Skip to main content

उपवासाचे ढोंग

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘कळतंय पण वळत नाही’ असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो.

जरा नजर टाकूयात का मराठी माणसाच्या उपवासाच्या खास ‘मेन्यू’ वर? त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी ! त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा! तेव्हा असे बरेच पदार्थ दिवसातून तीनदा यथेच्छ खाल्यावर तो दिवस हा ‘उपवासाचा’ म्हणता येईल?

अशा अशास्त्रीय पद्धतीने उपवास ‘साजरे’ करून तथाकथित धार्मिकता जोपासली जाते. पण, त्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. उलट तोटाच होण्याची शक्यता अधिक.

उपवासाला खायला काय ‘चालते’ आणि काय ‘चालत नाही’ हा तर एखाद्या लघुप्रबंधाचा विषय होईल! त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो ! किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत ! उलट, जिभेचे चोचले पुरवणारे, जठराम्ल वाढवणारे आणि मेदवृद्धी करणारे पदार्थ मात्र उपवासाच्या ‘मेन्यू’ मध्ये उच्च स्थानावर असतात. अनेक नियतकालिकांतून ‘उपवासाच्या पाककृती’ ची वर्णने करणारी सदरे जोरात असतात. त्यातून नवनवीन पदार्थांची भर या ‘मेन्यू’ मध्ये सतत होत असते.

थोडक्यात काय तर उपवासाचा दिवस म्हणजे ‘साबुदाणा – दाणे – बटाटा’ या त्रिकुटाची रेलचेल असलेला दिवस होय. काही विशिष्ट कालावधीत तर या त्रिकुटाचा सप्ताह देखील साजरा होताना दिसतो ! एकदा सहज गंमत म्हणून मी घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपवास-दिन आहार बारकाईने पाहिला. तो असा होता:
सकाळी उठल्यावर : साखरयुक्त चहा.हे एक उत्तेजक पेय पण ते पाहिजेच कारण त्याच्याशिवाय ‘’मला होतच नाही’’.
सकाळचा नाश्ता: साबुदाण्याची दूध-साखरयुक्त खीर
औषधे : मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या गोळ्या. नेहेमीचे एक आयुर्वेदिक चूर्ण मात्र टाळले गेले कारण त्यात हळद असते ( जी खरे तर आरोग्यदायी आहे) व ती ‘चालत नाही.’

दुपारचे जेवण: साबू-खिचडी, रताळ्याचा कीस, काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर, दाणे व कोथिंबीर यांची चटणी व ताक (अर्थातच ते साखर व मीठयुक्त).

औषधे: मधुमेहाची गोळी. नेहेमीची बडीशेप (जी खरे तर पाचक असते) मात्र टाळली कारण ती ‘चालत नाही’.
संध्याकाळचे खाणे: राजगिरा- शेंगदाणे चिक्की (विकतची) व चहा

रात्री: वरईचा भात व चवदार दाण्याची आमटी. घरी त्यांच्या नातवाने आईसक्रिम आणले होते ते थोडे खाल्ले कारण ते ‘चालते’.

तेव्हा या ‘उपवास-दिनाने’ त्यांच्या आरोग्याला काय फायदा झाला यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. किंबहुना अशा दिवसाला नेहेमीपेक्षा ‘वेगळे पदार्थ खाण्याचा दिवस’ असे संबोधणे योग्य राहील.
आपल्याकडे बहुतेक लोक हा वरीलप्रमाणे ‘दुप्पट खाशी’ प्रकारचा उपवास करतात. परंतु, खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या खालील प्रकारच्या आढळून येतात:

१. दिवसाचे १२ तास अन्न व पाणी पूर्ण वर्ज्य
२. दिवसभर अन्न वर्ज्य पण, पाणी भरपूर पिणे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात हा प्रकार सर्वोत्तम आहे.
३. फक्त द्रव पदार्थ पिणे (पाणी, शहाळे, सरबत इ.)
४. फक्त फळे खाणे. तीही पाणीदार व कमी गोडीची.
वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो हे निःसंशय.

आता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. लहानपणी घरी पारंपारिक ‘दुप्पट खाशी’ प्रकारचे उपवास हे लादलेलेच होते. तेव्हा अर्थातच ती चंगळ वाटायची आणि ते पदार्थ मनमुराद खात असे. बहुतेक मुले ही त्यासाठी उपवास-दिनाची वाट पाहत असत. महाविद्यालयीन वयात या प्रकारातील फोलपणा ध्यानात आला होता.पण, घरात वाद नकोत म्हणून तसे उपवास ‘साजरे’ करत होतो. मात्र जेव्हा स्वतंत्र संसार थाटला आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले तेव्हा विचारपूर्वक या ढोंगातून बाहेर पडलो. मग स्वतःच्या पद्धतीने उपवास संकल्पना आचरणात आणली. सुरवातीस आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण बंद केले. पुढे वयाची चाळीशी उलटल्यावर तर रोज रात्रीचे ‘जेवण’ हा प्रकार बंद करून त्याऐवजी फक्त फलाहार ठेवला. याचे फायदे चांगलेच जाणवले.

मग ‘उपवास’ या संकल्पनेवर खोलवर विचार करू लागलो. खऱ्या उपवासातून जसा आरोग्याला फायदा होतो त्याचबरोबर एक प्रकारचा मनोनिग्रह आपण शिकतो. जरी एखाद्याने आपल्याला त्या दिवशी आपला सर्वात आवडता चमचमीत पदार्थ देउ केला तरी तो नाकारण्याचे बळ आपल्याला मिळते.
पुढे जाउन असे वाटले की असा मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा? गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे. सतत ‘दिल मांगे मोअर’ असे वातावरण अवतीभवती दिसते. बौद्धिक श्रमांच्या आहारी गेल्याने आपण शारीरिक श्रमांना हीन लेखत आहोत. स्वावलंबनाचा आपल्याला विसर पडतो आहे. तर या दृष्टीने आपण अजून काही गोष्टींचा निग्रह करू शकू का असे स्वतःला विचारले. त्यातून एक कल्पना स्फुरली. ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरले:

१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले एक मुख्य जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

असा दिवस पाळण्यास आपल्या साप्ताहिक सुटीचा दिवस उत्तम ठरतो. सुरवातीस या सर्व गोष्टी एकदम करणे जरा जड गेले पण, टप्प्याटप्प्याने सर्व जमत गेल्या. असा हा दिन खरोखर आनंददायी ठरला आणि त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यास चांगला फायदा झाला, हे सांगणे नलगे.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर नजर टाकता काही आजार ठळकपणे उठून दिसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त्यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित स्वरूपात एखाद्या उपवासदिनाची नक्कीच गरज आहे. मात्र तो उपवास हा खराखुरा हवा. त्याचे निव्वळ ढोंग नको.

ज्यांना या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटते त्यांनी आपण करीत असलेल्या पारंपरिक उपवास पद्धतीकडे (म्हणजे साबूदाणा, दाणे, बटाटा इ.) डोळसपणे पाहावे. त्यावर जरूर विचार करावा. जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी नक्कीच साबुदाण्याच्या खिचडीची सुटी करू शकू!
***********************************************************

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/02/2017 - 09:16

मला मनोनिग्रह दिवस मुद्दाम पाळण्याची गरज पडत नाही. आठवड्याचे पाच दिवस मी स्वतःच्या हातचं जेवते. विकेण्डच्या ब्रेकफास्टला बरा अर्धा पोहे आणि साबुदाण्याची खिचडी करून खायला घालतो; तेव्हा मी भरपूर हादडते.

काॅफी हे व्यसन मला अनेक वर्षांपूर्वी लागलंय; मला ते सोडायचं नाही. दिवसातून दोनच्या जागी तीन कप काॅफीची लहर आली, याचा अर्थ मूड फारच उत्तम आहे आणि दिवसभरात चिकार वाचन-अभ्यास होत आहेत.

आदूबाळ Thu, 16/02/2017 - 12:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण गार पाण्याने आंघोळ करता का तुम्ही? अ‍ॅट लीस्ट तुमची मांजर तरी? नाहीतर सगळं फिजूल आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/02/2017 - 23:45

In reply to by आदूबाळ

परवाचीच गोष्ट आहे. मी घरभर नाचत होते, 'वश्या आला, वश्या आला' म्हणत. म्हणून बऱ्या अर्ध्याला म्हटलं, "आता पाण्याच्या हीटरचं तापमान कमी करून ठेवू. पाणी सतत एवढं गरम ठेवायची गरज नाही." तर तो म्हणे, "राहू दे. दोन दिवसांनी (म्हणजे काल-आज आणि उद्या पहाटे) तापमान १०से.च्या खाली उतरणार आहे. त्यानंतर बघू."

तर मी मनोनिग्रह केला, आणि त्याला ढोस पाजला नाही. एरवी, 'पुरुषांना काय अक्कल असते, घर कसं चालवायचं याची!' असं म्हणून लेक्चर मारलं असतं. पण तसं केलं नाहीच, शिवाय स्वतः आंघोळ करताना शॉवरचा नॉब गार पाण्याकडे झुकवून आंघोळ केली. म्हणजे त्याच्या तुलनेत गार पाण्यानंच म्हटलं पाहिजे. शिवाय, नेहमीच उशीर झालेला असतो त्यामुळे तीन मिनीट १४ सेकंदात संपूर्ण स्वच्छ होऊन शॉवरबाहेर आले होते! बघा, बघा, मनोनिग्रह बघा!!

त्यापलीकडे मला गार पाण्यानं आंघोळीची चैन करण्याची काहीही गरज नाही. रात्री नऊ तास झोपलं, आणि सकाळी उठून कॉफी प्यायली की गार पाण्यानं आंघोळ करण्याची गरजच नाही. आपसूक जाग येते.

मांजरीच्या आंघोळीचं बोलूच नका! मांजरीसारखा स्वच्छ प्राणी नाही. स्वतःची चाटावी लागली तरीही चालेल, पण पाण्याचा टिपूस वाया न घालवता ती स्वच्छ राहते. तुमच्या हानग्या कुत्र्याला नाही समजणार या गोष्टी!

अनु राव Thu, 16/02/2017 - 09:33

कोणाला "उपास" करतो म्हणुन साबुदाणा, बटाटा, दाण्याची आमटी वगैरे खायची असेल तर तुमचा का जाच?
त्यांच्या पैश्यानी ते खातात वर ते तुमच्याकडे येऊन काही तक्रार पण करत नाहीत. मग तुमची का हरकत?

त्यापेक्षा तुम्ही हे मनोनिग्रह कायमचे का पाळत नाहीत?

१. व्हॅल्यु जजमेंटल होयचे नाही,
२. लोकांना विचार आचार स्वातंत्र्य द्यायचे,
३. स्वताच्या पैश्यानी खाणार्‍या लोकांच्या खाण्याच्या पद्द्धतीवर टिका करायची नाही ( तुमच्या पैश्यानी खात असतील तर काहीही शिव्या घाला ).
४. कोणी जर कुठल्याही गोष्टीत, कृतीत आनंद , समाधान मिळवत असेल ( दुसर्‍यांना त्रास न देता ) तर त्याच्या आनंदावर विरजण घालायचे नाही.

अनु राव Thu, 16/02/2017 - 09:37

१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले एक मुख्य जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

१.ह्या असल्या टुच्च्या गोष्टींनी काय होणार आहे?
२.सौम्य किंवा कडक व्यसने केली तर तुमची काय हरकत आहे?
३.उद्या बर्फानी अंघोळ करा असे म्हणाल, काहीही बोलायचे का? कोणाला कीती गरम पाण्यानी आंघोळ करायची ते करु दे की.
४. रोज घासा की ताटे, पण फक्त स्वताचीच का? बायकोची पण घासा. एकच दिवस का? रोज घासा. रो सर्वांना स्वैपाक करुन पण वाढा. तुम्हाला सुधारायला खुप वाव आहे हो.
५. चालत वगैरे जाउन काम करायला आमच्या कडे वेळ नाही.

गब्बर सिंग Fri, 17/02/2017 - 00:58

In reply to by अस्वल

तुमको क्या प्रॉब्लेम हय?

रदबदली करतोय.

अनु चा प्रॉब्लेम काय आहे ते स्वच्छ व स्पष्ट झालेले नाहिये का ?

अस्वल Fri, 17/02/2017 - 23:06

In reply to by गब्बर सिंग

ते असेल हो.
पण लेखात त्यांना न पटलेल्या गोष्टी जशा त्यांनी प्रतिक्रियेत मांडल्या तशा त्यांच्या प्रतिक्रियेतल्या न पटलेल्या गोष्टी मी प्रति-प्रतिक्रियेत मांडल्या.
दमलो हे वाक्य लिहून. आता जरा च्यवनप्राश खातो, अर्थात उपवासाला चालत असेल तरच.

सामो Thu, 16/02/2017 - 12:20

मनोनिग्रह? ते काय असतं रे भाऊ?
.
पण सिरीअसली, विलपॉवरचा, मनोनिग्रहाचा प्रॉब्लेम आहे. मिडनाईट स्नॅकिंगसारखी घातक सवय लागलेली आहे व नेल बायटींग पाचवीस पूजलेली आहे. अजुन छोटे छोटे मनोनिग्रह आहेतच जसे व्यायाम.
.
असा एक दिन खरच अनुसरायचा कि-मा-न प्रयत्न करुन पहाते. उदा दर शुक्रवारी १ बस मिस करुन, स्कायवॉकवरुन चालतच जायचं, यायचं अशा सोप्यापासून ते मैल बाइटींग करायचे नाही अशा अवघडपर्यंत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/02/2017 - 23:47

In reply to by सामो

नखं खाल्ली नाही तर विचार कसा करणार! बरा अर्धा स्वतःच्या डोक्यावरचे केस पिरगळतो, पण मी हेअरस्टाईल न बिघडवण्याचा मनोनिग्रह कसोशीनं पाळते.

गब्बर सिंग Fri, 17/02/2017 - 00:59

In reply to by सामो

मनोनिग्रह?

"तुझे आहे तुजपाशी" हे नाटक युट्युब वर मोफत पहा अशी सुचवणी.

मनोनिग्रह पेक्षा अधिक चांगली संज्ञा ऐकायला मिळेल.

सामो Fri, 17/02/2017 - 06:23

In reply to by गब्बर सिंग

हा काय चाललाय, त्यावर हे काय लिहतायत म्हणजे ह्याचा ह्याला काही हाच ऊरलेला नाही.
____
सॉरी हे तरुण तुर्क मधील आहे. तुझे आहे तुजपाशी पहाते.

राही Fri, 17/02/2017 - 13:11

In reply to by सामो

नखं? ती तर खाण्यासाठीच असतात. किमान तोंडात घालण्यासाठी तरी असतातच असतात. निदान भारतात तरी.आणि धातूच्या चमच्याच्या थंडगार आणि कठिण चव/स्पर्शापेक्षा मऊ आणि उबदार नखं बरी की.
(ऊं: त्यात काय.सचिन तेंडुलकरसुद्धा खातो की.)

तिरशिंगराव Thu, 16/02/2017 - 20:08

कुठल्याही अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरला विचारा, पचनसंस्थेला विश्रांती पाहिजे, हे गृहीतच मुळी अशास्त्रीय आहे.
आणि काय खायचं, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
मी तर कधीचा, साबुदाण्याच्या खिचडीत, प्रॉन्स घालावेत या मताचा आहे. पण घरी या मताचा आदर राखला जात नाही.

अस्वल Thu, 16/02/2017 - 23:14

गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे.

ह्या वाक्याचा अर्थ खरंच कळला नाही. चंगळवादी म्हणजे नक्की काय असतं? हातात पैसा आहे, बाजारात वस्तू आहेत, त्या खरेदी कराव्यात, हाटेलात खावं प्यावं, बरे कपडे ऑनलाईन विकत मिळतात ते तिथे घेऊन नको असल्यास परत करावेत - त्या निमित्ताने ४ लोकांना रोजगार द्यावा- इज द्याट चंगळवाद?

गब्बर सिंग Fri, 17/02/2017 - 01:22

In reply to by अस्वल

ह्या वाक्याचा अर्थ खरंच कळला नाही. चंगळवादी म्हणजे नक्की काय असतं? हातात पैसा आहे, बाजारात वस्तू आहेत, त्या खरेदी कराव्यात, हाटेलात खावं प्यावं, बरे कपडे ऑनलाईन विकत मिळतात ते तिथे घेऊन नको असल्यास परत करावेत - त्या निमित्ताने ४ लोकांना रोजगार द्यावा- इज द्याट चंगळवाद?

मुद्दा एकदम शॉल्लेट आहे.

चंगळवाद ही सुरेश भटेवरांसारख्या पत्रकारांनी मराठी भाषेला बहाल केलेली संज्ञा आहे. लोकांना हवं आहे ते द्यायचं असा मुद्दा आहे. व तो न्युजकॉन्टेंट च्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. जिन्हे पढना है वो अखबार खरीदते है और पढते है. उससे भी रोजगार का निर्माण होता है.

१४टॅन Fri, 17/02/2017 - 15:38

मला हे पूर्णतः पटलेलं आहे. बाकी ते मनोनिग्रह, चंगळवाद वगैरे मरो. पर्सनल ओपिनिअन्स एव्हरीव्हेअर. पण ते पाच मुद्दे आवडले. पटले.

कुमार१ Mon, 20/02/2017 - 12:39

गार पाण्याने अंघोळ
हे कशासाठी? >>>>

हा निग्रह करण्यामागे दोन हेतू. एक म्हणजे वेळप्रसंगी गरम पाण्याची सोय नसल्यास आपले अडले नाही पाहिजे. दुसरे असे की शहरी जीवनात आपण पाणी तापवण्यासाठी इंधन वा विजेचा भरपूर वापर करतो. या दोन्ही संसाधनांच्या बाबतीत आपल्या देशाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. तेव्हा याची मनाला बोच म्हणून त्यांची थोडी तरी बचत करण्याची सवय लाउन घ्यावी.(अर्थात हे सर्व स्वतःपुरते ठेवायचे. कोणी विचारले तरच सांगायचे.)

सामो Mon, 20/02/2017 - 12:44

In reply to by कुमार१

तसं होत नाही हा स्वानुभव आहे. गार पाण्याची सवय होत नाही. गरम पाण्याचा शेक ही गरज आहे, लक्झरी नाही. त्यामुळे गार पाण्याने आंघोळ हे फक्त स्वपीडन होऊन बसते.

प्रकाश घाटपांडे Mon, 20/02/2017 - 12:47

In reply to by सामो

कड्क थंडीत गार पाण्याची अंघोळ हा आत्मपीडनाचा प्रकार वाटतो. पण काहींना त्यातही आनंद वाटू शकतो. मनाचे तसे कंडिशनिंग झाले असते.

अनु राव Mon, 20/02/2017 - 13:23

In reply to by कुमार१

तसेच, नहेमीचे शिजवलेले, सवयीचे अन्न वेळप्रसंगी मिळणार नाही ही शक्यता गृहीत धरुन आठवड्यात एक दिवशी पाने, कंदमुळे स्वता शोधुन न शिजवता खाण्याचा मनोनिग्रह करणे गरजेचे आहे.

तसेच शाकाहारी लोकांनी, कधी तरी शाकाहारी अन्न मिळणारच नाही ही शक्यता गृहीत धरुन आठवड्यात एक दिवशी मांस खाण्याचा मनोनिग्रह करणे गरजेचे आहे.

तसेच मांसाहारी लोकांनी, कधी तरी प्राण्यांचे मांस मिळणारच नाही ही शक्यता गृहीत धरुन आठवड्यात एक दिवशी तरी माणसाचे मांस खाण्याचा मनोनिग्रह करणे गरजेचे आहे. ( आठवा आठवा तो सुप्रसिद्ध विमान अपघात )

कुमार१ Mon, 20/02/2017 - 13:05

कड्क थंडीत गार पाण्याची अंघोळ हा आत्मपीडनाचा प्रकार वाटतो. पण काहींना त्यातही आनंद वाटू शकतो. मनाचे तसे कंडिशनिंग झाले असते.>>>>
एका परिचिताने त्याच्या दोन्ही मुलींना ६ महिन्यांच्या असल्यापासून गार पाण्याच्या अंघोळीची सवय लावली होती. हेतू हा की धट्ट्याकट्ट्या करणे.
मी त्याकडे फक्त १ दिवसाचा इंधन्/वीज उपवास म्हणून बघतो.
हा फक्त एक विचार आहे. कोणावरही कोणी सक्ती करू नये हे योग्यच.

सामो Mon, 20/02/2017 - 13:33

In reply to by कुमार१

होय माझेही तसेच झालेले. बाबांनी ही सवय लावलेली. पण लागली नाही. उलट आज्जी तर म्हणायची गार पाण्याने उतारवयात संधीवात होतो. त्यात तथ्य किती देवच जाणे कारण मला किंचीत संधीवात आहे पण तो गार पाण्याने असेल याला शास्त्रिय आधार वाचनात आलेला नाही.
_______
अजुन एक मला तरी ऊशीरा सवय लावली होती. पण ६ महीन्याच्या बाळाला गार पाण्याने आंघोळ? वेडा आहे तो मनुष्य, वेडा. अशा लोकांना लहान बाळाची आबाळ केली या गुन्ह्याखाली शिक्षा व्हायलाहवी. इथेही व्हेगन डाएटवरती मुलांना ठेवणारे महाभाग आहेत. मग मुलं कुपोषित, अशक्त, मालनरीश्ड (मुद्दाम द्विरुक्ती करतेय. ठसवायला) होतात व यथावकाश पालकांना अटक होते. जी की व्हायलाच हवी. इथे "एव्ह्रीबडी ऑन हिज ओन" म्हणणं हा तद्दन डोळेझाकी शहामृगीय प्रकार आहे. मला नाव द्या मित्राचं, फेसबुकवर निषेध नोंदवते.
_______________
गार पाण्याने आंघोळ करुन कोणी धट्टेकट्टे होऊन ऑलिम्पिकमध्ये गेल्याचा काही विदा आहे का? काय वेडगळ समजूती आहेत. ते कच्चं अंडं दूधात घालून पीणं तसच त्याने अनेकांचं पोट वगैरे दुखतं, तांबं पोटात जावं म्हणुन तांब्याच्या फुलपात्रातून ते कळकलेली चव असलेलं पाणी पीणं ही तसच रोज एवढ्या तांब्यानी नक्की फायदा होतो की दुष्परीणाम कोणाला ठाऊक. मग स्वतःला गिनीपिग कशाला बनवायचं. अडाणीपणे करायला जातो भलं आणि उलट भलत्या खाईतच पडतो असं तर होत नाही ना हे सुद्धा तर तपासून पहायला हवं.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/02/2017 - 23:10

In reply to by सामो

स्वच्छ घासलेली तांब्याची भांडी छान दिसतात. मी बराच काळ तांब्यात ठेवलेलं पाणी चांदीच्या पेल्यातून पीत असे.

गार पाण्यानं आंघोळ हा प्रकार आपण कुठे राहतो यावरही अवलंबून आहे. पुण्या-मुंबईत भर उन्हाळ्यात गार पाण्यानं आंघोळ ही चैन ठरू शकते, विशेषतः पावसाळा लांबला तर. तू जिथे राहतेस तिथे थंड पाण्यानं आंघोळ म्हणजे मरणाला आमंत्रण; धूम्रपानासारखं कूर्मगतीनं नाही, प्रकाशाच्या वेगानं. तसंच १८-२० वर्षाच्या लोकांनी उपासाच्या दिवशी खाल्ले साबुदाणे आणि रताळी, काय फरक पडणार आहे! माणसांची राहण्याची जागा, वय, सवयी या गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात.

आणखी एक गंमत. मी दुसरीत असताना आमच्याकडे कपडे धुण्याचं यंत्र आलं; तोवर "माझे कपडे कायम मीच धुतले, अगदी रुमालसुद्धा", असं माझे वडील मोठ्या अभिमानानं म्हणायचे. त्यांच्या पिढीसाठी ही गोष्ट पुरुषांसाठी अभिमानास्पद असेलही; आता बाबांनी याबद्दल अभिमान मिरवला असता तर मी हसले असते आणि त्यांना म्हटलं असतं, "उद्या म्हणाल, मी स्वतःच जेवतो, मला कुणी भरवत नाही!"

Everyone is a relative - Einstein's mother.

सामो Mon, 20/02/2017 - 23:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होय हा प्रतिसाद आवडला.
You always amaze me at your capability of putting yourself in other person's shoes. आणि म्हणुनच कदाचित तू स्त्रीमुक्तीवादी आहेस. अन्यायाची चीड आणि तो मुख्य म्हणजे जाणून घेता येतो तुला.

गब्बर सिंग Tue, 21/02/2017 - 00:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणखी एक गंमत. मी दुसरीत असताना आमच्याकडे कपडे धुण्याचं यंत्र आलं; तोवर "माझे कपडे कायम मीच धुतले, अगदी रुमालसुद्धा", असं माझे वडील मोठ्या अभिमानानं म्हणायचे. त्यांच्या पिढीसाठी ही गोष्ट पुरुषांसाठी अभिमानास्पद असेलही; आता बाबांनी याबद्दल अभिमान मिरवला असता तर मी हसले असते आणि त्यांना म्हटलं असतं, "उद्या म्हणाल, मी स्वतःच जेवतो, मला कुणी भरवत नाही!"

भारतातल्या बहुतांश लोकांकडे वॉशिंग मशीन नसते. तेव्हा वॉशिंग मशीन ही पुस्तकी बाब आहे. तेव्हा त्यावर आधारीत सगळ्या संकल्पना, मुद्दे हे सुद्धा पुस्तकी आहेत. पुस्तकी असते ते असत्य असते. पुस्तकी असते ते प्रत्यक्ष व्यवहारात कधीही येत नाही. ते फक्त पुस्तकातच राहते. उदा. वॉशिंग मशीन ही बहुतांश पुस्तकी संकल्पना असल्याने त्याची किंमत कोणालाही माहीती नसते. सबब तुमचा मुद्दा पुस्तकी आहे. याला तुम्ही पोथिनिष्ठ सुद्धा म्हणू शकता बर्का. फक्त पोथिनिष्ठ हा थोडा इन्टेलेक्च्युअल शब्द आहे. (म्हंजे दुसरं प्रशंसात्मक काही सुचलं नाही की तो शब्द वापरायचा असतो.) पुस्तकी हा सामान्य माणसाचा शब्द आहे. सामान्य माणूस हा पुस्तकी नसतो. सामान्य माणूस हा व्यवहारी असतो. व्यवहारी व पुस्तकी हे दोन विरूधार्थी शब्द आहेत. ____ इति मनोबा.

मनोबाला लवकर प्रमोशन मिळावे म्हणून तो त्याच्या मॅनेजर ला खुश करण्यासाठी "हे पुस्तकी व ते प्रॅक्टिकल" असा भाव करू इच्छितो. त्यास पाठिंबा देण्यासाठी दिलेला प्रतिसाद.

मनीषा Tue, 21/02/2017 - 00:55

बहुसंख्य लोक, उपवासाचे पदार्थ खाउन पण मनोभावे उपास करतात . त्यांच्या करण्याला सरसकट ढोंग म्हणणे पटले नाही.
तुमच्या दृष्टीने * ती पद्धत चु़कीची असेल, पण ते करणार्‍याची भावना खरी असते. त्यात कसली खोट नसते. तसेही आपल्यावर संस्कारच असे असतात, की चारचौघे वागतात , बोलतात तेच योग्य. त्या वेगळे काही करू जाल, तर एकटे रहाल. म्हणुन माणसे पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती , समजुती घट्टं पकडून राहतात.

* तुमच्या दृष्टीने योग्य अथवा अयोग्य असलेली गोष्टं, इतरांनाही तशीच वाटावी हा अग्रह तुम्ही करू शकत नाही .

***********************