Skip to main content

अँग्री यंग (!) वुमन

3 minutes

कोव्हिड लॉकडाऊनच्या निमित्ताने मानवी वर्तणूक, विचार, लिखाण आणि अभिव्यक्ती याचं प्रदीर्घकाळ निरीक्षण, वाचन आणि मनन करायची संधी मिळाली. माझा भोवताल आणि संपर्कातली बहुसंख्य माणसं शहरी, ब्राह्मणी किंवा फारातफार मराठा मध्यमवर्गीय. त्यामुळे शीर्षक असं का दिलं असेल, याची थोडीफार कल्पना करता येऊ शकेल. मला ठळकपणे जाणवलेल्या/दिसलेल्या काही गोष्टी मांडते.
१. लॉकडाउनच्या सुरवातीला टाळ्या, थाळ्या वाजवणे आणि दिवे लावणे ह्या प्रकारात अत्यंत उत्साहाने सहभाग आणि त्याचं समर्थन करायला देशभक्ती, सामाजिक एकता, सकारात्मकता वगैरे भावपूर्ण स्पष्टीकरण किंवा सूडोसायन्सचा संतापजनक वापर (भारतातल्या लोकांची इम्युनिटी घाणीत राहिल्याने कशी जगात भारी असते वगैरे ज्ञान यातच आलं). पण चार तासांची मुदत देऊन टाळेबंदी करताना हातावर पोट असलेल्या 'त्या' लोकांचं काय होईल याचा विचारदेखील डोक्यात न येणे.
२. तबलीघ जमातीमुळे करोना भारतात सर्वत्र पसरला हे अत्यंत ठाम मत. पण दिल्लीत त्या मेळाव्याला परवानगी कोणी आणि का दिली याबद्दल जाणीवपूर्वक अंगी बाणवलेली अनभिज्ञता. मुंबईत याच मेळाव्याला परवानगी नाकारली होती हे सांगितल्यावर 'हो का?' एवढाच प्रतिसाद.
३. स्वतःचा पगार चालू असताना घरकामात मदत करणाऱ्या बायकांचा पगार देताना होणारी घालमेल. पण गरीब लोकांचे कसे हाल होताहेत यावर गप्पा.
४.मैलोनमैल चालत घरी निघालेल्या लोकांवर - कशाला यांना घरी जायचंय, देव जाणे वगैरे टीका. पण स्वतःच्या होस्टेलवर असणाऱ्या मुलाला घरी यायला कशी शेवटची फ्लाईट मिळाली पण एअरपोर्टवर कसे हाल झाले याची दर्दनाक वर्णनं.
५. लॉक डाऊन हा निरनिराळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ घरी बनवून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी मिळालेला वेळ असावा अशा पद्धतीने केलेल्या पोस्ट्स. त्यासाठी लागणारं सामान आणायला (यात केक डेकोरेशनसुद्धा आलं!) रोज दुकानाच्या रांगेत उभं राहताना मजुरांच्या घरी जायच्या गर्दीविषयी रोष.
६. घर गाठायला नाईलाजापोटी चालताना रेल्वेखाली मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी जिवांविषयी करुणा न वाटता त्यांच्या बुद्धीविषयी शंका किंवा घरच्यांना एक दोन लाख रुपये मिळतात म्हणून मुद्दाम केलं असेल, ही संवेदनाशून्य मखलाशी.
७. स्वतः आज किती स्टेप्स/किलोमीटर चाललो, ऑनलाइन योगा किंवा वेट्स वगैरे कसे केले याचं सोशल मीडिया प्रदर्शन. स्लिम अँड फिट राहण्याने मेंटल हेल्थ चांगली राहाते नं ! पण ते एका टिनाच्या खोलीत दाटीवाटीने राहणारे लोक कसे बिनधास्त बाहेर फिरतात यावर मौलिक टिप्पणी.
८. फॅमिली बाँडिंगसाठी देश-विदेशातल्या नातेवाईक-मित्रमैत्रिणींंना आवर्जून केलेले व्हिडीओ कॉल आणि त्यासाठी केलेला नट्टापट्टा. पण बिल्डिंग मध्ये रोज कामाला येणारा अमराठी वॉचमन कुठून आला आहे, त्याचं पोट तो कसं भरतो हे विचारावं, असं सुद्धा न वाटणे.
९. करोना बाधित केसेसचा आकडा वाढत असताना ते कसे 'या झोपडपट्टीवाल्यांंमुळे' वाढत आहेत आणि परराज्यात गेलेल्यांना कसं परत येऊ देता कामा नये वगैरे मुद्दे मांडणे. त्याच वेळी मारवाड्याच्या दुकानात रोज सामान आणायला जाणे आणि मराठी दुकानदार कसे आळशी आणि माजुरडे असतात यावर मतप्रदर्शन.
१०.सुशांतसिंग किंवा सीमेवरची चायनीज आगळीक हे मुद्दे मिळाल्यावर रोख बदलून एकदम माणसाचा एकटेपणा आणि सीमेवरील जवान यांविषयी उठसूठ चर्चा करणे. शेवटी आपलं आयुष्य बरं आहे बुवा, असा सुस्कारा टाकणे.
११. ऑनलाइन शाळा आणि इंटरनेटस्पीड विषयी तक्रार करताना खेड्यापाड्यातली किंवा शहरातली गरीब मुलं काय करत असतील असा विचार डोक्यात आला तरी तो झटकून त्यांच्याकडे टिकटॉक बघायला इंटरनेट असतं की, वगैरे मौलिक विचार मांडणे.
१२. बॅन चायनीज गुड्स चा नारा देताना वन प्लस एट करता गुपचूप पैसे भरणे आणि आपण घेत असलेली औषधं सुद्धा मेड इन चायना आहेत याविषयी गंधवार्ता नसणे.
अजून बऱ्याच गोष्टी लिहिता येऊ शकतील. वर उल्लेखलेल्या गोष्टींंपैकी कोणतीही बाब मला लागू होत नाही, असा दावा अजिबात नाही. पण आपल्या समाजातील एका सुशिक्षित वर्गाने एका पिढीच्या अवधीत सुसंस्कृतपणा, जागतिक-सामाजिक परिस्थितीची जाणीव आणि सहानुभूती गमावल्याची ही ठळक चिन्हं आहेत. डोळ्यांवर पट्टी बांधून भोवतालचं काही दिसणार नाही, कानात बोळे कोंबून ऐकू येणार नाही पण 'आतल्या आवाजाचं' काय करायचं? तो ऐकावा असं वाटलं, तर निराशा येण्याची शक्यता अधिक. कारण आपण आणि आपले बहुसंख्य नातेवाईक आणि मित्रपरिवार याच गटात मोडतो..

टीप: अनेक लोकांनी एकमेकांना आणि अडचणीत असलेल्याना संवेदनशीलतेने बरीच मदत केल्याची उदाहरणेसुद्धा नक्कीच आहेत, पण माझ्या सभोवताली ती संख्येने कमी सापडली, किंवा वाचनात, प्रत्यक्षात दिसली/समजली नाहीत. अशा लोकांची आधीच क्षमा मागते.

Node read time
3 minutes

'न'वी बाजू Mon, 22/06/2020 - 13:51

पण आपल्या समाजातील एका सुशिक्षित वर्गाने एका पिढीच्या अवधीत सुसंस्कृतपणा, जागतिक-सामाजिक परिस्थितीची जाणीव आणि सहानुभूती गमावल्याची ही ठळक चिन्हं आहेत.

...एका पिढीच्या पूर्वी परिस्थिती याहून बरी होती, असे नक्की का बरे वाटावे?

shantadurga Mon, 22/06/2020 - 14:46

एका पिढीपूर्वी परिस्थिती कदाचित बरी नसेलही, पण निदान with us or against us असा टोकाचा विचार (निदान माझ्या आजूबाजूला तरी ) नव्हता. आज ban on Chinese goods प्रत्यक्षात आणायला किती अवघड आहे, असं बोलायची सुद्धा सोय नाही. हल्लाच होतो एकदम. आणि प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट सुद्धा होत नव्हता. यात मीडियाचा वापर हा भाग आहेच, पण हे नमस्ते ट्रम्प, टाळ्या-थाळ्या-दिवे , सेल्फी विथ डॉटर, मदरहूड डेअर वगैरे गोष्टी लोक उत्साहाने साजरे करत नसावेत.

तिरशिंगराव Mon, 22/06/2020 - 14:58

आत्ता असलेले प्रमुख नेतेच कसा भारताचा उद्धार करणार आहेत आणि भारत ही एक महासत्ता नक्कीच बनणार आहे अशी या बहुसंख्य आंधळी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांची खात्री पटली आहे. इतकी वर्षं , असा कोणीतरी जन्माला येणार आहे अशी आशा धरुन लोकं बसले होते. पण अजून तसा कोणाचाच अवतार जन्माला न आल्यामुळे , आहे त्यांतच आपला तारणहार त्यांनी शोधला आहे. त्यामुळे राजा बोले आणि प्रजा हाले, असा कठपुतळीचा खेळ चालूच रहाणार आहे.

घाटावरचे भट Mon, 22/06/2020 - 15:16

हा हन्त हा हन्त, हाय रे हाय मध्यमवर्ग... का ब्रे मी अशा मध्यमवर्ग नामक बौद्धिक दिवाळखोर सामाजिक स्तरात जन्माला आलो? चांगला गरीब खेडूत, परप्रान्तीय मजूर, आदिवासी वगैरे झालो असतो तर किती छान झालं असतं....

अस्वल Tue, 23/06/2020 - 01:42

In reply to by घाटावरचे भट

मला वाटतं तसं झालं असतं तर तुम्ही तुमचा प्रतिसाद
"हा हन्त हा हन्त, हाय रे हाय ... का ब्रे मी अशा गरीब खेडूत/परप्रान्तीय मजूर/आदिवासीनामक बौद्धिक दिवाळखोर सामाजिक स्तरात जन्माला आलो? चांगला मध्यमवर्ग वगैरे झालो असतो तर किती छान झालं असतं...."
असा टायपला असता.

घाटावरचे भट Tue, 23/06/2020 - 10:16

In reply to by अस्वल

तसं असतं तर मी इथे प्रतिसाद द्यायलाच कसा आलो असतो? कुठे तरी तडफडून मेलो नसतो का? लोकांना मध्यमवर्ग कसा असंवेदनशील आहे वगैरे सिद्ध करायला अजून बातमीस्वरूप मट्रियल झालो असतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/06/2020 - 19:49

In reply to by घाटावरचे भट

इथे जी निरीक्षणं मांडली आहेत; ती भले मराठी, मध्यमवर्गाची नसतील. पण जे कुणी असे वागतात त्यांचं वर्तन दुटप्पी आहे, हे पटतं का भटोबा?

घाटावरचे भट Wed, 24/06/2020 - 10:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माणसांच्या दुटप्पी वागण्याबद्दल काहीच दुमत नाही. पण लेखाचं पहिलं वाक्य -

कोव्हिड लॉकडाऊनच्या निमित्ताने मानवी वर्तणूक, विचार, लिखाण आणि अभिव्यक्ती याचं प्रदीर्घकाळ निरीक्षण, वाचन आणि मनन करायची संधी मिळाली.

म्हणजे वाचणाऱ्याची (पक्षी: माझी) अपेक्षा अशी की काही तरी मानव जातीबद्दल जनरलाईझ्ड विचार मांडले असतील. मग दुसरं वाक्य

माझा भोवताल आणि संपर्कातली बहुसंख्य माणसं शहरी, ब्राह्मणी किंवा फारातफार मराठा मध्यमवर्गीय.

याने लेखाचा/निरीक्षणांचा पट क्षणार्धात इतका लहान होऊन गेला, की पुढे लिहिलेलं सगळं लेबलिंग वाटलं. म्हणून मी प्रतिसाद दिला.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/06/2020 - 04:51

In reply to by घाटावरचे भट

दिसण्याएवढा, ढळढळीत दुटप्पीपणा करता येणं आणि तो टोचणं, हाही सधन, सुखवस्तुपणाचा भाग होऊ शकत नाही का? गरीब खेडूत/परप्रान्तीय मजूर/आदिवासीनामक लोकांचा दुटप्पीपणा कितीदा समोर येतो?

लहान मुलांचा बोबडेपणा क्यूट वाटतो; मोठी माणसं तसं लिहायला लागली, तर ते हास्यास्पद वाटतं तसंच...

. होय, हे प्रकार फेसबुकवर चालतात; ते करणारे ह्याच सुखवस्तू वर्गातले लोक असतात

shantadurga Thu, 25/06/2020 - 13:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात भटांना आक्षेप कशावर आहे तेच न कळल्यामुळे मी प्रतिसाद दिला नाही. छोटा कॅनव्हास असलेल्यांनी लिहिलेलं त्यांना मान्य नसावं बहुतेक.

चिमणराव Mon, 22/06/2020 - 17:49

अनुक्रमणिकेत एका ओळीत आणि दमात
अँग्री यंग (!) वुमन शान्तादुर्गा वाचल्याने घोळ झाला.
-------------
राष्ट्रवादळ पुन्हा आले.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/06/2020 - 20:40

मार्मिक

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/06/2020 - 04:17

करोनामुळे सुरुवातीला चार तासांची सूचना देऊन लॉकडाऊन झाला तेव्हा फेसबुकवर वाचलेलं मुक्ताफळ - व्हॉट्सॅपमुळे अफवा पसरतात, त्यावर बंदी आणा.

आजोळच्या खेड्याजवळ कातकरी वस्ती आहे. तिथल्या लोकांकडे रेशनला पैसे नव्हते; रेशनच्या दुकानातून काही मिळेल का ह्याचीही गंधवार्ता नव्हती; कातकरी लोक कसेबसे घरी पोहोचत होते; आजूबाजूच्या वाड्यांतले काही लोक उन्हात चालताना दगावलेही. ह्या लोकांसाठी भावानं काही पैशांची सोय केली; हे सगळं व्हॉट्सॅपमुळे शक्य झालं.

ह्यात माझा कबुलीजबाब असा की सदर स्त्री फार टोकाची भूमिका घेत आहे, असं मी तिला सांगायचा जाहीर प्रयत्न केला.

shantadurga Tue, 23/06/2020 - 10:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टीप टीका टाळण्यासाठीच तर लिहायची असते!
म्हणूनच मी भूमिका वगैरे न घेता निरीक्षणं मांडली आहेत. उगाच कोणाच्या भावना वेग्रे का दुखवाव्या ब्र :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/06/2020 - 19:47

In reply to by shantadurga

स्वभावाला मुरड घालून भूमिका न घेण्याचा प्रयत्न मी करते; जमतंच असं नाही.

करोनाच्या आधीसुद्धा माफक प्रमाणात अशा गोष्टी दिसत होत्याच. 'आम्ही जातपात मानत नाही; पण कामाला येणाऱ्या बायकांनी लिफ्ट वापरू नये.'

Rajesh188 Tue, 23/06/2020 - 12:00

तुमचे निरीक्षण योग्य आहे पण तुमची मत त्या निरीक्षण ला चीकटवली आहेत .
त्या मुळे तुमची तळटीप निष्प्रभ तुम्ही च केली आहे.
बाकी आम्हाला येथे स्वतःचे मत मांडणे सोयीस्कर वाटत नाही.
इथे स्वयंभू विद्वान खूप असल्या मुळे भीती वाटते .

यडमाठराव Tue, 23/06/2020 - 12:25

राजेशराव,
मी काय स्वयंभूभू नाय आन ईद्वान तं सांगतो, माह्या अख्या खानदानात कोनंच नाय. पार लांबच्या वळखीत, नात्यात, राहायला, बगितल्यांलं सुदिक कोनंच नाय.
आपन तुम्हाला फूल सपोर्ट हे. तुम्ही ल्ह्या. फकस्त विंग्रजीत नको. ते काय समजत नाय आपल्याया. आपल्याला म्हंजी मला. आपन लै आदर देतो सोताला.
तं मंग ल्ह्या आता पोटभर. काय म्हागं ठिउ नका ल्ह्यायाचं.

मन्या ऽ Wed, 24/06/2020 - 01:38

हे असे वादविवाद करुन लॉकडाऊनच्या काळात तोंडाची वाफ खुपदा वाया घालवलीये घरात.. आता असे विचार मनात आले, कि त्यावर अलगद हाताने माती पांघरते, आणि नवीन विचाराच बी पेरते.

अनुप ढेरे Wed, 24/06/2020 - 10:56

औषधे मेड इन चायना असतात हे चूक आहे. औषधांचे काही केमिकल कम्पोनंट चीनी असतात. पण बहुतांश औषधे भारतातच बनतात. भारताला जगाची फार्मसी असे म्हणतात.

आनन्दा Wed, 24/06/2020 - 11:02

In reply to by अनुप ढेरे

पटले.. मी पण हेच करतो.
बदल घडवायचा असेल तर स्वतः मध्ये पहिला बदल करायला लागतो.
बाकी जग आपोआप बदलत जाते.
तुम्ही आक्रस्ताळे तर जग पण आक्रस्ताळे, तुम्ही सहृदयी तर जग पण सहृदयी.
जगण्याचा सरळ सोपा मंत्र आहे हा.
मी मानतो, आणि जमेल तितका आचरणात पण आणतो...
गर्जेल तो पडेल काय आणि पडेल तो गर्जेल काय?

shantadurga Wed, 24/06/2020 - 11:38

In reply to by अनुप ढेरे

यच्चयावत सर्व औषधे मेड इन चायना असतात असं नाही. पण पेनिसिलीन सारखा बेस मॉलेक्यूल आपण चायनाकडून आयात करतो आणि मग त्याचे डेरिव्हेटीव्ह बनवतो. तोच मिळाला नाही, तर पुढे काय? पूर्वी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स तो बनवायची, पण आता नाही. ही भारताचीच नाही, तर जगातल्या अनेक देशांची स्थिती आहे.

अनुप ढेरे Wed, 24/06/2020 - 12:03

In reply to by shantadurga

अधिकाधिक ए पि आय वगैरे भारतात बनावेत यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत जे चांगल आहे. आणि सर्व रॉ मटेरियल चीनी आहे हेही खोटे आहे. अनेक कंपोनंट भारतात बनतात. भारतात मिळणारी औषधे चीनी असतात हे विधान चूक आहे आणि दिशाभूल करणारे आहे. भारत जगाला औषधे बनवुन देतो.

चीनी वस्तुंचा भारतीय उद्योगांना असलेला धोका हाही खरा आहे. इल्केट्रोणिक्स सोडा पण प्लास्टीकचे चमचे, सुया, खेळणी असल्या चिल्लर गोष्टी देखील चीनी असतात. या चीप आयातीने अनेक भारतीय उद्योगांना झोपवले आहे.

shantadurga Wed, 24/06/2020 - 12:20

In reply to by अनुप ढेरे

>>>अधिकाधिक ए पि आय वगैरे भारतात बनावेत यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत जे चांगल आहे.
--- प्रयत्न सुरु होणे आणि प्रत्यक्षात API भारतात तयार होणे, यांत फरक नाही काय? मीही याबाबत आशावादी आहे.
आणि दिशाभूल करायचा वगैरे माझा हेतू निश्चितच नव्हता.

मनीषा Sat, 04/07/2020 - 16:43

तुमचे मुद्दे तुमच्या परिघापुरते योग्य आणि खरे असतील.
पण इतकी हताश होण्याजोगी परिस्थिती आहे असे दिसत नाही.
काही जण आहेत ते यथाशक्ती मदत करताहेत.
त्यांना योग्यं तितकी प्रसिद्धी मिळायला हवी.
भारतीय समाज आणि तिथल्या समस्या अत्यंत गुंतागुंतीचा प्रकार आहे. त्यामुळे सरसकट एकच उपाय लागू पडू शकत नाही.
एक मात्रं खरे .. यात लोकसहभाग फार महत्वाचा आहे. सगळे नियम , बंधने तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, आणि समोर पोलीस काठी घेऊन उभे नसले तरी आपणहून त्यांचे पालन करणे हितकारक आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.