बुलेट ट्रेन (भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण
अकबराचा थोरला मुलगा जहांगीर म्हणजे मुघल- ए- आझम या चित्रपटातला सलीम, मुघल साम्राज्याचा सम्राट असूनही अफूच्या आहारी गेला होता. त्याच्यानंतर त्याचा तिसरा मुलगा खुर्रम, आपल्या धाकट्या भावाला (शहर्यारला) हटवून मुघल सल्तनतीचा सम्राट बनला. त्याला आपण ओळखतो ते शहाजहान म्हणून. मुमताजमहालचा नवरा आणि औरंगझेबाचा बाप असलेल्या शहाजहानने १६३२ मध्ये ताजमहाल बांधायचा निर्णय घेतला. १६५३ मध्ये काम पूर्ण झाले. २०,००० लोकांनी २२ वर्षे काम करून जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य यमुनेच्या तीरावर वसवले.
Courtesy : Internet |
Courtesy : Internet |
अॅडम स्मिथच्या आधी युरोपमध्ये देखील शहाजहान सारख्या राजांची चलती होती. संपत्ती म्हणजे सोने, नाणे हाच विचार युरोपमध्ये फोफावला होता. खोलवर रुजला होता. पण अॅडम स्मिथने या सगळ्याला धक्का दिला आणि ठामपणे सांगितले की देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या त्या वस्तू आणि सेवा ज्यांची संपूर्ण जगात मागणी आहे. त्याच्या दृष्टीने जग म्हणजे एक बाजारपेठ होती. ज्यात वेगवेगळे समूह आपापली उत्पादने विक्रीस घेऊन येत होते. या खरेदी विक्रीस राजे राजवाड्यांचा, 'संपत्ती म्हणजे सोने नाणे' हा विचार आडवा येत होता. कारण आयात केली की सोने नाणे द्यावे लागते म्हणजे राष्ट्राची संपत्ती कमी होते, या विचाराने सर्व देश आयाती विरुद्ध निर्बंध घालून होते. आणि अॅडम स्मिथचे विचार तर अनिर्बंध बाजाराची मागणी करत होते. तो अनिर्बंध व्यापाराचा, मुक्त अर्थव्यवस्थेचा आणि 'लेझे फेअर' सरकारचा इतका कट्टर समर्थक होता की त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीला कडवा विरोध केला आणि अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी अमेरिकन वसाहती बरोबर असून इंग्लड सरकारचे चुकते आहे असे मत त्याने मांडले.
Courtesy : Internet |
(लेझे फेअर सरकार म्हणजे अर्थव्यवस्थेत ढवळाढवळ न करणारे सरकार. अॅडम स्मिथच्या मते सरकारचे काम केवळ कायदे करणे आणि त्याची अमबजावणी करणे इतकेच असावे. स्वतः बाजारात उतरणे, किंवा कुणाला मक्तेदारी अथवा विशेषाधिकार देऊन अर्थव्यवस्थेला एका दिशेला झुकवणे हे सरकारचे काम नाही)
त्याच इंग्लंडमध्ये १८८३ ला अजून एका अर्थतज्ञाचा जन्म झाला. पहिल्या महायुद्धानंतर पराभूत जर्मनीवर लादलेल्या अटी जाचक आहेत आणि यात पुढील काळासाठी अशांतीची बीजे रोवलेली आहेत असे ठामपणाने सांगणारा आणि १९२९च्या आर्थिक मंदीतून जगाला बाहेर पडण्याचा एक रस्ता दाखवणारा हा ब्रिटिश अर्थतज्ञ म्हणजे 'जॉन मेनार्ड केन्स'. जेव्हा लोकांची खर्च करण्याची इच्छा कमी होते आणि पैसा साठवण्याकडे कल वाढतो तेव्हा खाजगी व्यवसायांना घरघर लागते. अश्यावेळी सरकारने बाजारात उतरावे आणि स्वतः गुंतवणूक करावी असा सल्ला त्याने दिला. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचं म्हणजे, 'सरकारने छापील चलन बाटल्यांमध्ये भरावं, निरुपयोगी ठरलेल्या कोळशाच्या खाणीत त्या बाटल्या पुराव्यात, त्यावर शहरभरचा कचरा टाकून त्या बुजवाव्यात आणि मग लेझे फेअर तत्वाचा वापर करत बाजूला होऊन, त्या बाटल्या वर काढण्याचं काम खाजगी उद्योगांना द्यावं, म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल'.
Courtesy : Internet |
यातला ब्रिटिश विनोद सोडला तर या उपायामागील महत्वाचे तत्व होते, अॅडम स्मिथने सांगितलेला लेझे फेअरचा मार्ग काही विशिष्ट परिस्थितीत योग्य आहे. सरकारने कायमस्वरूपी लेझे फेअर रहाणे अर्थव्यवस्थेसाठी हितावह नाही. जेव्हा समाजाचा अर्थव्यवस्थेवरचा विश्वास उठतो तेव्हा तो परत आणण्यासाठी सरकारला बाजारात उतरणे क्रमप्राप्त असते. सरकारने असा रोजगार द्यावा की ज्यामुळे बाजारात नव्या वस्तू येणार नाहीत पण लोकांच्या हातात पैसा खेळता राहील. यातून बाजारात आधीपासून असलेल्या वस्तूंची मागणी वाढेल आणि खाजगी क्षेत्राला पुन्हा चालना मिळेल.
सन १९०० पासून अमेरिकन सरकारने नेवाडाच्या वाळवंटात कोलोरॅडो नदीवर मोठा धरण प्रकल्प बांधण्याची योजना आखलेली होती. पण प्रकल्प रेंगाळत होता. १९२९ची आर्थिक मंदी आली. केन्सने 'पैसे बाटलीत घालून कोळशाच्या खाणीत पुरा आणि ते बाहेर काढणाऱ्या लोकांना तोच पगार द्या' चा उपाय सुचवला. आणि धरण बांधायला जणू तात्विक पाया मिळाला. १९३१ मध्ये कोलोरॅडो नदीवर जगप्रसिद्ध हूवर धरण बांधायला सुरवात झाली. २१,००० लोकांनी ७ वर्षे काम करून धरण बांधलं. हूवर धरण बांधायला अमेरिकन सरकारला कुणाकडूनही कर्ज मिळणार नव्हतं. आणि बहुतेक सरकारकडे शहाजहानइतका पैसाही नव्हता. म्हणून सरकारने स्वतःच हूवर धरण प्रकल्पाला कर्ज दिलं. १४० मिलियन डॉलर्सचं कर्ज. हूवर धरण प्रकल्पाने हे कर्ज ५० वर्षात फेडावं अशी अपेक्षा होती.
Courtesy : Internet |
कर्ज फेडणार कसं? धरणाला उत्पन्न कुठलं? तर त्यावर एक जलविद्युत प्रकल्प उभारून तीन राज्यांना त्या विजेचा पुरवठा होणार होता. ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि नेवाडा.
Courtesy : Internet |
कॅलिफोर्नियामध्ये हॉलिवूड बहरू लागलं. १९५५ मध्ये तिथे जगातील पहिलं डिस्नेलँड थीम पार्क बनलं आणि आता तर तिथे सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत.
Courtesy : Internet |
नेवाडा म्हणजे वाळवंट. १९३१मध्ये अतिशय विरळ लोकसंख्या असलेलं राज्य. इथे वीज घेणार कोण? मग १९३१ला नेवाडामध्ये जुगार कायदेशीर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे संपूर्ण अमेरिकेत नेवाडा सोडून इतर राज्यांत जुगारप्रतिबंधक कायद्यांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे नेवाडातील लास वेगास ही अमेरिकेतल्या आणि जगातल्या जुगाऱ्यांची पंढरी बनली. वेश्याव्यसाय कायदेशीर असणारं नेवाडा हे अमेरिकेतील एकमेव राज्य आहे. लास वेगासमधले गर्दीने भरून वाहणारे कॅसिनो आणि तिथलं जगप्रसिद्ध नाईट लाईफ, काही अपवाद सोडल्यास रात्रभर हूवर धरणाच्या वीजप्रवाहावर लखलखत असतं. जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतं आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत परकीयांच्या पैशाची भर घालतं. त्याशिवाय नेवाडामध्ये वैयक्तिक उत्पन्नावर कर नाही आणि अप्रत्यक्ष कर अतिशय कमी आहेत. त्यामुळे सुरवातीला जरी बग्सी सीगल सारख्या कुख्यात गुंडांनी लास वेगासमध्ये गुंतवणूक केली असली तरी नंतर हॉवर्ड हयुजेससारख्या प्रतिष्ठित धनाढ्य लोकांनी लास वेगासमध्ये गुंतवणूक करून नेवाडाच्या अर्थव्यवस्थेत भर घातली. १९८७ मध्ये सरकारने दिलेलं कर्ज हूवर धरणाने फेडलं. तोपर्यंत तीन राज्यातील विजेचे ग्राहक आपापल्या वीजबिलातून दरवर्षी ३% दराने, ५.४० मिलियन डॉलर्स व्याज म्हणून भरत होते.
कुणी म्हणेल अमेरिकन सरकारने हवेतून कर्ज निर्माण केलं. मी म्हणतो अमेरिकन सरकारने पुढील पिढ्यांकडून वस्तू आणि सेवा उत्पादन करून घेऊ अशी स्वतःच स्वतःला ग्वाही दिली आणि त्या भविष्यकालीन उत्पादनाच्या हमीवर धरणाला कर्ज दिलं. मग लोकांनी काम करावं, त्यांच्याकडील वस्तू आणि सेवा फक्त अमेरिकनांनीच नव्हे तर जगभरातील लोकांनी विकत घ्याव्यात म्हणून तसे नवे कायदे बनवले. तशी व्यवस्था बनवली.
२०,००० लोकांनी २२ वर्ष खपून ताजमहाल बनवला. आपल्या सल्तनतीचा साठवलेला खजिना ज्यावर उधळला, तिकीट काढून त्याला बघायला पर्यटक येण्यासाठी जवळपास ३०० वर्षे जावी लागली. मुघलांचा खजिना ज्यामुळे रिकामा झाला त्या ताजमहालामुळे शहाजहानचे नाव इतिहासात अजरामर झाले पण त्याला किंवा त्याच्या वारसदारांना या तिकिटातून काहीही मिळणे अशक्य आहे. आग्र्याची अर्थव्यवस्था अजूनही जगात कुणाच्याही खिजगणतीत नाही.
२१,००० लोकांनी ७ वर्ष खपून हूवर धरण बांधले. देशाने धरणाला दिलेल्या कर्जातून. देशाच्या जनतेकडून वसूल केलेल्या करातून नाही. व्याजासहित कर्ज तीन राज्यांकडून वसूल केलं. धरणाचे तंत्रज्ञान स्वतः तयार केले. त्याच्या विजेने हजारो घरे आणि कारखाने उजळले. चित्रपट बनले. नायक नायिकाच काय पण चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेकांची घरे वसली. डिस्नेलँड, आयटी कंपन्या यांनी जगभर करोडो रोजगार निर्माण केले आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला जगाच्या पुढे नेले. हॉटेल्स आणि टुरिझम विकसित करून नेवाडाच्या वाळवंटात ओऍसिस फुलवलं.
वर उल्लेख केलेल्या दोन्ही प्रकल्पांवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास सारखी असली तरी प्रकल्पांची फलिते वेगवेगळी कशी काय झाली? कारण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा प्रकल्पामुळे नंतर कुठल्या वस्तू आणि सेवा तयार करण्यात येतील याबाबत अमेरिकन विचार स्पष्ट होते.
Courtesy : Internet |
बुलेट ट्रेन प्रकल्पात देखील १६,००० ते २०,००० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. पण त्यामुळे वाढलेल्या वेगाने किती जणांचा काय फायदा होणार आहे त्याबाबत सरकारी पातळीवर कुठल्याही योजना मला दिसत नाही. मुंबई अहमदाबाद हा प्रभाग करमुक्त होणार आहे काय? बुलेट ट्रेनचा खर्च केवळ येथील लाभार्थी उचलणार आहेत काय? बुलेट ट्रेनमुळे इथे कुठले नवीन उद्योग उभे राहणार आहेत? त्यांना सरकार काय प्रोत्साहन देणार आहे? त्यामुळे जगभरातून या प्रदेशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांची मागणी कशी वाढणार आहे? त्यामुळे आपण परकीय चलन कसे कमावणार आहोत? याबाबत काही स्पष्ट योजना दिसत नसल्याने मला बुलेट ट्रेनचे स्वागत करताना छातीत थोडे धडधडते.
मी बुलेट ट्रेनचे स्वागत करतो. खुल्या मनाने करतो. पण ते करत असताना भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकणार्या अनेक शक्यतांपैकी एक काळजी करण्याजोगी शक्यता मला दिसते.
इथे कर्ज परदेशातून आहे. तंत्रज्ञान इतरांचे आहे. कर्ज परतफेड संपूर्ण देशाकडून जमा केलेल्या करातून होणार असे आता तरी वाटते आहे. प्रवासाच्या वाढलेल्या वेगामुळे ज्यांना प्रत्यक्ष लाभ होईल त्या लाभार्थींची संख्या सध्या तरी नजरेसमोर येत नाही. म्हणून केवळ बुलेट ट्रेनचे अवाजवी स्वागत करण्यापेक्षा, समाजमाध्यमांवर; मित्रमंडळींशी लाथाळ्या खेळून, 'बाजारात तुरी' ही म्हण खरी करण्यापेक्षा, भविष्यातील अप्रिय शक्यता प्रत्यक्षात येऊ नये म्हणून मित्रांना तरी माझे मत विस्ताराने सांगावे असे मला वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच.
प्रतिक्रिया
लाभार्थी कोण आणि किती हे
लाभार्थी कोण आणि किती हे कोडंच आहे.
सहमत
हा रेल मार्ग दोन शहरे थेट जोडणारा आहे. आरंभबिंदू आणि अंतिमबिंदू याव्यतिरिक्त मधल्या लोकांना त्याचा फायदा फारच थोडा आहे. महाराष्ट्रात फक्त चार स्थानके आहेत. दोन स्थानकांदरम्यान खूपच मोठे अंतर असेल. मालवाहातुकीसाठी हा मार्ग वापरला जाणार की नाही याची माहिती नाही. निव्वळ प्रवासी वाहतूक असेल तर फक्त प्रवासवेळेत मोठी बचत याच एक मुद्द्याचा लाभासाठी उपयोग करून घेता येईल. उत्पादनक्षेत्र आणि कर्मचारीनिवासक्षेत्र यात २०० किमी चा फरकही ठेवता येईल. अर्थात मुख्य वसतीपासून लांबवर उत्पादनक्षेत्र नव्याने निर्माण करता येईल. तेथील रोजगार वापरणाऱ्या आणि तेथे रोजगार पुरवणाऱ्या अश्या दोन्ही गटांचा फायदा (बुलेट ट्रेनमुळे) आहे म्हणून या दोन गटांकडून कर घेता येईल. वायव्य महाराष्ट्रात सेवाउद्योग विस्तारता येईल. पण ग्रामीण भागातल्या मनुष्यबलाने बुलेट ट्रेनमुळे रोजगारासाठी पुन्हा मुंबई - अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेणे सुरू केले तर मात्र या उद्दिष्टाला हरताळ फासला जाऊ शकेल.
?
>>वायव्य महाराष्ट्रात सेवाउद्योग विस्तारता येईल.
यू मीन तलासरी-जव्हार? ऑर धुळे-नंदुरबार?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तलासरी बोयसर पालघर डहाणू.
धुळे नंदुरबार नव्हे. विरारपासून पुढे पश्चिमोत्तर सफाळे बोयसर पालघर डहाणू वगैरे.
विचारांना चालना
विचारांना चालना देणारा लेख आहे. अर्थशास्त्रात गति नसल्यामुळे ह्याहून अधिक लिहीत नाही. ह्या क्षेत्रातील जाणकारांची मते वाचायची उत्सुकता आहे.
मी तर कधीची वाट पाहतोय पुणे
मी तर कधीची वाट पाहतोय पुणे मिरज बुलेट ट्रेन कधी सुरू होते त्याची. पुणे कोल्लापूरही चालेल. म्हणजे रोज शानसे अपडौन करून घरी सुखाने राहता येईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिरज बुलेट ट्रेन
मी पण. मस्त शनि रवी शेती करेन. पाच दिवस आयटीत नोकरी. मिरजेत मस्त दंडोबावर जाईन सकाळी नाहीतर घाटावर पोहायला.
अश्या बुलेट ट्रेन मुळे शहरांवर येणारा त्राण खूप कमी करता येईल. विचार करा पुण्याच्या 200किमीच्या परिघात बुलेट ट्रेनचे जाळे आहे. साताऱ्यात राहणारा माणूस बुलेट ट्रेनने पुण्यात येईल. पुणे स्टेशनला जमिनीखाली मेट्रो स्टेशन असेल व त्याने तो मनुष्य कामाच्या ठिकाणी पोहचेल. सगळे धरून दिवसाचे चार ते पाच तरी यात खर्च झाले तरी अनेक जण साताऱ्या सारख्या शहरात राहणे पसंत करतील. बाहेरून पुण्यात येऊन अर्धे आयुष्य घर विकत घेण्यात घालवून शहराच्या कोंडाटात राहण्यापेक्षा निम्न शहरी भागात आयुष्याची प्रत तरी किमान चांगली असते. आता इंटरनेट व इतर माहिती दळणवळणाच्या साधनांमुळे निम्न शहरी गावे, तालुका स्तरावरील गावे, खेडी व मोजकी चार पाच शहरे यातली तफावत कमी होत चालली आहे.
सर, तुम्हीपण मिरजेचे का? लय
सर, तुम्हीपण मिरजेचे का? लय आनंद झाला फेलो मिरजकर इकडे पाहून. _/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हम्म्म्म्म्...
... कल्पना म्हणून वाईट नाही. (व्यक्तिशः, मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, कम्यूटर रेल वगैरे संकल्पनांच्या सक्त फेवरात आहे, ज्यांची अवस्था आमच्या देशात दुर्दैवाने (न्यूयॉर्कसारखे हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे अपवाद वगळता) आत्यंतिक दळभद्री आहे. इंटरसिटी वगैरे पुढची गोष्ट झाली, अगदी स्थानिक (सबर्बन) पातळीवरसुद्धा. कारणे अनेक असू शकतात; कार लॉबी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, आमच्या अटलांटासारख्या केसिसमध्ये छुपा किंवा उघड रेशियल अॅनिमससुद्धा. त्यांच्या तपशिलांत शिरू इच्छीत नाही, परंतु व्यावहारिक पातळीवर मेट्रो अटलांटाचा भाग गणल्या जाणाऱ्या परंतु तत्त्वतः अटलांटाच्या नगरवेशीबाहेरील उपनगरात असलेल्या (आणि म्हणून अटलांटाच्या स्केलेटल का होईना, परंतु असलेल्या झुकझुकगाडीच्या कार्यक्षेत्रात न येणाऱ्या) माझ्या घरापासून ते दुसऱ्या टोकास अटलांटाच्या वेगळ्या भागात अटलांटाच्या नगरवेशीत जेमतेम का होईना, पण येऊनसुद्धा झुकझुकगाडी न पोहोचणाऱ्या ऑफिसपर्यंत रोज अटलांटाच्या त्या घाणेरड्या ट्राफिकला तोंड देत वन वे चाळीसेक मैलांची गाडीतोड करण्यास काही पर्याय लाभता, तर मलाही खूप बरे वाटते. पण ते होणे नाही. असो.) मात्र, हॅविंग सेड दॅट...
समजा, आली तुमची बुलेट ट्रेन नि गेली ती तुमच्या मिरजेच्या पांडू गुरव-ईक्विव्हॅलंटाच्या परसातून. त्या थोट्या पांडबाच्या हातांच्या थोटकांचे जे काय व्हायचे असेल ते होवो, परंतु तुम्ही हे जे सर्व कराल म्हणताय, करू पाहताय, करू इच्छिताय, जे करण्यासाठी हा सारा अट्टाहास आहे, ते सर्व बुलेट ट्रेन आल्यावर तुम्ही करु शकाल असे तुम्हाला खरोखरच वाटते काय?
बुलेट ट्रेन आल्यावर मिरजसुद्धा बदलणार नाही काय? आणि, नॉट नेसेसरिली फॉर द बेटर?
बुलेट ट्रेन आल्यावर ती चांगली प्रत किती दिवस टिकेल असे वाटते?
असे पाहा. बुलेट ट्रेन आल्यावर फक्त मिरजेचे लोक मिरजेहून नि साताऱ्याचे सातारहून पुण्यास रोजचा अपडाऊन कम्यूट करतील असे वाटते काय? उलटपक्षी, बाहेरून कोठूनकोठून (फक्त मिरजेहून किंवा सातारहूनच नव्हे) येऊन पुण्यात नोकरीकरिता राहू पाहणाऱ्या साऱ्याच पब्लिकला मिरज किंवा सातारा हे रात्री टेकण्याकरिता आणखी एक व्हायेबल ऑप्शन म्हणून निर्माण होऊन ती सर्व मंडळी तेथे घरे घेऊन गर्दी करू लागणार नाहीत काय? जेणेकरुन तेथील घरांच्याही किंमती अवाच्यासवा वाढतील नि गर्दी वाढेल? नि एकंदरीत पुण्याचा अर्बन स्प्रॉल पसरत पसरत मिरजेपर्यंत किंवा सातारपर्यंत पोहोचून मिरजेचे नि सातारचे बुलेटगतीने बकालीकरण होईल?
मग तुम्ही कसे शेती करणार नि घाटावर पोहोणार राव? कारण, तुमच्या आजूबाजूच्या गावांतल्या साऱ्या शेतजमिनी एखादा बिल्डर विकत घेऊन तेथे फ्लॅटवाल्या इमारती उठवेल. मग तुम्ही शेती कोठे कराल? नि बाहेरून इतकी माणसे आल्यावर तुमच्या पोहोण्याच्या जागेचे कधीच गटार झालेले असेल.
दुसरी गोष्ट. बुलेट ट्रेनला थांबे मर्यादित असणार. समजा, मिरजेला ती थांबते. म्हणजे, मिरजेहून पुण्याच्या दिशेने किमान १०० किमींपर्यंत तरी दुसरा थांबा नसणार. मात्र, आता नवीन बुलेट ट्रेन चालू झालीये म्हटल्यावर यामधल्या पट्ट्यातलेही लोक पुण्यास नोकरीसाठी येऊ पाहणार. (यात पुण्यात अगोदरपासूनच नोकरी करणारे पण बुलेट ट्रेन आल्यावर बाहेरून येऊन यथाक्रयशक्ती या मधल्या पट्ट्यात कोठेतरी घरे घेतलेले लोकही आले.) ही सर्व
मंडळी रोज सकाळी बुलेट ट्रेन पकडायला कोठे येणार? ५० किमींपर्यंतची तरी मंडळी अर्थात मिरजेत. शिवाय यात मिरजेपलिकडून वा इकडून तिकडून चोहीकडूनही किमान ५० किमींच्या परिघातून बुलेट ट्रेन पकडण्यासाठी सकाळीसकाळी टपकणारी मंडळी मिळवा. म्हणजे रोज सकाळी मिरजेच्या ट्राफिकचे भजे! (आणि संध्याकाळीसुद्धा! कारण सकाळी जाणारी मंडळी मधल्यामध्ये पुण्यातच गचकल्याखेरीज संध्याकाळी परतूनही येणार.) नि सकाळी-संध्याकाळी प्रचंड प्रदूषणसुद्धा.
नाही, डोंट गेट मी राँग. बुलेट ट्रेनला माझा विरोध नाही.ती जरूर व्हावी. मिरज-पुणे किंवा सातारा-पुणे प्रवाशांकरिता तो एक उत्तम नि जलद विकल्प राहील. मिरजेच्या किंवा सातारच्या विकासासही माझा विरोध नाही. (का असावा?) माझे कंटेन्शन इतकेच आहे की, अर्बन स्प्रॉल / रोजगाराच्या संधी पुण्यातच केंद्रित ठेवून, त्यात फक्त बुलेट ट्रेन टाकून कर्मचारी जा-ये करू शकतील अशा क्षेत्राचा परिघ अवाच्यासवा वाढवत नेणे, एक खूप मोठा परिघ हा केवळ पुण्यावर अवलंबून असणाऱ्या आणि अन्यथा स्वतःचे काहीही नसणाऱ्या / असलेले बकालीकरणात गमावून बसलेल्या निव्वळ रेसिडेन्शियल सॅटेलाइट टाउनशिप्सचा बनवणे हे विकासाकरिता कितपत डिझायरेबल मॉडेल आहे? यात नक्की कोणाचा विकास होतो? त्यापेक्षा, रोजगाराच्या संधींचे विकेंद्रीकरण करणे (आणि मग बुलेट ट्रेन हे नैमित्तिक इंटरसिटी प्रवासाकरिता आणखी एक ऑप्शन म्हणून ठेवणे) हे अधिक श्रेयस्कर नव्हे काय? (टीप: यातही बकालीकरण होणार नाहीच, असे नाही. पण बहुधा त्या मानाने खूपच कमी प्रमाणात व्हावे. चूभूद्याघ्या.)
..........
पुण्यामुंबईच्या दरम्यानचा घाट जर नसता, तर पुणे हीसुद्धा केवळ मुंबईची सॅटेलाइट टाउनशिप कधीच होऊन बसती. थँक गॉड फॉर द सह्याद्रीज़!
असे होणार नाही. कारण जे भय्ये
असे होणार नाही. कारण जे भय्ये किंवा अण्णा आहेत त्यांच्यासाठी पुणे काय अन मिरज काय, एकूण एकच. सबब ते पुण्यात किंवा शक्य तितक्या जवळ राहणे पसंत करतील. आणि हा अर्बन स्प्रॉल वाढेल हेही खरे, पण तो मिरजेपर्यंत येणार नाही, कारण मध्ये सातारा आहे. पुणे ते सातारा या दरम्यानचा पट्टा तो बफर म्हणून राहील. आणि सांगलीमिरजकोल्हापूरइचलकरंजी येथील जन्तेला गाव सोडावे लागणार नाही. फार फार तर जिल्हांतर्गत मायग्रेशन होईल. पण त्याची संख्या तुलनेने बरीच कमी आहे.
बाकी सस्टेनेबल ग्रोथबद्दल सहमत. खरेतर कोल्हापुरात आयटीपार्क झाले तर बेष्ट काम होईल. तेवढ्यावरही मिरजेस पळायला मी एका पायावर तयार आहे. धारवाडात आयटी पार्क आलेय म्हणतात. चांगली गोष्ट आहे पण मिरजेहून धारवाड अन पुणे दोन्ही सारखेच. सबब त्याचा उपेग इल्ले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+11
उद्योगनिर्मितीची आणि पर्यायाने रोजगारनिर्मितीची केंद्रे जुनीच ठेवून नुसत्या प्रवासाच्या सोयीसुविधा वाढवल्या तर काय होते हे मुंबईच्या सद्यस्थितीवरून लख्ख दिसून येते. नवी मुंबई हे इतके सुनियोजित मोठे शहर निर्मूनही हार्बर रेल गाड्या सकाळच्या वेळी मुंबईच्या दिशेने खचाखच भरून वाहतात. कदाचित तिथे उद्योजकांना हवी असलेली कार्यसंस्कृती रुजलेली नाही हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल. सुविधा दिल्या म्हणजे विकास होतोच असे नाही. त्यात सातत्य आणि शाश्वतता असायला हवी. आज मिरा भाइंदर म्हणा अथवा नवी मुंबई , सर्वत्र परप्रांतीयांची बहुसंख्या आहे. मुंबईत जागा परवडत नाही म्हणून नाइलाजाने ते तिथे राहतात. त्यांना त्या परिसराशी काहीही देणेघेणे नाही .निसर्गरम्यता वगैरे कधीच कोनाड्यात सरकली आहे. इतकेच नव्हे तर एके काळची टुमदार गावे आणि घरे आज दाटीवाटीची गलिच्छ गावठाणे बनली आहेत .
>> तुमच्या आजूबाजूच्या
>> तुमच्या आजूबाजूच्या गावांतल्या साऱ्या शेतजमिनी एखादा बिल्डर विकत घेऊन तेथे फ्लॅटवाल्या इमारती उठवेल.
श्री बॅटमन यांची जमीन वैग्रे असल्यास "प्राण गेला तरी बेहतर, माझी जमीन मी बिल्डरला विकणार नाही" असे म्हणून ते आपल्या जमिनीवर शेती करण्याचा प्रयत्न करू शकतील. सर्व बाजूंनी पंचवीसेक मजली बिल्डिंगांनी वेढलेल्या शेतजमिनीत ते शेती करू शकतील. [नाहीतरी बॅटमन यांना गं भा लक्ष्मीबाई नेवाळकर यांचे कौतुक असेलच असा संशय आहे].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काहीही हं थत्तेचाचा
काहीही हं थत्तेचाचा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मार्केत्तिची स्थिरसंख्या
नागरी पसारा (अर्बन स्प्रॉल) बाबत मार्केत्तिची स्थिरसंख्या (Marchetti's constant) ही एक कल्पना आहे.
बहुतेक लोक कामाला जायला अर्धा तास, परत यायला अर्धा तास प्रवास करतील इतकी शहराची त्रिज्या वाढते.
रोचक, धन्यवाद!
रोचक, धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बार्शीलाइट
बार्शीलाइट रेल्वेच्या वेगाच्या आठवणी असणाऱ्यांना, बुलेट ट्रेनचा वेग ऐकून घेरी येईल हो!
पण, जन्मत:च विचार थोडे डावीकडे झुकलेले असल्याने बुलेट ट्रेन पचनी पडत नाही.
हिंदीत नांव काय, हा विषय अर्थमंत्र्यांनी टाळला तरी आपण का शोधू नये ? 'गोली गाडी' ? की आठ बैलोंकी गाडी? (बुल्+एट)
बार्शीलाइट
काय आठवण काढून दिली हो. आभार.
लातूर ते कुर्डूवाडी...साधी म्हैस जरी समोर आली की गाडी थांबायची. वरुन पावडर फासल्यागत सगळ्या अंगावर फुफाटा उडायचा. मी भरपूर (उगीच) फिरलो मित्रांसोबत ह्या गाडीनं
भांबड आलं
लातूर ते कुर्डूवाडी...साधी
लातूरच्या पवित्र भूमिवर पाय पडणं असं उगीच जात नाही हो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हैस
अनेकदा तीचतीच म्हैस थोड्याथोड्या अंतराने पुन्हापुन्हा आडवी येऊन वारंवार गाडी थांबवत असे, असेही ऐकले आहे.
किंवा, वाटेत लघवीला लागल्यास, मनुष्य चालत्या गाडीतून उतरून, आपले क्रियाकर्म उरकून, पुन्हा तीच गाडी पकडू शकत असे म्हणे.
ऐकीव माहिती. कधी गेलो नाही. चूभूद्याघ्या.
इंटरनेटवर आधारित कामाच्या
इंटरनेटवर आधारित कामाच्या ठिकाणी हे काही कळले नाही. मिरजेत/ रेठरे बुद्रुक- खूर्द/अन्य ठिकाणी १५०/५० एमबिपिएस डा/अप स्पीड अधिक वाय्रावरची वीज मिळवून दिली तर ?
या लेखातीलच उदाहरण घेऊन समुद्रातला शिवाजी पुतळाऐवजी समुद्रातल्या पवनचक्क्या बशिवल्या तर? शिवाजीनेच समुद्री किल्ला धोरणात्मक निर्णय घेतला होता. हजारो कोटी खर्चायचेच असतील तर पवनचक्की हाच या युगातला निर्णय आहे.
इंटरनेटवर आधारित कामाच्या
वरचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला आहे असे गृहीत धरुन. मिरजेत अन अश्या अनेक छोट्या गावात आज उत्तम ब्रॉडबँड व वीज येत आहेच. त्यात सुधारणेची गरज आहे यात दुमत नाही. सांगलीतच माझ्या मेव्हण्याची सॉफ्टवेअर डेवलपमेंट टिम आहे ज्याचे प्रॉडक्ट्स ते देशभर देतात. तेव्हा हे काम आजही होत आहेच. पण केवळ ब्रॉडबँड आले म्हणून माणसांचे प्रवास चुकत नाहीत. अनेकविध कारणांसाठी जलद वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. रात्री बेरात्री गाड्या हाकत पुणे नाहीतर मुंबई कामासाठी गाठणाऱ्या शेतकरी, दुकानदार, व्यावसायिकांना विचारा मिरज - मुंबई बुलेट ट्रेन हवी का ते. पाचपट पैसे मोजून त्यात प्रवास करण्याची तयारी बहुसंख्य यातले प्रवासी करतील.
मात्र तरीही भौतिक (सामान, शरीरे) दळणवळणाची उत्तम व वेगवान साधने असणे आजही गरजेचे आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे झाला तेव्हा याच प्रकारची टिका वाचली होती, सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन क्वाडिलॅटरल)चे काम सुरु झाले तेव्हाही. बेजिंग विमानतळावर उतरुन हाय स्पीड रेल्वेने तीन तासात नानजिंग गाठून काम उरकून पुढे जाता येते तेव्हा सर्वांचीच सोय होते. त्यातून निर्माण होणार रेवेन्यु चीनच्या प्रगतीस हातभार लावतो.
जितकी मालवाहतूक अधिक कार्यक्शम करण्याची गरज आहे तितकीच प्रवासी वाहतूक देखील.
मुद्दा पटला टवणे सर.
मुद्दा पटला टवणे सर.
खांडवा-इंदौर जाणाय्रा
खांडवा-इंदौर जाणाय्रा मिटरगेजशी वेळीच सेल्फि काढला पाहिजे.
आमचा स्थानिक प्रश्न :
आमचा स्थानिक प्रश्न :
बुलेट ट्रेनचा मार्ग बीकेसी-ठाणे मार्गे
अहमदाबादअमदावादअसा सांगत आहेत. तर ठाणे - बीकेसी असा पास मिळेल का? आणि आम्हाला ठाण्याहून बीकेशीत बुलेट ट्रेनने (धा मिंटात) जाता येईल का?अवांतर: ठाण्याला ष्टाप ठेवला तर मग फुडे वापीला का नाही? आणि सुरतला का नाही? आणि बडोद्याला का नाही? असे होऊन त्या बुलेट ट्रेनची पाशिंदर झाल्यास नवल वाटू नये.
आम्हाला लाभार्थी म्हणून गणता येईल का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बुलेट ट्रेन लहान गावी थांबणार नाही.
ज्या बुलेट ट्रेन्स मी जपानमध्ये (किंवा High Speed trains युरपमध्ये पाहिल्या आहेत त्या मधल्याअधल्या छोट्या स्टेशनांवर थांबत नाहीत कारण त्यांचा रुळांचा मार्ग संपूर्ण नवा आणि जुन्या मार्गापासून अलग असतो. त्या मार्गावर छोटी स्टेशने नसतात. त्यांची सबर्बन लोकल होणे हे त्यांच्या बुलेट ट्रेन ह्या नावाशी विसंगत असेल.
ठाण्याला लहान गाव
ठाण्याला लहान गाव म्हटल्यामुळे अस्मिता दुखावल्या गेली आहे. तुमच्यावर कायद्यानुसार (खळ्ळ-खट्यॅक) कारवाई करण्यात येईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मार्ग
नेट धुंडाळल्यावर कळले की ठाण्यानंतर विरार आणि बोयसर अशी स्टेशने आहेत. पुढचे स्टेशन वापी आहे. बीकेसी ते ठाणे या अंतरापैकी १५ किमी मार्ग भूमिगत तर ठाणे ते वसई हा अथवा यापैकी ७ किमी पाण्याखालून (undersea म्हटले आहे)असणार आहे. वसईला स्टेशन नाही. ठाणे ते वसई या दरम्यान ७ किमीचा पाणीपट्टा अथवा समुद्रपट्टा आहे हे माहीत नव्हते. वसई खाडी असेल कदाचित. बाकीचा मार्ग (५०८ पैकी ४७१ किमी.) १८मीटर इतका उन्नत असणार आहे.
तेव्हा तुम्हांला बुलेट ट्रेनने ठाणे- वापी हा प्रवास नक्कीच करता येईल.
ऐकलेत काय थत्तेचाचा. आता तरी
ऐकलेत काय थत्तेचाचा. आता तरी अच्छे दिन आलेत हे कबूल करा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
?
त्यांना बुलेट ट्रेनने ठाण्याहून वापीला जायचे नाही. रोज ठाण्याहून बीकेसीला (हे जेथे कोठे असेल तेथे) अपडाऊन करायचे आहे. पास काढून.
बीकेसी = बांद्रा कुर्ला
बीकेसी = बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. ठाण्याच्या दक्षिणेला आहे आणि नेमके तिथेच टेसन आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Mumbai%E2%80%93Ahmedabad_high-speed_rail_c...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थत्त्यांच्या दृश्टिनं
थत्त्यांच्या दृश्टिनं "ठाण्याच्या दक्षिणेलाच* अंटार्क्टिका आहे" असं म्हणण्याइतका हा प्रतिसाद दुष्ट आहे.
===========================
*इथेही हेल असा काढावा कि "उत्तरेलाच नसून दक्षिणेलाच" असा टोन न येता "तिथेच खालीच, लगेच, जवळच" असा टोन यावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजोंच्या साध्या सरळ
अजोंच्या साध्या सरळ प्रतिसादाप्रमाणेच उपरोधही पब्लिकला (मला) झेपत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जाना था जापान
जाना था जापान , पहुंचा रहे चीन..
दहा मिंटात पोचण्याची अपेक्षा
दहा मिंटात पोचण्याची अपेक्षा आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
न'बा आणि राही अचूक निरीक्षण.
न'बा आणि राही अचूक निरीक्षण.
आशावादी असण्यापासून कोणाला थांबवता येत नाही.
आयला!! याबाबतीत सगळे मिरजकर
आयला!! याबाबतीत सगळे मिरजकर एकसारखाच विचार करतात की काय! 2010 साली पुण्यात असताना सारखी मिरजेची आठवण यायची तेव्हा मी आणि एक मित्र मिरज-पुणे बुलेट ट्रेन सुरू झाली तर निवांत रोज अपडाऊन करून कसं मस्त राहता येईल यावर मनोरथं रचत बसायचो. अगदी वेळ कसा वाचवायचा, कितीला घरातून निघावं लागेल, पुन्हा संध्याकाळी घरी यायला किती वाजतील या सगळ्यांचं मोजमाप करून झालेलं.
बुलेटच्या मार्गात घाट आला तर
बुलेटच्या मार्गात घाट आला तर तिचा एकूण सरासरी वेग १३०पडेल.