Skip to main content

राजूचे बिल

3 minutes

आज काहीसा अप्रासंगिक झालेला हा जुना लेख:

राजूचे बिल
कालच मराठी वाड्:मयाचा इतिहास गाळत...च्..च् चुकलो, चाळत असताना एका जुन्या दस्तऐवजावर आमची नजर पडली. सदर मजकूराचे प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘दिनूचे बिल’नामक मजकूराशी असलेले साम्य आमच्या व्यासंगी बुद्धीने चटकन टिपले. ‘उद्याचा संसार’ सारखे अचूक सामाजिक भविष्य सांग़णारे नाटक लिहिणार्‍या अत्र्यांच्या लेखणीतूनच हा मजकूर उतरला असावा असे समजण्यास वाव आहे कारण त्यात वापरलेले ‘प्रचंड’ आकडे आजसुद्धा ‘दहा हजारात’ एखादा तरी मराठी लेखक वापरू शकतो का याबाबत आम्हांस शंका आहे. तरीही छातीठोकपणे आम्ही हे प्रतिपादन करू शकत नाही. त्यामुळे जिज्ञासूंची ज्ञानपिपासा अधिक ताणून न ठेवता आम्हांस उपलब्ध झालेला उपरोल्लेखित मजकूर येणेप्रमाणे-

राजू नावाचा एक दहा-बारा वर्षांचा आधुनिक गणराज्यातला एक पुढारी होता. त्याचे ‘बाबा’ एका राज्याचे ‘मुख्य’ तर आई ही राणी होती. बाबांना मुंबईत तर आईला कामानिमित्त दिल्लीत राहावे लागे. राजू दोन्हीकडे येऊन जाऊन असे. बर्‍याचदा क्रिकेटचा सामना किंवा फिल्मी पार्ट्या असा काहीच कार्यक्रम नसला की तो बाबांच्या ऑफिसमध्ये त्यांचे काम पाहत बसे. बाबांकडे अनेक लोक त्यांची गार्‍हाणी घेऊन येत. बाबा त्यांचे ऐकून घेत, त्यांच्या शंकेचे समाधान करतो असे सांगत व आपल्या हाताखालच्या सचिवाला त्यांचे ‘बिल’ बनविण्यास सांगत. राजूला याचे नवल वाटे. एक दिवस त्याने बाबांना विचारले.
“बाबा, बिल म्हणजे काय हो ?”

बाबा आपली रुंद जिवणी अधिकच रुंदावत हसत म्हणाले, “अरे बाळ, आपण लोकांची अनेक कामे करतो , जसं की पुतळे उभारतो, वीज बिलं माफ करतो, कमी किमतीत घरं वाटतो. या सगळ्याबद्द्ल लोकांकडून पैसे घेतो.”

“हं...” छोट्या राजूला ‘लोकांची कामे’ म्ह्णजे काय ते कळले नव्हते, असतील काही मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी असे समजून राजू म्हणाला, “बघू, तुमच्या हातातलं ते बिल बघू...”

बाबांनी एक कागद राजूपुढे सरकवला. राजूने तो कागद डोळ्यांसमोर धरला. प्रथम त्याला काही कळेच ना. आतापर्यंत फक्त क्रिकेटचे धावफलक, सिनेमातील नटनटयांचे रंगवलेले चेहरे पाहण्याचीच त्याला सवय होती. त्या कागदावर लिहिले होते....

(पुढचा काही मजकूर उपलब्ध नाही)

......रात्री आई निजण्यासाठी बिछाना सारखा करू लागली तेव्हा तिला उशीखाली एक चिठ्ठी दिसली. आईला नवल वाटले. तिने ती वाचली. तळाशी राजूची सही होती आणि वर राजूने असे लिहिले होते-

(पुढचा काही मजकूर उपलब्ध नाही)

...........सकाळी राजू उठला. बिछाना आवरून ठेवताना त्याला उशीखाली एक नीट घडी केलेला कागद दिसला. राजूने चटकन तो उघडला.त्यावर त्याचे नाव होते आणि लिहिले होते- ‘बिल’. ‘अरेच्चा! आपल्याला कुणी बिल पाठवल ?’ राजूला नवलच वाटले. खाली सही होती-‘आई’. ते बिल असे होते

-

(पुढचा काही मजकूर उपलब्ध नाही)

...........वाचता वाचता राजूचे डोळे भरून आले. तो धावतच स्वयंपाकघरात चहा बनवत असलेल्या आईला जाऊन बिलगला आणि मुसमुसून रडू लागला. आईलाही अश्रू अनावर झाले.......

(पुढचा काही मजकूर उपलब्ध नाही)

....राजूने त्याने आईला दिलेले बिल आईच्या हातातून घेतले आणि फाडून टाकले.......

(पुढचा काही मजकूर उपलब्ध नाही)

सदर मजकूराचे काही वर्तमानकालीन घडामोडींशी साधर्म्य आढळल्यास तो लेखकाच्या दूरदृष्टीचा पुरावाच समजावा असे आमचे मत आहे.
टीप: वरील मजकूराच्या शेवटचा काही मजकूर आम्हांस उपलब्ध न झाल्यामुळे ही गोष्ट इथेच संपते किंवा पुढे चालू राहते असे निश्चित प्रतिपादन करण्यास आम्ही तूर्त असमर्थ आहोत. तोवर आमचे संशोधनकार्य सुरू आहेच.

Node read time
3 minutes

रेड बुल Fri, 13/02/2015 - 00:11

पप्पु ची गोष्ट आहे की राजुची ? काही असो जबरा आहे... आता हीच अभ्यासक्रमात सामील होणार.

शहराजाद Fri, 13/02/2015 - 01:25

_/\_

तिरशिंगराव Fri, 13/02/2015 - 17:19

क्या बात है! 'दिनुचे बिल' वाचताना आमच्या डोळ्यांतून आपसूक अश्रु ओघळले होते. हे वाचताना तर धारा लागल्या हो!
कुठे नेऊन ठेवला आहे आमचा सानेगुरुजींचा देश ?