गणपतीचा शोध
लोकहो,
लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.
पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतीं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.
यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अॅण्ड रिअॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.
अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.
एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.
जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहीती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्यांच्या पुस्तकात मिळाली. मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.
सतीश लळीत
सतीश लळीत ह्यांनी कमेंट देताना त्यांचं जो मालक आहे महाराष्ट्र सरकार त्यांची परवानगी घेतली होती का .
जे त्यांना पगार देतात आणि त्यांना न विचारता सार्वजनिक टिप्पणी करून हिंदू च्या भावना दुखावल्या गेल्या त्याला तर्कतीर्थ जबाबदार आहेत असेच मी समजतो .
सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या मध्ये श्री गणेशाचे फक्त आहेत आणि त्यांच्या paisya वर राज्य सरकार चालत आणि नोकरांना पगार मिळतो
सिंधु नदीकाठी असणार्या या
सिंधु नदीकाठी असणार्या या भागात आर्य आले...त्यांनी इथल्या नेटीव्ह लोकांवर विजय मिळवुन आपले स्थान निर्माण केले. जेते असल्याने आपसुकच त्यांच्या देवता वगैरे प्रकार उच्च अन बाकीच्यांचे नीच झाले.
राहता राहीला गणपतीच्या विघ्नकर्ता असण्याचा तर असेलही...जर खरंचच हत्तीचं डोकं असणारा माणुस अस्तित्वात होता हे मानायचंच तर त्याने त्याच्या समुहाला संरक्षित ठेवण्यासाठी इतरांवर हल्ले करुन त्यांच्या कार्यात विघ्न आणणे शक्य आहे. हेच अनार्यांनी आर्यांना हरवले असते तर चित्र वेगळे असते.
तुमचे प्रतिसाद वाचुन तुमची कीव आली. तुम्हाला किंवा कोणालाही देव माना/ नका मानु पण केवळ उच्च -नीच भेद करुन एखाद्या मुर्तीला "हद्दपार" करण्याची मानसिकता विकृत वाटते..मलातरी.
भारतात खुप संत , सुधारक होउन गेले ज्यांनी "देव दगडात नाही" हेच शिकवले...म्हणुन असलेल्या मुर्त्या घराबाहेर काढा वगैरे मुर्खपणा कोणी केला नाही. असो, शेवटी ज्याची त्याची समज.
बाकी इतका काळ गणपतीची भक्ती (?) करुन तुमची बुद्धी वाढली नाही ती नाहीच याबद्द्ल खेद आहे.
: लक्ष वेधुन घेण्यासाठी राखी सावंत जसा सवंगपणा करते तसा तुमचा लेख वाटतोय.
ब्राह्मणीकरण
त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
हल्ली ब्राह्मणीकरण हा शब्द शोषण अथवा लबाडीकरण अशा अर्थानेही वापरला जातो. उदा. आमचा विरोध ब्राह्मणांना नाही तर ब्राह्मण्याला आहे हे घासून घासून गुळगुळीत झालेले वाक्य सर्रास वापरले जाते.
अवांतर- गणपतीला जानवे घालतात याची मला मोठी गंमत वाटते. की हा पण ब्राह्मणी कावा?
गणपतीबद्दल आणखी एक कोडं
मला गणपतीबद्दल आणखी एक कोडं आहे...
गणपती आणि समस्त चित्पावनांचे आद्य दैवत परशुराम यांचे तुंबळ्युद्ध झाले आणि त्यात गणपतीचा एक दात तुटला आणि तो एकदंत झाला असे ब्रह्मवैवर्तक पुराणात वर्णन आहे. माझी समस्या अशी, एव्हढे वाकडे असूनही चित्पावन ('अग अग म्हशी' करत) गणपतीला का भजतात? कदाचित त्याने त्रास देऊ नये आणि सूड काढू नये म्हणून का? शक्यता नाकारता येत नाही.
शक्यता
चित्पावनांना नंतर "काही पुस्तके" वाचून परशूराम + गणपती दोहोंबद्दल प्रेम उत्पन्न झाले असावे, त्यामुळे त्यानी गणपतीला घरात घेतले असावे. शंका नाकारता येत नाही.
किंवा
तसेही चित्पावन बहूदा नीच* वगैरे असल्याने त्यांना नीच देवता भावली असावी, शंका नाकरता येत नाही. परशूराम मुळचा देशस्थ असावा वगैरे.
* वरिल प्रतिसादांच्या रांगेतला एक संदर्भ.
प्रश्न मर्यादेचा
तर्कतीर्थ, तुम्ही समंजसपणाची मर्यादा सोडत आहात असे खेदपूर्वक म्हणावे लागत आहे.
तुम्ही गणपतीला घरातून 'हद्दपार' केल्यानंतर तुमच्यापुरता 'भजना'चा प्रश्न संपुष्टात आल्यामुळे इतरांनी त्याला पुजावे, भजावे वा डोक्यावर ठेवून नाचावे याच्याशी तुमचा अर्थाअर्थी काहीही संबंध उरलेला नसतानाही अकारण "चित्पावन गणपतीला का भजतात ?" [वरतून उत्तरासाठी दोनेक विकल्पही देऊन] अशी निरर्थक पृच्छा इथे जालावर करण्याचे तुमचे प्रयोजन म्हणजे "उडविता येईल तितका भडका उडविणे' या प्रवृत्तीचे ते एक निदर्शक आहे असे म्हणावे लागत आहे.
तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी [अन्यत्र] आदराने लिहिले बोलले गेल्याचे मला आढळले आहे. पण दुर्दैवाने तुमचा हा खाजवून खरुज काढण्याचा प्रकार त्या गुणवत्तेशी फारकत घेत असल्याचे जाणवते.
अशोक पाटील
अशोकराव,मला निसर्गाने
अशोकराव,
मला निसर्गाने अमर्याद कुतुहल दिले आहे. मला पडलेली समस्या हा त्याच कुतुहलाचा भाग आहे. (ते दडपणारे कोपर्निकसला जाळणा-यांचे वंशज आहेत असे माझे स्पष्ट मत आहे). या शिवाय नरहर कुरुंदकरांनी इरावती कर्व्यांच्या पुस्तकाला लिहीलेल्या परिशिष्टामध्ये लिहीलेले एक वाक्य आठवते. कुरुंदकर म्हणतात, "जे ठळकपणे दिसत नाही ते अधिक महत्वाचे सत्य असण्याचा संभव असतो. ठळकपणे न दिसणा-या पण अधिक मूलभूत असणा-या सत्यकणांचे दर्शन घडविण्यासाठी त्या त्या शास्त्रातील विचारवंतांची गरज असते." (संस्कृती, पृ १२०, देशमुख आणि कंपनी)
मी स्वतःला विचारवंत समजत नसलो तरी विद्यार्थि म्हणून " ठळकपणे न दिसणा-या सत्यकणांचा" शोध घेण्याचे स्वातंत्र्य मला नक्कीच आहे, हे लक्षात असू दे!
पाठिंबा
आमचा याला पूर्ण पाठिंबा आहे.
सगळ्या देवांच्या कुळा-शीलाचा पंचनामा केला जावा. आजकाल कोणिही कोणाच्याही मांडीला मांडी लावून देवघरात बसलेले दिसतात. शिव शिव शिव.
गणपतीचा निक्काल लावला हे बरे केलेत. फार पुढे पुढे करत होता. (आता मोदक केल्या केल्या खायची सोय झाली. नेवैद्य दाखवायची वाट बघायला नको.)
या विषयावर सखोल संशोधन करून ठळक नसलेल्या गोष्टींमधले सत्य उजेडात आणून जंगली (खालच्या जातींच्या) लोकांच्या उपद्रवी देवतांचे सार्वजनिक चीरहरण करावे.
शिवाय इतके दिवस आधी गणपतीची पूजा केली म्हणून इतर देव कोपले तर नसतील ना? त्यांची शांती करण्याचे काही उपाय आहेत काय? चार-पाच ब्राह्मणांना खाऊ घालायचे असल्यास घालू, त्याचा काही प्रश्न नाही. पण ते सवत्स धेनू वगैरे जमणार नाही. तेवढे पैसे नाहीत हो. शिवाय ते ब्राह्मणही गणपतीच्या पूजेने भ्रष्ट झालेले असतील तर काय? असा भ्रष्ट न झालेला ब्राह्मण कसा ओळखावा यावरही संशोधन करावे. आर्थिक किंवा अन्य अडचण असल्यास सांगावे.
बाकीच्या लोकांचे प्रतिसाद वाचून तर चीड उत्पन्न झाली आहे. आजकाल कोणिही उठतो आणि चेष्टा करतो. शाप दिले पाहिजेत एकेकाला.
असो. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. इतिहास साक्ष आहे, आपल्यासारख्या लोकांनी जेव्हा जेव्हा एखादे कार्य हाती घेतले तेव्हा तेव्हा त्रिखंडात त्याचा परिणाम जाणवलेला आहे.
मी नवीनच सदस्य आहे व कोणाही
मी नवीनच सदस्य आहे व कोणाही सदस्याशी माझी ओळख नाही, त्यामुळे मी त्रयस्थपणे लिहीणार आहे. मी या विषयाचा तज्ञ तर सोडाच, अभ्यासक देखील नाही. परंतु येथे अनेक सदस्यांनी गंभीर, माहितीपुर्ण, अभ्यासु विचार मांडले आहेत. ते वाचुन मिळालेल्या वैचारिक चालनेमुळे व मनात घोळत असलेल्या शंकांचे निरसन करुन घेण्यासाठी या संधीचा उपयोग करुन घ्यावा म्ह्णुन हे लिहीत आहे. तज्ञ/अभ्यासकांकडुन काही सल्ला / दिशा मिळाली तर उत्तम !
१. देव, धर्म, व संस्कृती यांची सांगड कशी घालावी ? यातील आधी कोण ? देव ही जर माणसाने तयार केलेली संकल्पना असेल तर, अर्थातच संस्कृती आधी यायला हवी. कारण मानव समुहाच्या कालौघातुन निर्माण होते ती संस्कृती. मग कालाच्या ओघात त्या मानवी समाजाने, आपल्या आसपासच्या निसर्गाच्या विवीध रुपांना आणि अनाकलनिय अशा शक्तींना शरण जाउन, एक सुरक्षीतपणाची भावना निर्माण केलेली संकल्पना म्हणजे देव. आणि मग या समुहामधल्या एका विशीष्ठ, समर्थ गटाने, सगळ्या समुहाला सुनियंत्रीत करण्यासाठी, सुयोग्य दिशा दाखवण्यासाठी व ऐहीक जीवनातील दुक्खांची कारणमिमांसा व त्यावर तथाकथित उपाय, यासाठी तयार केलेली एक शिस्तबध्ध व्यवस्था म्ह्णजे धर्म. म्ह्णजे, आधी संस्कृती, मग देव व नंतर धर्म असा क्रम समजायचा का ?
२. या धाग्यामध्ये, आर्य, अनार्य व द्र्वीड यांची थोडीशी सरमिसळ झाल्यासारखी वाटते. द्रवीड वंशीय हे भारताचे मुळ रहीवासी. आर्यांच्या उगमस्थानाबद्दल व भारतातील आगमनाबद्दल अजुनही काही संदेह आहेत. रामायण, महाभारताच्याही आधीपासुन भारतात आर्य ही संज्ञा होती - नैतिक आधिकाराचे व आदराचे संबोधन म्ह्णुन. रामायणात रावणाला देखील आर्य म्ह्णुन संबोधले आहे तर महाभारतात सारे कुरु कुळ, आर्य समजले गेले आहे. त्यामुळे अनार्य हा वेगळा समाज / समुह गट खरोखर होता का ? की आर्यांमधलेच जे नितीहीन लोक होते त्यांना अनार्य असे म्हटले जायचे (जसे आपण लायकच्या उलट ना-लायक म्हणतो). हाच मुद्दा पुढे नेला तर, आर्यांच्या आगमनाने व रेट्याने द्क्षीण भारतात ढकलले गेले ते अनार्य की द्र्वीड ? कि अनार्य म्ह्णजेच द्र्वीड ? आणि अनार्य संस्कृती म्ह्णजे द्र्वीड संस्कृती ? आणि अनार्य देव म्ह्णजे द्र्वीड देव ?
३. आर्य / अनार्य / द्रवीड संस्कृती प्रथम आल्या, मग त्यांचे त्यांचे देव आले, मग हिंदु धर्म आला. मग हिंदु धर्म मुळ कुणाचा ? आर्यांचा ? मग त्यांनी तो जेत्यांचा धर्म म्ह्णुन अनार्यांवर / द्रवीडांवर लादला का ? कि हिंदु धर्म म्हणजे या सगळ्या संस्कृतींचे सार ?
४. ग्रीक, रोमन, इजीप्शियन, सिंधु या सगळ्या सुमारे ४-५००० वर्षांपुर्वीच्या संस्कृती. इंका, माया या त्यामानाने थोड्या अलिकडच्या. पण या सगळ्या संस्कृतींमधले समान सुत्र म्ह्णजे अनैकेश्वरवाद. सर्वांचे देव म्हणजे निसर्गाची विविध रुपे, पशु-पक्षी किंवा पशु-मानव यांचे संकरीत रुप. परंतु कालौघामधे, इतर संस्कृतींच्या आधुनिक अवतारांनी, अनैकेश्वरवाद सोडून देउन एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला दिसतो. हिंदु संस्कृतीच याला अपवाद कशी व का ? एकेश्वरवाद हा जर मानवी समाजाच्या मानसिक / भावनिक प्रगतीचा पुढचा टप्पा समजायचा असेल तर, हिंदु संस्कृती अजुन मागच्याच टप्प्यावर आहे अस समजायचं का ?
५. हिंदु देवादिकांच्या स्वरुपांतही टोकाची रुपे दिसतात. एका टोकाला ओबडधोबड दगड, धोंडे, वृक्ष, पशु-पक्षी, लिंग्-योनी यांची पुजा तर दुसय्रा टोकाला दागिन्यांनी मढलेले, सुबक, देखणे, एका साच्यातुन काढ्ल्यासारखे वाटणारे देव आणि देवी. अर्थात या सर्व देवादिकांच्या तसबिरी, राजा रविवर्म्याच्या चित्राकृतींवर आधारलेल्या असल्यामुळे, त्यांचे हे रुप केवळ सव्वाशे-दिडशे वर्षे जुने आहे - असावे. मग त्यापुर्वी हे देव कसे दिसत होते ? देवांच्या रुपांमधला हा टोकाचा विसंवाद हा कसला प्रतिकात्मक समजायचा ? संस्कृतींमधला फरक ? कि उच्च्-नीच वर्णीय फरक ? कि समाजातल्या विवीध उलथापालथींनुसार होणारे विविध देवतांच्या महत्वामधील होणारे चढ्-उतार ? जेत्यांच्या देवतांचे स्तोम व जीतांच्या देवतांची अवहेलना ?
६. संस्कृती - देव - धर्म यांना जोडणारा धागा म्हणजे इतिहास. भारतिय संस्कृतीमधले दोन महापुरुष म्ह्णजे राम व कृष्ण. दोघेही राजे, कर्तृत्ववान, कुशल नेते व समाजधुरीण. त्यांचे कर्तृत्व, त्यांच्या पिढीपुरते मर्यादित न रहाता ते पुढ्च्या कैक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरले. म्हणजेच ते महापुरुषाचे 'युगपुरुष' झाले. 'महापुरुष ते युगपुरुष ते देवत्व' हा प्रवास ह्वायला किती काल जावा लागतो ? (शिवाजी महाराज देखील याच मार्गाने जाणार का ?) त्यामुळे कधी आम्ही मानवातील अद्भुत तेजाला देवत्व बहाल करतो (राम, कृष्ण), तर कधी आमचे देवत्व हे प्रतिकात्मक बनते - उदाहरणार्थ, गणपती - बुद्धी, दुर्गा - संहारक शक्ती, सरस्वती - विद्या, लक्ष्मी - संपत्ती/समृद्धी.
इतिहास हा खरा असतो. तो कधी काळाच्या ओघात नष्ट होतो, कधी नजरेआड होतो तर कधी तो भ्रष्ट रुपात (बहुदा जेत्यांनी लिहीलेला असल्यामुळे) पुढ्च्या पिढ्यांच्या हातात सोपविला जातो. [या ठिकाणी माझे म्हणणे मांड्ण्यासाठी, महाराष्ट्र टाईम्समध्ये गुढीपाड्व्याच्या निमीत्ताने काढ्लेल्या पुरवणीमध्ये श्री संजय सोनवणी यांच्या लेखातील उल्लेख देतो - 'पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.']
त्यामुळे आमच्या संस्कृतीचा खराखुरा इतिहास जेंव्हा आम्हाला उलगडता येईल तेंव्हाच आमच्या देवादिकांच्या अस्सल रुपाची आम्हाला ओळख पटेल. जेंव्हा आमचा आजचा भारतिय वंशच मुळी भिन्न भिन्न संस्कृतींची सरमिसळ बनला आहे तेंव्हा आमचे देव देखील सरमिसळ झालेले असणार, यात नवल ते काय. त्यामुळे कुणाच्या आराध्य दैवताला इतर कुणाच्या घरात प्रवेश नसावा आणि कुणासाठी विघ्नकर्ता असलेले दैवत कुणासाठीतरी विघ्नहर्ता असावे हे देखील शक्य आहे.
(ही माझी वैयक्तिक मते, शंका, प्रश्न आहेत. कुणाच्याही मताला खोड्ण्याचा किंवा कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतु नाही).
श्री संजीव, तुमचे " शिस्तबध्ध
श्री संजीव,
तुमचे " शिस्तबध्ध व्यवस्था म्ह्णजे धर्म." हे विधान मला तरी पटत नाही. कारण शिस्त हा शब्द मला खटकतो. मला प्रा. मे. पु. रेग्यांच्या एका पुस्तकातील (नाव आठवत नाही, शोधाशोध बरीच करावी लागेल) धर्माची व्याख्या मला जास्त पटते. ते म्हणतात, धर्म हा समाजातील शहाण्या [मानल्या गेलेल्या] लोकांच्या सहमतीवर आधारलेला असतो. चौकटी कंसातील शब्द माझे आहेत. या सहमती मध्ये काळाच्या ओघात होत गेलेला दिसतो. उदा द्यायचे झाले तर चातुर्वर्ण्याचे देता येईल. सुरुवातीला चातुर्वर्ण्य लवचिक होते आणि नंतर त्यातील लवचिकता लुप्त झाली आणि ते शोषणाचे स्रोत बनले. धर्माला जर शिस्त असती तर ही लवचिकता नष्ट व्हायला नको होती. स्वयंसुधारणेच्या आकारिक (फॉर्मल) व्यवस्थेच्या अभावामुळे हिंदू धर्म शिस्तीपासून लांबच राहिला आहे.
तुमचे बा़कीचे मुद्दे यथावकाश...
~तर्कतीर्थ
गणपती विषयी आज आणखी एक नवी
गणपती विषयी आज आणखी एक नवी माहिती समजली. लेखकाने आपली ओळख मात्र लपवली आहे. http://khattamitha.blogspot.in/2008/01/blog-post_08.html
प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स..
या लेखाची आठवण आली. मिसळपाव वर चे ट्रोल इकडे वेगळ्या नावाने फिरायला लागले!
श्री गणेशाची सर्व सामान्य लोकांच्या मनात एक प्रतिमा आहे
श्री गणेशाची सर्व सामान्य लोकांच्या मनात एक बुध्दीची देवता आणि विघ्न हर्ता अशी प्रतिमा आहे .
आताच्या विचारवंत chya मताला जनता किंमत देत नाही .
कारण हे स्वयं घोषित विचारवंत पक्षपाती आहेत अशी पूर्ण खात्री लोकांची आहे .
श्री गणेश विषयी च बौध्द लोकांचे विचारवंत,नास्तिक विचारवंत ह्यांची फक्त नकारात्मक भूमिका आहे .
काही ही करून हिंदू धर्म देव देवता कशा खऱ्या नाहीत हेच ह्यांचे ब्रीद असते आणि ते आस्तिक लोकांच्या पचनी पडत नाही .
त्या मुळे मंदिरात होणारी गर्दी आणि मिळणारे दान ह्या मध्ये वाढच होत आहे .
आपले पूर्वज 500 वर्षा पूर्वी कोण होते हे सुधा आपल्याला माहीत नाही .
त्यांचे नाव काय होते ,त्यांना मुले किती होती ,किती वर्ष जगले आहे का कोणाकडे पुरावे.
आणि हजारो वर्षा पूर्वी घडलेल्या घटनांचे ह्या विचारवंतांना कुठून पुरावे मिळणार फक्त शब्दांचा खेळ आणि काठी ला च साप ठरवण्याचा ह्यांचा उद्योग .
नस्तिक म्हणतात आम्ही देव मानत नाही पण मरेपर्यंत ह्यांचा डोक्यात देवाचाच विचार तो कसा नाही हे ठरवताना आयुष्यभर देव देव च करतात ढोंगी .
बौध्द लोकांच्या हिंदू विरोध सर्वांना नाहीत आहे त्याला पार्श्वभूमी आहे .
पण ते सुद्धा धर्म बदलून सुद्धा हिंदू धर्मा मध्येच अडकून पडले आहेत .
जो धर्म तुम्हाला आवडत नाही ज्याचा तुम्ही त्याग केला आहे त्या धर्मा विषयी विचार करायचे बंद करा आणि स्वधर्म कसा चांगला होईल त्या वर लक्ष द्या पण नाही स्व सुधारणा न करता फक्त हिंदू वर टीका करणे हेच कार्य .
त्या मुळे वीतुष्ट वाढत आहे .बाकी काही घडत नाही.
ह्या विश्वाचा कोण्ही तरी निर्माता आहे अशी शंका येणाऱ्या खूप गोष्टी पृथ्वी वर अस्तित्वात आहेत .
विज्ञान सर्व प्रश्नांची उत्तर देण्यास समर्थ नाही .
म्हणून देव ही संकल्पना अजुन टिकून आहे आणि पुढे किती तरी वर्ष टिकून राहील .ह्या विशाल विश्वात पृथ्वी ची दखल घेणे हाच मोठा जोक आहे त्या पेक्षा माणूस ह्या अतिसामान्य प्राण्याची ह्या विश्वात काहीच महत्व नाही .
आपल्याला च आपले कार्य खूप मोठे वाटत आहे पण विश्वाच्या पसाऱ्यात त्याला काही किंमत नाही .
मला वाटतं - Faith is reward
मला वाटतं - Faith is reward in itself.
श्रद्धा ठेवण्याचे इतके मानसोपचारात्मक फायदे आहेत की मला तरी वाद घालावासा वाटत नाही. आणि वाद तरी का म्हणून घालायचा? आपल्याच वेळेचा व उर्जेचा अपव्यय. प्रत्येकाला स्वतचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वत:चे विचार तसेच अति चिकित्सा करण्याची सवय वगैरे वगैरे बाळगण्याचे स्वातंत्र्य आहे.
स्तोत्रं वाचून मला बरे वाटते, खूप आराम मिळतो, शांती मिळते - हे माझ्याचकरता उत्तम आहे की मग कशाला वाद घालायच्या फंदात पडा? त्या 'गोंदवले' ग्रुपवरही जातीपातिच्या, पोस्टस आल्या की मी सरळ दुर्लक्ष करते. हे म्हणजे ज्ञानेश्वरीत लिहीले तसे झाले - जिथे गोचीड गाईचे दूध पिउ शकते तिथे ती आचळावर राहूनही रक्त पिण्यात समाधान मानते.
बुद्धीगम्य नाहीचे हा विषय. फक्त भक्तीनेच कणभर जाणता येइल. देवीची नावे - भक्तीगम्या, योगगम्या वगैरे उगाच नाहीत. ज्याची त्याची प्रचिती. देवाने नामस्मरण करता यावे इतका वेळ व इच्छा तसेच भान राखले आहे. पुढेही राखेल.
गणपती अथर्वशीर्षामधील शांतीमंत्र -
ओम् भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: |
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: |
व्यशेम देवहितं यदायु:
अर्थ - हे देवांनो आमच्या कानांवर (सदैव) शुभ वचने पडावीत.
आमच्या नयनांना (सदैव) शुभ दृष्ये दिसावीत.
तुमची स्तुती करण्यासाठी आम्हाला भरपूर आयुष्य लाभो.
या मंत्राचे सौंदर्य आणि त्याचे माधुर्य, त्यामागचे उच्च भाव, हे गणपती उच्च/नीच असल्याने बदलणार आहे का? नाही. झालं तर मग! सगळा वादच व्यर्थ आहे, दूध सोडुन रक्त पिण्याच्या कॅटॅगरीतला आहे.
_____________________________________
हां आता भरपूर आयुष्य लाभावे म्हणु काहीजण मंत्र म्हणतात तर काही लशी शोधतात. पण हे म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह नाहीच्चे ना. असे काही आहे का की जे लोक मंत्र म्हणतात त्यांना लशी शोधायला वेळच मिळत नाही? तेव्हा विवेकवाद आणि आस्तिक्य किंवा विवेकवाद आणि नास्तिक्य यांचा परस्पर संबंध काही नाही. बुद्धीवादापक्षा मला तरी विवेकवाद जास्त महत्वाचा वाटतो.
प्रकाश भाऊ दृष्टांत हा
प्रकाश भाऊ दृष्टांत हा दृष्टांत म्हणूनच घ्यायचा असतो ना. तसं ज्ञानेश्वरीत लिहिलंय की कुंभारीण माशी अळ्या पकडून चिखलाच्या घरात कोंडते व येताजाता त्यांना डंख मारते. डंखाच्या भितीने अळ्या स्वत:ला कुंभारीण माशी बनवतात. वास्तविक अळ्या हे तिच्या पिलांना खाद्य म्हणून ठेवते व तिथे अंडी घालते.
प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया उमटते हा निसर्गाचा नियम आहे
जाणून बुजून हिंदू धर्मावर चिखलफेक कराल तर हिंदू देव धर्म करायचे सोडणार नाहीतच उलट जास्त प्रमाणात वाजत गाजत ,गर्जत अजुन जोरात धार्मिक होतील आणि बाकी धर्माचा आणि त्यांच्या प्रतीकांचा सुद्धा मस्तर करतील हा नियम तर्कतीर्थ स्वतःला म्हणवून घेणारा आणि तर्कतीर्थ chya बिनडोक विचारानं पाठिंबा देणाऱ्या लोकांना माहीत असायला हवा होता .
बिनडोक टीका केली की हिंदू सैरभेर होवून धर्म पालन करणारा नाहीत हा त्यांचा हेतू त्यांच्या वराच उल्टेल .
मग हिंदू कशे धर्मांध आहेत असा गजर चालू करतील हीच मंडळी.
अशी पण अशा खाजवून खरूज काढणारे लोकांचे विचार त्यांच्या कंपू पर्यंतच मर्यादित असतात बाकी लोक ना ऐकत नाही वाचत ना गंभीर
पने घेत ह्यांच्या विचारानं.
सायबांनू-
सायबांनू-
कुठल्याही गोष्टीत "टीका" म्हणजे वाईट नव्हे.
"उहापोह", "चिकित्सा" "सांगोपांग अभ्यास" हे शब्द मराठीत डिक्शनरीची शोभा वाढवायलाच ठेवलेले नाहीत.
ह्यात चिखलफेक वगैरे काही नाही.
बाकी आम्ही वाचतो ह्यांचे लेख. त्यांचे विचार आवडले/नावडले तरी.
असो.
"हिंदू धर्मावर चिखलफेक कराल तर हिंदू देव धर्म करायचे सोडणार नाहीतच उलट जास्त प्रमाणात वाजत गाजत ,गर्जत अजुन जोरात धार्मिक होतील"
बरं. म्हणजे आता तुम्ही स्वत:च भारताचा पाकिस्तान करणार. एंजॉय.
आर्य अनार्य - निरर्थक वाद त्यात देवतान्ना का ओढा ?
इथे लेखकाचा भक्तीकडून अभक्तीकडे झालेला प्रवास लेखात दिसला.
देवता अनार्य म्हणून गणपति चा त्याग केला असे अभिप्रेत होत आहे. तरिहि हा लेखकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
पण सार्वजनिक व्यासपीठावर असे विचार मांडल्यावर ठिणग्या उडणे अपेक्शित होतेच.
दैवतान्चे वैदिकिकरण काळाच्या ओघात झाले कि केले गेले हा सन्शोधनाचा विशय असु शकेल.
पण ब्रह्मा , विष्णू आणि शिव या आर्यान्च्या भाशेत अनार्य देवता आणि अनार्यान्च्या भाषेत मुख्य देवता होत.
तसेहि वैदिक देवता या पूजल्या जात नाहित. इन्द्र, वरुण, प्रजापति, रुद्र अशी अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे वैदिक दैवतान्ना समान अनार्य देवता शोधुन त्यान्ना नावे चिकटवून दिलि गेलीत
अलिकडे म्हणे आर्य हे बाहेरचे नव्हेतच असेही सन्शोधन प्रसिद्ध झाले आहे. अर्थात त्या सन्शोधनावर सुद्धा अनेक तद्न्य लोकानि आक्शेप घेउन हे सन्शोधन भगवेकरन असल्याचे आरोप केलेले आहेत. कारण एका अवशेशावरुन थेट हा निष्कर्श काधने अकल्पित आहे. असो. जास्तच अवान्तर होतय
त्यांचा प्रतिसाद PRO TO CM या
In reply to पद by श्रावण मोडक
त्यांचा प्रतिसाद PRO TO CM या आयडीवरून आला आहे.