प्रतिमा
ऑक्टोबर २०११. चिमलखेडी (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार). सरदार सरोवर प्रकल्पात बुडालेलं एक गाव. विस्थापितांचा एक मेळावा झाला तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत आणि खासदार माणिकराव गावीत उपस्थित होते. या मान्यवरांना आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्याची या एका विस्थापिताची उत्सुकता माझे लक्ष वेधून घेत होती.

या प्रतिमेसाठी काही ओळी सुचतात?
श्रावण, फोटो प्रचंड आवडला.
श्रावण, फोटो प्रचंड आवडला. प्रियालीचा प्रतिसादही आवडला.
सर्वसाधारण माणसं, या माणसांच्या चेहेर्यावरचे वेगवेगळे भाव, बायकांच्या साड्यांचे रंग, शेजारच्या चेहेर्यावरचे 'मायबाप' मंत्र्याला पहाणारे भाव, पोरांचा टाळकुटेपणा, मोबाईलवाल्या माणसाचा 'रगेड' चेहेरा-भाव आणि विशेषतः अक्कडबाज मिशा, त्याला न शोभणारा मोबाईल, थोडीशी बेशिस्त ... एकदम 'आपला' वाटला फोटो. पनवेलला जाण्यासाठी ठाण्याला यष्टीची बस पकडली की असंच काही चित्र दिसतं.
कॅमोफ्लाज
फोटोत कॅमोफ्लाज चांगला जमला आहे. ते नाव थोडेसे अनवट वाटेल पण माझं नॉमिनेशल त्यालाच. (हे नाव का? हे खाली लिहले आहे. पांढर्या शाईत मुद्दाम. तुमचं नाव ठरविल्याशिवाय पाहू नका)
मोबाईलवाल्या माणसाचा 'रगेड' चेहेरा-भाव आणि विशेषतः अक्कडबाज मिशा, त्याला न शोभणारा मोबाईल, थोडीशी बेशिस्त
तो तो नव्हेच!
बरोबर
मागे श्रावणने हे फोटो दाखवले तेव्हा मलाही वाटलं होतं की अक्कडबाज मिशांचा माणूस फोटो काढतोय पण मग लक्षात आलं की हात समोरच्या तरुण मुलाचा आहे. माझा प्रतिसादही म्हणूनच आला आहे की तरुणांशी मोबाईल इतका घट्ट झाला आहे की मोबाइल आणि तारुण्य वेगळं काढता येत नाही.
बायदवे, हात कोणाचा? असंही शीर्षक देता येईल. लास्ट सपर या लिओनार्डो द विंचीच्या चित्रात असाच एक गूढ हात आहे. ;)
उत्तम शक्यता असलेले चित्र
उत्तम शक्यता असलेले चित्र आहे.
परंतु कमीतकमी चार विसंवादी कथा असलेले हे चित्र आहे : सर्वात जवळचा, फोनवाला, वेगळ्या दिशेने बघणारा, आणि छोटी मुलगी, सगळ्यांचे चेहरे लक्षणीय आहेत, आणि त्यांच्या चर्येतून कळणारी कथा वेगळी आहे. पण चार चित्रांच्या विसंवादाची एकत्रित कथा होत नाही आहे माझ्यासाठी.
अशा परिस्थितीत कलात्मकतेसाठी खूप घट्ट डेप्थ ऑफ फोकस असलेला बरा.
सहमत
कलात्मकतेसाठी खूप घट्ट डेप्थ ऑफ फोकस असलेला बरा.
पूर्ण सहमत. आणि 'असलेला बरा' कशासाठी? असलाच पाहिजे.
वाद म्हणून नव्हे, पण हे प्रचंड वैविध्य - भावभावनांचे, रंगसंगतीचे, प्रतिमांचे - टिपले आहे इतकेच खरे. त्यापलीकडे फार वेगळी, खोलवर जाणारी, काही अधिक अर्थगर्भता असणारी कलात्मकता टिपण्याचा विचारही माझ्या मनात आला नव्हता, कारण तशी काही कलात्मकता मी पाहूही शकत नाही.
अश्याच काही ओळी
हाफीसातून चित्र दिसत नाहीय. मात्र एकुणह्च या आंदोलनासाठी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी काहि ओळी आठवतात
१.
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या||
-- (संत तुकडोजी महाराज)
२.
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
-- मर्ढेकर (पिपात मेले...)
३. (हे कदाचित वरील वर्णन केलेल्या प्र्संगाला शोभावे)
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलि:कण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुळीचेच आहे मला भूषण
-- कुसुमाग्रज (पृथ्वीचे प्रेमगीत)
बाकी घरी जाऊन चित्र बघितल्यावर काही ओळी सुचल्या तर सांगतो
फोटोला नाव काय द्यावं?
किंवा स्वतःला काय नावे ठेवावीत?
तर काय वाटले/(वाट्टेल) ते -
आम्ही दुरून गंमत पहाणारे काय? किंवा तिथे प्रत्यक्षात उपस्थित असणारे/विस्थापित काय? बहुतांशी कुणीच खरेखुरे गंभिर नाही असे जाणवले.
कदाचित विस्थापितांच्या नेत्यांनाच त्या प्रश्नाचे गांभिर्य कळत/वाटत असावे. अक्कडबाज मिशावाला सोडला तर कुणालाही कार्यक्रमात गम्य नाही.
कुणी फोटो काढतोय, कुणी पोराटकी टाळ्या वाजवत आहेत, कुणी स्वतःच्याच विचारात आहे.
याचे कारण काय असावे? कदाचित इतकी वर्षे चालेलेले आंदोलन आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा परिंणाम म्हणून सगळेच हळूहळू निबर होत चालले असावेत.
'हे असंच चालणार' ही भावना कुठेतरी रुजत गेली असावी. (आमच्यात आणि त्यांच्यातही)
म्हणजे 'रोज मरे त्याला कोण रडे' : किंवा : ऊर्ध्वदैहिकातले 'मुरब्बी' लोक कवटी फुटेतोवर शिळोप्याच्या गप्पा मारतात तसे!
मिशावाल्याच्या शेजारची लगेच उजवीकडची मुलगी (चेहर्याला लागून चेहरा) मात्र खरोखर श्रवण, चिंतन आणि मनन करत आहे असे वाटले.
तिच्या डोळ्यात समज जाणवते. (तिच्याकडे पाहिले की मोडकमास्तर जाणवतात.)माझ्या दृष्टीने ती मुलगीच या फोटोचा मुख्य बिंदू आहे.
तेंव्हा : वाचकांत/श्रोत्यांत/प्रेक्षकांत काही फोटो काढणारे, काही टाळ्या पिटणारे, काही मिशा गोंजारणारे, काही आत्ममग्न आणि फार थोडे
मूळ विषय समजणारे आणि समजावून घेणारे असतात हेच या प्रकाशचित्रावरून दिसते.
म्हणून फोटोचे नाव - 'मातीच्या चुली'
नाव माहित नाही.
नाव माहित नाही पण परवा आमच्याकडे जबरदस्त वादळ झालं, सायरन वाजत होती पण माझ्या मुलीला पत्ताच लागला नाही तेव्हा मी वैतागून तिला सांगत होते -
"आपल्या घरावर वीज पडली तर आश्रय शोधायच्या ऐवजी तू मित्र मैत्रिणींना एसएमएस करून बातमी पोहोचवत असशील किंवा रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता तशी तू कानाला हेडफोन्स लावून आयपॉडवर गाणी ऐकत असशील."
वरचं चित्र पाहून त्याची आठवण झाली.