Skip to main content

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

10 minutes

(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्या साठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे).

तदागच्छ महातेज आश्रमं पुण्यकर्मणः ।
तारयैनां महाभागां अहल्यां देवरूपिणीम् ॥ ११ ॥

(महातेजस्वी श्रीरामा! आता तू पुण्यकर्मी महर्षि गौतमाच्या या आश्रमात चल आणि त्या देवरूपिणी महाभागा अहल्येचा उद्धार कर).

विश्वामित्रवचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः।
विश्वामित्रं पुरस्कृत्य आश्रमं प्रविवेश ह॥ १२॥

(विश्वामित्रांचे हे वचन ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामांनी महर्षिंच्या मागोमाग त्या आश्रमात प्रवेश केला.)

र्श च महाभागां तपसा द्योतितप्रभान् ।
लोकैरपि समागम्य दुर्निरीक्ष्यां सुरासुरैः ॥ १३ ॥

(तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले- महासौभाग्यशालिनी अहल्या आपल्या तपस्येने दैदीप्यभान होत आहे. या लोकातील मनुष्य तसेच संपूर्ण देवता आणि असुरही तेथे येऊन तिला पाहू शकत नव्हते).

देवी अहल्येचे तेजस्वी स्वरूप पाहून श्रीरामाचे डोळे दिपून गेले. काल महर्षि विश्वामित्राने सांगितलेली देवी अहल्येची कथा डोळ्यांसमोर तरळली. श्रीरामाला आठवले, महर्षि विश्वामित्र म्हणाले होते, राम, उद्या आपण मिथिला राज्यात प्रवेश करू. त्या आधी उद्या पहाटे, माझा देवरूपिणी महातेजस्वी अहल्येच्या आश्रमात जाण्याचा विचार आहे. श्रीरामला आतापर्यंत हे चांगलेच कळले होते, महर्षि विश्वामित्रांच्या बोलण्यामागे काही हेतू निश्चित असतो. त्यांना काहीतरी कार्य सध्या करायचे असते. श्रीरामाने विचारले महर्षि, देवी अहल्या कोण आहेत, आपण तिथे जाण्याचे प्रयोजन काय? महर्षि म्हणाले, राम, लक्ष्मण आज तुम्हाला महासाध्वी अहल्येची कथा सांगतो. महर्षि विश्वामित्र कथा सांगू लागले

अयोध्या आणि मिथिला दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित एका रान नदीच्या काठी, एका वृद्ध तपस्वीचे आश्रम होते. न्यायशास्त्राचे अध्ययन करून, गौतम ऋषी, गौतम ऋषी वृद्ध तपासिच्या आश्रमात न्यायशास्त्र शिकवू लागले. त्या वृद्ध तपस्वीची एक कन्या होती. तिचे नाव अहल्या. प्राण सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या प्रिय पुत्री अहल्येचे लग्न गौतम सोबत लावले. आश्रमाच्या जवळच एका पर्णकुटीत दोघे पती-पत्नी गृहस्थ धर्माचे पालन करत आनंदाने आयुष्य जगू लागले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

सकाळची वेळ होती, नेहमीप्रमाणे गौतम ऋषी आश्रमात शिकवायला गेले होते. कुटीत एकटी अहल्या होती. अचानक तिला अश्वांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अहल्या कुटी बाहेर आली. एक धिप्पाड पुरुष घोड्यावरून उतरला आणि त्याच्या सोबत अनेक हत्यारबंद सैनिक ही होते. तो पुरुष म्हणजे देवांचा राजा इंद्र. या इंद्राला, इंद्रपद स्वत:च्या कर्तृतावर नव्हे तर वंशपरंपरेने मिळाले होते. त्या काळी इंद्रपदाचे स्थान आजच्या युनायटेड नेशन्स सारखे होते. इंद्राचे स्थान आर्यावर्तातल्या राज्यांच्या वाद-विवादात एक मध्यस्था व्यतिरिक्त अधिक न्हवते. आर्यावर्तातले अधिकांश राजा-महाराजा प्रजेकडून वसूल केलेल्या करांच्या एक भाग इंद्राला देत असे. राज्य चालवण्याची कसली ही चिंता नसल्यामुळे इंद्र स्वर्गात, एशोआरमात, गंधर्व– अप्सरांच्या सोबत राहायचा. स्वर्गातले नियम कायदे वेगळे होते. एवढेच नव्हे, आर्यावर्तात ही इंद्र अदंडनीय होता अर्थात आर्यावर्तात केलेल्या अपराधासाठी इंद्राला दंड देण्याचा अधिकार कुणाला ही नव्हता.

इंद्र घोड्यावरून उतरला. गळ्यात फुलांची माळ आणि वल्कल वस्त्र परिधान केलेली साक्षात रतिपेक्षा सुंदर स्त्रीला पर्णकुटीतून बाहेर येताना पाहून इंद्राला खात्री पटली, हीच ती अहल्या आहे, जिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तो आला होता. तिला पाहून इंद्राची कामवासना पेटली, त्याची कामुक नजर तिच्या अंग प्रत्यांगावर फिरू लागली. एक पुरुष आपल्याकडे कामुक नजरेने पाहत आहे, हे पाहून अहल्या मनात चाचपली, तरी ही सर्व धैर्य एकत्र करून म्हणाली, अतिथी आपण कोण आहात, कोणाला भेटायला आले आहात. माझे पती गौतम सध्या घरी नाही. ते आश्रमशाळेत शिकवायला गेले आहेत. मी त्यांना बोलवते. इंद्र जोरात हसत म्हणाला, हे सुंदरी, मी तुझ्यासाठी इथे आलो आहेत. तुझे विलोभनीय सौंदर्य अरण्यात नष्ट होण्यासाठी नाही आहे, तुझी जागा स्वर्गात आहे. स्वर्ण अलंकारांनी नटलेले तुझे सौंदर्य पाहून स्वर्गातील देवता थक्क होतील. हे सुंदरी, मला प्रसन्न कर. मी तुला आपल्या सोबत स्वर्गात घेऊन जाईल. अप्सरांमध्ये तुला सर्वोच्च स्थान मिळेल. इंद्राचे असे असभ्य बोलणे ऐकून, अहल्या रागाने आणि त्वेषाने ओरडली, कामांध, नराधम, माझ्या पतीला कळले तर...

अद्याप त्याला कळले ही असेल, पण तो काही ही करू शकणार नाही, इंद्राला जी वस्तू आवडते, तिचा उपभोग घेतल्या खेरीज तो राहत नाही, मुकाट्याने माझ्याशी समागम करून मला प्रसन्न कर, अन्यथा बळजबरी करावी लागेल, असे म्हणत इंद्राने तिचा हात पकडला आणि फरपटत तिला कुटीत नेले.

अश्वांच्या टापांच्या आवाज आश्रमात ही ऐकू आला होता. आपल्या कुटी बाहेर काही शस्त्रधारी व्यक्ती आहे, हे गौतम ऋषींना कळले, त्यांच्या मनात पाल चुकचुकली, काही ब्रह्मचार्यांना सोबत घेऊन गौतम ऋषी कुटी कडे निघाले, जवळ पोहचतच आपल्या प्रिय पत्नी अहल्येच्या किंकाळ्या ऐकू आल्या. काही लोकांना येताना पाहून अश्वरोही सैनिकानी आपले घोडे त्यांच्यावर सोडले. तरी ही गौतम कसेबसे कुटी जवळ पोहचले. सैनिकांनी त्यांना पकडले. गौतम म्हणाले, दुष्टानों, हे काय चालले आहे.

तुझी भार्या, देवराज इंद्राला प्रसन्न करीत आहे, कुत्सित पणे असे म्हणत एका सैनिकाने त्याच्या डोक्यावर गदेने वार केला. गौतम ऋषी चक्कर येऊन खाली पडले. दुसर्या सैनिकाने त्यांचे हात मागून बांधले. थोड्यावेळाने गौतम ऋषी शुद्धीवर आले, पाहतो काय समोर इंद्र उभा होता. त्याच्या शरीरावर नखाने ओरबाडण्याच्या आणि दाताने चावण्याच्या अनेक जखमा होत्या. काहीतून रक्त ही वाहत होते. तरी ही गौतमकडे पाहत, राक्षसी हास्य करत इंद्र म्हणाला. गौतम तुझ्या भार्याने आज मला प्रसन्न केले आहे. एका वाघाला हरिणीचा शिकार करताना जो आनंद मिळतो, तसा आनंद तिने मला दिला आहे. काही थांबत, गौतमा, तुझ्या प्रिया भार्याने परपुरुषाशीं समागम केला आहे. तू तर न्यायशास्त्राचा ज्ञाता. तुला माहितच असेलच, न्यायानुसार, अश्या भ्रष्ट स्त्रियांच्या हातून अन्न जल घेणे तर दूर त्यांना स्पर्श करणे ही पाप आहे. तुला तिचा त्याग करावा लागेल. तरी ही मला तिची कीव येते. तिच्या सारख्या सौंदर्यवतीने पृथ्वीवर तिरस्कृत जगणे किंवा वारांगना सारखे जीवन व्यतीत करणे मला आवडणार नाही. तिला समजावून स्वर्गात पाठव, त्यातच तिचे हित आहे. आपल्या रूप सौंदर्याने देवतांना प्रसन्न करून एशोआरमात आयुष्य जगेल. स्वर्गीय अप्सरांमध्ये तिला मनाचे स्थान मिळेल. राहिले तुझे, एखाद्या कुरूप स्त्रीशी लग्न करून तू ही मजेत आणि चिंतामुक्त राहशील, हा! हा! हा!, असे म्हणत इंद्राने तेथून प्रयाण केले.

आश्रमात स्मशान शांतता पसरली. कुटी बाहेर गौतम ऋषी डोक्यावर हात ठेऊन मौन बसले होते. पुढे काय करायचे कुणाला ही काही कळत नव्हते, सर्वच मौन होते. सूर्यदेव अस्ताचला कडे जाऊ लागले. कुटीतून अहल्या बाहेर पडली, गौतमला उदेश्यून म्हणाली, प्रिय, इंद्राने मला भ्रष्ट केले आहे, आता माझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही. ह्या अपवित्र शरीराला नष्ट करण्याची मला अनुमती द्या. गौतम ऋषी तिच्या कडे पाहत म्हणाले, अहल्या, आत्महत्या करणे पाप आहे, मी त्याची अनुमती देऊ शकत नाही. शिवाय ह्यात तुझा काहीच दोष नाही. मी जाणतो तू, निर्दोष आहे. तुला दोषी मानून, समाजाने आपल्याला वाळीत टाकले तरी चालेल. आपण अरण्यात जाऊन कुटी बांधून राहू, अरण्यातल्या वृक्ष, लता, पक्षी, सत्य जाणतात, ते आपला त्याग करणार नाही.

तुम्ही म्हणतात म्हणून, मी आत्महत्या करणार नाही. मी जर दोषी नाही, तर समाजाने मला वाळीत का टाकावे? जो पर्यंत लोक माझ्या हातचे अन्नजल स्वीकार करणार नाही, तो पर्यंत मी ही अन्नजल स्पर्श करणार नाही.
गौतम ऋषी म्हणाले, अहल्या, हे उचित नाही अन्नजल ग्रहण न करणे म्हणजे एकप्रकारे आत्महत्या करणेच आहे.
अहल्या म्हणाली, हा केवळ माझ्या एकटीच प्रश्न नाही. अनेक स्त्रियांना अश्या प्रसंगातून जावे लागते, निर्दोष असताना ही त्यांना तिरस्कार सहन करावा लागतो, त्यांना जगणे त्यांना असह्य होते. जो पर्यंत मला न्याय मिळत नाही अन्न-जल ग्रहण करणार नाही, केवळ वायू आणि यज्ञीय अग्नि भक्षण करून मी जिवंत राहिल.

यज्ञवेदी समोर असलेल्या एका शिलेवर अहल्या ध्यानिस्थ होऊन बसत सूर्यदेवाला उद्येशून म्हणाली, हे सूर्यदेव, तुम्ही सर्वज्ञ आहात, मला न्याय द्या. जो पर्यंत मला न्याय मिळणार नाही, मी इथून उठणार नाही.

गौतम ऋषींच्या आश्रमात घडलेली घटना पंचक्रोशीत पसरली. जवळपासच्या आश्रमातील काही ऋषी-मुनी गौतमाचे सांत्वन करायला तिथे पोहचले. एक वृद्ध मुनी गौतमला म्हणाला, गौतम, अहल्येने उचित मार्ग निवडला आहे. अश्यारीतीने प्राणत्याग केल्यास, ती पवित्र होईल, तिला स्वर्गात स्थान मिळेल. गौतम म्हणाले, मुनिवर, आज एक महिना होऊन गेला आहे. इतके दिवस बिना अन्न-जल ग्रहण केल्या कुणी ही जिवंत राहू शकत नाही. पण अहल्या जिवंत आहे. तिला न्याय पाहिजे. कोण देणार न्याय. वृद्ध मुनी म्हणाले, तू महाराज दशरथ यांच्या सभेत न्याय मागण्यासाठी जा, कारण न्यायिक नियमांत परिवर्तन करण्याचा अधिकार फक्त राजाचा असतो. गौतम म्हणाले, मला माहित आहे, मी येथून बाहेर गेलो तर यज्ञीय अग्नि कोण प्रज्वलित ठेवणार? वृद्ध मुनी म्हणाले, ते आम्ही बघून घेऊ, तू काळजी करू नकोस.

गौतम ऋषी, महाराज दशरथाच्या राज्यसभेत पोहचले, आपली व्यथा-कथा त्यांच्या समोर मांडली. महाराज दशरथाने, राजपुरोहित महर्षि वशिष्ठ यांचे मत विचारले. महर्षि वशिष्ठ म्हणाले, राजन, कुठल्या ही निर्दोष व्यक्तीला दंड देणे न्यायसंगत नाही, हे जरी खरे असेल तरी, न्याय हा व्यक्तीनिष्ठ नसून, संपूर्ण समजासाठी असतो. कोणी पुरुष, परस्त्री बरोबर समागम करेल किंवा बळजबरी करेल तर त्याला मृत्यू दंड देण्याची व्यवस्था आहे. देवराज स्वर्गाचे अधिपती असल्यामुळे, ते अदंडनीय आहेत. त्या मुळे त्यांना दंड देणे शक्य नाही.

पर-पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला पुरुषाप्रमाणे मृत्युदंड देण्याची व्यवस्था नाही. कारण, स्त्रीवर बळजबरी झाली, किंवा तिने स्वतच्या इच्छेने संबंध केले, हे सिद्ध करणे अतिशय कठीण असते. स्वत:च्या बचावासाठी तिची पुरुषावर आळ घेण्याची संभावना नाकारता येणार नाही. दोन्ही बाबींवर विचार करून, व स्त्री वर अन्याय न होऊ देणे, यासाठी न्यायविदानीं स्त्रीला फक्त वाळीत टाकण्याची व्यवस्था केली आहे. केवळ एका स्त्री साठी न्यायिक व्यवस्थेत परिवर्तन करणे उचित नाही. तसे केले तर, स्वेच्छाचारी स्त्रिया याचा गैरवापर करतील. गौतम कडे पाहत वशिष्ठ ऋषी म्हणाले, अन्नजल ग्रहण न करता कुणी ही जिवंत राहू शकत नाही. मला तर असे वाटते, स्त्री सौंदर्याला भुलून गौतमनेच हा प्रपंच रचला असावा. वशिष्ठ ऋषींचे वचन गौतमला सहन झाले नाही. क्षणभर ही विचार न करता, सभात्याग केली. मोठ्या आशेने गौतम अयोध्येत आला होता. इथे ही त्याला न्याय नाही मिळाला. आता काय करायचे त्याला समजेनासे झाले. कुठल्या तोंडाने आश्रमात परत जाणार. अयोध्येत काय घडले असे कुणी विचारले तर त्यांना काय सांगणार. राहून-राहून वशिष्ठ ऋषींचे बोल, गौतमच्या कानावर आदळत होते. वशिष्ठ ऋषीने संपूर्ण सभेसमोर गौतमला स्त्री लंपट ठरविले होते. हा अपमान गौतमला सहन होत नव्हता. आपण अगतिक आहोत, आपण काहीच करू शकत नाही. आपल्या पत्नीला न्याय ही मिळवून देऊ शकत नाही. गौतम निराश झाला. आता जिवंत राहण्यात काहीच अर्थ नाही, गौतमाने प्राण त्यागण्याचा निश्चय केला आणि सरयू नदीत उडी टाकली.

गौतमचे डोळे उघडले, तो एका पर्ण कुटीत होता. गौतमला आठवले, मी तर नदीत उडी टाकली होती, तरी जिवंत का. कुणी आपल्याला इथे आणले. हा प्रश्न त्याला पडला. गौतमने चहूकडे डोळे फिरवले, एक प्रौढ वयाचे मुनी गौतमकडेच पाहत होते. गौतमने डोळे उघडले हे पाहून, ते म्हणाले पुत्र, या तरुण वयात जगण्याचे सोडून, मरणाची वाट का धरली? मी जर तिथे नसतो तर नाहक प्राण गेला असता तुझा. गौतम उठून म्हणाला. मुनिश्रेष्ठ, आपण माझे प्राण का वाचविले? मला जगायची इच्छा नाही. असे म्हणत, गौतमाने आपली कहाणी त्या मुनिना ऐकवली. ते मुनी म्हणले, गौतम, मी कुशिक पुत्र विश्वामित्र आहे. मी वचन देतो, मी देवी अहल्येला न्याय मिळवून देईल. तुला एकच विनंती आहे, पुन्हा आत्महत्येचा विचार मनात आणू नको. तू निश्चिंत होऊन आपल्या आश्रमात परत जा.

विश्वामित्र कथा सांगता सांगता थांबले, रामाला उद्येशून म्हणाले, राम, तू अयोध्येचा युवराज आहे, आता तूच ठरव, उद्या आपण गौतम ऋषींच्या आश्रमात गेले पाहिजे कि नाही. राम उद्गारला, गुरुदेव, मी उद्या अन्न-जल महातपस्वी अहल्येच्या हातानेच ग्रहण करेल. विश्वामित्र म्हणाले, राम मला तुझ्यापासून हीच अपेक्षा होती.

महर्षि विश्वामित्र, अयोध्येचे युवराज राम आणि त्यांचे अनुज लक्ष्मणासोबत गौतम ऋषींच्या आश्रमात येणार ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. जवळपासच्या आश्रमातले ऋषी मुनी, ब्रह्मचारी आणि ग्रामस्थ त्यांच्या स्वागतासाठी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ जमले. आज काय होणार याची उत्सुकता सर्वाना होती. श्री रामाने आश्रमात प्रवेश केला

प्रयत्नाान् निर्मितां धात्रा दिव्यां मायामयीमिव ।
धूमेनाभिपरीतांगीं दीप्तां अग्निशिखां इव ॥ १४ ॥

सतुषारावृतां साभ्रां पूर्णचंद्रप्रभामिव ।
मध्येऽम्भसो दुराधर्षां दीप्तां सूर्यप्रभामिव ॥ १५ ॥

(तिचे स्वरूप दिव्य होते विधात्याने फार प्रयत्ना॥ने तिच्या अंगांची निर्मिति केली होती. ती मायामयी असल्याप्रमाणे प्रतीत होत होती. धूमाने घेरलेल्या प्रज्वलित अग्निशिखेप्रमाणे ती वाटत होती. आणि ढगांनी झाकल्या गेलेल्या पूर्ण चंद्राच्या प्रभेसारखी दिसत होती. तसेच जलामध्ये उद्भाासित होणार्यां सूर्याच्या दुर्धर्ष प्रभेसमान दृष्टिगोचर होत होती.

सूर्यदेवा सारखे प्रखर तेज तिच्या चेहऱ्यावर असेल्यामुळे कुणाला ही तिला पाहणे शक्य नव्हते. एवढ्या कालखंडानंतर श्री राम आणि लक्ष्मणाने तिच्या चरणांना स्पर्श केला. श्री रामाने चरणस्पर्श करताच अहल्येने डोळे उघडले. श्री राम म्हणाले, माता मी अयोध्या नरेश दशरथ यांच्या पुत्र राम आहे आणि हा माझा अनुज लक्ष्मण आहे. तुझे दर्शन घेऊन आज मी कृतार्थ झालो आहे. अहल्येच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती उठली आणि रामाला मिठी मारत म्हणाली, राम किती वाट पहिली तुझी, का लावला एवढा वेळ? तू कौसल्येच्या गर्भात होता, तेंव्हा पासून तुझ्या आयुष्यातला एक एक दिवस मी ही जगला आहे. रामाने आपल्या हाताने तिचे ओघळणारे अश्रू पुसले आणि म्हणाला, माता, मला भयंकर भूक लागली आहे, तू आपल्या हाताने मला ग्रास भरवणार नाही तो पर्यंत माझी भूक शांत होणार नाही.

ते दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले नसेल तर नवलच. महर्षि विश्वामित्र गौतमास म्हणाले, गौतम, मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे. आता महाभोजाची तैयारी करा, आज साध्वी अहल्या, सर्वांनाच आपल्या हातानी भरवणार आहे. सर्व आश्रमवासी, ग्रामस्थ महाभोजाच्या तैयारीला लागले. महासती अहल्येने राम लक्ष्मणांना आपल्या हाताने भरविले ते अदभूत दृश्य पाहताना

पुष्पवृष्टिर्महत्यासीद् देवदुंदुभि निःस्वनैः ।
गंधर्वाप्सरसां चैव महानासीत् समुत्सवः ॥ १९ ॥

(देवतांच्या दुन्दुभि वाजू लागल्या. त्याबरोबरच आकाशांतून फुलांची भारी वृष्टि होऊ लागली. गंधर्व आणि अप्सरांच्या द्वारा महान उत्सव साजरा केला जाऊ लागला).

साधु साध्विति देवाः तां अहल्यां समपूजयन् ।
तपोबलविशुद्धाङ्गींः गौतमस्य वशानुगाम् ॥ २० ॥

(महर्षि गौतमांच्या अधीन राहणारी अहल्या आपल्या तपःशक्तिने विशुद्ध स्वरूपास प्राप्त झाली हे पाहून सर्व देवता तिला साधुवाद देऊन तिची भारी प्रशंसा करू लागल्या.)

गौतमोऽपि महातेजा अहल्यासहितः सुखी ।
रामं संपूज्य विधिवत् तपस्तेपे महातपाः ॥ २१ ॥

(महातेजस्वी महातपस्वी गौतमही अहल्येला आपल्याबरोबर पाहून सुखी झाले. त्यांनी श्रीरामांची विधिवत् पूजा करून तपस्येस आरंभ केला.)

अखेर अहल्येच्या संघर्षाला यश मिळाले. समाजाने तिचा स्वीकार केला. आज ही स्त्रियांवर बलात्कार होतात. पण तिला समाजात मनाचे स्थान मिळवून देण्यात आज समाज आणि राज्यव्यवस्था सबळ आहे का? त्या वेळी श्री राम होते, पण आज...

टीप: अन्न-जल ग्रहण केल्या बिना ही मनुष्य जिवंत राहू शकतो. गुजरात येथील अंबाजी मंदिराचे ९० वर्षाच्या अधिक वयाचे पुजारी गेल्या ६० वर्षाहून अधिक अन्न-जल ग्रहण करता जीवित आहे. भारताच्या सरकारी संस्थांनी सत्यता पारखण्यासाठी त्यांच्यावर प्रयोग ही केले आहे. NGO वर ही त्यांच्या वर कार्यक्रम बघितला होता.

Node read time
10 minutes

रेड बुल Sun, 29/03/2015 - 15:55

"पुराणा़ज सन अँड डॉटर" असे धाग्याला नाव द्यायला हवे होते.

असो...

पर-पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला पुरुषाप्रमाणे मृत्युदंड देण्याची व्यवस्था नाही. कारण, स्त्रीवर बळजबरी झाली, किंवा तिने स्वतच्या इच्छेने संबंध केले, हे सिद्ध करणे अतिशय कठीण असते.

आँ ? असो, कॉलींग अनु राव.

नगरीनिरंजन Sun, 29/03/2015 - 16:10

हन्म. कथा चांगली आहे पण तात्पर्य हे की समाज तेव्हापासून असाच आहे आणि त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही.

बाकी, अहिल्येचा उद्धार करणार्‍या पुरुषोत्तमाने आपल्या बायकोला जनापवादामुळे का सोडले ते कळत नाही.

मस्त कलंदर Sun, 29/03/2015 - 16:41

In reply to by नगरीनिरंजन

हे तर आहेच. पण प्रचलित किंवा या कथेहून अधिक प्रसिद्ध व्हर्जननुसार, इंद्राने गौतमाचे रूप घेतले आणि त्याने गौतमीशी समागम केला. गौतमीला कामक्रिडेदरम्यान हा आपला नवरा नाही हे कळाले होते परंतु ती गप्प बसली आणि माझ्याच रूपातल्या का होईना , पण परपुरूषासोबत रत झाली म्हणून तिला शिळा होण्याचा शाप गौतम ऋषींनी दिला. तसेच पत्नीकडे कामुक नजरेने पाहिलेस त्याची शिक्षा म्हणून तुझ्या शरीराला हजार डोळे फुटतील असा इंद्राला शाप दिला. त्यामुळे इंद्राचे सहस्त्राक्ष हे नांव पडले. जर ही कथा खोटी तर सहस्त्राक्षाची कथा पण चुकीची ठरते.

नक्की कोणती कथा खरी? जर पहिली तर इंद्र आणि सहस्त्राक्ष ही भानगड काय आहे? दुसरी खरी मानायची तर मग इंद्राला दंड कसा काय झाला?

'न'वी बाजू Sun, 29/03/2015 - 19:24

In reply to by मस्त कलंदर

तसेच पत्नीकडे कामुक नजरेने पाहिलेस त्याची शिक्षा म्हणून तुझ्या शरीराला हजार डोळे फुटतील असा इंद्राला शाप दिला. त्यामुळे इंद्राचे सहस्त्राक्ष हे नांव पडले.

बटाटा हा कोलंबियन एक्स्चेंजपूर्वी 'जुन्या जगा'त ज्ञात नव्हता. पौराणिक काळात तर चान्सिल्ले.

तस्मात्...

जर ही कथा खोटी तर सहस्त्राक्षाची कथा पण चुकीची ठरते.

नक्की कोणती कथा खरी?

...दोन्ही कथा खोट्या (मराठीत: 'प्रक्षिप्त') आहेत, हे उघड आहे.

'न'वी बाजू Tue, 31/03/2015 - 19:38

In reply to by नितिन थत्ते

दक्षिण अमेरिकेत हिंदू (मराठीत- वैदिक) धर्माची चिन्हे सापडली आहेत ना?

काही कल्पना नाही ब्वॉ. पण दक्षिण अमेरिकेत कोलंबियात "हिंदू" ब्र्याण्डचा चहा मिळतो, असे ऐकून आहे.

...................

स्प्यानिशात "ते" बोले तो चहा. तस्मात्, "ते हिंदू" बोले तो, "हिंदू-छाप चहा". ("वनदेवी छाप हिंग" किंवा "माकड छाप काळी टूथ पावडर"प्रमाणे. "संभाजी-छाप विडी"१अचे उदाहरणही चालू शकेल.) चहाच्या लोगोत मांडीबिंडी घालून बसलेला कोणी अनामिक स्वामी आहे. चहाची उत्पादक कंपनी आपले नाव "Agrícola Himalaya" म्हणून सांगते, असे कळते. (उपदुवा: HISTORY OF A LEADING BRAND.)

मात्र, दक्षिण अमेरिकेतील "हिंदु"त्वाच्या अस्तित्वाचे प्रस्तुत लक्षण हे प्राचीन नसून अर्वाचीन (सर्का १९६०) असावे, असे मानावयास जागा आहे. (उपदुवा: HISTORY OF TEA.)

(कंपनीच्या मूळ स्प्यानिश भाषेतील संस्थळाचा दुवा.)

१अ हा ब्र्याण्ड मुळात "शिवाजी छाप विडी" असा होता, परंतु पुढे आक्षेप, खटले वगैरे भानगडींनंतर कंपनीस तो बदलावा लागला, असे ऐकून आहे. जाणकारांनी खुलासा करावा.

अजो१२३ Sun, 29/03/2015 - 19:57

In reply to by नगरीनिरंजन

लोक रामायणाला सत्यकथा मानतात का नाही हे मला कधीच कळले नाही. म्हणून ती टिका ऐतिहासिक सत्य लोकांवर आहे की "लेखकाने एक कथा एका विशिष्ट प्रकारे का लिहिली आहे" यावर आहे हे कळत नाही. If it is the latter, it is meaningless to comment anything.

आता ...
कोणी आपल्या बायकोला का सोडावे याबद्दल आजच्या सुधारित समाजाने काही विशिष्ट अपेक्षा का ठेवावी? रामाला आपली व्यक्तिगत बदनामी टाळायचा अधिकार नाही का? वाल्मिकी ऋषिंना नसलेली माहिती सीतेने रामाला दिली नसेलच कशावरून? रामायण ज्या काळात झाले त्या काळातली शत्रूची (रावणाची) शत्रूपत्नीबद्दलची (सीतेबद्दलची) लैंगिक मूल्ये त्या काळाच्या मानाने अव्वाच्या सव्वा महान होती, इ इ मात्र रामाच्या आजच्या टिकाकारांना मान्य असते. मात्र आपला राजा नौटंकी आहे आणि त्याची बायको खोटारडी आहे असे प्रजेला वाटू नये म्हणून रामाने पत्नीचा त्याग केला इतका महान तो अज्जिबातच नव्हता याची पक्की खात्री असते.

बॅटमॅन Sun, 29/03/2015 - 20:04

In reply to by अजो१२३

मात्र आपला राजा नौटंकी आहे आणि त्याची बायको खोटारडी आहे असे प्रजेला वाटू नये म्हणून रामाने पत्नीचा त्याग केला इतका महान तो अज्जिबातच नव्हता याची पक्की खात्री असते.

फडतूस प्रजेला कन्व्हिन्स करण्यात तो अपयशी पडला म्हणून शिव्या घालतात इतकंच. चार फडतूस लोक कायतरी बोलतात म्हणून बायकोला टाकून द्यायचं ही कुठल्या अंगाने महानपणाची कसोटी आहे ते मज पामराला कळत नाही. आता तो काळच तसा होता तर मग हजारो बायकांना नरकासुराच्या तावडीतून सोडवून त्यांना परत आपल्या बायकोचा दर्जा देणार्‍या कृष्णाला ही समस्या का सतावली नाही हेही एक कोडेच आहे.

म्हणून राम माणूस/देव असेल हो मोठा, पण आमच्या लेखी त्याचा मोठेपणा मोजायचा कशावर?

अजो१२३ Sun, 29/03/2015 - 20:27

In reply to by बॅटमॅन

चार फडतूस लोक कायतरी बोलतात म्हणून बायकोला टाकून द्यायचं ही कुठल्या अंगाने महानपणाची कसोटी आहे ते मज पामराला कळत नाही.

२९-०३-२०१५ ला देखिल बायकोचे लफडे आहे हे घटस्फोटासाठी पुरेसे कारण आहे. वर पोटगी द्यायला लागत नाही. शिवाय लेकराची कस्टडी मिळते. हे कायद्यात असं का आहे याचा अभ्यास आवश्यक आहे.

बॅटमॅन Sun, 29/03/2015 - 20:38

In reply to by अजो१२३

अग्निपरीक्षा करून खात्री झाल्यावरही संशय उदाहरणार्थ रोचक आहे.

शिवाञ ओढूनताणून आजच्या काळाशी संबंध लावणे त्याहून अधिक रोचक आहे.

नगरीनिरंजन Sun, 29/03/2015 - 21:29

In reply to by अजो१२३

कोणत्या कोर्टात जबरदस्तीला लफडे म्हणतात? सीतेचे रावणाशी लफडे झाले आणि तिने ते रामाला सांगितले असेच तर तुम्हाला सुचवायचे नाहीय ना? तसे असेल तर वादच खुंटला.

नितिन थत्ते Mon, 30/03/2015 - 22:37

In reply to by अजो१२३

>>शिवाय लेकराची कस्टडी मिळते.

३० मार्च २०१५ ला लेकराच्या कष्टडीचा फर्ष्ट राइट बापाचाच असतो. बायकोचे लफडे आहे किंचा नाही नॉटविथष्टॅण्डिंग. मूल बापाकडे राहणे धोक्याचे आहे असे सिद्ध करू शकल्यासच आईला कष्टडी मिळते. इव्हन देन बाप कान्ट बी डिनाइड अ‍ॅक्सेस टु चाइल्ड.

रेड बुल Mon, 30/03/2015 - 11:59

In reply to by बॅटमॅन

राम माणूस/देव असेल हो मोठा, पण आमच्या लेखी त्याचा मोठेपणा मोजायचा कशावर?

स्वार्थ साधल्याच्या आणी त्याग केल्याच्या घटनांच्या ताळेबंदावर... करायची मोजणी ? मी अजुअन केलेली नाही पण आत्ताच विचार आला, तेंव्हा एकत्रच करुया अन बघुया हिशोब प्लस मधे जातो की मायनस मधे ?

बॅटमॅन Mon, 30/03/2015 - 12:04

In reply to by रेड बुल

अगदी अवश्य करा.

माझ्या मते लोकांमध्ये आलोकनाथी संस्कार खपवायला रामाचे उदा. एकदम बढाचढाके सांगितल्या गेले आहे.

रेड बुल Mon, 30/03/2015 - 12:09

In reply to by बॅटमॅन

आपण आपली मतं बाजुला सारायची आणी आपण दोघांनी ( एकतर्फी नको म्हणून) तठस्तपणे रामाच्या आयुष्यातील प्रत्येक ज्ञात घटनाक्रमाचे अवलोकन करत त्याच्या कृतीच्या परीणामांचा तौलनीक अभ्यास करत ताळेबंद मांडायचा असा प्रस्ताव होता माझ्यावर काही ढकलु नका. आपले वैयक्तीक मत ऐकायला हा प्रस्ताव दिलेलाही नाही. प्रस्ताव मान्य करणे अप्रशस्त वाटत असेल नसेल स्पष्ट करा विषय संपला. वैयक्तीक मत सिध्द अथवा रद्द करण्यासाठी याचे प्रयोजन नाही.

बॅटमॅन Mon, 30/03/2015 - 12:16

In reply to by रेड बुल

=))

करा की मूल्यमापन, तुमचे तोंड धरणारा मी कोण?

शिवाय त्याच न्यायाने माझे मत मी मांडणारच, त्यावर बोलणारे तुम्ही कोण?

रेड बुल Mon, 30/03/2015 - 12:28

In reply to by बॅटमॅन

हे काय लिहलय ?

राम माणूस/देव असेल हो मोठा, पण आमच्या लेखी त्याचा मोठेपणा मोजायचा कशावर?

जर त्याला उत्तर दिलय तर मग ? पळ का काढताय ? :puzzled: :shock:

रेड बुल Mon, 30/03/2015 - 12:39

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला रामाचा मोठेपणा ठरवायचा कसा प्रश्न पडलाय... जो तुम्ही प्रस्तुत केला मी फक्त त्याला सोल्युशन दिले आहे व ते मान्य आहे की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे एव्हडेच विचारले... ते सोडुन मी काय करावे ... तुमी तुमचे मत मात्र जे आहे ते बदलणार नाही असा दांभीक प्रतिसाद लिहला.

तुम्हाला रामाचा मोठेपणा ठरवायचा आहे की लोकांमध्ये आलोकनाथी संस्कार खपवायला रामाचे उदा. एकदम बढाचढाके सांगितल्या गेले आहे. यावर ठाम रहायचे आहे यावर तुमचेच एकमत नाहीये तर किमन दांभिकता टाळली तर बरे होइल.

बाकी मला कसला सल्ला हवा असेल तर खुलेपणे विचारेनच पण आपण तो फुकटचा देउ नये ही नम्र विनंती.

नगरीनिरंजन Sun, 29/03/2015 - 20:11

In reply to by अजो१२३

अहिल्येवर जबरदस्ती झाली तशी सीतेवरही झाली असे समजल्यास दोघींना वेगळा न्याय का एवढाच प्रश्न होता. रामाच्या महानतेवर अजून शंका उपस्थित केलेली नाही.

रामाला आपली व्यक्तिगत बदनामी टाळायचा अधिकार नाही का?

मुळात सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवायला जाणे हेही आपली पुरुष म्हणून बदनामी टाळण्यासाठीच होते असे तुम्हाला सुचवायचे नाहीय ना?
रामाचे सीतेवर प्रेम होते असेच मी इतके दिवस समजत होतो.

अजो१२३ Sun, 29/03/2015 - 20:30

In reply to by नगरीनिरंजन

रामाचे सीतेवर प्रेम होते असेच मी इतके दिवस समजत होतो.

बायकोला गुंड उचलून घेऊन गेले तर पहिली कृती पोलिसात तक्रार करणे ही असते. बायको परत आल्यावर नंतर काय काय होईल इ इ हा त्याक्षणीचा विचार नसतो.

नगरीनिरंजन Sun, 29/03/2015 - 21:27

In reply to by अजो१२३

मान्य आहे. पण तुमचं नक्की म्हणणं काय आहे?
अहिल्येवर जबरदस्ती झाली तशी सीतेवरही झाली असे समजल्यास दोघींना वेगळा न्याय का एवढाच प्रश्न होता.
रामाच्या महानतेवर शंका अजून उपस्थित केलेली नाही.

प्रतिसादातली महत्त्वाची वाक्ये वगळून फाटे फोडू नका.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 10:48

In reply to by नगरीनिरंजन

अहिल्येवर जबरदस्ती झाली तशी सीतेवरही झाली असे समजल्यास दोघींना वेगळा न्याय का एवढाच प्रश्न होता.

रामाने अहिल्येवर कोणता न्याय केला, कसा केला, का केला हे कळलं तर सांगता येईल. ते दगडाची बाई करणे इ इ काल्पनिक स्टफवर कमेंट करणे अवघड जाते.

विवेक पटाईत Sun, 29/03/2015 - 18:23

प्रतिसादाबाबत धन्यवाद, वाल्मिकी रामायणात बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहे. दोन्ही सर्गात मिळून ३३ + २२ = ५५ श्लोक आहेत. याच आधारावर पुढे अनेक कथा या घटने संबंधित अनेक कालखंडात विकसित झाल्या. प्रत्येक कथा त्या वेळच्या कालखंडानुसार विकसित झाल्या असतील. ही कहाणी लिहिण्याआधी कमी कमी २५-२६ वेळा हे सर्ग वारंवार वाचले. मूळ वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले श्लोक किती असतील हाही प्रश्न पडला. ४९व्या सर्गातील ११-२२ श्लोक वाचल्यावर वाल्मिकींची मूळ भावना काय होती हे स्पष्ट होते. त्यानुसार कथेच्या विस्तारासाठी मूळ श्लोक आहे तसेच दिले आहे. कथेचा शेवट वाल्मिकी रामायणातील श्लोकांद्वारे केला आहे.

.

या आधी रामायणावर आधारित क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा aisiakshare.com/node/3847 घेतली होती.

रामाने सीतेचा त्याग का केला होता? वाल्मिकी रामायणाचे वाचन सुरु आहे. बाकी आत्ताच काही सांगता येत नाही.

शेवटी गौतमाने इंद्राला कोणता श्राप दिला, हा कथेचा विषय नव्हता म्हणून घेतला नाही. बाकी वाल्मिकी रामायाणानुसार गौतमाने सहस्त्राक्ष इंद्राला अंडकोषांपासून रहित होण्याचा श्राप दिला होता (बालकांड सर्ग ४८, श्लोक २७-२८).

अरविंद कोल्हटकर Mon, 30/03/2015 - 09:27

केवळ कल्पनाविलास म्हणून अथवा अहल्याकथेचा नवा अर्थ म्हणून केलेले ललित लेखन निश्चितच स्वागतार्ह म्हटले पाहिजे. पण असे लेखन मुळाबरहुकूम केले आहे असा दावा जर केला गेला तर मूळ स्रोत तपासून त्या दाव्यामध्ये काही अर्थ आहे का हे पाहण्याची आवश्यकता निर्माण होते. ह्या हेतूने मी वाल्मिकी रामायणाच्या तीन विश्वसनीय संस्थळावर हे अहल्याप्रकरण पाहिले आणि त्यात मला जे दिसले ते लिहीत आहे.

ह्या तिन्ही संस्थळांमध्ये थोडीथोडी तफावत जरूर आहे पण ती तफावत सर्गक्रमसंख्या आणि श्लोकक्रमसंख्या असल्या मुद्द्यांवरच दिसते. ही तफावत दूर ठेवली तर मूळ कथा सर्वत्र एकच दिली आहे आणि ती अशी आहे:

(विश्वामित्र रामास आश्रमाचा पूर्वेतिहास सांगत आहेत.)

तस्यान्तरं विदित्वा तु सहस्राक्ष: शचीपति:।। १.४८.१७
मुनिवेषधरोऽहल्यामिदं वचनमब्रवीत्।
ऋतुकालं प्रतीक्षन्ते नार्थिन: सुसमाहिते ।। १.४८.१८

तो (गौतममुनि) दूर गेला आहे हे जाणून शचीपति सहस्राक्ष (इंद्र) (गौतमाचा) मुनिवेष धारण करून अहल्येला असे बोलता झाला.
हे सुबक बांध्याच्या स्त्रिये, (कामाची) इच्छा असलेले ऋतुकालाची (मासिक पाळीच्या अखेरीची) वाट पाहात नाहीत.

सङ्गमं त्वहमिच्छामि त्वया सह सुमध्यमे।
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन ॥ १.४८.१९

हे मध्यमभाग अरुंद असलेल्या स्त्रिये, तुझ्यासह मी अंगसंगाची इच्छा करतो. (’मध्ये क्षामा’ कालिदासाची यक्षी.)
हा मुनिवेष धारण केलेला सहस्राक्ष आहे हे जाणून, हे रघुनंदना...

मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्
अथाब्रवीत्सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना ॥ १.४८.२०
बुद्धि भ्रष्ट झालेल्या तिने देवांचा राजा कसा असतो हे जाणण्याच्या कुतूहलाने त्याला होकार दिला (मतिं चकार) आणि कृतार्थ मनाने ती सुरश्रेष्ठाला म्हणाली:

कृतार्थोऽसि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो |
आत्मानं मां च देवेश सर्वदा रक्ष गौतमात् || १.४८.२१

हे सुरश्रेष्ठा, तुझी इच्छा आता पूर्ण झाली आहे. तू आता येथून त्वरित निघून जावे आणि मला आणि स्वत:ला गौतमापासून रक्षावे.

(ह्यानंतर गौतममुनि आश्रमामध्ये प्रवेश करतात. त्यांच्या तेजाच्या वर्णनाचे काही श्लोक वगळून पुढे कथानक...)

दृष्ट्वा सुरपतिस्त्रस्तो विवर्णवदनोऽभवत्।
अथ दृष्ट्वा सहस्राक्षं मुनिवेषधरं मुनि:।। १.४८.२६
त्याला पाहून देवांचा राजा विवर्ण झाला. मुनिवेशातील सहस्राक्ष इंद्राला पाहून ...

दुर्वृत्तं वृत्तसम्पन्नो रोषाद् वचनमब्रवीत्।
मम रूपं समास्थाय कृतवानसि दुर्मते।।१.४८.२७
श्रेष्ठ वर्तन असलेला मुनि त्या वाईट वर्तनाच्या इंद्राला रागाने असे बोलता झाला. हे दुर्मते, माझे रूप घेऊन तू असे कृत्य करता झालास...

अकर्तव्यमिदं तस्माद्विफलस्त्वं भविष्यसि।
गौतमेनैवमुक्तस्य सरोषेण महात्मना।।१.४८.२८
जे त्वां करायला नको होतेस आणि म्हणून तुझे फल नष्ट होईल. क्रुद्ध महात्म्या गौतमाने असे बोलले गेलेल्या...

पेततुर्वृषणै भूमौ सहस्राक्षस्य तत्क्षणात्।
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।१.४८.२९
सहस्राक्षाची वृषणे त्या क्षणीच भूमीवर पडली. त्याला तसा शाप देऊन अहल्येलाहि (मुनीने) शाप दिला...

इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि।
वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।१.४८.३०
अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि।
यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।१.४८.३१
आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।

येथे एक सहस्र वर्षे वायु भक्षण करून, निराहार, पापाग्नीमध्ये जळत आणि भस्मसात् झालेली, सर्व प्राण्यांना अदृश्य झालेली अशी तू ह्या आश्रमात राहशील, जोपर्यंत प्रतिकार करायला दुर्धर असा दशरथात्मज राम ह्या घोर अरण्यामध्ये येत नाही. तो आल्यानंतर तू पवित्र होशील.

मुळामध्ये इतकीच कथा आहे. तिच्यामध्ये आणि धागाकर्त्याच्या रंजक वर्णनामध्ये दोन प्रमुख भेद आहेत. पहिले म्हणजे इंद्राने फसवून अहल्येचा भोग घेतला असे दिसत नाही. तिने इंद्राला ओळखले होते पण मोहामुळे ती त्याला वश झाली आणि अपराधी भावनेतून तू येथून लवकर निघून जा आणि स्वत:ला आणि मला वाचव असेहि तिने इंद्राला सांगितले. तदनंतर गौतमाने जिकडेतिकडे जाऊन पत्नीला वाचवायचा आणि तिच्यासाठी सहानुभूति निर्माण करण्याचा काही प्रयत्न केला असेहि दिसत नाही. त्याने तेथल्या तेथेच तिला शापहि देऊन टाकला.

थोडक्यात काय, रंजक कथा अवश्य लिहा पण वाल्मिकीला हेच सुचवायचे होते असे म्हणू नका. वाल्मिकीला काय म्हणायचे होते ते स्पष्ट आहे.

ह्यानंतर माझी शंका. गौतमाने अहल्येला शाप दिला हे वर पाहिलेच पण ती शिळा झाल्याची कथा कशी आणि केव्हा निर्माण झाली? ती तर मूळ रामायणात दिसत नाही. तरीहि तशी समजूत आहे हे निश्चित. 'अहल्या शिळा राघवे मुक्त केली। पदी लागता दिव्य होऊनि गेली। जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥’ असे रामदास मनाच्या श्लोकांत म्हणतात. ‘मुक्त जाहले श्वास चुम्बिती पावन ही पाउले, आज मी शाप मुक्त झाले’ असे गदिमा गीतरामायणात म्हणतात. ही शिळाकथा कशी निर्माण झाली?

(जाताजाता - ह्यावरून आठवले. गदिमा-सुधीर फडके निर्मित गीतरामायणाचा येत्या १ एप्रिलला ६०वा वाढदिवस आहे. ह्याच दिवशी १९५५ साली नव्यानेच सुरू झालेल्या पुणे आकाशवाणीने ह्याचे पहिले गीत ’स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती’ हे गीत प्रसारित केले आणि गीतरामायण ह्या काव्याचे पदार्पण झाले.)

अंतराआनंद Mon, 30/03/2015 - 12:12

In reply to by अरविंद कोल्हटकर

गदीमांच्या गीतरामायणात रावणाचा वध केल्यानंतर रामाने सीतेला उद्देशून म्हटलेले गाणे "लीनते चारुते सीते" यात "माझा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठीच मी हे सगळे केले" अश्या अर्थाचे कडवे आहे, ते आठवले.
हें तुझ्यामुळें गे झालें
तुजसाठी नाहीं केलें
मी कलंक माझे धुतले
गतलौकिक गे लाभे रघुवंशातें

विवेक पटाईत Mon, 30/03/2015 - 17:07

In reply to by अरविंद कोल्हटकर

१. वाल्मिकीने रामायण सांगितली होती त्याला ७५०० वर्ष होईन गेले आहेत. या कळत त्यात अनेक कवींनी आपापल्या कालखंडानुसार विभिन्न मते निश्चित जोडली असेल. आपण पुन्हा वाचाल तर ४८ व्या सर्गातील श्लोकांत आणि ४९ व्या सर्गातील ११-२२ श्लोकांत, भरपूर विभिन्नता दिसेल. अर्थात वेग वेगळ्या व्यक्तींनी हे श्लोक लिहिले आहे, सहज कळते. संपूर्ण रामायणात प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागले आहे. अहल्या निर्दोष होती, पण राजकीय आणि सामाजिक नियमांमुळे तिला (किंवा तिच्या सारख्या स्त्रियांना वाळीत टाकल्या जात असे) वाळीत टाकले. केवळ रामाने आतिथ्य ग्रहण करतातच. तिला सामाजिक प्रतिष्ठा पुन्हा मिळाली. (अर्थात राजकीय स्वीकृती मिळाली). गौतमाने तिच्या त्याग केला हे ही ठीक नाही. महर्षि विश्वामित्र रामाला गौतमाचा आश्रमातच घेऊन गेले होते. अर्थात गौतम ऋषी तिथेच होते. फक्त सामाजिक स्वीकृतीची वाट पाहत होते.
तसाधु साध्विति देवाः तां अहल्यां समपूजयन् ।
तपोबलविशुद्धाङ्‍गीं गौतमस्य वशानुगाम् ॥ २० ॥
महर्षि गौतमांच्या अधीन राहणारी अहल्या आपल्या तपःशक्तिने विशुद्ध स्वरूपास प्राप्त झाली हे पाहून सर्व देवता तिला साधुवाद देऊन तिची भारी प्रशंसा करू लागल्या.

बॅटमॅन Mon, 30/03/2015 - 17:22

In reply to by विवेक पटाईत

वाल्मिकीने रामायण सांगितली होती त्याला ७५०० वर्ष होईन गेले आहेत.

हे कुठे कळालं हो तुम्हांला? वर्तकप्रणीत कालानुक्रमाच्या २००० वर्षे उशिराच आहे की ही तारीख. इसपू ५५६१ हे वर्ष वर्तकांच्या मते महाभारत युद्धाचं वर्ष आहे. ;)

अरविंद कोल्हटकर Mon, 30/03/2015 - 18:24

In reply to by विवेक पटाईत

विवेकजी,

वाल्मीकीने रामायण लिहिले त्याला ७५०० वर्षे होऊन गेली अशा प्रकारची सश्रद्ध विधाने करून तुम्ही फार खोल पाण्यात शिरत आहात असे वाटते. प्रत्यक्ष रामायणकथा घडली काय, केव्हा आणि कशी ह्याबद्दल वाल्मिकीशिवाय कोठलाच पुरावा नाही. वाल्मीकीहि कोण होता, एक की अनेक असे अनेक वादग्रस्त मुद्दे येथे उपस्थित होऊ शकतात आणि 'श्रद्धा' हेच उत्तर त्याला समर्पक नसते. प्रत्यक्ष जे शब्द आपल्यापुढे आहेत त्यावरून असे वाटते की लेखनातील ही भाषा पाणिनि-उत्तर कालातील, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पुढची मागची असावी. म्हणजेच आज दिसणारे रामायण हे इ.स.च्या पहिल्या-दुसर्‍या शतकातील आहे, मग प्रत्यक्ष कथा कशीहि आणि केव्हाहि झाली असो अथवा नसो.

अहल्येने मोहाने इंद्राला आपल्याजवळ येऊ दिले आणि त्यामुळे क्रुद्ध गौतमाने तत्क्षणीच तिला आणि इंद्राला शाप दिले हे मी वर दाखविलेल्या शब्दशः भाषान्तरावरून स्पष्टच आहे. ह्यावर झिलई चढवून त्यात तुम्हाला आजच्या काळातील सामाजिक न्याय दाखविणारे मिथक करायचे असेल तर ते अवश्य करावे, मात्र ते मुळाबरहुकूम असल्याचा दावा करू नये कारण ते तसे नाही. अहल्येची देवादिकांनी पूजा केली कारण ती महासती होती वगैरे सर्व ठीक आहे पण ते सर्व ex post facto आणि रामाने तिचा उद्धार केल्यानंतरचे आहे असे वरच्या शब्दशः भाषान्तरावरून स्पष्ट आहे. मुळात तिचे स्खलन झाले होते पण रामाकडून उद्धार झाल्यामुळे ती महासती झाली ह्यामागे रामाची थोरवी सांगण्याच्या प्रयत्नच आहे, अहल्या ही तेथे incidental beneficiary आहे. तसेहि गौतमासारखा तपस्व्याची पत्नी ही सर्वकाळची कुलटा होती असे दाखविणे हे रामायणाच्या आणि त्यात ज्या उच्चवर्णीय संस्कृतीचे गुणवर्णन आहे त्याच्याशी मिळते नाही. ह्यामुळेच 'अहल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा| पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम्' असा प्रसिद्ध श्लोक लिहिला गेला आहे.

सारांश असा की हा विरोधाभास वाल्मीकीच्या लिखाणामध्येच आहे आणि तो दूर करण्याचे शिवधनुष्य तुम्ही उचलायचे काही कारण मला दिसत नाही.

रेड बुल Mon, 30/03/2015 - 17:35

सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल.

मग ? आपण शुध्दीकरण करत आहात असा दावा आहे का ? की याआधी लोकांना सारासार विवेकबुध्दी अस्तित्वात न्हवती व ते आपण लिहलेला अर्थ काढण्यास सक्षम न्हवते (इंटर्नेट न्हवते हे मान्य) ? तुम्हीसुध्दा हा लेख लिहुन काही भाग प्रक्षिप्तच करत आहात. त्याचे शुध्दीकरण कोण करणार :(

अरविंद कोल्हटकर Mon, 30/03/2015 - 19:01

ह्याच जागी तुलसीदासांनी काय लिहिले आहे ते पहा:

अहल्या उद्धार
* आश्रम एक दीख मग माहीं। खग मृग जीव जंतु तहँ नाहीं॥
पूछा मुनिहि सिला प्रभु देखी। सकल कथा मुनि कहा बिसेषी॥6॥
भावार्थ:-मार्ग में एक आश्रम दिखाई पड़ा। वहाँ पशु-पक्षी, को भी जीव-जन्तु नहीं था। पत्थर की एक शिला को देखकर प्रभु ने पूछा, तब मुनि ने विस्तारपूर्वक सब कथा कही॥6॥
दोहा :
* गौतम नारि श्राप बस उपल देह धरि धीर।
चरन कमल रज चाहति कृपा करहु रघुबीर॥210॥
भावार्थ:-गौतम मुनि की स्त्री अहल्या शापवश पत्थर की देह धारण किए बड़े धीरज से आपके चरणकमलों की धूलि चाहती है। हे रघुवीर! इस पर कृपा कीजिए॥210॥
छन्द :
* परसत पद पावन सोकनसावन प्रगट भई तपपुंज सही।
देखत रघुनायक जन सुखदायक सनमुख होइ कर जोरि रही॥
अति प्रेम अधीरा पुलक शरीरा मुख नहिं आवइ बचन कही।
अतिसय बड़भागी चरनन्हि लागी जुगल नयन जलधार बही॥1॥
भावार्थ:-श्री रामजी के पवित्र और शोक को नाश करने वाले चरणों का स्पर्श पाते ही सचमुच वह तपोमूर्ति अहल्या प्रकट हो गई। भक्तों को सुख देने वाले श्री रघुनाथजी को देखकर वह हाथ जोड़कर सामने खड़ी रह गई। अत्यन्त प्रेम के कारण वह अधीर हो गई। उसका शरीर पुलकित हो उठा, मुख से वचन कहने में नहीं आते थे। वह अत्यन्त बड़भागिनी अहल्या प्रभु के चरणों से लिपट गई और उसके दोनों नेत्रों से जल (प्रेम और आनंद के आँसुओं) की धारा बहने लगी॥1॥

गौतमाच्या शापाने अहल्या शिळा होऊन पडली होती आणि रामाने चरणस्पर्शाने तिला पावन केले असे येथे लिहिले आहे. तिला तपोमूर्ति इत्यादि का म्हटले आहे त्याविषयीचे माझे मत मी वर दाखविले आहेच.

माहितगारमराठी Mon, 30/03/2015 - 19:36

@ अरविंद कोल्हटकर

मला जिथपर्यंत आठवते उपलब्ध वाल्मिकी रामायणानुसार अहल्या उद्धाराचा प्रसंग श्रीरामांच्या विवाहाच्या (स्वयंवराच्या) आधीच घडतो, आणि तेथेही विश्वामित्र ऋषिच त्यांना त्या आश्रमात घेऊन जातात हे बरोबर आहे का ? विवाह (स्वयंवरा)पुर्वी एका तरुण राजकुमारासमोर असा प्रसंग उभा करण्या मागे काय प्रयोजन अथवा औचित्य असेल ? का केवळ इश्वरी गुण चिटकवणे एवढाच संबंधीत कविचा येथे उद्देश असेल ? असा विचीत्र प्रश्न मला वाल्मिकी रामायण वाचताना पडला होता असे आठवते.

(आपले माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.)

अरविंद कोल्हटकर Mon, 30/03/2015 - 21:02

In reply to by माहितगारमराठी

वर दाखविल्याप्रमाणे गौतमाने अहल्येला शाप देतांना उ:शापहि दिला होता. तो असा:

इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि।
वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।१.४८.३०
अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि।
यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।१.४८.३१
आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।

येथे एक सहस्र वर्षे वायु भक्षण करून, निराहार, पापाग्नीमध्ये जळत आणि भस्मसात् झालेली, सर्व प्राण्यांना अदृश्य झालेली अशी तू ह्या आश्रमात राहशील, जोपर्यंत प्रतिकार करायला दुर्धर असा दशरथात्मज राम ह्या घोर अरण्यामध्ये येत नाही. तो आल्यानंतर तू पवित्र होशील.

एक सहस्र वर्षांपूर्वी गौतम मुनींनी जी वाणी उच्चारली होती त्याप्रमाणेच विश्वामित्रांनी केले आणि रामाला अह्ल्योद्धारासाठी तिच्यासमोर आणले.

अरविंद कोल्हटकर Mon, 30/03/2015 - 22:13

मी वर उपस्थित केलेली शंका - शिळेची कथा मुळात नसतांना नंतरच्या काळात तिने जनमानसाची पकड कशी आणि का घेतली असावी - हा प्रश्न दुसर्‍या एका चर्चागटात मी विद्वान मित्रांना विचारला. त्यांनी गोविन्दराज आणि नागेशभट्ट ह्या दोन संस्कृत टीकाकारांचे ह्याविषयीचे मत माझ्यासमोर ठेवले आहे.

गोविन्दराजाची टीका -
कथं निवासमात्रस्य शापत्वमिति तद्विवृणोति -- वायुभक्षेति । निराहारा अन्नपानादिरहिता । तप्यन्ती तप्यमाना । भस्मशायिनी भस्मशयना । अत्र बुद्धिपूर्वकव्यभिचारस्य विधीयमानं प्रायश्चितं शापापदेशेनोच्यते । एवं व्यक्ततया वाल्मीकिवचने स्थिते शैलीभवेति शापो रामपादस्पर्शात् शिलात्वमुक्तिरिति पुराणकथा कल्पान्तरवृत्तमनुसृत्येतिबोध्यम् ।। 1.48.31 ।।
सारांश - वाल्मिकीने असे म्हटले असता 'शिळा हो आणि रामाच्या पवलाच्या स्पर्शाने तुला मुक्ति मिळेल' ही पुराणकथा नंतरच्या काळात निर्माण झाली आहे असे मानावे

नागेशभट्टाची टीका -
तदुक्तं पाद्मे "शापदग्धा पुरा भर्त्रा राम शक्रापराधतः । अहल्याख्या शिला जज्ञे शतलिङ्गः कृतः स्वराट् ।।" इति। शिला तत्प्रतिमाकारा।
सारांश - शिळेची कथा पद्मपुराणामधून निर्माण झाली आहे.

अन्य मित्राने हेहि लक्षात आणून दिले आहे की ह्या अहल्याशिळेसारखीच अन्यहि काही प्रसिद्ध कथानके कोणीतरी नंतर रामायणामध्ये घुसविली आहेत. शबरीने उष्टी बोरे रामाला दिली आणि त्याने ती आनंदाने खाल्ली ही कथा, तसेच रामाचा दूत हनुमान रावणासमोर आपल्या शेपटाचे उच्चासन करून त्यावर बसला ही कथा, ह्या दोन्हीहि नंतर रामायणात घुसलेल्या आहेत.

विवेक पटाईतांसारखे कोणी creative लेखक अशा गोष्टींचे उत्पादक असणार असा तर्क!

अवान्तर - ह्या इन्द्र-अहल्या प्रकरणावरून दोन श्लोक आठवले. पाणिनीने श्वन्, युवन्, मघवन् ( कुत्रा, तरुण आणि इन्द्र) ह्या शब्दांचे विभक्तिप्रत्यय एकासारखेच असतात असे म्हटले. त्यावरूनः

काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुक्ता निबध्नन्ति किमत्र चित्रम्?
विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह||
शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी|
विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह||

मुग्ध बालिका काच, रत्न आणि सोने एकाच सूत्रात गुंफतात ह्यात आश्चर्य काय? मोठया विचारी पाणिनीने एकाच सूत्रात श्वन्, युयुव, मघवन् ( कुत्रा, तरुण आणि इन्द्र), ह्यांना घातले आहे.
तरुण श्वानाप्रमाणे इन्द्राने बलात्काराने गौतमाच्या धर्मपत्नीवर अत्याचार केला. (म्हणून) मोठया विचारी पाणिनीने एकाच सूत्रात श्वन्, युयुव, मघवन् ( कुत्रा, तरुण आणि इन्द्र), ह्यांना घातले आहे.

माहितगारमराठी Tue, 31/03/2015 - 11:20

@ अरविंद कोल्हटकर

वाल्मिकी रामायणाच्या सुन्दरकाण्डातील हनुमान रावणाच्या घरी जातो आणि तद नंतर रावणाची अशोकवनाला भेट देतो असा प्रसंगाचे वाल्मिकी रामायणातील (अनुवादीत) वर्णन वाचताना प्रसंग नाट्यलेखनात अभिप्रेत असलेली जाणीवपूर्वकता आहे असे वाटते. (मी या दुव्यावर अनुवाद वाचला) आपण वर एका प्रतिसादात रामायणात काही भाग पाणिनीकालीन व्याकरण दर्शवतो असे म्हटले आहे. सुन्दरकाण्डातील हनुमान रावणाच्या घरी जातो आणि तद नंतर रावणाची अशोकवनाला भेट हाही भाग प्रक्षिप्त असण्याची शक्यता असू शकेल का ?

गवि Tue, 31/03/2015 - 12:34

इथे सर्वकाही चालू काळात आजुबाजूला याच जगात घडलेलं असूनही आणि असंख्य साक्षीदार, पुरावे हातात असूनही काळवीटहत्या, फुटपाथनिद्रिस्तांचा बळी घेणारं ड्रंक ड्रायव्हिंग, मुलीला बेडरुममधे ठार करणे अशा प्रकारच्या केसेसचे निकाल अन त्यातलं सत्य वर्षानुवर्षे बाहेर येत नाही अन न्याय होत नाही. महिन्या दोन महिन्याच्या अंतराच्या तारखा, कोणत्या न्यायालयात खटला वर्ग करावा या वादात सहा महिने. सर्व आरोपांचा एकत्रित खटला चालावा की प्रत्येक आरोपाचा वेगवेगळा या वादात एक वर्ष. सर्व आरोपींवर एकत्र चालवावा की सेपरेटली यात आठ महिने. अमुक खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी तमुकचा लागणे योग्य की अयोग्य यावर तीन तारखा. तमुक कलम लावणे योग्य की अयोग्य या वादात दोन वर्षं.

वीसवेळा खटला मोडीत काढून नव्याने.. साक्षीदार पलटणे, गायब होणे, अंग काढून निघून जाणे, वृद्धत्वाने मरणे, खुद्द आरोपी वृद्ध होणे वगैरे कारणांनी आणखी दहाबारा स्थगित्या.. त्यानंतर अमुक एक तपासणी केली जाणे आवश्यक होते यावर एकमतासाठी तीन महिने.. असे करत करत काही खरे ठरत नाही.

पण हजारो वर्षांपूर्वीच्या कदाचित घडलेल्या, किंवा कदाचित कादंबरी असलेल्या रामायणात, महाभारतात कोणाची चूक होती, बायकोला का सोडलं, लफडं की जबरदस्ती, कपट, अमुक प्रक्षिप्त नंतर घुसडलेलं अन तमुक ओरिजिनल तस्मात अमुक दोषी आणि तमुक निर्दोष वगैरे हे मात्र ताबडतोब सिद्ध करु शकतात.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 13:00

In reply to by गवि

पण हजारो वर्षांपूर्वीच्या कदाचित घडलेल्या, किंवा कदाचित कादंबरी असलेल्या रामायणात, महाभारतात कोणाची चूक होती, बायकोला का सोडलं, लफडं की जबरदस्ती, कपट, अमुक प्रक्षिप्त नंतर घुसडलेलं अन तमुक ओरिजिनल तस्मात अमुक दोषी आणि तमुक निर्दोष वगैरे हे मात्र ताबडतोब सिद्ध करु शकतात.

वेल्ले आहेत हो सगळे.

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 13:21

In reply to by बॅटमॅन

जुना काळ चांगला म्हटल्याबद्दल समस्त ऐसीकरांची जाहीर माफी मागतो. तुमची अजून एकदा मागतो. आता त्या अपराधाबद्दल क्षमा कराल काय?

तिरशिंगराव Tue, 31/03/2015 - 14:52

कुठल्याही धाग्यावर अखंडपणे, न कंटाळता जो वाद घालू शकेल त्याला 'आप' पक्षाने सन्माननीय सदस्य बहाल करावे,
जेणेकरुन 'आप' हे 'कॉन्स्टंट बॉयलिंग मिक्स्चर' नांवाप्रमाणेच कायम उकळत राहील.

मिहिर Tue, 31/03/2015 - 16:10

In reply to by तिरशिंगराव

हे फारच अवांतर आहे, तरीही राहवले नाही.
फार दिवसांनी 'कॉन्स्टंट बॉयलिंग मिक्स्चर' हे नाव वाचले. फार भारी वाटले. जरा शोधाशोध केल्यावर 'राओल्ट्स लॉ', 'डाल्टन्स लॉ' हेही आठवले. केमिस्ट्री एकुणात फार आवडत नसले, तरी फिजिकल केमिस्ट्रीतली सोल्युशन्स, केमिकल कायनेटिक्स ही प्रकरणे फार आवडली होती. पण कॉन्स्टंट बॉयलिंग मिक्स्चर हे नावाप्रमाणे सतत उकळत नसते ना? ते तर कितीही उकळून घटक पदार्थ वेगळे करता येत नाहीत म्हणून नाव आहे ना? चूभूद्याघ्या.

मिहिर Tue, 31/03/2015 - 16:50

In reply to by आदूबाळ

त्या व्याख्येचा संदर्भ प्रत्यक्ष उकळण्याशी नसून उकळून घटक पदार्थ वेगळे करण्याशी आहे. उदाहरणार्थ, पाणी आणि इथेनॉलचे (इथिल अल्कोहोल) मिश्रण उकळले, तर सामान्यपणे तयार होणाऱ्या वाफेत इथेनॉलचे प्रमाण जास्त असेल आणि त्यामुळे तळाशी उरलेल्या द्रवात पाण्याचे प्रमाण जास्त असेल. जितके जास्त उकळू, तितके शुद्ध पाणी मिळेल. पण जर पाणी आणि इथेनॉल विशिष्ट प्रमाणात मिसळले (पाणी ५ टक्के आणि इथेनॉल ९५ टक्के), तर बनणाऱ्या वाफेतही दोन्ही पदार्थांचे प्रमाण सारखेच असेल. त्यामुळे कितीही उकळले, तरीही तळाशी राहणाऱ्या द्रवात पाणी आणि इथेनॉलचे प्रमाण तितकेच राहील. ते वेगळे करण्यासाठी ते सतत उकळत राहावे लागेल (पक्षी: कधीच वेगळे होऊ शकणार नाही), अशा अर्थाने ते नाव असावे. पाणी आणि इथेनॉलप्रमाणेच इतर काही जोड्या विशिष्ट प्रमाणात मिसळल्या की त्यांचे कॉन्स्टंट बॉयलिंग मिक्स्चर बनते. त्यालाच अझिओट्रोपही म्हणतात.

विवेक पटाईत Fri, 03/04/2015 - 20:23

सर्व प्रतिक्रिया वाचल्या, सर्वाना धन्यवाद. अह्ल्येची कथा असूनही, आश्चर्य एवढेच एका ही पुरोगामी स्त्रीची प्रतिक्रिया नाही. बहुतेक त्यांच्या पैकी कुणी ही रामायण वाचले नसावे किंवा श्रीरामा बाबत पराकोटीची अनास्था असावी असे वाटते.

रेड बुल Fri, 03/04/2015 - 20:31

In reply to by विवेक पटाईत

वाचुन काय होते ? सगळ्या शोऑफ करायच्या गोष्टीच ना ? रामायण वाचुन ना प्रत्यक्ष आयुष्यात कोणी राम घडला ना महाभारत वाचुन अर्जुन... शाळेत शिकलेलं सगळं इंप्लिमेंट होत नाही हे अवांतर डोक्यात ठेउन काय साधणार ?

विवेक पटाईत Sat, 04/04/2015 - 20:00

In reply to by रेड बुल

'वाचाल तर वाचाल'. आपण जे काही वाचतो त्याचा आपल्या जीवनावर न कळत परिणाम होतो. जुन्या दिल्लीत एका वाड्यात (चाळीत) भाड्याने राहत असताना (अर्थात बाल पण तिथेच गेले). त्या वेळी लोक रात्री गच्चीवर झोपायचे. (१९७०-८० चा काळ) संध्याकाळी एक गुजराती आजी -वाड्यातल्या सर्व बालगोपालाना राम, कृष्ण, अनेक जुन्या पुराणातल्या नैतिक गोष्टी सांगायची. परिणाम- मोठे झाल्यावर ही कुणाच्या ही तोंडात शिवी नव्हती. 'मी स्वत: उभ्या आयुष्यात 'साले' ही शिवी सुद्धा दिली नसेल. वाड्यातल्या १०-१५ मुलांपैकी कुणी ही वाया गेला नाही. आता आपण काय वाचतो या वर सर्व भविष्य असते. .... गोष्टी सारखी कथा वाचायला आवडत असेल, तर त्याचा परिणाम वेगळा होईल.

नितिन थत्ते Sat, 04/04/2015 - 23:26

In reply to by विवेक पटाईत

-१.

मी एकही शिवी (इनक्लूडिंग साला/च्यायला) न देता आणि भरपूर शिव्यांसह असा दोन्ही प्रकारे सहज बोलू शकतो. त्याचा माझ्यावर विशिष्ट संस्कार होण्याचा आणि नैतिक गोष्टी ऐकण्याचा काही संबंध नाही.

धनंजय Sun, 05/04/2015 - 19:37

In reply to by नितिन थत्ते

काहीसे असेच.

(शिव्यांमधील शब्दचापल्य सध्या थोडे कमी आहे, कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये शिव्या मिसळून बोलण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे "सहज बोलू शकतो"बाबत थोडा फरक आहे, तितकाच.)

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 12:26

In reply to by नितिन थत्ते

मी एकही शिवी (इनक्लूडिंग साला/च्यायला) न देता आणि भरपूर शिव्यांसह असा दोन्ही प्रकारे सहज बोलू शकतो.

आपण जेव्हा एकही शिवी न देता बोलता तेव्हा आपल्या मनात त्याच वचनांचे जे एक पॅरलल सबकाँशस व्हर्जन चाललेले असते ते देखिल बिना-शिव्यांचे असते का हे एकदा चेक करून पहा.
साधारणतः शिव्या न देणार्‍या लोकांना राग आलेला असतानाही समोरच्याला एक विशिष्ट प्रमाणात आदर देत राहणे जमते असे निरीक्षण आहे.

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 12:37

In reply to by अजो१२३

आपण जेव्हा एकही शिवी न देता बोलता तेव्हा आपल्या मनात त्याच वचनांचे जे एक पॅरलल सबकाँशस व्हर्जन चाललेले असते ते देखिल बिना-शिव्यांचे असते का हे एकदा चेक करून पहा.

ठ्ठो =))

आमच्या एका मित्राची आठवण झाली. (गरीब बिच्चार्‍या इ.इ.) मुली सोबत असताना तो फक्त 'अबे उल्लू' इतकेच म्हणत असे. पण भावार्थ अन मथितार्थ अन बाकीचे कुठले असतील ते सगळे अर्थ सर्वांना यथास्थित विदित होते.

साधारणतः शिव्या न देणार्‍या लोकांना राग आलेला असतानाही समोरच्याला एक विशिष्ट प्रमाणात आदर देत राहणे जमते असे निरीक्षण आहे.

'तुमच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता वाटते' या शिव्याहीन वाक्यात कुणीतरी आदर शोधून दाखवावा असे आवाहन आहे.

adam Mon, 06/04/2015 - 13:24

In reply to by बॅटमॅन

इथल्या एरव्ही नॉर्मल वाटाव्या अशा सदस्यांनी आपली "मानसिकता उघडी पाडणारे" प्रतिसाद दिलेले पाहणं रोचक वाटलं
.
.
ह्या शिव्याहीन वाक्यात कुणीतरी आदर शोधून दाखवावा असे आमचेही आवाहन आहे

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 12:19

In reply to by विवेक पटाईत

आयला, आम्ही तर पूर्णच वाया गेलोत म्हणजे. अख्ख्या गॉथममध्ये एक जोकर सोडला तर आमच्याइतक्या शिव्या कुणीच देत नाही. मग आमची काय वाट?

बाकी, भगवान् श्रीकृष्णांच्या "क्लैब्यं मा स्म गमः पार्थ" या उक्तीबद्दल काय मत आहे? ;)

शुचि. Fri, 03/04/2015 - 20:42

In reply to by विवेक पटाईत

श्रीरामा बाबत पराकोटीची अनास्था असावी असे वाटते.

श्रीरामाबद्दल वाईट काही वाचवत नाही त्यामुळे प्रतिक्रिया नीट वाचल्याच नाहीत. :( न जाणो :(
लेख मात्र वरवर वाचला आहे. सावकाश वाचेन.

अस्वल Fri, 03/04/2015 - 23:11

In reply to by विवेक पटाईत

पुरोगामी स्त्रियांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेपेक्षा स्त्रियांच्या पुरोगामी प्रतिक्रियांकडे पहावे, कसें?
क्वेष्चनः अहल्या ही त्या काळची पुरोगामी स्त्री होती का?

विवेक पटाईत Sat, 04/04/2015 - 20:02

In reply to by अस्वल

अहल्या निश्चित पुरोगामी होती. तिने न्यायासाठी संघर्ष केला. शेवटी राजाला न्याय देणे भाग पडले.
बाकी आज पुरोगामी शब्दाच्या अर्थाचा अनर्थ झालेला आहे, त्या मुळे पुरोगामी कोण प्रतिगामी कोण हे सांगणे अवघड आहे.

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 12:28

In reply to by विवेक पटाईत

अह्ल्येची कथा असूनही, आश्चर्य एवढेच एका ही पुरोगामी स्त्रीची प्रतिक्रिया नाही.

बट धिस मेक्स मोर सेन्स.

बहुतेक त्यांच्या पैकी कुणी ही रामायण वाचले नसावे किंवा श्रीरामा बाबत पराकोटीची अनास्था असावी असे वाटते.

असं म्हणणं चूक असावं.