ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ९

प्रकरण ९ आयुर्वेदाची प्रॅक्टीस

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • कॅन्सर आणि आयुर्वेद
  • आमवात आणि संधिवात
  • मधुमेह
  • केस स्टडी
  • समालोचन
  • आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

***


कॅन्सर आणि आयुर्वेद

२०२२ सालाच्या सप्टेंबरमध्ये या विषयावर आठवड्याच्या अंतराने दोन लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये पसिद्ध झाले. एक विशिष्ट प्रकारचा कॅन्सर आयुर्वेदाच्या उपचाराने कसा बरा झाला याविषयी पहिला लेख होता.

लेखकाने स्वत:च हा एक केस स्टडी होता असे लिहिले आहे. आयुर्वेदाने जीवघेण्या गंभीर आजारावर मात करता येते, असे मत लेखकाने व्यक्त केले आहे.

माझ्या जवळच्या एक नातेवाईक, यांना स्वादुपिंडाचा (pancreas) कॅन्सर झाला आहे असे निदान ॲलोपथीच्या डॉक्टरांनी केले. या धार्मिक वृत्तीच्या, कीर्तन करणाऱ्या होत्या. त्यांच्या कुटुंबाने आयुर्वेदाचा उपचार करण्याचे निश्चित केले. त्यांना आठवड्यातून दोन वेळा भयंकर ओकाऱ्या होतील असे औषध देण्यात आले. स्वादुपिंडातील कॅन्सरच्या पेशी ओकाऱ्यांनी शरीराबाहेर जाण्याची अजिबात शक्यता नव्हती. एका बाजूला कॅन्सर दुसऱ्या अवयवात पसरत राहिला आणि या भयंकर ओकाऱ्यांनी या बाईंची तब्येत ढासळत गेली. साधारण तीन महिन्यांत या बाईंचा मृत्यू झाला.

आता हासुद्धा एक केस स्टडी नाही का? माझ्या एका अनुभवावरून आयुर्वेदाने कॅन्सर बरा होत नाही असा निर्णय काढणे अयोग्यच होणार नाही का? त्याच प्रकारे महाराष्ट्र टाइम्समधील केस स्टडीवरून आयुर्वेदाने कॅन्सर बरा होऊ शकतो असाही निर्णय काढता येणार नाही. मला माहीत असलेली केस स्टडी मी वृत्तपत्रात छापू नये आणि महाराष्ट्र टाइम्समधील केस स्टडी वृत्तपत्रात छापणे हे ही अयोग्यच आहे. एका केस स्टडीमधून काही सिद्ध होत नाही.

महाराष्ट्र टाइम्समधील लेखात अजून एक सत्य पुढे येते. वैद्य साहेबांनी कॅन्सरची वाढ किंवा कमी होणे हे मापण्यासाठी आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला. ही फार स्तुत्य बाब आहे. आयुर्वेदातील निदान चाचण्या आता कालबाह्य झाल्या असून आधुनिक निदान चाचण्या आयुर्वेदाने अवलंबिणे हे आयुर्वेदाच्या आणि रोग्यांच्या हिताचेच राहील.

या साखळीतील दुसरा लेख वृद्धांतील कॅन्सर या विषयावर होता. लेखाच्या शेवटी असे विधान आहे की हजारो वृद्ध कॅन्सर रुग्णांनी रसायन चिकित्सा उपचार घेतले त्यांच्यापैकी अनेकांना फायदा झाला. हजारोंपैकी 'अनेक' म्हणजे किती हा महत्त्वाचा प्रश्न होतो. हजारोंपैकी दीडशे हे पण कित्येक होऊ शकतात. याशिवाय ज्या संस्थेने हे उपचार केले त्या संस्थेने जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल वापरला तो एका विख्यात शास्त्रीय मासिकात प्रसिद्ध करणे जरूर आहे, तरच ते शास्त्रीय संशोधन समजले जाईल. जर हजारोंनी रोग्यांवर उपचार झाले असतील तर सांख्यिकीय महत्त्व दाखविणारा निर्णय मिळू शकतो.

यानंतर पुढच्याच आठवड्यात मटामध्ये अजून एक केस स्टडी प्रसिद्ध झाला. पुण्यातील दुसऱ्या एका आयुर्वेदिक औषधोपचार करणाऱ्या संस्थेतर्फे हा लेख लिहिला होता. एका स्त्रीचा स्तनाचा कॅन्सर आयुर्वेदिक उपचारांनी १२ वर्षे वाढला नाही असे लिहिले होते.

पहिल्या केस स्टडीमध्ये रसायन चिकित्सेचा वापर केला गेला असे लिहिले होते तर दुसऱ्या केस स्टडीमध्ये पंचकर्माचा वापर केला गेला असे लिहिले होते. या दोन्ही केसेसमध्ये जो ट्रीटमेंट प्रोटोकोल वापरला गेला तो सर्व आयुर्वेदाच्या तज्ज्ञांना माहीत झाला पाहिजे.

महाराष्ट्र टाईम्समध्ये २२ जानेवारी २०२३च्या अंकात मंगला नारळीकर यांचा त्यांच्या स्वत:च्या कॅन्सर आजाराविषयी लेख आला होता. त्या लेखातील भाग –

आम्ही वैद्य नानल यांचेकडे गेलो. मी त्यांना स्पष्ट विचारले, “आयुर्वेदात कॅन्सरसाठी औषध सांगितले आहे का?” त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “तसे औषध नाही. आयुर्वेदाची रचना झाली त्यावेळी आज या रोगाची जशी माहिती आहे तशी नव्हती. मी कॅन्सरसाठी औषध देणार नाही पण तुझे शरीर सुदृढ राहावे याचा प्रयत्न करणार आहे. मी त्यांची औषधे चार-पाच वर्षे घेतली. एकंदरीत प्रकृती चांगली झाली. त्यानंतर पुढील ३३ वर्षे मी निरोगी राहिले त्यांचे श्रेय मी केमोथेरपीला, आयुर्वेदाच्या औषधांना आणि माझ्या नैसर्गिक प्रकृतीला देते. त्यानंतर २०२१ साली पुन्हा आजाराचा प्रादुर्भाव झाला.

एका संदर्भात (Ayurveda and cancer, Roopesh Jain, Susmit Kosta, and Archana Tiwari, Pharmacognosy Res v.2(6); Nov-Dec 2010 , PMC3111701), वनस्पतीजन्य औषधांची एक यादी दिली आहे आणि ही सर्व औषधे कॅन्सर वर काम करितात याचा शास्त्रीय आधार आहे असे सांगण्यात आले आहे. या संबंधी झालेल्या प्रयोगांचा काहीही संदर्भ नाही. काही RCTचे निष्कर्ष नाहीत.

कनेडियन कॅन्सर सोसायटीचे म्हणणे असे –

There is no evidence at this time that Ayurveda as a system of medicine can treat cancer. There has been some research showing that certain approaches used in Ayurveda are helpful as complementary therapies. For example, research has shown that both yoga and meditation are helpful complementary therapies that can relieve stress and anxiety in people living with cancer.

NIHचे (National Institute for Health – US Health Department) एक प्रकाशन आहे. यात हळदीचा कॅन्सरच्या उपचारात काय परिणाम होतो याचे विवरण आहे. National Institute of Health / National Cancer Institute publication - Curcumin (Curcuma, Turmeric) and Cancer

हा एक मोठा अभ्यास झालेला आहे. त्यांनी काढलेला निष्कर्ष खालीलप्रमाणे –

Curcumin exhibits anticancer ability by targeting different cell signaling pathways including growth factors, cytokines, transcription factors, and genes modulating cellular proliferation and apoptosis. However, curcumin is not immune from side effects, such as nausea, diarrhea, headache, and yellow stool. Moreover, it showed poor bioavailability due to the fact of low absorption, rapid metabolism, and systemic elimination that limit its efficacy in disease’s treatment. Further studies and clinical trials in humans are needed to validate curcumin as an effective anticancer agent.

निष्कर्ष स्वच्छ आहे – अजून चाचण्यांची गरज आहे. पाश्चिमात्य जगतात आपल्याकडील बऱ्याच वनस्पतींवर अशा स्वरूपाचे संशोधन चालू आहे. एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे – याचा आयुर्वेदाशी काही संबंध नाही. ‘आमच्या’ हळदीवर संशोधन म्हणजे आयुर्वेदातील संशोधन होत नाही.

आमवात आणि संधीवात

(आमवाताची माहिती प्रकृतीचे अंतरंग भाग २, लेखिका वैद्य विजया लेले, आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर १९९१, पृष्ठ ८६, या पुस्तकातून)

आम म्हणजे शरीराला विषवत झालेले अन्न. सध्याच्या भाषेत टॉक्सिन. शरीरात आम आणि वातदोष प्रबळ झाला की आमवात होतो. हा आम वातदोषाबरोबर निरनिराळ्या सांध्यात जातो. जेथे आम असेल तेथे सूज येते, तो सांधा गरम राहतो. हालचाल करता येत नाही. भूक मंदावते.

आमवाताची कारणे – न पचणारा आहार घेणे, दीर्घकाळ वातानुकूलित वातावरणात राहणे, सतत पाण्यात काम करणे.

आमवाताची चिकित्सा – लंघन, लंघन सोडताना जव, बाजरी याची पेज घ्यावी, रोज रात्री एरंडेल घ्यावे.

एरंडाच्या बियाची खीर प्यावी, एरंडमुळाच्या काढयाने सांधे शेकणे, सुकलेले मुळे आणि सुंठ याचे पाणी प्यावे.

निरनिराळ्या प्रकारचे काढे घ्यावेत.

संधिवात

संधिवातावर आयुर्वेदिक उपचार कसे काम करतात हे पाहण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. ती खालील शोध निबंधात प्रसिद्ध करण्यात आली.
Ayurvedic management for Sandhivata Osteoarthritis of knee joints, Manisha Sharma et al, Ayu. 2013 Jan-Mar; 34(1): 49–55.

This study has been conducted to evaluate the efficacy of Ayurvedic multimodal management in Sandhigatavata . In present clinical trial, 50 patients of Sandhigatavata have been registered and have been given Snehana, Svedana, Mriduvirechana, Matrabasti, and Jalaukavacharana, along with oral medications like Yogaraja Guggulu and Ashvagandha Churna. On overall effect of therapy, 4% of the patients were relieved completely, while 24% have shown marked improvement, 50% moderate improvement, and 22% mild improvement. Results of follow-up showed mild improvement. Results of follow-up showed that marked improvement decreased, but moderate improvement was steady.

Continuing the study on a larger number of patients, with inclusion of more objective parameters to get better conclusions is suggested at the end of the study. Sandhivata is an incurable, but manageable disease, which is why the repetitive use of manual therapies is needed for a long time.

इंग्लंडमध्ये सप्टेंबर २०२२ महिन्यात इनसायडर मासिकात एक बातमी आली. एका ३७ वर्षीय गुजराती स्त्रीला संधिवाताचा त्रास होत होता. त्या स्त्रीने लंडनमधील एका आयुर्वेदिक डॉक्टराकडून औषधे घेतली. काही महिन्यातच यकृताच्या आजाराने त्या स्त्रीचा मृत्यू झाला. कोर्टाने महिलेच्या मृत्यूचे कारण आयुर्वेदिक औषधे हे ठरविले. आधीच्या लेखात निराळ्या संदर्भात ही माहिती आपण पाहिली आहे.

वरच्या लिखाणावरून असे दिसून येते की आयुर्वेदातील संधिवात हा आजार ॲलोपथीतील osteoarthritis आहे आणि आयुर्वेदातील आमवात हा ॲलोपथीतील rheumatoid arthritis असावा. आमवात आणि rheumatoid arthritis यांतील मोठा फरक म्हणजे आयुर्वेदाच्या सांगण्याप्रमाणे आमवात हा आम वाढल्यामुळे होतो आणि ॲलोपथीप्रमाणे rheumatoid arthritis हा आजार एक ऑटोइम्यून डिजिज आहे. Rheumatoid arthritis हा आजार पूर्णपणे बरा करण्याचे औषध अजून सापडलेले नाही. आयुर्वेदाचे डॉक्टर्स अर्थातच त्यांच्या वैद्यकाविषयी असे कधीच बोलणार नाहीत.

संधिवाताविषयीच्या लेखाचा विचार केला तर ॲलोपथीच्या डॉक्टराने तुम्हाला असे सांगितले की आमची ट्रीटमेंट घेतलीत तर तुम्ही पूर्ण बरे होण्याची शक्यता ४ टक्के आहे तर तुम्ही काय कराल? कारण वरील उल्लेखिलेल्या शोधनिबंधात तेच लिहिले आहे, 4% of the patients were relieved completely.

मधुमेह
गेल्या वीस वर्षांत मधुमेहावर आयुर्वेदिक औषधे काय परिणाम करतात यावर बरेच काम झाले आहे. अर्थातच सर्वच शोधनिबंधात आयुर्वेदिक औषधे काम करतात हाच निष्कर्ष दिसतो. ज्याला टाइप 2 डायबेटीस असे म्हणले जाते त्याविषयी आपण विचार करत आहोत. या सर्व संशोधनात बरीच औषधे एका वेळी वापरली गेली. प्रत्येक संशोधनात निरनिराळी औषधे निरनिराळ्या प्रमाणात वापरली गेली. अर्थातच पहिली गरज म्हणजे एक standard protocol बनविणे.

मधुमेहावरील ॲलोपथीचे औषधही चाचणी करून ठरवावे लागते कारण प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली आणि स्वादुपिंडाच्या कामात किती कमतरता आहे यावर औषधाचा डोस ठरतो. त्यामुळे एक-दोन दिवस औषध घेतल्यावर रक्तातील साखर पाहून मग डोस निश्चित करावा लागतो.

आयुर्वेदिक औषधांचा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल ठरत नाही तोपर्यंत त्यांचा वापर करणे अवघड आहे.

सिमनधर हर्बल या कंपनीच्या यसाका या औषधाची जाहिरात वाचण्यात आली. जाहिरातीच्या हेडलाइनमध्ये, 'यसाका आता क्लिनिकल चाचणीमध्येसुद्धा परिणामकारक ठरले', असे लिहिले आहे. ज्या शोधनिबंधात हा निष्कर्ष काढण्यात आला त्याचा संदर्भ देण्यात आला आहे.

Journal of Ayurveda Year : 2022 , Volume : 16 , Issue : 1 , Page : 4-10

Evaluation of clinical efficacy and safety of “Yesaka Liquid” (an ayurvedic liquid formulation) as add-on therapy to oral hypoglycemic agents in type ii diabetes patients, Pawankumar Godatwar et al.)

जाहिरातदाराने ‘यसाका आता क्लिनिकल चाचणीमध्येसुद्धा परिणामकारक ठरले’ असे विधान करणे हे अर्धसत्य आहे. ट्रायल झाली खरी पण ती add-on therapy म्हणून झाली. म्हणजे ॲलोपथीच्या औषधाबरोबर हे औषध देण्यात आले.

आपण येणाऱ्या भागात क्लिनिकल ट्रायल म्हणजे काय हे पाहणार आहोत. ५० रोग्यांना add-on therapy म्हणून औषध देणे आणि त्याला क्लिनिकल ट्रायल म्हणणे हे बरोबर नाही.

ही जाहिरात आणि इतर आयुर्वेदाच्या औषधांच्या जाहिराती वाचून अजून एक गोष्ट जाणवते. औषधे बनविणाऱ्या कंपन्यांनी आयुर्वेदाच्या डॉक्टरांना bypass केले आहे. बेधडकपणे या आजारावर हे औषध घ्यावे आणि त्याचा डोस असा असावा असे जाहिरातीत लिहिलेले असते.

अशाच एका जाहिरातीचा परामर्श डॉक्टर शंतनु अभ्यंकर यांनी १३ डिसेंबरला प्रसिद्ध झालेल्या लोकसत्तेच्या अंकात घेतला आहे (लेखाचा दुवा). त्यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने केलेले लिखाण वाचनीय आहे.

खालील शोधनिबंधात मधुमेहावर आयुर्वेदिक औषधांचा आढावा घेण्यात आला. (Ayurvedic treatments for diabetes mellitus, Kalpana Sridharan,Roshni Mohan,Sridharan Ramaratnam, and Deepak Panneerselvam PMC 2013 Jul 22.)

लेखकांनी काढलेला निष्कर्ष याप्रमाणे –

Although there were significant glucose-lowering effects with the use of some herbal mixtures, due to methodological deficiencies and small sample sizes we are unable to draw any definite conclusions regarding their efficacy. Though no significant adverse events were reported, there is insufficient evidence at present to recommend the use of these interventions in routine clinical practice and further studies are needed.

केस स्टडी

वर्तमानपत्रात आलेल्या तीन केस स्टडीजची आपण वर माहिती घेतली. शास्त्रीय मासिकातून अशा केस स्टडीज प्रसिद्ध होत आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. अशा केस स्टडीज खालील तीन लेखात रीपोर्ट केल्या आहेत.

  • Case Report – Ayurvedic management of spondyloepiphyseal dysplasia tarda, a rare hereditary disorder, Sarvesh Kumar Singh, Kshipra Rajoria, Journal of Ayurveda and Integrative Medicine, Science Digest
  • Case Report - AYURVEDIC MANAGEMENT OF LIVER CIRRHOSIS WITH PORTAL HYPERTENSION, VASANT PATIL, MADHURI RODD, Journal of Ayurveda and Holistic medicine, e ISSN- 2321-1563
  • Ayurvedic management of vicharchika, with special reference to eczema : A case report, Mahesh P. Savalagimath, Jyoti Rani, Santosh F. Patil

www.ijournalhs.org

या तीनही लेखात एक गोष्ट जाणवते – आयुर्वेदात काम करणाऱ्या डॉक्टरांनी आधुनिक investigative techniques वापरायला सुरवात केली आहे. आता सर्वांनी एकदिलाने अष्टविध परीक्षा याचा वापर बंद करून टाकावा.

लिवर सिरहोसिसवर उल्लेखिलेल्या शोधनिबंधात रोगाचे केलेल्या निदानाची नोंद पाहा :

Abdominal examination - Abdomen distended and mildly painful, fluid thrill present, shifting dullness present and skin over abdomen is glossy.

Asthavidha Pariksha
Nadi - 64 bpm, Mala – Vibandha, Gadha Mala, Mutra - Ksheena
Jihva - lipta, Shabda – Ksheena Svara, Sparsha - Anushnashita
Drik - Prakrit, Akriti - Krisha

Investigation USG Abdomen (21/08/2018):Impression: Changes of diffuse liver parenchymal disease, cirrhosis with portal hypertension.

Samprapti Ghataka (components of manifestation of disease) :
Dosha: Prana Vata, Samana Vata, Apana Vata, Pachaka Pitta,
Dushya: Rakta, Mamsa, Agni: Jatharagni, Aam: Jatharagnimandhyajanya
Srotasa: Raktavaha, Svedavaha and Udakavaha, Srotodusthi Prakara: Sanga
Vyadhi Udbhavasthana: Amashaya, Vyakta Sthana- Yakrita and Udara
Sancharasthana: Tvakamamsantara Agamya, Vyadhi Svabhava: Chirakari

रोगाचे निदान करण्यासाठी काय काय केले हे लिहिले आहे. हे कसे सादर केले आहे ते पहा. दहा ओळींमध्ये आयुर्वेदात सांगितलेल्या निरनिराळ्या चाचण्यांविषयी लिहिले आहे आणि मध्येच दोन ओळींत अल्ट्रासोनिक चाचणीविषयी लिहिले आहे. खरे पाहता केवळ याच चाचणीने रोगाचे निदान झाले आहे.

रोगाचे उद्भवस्थान आमाशय असे सांगितले आहे. सिरॉसिसचा उगम आमाशयात होत नाही.

परत एकदा सांगावेसे वाटते – एक केस स्टडी हे शास्त्रीय सत्य होत नाही. सत्याकडे जाण्याचे ते पहिले पाऊल आहे. केस स्टडीविषयी अजून एक नमूद करावेसे वाटते – एकही केस स्टडी आयुर्वेदिक उपचार काम करत नाही असे लिहित नाही. आपण पाहिल्याप्रमाणे शास्त्रात काय काम करत नाही हे सांगणेही महत्त्वाचे असते.

करोना काळात झालेल्या अनुभवांवर एक संशोधन प्रसिद्ध झाले. त्यात हे दाखवून देण्यात आले की विषाणूविरोधी औषधे (antiviral drugs) मृत्युदर कमी करू शकली नाहीत. अशा प्रकारचे नकारात्मक निष्कर्ष आपल्याला आयुर्वेदाच्या शोधनिबंधात वाचायला मिळणात नाही. आयुर्वेदात सर्व छान छान आहे!

शल्यचिकित्सा

सुश्रुताच्या काळात शल्यचिकित्सेत कशी प्रगत स्थिती होती ते आपण पाहिले. नंतरच्या दोन हजार वर्षांत काय झाले? आपण प्रगती तर केली नाहीच, असलेल्या ज्ञानाचाही वापर केला नाही.

Surgical practices in Ayurveda: a realistic analysis, Kishore Patavardhan and Manoj Kumaar, Journal of Ayurveda and integral medicine

इसवी सन पूर्व ६०० या काळात लिहिलेल्या सुश्रुत संहितेत निरनिराळ्या शल्यक्रियेविषयी लिखाण आहे. सुश्रुत बनारसमध्ये शल्यक्रिया करीत असत. त्यानंतर पुढील ७०० वर्षे शल्यक्रियेविषयी लिखाण सापडते. त्यानंतर इतर क्षेत्रात झाले त्याप्रमाणे या ज्ञानातही अंध:कार पसरला. १९५० सालापासून या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न पुणे आणि बनारस येथे चालू आहेत. Central council of Indian medicine या संस्थेने असे सूचित केले आहे की आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना काही प्रकारच्या शल्यक्रिया करता आल्या पाहिजेत. या दिशेने प्रगती करण्यासाठी शिकत असताना विद्यार्थ्यांना क्लिनिकल शिक्षण देणे जरूर आहे.

समालोचन

आयुर्वेदाचे उपचार कॅन्सर, मधुमेह, आमवात आणि संधीवात यांवर उपयुक्त ठरतात असे वाचनात येते. आपण पाहिले की वर्तमानपत्रातून अशा तऱ्हेचे लेख छापले जात आहेत. अशी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध न झालेली माहिती वर्तमानपत्रातून छापून प्रसिद्धी मिळविणे अयोग्य आहे. असे संशोधन प्रथम शास्त्रीय मासिकातून छापले गेले पाहिजे. त्यानंतर एका विशिष्ट कॅन्सर साठी काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल असावा हे कित्येक चाचण्यानंतर ठरविले पाहिजे. एक केस स्टडी हे शास्त्रीय सत्य होत नाही.
शास्त्रीय मासिकातून जे आयुर्वेदातील संशोधन प्रसिद्ध होत आहे त्यात हे दिसून येते की आधुनिक investigation techniques वापरात येत आहेत. हे स्तुत्य आहे. आयुर्वेदातील चाचण्या आता कालबाह्य झाल्या आहेत.

सारांश
गेल्या सात भागात आपण आयुर्वेदाच्या निरनिराळ्या पैलूंचा विचार केला. असे करताना काही प्रश्न उभे राहिले. ते कोणते?

आयुर्वेदात ज्या मूलभूत कल्पना आहेत त्यात धातू आणि त्रिदोष या महत्त्वाच्या कल्पना आहेत.

धातू म्हणजे शरीरातील निरनिराळ्या टिशूज. मेद धातू म्हणजे शरीरातील चरबी. मेद धातू सांध्यात वंगणाचे काम करतो. मज्जा धातू अस्थि धातुत बनतो इंग्रजीत त्याला बोन मॅरो म्हणतात. हाच धातू मेंदू आणि मज्जारज्जुत असतो. शुक्र धातू (Reproductive fluid or Semen), हा धातू मज्जा धातूपासून (बोन मॅरो) बनतो. सात धातूंचे सार या धातूत असते. शरीरशास्त्रदृष्ट्या धातुविषयीचे हे विचार किती चुकीचे आहेत. आयुर्वेदाने असे विचार त्यागून टाकायला नको?

त्रिदोष ही कल्पना पण शास्त्रीयदृष्ट्या खरी उतरणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्रिदोषावर उपचार ठरतात. आपण हे पाहिले की आयुर्वेदात हे लक्षण आणि हे औषध हा प्रकार चालू झाला आहे.

आयर्वेदातील परीक्षेत (चाचणी) नाडीपरीक्षेला महत्त्व आहे. नाडीपरीक्षेमुळे व्यक्तितील त्रिदोष समजतात असे सांगितले जाते. निरनिराळ्या प्रकारच्या रोगांचे निदान होते असेही बोलले जाते. ही परीक्षा पूर्ण व्यक्तिनिष्ठ आहे. कोणत्याही प्रकारचे मोजमाप होऊन ते नोंदविणे याची शक्यता नाही. वस्तुनिष्ठ चाचणी नसेल तर ती चाचणी संदिग्धच राहणार.

बरीच आयुर्वेदिक औषधे इतक्या निरनिराळ्या रोगांवर सांगितली जातात की त्या रोगांचा एकमेकाशी काही संबंध नाही. काही औषधात पाऱ्याचे भस्म असते जे शरीराला घातक असते. सुवर्ण भस्म आणि सुवर्ण मक्षिका भस्म यातील चलाखी आपण पाहिलीच.

आयुर्वेदाची औषधे दुष्परिणामरहित असतात असे सांगितले जाते. हे पूर्ण सत्य नव्हे याची उदाहरणे आपण पाहिली. कोणतेही रासायनिक संयुग एका प्रमाणानंतर शरीराला अपाय करणारच. आयुर्वेदिक औषधांना RCT अनिवार्य नाही. यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा काय फायदा आहे?

आयुर्वेदाच्या पदवी शिक्षणात मोठ्या प्रमाणावर ॲलोपथीचे शिक्षण दिले जाते. याची जरूर का पडावी? आयुर्वेद जर स्वयंपूर्ण आहे तर ॲलोपथीचे शिक्षण कशासाठी? आयुर्वेदाची पदवी घेतलेले डॉक्टर्स ॲलोपथीची औषधे देतात.

आज कोणतेही वर्तमानपत्र अथवा मासिक उघडा. आयुर्वेदाच्या औषधाची जाहिरात सापडणारच. कोणत्या आजारावर ते औषध आहे ते लिहिलेले असते. येथे या आजारावर हे औषध असे आयुर्वेदात नाही या नियमाची पायमल्ली होते. अशा प्रकारे इतर कोणतेही वैद्यक अशा प्रकारे औषधांच्या जाहिराती करत नाही. या जाहिरातीतून ‘शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले’ किंवा ‘क्लिनिकल ट्रायल्स पास झालेले’ अशा तऱ्हेची असत्य किंवा अर्धसत्य विधाने असतात. आयुर्वेदाच्या औषध कंपन्यांवर काही अंकुश राहिलेला नाही. आयुर्वेदाचे डॉक्टर्स यावर एक शब्दही काढत नाहीत.

आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी अधुनिक चाचण्यांचा वापर करणे सुरू केले आहे. परंतु आयुर्वेदाचा गंध यावा म्हणून अष्टविध परीक्षांचेही नाटक केले जाते. खऱ्या अर्थाने आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी आता रोग निदान आधुनिक चाचण्यावर करणे सुरू केल आहे. पण उघडपणे ते सांगितले जात नाही.

आयुर्वेदाच्या मासिकातून आणि बऱ्याच वेळी वृत्तपत्रातून निरनिराळ्या आजारावर केस स्टडी प्रसिद्ध होत आहेत. प्रथमत: वृत्तपत्रातून असे केस स्टडी प्रसिद्ध करणे अयोग्य आहे कारण त्यामुळे सामान्य माणसाची असा समज होते की या सर्व आजारांवर आयुर्वेदात उपचार आहेत. या शिवाय केस स्टडी हे शास्त्रीय सत्य होत नाही.

आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल?

याचे उत्तर देण्यासाठी आपण ३ ते ९ या भागांत जे पाहिले त्याचा विचार करू. आयुर्वेदाला शास्त्रीय मानदंड लावून काय दिसते ते पाहू.

ज्या मूल सिद्धांताच्या पायावर हे वैद्यक उभे आहे हे सिद्धांत कसे सिद्ध झाले? परत प्रयोग करून हे सिद्धांत पाहिजे तेव्हा सिद्ध करता येतील का? या प्रयोगातून काय प्रकारचे मोजमाप वापरण्यात आले? सुरुवातीला ग्राह्य धरलेले कोणते सिद्धांत नंतर चूक ठरले?

आयुर्वेदाची मूलभूत तत्त्वे आहेत त्रिदोष – धातू, आम आणि अग्नीकल्पना. आयुर्वेद सांगते की शरीरात पित्त, वात, आणि कफ असे तीन दोष असतात. या तिन्हींतला समतोल गेला की आजार उत्पन्न होतो. या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर पटवर्धन यांचे या विषयावरील मत आपण पाहिले. हा त्रिदोष सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या कसा सिद्ध करता येईल?

पित्त वाढणे याची काही लक्षणे असतील. ती लक्षणे विद्यार्थ्यांना शिकविली जात असतील. पण शास्त्र इथे थांबत नाही. एखादे तत्त्व शरीरात वाढले हे मोजल्याशिवाय शास्त्र थांबत नाही. त्याचप्रमाणे वात वाढला म्हणजे किती? कफ वाढला म्हणजे किती? या तिन्हींतला समतोल म्हणजे काय प्रमाणात?

आयुर्वेदाविषयी माहिती घेताना आपण पाहिले की त्रिदोष – आम, धातू आणि अग्नीकल्पना – या आयुर्वेदाच्या मूलभूत कल्पना आहेत. या विषयांची माहिती आपण आयुर्वेदाच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांवरून घेतली. या सर्व शोधनिबंधांत एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे या कशाचेच काही मोजमाप नाही. आणि मोजमाप नाही तर शास्त्र नाही.

शास्त्रीय प्रयोग त्रिदोष, नाडी किंवा अग्नी यांबाबत करता आले पाहिजेत. आपण पाहिलेल्या शोधनिबंधांत फक्त माहिती आहे. प्रयोग काही नाहीत. या विषयावर बनारस हिंदू विद्यापीठात आयुर्वेदातील शरीरशास्त्र शिकविणारे प्राध्यापक, किशोर पटवर्धन काय लिहितात ते पाहू – Confessions of an Ayurvedaa Professor हा निबंध इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स या मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाला. नंतर हा निबंध science, the wire येथे प्रसिद्ध झाला. त्या निबंधातील खालील उतारा –

Most of our research starts with the premise that these theories are true and are unquestionable. In science, nothing should take precedence over finding the truth. We must not hesitate to put our practices through scientific scrutiny. The scientific attitude is universal, and it cannot change from one stream to another. The immediate need is to evolve a rigorous method to identify such content in the present curricula of Ayurveda programmes that can safely be dropped. The logical next step is to subject our theories and principles to scientific scrutiny. Instead of teaching obsolete concepts in Ayurveda anatomy and physiology.

थोडक्यात आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याची गरज आहे.

प्रयोगांचे शोधनिबंध इतर तज्ज्ञांनी तपासल्यानंतर प्रसिद्ध केले जातात का?

आयुर्वेदात अशा तऱ्हेचे प्रयोग करून शोधनिबंध प्रसिद्ध करणे ही परंपरा नव्हती. आता असे प्रयोग करून शोधनिबंध प्रसिद्ध करणे याची आवश्यकता आहे. या प्रवृत्तीला हळूहळू सुरवात होत आहे. पण अजून पुष्कळ लांब रस्ता पुढे आहे.

रोगाच्या निदानासाठी काय प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. या चाचण्यांत काय मोजमाप केले जाते? चाचण्यांचे निष्कर्ष मानवी हस्तक्षेपाशिवाय रेकॉर्ड होऊ शकतात का?

रोगाच्या निदानासाठी मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, नेत्र, आकृती, नाडी या आठ चाचण्या केल्या जातात. परंतु या चाचण्यांत कोणतेही मोजमाप नाही मग रेकॉर्ड कुठले ठेवणार?

औषध देण्याअगोदर RCT केल्या जातात का? RCT कुठल्या संस्थेमार्फत केली जाते? या संस्थेची स्वायत्तता कशी राखली जाते?

सर्वांत महत्त्वाची बाब औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स. औषधांच्या चाचण्या का केल्या जात नाहीत? भारतात आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्लिनिकल ट्रायल्स केल्या जातात. आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी याचा जरूर विचार करावा.

आपण सर्व निकषांकडे पाहिले तर असे म्हणू शकतो की आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक मानता येणार नाही.

या बाबतीत एका डॉक्टरांचे काय मत आहे ते पाहू (डॉक्टर लेले, फायनान्शियल एक्स्प्रेस १, जून, २०२१)

Saying that aircrafts were first invented in the Vedic Age by a sage is sexy, but we have nothing available in the scriptures of the past which can help HAL or DRDO and boost India's aviation industry to match Boeings or Lockheed Martin. It is important to understand that the progress of science is dynamic.

The Allopathy-Ayurveda debate teaches us that having knowledge of history and getting stuck in history are two different things. It is important not to burden India's scientific community with the baggage of our past unnecessarily.

या विधानाचा अर्थ मी असा समजतो. दोन-तीन हजार वर्षांपूर्वी लिहिले गेलेले प्रत्येक विधान सत्य आहे हे गृहीत धरणे योग्य नाही. शास्त्रीय निकषाला लावून जे खरे ठरेल तेव्हढे वापरावे आणि बाकीचे त्यागावे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आयुषच्या केंद्रीय मंत्र्यांनी असे विधान केले – पारंपरिक उपचारपद्धतींबद्दल काही जण वैज्ञानिक पुरावे मागत आहेत. आज जागतिक पातळीवर आयुर्वेदाचा अभ्यास होऊन ते पुरावे जगासमोर आले आहेत. (म टा, ७ नोव्हेंबर २०२२) केंद्रीय मंत्र्यांना याची माहिती असेल तर त्यांनी आयुष मंत्रालयातर्फे हे जाहीर करून टाकावे की या आजारासाठी हे आयुर्वेदिक औषध काम करते हे या जागतिक प्रयोगातर्फे सिद्ध झाले आहे. पण असे होणार नाही. अशी गुळमुळीत विधाने करून निघून जाणे हाच प्रकार चालू असतो.

ता. क.
१५ फेब्रुवारी २०२३च्या लोकसत्ता संपादकीयात हाच विषय हाताळला गेला आहे. संपादकीयात चिनी प्राचीन वैद्यक आणि आयुर्वेद यांची तुलना करण्यात आली आहे. संपादकीयातील राजकीय संदर्भ वगळून काही भाग उद्धृत करतो –

आधुनिक काळात चीनने आपल्या औषधांचा बटवा कोणा बोगस बाबा-बापूच्या हाती दिला नाही. त्यामुळे प्राचीन जडीबुटीचा दावा करीत कोणाही दाढीधारी उपटसुंभास स्वत:च्या तुंबड्या भरण्याची आणि कर वाचवण्याची लबाड संधी त्या देशात मिळाली नाही. आज एकविसाव्या शतकातही चिनी उपचारपद्धती ताठ मानेने उभी आहे. कारण ती कधीही विज्ञानाच्या कसोटीला घाबरली नाही. आपल्या आयुर्वेदीय चलाखीप्रमाणे चिनी उपचारशास्त्र प्रोडक्ट पेटंट की प्रोसेस पेटंट या कृत्रिम वादात पडले नाही. त्यामुळे त्यांची आत्मवंचना टळली.

गायीच्या शेणात किरणोत्सर्ग रोखण्याची क्षमता असते असा बिनडोक युक्तिवाद करणारे लोकही त्या देशात उपजले नाहीत. सुरुवात म्हणून एका मानांकित रिसर्च संस्थेने गायीसकट सर्व प्राण्यांच्या मलमूत्रात खरोखरच काही गुणधर्म असतात का याचा शोध घ्यावा. चीनप्रमाणे आपल्या प्राचीन उपचार पद्धतीचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर अशा मूलभूत विषयांवर संशोधनाची गरज आहे. तसे केल्याने आयुर्वेदाचे दुकान मांडून बसलेले अनेक बडवे दूर होतील. आयुर्वेदास आज सर्वात मोठा धोका प्राचीन ज्ञानावर आपली दुकानदारी चालविणाऱ्या या कुडमुड्यांपासून आहे. त्यांना आवरणे ही काळाची गरज आहे.

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर

field_vote: 
0
No votes yet

'ऐसी अक्षरे'मधला लेख वाचला. त्यातली निरीक्षणे योग्यच आहेत. आपणही पाहतो की खास करून आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकून डिग्री मिळवणारे वैद्य जास्त करून आधुनिक पाश्चात्त्य औषधे जास्त देतात. कारण पेशंटला तत्काळ गुण हवा असतो, शिवाय दुखणे बळावले असेल तर आधुनिक पाश्चात्त्य औषधांना पर्याय नाही. पण आयुष डिपार्टमेंट मध्ये होमिओपाथीचाही समावेश आहे, याचे आश्चर्य वाटले. युनानी व सिद्ध औषधे ही बरीचशी आयुर्वेदिक औषधांसारखी असतात, योगशास्त्र शरीर व मन सुदृढ ठेवायला मदत करते, पण त्यात औषधे नसतात. होमिओपथी ही अगदी वेगळी औषधप्रणाली आहे. आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकापेक्षा वेगळ्या, पण सहजी उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायी औषध प्रणालींना एका जुडीत बांधून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. लहान गावात, जिथे मोठे हॉस्पिटल जवळपास नाही, ॲलोपथीचा डॉक्टर नाही, किंवा त्याची फी परवडत नाही, ते निश्चित या पर्यायी व्यवस्थेकडे वळत असतील. पण तेथे काम करणारे जर पाश्चात्त्य औषधे जास्त वापरत असतील, तर त्यांना Anatomy, physiology आणि आधुनिक औषधांचे उपयोग व side effects चांगले माहीत हवेत. पेशंटच्यासाठी जे औषध आजार लवकर आणि पूर्ण बरा करेल, ते उत्तम! कोणत्या प्रणालीचे आहे हे महत्त्वाचे नाही.

माझ्या बाबतीत, आमच्या घरी आयुर्वेदिक औषधे काही तक्रारींसाठी आधीपासून वापरली जात होती. खास करून पोटाचे विविध विकार, ताप, कावीळ, एकूण सर्दी खोकला इत्यादीसाठी. नंतर मुली लहान असताना, मुंबईत होमिओपॅथीची पुस्तके वाचून त्यांची कार्यप्रणाली समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातीलही काही औषधे उपयोगी वाटली. माझ्या मैत्रिणीचा याचा खूप अभ्यास होता, तिची औषधे गुणकारी असत.

तरीही आधुनिक पाश्चात्त्य औषधांना पर्याय नव्हता. उदाहरणार्थ शाळेत असताना मे महिन्यात सुट्टीत एकत्र जमलो, की टायफॉईड कॉलराचे इंजेक्शन घेतल्यावाचून रसवंतीगृहात उसाचा रस प्यायला व बाहेरची भेळ खायला परवानगी नव्हती. पेशंटचे बाळंतपण करताना आई शक्य तेवढा नैसर्गिक बालजन्म व्हावा म्हणून प्रयत्न करी, पण बाळाच्या किंवा आईच्या जिवाला थोडाही धोका वाटल्यास ताबडतोब सिझेरियन ऑपरेशनचा निर्णय घेत असे. घरातील मुलांना वेळेवर vaccines दिली जात.
मी कॅन्सरचा सामना करता असताना, सगळे उपलब्ध पाश्चात्त्य उपाय करून झाल्यावरही, कॅन्सर लपूनछपून पुन्हा येऊ शकतो याचा अनुभव घेतला. तेव्हा आयुर्वेदिक तत्वज्ञानाप्रमाणे आपली मूळ प्रकृती चांगली सुदृढ करता येईल अशा विश्वासाने मी वैद्य भा पु नानल यांची औषधे ४-५ वर्षे घेतली. दुसरी अधिक स्ट्राँग केमोथेरपी आणि आयुर्वेदिक औषधे, या दोन्हींचा मला फायदा झाला असे वाटते. एकूण विविध शारीरिक क्रिया चांगल्या चालाव्यात, वारंवार सर्दी खोकला होऊ नये, यासाठी आयुर्वेदिक औषधे चांगले काम करतात. आपण याला preventive medicine म्हणू शकतो. कॅन्सरशी दुसरा सामना झाल्यावर ३३ वर्षे तो गायब होता, याचे श्रेय मी स्ट्राँग केमो व आयुर्वेदिक औषधे यांना देते.
- मंगला नारळीकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होमिओपॅथी या विषयी इकडेच कुठे मागे मी लिहिले आहे. त्याची चिकित्सा म्हणून नव्हे तर कुटुंबात आजारपण येत गेले आणि आमच्या डॉक्टरने लगेच बरे केले. पुढे गाव बदलले तरी ओवरदकाउंटरने हात दिला. आयुर्वेदातील काही ठराविक काढे आणि चूर्णे घरी कायम असतं आणि ती वेळेला धावून येत.
या विविध प्रणाली बरोबर का नाही अशा अंगाने कधी विचार केलाच नाही.
बाकी चर्चा चांगलीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला मंगला नारळीकरांच्या वैयक्तिक अनुभवांवर कोणतीही टिपण्णी करायची नाही. मला फक्त एकच प्रश्न पडला, परंतु प्रश्न वैयक्तिक आहे तितकाच मला महत्त्वाचा वाटतो.

मंगला नारळीकरांचा देवावर विश्वास आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मंगला नारळीकरांचा देवावर विश्वास आहे काय?

हे सगळे कोणत्या दिशेने चाललेले आहे, याची मला यत्किंचितही कल्पना नाही, परंतु (किंवा कदाचित त्यामुळेच) प्रश्न रोचक आहे.

=====================

मला या निमित्ताने काही वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो, तो हा, की (डॉ. मंगला नारळीकरांचा) प्रस्तुत प्रतिसाद तथा त्याचे सादरीकरण, या दोन्ही गोष्टी काहीश्या दुर्दैवी आहेत.

डॉ. मंगला नारळीकरांच्या वैयक्तिक अनुभवांवर मलाही अर्थात कोणतीही टिप्पणी करायची नाही. ते अनुभव मांडण्याचे त्यांचे (एक व्यक्ती म्हणून) अभिव्यक्तिस्वातंत्र्यही अर्थात मान्यच आहे. (भले त्यातील काही बाबी सहमत होण्याजोग्या मला वाटल्या नाहीत, तरीही.) शिवाय, डॉ. मंगला नारळीकर यांचा प्रस्तुत प्रतिसाद हा, प्रस्तुत धाग्याच्या लेखकाने उद्धृत केलेल्या त्यांच्या (डॉ. मंगला नारळीकरांच्या) अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या विधानांसंदर्भात आहे, हे उघड आहे. (आणि, त्या अनुषंगाने तो प्रतिसाद सुस्थानी आहे.)

मात्र,

होमिओपथी ही अगदी वेगळी औषधप्रणाली आहे.

नंतर मुली लहान असताना, मुंबईत होमिओपॅथीची पुस्तके वाचून त्यांची कार्यप्रणाली समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातीलही काही औषधे उपयोगी वाटली. माझ्या मैत्रिणीचा याचा खूप अभ्यास होता, तिची औषधे गुणकारी असत.

प्रतिसादातील ही विधाने निव्वळ दुर्दैवी आहेत.

अर्थात, डॉ. मंगला नारळीकर यांची ही (एक सामान्य व्यक्ती म्हणून) अनभ्यस्त (किंवा कदाचित अभ्यस्तसुद्धा — ऑल्दो, याबद्दल प्रचंड शंका वाटते.) वैयक्तिक मते असूही शकतात. (आणि, एक सामान्य व्यक्ती म्हणून ती मते — किंवा, फॉर्दॅट्मॅटर, वाटेल ती मते — असण्याचा नि त्या मतांच्या अभिव्यक्तीचा अधिकार त्यांना अवश्य आहे.) अडचण अशी आहे, की डॉ. मंगला नारळीकर या केवळ एक सामान्य व्यक्ती नाहीत. त्यांना समाजात काही एक स्थान आहे, stature आहे. (ते stature हे केवळ डॉ. जयंत नारळीकरांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर of her own right आहे — स्थानिक स्त्रीवादी मंडळी काइंडली नोट.) त्या statureमुळे, समाजात त्यांच्या शब्दाला काही वजन आहे, मान आहे, किंमत आहे. अशा परिस्थितीत, (भले वैद्यकशास्त्र हे त्यांच्या expertiseचे क्षेत्र नसले, तरीही) त्यांची अशा प्रकारची जाहीर विधाने ही (त्यांच्याकडून) होमियोपथीची endorsement समजली जाण्याचा धोका उद्भवतो., (भले त्यांचा तसा कोणत्याही प्रकारे इरादा नसला, तरीही.) सबब, अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी, एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्या विधानांमागील तथ्यांबाबत काही किमान due diligence करण्याची जबाबदारी डॉ. मंगला नारळीकरांच्या खांद्यावर येऊन पडते.

--------------------

(यावरून एक काहीसा अवांतर, हायपॉथेटिकल प्रश्न / थॉट एक्स्पेरिमेंट: समजा, प्रस्तुत विधानांच्या धर्तीवरची जाहीर विधाने ही डॉ. मंगला नारळीकरांऐवजी डॉ. जयंत नारळीकरांनी जर केली असती, तर ती टीकेस पात्र ठरली नसती काय? मग, ceteris paribus, डॉ. जयंत नारळीकरांना उपलब्ध नसलेले दाक्षिण्य हे डॉ. मंगला नारळीकरांनाच तेवढे काय म्हणून उपलब्ध असावे?)

--------------------

हे झाले (डॉ. मंगला नारळीकरांच्या) प्रतिसादाबाबत. त्या प्रतिसादाच्या सादरीकरणाची गोष्ट आणखीच वेगळी.

प्रस्तुत प्रतिसाद हा डॉ. मंगला नारळीकरांनी स्वत:च्या खात्यातून स्वत: टंकलेला नाही. तर, 'ऐसीअक्षरे' व्यवस्थापनाने, आपल्या 'ऐसीअक्षरे' या सदस्यनामाने, 'मंगला नारळीकर यांची प्रतिक्रिया' या शीर्षकाखाली तो प्रसिद्ध केलेला आहे. हे दुर्दैवी तथा सर्वस्वी अनुचित आहे.

डॉ. मंगला नारळीकरांनी प्रस्तुत प्रतिसाद स्वत:च्या खात्यातून स्वत: न टंकण्याचे कारण अनाकलनीय आहे, परंतु तो मुद्दा तितकासा महत्त्वाचा नाही. मात्र, त्यांच्या विनंतीवरून 'ऐसीअक्षरे'च्या व्यवस्थापकमंडळींपैकी कोणी हा प्रतिसाद स्वत:च्या वैयक्तिक खात्याखाली ('मंगला नारळीकर यांची प्रतिक्रिया' या शीर्षकासहित) जरी प्रसिद्ध केला असता, तरी ते उचित ठरू शकले असते. कारण, त्या परिस्थितीत, प्रतिसाद प्रसिद्ध करणाऱ्या व्यवस्थापकसदस्याची भूमिका तथा जबाबदारी ही निव्वळ courtesyपुरती मर्यादित राहू शकली असती. ('ऐसीअक्षरे'च्या व्यवस्थापनाने डॉ. मंगला नारळीकरांचा प्रस्तुत प्रतिसाद छापण्यामागे निव्वळ courtesyव्यतिरिक्त कोणतेही कारण नसावे, याबद्दल निदान माझ्या मनात तरी कोणताही संदेह नाही.) मात्र, सद्य अवस्थेत या प्रतिसादातून 'डॉ. मंगला नारळीकर या होमियोपथीला endorse करीत आहेत, नि 'ऐसीअक्षरे'चे व्यवस्थापन हे डॉ. मंगला नारळीकरांच्या होमियोपथीच्या endorsementला promote करीत आहे' असा काहीबाही (hopefully चुकीचा) संदेश जात आहे.

'ऐसीअक्षरे'च्या व्यवस्थापनापैकी विचार करण्याची कुवत असलेले कोणी सदस्य कृपया याकडे लक्ष देतील काय?

=====================

तळटीपा:

डॉ. मंगला नारळीकरांच्या प्रतिसादास ताबडतोब आलेला अचरट ऐसीकर यांचा सहमतिदर्शक प्रतिसाद हे जर याच्या साक्षीचे उत्तम उदाहरण नसेल, तर मग ते नक्की कशाचे उत्तम उदाहरण आहे, असा प्रश्न पडतो.

एखाद्या खरोखरीच्या सामान्य व्यक्तीने — उदाहरणादाखल, 'न'वी बाजू यांनी, किंवा राजेश१८८ यांनी, किंवा फॉर्दॅट्मॅटर अचरट ऐसीकर किंवा विवेक पटाईत किंवा वामन देशमुख यांपैकी कोणी२अ — येथे 'ऐसीअक्षरे'वर — किंवा तत्सम सार्वजनिक फोरमवर — काहीबाही बेजबाबदार विधाने जरी केली, तरी (आमच्यापैकी एकाच्याही शब्दास समाजात काहीही किंमत नसल्याकारणाने — थोडक्यात, आम्हाला कुत्रेसुद्धा विचारीत नसल्याकारणाने) फारसे बिघडत नाही; किंबहुना, त्याने (समाजाला किंवा समाजाच्या दृष्टीने) काहीच फरक पडत नाही. त्यामुळे, वैयक्तिक अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या पांघरुणाखाली we can literally get away with it.२ब (फार फार तर 'अभ्यास वाढवा!' असा एखादा सल्ला आम्हाला मिळू शकतो; त्याकडे अर्थात आम्ही दुर्लक्ष करू शकतोच, नपक्षी तो सरळसरळ धुडकावून लावू शकतोच.) मात्र, समाजात काही stature असणारी एक व्यक्ती या नात्याने, डॉ. मंगला नारळीकर यांच्याकडून काही किमान अपेक्षा आहेत; आम्हां सामान्य मंडळींना उपलब्ध असलेली (काहीबाही विधाने बिनदिक्कतपणे करण्याची) ही luxury त्यांना उपलब्ध असू नये.

२अ डिस्क्लेमर: उपरोल्लेखित सदस्यनामे निव्वळ प्रातिनिधिक आहेत.

२ब किंबहुना, काही वर्षांपूर्वी, 'ऐसीअक्षरे'चा गब्बर सिंग नामक एक सदस्य, टोकाची विधाने करीत असूनसुद्धा, याच अभिव्यक्तिस्वातंत्र्याखाली he could consistently get away with it, असे स्मरते. अर्थात, गब्बर सिंग नामक सदस्यास समाजात बहुधा कुत्रे विचारीत नसल्याकारणाने, ते कदाचित ठीकच असावे.

माझ्या मते नक्कीच ठरली असती! नव्हे, तशी ती ठरणेच उचित ठरले असते!

हे उगाचच!

स्थानिक स्त्रीवाद्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला देण्याची निकड अशी नाही. स्वत:ला जरी देता आले, तरी पुष्कळ आहे. तसेही, श्रीमती सिमोन दि बोव्हार५अ यांची regurgitated मते पुन:पुन्हा वाचण्यात फारसे स्वारस्य नाही.

५अ याचा उच्चार जो काही असेल तो. प्रस्तुत उच्चार ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या एका लेखातून जसाच्या तसा उचललेला आहे.

डॉ. मंगला नारळीकर ज्या पिढीत वाढल्या, त्या पिढीतील बहुसंख्य मंडळी ही (जरी सुशिक्षित असली, तरीसुद्धा) जालनिरक्षर असतात, असे सामान्य निरीक्षण आहे. (याबद्दल त्या पिढीस दोष देण्याचा इरादा नाही; केवळ वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयास आहे.) त्यातसुद्धा, (निदान भारतात तरी) त्या पिढीतील पुरुषांच्या तुलनेत त्या पिढीतील स्त्रिया या जालनिरक्षर असण्याची शक्यता अधिक असते, याबद्दल फारसे दुमत नसावे. (स्थानिक स्त्रीवादीगण, प्लीज़ एक्स्क्यूज़. हे केवळ वस्तुस्थितीचे निरीक्षण आहे. अर्थात, यात दोष त्या स्त्रियांचा नसून याला बव्हंशी समाजपरिस्थिती कारणीभूत आहे, असे म्हणता येतील.) डॉ. मंगला नारळीकर या स्वत: जालनिरक्षर असतीलच, असा याचा अर्थ अर्थातच नव्हे; परंतु, तशा त्या असल्यास, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही, इतकेच. उलटपक्षी, समजा त्या जालसाक्षर असल्या, तरीसुद्धा, सातत्याने 'ऐसीअक्षरे'वर contribute करण्याचा त्यांचा इरादा नसल्यास, नि फक्त असे तात्कालिक आनुषंगिक प्रतिसाद आणि तेही क्वचितच प्रसिद्ध करण्याची त्यांची इच्छा असल्यास (आणि त्यातसुद्धा 'ऐसीअक्षरे'च्या व्यवस्थापकवर्गापैकी कोणाशी त्यांची व्यक्तिगत ओळख असल्यास), 'ऐसीअक्षरे'वर खाते न उघडता, 'ऐसीअक्षरे'च्या व्यवस्थापकवर्गास विनंती करून आपले प्रतिसाद त्यांनी येथे छापवून आणणे, यात गैर असे काहीही नाही.

वदतो व्याघात:? (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

मी इकडे या प्रणालीवर मते देण्याचे बंद केलंय.
प्रतिसादातले हे या विविध प्रणाली बरोबर का नाही अशा अंगाने कधी विचार केलाच नाही.
एक सामान्य व्यक्ती म्हणून काय घडले ते लिहिले. प्रणालीची समीक्षा नाही. लेखकाने प्रणालीच्या कसोट्या आणि सत्यता मांडल्या आहेत. त्याबद्दल वादच नाही.
माझी मते इथे रेटली नाहीत. फक्त अनुभव सांगितले लेखाच्या विषयाला धरून अनाठायी वाटत असले तरी नोंद करावीशी वाटली.
बाकी मी दिलेल्या मतांनी आणि इतर ग्राहक,वापरकर्ते यांच्यावर खूप परिणाम होईल असे वाटत नाही. प्रचारही नाही.
बाकी या वैद्यकीय प्रणाली वापरांत आहेत हे डोळ्याआड करणेही गैर आहे.
_____
प्रतिसादासाठी रेजिस्टर /लॉगिन (सभासद होऊन मत मांडणे) करणे फार अवघड नाही. वाचकांनी ते करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी मते इथे रेटली नाहीत. फक्त अनुभव सांगितले लेखाच्या विषयाला धरून अनाठायी वाटत असले तरी नोंद करावीशी वाटली.
बाकी मी दिलेल्या मतांनी आणि इतर ग्राहक,वापरकर्ते यांच्यावर खूप परिणाम होईल असे वाटत नाही. प्रचारही नाही.

आक्षेप आपल्या प्रतिसादाबद्दल नाही. किंबहुना, (मी आणि आपण, दोघांनीही वेगवेगळ्या वेळी मांडल्याप्रमाणे) ‘एक सामान्य व्यक्ती’ या नात्याने आपल्या (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, माझ्या) मतांना समाजात ‘असेच आणखी एकाचे आणखी एक मत’ याउपर अधिक महत्त्व, किंमत, वा वजन नसल्याकारणाने, (काही मर्यादांमध्ये, अर्थात) काय वाटेल ते मतप्रदर्शन करून (‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’च्या नावाखाली) त्याच्या उत्तरदायित्वातून आपण मोकळे होऊ शकतो. मात्र, डॉ. मंगला नारळीकरांच्या तोडीच्या व्यक्तीस सार्वजनिक मंचावर इतक्या ढिसाळ मतप्रदर्शनाची luxury उपलब्ध असू नये, असे वाटल्याकारणाने हा प्रतिसादप्रपंच.

बाकी या वैद्यकीय प्रणाली वापरांत आहेत हे डोळ्याआड करणेही गैर आहे.

एक फॅक्ट म्हणून या बाबीची दखल घेणे अर्थातच आवश्यक आहे. ही फॅक्ट अशी असावी की नाही, ही वेगळी गोष्ट. (परंतु, तो वेगळा मुद्दा आहे.)

प्रतिसादासाठी रेजिस्टर /लॉगिन (सभासद होऊन मत मांडणे) करणे फार अवघड नाही. वाचकांनी ते करावे.

असे झाल्यास बरे, असे मलाही वाटते. परंतु, अखेरीस हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.

====================

या मर्यादा नेमक्या काय असाव्यात, याबद्दल अर्थातच मतभिन्नत्व असू शकते, तथा याच कारणास्तव ते सुनिश्चित करणे कठीण असावे. (उदाहरणादाखल, ‘फडतूसांना गोळ्या घालाव्यात’ असे मतप्रदर्शन मर्यादाबाह्य ठरावे, असे कोणास वरकरणी भासू शकते खरे, परंतु, अशा मतप्रदर्शनातून कोठल्याही मर्यादेचे उल्लंघन होत असल्याबद्दल काही अधिकृत मतप्रवाह आढळला नाही. (चूभूद्याघ्या.) असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सद्य अवस्थेत या प्रतिसादातून 'डॉ. मंगला नारळीकर या होमियोपथीला endorse करीत आहेत, नि 'ऐसीअक्षरे'चे व्यवस्थापन हे डॉ. मंगला नारळीकरांच्या होमियोपथीच्या endorsementला promote करीत आहे' असा काहीबाही (hopefully चुकीचा) संदेश जात आहे.

'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित होणारे लिखाण ही लेखकांची अभिव्यक्ती असते, सबब त्यात त्यांची व्यक्तिगत मते असतात. व्यवस्थापन त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही.

तद्वत, सदस्य नसलेले लोकही 'ऐसी अक्षरे' वाचतात (किंबहुना, अशा वाचकांची संख्या लक्षणीय आहे हे लेखांची किती वाचने झाली आहेत त्यावरून अनेकदा लक्षात येते) आणि त्यावर खाजगीत किंवा इतर माध्यमांत व्यक्त होतात. त्यांच्या इच्छेनुसार प्रसंगी त्यांची अभिव्यक्ती इथे आणली जाते. तिलाही हेच तत्त्व लागू होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे डिस्क्लेमर येथे छापलेत, हे उत्तम केलेत. तसेच, (आधी म्हटल्याप्रमाणे) सदस्य नसलेल्या व्यक्तींचे प्रतिसाद त्यांच्या विनंतीने येथे छापण्याबद्दल per se आक्षेप नाही. (आधी म्हटल्याप्रमाणे, त्यात गैर असे काहीही नाही.)

मात्र, ‘ऐसीअक्षरे’ या आयडीखाली जर असे प्रतिसाद येथे छापणे असेल, तर (न-सदस्यांकडून आलेल्या) अशा प्रत्येक प्रतिसादाखाली असे डिस्क्लेमर छापणे उचित ठरेल. अन्यथा, it remains open to some serious misinterpretation, एवढेच लक्षात आणून देण्याचा हा प्रयत्न आहे.

(हे misinterpretation माझ्याकडूनच — किंवा फॉर्दॅट्मॅटर येथील एका सदस्याकडून वा एकाहून अधिक सदस्यांकडूनच — होऊ शकते, अशातला भाग नाही. किंबहुना, येथील सदस्यांकडून असे misinterpretation होण्याची शक्यता फारच कमी आहे, असेही मत (चूभूद्याघ्या.) येथे नोंदविण्याचे धाडस या निमित्ताने येथे करू इच्छितो. (किमानपक्षी, माझ्या मनात असे कोणतेही misinterpretation नाही. मात्र, असे misinterpretation होऊ शकते, हे मला चटकन लक्षात येऊ शकते.) ‘ऐसीअक्षरे’वर प्रसिद्ध होणारे material वाचणारे सर्वच जण ‘ऐसीअक्षरे’चे सदस्य असतील, असे नाही, ही बाब लक्षात घेता, अशा (संभाव्य) misinterpretationचा (बाह्य जगात) गैरफायदा घेतला जाऊ नये, यास्तव असे डिस्क्लेमर अशा (‘ऐसीअक्षरे’ या सदस्यनामाखाली प्रसिद्ध केलेल्या) प्रत्येक (न-सदस्याच्या विनंतीवरून छापल्या जाणाऱ्या) प्रतिसादाबरोबर छापणे हे महत्त्वाचे आहे.)

उलटपक्षी, असे (न-सदस्यांच्या विनंतीवरून छापले जाणारे) प्रतिसाद हे ‘ऐसीअक्षरे’ या आयडीखाली न छापता, व्यवस्थापकांपैकी एखाद्या सदस्याच्या व्यक्तिगत सदस्यनामाखाली छापल्यास त्याचे उत्तरदायित्व ‘ऐसीअक्षरे’वर राहणार नाही, अत एव असे डिस्क्लेमर छापण्याची आवश्यकता उरणार नाही, एवढेच सुचवावेसे वाटते.

सारांश:

१. डॉ. मंगला नारळीकरांनी येथे व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक मते जरी असली, तरी ‘समाजात काही stature असलेली व्यक्ती’ ही त्यांची स्थिती लक्षात घेता, त्यातील factual विधानांसंदर्भात त्यांच्याकडून असलेली due diligenceची अपेक्षा तथा त्या संदर्भातील आक्षेप कायम आहे. मात्र, हा आक्षेप डॉ. मंगला नारळीकर यांजप्रति व्यक्तिशः आहे; ‘ऐसीअक्षरे’प्रति नव्हे. (तसेच, आक्षेप हा केवळ due diligenceच्या अभावासंदर्भात आहे; जाणूनबुजून दिशाभूल वा फसवणूक करण्याचे कोणतेही उद्दिष्ट त्यांजवर लादलेले नाही, याची कृपया नोंद व्हावी. (किंबहुना, त्यांचे तसे कोणतेही गैरवाजवी उद्दिष्ट नसावे, हे त्या प्रतिसादाच्या एकंदर टोनवरून निदान मला तरी उघड होते.) मात्र, समाजात काही स्थान असणाऱ्या त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून जाहीररीत्या व्यक्त होताना निदान इतक्या तरी किमान due diligenceची अपेक्षा ही अति नसावी.)

२. ‘ऐसीअक्षरे’ने एखाद्या न-सदस्याच्या विनंतीवरून अशा न-सदस्याचे प्रतिसाद येथे छापण्यासंदर्भात आक्षेप नाही. (किंबहुना, त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही.) मात्र, असे प्रतिसाद ‘ऐसीअक्षरे’ या सदस्यनामाखाली छापणे असल्यास, संस्थळाच्या उत्तरदायित्वाचा अव्हेर करण्याच्या दृष्टीने अशा प्रत्येक प्रतिसादासोबत वरीलप्रमाणे डिस्क्लेमर जोडणे इष्ट आहे; नपक्षी, व्यवस्थापनापैकी एखाद्या सदस्याच्या व्यक्तिगत सदस्यनामाखाली असे प्रतिसाद प्रकाशित केल्यास, (संभाव्य) उत्तरदायित्वाची ही अडचण तथा तिच्या निवारणार्थ डिस्क्लेमर छापण्याची आवश्यकता दोन्ही उरणार नाहीत, एवढेच सुचवावयाचे आहे. (कितीही खाजगी संकेतस्थळ म्हटले, तरी शेवटी पब्लिक डोमेनमध्ये आहे, याचे विस्मरण होऊ नये. (किंबहुना, ‘सदस्य नसलेले लोकही 'ऐसी अक्षरे' वाचतात (किंबहुना, अशा वाचकांची संख्या लक्षणीय आहे हे लेखांची किती वाचने झाली आहेत त्यावरून अनेकदा लक्षात येते)’ असे आपणच वर निर्देशित केलेले आहे.))

इत्यलम्।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगलाताईंनी दोन चार दिवसांनी मतांवर आलेले प्रतिसाद वाचून ऐसीकडे उत्तर पाठवले तर बरे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होमिओपथीही तितकीच illogical आहे, जितकी 'देव' ही संकल्पना !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होमिओपथीचे effects हे placebo effect मुळे होतात. म्हणजे, आपण औषध घेतोय, या विचाराने दिलासा मिळून मानसिक शक्ती मिळते. त्यामुळे काही लक्षणे कमी होतात, शरीर आपले आपण रोगाचा प्रतिकार करते. देव या संकल्पनेचेही साधारण असेच फायदे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होमियोपथी आणि देव यांतील हे साधर्म्य आपण जे सांगितलेत, ते बरोबरच आहे, परंतु त्याचबरोबर, (या दोहोंत) एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे, जो आपल्या लक्षात आलेला दिसत नाही.

बोले तो, होमियोपथीचे “औषध” जितके विरळ (पक्षी: “औषधा”चे प्रमाण जितके कमी), तितके ते अधिक सक्षम (potent), अशीही कायशीशी होमियोपथीची एक संकल्पना आहे. अशीच कायशीशी संकल्पना देवाच्याही बाबतीत जर लागू पडती, तर काय बहार येती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव आणि आयुर्वेद ह्या मध्ये अजून एक साम्य व आहे.
ह्या दोन्ही गोष्टी illogical आहेत पण बहुसंख्य लोक ह्याच गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात.त्या सत्य च समजतात.

अगदी जगाच्या लोकसंख्येत अशा लोकांची टक्केवारी काढली तरी तो खूप प्रचंड निघेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात तरी आयुर्वेद(, एकंदरीत सर्व च प्राचीन ज्ञान ,जे हजारो वर्ष अनुभवातून आलेले आहे)
आणि आताची आधुनिक मेडिकल पद्धत.

ह्यांच्यात जी टोकाची भांडणे आहेत ती फक्त आणि फक्त व्यवसायिक आहेत.
आधुनिक डिग्री घेतलेले डॉक्टर च आरोग्य विषयी सर्व काही समजतात असे नाही.
जीवशास्त्र शिकणारे पण शरीराचे कार्य कसे चालते हे डॉक्टर न पेक्षा खूप उत्तम समजतात.
Microbiology वाले तर खूप उत्तम समजतात.
पण प्राचीन ज्ञान,आणि आरोग्य शास्त्र त्या मध्ये आयुर्वेद आणि बाकी सर्व असेल ह्यांचं विरुद्ध कोण असते तर डॉक्टर सरळ आहे हा व्यवसायिक प्रश्न आहे.
कॅन्सर,मधुमेह हे आजार नाहीत तर शरीराचा बिघाड आहे.
हे रोग फक्त थांबवता येतात बरे करण्याची कुवत आज पण नाही.
Chemotherpy नी कॅन्सर ग्रस्त पेशी नष्ट होतील पण तसाच कॅन्सर ग्रस्त पेशी निर्माण करण्याचा जो बिघाड शरीरात निर्माण झाला आहे तो कसा दुरुस्त होईल .
आरोग्य म्हणजे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे ?
आणि प्रश्न च महत्वाचा आहे.
उत्तम आरोग्य कसे असावे आणि ते कसे मिळवावे.
ह्या वर फक्त आणि फक्त प्राचीन अनुभव चे बोल च नीट गाईड करतात.
आधुनिक शास्त्र नाही.
हजारो diet पद्धती आधुनिक शास्त्रात आता आहेत पण सर्व च्या सर्व फेल आहेत.
पारंपरिक डाएट हेच उत्तम डाएट हे लोकांस नीट समजते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात तरी आयुर्वेद(, एकंदरीत सर्व च प्राचीन ज्ञान ,जे हजारो वर्ष अनुभवातून आलेले आहे)
आणि आताची आधुनिक मेडिकल पद्धत.

ह्यांच्यात जी टोकाची भांडणे आहेत ती फक्त आणि फक्त व्यवसायिक आहेत.
आधुनिक डिग्री घेतलेले डॉक्टर च आरोग्य विषयी सर्व काही समजतात असे नाही.
जीवशास्त्र शिकणारे पण शरीराचे कार्य कसे चालते हे डॉक्टर न पेक्षा खूप उत्तम समजतात.
Microbiology वाले तर खूप उत्तम समजतात.
पण प्राचीन ज्ञान,आणि आरोग्य शास्त्र त्या मध्ये आयुर्वेद आणि बाकी सर्व असेल ह्यांचं विरुद्ध कोण असते तर डॉक्टर सरळ आहे हा व्यवसायिक प्रश्न आहे.
कॅन्सर,मधुमेह हे आजार नाहीत तर शरीराचा बिघाड आहे.
हे रोग फक्त थांबवता येतात बरे करण्याची कुवत आज पण नाही.
Chemotherpy नी कॅन्सर ग्रस्त पेशी नष्ट होतील पण तसाच कॅन्सर ग्रस्त पेशी निर्माण करण्याचा जो बिघाड शरीरात निर्माण झाला आहे तो कसा दुरुस्त होईल .
आरोग्य म्हणजे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे ?
आणि प्रश्न च महत्वाचा आहे.
उत्तम आरोग्य कसे असावे आणि ते कसे मिळवावे.
ह्या वर फक्त आणि फक्त प्राचीन अनुभव चे बोल च नीट गाईड करतात.
आधुनिक शास्त्र नाही.
हजारो diet पद्धती आधुनिक शास्त्रात आता आहेत पण सर्व च्या सर्व फेल आहेत.
पारंपरिक डाएट हेच उत्तम डाएट हे लोकांस नीट समजते
समजा रोगांचा राजा.
कॅन्सर.
मला पण झाला आहे हाडांचा झाला आहे.
आणि अशा अनेक लोकांना पण हाडांचा च झाला आहे
त्या मधील एकच वयातील रोग ग्रस्त ह्यांचं जरी अभ्यास केला.
एकच उपचार जी क्लिनिकल trial मध्ये खरी उतरली आहे.
एकच आहार ज्याची गरज आहे .ती उपचार पद्धती आणि तो आहार जरी सर्वांना सामान दिला तरी
रोग मुक्त (म्हणजे मरेपर्यंत परत कॅन्सर झाला नाही ).
आणि काही वर्षाच्या फरकाने ती लोक मेली तर .
ती उपचार पद्धती अयोग्य होती असे म्हणाल का?
जी उपचार पद्धती सर्व क्लिनिकल trial मध्ये यशस्वी झाली आहे.
पण असे घडते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्थळांवर नकोशा येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला मला तरी पटली नाही.
सोयीस्कर अर्थ काढणे आणि अजेंडा राबवणे हाच हेतू.
Covid लसी मुळे heart attack तरुण वयात येत आहेत.
मग क्लिनिकल trial काय घेतली आणि त्याला मंजुरी कशी मिळाली
Covid काळात corona पेक्षा उपचार नी जास्त लोक मेली .
ह्या वर बहुसंख्य लोकांचे अनुभव नी एकमत आहे..
त्या वर सुधीर भिडे नी एक तरी पोस्ट करावी
निःपक्षपाती असणे ..हे जगातील सर्वात कठीण काम आहे

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1