वसईच्या घंटेचा शोध

वसईचा किल्ला (Vasai Fort)

आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.

छोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला. ( का ते विचारू नका, उगाच हौस ) पण ते जास्तच लांब आणि सुट्टीची बोंब, म्हणून मग भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला.

ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला. तसेही आम्हाला निमित्तच हवे असते.
चिमाजी आप्पा यांचा शोध पहिला घ्यायला हवा … अख्खं जग फेसबुकवर आहे म्हणून त्यांना शोधण्यासाठी तडक फेसबुकवर गेलो. निराश न होता म्हटले जाऊ स्वतःच आणि छडा लावू याचा.
तसे कशाचा कशाशीही संबंध नसतो, पण ठरवले तर सुतावरून स्वर्ग गाठता येतो .

सकाळची सिंहगड पकडून गेलो कल्याणला, यावेळी भूषण काही आला नव्हता, म्हणून मग फोनाफोनी करून त्याला बोलावले. मुंबईत गेले की माझ्यासारख्या माणसाचे अवघड होऊन जाते. स्वतःला तर काही माहीत नाही आणि दुसऱ्यांना विचारायचे तर काय विचारायचे ते हि माहीत नाही.

मग भूषणचा फोन आला,
"कुठे आहेस ? मग या प्रश्नाला मी प्लाटफोर्म वर आहे असे उत्तर दिले. "
"प्लाटफोर्म वर कुठे?"
"अरे जिथे वडापाव वाला माणूस उभा आहे तिथे."
असे बरेच निरर्थक प्रश्न उत्तरे झाली मग तो म्हणाला आहेस तिथेच थांब, मी शोधतो तुला.
मग थोड्या वेळाने भेट झाल्यानंतर आम्ही लगेच लोकल पकडून 'कोपर' ला जाण्यासाठी निघालो. भूषण ने सगळी माहिती काढलीच होती, आणि लोकल कुठून कशी जाणार हे हि त्याला माहीत होते.
साडे नऊ वाजेपर्यंत कोपर स्थानकावर पोहोचलो. तिथले रेल्वे स्थानक जरा वेगळेच आहे. एका स्थानकावरून, वसई कडे जाणाऱ्या गाडीच्या फलाटावर आम्ही येऊन थांबलो.
सव्वा दहा वाजता ट्रेन होती, जशी वेळ जवळ आली तशी गर्दीही वाढू लागली होती.
आता हि ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो वसई रोड ला. तिथून मग महानगर पालिकेची बस पकडून निघालो वसई किल्ल्याला. बस मध्ये तरुण मंडळी जास्त होती. वाटले की तरुण पिढीला किल्ल्याविषयी वा इतिहासाविषयी अजूनही आस्था आहे. हे वाक्य भूषण ला सांगितले तर तो म्हणाला की,
"तसे नाहीये, "या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. नंतर मात्र मला ऐकवू नकोस की, कुठेही नेतोस मला तू म्हणून. "

ऐतिहासिक संदर्भ :
स.न. 1414 मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला. 1530 मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे 1534 मध्ये तो पोर्तुगीजाकडे आला. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला.12 डिसेंबर 1780 रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. ( नंतर परत आपल्या ताब्यात आला आणि ३०० वर्ष भक्कम अश्या किल्ल्याची दुर्लक्ष केल्यामुळे वाट लागली. )

भौगोलिक संदर्भ :
ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला,जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो.
किल्ला प्रचंड मोठा असून दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. एका बाजूस समुद्र व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत.
किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. पोर्तुगीज काळात नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. (विकिपीडिया द्वारे)
.
वसई किल्ल्याचा पोर्तुगीजकालीन नकाशा:
सौजन्य : विकिपीडिया

येण्याजाण्याच्या वाटा:

पुण्याकडून जाताना कल्याण ला उतरून, पुढे कोपर पर्यंत दुसरी लोकल पकडून, अजून त्यापुढे कोपर पासून वासी रोड ला जाणारी ट्रेन पकडून नवघर स्थानकावर उतरावे. तिथून वसई किल्ल्याला जाणाऱ्या बऱ्याच बस मिळतात. त्या बस किल्ल्याच्या आत जाऊन सोडतात.

आमचा ट्रेक अनुभव :

बस मध्ये एक आजोबा म्हणाले की "हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे". मग म्हटले जाऊयाच संस्कृती च्या मागे ( म्हणजे समाज संस्कृती च्या मागे). घंटेचे ही कारण होतेच जोडीला.
थेट बस असल्याने आम्ही किल्ल्याच्या समुद्राकडील प्रवेशद्वारापाशीच पोहोचलो. तेथे चौकशी करून सरळ किल्ल्याच्या वाटेने न जाता प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याच्या वाटेला लागलो. तिकडची एकंदर गचाळ स्थिती पाहून परत फिरलो.

आता किल्ल्याची एक बाजू पकडून नुसतेच चालत सुटलो. तेथे एक कामगार भेटला. तो नाशकातील बागलाण तालुक्यातील होता. "आम्ही नुकतेच साल्हेर,सालोटा, मुल्हेर करून आलो बागलाण मधले" हे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यातला आमचा आदर वाढला. त्याने लगेच "मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे" असे वाक्य टाकल्यावर मग आम्ही आमच्या बाता मारणे बंद केले. आम्हाला कळले की हा पण "कसलेला खिलाडी" आहे. तो २२ वर्षे बागलाण मध्ये वनविभागात कामाला होता. आणि त्याने महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व किल्ले आणि प्रदेश अक्षरशः पिंजून काढले होते.
त्याच्याकडून माहिती काढून पुढे गेलो. तटबंदी वर चढून त्या वाटेने हिंडायला लागलो. पहिलेच समुद्राचे आणि बंदराचे दर्शन घडले.
.
किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आणि पोफळीची, नारळाची झाडे दूरवर पसरली होती. हा हिरवळ दिसणारा परिसर दलदलीने वेढलेला आहे .
.
बिचारी एकाच बोट भर उन्हात काय करत होती देव जाणे, पण मस्त फोटो आला.
.
भक्कम अश्या तटबंदी मधून तोफा मारण्याची सोय कशी असेल हे बघण्यासाठी आम्ही अजून आत आत जात राहिलो.
कोपऱ्या-कोपऱ्यात लपून अनेक प्रेमवीर आपल्या "प्रेमलीला" करण्यात मग्न होते. सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना उरले नसावे. पोर्तुगीजांनी छोटे छोटे खंदक बांधून या प्रेमवीरांची चांगली सोय केली होती.
या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. ह्या भूषण च्या वाक्याचा मला अर्थ कळला.
मगाशी 'हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे" असे म्हणणाऱ्या आजोबा बऱ्याचं वर्षात येथे फिरकले नसावे .

मस्त कैऱ्यांनी फुललेले भलेमोठे झाड बघून तेथेच जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर थोड्या कैऱ्या पडून घेतल्या.
.
थोडे खाली उतरून मग आम्ही किल्ल्याचे अवशेष बघायला आलो.
.
जेवण करून आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचलो. भक्कम दगडी बुरुजांमध्ये लपवल्यासारखे बांधलेले ते अजस्त्र प्रवेशद्वार बघून त्या काळच्या राजांच्या कल्पकतेची प्रचीती आली.
.
जमिनीवरचा दरवाजा

परत मागे फिरून वाट फुटेल तिकडे आम्ही हिंडत बसलो. कुठेही खोपदडात आम्ही जात होतो. आमच्या हातातील कॅमेरे बघून प्रेमवीरांची मात्र तपश्चर्या भंग पावत होती. आम्ही मात्र संपूर्ण किल्ला पालथा घालायचाच अश्या निश्चयाने हिंडत होतो.

थोडं पुढे जाऊन नारळीची, सुपारीची असंख्य झाडे, कोंकणाची चाहूल देत होती.
.
जवळ जवळ पूर्ण किल्ला २ तासात पाहून होईल म्हणून आम्ही संध्याकाळी बोरिवली च्या राष्ट्रीय उद्यानात जायचे ठरवले होते. पण किल्ला इतका मोठा होता की संध्याकाळचे ५ वाजून गेले.

तटबंदी वरून असेल फिरत एका पडक्या भागाशी आलो. बघतो तर काय, हे काका चक्क झाडावर चढून मस्तपैकी उभे राहून ताडी काढण्यासाठी मडके लावत होते.
.
बाकी जीवनाची लढाई कोणाला चुकली नाहीये हेच खरे.
.
तेवढ्यात, भूषण ने चतुर मोठ्या चतुरीने टिपून घेतला.
https://plus.google.com/u/0/photos/104678855081644041237/albums/58626566...
आता बरेच अंतर फिरून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाशी आलो. तेथे भली मोठी वास्तू खरोखरच अचंबित करणारी होती. बरीच पडझड झाली असली तरी त्याचा साचा आणि आर्किटेक्चर बरेच शिल्लक आहे.
येथे पूर्वी ख्रिस्त लोकांची दफनभूमी असावी असे वाटत होते. पूर्ण जागेत चौकोन करून त्यावर इंग्लिश सारख्या भाषेत काहीतरी लिहिले होते. St. Anthony's यांचे चर्च म्हणून हे ओळखतात.
येथे पुढील बाजूने पाहिल्यास फक्त एक सूर्यकिरण तटबंदीतून बाहेर पडलेला दिसतो . याला रे ऑफ होप ( Ray of Hope) म्हणतात.
.
जरा विश्रांती घेऊन मग आम्ही परत हौसेने फोटोग्राफी चालू केली. फोटो काढण्यासाठी उपयुक्त असा प्रकाश पडल्याने प्रकाशाची रंगसंगती जुळून आली.

उगाच हौस करून एका भुयारातून जाऊन बघितले. नशिबाने हा रस्ता वरती जात होता, ( वरती म्हणजे वरच्या मजल्यावर, "वर" नाही हा स्मित )
वर जाऊन बघितले तर मागच्या चर्च ची वास्तू दिसत होती.

तेव्हाच्या काळी या किल्ल्यामध्येच संपूर्ण नगर वसवले असावे. असे वाटत होते.
त्याकाळी किल्ल्यात ३ चर्च, दवाखाना. न्यायालय तसेच राजवाडा सदृश्य वस्तू होत्या. त्याकाळची स्थापत्य कला किती अवगत होती याची प्रचीती येते.
.
.
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातला जो ऐतिहासिक वसई चा तह झाला तो येथे प्रमाणित झाला असे आंतरजालावरील माहितीवरून कळते.
.
पूर्ण किल्ल्याभर अशीच स्थापत्य रचना दिसत होती. सगळीकडे दारे आणि त्यावर दारे असेच दिसले.

सगळ्यात शेवटी आम्ही येथे येऊन पोहोचलो. येथे चर्च होते असा उल्लेख आढळतो. बाकीच्या अवशेषांपैकी हेच जर बऱ्या स्थितीत होते.
.
.
दर्शनी भागातील कोरीवकाम खरंच लक्षणीय होते. इतके बारकावे आणि सुंदर नक्षीकाम करायला किती वेळ लागला असावा या विचारातच आम्ही पुढे निघालो. याच द्वारावर वरती सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमाही कोरलेल्या होत्या. एकंदर रचना हि पोर्तुगीज रचनेसारखी भासत होती. पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करून येथे ३ चर्च बांधली होती. हे त्यापैकीच एक होते.
.
या पायऱ्यांची घडण वेगळीच भासली. एकाच दगडात कोरून केलेल्या वाटत होत्या. किती अचूक मोजमाप त्या काळीही अवगत होते हा विचार करून आमचे डोके चक्रावले.
.
जवळपास संपूर्ण किल्ला पाहून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी पोहोचलो. आता परत दुसऱ्या बाजूला जायचे त्राण उरले नव्हते.लांबूनच तेथील तटबंदी चे फोटो काढून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी निघालो.

चिमाजी आप्पांचा घोड्यावरचा ब्राँझ चा पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेत होता.
.
चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.

काही काळ येथेच टेकून आता मात्र निघायची तयारी चालू झाली. आता या सगळ्या प्रकारात त्या घंटेचा विषय राहिला बाजूलाच. आमची मात्र मस्त चैन झाली.

किल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे राहण्यार्या काही लोकांना त्या घंटे विषयी विचारले पण कोणाला काहीच माहीत नव्हते. मग थोडा खटाटोप केल्यावर माहिती मिळाली.

1534 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे जस्त आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.
बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.
आजही या तीन घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास ( diameter ) हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल. तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात असून याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
या तिन्ही घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो.

.
वसई किल्ल्याचे १७८० मधले रेखाटलेले चित्र.
संदर्भ : ( ब्रिटिश लायब्ररी)
http://www.webcitation.org/query?url=http://www.geocities.com/unitedit/v... )

अधिक छायाचित्रे आणि घंटेच्या फोटोसह येथे वाचता येईल.
http://sagarshivade07.blogspot.in
सागर

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

उत्तम भटकंती, माहिती, सादरीकरण..
सगळेच आवडले!

लहानपणी कधीतरी इथे गेल्याचे आठवते आहे.. पुन्हा जायला पाहिजे!

मगाशी 'हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे" असे म्हणणाऱ्या आजोबा बऱ्याचं वर्षात येथे फिरकले नसावे.

हे मात्र खरां नाही. प्रेम हीच आमची संस्कृती आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रेम हीच आमची संस्कृती आहे
सहमत, म्हणून तर पुण्यापासून वसई पर्यत पोहोचलो होतो. Smile
किल्ल्यावर आडोसा पकडून चाललेले प्रेम मात्र भयानक Smile महापालीकेनी काहीतरी हिशोब लावला पाहिजे अश्यांचा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

भारी लिहिलय!
संस्कृतीबद्दल ऋ शी सहमत Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाणाची शैली आवडली. आणि माहितीही. वसईचा किल्ला खूप पूर्वी पाहिला होता; आता काहीही आठवत नाही. पुन्हा बघितला पाहिजे.

घंटांचं शुद्धीकरण करून, क्रॉस मिटवण्याचा प्रयत्न हे रोचक आहे. माणसांचं असं शुद्धीकरण त्या काळात होत असे का? घंटांच्या बाबतीत जातीचा प्रश्न येत नाही. माणसांना लावलेला न्याय त्यांना लावला जात नाही, आपलसं केलं गेलं असं दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वसईचा किल्ला खूप पूर्वी पाहिला होता; आता काहीही आठवत नाही >>>
मी आता पाहून आलो तरीही मला काही आठवत नाहीये Smile कारण तेथे काहीच माहिती फलक नाहीत.
ऐतिहासिक वारसा म्हणून हा किल्ला जतन केला आहे असे महापालिकेचे म्हणणे असले तरी प्रत्यक्ष तेथे काही प्रयत्न दिसत नाहीत.
बस मात्र आतमध्ये जाते हि जमेची बाजू

माणसांचं असं शुद्धीकरण त्या काळात होत असे का?>>
त्या काळात अशी गरज असेल असे वाटत नाही मला वयक्तिक, एकंदर इतिहासाची मानसिकता समजून Smile
अर्थात आपण ऐकला तो इतिहास (च) बरोबरच (च) आहे (च) याचीही शक्यता कमी आहे Smile

माणसांना लावलेला न्याय त्यांना लावला जात नाही, आपलसं केलं गेलं असं दिसतंय.>>>
खरच, विचार करायला भाग पाडलत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

तुमच्याबरोबर भटकणं त्रासदायक असलं तरी मजेदार असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच मत आहे माझ्या सहकरी मित्राचे Smile
त्याच्यात बराच पेशन्स आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

चांगली माहिती आणि चित्रे ह्यांमुळे लेख वाचनीय झाला आहे.

य.न.केळकर (नचिं ह्यांचे पुत्र) ह्यांनी लिहिलेले 'इतिहासातील सहली' नावाचे पुस्तक १९५१ साली छापले गेले. त्यातील अनेक लेखांमध्ये 'साष्टी-वसईची मुशाफिरी' असा एक लेख आहे. स्वतः केळकर आणि अजून दोन सहकारी - त्यांपैकी एक अणजूरकर नाईक ह्या ऐतिहासिक घराण्यातील एक - मुंब्रा गावाजवळील अणजूराहून मचव्याने वाटेतील अवशेषरूपाने राहिलेली पोर्तुगीज स्थळे पाहात खाडीमार्गाने वसईपर्यंत गेले त्या प्रवासाचे हे वर्णन आहे. हा प्रवास आता ६५-७० वर्षाचा जुना झाला. त्यांना वसई कशी दिसली हे आता वाचणे मोठे मनोरंजक आहे. ते इतिहासाचे अभ्यासक असल्याने वसईच्या आसपासच्या अनेक जागांचा जुन्या पत्रातील नावांशी ते संबंध लावू शकले हाहि दुसरा वाचनीय भाग.

माझे एक काका काही वर्षे सरकारी नोकरीमुळे वसईत होते. मी स्वतः शाळकरी विद्यार्थी असतांना १९५४ची उन्हाळ्याची सुटी त्यांच्याकडे वसईत काढली. ५४ची वसई हे एक निवांत छोटे कोकणी गाव होते. मुंबईची लोकल तेथे येत होती ह्यापलीकडे तिचा मुंबईशी काही संबंध नव्हता. बिल्डर जमात अजून उदयास यायची होती. एका सायंकाळी मी आणि माझ्याच बरोबरीचा माझा आतेभाऊ असे आम्ही दोघे वसईचा किल्ला पाहावयास गेलो. गावाकडून भातखाचरांमधून चालत जाऊन पडक्या किल्ल्यात शिरकाव केला. तोपर्यंत अंधार पडू लागला होता. ओसाड किल्ल्यात वा आसपास आमच्याखेरीज चिटपाखरू नव्हते. धडधडत्या काळजाने आम्ही आत शिरलो आणि अंधार पडेपर्यंत पाऊण तास जुनाट चर्चेस, वाडे, भिंती पाहत काढला. त्याचा ऐतिहासिक अर्थ समजणे आमच्या बुद्धीपलीकडचे होते पण ओसाड किल्ल्याचे अर्धवट अंधारातले ते दर्शन आणि आमची धास्तावलेली अवस्था चांगली लक्षात आहे.

थोडे घंटाविषयी. वर वसईच्या तीन घंटांचा उल्लेख आला आहेच. ह्याखेरीज मी पाहिलेल्या दोन आणखी घंटा वसईच्या आहेत असा सार्वत्रिक समज आहे. त्याच्यामागचा इतिहास मला ठाऊक नाही पण थेऊरच्या गणपतिमंदिरातील घंटा - हे थोरल्या माधवराव पेशव्यांचे मृत्युस्थान - आणि मेणवलीमधील नाना फडणिसांच्या वाड्यामागील घाटावरली घंटा ह्या दोन्ही वसईच्याच आहेत असे ऐकले आहे. त्यांपै़की वाईच्या घंटेचा फोटो मी स्वतः घेतलेला मजजवळ आहे पण त्याहून चांगला फोटो खाली दाखवीत आहे. हा फोटो येथून घेतला आहे.

घंटेवर मेरी आणि येशूचे चित्र स्पष्ट दिसते. खाली १७०७ साल दिसते आणि **MI MDCC** अशी काही अक्षरे जाणवतात. ही अक्षरे ANNO DOMINI MDCCVII - Year of the Lord 1707 - अशी असू शकतात. तेव्हा घंटा पोर्तुगीज आहे हे सहज शक्य वाटते. अर्थात वसईच्या विजयाच्या वेळी नाना फडणिसांचा जन्महि झाला नव्ह्ता तेव्हा ही घंटा नानांनी नंतरच्या काळात कोठून तरी मिळवून येथे आणली असावी असे म्हणता येईल.

एक बारीकशी दुरुस्ती. वर "मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे" असे विधान आहे. गूगल अर्थवरून पाहता त्याची उंची ४१०० फूट कमीअधिक असावी असे दिसते. ३६४७ मीटर म्हणजे १००००पेक्षा अधिक फूट. इतकी उंची भारतात फक्त हिमालयात मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे" असे विधान आहे. गूगल अर्थवरून पाहता त्याची उंची ४१०० फूट कमीअधिक असावी असे दिसते. ३६४७ मीटर म्हणजे १००००पेक्षा अधिक फूट. इतकी उंची भारतात फक्त हिमालयात मिळते.

सहमत. कळसूबाई हे सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर १५०० मीटर आहे. त्यापेक्षा मुल्हेर कमी हवे.

काही वर्षापूर्वी लोकसत्तामध्ये या घंटांविषयी लेख वाचला होता. भारतात अशा घंटा त्याकाळी बनत नव्हत्या.

कदाचित घंटेचे हायपरबोलिक प्रोफाइल जमत नसेल. किंवा हायपरबोला असायला हवा हे समजलेले नसेल. (वेदांमध्ये याविषयी काही लिहिलेले नसावे बहुधा Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येथे फुट आणि मीटर मध्ये गफला झाला वाटतो. ( माझ्याकडूनच Smile )
"मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९० फूट आहे." हे वाक्य मी माझ्याच मुल्हेर किल्य्याच्या लेखात लिहिले आहे. ते तपासून घ्यावे.

कदाचित घंटेचे हायपरबोलिक प्रोफाइल जमत नसेल. किंवा हायपरबोला असायला हवा हे समजलेले नसेल. >>>
हायपरबोला म्हणजे काय हेही आपल्या लोकांना ठाऊक नसावे. पोर्तुगीज आणि ब्रिटीश लोकांमुळेच आपण इथपार्यात तरी आलो असे मला वाटते पर्सनली, नाहीतर अजून बैलगाडी वरूनच हिंडत असतो आपण Smile (परत पर्सनली)
वेदांमध्ये याविषयी काही लिहिलेले नसावे बहुधा >>
शालजोडीतले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

जालावर शोधले असता घंटा एक्झॅक्टली हायपरबोलिक नसाव्यात असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरविंद सर, एकदम मस्त प्रतिसाद. अश्या प्रतिसादाने लिहिण्याची उर्मी वाढते.
मी साष्टी-वसईची मुशाफिरी' ला लेखाबद्दल अजूनही एकदा ऐकले आहे. तो कोठे मिळू शकेल का ? आपणास काही कल्पना आहे का?
ओसाड किल्ल्याचे अर्धवट अंधारातले ते दर्शन आणि आमची धास्तावलेली अवस्था चांगली लक्षात आहे. >>>
प्रसंग उभा राहिला डोळ्यासमोर Smile
तुमचे घंटे विषयीचे लिखाण हि अगदी बरोबर आहे. मेणवली ची घंटा हि पोर्तुगीज्कालीनच असावी. मला माहित नव्हते. लेखाच्या निमित्ताने कळले. थेउर येथील घंटा हि मित्राने पहिली असून ती भीमशंकर येथील घंटे सारखीच आहेअसे त्याचे मत आहे.
एकूण ५ घंटा माहित झाल्या पोर्तुगुज्कालीन. पण उल्लेख मात्र ३ चाच सापडतो. जाणकारांना विचारले पाहिजे Smile

ही घंटा नानांनी नंतरच्या काळात कोठून तरी मिळवून येथे आणली असावी असे म्हणता येईल.>>>
शक्यता नाकारत येत नाही

येथे फुट आणि मीटर मध्ये गफला झाला वाटतो. ( माझ्याकडूनच (स्माईल) )

अजून एक, हा तुमचा प्रतिसाद मी माझ्या ब्लोग वर प्रतिसाद म्हणून टाकू का ? तेथे वाचणार्या लोकांनाही हि उपयुक्त माहिती मिळावी हि अपेक्षा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

Itihaasaatiila Sahalii., 2030020018042. . 1951. Marathi. GEOGRAPHY. BIOGRAPHY. HISTORY. 369 pgs..

अशी ह्या पुस्तकाची नोंद Digital Library of India मध्ये आहे. जालावर मिळणारे DLI Downloader हे freeware वापरून आणि 2030020018042 ह्या बारकोडचा उपयोग करून संपूर्ण पुस्तक उतरवून घेता येईल. (अर्थात DLI मधील काहीहि मिळवतांना 'दैवं चैवात्र पञ्चमम्' हे तत्त्व नेहमी लक्षात ठेवायला हवे!) काही पानेच फक्त पाहायची असल्यास DLI वरूनच तसे करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंद सर आभार, नुसती पाने दिसत नाहीतेय. तुम्ही म्हणता तसा प्रयत्न करून बघतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

आपण अणजूरकर नाईक घराण्याचा उल्लेख केला तेव्हा पुन्हा एकदा मला साष्टीची बखर आठवली. ही मोडी लिपीतली (मुद्रित प्रतीत लिप्यंतर झालेले आहे)लहानशी पुस्तिका वसईच्या लढाईचे वर्णन त्यात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांच्या दृष्टिकोनातून सांगते. वसईवर स्वारी करून पोर्ट्युगेझांना हाकलावे म्हणून साष्टीतली स्थानिक जनता पेशवे दरबारात सतत पंचवीस वर्षे कशी प्रयत्न करीत होती आणि प्रत्यक्ष लढाईत त्यांनी कसे शौर्य गाजवले याची हकीगत म्हणजे ही बखर. साष्टी बेटावरल्या वांदरे,मालाड, बोरिवली इथल्या आणि आजूबाजूच्या स्थानिक जनतेची ही खरे तर कैफियत आहे.ही बखर विश्वसनीय मानण्यात येत नसली (मला वाटते प्रतिसादात उल्लेखित य.न.केळकर यांनीच या कथनाच्या सत्यतेचा जोरदार प्रतिवाद भारत इतिहास संशोधन मंडळाच्या बैठकीत केला होता असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. नावाविषयी चूभूदेघे.)तरीही त्या काळचे लोकमानस आणि सामाजिक-भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. मी वाचलेली प्रत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात छापलेली होती. (साधारणतः १९३४ च्या आसपास.)या प्रतीमध्ये बखरीच्या सुरुवातीला एक विस्तृत प्रस्तावना आहे. ती बखरीइतकीच वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या बखरीचे संपादन कोणी केले? य न केळकर की अजून कोणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संपादन कोणी केलेले आहे ते आता आठवत नाही, पण ते केळकर नक्कीच नसावेत. या पुस्तिकेतील घटनां ची पार्श्वभूमी अशी आहे की साष्टी बेटात धर्मांतराचा धुमाकूळ चालू होता,जमीनदारांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जात होत्या.वान्दरे भागात तर मूळ रहिवाश्यांची ससेहोलपट झाली होती.तिथली जनता-मुख्यतः मालाड,बोरिवली,भिवंडी,अणजूर येथील जमीनदार, पोर्तुगेझांचे पारिपत्य करावे म्हणून पेशवेदरबारात अर्जविनंत्या करीत होते.अणजूरकरांपैकी एक शूर लढवय्याने यासाठी खूप खटपटी लटपटी केल्या. वीस पंचवीस वर्षे तो पेशव्यांचे लक्ष इकडे वळावे या साठी सतत प्रयत्नशील होता. पण या काळात पेशवे दुसर्‍या मोहिमांत गुंतले होते (नि़जाम वगैरे.) शेवटी एकदाचे पेशव्यांच्या कार्ययादीमध्ये वसईला स्थान मिळाले आणि चिमाजीअप्पांना धाडण्यात आले.या कथाभागानंतर प्रत्यक्ष धुमश्चक्रीचे वर्णन आहे. कोणते व्यूह रचले गेले, कोणत्या बुरुजांवर हल्ला झाला,कोण कोण कामास आले वगैरे हे सर्व स्थानिकांनी त्यांच्या दृष्टीकोनातून लिहिले असल्याने त्यात स्थानिकांना झुकते माप दिले गेले आहे असा आक्षेप इतिहासतज्ज्ञांकडून घेतला गेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीकरिता बहुत धन्यवाद Smile हे असलं वाचायला आवडेल, मंडळाच्या लायब्रीत जातो आता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राही, मस्त प्रतिसाद. बरीच नवीन माहिती कळली. हि पण लेखात भर टाकतो.
पण एकंदर या पुस्तक मध्ये पोर्तुगीजांना डावे ठरवल्याचा सूर वाटतो. जालावर काही ठिकाणी पोर्तुगीजांमुळे या प्रदेशाची झालेली भरभराटीची हि माहिती मिळते.
तुम्हीच जास्त बरोबर सांगू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

वसई गावाची आणि जिथे जिथे पोर्ट्युगेझांची ठाणी होती त्य त्या गावांची (चिंचणी, तारापूर,)भरभराट झाली हे खरे, पण साष्टी बेटाविषयी असे म्हणता येत नाही. इथे मंडपेश्वरासारखे जागते गुफामंदिर होते,महाकाली सारख्या गुफा होत्या,कान्हेरीचा मठ/विद्यापीठ चौदाव्या शतकापर्यंत उतरणीला लागलेले का होईना, पण नांदते होते. पोर्ट्युगेझांनी या सर्वांवर कब्जा मिळवून आपली धर्मस्थळे तिथे उभारली. कान्हेरी फारच अंतर्भागात असल्यामुळे तिथे बांधकाम झाले नाही, पण मठाच्या खर्चासाठी नेमून दिलेली मागाठणे आदि गावे त्यांनी बोरिवलीतल्या आपल्या धर्ममठाकडे वर्ग केली.महाकालीचा सगळा डोंगर (कोंदिवटे, मरोळ आणि इतर गावे),मंडपेश्वरचा पूर्ण परिसर ताब्यात घेऊन तिथे मठ उभारले. मंडपेश्वरच्या तर ऐन माथ्यावर चर्च बांधले गेले होते. मालाडमध्ये या सर्वांस कडवा विरोध झाला कारण तिथे पाठारेप्रभूंसारखी लढवय्यी जमात वतनदार होती.बाकी वळणई(ओरलें),मढ, मनोरी,सारख्या कोळी/आगरीबहुल वस्त्या सहज धर्मांतरित झाल्या.
असो, बरेच अवांतर झाले खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद.
दहिसरमधील मंडपेश्वर गुंफांमध्ये लहानपणी जत्रेला जाणे होत असे. तिथून एक भुयार आहे जे कान्हेरी लेण्यात निघते वगैरे वंदता त्यावेळी ऐकल्या होत्या असे आठवते.

बाकी तुम्ही म्हणता त्या

वळणई(ओरलें),मढ, मनोरी,सारख्या कोळी/आगरीबहुल वस्त्या सहज धर्मांतरित झाल्या

त्यांचा उल्लेख आता आतापर्यंत - माझी आजी असेपर्यंत - "उत्तनचे बाटगे" असा ऐकला आहे. माझे काही बालमित्रही याच वर्गातील होते. अर्थातच त्यांच्या ख्रिस्ती असण्याचा आणि पोर्तुगीझांच्या राजवटीचा संबंध लहानपणी तरी त्यांना माहित नव्हता हे ओघाने आलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादात उल्लेखलेले साष्टी बेटावरील मरोळ, कान्हेरी वगैरे भाग ख्रिश्चन वस्ती म्हणून पारंपरिकरीत्या प्रसिद्ध नाहीत. मढ, मालवणी हे ख्रिश्चन बहुल आहेत. पण तसे म्हणून प्रसिद्ध नाहीत. मुख्यत्वे माहीम, खार, बांद्रा, सांताक्रूझ हे पश्चिमेकडील, उत्तरेकडील भाईंदर आणि माझगाव वगैरे पूर्वेकडील भाग ख्रिश्चन वस्ती म्हणून प्रसिद्ध होते/आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्याच्या काळात ईस्ट इंडिअन क्रिस्टिअनांचे मुंबईतले संख्याबाहुल्य टिकून राहिलेले नाही.गेल्या शंभर-दीडशे वर्षातल्या मानवी लोंढ्यांमुळे मराठी माणूसच अल्पसंख्य झाला आहे तिथे मराठी माणसांतल्याच या अल्पसंख्य गटाचा काय पाड लागणार? पण वाकोला, कलीना(caliana-कोळे कल्याण),कोळीवाडी(colivery),सान्ताक्रुझ पश्चिम, इरले, इ.स.१९०० सालापूर्वीचे पारले,मरोळ,चकाला,गुंदवली,बामणवाडा,सहार,आंबोली, म्हातारपाडा,जुवें(जुहू),मढ-मारवे-मनोरी पट्ट्यातली बहुतेक सर्व गावे.पोंयसर,मंडपेश्वर ही ईस्ट इंडिअनांचीच गावठाणे होती. हे लोक हाडाचे शेतकरी आणि अत्यंत उद्योगी.जमिनीचा एक इंचाचा तुकडासुद्धा ते वाया जाऊ देत नसत. मरोळ आणि बामणवाडा भागात तीस चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत घरांच्या परसवात(वाडीत)भाजीमळे होते, निळ्या किंवा विटकरी रंगांची मोठ्या काठांची धारवाडी नऊवारी लुगडी नेसणार्‍या आणि कोपरापर्यंत बाह्यांची पोलकी घालणार्‍या ईस्ट इंडिअन बायका ती भाजी शहरीकरण झालेल्या अंधेरी/पारल्यासारख्या भागात आणून विकीत. साष्टीच्या पश्चिम भागात ह्या गावठाणांव्यतिरिक्त मालाड आणि कांदिवली गावठाणे सोडली तर बहुतेक सर्व दलदल होती,आणि पूर्व भागात डोंगराळ प्रदेश. जोगेश्वरीपासून पुढच्या ईशान्य भागात निव्वळ डोंगर होते.फारशी वस्ती नव्हती.खार(पूर्व) भागातही वस्ती नव्हती. पश्चिमेच्या दांडा गावातच काय ती थोडीफार वस्ती.नंतर चित्रकार धुरंधर इथे रहायला आले आणि त्यांच्यामागून अनेक पाठारे कुटुंबांनी इथल्या टाउन्-प्लॅनिंग मध्ये भूखंड घेऊन घरे बांधली.आज तेही इथेनाममात्रच उरले आहेत.
हे लोक खरे भूमिपुत्र. जमिनीप्रती त्यांची बांधिलकी एव्हढी घनिष्ठ आहे की वसई-विरार पट्ट्यातले 'हरित वसई' आंदोलन त्यांनी राजकारण्यांच्या आणि भूविकासकांच्या दबावाला तोंड देत अत्यंत चिकाटीने गेली अनेक वर्षे चालविले आहे.
ता.क. : माझगाव आता क्रिस्टिअनांचे राहिलेले नाही.माझगावचे हे स्थित्यंतर त्या मानाने अलीकडचे म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांतले आहे.नागपाड्याचीही तीच कथा आहे. मरोळ,चकाला, आंबोली ही गावे दूर कोपर्‍यात वसलेली म्हणून कदाचित ठळकपणे नजरेस आली नसावीत.मुख्य प्रवाहातल्या मराठी छापील साहित्याला(तेही अर्थात गेल्या दीडशे वर्षातले)या गावांची दखल घेण्याचे काही कारण नव्हते. तत्कालीन आणि सध्याच्याही कथाकादंबर्‍यातली कथानके इथे घडत नव्हती. इथे शेतीशिवाय काही घडतच नव्हते म्हणून या भागाला बातमीमूल्यही नव्हते. नाही म्हणायला 'कलंकशोभा'च्या मूळ आवृत्तीत नायिकेच्या अंधेरी भागातील सहलीचे वर्णन आहे,त्यात इथल्या क्रिस्टिअन वाड्यांचे आणि भातखाचरांचे उल्लेख आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक नेत्रसुखद छायाचित्राबरोबर रोचक वर्णन यामुळे रंगत जास्त वाढली.
पायर्‍यांचे छायाचित्र पाहून खरोखर डोळे गरगरले. काय कौशल्य आहे या पायर्‍या खोदण्यात. पूर्ण सहमत.
लेख मनापासून आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख मस्ताड झाला आहे एकदम!!! घंटेच्या इतिहासाबद्दल थोडं वगळलं तर घंटा काही माहिती नसल्याने वाचायला मस्त मजा आली Smile

अवांतरः हायपरबोला किंवा एकूणच कोनिक सेक्शन्स यांना भारतीय भूमितीत केंद्रस्थान नव्हते असे दिसते. किंबहुना भारतीय गणित हे भूमितीला केंद्रस्थानी मानत नव्हते. त्यामुळे ५व्या घातांकापर्यंतची समीकरणे फॉल्स पोझिशन मेथडने सोडवणार्‍यांनी हायपरबोलाला फारसे महत्व दिले नसण्याची शक्यता जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फॉल्स पोझिशन मेथड Smile
कोलेज चे दिवस आठवले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

त्यामुळे ५व्या घातांकापर्यंतची समीकरणे फॉल्स पोझिशन मेथडने सोडवणार्‍यांनी हायपरबोलाला फारसे महत्व दिले नसण्याची शक्यता जास्त.

महत्त्व दिले नव्हते का माहितीच नव्हते?
दुसरी शक्यता अधिक वाटते.

सचिनला तो खेळाडू आहे म्हणून खुरू (भुतानी खेळप्रकार) माहिती असला पाहिजे असे कै नै. आणि ते माहित नसण्याने / तसे मान्य केल्याने त्याचे उत्तम क्रिकेटर असण्याला धक्काही बसत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीच नव्हते असे म्हणण्याला आधार दिसत नाही. मुळात ग्रीक आणि भारतीय भूमितीचे प्रेरणास्रोत वेगळे आहेत एकदम. ग्रीक गणिती हे "गणितासाठी गणित" याचे पुरस्कर्ते होते तर भारतीय गणिती हे मुख्यत: खगोलशास्त्रासाठीचे आवश्यक टूल म्हणून गणिताकडे पहायचे. एखाद्या गोष्टीचे अ‍ॅप्लिकेशन लगेच कुठेतरी होत नसेल तर ती कन्सेप्ट डिव्हेलप करण्याकडे इन जण्रल भारतीयांचा कल फारसा दिसत नाही-१५व्या शतकापासूनचे काही अपवाद सोडले तर. अगदी कुट्टकासारखी थिओरेटिकल मेथडसुद्धा खगोलशास्त्रासंदर्भाताच डिव्हेलप झालेली आहे. शिवाय कोनिक सेक्शन्सचा युरोपातसुद्धा १६व्या शतकापर्यंत फारसा कुठे उपयोग झालेला दिसत नाही-अपार्ट फ्रॉम अवघड जॉमेट्रिक प्रूफ्स. त्यामुळे अगदीच माहिती नव्हते असे नसून त्यांना त्यात प्रॉमिस दिसले नसावे याचे चान्सेस जास्त. समजा भारतीयांनी स्वतः हुडकले नसले तरी ग्रीक ग्रंथांचा या ना त्या रूपात परिचय भारतीयांना जुन्या काळापासून होताच- त्यामुळे माहिती नसणे हे संभवतच नाही. याला अजून एक उदाहरण म्हंजे "प्रूफ" ची संकल्पना. मुसलमानांकरवी आणि त्याच्या आधी ग्रीकांकरवी या कल्पनेचा भारतीयांना परिचय होताच-पण ते त्यांच्या विचारपद्धतीत बसत नसल्याने त्याला प्रतिष्ठा मिळाली नाही आणि काही अपवाद वगळता भारतीय गणिती पुस्तकांत तसे रिगरस स्पष्टीकरण दिलेले आढळत नाही. याचा अर्थ त्यांना प्रूफ म्हणजे काय हेच माहिती नव्हते असा घेतला तर ते अतिशय तर्कदुष्ट आणि चूक ठरेल. एखाद्या गोष्टीशी संबंधित डोक्युमेंटेशन दिसत नाही याचा अर्थ ती नसतेच असे सरसकट म्हणणे चूक आहे. तसे ठरवायला अजून बरीच परिमाणे लावली पाहिजेत, इतर अप्रत्यक्ष पुरावा काय सांगतो ते पाहिले पाहिजे. तसे न बघता विधान करणे हे चूक आहे.

अवांतरः इथे सचिनची उपमा गैरलागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या प्रतिवादाचे खंडन अथवा समर्थन करण्याइतका अभ्यास नाही, फक्त भारतीयांना जे माहिती होते तर त्याचा कुठेतरी उल्लेख दिसला असता किंवा ऐकू आला असता असे वाटते. शिवाय भारतीय गणिताचा वापर खगोलशास्त्राबरोबरच स्थापत्यशास्त्रासाठी लागणार्‍या गोष्टींसाठी झाला असावा असे वाटते तेव्हा या आकाराच्या वस्तु नपेक्षा वास्तुमध्ये आकार दिसायला हवे होते.

एखाद्या गोष्टीशी संबंशित डोक्युमेंटेशन दिसत नाही याचा अर्थ ती नसतेच असे दरवेळेस म्हणणे चूक आहे.

सहमत आहे. पण दिसा नसूनही तसे होते म्हणायला काहितरी ठोस आधार हवा, नाहितर ते 'विशफुल थिंकिंग' वाटते.
मुळातला प्रतिसादही भावनेवर अधिक बेतल्याचा समज झाल्याने वरिल प्रतिसाद दिला होता. असो. Smile

वरील प्रतिसाद, मूळ प्रतिसाद संपादित करण्यापूर्वी टंकला असल्याने काहिसा गैरलागू झाला आहे. वेळ मिळताच नव्याने टंकेन.. पण मुद्दा तोच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. पण दिसा नसूनही तसे होते म्हणायला काहितरी ठोस आधार हवा, नाहितर ते 'विशफुल थिंकिंग' वाटते.

अर्थातच. पण माझ्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे, आधी ग्रीक आणि नंतर अरबी-फारसी ग्रंथांशी संबंध आल्याने कोनिक सेक्शन्स हा प्रकार भारतीयांना माहिती असण्याची शक्यता आहे. तसेच, उपलब्ध माहितीच्या आधारे नेमक्या कुठल्या ग्रंथांशी संबंध आला आणि त्या ग्रंथांत कोनिक सेक्शन्स होते का हे पाहून मग वरील विधान रिफाईन नक्कीच करता येऊ शकेल. तूर्त मी इतकेच म्हणेन की भारतीयांनी वरिजिनली कोनिक सेक्शन्सची थिअरी डिव्हेलप केल्यासारखे काही सापडत नसले तरी बाहेरच्या ग्रंथांच्या काँटॅक्टमुळे तत्वतः त्यांना तो प्रकार ऐकून तरी माहिती असायची शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आत्ता नेटवर शोधाशोध करताना दिसले, की महावीर या इ.स. ९व्या शतकातल्या "गणितसारसंग्रह" नामक ग्रंथ लिहिलेल्या गणितज्ञाने लंबवर्तुळाचा ओझरता उल्लेख आपल्या ग्रंथात केलेला आहे. एतसंबंधीचा परिच्छेद खालीलप्रमाणे:

After Sridhara, the most celebrated mathematician was Mahaviracharaya or Mahavira. He wrote Ganita Sara Sangraha in 850 A.D., which is the first text book on arithmetic in present day form. He is the only Indian mathematician who has briefly referred to the ellipse (which he called Ayatvrit). The Greeks, by contrast, had studied conic sections in great detail.

मूळ स्रोताचा दुवा.

अजून एका विश्वासू स्रोताचा दुवा.

तस्मात, कोनिक सेक्शन्सपैकी किमान इलिप्स माहिती असल्याचा डायरेक्ट पुरावा आहे. बाकी पॅराबोला आणि हायपरबोलाचे माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीबद्दल अनेक आभार! दुवा नक्की वाचेन

स्वगतः या बॅट्याला डिवचणे एकूणात फायद्याचे ठरते Wink - ह घेशीलच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्याला डिवचणे एकूणात फायद्याचे ठरते Smile
अगदी खरय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये असा उल्लेख आढळला.

भारतीय गणित तज्ञांनी कोनिक सेक्शन्स आणि इतर तत्सम जोमेंत्रीकल अभ्यास केला नाही एलिप्स चा जो केला तो चुकीचा केला … ( डायरेक्ट भाषांतर जास्तच परखड झालेय)

"Ellipse:
Only Indian mathematician to refer to the ellipse, indeed Indian mathematicians did not study conic sections or anything along these lines. Gave incorrect identity for area of ellipse. His formula for the perimeter of an ellipse is worth noting. "
(http://www-history.mcs.st-and.ac.uk/Projects/Pearce/Chapters/Ch8_4.html)
आता only ची जागा पहिल्यांदी हवी का refer to the ellipse मध्ये refer to the ONLY ellipse असे असावे काय ठाऊक Smile
तुम्हीच योग्य सांगू शकता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

दिलेल्या माहितीवरून

१. महावीर या एकाच भारतीय गणितीने इलिप्सचा किमान उल्लेखतरी केला.

२. त्याने इलिप्सच्या क्षेत्रफळाचे चुकीचे सूत्र दिले.

असे समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतीयांतर्फे जोरदार बॅटिंग केल्याबद्दल आम्ही आजपासून बॅटमन ह्यास सर्जेराव,प्रतापराव किंवा निदान फळकूटराव अशी पदवी देउ इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा ऑरे आउट ऑफ बाउंड Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

इतिहासाची माहिती घेऊन मग जाणीवपूर्वक भटकंती करण्याची कल्पना कौतुकास्पद आहे. फोटोदेखील नुसत्याच किल्ल्याचे न काढता आसपास दिसणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचेदेखील काढलेले आहेत हेही आवडलं. तुमच्या स्वच्छंद आणि उत्साही मनोवृत्तीला दाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश सर धन्यवाद.
आधी नुसतेच भटकत होतो मजा करत, आता लिहायला लागल्यापासून नजर बदलली आणि असे नवीन माहिती देणारे आणि इतिहास जागवणारे प्रतिसाद वाचून त्यातली आवड वाढली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

माहिती चांगली.
वर कुणीच एका गोष्टीचा उल्लेख न केलेला पाहून आश्चर्य वाटले.
पुण्याजवळ बनेश्वर येथे एक शंकर मंदिर आहे. पुण्याहून सातार्‍याला जाताना सुमारे पंचवीस तीस किलोमीटारवर हे दाट झाडीने वेढलेले देउळ लागते.(नारायणपूर बालाजी किंवा केतकवळीला दत्तमंदिरास पोचायच्या थोडे आधी, कापूरहोळ गावापोसून राइट टर्न मारावा. दोनेक किलोमीटर आत हे ठिकाण लागेल. चांगली ग्रीनरी मेन्टेन केली आहे.)
तर हे मंदिर नानासाहेब पेशव्याने १७५५ च्या आसपस बांधले (का त्याचा जीर्णोद्धार का काहीतरी) म्हणतात.
त्या मंदिरातही शेम टू शेम अशीच पोर्चुगीज घंटा आहे. त्यापुढे तपशीलाचे फलकही दिले आहेत.(मंदिरासआठी नानासाहेब पेशव्याने किती खर्च केला वगैरे. घंटा कुठली आहे वगैरे.)
.
वर आदिती म्हणते तशीच शंका येते. विहिरीत पव टाकला गडबडून जाणारी मंडाळी, "पांढर्‍या लोकांच्या स्पर्शाने बाटलेली" घंटा आणत का असावीत? आणणारे कै बाटत वगैरे नसत काय? धर्म वगैरे बुडत नसे काय तेव्हा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लुटीतली घंटा आणण्याला खास प्रतिष्ठा असेल असे नक्कीच वाट्टे, शिवाय क्रॉस मिटवला की झालं हिंदूकरण Smile मशिदींतसुद्धा बर्‍याच हिंदू देवळांचे चिरे छिन्नभिन्न करून मग वेडेवाकडे वापरले जायचेच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पदार्थ पोटात गेला तरच मनुष्य बाटतो असे असावे.

अन्यथा जनावराच्या चामड्याचा लगाम/जोडे वापरण्याने देखील बातणे/धर्मभ्रष्ट होणे झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाव टाकलेलं पाणी पिण्यामुळे बाटणं हे पेशवाईच्या शेवटानंतरच्या काळापुरतंच मर्यादित होतं का पेशवाईतही होतं? राजे/राज्यकर्ते बदलल्यानंतर अशा प्रकारचे समज बदलण्याची शक्यता वाटते. घंटा पेशव्यांनी हलवलेल्या; त्यांनी आपल्या अखत्यारित ब्राह्मणांकडून शुद्धीकरण करून घेतलं असेल. याउलट मूळचा यवन/म्लेंच्छ हिंदू करून घ्यायचा तर जात कोणती हा प्रश्न येणार. तो राजाच्या/राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत सोडवणंही त्यामानाने कठीण जाणार.

इतिहासाच्या अभ्यासकांनी सांगावं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाव टाकून बाटवण्याच्या गोष्टी खरोखरच कोठे घडल्या आहेत का केवळ अतिरंजित सांगोवांगीच्या गोष्टी आहेत? सर्वसाधारणतः सर्व पातकांवर आपल्या शास्त्रांमधून नाना तर्‍हांची प्रायश्चित्ते घेण्याची सोय होतीच. असेच एखादे प्रायश्चित्त सांगून पातक्याला शुद्ध करणे अधिक सहजपणे होत असावे. हिंदु धर्मातूनच काढून टाकण्याचे साधार उदाहरण कोठे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगोवांगीच्याही असू शकतात. संघ किंवा संघाशी संबंधित वाङ्गमयात हे वाचलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाव टाकून बाटवणे हे इतक्या वेळेस लिहिलेले पाहिलेय की गोबेल्सनीतीप्रमाणे ते खरेच वाटतेय. पण गोवा इन्क्विझिशन मध्ये प्रियोळकर काय म्हणतात ते पाहिल्याखेरीज याचा उलगडा होणार नाही असे वाटते.

बाकी त्याच पुस्तकात वाचलेले आठवतेय, की पोर्तुगीजांनी हाणामारी करूनही हिंदूंनी धर्म सोडला नाही, मात्र कन्व्हर्जन झालेल्यांना आर्थोडॉक्स हिंदू धर्मात परत घेणार नाहीत अशी मिशनर्‍यांची अटकळ होती आणि ती बरोबर ठरली. अर्थात "अमुक एका पातकामुळे कुणाला हिंदू धर्मातून बाहेर घालवणे" आणि यात तत्वतः असला तरी प्रत्यक्षात तसा फार फरक नाही.

आणि ही वृत्ती नंतर बळावली असावी, कारण देवलस्मृतीत धर्मांतराला प्रायश्चित्त आहे याची नोंद आत्ताच नेटवर सापडली. या स्मृतीचा काळ इ.स. ९०० च्या आसपासचा सांगितला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही दिलेली लिंक ओळखचीन्ह लावून ठेवली. तुमचे वाचन आणि वेळेस तो माहितीचा स्तोत उपलब्ध करून देण्याची कला. मानले तुम्हाला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

एकोणिसाव्या शतकासारख्या अलीकडीच्या काळातही मिशनर्‍यांबरोबर चहापान केले म्हणून टिळकप्रभृतींवर ग्रामण्य घालण्यात आले होते. मग त्याआधी शंभर दीडशे वर्षांपूर्वी शिवाशिवीच्या अथवा खाण्यापिण्याच्या क्षुल्लक कारणांवरून वाळीत टाकणे, धर्मबहिष्कृत करणे असे प्रकार नक्कीच घडले असतील. आत्ता आत्ता म्हणजे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी,आमच्या परिसरातील झाडूवाले आणि कचरा वाहून नेणार्‍या जमातीतला एक मोठा गट अशा प्रकारांद्वारे धर्मांतरित झाला आहे. हे लोक कोल्हापूरच्या कर्णाटक सीमेवरचे आणि पलीकडचे आहेत. आता त्यांच्या सोयरिकी कूर्ग, मंगळूर्,वेलंकणी वगैरे प्रांतांतल्या नवधर्मांतरितांमध्ये होतात.मिशनर्‍यांनी मंत्रून दिलेले पाणी प्यायले म्हणून त्यांच्याच ज्ञातिबांधवांनी त्यांच्याशी असलेले रोटीबेटीव्यवहार तोडले.अर्थात ते पाणी प्यावे म्हणून मिशनर्‍यांनीही बरीच आमिषे दाखवली होती आणि त्यांच्यातल्या कुलप्रमुखाला(क्लॅन साठी मराठी शब्द?) वश करून घेतले होते. संपूर्ण आंध्रप्रदेशात चालू घटकेलाही धर्मांतरे जोरात चालू आहेत. आणि स्पष्टपणे लिहिता येण्याजोगे नाही,पण दहशतवादी चळवळींना बळ आणि काडर मिळवून देणारा हा प्रांत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाच ह्याच्यावर एक उत्तर सुचत आहे.

ख्रिश्चन धर्मामध्ये जशी धर्माधिकार्‍यांची उतरंड असते तशी हिंदूंमध्ये नाही. ख्रिश्चनांमध्ये एखाद्या अपराध्याला अधिकृत मार्गाने 'धर्मबहिष्कृत' करता येते - येथे 'Becket'चित्रपटामधील मधील excommunication चा अत्यंत प्रभावी सीन http://www.youtube.com/watch?v=qUTSttwksL4 आठवतो. हिंदूमध्ये असे काही नव्हते पण दुसरे एक प्रभावी अस्त्र होते आणि ते म्हणजे बाकी समाजाने अपराधी व्यक्तींशी सर्व संबंध पूर्णपणे तोडणे. त्या काळात बहुतेक व्यक्तींना आपले कुटुंब, जात आणि पंचक्रोशी ह्या संदर्भाबाहेर अस्तित्वाच नसायचे. ह्या वर्तुळाने जर व्यक्तीशी संबंध पूर्णपणॅ तोडले तर ती व्यक्ति लवकरच जेरीस येऊन अगतिकतेने आपला स्वीकर करण्यास तयार असलेल्या अन्य गटात - उदा. दुसरा धर्म - आपणहूनच चालत जाईल. अशा रीतीने ती व्यक्ति अथवा व्यक्तिसमूह हिंदु समाजातून बहिष्कृतच झाली असे म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विहिरीत पाव टाकला हे काय आहे ? मला काहीच माहित नाही याबद्दल Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

परवा रविवारी तेथूनच जाणार आहे. जाऊन बघूनच येतो.
माहिती बद्दल धन्यवाद Smile
बाकी धर्माचे, बुडण्याचे तुम्ही म्हणता तसे खरेही असेल. आणि म्हणूनच अश्या प्रथांमुळे पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटीश आपल्या लोकांना फोडून काढत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

भटकंती आणि लेखन आवडले, ही पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वसईतल्या घंटेसारख्या अनेक घंटा महाराष्ट्रात आहेत असे प्रतिसादांवरून वाटते. या सर्व घटा लुटीतल्याच असतील का, की कदाचित यातल्या काही विकत घेतलेल्या, बनवून घेतलेल्याही असू शकतात? धातूच्या ओतकामात आपण फारसे प्रवीण किंवा तज्ज्ञ नव्हतो असे कुठेशी वाचलेले आहे. अर्थात तोफा ओतल्या जात होत्याच.आणि कुत्ब संकुलातला लोखंडी मनोराही आहेच.
दुसरी एक अगदीच बाळबोध शंका : देवळांमधून घंटा टांगण्याची प्रथा किती जुनी असावी? पूजेतला घंटापूजनाचा मंत्र(आगमनार्थं तु देवानाम्...)कितीसा जुना असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित यातल्या काही विकत घेतलेल्या, बनवून घेतलेल्याही असू शकतात>>>
याची शक्यता आणि संख्या दोन्हीही कमी वाटते. लेखात एक लिहिले आहे कि या पोर्तुगीज घंटा आपल्या ( हिंदूंच्या) मंदिरातील घंटे पेक्षा बर्याच वेगळ्या जाणवतात. त्यांचे धातू, वजन आणि आकार लक्षात घेत त्या बनवून घेणे,विकत घेणे अवघड वाटते.
त्या पोर्तुगीज कालीन घंटांचा किल्ल्यातील उपयोग धोक्याची सूचना देण्यासाठी होत असे असेही कळते. चर्च ला लावलेल्या घंटा शुद्धीकरण करून मंदिरात लावण्यासाठी मराठे विकत घेतील. याची शक्यता कमी वाटते. उलट चिमाजी अप्पाने हत्तीवरून किल्ल्यातील ३ घंटा विजयाचे प्रतिक म्हणून नेल्याचा उल्लेख आढळतो.

वसईतल्या घंटेसारख्या अनेक घंटा महाराष्ट्रात आहेत >>
येथे आणि इतर ठिकाणी लेखाला आलेल्या प्रतिसादावरून वरील फोटोत आहे तश्या एकूण ५ घंटा महाराष्ट्रात असल्याचे कळते. अधिकृत माहिती ३ घंटा असल्याची आहे. ( मंगेश तेंडूलकर यांचा २२ ऑक्टोबर २००२ च्या times मधील लेखावरून आणि पास्कल लोप्स नावाच्या वसई स्थाईक इतिहासकाराच्या ब्लोग वरून )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

वरील राही इत्यादींच्या प्रतिसादामध्ये वसई आणि आसपासच्या प्रदेशातील पोर्तुगीजकालीन आणि नंतरच्या इतिहासाबाबत आणि तेथील जनतेबाबत बरेच लिहिले गेले आहे. त्यापूर्वीच्या ह्या भागाच्या इतिहासात डोकावयाचे असेल तर राजवाडेसंपादित 'महिकावतीची बखर' हे पुस्तक आणि त्याला राजवाडयांनी लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना जरूर वाचावी.

मी हे पुस्तक पंचवीसेक वर्षांपूर्वी वाचले होते त्यातील आठवणीवरून लिहितो. महिकावती म्हणजे माहीम. उत्तरेकडून आलेल्या बिंबवंशीय आक्रमकांनी १२व्या शतकात हा भाग काबीज केला तेव्हापासून मुस्लिम सत्ता येथे स्थिर होईपर्यंतचा इतिहास बखरीमध्ये आहे. ठाणे-माहीम आणि आसपासच्या टापूमधील बहुतेक गावांची नावे आजहि ओळखता येतात. आजच्या मुंबईच्या अनेक भागांचा जुना इतिहास म्हणून बखरीकडे बघता येईल.

असेहि वाचल्याचे आठवते की प्रस्तावनेमध्ये राजवाडयांनी पाठारे प्रभू (पाप्र) आणि चान्द्रसेनीय कायस्थ प्रभू (चांकाप्र)ह्यांच्या इतिहासाचा एक अर्थ त्यात लावला आहे. त्यांच्या मते चांकाप्र हे ह्या भागातील मूळचे. यादवांनी ह्या भागावर सत्ता बसवितांना आपल्याबरोबर ५४ पाप्र कुटुंबे आणली होती. त्यांना ह्या भागात नवी वतने इ. मिळाली आणि मूळच्या चांकाप्रना त्यांनी येथून निष्कासित केले. ह्याला पुरावा म्हणून त्यांनी दोन गोष्टी दाखविल्या आहेत. पहिले म्हणजे पाप्र जातीमधील राणे, जयवंत, अजिंक्य अशा प्रकारची पराक्रमदर्शक आडनावे. दुसरे म्हणजे पाप्र जातीची मूळ वस्ती मुंबईतच असणे (गावदेवीसारखे भाग) आणि त्याविरुद्ध चांकाप्र मूळ वस्ती ठाणे आणि दक्षिणेकडेच असणे. राजवाडयांनी दाखवून दिल्याप्रमाणे ह्या उघड दिसणार्‍या गोष्टींचा असा अर्थ लावता येतो.

महिकावतीची बखर हातात मिळाल्यास अवश्य वाचावे पण येथे त्याचा उत्तम सारांशहि वाचायला उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख, छायाचित्रे, प्रतिसाद आणि त्यांच्यावरची चर्चा हे सारेच आवडले. वसईलाच कॉलेज असल्याने किल्ल्यात आणि आसपासच्या परिसरात बर्‍याचदा भटकंती झाली होती. त्या परिसराचे पुन्हा फोटो पाहून छान वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे याच किल्ल्याबद्दल आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असो वा नसो, तो ब्लॉग लैच भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असावेसे वाट्टेय
बाकी लिहिलेलं झकास आहे. ब्लॉगवरील इतरही लेख छानच. इथे लेखिकेशी परिचय असेल तर इथे बोलव ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ती आहे इथे. मणिकर्णिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे याच किल्ल्याबद्दल आहे काय? >>

असेलही, पण मला काही साधर्म्य वाटले नाही.
बाकी, ब्लोग खरच भारी आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

लेख आणि प्रतिसाद सर्वोत्तम बरेच दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली .१ तुमचा उत्साह आणि कळकळ पाहून हम्पि ,झाशी ,आणि तंजावुर या तीन ठिकाणी जाच .२.विल्यम डर्लींपलचे 'व्हाईट मुघलस् हे पुस्तक तुम्ही वाचाच .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. नक्कीच जाऊन येईन. तसेही हिंडायला फक्त निमित्तच हवे असते.
तंजावुर हे कुठे आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

हेच तंजावुर असावं. गूगल मॅपचा दुवा शहाजी राजांच्या दक्षिण जहागिरीचा भाग.

वरच्या सूचनेला अनुमोदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबई कडून गुजरात कडे जाणार्या रस्त्यावर एका गावात ( र वरून नाव आहे, मी नाव विसरलो बहुतेक रंजनाथ) येथे चिमाजी अप्पांचे अजून एक स्मारक आहे. असे कळले. माझे एक दूरचे नातेवाईक ते बघून आले आहेत. वसई सारखाच पुतळा तेथे असून तेथे अजून एक पोर्तुगीज घंटा आहे असे कळले.
एकंदरीत, लेखात ३ घंटाचा शोध लावायला गेलो तर ६ घंटा सापडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

मस्तच हो! घंटापुराण आवडले Smile हे ठिकाण पाहिले पाहिजे कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोठे असेल ही अजून एक घंटा आणि चिमाजीअप्पा पुतळा? तुमचे नातेवाईकच असले तर विचारून पाहा.

असे काही असण्याची शक्यता मात्र कमी वाटते. एकतर आजवर असे काहीच कधी कानावर पडलेले नाही अथवा वाचनात आलेले नाही. चिमाजी अप्पाचे नावहि मुख्यत्वेकरून वसईशीच जोडलेले आहे, ज्या कारणाने त्यांचा पुतळा त्या किल्ल्यात आहे. एरवी पेशव्यांपैकी कोणाचा पुतळा उभारणे अजिबात fashionable नाही त्यामुळे बाकी सर्व पेशवे बाजूस ठेवून चिमाजीचाच पुतळा कोणी का उभारावा?

'चिमाजी अप्पा' असा Google Image शोध घेतला पण वसईखेरीज अन्य कोठलाच चिमाजी पुतळा तेथे दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे ते नातेवाईक नालासोपाराला असतात त्यामुळे त्यांना वसईतर माहिती आहेच, त्याचमुळे चिमाजी आप्पा विषय निघाल्यावर त्यांनी मला या दुसर्या स्मारकाबद्दल सांगितले. त्यांनाहि गावाच्या नावाबद्दल शंका होती. मग त्यांनी (त्यांच्या मुलाशी बोलून)तेथेही एक पोर्तुगीज घंटा असल्याचे सांगितले. त्यांच्याशी संपर्क झाला तर परत त्या गावाचे नाव विचारून घेईन. ( कारण मी परवा त्यांना पहिल्यांदाच भेटलो आणि ते नात्यात कोणाचे कोण आहेत हे हि मला कळले नाही Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

अजून एक पोर्तुगीज घंटा मिळाली. पण महाराष्ट्राबाहेरील Smile
एस्तोरियन मेरीटाइम म्युजियम, टल्लीन, इस्टोरिया (Estonian Maritime Museum, Tallin, Estonia)
( फिनलंड जवळचा देश)
.
यात एक माणूस जाऊ शकतो एवधी ती मोठी आहे. हापिसातला एक मित्र गेला होता, त्याने हा लेख वाचून माझ्यासाठी फोटो काढून आणला म्हणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in