"वपुर्झा"... एक "आनंदानुभव"…
सुरुवात कशी आणि कुठून करावी हे कळत नसलं तरी सुरुवात करतोय...
खरं तर "व .पु." यांच्या लिखाणावर काही भाष्य अथवा टिप्पणी करणं इतकी माझी तरी औकाद नाही, पण "वपुर्झा" वाचतांना जो काही "आनंदानुभव" आला तो सांगावासा वाटतोय, बस्स...
काही दिवसांपूर्वीच हे पुस्तक वाचायला हाती घेतलं, आणि विशेषतः हेच पुस्तक हाती घेण्याचं कारण म्हणजे, अधून-मधून "वपुर्झा" मधील काही उतारे विविध माध्यमांतून नजरेस पडत होते किंबहुना काळजात शिरत होते... ते उतारे वाचतांना "व .पु." यांच्याबद्दल दिवसेंदिवस आदर वाढतच जात होता... मग कधी मी ते पुस्तक विकत घेतो आणि वाचतो असं झालं होतं...
वाचायला सुरुवात झाली ती प्रस्तावनेने…
व.पुं.नी प्रस्तावनेत "मुख्पृष्टातला पेला रिकामा का?" ह्याबद्दल सांगितलंय...
ते स्पष्टीकरण वाचून व.पुं.मधला माणूस किती सच्चा आहे याची प्रचीती येते...
"हा पेला त्या आकाशाचे नित्यनूतन
दान स्वीकारण्यासाठी,
कायम रिताच राहावा.
असा मला आशीर्वाद द्या!"
ही प्रस्तावनेतली शेवटची ओळ सांगून जाते की, हा व्यक्ती प्रसिद्ध लेखक, कथकथनकार असला तरी गर्वशून्य आणि अतिशय नम्र आहे...
एका मागोमाग उतारे वाचत होतो , प्रत्येक उतारा वाचतांना मनात यायचं की हा उतारा खूप सुंदर आहे, यावर खुण करून ठेवूयात, म्हणजे नंतर पुन्हा कधीतरी वाचायला बरं...
मग पेन्सिल घेऊन खूणा करण्यास सुरुवात केली, आणि मग वाचता-वाचता असं लक्षात यायला लागलं की माझ्याकडून जवळपास प्रत्येकच उताऱ्याला खुण केली जात आहे...
आणि याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात आली की हे नजरचूकीने होत नसून, व.पुं. च्या धारदार आणि प्रभावी लेखनशैलीचा परिणाम होता...
उताऱ्यामागून-उतारे, पानांमागून-पानं पुढं सरकत होती, प्रत्येक उतारा काहीतरी नवीन शिकवून जात होता...
प्रत्येक उताऱ्यागणिक, कधी न उमगलेलं कोडं कसं आपसूक उलगडत होतं...
पण पानं पलटवतांना, "हे पुस्तक लवकर संपून तर नाही ना जाणार?" अशी एक अनामिक भीतीही उरत दाटून यायची…
" 'जगायचं' - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं - म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नंही हवीत.
केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात.
भोगून पार केलेली संकटं आणि यातना, त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात.
त्याची नशा माणसाला गस्त बनवते, मस्तवाल बनवत नाही..." - व .पु.
माणूस भूतकाळापासून कायमच पळत आलेलाय, प्रत्येकाची करणं फक्त तेवढी निराळी असतात…
वरच्या उताऱ्यात व.पुं.नी भूतकाळ असण्याचं महत्व ज्या पद्धतीने समजवलय, त्याने मला तरी "भूतकाळ" असल्याचा अभिमान वाटायला लागलाय आता (जो कधीकाळी असहनीय वाटायचा)…
माझ्या मते, व.पुं. च्या लेखनाची खासियत म्हणजे वाचकाला क्षणभर थबकावून विचार करण्यास भाग पडणे, गोष्टी इतक्या सध्या अन सोप्या शब्दात मांडणे की, वाचतांना असं वाटल्यावाचून राहणार नाही की, "माझ्यासोबातही हेच घडलं होतं (अथवा घडत आहे), पण मी ह्या दृष्टीकोनातून कदाचित विचार केला नव्हता, नाहीतर मी देखील हा सकारात्मक उपाय योजू शकलो असतो" किंवा "हो, यापुढे मी ह्या दृष्टीने जरूर विचार करेन"...
ही त्यांची कलाच म्हणावी की ते वाचकाला एखाद्या गोष्टीकडे, परिस्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघण्यास प्रवृत्त करतात...
त्यांच्या मार्मिक लिखाणातून व.पुं. चं व्यक्तिमत्व किती विस्तृत आणि सकारात्मक होतं हे ध्यानास येतं...
त्यांचा गाढा अनुभव, त्याचं अलौकिक निरीक्षण सामर्थ्य, त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीतून पाझरत असतं...
माणसाच्या स्वभावाच्या तसेच भावनेच्या दरेक पैलूला, गुणांना, दोषांना इतक्या सुंदर रीत्या शब्दांत मांडणं आपण व.पुं. कडून शिकावं…
"व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" ह्या विधानाला दुजोरा देत त्यांनी त्या प्रत्येक "प्रवृत्ती" बद्दलचे बारकावे, त्यातली गुंतागुंत अत्यंत डोळस पद्धतीने मंडलीये… व .पु. याला "Patterns" म्हणत असत…
पुढील काही उतारे याची जाणीव नक्कीच करून देतात -
"माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो.
पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो."
"माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत.
जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.
आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही.
एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं वाटतं. असं का?
- ह्याला उत्तर नाही."
एखादी गोष्ट, एखादा मुद्दा समोरच्याला पटवून कसं द्यावं याबाबतीत, मला वाटतं की कदाचितच कुणी त्यांचा हात धरू शकेल...
कारण समोरच्याला फक्त उपदेश देऊन मोकळं होणाऱ्यांपैकी व.पुं. नाहीत, इथे समर्पक आणि वास्तविक उदाहरणांची - स्पष्टीकरणाची जोड असते...
"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका."
"प्रेमभंगाचं दुःख असो वा कोणतही न पेलणारं दुःख असो.
'सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.असा एखादा अनुभव.'"
एक उतारा वाचून तर मला खूप हलकं झाल्यासारखं वाटलं, कारण माझ्या कविता अथवा माझ्या इतर लेखांबद्दलची जी गोष्ट मला सारखीच सलत होती, त्यात काहीही वावगं नसल्याची जाणीव मला व.पुं. नी करून दिली ती याप्रमाणे -
"माझं वैयक्तिक आयुष्य माझ्या साहित्यापासून लांब नाही म्हणूनच मला 'वाङमयीन अलिप्तता' साधलेली नाही हे मला जाणवतं, पण त्याच वेळेला माझ्यातल्या लेखकाच्या आणि माणसाच्या संवेदना एकंच आहेत ह्याचा मला अभिमान वाटतो."
व.पुं. च्या लिखाणातून त्यांच्यातला द्रष्टा माणूस प्रत्ययास येतो… त्यांचे काही मुद्दे, खास करून राजकारण, समाज आणि व्यक्ती यांवरील त्यांची मतं, यांत त्यांचा "दूरदृष्टीकोन" नेहमीच झळकत असतो…
विशेष म्हणजे २५-३० वर्षांपूर्वी या माणसाने वरील विषयांवर जे भाष्य करावं ते अगदी आजही जसंच्या तसं लागू व्हावं हे चमत्कारिक तर आहेच, पण त्यांची विचारशक्ती किती तगडी अन असीम होती हे लक्षात येतं…
ज्यादिवशी शेवटचं पान आलं, तेव्हा मी थोडा हळवा झालो, कुणास ठाऊक का?
व.पुं. शी गप्पा मारण्याचा शेवटचा दिवस उजाडला होता, बहुधा त्यामुळे…
पुस्तक वाचून संपल्यावर आणखी एका गोष्टीचं वाईट वाटलं की, "हे पुस्तक मला काही वर्षे अगोदर काही नाही मिळालं?"
"वपुर्झा" बद्दल कसं आणि किती लिहावं याला बहुधा मर्यादा नाही, सारं कसं कमीच पडेल… म्हणूनच "मनातलं सगळं सांगून झालंय आता" असं वाटत नसलं तरी स्वतःला इथेच थांबवतो…
एवढंच सांगावसं वाटतंय की, आयुष्य किती यापेक्षा "कसं" जगावं ह्याबद्दल व.पुं. चं "वपुर्झा" एक उत्तम मार्गदर्शक ठरेल…
ज्यांनी हे पुस्तक अजून वाचलं नाहीये, त्यांनी तर जरूर-जरूर वाचावं…
जाता-जाता व.पुं.शी झालेलं माझं शेवटचं संभाषण सांगून जातो -
"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही.
वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव
जोडायचे असतात.
म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं.
करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची
घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
'साहित्य हे केवळ चुन्यासारखं असतं.'
त्यात आपल्या विचारांचा कात
टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ
रंगत नाही.
आणि लेखकाला हवा असतो तो संवाद.
त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही." - व. पु. काळे.
व.पुं.ना माझा साष्टांग दंडवत…
- सुमित
प्रतिक्रिया
चांगला परिचय....
चांगला परिचय....
.
अवांतर :-
फार फार मागे, दशकभरापूर्वी, फारसे काही समजत नसताना सुरुवातीला जी काही पुस्तके वाचली त्यातली काही व पुं ची होती. सुरुवातीला त्याची ग्रिप जाणवली; पण अल्पकाळच. नंतर नंतर दरवेळेला तत्वज्ञान सांगणे/मांडणे किंवा quotations बनवायचा प्रयत्न करणे ह्याप्रकाराचा कंटाळा येउ लागला.
आता तर नक्की काय वाचलं होतं हेही आठवत नाही; पण "आपल्याला वपु आता आवडत नाहित" इतकं इम्प्रेशन डोक्यात पक्कं आहे.
पण म्हणून ते इतर कुणाला आवडूच नयेत का? तसेही नाही. तो एक वेगळा प्रकार आहे; आणि आता इतर प्रकारांत अधिक रस आहे(किम्वा कुठल्याच वाचनात फारसा रस नाही) इतकच.
(वसंत कानेटकरांच्या नाट्यसंहितांबद्दलही हीच तक्रार माझी आहे, पण ते ह्यामानाने सौम्य आहेत. )
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जवळ जवळ दहा वर्षापुर्वी समस्त
जवळ जवळ दहा वर्षापुर्वी समस्त वपु वाचून काढले होते. त्या वेळी लायब्ररी , किंवा फुकटेगिरी हेच साधन होते. पण त्यातील काही आपण विकत घेऊन संग्रही बाळगावी अशी तेव्हा फार इच्छा होती.
मध्ये दहा वर्षे गेली, आता पुस्तके विकत घेऊन वाचण्याची आपली ऐपत झाली आहे, असा मध्ये अचानक साक्षात्कार झाला, सुरवातीच्या लॉट मध्ये अर्थात २-३ वपुं ची पुस्तके आणली.
पण आता वाचल्यावर दुदैवाने तुम्ही म्हणताय तसंच झालं, आता आपल्याला बहुतेक वपु आवडेनासे झाले आहेत अशाच निष्कर्षापर्यंत मी पण आले आहे.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
आपला गैरसमज होत असावा कदाचित...
सविता, आपला गैरसमज होत असावा कदाचित...
मी इथे "मला वपु आवडत नाही" असे कुठेही लिहिले नाहीये...
याउलट "वपुर्झा का वाचावे...?" याबद्दल मी लिहिलंय...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
हा प्रतिसाद, मन यांच्या
हा प्रतिसाद, मन यांच्या प्रतिसादाला होता.
जसा आत्ता तुमच्या प्रतिसादावर दिलाय तसा!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
वपु तरी बरेच बरे म्हणायचे.
वपु तरी बरेच बरे म्हणायचे. दवण्यांपेक्षा एनी टैम लै चांगले हैत. वपुर्झा हे कोरड्या मूल्यशिक्षणी उपदेशपर ऐवजी रोचक कथनपर जास्त वाटलं. पार्टनरसुद्धा आवडली. साले काढायला तयार असलेल्या मला आज कदाचित अपील नै होणार इतकं , पण तरी अज्जीच वाईट नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तम लिहिल आहे..
मनापासून आवडले... लिहीत राहा..
पु.ले.प्र.
छान परिचय. हे पुस्तक मलाही
छान परिचय. हे पुस्तक मलाही आवडलं होतं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद...
धन्यवाद बॅटमॅन, मनोबा, मन्दार ...
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com/node/14474
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
जबरदस्त आहे
जबरदस्त आहे प्रतिक्रिया!
प्रतिक्रियेवरच्या उपप्रतिक्रियेवरचे "वपु , कदम, सुशि (थोडेफार पिंगेही) यांची पारायणे करणारे आणि सर्वात आवडता लेखक सिडने शेल्डन असणारे यांच्यात तत्वतः फरक नाही." हे वाक्यही भारीच.
गहिवरून आले...
रावांच्या प्रतिसादात -
"सुशिंची एक कादंबरी वाचली होती, त्यात तलतची सलग दोन गाणी ऐकून तो नायक असाच 'उदय विहार' मधून तिरिमिरुन बाहेर पडतो."
हे वाचून गहिवरून आले.
मी वपुंची केवळ पार्टनर वाचली
मी वपुंची केवळ पार्टनर वाचली आहे.. कंटाळलो.. वरची गमतीदार भरजरी वाक्ये वाचुन वपुर्झा (सध्या तरी) वाचायची नाही असे (पुन्हा एकवार) ठरवले आहे
परिचयाबद्दल आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शाळा कॉलेजात असताना वपुं च्या
शाळा कॉलेजात असताना वपुं च्या माहेर मेनका त येणार्या कथा वाचलेल्या आणि आवडलेल्या.
काही वर्षाँनी पार्टनर वाचली आणि बोअर झाल.
नंतर काही वपुं च्या वाटेला गेले नाही...
बाकी हे पेन्सील ने पुस्तकात खूणा करणे वगैरे मी पण केलेलय. ऑस्कर वाइल्डच 'द पिक्चर ऑफ डोरीयन ग्रे', त्यातले लॉर्ड हेन्री चे जवळजवळ सगळे डायलॉग
वपु - एक रंजक लेखक.
संजोप रावांचा 'मिसळपाव'मधील चुरचुरीत लेख वाचला आणि त्यांनी आपल्या लेखातून वपुंना अचूक पकडले आहे असे जाणवले.
माझा आणि वपुंचा थोडा वैयक्तिक परिचय होता तरीहि त्यांचे लिखाण वाचावे असे कधी मला आतून वाटले नाही. ते चमकदार लेखन करून वाचकाला इंप्रेस करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत असे वाटे आणि त्यामुळे त्यांच्या लेखनात एक प्रकारचा प्लॅस्टिकी कृत्रिमपणा जाणवे हे त्याचे कारण असावे.
त्यांची थोडी वैयक्तिक माहिती म्हणजे त्यांचे वडील पु.श्री.काळे हे नाट्यव्यवसायाच्या भरभराटीच्य दिवसातील एक यशस्वी नेपथ्यकार होते. वपुंच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठे दु:खाचे ओझे होते पण येथे मी त्याचा उल्लेख करणे अप्रशस्त ठरेल कारण त्याबद्दल वपु स्वतः कोणाशीहि बोलत नसत.