पु लं - लिखाण आणि इतर विषयक चर्चा
धागा सुधारला आहे. मजकूर डकवत जाईन .
पुल मला प्रचंड आवडतात. प्रचंड. पण त्यातही टप्पे होते.
टप्पा एक -
एकेकाळी मी त्यांचा जबरा फॅन होतो. त्यांची सगळी पुस्तकं कोण कलेक्ट करतंय अशी आम्हा मित्रांत चढाओढ वगैरे चालायची.
आणि "काय वाट्टेल ते होईल" माझया एकट्याकडेच असल्याने मी शर्यतीत नेहेमीच आघाडीवर राहिलो. हे दिवस पुलंनी भारावून जाण्याचे होते. कुणी पुलंविरूद्ध किंवा पुलंविषयी कौतुक सोडून इतर काही बोललेलं मला खपायचंच नाही. त्यांचं प्रत्येक वाक्य प्रमाण आणि त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ ग्रेट. बास. विषय संपला.
टप्पा दोन -
ही फेज संपली आणि पुल पाठ झाले. पुस्तकं वाचून आणि त्यापेक्षा जास्त ऐकून अतिपरिचयात अवज्ञा झाली. मग पुल म्हणून आवडत असले असले तरी त्यांची पुस्तकं वाचायचा कंटाळा आला. नवे लेखक सापडले, चित्रपट, गूढ किचकट डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या गोष्टी आवडायला लागल्या आणि पुल काहीसे बाळबोध, नॉस्टाल्जिक आणि गुडीगुडी वाटायला लागले. पुलंच्या पुस्तकांवर धूळ जमली.
टप्पा तीन -
बरंच काही वाचून पुन्हा पुलंकडे आलो. पुस्तकातले संदर्भ वगैरे पुन्हा वाचावेसे वाटू लागले. सध्या इथे आहे. पण आता काही विनोद अस्सल वाटतात आणि काही कमाअस्सल. काहीकाही निव्वळ शाळकरी. थोडक्यात पुलंच्या लिखाणाबद्द्लचं भाबडेपण जाऊन आता थोडं कुतुहल वाटतंय आणि "हे असं पुलंनी का लिहिलं असेल?" असे प्रश्न वाचतानाच पडतायेत.
त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आणि जमलं तर इतरांची त्याबद्दलची मतं काय आहेत ते जाणून घ्यायला आवडेल म्हणून हे लिखाण.
------------------------------------------------------------------------------
प्रस्तुत चर्चेचा विषय पुलंचं साहित्य आणि त्यातील त्रुटी/उणीवा/मर्यादा असा आहे. म्हणजे इतक्यांदा पुल वाचून त्यांच्या पुस्तकांबद्दल काही मतं तयार झालीत ती तपासून पहावी असं वाटतंय. खाली "मिसळपाव" ह्यांनी म्हटल्याप्रमाणे पुलंबद्दल चर्चा करणारे आपण कोण टिकोजीराव? कुणीच नाही. एक वाचक म्हणून मला पुलंबद्द्ल जे वाटतं तितकंच, त्यापेक्षा जास्त काहीच नाही.
१. मेघना भुस्कुटे ह्यांनी मोलाची भर घातलीये हा लेख लिहून. तो वाचला आणि खूप बरं वाटलं. मला वाटणारं बरंच काही तिथे आलं आहे.
मस्त मस्त लिहिलंय, जियो!
--------------------------------------------------------------------------------
आता माझं तुणतुणं वाजवतो.
मला पुलंबद्दल जाणवलेल्या काही नोंदी.
१. विनोदी पुस्तकं - "
व्यक्ती आणि वल्ली" ला तोड नाही.
Tier 1 - त्यानंतर क्रमाने कदाचित "असा मी असामी" "हसवणूक" "मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास" "काय वाट्टेल ते होईल" ही पुस्तकं येतील. ह्यातले जवळपास सगळे लेख उत्तम आहेत. "काय वाट्टेल ते होईल" हे माझं अतिशय आवडतं पुस्तक असल्याने मी इथे टाकतोय :)
.
Tier २
"खोगीरभरती" "गोळाबेरीज" "खिल्ली" "अघळपघळ" "उरलंसुरलं"
ह्यातले काही लेख उत्तम आहेत तर काही सुमार.
उदा. गोळाबेरीज मधला "म्हैस" हा लेख ए१ आणि पुलंच्या सर्वोत्तम लेखांपैकी म्हणता येईल असा असला तरी त्याच पुस्तकातला "महाभारतकालीन वृत्तपत्रे"/"जाल्मिकीचे लोकरामायण" हे लेख शाळकरी वाटतात.
खोगीरभरतीमधला उपहास बरेचदा अव्वल वाटतो तर काहीवेळा अगदीच ओढून ताणून (आदर्श समाजसेविका).
खिल्लीमधला "तुम्हाला कोण व्हायचे आहे" आजही पॉप्युलर असला तरी "अंतुले तुम्हारा चुक्याच" सारखा निव्वळ फालतू लेखही त्याच पुस्तकात आहे.
उरलंसुरलंबद्दल बरंच काही खाली आलंच आहे.
.
Tier ३ - बटाट्याची चाळ.
हा प्रकार वेगळा निवडण्याचं कारण म्हणजे त्यावर लोकांची आत्यंतिक टोकाची मतं ऐकली आहेत. "सिंपली ग्रेट" ते "अगदीच टाकाऊ" पर्यंत.
मला त्यातली "भ्रमण मंडळ" "काही वासऱ्या" "आगामी आत्मचरीत्र" वगैरे आवडतात, पण "संगितिका" "काही स्त्रीगीते" मेजर हुकलेत.
चिंतन आता वाचलं तर अजिबात आवडत नाही.
पुस्तक अधेमधे चाळण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यातली चित्रं.
असो. बटाटयाची चाळ हे पुस्तक साधारण किती सालापर्यंत रिलेव्हंट होतं पाहिलं पाहिजे.
२, व्यक्तिचित्रं -
व्यक्ती आणि वल्ली इतकं जबरदस्त निरीक्षण इतर कुठल्याही व्यक्तिचित्रांत न येण्याचं कारण उघड आहे- बाकी सगळं खऱ्या माणसांबद्दल लिहिलंय.
आणि पुल कहर गोग्गोड लिहीतात. एखाद्या माणसाचे गुण इतक्या कमी पानांत वाचले की तो/ती सद्गुणांचा पुतळा असल्यागत आपलं मत व्हावं आणि डोळेबिळे भरून यावेत अशी अपेक्षा असेल तर ही पुस्तकं वाचायला हरकत नाही.
गायकांबद्दल/गायिकांबद्दल बरीच व्यक्तीचित्रं आहेत त्यात किस्से आणि कहाण्या अफाट.(हे स्मरणातून - तेव्हा चू.भू. द्या.घ्या.) विष्लेशण हा प्रकारच पुलंचा नावडता असल्याने एखादा माणूस का ग्रेट वाटला त्याच्या खोलात न जाता पुल भावनिक होऊन कढ काढत रहातात. पुलंची सगळी व्यक्तिचित्रं "गणगोत" "गुण गाईन आवडी" "मैत्र" "दाद" वगैरे एकामागे एक वाचली तर असह्य रिपीटेशन होतं, आणि एकसुरी एकतारी घेऊन पुल गुणगान करताहेत असं एक उगीचच क्षुद्र वाटणारं चित्र डोळ्यापुढे येतं.
म्हणजे अत्र्यांवरच्या लेखात इतक्या स्फोटक मजकूराला जागा (व्यक्तिगत हल्ले नव्हेत पण निदान जे आहे ते तरी लिहा) असताना पुल अत्र्यांना १०००० विशेषणं देऊन लेख संपवतात.
आणखी एक शक्यता म्हणजे व्यक्ती एकबद्दल एखाद्या गोष्टीची टिंगल करणारे पुल व्यक्ती क्रमांक २ च्यावेळी त्याच गोष्टींना सावरून घेतात. (इथे पक्क्या उदाहरणांची गरज आहे. तेव्हा हे थोडं शोधायला लागेल.)
क्रमश:
संभाव्य उत्तर
प्र्श्न असा की ही नाटकं महत्त्वाची आहेत हे माहिती असूनही पुलंनी "उपहासात्मक" म्हणून हे दोन्ही लेख लिहिले आहेत
की ही नाटकं "कायच्या काय/ वाईट दर्जाची" असल्याने त्या नाटकांची खेचली आहे?
एकूण पुलंचं लिखाण बघता त्यांना चिकित्सेची ॲलर्जी होती हे जाणवतं.
अशीही एक शक्यता जाणवते का, की पुलंची कलाविषयक जाण / समज अतिशय मर्यादित होती आणि त्या मर्यादेपलीकडे जाण्याची त्यांची इच्छा तर नव्हतीच, पण त्याहून वेगळ्या कलाविष्कारांची खिल्ली उडवण्यातच त्यांनी धन्यता मानली. आता ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व त्यामुळेच झाले का, की उलट म.ला.व्य.नीच अशी धन्यता मानल्यामुळे महाराष्ट्रानंही त्यातच धन्यता मानत कधी आपला परीघ ओलांडायचा प्रयत्नही केला नाही, हा कार्यकारणभाव प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर शोधावा. मात्र, मराठी विचारविश्वात बहुसंख्य लोक आजही त्याच मर्यादांमध्ये अडकले आहेत आणि त्यामुळे आपली कला थिटी राहिली आहे, अशी शक्यता लक्षात घेण्याची गरज कधी जाणवते का?
बर्गमन
दुसरी एक शक्यता अशीही असू शकेल, की स्वत:ची समज तुम्ही म्हणता तितकी मर्यादित नसूनही त्यांनी प्लेयिंग टु द ग्यालरी लै केले वगैरे वगैरे
सर्व बाबतींत तसं नसावं कारण समोर गॅलरी नसतानाचे त्यांचे किस्से आहेत. उदा. तेंडुलकरांनी सांगितलेली एक आठवण - इंगमार बर्गमन ह्या विख्यात स्वीडिश दिग्दर्शकाचे सिनेमे चांगले असतात असं म्हणून त्यांनी पुलं आणि सुनीताबाईंना एक चित्रपट पाहायला नेलं. सुनीताबाईंनी आवर्जून पाहिला आणि त्यांची नंतर त्यावर काही चर्चाही झाली, पण पुलं कंटाळून झोपले. असे इतरही किस्से आहेत.
बर्गमान चे चित्रपट बघुन झोप उडुन जाते
बर्गमान चे चित्रपट इतके अस्वस्थ करणारे किमान इतके विचारप्रवृत्त करणारे आहेत असा व्यक्तीगत अनुभव आहे. चला ते ही नसले तरी निव्वळ अप्रतिम कॅमेरा साउंड अभिनय ही अत्यंत मुव्हींग असा अनुभव असतो त्यातही झोप येत असेल तर ...................आनंद आहे.
तेंडुलकर आणि पुलं यांचीच एक दुष्टीकोणातली तुलना म्हणजे नोबेल विजेता सॅम्युएल बेकेट च्या विख्यात वेटींग फॉर गोदो वर एकीकडे तेंडुलकरांनी त्यांच्या एका वर्तमानपत्रीय सदरात अत्यंत मोजक्या शब्दात अत्यंत मुलगामी असे विश्लेषण करुन दाखवलेले आहे जे फारच सुंदर आहे. आणि दुसरीकडे पुलनी गोदुची वाट का काय सारखा निन्मदर्जाचा विनोद वगैरे प्रकार केला होता.
सौदर्यशास्त्राच्या त्याकाळातील गंभीर चर्चा सुरु असतांना ज्यात मर्ढेकर पाटणकर आदी भाग घेत होते त्यावरही खिल्ली उडवणारा असाच एक फालतु लेख.
एक सौदर्यवाचक विधान का काय तरी नावाने.
नंतर खुर्च्या आहेच बर्गमान चे चित्रपट ही मग या माणसाला या सर्वात एकाही ठिकाणी कणभरही अर्थ सापडला नाही ? की खरचं जंतु म्हणता तसे क्षंमताच नव्हती असे म्हणावयास बराच वाव आहे.
स्वत:ही असे काय विशेष केले ? तेंडुलकरांशीच पुन्हा तुलना तेंडुलकरांमध्ये दलितांच्या मानसिक घडणीतली एक काळी पण मानवी बाजु तपासायचे कन्यादान सारखे नाटक लिहीण्याचे सर्जनशील धाडस होते. पुल ? त्याकाळी कुठलेही दलित आत्मकथन आले की सर्व चिकीत्सा म्यान करुन पुलं आपले आरती घेऊन गिल्ट घेउन उभे. मग त्यातुन अति कौतुक शुन्य चिकित्सा म्हणजे सगळा इमोशनल गळाभरुन येऊन च मामला. त्यांच्या मागे मग त्यांचा ममव फॅन चला चला आपण ही बलुतं वाचलं पाहीजे बर का गडे ! मुळात ते फारच मर्यादीत कुवतीचे लेखक होते असे वाटते.
सारंग अगदी अचुक म्हणतात त्याप्रमाणे एका कोळीयाने मध्ये पुलं नी हेमिंग्वे च्या महान कलाकृतीला त्यांनी केलेल्या अनुवादात् पण एकदम घरगुती करुन टाकले. ममव ला प्रिय असणारी घरगुती सारणी (सारंग म्हणतात यातुन एक लेखक म्हणुन स्वत:ची सुटका करुन घेणे महाकठीण ) हे कोळिया या शब्दाच्या निवडीवरुन ही प्रकर्षाने जाणवते.
त्यांची व्यक्तिचित्रे काही काही मात्र चांगली आलेली आहेत.
मला वाटत मी ही प्लेट अगोदर वाजवलेली आहेत इथेच कुठेतरी
असो
मला चाळीतले विनोद आवडत नसत.
मला चाळीतले विनोद आवडत नसत.
काहीवेळा ते नंदनसारख्या अती कोट्या करत. परदेशप्रवास अनुभव - यात सतत तुलना लिहिणे॥ तिकडे काय आहे ते लिहा हो, इकडचे माहितच आहे, ओळी वाया घालवू नका. गिरगाव -कोकण -दादर रहिवाशी हा अधिकतर श्रोता.
बाकी त्यांनी लहानपणी हसवले हे नक्कीच॥
मराठी माणसाच्या कलाविषयक
मराठी माणसाच्या कलाविषयक जाणीवा विस्तारायची जबाबदारी पुलंवर कोणी टाकली होती? महाराषःट्र शासनाने काय जी आर काढून पुलंना एक्स्क्लुझिव्ह टेंडर दिलं होतं का, की बाबा हे लाखभर रुपये घे आणि तेवढ्या मराठी जनतेचा परीघ विस्तारून दे. आणि मुळात हा इन्ग्मर बर्गर की कोण तो कशावरून एवढा ग्रेट. केवळ त्याची गांड गोरी होती म्हणून? आणि तुम्हाला तो ग्रेटबिट वाटत असेल म्हणून मराठी जनतेने ग्रेट मानून घ्यायलाच पाहिजे ही जबरदस्ती कशाला? इंगमार बर्गरने अंतू बर्वा वाचलं होतं का? त्याने 'तुझे आहे तुजपाशी' पाहिलं होतं का? त्याने 'बटाट्याच्या चाळी'तला अस्वस्थ आणि विचारप्रवृत्त करणारा मध्यमवर्गीय जीवनानुभव स्वीडनमधल्या त्याच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला होता का? उद्या म्हणाल पुलंनी भारताचं ढिसाळ क्षेत्ररक्षण सुधारायचा प्रयत्न केला नाही. परवा म्हणाल पुलंनी महाराष्ट्रातील बाजरीचं दर हेक्टरी उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला नाही. तेरवा म्हणाल ते कापसावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात अयशस्वी ठरले. पुढे म्हणाल पुलंनी उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात पुरेसं योगदान न दिल्यामुळे भारताचा एएसेल्व्ही प्रॉजेक्ट अयशस्वी झाला. अरे भेंचूत एक चार विनोदी पुस्तकं लिहिली म्हणून त्यांनी मराठी विचारविश्वाच्या मर्यादा ताणून दिल्या पाहिजेत हा अट्टाहास कशासाठी?
अहो रागावू नका. एखाद्या
अहो रागावू नका. एखाद्या व्यक्तीच्या मर्यादा सांगणं आणि त्या व्यक्तीला दोष देणं यात फरक आहे. वरच्या चर्चेत मर्यादा सांगणं चालू आहे. त्या मर्यादा ओलांडायला हव्या होत्या असं म्हणणं नाही. 'इंगमार बर्ग्मनला पेटी वाजवता येत नसे बुवा' असं म्हटलं, आणि त्याचा कोणतरी चाहता त्याबद्दल वरच्या प्रतिसादासारखी तणतण करायला लागला तर तुम्हीही म्हणालच 'त्याने पेटी वाजवायला हवी होती असं नाही तर त्याला येत नव्हती एवढंच विधान आहे'. फरक समजून घ्या.
की तुम्हाला पुलंच्या मर्यादा सांगणंच मान्य नाही?
मर्यादा जरूर सांगाव्या हो
मर्यादा जरूर सांगाव्या हो, पण त्यासाठी लायकी हवी ना मुळात? म्हणजे अर्थात, कोणीही पुलंच्या मर्यादा सांगाव्या, नव्हे दोषही उच्चरवाने सांगावेत. मी आपला पुढच्या लिखाणाकडे वळतो!! पण पिऱ्या मांग फारच वैतागलाय म्हणून हा प्रतिसाद. हां, तर काय चालू होतं ईथे, "अमेरिकेची आर्थिक आघाडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" चालुद्या :-))))))
हा निकष लावला तर संपूर्ण
हा निकष लावला तर संपूर्ण भारतात क्रिकेटवर चर्चा बंद होईल. स्वतः कधीही बॅटला हातही लावला नसेल तरी तेंडुलकरच्या बॅटिंग मधील दोष दाखवायला बंदी/ आक्षेप नसतो. त्याप्रमाणेच पुलं किंवा कुणाच्याही कशावरही सभ्य भाषेत मर्यादा/दोष दाखवायला काय हरकत असावी ?
समीक्षक जमातीला देशोधडीला लावू नका हो मिसळपाव... :) :)
समीक्षकहो, क्षमस्व!
समीक्षकहो, क्षमस्व! अबापट म्हणताहेत त्याप्रमाणे तुम्हा तमाम लोकाना देशोधडीला लावायचा उद्देश नव्हता. सचिनवर टीप्पणी करायला उत्तम क्रिकेटर असणं जरूर नाही हे अगदी मान्य. पण म्हणून कोणीही सोम्यागोम्याने त्याने बॅट कशी धरायला हवी सांगावं हेही बरोबर नव्हे.
मग प्रश्न उभा राहातो की पुलंवर टीका करायची लायकी आहे हे कसं समजणार? लायकीचे निकष कोण ठरवणार? मुळात लायकी हवी हे म्हणणारा मी कोण टिकोजीराव?? त्यामुळे जाउंदे. लायकी काढल्यामुळे कोणाच्या शेपटावर पाय पडला असेल तर... तर काही नाही, तुमच्या शेपटावर माझा पाय पडलाय so deal with it. (काही काही गोष्टी साहेबाच्या भाषेतंच झकास एक्स्प्रेस करता येतात!! ) मतितार्थ काय? तर "अमेरिकीची आर्थिक आघाडी... ....". हां भैया, लगे रहो!
रा रा मिसळपाव, मला शेपटी नाही
रा रा मिसळपाव, मला शेपटी नाही , मी समीक्षक नाही मी टरफले उचलणार नाही.
अहो तुम्ही का कावताय ?
मत असण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच इतरांना पण आहे.
तेव्हा चिल माडी... पेटू नका.
राष्ट्रसंत न बा यांचं वचन लक्षात घ्या ... मत आणि ते हे कुणालाही असू शकतं
तरी मी म्हंटलं हां
तरी मी म्हंटलं हां, की मी आपला पुढच्या लिखाणाकडे वळतो. पिऱ्या मांग वैतागलाय म्हणून माझ्या मताची पिंक टाकायला कोणी सांगितलं होतं? त्यामुळे मंडळी माझी (पेटलेली!) मतं बाजूला सारा आणि "oh your left shoulder, shorter than right" वगैरे चालूंद्या. बाकी त्यातलं अजून एक वाक्य ईथे अगदी चपखल बसेल नाही? - "आता असतील पण ते सांगायची काही गरज आहे का?" :-)
आरं प्वारा
आरं प्वारा, क्यास पिकाया लागलं माजं आन तू ह्ये काका काय म्हनतोयस मला आं?? आणि तू पार्श्वभागाला ( क्यास पिकाया लागलं तरी मी चार अक्षरी शब्दच वापरतो. पण निदान " Radha, whose that part of body below shoulders and above stomach " या चालीवर " that part of body below stomach and above thighs " असं तरी नाहीये :-) ) कुठलाही शब्द वापर रे बाबा !
...
मत आणि ते हे कुणालाही असू शकतं
ते तर आहेच. शिवाय दुसरा मुद्दा असा पाहा: समजा मी जर एखाद्या उपाहारगृहात गेलो, नि, से, डोसा मागवला. तो मला आवडला नाही. तर 'तुमचा डोसा भिकार आहे, बकवास आहे' हे मालकाच्या तोंडावर सांगायला मला स्वतःला डोसा बनवता येणे आवश्यक आहे काय? उपाहारगृहाचा मालक जर म्हणाला, की च्यायला तुम्हाला स्वतःला तर डोसा बनवता येत नाही, नि आले माझ्या डोशाला नावे ठेवायला; खायचा तर खा, नाहीतर गप्प बसा नि चालते व्हा, तर मी ते निमूटपणे ऐकून घ्यावे काय?
अरे, ग्राहकाचे हक्क म्हणून काही प्रकार आहे की नाही?
तस्मात्, पु.लं.ना शिव्या घालताना, त्या शिव्या घालणाऱ्याची लायकी हा मुद्दा गौण आहे, किंबहुना, असंबद्ध आहे.
(बाकी, तुम्ही मला राष्ट्रसंत ही पदवी दिलीत. तशीच मागे एकदा गांधीजी आणि रवींद्रनाथ एकत्र बसलेले असताना गांधीजींनी गमतीत रवींद्रनाथांना गुरुदेव म्हणून पदवी दिली होती. त्यावर रवींद्रनाथांनी भडकून, साल्या मला गुरुदेव म्हणतोस काय, थांब लेका तुला मी महात्माच म्हणतो, म्हणून रिटर्न पदवी दिली. अशी ष्टोरी सांगतात. अशीच ष्टोरी आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलही सांगतात. सांगण्याचा मतलब, तुम्ही मला दिलेली राष्ट्रसंत ही पदवी मी सहर्ष स्वीकारत असून, तुम्हाला मी पुण्यपुरुष अशी रिटर्न पदवी बहाल करत आहे.)
इत्यलम्|
प्रतिप्रश्न
ओके.
आता समजा मला स्वतःला जर उत्तम पंजाबी आणि थालीपीठ बनवता असेल (पण डोसा बनवता येत नसेल), तर मग "तुम्ही फक्त डोसा ठेवता तुमच्या हाटेलात त्यामुळे (लोकांनी) कधी पंजाबी खायची टेस्ट डेव्हलप नाही केली" किंवा "तुम्हाला कधी थालीपीठ करावसं वाटलं नाही? हात तुमची" हे (त्या दोन्हीं मुद्द्यांत दम नसूनही) त्यास ठणकावायची माझी लायकी वाढते काय?
QED.
माझ्या मते माणसाची बोलण्याची
माझ्या मते माणसाची बोलण्याची लायकी वगैरे गोष्टी निरर्थक आहेत. लायकी असते ती विचारांची, मतांची, कलाकृतींची इ. - मग ती कोणीही का मांडलेली असेनात. 'अमुक व्यक्तीला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही' असं आधीच ठरवून ती मतं खारीज करून टाकणं हे वर्णव्यवस्थेसारखं झालं.
चोक्कस!
चोक्कस! मी अबापटांच्या प्रतिसादात म्हणूनच म्हंटलं की
मुळात लायकी हवी हे म्हणणारा मी कोण टिकोजीराव??
तुम्ही अगदी रास्त मुद्दा मांडला आहे - "... लायकी असते ती विचारांची, मतांची, कलाकृतींची इ. - मग ती कोणीही का मांडलेली असेनात. ....". पण ईंगमारच्या चित्रपटावर चर्चा करताना पुलं झोपले, मुळात ते फारच मर्यादीत कुवतीचे लेखक होते, त्यांची प्रवासवर्णनं सुमार / दवणीय होती ह्या पिंका टाकेलेल्या वाचल्यावर म्हंटलं लिखाण नाही, लेखक तरी मातब्बर आहे का? तर त्येबी न्हाई! असो.
इंगमारच्या सिनेमाचं उदाहरण
इंगमारच्या सिनेमाचं उदाहरण फारच स्पेसिफिक मुद्द्यासाठी आलं होतं.
- मनातून पुलंना या प्रयोगांबद्दल आस्था होती, पण मुरब्बीपणे, वाचकांची नस ओळखून त्यांनी चेष्टा केली.
- त्यांचा पिंडच तसा मर्यादित दृष्टीचा होता, आणि ते प्रामाणिकपणे चेष्टेतून व्यक्त व्हायचे
या दोनपैकी दुसरं विधान योग्य आहे एवढंच सिद्ध करण्यासाठी होता. माझ्या मते त्या उदाहरणाशिवायही, पुलंना मर्यादा असतील, पण असल्या बाबतीत मुरब्बीपणा, खोटेपणा करणारे नव्हते असं म्हणता येईल.
अहो मर्यादा कशाला, दोषही
अहो मर्यादा कशाला, दोषही सांगा की, कोण नाही म्हणतंय? इथे कुणी पुलंचा फॅनबॉय नाही. घ्या मीच संगतो, त्यांची प्रवासवर्णनं सुमार, दवणीय आणि आजच्या मुक्तपीठातल्या लेखांचे आद्य पितामह म्हणता येतील अशी आहेत. शिवाय विनोदी खेरीज इतर काही लिहिताना ते अगदीच मीडीओकर आणि निष्प्रभ वाटतात.
पण ते उत्कृष्ट विनोदी लेखक होते म्हणून एकंदरच साहित्य-कलाविषयक सर्वच प्रांतात त्यांची समज उच्च असायला हवी होती आणि वर ती त्यांनी मराठी समाजालाही शिकवण्याचं त्यांचं काही उत्तरदायित्व होतं असा जो सूर इथे दिसून येतो आहे, तो अगदी बर्गमनला पेटी यायला हवी होती या लेवलचा हास्यास्पद मला वाटतो.
ते उत्कृष्ट विनोदी लेखक होते
ते उत्कृष्ट विनोदी लेखक होते म्हणून एकंदरच साहित्य-कलाविषयक सर्वच प्रांतात त्यांची समज उच्च असायला हवी होती
सर्व प्रांतात त्यांची समज उच्च हवी होती म्हणण्यापेक्षा, नाटकसिनेमा आणि साहित्य या प्रांतातील नवीन प्रयोग (नवनाट्य, थिएटर ऑफ ॲबसर्ड इ.) कडे पुलंनी थिल्लरपणे पाहिलं असा आक्षेप आहे असं मला वाटतं.
आता ही त्यांची मर्यादाच आहे, राईट?आणि वर ती त्यांनी मराठी समाजालाही शिकवण्याचं त्यांचं काही उत्तरदायित्व होतं
ही अपेक्षा असली तर सपशेल चुकीची आहे. मान्य. चूक असेल तर ती पुलंचे भक्त बनून त्यापुढे बाकी साहित्य व्यर्थ वगैरे मानणाऱ्या भक्तांचीच असेल.
अ. विडंबन करणं म्हणजे
अ. विडंबन करणं म्हणजे 'थिल्लरपणे पहाणं' नव्हे. हजारो शब्दांच्या टीकात्मक लेखातून जेवढं व्यक्त करता येणार नाही तेवढं एका तरल विडंबना धून करता येऊ शकतं.
ब. 'खुर्च्या' वगैरेंमधून केलेली टिप्पणी ही मूळ कलाकृतींपेक्षा अस्ल्या प्रयोगांमध्ये आपल्याला काही गम्य आहे असा (कधी कधी स्वत:लाही फसवून) आव आणणार्या स्युडो-रसिकांबद्दल होती असा माझा अंदाज आहे.
क. एखादा प्रयोग आपल्याला भावला नाही ही 'आपली मर्यादा' कशीकाय होऊ शकते? शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असलेल्या माणसाला ग्रंज रॉक, स्का किंवा जॅझमध्ये गम्य नसेल (किंवा व्हाईस व्हर्सा) तर ती त्याची 'मर्यादा' मानावी का?
अ आणि ब शंभर टक्के मान्य.
अ आणि ब शंभर टक्के मान्य. पुलंनी केलेली चेष्टा उच्च दर्जाची आहे. मात्र त्या विडंबनांतून नक्की कसली चेष्टा केली जाते आणि कसली केली जात नाही, यावरून लेखकाची वैचारिक बैठक समजून घेता येते. चिकित्सेची चेष्टा, नवतेची चेष्टा, जुनं ते सोनंची भलावण, भावुकतेला नमस्कार, दैवतांची चेष्टा करायला नकार हे पुलंच्या लेखनात पदोपदी दिसतं. त्यामुळे क मधला मुद्दा थोडा बदलावा लागतो. जाझ की शास्त्रीय संगीत अशी तुलना योग्य नाही. कवितांमध्ये गदिमा/बाकीबाब/कुसुमाग्रज यांच्यासारखे परंपरेचे पाइक कवी की त्यांच्या वर्तुळापलिकडे जाणारे मर्ढेकर/कोलटकर अशी तुलना व्हायला हवी. कविताच नाही, कुठच्याही क्षेत्रात ही पारंपारिकता विरुद्ध नवता दिसून येते. पुलंचा ओढा कायमच पारंपारिकतेकडे राहिलेला होता.
असा जो सूर इथे दिसून येतो आहे
असा जो सूर इथे दिसून येतो आहे,
असा सूर नक्की कुठच्या विधानांतून दिसला?
कारण असले सुरांचे आरोप करायला लागलं तर 'आपल्या दैवताबद्दल जराही काही वाकडं विधान निघालं तरी खवळून उठणं' अशा सुराबद्दलही तक्रार करता येते. शेवटी कुठचा सूर ऐकू येतो हे कानावरच अवलंबून असेल तर काय करणार?
त्यांची प्रवासवर्णनं सुमार, दवणीय आणि आजच्या मुक्तपीठातल्या लेखा
पुलनी जेव्हा प्रवास केला तो काळ साधारणतः १९५५ च्या आसपास चा असावा. दूरदर्शनचे आगमन झाले नव्हते , इंटरनेट तर फार दूरची गोष्ट. सामान्य माध्यम वर्गीय मराठी माणसांसाठी परदेश प्रवास हा दुर्मिळ अनुभव होता. अपूर्वाईचं होती.
अशा काळाच्या पार्श्वभूमीवर पुलंनी लिखाण केले होते ,
हे सगळे लक्षात घेतले तर ते लिखाण तेव्हा का लोकप्रिय झाले हे समजेल. त्या वरून त्याची योग्यता हि ठरवता येईल
आता जो माहितीचा प्रचंड स्रोत सर्वाना उपलब्ध आहे ( इंटरनेट, टीव्ही , ) त्यामुळे ते लिखाण कमी दर्जाचे वाटू शकेल, पण ते तसे नाहीये.
पी एल्
"खुर्च्या" नाटकाच्या निमित्ताने लिहिलेलं प्रहसन निव्वळ नाटकावर नव्हतं. विविध अर्थांनी उच्चभ्रूपणा करणार्यांची ती खिल्ली होती. त्यामधे एक वाचक म्हणून बोचण्यासारखं काही वाटलं नाही. आणि "थिएटर ऑफ द अॅबसर्ड" करणार्यांनी - पर्यायाने मानवी अस्तित्वातल्या असंगततेवर भाष्य करणार्यांनी, तितकं विस्तिर्ण क्षितिज असलेल्यांनी - मध्यमवर्गीय, बूर्झ्वा मानल्या गेलेल्या (!) लेखकाकडून उडवलेल्या थट्टेमधे वैषम्य मानावं यात काहीतरी गमतीशीर विसंगती आहेच :-)
पुलंनी विसाव्या शतकातल्या घडामोडींवर - मग त्या कुठल्याही संदर्भातल्या असोत - विशेष खोलवरपणे काही लिहिलेलं नाही हे खरं आहे. महायुद्ध चालू होतं तेव्हा पुलंच्या तारुण्यातलं पहिलंवहिलं लिखाण आलं. ते निरागस होतं. स्वातंत्र्यचळवळीसंदर्भातल्या आठवणी अशा कुठे दिसत नाहीत. महागाई, गरीबी, स्वातंत्र्यानंतर झालेला भ्रमनिरास या गोष्टी पुलं-साहित्यात शोधून शोधून पहाव्या लागतील. दलित साहित्याबद्दल मात्र त्यांनी आवर्जून लिहिलेलं आहे. किंबहुना १९७०च्या आणि काही प्रमाणात १९८०च्या दशकात केलेलं पुलंचं लिखाण समाजापुढच्या प्रश्नांना प्रतिसाद देणारं आहे. मात्र त्यातही नेमाडे सारख्यांनी किंवा दलित साहित्याने घडवून आणलेले भूकंप नाहीत. जी भूमिका आहे ती समजून घेण्याची, सामाजिक/राजकीय संदर्भातल्या विसंगती टिपणारी.
'चिकित्सेची चेष्टा' या
'चिकित्सेची चेष्टा' या हेडिंगखाली पुलंचं 'सौंदर्यवाचक विधान'देखील येतं. हा उत्तम जमलेला लेख मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राबद्दलच्या लेखनाची चेष्टा करणारा आहे हे मला नंतर कळलं.
कोणीतरी म्हटलं होतं 'पॊर्न म्हणजे काय याची व्याख्या मला करता येणार नाही, पण पाहिल्यावर मला ते पॊर्न आहे की नाही हे सांगता येईल.' सौंदर्यवाचक विधान लेखातही सौंदर्याबाबतची हीच भूमिका ठामपणे मांडलेली आहे.
एकूण abstract गोष्टींची
एकूण abstract गोष्टींची तात्विक (theoretical) चिकित्सा, चर्चा, त्रैरशिके, पायऱ्या सुट्या करुन मांडणी अशा गोष्टी म्हणजे पुलंना बहुधा "अनावश्यक चिरफाड" (dissection) वाटायच्या. टीका करणं म्हणजे तडतड करत विरोधी मतं नोंदवणं (म्हणजे पुन्हा उलट दिशेने तात्विक चिकित्सा) हा मार्ग नावडता असावा, त्यामुळे एकूण तात्विक जड मांडणीला विरोध हा विडंबन करुन करायचे.
याचं सार एका ठिकाणी "ही शून्याला भागत बसणारी माणसं" अशा उल्लेखात जाणवतं.
अल्टीमेट व्यर्थता आतून कुठेतरी जाणवलेला हा मनुष्य असू शकेल. नियतीने जन्म आणि मृत्यू या दोन टोकांत पकडून चालवलेली आपली फसवणूक पाहिल्यावर आसपासच्या इतरांची हसवणूक करणं याखेरीज काय करणार? (हसवणूक पुस्तकाची सुरुवात) असं मानणारे ते दिसतात.
देवापेक्षा भक्तात रस असलेले, शास्त्रापेक्षा शास्त्रज्ञाकडे जास्त उत्सुकतेने पाहणारे, असे वाटतात.
निळ्या रंगाच्या फ्रीक्वेन्सीजपेक्षा इटलीच्या त्या गुंफेतल्या निळाईचा माणसाला जाणवणारा थेट अनुभव त्यांच्या फोकसमध्ये असतो.
पण माणसाचं भौतिक आयुष्य सोपं, कमी कष्टाचं करणाऱ्या शास्त्रज्ञ लोकांविषयी त्यांना आदर दिसतो. फक्त कला, भाषा, सौंदर्य वगैरेची थियरी त्यांना नकोशी वाटते. "मराठी म्हणजे काय शिकवायचं असतं हो त्यात? -रावसाहेब, याला ते स्वतः मराठीचे प्राध्यापक असूनही"खरंच आहे ते" अशी दाद देतात. त्यांनी सुरुवातीला प्राध्यापकीच्या काळात विद्यार्थ्यांना हे सौंदर्यवाचक तात्विक शिकवलंच असेल. त्यातूनच व्यर्थता जाणवली असू शकते.
चिकित्सा, थियरी यादेखील अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. त्या जड अन्नाप्रमाणे अनेकांना अप्रिय वाटतात. पण त्याही चालू राहाव्यात हे गरजेचं.
पुलंवर टीका जरुर करावी, चिरफाडही करावी. पण ते प्रचंड लोकप्रिय आहेत म्हणून त्यांचं काही आपल्याला आतून, विनाचिकित्सा आवडून गेलं असेल तरी ते मान्य केल्यास आपण अगदीच सामान्य ठरु, ममव हे फडतूस बिरुद आपल्याला लागेल, आपण अधिक "ग्लोबल" "युनिव्हर्सल" झालंच पाहिजे, क्षितिज विस्तारलंच पाहिजे असं कंपालशन, अशी मर्यादा आपण मनात बाळगत नसलो तर अगदी कोणाचीही पूर्ण चिकित्सा करावी.
तुलना
'फ्रेंड्स' ही मालिका मला फारशी आवडत नाही. विनोदासाठी विनोद सुरू असतात. मालिकेतले सुटे-सुटे प्रसंग बघितले तर विनोद आवडतातही; पण एकत्रित काही उरत नाही. याउलट त्यांतल्याच काही लोकांनी बनवलेली 'एपिसोड्स' ही मालिका बघताना सुटे विनोद समजण्यासाठी काही संदर्भ असावे लागतात; संपूर्ण मालिका म्हणून ती मालिका मला आवडते.
बालवयात पुलंच्या विनोदांनी हसवलं; एवढंच नव्हे मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला काही विषयही दिला. आताही पुलंच्या लेखनातले सुटेसुटे बरेच विनोद आवडतात. मात्र संपूर्ण पुस्तक, किंवा लेखन वाचताना कंटाळा येतो. त्यातून काहीच मिळत नाही. उलट कसलीही फार चिकित्सा न करणं, नव्या गोष्टींपेक्षा परंपराच जवळची वाटणं, इत्यादी पुलंच्या लेखनातल्या गोष्टी माझ्या धारणांच्या संपूर्ण विरोधी आहेत. त्यामुळे अशा काही गोष्टींवर विनोद आले की 'चालू द्या' पलीकडे काही प्रतिक्रिया येत नाही.
पु.लंच्या लेखनाविषयी आक्षेप
मस्त चर्चा. वाचतोय.
पु.लंच्या लेखनाविषयी एक आक्षेप म्हणजे त्यांचे लेखन तत्कालीन मराठी मध्यमवर्गीयांना भावणारे होते पण इतर समाजघटकांना आकर्षिक करणारे नव्हते.
बटाट्याच्या चाळीत १९५०-६० च्या दशकातील मराठी मध्यमवर्गीयांचे प्रतिबिंब उमटते. हळूहळू ते लेखन कालबाह्य होईल. कारण त्या लेखनातील परिस्थिती आपली वाटणारे लोक कमी व्हायला लागतील.
त्यांचे लेखन तत्कालीन मराठी
त्यांचे लेखन तत्कालीन मराठी मध्यमवर्गीयांना भावणारे होते
नीट बारकाईने पाहू गेल्यास ते सो कॉल्ड "एक स्टेप" वरच्या वर्गाला आवडत होते. प्रत्यक्ष डायरेक्ट चाळीतल्या त्या लोकांना (पावशेअण्णा, जोगदंडकाकू, काशिनाथ नाडकर्णी यांना) नाही, तर चाळीतून प्रमोशन होऊन "मफतलाल पार्का"त राहायला गेलेल्यांना ते जास्त अपील व्हायचे. "काय ही त्या चाळीतली ममव चाकोरीबद्ध मेंटेलिटी" असं वाटून सुख कम गंमत वाटायची. आपण असे नाही असं वाटणारा वर्ग वाढत चालला होता. त्यातून लोकप्रियता वाढली.
प्रत्यक्ष आयुष्यात स्वतःला कोणी हसत नाही. किमान त्यात त्याला मनोरंजन तरी नक्की वाटत नाही. मनुष्य दुसऱ्यांनाच हसू शकतो.
एकंदरीतच त्यात या प्रकारच्या
एकंदरीतच त्यात या प्रकारच्या नाटकांची निर्मिती, ते सादर करण्याची आणि बघण्याची प्रक्रिया, ती करणारी माणसं या सगळ्याचीच खिल्ली आहे. भाषांतर भिकार असल्याची चेंष्टा हा त्याचाच एक पदर. शब्दांच्याही पलिकडे परकीय संस्कृतीतल्या गोष्टी मराठी वातावरणात फिट करण्याचीही टिंगल केलेली आहे. तसंच, ही नाटकं बघाणारे प्रेक्षक, त्यांचा उच्चभ्रूपणा यावरही विनोद आहेत.
मला आठवत नाही कुठे वाचलय ते
मला आठवत नाही कुठे वाचलय ते पण त्यांचा मेन आक्षेप असा होता की "थिएटर ऑफ द ॲबसर्ड" का कायसंस, ज्याची यथेच्छ थट्टा पुलंनी उडवली आहे त्याचा, उगम युरोपात दुसऱ्या महायुद्धामुळे झाला. त्या युद्धात जे डिस्ट्रक्षन लोकांच्या अनुभवण्यात आलं त्यातुन ती नाटकं तयार झाली आणि त्यामुळे युरोपीय परिप्रेक्ष्यात ती प्रभावी/ क्रांतिकारी होती. पण आपल्या इथे त्या स्केलवरचं डिस्ट्रक्षन कोणीही अनुभवलं नाही आणि म्हणुन त्या प्रकारच्या नाटकांना भारतीय वातावरणात आणणे, अनुवादीत करणे हा प्रकार फ्रॉड आहे. आणि म्हणुन त्यांनी त्याची टर उडवली.
इंगमार
कोण इंगमार?
धन्यवाद
;)
असो, पण सीरियसली इंगमार यांचा एक चित्रपट फेस्टिव्हलमध्ये पाहिला होता. चांगला असावा . कारण अजूनही आठवतोय.
पुलंचे भक्त आणि इंगमारांचे° भक्त यांच्यात डावे ऊजवे करणे अपेक्षित आहे का?
° इंगमार किंवा सारंग किंवा मर्ढेकर (वगैरे) pick your poison°°
°° किंवा जी ए
°°° हे उगीचच. वरती संदर्भ शोधू नका. सापडला नाही म्हणून अर्थहीन आयुष्याचे प्रतीक वगैरे असं काही भंकस करू नका.
काय फरक पडतो राव...
तुम्ही जाणीवांच्या कक्षा विस्तार विस्तार विस्तारलेले उच्चभ्रू युनिव्हर्सल असाल किंवा अगदीच सदाशिवपेठी/दादर-गिरगावकर ममव असाल; तुम्ही परंपरांवर निष्ठा ठेवणारे असाल किंवा नवतावादी असाल; तुम्ही काळ्या गांडीचे असाल, गोऱ्या गांडीचे असाल नायतर काळी गांड गोरी करण्याचा नादात घासून घासून झालेल्या लाल गांडीचे असाल; मुख्य प्रश्न हा, की पुलं युनिव्हर्सल वगैरे होते की नाही, किंवा त्यांची कला वगैरे गोष्टींबद्दल समज किती होती याने नक्की काय फरक पडतो? त्यांना जे काय करायचं ते त्यांनी केलं, बऱ्यापैकी लोकप्रियताही मिळवली. आता त्यांचं लिखाण काही लोकांना सुमार वाटेल काही लोकांना डोक्यावर घेऊन नाचण्याइतकं भारी वाटेल, वाटेना का? मुळात येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या लेखनात स्वत:शी/सभोवतालशी रिलेट करता येण्याजोगं काहीतरी सापडलं तर ते टिकेल अन्यथा विस्मृतीत जाईल. ते येणारा काळच ठरवेल, आपण ठरवणारे कोण? राहता राहिला प्रश्न पुलंनी खिल्ली उडवलेल्या वेटिंग फॉर गोदो किंवा खुर्च्या वगैरे गोष्टींचा. त्या तर इतक्या टाईम स्पेसिफिक किंवा ठराविक कालाशी जोडलेल्या आहेत की अजून ५० वर्षांनी पब्लिकला घंटा कळणार नाहीत त्यातले संदर्भ. मी स्वत: त्याचं विडंबन 'खुर्च्या' वाचलं तेव्हा काही समजलं नव्हतं आणि इर्रेलेव्हंट वाटलं होतं. त्यातले संदर्भ नुकतंच विजया मेहतांचं आत्मचरित्र वाचलं तेव्हा उमगले. तेव्हा इतरांची बातच सोडा.
मुख्य प्रश्न हा, की पुलं
मुख्य प्रश्न हा, की पुलं युनिव्हर्सल वगैरे होते की नाही, किंवा त्यांची कला वगैरे गोष्टींबद्दल समज किती होती याने नक्की काय फरक पडतो?>>>
अगदीच निहिलिस्टिक टोकाला जायचं झालं तर कशानेच काहीच फरक पडत नाही. पण त्या टोकाला न जाता जगायचं असेल तर अभ्यासण्यासारखे खूप प्रश्न असतात. त्यांच्या उत्तरातून कुठलंतरी मिक्सरसारखं उपयुक्त यंत्र बनवता येईल असंही नसतं. पण ते प्रश्न असतात, पडतात म्हणून त्यांची उत्तरं शोधली जातात. हा मनुष्यस्वभाव आहे. त्यातून सर्वसाधारण ज्ञानविस्तारापेक्षा अधिक काही होण्याची अपेक्षा नसते.
जीवनविषयक तत्त्वज्ञान
१. "काय घाण सुटलीय!", माझी पत्नी म्हणाली. घाण आता मलाही आली होती; पण एन्ट्रीला हे वाक्य टाकावं, हे काय मला बरं वाटलं नाही. - 'पेस्तनकाका'तून
२. 'जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा'
--- बोरकरांच्या काव्यवाचनात, पुलंनी उद्धृत केलेल्या ओळी
तुझे आहे तुजपाशी
'तुझे आहे तुजपाशी' पुलंच्या जीवनदृष्टीच्या जवळ जाणारं वाटतं. म्हणजे, आनंदी वृत्तीनं मजा घेत जगावं, फार विचार करू नये, वगैरे. जगण्याचा एक व्यक्तिनिष्ठ मार्ग म्हणून त्यात काहीच अडचण नाही, आणि ज्याला तसं जगायला आवडतं (आणि परवडतंही) त्यानं ते खुशाल करावं. मात्र, त्याचं तत्त्वज्ञान करू गेलं किंवा जगण्याचा तोच एक मार्ग योग्य म्हणू गेलं की अडचणी येतात. 'ज्या वयात सूत जमवायचे त्या वयात सूत काय काततोस?' वगैरे कोट्या (कोट्या म्हणून) चांगल्याच आहेत, पण त्यातून अँटि-इंटेलेक्चुअलिझमला एक प्रकारे प्रतिष्ठा मिळाली, हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. कुणी म्हणेल की ह्यात पुलंचा काय दोष? त्यामुळेच वर मी कार्यकारणभावाचा मुद्दा मांडला. म्हणजे मराठी माणूस अँटि-इंटेलेक्चुअलिझमला प्रतिष्ठा देणारा असल्यामुळे पुलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व झाले, की पुलंमुळे तो अँटि-इंटेलेक्चुअलिझम अधिक फोफावायला मदत झाली, ते नक्की सांगता येत नाही.
पुलंमुळे फोफावायला मदत झाली
पुलंमुळे फोफावायला मदत झाली असं वाटतं, कारण जर मराठी माणूस अँटी इंटेलेक्चुअल असता तर इतके विचारवंत महाराष्ट्रात उदयास आले नसते. आणि हे सगळे युनिव्हर्सिट्यांमधल्या खुर्च्या उबवणारे आर्मचेअर लोक्स नव्हते तर कर्ते सुधारक होते. त्यामुळे समाजाची प्रकृती तशी नसावी.
असं म्हणता येईल का, की १९५०-७० मध्ये जो भ्रमनिरास झाला होता त्याचं प्रतिबिंब म्हणून मग ही असली जाणीव फोफावली? १९५०-७० या काळात महायुद्धपूर्व समाज तुफान वेगाने बदलला, धार्मिक व जातीय समीकरणे बदलली. बेरोजगारी बेकारी इ. सुद्धा होतीच. त्यामुळे असं झालं असावं?
काळाचा महिमा असेलही. याच
काळाचा महिमा असेलही. याच काळाच्या सुमारास "अँग्री यंग मॅन"चा उदय झाला. प्रश्नाच्या नुआन्सेसला टाळून सोप्प्या उपायाचे स्वप्न पाहणे सुरू झाले का?
तो बॅलन्स नेहमी मागे पुढे होत असावा. काही काळ पुन्हा नुआन्सेस पाहण्याचा काळ येत असावा. मग पुन्हा नाना पाटेकर/नांगरे पाटील यांचा जमाना येत असावा.
मला नाय वाटत तसं.
मुळात बुद्धिवादी लोकांचे सनदशीर पद्धतीने विरोध करण्याचे, लिखाण वाचन करून शिकण्याचे, शास्रांवर प्रभुत्व मिळवण्याचे उपाय गांधीजींच्या आगमनानंतर अगदीच केविलवाणे ठरले.
बापूंनी आपल्या "आतल्या आवाजाला महत्त्व द्या" सांगून बुद्धिवादी परंपरेला(?) जवळपास संपवून टाकलं.
तेव्हा सगळ्यावर सुलभ इलाज दिला गांधींनी- आणि मग १९२० नंतरच्या गांधीयुगात तेच सर्वमान्य झालं.
विनय हर्डीकरांच्या सुमारांच्या सद्दीत ह्यावर मार्मिक टिपण आहे तसंच "महाराष्ट्राची शोकांतिका" हे अरूण गुजराथी लिखित पुस्तक काहीसं वहावत गेलं तरी त्यात हा मुद्दा नीट मांडला आहे.
दळवींच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या लेखात समाजवाद्यांच्या मानसिकतेवर असं बरंच लिहून ठेवलंय-
ते म्हणातात गावांकडे जाऊन लोकांसाठी कामं करणं, काटक बनायला कमी अन्न घेणं आणि खूप चालणं असे उपक्रम चालत कारण राष्ट्राच्या कामी यायचं होतं.
मग शालेय शिक्षणाला तिलांजली द्या, समाजाची सेवा करा, आतल्या आवाजाकडे लक्ष द्या, गरीबांसारखे रहा वगैरे वगैरे काहीही उपक्रम कुणीही सुरू केले.
गांधीवादाने भारून जाऊन लोकांनी आश्रम, अहिंसा, सूतकताई, आत्मक्लेश, त्याग इ.इ. म्हणजे योग्य आणि अनुकरणीय जीवनशैली मानली. ह्या सगळ्याचं ओझं डोक्यावर घेऊन वागताना दमछाक झाली नसेल का?
हा सगळा मुळात अँटि-इंटेलेक्चुअलिझम नाही तर अजून काय आहे? तेव्हा १९२० पासूनच हे चालू झालं होतं आणि स्वातंत्र्यानंतरही हर्डीकर म्हणतात तशा "गांधींच्या विधवा" आपण पोसत होतो.
------
आता १९५५ - म्हणजे पस्तीस वर्षांनी पुलंनी "तुजे आहे तुजपाशी" लिहिलं असेल तेव्हा "स्वत:च्या आनंदासाठी जगलं तर त्यात काहीच चूक नाही" इतका साधा सल्लासुद्धा ॲबनॉर्मल वाटला असणार.
काकाजींसारखं पात्र अतिशय ढोबळपणे गोंधळलेल्या शामला (तरूण लोक्स) आचार्य पोफळे गुरूजींच्या दबावातून सोडवतं हे तेव्हा गरजेचं होतंच.
कसं वागावं ह्या आदर्शाचा लंबक एकदम "आत्मपीडन" वगैरे टोकाला गेला त्याला "हस्तमैथुना" पर्यंत नको पण निदान पोरं-पोरींनी एकमेकांना बघण्यात पाप नाही इथपऱ्यंत आला ते काय कमी आहे?
----
खरं तर स्वत:ला पुलंच्या यत्तेत बंद करून घेतलं लोकांनी. आता पुल लोकप्रिय आहेत तेव्हा वाचकांनी पुलंच्या इयत्तेतून बाहेर पडायचं की नाही हा ज्यांचा त्यांचा प्रश्न.
पण हा आरोप पुलंच्या इतर लिखाणाला जेवढा रास्त लागू होतो तितका "तुझे आहे तुजपाशी"ला नाही.
====
शेवटी मेघनाच्याच लेखातून पुन्हा चिकटवायचं झालं तर -
काहीही असलं, तरी पुलंबद्दलच्या या अतिरेकी कौतुकामुळे सर्वसामान्य मराठी वाचकाचं नुकसानच झालं. ‘मी आणि माझ्या शत्रुपक्ष’मध्ये नायकाच्या खांद्यावर पडलेल्या शिमिटाच्या गिलाव्याच्या लपक्याला ‘नवचित्रकला’ असं संबोधणाऱ्या पुलंचा आदर्श मानून आजही अनेक जण ‘ते ॲबस्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही बा कळत’ असं आनंदानं आणि अभिमानानं सांगतात. हे स्वतःलाच एका विशिष्ट प्रकारच्या अभिरुचीच्या कुंपणात बंदिस्त करून घेणंच होतं. पुलंच्या राक्षसी लोकप्रियतेनं त्याला प्रतिष्ठाही बहाल केली.
लपक्याला ‘नवचित्रकला’ असं ...
लपक्याला ‘नवचित्रकला’ असं संबोधणाऱ्या पुलंचा आदर्श मानून आजही अनेक जण ‘ते ॲबस्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही बा कळत’ असं आनंदानं आणि अभिमानानं सांगतात.
अहो पण...एक मिनीट, नीट लिहितो..
- सर्वात आधी म्हणजे असं लिहिलंय म्हणून "खरोखरच पुलंना नवचित्रकला कळत नाही" असं अनुमान कोणी अंध भक्ताने काढलं तर त्याला पुल जबाबदार कसे? लेखक जे लिहितो ते प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यातही तसंच असेल असं सरसकट समजणारी भोटम मंडळी होती का समाजात /आहेत का? "यू सी यू सी, वुई आर वेटींग हेअर फॉर हाफ पास्ट सिक्स अवर्स यू सी?" किंवा "टुमारो बीईंग ऑल फादर्स नाईट" वगैरे लिहिणारे पुल प्रत्यक्षात उत्तम ईंग्रजीत भाषण द्यायचे. आता प्रत्यक्षातपण पुलंची ईंग्रजीत बोलायची पंचाईत होती असा निष्कर्श कोणी काढला तर ती कोणाची चूक?? बाय द वे, पुलना नवचित्रकलेत किती गम्य होतं मला माहीत नाही - असेलही / नसेलही.
- पुलंनी हजार हातानी लोकाना मदत केली. पुलंबद्दल अतिरेकी कौतुक असणाऱ्या किती मंडळीनी या बाबतीत त्यांचा कित्ता गिरवला? पुन्हा तोच प्रश्न - "पुलनी केलंय म्हणून मीही तसं करीन" असं करणाऱ्या / वागणाऱ्यांच्या सिलेक्टिव्हपणाबद्दल पुलंना दोष द्यायचा? आणि मी जेव्हा किती मंडळीनी कित्ता गिरवला विचारतोय तेव्हासुद्धा हाच निकष लाउन कोणी "पुलनी समाजाला मदत केली म्हणून मीही करीन" या भावनेने करावं अशी अपेक्षा नाही तर त्यानी सत्पात्री दान करण्याचा दृष्टिकोन ठेवला होता, त्यांच्याकडे जे आहे ते निव्वळ तिजोरी लुटवल्यासारखं न देउन टाकता त्याबद्दल अकाउंटेबिलिटीची अपेक्षा ठेवली होती, "दानच देणारे मग थोडे नियम वाकवून पैसे जमा केले तर चूक काय त्यात?" असला अंगचोरपणा कधी केला नाही हे सगळं लक्षात घेउन, विचार करून, "जे जे उत्तम ते ते आचरावे" या उक्तीला स्मरून कित्ता गिरवावा.
- आनंदानं आणि अभिमानानं नाही पण अतिशय प्रांजळपणे, कळवळून, प्रामाणिकपणे, हृदयस्थ आत्य्माला वगैरे वगैरे साक्षी ठेउन मी सांगतो की मला ख रो ख रं च ॲबस्ट्रीक्ट वगैरे नाही कळत. आणि कळवळून म्हणायचं कारण की लोकाना त्यातलं कळतं (म्हणजे तसं लोक म्हणतात तरी!) मग मलाच का नाही? ही खंत आहे !! ("आम्हीच रे कसे असे कर्म दरिद्री? मधे बेंबट्याचा वडीलांची आहे ना तश्श्श्शी खंत आहे मला :-) यावरनं अजून एक - माझ्या या लेखावरच्या जवळ जवळ प्र्त्येक प्रतिसादात पुलंचं काहीतरी उद्धृत केलंय. ते प्रयत्न करून नव्हे, आटापिटा तर नव्हेच नव्हे, तर ते आपसूकच 'आलं / येतं' म्हणून. नाही म्हणजे अतिरेकी कौतुकाचा आरोप वगैरे व्हायचा नाहितर !! ) . आता ही माझ्या अकलेची मर्यादा आहे. ॲब्ष्त्रॅक्ट आर्ट, अदिती पहिल्या पानावर डकवते त्यातली बरीचशी चित्र, ईथल्या बऱ्याचशा कविता, तूच लिहिलयंस त्याप्रमाणे ईथले "धुरिणत्वाच्या छायेतील विखुरलेली सत्ये" सारखे लेख, भिकार आहेत - हे पुलना आवडेल म्हणून नाही मला वाटतं म्हणून मी म्हणतोय. पुलंचा भक्तगण बनून त्यातलं कळत असूनही मी "नाही बुवा समजत" म्हणायला लागलो तर तो माझा मूर्खपणा पुलंच्या खात्यात जमा करायचा??
असो. खूप शब्द ओतले ईथे. आणि आता आधी मेघनाचा लेख वाचतो. क्वाईट फ्रँकली, या तुझ्या लेखनामुळे मेघनाचा ब्लॉग (परत एकदा) सापडला हे मोठ्ठं फलित. मला वाटलं गायबच झाली होती ती आंतरजालावरूनच.
कलोअ...
तुझे
मला वाटतं (हा मुद्दा मध्यंतरी अजूनही कोणीतरी मांडला होता.) तात्कालिक साहित्याला नंतर काल-निरपेक्षपणे पाहिलं तर अनेक उणिवा जाणवत असाव्यात. तुझे मध्ये ज्या तत्कालिक 'आदर्श' तत्वांची खिल्ली उडवलेली आहे ती तत्वं आज तशी कोणालाच महत्त्वाची वाटत नाहीत. (तरीही, आजही अधूनमधून मला गीतेतल्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगणारा कोणीतरी भेटतोच, किंवा 'आय एम द ही इन द यू... ' वगैरे प्रकार करणारे बाबाबूवा आजही आहेत अन त्यावर भाळणारेही आज दिसतात, त्यावरून तेव्हा तो विनोद तेव्हा किती समर्पक असेल असे वाटल्याशिवाय राहत नाही.)
बाकी, बर्गमनविषयीचा हा लेख नुकताच वाचनात आला. "From the late 1950s through the early 1980s, the name Ingmar Bergman was virtually synonymous with art-house cinema. But by the time the Swedish filmmaker died in 2007, he seemed to have gone out of fashion. A mere week after his death, the critic Jonathan Rosenbaum wrote an Op-Ed piece in The New York Times titled “Scenes From an Overrated Career.”"
"चुक्याच"...
"अंतुले तुम्हारा चुक्याच" सारखा निव्वळ फालतू लेख
"चुक्याच" जेव्हा लिहिला गेला / (वर्तमानपत्रात) प्रकाशित झाला, तेव्हा पुष्कळ भाव खाऊन गेला, असे आठवते. जे ठीकच होते. त्याला काही तात्कालिक राजकीय संदर्भ होते, आणि त्या अनुषंगाने एक करंटटॉपिकात्मक राजकीय खिल्ली म्हणून तो आपल्या जागी ठीकच असावा; नव्हे, उत्तम असावा, असेही म्हणण्याचे धाडस करता येईल. मात्र, हा अजरामर/एव्हरग्रीन लेख खचितच नव्हे. आणि संग्राह्य तर (निदान माझ्या मते) निश्चितच नाही. ('पु.लं.नी हेही कधीतरी लिहिले होते' म्हणून आर्काइव्हलमूल्याखेरीज त्यास संग्रहमूल्य नसावे.) का त्या संग्रहात अंतर्भूत केला गेला, हे एक तो (संग्रहाचा) प्रकाशकच जाणे. आजमितीस, डिव्हॉइड ऑफ द कंटेंपररी पॉलिटिकल रेफरन्सेस (विच वुड बी लार्जली इर्रेलेव्हंट टुडे), हा लेख निव्वळ फालतू वाटणे साहजिक आहे.
वोके.
खिल्लीच्या प्रस्तावनेतच पुलंनी ह्या पुस्तकात नेत्यांची जाहीर खेचल्याची कबुली दिली आहे.
"प्रस्तुत पुस्तकातले प्रसंग काल्पनिक असले तरी व्यक्ती खऱ्याच आहेत.तेव्हा साम्य वगैरे आढळलं तर योगायोग मानू नये".
पुस्तक प्रकाशित झालं १९८०त - त्याआधी आणिबाणी ते जन्ता सरकार वगैरे प्रकारांत पुलंनी आपली भूमिका मांडली होती. ह्या पुस्तकात नेत्यांची खेचली जाणं असा उद्देश असेल तर त्यातले लेख "संग्राह्य" म्हणता येणार नाहीत.
पण मग अशा पुस्तकात इतर लेख टाकून थोडी गडबड झाली आहे. असो.
थ्यांक्स न.बा.
रिपीटिशन...
पुलंची सगळी व्यक्तिचित्रं "गणगोत" "गुण गाईन आवडी" "मैत्र" "दाद" वगैरे एकामागे एक वाचली तर असह्य रिपीटेशन होतं
एखाद्याने भरपूर साहित्य लिहिले, तर त्यात रिपीटिशन होणे हे अनिवार्य जरी नसले, तरी स्वाभाविक आहे / त्याकडे कल वाढत असावा. नव्हे, तसा मोह होत असणेही अशक्य नाही. त्यामुळे, पु.लं.ना त्याबद्दल क्षमा करता येईल.
रिपीटिशन कोणाला टळले आहे? पाहायला गेले, तर वुडहाउसमध्येदेखील रिपीटिशन आढळेल, अॅस्टेरिक्समध्येही आढळेल. (आमच्या वाचनकक्षेची मर्यादा पु.ल., वुडहाउस आणि अॅस्टेरिक्स इथे संपते, हे यावरून उघड व्हावे.) फार कशाला, खुद्द आमच्या लिखाणात प्रचंड रिपीटिशन आढळेल. (पु.ल., वुडहाउस आणि अॅस्टेरिक्स यांच्या पंगतीत गेटक्रॅश करण्याचा आमचा हा ब्लेटंट प्रयत्न.) पण रिपीटिशननेही कधी बहार येऊ शकते; रिपीटिशनला, कसे वापरले आहे त्यानुसार, विनोदमूल्य असू शकते. (असतेच, असे नाही.) तेव्हा, रिपिटिशनमुळे लिखाणास खुमारी यावी, की ते असह्य व्हावे, हे (१) सब्जेक्टिव आहे, आणि (२) लिहिणाऱ्याच्या हाताळणीवर अवलंबून आहे.
अर्थात, व्यक्तिचित्रांत रिपीटिशन एकसुरी तथा असह्य होऊ शकेल, हे मान्य. (पु.लं.च्या विनोदांतही ते - बोले तो, रिपीटिशन - क्वचित नॉट-सो-फनी तथा असह्य कंटाळवाणे होऊ शकते, ते वेगळे. परंतु त्याबद्दल पुन्हा कधीतरी.)
.........
असो. पु.लं.बद्दल आम्हांस इतर काहीही आक्षेप असू शकतील, परंतु आमची तक्रार रिपीटिशनबद्दल (तितकीशी) नाही.
हॅट चामारी !
हॅट चामारी ! अस्वलाचा अद्ययावत मजकूर वाचला. आधी पुलंच्या साहीत्याची चिरफाड / त्यांच्या मर्यादा, दोष वगैरे स्फोटक टायटल होतं आणि आता आपलं हे आवडलं, ते नाही ईतकंच. "सखाराम बाईंडर" बघायला जावं आणि "सखाराम बाईंडर - एक तौलनिक अभ्यास" ऐकावं लागावं तद्वत. पण क्रमश: आहे - सो, लेट्स सी.
पण या निमित्ताने मेघना अजून लिहिते हा शोध लागला. एव्हढं फलित सध्या मला पुरेसं आहे :-)
'तुझे आहे तुजपाशी' पुलंच्या
'तुझे आहे तुजपाशी' पुलंच्या जीवनदृष्टीच्या जवळ जाणारं वाटतं. म्हणजे, आनंदी वृत्तीनं मजा घेत जगावं, फार विचार करू नये, वगैरे.>
पुलंच्या विनोदाचं इतकं डंबिंग डाऊन, तेसुद्धा जंतातुर चिंतूंसारख्याकडून होत असेल, तर इतर येरांची काय कथा. यावरूनच 'wit' ही गोष्ट मराठी माणसासाठी किती फॉरेन कन्सेप्ट आहे हे लक्षात येतं. त्यांचा विनोद निव्वळ कोटीबाज नसून फारसं कडक न होता (त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हजामत केल्यासारखा) समाजातल्या दांभिकतेवर सूक्ष्म टीका करणारा होता. उदा. आचार्य पोफळे गुरुजींसारख्या धर्माचे अवडंबर मावणार्यांच्या वागण्यातल्या विसंगती, झालंच तर अतिविशाल महिलांचं तोंडदेखलं समाजकार्य. त्याचं 'विचार न करता जगावं' हे इंटरप्रिटेशन गमतीदार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भ्रमनिरासामुळे आणि थोरांनी दाखवलेल्या मातीच्या पायांमुळे मराठी माणसाने पुलंचा विनोद उचलून धरला, यात थोडंफार तथ्य वाटतं. उदाहरणादाखल विनोबांवर पुलंचे दोन लेख आहेत. पहिला टीपिकल भक्त मोडमध्ये लिहिलेला आणि दुसरा आणीबाणीत त्याच बाबाने दाखवलेल्या लाचारीची खिल्ली उडवणारा. (फॉर द रेकॉर्ड, पुलं स्वतः फार ध्येयवादी होते असे म्हणायचे नाही. तेही कायम नॉन-कन्फ्रन्टेशनल मोड मध्येच जगत आले. कदाचित इतरांची खिल्ली उडवताना ते स्वतःवरही हसून घेत आले असावेत. आणि त्यांचा विनोद उचलून धरणार्या त्यांच्या चाहत्याने आपलं प्रतिबिंब त्यात पाहिलं असावं) पुलं मुळे मराठी माणूस ॲंटि-इंटलेकच्युअल बनला म्हणणं म्हणजे थर्मामीटरमुळे तपमान वाढलं म्हणण्यासारखं आहे.
मूळ आणि प्रेरित आणि प्रेरितप्रेरित
उदा. आचार्य पोफळे गुरुजींसारख्या धर्माचे अवडंबर मावणार्यांच्या वागण्यातल्या विसंगती, झालंच तर अतिविशाल महिलांचं तोंडदेखलं समाजकार्य.
ह्यातला मूळचा विचार (धर्माचं अवडंबर माजवण्यावर विनोद, उच्चभ्रू बायकांवर विनोद) मोलिएरनं काही शतकं पूर्वी केला होता, मग अत्र्यांनी त्याच्यावरून प्रेरित होऊन मराठीत नाटकं लिहिली होती. त्यानंतर पुलं आले, हे लक्षात घेतलं तर पुलंमध्ये जे ओरिजिनल उरतं ते काय, हे समजू शकेल, कदाचित.
जंतू, (माझ्यासारख्याला हे
जंतू, (माझ्यासारख्याला हे म्हणायचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद!)
सरसकटीकरण करू नका हो!
तुझे आहे तुजपाशीमधले काही भाग पुलंनी इतरांच्या लिखाणावरून भले ढापलेही असतील (मुळात ते तपासायला हवं)
पण त्यावरून डायरेक्ट "पुलंमधे ओरिजिनल" ..
त्च.. त्च.. तुम्हीच सांगा हे बरोबर वाट्टंय का?
-----------
पुलंमधलं काय काय् ओरिजिनल नाही ते वाचायला आवडेल.
एय्य?
प्रत्यक्षात काय झालं आणि लोकांचे पुलंबद्दलचे विचार/मतं काय हे सोडून देऊ.
मात्र कलाविषयक जाणिवांच्या मर्यादा ओलांडायच्या असतील तर स्वतःचं काही योगदान द्यावं लागतं; मागच्या लोकांनी जे केलेलं आहे तेच पुन्हा पुन्हा करून मर्यादा ओलांडता येत नाहीत. (बालिष्टर बनवताना असं साधं तर्कशिक्षण होत नाही काय?)
Einstein once said that insanity is doing the same thing over and over and expecting a different result. हे आईनस्टाईन म्हणाला का श्माईनस्टाईन यानं फरक पडत नाही. त्यातलं तथ्य महत्त्वाचं.
पुन्हा, गाणं आसमंतात आहे की
पुन्हा, गाणं आसमंतात आहे की फक्त तुमच्या कानांत आहे? कारण या लेखात आणि त्यावरच्या प्रतिसादांत कोणीच 'पुलंनी मराठी माणसाची कलाविषयक जाणीव मर्यादित केली' असं म्हटल्याचं दिसत नाही. काही विधानं उद्धृत करता का? प्लीज, 'पुन्हा वाचा म्हणजे समजेल' असं म्हणू नका...
पुलंनी कोणाची खिल्ली उडवली
पुलंनी कोणाची खिल्ली उडवली यावरूनही त्यांच्या वैचारिक बैठकीचं चित्र उभं राहातं. 'जीवन आनंदाने जगा लेकोहो, उगीच कुठल्यातरी तत्त्वज्ञानाचं एरंडेल पिऊन तोंड वाकडं करून आनंदाकडे पाठ फिरवण्यात, मन मारण्यात काय अर्थ आहे?' हा त्यांचा साधा मूलमंत्र होता. यातच एक सुलभीकरण आणि तत्त्वचिंतनाला विरोध दडलेला आहे. पोफळे गुरुजींची चेष्टा ही त्यातूनच आलेली आहे.
नाही
पोफळे गुरुजिंना विरोध = तत्त्वचिंतनाला विरोध असं म्हणताय का? त्यातुन पोफळे गुरुजी जे करत होते (सुत कताई, भजी खाण्याला पाप म्हणणे, हातसडी वगैरे) ते तत्वचिंतन होते असं ध्वनित होत आहे. पोफळे गुरुजींच्या फाल्तुपणाला तत्वचिंतन म्हणणं पटत नाही.
ज्याचा विरोध करायचा त्याची खिल्लीच उडवायची हाच तर स्थायीभाव आहे. म्हणजे मग समोर मोनालिसा असो की आधुनिक कला की गांधीवाद - त्यांचं चित्रण असं काही करायचं की त्यांची खिल्ली न्याय्यच वाटावी, आणि शिवाय आपल्याला हशे आणि टाळ्याही मिळाव्यात, हीच तर खुबी आहे. आणि ही स्ट्रॅटेजी आधी अत्र्यांनीही वापरली होती. आणि तेही महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होतेच. म्हणजे महान परंपरा उत्तमरीत्या कशी जिवंत ठेवायची ह्याचा धडाच!
गांधीवादाची खिल्ली - हे
गांधीवादाची खिल्ली - हे पुलंच्या कुठल्या पुस्तकाल उद्देशून आहे?
तुज आहे तुजपाशीवरून का? ती गांधीवादाची खिल्ली आहे असं आपलं मत असेल तर ते दुरूस्त करायला हवं.
---
नाही, कारण त्यांनी गांधीजी नामक पुस्तक आणि "एक शून्य मी" मधे गांधींच्या स्तुतीपर इतकं लिहिलंय की पुलं गांधीभक्त होते अशी खात्रीच पटावी.
खिल्ली उडवणं हा निगेटिव्ह
खिल्ली उडवणं हा निगेटिव्ह मुद्दा कसाकाय होऊ शकतो? विनोदाचं वावडं का एवढं? त्यांनी त्यांची मतं विनोदाच्या माध्यमातुन सांगणं यात मला वावडं वाटत नाही. आणि ते त्यांनी हशे/टाळ्यांसाठीच केलं हे तर अजिबातच पटत नाही. टीकेचा फॉर्म अमुक अमुक होता हा आक्षेप तकलादु वाटतो.
तत्त्वचिंतन हा फार टोकदार
तत्त्वचिंतन हा फार टोकदार शब्द झाला. त्याऐवजी 'फार विचार करून जगणं' म्हणून बघा. असा फार्विचार हे काहीतरी कृत्रिम, अनैसर्गिक आणि जगण्याच्या ऊर्मींना बांध घालणारं - म्हणून त्याज्य - हे पुलंच्या लेखनात जागोजाग दिसतं. म्हणून दिलखुलास शिव्या देणारे रावसाहेब त्यांच्या स्तुतीचे पात्र होतात, तर सौंदर्यवाचक विधानातल्या फार्विचारी चिकित्सक मित्राची चेष्टा होते.
फार विचार त्याज्य नसुन
फार विचार त्याज्य नसुन बेगडीपणा, डबल स्टँडर्ड (पोफळे, नागुतात्या, लखु रिसबुड, खुर्च्या ) त्याज्य असं मला तरी दिसतं त्यांच्या लिखाणात. त्यांच्या लिखाणातुन्न/भाषणातुन केलेली हिंदुत्ववाद्यांवरची टीका, वैद्न्यानिक दृष्टीकोण प्रसार करण्याचं इन्क्लिनेशन हे विचार करुन जगणंच आहे.
मला आवडलेल्या/महत्वाच्या वाटणारऱ्या कलाकृतीची टर उडवली म्हणुन ते एकंदर विचारालाच् विरोध करायचे असा काहीसा सुर दिसतो वरील आक्षेपांमध्ये.
तुझे आहे.. मधल्या आचार्यांवर
तुझे आहे.. मधल्या आचार्यांवर मुख्य टीका अशी आहे की ते त्यांचं जीवन तत्त्वांच्या मागे लागून वाया घालवत आहेत. 'उंट तिरका जाणार, आणि हत्ती सरळच जाणार' असा निसर्गनियम ते तोडत आहेत. Life just flows, and it aught to flow naturally uninhibited. असं त्यांचं साधं जीवनमूल्य होतं. वैचारिक बांध घालणं त्यांना आवडत नसे. हे त्यांच्या ललित लेखनातून दिसून येतं.
ललिताच्या मानाने त्यांचं अललित इतकं कमी आहे, आणि इतकं कमी प्रसिद्ध आहे की त्यांच्या विचारांचा उदारमतवादी कल वैयक्तिक पातळीवरच राहिला असं म्हणता येईल.
'उंट तिरका जाणार, आणि हत्ती
'उंट तिरका जाणार, आणि हत्ती सरळच जाणार' हाच तर उदारमतवाद नव्हे का मित्रा? 'तुझे आहे' आजच्या काळात लिहिलं गेलं आहे असा विचार करून पहा. सूतकताई, ब्रह्मचर्य हे आज कालबाह्य झाले, पण आजच्या काळातला श्याम कदाचित त्यांनी गे दाखवला असता. पोफळे गुरुजी हा त्याला 'स्ट्रेट' करण्याचा प्रयत्न करणारा एखादा संस्कृतीरक्षक असता. आणि 'तुम्ही काही केलंत तरी उंटाला 'सरळ' चालवण्याचा प्रयत्न करणं हेच अनैसर्गिक आहे' हा संदेश दिला असता.
पुलंच्या विनोदाचं लक्ष्य अध्यात्मिकता, उच्चभ्रू किंवा विचारवंत नसून 'दांभिकता' होतं हेच इथे अनेक जण सांगायचा प्रयत्न करतायत.
...
पण आजच्या काळातला श्याम कदाचित त्यांनी गे दाखवला असता. पोफळे गुरुजी हा त्याला 'स्ट्रेट' करण्याचा प्रयत्न करणारा एखादा संस्कृतीरक्षक असता. आणि 'तुम्ही काही केलंत तरी उंटाला 'सरळ' चालवण्याचा प्रयत्न करणं हेच अनैसर्गिक आहे' हा संदेश दिला असता.
नसता दाखवला. नसता दिला.
'जावे त्यांच्या देशा'मधले ते अमेरिकेतल्या गे चळवळीच्या अनुषंगाने त्यांचे (विनाकारण) प्रचंड होमोफोबिक ताशेरे आठवा.
(पुस्तक आता हाताशी नाही, आणि नेमके शब्द आता आठवत नाहीत, परंतु गोषवारा काहीसा असा. 'या लोकांनी आता समलिंगी लोकांची लग्नेसुद्धा व्हावीत, अशीसुद्धा मागणी करायचा आचरटपणा सुरू केलेला आहे. म्हणजे अमेरिकन आईबापांना आता नवी काळजी - मुलगा सून आणतो, की जावई, अशी. "हा माझ्या मुलाचा नवरा" अशी लोकांना ओळख करून द्यावी लागते की काय, ही धास्ती.' यातला होमोफोबिकपणा हा एक भाग झाला, पण मुळात, जावे त्यांच्या देशा, तर तिथे जा, काय पाहायचे ते पाहा, काय खायचेय ते खा नि गुमान परत या की! तिथल्या सामाजिक घडामोडींवर - आणि ज्यातले प्रश्न आपल्याला कळत नाहीत त्यात, कळून न घेता, कळून घेण्याचा प्रयत्नही न करता - आपल्या पूर्वग्रहांवरून ताशेरे कशासाठी? तुमच्या देशातल्या गिऱ्हाइकांत तुमचे पुस्तक खपावे म्हणून? 'पूर्वरंग'मध्येसुद्धा सिंगापुरातल्या चिनी जनतेबद्दल, त्यांच्या डोळ्यांच्या फटीतून सांडणाऱ्या बिलंदरपणाबद्दल, डुकरांसारखी पोरे काढण्याच्या चिनी बायकांच्या प्रॉपेन्सिटीबद्दल नि झुरळाच्या लोणच्याबद्दल प्रचंड रेसिस्ट ताशेरे ओढले आहेत. कशासाठी? च्यामारी, तुमच्या कंट्रीत येऊन आमच्याकडल्या एखाद्या टूरिष्टाने तुमच्या कंट्रीतल्या त्याला न कळलेल्या परंतु विचित्र वाटलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल घरी परत आल्यावर आपल्या ब्लॉगावर काही(बा)ही ताशेऱ्यात्मक खरडले (आणि मग ते व्हायरल झाले, किंवा झाले नाही तरीही), तर तुम्हाला ते खपेल काय?)
टू बी ऑनेस्ट, ती होमोफोबिक वक्तव्ये आम्ही जेव्हा प्रथम वाचली, तेव्हा आम्हाला ती मनोरंजक वाटली होती, आणि आम्ही त्यांवर खदाखदा हसलोही होतो. कारण शेवटी आम्हीही पडलो ममव, नि निदान त्या काळी तरी आमचेही एक्सपोजर नि आमचीही जाण तितपतच होती. (परहॅप्स, नाउ आय नो बेटर; परहॅप्स ओन्ली स्लाइटली बेटर, बट नेव्हरदलेस समव्हॉट बेटर.) आणि, टू बी फेअर, पु.लं.चीही जाण तेव्हा या बाबतीत कदाचित तितपतच असावी. आफ्टर ऑल, ही वॉज़ अ प्रॉडक्ट ऑफ हिज़ टाइम्स, सो परहॅप्स ही डिड नॉट नो एनी बेटर, ईदर. त्यामुळे, त्या काळातल्या सर्वसाधारण मानसिकतेस अनुसरून त्यांची वक्तव्ये ही (अन्याय्य आणि कदाचित हीन अभिरुचीतील असली, तरी) असाधारण अशी नव्हतीच. किंबहुना, रस्त्यावरील कोठल्याही तितपतच समज असलेल्या सोम्यागोम्याने केली असती, अशीच होती. (इथल्या एखाद्या ज्यूरी ऑफ पियर्सने कदाचित त्यांबद्दल त्यांना एक्सोनरेटही केले असते. किंबहुना, कोण जाणे, म्हणूनच ते मलाव्य असतील काय? मराठी माणसाच्या लसाविलासुद्धा अपील होऊ शकणारे, म्हणून?) पण मग प्रश्न असा पडतो, की त्यांना ग्रेट म्हणायचे, तर त्यांचा ग्रेटपणा मांडायचा कोणत्या खात्यावर?
त्याच 'जावे त्यांच्या देशा'मधल्या अमेरिकेसंबंधीच्याच एका लेखात आणखी एक गोष्ट खटकली. एका ठिकाणी अमेरिकेतल्या मोटारप्रवासाच्या संदर्भात अमेरिकेतल्या रस्त्यांच्या गुळगुळीतपणाची (पक्षी: रस्त्यांतील खड्ड्यांच्या अभावाची) प्रशंसा करतात. रस्त्यावरून मोटारीने भरधाव वेगाने प्रवास करताना पोटातले पाणी ठरत नाही, की ठरते, की असेच काहीतरी. (नक्की शब्दयोजना विसरलो, नि तपासण्यासाठी पुस्तक हाताशी नाही. परंतु सांगण्याचा मतलब भरधाव वेगातसुद्धा मोटार लागत नाही, असा होता. आता, 'पोटात पाणी न ठरणे' म्हणजे 'उलटी होणे' अशी माझी समजूत आहे. त्यामुळे, ते 'पोटातले पाणी ठरते' असे असले पाहिजे, असे वाटते.पण, समहाउ, ते 'ठरत नाही' असे वाचल्याचेही आठवते. त्यामुळे कन्फ्यूजन आहे. असो, त्याला फारसे महत्त्व नाही; गोषवारा 'मोटार लागत नाही' असा आहे. कदाचित 'ठरत नाही' नसेल, 'हलत नाही' असेल. जाऊ द्या.) आता, अमेरिकेतले रस्ते हे बव्हंशी पुण्यातल्या रस्त्यांच्या तुलनेत कित्येक पटींनी खड्डाविहीन आहेत, ही गोष्ट निदान आजमितीस तरी खरीच आहे (कदाचित तेव्हाही खरी असावी, असे मानावयास जागा आहे), तेव्हा सो फार सो गूड. मात्र, पुढचेच विधान 'अर्थात, अमेरिकेत पोटात पाणी क्वचितच असते म्हणा', असे काहीसे आहे. उगाच काहीही? ठोकून देतो ऐसा जे? अमेरिकेत दारू वर्ज्य नाही, अनेकप्रसंगी सामान्य आहे, हे खरे आहे, बियर तर अतिसामान्य पेय आहे, हेही खरे आहे, परंतु म्हणून अमेरिकन मनुष्य सदानकदा दारू पीत/पिऊन असतो, हेही एक तर तितकेसे खरे नाही. आणि दारू पिऊन वाहन चालवण्याविरुद्ध भयंकर कडक कायदे आणि शिक्षा आजमितीस तर आहेतच, बहुधा तेव्हाही असावेत. अगदी ज्या लिबरल कॅलिफोर्नियातले हे वर्णन आहे, तेथेसुद्धा तेव्हासुद्धा दारू पिऊन वाहन चालवणे हे टॉलरेट केले जात असेलसे वाटत नाही, आजमितीस तर केले जात नाहीच. पण अर्थात त्या काळात अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता तसाही कोणाला पत्ता लागणार होता म्हणा. उलट अमेरिकेबद्दलच्या प्रचलित पूर्वग्रहांना फुंकर घातली जाऊन लोकांना हसायला बरे. म्हणजे हे अमेरिकेचे जाणूनबुजून नि बेजबाबदार डेनिग्रेशन नव्हे काय? नि कशासाठी, पुस्तक खपवण्यासाठी?
असो, तूर्तास इतकेच. पु.लं.ची प्रवासवर्णने ही मुक्तपीठात छापण्याच्याच लायकीची होती, या आमच्या अलीकडे होऊ लागलेल्या मताचा पुनरुच्चार करून हा प्रतिसाद आवरता घेतो. उर्वरित मते/ढुंगणे पुन्हा कधीतरी.
प्वाईंट रोचक आहे.
प्वाईंट रोचक आहे.
----
पण मग प्रश्न असा पडतो, की त्यांना ग्रेट म्हणायचे, तर त्यांचा ग्रेटपणा मांडायचा कोणत्या खात्यावर?
आधी ह्याचं उत्तर देतो- विनोद. उत्तम, लोकांना खरोखरंच हसवणारा आणि दर्जेदार विनोद. हा माझ्या अल्पमतीप्रमाणे पुलंचा सगळ्यात मोठा ग्रेटनेस आहे.
पहा - वरती दिलेली Tier 1 पुस्तके. आणि पुलंनंतर उत्तम विनोदी लिहिणारे किती लेखक आज वाचले जातात?
------
आपण आज समलैंगितकेच्या बाजूने आहोत. पण नातेवाईकांचे परस्पर् लैंगिक संबंध निषिद्ध मानतो.
पण समजा २१०९ साली जर कुणी हे वाचत असेल तर तो म्हणेल की अरे - हे लोक इतके मागासलेले आणि निर्बुद्ध होते की साधे लैंगिक संबंध नको म्हणत. दोन माणसांना काय कराय्चं ते करू देत नसत. जगायला नालायक होते हे लोक.
तर मग कसं व्हायाचं? आजचे सगळे पुरोगामी २१०९ च्या नियमानुसार प्रतिगामी ठरतील. तेव्हा १९६० साली पुलंनी जे लिहिलं त्याला आजच्या नियमांप्रमाणे जोखून ती पुलंची मर्यादा मानता येईल का?
पुल काळाच्या पुढे अज्याबात नव्हते हे एकदम मान्य.
प्रश्न...
...त्यांच्या दृष्टिकोनाचा तितकासा नाही. (आधी म्हटल्याप्रमाणे, ही वॉज़ अ प्रॉडक्ट ऑफ हिज़ टाइम्स - अँड सो वेअर वी - आणि तत्कालीन सामाजिक माइंडसेटप्रमाणे ही मते सामान्य होती. त्यामुळे त्यांबद्दल आश्चर्य नाही.) प्रश्न ताशेरे ओढण्याच्या - खास करून विनोदनिर्मितीकरिता ताशेरे ओढण्याच्या - घाईबद्दल आहे.
दुसरे म्हणजे, तसे मग कशाचेही समर्थन करता येईल. करायचेय काय स्त्रियांना शिक्षण, चूल आणि मूल यापलीकडे काही बघायची त्यांना गरजच काय? अस्पृश्यांना हक्क काय म्हणून, लायकी आहे काय त्यांची? कार्यांना समान हक्क काय म्हणून? त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले, तेवढे पुरे झाले नाही काय? हिंदुस्थानास स्वातंत्र्य? अरे काय लायकी आहे काय इंडियनांची राज्य करण्याची? देशाचा बट्ट्याबोळ करतील! ही आणि अशी मतेही कधीकाळी सामान्य होती, ती व्यक्त करणारे - आणि तशा मागण्या करणाऱ्यांची खिल्ली उडविणारे, त्यांच्यावर विनोद करणारे - हेही प्रॉडक्ट्स ऑफ देअर ओन टाइम्सच होते. बरे मग?
तर मग कसं व्हायाचं? आजचे सगळे पुरोगामी २१०९ च्या नियमानुसार प्रतिगामी ठरतील.
ठरू देत की. उद्या कोणीतरी मला चूक ठरवेल, म्हणून मला आज जे चूक दिसत आहे, त्याला मी (भले काल तेच मलासुद्धा चूक दिसले नसले तरीही) आज चूक म्हणू नये काय?
आणि, समजा आज मी काही चूक करत असेन, पण ते चूक आहे हे आज मला कळत नसेल, तर उद्या कोणाला ते चूक आहे असे दिसले, तर त्याला मी चूक होतो असेसुद्धा म्हणता येऊ नये काय?
ताशेरे ओढण्याची घाई - हे नीट
ताशेरे ओढण्याची घाई - हे नीट वाचून बघायला लागेल. तूर्तास अपूर्वाई/पूर्वरंग/ जावे त्यांच्या देशा हाती नाही.
पण पुलंनी एकंदरीतच अमेरिकेवर लिहिलेला लेख "फार एकतर्फी आणि महाराष्ट्राच्या अमेरिकासंस्क्रुतीविरोधाला खतपाणी घालणारा" असल्याची टीका अनेक एनारायांनी केली होती हे वाचलं आहे (संदर्भ शोधतो).
----
१९६० साली जे सर्वसामान्यांसाठी बरोबर समजलं जात होतं ते सामाजिक मत आजच्या बदलत्या कसोट्यांवर परखून पहाणं चूक आहे.
उदा. मार्क ट्वेनाने निग्रो हा शब्द सरसकट लिहिलाय पुस्तकांत (आणि मराठीत तो आजही रूढ आहे) - तेव्हा ट्वेन चुकला, असं म्हणता येईल का?
असो, प्वाईंट टेकन.
ज्या काही गोष्टि तुम्हाला खटकल्याहेत
ज्या काही गोष्टि तुम्हाला खटकल्याहेत त्या 'पुस्तक खपवण्यासाठी' लिहिल्या आहेत का काय असं तुम्ही म्हणताय. रिअली? "अमुक/तमुक लिहिलं की पुस्तक खपेल" असा विचार करून पुलं लिहायचे असं खरंच तुम्हाला वाटतं??
ते पुस्तक शोधतो आता कारण समलिंगी संबंधाबद्दल "...आचरटपणा सुरू केलेला आहे" अशा अर्थाचं वगैरे "प्रचंड होमोफोबिक" लिखाण असल्याचं आठवत नाहीये. विशेषतः ते त्यानी काय ऐकलं ते नसून त्यांचं स्वत:च मत आहे असं. (प्रत्यक्षात ते असतीलही होमोफोबिक, माझा संदर्भ त्या पुस्तकापुरताच आहे) आणि त्यावरचे विनोदपण होमोफोबियात धरायचे? गे लोकांबद्दल विनोद केला म्हणून मी होमोफोबिक ठरत असेन तर कठीण आहे. म्हणजे "कोकणस्थाना पाच दिवसाचा गणपती माहितच नसतो आणि देशस्थांचाही दिड दिवसच असतो खरा पण सगळं उरकेपर्यंत पाच दिवसांचा होतो!" हे मी व्हॉट्सअॅपवर पाठवलं की मी कोकणस्थफोबिक आणि देशस्थफोबिक? आणि पाणी नाही म्हणजे थेट दारूच? सोडा नाही? रेष्टारंटात किती अमेरिकन्स (दारू / वाईन/ बिअर न मागवणारे) पाणी मागवतात? "...अमेरिकन मनुष्य सदानकदा दारू पीत/पिऊन असतो..." हेही माझ्या वाचनातनं सुटलं का काय बघतो. पण पुलंचं प्रवासवर्णन मुक्तपिठातल्या लेखनाच्या तोडीचं लेखन - म्हणजे मुक्तपिठ आता "महाराष्ट्राचं लाडकं लेखन" म्हणावं का? !!!!
ता.क. - नबा, हे असं भडास काढल्यासारखं, तळटीपवर्जित लेखन नक्की तुमचंच ना? ;-)
चिकित्सेचं वावडं?
देशस्थ आणि कोकणस्थांपैकी कोणीत्याही पोटजातीचं असणं बेकायदेशीर वगैरे नाही. 'जावे त्याच्या देशा' लिहिलं तेव्हा अमेरिकेत आणि अगदी गेल्या वर्षापर्यंत भारतात समलैंगिकांना समान अधिकार नव्हते. भारतात आजही समलैंगिक लग्नं कायदेशीर समजली जात नसतील; गेल्या वर्षापर्यंत समलैंगिक असणं गुन्हा होता. मजेमजेत चाललेले कोकणस्थ-देशस्थ वाद आणि अस्तित्वच कायदेशीररीत्या गुन्हा ठरवणं यांच्यात फरक आहे. (तो फरक समजून न घेणं, सदर संदर्भात, चिकित्सेचं वावडं असण्याचं लक्षण वाटतं.)
तुम्हाला जी भडास काढल्यासारखी वाटते, ती उलट 'न'वी बाजूंनी स्वतःची केलेली चिकित्सा वाटते; एकेकाळी, 'तरुण वयात मला हे असं काही विनोदी वाटलं होतं; हे सहानुभूतीशून्य विनोद आहेत.'
मी लिहिलंय की
मी लिहिलंय की "...विशेषतः ते त्यानी काय ऐकलं ते नसून त्यांचं स्वत:च मत आहे असं. (प्रत्यक्षात ते असतीलही होमोफोबिक, माझा संदर्भ त्या पुस्तकापुरताच आहे)...". त्यांचं मत असणं आणि त्यानी लोकांचं वक्तव्य ऐकलेलं लिहिणं यात फरक आहे. आणि ते अगदी होमोफोबिक असले तरी समलैंगिक असणं गुन्हा आहे त्याना वाटत असेल याची शक्यता कमी वाटते. अर्थात आता माझ्या वाटण्याला काही अर्थ नाही कल्पना आहे मला पण आपलं माझं मत. आणि "मुलगा सून आणतो का जावई" आणि "हा माझ्या मुलाचा नवरा" हे विनोद केल्यामुळे (हे मला सहानुभूतीशून्य वाटत नाहीत) समलैगिकत्व गुन्हा आहे असं त्याना वाटत असणार हे जरा टोकाचं होईल नाही का? त्यामुळे मला चिकित्सेचं वावडं असावं असं मला वाटत नाही. (माझ्या बायकोला तर अजिब्बात वाटत नाही!!) पण ईथेही तेच - हे माझं मत झालं. तुम्ही तिऱ्हाईताच्या दृष्टिकोनातून बघताय त्यामुळे तुम्हाला उलटं वाटत असेल.
मे बी. पण मला ते नुसतंच आत्मताडन - "हे असलं लिखाण मला आवडलं होतं?" - नाही वाटलं. "हे असलं लिखाण मला आवडलं होतं? पुस्तक खपवण्यासाठी हे असलं लिहिलं होतंत का? मग यापेक्षा मुक्तपीठ काय वाईट?" असं वाटलं.
आत्मताडन, इ.
वाटल्यास आत्मताडन + पु.ल.-बॅशिंग म्हणा. आपले काहीच म्हणणे नाही.
"हे असलं लिखाण मला आवडलं होतं? पुस्तक खपवण्यासाठी हे असलं लिहिलं होतंत का? मग यापेक्षा मुक्तपीठ काय वाईट?" असं वाटलं.
लेट मी पुट इट इन अदर वर्ड्ज़.
"हे असलं लिखाण मला आवडलं होतं?१, २ बरं, मला आवडलं ते सोडा. मी एवीतेवी तेव्हा होतो तितपतच समज असलेला टिपिकल ममव३. पण पु.ल., तुम्हीसुद्धा? अॅट लीस्ट यू शुड हॅव नोन बेटर! आणि इफ यू डिड इंडीड नो बेटर, तर मग जाणत असूनसुद्धा हे असलं४ नेमकं का लिहिलंत? माझ्यासारख्यांनी तुमचं पुस्तक विकत घ्यावं म्हणून?५ ऑन द अदर हँड, इफ यू डिड नॉट नो एनी बेटर, तर मग माझ्या नजरेत तुम्ही अजूनही त्या पेडेस्टलवर का उभे आहात? तुमच्या आणि माझ्या६ लेव्हलमध्ये मग काय फरक राहिला? (किंवा, फॉर दॅट मॅटर, माहीत नसता उगाच काहीबाही खरडणाऱ्या त्या मुक्तपीठलेखकांच्या अमेरिकावर्णनांमध्ये मग नक्की काय वाईट आहे?) चला, उतरा खाली त्या पेडेस्टलवरून!" असे ते वाचून पाहावे.
(हं, आता, मुळात पु.लं.ना पेडेस्टलवर चढविण्याची घाई करण्याचा दोष हा सर्वस्वी माझा असू शकतो, पु.लं.चा नव्हे, हे सपशेल मान्य.)
.........
१ हे आत्मताडन. उर्वरित सर्व पु.ल.-बॅशिंग मानायला माझी हरकत नाही.
२ 'हा माझ्या मुलाचा नवरा' किंवा 'मुलगा सून आणतो, की जावई, ही चिंता' हे - विनोद असलेच तर - तसेही आत्यंतिक भिकार विनोद आहेत. (इन हाइण्डसाइट, ऑफ कोर्स. बोले तो, एकेकाळी मी स्वतः जरी यांवर खदाखदा हसलो असलो, तरीही.)
३ cf. 'कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार?' (हेसुद्धा पु.लं.च, बरे का?)
४ समजा, कायद्याने समलैंगिकता हा गुन्हा आहे, हे पु.लं.ना माहीत नाही, असे गृहीत धरू. (तो मुद्दा तसाही गौण आहे.) तरीसुद्धा, 'हा माझ्या मुलाचा नवरा' किंवा 'मुलगा सून आणतो की जावई, ही चिंता' ही सरळसरळ समलैंगिकांच्या विवाहाच्या मागणीची खिल्ली आहे? आता, तत्कालीन गैरसमजुतींप्रमाणे समलैंगिकता ही विकृती किंवा व्यंग आहे, असे जरी क्षणभर मानले (जे तत्कालीन सर्वांप्रमाणे पु.लं.नाही बहुधा वाटत असावे, असे मानायला जागा आहे. कारण, खिल्ली ही जे अॅबनॉर्मल समजले जाते, त्याचीच होते.), तरीसुद्धा, एखाद्याच्या व्यंगाची खिल्ली उडविणे हे (तेव्हाच्या स्टँडर्ड्ज़नीसुद्धा) कोठल्या सभ्यतेला धरून होते? आणि मग तो कोणत्या पातळीचा विनोद होतो? सबब, पु.ल. या एक्सक्यूजखालीसुद्धा सुटू शकत नाहीत.
५ 'मग चेतन भगत आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला?' हा प्रश्न येथे विचारण्याचा मोह हा केवळ 'परहॅप्स पु.लं. डिड नॉट नो एनी बेटर' ही शक्यता लक्षात घेऊन, तसा बेनेफिट ऑफ डाउट पु.लं.ना देऊन आवरता घेतला आहे. कितीही तसा दिसला, तरीही आपण काहीही लिहितो हे न समजण्याइतका चेतन भगत मूर्ख असावा, असे वाटत नाही. फक्त, खपते म्हणून तो काय वाटेल ते लिहितो, इतकेच.
६ किंवा माझ्याप्रमाणेच समज नसलेल्या ममवंच्या लसाविच्या.
अमक्या काळाच्या अवेअरनेसच्या
अमक्या काळाच्या अवेअरनेसच्या कसोट्यांनी तमक्या काळात केलेल्या लेखनाचं मूल्यमापन करणं चुकीचं आहे.
तुम्ही बालविवाहाला विरोध करता? तुम्ही पेडोफोबिक आहात - इ.स. १८१८
पेंडशांकडे ऑर्ज्या चालतात म्हणून तुम्ही त्यांना सत्यनारायणाला बोलवलं नाहीत? तुम्ही ऑर्ज्योफोबिक आहात - इ.स. २१२०
असहमत
हे विचार त्यांच्या ललित लेखनातूनदेखील भरपुर दिसततात. बटाट्याच्या चाळीच्या शिष्टमंडळाच्या गोष्टीत सेंसर प्रकाराची टर, "असामी असामी"मधली गुरुदेवांची आणि त्यांच्या भक्तांची टर, "तुझे आहे..." मधली पोफळे गुरुजींची टर, "उरलं सुरलं" मधला "समजा तुमच्या मुस्काटात.." वाला लेख या गोष्टी त्यांच्या अतिशय प्रसिद्ध ललित लेखनातल्या आहेत.
हेच ते!
उगीच कुठल्यातरी तत्त्वज्ञानाचं एरंडेल पिऊन ...
मला जो समजतो तेवढाच आनंद, अशी जी त्यात भावना आहे, ती किमानपक्षी अत्यंत कंटाळवाणी आहे. एखाद्या गोष्टीत रस घेऊन तिची चिकित्सा करणं, अभ्यासू लोकांशी मुद्देसूद वाद घालणं ही अतिशय आनंददायक गोष्ट असते. ज्यांना ते समजत नाही, त्यांच्यावर त्याची जबरदस्ती नाही. मात्र इतरांना त्यातून आनंद मिळतच नाही, वगैरे अगोचरपणा कशाबद्दल?
आहे मनोहर तरी गमतें उदास
मी सुनिताबाई देशपांडे यांचे "आहे मनोहर तरी" वाचले तेव्हा मी अतिशय पुल-भारावलेला होतो.
मला त्यांनी केलेली प्रशंसाही नीट समजली नाही - म्हणून खोटी वाटली, मग त्यांनी केलेल्या टीकेचे काय घ्या! ती अमान्यच होती.
परंतु "आहे मनोहर तरी" टीकेचे अधिष्ठानच पुलंचे potential आहे, त्यामुळे प्रशंसा खरी असल्याशिवाय काही अर्थच नाही.
मनोहर असल्यामुळेच तर, पूर्णत्वाची शक्यता असल्यामुळेच तर ते पूर्णत्व नसल्यामुळे भकास वाटते.
(आहे मनोहर तरी गमतें उदास ही सरस्वतीकंठाभरण यांची कविता आहे, हे मला पुस्तक वाचून झाल्यावर कित्येक वर्षांनी कळले. कवितेतल्या प्रत्येक कडव्यात अत्यंत सुंदर पण काहीतरी कमी राहिल्यामुळे वाईट वाटण्यासारख्या वेगवेगळ्या वस्तूंचे वर्णन केले आहे. प्रत्येक कडव्याच्या शेवटची ओळ "आहे मनोहर तरी गमतें उदास" अशी आहे." हा संदर्भ कळल्यावर मला ते पुस्तक आणखी समजले.)
पुलं कडे खालून बघा .
इतका सगळं कुटाणा पुलं कसे उच्च होते किंवा नव्हते याबद्दल चालू आहे .
त्यांच्याकडे वरून बघणे चालू असावे .
मी काय म्हणतो , जरा खालून बघा राव ...
तर पुलं माझ्या वडिलांच्या पिढीचे. त्यांचं बरंच लेखन हे त्या पिढीला माफक हसवणारं. अनेक राजकीय सामाजिक गोष्टींविषयी त्यांचं त्या काळचं आकलनही त्या कालानुरूप मर्यादित . ( कुणाचं नसतं ? जवळजवळ सगळ्यांचंच तसंच असतं )
पुलं सुपरस्टार. म्हाग्रु स्वप्नातही कल्पना करू शकणार नाहीत असे सुपरस्टार. ममव मंडळींचे . महाराष्ट्राचे सगळ्यात लाडके व्यक्तिमत्व वगैरे.
( स्वतःच स्वतःला दुसरे लाडके व्यक्तिमत्व मानणाऱ्या वपुना यांची कॉपी करावीशी वाटली इतके पहिले लाडके व्यक्तिमत्व )
समीक्षक मंडळी थांबा . मी पुलंच्या साहित्य , संगीत (याबद्दल स्वतः सुनीताबाईंनीही स्पष्ट मत व्यक्त केले आहे ) , परफॉर्मर या कशाही बद्दल दर्जात्मक काहीही लिहिलेलं नाहीये.
लिहिणारही नाहीये .
१. गेल्यानंतर पुलं नी दोन मोट्ठे धक्के दिले . त्यांनी म्हणे त्या काळी काय दहा का कायतरी कोटी डोनेट केले होते. ( लोकहो , सचिन तेंडुलकरच्या आधीच्या कलाकारांबद्दल चाललंय, त्यामुळे दहा कोटी कमी समजू नका ) यात दोन धक्के होते . एक म्हणजे मराठी कलाकार धा वगैरे कोटी कमवू शकतो आणि ते देऊन टाकू शकतो .
२. काही मित्रांनी कट्टा नावाचे अनियत्कालिक काढले होते . त्यात पुलंबद्दल टवाळी असावी . म्हणे पुलंनी ते अंक मागून घेतले आणि पुढच्या येणाऱ्या अंकांची मागणी करून ठेवली अशी अफवा.
३. जनता पक्षाचा ( रादर काँग्रेस विरोधाचा ) ७७ साल जोरात प्रचार करूनही जंता पक्षाच्या विजयसभेला ( भले सुनीताबाईंमुळे ) जाण्याचे नाकारले .
४. सोत्ता सुपर ष्टार असूनही इतर लोकांबद्दल कधीकधी ते चांगलंही लिहीत .
४. शाम काहीही म्हणो , पण तीन पैशांचा तमाशा नावाचा त्यांच्या पिढीला न झेपणारा दंगा त्यांनी स्वतःच्या नावानी चालू दिला .
अशा अनेक गोष्टी . आणि बऱ्याच अजूनही .
माणूस एकंदरीत नॉर्मल असावा. म्हागृनपेक्षा सहापट लोकप्रिय असूनही नॉर्मल असावा . आवडायला एवढं पुरे आहे.
आणि एवढंच पुरे आहे .
अर्थातच.
आपल्याला पुलं - म्हणजे पुलंचं लेखन आणि त्यांची साहित्यिक जाण - फार/अजिबात का आवडत नाहीत, याची चिकित्सा केलेली फार लोकांना आवडलेली दिसत नाही. वर पुन्हा पुलंना चिकित्सेचं वावडं असल्याचं दोन्ही बाजू म्हणत आहेत. मग पुलं आवडण्याची चिकित्सा केलेली बघून गंमत वाटली.
आकडा
दहा कोटी - हा आकडा मी पंचात्तर लाख असा ऐकला आहे.
ज्या काळात ती रक्कम दिली गेली, त्या काळात पंचाहत्तर लाख (= पाऊण कोटी) हादेखील खूप मोठा आकडा असावा. त्यात पुन्हा मराठी लेखकाकडून म्हणजे... विशेष.
(अनलेस, नंदनच्या कोट्यांसारख्या एखाद्या कोटीचा तीनचतुर्थांशच भाग पूर्ण करून तो बहाल केला असेल तर. पण मग इन दॅट केस, पु.लं.सारख्याकडून असल्या फक्त पाऊणच कोटीचे लोकांना विशेष वाटले नसते. (किंवा फॉर्दॅट्मॅटर दहा कोट्यांचेसुद्धा.) ज्याअर्थी लोकांना विशेष वाटले, त्याअर्थी ते गेला बाजार पंचाहत्तर लाख रुपयेच असले पाहिजेत.)
अर्थात आकडयाने काहीही शाबीत होत नाही. इतके पैसे कमवून दान करणं हे कुणा म.म.व लेखकांच्या बापजन्मी स्वप्नातही आलं नसावं.
नेमके.
बापट तुम्ही क्रिकेट खेळताना
बापट तुम्ही क्रिकेट खेळताना विकेट कीपर होत का? प्रतिस्पर्धी खेळाडुच्या विकेट्स संभाळणे वगैरे?
---
अमच्या लहानपणी टराटरा हसायला मिळेल असे विनोदी लेखन आवडायचं. वपु समजायला वेळ लागला (माझ्या पुढच्याच ब्याचला अमच्याच शाळेत होते तरी.)
म्हैस अजुनही आवडते.
( व्यं माडगुळकरांची ' काळ्या तोंडाची ' कथा म्हशीच्या अगोदरची का?)
काआआअय?
अवांतर - वपु तुमचे ज्यूनिअर होते? अर्र्र. शाळेत असताना जेव्हा त्यांनी " जीवन हे एखाद्या खडूसारखं असतं, कधी सफेद तर कधी निळं. त्याला फळ्याची ओढ असते ती लिहिण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी नव्हे" अशा अर्थाचं काही लिहिलं तेव्हाच् त्यांच्या कुल्ल्यावर सणसणीत चापटी हाणून "चूप!" असं म्हणायचा अधिकार तुम्हाला होता आचरटबाबा.
हाय! तुम्ही तेव्हाच थोडं रॅग केलं असतं तर आज वपुंच्या नावावर सोशल मिडिआवर खपणाऱ्या उक्ती तरी वाचाव्या लागल्या नसत्या.
पण असो. चान्स गेला तो गेलाच.
-----------
वपु समजायला वेळ लागला म्हणजे - वाचून काय लिहितात ते समजायला वेळ लागला की वाचण्यासारखं लिहित नाहीत हे समजायला वेळ लागला?
वपु शाळेबिळेत असताना गाजलेले
वपु शाळेबिळेत असताना गाजलेले किंवा चमकुवगैरे नसावेत. तर रॅगिंग. खडुफळ्याचं वाक्य कधी मुद्दामहून अल्लड वयात लिहिलं असावं. थोडं अवांतर परंतू - लेखक म्हणून प्रसिद्ध झाल्यावर एक लेख लिहिला होता शाळेवर. - त्यात शेवटी " पत्ता सांगताना लोक डिएसहाइस्कूलजवळ असं आता सांगत नाहीत. शाळेचा पत्ता गुरुकृपा ( समोसाफेमस) हॅाटेलजवळ."
तर मुद्दा असा की मोठ्या लेखकांकडून कधीकधी फारच छान लेखन होत असतं. तसं पुलंचं आणि वपुंचं झालं. वपुच्या लेखनाची चौकट, त्यांच्या पात्रांचे प्रश्न फार वेगळेच होते. पुलंची पात्रं वेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरांतली॥
लक्ष्मण देशपांडे यांचे प्रयोग त्यांच्या वर्हाडी चौकटीमुळे वेगळे पडले असावेत इथल्या कोकणी वातावरणात.
(अवांतर शंका)
लक्ष्मण देशपांडे यांचे प्रयोग त्यांच्या वर्हाडी चौकटीमुळे वेगळे पडले असावेत इथल्या कोकणी वातावरणात.
लक्ष्मण देशपांडे (अॅज़ इन, 'वऱ्हाड निघालंय लंडनला'वाले. पु.लं.चे तीर्थरूप नव्हेत.) हे वऱ्हाडी की मराठवाडी? (हं, आता, लंडनला निघालेल्या 'वऱ्हाडा'मुळे त्यांची चौकट 'वऱ्हाडी' म्हणता येईलही कदाचित, परंतु तरीही.)
आणि, 'इथल्या' कोकणी वातावरणात म्हणजे नेमक्या कुठल्या? त्या मालवणी प्रकाराला तुमच्या मुंबईकडे नको तितके डोक्यावर चढवून ठेवले आहे खरे, परंतु अन्यथा (खुद्द मालवण सोडल्यास) मालवणीला नि त्या मालवणी नाटकांना नक्की कोण विचारतो? जिल्हे सिंधुदुर्ग, दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई म्हणजे उभा महाराष्ट्र कधीपासून झाला? की मराठी नाट्यसृष्टीला महाराष्ट्रात मुंबईबाहेर कुत्रे विचारत नाही, असा काही दावा आहे?
अहो, पुण्यातसुद्धा (यानी कि मराठी नाट्यसृष्टीला जिथे अमाप भाव आहे, अशा त्या महाराष्ट्रातल्या मुंबईबाहेरच्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या ठिकाणी) 'कोकणस्थी'-डॉमिनंट वातावरण असेलही कदाचित, परंतु 'कोकणी' वातावरण नाही. किंबहुना, कोकणीला किंवा कोकणाला तिथे कुत्रे विचारत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उर्वरित महाराष्ट्राचे तर विचारूच नका. पण मुंबईकरांना मुंबईबाहेरच्या महाराष्ट्राशी काही घेणेदेणे नसते; किंबहुना मुंबईबाहेर काही महाराष्ट्र आहे, हेही कित्येक मुंबईकरांच्या खिजगणतीत नसते. म्हणूनच सर्वप्रथम महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून हटवली पाहिजे (मग ती कुठल्या वाटेल त्या गा.च्या गां.त घाला; पण मुंबईत नको!), नंतर मग मुंबई महाराष्ट्रापासून अलग केली पाहिजे, आणि ती पाकिस्तानला देऊन टाकली पाहिजे (तमाम ठाकऱ्यांसकट!). जय हिंद, जय महाराष्ट्र!
(असो, हे खूप म्हणजे खूपच अवांतर झाले. चालायचेच!)
मी इतरांना विचारलं तसं
मी इतरांना विचारलं तसं तुम्हालाही विचारतो, इथे पुलंबद्दल वाईट लिहिलेलं कुठे दिसलं? 'लता मंगेशकरांचा 60 किंवा 70च्या दशकानंतरचा आवाज ऐकवत नाही' असं त्यांच्याविषयी स्पष्ट शब्दात म्हटलं गेलेलं होतं. इथे तसं काहीही नाही. त्यांना नवतेचं आकर्षण होतं की नव्हतं, एवढाच मुद्दा आहे. यात नवता चांगली, त्यामुळे पुलं कमी पडले असंही म्हटलेलं नाही. Why can't some statement just stay as simple charcterization? Why is it perceived as a value judgement?
..
मी इतरांना विचारलं तसं तुम्हालाही विचारतो, इथे पुलंबद्दल वाईट लिहिलेलं कुठे दिसलं? 'लता मंगेशकरांचा 60 किंवा 70च्या दशकानंतरचा आवाज ऐकवत नाही' असं त्यांच्याविषयी स्पष्ट शब्दात म्हटलं गेलेलं होतं. इथे तसं काहीही नाही.
अद्याप तरी नाही, हे मान्य करावे लागेल.
.
लता मंगेशकर यांच्यामुळे
लता मंगेशकर यांच्यामुळे "चित्रपटातील नायिकेच्या आर्त गीतांचा आवाज" (आणि आशा भोसले यांच्यामुळे "चित्रपटातील व्हॅम्पचा आवाज") याचा एक साचा बनला असं काहीतरी त्या लेखात/प्रतिसादांत म्हटलं गेलं.
पु ल देशपांड्यांनी अमुक तमुक प्रकारे/प्रकारचं लेखन केलं नाही त्यामुळे म म व च्या जानीवा संकुचित राहिल्या असं काहीतरी इथल्या प्रतिसादांत दिसलं.
मी फक्त सिमिलॅरिटी हायलाइट केली.
तेच ते.
मला पुलंच्या ह्या (खुर्च्या- एक न नाट्य) आणि अजून एक आहे (थ्री इन वन : एका नाट्यानुभवाचा नाट्यानुभव) ह्याविषयी थोडी शंका आहे.
खुर्च्या.. मधे मुद्दामच अतिशय बाळबोध असं भाषांतर आहे (चिराबाजारात बर्फ वगैरे).. मूळ नाटकाची बरीच खेचली आहे.
थ्री-इन-वन मधे रंगमंचावर कुणीतरी दारू ढोसून बलात्कार करतो असं काहीतरी आहे त्याची रेवडी उडवण्याचा प्रत्यत्न केलाय. (हे तेंडुलकरांच्या बाईंडर किंवा पुरूष वर आहे का?)
--
प्र्श्न असा की ही नाटकं महत्त्वाची आहेत हे माहिती असूनही पुलंनी "उपहासात्मक" म्हणून हे दोन्ही लेख लिहिले आहेत
की
ही नाटकं "कायच्या काय/ वाईट दर्जाची" असल्याने त्या नाटकांची खेचली आहे?
एकूण पुलंचं लिखाण बघता त्यांना चिकित्सेची ॲलर्जी होती हे जाणवतं. जे काही आहे (कला/साहित्य/नाटक) ते मन:पूर्वक अनुभवावं आणि मजा घ्यावी. पण त्याची चिकित्सा नको.
तद्वतच असले नवे प्रयोग नकोत, आणि नाटकाचं पावित्र्य अबाधित रहावं ,रंगमंचावर दारू,बलात्कार, इ.इ दाखवू नयेत अशी पुलंची भूमिका असावी काय?
जाणकार ह्यावर काही प्रकाश टाकतील काय?