१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास

१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास

काळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक तिसरा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रस्तावना

प्रवासवर्णनं आणि आर्थिक इतिहास

'अपूर्वाई'च्या प्रस्तावनेत पुल म्हणतात, की त्यांचं पुस्तक हे टूरिस्ट विभागाचं गाईड नसून प्रवासवर्णन आहे. या दोहोंमध्ये त्यांनी स्पष्ट न केलेला, परंतु मूलभूत फरक आहे. टूरिस्ट विभागाच्या गाईडमध्ये 'निवेदक' महत्त्वाचा नसतो. गण्या, गंप्या, संप्या, शीतल, किंवा राजू अशा कोणीही हे गाईड लिहिलं, तर कदाचित ते तसंच्या तसं उतरेल. पण प्रवासवर्णनात मात्र निवेदक महत्वाचा आहे. गण्या सांगतोय की शीतल, यावर त्या लेखनाचा पोत अवलंबून असतो. गण्या आणि शीतलची जगाकडे पाहायची दृष्टी प्रवासवर्णनात नकळत उतरते. पण प्रवासवर्णन हे गण्या आणि शीतलचं आत्मचरित्र नव्हे. पुल म्हणतात त्याप्रमाणे हे 'प्रवासातल्या मी'चं चित्रीकरण आहे. प्रवासापूर्वी आणि प्रवासानंतर त्या गण्या आणि शीतलने काय केलं, किंवा केलं नाही याचे तपशील द्यायची ती जागा नव्हे.

'जग चालतं कसं' याचं कुतूहल सगळ्यांनाच असतं, आणि प्रत्येक जण ते आपापल्या हिशेबाने शमवतही असतो. गंप्याचं समाधान न्यूटनचे नियम कळल्यावर होईल, संप्याला 'कर्माचा सिद्धांत' पुरेसा वाटेल. प्रवासवर्णन 'सांगणाऱ्या'सोबत त्याचे हे जगाकडे पाहायचे दृष्टिकोण आपोआप, चोरपावलांनी येतात.

'आर्थिक इतिहास' म्हणजे भूतकाळातल्या अर्थव्यवस्थांचा किंवा आर्थिक घडामोडींचा अभ्यास. तो विविध प्रकारे करता येतो. आर्थिक इतिहास या विषयाचे लागेबांधे सामाजिक इतिहासापासून ते इकॉनॉमेट्रिक्ससारख्या गणिती विषयापर्यंत पोचतात. आर्थिक इतिहास समजून घेण्यासाठी ऐतिहासिक कथनं (historical narratives) हा महत्त्वाचा कच्चा माल आहे. अर्थातच, 'प्रवासवर्णन' या साहित्यप्रकाराला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्रवासवर्णनांतून आर्थिक इतिहास समजून घ्यायला मदत कशी होते? विष्णुभट गोडसे वरसईकरांच्या 'माझा प्रवास'च्या अनुषंगाने आपण ते बघणार आहोत.

'माझा प्रवास' - मराठीतील आद्य प्रवासवर्णन

इ० स० १८५७च्या आसपासची गोष्ट. तिशीतले विष्णुभटजी गोडसे (आणि त्यांचे दोघे धाकटे भाऊ) पेणजवळच्या 'वरसई' या खेड्यात राहत होते. घरची शेती होती, गावातलं उपाध्येपण त्यांच्याकडे होतं. पण लग्नसमारंभ वगैरे कारणांनी कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढला, आणि तो उत्तरोत्तर वाढतच चालला. उत्पन्नाच्या उपलब्ध स्रोतांतून कर्जं कमी व्हायची चिन्हं दिसेनात. त्यातच एके वर्षी भाताचे भाव पडले, आणि शेतीतल्या उत्पन्नावरही गदा आली. विष्णुभटजींच्या शब्दांत 'मागील दारी पुढील दारी तर दरिद्र फुगड्या घालीत होते'. काय करावे, या विवंचनेत असतानाच उत्तरेत बायजाबाई शिंदे सर्वतोमुख नामक यज्ञ करणार आणि त्यात ब्राह्मणांना पुष्कळ दानधर्म होणार अशी बातमी गोडसे भटजींना कळली, आणि पैसे कमावण्याच्या ध्येयाने ते उत्तरेच्या प्रवासाला निघाले.

त्या प्रवासात कायकाय होतं ते पुढे पाहूच, पण गोडसे भटजींचा अर्थार्जनाचा हेतू काही सफल झाला नाही. ते वरसईला परतले, आणि उर्वरित आयुष्य भिक्षुकी केली. त्यांच्या यजमानांपैकी एक कल्याणचे 'भारताचार्य चिं० वि० वैद्य'. वैद्यांच्या घरी पूजेबिजेनिमित्त गेल्यावर आपल्या प्रवासाच्या रसभरित आठवणी गोडसे भटजी सांगत असत. त्या ऐकून वैद्यांनी 'या आठवणी लिहून द्या' अशी गोडसे भटजींना गळ घातली. बदल्यात शंभर रुपये द्यायचं कबूल केलं. त्या शंभर रुपयांची हकिकत येते आहे पुढे! त्यानुसार १८८३ साली गोडसे भटजींनी या आठवणी लिहून काढल्या. त्या प्रकाशित व्हायला १९०७ उजाडलं, पण ती वेगळीच रंजक हकिकत आहे.

'प्रवासवर्णन हे आत्मचरित्र नव्हे, तर लेखकाच्या आयुष्याचा प्रवासापुरता क्रॉस सेक्शन आहे' हा वर उल्लेख केलेला विचार पाश्चात्त्य प्रवासवर्णनांच्या ढाच्यावर बेतलेला आहे. गोडसे भटजीपूर्व मराठी साहित्यात 'प्रवासाची वर्णनं' होती (उदा० नाना फडणविसाचं आत्मचरित्र), पण 'प्रवासवर्णन' नव्हतं. या आधुनिक अर्थी गोडसे भटजींचं लेखन हे मराठीतलं आद्य प्रवासवर्णन म्हणता येईल.

'माझा प्रवास'वरील समीक्षा-परीक्षण

माझा प्रवास गोडसे भटजी

'माझा प्रवास'ची मराठीत विपुल समीक्षा झाली आहे. 'राजहंस प्रकाशन'च्या मृणालिनी शहा संपादित आवृत्तीत त्यांनी सोळा परीक्षणांचा उल्लेख केला आहे. त्यांची प्रस्तावनाही तपशीलवार आणि विविध विषयांना स्पर्श करणारी आहे. त्यांनीच लिहिल्याप्रमाणे तिसऱ्या आवृत्तीला प्रा० न० र० फाटक यांनी लिहिलेली प्रस्तावनाही 'माझा प्रवास'चा चिकित्सक वेध घेणारी आहे.

या लेखासाठी अभ्यास करताना वाचायला मिळालेल्यापैकी दोन समीक्षांचा उल्लेख करणं प्राप्त आहे. पहिला लेख प्राची देशपांडे यांनी 'इतिहासलेखनाचा इतिहास' (historiography) या अनुषंगाने लिहिलेला आहे. त्यात त्या गोडसे भटजींचं मूळ लेखन आणि त्यात चिं० वि० वैद्यांनी केलेले बदल टिपतात. वैद्यांना हे बदल का करावेसे वाटले असतील, आणि तसं करणं हे वैद्यांच्या समकालीन आणि समविचारी इतिहासकारांच्या मांडणीशी कसे सुसंगत आहेत, हे त्या दाखवून देतात. 'इतिहास सांगण्याची कला' कशी (आणि मुख्य म्हणजे का) घडत जाते हे समजून घेण्यासाठी प्राची देशपांडेंचा हा लेख अत्यंत उपयुक्त आहे.

दुसरा वाचनीय लेख आहे शैलेन भांडारे यांचा. यात ते गोडसे भटजींच्या लेखनाला '१८५७च्या बंडाचा इतिहास' म्हणून न बघता प्रवासवर्णन म्हणून बघणं आवश्यक आहे हे सांगतात. तसंच 'संपर्कजाल', 'परिसंचार', 'अजायब' किंवा विस्मय, अशा विश्लेषक संकल्पना (analytical tools) वापरून या लेखनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात.

तरी, गोडसे भटजींच्या लेखनाकडे 'आर्थिक इतिहास' या चश्म्यातून बघण्याचे प्रयत्न मात्र झालेले दिसत नाहीत. ते होणं आवश्यक आहे, अन्य कोणी नाही, तरी गोडसे भटजींबाबत हे होणं गरजेचंच आहे. त्याची कारणं पाहू.

गोडसे भटजीच का?

'अर्थसाक्षर' (financially literate) असणे याची एकच, सर्वमान्य व्याख्या करणं अवघड आहे. तसा प्रयत्नही मी करणार नाही. पण अर्थसाक्षर असणं हे सहसा काही उद्दिष्टापोटी असतं. (उगाचच कोणी पैशाचा विचार का करत बसेल?) ती उद्दिष्टं ठरवली तर अर्थसाक्षर असणं म्हणजे काय याच्या सीमारेषा दिसायला लागतील.

आपण आपल्या सज्ञान वयातल्या आयुष्यात वेगवेगळे आर्थिक निर्णय घेत असतो. कोणतं शिक्षण घ्यायचं, अमुक व्यवसाय/नोकरी तमुकपेक्षा चांगली की वाईट, क्ष इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी की ज्ञ असे दूरगामी निर्णय, किंवा टमुक हॉटेल महाग असलं तरी 'पैसे वसूल' आहे, विमानाचं तिकीट आज काढावं की दोन दिवस थांबल्यास सस्त्यात मिळेल यासारखे तात्कालिक निर्णय. अशा वेळेस निर्णय घेताना शक्य तितका विचार-विश्लेषण करून, आपल्याला जास्तीत जास्त फायदा किंवा कमीत कमी तोटा होईल असे निर्णय घेणं हे शहाणपणाचं असतं. मग प्रसंगी जनसमजांशी विपरीत असे निर्णयही घ्यावे लागतात, निभावून न्यावे लागतात. थोडक्यात, 'आर्थिक निर्णय घेताना सारासार विचार करून आपल्याला सगळ्यात फायदेशीर होईल असा निर्णय घेण्याची क्षमता असणे म्हणजे अर्थसाक्षरता' अशी ढोबळ व्याख्या तात्पुरती करू.

गोडसे भटजींकडे पाहू या. शेतमालाला भाव नाही, गावंढ्या गावात भिक्षुकीला मान भरपूर असला तरी रोकड हातात नाही. समाजातल्या स्थानामुळे म्हणा किंवा तत्कालीन रूढींमुळे म्हणा, लग्नसमारंभात नगद खर्च करायला लागतो, आणि त्यासाठी कर्जं काढावी लागतात. ती फेडण्याचं अन्य कोणतंही साधन दृष्टिपथात नाही. असं हे 'तुटीचं अंदाजपत्रक' असताना गोडसे भटजी 'ठेविले अनंते…'चा गजर करत निष्क्रिय बसून राहत नाहीत. थोरला मुलगा म्हणून कुटुंबाला आर्थिक सुबत्तेच्या दिशेने न्यायच्या कर्तव्याची जाणीव त्यांना आहे. भांडारे ज्याचं वर्णन करतात ते 'संपर्कजाल' वापरून पैसे मिळवायची क्लृप्ती गोडसे भटजी शोधून काढतात. घरचे लोक अढेवेढे घेतात, बायको दुखणेकरी (की गरोदर?) असते, पण तरीही गोडसे भटजी रेटून उत्तरेच्या प्रवासाला निघतात. अशा प्रकारचा 'परिसंचार' करणं (श्रेय : भांडारे) त्या काळी अगदीच जगावेगळं नसलं तरी धाडसाचं नक्कीच होतं.

प्रवासात गोडसे भटजींच्या अर्थसाक्षरतेचे अनेक मासले दिसतात. काही शेलके नमुने इथे पाहू:

  • प्रवासवर्णनात जागोजागी पैसे आणि तदानुषंगिक उल्लेख आहेत. या लेखासाठी असे सगळे उल्लेख मी 'हायलाईट' केले. ज्या पानावर पैशाशी संबंधित एकही उल्लेख नाही अशी पानं उणीपुरी दहा टक्के असतील!
  • गोडसे भटजींनी प्रवासात पैसा कमावला, पण किमान दोन वेळेला त्यांच्याकडून तो लुटला गेला. तरी आपलं खास प्रवासी व्यवहारचातुर्य गोडसे भटजी दाखवतात. प्रवासात कमावलेले अडीचशे रुपये झाशीत लुटले जाऊनही 'पाचचार रुपये रोख आणि खुर्दा दोन रुपयेपर्यंत' लुटारूंपासून लपवून ठेवणं ते जमवतात. झाशी शहराची गाडग्यामडक्याधान्यासहित सर्वंकष लूट होऊनही 'तंबाखू आणि तांदूळ' या जीवनावश्यक वस्तू घेण्याइतके पैसे गोडसे भटजी शिल्लक ठेवतात.
  • गोडसे भटजी व्यवसायाने याज्ञिक. विविध यज्ञकृत्यांची वर्णनं त्यांच्या लेखनात आली आहेत. पण कर्मकांडांबरोबरच ते त्यातला आर्थिक भागही उलगडून सांगतात.
  • परतीच्या वाटेवर सातपुड्यात गोडसे भटजी आणि त्यांचा मित्र वाट चुकतात आणि भिल्लाच्या तावडीत सापडतात. पण डगमगून न जाता भिल्लांनाच शास्त्रार्थ सांगून त्यांच्याकडून तीन रुपये दक्षिणा कमावतात!

'गोडसे भटजी अर्थसाक्षर होते' याहीपलीकडे जाऊन असं म्हणावंसं वाटतं, की गोडसे भटजींकडे एक विचक्षण (sagacious) अर्थदृष्टी होती. त्याचीही उदाहरणं जागोजागी आहेत. त्यांच्यासारख्या भिक्षुकाचा ज्या वस्तूंशी संबंध जन्मात येणं शक्य नाही अशा गोष्टींचे भाव त्यांना ठाऊक आहेत. त्यांच्या भ्रमंतीदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतात तेव्हा 'अमका सुभा तमक्या लाखाचा' वगैरे तपशील ते सांगतात. 'दुर्भिण' आणि 'किले तोडण्याचा गोळा' यांच्या किमती त्यांना माहीत आहेत. काहीही कारण नाही, पण माहीत आहेत! (आणि आपल्याला अजून राफाले विमानांची नक्की किंमत कळत नाही!) अगदी ते सुप्रसिद्ध 'भंगीण-पद्मिणी'चं ऐकीव गॉसिप सांगतानाही त्या नारायण शास्त्रीबाबांना किती पगार होता, आणि त्यांनी नेमके किती पैसे देऊन त्या भंगिणीच्या पोरीला पटवलं याचे तपशील द्यायला गोडसे भटजी विसरत नाहीत.

आपल्या बोडक्यावर सतत माहिती येऊन आपटत असते. आपल्याला त्या माहितीचा काहीतरी उपयोग असेल किंवा त्या विषयात रस असेल, तर ती माहिती डोक्यात राहते. लिहून ठेवली नाही, तर स्मरणातून वाहून जाते. गोडसे भटजी आधी दिलेले आर्थिक तपशील सहजपणाने लेखनात गोवतात. एक 'स्मरणबुक' असल्याचे उल्लेख त्यांनी एकदोन ठिकाणी केले आहेत. ते कितपत तपशीलवार होतं ते कळायला आता मार्ग नाही, पण अगदी त्याचा आधार घेतला असं जरी म्हटलं, तरी मुळात ते आर्थिक तपशील टिपून ठेवावेसे वाटले आणि आपल्या लेखनात आवर्जून आणावेसे वाटले हीच गोष्ट गोडसे भटजींच्या अर्थदृष्टीची सामक्षा देते.

या कारणांमुळे गोडसे भटजींनी आपल्या प्रवासवर्णनातून दाखवलेला १८५७चा आर्थिक इतिहास बघणं रोचक ठरेल. या आर्थिक इतिहासाचा दोन स्तरांवर विचार केला आहे.

(१) एका समाजाचं आर्थिक पर्यावरण

(२) गोडसे भटजींचं वैयक्तिक अर्थजीवन

दखनी ब्राह्मण समाजाचं आर्थिक पर्यावरण

एखाद्या समाजाकडे (किंवा समाजाच्या एखाद्या भागाकडे) थोडं 'झूम आऊट' करून पाहिलं तर त्या समाजाच्या एकत्रित अशा 'आर्थिक पर्यावरणा'चा अंदाज यायला लागतो. पैसे कुठून मिळतात, कुठे खर्च होतात? तो समाज संपत्ती कशाला मानतो, आणि देणी कशा प्रकारची? 'योग्य आर्थिक निर्णय' कशाला समजलं जातं? आर्थिक आपत्तीला त्या समाजातले घटक कसे सामोरे जातात? समाजातल्या व्यक्तीचं स्थान ठरवणाऱ्या धारणा पैशाशी, संपत्तीशी कितपत संबंधित आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे त्या समाजाचं 'आर्थिक पर्यावरण'. समाजाच्या दैनंदिन व्यवहारातून आर्थिक पर्यावरण दिसत, जाणवत राहतं. अगदी भाषेतूनही. 'अंथरूण पाहून पाय पसरावेत', 'Money makes the mare go' वगैरे. असो. हा वेगळा आणि मोठा विषय आहे.

तत्कालीन दखनी ब्राह्मण समाजातले वर्ग

भारतीय समाजाबाबत कोणताही विचार करताना 'जात' हा दृष्टीकोन - कितीही प्रतिगामी असला - तरी येणं अपरिहार्य आहे. किंबहुना भारतीय समाजाच्या बाबतीत वर्गविचार हा जातीविचाराच्या पोटात येतो. म्हणजे समाजात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण ठरवताना आधी जातीचा विचार, आणि मग वर्गाचा. त्यांना भाषा, प्रांत आदि अस्मिताही छेद देऊन जातात. भारतीय समाजातल्या परस्परांना छेद देणाऱ्या विविध अस्मिता कागदावर एखाद्या Venn diagram मध्ये चितारणं मनोरंजक ठरेल.

इथली चर्चा आपण 'दखनी ब्राह्मण समाजातले विविध वर्ग' इतकी मर्यादित ठेवू. अर्थात गोडसे भटजींनी दाखवलेले.

प्रथम येतात ते भट (पेशवे), नेवाळकर (झाशीवाले), गुलसराईवाले, यांसारखे राज्यकर्ते. दिनकरराव राजवाडे, मोरोपंत तांब्यांसारखे 'पॉवर ब्रोकर'. रावसाहेब हिंगणे यांच्यासारखे जहागीरदार. किबे यांच्यासारखे सावकार. येवलेकर (टोपे) यांच्यासारखे लढाऊ. हा सत्तापद भोगणारा किंवा सत्तास्थानाशी जवळीक असलेला उच्चवर्ग. संपत्तीत, ऐश्वर्यात लोळणारा. गोडसे भटजींच्या दृष्टीकोनातून हा 'आश्रयदात्यांचा' वर्ग आहे. यांच्याकडे गोडसे भटजी 'उत्पन्नाचा स्रोत' म्हणून बघतात. यांच्याशी थेट ओळख असणं गोडसे भटजींना दुरपास्त आहे, पण अपवादात्मक परिस्थितीत ती असू शकते. त्याचा उपयोग करून घ्यायला गोडसे भटजी लाजत नाहीत. रामभटकाकांच्या मोरोपंत तांब्यांशी असलेल्या आपल्या ओळखीचा वापर करून झाशीच्या राणीकडे आश्रय मिळवतात. अयोध्येहून काशीयात्रेस जाण्यासाठी सोबत मिळावी म्हणून थेट हिंगण्यांना गळ घालून त्यांच्या लवाजम्यात भरती होतात.

मग येतो तो या उच्चवर्गाकडे काम करणारा उच्चमध्यमवर्ग. चार पैसे गाठीशी बाळगून असलेला. सुखासीन, सुरक्षित आयुष्य जगणारा. आश्रयदात्या उच्चवर्गाशी जवळीक असलेला, पण स्वतः उच्चवर्गात न मोडणारा. यात येतात ते वैशंपायन (बायजाबाई शिंद्यांकडचे दानाध्यक्ष), तातू दीक्षित भडकमकर (राजज्योतिषी, मनू तांबेचं स्थळ नेवाळकरांना सुचवणारे), वगैरे. यातच येतात ते राजाश्रयाने राहणारे विद्वान : कृष्णंभट आरडे (ग्रंथकार), वगैरे. गोडसे भटजी यातही बसत नाहीत. ही मंडळी गोडसे भटजींच्या 'संपर्कजाला'त (नेटवर्कमध्ये) येतात. यांच्या ओळखी वापरून गोडसे भटजी आश्रयदात्यांपर्यंत पोचू शकतात. आश्रयदाते 'सीईओ' असतील तर हे उच्चमध्यमवर्गीय 'मिडल मॅनेजर्स' आहेत. हेही पाहायला मिळतं. वैशंपायनांच्या ओळखीने दानातला हिस्सा गोडसे भटजी पदरी पाडून घेतात.

मग येतो तो गोडसे भटजी ज्यात आहेत असा मध्यम/कनिष्ठ मध्यमवर्ग. (याला समाजशास्त्रीय परिमाण नाही - फक्त सोयीसाठी त्याला 'मध्यमवर्ग' म्हटलं आहे.) अगदी 'हातातोंडाची गाठ नाही' अशी स्थिती नसलेले, पण मोठा खर्च दत्त म्हणून उभा राहिला की जवळ एकरकमी पैसे नसलेले हे लोक. नेमक्या याच कारणामुळे (लग्नकार्ये) गोडसे कुटुंबावर कर्जाचे डोंगर चढतात. या वर्गातल्या लोकांकडे स्थावरजंगम मालमत्ता (assets) नसतात असं नाही, पण असलेले अॅसेट्स अ-नगद (illiquid) स्वरूपाचे असतात. गोडसे भटजींकडेही शेती आहे, पण जिथे शेतमालालाच भाव नाही तिथे शेताला कितपत भाव येणार? शिवाय असलेलं शेत विकून गोडसे कुटुंब खाणार काय? झाशीत गोडसे भटजी ज्यांच्याकडे उतरतात ते केशवभटजी मांडवगणे हेही असेच मध्यमवर्गीय. 'वेदजटा म्हणण्याचे सामर्थ्य त्या ब्राह्मणाचे आहे. पुन्हा सरकार आश्रय नाही आणि स्वतंत्र घर मोठे आहे. सभ्यचालीचा फार गरीब वृत्तीने आणि द्रव्यानेही आहे.' असं मांडवगणे यांचं वर्णन गोडसे भटजी करतात. गोडसे भटजी 'द्रव्याने गरीब' म्हणत असले तरी ते मत 'मिठाच्या चिमटीसह' घ्यायला पाहिजे. कारण त्यांच्या घरी 'राहण्याबाो विचारिताच त्याणी संतोषानी राहण्यास सांगितले', वर 'आग्रह करून फराळास दिल्हे'. गोडसे भटजींना 'द्रव्याने गरीब' म्हणजे 'इतर गडगंज लोकांच्या तुलनेने गरीब' असं म्हणायचं असेल. मध्यमवर्गाची अन्य आर्थिक लक्षणंही गोडसे भटजींच्या लेखनात दिसतात. ती वेगळी मांडली आहेत.

हातातोंडाची गाठ असलेल्या गरीब दखनी ब्राह्मण वर्गाबद्दल मात्र गोडसे भटजींच्या लेखनात काही सापडत नाही. काही आश्रितांचा उल्लेख आहे, पण तो तेवढ्यापुरताच. 'असे गरीब ब्राह्मण त्या काळी नव्हतेच' असा निष्कर्ष काढण्याची घाई मात्र करायला नको. गोडसे भटजींच्या कोकणातच असे अनेक ब्राह्मण सापडण्याची शक्यता होती. पण 'माझा प्रवास'मध्ये तरी असे उल्लेख फार कमी आहेत एवढं खरं. तत्कालीन अन्य साधनांचा, साहित्याचा अभ्यास करून ही मोकळी जागा भरून काढता येईल.

'आग्रह करून फराळास दिल्हे' प्रकारची मदत गोडसे भटजींना परक्या मुलखात मिळते. ही मदत मिळण्यात त्यांचं 'ब्राह्मण असणं' हा कळीचा मुद्दा आहे. ब्राह्मण समाजातला त्यांचा मध्यम/कनिष्ठ मध्यमवर्ग त्यांना इथे नडत नाही. तत्कालीन ब्राह्मण समाजाच्या 'social capital'वर प्रकाश टाकणारी ही गोष्ट आहे. भांडारे म्हणातात त्या 'संपर्कजाला'तून निर्माण झालेलं हे 'social capital' आहे. या संपर्कजालात 'सरंजामी' आणि 'आश्रित' असे दोन ढोबळ प्रकार आहेत. सरंजामी ब्राह्मणांना मिळालेले उच्चाधिकार ते आश्रित ब्राह्मणांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी वापरले जात आहेत.

त्याबरोबरच गोडसे भटजींच्या लेखनात कृषिसंस्कृतीचे अत्यंत पुसट उल्लेख आहेत. सुरुवातीला भाताचे भाव पडल्याचा उल्लेख येतो, पण त्याची कारणमीमांसा ते करत नाहीत. हा उल्लेखही 'कर्जं का वाढली' हे सांगण्यापुरता आहे. प्रवासातही असे उल्लेख तुरळक दिसतात. एके ठिकाणी ते 'लहानसी तीनसे रुपये किमतीचे बैल' असा उल्लेख करतात. गोडसे भटजी व्यवसायाने याज्ञिक होते, कृषक नव्हते, हे या अनुल्लेखाचं कारण असावं.

तत्कालीन दखनी ब्राह्मण समाजाच्या अर्थविषयक धारणा

आधी लिहिल्याप्रमाणे गोडसे भटजींच्या मध्यमवर्गात 'लग्नासाठी कर्जं काढणं, आणि ती फेडता ना येणं' हे कर्जबाजारीपणाचं, आणि पर्यायाने दारिद्र्याचं मुख्य कारण दिसतं आहे. एक कर्ज घेऊन, ते पुरतं फेडून व्हायच्या आधीच नवं कार्य समोर आल्याने दुसरं घ्यावं लागतं असा एकंदर प्रकार दिसतो आहे. असं असतानाही गोडसे परिवाराला वेळोवेळी कर्जं मिळत होती हे विशेष! गोडसे भटजींनी नोंदल्याप्रमाणे 'उत्तम लौकिकामुळे काही कारणानी रुो लागल्यास सावकार लोक बिनहरकत खतपत्र नसता पाच-पाचशे रुो देत असत.' बँकांच्या भाषेत, गोडसे भटजींचं credit rating हे reputation-based होतं. (जसं विजया मल्ल्याचं होतं!) त्याचा credit historyशी संबंध नव्हता. तत्कालीन ब्राह्मण समाजाच्या 'social capital'चा अभ्यास कोणी केला तर त्यात आवर्जून नोंदवावी अशी ही गोष्ट आहे.

कर्ज जरी असलं, तरी गोडसे भटजींचा ते बुडवायचा हेतू नव्हता. 'कर्ज बुडवणे' - मग ते दिवाळं फुंकण्यासारख्या वैध मार्गाने का असेना - याला आजही कलंक (social stigma) मानलं जातं. आपलं social capital खाली येण्याची भीती त्यांना असावी. शिवाय, त्यांच्या वैयक्तिक मूल्यव्यवस्थेतही कर्ज बुडवणं बसत नाही असं मानायलाही जागा आहे.

या तुलनेत उच्चवर्गाच्या आर्थिक धारणा वेगळ्या असल्याचं जाणवतं. झाशीचे संस्थानिक असलेल्या गंगाधरपंत नेवाळकरांचं वर्णन भटजी चक्क 'षंढ' असं करतात. वस्तुतः तो 'नपुंसक' या अर्थी षंढ नसून 'क्रॉसड्रेसर' असावा असं गोडसे भटजींच्या वर्णनावरून वाटतं. तरी अशा षंढ राजासोबत मोरोपंत तांबे आपल्या फटाकड्या (dashing) मुलीचं लग्न लावून देतात. असं का - या प्रश्नाचं कोरडं उत्तर आहे 'पैशासाठी पोरीला विकलं'. ते नेमकं काय भावात, याचे तपशील पुढे मिळतात : 'मोरोपंत तांबे मुलीसुाा झासीस नेऊन स्वतंत्र शहरात वाडा राहण्यास दिल्हा. आचारी, पाणके, ब्राह्मण, कारकून वगैरे सर्व मनुष्ये ठेऊन दिल्ही. … पुढे मोरोपंत तांबे यांचे लग्नही ठरावाप्राो करून दिल्हे.' या विवाहामुळे मोरोपंत झाशीचे 'किंगमेकर' झाले.

उच्चवर्गीय अभिजन आणि गोडसे भटजींसारखे मध्यमवर्गीय प्रवासी यांच्या आर्थिक धारणांतला फरक आणखी एका मनोरंजक प्रकारे दिसतो. हे प्रवासवर्णन आहे १८५७ सालचं. राजकीय अस्थिरतेच्या त्या काळात शत्रूचा हल्ला होणे, आणि जिवाच्या भीतीने पळून जायला लागणे हा प्रसंग सर्वच लोकांवर वेळोवेळी गुदरला. पण या प्रसंगाला उच्चवर्गीय कसे सामोरे जातात आणि मध्यमवर्गीय कसे सामोरे जातात हे टिपणं मनोरंजक आहे.

इंग्रजांच्या हल्ल्यामुळे नानासाहेब पेशव्यांना बिठूर सोडून गंगापार लखनौच्या दिशेने सहकुटुंब पळून जायला लागलं. त्या वेळी त्यांनी बरोबर घेतलेल्या जिनसा अशा : रामदास स्वामींनी दिलेल्या छाट्या, दक्षिणावर्त शंख, गौरीशंकर बाण, अमोलिक रत्नासारखं वडाचं पुष्प. हे सगळं गंगेच्या प्रवाहात विसर्जन करण्यासाठी. गंगापार झाल्यावर मात्र त्यांच्या लक्षात आलं, '...बायकास अति ताहान लागली. ते समई देवळाजवळ पाण्याची विहीर होती, पण याजपासी रसी लोटा नव्हता … कोणापासी पैसा नाही व पाणी पिण्यास पात्र नाही. पुरुषापासी नेसू वस्त्र व येक उपरणा आंगावर बायकांपासी नेसू मात्र वस्त्र, आंगात चोळी व खेरीज वस्त्र नाही.' मग अशा वेळी मदतीला आला तो आश्रित 'राघोबा सिष्य'. त्याने त्याच्या 'बन्यानांतला येक रुपया' काढून जेवण्याची तजवीज केली! पुढे झाशीची राणी मात्र तुलनेने जास्त तयारीने पळून गेली. लूटमार होऊन प्रसंगी जिवाला धोका उत्पन्न होऊ शकेल या भीतीने तिने बरोबर एका पैसादेखील घेतला नाही, पण पाणी पिण्यासाठी 'रुप्याचा जाब' नेला होता असं गोडसे भटजी नोंदवतात.

आता गोडसे भटजींची पळापळीची तयारी बघू या : '...कंबरेस करगोटे बांधोन लागोटे नेसून लागोट्याचे आत सोन्याचे जोडवे पके बांधून ठेविले, आणि दोघा मिळून तंबाखूचा बटवा येकच राहिला होता तो बाहेरून फाटून चिंध्या लोम्बत होत्या असा फाटका बटवा बराबर घेतला. त्यांत साधारण लोखंडी अडकित्या व येक डबी जस्ती होती आणि रुपये तीन व येक रुपयांचा खुर्दा इंग्रजी याप्राो बराबर अर्थ होता. कंबरेस येक उपर्णा फाटका होता, तो नेसण्यासारखा गुंडाळून घेतला. येक पंचा डोकीस बांधला होता व येक उपर्णा अंगावर होता व फाटके बन्यान अंगात घातले होते. आंबाडीची दोरी पाउणसे हात सुमार घेऊन त्यास तांब्याभर पाणी राहील असे मातीचे मडके लाविले होते. अशा सरंजामानी सर्वांस नमस्कार करून बाहेर पडलो.' यांच्या अवताराकडे बघून कोणाला शंकाही येणार नाही, की हे गरीब ब्राह्मणाव्यतिरिक्त आणखी कोणी असतील, किंवा यांच्याकडे सोन्याचं जोडवं असेल! वर दिलेला वर्गविचार इथे प्रभावी दिसतो आहे : पेशवे किंवा राणीसारख्या सरंजामी वर्गाला गेलेली दौलत परत मिळण्याची शक्यता होती. एका सोन्याच्या वळ्यासारख्या गोष्टींनी त्यांचं काही अडणार नव्हतं. पण गोडसे भटजींसारख्या मध्यमवर्गीयासाठी सोन्याचं वळं ही तुलनेने दुष्प्राप्य आणि म्हणून मोलाची वस्तू होती. म्हणून एवढा कडेकोट बंदोबस्त!

ग्वाल्हेरच्या नाटकमंडळीला त्यांचा प्रयोग बघितल्याशिवाय राजाश्रय न देण्याइतका सुज्ञपणा राणीकडे आहे, पण अनुष्ठानांकरता मात्र हवं तेवढं बजेट आहे! तत्कालीन राज्यकर्त्यांच्या मते 'अनुष्ठानं करणे' हा बराच प्रभावी उपाय असावा. विधवा असल्याने काही धार्मिक कर्मकांडं रोज करणे राणीला आवश्यक होते. पण त्याव्यतिरिक्तही शत्रुक्षय व्हावा म्हणून, आणि राज्य चांगले चालावे म्हणून लक्ष्मीबाईंनी अनुष्ठानं केल्याची आठवण गोडसे भटजी नोंदतात. इथे लक्षात घेतलं पाहिजे, की मुख्यमंत्र्याने विठ्ठलाची पूजा करणं किंवा कुंभात स्नान करणं यासारखी ही लोकानुनयी कृती नाही. इथे राज्यकर्त्यांची अनुष्ठानांच्या परिणामांवर श्रद्धा आहे!

तत्कालीन दानधर्म

सुरुवातीलाच धारच्या पवारांनी केलेल्या जंगी दानधर्माचं वर्णन आहे. सात-आठ लक्ष रुपये दानधर्म होणार म्हणून आठ-नऊ हजार दखनी ब्राह्मण तिथे जमले होते. त्या दानसमारंभाच्या भपक्याचं वर्णन आज अक्षरशः अतर्क्य वाटेल असं आहे. त्यात 'दासीदान' आणि ते घेणाऱ्या ब्राह्मणाची इतर ब्राह्मणांनी उडवलेली हुर्यो हा भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

नवरा मेल्यावर केशवपन करणे ही तत्कालीन ब्राह्मण समाजात असलेली प्रथा. पण पैसेवाल्यांना त्यातूनही सूट! गंगाधरपंत नेवाळकर वारल्यावरही राणी लक्ष्मीबाईने केशवपन करायला नकार दिला. म्हणून तिला प्रतिदिवशी तीन 'कृच्छ्रे' प्रायश्चित्त आहे. झाशीची राणी हे प्रायश्चित्त ब्राह्मणांना रोज तीन रुपये दक्षिणा देऊन करत असे!

नित्यदानं करणं - म्हणजे ब्राह्मणांना जेवायला घालून दक्षिणा देणं - हा सगळ्याच राज्यकर्त्यांचा आणि धनिक लोकांचा आवडता उद्योग दिसतो. हरिकर्ण रविकर्ण सावकाराने चालवलेल्या अन्नछत्राची माहिती गोडसे भटजी देतात. अन्नछत्र अधिक दक्षिणा या उत्पन्नात 'गरीब ब्राह्मणांची कुटुंबे' आपला चरितार्थ कसा चालवतात याचं वर्णन गोडसे भटजी देतात. सूर्ययंत्र क्षेत्र 'अष्टकुष्टे घालविण्यासाठी' प्रसिद्ध होतं. तिथे आलेला धनिक व्याधिमुक्त झाल्यास कृतज्ञता म्हणून धर्मशाळा बांधतो, सदावर्ते ठेवतो हेही एक दिसतं.

दानधर्माची फक्त काही थोडकी उदाहरणं वर दिली आहेत. त्यातून कोणती गोष्ट स्पष्ट होत असेल, तर ती म्हणजे गोडसे भटजींसारख्या मध्यमवर्गीय दखनी ब्राह्मणांसाठी 'दानधर्म' हाच उत्पन्नाचा मुख्य, आणि सुलभ स्रोत होता.

गोडसे भटजींचं वैयक्तिक अर्थजीवन

समाज हा वैयक्तिक घटकांचा बनलेला असतो. समाजाच्या अर्थधारणांचा प्रभाव वैयक्तिक घटकांच्या अर्थधारणांवर पडणं स्वाभाविक असतं. उदाहरणार्थ, श्री० ना० पेंडशांच्या 'लव्हाळी'मधला नायक विमा पॉलिसीला 'अ‍ॅसेट' मानतो. ही १९४०च्या आसपासची गोष्ट, बहुधा तत्कालीन सामाजिक अर्थधारणा. आज विचार करता हा खुळचटपणा वाटू शकेल, आणि विमा हा खर्च आहे असं मानलं जाईल. गोडसे भटजीकालीन दखनी ब्राह्मण हा/त्याच्या स्त्रीच्या हौसेमौजेखातर काही बजेट ठेवत असेल असं वाटत नाही. सुदैवाने परिस्थिती बदलली आहे. जुन्या लोकांना याबद्दल विचारलं, की "तशी पद्धत नव्हती रे!" असं ठरावीक छापाचं उत्तर मिळतं.

आर्थिक मूल्यव्यवस्था

गोडसे भटजी मध्यमवर्गीय होते हे आपण पाहिलंच. अशा गोडसे भटजींच्या वैयक्तिक अर्थधारणा काय होत्या? त्यांची 'आर्थिक मूल्यव्यवस्था' कशी होती? म्हणजे कोणत्या मार्गाने पैसे मिळवणं ते योग्य मानत आणि कोणत्या मार्गाने अयोग्य? पाहू या.

गोडसे भटजी पैसे कमावायला निघाले हे तर उघडच आहे. पण तरीही ते पैशाबाबत साधनशुचिता बाळगताना दिसतात. त्यांच्या धार्मिक धारणेप्रमाणे ते 'मृताबाो आपल्याला दान घेणे नाही'. त्यामुळे धारानगरच्या राजाने मोठा दानधर्म करूनही त्यात ते काही दान घेत नाहीत. इतकंच काय, आपला हा नियम दानाध्यक्षाला सांगण्याइतका बाणेदारपणाही ते दाखवतात.

'कोणाचे पैसे बुडवू नयेत' हा अगदी खास मध्यमवर्गीय संस्कार. गोडसे भटजींच्या वागण्यातही तो ठळकपणे दिसतो. आजारी काकांना गावात आणवून ठेवायचे दोन आणे रांगड्या ब्राह्मणाला देण्याचा व्यवहार त्याच्याबरोबर ठरतो. पण आणून ठेवल्यावर, बहुधा भूतदयेपोटी, पैसे न घेताच तो रांगडा ब्राह्मण निघून जायला लागतो. तर गोडसे भटजी आजारी काकांना तिथेच सोडून त्या ब्राह्मणाच्या मागे-मागे धावतात, पैसे देण्यासाठी! पूर्वी झाशीला मांडवगण्यांकडे राहत असताना लुटीच्या गडबडीत भंग्याला पैसे द्यायचे राहून गेल्याचं त्यांना आठवतं, आणि अशा जातीचे आपण कायमचे देणेकरी राहून गेलो असे होऊ नये म्हणून भटजी ते देण्यासाठी भटजी खास ग्वाल्हेरहून झाशीचा टल्ला मारतात.

याचंच दुसरं रूप म्हणजे 'कोणाचंही मिंधेपण घ्यायला नको' ही भावना. काशीयात्रेला रावसाहेब हिंगणे या धनिकाच्या तांड्यात ते सामील होतात. पण यजमानावर बोजा नको म्हणून काका-पुतण्या स्वतःचं स्वतः रांधून खातात. अर्थात यात सोवळ्या-ओवळ्याचा भागही होता. आपल्या स्वभावाप्रमाणे हिंगण्यांशी दोस्ती जमवतात, पण हिंगणे त्यांना 'आपल्याबरोबरच जेवत चला' असं सुचवतात, तेव्हा यजमानाचे आणखी उपकार नको या भावनेने ते शिताफीने जेवणाचं आमंत्रण चुकवतात! परतीच्या वाटेवर नाना राहाळकर या ग्रामबंधूंच्या सोबतीने यायचं ठरवतात, पण काशीत बिऱ्हाडं मात्र वेगवेगळी ठेवतात.

त्याच अनुषंगाने, कशावर पैसे घालवणं योग्य आणि कशावर अयोग्य असं भटजींना वाटे याचाही विचार करू. जमलेल्या पैशांचा विनियोग करण्यासाठी त्यांनी (१) कर्जफेड (२) काशीयात्रा (३) अन्य धार्मिक कृत्ये अशी उतरती भांजणी लावलेली दिसते. हे प्रवासाच्या 'आधुनिक' हेतूंच्या विपरीत आहे - मनोरंजन हा हेतू त्यात नाही. हा हेतू त्यांच्या मनात कुठेतरी असावा का, अशी शंका मला येत होती. पण लखनौजवळ असताना '...आपण येथे रुो धर्मकृत्यात बरेच उडविले. परंतु आपण चैनेत पैसा उडविला नाही.' असे वाटून 'बुध्धीपूर्वक लखनौस जाऊन स्वइच्छ नाच बैठकी पाहून सुख भोगून मौजही पाहू' असा निर्णय ते घेतात. चुलत्यांना 'मॅनेज' करून ते सोबत्यांबरोबर जिवाचं लखनौ करतात. 'यवनस्त्रियांची गाणी' ऐकतात, 'गवई लोकांची गाणी ऐकोन त्यांस द्रव्य' देतात, 'बंगाली खेळ मंत्रविद्येचा पाहून त्यांस द्रव्य देऊन खुसी' करतात. इतकंच काय 'वरचेवर चहाकापी' घेतात! हे करताना त्यांच्या मनाला कुठेही बोचणी लागत नाही, आणि आपल्या प्रवासवर्णनात ते 'दोज वेअर द डेज'च्या स्मरणरंजनी सुरात त्या चंगळीच्या आठवणी जागवतात हा त्यांच्या आर्थिक मूल्यव्यवस्थेचा थोडा वेगळा, आणि म्हणूनच रोचक पैलू आहे!

समाजमनातला पैसा

मध्यमवर्गामध्ये, विशेषतः मराठी मध्यमवर्गामध्ये, आजही 'पैसा' हा खुलेपणाने चर्चिला जाणारा विषय नाही. "मग? किती पगार मिळतो तुला?" असा प्रश्न विचारणं अशिष्ट समजलं जातं. विशेषतः ही संपत्ती 'निगेटिव्ह' असेल (पक्षी: कर्ज असेल) तर नाहीच नाही. गोडसे भटजींमध्येही हा गुण (?) दिसतो. ते ना संपत्तीचं प्रदर्शन करत, ना कर्जाचं.

तोफगोळ्यांच्या किमती, सुभ्याचा महसूल, तिसऱ्याच माणसाने वेश्येला दिलेले पैसे, असे वाट्टेल ते आर्थिक तपशील आपल्या प्रवासवर्णनात मुक्तपणे उधळणारे गोडसे भटजी आपल्या घरच्या कर्जबाजारी परिस्थितीविषयी लिहितात खरे, पण ते कर्ज नेमकं किती होतं याचा पत्ता लागू देत नाहीत! त्याचप्रमाणे ते इथे अमके रुपये मिळाले, तिथे तमके मिळाले, इथे एवढे लुटले गेले वगैरे लिहितात, पण त्यांच्या वर्णनातून एक सलग 'कॅश फ्लो स्टेटमेंट' तयार करायला जावं तर ते जमत नाही! हा गोडसे भटजींचा अजागळपणा (oversight) असण्याची शक्यता फार कमी आहे. 'घरची धुणी बाहेर कशाला धुवा' असा विचार करून त्यांनी जाणीवपूर्वक हे तपशील दडवलेले आहेत!

तरीही एका भन्नाट शक्यतेचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. गोडसे भटजींनी आपलं मूळ लेखन दोन बांधीव वह्या आणि सहा पुरवणी बंद यांवर केलं आहे. राजहंस आवृत्तीच्या संपादिका मृणालिनी शहा आपल्या प्रस्तावनेत नोंदतात, की 'दुसऱ्या बांधीव वहीत प्रारंभी एक मोठा ताव दुमडलेला आहे. त्यावर काही जमाखर्चाचा मजकूर लिहिलेला आहे.' मी पाहिलेल्या कोणत्याच आवृत्तीत जमाखर्चाचा उल्लेख नाही. कदाचित कोणीतरी भलत्यानेच दिसला कोरा कागद म्हणून किराण्याची यादी खरडली असण्याची शक्यताही आहे, पण कदाचित, कदाचित गोडसे भटजींनी आपल्या प्रवासाचा लिहिलेला जमाखर्चही असू शकतो! असं असल्यास तत्कालीन अर्थकारणावर महत्वाचा प्रकाशझोत पडेल. (हे मूळ लेखन भाइसं मंडळाकडे असल्याचं कळतं. प्राची देशपांडे यांनी त्या जमाखर्चाच्या तावांची स्कॅन प्रत पाठवली आहे. कोणा मोडी जाणकाराच्या सहकार्याने 'तो मोठा ताव' वाचून त्यात काही सापडल्यास येथेच लिहीन.)

"Know when you are beaten"

झाशीला गोडसे भटजी लुटले जातात हा अनेक अर्थांनी कळीचा टप्पा आहे. मुख्य म्हणजे 'पैसे कमावण्यासाठी प्रवास' हे आपलं उद्दिष्ट काही सफल होण्यातलं नाही हे या घटनेनंतर त्यांना पुरेपूर कळून चुकतं. अर्थसाक्षर गोडसे भटजी आता पैसे मिळवायचा विचार मनातून काढून टाकतात. 'हसरतों के दाग' चोंबाळत जिवाची तगमग करून घेण्यापेक्षा 'संकट आले हा दैवयोग' असं मानून अनायासे उत्तरेत आलो आहोत तर 'आता यात्रा करून घरी जावे' असं ठरवतात. असं असलं तरी वेळप्रसंगी जमेल तशी अर्थार्जनाची संधी ते सोडत नाहीत. परतीच्या प्रवासात खांद्यावर गंगाजलाच्या कावडीचं ओझं आणि जबाबदारी वागवतानाही ते किबे सावकारांच्या मुलीच्या विवाहासाठी थांबतात.

प्रवासानंतर

पण आपण अर्थप्राप्तीसाठी गेलो आणि अपयशी ठरलो हे ते विसरत नाहीत. शेवटचं 'प्रवासाचे फलित' लिहिताना 'तेव्हा मुख्य प्रारब्ध आहे' असा त्यांच्या पारंपरिक श्रद्धाळू स्वभावाला साजेसा निष्कर्षही ते काढतात.

एकूणच प्रवासवर्णनांतून गोडसे भटजींची 'अर्थसाक्षर, पैशाबाबत सजग, पण पैशासाठी न हपापलेला माणूस' ही छबी दिसत राहते. परतल्यावर त्यांनी व्यतीत केलेल्या आयुष्यातूनही तेच दिसतं. आल्यावर त्यांनी क्षेत्रसंन्यास घेतला. क्षेत्रसंन्यास म्हणजे गावातून सहसा बाहेर पडायचं नाही असं व्रत. पौरोहित्य आणि भागवत निरूपण करत त्यांनी उर्वरित आयुष्य घालवलं. त्यांचा मुलगा नरहरशास्त्री मुंबईला गेला आणि त्याने गीता प्रवचनकार म्हणून ख्याती मिळवली. पण गोडसे भटजींची त्याच्याकडून अपेक्षा 'त्याने दरमहा पाच रुपये पाठवत जावेत' एवढीच होती असं मृणालिनी शहा नोंदवतात. चिं० वि० वैद्यांच्या सांगण्यावरून गोडसेंनी आठवणी लिहिल्या खऱ्या, पण त्याबद्दल कबुलीचे शंभर रुपये त्यांच्या हयातीत मिळाले नाहीत. (वैद्यांनी पुढे ते गोडसे भटजींच्या मुलाला दिले.) यावरून दिसतं, की त्यांचा लेखनाचा हेतू पैसे मिळवणे हा नव्हता.

समारोप

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे आर्थिक इतिहास हा बहुपेडी विषय आहे. वसाहतकालीन भारताच्या आर्थिक इतिहासावरही विपुल लेखन उपलब्ध आहे. पण गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास'चा विचार तत्कालीन आर्थिक इतिहासाच्या अनुषंगाने कोणी केला नव्हता, म्हणून हा लेखनप्रपंच.

गोडसे भटजींचा प्रवास तीन वर्षं चालू होता. परततेवेळी ते तेहतीस वर्षांचे होते. प्रवास संपवताना गोडसे भटजी बरोब्बर माझ्या (आजच्या) वयाचे आहेत. मी समजा १८५७मध्ये त्यांच्या जागी असतो, आणि माझ्यावर असे प्रसंग गुदरले असते, तर गोडसे भटजींइतक्या चाणाक्षपणे (and in good humour) त्याला तोंड देऊ शकलो असतो की नाही ही मला शंकाच आहे.

या लेखात गोडसे भटजींच्या लेखनातून दिसण्याऱ्या तत्कालीन अर्थकारणाला मी पुरेसा न्याय देऊ शकलो नाही असं वाटतं. विस्तारभयास्तव एक भाग वगळावा लागला. आणखी दोन पैलू 'Economic history' या शाखेला वाहिलेल्या अकादमीय प्रकाशनांसाठी योग्य आहेत.

आर्थिक असो किंवा नसो, इतिहास हा भावनिकपणे बघायचा विषय नव्हे. पण तरीही इतिहासातले काही मानवी प्रसंग काळजाला हात घातल्याशिवाय राहत नाहीत. 'तुझिये भानवसींचा ठोंबरा खाऊन राहीन' म्हणत सती न जाण्यासाठी गयावया करणारी कोणी यादव राणी, एल्बा बेटावर आपल्या गेलेल्या साम्राज्याचा शोक करणारा नेपोलियन, दत्ताजी शिंद्याचं 'आप मेला, जग बुडाले. आबरू जाते अन् वांचतो कोण', यांबरोबर शोभेल असा एक प्रसंग गोडसे भटजी वर्णन करतात. झाशी पडल्यावर गोडसे भटजी काल्पीच्या दिशेने निघतात. त्याच वाटेत त्यांना परागंदा झालेली राणी लक्ष्मीबाई भेटते. एके काळी केशरबदाम घातलेलं सुवासिक पाणी आंघोळीला वापरणारी राणी गोडसे भटजींना सांगते, की आता मी 'अदशेर आट्याची धनीण' उरले आहे. राणीच्या आयुष्यातल्या वाताहतीचं यापेक्षा नेमकं, हृद्य वर्णन सापडणं कठीण आहे. असो.

(समाप्त)

कृतज्ञता : या लेखाच्या निर्मितीप्रक्रियेत अनेकांनी आपलं समजून मदत केली. मुळात असं काही लिहावं ही कल्पनाच प्राची देशपांडे आणि शैलेन भांडारे यांचे उपरोल्लेखित लेख वाचून सुचली. या लेखाचा कच्चा खर्डा वाचून या दोघांनी अमूल्य सूचना दिल्या, भर टाकली. प्राची देशपांड्यांनी जमाखर्च लिहिलेल्या तावांची स्कॅन पाठवली. या सगळ्या आपुलकीबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. लेखनाच्या पहिल्या खर्ड्याचे वाचक आणि संपादक-per-defaltam रा रा श्री अमुकराव आणि मेघना भुस्कुटे यांचे औपचारिक आभार मानले तर मला ते लय मारतील. ते ऋण व्यक्त करून थांबतो.

तळटिपा


  1. गाईडलाही स्वतःचा दृष्टिकोन, असतो, त्यामुळे कदाचित नाहीही होणार.  

  2. इतका, की 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या आर्थिक इतिहास विभागाला 'वर्णनशास्त्र' या विषयाचा अभ्यास आर्थिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून करण्यासाठी मोठं अनुदान मिळालं आहे! अधिक माहिती इथे : https://cordis.europa.eu/project/rcn/205203/reporting/en  

  3. त्यांचं अन्य लेखनही (चांगल्या अर्थी) मनोरंजक आहे.  

  4. पहिल्या भागातील 'कर्जाचा बोजा' या उपप्रकरणात याबद्दल अधिक माहिती आली आहे. 

  5. या व्यवहाराबद्दल राणीचं स्वतःचं काय मत होतं याविषयी मला कुतूहल आहे. एकंदरीत त्या काळची सामान्य रूढी म्हणून तिनेही मनात कटुता न ठेवता ते मान्य केलं असावं. कारण पुढे एके ठिकाणी तिने स्वतःच अशा 'रिव्हर्स-हुंडा' प्रकारच्या एका विवाहाला उत्तेजन दिल्याचं गोडसे भटजी नोंदवतात. स्त्रीमुक्ती आणि सुधारकी विचार मराठी लोकांपासून १८५७ किती लांब होता हे इथे दिसतं.  

  6. 'मुलीसुाा' ही शुद्धलेखनाची चूक नाही. मोडीमध्ये नेहेमीच्या वापरातल्या मोठ्या शब्दांची अशी लघुरूपं करायची पद्धत होती. 'मुलीसुाा' म्हणजे 'मुलीसमवेत'. गोडसे भटजींच्या लेखनात अशी अनेक लघुरूपं दिसतात. या लेखात उद्धृत केलेल्या भागात काही आली आहेत, उदा० 'याप्राो' म्हणजे 'याप्रमाणे'. बाळबोधीने देवनागरी लिपी स्वीकारून लघुरूपं करायची पाश्चात्त्य पद्धत स्वीकारली, म्हणजे शब्दानंतर टिंब / गोळा देणे. जुनी मोडी पद्धत जवळजवळ लुप्त झाली आहे. आजच्या युगात त्यातल्यात्यात टिकून राहिलेलं म्हणजे 'साहेब'चं लघुरूप 'साो'. उदा० बाळासाो.  

  7. सदावर्त आणि अन्नछत्र यांत एक मूलभूत फरक आहे. सदावर्तात कोरडा शिधा दिला जाई, म्हणजे ज्याला सोवळं पाळायचं असेल तो स्वतः शिजवून घेऊ शकेल.अन्नछत्रात मात्र अन्न शिजवून द्यायची पद्धत होती. 

  8. वैद्यांनी आपल्या वकील मित्राला आठवणी दाखवल्या. त्याचं मत पडलं, की लेखकाच्या हयातीत या आठवणी प्रकाशित केल्यास ब्रिटिश सरकार कदाचित लेखकाला त्रास देईल, म्हणून लेखक जिवंत असेपर्यंत या आठवणी छापू नयेत. गोडसे भटजींचा मृत्यू १९०६ साली झाला, आणि वैद्यांनी १९०७ साली प्रथम प्रकाशन (पदरचा बराच मसाला घालून) केलं. पुढे १९२२ साली त्यांनी गोडसे भटजींनी लिहिलेले मूळ मोडी ताव भाइसं मंडळाच्या स्वाधीन केले, त्यामुळे आज आपल्याला मूळ प्रत वाचायला मिळते!  

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

अतिशय छान लेख. पुन्हा वाचणार. भांडारे आणि देशपांडे यांच्या लेखाबद्दलही माहिती मिळाली आबा, धन्यवाद.
आबा रॉक्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचंड अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतो आणि मग अजून लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख. पुन्हा एकदा वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच छान. शाळेत असताना वाचलं होतं. नव्याने वाचलंच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्टर पिस आहे आबा. लेख खाली ठेववलाच नाही. अतिशय सुसूत्र व इनसाईटफुल लेखन. एकही शब्द अधिक-ऊणा नाही.
..
गोडसे भटजी तर आदरणियच वाटले. पैशाला देव न माणणारे, श्रद्धाळू, प्रारब्धावरती विश्वास असलेले, आणि कर्तबगारही आहेतच की. पैसे लुटुन नेल्यानंतर हताश न होता चाणाक्षपणे तीर्थयात्रा उरकून परत प्रयाण करण्याचे चातुर्यही राखून आहेत. अमुक एका वर्गाचे आपण कायमचे देणेकरी राहीलो वगैरे लहान सल, त्यांची अर्थशुचिता, नीतीमत्ता, श्रद्धाच तर दाखविते.
.
माझा प्रवास' हे पुस्तक अगदी समर्थपणे, आर्थिक अंगाने उलगडून दाखवलेत आबा. _/\_.
______________________

संपादक-per-defaltam रा रा श्री अमुकराव आणि मेघना भुस्कुटे यांचे औपचारिक आभार मानले तर मला ते लय मारतील. ते ऋण व्यक्त करून थांबतो.

खूप छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदूबाळ यांनी गोडसे भटजींचा आदर्श ठेऊन विलायतेतील जीवनाविषयी राहणंवर्णन लिहावे अशी त्यांना प्रार्थना करूयात काय? ( या विषयी गाइडे खूप झाली . बोर आहेत ) संदर्भ व प परिप्रेक्ष्य बदलले असले तरीही इथे लेखणी झिजवायला स्कोप आहे असे वाटते . कसें ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह. लेख प्रचंड आवडला आबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आदूबाळ, उत्तम लेख आणि लेखमाला. लेख चांगला असला की भाषेकडे फार लक्ष जात नाही; म्हणून मुद्दाम लेख बरेचदा वाचला. भाषाही आवडली.

या लेखाच्या निमित्तानं पुस्तक पुन्हा वाचलं जाईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोडीतून आलेली शब्दांची लघुरूपं - साो = साहेब, मुलीसुाा = मुलीसमवेत, यात देवनागरी वाचकांना एक जास्तीचा काना दिसतो. तो काना आहे का दंड? दंड असेल तर मोडीत पूर्णविराम वापरतात का दंड? दंड वापरत असतील तर मराठीत दंड न वापरता, पूर्णविराम वापरण्याचं साधर्म्य दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काना का दंड प्रश्नाचं उत्तर जंतूंनी दिलं आहे.

मोडीत पूर्णविराम वापरतात का दंड

मोडीत विरामचिन्हं वापरण्याची फारशी पद्धत नव्हती. एवढेच काय, दोन शब्दांत spaceही देत नसत. मोडीतच नव्हे, बाळबोध (=देवनागरी) लिपीत लिहिलेल्या मराठी/संस्कृत हस्तलिखितांतही विरामचिन्हांची आणि विशेषतः space ची पत्रास फार बाळगत नसत. इंग्रजांना अक्षरशः सरकारी नियम करावा लागला निदान पूर्णविराम म्हणून दंड वापरा आणि शब्दांत अंतर सोडा असा.

दंड वापरत असतील तर मराठीत दंड न वापरता, पूर्णविराम वापरण्याचं साधर्म्य दिसतं.

या वाक्याचा अर्थ नीटसा लागला नाही. पण मराठीत एके काळी दंड हाच पूर्णविराम होता. स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अवतरणचिन्ह इ. चिन्हं इंग्रजीतून मुद्दाम मराठीत आणायचे प्रयत्न मिशनरी वगैरे लोकांनी केले. त्यांच्याबरोबर इंग्रजी पूर्णविराम (.) मराठीत शिरला आणि दंड जुन्या कवितांपुरता उरला।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा!! काय लेख! काय अभ्यास!!
जबरदस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अत्यंत सुंदर झाला आहे लेख.

अशा दृष्टीने पुस्तकाचा विचार करणे भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अप्रतिम लेख ! गोडसे भटजींचं हे पुस्तक इतकं भारी आहे, पण यावर अजून कुठलीच फिल्म / डॉक्युमेंट्री वगैरे का झाली नाही याचं आश्चर्य गेली अनेक वर्षे वाटत राहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

__/\__
घाई घाईत वाचला, पण आता मूळ पुस्तक आधी आवर्जून वाचून परत हा लेख वाचावा लागेल.
सहित्य समीक्षेच्या आणि रसग्रहणाच्या त्याच त्याच प्राध्यापकी लेखांनी वीट आणला आहे. आबांनी मात्र बॅलन्स शीट (आणि कॅश फ्लो) आणून कमाल केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

बाय द वे आदुबाळ यांच्यासाठी एक प्रश्न आहे. डबल एण्ट्री अकाउंटिंग सिस्टिमचा शोध कुठे आणि केव्हा लागला? न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधाइतकाच क्रांतीकारी शोध आहे तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लुका पाच्योली (Luca Paciolli) या इटालियन मनुष्याने ही सिस्टीम प्रचारात आणली असे माझे अकौंटिंगचे आद्यगुरू सांगायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

येस....

https://en.wikipedia.org/wiki/Luca_Pacioli

He is referred to as "The Father of Accounting and Bookkeeping" in Europe and he was the first person to publish a work on the double-entry system of book-keeping on the continent

"Accounting practitioners in public accounting, industry, and not-for-profit organizations, as well as investors, lending institutions, business firms, and all other users for financial information are indebted to Luca Pacioli for his monumental role in the development of accounting."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डूप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख आवडला (शैली आणि विश्लेषणही)

काही मुद्दे -

हातातोंडाची गाठ असलेल्या गरीब दखनी ब्राह्मण वर्गाबद्दल मात्र गोडसे भटजींच्या लेखनात काही सापडत नाही.

ह्या वर्गाकडून गोडसे भटजींना मिळण्यासारखं काही नाही, किंबहुना ते त्यांचे स्पर्धक असतील, किंवा त्यांनाच गोडसेंसारख्यांकडून द्रव्याची अपेक्षा असेल. म्हणून तर त्यांचा उल्लेख नसेल? म्हणजे गोडसेंच्या दृष्टीनं त्यांच्यात पुरेशी रोचकता नसल्यामुळे?

'मुलीसुाा' म्हणजे 'मुलीसमवेत'. 'याप्राो' म्हणजे 'याप्रमाणे'. 'साहेब'चं लघुरूप 'साो'. उदा० बाळासाो

इथे एक प्रश्न पडला. माझा असा समज होता की शब्दातल्या न लिहिलेल्या भागातले काने-मात्रे लघुरूपात येत. उदा. 'याप्रमाणे'मधून 'माणे' काढले तर त्यांचे कानेमात्रे ा आणि े. तसंच 'साहेब'मधून 'हेब' काढता राहिले े आणि ा. आता, हे तर्कशास्त्र वापरून 'समवेत'मधून 'मवेत' काढू जाता उरतील ते कानेमात्रे ा, े आणि पुन्हा ा. मग हा ु कुठून आला?

इथे लक्षात घेतलं पाहिजे, की मुख्यमंत्र्याने विठ्ठलाची पूजा करणं किंवा कुंभात स्नान करणं यासारखी ही लोकानुनयी कृती नाही. इथे राज्यकर्त्यांची अनुष्ठानांच्या परिणामांवर श्रद्धा आहे!

माझ्या मते अशा श्रद्धेच्या मागेसुद्धा आर्थिक किंवा व्यवहाराचा हेतू असे. म्हणजे,

  1. राजा गोब्राह्मणप्रतिपालक आहे हे प्रजेला सतत दिसत राहायला हवं.
  2. त्यात आर्थिक 'ट्रिकल-डाऊन' विचार आहे. अशानं प्रजा आपसूक राजाच्या बाजूची होईल, असा विचार राज्यकर्ता वर्ग करत असणार. आणि अर्थात,
  3. सत्ताधारी (क्षत्रिय) वर्गाला सतत भीती दाखवत राहणं (तुम्ही ब्राह्मणाला दानधर्म केलात तर पुण्य मिळेल; तुमच्या राज्याचं भवितव्य चांगलं होईल वगैरे) ह्यात ब्राह्मण वर्गाचा व्यवहार होताच. त्यामुळे ही श्रद्धा एक प्रकारे व्यवहारी हेतूनं राज्यकर्त्यांमध्ये जोपासली जाई.
  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुलीसुाा हे मुलीसुद्धा या शब्दाचं लघुरूप आहे. सुद्धा हा प्रत्यय जुन्या (पुस्तक लिहिले त्या) काळात समवेत या अर्थी वापरात होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या मालेतले सगळेच लेख आवडत आहेत, हा विशेषच आवडला.
सविस्तर लिहिते नंतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ पुस्तक कुठे मिळेल ? बुकगंगा आऊट ऑफ स्टॉक म्हणतंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुकगंगा आऊट ऑफ स्टॉक म्हणतंय

पहिली आवृत्ती इथे.
राजहंस प्रकाशनाची आवृत्ती उपलब्ध नाही, पण व्हीनसची इथे दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अण्णा, त्याआधी प्राची देशपांडेंचा लेख वाचा असं सुचवेन.

चिं वि वैद्यांनी मूळ संहितेत काही बदल केले. ते कसे आणि का हे देशपांडेंच्या वरील लेखात आलं आहे. आशयात फारसा फरक नसला तरी वैद्यप्रतीतले गोडसे भटजी जरा 'holier than thou' वाटतात. त्यामुळे मृणालिनी शहांनी मूळ मोडीवरून बाळबोधीत आणलेली राजहंस आवृत्ती मूळ गोडसे भटजींशी सर्वात प्रामाणिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जंतु धन्यवाद . ही आवृत्ती म्हणजे वैद्य यांनी बदल केलेली असेल ना ?
तसं असेल तर राजहंसची मूळ आवृत्ती घेण्याकरिता थांबेन म्हणतो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही आवृत्ती म्हणजे वैद्य यांनी बदल केलेली असेल ना ?

हो.

तसं असेल तर राजहंसची मूळ आवृत्ती घेण्याकरिता थांबेन म्हणतो .

जर आउट ऑफ प्रिंट असेल तर फोटोकॉपी मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी काम झालय.
मूळ पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही.
जमाखर्चाच्या नोंदी करताकरता त्याच पानावर घटनांची नोंद केलेले बाड एकाने राजवाडेंकडे सोपवले आणि नवा इतिहास लिहिला गेला हे माहिती आहेच. तर इथे प्रत्येक पानावर दिनांक आणि नोंद याशिवाय अधिक चांगले पुरावे कुठे असणार?
गोडसे भटजीं फारच मजेदार माणूस दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर इथे प्रत्येक पानावर दिनांक आणि नोंद याशिवाय अधिक चांगले पुरावे कुठे असणार?

प्रत्येक पानावर दिनांक आणि नोंद अशी डायरी-पद्धत इथे नाही. तारखांचा हिशोब संदर्भाने लावावा लागतो. उदा० झाशी पडली त्या दिवसाचं वर्णन गोडसे भटजी करतात. तो दिवस ३ एप्रिल १८५८ हे बाह्य संदर्भाने कळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाही, माझं वाक्य चुकलय.
इथे म्हणजे 'जमाखर्च लिहिण्याच्या वहीशिवाय' , या गोडसेंच्या कथानकात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. अगदी अभ्यासपूर्ण, सिस्टमटीक मांडणी आहे.

काही शंका:
१. गोडसे भटजींचा लेखाजोखा कितपत विश्वसनीय, क्रॉस वेरिफायेबल आहे? म्हणजे त्याच काळातली इतर पुस्तक (खासकरून इतर जातीतल्या माणसाने लिहलेली) 'दखनी ब्राह्मण समाजा'ला कशी बघत होती?
२. > पेशवे किंवा राणीसारख्या सरंजामी वर्गाला गेलेली दौलत परत मिळण्याची शक्यता होती. एका सोन्याच्या वळ्यासारख्या गोष्टींनी त्यांचं काही अडणार नव्हतं. पण गोडसे भटजींसारख्या मध्यमवर्गीयासाठी सोन्याचं वळं ही तुलनेने दुष्प्राप्य आणि म्हणून मोलाची वस्तू होती. म्हणून एवढा कडेकोट बंदोबस्त! > पेशवे/ राणी इंग्रजांच्या हल्ल्यामुळे 'पळून जात' होते. गोडसे व्यवस्थित प्लान करून 'प्रवासाला निघालेत'. त्यांच्यासोबत असलेल्या समानची तुलना त्यांच्या आर्थिक वर्गावरून नाही तर ज्या परिस्थितीत घराबाहेर पडलेत त्यावरून करावी लागेल.
३. > 'पैशासाठी पोरीला विकलं'. > हे काही झेपलं नाही.गोडसेनी कर्ज कशासाठी काढली होती? हुंडा देऊन मुली/बहिणीची लग्न करून द्यायला? कि पुरुष सदस्यच्या लग्नातील खर्चचा वाटा उचलायला? गोडसे आणि तांबे एकाच जात, भौगोलिक ठिकाणचे होते का? त्यांच्यात सगळ्या कस्टम्स सारख्या होत्या, आणि तांबेनी त्या मोडून 'मुलगी विकायला काढली?'
एकंदर तू म्हंतोय्स तसं holier than thou, सरंजामकडून फायदे उकळून घ्यायचे आणि मग त्याला पीठपिछे नावं ठेवायची प्रवृत्ती जाणवत आहे.
४. > पण डगमगून न जाता भिल्लांनाच शास्त्रार्थ सांगून त्यांच्याकडून तीन रुपये दक्षिणा कमावतात! > हौ स्मार्ट!!
५. > अगदी ते सुप्रसिद्ध 'भंगीण-पद्मिणी'चं ऐकीव गॉसिप सांगतानाही त्या नारायण शास्त्रीबाबांना किती पगार होता, आणि त्यांनी नेमके किती पैसे देऊन त्या भंगिणीच्या पोरीला पटवलं याचे तपशील द्यायला गोडसे भटजी विसरत नाहीत. > हा भंगिण किस्सा मी कुठेतरी वाचलाय पण नीट आठवत नाही.
६. इतर कोणकोणत्या जातीचे उल्लेख आले आहेत? त्यांना कसं रेखाटलं आहे?
७. त्याकाळच्या स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,वैयक्तिक स्थितीची जातीनुसार तुलना करता येईल इतपत माहिती आहे का या पुस्तकात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'माझा प्रवास'मधील काही भाग 'पॉर्न ओके प्लीज'मध्ये पुनर्मुद्रित केला होता.
१. भंगिणीची गोष्ट,
२. आणखी काही उतारे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>'पैशासाठी पोरीला विकलं'.

हे गोडशांबाबत नसून तांब्यांबाबत आहे. नपुंसक/क्रॉसड्रेसर असणाऱ्या इसमासोबत केवळ तो पैसेवाला असल्यामुळे आणि स्वत:लाही पैसा पुरवणार असल्याने मुलीच्या बापाने आपल्या तडफदार मुलीचं त्या इसमाशी लग्न लावून दिलं.

तांबे आणि गोडसे एका जातीतले नाहीत.

ही काही नेहमी घडणारी रूढी नसेल. पण असेही बाप असतीलच (प्रत्येक काळात).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अदिती,
लिंकसाठी आभार.

===
नितीन,
हो गोडशांबाबत नसून तांब्यांबाबत आहे हे लक्षात आलेलं. म्हणूनच विचारतेय कि गोडसेंच्या घरात, जातीत, भौगोलिक प्रदेशात लग्नाच्या काय रूढी, परंपरा होत्या?

तांबे आणि गोडसे एका जातीतले नाहीत, एका प्रदेशातले नाहीत, एक वर्गदेखील नाही. तर त्याच्या रुढीच वेगळ्या आहेत असेदेखील असू शकते. कुणबी लोकात Bride Price पूर्वीपासून घेतले जाते असे ऐकले आहे. काही मराठा कम्युनिटीत मातृसत्ताक पद्धत होती असेदेखील वाचले आहे. श्रीमंत घराण्यात लग्न ठरवताना, एकुलतीएक मुलगी असेल तर, पैसा-मालमत्ता-राजसत्ता सगळेच फार मॅटर करते.

१८५७ नंतरचा काळ असला तरी ताराबाई शिंदेंच्या नवरा घरजावई होता वाचले, मराठा जात? रखमाबाई राऊत सुतार जात, नंतर घटस्फोट घेतला असला तरी त्याआधी नवरा त्याच्या सासरीच रहात होता.

===
८. > सात-आठ लक्ष रुपये दानधर्म होणार म्हणून आठ-नऊ हजार दखनी ब्राह्मण तिथे जमले होते. > परवाच १८७७ दुष्काळबद्दल वाचत होते. दिवसभर रेल्वेरूळ टाकायचे काम केल्यास ४५० ग्राम धान्य किंवा (कि आणि?) १ आणा मिळायचा. इथे माणशी १०० रुपये मिळतायत, १८५७ मधे, काही काम न करता. बरंय... आणि त्या पवारांकडे कुठून आले एवढे पैशे दानधर्म करायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो लेख वाचला. त्यात भंगीणबद्दल काही उल्लेख दिसला नाही

पुन्हा वाचून पाहा; सापडेल कदाचित. हा दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ही रूढी कॉमन नसावीच पण विसाव्याशतकाच्या आरंभी येणाऱ्या (पुण्या-मुंबईच्या) ब्राह्मणी नाटकात (उदा. संगीत शारदा) पैसा आहे म्हणून (म्हातारा नवराच मुलीच्या बापाला पसे देणार म्हणून) मुलींचे बाप म्हाताऱ्यांशी आपल्या नऊ-दहा वर्षीय मुलींची लग्ने लावून देतात हे उल्लेख दिसतात. तर तशा घटना त्या आधी ५० वर्षे घडत असतील असे म्हणता येईल. नहाण येण्याच्या आत मुलीचे लग्न व्हायला हवे या प्रेशरखाली असणाऱ्या बधुपित्यांकडून हे घडणे शक्यही आहे. सो इथे गोडशांच्या जातीतही हे घडत असावे. बाकी तेव्हा तांब्यांच्या बाबतीत "संस्थानिकाकडून आलेली ऑफर नाकारणे अशक्य" अशीही कुचंबणा असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाकी तेव्हा तांब्यांच्या बाबतीत "संस्थानिकाकडून आलेली ऑफर नाकारणे अशक्य" अशीही कुचंबणा असू शकेल.

हा मुद्दा फार इनसाईटफुल आहे. पॉवरप्ले. हे मला सुचलं नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नितीन,

बालजरठ विवाह पद्धत कोणकोणत्या जातीत आणि किती कॉमन होती काय माहित.
म्हाताऱ्या पुरुषांकडे पैसा आहे म्हणून + पाळी यायच्याआत जर मुलींचे लग्न झाले नसेल तर सामाजिक स्टिग्मा होता म्हणून + ४-५ पोरी असतील तर त्या पटपट उजवून टाकायच्या म्हणून अशी लग्न व्हायची हे माहित आहे.
तुम्ही म्हणता तसे "संस्थानिकाकडून आलेली ऑफर नाकारणे अशक्य" अशीही कुचंबणा असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. गोडसे भटजींचा लेखाजोखा कितपत विश्वसनीय, क्रॉस वेरिफायेबल आहे? म्हणजे त्याच काळातली इतर पुस्तक (खासकरून इतर जातीतल्या माणसाने लिहलेली) 'दखनी ब्राह्मण समाजा'ला कशी बघत होती?

असं (म्हणजे १८५७ कालीन) लेखन माझ्या वाचनात तरी आलं नाहीये. ब्राह्मणेतर पर्स्पेक्टिव्ह पाहण्यासाठी सर्वात जवळचा स्रोत म्हणजे 'ब्राह्मणांचे कसब' हा फुल्यांनी १८६९मध्ये लिहिलेला पोवाडा. (माहीती थोडी, मिजाज बडी, भोगिती नित्य आरामास, पुरविती हक्क पेनशनीस, वगैरे.)

पेशवे/ राणी इंग्रजांच्या हल्ल्यामुळे 'पळून जात' होते. गोडसे व्यवस्थित प्लान करून 'प्रवासाला निघालेत'. त्यांच्यासोबत असलेल्या समानची तुलना त्यांच्या आर्थिक वर्गावरून नाही तर ज्या परिस्थितीत घराबाहेर पडलेत त्यावरून करावी लागेल.

नाही. इथे चर्चा चालू आहे ती 'परचक्र आल्यावर पळून जाणे' या गोष्टीची. साध्यासुध्या प्लॅन्ड प्रवासाची नव्हे. शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे : गोडसे भटजी जेव्हा फाटकी लंगोटी, बन्यान वगैरे जामानिमा करतात तेव्हा ते आगोदरच लुटले गेले आहेत. त्यांच्या प्लानचा, तयारीचा बट्ट्याबोळ झालेला आहे.

गोडसेनी कर्ज कशासाठी काढली होती? हुंडा देऊन मुली/बहिणीची लग्न करून द्यायला? कि पुरुष सदस्यच्या लग्नातील खर्चचा वाटा उचलायला? गोडसे आणि तांबे एकाच जात, भौगोलिक ठिकाणचे होते का? त्यांच्यात सगळ्या कस्टम्स सारख्या होत्या, आणि तांबेनी त्या मोडून 'मुलगी विकायला काढली?'

कर्जं स्त्री-पुरुषसदस्यांच्या लग्नकार्यांसाठी काढली होती. गोडसे आणि तांबे एकाच जातीचे (ब्राह्मण) होते. (गोडसे कोकणस्थ आणि तांबे कऱ्हाडे हा पोटभेद सोडून देऊ.) ते दोघेही एकाच भौगोलिक ठिकाणचे (दख्खन) होते.

मुख्य मुद्दा वेगळा आहे. लग्नातल्या दोहो पार्ट्यांची आर्थिक सामाजिक स्थिती समान असेल तर प्रश्न नाही. ती असमान असली तर काही तडजोडी समाजमान्य होत्या. उदा० मुलीचा बाप निर्धन असेल तर 'नारळ आणि मुलगी' देऊन लग्न करणे (संदर्भ : 'तुंबाडचे खोत'.) असमान स्थितीत आपल्या व्याह्याला आपल्या बरोबरीला आणण्यासाठी प्रयत्न करणे हे कॉमन असावं.

पण गोडसे भटजी holier than thou सुरात लिहीत नाहीत एवढं नक्की. ते ही घटना त्याकाळच्या सर्वसामान्य प्रथेचं वर्णन करावं अशा सुरात सांगतात. आजच्या चष्म्यातून पाहिल्यास आपल्याला त्यातला 'व्यवहार' जाणवतो एवढंच.

६. इतर कोणकोणत्या जातीचे उल्लेख आले आहेत? त्यांना कसं रेखाटलं आहे?

हा खूप मोठा विषय आहे. अनेक जातींचे लोक गोडसे भटजींच्या वर्णनात येतात. पण गोडसे भटजी discriminating किंवा सरसकट पूर्वग्रहदूषित झालेले दिसत नाहीत. (उदा० अमुकतमुक जातीचे लोक 'असलेच असतात' वगैरे विधानं ते करत नाहीत.)

७. त्याकाळच्या स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,वैयक्तिक स्थितीची जातीनुसार तुलना करता येईल इतपत माहिती आहे का या पुस्तकात?

नाही. कदाचित माझं लक्ष त्याकडे गेलं नसेल अशीही शक्यता आहे. तू वाच आणि असं काही जाणवलं तर जरूर लिही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१. ठीक.
२. माझ्या वाचण्यात गफलत झाली. गोडसेंचेदेखील पळ काढतानाचेच वर्णन आहे.
३. > गोडसे आणि तांबे एकाच जातीचे (ब्राह्मण) होते. (गोडसे कोकणस्थ आणि तांबे कऱ्हाडे हा पोटभेद सोडून देऊ.) > वर्ण एक, जात वेगळी ना? पण ठिकय.रूढी सारख्याच असतील.
> ते ही घटना त्याकाळच्या सर्वसामान्य प्रथेचं वर्णन करावं अशा सुरात सांगतात. आजच्या चष्म्यातून पाहिल्यास आपल्याला त्यातला 'व्यवहार' जाणवतो एवढंच. > 'पैशासाठी पोरीला विकलं' हे पुस्तकातलं वाक्य आहे ना?
६. ठीक.
७. ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पैशासाठी पोरीला विकलं' हे पुस्तकातलं वाक्य आहे ना?

नाही नाही. ही माझी मल्लिनाथी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओह्ह अच्छा.

आधीच्या एका प्रतिसादात लिहल्याप्रमाणे रिव्हर्स हुंडा किंवा ब्राईड प्राइस हा प्रकार कुणबी जातीत होता, आहे.
या रुढीला 'मुलगी विकणे' समजणे अयोग्य होईल. हे थोडंस केरलातल्या नायर स्त्रिया वेश्या होत्या म्हणण्यासारखं आहे.

> या व्यवहाराबद्दल राणीचं स्वतःचं काय मत होतं याविषयी मला कुतूहल आहे. एकंदरीत त्या काळची सामान्य रूढी म्हणून तिनेही मनात कटुता न ठेवता ते मान्य केलं असावं. कारण पुढे एके ठिकाणी तिने स्वतःच अशा 'रिव्हर्स-हुंडा' प्रकारच्या एका विवाहाला उत्तेजन दिल्याचं गोडसे भटजी नोंदवतात. स्त्रीमुक्ती आणि सुधारकी विचार मराठी लोकांपासून १८५७ किती लांब होता हे इथे दिसतं. > छे उलट जर राणी, तिचे वडील 'मुलीला स्वतंत्र शहरात वाडा, कामासाठी आचारी, पाणके, ब्राह्मण, कारकून वगैरे सर्व मनुष्ये' अशा अटी ठेऊन, त्याकाळात लग्न करत, लावत असतील तर आताच्या मराठी अंतर्जालावरच्या बाणेदार स्त्रीवादी जे 'मुलाचा स्वतंत्र 2bhk, दालआटासाठी महिना ४० हजार पगार हवा' वगैरे म्हणतात ते सेमच झालं कि! म्हणजे एकतर तांबे पुढारलेले होते किंवा आताचे स्त्रीवादी मागासलेले आहेत Biggrin

> पुढे मोरोपंत तांबे यांचे लग्नही ठरावाप्राो६ करून दिल्हे.' या विवाहामुळे मोरोपंत झाशीचे 'किंगमेकर' झाले. > हे काये? सासर्याचे लग्न लावून दिले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदूबाळ, तुम्ही लिहिलेल्या एका मुद्द्यावर माझे आकलन वेगळे आहे. मला वाटते की अर्धा शेर तांदूळ हे राणीच्या लढाईनंतरच्या स्थितीला/वाताहतीला उद्देशून नाही.
तुम्ही लिहिले आहे " ... इतिहासातले काही मानवी प्रसंग काळजाला हात घातल्याशिवाय राहत नाहीत... झाशी पडल्यावर गोडसे भटजी काल्पीच्या दिशेने निघतात. त्याच वाटेत त्यांना परागंदा झालेली राणी लक्ष्मीबाई भेटते. एके काळी केशरबदाम घातलेलं सुवासिक पाणी आंघोळीला वापरणारी राणी गोडसे भटजींना सांगते, की आता मी 'अदशेर आट्याची धनीण' उरले आहे. राणीच्या आयुष्यातल्या वाताहतीचं यापेक्षा नेमकं, हृद्य वर्णन सापडणं कठीण आहे."
मी वैद्यांच्या प्रतीत असे वाचले आहे : "नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की मी अर्धा शेर तांदुळाची धनीण, मजला रांडमुंडेस विधवा धर्म सोडून हा उद्योग करण्याची काही जरूर नव्हती. परंतु हिंदुधर्माचा अभिमान धरून ह्या कर्मास प्रवृत्त झालें, व याजकरिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोडिली".
माझे आकलन असे आहे की राणीचे म्हणणे असे की राज्याच्या भानगडीत न पडता विधवेप्रमाणे विरक्त जीवन जगण्यास तिला अर्धा शेर तांदळाचा वाटा पुरेसा होता (आणि तो आजन्म मिळालाही असता). परंतु केवळ धर्मरक्षणासाठी तिने बंडाचा झेंडा हाती घेतला, राज्याधिकार/विलासासाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

या वाक्याच्या आकलनाविषयी मला प्रश्न आहेच, आणि मी विविध लोकांकडून विविध मतं ऐकली आहेत.

मतांकडे जाण्याआधी मूळ टेक्स्ट बघू :

वैद्यप्रत : "नंतर मोठ्या निराश मुद्रेनें बोलल्या कीं, मी अर्धा शेर तांदुळाची धनीन, मजला रांडमुंडेस विधवा धर्म सोडून हा उद्योग करण्याची काही जरूर नव्हती. परंतु हिंदुधर्माचा अभिमान धरून ह्या कर्मास प्रवृत्त झालें, व याजकरिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोडिली."

फाटकप्रत : "नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की, मी अर्धा शेर तांदुळाची धनीण, मजला रांडमुंडेस विधवाधर्म सोडून हा उद्योग करण्याची काही जरूर नव्हती. परंतु हिंदुधर्माचा अभिमान धरून ह्या कर्मास प्रवृत्त झाले, व याजकरिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोली."
(आ.बा. : शुद्धलेखनाचा बदल वगळता काही फारसा फरक नाही.)

पोतदारप्रत आणि राजहंसप्रत : "मी अदशेर आट्याची धनीन आहे. मजला रांडभुंडेस काही येक गरज नव्हती. परंतु सर्व हिंदुबदलचा धर्मसमंधे अभिमान धरून कर्मास प्रवृत्त झाले."
(आ.बा. : तांदुळाचा आटा झाला आहे! विधवाधर्म आणि 'वित्ताची जीविताची आशा' हे वैद्यांनी घुसडलेलं दिसतं आहे, जे मूळ मोडी टेक्स्ट मिळाल्यावर गळून पडलं!)

माझे आकलन असे आहे की राणीचे म्हणणे असे की राज्याच्या भानगडीत न पडता विधवेप्रमाणे विरक्त जीवन जगण्यास तिला अर्धा शेर तांदळाचा वाटा पुरेसा होता (आणि तो आजन्म मिळालाही असता). परंतु केवळ धर्मरक्षणासाठी तिने बंडाचा झेंडा हाती घेतला, राज्याधिकार/विलासासाठी नाही.

शैलेन भांडारेंचंही हेच मत आहे. त्यांनी लिहिलं आहे "हे राणीचे उद्गार ती मूळचीच अर्ध्या हिश्श्याची मालकीण होती, म्हणजे तिच्या पतीच्या हिश्शात तिचा वाटा इतपतच तिची लायकी होती, हे सूचित करणारे आहेत. कारण ती या वाक्याच्या पुढे मला या भानगडीत पडायची गरज नव्हती पण “हिंदू धर्माचा अभिमान” धरून मी यात पडले वगैरे सांगते. इथे अर्थातच ‘अभिमान’ म्हणजे तिला तिच्या विहित धर्मकार्यापासून इंग्रजांच्या धोरणामुळे चळावे लागले हा भाग तिला सांगायचा आहे."

पण मला हे पटत नाही, कारण :
- हिंदू धर्माचा अभिमान वगैरे ठीकच. पण राणीही काही 'विहित धर्मकार्ये' वगैरे व्यवस्थित पाळत होती असं नाही. तत्कालीन रूढीप्रमाणे तिने केशवपन करायला हवं होतं. त्याऐवजी पैसा आणि सत्तेच्या जोरावर 'कृच्छ्रे' वगैरे शॉर्टकट मारणं चालू होतं.
- हाच पैसा आणि सत्ता कंपनीच्या धोरणामुळे धोक्यात आली. हाच राणीच्या बंडाचा ट्रिगर होता असं अन्य साधनांवरून दिसतं.
- भांडाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिचा वाटा जरी अर्धा असला (आणि उरलेला तिच्या दत्तकपुत्राचा असला), तरी प्रॅक्टिकली स्पीकिंग ती पूर्णच वाटा उपभोगत होती.

म्हणजे "परंतु केवळ धर्मरक्षणासाठी तिने बंडाचा झेंडा हाती घेतला, राज्याधिकार/विलासासाठी नाही." ही राणीची मखलाशी गोडसे भटजींना पटली असेल कदाचित, पण आपण पटवून घ्यायचं काही कारण नाही.

मग उरतो तो अदशेर आटा.

माझं आकलन चुकतही असेल, पण तीसेक पानं अलिकडे राणीच्या विलासी आंघोळ-वर्णनाच्या पार्श्वभूमीवर 'अदशेर आटा' मनाला चावून गेला, इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुळात जर ' अदशेर आटा' आहे तर त्याचा ' तांदुळाचा वाटा' का करावा? उत्तर हिंदुस्थानात पूर्वापार गहू प्रचलित आहे. रोटी हा आम शब्द आहे. घर की बेटी और रोटी घर की इज्जत होती है टाइपच्या म्हणी प्रचलित आहेत. पलायन करावे लागलेली राणी अदशेर तांदुळापेक्षा किंवा रियासतीतल्या अर्ध्या वाट्यापेक्षा अधिकतर अदशेर आट्यालाच मोताद असू शकते
लेख अतिशय आवडला हेवेसांनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाशी (झाँसी) भलेही उत्तर हिंदुस्थानात असेल, नि तिथे गहू पूर्वापार प्रचलित असेल. परंतु राणी कऱ्हाडे ब्राह्मण होती, हे विसरू नका! हे लोक एक वेळ प्राण सोडतील, पण भात खाणे सोडणार नाहीत. किंबहुना, एक वेळ झाशी देतील (गिव्ह अप करतील), पण तांदूळ गिव्ह अप करणार नाहीत.

किंबहुना, गिव्हन द्याट, अर्धा शेर तांदूळ म्हणजे खरे तर खूपच कमी झाले. (काय भाताचे ढीग उपसतात लेकाचे!) बिचाऱ्या राणीचे हाल होत असले पाहिजेत.

- (झाशीच्या राणीचा (आईच्या बाजूने) तथाकथित वंशज) 'न'वी बाजू.

..........

आणि तशीसुद्धा, टेक्निकली झाशीची राणी असली, तरी लग्न होऊन झाशीला आलेली, म्हणजे झाशीत तशी उपरीच. फर्स्ट जनरेशन इमिग्रंट. त्यामुळे, झाशीत पूर्वापार गहू चालत असेलही, परंतु त्याच्याशी तिचा काय संबंध? पण असो. हा मुद्दा त्या मानाने गौण आहे.

पण त्या भाताच्या ढिगावर आमटीच्या नावाखाली जो काही द्रव ओतून खातात, त्यात मात्र डाळ सूक्ष्मदर्शित्राने शोधावी लागते. असो चालायचेच.

झाशीची राणी ही माझ्या आईच्या खापरपणजीची सख्खी बहीण की अशीच कोणीतरी होती, असे माझ्या लहानपणी (आणि फॉर्दॅट्मॅटर मोठेपणीसुद्धा, किंबहुना माझी म्याटर्नल आजी हयात असेपर्यंत) माझ्या म्याटर्नल आजीकडून मला असंख्य वेळा सांगण्यात आलेले आहे.३अ (पण तसे पाहिले तर सगळेच कऱ्हाडे ब्राह्मण झाशीच्या राणीशी ओढूनताणून काही ना काही नाते सांगतात म्हणा.) या (आणि इतरही अनेक) कारणांस्तव, झाशीची राणी३ब हे एक फिक्टीशियस क्यारेक्टर असावे (जे बहुतकरून कऱ्हाडे ब्राह्मणांनी सेल्फ-ग्लोरिफिकेशनसाठी आपल्या सुपीक कल्पनाशक्तीतून३क प्रसवून पसरविले असावे), अशी एक जबरदस्त शंका माझ्या मनास बहुत काळापासून भेडसावीत आहे.

३अ त्याचबरोबर, (अ) ज्या मुलाला पाठीशी घेऊन तिने उडी मारली, तो तिचा दत्तक मुलगा नसून पोटचा मुलगा होता, आणि (ब) ती पोर्तुगीजांबरोबर लढली, असेही माझ्या त्याच आजीने एकदा ठामपणे सांगितले होते, त्यामुळे... असोच.

३ब आणि बहुधा जयंत नारळीकरसुद्धा.

३क कऱ्हाडे ब्राह्मणांच्या संदर्भात तेवढी एकच गोष्ट सुपीक.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा, अशा रीतीने तुमच्या ( बहुधा) बाणेदार , साहसी आणि रोखठोक स्वाभिमानी (बहुधा ) व्यक्तिमत्वाचे रहस्य (बहुधा) थोडेसे उलगडले असावे.
शेवटी झाशीच्या राणीचा खापर खापर भाचा म्हणल्यावर हे सगळे ओघानेच आले. इतके दिवस आम्ही उगाचच या सद्गुणांचे क्रेडिट तुम्हाला देत होतो.

आता असे कुणी या पिढीत आहे याची (बहुधा) कु. कणगणा राणावत दखल घेईल काय ? ( नाही घेणार बहुधा , कारण नाव व काहीच माहीत नसलेल्या व्यक्तीवर बायोपिक कसा बनवणार, हे माहीत असूनही हा प्रश्न मनात आला) असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिमत्वाचे रहस्य (बहुधा) थोडेसे उलगडले असावे.

नाय वाटत तसं. उलट हा रहस्य अधिक गडद करण्याचा प्रयत्न असावा.

संस्थळीय रद्दी काढून शोधल्यास कुठेतरी त्यांनीच ते सरोजिनी नायडू किंवा लाचित बडफुकन किंवा आंडाळ यांचे वंशज असल्याचंही नोंदवलं असेल. किंवा नसेलही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खवचट देणारे कोण रे ते ? न बा असं करतील असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोडसे भटजींच्या मूळ text साठी धन्यवाद. राणी आपल्या राज्यासाठी लढत होती हे तर नक्की. पैसे मिळवणे हा एक हेतू असेलच. ती स्वतः धर्मातून पळवाटा काढत असली तरी सार्वजनिक स्तरावर हिंदुधर्माचे रक्षण करणे हाही तिच्या राज्यासाठी लढा उभारण्याचा एक हेतू असेल ह्याबद्दल शंका घेववत नाही. उदाहरणार्थ राणीला किल्ल्यातून शहरातल्या वाड्यावर घालवून दिल्यावर इंग्रजांनी झाशीतली पूर्वापार चालत आलेली गोवधबंदी उठवली. राणी व व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांनाही इंग्रज बधले नाहीत. सत्ताहीन राणी अगतिकपणे बघण्यापलीकडे काही करू शकली नाही. आपले राज्य परत मिळवणे हा हिंदूंची (आणि स्वतःचीही) ही अगतिकता नष्ट करण्याचा एक मार्ग होताच.
"अदशेर आट्याचे" दुसरे एक आकलन मला शक्य वाटते ते असे की पूर्वी सैनिक स्वतःबरोबर आपला शिधा बाळगत असत तो असाच अर्धा शेर आटा वगैरे असावा. इथे "अदशेर आट्याची धनीन" म्हणजे "मी आता एक साधी शिपाई गडी आहे" (kind of सर पे कफन बांधकर वगैरे) असाही अर्थ होऊ शकतो.
राणीचे ऎश्य्वर्यसंपन्न जीवनापासून ह्या शिपाईगिरीपर्यंतचे transition मनाला चटका लावून जाते खरे. ह्यातले पुढचे वाक्य (वैद्य प्रतीत आहे, मूळ प्रतीत आहे की नाही हे ठाऊक नाही) मला स्वतःला जास्त चटका लावून गेले "आमच्या पदरी पातकच फार म्हणून आम्हास ईश्वर यश देत नाही". सर्व काही पणाला लावून निकराचा प्रयत्न करूनही अपयश आल्यामुळे निराश झालेली आणि तरीही कर्मयोग्याप्रमाणे काल्पीला पुढच्या लढाईची तयारी करणारी राणी मनात घर करते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोडसे भटजी 'बन्यान' घालतात. ही 'बन्यान' घालण्याची प्रथा इंग्रजांकडून/परकीयांकडून आपण उचलली असावी, की एतद्देशीय असावी?

'बन्यान' शब्दाची व्युत्पत्ती काय?

प्रथा एतद्देशीय नसल्यास (परकीयांकडून उचलली असल्यास) नक्की कोणाकडून आणि कधी उचलली असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे म्हणतात की गुजराती वाणी अशा प्रकारचा अस्तन्या नसलेला तोकडा अंगरखा वापरीत असत म्हणून या वस्त्राला बनिया अथवा बनियान म्ह्णू लागले. इतकेच नव्हे तर (पुन्हा,असे म्हणतात की,)मुंबईत फोर्टात जुन्या ओल्ड कस्टम हाउससमोर (मुंबईत दोन ओल्ड् कस्टम्स हाउसे आहेत.) एक प्रचंड विस्तार असलेले वडाचे झाड होते, त्याच्या सावलीत बसून हे वाणी लोक आपसातले देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करीत. मुंबई शेअर बाजाराचा उगम होता तो. तर हे आखूड वस्त्र घातलेले बनिये ज्या झाडाखाली बसत त्या झाडाला ब्रिटिश लोक बनियन म्हणू लागले!
पण गंभीरपणे, बनात म्हणजे लोकरी वस्त्र असे शब्दकोशांत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)जरठ -कुमारी विवाह -
शेवटचा बादशहा जफर आणि त्याची (कितवी) पंधराएक वर्षांची बायको हे उदाहरण पाहा.
२) >>"संस्थानिकाकडून आलेली ऑफर नाकारणे अशक्य" अशीही कुचंबणा असू शकेल>>
यावर एक कथा वाचली आहे. संस्थानिकाला कधीमधी औषध देणारा वैद्य एखादी विषारी पण अति गुणकारी मुळी काळजिपुर्वक एकदोनतीन वळसे उगाळून देण्याचा उल्लेख अशी सुरुवात. - इतरांनाही औषधे देऊन प्रपंच चालवणारा. एकदा संस्थानिक त्यास बोलावून जरा आदर सत्कार करतो - संस्थानिकाचा वेडसर मोठा मुलगा - वेद्याची मोठी मुलगी - वैद्या रात्री मुळी उगाळायला घेतो - वळसे मोजण्याची काळजी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम लेख, खूप तपशीलवार आणि अतिशय काळजीपूर्वक लिहिलेला आहे. जरा कमी रिसर्च पेपरच आहे. या अनुषंगाने गोडसे भटजींच्या अनुभवविश्वाचा मागोवा घेण्याची पद्धत अभिनव आहे. हीच पद्धत इतरही अनेक ग्रंथांना लावून पाहण्यासारखी आहे. आर्थिक इतिहास जेव्हा लिहितात तेव्हा बऱ्यापैकी हाय लेव्हल डॉकुमेंटेशनचा आधार घेतला जातो- पेशव्यांची पत्रे, ब्रिटिशांचे रिपोर्ट्स, वगैरे वगैरे. क्वचित कधी अन्य पॉवर ब्रोकरचाही आधार घेतला जातो - उदा. दीक्षित-पटवर्धन सावकार फॅमिलीच्या वह्या. परन्तु किमान मराठीपुरता तरी हा पैलू कधी फारसा विचारात घेतला जात नाही किंवा माझ्या पाहण्यात नाही. तेव्हा रा०रा० आदूबाळ यांना आग्रहाची विनंती आहे की बखरवाङ्मय किंवा संत-पंत-तंत काव्यादींचाही या दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा. सामाजिक अंगाचा जेव्हा विचार केला जातो किंवा भावविश्वाचे पैलू उलगडणे वगैरे चर्चा जेव्हा असतात तेव्हा हे अंग काही तितकेसे उद्मेखून सांगितलेले दिसत नाही. समाजाची अनेक अंगे ही जनसामान्यांच्या अभिव्यक्तीद्वारे उलगडण्याचा प्रयत्न होतो तिथे खरेतर आर्थिक अंगाने केलेली मीमांसा ही खूप कॉमन असायला हवी, कारण जनसामान्यांकडे पैसा कमी असतो आणि त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व फार असते. ते त्यांच्या अनेक उक्ती, कृतींमधून अभिव्यक्त होत असते. ते टिपून त्याचा निचोड मांडण्याचे बेस्ट काम रा०रा० आदूबाळ यांनी केलेले आहे. त्यांना अशीही सूचना आहे, की इतिहासाच्या कॉन्फरन्सेसमध्ये असे विवेचन सिलेक्ट होऊ शकते. तेव्हा ऐसीसारख्या ठिकाणी लिहिण्यासोबतच कॉन्फरन्ससाठीही काही करण्याचे त्यांनी मनावर घ्यावे. कैसे कैसों को सिलेक्ट करते हैं, रा०रा०आदूबाळ तरी सहजच सिलेक्ट होऊ शकतील.

आता गोडसेभटजीबद्दल थोडेसे- हे पुस्तक पुन्हा एकदा नीटच वाचले पाहिजे ही जाणीव दृढमूल होते आहे.

'प्रवासवर्णन हे आत्मचरित्र नव्हे, तर लेखकाच्या आयुष्याचा प्रवासापुरता क्रॉस सेक्शन आहे' हा वर उल्लेख केलेला विचार पाश्चात्त्य प्रवासवर्णनांच्या ढाच्यावर बेतलेला आहे. गोडसे भटजीपूर्व मराठी साहित्यात 'प्रवासाची वर्णनं' होती (उदा० नाना फडणविसाचं आत्मचरित्र), पण 'प्रवासवर्णन' नव्हतं. या आधुनिक अर्थी गोडसे भटजींचं लेखन हे मराठीतलं आद्य प्रवासवर्णन म्हणता येईल.

याच्याशी असहमत. नाना फडणीसाचे आत्मचरित्रात जर प्रवासाचे वर्णन आले असेल तर ते गाईडबुक छापाचे आहे आणि सब्जेक्टिविटी नाही असे कसे म्हणता येईल? फारतर असे म्हणता येईल की गोडसेभटजींनी इंट्रोस्पेक्शन जास्त केले असेल. परंतु त्याअगोदरच्या ग्रंथांत असे बघायला मिळतच नाही असे आजिबात नाही. तशा एखाद्या ग्रंथावर काम करायची इच्छा आहे. तूर्त एक सतराव्या शतकातील थोडेसे ऑब्लिक उदाहरण देतो.

विश्वगुणादर्शचंपू हा संस्कृत ग्रंथ गद्य पद्य मिश्रित असून इ.स. १६५० साली कांचीपुरम येथे राहणाऱ्या वेंकटाध्वरी याने लिहिला. याचा वर्ण्य विषय मोठा रोचक आहे. विश्वावसू आणि कृशानु या नावाचे दोन गंधर्व एका विमानात बसून भारतभर भ्रमण करत असतात. विमान ठीकठिकाणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर आकाशात स्थिर होते, आणि दोन्ही गंधर्व त्या ठिकाणाबद्दल बोलू लागतात की ही जागा कुठली, हा प्रांत कुठला, इथले लोक कसे वागतात, कसे बोलतात, वगैरे वगैरे. यात एकजण हा कुठल्याही ठिकाणाची कायम स्तुती तर दुसरा हा कायम निंदा करत असतो. तेव्हा एका मर्यादित अर्थाने तरी हे एक प्रवासवर्णनच म्हटले पाहिजे. फक्त त्यामध्ये प्रवासाने आलेल्या इन्साईट्स तितक्याच काय ते वर्णिलेल्या आहेत. प्रवासाचे वर्णन नाही.

सांगायचा मुद्दा असा की प्रवासाशी संबंधित इंट्रोस्पेक्शनचा प्रादुर्भाव, सब्जेक्टिविटी ठळक दिसणे, वगैरे निकष असतील तर त्यांत कमीअधिक फरकाने बसणारे ब्रिटिशपूर्व कालीन भारतातही अनेक ग्रंथ आहेत. तेव्हा ही सीमारेषा आखायची ती कशाच्या जोरावर? त्याबद्दल थोडासा विचार व्हावा. हा मुद्दा थोडा स्पष्ट व्हावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद!

नाना फडणीसाचे आत्मचरित्रात जर प्रवासाचे वर्णन आले असेल तर ते गाईडबुक छापाचे आहे आणि सब्जेक्टिविटी नाही असे कसे म्हणता येईल?

असं म्हणणं नाही.

मुद्दा शिंपळ आहे - नाना फडणिसाचं आत्मचरित्र हे आत्मचरित्र म्हणून लिहिलेलं आहे. त्यात प्रवासापूर्वीच्या आणि नंतरच्याही घटना आहेत. त्या तुलनेत 'माझा प्रवास' हे नावापासूनच 'प्रवास-फोकस्ड' लेखन आहे. गोडसे भटजींच्या पूर्वायुष्याचा अत्यंत तोकडा, आणि उत्तरायुष्याचा आजिबात उल्लेख 'माझा प्रवास'मध्ये नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हम्म बरोबर. तरी अजून एखाददुसरा ग्रंथ अशा छापाचा आहे असे आठवते, नीट तपास घेतला पाहिजे.

बाकी ते कॉन्फरन्सचं बघा जरा घ्या मनावर, ऐसे ऐसों को दिया (जाता) है...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या काळात काय अगदी आता सुद्धा माणसं अर्थसाक्षर असूनही आकडेमोड करून निर्णय घेतीलच असं नाही. (अगदी माझ्या स्वत:च्या निर्णयांकडे बघताना मला ते जाणवते) म्हणूनच कदाचित बिहेविअरल फायनान्स ही पोटशाखा विकसित होत आहे.

लेख आवडला हे वेगळं सांगणं न लगे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक वाचायचे राहून गेले. तुमच्या लेखासह.अन्य दोन.लेखही वाचले. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय मस्त आहे हा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Please pardon me for writing in English
I like this well researched article.
I would like to request the author to reconsider some statement.
1. Life Insurance Policy is indeed an asset for the buyer of the policy. It is so today, it was so in the past and will be so in the future. Why is the author hinting that it is foolish to consider Insurance Policy as an asset?
2. Proper conduct of our day-to-day life requires a person to have basic skills in financial literacy. No specific purpose is needed as claimed by the author. What is gained by making (उगाचच कोणी पैशाचा विचार का करत बसेल?) such a statement?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो.

1. Life Insurance Policy is indeed an asset for the buyer of the policy. It is so today, it was so in the past and will be so in the future. Why is the author hinting that it is foolish to consider Insurance Policy as an asset?

लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी हा ॲसेट नाही, कारण पॉलिसी असल्यामुळे 'त्या व्यक्तीला' (life assuredला) काही फायदा होत नाही. फायदा होतो तो व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या वारसांना. त्या अर्थी हा ॲसेट नाही.

2. Proper conduct of our day-to-day life requires a person to have basic skills in financial literacy. No specific purpose is needed as claimed by the author. What is gained by making (उगाचच कोणी पैशाचा विचार का करत बसेल?) such a statement?

मी तेच तर म्हणतो आहे! पुढच्याच परिच्छेदात "आर्थिक निर्णय घेताना सारासार विचार करून आपल्याला सगळ्यात फायदेशीर होईल असा निर्णय घेण्याची क्षमता असणे म्हणजे अर्थसाक्षरता" अशी व्याख्या केली आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात किमान मूलभूत आर्थिक कौशल्यं असायलाच हवीत. इथे उद्दिष्ट "आपल्या दैनंदिन आयुष्यात आर्थिक निर्णय घेता येणं" हे आहे. म्हणून माणूस अर्थसाक्षर व्हायचा प्रयत्न करतो.

आपल्याला आपल्या मासिक उत्पन्नात आपले मासिक खर्च भागवता येतील की नाही याने एखाद्या मनुष्याची झोप उडेल. पण "व्हेनेझुएलाच्या मादेरोची आर्थिक धोरणं" किंवा "आईसलँडचं पर कॅपिटा इन्कम" याने उडणार नाही.

अर्थसाक्षरता उद्दिष्टापोटी येते. "No specific purpose is needed as claimed by the author" - हा क्लेम माझा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अतिशय छान लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre