Skip to main content

कर्वेनगरात

जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.

स्वागत म्हणून की काय कोण जाणे , स्वारगेटवर उतरताच जो बदाबदा पाउस कोसळायला लागला थांबायचं नावंच घेईना. तसाच अखंड भिजलेल्या अवस्थेत कसाबसा आधीच ठरवून ठेवलेल्या रूमवर पोहोचलो. नव्या पेठेत. आता केवळ वरवर पाहून गडबडीत ठरवलेली खोली ही मी आणि माझ्या एका मित्राने. महिना ६००० रुपये एका खोलीचे. बर त्यात विशेष असं काहीच नव्हतं. एक साधी खोली विथ संडास-बाथरूम. पंखा पण नव्हता. पाण्याची बोंबाबोंब आणि वरून मालकीण आणि तिच्या सासूची सतत कटकट आणि सूचना. इतर कुणाला यायची बंदी. इतक्या छोट्या खोलीचे ६००० कशासाठी घेतात हे न कळल्याने एकदा मालकाला विचारलं तर तो ख्यक करून हसून म्हणाला, ”पैसे खोलीचे नाहीत जागेचे आहेत. इट्स इन हार्ट ऑफ द सिटी.” आयला म्हणजे असं पण काही असतं का ? आम्ही आपली वडणगे बुद्रुकच्या पल्याडपण न गेलेली माणसं. आम्हाला हे (तेव्हा) नवीन होतं. असो.

महिन्याभरात या कटकटीला वैतागलो. नाही म्हणायला मालकाची मुलगी अगदी छान होती. पण तिने पण मला डायरेक्ट ‘अभिदादा’ बनवून टाकल्यामुळे प्रश्नच मिटला. मित्रपण “सोडून जाऊ” म्हणत कुरकुरायला लागला. मग म्हटलं आता बघूच दुसरी जागा. पुन्हा शोधाशोध सुरु केली.

यावेळी जरा चांगलीच बघू असं ठरवलं. आणखी एका मित्रालाही रूम पार्टनर होण्यासाठी तयार केलं आणि मग तिघांनीही मोहीम हातात घेतली. राहायला चांगला , आमच्या क्लासपासून तसा टप्प्यात आणि खिशाला परवडणारा एरिया कुठला याची चौकशी केल्यावर कोथरूड, कात्रज आणि कर्वेनगर असे तीन पर्याय मिळाले. क्लास एफसी रोडवर असल्यामुळे कात्रज कट करून टाकला. आता कोथरूड की कर्वेनगर असा प्रश्न असताना ब्रोकरने आम्हाला कर्वेनगरात कमिन्स कॉलेजजवळ एक फ्लॅट असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर साहेबांनी जीभ बाहेर काढून आणि हाताने “रापचिक” टाईप ची खूण करून तो एरिया म्हणजे जन्नत आहे आणि सगळी मुले तिथेच खोली घेऊन राहण्यासाठी धडपडतात हे ही आवर्जून सांगितलं.
आता ही जन्नत का असावी याचा अंदाज मला आलेला कारण कमिन्स हे एक मुलींचं अभियांत्रिकी कॉलेज आहे हे अगोदरपासून माहिती होतं. पण प्रत्यक्षात बघितल्यावर मात्र खात्रीच पटली. पूर्ण कर्वेनगरात मुलीच मुली. हातात पुस्तकं, drafter, जर्नल घेऊन इकडेतिकडे फिरणाऱ्या, एकदम स्टायलिश आणि हायफाय, फाडफाड इंग्रजी झाडणाऱ्या, आणि जवळजवळ सगळ्याच सुंदर. म्हणजे दिसेल ती मुलगी चांगलीच दिसायला. असं कसं शक्य आहे ? पण तसंच होतं. माझा एक मित्र तर लईच एक्साईट झाला. सगळ्यांनी ठरवून टाकलं आता इथेच राहायचं. शाहू कॉलनी, कर्वेनगर.पुणे-५२.

इथला मालकही तसा खडूसच. एक नंबरचा कंजूष. हा राहायचा सदाशिव पेठेत. बऱ्याचदा न सांगता धाड टाकायचा. सतत फोन करून पिडायचा. भाडे द्यायला एक दिवसही उशीर झाला तरी याचे फोन सुरु व्हायचे. पण घर मात्र छान हवेशीर होते.

बाकी कर्वेनगरातलं वातावरणच एकदम जबरदस्त होतं.सर्वत्र गर्द झाडी. शाहू कॉलनीच्या ११ छोट्या छोट्या गल्ल्या आणि त्या गल्ल्यांमध्ये घरांबरोबरच (किंवा घरातच ) भरमसाट मुलींची वसतिगृहं. जिथे तिथे सायबर कॅफे , मेस आणि कॅन्टीन्स.संध्याकाळी तर एकदम मॅजिकल. जिथेतिथे उत्साह , इकडेतिकडे (अक्षरश:)बागडणाऱ्या मुली , जागोजागी मुलामुलींनी सदा भरलेली छोटी कॅन्टीन्स. मुलींबरोबरच मुलंपण भरपूर. एका चौकात सगळी पोरं आपापल्या गाड्या लावून चहा किंवा ज्यूस पीत येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे पाहत बसलेली असायची. अर्थात आम्हीपण त्याचा हिस्सा होतोच. पण पाहण्यापलीकडं काही जमलं नाही. इतकी मुलं इथं येऊन का राहतात हा प्रश्न नेहमी पडायचा. पण एकदा माझ्या एका मित्राच्या मित्राने ‘कर्वेनगर म्हणजे स्ट्रगलर बॅचलर पोरांचा एक अड्डा आहे’ असं म्हटल्यावर याचं उत्तर मिळून गेलं. नोकरीसाठी आमचा स्ट्रगल अजूनही सुरूच होता. तिथे राहणारी इतरही बरीच पोरं नोकरीच्या शोधात असलेलीच असायची. रोज कर्वेनगरात कॅन्टीन , मेसमध्ये दिसणारे काही चेहरे कंपनीत मुलाखातीवेळीपण दिसायचे. जवळजवळ सगळेच इंजिनियर. जॉब शोधणारे. लवकर मिळावा म्हणून ढीगभर कोर्स करत बसणारे, छोट्या शहरांमधून आलेले. आमचे समदु:खी. संध्याकाळी मात्र सगळे एकदम उत्साहात चौकात गप्पा झाडत, पोरी बघत थांबायचे. भले त्या भाव का न देईनात. काही पोरांशी अशाच ओळखीही झाल्या. पुढचा ऑफ-कॅंपस कधी, कुठे आहे याची चर्चा करता करता हळूच सर्वांच्या नजरा पोरींच्या चकचकीत वॅक्सिंग केलेल्या पायांकडे कधी वळायच्या हे कळायचंही नाही.

मर्सिडीज, बीएमडब्ल्यू घेऊन कॉलेजला येणाऱ्या पोरी पाहिल्या की खूप अप्रूप वाटायचं. मुलींना सिगारेट ओढताना पहिल्यांदा मी तिथेच बघितलं. जिकडेतिकडे पोरीच पोरी. एकापेक्षा एक भारी. पण ढुंकूनही पाहायच्या नाहीत. आधीच आम्ही दिसायला महादेखणे. आमच्याकडे गावातल्या पोरी बघायच्या नाहीत तर या कसल्या बघतायत. पूर्ण दोन वर्षांत फक्त एकदाच एक मुलगी माझ्याशी बोलली. काय? तर एकदा कॅन्टीनमध्ये माझ्याशेजारी एक ज्यादा खुर्ची होती ती घेऊ का असं मला तिने विचारलं. बस.

पण आयला यांचं एक कळायचं नाही. संध्याकाळी जेव्हा आम्ही चौकात थांबायचो , त्यावेळी बऱ्याचजणी एकतर सतत फोनवर असायच्या. नाहीतर १५० सीसी बाईकवर आपल्या स्टायलिश बॉयफ्रेंडच्या मागे बसून इकडून तिकडे फिरत असायच्या अथवा त्यांच्याशी बोलत, हसत-खिदळत थांबायच्या. आता हे मुलींचं कॉलेज. यांना बॉयफ्रेंड(किंवा मित्र म्हणा) मिळतात कसे हेच कळायचं नाही. बर हे सगळे बॉय लोकपण एकदम झ्याकप्याक असायचे. आम्हा स्ट्रगलरांना उगाचच आम्ही ‘जो जीता वही सिकंदर’ मधल्या मॉडेल कॉलेजचे असल्यासारखं वाटायचं(आमीर खान पण नाही, त्याचे मित्र). आम्ही सगळे आशाळभूतपणे तो सोहळा पाहत राहायचो. बऱ्याचदा वाटायचं ट्राय मारावा एखादा पण हिम्मत कधीच नाही झाली. सगळ्या आउट ऑफ रेंज वाटायच्या.नाही, होत्याच. नंतरनंतर तर उगाचच स्वत:बद्दल न्यूनगंड यायला लागला कारण नसताना.

माझा मित्र काहीही करून एक मुलगी पटवायचीच असं खूळ घेऊन बसलेला. त्याने असा अंदाज काढला की इथे कॅन्टीनमधले काही लोक मुलामुलींना भेटवून वा नंबर देऊन-घेऊन मॅचमेकिंग करत असावेत. झालं. खात्रीसाठी त्यानं एकदा (आम्ही शेजारी उभारलेलो) एका कॅन्टीनवाल्याला डायरेक्ट “ भैया इधर लडकी कैसे पटाते है?” असं विचारलं. हे ऐकून तो माणूस “मुझे क्यूं पूछते हो? मुझे नाही मालूम” असं म्हणत जो खेकसला आणि अशा विचित्र नजरेनं त्यान पाहिलं की विचारूच नका. तेव्हापासून आम्ही तो दिसताच इकडेतिकडे पाहू लागलो.

तो एरियाच असा होता की तिथे राहता राहता आपणही आपला गबाळा अवतार सोडून थोडं छान-छान राहायला-वागायला हवं या भावनेनं मला झपाटलं. मित्राच्या देखरेखीखाली माझ्यासाठी कपड्यांची खास खरेदीही झाली. जरा त्यातल्या त्यात बऱ्या अवतारात मी वावरू लागलो. चार पोरी माझ्याकडे बघतील अशी (अवास्तव)अपेक्षा ठेवू लागलो. या सगळ्या मुलींपैकी निदान एकतरी माझी गर्लफ्रेंड असावी , निदान मैत्रीण तरी असावी असं वाटायचं. पण छे हो, असं काहीच नाही झालं. माझा रिलेशनशिप स्टेटस काही बदलला नाही. आम्हा मित्रांपैकी कुणाचाच नाही बदलला. इकडे जॉबसाठी धडपड सुरु होतीच अजूनही. एकाला मिळालेला. पण आम्ही दोघे अजूनही धडपडत होतो. मला आयटी मधलीच नोकरी हवी होती. पण मिळत नव्हती.

एव्हाना कर्वेनगरात येऊन दीड वर्षे उलटून गेलेली. बरेच चेहरे सतत चौकात पाहून पाहून ओळखीचे झालेले. काही पोरं, हॉटेल-मेस-कॅन्टीनवाले, दुकानदार, चहावाले सगळेच. कर्वेनगर अगदी सोडू नये असं वाटायचं. वेगळंच जग ते आमच्यासाठी. कमिन्सच्या आजूबाजूला फिरणारं. तिथे कंटाळाच नाही यायचा कधी. पण नंतर हळू हळू यायला लागला. का कुणास ठाऊक पण मन विटलं या सगळ्याला. आपण उगाचच काही तरी होऊ घातलेला बनतोय असं वाटायला लागलं. आधी पोरींना बघून भिरभिरणारे डोळे आता सरळरेषी झाले. पण काही झालं तरी जागा सोडण्याची इच्छा होत नव्हती. पण सोडावी लागली. सोडली.
२ वर्षे पुण्यात राहूनही नोकरी न मिळाल्यानं नाईलाजानं मी गावातल्या MIDC मध्येच जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि मे २०१२ मध्ये मी पुणे सोडलं. पुन्हा गावी निघालो. जणू कर्वेनगरानं, पुण्यानं मला “तू इथला नव्हतासंच, निघ आता.” असा इशारा दिलेला. निघालो.
मित्रांचा निरोप घेऊन , भरलेल्या बॅगा घेऊन निघताना डोळ्यात पाणी नाही आलं पण येईल का काय अशी भीती वाटण्याइतपत परिस्थिती नक्कीच होती. कर्वेनगर सोडलं. पुणेही. ते सुटलं ते कायमचंच.

माझं आयटीचं स्वप्न मात्र तसंच राहिलं. आता कर्वेनगरमधल्या या दोन वर्षांनी मला काय दिलं, काय नाही दिलं हे समजण्याच्या फंदात मला पडायचं नाही. पण एक प्रश्न आहेच. अजूनही तिथे अशीच मुलं असतील का? माझ्यासारखी. माझ्या मित्रांसारखी. पास झाल्यानंतर एखादा जावा , डॉटनेट वगैरेचा कोर्स करत नोकरी शोधणारी. हिंजवडीच्या, मगरपट्ट्याच्या खेपा मारणारी. रूमवर आल्यावर संध्याकाळचा टाईमपास म्हणून चहा मारता मारता चौकात पोरी बघत थांबलेली. यातली एखादी आपल्याला कटली तर किती भारी होईल ना!! अशी स्वत:ला कल्पनेत कुरवाळणारी. सकाळी घरातून बाहेर पडताना चांगल्या पॅकेजच्या जॉबचे आणि संध्याकाळी गर्लफ्रेंडचे अशी दोन-दोन स्वप्ने पाहणारी. आणि तरीही त्या जगाच्या खिजगणतीतही नसणारी.

असतील बहुतेक. असोत. कर्वेनगर अजूनही माझ्या मनातून जात नाही हे मात्र नक्की.

अरविंद कोल्हटकर Fri, 05/02/2016 - 01:01

लेख अतिशय छान लिहिला गेला आहे.

माझे मेव्हणे डॉ भिडे ह्या कॉलेजचे पहिले आणि अनेक वर्षांचे प्रिन्सिपॉल. त्यांची मुलगी - माझी भाची - इथलीच विद्यार्थिनी त्यामुळे ह्या भागाशी आणि वातावरणाशी मी चांगलाच परिचित आहे.

(दोघांनाहि ई-मेलवरून लेख पाठविला आहे.)

मिहिर Fri, 05/02/2016 - 04:26

छान. आवडलं!

राजेश घासकडवी Fri, 05/02/2016 - 07:52

लेख खूप आवडला. एका अस्वस्थ काळातल्या परक्या शहरात असण्याचं आणि तिथे नाकारलं जाण्याचं करुण चित्र रंगवलं आहे.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा मधली हिरॉइन हे मुंबई शहराचं प्रतीक आहे. तिच्यावर मालकी हक्क कोणाचा आणि ती कोणाच्या प्रेमात पडते यावरून झालेल्या लढ्याची त्यात कथा आहे. त्याची आठवण हा लेख वाचून झाली. या लेखात आलेल्या मुलींना एकच एक चेहेरा नाही. मात्र तो सगळा घोळका पुण्याचं प्रतीक बनलेलं आहे. शोधायला आलो, प्रयत्न केला, इतरांना मिळताना दिसल्या, पण आपल्याला नोकरी मिळाली नाही. तेच या मुलींबरोबर झालं.

पुन्हा एकदा, लेखन खूप आवडलं. लिहीत राहा.

प्रियदर्शिनी कर्वे Fri, 05/02/2016 - 08:29

लेख आवडला. महर्षि कर्व्यांचे काम आणि नाव इतक्या दीर्घ कालावधीनंतर लोकांच्या लक्षात रहाण्याचे हेही एक कारण असू शकते, हे कधी डोक्यात आले नव्हते! :D

राही Fri, 05/02/2016 - 09:45

आणि इथे 'मी'पेक्षा परिसरच मनावर ठसला. किंबहुना परिसराची भव्यता आणि 'मी'चे सपाटखुजेपण यांचे जक्सटॅपोज़िशन खूप परिणाम साधून जाते.

राजेश कुलकर्णी Fri, 05/02/2016 - 10:17

लेख आवडला. तुम्ही पुण्यातून परत गेलात हे नाही आवडले.

या महाविद्यालयात अनेक परराज्यीय मुली असतात. तेथील शिक्षिकांकडून मधूनमधून त्यांच्याबद्दलचे अनुभव कळत असतात. एकीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी या बाईंकडून पैसे मागितले. किती? तर फक्त पंचवीस हजार. बाईंना आश्चर्य वाटले. एवढे पैसे द्यावेत की नाही याबद्दल त्या विचार करत असतानाच या मुलीने थेट तिच्या आईला फोन केला आणि तो बाईंकडे दिला. आई म्हणाली, सिर्फ पच्चिसही तो मॉंग रही है ना, दे दीजिये, और मुझे आप का अकाउंट नंबर बताइये, मैं आज ही भिजवा दूंगी. बाई आश्चर्यचकीत.

दुस-या एका शिक्षिकेकडून कळलेली गोष्ट. अतिडाएटिंगच्या नादात किंवा विविध 'काळज्या'मुळे काहीजणी बेशुद्ध पडतात. डॉक्टरला बोलवावे लागते. पण अनेकदा यांचे कपडे एवढे तोकडे असतात की आम्हाला काही सलवारी तयार ठेवाव्या लागतात.

बाकी आजकालच्या मुलांना हू वॉज धिस सॅने गुरूजी या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते, तसेच महर्षि कर्वेंची झोपडी व त्यांच्या भारतरत्नाची प्रतिक्ृती तेथे जवळच असूनही ब-याच जणींना त्यांच्या कार्याची माहिती नसते, ना फार कोणी तिकडे फिरकते. अर्थात ते तर त्यांचे काम करून गेले.

तुमच्याबद्दल किंवा तुम्ही परत गेलात म्हणून नव्हे, पण नोकरीच्या शोधात आलेल्या अनेक जणांशी विविध कारणांनी संपर्क येतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की नोकरी 'शोधायची' कशी याचे तंत्र अनेकांना अवगत नसते. अनेकांना या नोकरीच्या महासागरात आपण कोठे आहोत याचे भानच नसते. काही जण ओव्हरस्मार्ट व भलत्याच अपेक्षा बाळगणारे तर काही इंजिनियरिंग किंवा इतर कोर्सेस करताना निव्वळ पाट्या टाकल्याने नोकरी मिळू शकण्याच्या जवळपासही नसतात. कोणीतरी सांगितले म्हणून एका पाठोपाठ विविध कोर्सेस करत राहतात. इंग्रजीचे बोलणे-लिहिणे-वाचणे-समजणे या प्रकारांमधील ज्ञान यथातथाही नसते. सिव्ही पाठवतानाही एसएमएसची भाषा वापरतात. कॅंपसमधून बाहेर पडतानाच नोकरीची सोय झाली नाही तर स्वत: नोकरी मिळवणे हे फारच अवघड झालेले आहे.

नगरीनिरंजन Fri, 05/02/2016 - 14:51

In reply to by मेघना भुस्कुटे

फुसका बार>
पायातून एक आणि हातातून एक अशा दोन सलवारी घालून पोटावर गाठ मारत असतील; तुम्हाला काय करायचंय?
तुमचा तोकडेपणा तुमच्याकडेच ठेवला तर बरे होईल.
</फुसका बार>

अनु राव Fri, 05/02/2016 - 15:01

In reply to by नगरीनिरंजन

विविध 'काळज्या'मुळे काहीजणी बेशुद्ध पडतात. डॉक्टरला बोलवावे लागते. पण अनेकदा यांचे कपडे एवढे तोकडे असतात की आम्हाला काही सलवारी तयार ठेवाव्या लागतात.

काय ना हल्लीचे डॉक्टर, पेशंट ला काय झालय बघायच्या ऐवजी पेशंट कडेच ( आणि तिच्या/त्याच्या तोकड्या कपड्यांनी झाकल्या गेलेल्या आणि न झाकल्या गेलेल्या गोष्टींकडेच ) बघत रहातात.

.शुचि. Fri, 05/02/2016 - 20:33

In reply to by साती

पेशंटची नाडी शोधताना कसरत करायला लागणार आम्हाला मग!

=)) =)) हसून फुटले.

दाह Fri, 05/02/2016 - 22:56

In reply to by राजेश कुलकर्णी

तुम्ही पुण्यातून परत गेलात हे नाही आवडले

माझ्या काही मित्रांनी पुणे सोडल्यावर खूप शिव्या घातलेल्या. पण त्यावेळी काय चूक काय बरोबर काहीच कळत नव्हतं. एकाने तर 'ही तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे आणि तू नंतर खूप पस्तावशील' असंपण सांगितलेलं. जॉब मिळत नव्हता आणि ज्यावेळी घराजवळ मिळाला तेव्हा आलेली नोकरी नाकारून पुण्यात थांबणे योग्य वाटले नाही म्हणून निघालो. आणि अजून किती दिवस असंच झगडायचं हा ही प्रश्न होताच.

नोकरी 'शोधायची' कशी याचे तंत्र अनेकांना अवगत नसते.

मान्य. याशिवाय अनेकांना आपण जो कोर्स करतोय तो का करतोय ? यात आपल्याला खरोखर रस आहे का ? हेच समजत नाही. सगळे जे करतायत ते आपण करायचं. फक्त हेच माहिती असतं. मीही त्यातलाच होतो. हे अमुक अमुक केलं की भारी नोकरी मिळणार असंच वाटत राहतं. आशा संपत नाही. काहीही करून MNCमध्ये जॉब मिळालाच पाहिजे हा अट्टाहास असतो. मुलांच्या याच उतावीळपणाचा फायदा घेऊन फसवणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. आपण एक कंपनी आहोत असं वातावरण तयार करून फेक मुलाखत घेऊन प्लेसमेंट झालंय असं वरवर दाखवायचं आणि नंतर हळूच ट्रेनिंग फी म्हणून पैसे मागायचे. ट्रेनिंग म्हणजे क्लास. तो क्लास झाला की मग खऱ्या कंपन्यात मुलाखतीला पाठवायचं. झालं तर झालं नाहीतर हात हे वर करून मोकळे. आपण फसलोय हे तेव्हा लक्षात येतं मुलांच्या. आपण काय करत आहोत काय करायचय काहीच कळत नाही. मग भरकटल्यासारखं होतं. मग पुन्हा नवीन कोर्स. लाखो रुपये इंजिनियरिंगवर खर्च झाल्याने कमी पगारावर नोकरी करण्याची इच्छा नसते. इतके पैसे खर्च करून ५-१० हजारची नोकरी नको वाटते.

कॅंपसमधून बाहेर पडतानाच नोकरीची सोय झाली नाही तर स्वत: नोकरी मिळवणे हे फारच अवघड झालेले आहे.

हे शत प्रतिशत सत्य आहे. जर कॅंपसमध्ये नोकरी नाही मिळाली तर खूप हाल होतात. फ्रेशरला अनेक कंपन्या घेत नाहीत. ऑफकॅंपसला इतकी गर्दी असते की निभाव लागणं खूप कठीण. नुसती नोंदणीचीच रांग तासनतास संपत नाही. नोकरी नेमकी मिळवायची कशी हाच प्रश्न मुलांना पडतो. आता प्रत्येक कंपनीच्या गेटवर जाऊन आपला सीव्ही देणं पण कालबाह्य झालंय. कोणीही ठेवून घेत नाही. घेतला तरी पुढे पाठवतील असं नाही.
आणि त्यातपण रेफरन्स नावाचा प्रकार असतोच. सगळ्यातून पार पडून कमीत कमी एक तरी वर्ष लागतंच नोकरी मिळेपर्यंत. ते नाही झालं तर अजून त्रास. जर एका वर्षात नाही मिळाली तर फ्रेशर म्हणूनही कुठे जाऊ शकत नाही. नवीन बॅच येते आणि आपण मागे पडत जातो प्रचंड त्रास आहे नंतर.
म्हणून कॉलेजमध्येच घासून प्लेसमेंट मिळवलेलं केव्हाही चांगलं.

ता.क - माझ्या एका मित्राचा मित्र चांगल्या कंपनीत होता. एकदा त्याला माझ्या मित्राने माझ्यासाठी काही जॉब मिळेल का असं विचारलं असता त्याने किती अनुभव आहे असं विचारलं. मी फ्रेशर आहे हे कळताच 'आय हेट फ्रेशर्स' असे उत्तर मिळाले.

राजेश कुलकर्णी Thu, 11/02/2016 - 14:49

In reply to by दाह

तुमचा अगदी प्रत्येक अनुभव वास्तव आहे.
काही जण किती का पगाराची नोकरी असेना घेतात आणि मग त्या निमित्ताने (घरून पैसे मागवावे लागत नाहीत, किंवा कमी मागवावे लागतात) पुढचा अधिक पगाराचा जॉब शोधत राहतात.
दुसरे काही जण आयटीतल्या घाऊक (बल्क) क्षेत्रातल्या नोक-यांच्या मार्गाने न जाता काही निवडक क्षेत्रे शोधून त्यात नोकरीच्या संधी शोधतात.
या निमित्ताने माझ्या पाहण्यात आलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या.

लॉरी टांगटूंगकर Fri, 05/02/2016 - 11:53

विशेष आवडला!, खास मित्राशी गप्पा मारतो आहे असं वाटलं. एक्दम झकास पर्सनल टच.
The more personal you make something, the more universal it becomes.

मारवा Fri, 05/02/2016 - 14:36

तुम्ही मौजमजा मध्ये टाकलाय पण लेख करुण आहे. एक अकेला गाण्यासारखा वाटला. ताटातुटीचा गाव सुटण्याचा वा कुठलीही ताटातुट चा भाग फार वेदनादायी असतो आणि कायमचा वियोग तर कहरच असतो.
बाय द वे "करिश्मा" या एका मोठ्या सोसायटी शेजारील च हा परीसर आहे ना ? म्हणजे स्मरणशक्ती दगा देत नसेल तर " अलंकार " या गमतीदार नावाने एक पोलीसचौकी व एक बगिचा ज्यात प्रत्येक वनस्पतीच शास्त्रीय नाव लिहीलेल आहे. तेथील योगी एकास दोन दोनास तीन अस गाऊन व्यायाम करतात. व एक योकशायर नावाच अंड्याच्या आयटेम्स च च एक दुकान आहे बघा. आणि एक म्हणजे या रोड च नाव जी. ए. कुलकर्णी पथ असे आहे. इथे जी.ए. त्यांच्या अखेरच्या काळात एका अपार्टमेंट मध्ये राहत होते. ते आहे काही तरी विहार अस नाव आहे मी तीथे गेलो होतो. पण हा भाग कोथरुड आहे कर्वेनगर त्याच्या आतच आहे की कर्वेनगर मध्ये कोथरुड आहे मला अचुक नाही सांगता येत. पण ते सर्व याला कोथरुडच म्हणतात.
मी होतो तिथे दोन दिवस मुक्कामाला करिष्मा मध्ये
म्हणुन ताडुन पाहतोय.
लेख ज्या प्रांजलपणे लिहीलाय तो फार आवडला खर म्हणजे मनाला भिडला.
ईश्वर करो तुम्हाला नोकरी मिळालीच आहे एखादी छान छोकरी पण लवकरच मिळो.

घाटावरचे भट Fri, 05/02/2016 - 15:53

In reply to by मारवा

बाय द वे "करिश्मा" या एका मोठ्या सोसायटी शेजारील च हा परीसर आहे ना ?

शाहू कॉलनी वगैरे? ना.... करिश्मा वगैरे कमिन्स कॉलेजच्या बरंच अलिकडे येतं (डेक्कनवरून आलं तर).

दाह Fri, 05/02/2016 - 23:12

In reply to by मारवा

कर्वेनगर आणि कोथरूड वेगळे. तुम्ही जे म्हणताय अलंकार पोलीस चौकी वगैरे भागपण कर्वेनगरमध्येच येतो. पण कर्वेनगरचा गाभा म्हणजे कमिन्स कॉलेज आणि त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर.
थोडा भाग असा आहे ज्याला काहीजण कर्वेनगर तर काहीजण कोथरूड म्हणतात. उदा. कोथरूड सिटीप्राईडच्या मागचा, आजूबाजूचा भाग. मुख्य कोथरूड मात्र वनाज कॉर्नर ते एमआयटी चा पूर्ण पट्टा हेच आहे.

साती Fri, 05/02/2016 - 17:10

लेख खूप आवडला.
अगदी अश्याच सिच्युएशनमधून ओळखीची बरीच मुले गेलीत.
आमच्या गावात बारावी पर्यंत शिकलेल्या आणि इंजीनियरिंग आमच्याच गावात नव्याने निघालेल्या कॉलेजात करून मग ही मुले हमखास पुण्याला धडकत.
(बाकी फिल्डमधले कोंकणी लोक मुंबईला जातात, इंजीनिअर मात्र पुण्याला.)

वर राकुंनी लिहीलंय तसं 'नोकरी शोधण्याच्या तंत्रात' पारंगत नसल्याने बरेचसे फ्रस्ट्रेट होऊन परतही जात. खरेच कुठले कुठले कोर्स करत आणि थोड्या दिवसांनी 'आता या कोर्सला फ्युचर नाही' असे म्हणत नव्या कोर्समागे लागत.
मात्र जे सेटल होऊ शकले त्यांना पुण्याने नोकरी/छोकरी/स्वतःचे घर/गाडी सगळेच काही इतरांपेक्षा भराभर दिले.
आता तर ते इतरांना मार्गदर्शन करतात आणि एका विशिष्ट कॉलेजमधून पास झालेले हे लोक आता 'कॉलेजातून बाहेर-पुण्यात कोर्सेस- पुण्यात सेटल्ड - जगभर प्रगती' असा एक नवाच पॅटर्न सुरू करताना दिसतायत.

अतिशहाणा Fri, 05/02/2016 - 20:42

लेख खूप आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/02/2016 - 20:53

लेखन आवडलं. लिहीत रहा.

(एवढ्या चांगल्या लेखनावर कोणी भलत्याच लोकांवर टीका करणारे प्रतिसाद बघून वाईट वाटलं. पण नाही काही लोकांना काही गोष्टी सुधरत, म्हणून सोडून द्यायचं.)

_मनकर्णिका Sat, 06/02/2016 - 09:01

लेख अतिशय आवडला.

२०१०-२०१४ या काळात कमिन्स कॉलेजची विद्यार्थिनी व राहायला नवी पेठेत असल्याने वातावरण माहित आहे.लेखामुळे आजूबजूला असणाऱ्या विद्यार्थांचा नोकरीसाठीचा स्ट्रगल समजू शकला.

मुलींचे 'तोकडे कपडे' व राहणीमान याकडेच लक्ष असल्याने कॉलेजचा प्लेसमेंट रेट व अभियांत्रिकी क्षेत्रातील याच मुलींची प्रगती याकडे मात्र दुर्लक्ष होते.

फारएण्ड Sat, 06/02/2016 - 09:57

सुंदर लिहीले आहे. आवडले एकदम.

कुलस्य Sun, 07/02/2016 - 11:16

खूप छान लिहिले आहेस. लिहीत रहा .

मेघना भुस्कुटे Mon, 14/03/2016 - 12:06

In reply to by आदूबाळ

मनोबा, कुणीही कितीही कुचकटासारखं बोललं, तरी त्वरित पुढे लिहिणे. फार सुरेख दस्तावेजीकरण करू शकतोस तू मनोवस्थेचं. तू या प्रकारचं जास्त लिहिलं पाहिजेस.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/03/2016 - 00:49

In reply to by मेघना भुस्कुटे

मनोबा लिहिणे.

कुजकटपणा वगळून - या वयाबद्दल, ग्रामीण/निमशहरी मुलींनी लिहिलेलं वाचायलाही मला आवडेल.

दाह Mon, 14/03/2016 - 23:06

अरे वा !! मस्तच!!!आता अपूर्ण आहे ते पूर्ण करा लवकरात लवकर. वाट पाहतोय.
उप प्रतिक्रिया द्यायची होती पण देऊ नका म्हणालात म्हणून प्रतिक्रिया देतोय. तुमच्या या तुमच्या अनुभवामुळे माझ्या आणखी काही आठवणी ताज्या झाल्या.

कित्येक मुलीही विचारयाला येत; मित्रांच्या मैत्रिणी होत्या त्या. मला मुलींशी बोलावंसं वाटे. पण काय बोलायचं समजत नसे. समोर मुलगी आल्यावर मी आक्रसून जात असे. मला सख्खी बहीण नाही.

मला पण. कदाचित म्हणूनच मुलींबरोबर बोलायची, वागायची कधीच सवय नव्हती. वेंधळयासारखा वागायचो मुली समोर आल्या की. गंमत म्हणजे अजूनही वागतो. फक्त जरा पुढचं व्हर्जन आहे इतकंच. हाय- हेलो झाल्यावर मुलीशी नेमकं काय बोलायचं हे अजूनही समजत नाही. मुलींना त्यांना हसवणारी मुलं खूप आवडतात असं एकदा एका मित्राने सांगितलेलं पण ही हसवण्याची कला अजूनही काही जमलेली नाही. पण आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे असं म्हणता येईल.

मुली बोलायला लागलयवर त्यांचय चेहर्‍याकडे पाहणं टाळत असे. कुठेतरी खाली जमिनीकडे, वर आकाशात किंवा मुलींच्या खांद्यावरुन मागे बघत;
पण नज्रानजर टाळत बोलत असे.

काय बोलू कळत नाही. हीच समस्या माझीही होती असं मी म्हणालो तर लोक कदाचित विश्वास ठेवणार नाहीत. पण हे खरंय. असं तिसऱ्याच दिशेला बघत बोलण्यामागे आत्मविश्वासाची कमतरता हे एक कारण असेलही पण त्यामागं माझं एक आणखी लॉजिक होतं. समजा तिच्याकडे पाहत बोलता बोलता आपली नजर भलत्याच ठिकाणी गेली आणि तिने आपल्याबद्दल गैरसमज करून घेतला तर हा गंड मला सतत पिडायचा.

माझ्या मित्राचे (रूममेट) अनेक मित्र होते. ते ही ओळखीचे झालेले माझ्या.जवळजवळ सर्वजण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामाला होते.त्यांना भरमसाठ पगार होता. आणि आम्ही मात्र बेकार होतो. ते अनेकदा रूमवर यायचे, सध्या काय चाललंय विचारायचे पण प्रत्येक वेळी जॉब सर्चिंग शिवाय दुसरं उत्तर आमच्याकडे नसायचं. वाईट वाटायचं.
कधी कधी एखाद्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला वगैरे त्यांच्याकडून बोलावणं यायचं तिथे जायचो. त्यांचा तो ताक-झाक पाहून हेवा वाटायचा. तीन-साडेतीन हजार जेवणाचं बिल आल्यावर 'तरी कमीच आलं' असं म्हणून दिमाखात ते कार्ड पेमेंट करायचे. जरा विचित्र वाटेल पण कार्ड पेमेंट ही त्यावेळी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.(पुढे माझा पहिला पगार झाल्यावर मी जी पार्टी दिली ते पेमेंट मी ठरवून कार्डने केलं. छोटासाच आनंद पण खूप भारी वाटलेलं)
त्यातल्या काहींच्या मैत्रिणी होत्या. त्या बोलायच्या , चार प्रश्न विचारायच्या पण हो- नाही च्या पलीकडे बोलायला जमायचं नाही. स्वत:हून काही विचारायची तर हिम्मत पण व्हायची नाही. पुन्हा त्यांना माझ्याबद्दल काय वाटेल, उगाच मी गळेपडू आहे असा त्यांचा समज होईल की काय ही भावना असायचीच. स्वत:ची नसलेली इमेज जपण्याचा इतका प्रयत्न मी करायचो हे आठवून आज हसायला येतं. मुळात त्यावेळी शरीरयष्टी तोळामासा होती त्यामुळे अनेक कपडे शोभून दिसायचे नाहीत. व्यक्तिमत्व तसं गबाळच. त्यामुळे उगाच कुणाला इम्प्रेस वगैरे करण्याच्या भानगडीत पडायचो नाही. असंच तिसरीकडे पाहत बोलायचो. माझं रूममेटही याला वैतागायचा. 'तुला मुलींसमोर वागायची समज नाही, अवघड आहे.' म्हणायचा. खरंच होतं म्हणा ते.
एक प्रसंग आठवतोय. माझ्या रूममेटचा असाच एक आयटी मधला मित्र होता. जंगली महाराज रस्त्यावरच्या मथुरा नावाच्या हॉटेलात तो त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत बसला असताना त्याने सहज फोन करून माझ्या रूममेटला भेटायला बोलावलं. कर्वेनगरवरून तिकडे एकटा दुचाकीवरून जायला कंटाळा आल्यामुळे माझा पार्टनर मला पण चल म्हणाला. डिसेंबर महिना आणि त्यात रात्रीचे दहा वाजत आलेले.थंडी होती. माझ्याकडे एक आजीने नेपाळवरून आणलेलं ४-५ वर्षे जुनं जाकीट होतं. मान्य की थोडं जुनाट दिसायचं. पण स्वत:ला थोडं स्टायलिश भासवण्यासाठीचा तो माझा एकमेव आधार होता. ते जाकीट मी चढवलं.
"हे जाकीट घालून येणार तू? अरे दोन चार मुली असतील तिकडे" माझा मित्र म्हणाला.
"हो. त्याला काय झालं? " मला या जाकीटात काय खटकण्यासारखं आहे हे समजेना.
"वेडा आहेस काय? काहीतरीच दिसतंय ते. हे घालून येणार असशील तर येऊ नकोस."
मला काही समजेना. वेगळीच अवस्था होती ती. "जा मी येत नाही" म्हणून उडवून लावावं असं वाटलं पण ते ही जमेना. तिकडे दोन-चार मुली येणार म्हणून उगाच एक आशा होती.
मुकाट्यानं जाकीट उतरवलं आणि कुडकुडत गेलो.

माझ्या या त्यागाचा फायदा तर काहीच झाला नाही हे काही वेगळ्याने सांगायला नकोच.

गवि Mon, 14/03/2016 - 23:15

In reply to by दाह

रोचक श्रेणी दिली आहे. लै म्हणजे लैच भारी. तुमच्यासारख्या निरागस पोराला एकीनेतरी पारखून इमानदारीने प्रयत्न करुन पटवायला हवं होतं. सुखी झाली असती. दे मिस्ड. नॉट यू.

अनु राव Tue, 15/03/2016 - 09:27

In reply to by गवि

तेजायला, गवि तुमचा आयडी मनोबा नी हॅक करुन ही प्रतिक्रीया टाकली असावी.

निसर्गे नियमा प्रमाणे मादी तिच्या पार्टनर ला निवडण्यासाठी जे क्रायटेरीया लावते त्यात निरागसता हा क्रायटेरीया अजिबात नसतो. भरगच्च पिसारा फुलवणारा मोर लांडोरीला हवा असतो.

अष्टेकर भाऊ - ही जर कहाणी खारीखुरी असेल तर पुढचे वाचा. नसेल तर तुम्हाला वाचनाच्या मार्केट ची मस्त नस सापडली आहे असे मी म्हणीन.

(

तुम्हाला इथली लोक गंडवतायत ( जाणुनबुजुन नाही ). ही सर्व लोक चांगली बुद्धीवान, यशस्वी वगैरे आहेत. पण जशी प्रेमभंगाची / विरहाची गाणी लोकांना आवडतात पण प्रत्यक्षात तसे स्वताला असले काहीही नको असते, तसे कोणी हाम्रीकेत शेरी आणि टकीला पित, तर कोण स्कॉच शँपेन पित तर कोणी बीफ खात तुमची कहाणी चविनी वाचतायत.
त्यांना भुलु नका.
ती गाणी पुरवण्याचे काम तुम्ही करत आहात. ती गाणी छापुन वगैरे आणा आणि नेमाडे तरी बना.
प्रत्येक युनियन लिडर ला पिचलेला कामगार हवा असतो, शबाना आझमी ला झोपडपट्टीत रहाणारे, काँग्रेस्स ला गरीबी , पर्यावरणाचे दुकान टाकणार्‍याला आदिवासी.
तुम्हाला कोणत्या कॅटेगरी मधे जायचे ते तुम्ही ठरवा.
प्रतिसाद आवडणार नाहीच, तरीपण लिहावा असे वाटले
......)

दाह Tue, 15/03/2016 - 09:59

In reply to by अनु राव

कहाणी खरीखुरीच आहे. अर्थातच. बाकी वाचनाच्या मार्केट्च काही माहिती नाही. पण माझा कल थोडासा निदान लिखाणामध्ये तरी निराशावादाकडे असतो. एखादी सरळ साधी गोड शेवट असलेली गोष्ट किंवा अनुभव लिहिण्याचा प्रयत्न कित्येकदा केलाय नाही असं नाही. पण जमून येत नाही.

गब्बर सिंग Tue, 15/03/2016 - 10:21

In reply to by अनु राव

तसे कोणी हाम्रीकेत शेरी आणि टकीला पित, तर कोण स्कॉच शँपेन पित तर कोणी बीफ खात तुमची कहाणी चविनी वाचतायत. त्यांना भुलु नका.

पुल्देश्पांडे सांगून गेलेलेच आहेत की - प्रेमपत्र हे गो च्या पुढे शंभर अवग्रह काढावेत व नंतर ड लिहावा तसे गोड ......

तसंच आम्हालापण वाटतं. कुणी जर मस्त ष्टोरी सुनावत असेल तर आम्ही चवीने ऐकतो.

गम-ए-दुनिया भी गम-ए-यार मे शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें

बॅटमॅन Tue, 15/03/2016 - 12:18

In reply to by अनु राव

अनुरावांशी (बहुधा नेहमीप्रमाणेच) सहमत. लोकांना पॉर्न आवडतं, मग ते सेक्सवालं असो नैतर अन्य कशाही प्रकारचं असो.

गंम्बा Tue, 15/03/2016 - 00:00

In reply to by दाह

सिरीअसली म्हणतोय.

मला छोट्या शहरातुन आलेल्या, बुजर्‍या, मुलींशी बोलु न शकणार्‍या, मध्यमवर्गीय, नोकरी शोधणार्‍या मुलांच्या स्मरणरंजनापेक्षा

ह्याच आठवणींमधे वर्णन केलेल्या पैसेवाल्या, मोठ्या पगारांच्या नोकर्‍या असणार्‍या, मुलींना पटवणार्‍या किंवा कमीतकमी खुप हुशार अश्या मुलांची स्मरणरंजने वचायला आवडतील.

किंवा त्या कर्वेनगरातील सुंदर मुलींची स्मरण रंजने पण आवडतील वाचायला.

हेच हेच रडगाणे कीती वर्षे ऐकायचे?

अरविंद कोल्हटकर Tue, 15/03/2016 - 08:12

In reply to by नितिन थत्ते

सुखं हि दु:खान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम्...
दाट अंधारामधून दिवा दिसावा तसे दु:खाचा अनुभव घेतल्यावरच सुखाची चव घेता येते.
ह्याउलट...
सुखाच्च यो याति नरो दरिद्रतां धृतः शरीरेण मृतः स जीवति
जो सुखातून दारिद्र्याकडे जातो तो शरीराने जिवंत असला तरी मेल्यासारखा असतो.

अनु राव Tue, 15/03/2016 - 08:58

In reply to by गंम्बा

ह्याच आठवणींमधे वर्णन केलेल्या पैसेवाल्या, मोठ्या पगारांच्या नोकर्‍या असणार्‍या, मुलींना पटवणार्‍या किंवा कमीतकमी खुप हुशार अश्या मुलांची स्मरणरंजने वचायला आवडतील.

किंवा त्या कर्वेनगरातील सुंदर मुलींची स्मरण रंजने पण आवडतील वाचायला.

हे पटले, अशी लोक का लिहीत नसावित?

adam Tue, 15/03/2016 - 09:09

In reply to by गंम्बा

मुलींना पटवणार्‍या किंवा कमीतकमी खुप हुशार अश्या मुलांची स्मरणरंजने वचायला आवडतील.

मी मुलींना "पटवलं" की नै ते ठौक नै. कदाचित मुलींनीच मला "पटवलं" असेल.
दोन-तीन प्रकरणं झाली. अधिकाधिक घोळात घोळ होत बोंबलली.
त्याबद्दल फार त दोन-चार ओळींत लिहिन.
पण फार काही विंट्रेष्टिग नसणारे त्यात.
अगदिच श्रीमंताच्या पोरीनं गरिबाच्या मुलाला नकार दिला इतकी वनलायनर असणारे.
गोंधळातून गोंगाटाकडे प्रवास झाला.
"मुलगी पाहण्याचा " कार्यक्रम काय असतो ह्याची मात्र उत्सुकता आहे आजही.
मग मेव्हणा, मेव्हणी ह्यांचे कार्यक्रम असले की आवर्जून जातो; ती क्याटेगरीही माहित असावी म्हणून.
पुढील दोन तीन अफ्फाट काम आहे हापिसात.
ऐसी उघडूही शकणार नाहिये.
तिकडून इकडे वळलो की लिहितो.
(शिवाय दोन तीन ओळी लिहिल्या की मशिन हँग होते; सर्व सआथवून ठेवायला लागतं;
त्यामुळे वे़ळ लागतो.)
बाकी हुशार, यशस्वी लोक लिहितच नाहित; असं काही नाही.
मिसळपाव वगैरेवर गाजलेली मिश्किल , नरम गरम मालिका "आयुष्याचे नातक" आतह्वते आहे का, आदि जोशी ह्यांची ?
त्यात मस्त यशस्वी लोकाअंची होतीच की ष्तुरी.
अशीच इतर उदाहरणं देता येतील; आता हाताशी नाहियेत पण.
बाकी, अभिजितचा लेटेष्ट प्रतिसादातला काही भाग हा प्रत्यक्षात माझ्या अयौषयतून चोरलेला आहे. जाकिट प्रकरण वगैरे.
इन फ्याक्ट मला मल्टिपल पर्सन्यालिटी डिसऑर्डार वगैरे असावी आणि माझे अनुभव थोडेफार डिस्टॉर्ट करुन अभिजित ह्या नावानं लिहित असावा अशी मला शंका आहे. त्याने सगळ्याच लेखात ही ढापूगिरी केलेली आहे.
.
.
मी प्रतिसाद पूर्ण करणार आहे; हे मात्र नक्की.

दाह Tue, 15/03/2016 - 09:45

In reply to by adam

मला मल्टिपल पर्सन्यालिटी डिसऑर्डार वगैरे असावी आणि माझे अनुभव थोडेफार डिस्टॉर्ट करुन अभिजित ह्या नावानं लिहित असावा

असेल. मला पण हीच शंका आहे. या विषया वर पण एक लेख लिहू दोघे मिळून

दाह Tue, 15/03/2016 - 10:03

In reply to by adam

"मुलगी पाहण्याचा " कार्यक्रम काय असतो ह्याची मात्र उत्सुकता आहे आजही.

म्हणजे अजून बोहोनी नाही झाली की काय? मी अनुभव घेतलाय. हा प्रकार मला तितकासा पटला नाही उलट हास्यास्पद आणि नाटकी वाटला पण इलाज नाही. आता ठरवूनच उरकावं लागणार. i have become a part of the system

लिहितो कधीतरी.

adam Tue, 15/03/2016 - 10:09

In reply to by दाह

लग्न झालेला आहे. अखंड सौभाग्यवता पत्नीव्रत/पत्नीव्रता आहे.
मी धाकाहारीही आहे. म्हणजे बायकोच्या धाकाने ताटात पडेल ते खाणारा. -- ना शाकहारी ना मांसाहारी ; आम्ही धाकाहारी.