Skip to main content

राहून गेलेल्या गोष्टी

रविवारच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'राहून गेलेली गोष्ट' नावाचे एक सदर प्रसिद्ध होत असते. प्रसिद्ध व्यक्तींच्या - मटाच्या भाषेत 'सेलेब्रिटीं'च्या कायकाय करण्याच्या इच्छा होत्या, आणि त्यातल्या काय राहून गेल्या याचा जाहीर पंचनामाच म्हणाना. त्या निमित्ताने या मंचावर असलेल्या लोकांच्या कायकाय गोष्टी करायच्या राहून गेल्या याचा पंचनामा करावा म्हणून हा धागा सुरु केलेला आहे. यात वाचकांनी आपल्याला काय करायचे होते, आणि ते या ना त्या कारणाने जमले नाही याबाबत लिहावे अशी अपेक्षा आहे. काही गोष्टी अद्याप करायला जमल्या नाहीत, पण पुढे जमू शकतील, या वर्गातल्या असतील तरे त्याही टाकायला हरकत नाही.अपूर्ण राहिलेली स्वप्नं म्हणून हा धागा गंभीर असला तरी टवाळकीला येथे मज्जाव नाही. पण गणोबापुढे मूळ गणपतीच उंदराएवढा दिसायला लागू नये, ही अपेक्षा.
तर सुरवात माझ्यापासून. मला दहावीनंतर कला शाखेला प्रवेश घ्यायचा होता. इंग्रजी विषय घेऊन एम.ए. करायचे होते. जमल्यास पी.एच.डीही. आणि एखाद्या कॉलेजात इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम करायचे होते. ही कळ अनावर होऊन कॉलेज सोडल्यानंतर कित्येक वर्षांनी मी इंग्रजी एम.ए. साठी प्रवेश घेतलाही होता, पण भाजी भाकरी शोधता शोधता ते काही जमले नाही. आता जमेल असे काही वाटत नाही. मला सेंद्रीय शेती करायची होती. फळबागा लावायच्या होत्या. एक लहानशी नर्सरी करायची होती. हे लिहायला जितके सोपे वाटते तितके असत नाही - अगदी स्वतःच्या मालकीची शेतजमीन असली तरी - हा कडवट धडा घेऊन मी उदास मनाने त्यातून बाहेर पडलो. आजही माझी शेतजमीन आहे, पण वर्ष-सहामहिन्यांतून एकदा चक्कर टाकण्यापलिकडे तिच्यात माझे मन रमत नाही. ही एक गोष्ट करायची राहून गेली. मला एखादे तंतुवाद्य वाजवायला शिकायचे होते. तेही राहून गेले. मला उर्दू लिपी शिकायची होती. तेही जमले नाही. असे आठवायला लागले की वजाबाक्याच जास्त दिसायला लागतात. पण या काही गोष्टी करता आल्या असत्या तर आयुष्य अधिक सार्थकी लागले असते असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

'न'वी बाजू Sun, 16/09/2012 - 20:51

आपले 'लागले नेत्र रे पैलतीरी' हे वाचून अतीव दु:ख झाले.

सांगण्याचा मुद्दा, 'राहून गेलेल्या गोष्टीं'ची बात कोणी करावी? तर आपले मरण ज्याच्या दृष्टिक्षेपात आले आहे, त्याने. बोले तो, ज्याची 'पंच्याण्णव झाली, पाच राहिली', त्याने. किंवा, जज्जाने लेखणी मोडून टाकल्याच्या परिणामाची वाट पाहणार्‍याने. (पण तेथेही 'अखेरची इच्छा' मिळते, झालेच तर बिर्याणीही खावयास मिळते, असे लोकप्रवाद अनुभवी (?) माहीतगारांकरवी ऐकलेले आहेत, सबब त्याही परिस्थितीत किमानपक्षी 'बिर्याणी खायची राहून गेली' अशा तक्रारीस जागा असू नये.)

पण बाकीच्यांचे काय? बाकीच्यांस कोणती सबब आहे? आयुष्यात सगळ्याच गोष्टी करण्याच्या संधी* मिळतातच, असे नाही; त्यातही, ज्या काही थोड्याबहुत गोष्टी करण्याच्या संधी आयुष्यात मिळतात, त्या सर्वच आयुष्याच्या सुरुवातीस मिळतात, असेही नाही. पण म्हणून काय झाले? जोवर मरण उद्यावर थडकल्याची खात्रीलायक माहिती नाही, तोवर यातील सर्वच नाही, तरी काही संधी तरी यापुढे अजूनही मिळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. (त्यापुढे केवळ 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'.)

आणि नाहीच मिळाल्या काही संधी, तरी चित्रगुप्तास दररोज लाखो केसिस हाताळायच्या असाव्यात, सबब तुमच्या त्या 'न केलेल्या गोष्टीं'च्या हिशेबाच्या बारीक तपशिलांत त्यास काही स्वारस्य असावे, असे वाटत नाही. (म्हणजे, 'चित्रगुप्ता'वर विश्वास असेल, तर. नसेल, तर प्रश्नच मिटला.)

मग हळहळ कशाबद्दल करावी? नि कोणी?

(उद्या समजा (केवळ उदाहरणादाखल) 'आपले' मनोबा (हे बाकी कशालाही प्रतिसाद देऊ शकतील, म्हणा! कौतुक आहे.) आपल्या 'राहून गेलेल्या गोष्टीं'ची लॉण्ड्री लिष्ट येथे देऊ लागले, तर कसे व्हायचे?)


* 'संधी'चे अनेकवचन मराठीत नेमके कसे व्हावे? 'संधी' असेच, की 'संध्या' असे? माझी समजूत 'संधी' असेच, अशी आहे; चूभूद्याघ्या. गरजवंतांनी जरूर दुरुस्ती सुचवावी.

मन Sun, 16/09/2012 - 22:28

In reply to by 'न'वी बाजू

धागा वाचतोय. काही रंजक प्रतिसाद येतील अशी अपेक्षा.
न वी बाजूंच्या प्रतिसादात मनोबाचा उल्लेख का यावा हे समजले नाही. प्रतिसादाचा नीटसा अर्थ ह्याही वेळेस समजला नाही.
सातत्याने उपरोधिक, उपहासात्मक प्रतिसाद लिहिणे, आणि त्यातही मनोबाला अधिकाधिक टार्गेट करण्याची ह्यांची इच्छा का होत असावी ?
असो.आवर्जून दुर्लक्ष केलेले परवडेल असे वाटते.
.

तिरशिंगराव Mon, 17/09/2012 - 19:15

In reply to by मन

खूप काही लिहावेसे वाटत होते. पण काही प्रतिसादांवरुन आपली गणना 'भावी मृतात्म्यांमधे' होईल हे कळल्याने आवरते घेतले.

स्नेहांकिता Sun, 16/09/2012 - 21:48

शास्त्रीय संगीत शिकायचे होते. कॉलेजमध्ये असताना क्लास जॉईन केलाही होता. ५-६ राग शिकल्यानंतर अभ्यासाच्या रेट्यापुढे सगळे विसरावे लागले.
आता वेळच नसतो.

वाचक Mon, 17/09/2012 - 01:22

असे म्हणणे बर्‍याच जणांचे असू शकते, माझेही आहे, अर्थात आता शिकणे अशक्य नसले तरी त्यात तेवढे आवर्जून करावे असे वाटत नाही (आणि इतर गोष्टींपुढे प्राधान्यही नाही.)
नोकरीत बस्तान बसण्याआधी किमान ३ महिने तरी 'प्रवास, भटकंती' करावी अशी खूप इच्छा होती, शक्य झाले नाही.
आता ३ जिवलग मित्रांबरोबर अमेरिकेची रोड ट्रीप करावी असे मनात आहे, त्यातले २ भारतात (कदाचित कायमचे) परत जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे तेही शक्य होईल की नाही माहिती नाही.
रावसाहेबांचा (अजून एक) उत्तम धागा.

सन्जोप राव Mon, 17/09/2012 - 06:46

आपले 'लागले नेत्र रे पैलतीरी' हे वाचून अतीव दु:ख झाले.
या निष्कर्षाचे अतीव नवल वाटले. असो, आपल्या निष्कर्षांवर नियंत्रण ठेवणारा मी कोण बापडा? पण वयाच्या पंचविशीतही एखाद्याला 'हे करायचे राहून गेले' असे वाटू शकते. ते आजवर जमले नाही इतकेच. त्यामुळे राहून गेलेल्या गोष्टींत सतराव्या वर्षी होणार्‍या प्रेमभंगासारखी एक लोभस हुरहुर असू शकते. ते अगदी अश्वत्थाम्यासासारखे भळभळते दु:खच हवे असे नाही.
आणि शेवटी एखाद्याचे नेत्र पैलतीरी लागले तरी त्यात इतरांना दु:ख वाटण्यासारखे काही नसावे. 'मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको...' वगैरे.
अवांतर: 'संधी' चे अनेकवचन माझ्या मते' संधी' असेच आहे. अर्थात भल्याभल्यांना मी 'भूक' चे अनेकवचन 'भुका' असे करताना पाहिले आहे, त्यामुळे खात्री नाही. संध्या म्हटले की 'संध्याछाया भिवविती हृदया' हे आठवते. 'न'वी बाजूंना पुन्हा एक फुलटॉस....

सर्वसाक्षी Mon, 17/09/2012 - 15:13

In reply to by सन्जोप राव

रावसाहेब,
वाईट वाटुन घेऊ नका हो. संध्याचे नाव घेताच सगळेच घाबरतात. भिण्यासारखीच होती ती.

लेखाविषयी:
जे मला सांगायचे होते ते शेवटाला तुम्हीच सांगुन टाकलेत, आता आणखी वजाबाक्या कशाला करत बसा?

लॉरी टांगटूंगकर Sat, 27/10/2012 - 11:37

In reply to by सन्जोप राव

अर्थात भल्याभल्यांना मी 'भूक' चे अनेकवचन 'भुका' असे करताना पाहिले आहे
अहो कोल्हापुर कडे भुका लागल्यात असेच म्हणतात ,जळगावकडे काय भौ? म्हणतात तसेच ,

कोल्हापूरकडे, बोल की भावा(वा ज्या पद्धतीने लांबवला जातो ते शब्दात दाखवणे अशक्य आहे) कसा हाइस? निव्वान्त ?तुमच्याकडे!! अश्या पद्धतीचे बोलणे असते ...

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 17/09/2012 - 07:19

पीताश्म राष्ट्रीय उद्यान* याचि देही याचि डोळा पाहिल्यानंतर "आता आयुष्यातली आणखी एक खंत कमी झाली" असे उद्गार नवर्‍याने काढले. त्यावर "लोकांना तिथले फोटो, व्हीडीओ दाखवून त्यांच्या यादीत एकाची भर टाकू या" असा पाशवीपणाचा उद्-घोष माझ्याच्याने आवरला नाही.
तशा मलाही बर्‍याच गोष्टी करायच्या आहेत, पण वेळ निघून गेली असं अजूनतरी वाटत नाही. तेव्हा या तुमच्या यादीत माझ्याकडून काही वाढ होणे नाही.

*या भयंकर भाषांतराबद्दल उशीरा का होईना, क्षमायाचना. मूळ नाव Yellowstone national park असं आहे.

ॲमी Mon, 17/09/2012 - 08:07

सन्जोप राव आणि 'न'वी बाजू दोघांच्या ही भा. पो.
काही गोष्टी आपल्या हातात नसतात ( कसे आई वडील मिळावे, त्यांच्याकडे किती पैसे असावेत, त्यांनी किती मुलं जन्माला घालावीत) म्हणुन राहुन जातात.
आणि काही गोष्टी आपल्या हातात असल्या तरी त्या बर्याचदा passion नसून छंद असतात. त्यामुळे पोटापाण्याच्या चिँतेत राहुन जातात. नेहमीचाच want व need मधला फरक.
आणि मग एकदा राहुन गेल्या की त्या परत कोणत्याही वयात करणे शक्य नसते.
आता मला टँगो/tap नृत्य शिकायचं होतं, गिर्यारोहण करायचं होतं किँवा केटरीना कैफ सारख लाखोँ दिलोँ की धडकन बनायचं होतं, म्हणलं तर माझ्या वयात ते शक्य नाही. उगाच हाडं मोडायची किँवा मिळालेच तर ताई/वहीनी चे रोल मिळणार काय उपयोग :-(

............सा… Mon, 17/09/2012 - 18:49

संस्कृत भाषा शिकायची आहे. ८ वीत ५०-संस्कृत/५०-हिंदी होती. पण आता परत नीट शिकायची आहे.
मूल दत्तक घ्यायचं होतं. जमले नाही.
दक्षिण भारतिय देवळे अगदी सावकाशीने पहायची आहेत. बेल्लूर-हळेबिड ची देवळे मनावर इतकी मोहीनी घालून आहेत की अजूनही त्यांच्या आठवणीने रोमांच ऊभे रहातात.
गाणे शिकायचे होते. त्यात बुडून जाऊन रियाज करायचा होता. जमले नाही.
ज्योतिष विद्या शिकायची आहे.

अन्य काही राहून गेलेल्या गोष्टी फारच वैयक्तिक आहेत. पण आहेत. त्या गोष्टी तर पहील्या क्रमांकावर आहेत.

क्रेमर Mon, 17/09/2012 - 20:39

सर्व आयुष्य जगल्याशिवाय काय करू शकलो नाही हे नेमके कळणे अवघड असावे. सध्यातरी काय करू शकलो नाही अशा शेकडो गोष्टी आहेत. पण केव्हातरी अगदीच करायलाच हव्या अशा वाटणार्‍या गोष्टी आता करण्याची इच्छा होत नाही. उदा. जेव्हा माझा हिंदू धर्माभिमान उतू जाण्याचे दिवस होते तेव्हा वेद तोंडीपाठ असावेत वगैरे वाटत असे. वडिलांना सांगून नाशिकच्या वेदमंदिरात वेद वगैरे शिकता येतील का म्हणून चौकशी करता ब्राह्ममण नसल्याचे कारण देऊन नकार मिळाला होता ते आठवले. आता अर्थातच वेद शिकण्याची काही इच्छा नाही.

राजन बापट Mon, 17/09/2012 - 21:31

छोटासा लेख आवडला. क्वचितच एखादा माणूस असा असेल ज्याला अशा स्वरूपाची रुखरुख नसेल.

विंदा करंदीकरांच्या "उंट" या कवितेमधे "उंट" हे ज्ञानमार्गावरच्या प्रवाशाचं प्रतीक आहे. त्याचं जे साध्य आहे त्याकरता "निळा पिरॅमिड" अशी प्रतिमा वापरली आहे. ज्ञानाच्या वाळवंटातला प्रदीर्घ, कष्टप्रद प्रवास असं एकंदर रूपक. तर त्यातल्या शेवटच्या ओळी या संदर्भात उधृत करतो. कदाचित काही वाचकांना त्या ओळींचं या विषयाशी नातं जोडता येईलसुद्धा.

"निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी."

Nile Mon, 17/09/2012 - 22:06

कॉलेज मध्ये असताना हलुसिनोजेन घेऊन पहायचं राहूनचं गेलं.. म्हणजे अजून घेण्याचं वय सरून गेलं आहे असं नाही पण त्या वयात ते करायला हवं होतं अस वाटून जातं.

आडकित्ता Tue, 18/09/2012 - 10:44

In reply to by Nile

Hallucinogensच म्हणायचंय ना तुम्हाला? ;)
तेच दिडकीची भांग खाल्ली की तत्वज्ञान वगैरे वालं :P

लॉरी टांगटूंगकर Mon, 17/09/2012 - 23:11

या विषयावर बोलायला मी फार लहान आहे तरी ही लिहितो .
शाळेत असताना शिरोडकरला सांगायच होतं ,मला तू आवडतेस,उद्या भेटशील इथेच??
बाकी विशेष नाही ,
जे करायचं आहे त्या दिशेने वाटचाल(कशी का असेना) सुरु आहे, ते करू शकेन असे आत्ता तरी वाटतंय .

संजोप रावांसारखे जी ए कुलकर्णीसारख्या कठीण विषयावर कधी तरी लिहायचंय ते मात्र जमेल का नाही शंका आहे

बॅटमॅन Wed, 03/04/2013 - 14:26

In reply to by लॉरी टांगटूंगकर

+१११११११११११११११.

माझंही शिरोडकरला सांगणं राहून गेलं. लै दिवस झाले त्याला. पण त्या जखमेवरची खपली व्हेसुव्हिअस ज्वालामुखीगत अधूनमधून निघते.

मन Wed, 03/04/2013 - 15:43

In reply to by बॅटमॅन

आमचही असच. फक्त जे सांगायचं होतं ते वेगळं.
"मला हो म्हणू शकली नाहिस म्हणून खंत करीत बसू नकोस; न्नि मला मजेत जगताना पाहून चकितही होउ नकोस" हे शिरोडकरला सांगणं राहून गेलं बघ.

सन्जोप राव Wed, 03/04/2013 - 16:03

In reply to by मन

आमच्या शिरोडकरचे आभार. तिला विचारायचे राहून न गेल्यामुळे 'तो शिंचा प्रेमभंग कसा असतो ते बघायचं राहूनच गेलं' हीही खंत दूर झाली. तेंव्हा थँक्स, शिरोडकर.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 04/04/2013 - 09:38

In reply to by अतिशहाणा

म्हटलं तर मीच जोशी, पण रोल शिरोडकरचा मिळाला. असो!
आमच्या जोश्याने आम्हाला विचारल्यामुळे नकारघंटेनंतर शिरोडकर कशी हसली असेल याचा अनुभवही मिळाला. ही संधी साधून त्या संधीबद्दल मी त्या (न-)जोश्याचे आभार मानते.

ॲमी Thu, 04/04/2013 - 10:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हि हा हा.
रोडवर चालत चालले असताना, अनोळखी मुलाने बाइकवर येउन आपल्याला थांबवावे आणि 'विल यु बी माय सिस्टर' विचारावे, असा अनुभव माझ्याशिवाय कोणाला आला असेल असे वाटत नाही =))

आतिवास Tue, 18/09/2012 - 00:15

'गेले करायचे राहून' ही यादी बरीच मोठी आहे. जितका जास्त विचार करावा तितकी यादीत भर पडत जाणार यात काही शंका नाही. पण 'जे केले' ते केले नसते आणि 'जे राहून गेले' ते केले असते तर तेव्हाही बरेच काही (आज केलेले!!) 'राहून गेले' असे जाणवले असतेच.

Robert Frost (1874–1963) ने म्हटल्याप्रमाणे:

TWO roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both.....

(कवितेचा विषय वेगळा आहे त्यामुळे फक्त या दोन ओळी सोयीच्या म्हणून घेतल्या आहेत :-))

शेवटी काहीतरी 'केले आहे' म्हणून काहीतरी 'राहून गेले आहे' यात समाधान मानणे क्रमप्राप्त आहे!

आडकित्ता Tue, 18/09/2012 - 00:28

काही गोष्टी अशा अचानक माझ्या घरी आल्या..
राहिल्या.
अन निघून गेल्या.
बर्‍याच आहेत.
त्या गेल्या म्हणून दु:ख करायचं, की बरी ब्याद गेली म्हणून आनंद मानायचा?
मनुष्य अर्धं आयुष्य गेल्या क्षणाला आठवण्यात अन उरलेलं अर्धं येणार्‍या क्षणाच्या विवंचनेत घालवतो म्हणतात. त्यात आहे तो क्षण जगायचे राहून जाते.
मी आहे तो क्षण पकडून आनंद घ्यायला शिकतोय सध्या.

अशोक पाटील Tue, 18/09/2012 - 00:35

टेलिव्हिजनच जमाना भारतासाठी अजून शेकडो मैल दूर होता तरी त्या काळी मला 'नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन' वाचण्याचे जबरदस्त वेड होते. माझ्या कॉलेजमधील मी कदाचित एकमेव विद्यार्थी असेन की जो ग्रंथपालाना थेट भेटून 'या महिन्याचा नॅशनल जिऑग्राफिक अंक अला का, सर ?" असे मुद्दाम अदबीने त्यांच्यासमोर उभे राहून विचारीत असे. श्री.बोन्द्रे नामक ग्रंथपालाना ते फार भावत असे; कारण खुद्द कॉलेजच्या भूगोल विभागाच्या एकाही प्राध्यापकाने त्यांच्यासमोर त्या मॅगेझिनबद्दल कधी इतकी उत्सुकता दाखविली नव्हती. एकदा का अंक [कॉलेज लायब्ररी सहीशिक्काने बरबटणे झाल्यावर] हाती आला की पुढील सारा दिवस मला अक्षरशः जादूमय वाटत असे. सहा तासात जगाच्या अशा काही भागाची सचित्र सफर माझ्यासाठी घडत असे की तेवढ्या काळात पन्नास पुस्तके वाचून देखील जितकी माहिती मिळाली असती त्यापेक्षाही माझ्याकडे विश्वातील नैसर्गिक घडामोडीचा विदा एकत्रित होत असे. अशा या मॅगेझिनमध्ये मला नोकरी मिळावी असे मला मनापासून वाटत होते. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचे ज्ञान अर्थातच शून्य. पण ती बाब माझ्या मनी घर करून राहिली होती हे निश्चित.

त्यातच जी.ए.कुलकर्णी यांच्या "घर" कथेतील एक पात्र डॉक्टर देशपांडे यांचे 'मृत्यू कसा यावा ?" याबद्दलचे एक छोटे चिंतन वाचनात आले होते. डॉक्टर म्हणतात, "ललितला घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाही. केव्हा का बंद पडेना ते ! मग शेजारी सिगारेटचे एक पूर्ण पाकीट असावे, एखादा दरबारी छबिना चौघडे-तुतार्‍या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेपरेकॉर्डरवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात नि:संकोच सरदारी दिमाखाने चित्रे आणि लेख छापणारे National Geographic किंवा Realities सारखे एखादे मासिक हातात असावे. मग बोलावणे घेऊन येणार्‍या, तू कसाही ये.....ते मला फार आवडेल....!"

जी.ए.सारख्या दिग्गजाला जर हे मॅगेझिन इतके मोहिनी घालत होते, तर मला त्या कथेच्या प्रकाशनापूर्वीपासून आवडत होते याचा झालेला मनस्वी आनंद आजही स्मरतो. त्याकाळी बाय एअर मेल सर्व्हिसेसने तर मी पदवी घेतल्या घेतल्या थेट मॅगेझिनच्या अमेरिकन कचेरीकडे नोकरीसाठी चक्क टायपिंग करून अर्ज पाठविला होता. त्याचे अर्थात उत्तर आले नाहीच...ती अपेक्षाही नव्हती. पण मनात कुठेतरी बरे वाटले की, चला ज्या अर्थी ते पत्र परत आले नाही, त्याअर्थी निदान त्यावर नॅशनल जिऑग्राफिक कार्यालयाचा इनवर्ड नंबर तरी पडला असणार.

तशा अनेक गोष्टी राहून गेल्या....पण इथे चर्चेसाठी द्यायच्या योग्यतेची एवढीच मला स्मरते.

... Tue, 18/09/2012 - 00:36

काही गोष्टी
इंग्रजी लिटरेचर शिकायच होत पण लिटरेचर शिकून काय दिवे लावणार आणि जरा इतरापेक्षा जास्त मार्क मिळाल्याने ते राहिल
पण मी आताही करु शकत असल्याने त्याची एवढी खंत नाही

हार्मोनियमचा अजून सराव करायला हवा होता अस वाटत

व्यंगचित्रे जमत नाहीत याची मात्र मनापासून खंत वाटते
ते स्ट्रोक हरवले कुठेतरी

काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे पटत अशावेळेला

ऋषिकेश Tue, 18/09/2012 - 10:58

राहुन गेलेल्या गोष्टींपेक्षा करू न शकलेलो (शक्य क्रियापद) किंवा शक्य असूनही न करण्याची निवड केलेल्या गोष्टी आहेत. मात्र "राहुन गेलेल्या" मधून जी खंत जाणवते ती खंत या न केलेल्या गोष्टींबाबत जाणवत नाही.

सध्या मी जो आणि जसा आहे तो मी केलेल्या गोष्टीं सोबतच न केलेल्या / न करू शकलेल्या गोष्टींमुळेही आहे. त्यामुळे या न केलेल्या/करु शकलेल्या गोष्टींबद्दल अजिबात खंत नाही

ऋता Fri, 16/11/2012 - 01:33

असं लक्षात येतय की बरंच बालसाहित्यं आहे जे बाल वयात वाचायचं राहून गेलं. आता वाचत्ये ते...पण राहून गेलं ते गेलंच !

उसंत सखू Wed, 03/04/2013 - 21:42

वाममार्गाला जायचे होते ते राहूनच गेले . ;;)

काही अहंकारी लोकांना ठेचायचे राहून गेले . J)

( नुसतेच चडफडत रहावे लागले नेहेमीप्रमाणे J) )

अख्ख्या महाराष्ट्रात वर्ल्ड फ़ेमस व्हायचे होते ते ही राहूनच गेले . :D>

बिटकॉइनजी बाळा Thu, 06/09/2018 - 09:21

राहून गेलेल्या गोष्टी:
मला सर्जन व्हायचे होते. पण ती वाट बारावीनंतर बंदच झाली. याची खंत नाही कारण कोणताही व्य्वसाय मला बोरछापच वाटला असता. मी रेटले असते तर काही कौटुंबिक कलह मला वाचवता आले असते, या गोष्टीची मात्र कधीतरी कळ जाणवते. ह्या अश्या वजाबाक्या जास्त असाव्यात असं आधी वाटायचं. आता या दोनच गोष्टी सोडल्या तर इतर वजाबाक्या आठवतच नाहीत. आपण लिहावं असं आधी वाटायचं. आता वाटतं, शेवटी अनुभवांनाच मोठा अर्थ आहे.

काही वेळाने आता जमतील अशा गोष्टी:
कोल्हापुरात एक बंगला असावा अशी फार इच्छा आहे. पुढे हे जमेल असे वाटते. सेंद्रिय शेती नाही जमली तरी कुटुंबापुरतं स्वत: पिकवावं ही अपेक्षा आहे. व्हायोलिन शिकण्याचा अर्धवट प्रयत्न केलाय तो तडीस न्यायचा इरादा आहे. घरात कुत्रीमांजरं असावीत असंही वाटतं, आणि हे आता शक्य आहे.