टीकाकाराची स्मशानयात्रा - शंकर वैद्य
कवी शंकर वैद्य ह्यांच्या निधनाच्या निमित्तानं त्यांच्याविषयी पुष्कळ लिहून येतंय. त्यात त्यांच्या कवितेविषयी जे म्हटलं जातंय ते प्रामुख्यानं त्यातल्या हळुवारपणाविषयी, ऋजुतेविषयी वगैरे आहे. त्यामुळे त्यांच्या निर्मितीचा एक वेगळा पैलू दाखवणारी ही कविता लोकांना दाखवावीशी वाटली. ही एका मासिकात आली होती, पण त्या अंकाविषयीचे तपशील मिळाले नाहीत. ती नंतर एखाद्या पुस्तकात प्रकाशित झाली होती का, हेदेखील ठाऊक नाही. अशी दुर्मीळ कविता इथे देण्यामागचे हेतू म्हणजे -
- त्या कवितेला अज्ञातवासातून बाहेर काढणं;
- त्या निमित्तानं शंकर वैद्यांच्या काव्याचा एक वेगळा, तिरकस पैलू लोकांना दाखवणं;
- ती कुठे प्रकाशित झाली होती, कुठे मिळू शकेल, वैद्यांच्या अशा इतर काही कविता आहेत का, ह्याविषयी काही तपशील मिळवणं.
त्यामुळे संपूर्ण कविता इथे देण्यात प्रताधिकारांचा भंग होणार नाही अशी आशा आहे.
तर ही ती कविता -
टीकाकाराची स्मशानयात्रा - शंकर वैद्य
अशोक,
आता तू या टीकाकाराच्या स्मशानयात्रेची तयारी कर
हे टीकाकार, तेव्हा —
यांच्यासाठी तिरडीच हवी करकरणारी
म्हणजे आपणही चालू लयबद्ध तालावर
यांच्यासाठी लाकडे हवीत ती टणक बाभळीची
तिरडीवरून दोरी बांधायची ती राठ काथ्याची
वर उधळायला फुले आण पिवळी
ढालीसारखी सूर्यफुलेही असू देत : — सारे कसे प्रतीकात्मक
त्यांच्या जवळ ठेवा ती त्यांची शिणलेली लेखणी
टाका सर्वांवर थोडा गुलाल,
आणि तिरडी बांधा थोडी व्यवस्थित आखूनरेखून
फूटपट्टीने मोजून, कोनमापकाचा उपयोग करून
टीकाकारांना वरती झोपवायचे ते नीट हिशेब करून
व्यवस्थित तोल सांभाळून
एकंदर आकृतिबंध नीट जमला पाहिजे
संवाद-विरोध सर्व ठीक ध्यानांत घेऊन;
कोपऱ्यावरून वळण घ्या नीट कोनात
आणि चालताना कोणी रडू नका हंबरडा फोडून
फक्त चेहऱ्यावरील भावांना
सूचक बोलू द्या — ते मात्र उत्कट
त्या सूचक भावांना
होता होईल तो विश्वात्मक आकार द्या
अरे, या टीकाकारांनीच आपल्याला शिकवलं :
'विशुद्ध रसिक रात्रंदिन कलात्मक पातळीवर असतो'
तसेच, 'जीवनाकडे कलात्मक दृष्टीने पहायला शिका!'
— अशोक, ते आपण आता तरी करू या!
हा चितेचा न्यास नीट जमला आहे
पण ओंडक्यांची एक ओळ कच्ची पडते
पश्चिमेकडला तोल जरा सुधारून घ्या
ती काळी लाकडे बाजूला काढा
बुक्का नको ऽ ; तो या स्कीममध्ये बसत नाही
लायटर नको. — गवरीने पेटवा
पण बुक्का टाकाच. कारण —
धुराला बॅलेन्सिंग फॅक्टर हवा
म्हणताय तर, कवटी फुटतानाचा आवाज
टेपरेकॉर्ड करा; होय —
“भावस्फोटाची उपपत्ती यांनीच मांडली होती!”
आता सारे हात जोडून प्रार्थना करू या —
हे दयाघन परमेश्वरा,
यांनी स्वत: कलात्मक निर्मिती केली नव्हती हे खरे,
घेतले यांनी वाङ्मय प्रवाहांचे दर्शन शब्दांच्या घाटावरून
वल्हवत गेले इकडे तिकडे पारिभाषिक शब्दांमधून
पकडत राहिले पाण्याचे आकार शब्दांची जाळी टाकून
तरी यांनी सेवा केली ती तशी कलेचीच
टीका करण्याचे व्रत घेऊन
तेव्हा यांना नवा जन्म देताना यांच्या अनेक उणीवा
तू सहानुभूतीने दूर कर
यांना टीकाकार करण्यापूर्वी रसिक कर
देवा, तू यांना पूर्ण देह दे,
धड इंद्रिये दे, निरोगी मन दे,
व्यवस्थित भूक आणि पचनशक्ती दे
येता जाता यांचे पोट दुखे तेवढे दूर कर
यांना जगाचे अनुभव दे
देवा, ते जग शक्य तितके मोठे असू दे
आणि बरं का देवबाप्पा,
तू यांना फूटपट्ट्यांनी युगे मोजण्याचे
क्लेश देऊ नकोस
यांना भरपूर खायला दे, भरपूर सुख दे
आणि आत्मप्रतिष्ठा पण दे
म्हणजे यांना थोर अज्ञजनांची लाचारी
करावी लागणार नाही;
किंवा असे कर ना : यांना सरळ भणंग गरीब कर
ज्यायोगे यांच्यात हुतात्म्यांचे तेज चढेल
सत्यासाठी!
आणि हो, त्यांना ती कवितेची व्याख्या दे एकदाची करून
टाक तुझे ते काव्याचे अंतिम सत्य एकदाचे जाहीर करून
म्हणजे बरीच फरफट वाचेल त्यांची.
देवा, या संबंधात कितीही बोलले तरी ते अपुरेच
आणि बोलता बोलता
पसरटपणा येत जातोय खरा
तथापि आमचा भाव तू जाणून घे. खरे म्हणशील तर
तू यांना अढळ ध्रुवाचीच जागा काढून दे
म्हणजे हे राहतील कायमचे वर
वाटचुकल्या गल्बत्यांना मार्गदर्शन होईल!
यांनी शिकवून ठेवलेली अनेक पंडित मंडळी
येथे आहेत;
त्यांच्या या आवडत्या शिष्यांना आज रडावेसे वाटते आहे,
सूचकतेचा मार्ग सोडून, औचित्याची बंधने तोडून!
देवा, तू त्यांना मनापासून रडण्यास मुभा दे आणि
उत्कट उर्मी दे;
त्याच्या प्रकट अश्रूंवर तू रागवू नकोस
ऐक तो त्यांचा गहिवर :
'परमेश्वरा, समीक्षकाची कुळे नाहीशी होतात
तेव्हा घराभोवतालची कुंपणेच हिरावली जातात
नाहीसे होतात साहित्याचे रखवालदार
आता आमचे कसे होणार?'
... पण देवा, आमचे जे काय होणार असेल ते होवो! मात्र
त्याला तोंड देण्याची शक्ती तू परस्पर आमच्याकडेच दे!
मंडळींनो, चला घरोघर जाऊ या
नियती अटळ असते
देवाचीच इच्छा होती : हे कार्य आपल्याच हस्ते व्हावे
— ते घडले आहे
उद्या राख सावडायला येण्याची गरज नाही
टीकाकाराची राख उरत नाही म्हणतात
कारण आशय अभिव्यक्तीत विरून गेलेला असतो
आता मोकळेपणाने चालायला हरकत नाही!
---
लेखनकाळ : अज्ञात
प्रकाशन तपशील : महाराष्ट्र टाइम्स वार्षिक १९७५
प्रताधिकार : शंकर वैद्यांचे वारस किंवा प्रकाशक (बहुधा)
अद्ययावत : प्रकाशन तपशील अद्ययावत केला आहे.
प्रतिक्रिया
अहाहा. ही कविता जंतूंनी इथे
अहाहा. ही कविता जंतूंनी इथे द्यावी यात काय विलक्षण औचित्य आहे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मेटाटीका की टीकेचा सबस्ट्रेट?
टीकाकारावरची तिरकस टिप्पणी हीदेखील एक प्रकारची टीकाच मानली, तर ती टीकाकारांना रोचक वाटणं ह्यात नवल ते काय?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एक वेगळा, तिरकस पैलू लोकांना
खरच खोचक आहे कविता!
शंकर वैद्य यांची "दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले" ही कविता माहीत आहे. अत्यंत सुंदर आहे. (आम्हाला सुंदर अन उत्कट व्यतिरीक्त विशेषण सापडायची बोंब. तर ते एक असोच )
वर दिलेली कविता खरच तिरकस आहे खास.
छोटसं करेक्शन
दिवे लागले रे दिवे लागले: शंकर रामाणी
ऊप्स!!! चुकले खरच खरच शंकर
ऊप्स!!! चुकले खरच खरच शंकर रामाणि च
मस्त
तुम्हीच अनुवाद केलेल्या एच.ड्ब्ल्यू.ऑडेन च्या फ्यूनरल ब्ल्यूजची आठवण करुन देणारी कविता आहे, त्याचबरोबर मराठीत फारच कमी आढळणारी नाट्यमय स्वगतछाप शैली परत टि.एस.एलिएट सम कविंची आठवण करुन देणारी, फक्त सटायरप्रमाणे प्रतिमा न वापरता थेट तिरकस शैली वापरली आहे ती जरा समिक्षेचा घाव खोल बसल्याचा संकेत देणारी आहे.
पण हे असं लिहणंही खास.
कविता वाचून खरोखरंच मजा आली,
कविता वाचून खरोखरंच मजा आली, मन कंस प्रसन्न झाल.
मी ही दोन ओळी जोडतो:
ज्यांना काहीच जमत नाही
किंवा असे ही
ज्यांना कविता कळत नाही
टीकाकार (समीक्षक) बनतात
कवींच्या चितेवरच
आपली पोळी भाजतात.
उच्च!
उच्च!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्त.
मस्त.
त्यामुळे संपूर्ण कविता इथे
तांत्रिक दृष्ट्या प्रताधिकारांचा भंग होतो आहे असे वाटते. "त्या कवितेला अज्ञातवासातून बाहेर काढणं;" हा उद्देश कितीही स्तुत्य असला तरी प्रताधिकारांचा भंग टाळण्यास पुरेसा नसावा. "त्या निमित्तानं शंकर वैद्यांच्या काव्याचा एक वेगळा, तिरकस पैलू लोकांना दाखवणं;" हे वाक्य सध्याच्या स्थितीत प्रताधिकार भंग टाळणार नाही, पण वाक्यात जरासा बदल केला तर "त्या निमित्तानं शंकर वैद्यांच्या काव्याचा एक वेगळा, पैलू तिरकस आहे, हे लोकांना दाखवणं;" या वाक्यात '''आहे''' हा शब्द जोडल्याने कवितेत तिरकसपणा असल्याच भाष्य तुम्ही स्वतः करत आहात हे अधिक स्पष्ट होईल आणि तुमचा उद्देश अंशतः समिक्षेचा अथवा टिकेचा होईल आणि प्रताधिकारांचा भंगातून अंशतः सूटका होईल असे वाटते. हि केवळ तांत्रिकता झाली तरी महत्वाची वाटते
पण एवढे करणेही पुरेसे नसावे, किमान प्रत्येक कडव्यानिशी तुमचे स्वतःचे काही ना काही भाष्य हवे नाही तर किमान पक्षी कवितेच्या अमूक तमूक परिच्छेदात कवीला नेमके काय म्हणावयाचे आहे असा प्रश्न असावा. आता अशा मुद्दाम वापरलेल्या शॉर्टकट तांत्रिकता जाहीर केलीत तर कॉपीराईटचा भंग होणारच पण जाहीर नाही केलीत तर भंग बहुधा होणार नाही.
ऐसीवर समिक्षा हे अधिकृत सदर आहे त्यात टाकावी शिवाय ऐसिने कुठेही समिक्षा हे टॅगिंगं उपलब्ध करून देणे चांगले.
(चुभूदेघे उत्तरदायकत्वास नकार लागू)
ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.
बहुतांश सहमत आहे भारतात हे
बहुतांश सहमत आहे
भारतात हे कॉपीराईट 'प्रकर्ण' फारच क्लीष्ट वाटतं. नक्की भंग कधी झाला कधीनाही याचे वस्तुनिष्ठ परिमाण उपलब्धच नाहिये.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कॉपिराईटची चर्चा वाचून हा
कॉपिराईटची चर्चा वाचून हा धागा आठवला.
http://www.aisiakshare.com/node/2142
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मूळ कविता तितकीशी समजली नाही.
मूळ कविता तितकीशी समजली नाही. अजून दोन तीनदा वाचली पाहिजे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फेअर यूज
इथून काही उद्धृतं -
माझे मुद्दे :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ही चर्चा मूळ कवितेशी तशी
ही चर्चा मूळ कवितेशी तशी संबंधीत नाही. वेगळ्या धाग्यात हलवता आली तरी चालेल,
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
शंका
सदर उद्धृत भारतीय कायद्याशी किती संबंधित आहे? त्या धाग्यावर भारताशी संबंधित असे काहि दिसले नाही
का ऐसीवर काहि देताना अमेरिकन कॉपीराईट कायद्यात बसणे पुरेसे आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बर्न करारापासून आजपर्यंत
इथून उद्धृत :
बर्न करारापासूनच 'फेअर यूज' संकल्पना अस्तित्वात आहे आणि थोड्याफार फरकानं आजही लागू असावी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||