Skip to main content

देवतांची ऐसी (तैसी)

भगवान विष्णूंचे पाय चुरुन चुरुन, देवी लक्ष्मीला अतिकंटाळा आलेला होता. हे काय मेलं जगाचा भार हे वहाणार अन मग पायात पेटके आले की पाय चुरुन मात्र मी द्यायचे, असे काहीसे टिपिकल, वैतागवाडी विचार तिच्या मनात फिरुन-फिरुन येऊ लागले होते. नक्की काय करावं हे सुचलं नाही तरी तिला पार्वतीची तिच्या जीवलग मैत्रिणीची आठवण आल्याशिवाय राहीली नाही. आता नारायण निद्राधीन झालेले असल्याने, काय करावं या कंटाळ्याला या विचारात तिने पार्वतीस फोन लावला. .. पार्वतीचं काय बरं असतय, महादेव नेहमी ध्यानात मग्न अन ही मोकळी शॉपिंग अन नट्टापट्टा करायला. अपेक्षेनुसार पार्वतीने दुसर्‍या रिंगला फोन उचलला. हाय हलो, हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर पार्वती मुद्द्यावर आली - "सो व्हास्सप रमा?" ती लाडाने लक्ष्मीस रमा म्हणे हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
.
हे विचारायचा अवकाश की लक्ष्मीचा बांध फुटला, "अगं उमा (ती लाडाने ....उमा..सूज्ञ ... असेलच.) मेलं नेहमीचच गं. यांना विश्वाच्या व्यापातून अन नारदमुनींबरोबर गफ्फा ठोकण्यातून उसंत मिळाली तर हे बायकोकडे लक्ष देतील ना! नारद नाही तर दधीची, दधीची नाहीत तर तुंबरु, गेला बाजार गरुड तर आहेच आहे... हे म्हणजे ना अगदी जगन्मित्र आहेत ....अन मी नेहमीसारखीच पाय चुरतेय, काम करतेय.बायकोच्याही काही अपेक्षा असतात हे ध्यानातच नाही. असो. तुझं काय नवीन? तू नेहमी सुटवंग अन लाइफ एन्जॉय करतेस. तू बोल"
.
पार्वतीस फक्त ढील द्यायची बाकी होती की ती धरणाचा बांध फुटल्यागत बोलू लागली. "तुला नारदमुनींकडून कळलं की नाही? पृथ्वीवर ऐसिअक्षरे नावाचं भन्नाट संस्थळ निघाले आहे. मी केव्हाच रजिस्टर केलय आताशा तिथेच पडीक असते. इतक्या विनोदी आपलं सुंदर कविता, रोचक चर्चा अन मार्मिक ललिते वाचावयास मिळतात की काय सांगू."
.
या तिच्या उत्साहामुळे लक्ष्मीही खुलली अन मनातील सल बोलून गेली, "ह्म्म्म इन्टेलेक्च्युअल संस्थळ दिसतय. यांना तर इन्टेलेक्च्युअल गप्पा मारायला उद्धवभाऊजी नाहीतर अर्जुनच लागतात. मला कधी सांगतात का मनीचे गूज? Sad माझी बाई फार बौद्धिक कुचंबणा होते. मलाही हे संस्थळ जॉइन करावेसे वाटते आहे. पण कशाप्रकारचा क्राऊड आहे गं, कसं वातावरण आहे? मला झेपेल का? तुला माहीते माझा गेल्या वेळेच्या तामसिक संस्थळाचा अनुभव Sad "
.
यावर पार्वती सांगू लागली, "चू!चू! रमा अगं ऐक तर, या संस्थळावर सात्विक अन राजस लोकांचा भरणा आहे. तामसिक आय डीज तिथे औषधालाही नाहीत. तू बिनधास्त बाळबोध कविता, सुमार ललीते व चर्वितोचर्वण चर्चांचे रवंथ टाकू शकतेस. हां मात्र व्यवस्थापन मोठे मुरब्बी आहे. अति झालं तर तिरकस लेख टाकून पळता भुई थोडी करतात. काही लोक आहेत प्रस्थापित पण ते स्वकष्टाने, वैचारीक बळजोरीने प्रस्थापित झालेले आहेत. एकंदर अतिशय खेळीमेळीचे वातावरण आहे."
.
"अगं उमा पण मराठी म्हटल्यावर कंपूबाजी,लाथाळ्या...??"
.
"नाही रमा, कंपूबाजी नाही अन लाथाळ्या तर बिलकुल नाहीत. श्रेणीपद्धतीने आळा बसलेला आहे. हा थोडं अवांतर आहे पण अगदी किंचीत."
.
लक्ष्मीने अजुन एक शंका काढली - "अगं त्रैलोक्यात संचार करणारे हे तिथे नसतीलच कशावरुन? तुझं बरं आहे महादेव इंग्रजी मिडीयमचे. पण आमचे हे तर व्हर्नाक्युलर्वाले आहेत ना. मग मी कशी बागडू शकणार?"
.
यावरही पार्वतीकडे उपाय होता. ती म्हणाली- "आय डी मागची तू प्रकटच होऊ नकोस. हाकानाका! अन तशाही आपण प्रकट झालो तर विश्वास ठेवणारे थोडीच हे मानव?"
.
यावर लक्ष्मीची कळी खुलली अन ती म्हणाली "हं हे बाकी खरय. पण तू नक्की कशी समृद्ध झालीस ते सांग ना सविस्तर."
.
यावर पार्वती म्हणाली- "मला किनई अनेक उर्दू शेर तर वाचायला मिळालेच पण युट्युबच्या मला अगदी अनभिज्ञ अशा लिंकाही मिळाल्या. जगातील घटनांच्या लिंका व मराठी मनावरील पडसादही मला पहावयास/ऐकावयास मिळाले. अन खवंचे तर मज्जाच आहे. खवं उचकपाचक करण्यात वेळ कसा जातो ते समजतच नाही. तुला माहीत आहेच हे किती कडक तपोसाधना करतात. मला तर घरच खायला उठायचं कारण गणेश सिद्धीबरोबर अन स्कंद वल्लीबरोबर वेगवेगळी बिर्‍हाडं करुन रहातात, तुला तर माहीतच आहे. पण मी मात्र या एकटेपणाचं संधीत रुपांतर केलं अन ऐसीची सदस्य झाले. विशेष म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे हे तू जाणतेसच अन शिवाय हे देखील स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहेत हे तुला माहीतच आहे. उदा- सारीपाट खेळणे, स्तोत्रे एकमेकांना सांगणे वगैरे गं. त्यामुळे मी स्वतःला आदि-स्त्री-मुक्तीवादी समजते अन गंमत म्हणजे- ऐसीवरही स्त्रीमुक्तीवादास पोषक-अतिपोषक-परमतोषक आता काय सांगू लई पोषक वातावरण आहे ज्यायोगे मी पटकन रमले. अजुनही काही गोष्टींनी मी समृद्ध झालेय पण आता हे समाधीतून जागे झालेत. ठेवते गं. तू मात्र रजिस्टर कर."
.
लक्ष्मी पटकन "हो" म्हणाली व फोन ठेवून लगेच सेल-वरुन ऐसीवर गेली.
.
तर अंदरकी बात अर्थात सांगण्याचा मुद्दा हाच की लक्ष्मी-पार्वती दोघी १००% इथे छुप्या आय डी ने वावरत आहेत (डोळा मारत)

______________________________________________________________
भाग २
______________________________________________________________
हां तर देवी लक्ष्मींची वैचारीक अन बौद्धीक काय ती कुचंबणा, घुसमट, दमन वगैरे होत होते त्यावर उतारा म्हणून लक्ष्मी ने रजिस्टर केले व नारायण झोपले रे झोपले की त्या ऐसीवर येऊन पडीक राहू लागल्या , अर्र वाचू बिचू लागल्या. त्यांना एखादा लेख,कविता, चर्चा तर टाकायची होती पण काही दिवस त्यांनी सदस्यांचे निरीक्षण करण्यात इन्व्हेस्ट केले. ऐसीवर-
(१) पूरक विदा द्यावाच लागतो,
(२) एक स्टँड घेतला अन त्यावरुन ढळलो की इमेजचा चक्काचूर होतो, पार वाटच लागते
(३) काही प्रस्थापित रथी/महारथी, नवख्यांना पंखाखाली घेण्यापूर्वी त्यांना बौद्धिक अग्नीपरीक्षा द्यावयास लावतात हे त्यांनी ताडले.
आता त्यांनी पहीला साहित्यप्रकार प्रसवायचे मनावर घेतले. कविता? नको, सहसा कविता फाट्यावर मारली जाते बरं मग गेला बाजार एखादं गोंडस ललीत - नको! लोक गालगुच्चा घेऊन मग दुर्लक्ष करतात .... मग चर्चा- हां एकदम सदाबहार साहीत्यप्रकार.
.
मग त्यांनी स्वतःच्या पौराणिक मकदुमानुसार एक एकोळी का होइना, चर्चाच काढली- नारायण श्रेष्ठ की महादेव? अन लॉग ऑट करुन सुम्मडीत, वाचकयादीत जाऊन बसल्या. हां पण दर अर्ध्या मिनिटाला स्क्रीन रिफ्रेश करतच (डोळा मारत)
.
पहील्या काही वा!वा! मस्त! प्रतिसादांनंतर गविंचा तोफेचा गोळा आला- झालं का देवादिकांचं पुराण सुरु? तेजायला शिळ्या कढीला उत नुसता, वैताग आहे.
.
यावर बॅट्या उसळून म्हणाला- धर्माचं सुरु झालं की बरी तुम्हाला शिळी कढी आठवते! खरं तर बॅट्या कोणाच्याच बाजूने नव्हता. पण विरोध करणे हा जन्मसिद्ध ह..... असो.
.
अन मग जी आस्तिक-नास्तिक जंगी कुस्ती सुरु झाली. कधी आस्तिकांचे परडे भारी (अगदी क्व-चि-त (डोळा मारत)) तर कधी नास्तिकांचे (म्हणजे काही विशेष असे नाही.)
.
मध्येच अतिशहाणा यांनी बंडाळी केली अर्थात चर्चेला रुळावर आणण्याचा क्षीण प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे पडले की जंतुद्भव रोगांवर जशी अ‍ॅलोपथी, पचन्/श्वसन व्याधींवर जशी होमिओपथी तशीच देवांची वाटणी. काही समस्या विष्णू तर काही महादेव सोडवणार मग श्रेष्ठ-कनिष्ठ कशाला?
.
इतका संतुलित प्रतिसाद दिल्याने अनेकांच्या मनात शंका आल्यावाचून राहीले नाही कदाचित अतिशहाणा हे ऋषीकेश यांचेच डु आय डी असतील!
.
ऋंषीकेशना १.२५ सेटींगमुळे बर्‍याच गदारोळाचा पत्ताच नव्हता त्यामुळे जनता अन्य काही संतुलित प्रतिसादांना मुकली.
.
मध्येच टिंकूने दोन्ही देवांना "पारलौकिक बांडगुळे" अशी दाहक संज्ञा वापरल्याने अनेक आस्तिकांच्या सात्विक संतापाचा कडेलोट होऊन ते हिंसक बनले. व चर्चा अधिकच गरम झाली.
.
आता अगदी मोक्याच्या मध्यबिंदूवर राघा अवतरले व म्हणाले हाकानाका - चला क्ष अक्षावर मारलेले राक्षस व य अक्षावर देव प्लॉट करा.हां तर (त्रिपुरासुर राक्षस, महादेव) अन (भस्मासूर, विष्णू) असे दोन बिंदू तर मिळाले, अजुन शोधा पटपट.
.
यावर अदितीने एकदम मार्मिक(४२) व भडकाऊ(२३) प्रतिसाद दिला की एकटी दुर्गा देवी घेतली तर असे सहस्त्र बिंदू मिळतील अन हा पुराणकालीन स्त्रीशक्तीचा विजयच आहे. इतःपर ती काही बोलू इच्छित नाही बस उसकी मर्झी (डोळा मारत)
.
गब्बर म्हणाले मूळ मुद्दा तो नाही तर मूळ मुद्दा आहे दैत्य मेले त्याचा लाभ कॉर्पोरेट ला झाला की सरकारला की फडतूसांना! अन इछुकांनी "सोशल मिसबिहेविअर & फ्रिकॉनॉमिक्स" (http://ecofrico.com/node/fridman) हे पुस्तक त्याकरता जरुर वाचावे.
या मोघम प्रतिवादाचा उलगडा न झाल्याने सर्वजण थंड पडले, बुचकळ्यात पड्ले वगैरे वगैरे एक्सेप्ट शुचि अन मनोबा. शुचिने तत्काळ त्या लिंकवर जाऊन महत्त्वाचे मुद्दे टिपून उपप्रतिसादात मांडले तर मनोबांनी विरोधी प्रश्नांची फैर झाडली.
.
इतक्यात कोणाच्या तरी लक्षात आले की देवी लेख टाकून पसार तरी झाल्यात किंवा गंमत तरी बघत बसल्यात अर्थात हा नानावटींचा डु आय डी असू शकतो (डोळा मारत)
.
या इतक्या ठळक अन दणकट मुद्द्यावर मात्र गर्दीची पांगापांग झाली.
.
इकडे नारायण उठतील या धाकाने लक्ष्मी देवी परत त्यांच्या सेवेत रुजु झाल्या.

____________________________________________
भाग ३
____________________________________________
लक्ष्मीदेवींनी असा धागा काढल्यामुळे, त्या धाग्यावरील मुक्ताफळे वाचून अस्वस्थ अन कोपिष्ट झालेल्या पार्वती देवी येरझारा घालू लागतात की कधी महादेव समाधीतून जागे होतायत अन कधी आपण त्यांच्या कानी हा अनावस्था प्रसंग घालतोय. महादेव इन्ट्युइशन झाल्याप्रमाणे नेमके समाधीतून तेव्हाच जागे होतात अन पार्वती देवी लगबगीने त्यांच्याकडे जाऊन म्हणतात, "बघा ना नाथ, रमा कशी कानामागून येऊन तिखट झाली." शंकर नुकतेच समाधीतून जागे झाल्याने, आकलन-ग्रहण आदि त्यांच्या सर्वच क्रिया मंदावल्या असतात व त्या नादात त्यांना वाटते की पार्वती ही "गंगा कानामागून येऊन तिखट झाली, डोक्यावर बसली" असे काहीसे परत परत उगाळते आहे. त्यामुळे ते म्हणतात, "काय हे देवी झालं का तुमचं गंगापुराण परत सुरु? हिमालयातही शांती नाही मग देवाने जावे तरी कोठे?" पार्वती काही बोलणार तोच त्यांना बोलू न देता महादेव म्हणतात - "चला फिरुन येऊ यात, तुमचा राग शांत होइल. कुठे जायचं प्रिये - भूलोक की भुव की स्वर्लोकात सैर करायची आहे आपल्याला?" बाहेर उनाडायचं म्हटल्यावर पार्वतीचा राग कुठेच्या कुठे गुल होतो व त्या म्हणतात "आह्हा! आपण भूलोकात जायचं का गडे? मला ती स्टारबक्स ची "कॉटन कँडी फ्रॅप" चाखायची आहे आज्च्या पुरतं डाएट गेलं खड्ड्यात. थोड्याच वेळात शंकर शॉर्ट अन टीशर्ट मध्ये तर देवी स्वतः टँक टॉप वर दुसरा टॉप अशा लेयर्ड आय कँडी पोशाखात अन जीन्स वगैरे घालून, हातातल्या पर्सला झोके देत निघतात. कॉफी चाखत दोघे गप्पा मारत असतानाच समोरुन ओळखा त्यांना कोण दिसतं .......... मनोबा, आपले मनोबा त्यांच्या नादात जात असतात. पार्वती देवी लगेच शंकरांना म्हणतात - अहो तो पहा ऐसीवरचा सर्वात सभ्य अन सालस (डोळा मारत) आय डी चालला आहे. आपण त्याला दर्शन देऊन कृतार्थ करायचं का?
.
दोघे मनसमोर मूळ रुपात प्रकटतात अन मनोबा तीन ताड उडतो पण मग लग्गेच प्रश्नांची फैर झाडतो -
तुम्ही कोणत्या नाटक कंपनीतले?
अलीकडे पौराणीक नाटके चालतात का?
कितीसा फायदा होतो?
खरा नाग वेशभूषेत वापरणं हे प्राणीहक्क समितीला चालतं का? वगैरे
यावर हसत पार्वती म्हणतात, "मनोबा, अरे तू आम्हाला ओळखलं नाहीस? आम्ही खरे शिव-पार्वती आहोत. मी ऐसीवरच्या तुझ्या लेखनावर अन प्रश्नांवर बेहद खूष आहे. सो चिल!! अन एक वर माग."
मन चकित होऊन साष्टांग नमस्कार वगैरे घालतो अन निस्वार्थी मनाने, तो फक्त एकच वराबद्दल कुरकुरत पण पुढील वर मागतो - "ऐसीवर माझे जीवलग दोस्त लोक आहेत. मला त्यांचा विचार आधी केला पाहीजे. तेव्हा देवी तुम्ही प्रत्येकाची सर्वात उत्कट, मनापासून निघालेली निरुपद्रवी इच्छा पूर्ण करा."
.
तर मंडळी एकच इच्छा करा, अगदी मनापासून जी निरुपद्रवी असेल (या निकषावर फडतूसांचे नामशेष अर्थातच बाद होतेय (डोळा मारत) )
अन मग बघा ती पूर्ण होते की नाही! (स्माईल) अर्थात मनोबास धन्यवाद द्यायला विसरु नका.
.
चीअर्स.

.शुचि. Tue, 23/06/2015 - 01:54

हां - http://aisiakshare.com/node/1399
असे काहीतरी लिहायचे होते पण नाही जमले. :(
___
अन जमत नसेल तर शांत बसून नामुष्की टाळावी हे रक्तातच नाही ;)

राही Tue, 23/06/2015 - 13:54

In reply to by .शुचि.

एव्हढेही काही मनाला लावून घ्यायला नको. चांगले जमले आहे. आणि विनोद नेहेमी तिखटच असावा असे कुठे आहे? आंबट, गोड, तुरट चालतंय की मधून मधून.

तिरशिंगराव Tue, 23/06/2015 - 11:52

लक्ष्मी-पार्वती दोघी १००% इथे छुप्या आय डी ने वावरत आहेत

आणि दैवी शक्तीचे वरदान असल्याने दर क्षणाला आय डी बदलत आहेत. तसेच , एकाच वेळी अनेक आय डीं वरुन संचार करण्याची कलाही त्यांना अवगत आहे.

बॅटमॅन Tue, 23/06/2015 - 18:51

In reply to by बाळ सप्रे

धर्माबद्दल आत्मीयता असलेल्यांची चेष्टा, मस्करी, टीका सगळे चालते. धर्म हीच एक मोठी कीड आहे असे मानणार्‍यांना मात्र ही सवलत मिळत नाही आणि मिळूही नये.

विवेक पटाईत Tue, 23/06/2015 - 19:25

लेख आवडला. लक्ष्मी आणि पर्वितींच्या छुप्या आयडी आहेत तश्या विष्णू आणि शंकराच्या ही असतील. ऐसी वर कोणी ही येऊ शकतो. प्रतिगामी लोकांचे ही इथे वास्तव्य आहे, कंपूबाजी ही आहे. दुसर्या शब्दात मराठी लोकांच्या सर्व सवयी इथे आहेत.

बाळ सप्रे Thu, 25/06/2015 - 11:21

In reply to by .शुचि.

इथेच टाकलात होय दुसरा आणि तिसरा भाग.. मी आपला "नवीन लेखन" मधे ढुंढाळतोय कालपासून..
दुसरा भाग खास आहे.. मान्यवरांचे प्रतिसाद एकदम परफेक्ट

नितिन थत्ते Thu, 25/06/2015 - 14:04

>>सो चिल!! अन एक वर माग.

मनोबा म्हणाले, "अहो मला वर नै कै; वधू पायजेलाय!!"

'न'वी बाजू Thu, 25/06/2015 - 16:57

In reply to by नितिन थत्ते

असे आहे होय!

आम्हाला वाटले, (छोट्या तेनालीरामाप्रमाणे) 'मला वर नि वधू दोन्ही पायजेलायत!' म्हणून दोन्ही 'घेऊन' मोकळेही झाले असतील.

(आणि वर 'वधूशिवाय वर नि वराशिवाय वधू काय कामाची?' असले 'लॉजिक'ही तोंडावर फेकले असेल.)

'न'वी बाजू Thu, 25/06/2015 - 18:01

In reply to by बॅटमॅन

या लॉजिकने, षड्रिपूंपैकी प्रथमावर विजय प्राप्त करावयाचा असेल, तर विवाहसंस्थेवर बंदी घातली पाहिजे, असे म्हणता येईल काय?

(अवांतर: कॉण्ट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, विवाहसंस्थेचे प्रयोजन 'कामा'चे फ्यासिलिटेशन हे नसून 'कामा'चे नियंत्रण हे होय.)

adam Fri, 26/06/2015 - 10:22

ह्या टैपच्या लिखाणाला आय डींची जालिय मिमिक्री म्हणता यावं; मिमिक्री जमते तेव्हा धमाल होते. भाग दोन आवडला.

विशेषतः -
.

गविंचा तोफेचा गोळा आला- झालं का देवादिकांचं पुराण सुरु? तेजायला शिळ्या कढीला उत नुसता,

.

यावर बॅट्या उसळून म्हणाला- धर्माचं सुरु झालं की बरी तुम्हाला शिळी कढी आठवते!

.
.

जंतुद्भव रोगांवर जशी अ‍ॅलोपथी, पचन्/श्वसन व्याधींवर जशी होमिओपथी तशीच देवांची वाटणी. काही समस्या विष्णू तर काही महादेव सोडवणार मग श्रेष्ठ-कनिष्ठ कशाला?

.

इतका संतुलित प्रतिसाद दिल्याने अनेकांच्या मनात शंका आल्यावाचून राहीले नाही कदाचित अतिशहाणा हे ऋषीकेश यांचेच डु आय डी असतील!

.

ऋंषीकेशना १.२५ सेटींगमुळे बर्‍याच गदारोळाचा पत्ताच नव्हता त्यामुळे जनता अन्य काही संतुलित प्रतिसादांना मुकली.

.

अन इछुकांनी "सोशल मिसबिहेविअर & फ्रिकॉनॉमिक्स" (http://ecofrico.com/node/fridman) हे पुस्तक त्याकरता जरुर वाचावे.

.
हे सर्व भारिच .

मध्येच टिंकूने दोन्ही देवांना "पारलौकिक बांडगुळे"

=))
.

यावर अदितीने एकदम मार्मिक(४२) व भडकाऊ(२३)

=))
.

:)

.शुचि. Fri, 26/06/2015 - 10:24

In reply to by adam

हाहाहा धन्यु :)
तुझा आय डी मन चा मन१ झाल्याने मी आनंदलेच होते की या ना त्या धाग्यावर आता काहीतरी अपडेटस येणार :)

चिमणराव Fri, 26/06/2015 - 11:27

वाचलं.थोडं झणझणीत व्हायला पाहिजे हे पटलं."सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार" चा रबर स्टॅंप बनवून घेतला असलात तरी जरा कमी वापरा.
किल्ल्यावर मारा करायला देवादिकांच्या खांद्यांचा दमदमा करणे मलाही नाही पटले मी नास्तिक असूनही.काही दुसरे नेपथ्य-मंच शोधायला हवा.दशावतारात एक परंपरा म्हणून चालून जाते.

.शुचि. Fri, 26/06/2015 - 18:01

In reply to by चिमणराव

किल्ल्यावर मारा करायला देवादिकांच्या खांद्यांचा दमदमा करणे मलाही नाही पटले मी नास्तिक असूनही.काही दुसरे नेपथ्य-मंच शोधायला हवा.दशावतारात एक परंपरा म्हणून चालून जाते.

ह्म्म्म! लहानपणी काही दिवाळी अंकात अशा छापाच्या प्रचंड विनोदी कथा वाचल्या आहेत. अन कदाचित लहान असेन म्हणून, जरा जास्तच आवडल्या होत्या. इतक्या की क्वचित मी अशा कथाच आधी शोधून वाचत होते.

प्रभाकर नानावटी Sat, 27/06/2015 - 10:07

एकदम झकास!

तिन्ही भाग एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

ब्रह्मदेवाची लाडकी पत्नी व विद्यादेवता सरस्वतीची शुची ही (डुप्लिकेट) आयडी असण्याची दाट शक्यता आहे.!!
कारण पार्वती आणि लक्ष्मी यांची उणे दुणे, तेही लिखित स्वरूपात, (व तेही ऐअवर,) देणे फक्त तिलाच जमू शकते. ;;)

नितिन थत्ते Sat, 27/06/2015 - 12:03

In reply to by प्रभाकर नानावटी

>>विद्यादेवता सरस्वतीची शुची ही (डुप्लिकेट) आयडी असण्याची दाट शक्यता आहे.!!

+१. अहो त्या "ग्रुपच्या नादानं आय आय टीत गेले" असं सांगतात. :)