पुलंचं काय करायचं :
पुलंचं काय करायचं :
आजचं युग हे .. ब ब .. अबब युग आहे! आज मनुष्य एकाच वेळी अनेक टाइम झोन्स मध्ये जगू शकतो. माझं आजचं वाचन म्हणजे सकाळी जनरल काही पेपर चाळणे, नंतर काही जर्मन कविता ( एकदम जुन्या ) , मग बायकोसाठी एका पोलिश सुपरमार्केटच्या प्रॉडक्ट मॅगझीनचं वाचन, मग बाहेरची काही कामं करून आल्यावर चक्क श्रीदा पानवलकर यांची "साय" कथा, नंतर घरातली काही कामे करून नेटवर काही मराठी वाचन वगैरे... कालमहिमा हाच असावा !
पु. ल. देशपांडे हे संगीत-नाट्य-साहित्य क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणाऱ्या एका दिलदार , दिलखुलास मनुष्याचं, गुणग्राहक, सामाजिक कामांसाठी सढळ हाताने मदत देणाऱ्या आणि अर्थातच "महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं" नाव आहे. येणाऱ्या पुल - जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुष्कळ 'पुलकित' कार्यक्रम , शिरियला येऊ घातल्या आहेत असं एकूण सोशल ( कुणाला सोसल ?) मीडिया निर्मित वातावरण सांगतं आहे. पुलंच काय इतरही अनेक लेखक , कवी , विचारवंत , नाटककार सामाजिक कार्यकर्ते वगैरे यांच्या जयंत्या , पुण्यतिथ्या , जन्मशताब्दी वर्ष वगैरे येत राहणारच , कॅलेंडर ची पाने उलटत राहणारच ! - कालमहिमाच तसा आहे !
यानिमित्ताने अनेक प्रश्न पडतात!
"व्यक्ती आणि वल्ली" या चाळीस ते साठ/सत्तरच्या दशका दरम्यान लिहिलेल्या "व्यक्तिचित्रण" या स्वरूपाच्या पुस्तकात जे लोकप्रिय "नमूने" आहेत त्यावर आधारित "नमूने" अशी एक हिंदी शिरीयल येते आहे हे पाहिल्यावर मी उडालोच ! मुळात पुल या अतिशय निखळ , दिलदार प्रवृत्तीच्या मनुष्याने त्याच्या आजूबाजूला असलेल्या समाजाचं , माणसांचं काही एक निरीक्षण करून त्याचं एक चित्र आपल्यासमोर ठेवलं. यानिमित्ताने "व्यक्तिचित्र" या प्रकाराकडे येऊ! हा "साहित्यप्रकार" आहे का असा मला एक फारा वर्षांपासून पडलेला प्रश्न आहे. कधी काही परदेशी मित्रांबरोबर साहित्यिक चर्चा करीत असताना मी (वरवरच्या ) फुशारकीनं सांगत असतो की आमच्याकडे फार सुरेख "व्यक्तिचित्र" लिहिली गेली आहेत, ते माझ्या इथल्या मित्रांना फारसं समजत नाही. एकूणात "व्यक्तिचित्रण" आणि आजकाल "कथा" हा साहित्यप्रकार देखील इथे पुष्कळ अ-लोकप्रिय झाला आहे असं माझं निरीक्षण आहे , असो ! तर "व्यक्तिचित्रण" हा साहित्यप्रकार असेल तर त्याचा उगम, इतिहास , त्यातील वेगवेगळे प्रवाह याबद्दल काही माहिती असेलच ना , त्याबद्दल आपण किती जागरूक आहोत ? पुलंनी आपल्यावर गारुड केलं आहे हे ठीकच आहे पण पुढे जाऊन आपण काही शोध घेतला आहे का ?
ही जी व्यक्तिचित्रे आहेत त्यात पुलंनी अर्थातच 'रावसाहेबांसारख्या' प्रत्यक्ष व्यक्तिमत्वांची वर्णने केलेली आहेत आणि काही त्याकाळच्या निरीक्षणांवर आधारित 'काल्पनिक' व्यक्तिचित्रे आहेत, उदा. त्याकाळी सरसकट लग्नसमारंभात सापडणारा 'नारायण'. आता पुलंना त्यांच्या दृष्टीने दिसलेले , सापडलेले रावसाहेब त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहेत. प्रत्यक्षातले रावसाहेब अजून कसे होते हे सांगू शकणारे आज कोणी आहे की नाही माहित नाही , कोणी नसावंच बहुधा ! आणि आज असे कोणी 'रावसाहेब' (त्यांचं संगीत नाटकावरील कचकचीत प्रेम , लगेच फटकन बोलण्याची प्रवृत्ती अशा अनेक वैयक्तिक ,सामाजिक स्पेशल आणि प्रामाणिक लक्षणांसह ! ) आपल्या आजूबाजूला खरंच आहेत का ? पुलंची व्यक्तिचित्रणाची शैली ही त्याकाळात एकमेवाद्वितीय होती आणि त्यात लोकप्रिय होण्याच्या शक्यता होत्या हे वादातीत आहे, परंतु पुल ज्या पद्धतीच्या , किंवा ज्या पद्धतीने , शैलीने व्यक्तिरेखाचित्रण करत असत त्याचा उगम नक्की कशात आहे/असावा याचा काही शोध घ्यायचा प्रयत्न आपण केला आहे का ? पुलंची खास सौंदर्यदृष्टी , त्यांची गुणग्राहकता , थोडीशी - राई का पहाड - करण्याची प्रवृत्ती अशा सर्वांनी मिळून त्यांची व्यक्तिचित्रे बनली आहेत असं मला वाटतं ! परंतु त्यांच्या लेखांची पारायणं करूनही यानिमित्ताने आज आपली सौंदर्यदृष्टी नक्की कशी आहे , आज आपण आपल्याच आजूबाजूच्या मनुष्यांकडे, समाजाकडे किती निखळपणे, निकोपपणे पाहतो आणि त्या निखळपणाची आजची प्रामाणिक अभिव्यक्ती काय आहे याचा शोध आपण का घेत नाही ?
ही व्यक्तिचित्रे नवीन काळाला अनुसरून हिंदी मध्ये जात आहेत हे देखील ठीकच आहे. परंतु यानिमित्ताने हिंदी साहित्यामधल्या व्यक्तिचित्रांचा वेध घेण्याची काही उठाठेव आपल्याला करावीशी वाटते का ? हिंदी मध्ये नारायण कसा आणि काय बोलेल , हिंदीतले रावसाहेब कसे दिसतील , भावतील असे अनेक प्रश्न मला पडत आहेत.
काळ : वर्तमानकाळ हा भूतकाळ कधी बनतो आणि वर्तमानातूनच भविष्यकाळ कसा येतो हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न जवळजवळ सर्वच शास्त्रे आणि कला अनंत काळापासून करीत आहेत. चाळीस ते साठच्या दशकातली सामाजिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती , त्याकाळात मनुष्यांचे असलेले संबंध आणि आजचे आपल्यातले संबंध यात प्रचंड फरक आहे. पुलंनी उभं केलेलं 'निखळ, एका अर्थानं निरागस' असलेलं जग आपल्याला भुलवतं , खुणावतं हे समजू शकतोच. परंतु आजचं आपलं सौंदर्यशास्त्र काय आहे याचा शोध आपण यानिमित्ताने का घेऊ नये आणि त्याचा शोध प्रामाणिकपणे घेऊन पुलंना का अर्पण करू नये ? पुलंच्या कथा, त्यांची व्यक्तिचित्रे ही विनोदाच्या , कोट्यांच्या , भावनाशीलतेच्या बळावर सहज खपू शकतात. पानवलकर किंवा सदानंद रेगे किंवा इतरही अनेक ताकदीचे लेखक-कवी यांच्या कथा कवितांवर सिरीयल काढण्याचं किंवा त्यांच्या साहित्याला आजच्या काळाला अनुसरून योग्य आकार देण्याचं या सीरियल लेखकांना सुचेल का , परवडेल का ? ( हे लेखक कवी त्यांनी वाचलेले, नसण्याची शक्यता अधिक )
पुन्हा पुल स्वतः जरी त्यांच्या खास शैलीत लिहीत असले , सदू आणि दादू लिहून ऍब्सर्ड नाटकाची त्यांच्या पद्धतीने खिल्ली उडवत असते तरी नवीन नाटककार , नवीन संगीतकार , लेखक यांची त्यांनी मुक्तस्तुती केली आहे हे विसरता कामा नये. पुलंचा आशीर्वाद म्हणा काहीही म्हणा हवा असेल तर 'आज आपलं' जे काही असेल ते 'आजच्या आपल्या' पद्धतीने सादर केलेलंच बरं असं मला आपलं उगाचच वाटतं !
बदलता काळ हा नवीन आव्हाने, नवे प्रश्न आपल्यासमोर ठेवत असतोच ! एकेकाळी नुसत्या पंचावर सशस्त्र सैनिकांना हसत हसत समोरा जाणारा मोहनदास करमचंद गांधी नावाचा आपल्याच देशातला माणूस ; त्याचं आजच्या पदोपदी घाबरणाऱ्या माणसाने नक्की काय करायचं....
- आजच्या काळात फटाफट सीरियाला करून , एकही वाद्य येत नसताना पडद्यावर संगीतकाराच्या भूमिका लावून झटपट लोकप्रिय होण्याच्या ट्रेंड मधल्या आजच्या कलाकारांपुढे कदाचित , मनोरंजनाच्याच क्षेत्रात असलेल्या एकाच वेळी पेटीवर सुरेल धुना छेडणाऱ्या , झाकीर हुसेनच्या तबल्याची मनमुराद स्तुती करणाऱ्या , सामाजिक कामांसाठी कायम आर्थिक मदत देणाऱ्या , रेडिओ वर , टीव्ही वर नानाविध प्रयोग करणाऱ्या , ते करू पाहणाऱ्या लोकांना प्रोत्सहन देणाऱ्या पुलंचं नक्की काय करायचं हा सुद्धा असाच प्रश्न असावा!
( जाता जाता एक एक्सरसाइज : साय या पानवलकर यांच्या कथेची सुरुवात! या काही ओळींचं आपल्याला अवगत असणाऱ्या कुठल्याही भाषेत सटीक भाषांतर करण्याचा प्रयत्न करावा!
बाईसाहेबांनी आरशासमोर उभं राहून आपल्याकडे पाहिलं. स्वतःभोवती एकदा वळून साडी व्यवस्थित केली. मंगळसूत्राचं टपोरं बदामी फूल मधोमध घेतलं. मग कपाटातून सुंदरशी छोटी पेटी काढली. अलगद उघडून त्यातली चांदणीसारखी चमकणारी अंगठी घेतली. बोटात सरकवली. देठासकट खुडून आणलेल्या शुभ्र कमलासारखा हात दिसू लागला. ]
प्रतिक्रिया
न उल्लेखलेल्या गोष्टी
आज पुलंच्या कथांना मार्केट आहे कारण आज टीव्हीवर भारतीय टीव्ही कोण पाहतात? आर्थिक वर्ग आणि यांचं वय बघता त्यांना या स्मृतीरंजनातून आनंद मिळेलसं वाटतं.
दुसरं, सदानंद रेगे, पानवलकर हे लोक कलाकार नव्हते. पुलंनी कार्यक्रम केल्यामुळे त्यांच्या लेखनाची लोकप्रियता बरीच वाढली. शंकर पाटील, द. मा. मिरासदार तसे काळाच्या आधीच जन्माला आले असं म्हणावं लागेल. आज त्यांच्या धाटणीचा विनोद आपलासा वाटणारा वर्ग आर्थिक प्रगती करत आहे. व्यावसायिक यशातून आणखी यश मिळायला मदत होते.
भाषांतर हे काम फारच किचकट आहे. विशेषतः संस्कृतीसापेक्ष गोष्टी. धर्म-परंपरा-रीती-कर्मकांडं यांतून येणाऱ्या गोष्टी, इथे जो कथेतला पहिला परिच्छेद दिला आहे तो, त्याचं परक्या संस्कृतीतल्या भाषेत भाषांतर कसं करावं! केलं तरीही भारतीय संस्कृती समजल्याशिवाय ते भाषांतर कितीसं पोहोचणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अगदीच !
अगदीच ! पुल अप्रतिम परफॉर्मर होते आणि बटाट्याची चाळ काय किंवा इतर कथाकथन ( ज्याला आता स्टॅन्डअप कॉमेडी म्हणता येईल कदाचित) यात कमालीची रंगत आणत असत. कन्टेन्ट म्हणून अनेक गोष्टी आज कालबाह्य झाल्या असल्या तरी त्यांनी फॉर्म मध्ये फारच भारी काम केलं होतं, त्याला पुढे नेण्याचं काम करायला हवं ना ! अशा कलाकाराला जर खरोखरच दाद द्यायची असेल तर त्या तोडीचं काहीतरी करून दाखवायला हवं ना ! नुसते नमूने करून सस्त्यात कटवायचा मामला आहे हा ! आणि आज तांत्रिक , आर्थिक शक्यता पुष्कळ वाढलेल्या असताना ! दमामि , शंकर पाटील , क्वचित प्रसंगी वपु यांची देखील कथाकथन शैली मला खूपच आवडते. आणि दृश्य माध्यम जर इतकं प्रगत झालं आहे तर इतर मराठी साहित्य नवीन प्रकारे इंटरप्रीट करण्याचं आव्हान का घेत नाहीत?
भाषांतराचा अभ्यास गम्मत म्हणून आणि खरंच एक 'नमुना' म्हणून दिला , की एका उताऱ्यातून जे चित्र एका भाषेत दिसतं ते दुसऱ्या भाषेत आणणं किती मुश्किल आहे याची दर्शक वाचकांना कल्पना आली तरी पुष्कळ झालं !
जाऊ दे ! कदाचित मी अति विचार करीत असेन !
Observer is the observed
पुलंनी महाराष्ट्रावर गारुड
पुलंनी महाराष्ट्रावर गारुड केलं म्हणण्यापेक्षा पश्चिम महा० कोकण , मुंबइतला चाळीतला प्रेक्षक यांवर.
महाराष्ट्र कला, साहित्यात एकाच अभिरुचीचा नाहीच. लक्शमण देशपांडे "वह्राड चाललय" किती लोकांना आवडलं? माणदेशी माणसं सगळ्यांनाचा कळली का? जे श्रीनापेंडसे करतात तेच पुलं करतात, दळवी करतात. आजुबाजुच्या समाजजीवनाचं नोंदणीकरण कथा कादंबरीतून. अमेरिकेत/इतर देशात गेलेल्या मराठी लेखकांनी आता हेच करायला पाहिजे. पॅाटलक.
.
घ्या माझ्याकडून 'अफलातून' श्रेणी.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
पु.लं.च्या लिखाणाला काळाची
पु.लं.च्या लिखाणाला काळाची चौकट जरूर आहे. पण तरीही मराठी साहित्याचा नमुना म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. अत्र्यांचे अतिशयोक्त, अनेकदा बेताल लेखन मी कॉलेजमधे असताना वाचले ते माझ्याच्याने सगळे मुळीच वाचवले नाही. असे पुं.लंच्या लिखाणाबाबत होईलसे वाटत नाही. या सुटीत माझ्या भावाने त्याच्या १२ वर्षांच्या मुलाला व्यक्ती आणि वल्ली वाचायला दिले ते त्याला भावले. वेगळी पण चांगली व्यक्तिचित्रणे म्हणून त्यांचे वाचनमूल्य अबाधित राहीलसे वाटते.
बटाट्याची चाळ मात्र मला स्वतःलाच फारशी भावली नव्हती. तुकड्या तुकड्यांनीच पटली होती. चिंतन तर फारच भाबडे, काळ्या पांढऱ्या रंगातले वाटले होते. पण पुढे वाचू नये असे वाटले नव्हते. पु.लं.च्या लिखाणाचा कोणी गांभार्याने अभ्यास केला असल्यास तो या नवीन माध्यमांच्या मार्फत जगासमोर यायला हवा. निदान पुस्तक रुपाने प्रसिद्ध व्हायला हवा.
अबब...
मी "पुलंच करायचं काय" असं वाचलं. क्षमा असावी.
भांबड आलं
मुबइतल्या पुलांचं करायचं काय?
मुबइतल्या पुलांचं करायचं काय?
नवी कंत्राटं निघतील. इष्टापत्ती.
>>पु.लं.च्या लिखाणाचा कोणी
>>पु.लं.च्या लिखाणाचा कोणी गांभार्याने अभ्यास केला असल्यास >>
मी चाळीतली माणसं पाहिली आहेत. होती अशी लोकं. इतर वल्लीही होत्या. पुलंना राजकपूरमधला कलाकार किंवा निर्माता होता नाही आलं किंवा फंड कमी पडला किंवा झेप घेता आली नाही. ( माझं मत.)
वपु, पुलं हे आपण उच्च जाताना
वपु, पुलं हे आपण उच्च जाताना पाय ठेवून वर चढण्याच्या पायरीचे दगड बनवले गेले आहेत. दगडाला चप्पल लावल्याशिवाय ते ट्रान्झिशन होत नाही अनेकांच्या बाबतीत.
(No subject)
call a spade a spade
दगडाला दगड म्हणण्यात काय चुक आहे ?
किंवा एक बेस्ट गाणं आठवतयं
या दिल की सुनो दुनियावालों
या मुझको अभी चुप रहने दो
मैं ग़म को खुशी कैसे कह दूँ
जो कहते हैं उनको कहने दो
दगडाला दगड म्हणण्यात काय चुक
.
हो... पण आम्ही व्हिस्कीसोडा आणि वांगेसोडा यांमधे श्रेष्ठकनिष्ठ केलं की तुम्ही तलवारी घेऊन अंगावर येता !!!
.
पळा पळा.
.
दगडच पण...
सगळे दगडच शेवटी; फक्त कोणी संगमरवर, कोणी चुनखडी तर कोणी गारगोटी इतकेच.
पुनर्मूल्यांकन
पुलंचे कधीतरी पुनर्मूल्यांकन होणार, हा नियतीचा भागच असावा. त्यांत आधी बहुजनसमाजाने पुढाकार घेऊन त्यांची (म्हणजे पुलंची) जागा दाखवून दिली. आता सर्व विचारवंतांनाही पुलंची साहित्यिक उंची मोजण्याची तळमळ लागलेली वाटते. त्यांनी एका ठराविक काळातल्या ठराविक समाजावर भाष्य केले तेंव्हा तो ठराविक समाज, ठराविक काळापुरता त्याचा आनंद घेत होता. आता काळ वेगाने बदलला. तेंव्हा हे होणारच होते.
एकच गोष्ट पुन्हापुन्हा वाचली,ऐकली तरी, पहिलेपणाचा आनंद पुन्हा देऊ शकत नाही. कालांतराने त्याचा कंटाळाही येऊ शकतो. पण तरीही, त्या पहिल्या आनंदाच्या आठवणी तुम्ही पुसु शकत नाही.
उंची मोजण्याचे खटाटोपातून
उंची मोजण्याचे खटाटोपातून शेक्सपिअरही सुटलेला नाही. गदिमा गीतकार का कवी? वसंत कानेटकरांनी अशी काय मोठी नाटकं लिहिली की सतत दणकून चालावी? बालकवीच्या पाण्यात पाय सोडून बसलेल्या औदुंबराचे काय ते कौतुक चाललेले असते? पिंपात पडून कधी उंदीर भिजून गारठून मेले नव्हते का? माळ्यावरची अडगळीतली तुतारी काढून देण्यासाठी काय तो मालगुंडकराचा कंठशोष? रात्री कधी काय कुणी मुंबईच्या रस्त्यांतून उंडारलेच नाही का? अम्ही काय कधी तळटिपा दिल्याच नाहीत काय?
उंची
५' १०".