Skip to main content

बैठक

2 minutes

लावणीची बैठक सिनेमात बघून, काही आंबट शौकिनांच्या गप्पातून आणि थोडीफार पुस्तकातून माहित होतीच. मध्यंतरी प्राध्यापक निवड समितीवरील सन्मानणीय प्राध्यापक सदस्यांनी उमेदवार निवडी बाबतची कार्यवाही यशस्वी रित्या चोख बजावल्याने, त्यांच्या बैठकीच्या ईच्छापूर्तीची अवघड जबाबदारी , यशस्वी उमेदवार आणि सदर यशामागील, प्रभावी सुत्रधार प्राध्यापक महोदयांवर येऊन आदळली. सुत्रधार प्राध्यापक महोदय मला 'जस्ट डायल' सर्व्हिस समजत असल्यामुळे , आमच्यात तासाला दहा या हिशोबात फोनाफोनी झाली आणि पुणे परिसरातील धानोरी, शुक्रवारपेठ, सनसवाडी इथे असलेल्या ठावठिकाण्यांचा सुगावा माझ्या एका पत्रकार मित्राकडून दोन तासाच्या अथक परिश्रमात लागला. आणि पत्रकार मित्रासह सात लोकांचा ताफा एका लोककला केँद्रावर पोचला.
१५ गट असलेलं कलाकेँद्र. प्रत्येक गटात पाच ते सात बायका , प्रत्येक गटात जाऊन बायका पाहून गट निवडण्याची विनामोबदला सोय. कलाकेँद्र म्हणजे पिव्वर वेशीबाहेर वसलेल्या वस्तीची कळा असलेलं ठिकाण. कोल्हाटी समाजाच्याच बायकांचा तुडूंब भरणा. त्या एक तासाचे अठराशे रुपये घेतात. दोन तास लावण्या, फिल्मी गाणी यावर अश्लिल हावभावा सहीत माफक देहप्रदर्शन करत नृत्य सादर करतात. तिथे वारंवार जाणारी बडी धेंड , चिरा न उतरलेली एखादी कोवळ्या वयाची पोरगी हेरुन बोली लावतात. आणि ती रात्र साजरी करतात. तिथे नाचणारी प्रत्येक स्त्री कोवळ्या वयातून गेलेली असते. ती मुलगी नंतर इतरांसमोर नृत्य करत चिरा बोलीत प्रबळ ठरलेल्या बड्या धेँडाची (धेँडाचे नामकरण नंतर 'मालक' असे होते ) हक्काची त्याला हवी तेव्हा शय्या सोबतीन करणारी बाई रखेल काय वाट्टेल ते म्हणुन राहते. देहप्रदर्शन व विक्री काही अटींच्या आधिन राहून केली जाते.
गट निवडला आणि आत गेलो. गाणी चालू झाली. गटातली थोडी वयस्कर बाई जिला मामी म्हटलं जात होतं. जी आता नाचण्यास काबिल नाही. म्हणुनच ती केवळ गाणी म्हणते. गटातल्याच एखाद्या ताई बाईचा भाऊ ढोलकी बडवत असतो. दिवसभराच्या चार सहा बैठका करुन मामी ज्याम दमलेली असते. दम खात खोकला दाबत पह्यले तेरी आंखोने चूम लिया प्यारसे असं काय बाय म्हणत असते. कारभारी दमानं म्हणताना खरंच दमलेली असते. प्राध्यापक महोदय न जाओ संय्याच्या सुरुवातीला जवळ येऊन पायावर केस मोकळे सोडण्याचा जटील आग्रह एका लहानगीला करत असतात. कोवळी देखणी पोर खळण्या कपड्यातल्या अनपेक्षित वागण्याला भलतीच बिचकलेली असते. स्वतःला आयी मायीवरुन शिव्या देत मी मुतायच्या बहाण्याने बाहेर येतो. चायना मोबाईल वर गेम खेळणारी पोरं बघत राहतो. कधी उरकणार म्हणुन थोड्या वेळाने पुन्हा आत डोकावतो. गाणं थांबलेलं असतं. शाँटचा बंदोबस्त होईल काय ? ही आग्रही विचारणा आत गटप्रमुख महिलेकडे चालू असते. यशस्वी उमेदवार आणि सुत्रधार प्राध्यापक महोदय वैतागलेले असतात. समिती सदस्यांचा मोबाईल वाजतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रिंगटोन संवाद खंडीत करते. मी उल्ट्या होईस्तोर दारु प्यायला सज्ज होतो. आणि गाडीत वाट बघत निमूट बसतो.

Node read time
2 minutes

श्रावण मोडक Mon, 18/03/2013 - 21:47

!
प्राध्यापक मंडळी आहेत म्हणून अधिक खुपलं का? नाही. प्राध्यापकाच्या जागी पत्रकार, पत्रकाराच्या जागी वकील, त्याच्या जागी सरकारी कर्मचारी... कोणीही असलं तरी तितकंच खुपेल. कारण ही पात्रं बदलतील, पण त्या बायकांचं शोषण आणि त्यातून येणारं दुःख हे मात्र एकाच प्रकारचं, एकाच जातीचं, एकाच वृत्तीचं असेल. दिगंबरा ही टोन हा कळस मार्मीकच आहे. ती टोनही कुणाच्याही मोबाईलमध्ये असू शकते.

रंग Tue, 19/03/2013 - 19:06

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' कादंबरीची अाठवण झाली. त्यात 'बैठक', 'कलाकेंद्र' यात लावणीच्या नावाखाली चालणारी दौलतजादा अाणि होणारे अत्याचार यावर डिट्टेलवार लिहिलंय. कधी कधी वाटतं एकवेळ डांसबार, मसाज पार्लरवर बंदी येईल किंवा हे प्रकार अाउटडेट होतील पण या 'बैठक' प्रकारातून चाललेला अत्याचार थांबणं अवघड अाहे. जाती-पातीच्या उतरंडीतून निर्माण झालेली 'सप्लाय चेन' अशी लगेच थोडीच तुटणार अाहे :(

राजन बापट Tue, 19/03/2013 - 21:16

In reply to by रंग

>>कधी कधी वाटतं एकवेळ डांसबार, मसाज पार्लरवर बंदी येईल किंवा हे प्रकार अाउटडेट होतील पण या 'बैठक' प्रकारातून चाललेला अत्याचार थांबणं अवघड अाहे.

असं वाटण्याचं नक्की कारण काय ? माझ्या समजुतीप्रमाणे मुंबई परिसरातले डान्स बार बंद झालेले आहेत. (म्हणजे या बार्स मधला डान्सच्या मिशाने चाललेला वेश्याव्यवहार बर्‍याच अंशी थांबलेला आहे.) हाच न्याय "बैठक" या प्रकाराला लागू न होण्याची कारणे काय असावीत ?

रंग Wed, 20/03/2013 - 04:46

In reply to by राजन बापट

डोळ्यावर येत नाही म्ह्णून आणि यात काम करणारा वर्ग नेहमीच उपेक्षीत तिथं वर्षानुवर्षे असंच चाललंय म्हणूनही...
पुढंमागं कधीतरी हे घटक मुख्य प्रवाहात येतील तेंव्हा कदाचित शोषण थांबेल.
दुसरा मार्ग म्हणजे अ‍ॅडल्ट एंटरटेन्मेंट म्हणून रेग्युलेशनच्या चौकटीत व्यावसायिक विकास करणे.
अर्थात किती जनरेशन नंतर हे आपल्याकडे होईल याची आपण कल्पना करु शकतोच ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/03/2013 - 06:07

In reply to by रंग

आपल्याकडे कायदेशीररित्या हा व्यवसाय अस्तित्त्वातच नाही, त्यामुळे असे प्रश्नतरी कागदावर कुठे अस्तित्त्वात असणार?

या स्त्रियांना आपलं शोषण होतं, शोषण करणारे जसे बाहेरचे आहेत तसेच आतलेही आहेत याची काही जाणीव असते का? आपली मध्यमवर्गीय मूल्य बाजूला केल्यास, त्या समाजात पुरुषप्रधान संस्कृतीच आहे का, 'कोल्हाट्याचं पोर'मधे वर्णन केल्यासारखी?

'न'वी बाजू Wed, 20/03/2013 - 06:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या स्त्रियांना आपलं शोषण होतं, शोषण करणारे जसे बाहेरचे आहेत तसेच आतलेही आहेत याची काही जाणीव असते का?

समजा असते असे मानले. त्याचा नेमका उपयोग काय?

त्याबद्दल त्या करणार नेमके काय, आणि कसे?

... Wed, 20/03/2013 - 07:27

In reply to by 'न'वी बाजू

एक्झँटली
हे नबा नेमके मनातले बोलतात

पण नबा जर ऊपाय केले तर इथे लेख कसे टाकता येणार
सदसदविवेकबुध्दीच्या टोचणीपेक्षा इथे मिळणारी वाहवा अंहगंड सुखावते
त्यातन दिगंबरा दिगंबरा या अँडेड व्हँल्यू

मी Thu, 21/03/2013 - 18:46

In reply to by सतीश वाघमारे

बायो डाटा टाकायला हवाच असे नाही, तो तुम्ही प्रतिसादांतून थोडाफार टाकला आहेच, पण लेखनातील पुरेशा फटींमधून अजेंड्याची शंका ठेवायलाच हवी असेही नाही.

परिकथेतील राजकुमार Tue, 26/03/2013 - 10:01

In reply to by सतीश वाघमारे

तुमच्या लेखनाविषयी आणि ते सामाजिक का काय कार्य करता त्या विषयी प्रचंड आदर आहे, पण तरी देखील तुमचे हे लिखाण वाचून खदाखदा हसावेसे वाटले. दु:ख रंगवायची म्हणून कै च्या कै लिहायचे का?

पुणे परिसरातील धानोरी, शुक्रवारपेठ, सनसवाडी इथे असलेल्या ठावठिकाण्यांचा सुगावा माझ्या एका पत्रकार मित्राकडून दोन तासाच्या अथक परिश्रमात लागला. आणि पत्रकार मित्रासह सात लोकांचा ताफा एका लोककला केँद्रावर पोचला.

नक्की कुठल्या कलाकेंद्रावरती पोचलात हे सांगीतलेत तर पुढील कुंडली मी मांडून देतो तुम्हाला.

तुम्ही जे वर्णन केले आहेत, स्पेशली ' चिरा न उतरलेली, शय्यासोबतीची सोय होणारी' वैग्रे वैग्रे केंद्रे ही लोककला केंद्रे म्हणून ओळखली जात नाहीत. ह्या केंद्रात कला सादर करणारी मंडली ही सरकार दरबारी चांगली नाव नोंदणी वैग्रे झालेली असतात आणि तिथे देखील सहसा 'अजाण' मुलांना 'कला' ह्या नावाखाली राबवून वैग्रे सहसा घेतले जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, धनदांडगे जिथे जातात त्यांना कलाकेंद्रे म्हणत नाहीत. :) उगाच चौफुल्याच्या ऐकीव गप्पा ह्या पुणे अथवा इतर कुठल्याही कलाकेंद्राच्या नावावरती खपवल्यासारखे वाटते.

तुम्ही ज्या कलाकेंद्राचे वर्णन ह्या लेखात केले आहेत, ते बहूदा 'आर्यभुषण' असावे. बरोबर ना ?

पण त्यात जे 'रंगेल'पणाचे वर्णन केले आहेत, ते तिथे कधीच आढळत नाही. मी विनोद करत नाहीये, पण खरंच तुम्हाला रंगेलपणाची कलाकेंद्रे बघायची असतील तर पुढच्यावेळी पुण्याला आलो की नक्की नेऊन दाखवतो. ती स्वतः अनुभवा आणि मग तुमच्या लेखणीतून त्यावरती उतरलेले लेखन नक्की वाचायला आवडेल. साला ४५०/- रुपायाचा गजरा आणि २२५/- रुपायाचे पान असले भाव असतात तिकडे.

असो..

सतीश वाघमारे Tue, 26/03/2013 - 20:13

In reply to by परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राजकुमार
तुमचा प्रतिसाद आज पाहिला. सालं कसा काय दिसला नाही माहित नाही. असो..मोबाईलवरुन आँपरेट करताना मर्यादा येतात त्यामुळे असेल कदाचित. माझ्या लेखना बद्दल आणि सामाजिक का काय त्या कार्याबद्दल प्रचंड आदर दाखवल्या बद्दल प्रचंड आभार ! आणि हा लेख वाचून खदा खदा हसावे वाटले याबद्दल तुमची किव करुन शेवटी जान्देव , म्हणुन मी ही स्मितहास्य केले. राजकुमार विश्वाचा आकार केवढा तर ? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा ! ४५० चा गजरा आणि २२५ चे पान ही तुमची मर्यादा ! कलाकेँद्राचं नाव निश्चित आठवत नाही. एरीया आठवतो. धानोरी परिसरात, भरत ढाब्याच्या थोडंसं पुढे आहे ते. सरकारी नोंदणी असते वगैरे ते मला निश्चित माहित नाही. त्यामुळे त्यावर मी बोलत नाही. आमच्या येथे बालकामगार काम करत नाहीत ही पाटी वाचेस्तोवर लहान पोरगा फडक्याने टेबल साफ़ करत असतो. हे आपल्या इथलं , साँरी भारतातलं वास्तव आहे. तुम्ही कायम मला दुसर्या गृहावरचे वाटत आला आहात. :-) असो. तुम्ही पुण्यात नक्की या तुमचं मोस्ट वेलकम् ! तुम्ही अस्सल रंगेल कलाकेँद्रे दाखवा मी तुम्हाला कलाकेँद्रात काम करणार्या माझ्या विद्यार्थ्याच्या माय, मावश्या, काक्यांची ( ज्या चौफुल्यात नव्हत्या ) त्यांच्या अस्सल अनुभवाची गाठ घालून देतो. त्यांची मुलाखत घ्या.(स्फुर्तीचा झटका आला आणि कै च्या कै लिहिलं असं नाही करत मी) सनसवाडी आर्यभुषण इथेच काम करुन दमल्यात बिचार्या. सांगतील किस्से तुम्हाला त्या. असो प्रतिसादा बद्दल मात्र धन्यवाद !

परिकथेतील राजकुमार Wed, 27/03/2013 - 19:24

In reply to by सतीश वाघमारे

आणि हा लेख वाचून खदा खदा हसावे वाटले याबद्दल तुमची किव करुन शेवटी जान्देव , म्हणुन मी ही स्मितहास्य केले.

चालायचेच.. शेवटी ज्याची त्याची जाण..समज.. इ. इ.

आमच्या येथे बालकामगार काम करत नाहीत ही पाटी वाचेस्तोवर लहान पोरगा फडक्याने टेबल साफ़ करत असतो.

असू द्या हो. आंतरजालावरती नै का काही लोकं समतोल विचारी माणसाचा मुखवटा आणि शिक्षणाची पाटी लावून एकाच जातीवरच्या अन्यायाचे गळे काढत लिहिण्यात आयुष्य काढतात. तसेच आहे हे.

तुम्ही पुण्यात नक्की या तुमचं मोस्ट वेलकम् !

तुम्ही कशाला करताय ? मी चांगला जन्मजात पुणेकरच आहे. अर्थात तुम्ही नदीपलीकडे राहात असल्यास, मलाच तुमचे स्वागत करावे लागेल हा भाग वेगळा.

ते असो..

तुम्ही अस्सल रंगेल कलाकेँद्रे दाखवा मी तुम्हाला कलाकेँद्रात काम करणार्या माझ्या विद्यार्थ्याच्या माय, मावश्या, काक्यांची ( ज्या चौफुल्यात नव्हत्या ) त्यांच्या अस्सल अनुभवाची गाठ घालून देतो. त्यांची मुलाखत घ्या.(स्फुर्तीचा झटका आला आणि कै च्या कै लिहिलं असं नाही करत मी) सनसवाडी आर्यभुषण इथेच काम करुन दमल्यात बिचार्या. सांगतील किस्से तुम्हाला त्या.

आता मात्र तुमच्यासारख्या विद्वत्तेच्या सूर्याचा जाहीर सत्कारच करायला पाहिजे बघा.

लेखात तुम्ही तुम्हाला 'अशी कलाकेंद्रे' ह्याआधी ठावूक देखील नव्हती असे म्हणत आहात. आणि आता एक बैठकीत तुम्ही तिथले रंगढंग, कोवळ्या वयातील हाल, शारीरीक शोषण येवढ्या सगळ्याचा अभ्यास करून वर त्या लोकांच्यात येवढे मिसळले आहात, की आता तुम्ही आम्हाला त्यांच्या ओळखी पण करून देऊ शकता ?

बाकी जाता जाता आपण 'अशा' वातावरणातल्या विद्यार्थ्याला कसे शिकवतो वैग्रे आहोत हे दाखवण्याचा सामाजिक प्रयत्न फारच स्तुत्य आहे हे कबूल करायलाच हवे.

तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का वाघमारे, (अगदी मी परग्रहावरचा आहे तरी सांगतोच बरं का) तुम्ही ना तो लेखन न करण्याचा निर्धार केलात आणि २४ तासात मोडून दाखवलातना तेव्हांच कोणाचीही किव वैग्रे करण्याचा तुमचा प्रयत्न ह्या पुढे किती हास्यास्पद होईल ह्याचा अंदाज करायला हवा होतात. लोकं काय सांगत आहेत, किंवा कशाला विरोध करत आहेत ते सोडून तुम्ही कायम इतरच निरर्थक वाद घालणे, किव करत बसणे अशा उद्योगात मग्न असता. वरती पुन्हा 'मी काय आमंत्र दिले होते का वाचायला यायचे?' असा आव आणता तो वेगळाच.

बाकी विश्वाच्या आकारावरती वैग्रे तुम्ही गप्पा मारणे म्हणजे.. हॅ हॅ हॅ..

असोच.

सतीश वाघमारे Wed, 27/03/2013 - 22:33

In reply to by परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राजकुमार ...ख्या ख्या ख्या...जान्देव !!!! प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आकलन कक्षेत येत नाही ! सालं तुम्ही हसवता बाकी जबराट ! ओके. बहुत आभार. :-)

परिकथेतील राजकुमार Thu, 28/03/2013 - 11:09

In reply to by सतीश वाघमारे

प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आकलन कक्षेत येत नाही !

सहमत.
पण तरी आम्ही तुमची आकलनशक्ती वाढवायचा यथाशक्ती प्रयत्न करत राहूच.

सालं तुम्ही हसवता बाकी जबराट !

कसलं कसलं...

तुमच्या सारख्या चार विनोदी लेखकांचे लेखन वाचून, तसलेच काही बाही करण्याचा प्रयत्न करतो झाले. ह्या आमच्या यशाचे श्रेय खरेतर तुमचेच आहे सर. तुमच्या विनोदी लेखनानेच आम्हाला अजून जास्ती विनोदी प्रतिक्रिया देण्याची इच्छा निर्माण होते.

तुमचे आभार.

सतीश वाघमारे Thu, 28/03/2013 - 12:19

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा तुमचा प्रतिसाद कायम डाँ. आंबेडकरांनी सांगितलेल्या मोतीरामच्या गोष्टीची आठवण करुन देतो. त्यामुळे तुमच्या सकट तुमच्या प्रतिसादाला जान्देवची वाट !

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/03/2013 - 21:17

In reply to by 'न'वी बाजू

शोषण होत आहे हे समजलं नाही/मान्य नसेल तर त्याविरोधात काही होणं कठीण असेल. काही गुन्ह्यांबाबत 'जनहित याचिका' दाखल करता येत नाही, पीडीतच तक्रार करू शकतो असं काहीसं.

रंग Wed, 20/03/2013 - 20:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'आपल्याकडे कायदेशीररित्या हा व्यवसाय अस्तित्त्वातच नाही'
-- हाच तर मुद्दा आहे.
शोषण हा मुद्दा नैतिकच असायला हवा असं नाही. मुळात त्याची कारणं आर्थिकतेत आहेत.
बाँडेड लेबर च्या मुळाशी जसा आर्थिक प्रश्न आहे तसाच प्रकार ईथे असावा का यावर चर्चा केली पाहिजे.

नगरीनिरंजन Thu, 21/03/2013 - 08:09

In reply to by रंग

असे व्यवसाय कायदेशीर करावेत असे मलाही वाटायचे, पण आधीच कायदेशीर असलेल्या व्यवसायांमधले शोषण पाहिल्यावर माझे विचार बदलले.
मुळात कायदेशीर झाला व्यवसाय म्हणून लगेच या स्त्रिया "entrepreneur" होतील असे समजायचे कारण नाही. उलट कायदेशीर मालक येऊन वाढत्या कायदेशीर मागणीमुळे शोषणही कायदेशीर होईल. शिवाय नवीन भरती वेगात होईल ती वेगळीच.

रंग Fri, 22/03/2013 - 06:20

In reply to by नगरीनिरंजन

'आधीच कायदेशीर असलेल्या व्यवसायांमधले शोषण...'
-- याचं उत्तर देणं शक्य नाही कारण हे इतकं जेनेरिक आहे की सगळीकडेच लागु पडेल. It's anarchic...

अनरेग्युलेटेड बाजार व्यवस्थेत मागणी-पुरवठा यांच्या मुळाशी शोषण असतं. यावर रेग्युलेशन/कायद्याची चौकट वापरणे हा उपाय आहे.
याअर्थी, अ‍ॅडल्ट एंटरटेनमेंटचा कधी ना कधी तरी चा विचार करावाच लागेल.
अर्थात, यासाठी समाजाचा दृष्टीकोन/मानसिकता बदलावी लागेल आणि हे सगळं व्हायला कित्येक वर्षं जातील, कदाचित काही पिढ्या...
इतकं करुनही हे पुर्णपणे थांबेल का तर कदाचित नाही.
देशी-विदेशी दारु दुकानात मिळते तरी भट्ट्या लावतातच, आणि पिणारे लोक दोन्हीकडे पितातच.

मेघना भुस्कुटे Thu, 21/03/2013 - 13:55

In reply to by ...

गैरसमज नसावा. पण तुमच्यातल्या आधीच्या संभाषणांची माहिती इथे कुणाला नाही, त्यामुळे या प्रतिसादाचा संदर्भ कळत नाही. प्रश्न का विचारत नाही?

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 14:37

In reply to by ...

श्रावण मोडक यांचा प्रतिसाद तुम्हाला किती कळलाय हे तुमच्या स्वतंत्र प्रश्नातून लक्षात येईलच.तेव्हा तुम्हाला विनंती अशी की तुमचे प्रश्न स्वतंत्रपणे येऊ द्या. म्हणजे सविस्तर उत्तर देता येईल.

... Thu, 21/03/2013 - 14:43

In reply to by सतीश वाघमारे

सल्ल्याबद्दल धन्यवाद

ही कृती करताना तुमचे काय हितसंबंध गुंतले होते
त्या प्रोफेसरांना तिकडे घेऊन जाण हे तुमच्या सदसदविवेकबुध्दीला पटल का

आणि दिगंबरा दिगंबरा ऐवजी भीमराया वगैरे टोन असली असती तर तेवढीच गंमत वाटली असती का

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 15:33

In reply to by ...

जाई लेखाच्या सुरुवातीलाच माझी बैठकी बाबतची जिज्ञासा मी व्यक्त केली आहे. तिथे मी नाईलाजाने गेलेलो नव्हतो. आणि आवर्जून खास असं ठरवूनही नव्हतो.शैक्षणिक शोषणाचा एक भाग म्हणुन तिकडे जाणे भाग पडले. स्वतःला 'जस्टडायल सर्व्हिस' हे कौतुकाने नाही तर उपरोधाने म्हटलं आहे. हे लक्षात घेतलं तर माझी भूमिका तिथेच स्पष्ट होतेय. अर्थात तुमच्या सारख्या व्यक्तीने गावात न जाता गाव लिहिले पाहिजे ही अपेक्षा करणं मला अनपेक्षित वाटत नाही. नैतिकतेच्या/अनैतिकतेच्या कसोट्या या आपल्याकडे जात समाज आणि व्यक्तीनिहाय प्रचंड वेगळ्या आहेत. वेश्या समजून घेण्यासाठी वेश्येकडे जावेच लागते. पण तिथे गेला म्हणजे तिच्या बरोबर झोपूनच आला ? बडवा त्याच्या सद्सदविवेक बुद्धीला ! हेच कायम केलं जात. बैठकीतला नाच पाहणे, नाच पाहतानाचे असभ्य वर्तन आणि शेवटी प्रबळ प्राध्यापकाने झोपण्याची इच्छा व्यक्त करणं या तीन घटना आहेत. या तीन घटनेमधला माझा रोल, माझ्या सद्सदविवेक बुद्धीबद्दल शंका यावी (मला स्वतःला देखील)असा कसा ठरतो ? हे जरा सविस्तर सांगा.
जाई वाईट अजिबात वाटून घेऊ नका. तुमच्या वाचना विषयी मला जबरदस्त शंका यायला लागली आहे. तुम्ही दलित साहित्य वाचलंय का ? दिगंबरा दिगंबरा ही रिँगटोन कुणाचीही असू शकते हेच जर तुम्हाला मान्य नसेल तर धन्य आहे ! रिंगटोन संवेदनशिलता बोथट करु शकते हा नवाच शोध तुम्ही लावला आहे असं दिसतं. असो भिमरायाची रिंगटोन असती तर गंमत नाही , विलक्षण चीड आणि लाज वाटली असती जी दिगंबरा दिगंबरा ऎकूणही वाटलीच. मेसेज बाँक्स मधे गंमत वाटली ती तुमच्या प्रश्न विचारण्याची ! ती गंमत तुम्ही लेखातल्या अनुभवाला लागू करताय. वा ! असो.

श्रावण मोडक Thu, 21/03/2013 - 15:54

In reply to by सतीश वाघमारे

शैक्षणिक शोषणाचा एक भाग म्हणुन तिकडे जाणे भाग पडले.

शैक्षणिक शोषण म्हणजे नेमके काय? ते स्पष्ट केल्यानंतर, त्यातली तुमची हतबलता (किंवा असहाय्यता, किंवा अगतिकतादेखील) स्पष्ट झाल्यानंतर, जे झाले ते तुमचे शोषणच ठरले की, येथे सद्सद्विवेकाचा प्रश्न शिल्लक रहाणार नाही. त्यामुळे या लेखनाच्या संदर्भात तुमच्याविषयी निर्माण झालेले प्रश्नही निकालात निघतील.

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 16:05

In reply to by श्रावण मोडक

शैक्षणिक क्षेत्रातील शोषण हा भरपूर मोठा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. स्वतंत्र लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही टाकतो पण जरा वेळाने.

श्रावण मोडक Thu, 21/03/2013 - 16:29

In reply to by सतीश वाघमारे

स्वतंत्र लेख लिहाच. पण आधी प्रस्तुत लेखनाच्या अंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांसंदर्भात मी आपल्या प्रतिक्रियेची तुमचे लेखन समजून घेण्यास ती उपयुक्त ठरणार असल्याने वाट पाहतो.

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 17:24

In reply to by श्रावण मोडक

ठिक आहे. या घटनेशी निगडीत व्यक्तीँच्या भूमिका आणि त्यांचे व्यवहार सांगतो.
थोडीशी पार्श्वभूमी. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदाचे दर १५ ते २० लाखापर्यँत आहेत. कला शाखेच्या विषयात प्रचंड स्पर्धा आहे. पात्रताधारक उमेदवारांची संख्या भरपूर प्रमाणात वाढल्याने आणि सहाव्या वेतन आयोगाच्या आकर्षणामुळे तुंबळ स्पर्धा वाढलेली आहे. संस्थाचालक वर्तमानपत्रामधे प्राध्यापक हवे असण्याची जाहिरात दिल्यानंतर मुलाखतीच्या आधीच भक्कम रक्कम देण्याची क्षमता असलेला उमेदवार (भले शै.पात्रता पूर्ण नसली तरी) निवडून ठेवतात. पोस्टमन मँनेज करुन इतर उमेदवारांना मुलाखत पत्रे सुध्दा उशीरा हाती पडावीत याची काळजी घेतात. सुरुवातीला विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून स्वतंत्र मुलाखत पत्रे पाठवली जायची ती सोय आता बंद असल्याने संस्थाचालक मनमानी करु शकतात.
काही नामवंत प्राध्यापक मंडळी अधिसभा सदस्य असल्याने विद्यापीठातील शैक्षणिक, आरक्षण, बी.सी. यु.डी इ महत्त्वाच्या विभागातील वरिष्ठांशी 'नीट' परिचित असतात.
दाबजोर पैशावाले उमेदवार सहज निवडले जात असल्याने, उत्तम शै.पात्रता असणार्या परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्या सर्व जाती धर्मातील उमेदवारांना संधी पासून वंचित राहावे लागते. ही नामवंत मंडळी विद्यापीठातील विभागाकडून आवश्यक तपशील जसे की मुलाखत दिनांक, समिती सदस्यांची यादी इ. गोळा करतात. आणि एखाद्या गरीब उमेदवाराची शिफारस करणार्या प्राध्यापकाला देतात. प्राध्यापक उमेदवाराच्या बाजूने इतरांशी बोलून घेतात. आणि संस्थाचालकांना झुगारुन एखाद्या होतकरु हुशार गरीब उमेदवाराची निवड केली जाते. या बदल्यात त्या उमेदवाराची शिफारस करणार्या प्राध्यापकाला बरेच सोसावे लागते. पर्यायाने उमेदवारालाही सोसावे लागते. मटन मासे दारु घरपोच आणुन देण्यापासून मुलांची ढुंगणं धुवावी लागतात. संस्थाचालक गरीबांचे कधीच असत नाहीत. कर्मवीरांचा जमाना गेला. त्यामुळे या अधिकार्याँची आणि अतिवरिष्ठ प्राध्यापकांची मर्जी सांभाळावीच लागते. कारण या मर्जीच्या आड कुणाचं तरी आयुष्य उभं राहणार असतं.
या अनुभवापुरतं बोलायचं म्हटलं तर केवळ नाच पाहणे हा हेतु जाहिर करुन तिथे गेल्यानंतर झोपण्याची इच्छा व्यक्त केली गेली. ती जर आधीच केली असती तर मी आणि सुत्रधार प्राध्यापक महोदयांनीही निश्चितच नकार दिला असता. असो. अत्यंत बारीक तपशीलासह या विषयावर मी पुन्हा लिहिणार आहेच.

राजन बापट Thu, 21/03/2013 - 17:35

In reply to by सतीश वाघमारे

लेखकाचा प्रस्तुत प्रतिसाद म्हणजे व्यवस्थेवरचं उघडंनागडं, कसलंही अभिनिवेश नसलेलं रिपोर्टींग आहे असं मला वाटलं. व्यवस्था कशी manipulate केली जाते, ध्येयधोरणांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या संधी कशा भ्रष्ट आणि वशिल्याच्या तट्टांपर्यंत पोचवल्या जातात याचं हे एक जळजळीत उदाहरण आहे. एकंदर Trickle Down Effect मधली वैय्यर्थता जाणवते.

मी वाघमारे यांना या विषयांवर अधिकाधिक लिहावे असे आवाहन करतो. त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीबद्दल, तपशीलाबद्दल, त्यातल्या त्रुटींबद्दल मतमतांतरे शक्य आहेत हे गृहित धरूनही मी हेच म्हणतो.

श्रावण मोडक Thu, 21/03/2013 - 19:30

In reply to by सतीश वाघमारे

पार्श्वभूमीत माझ्यासाठी नवे काही नाही. त्याहीपलिकडच्या गोष्टी मलाही माहिती आहेतच (मागे तुम्हीच एक किस्सा लिहिला होता, तो आठवला). तरीही, लेखनाची संदर्भचौकट कळण्यासाठी ती लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्रस्तुत विषयाकडे जाऊ. हा विषय जिज्ञासा ते एकाची नोकरी व्हाया शैक्षणिक शोषण असा जाताना दिसतो. आणि त्यातून अंतिमतः जे विदारक चित्र मांडण्याचा प्रयत्न झाला आहे त्यात कोल्हाटी समाजातील स्त्रियांचे शोषण हा एक बिंदू आहे. उत्तम.

आता एकेक मुद्दा.
१. या प्रकरणात एक उमेदवार आहे. तुम्ही दिलेल्या पार्श्वभूमीचा विचार करता तो गरीब (अधिक पात्र) उमेदवार आहे, असे मानू.
२. एक प्रभावी प्राध्यापक आहेत, ज्यांनी एक मोट बांधून त्या गरीब उमेदवाराची निवड होईल अशी व्यवस्था केली.
३. निवड समितीचे सदस्य आहेत, ज्यांनी त्या प्रभावी प्राध्यापकांच्या प्रभावाखाली येत (तो पात्र असूनही) त्या उमेदवाराची निवड केली आहे.

प्रकरणाची सुरवात कुठून होते? त्या उमेदवाराच्या निवडीनंतर. निवड झाल्यानंतर (तरी) ही नाचगाण्याची सोय नाकारण्याची हिंमत प्रभावी प्राध्यापकांमध्ये नाही? हिंमत नसेल तर अशा माणसांना अशा सोयींसाठी काय म्हणतात हे मी सांगण्याची गरज नाही. इथे आपण प्राध्यापक या वर्गाविषयी (मार्क्सनं सांगितलेला वर्ग नव्हे, पण खरं तर तोच...) बोलतोय. त्या प्रभावी प्राध्यापकांनी काय केलं? तर यंत्रणा राबवली. त्यात एक प्राध्यापक (जे स्वतःवर 'जस्ट डायल' अशी टीका करून घेतात) आहेत, त्यांच्या परिचयातील एक पत्रकार (हे अधिकच भारी. पत्रकार? अलीकडं पुण्यात तरी अशी काही बातमी आल्याचं मला दिसलं नाही... त्यांच्यापेक्षा वाघमारे अधिक चांगलं काम करताहेत. ते निदान हे असं लिहितात तरी.) आहेत. ही मंडळी मिळून नाचगाण्याची सोय करतात. मग तिथं ते समितीसदस्य 'शॉट'ची सोय होते का ते पाहतात. मग 'जस्ट डायल' माणसाला शिसारी येते.

दोन प्राध्यापक, एक भावी प्राध्यापक, अधिक एक पत्रकार; आणि त्यांच्यासमोर निवड समिती सदस्य. निवड समिती वरचढ ठरतेय, कारण त्यांनी 'वाका' म्हटल्यावर 'रांगणारी' मंडळी आहेत इथं. 'निवडीच्या प्रक्रियेतील काही बाबी बाकी आहेत, आणि म्हणून आपण ती सोय केली', असा युक्तिवाद आता जरूर करावा; पण तो केल्यानंतर 'तुम्ही भडवेगिरी करून प्राध्यापक झाला आहेत', असे कोणी म्हटले तर त्याचा संताप करू नये. निवड समितीच्या या सदस्यांना पकडून देता येत नव्हतं? होतं. दोन प्राध्यापक अधिक एक भावी प्राध्यापक आणि एक पत्रकार ही ताकद एकवटली कशासाठी? तर नाचगाण्याची सोय करण्यासाठी. तीच ताकद एकवटून त्या समितीला उघड्यावर आणलं असतं तर आजच्या या लेखनातील शिसारी अभिव्यक्त होण्याला एक मूल्य प्राप्त झालं असतं.

समितीला उघड्यावर आणण्याचे काम का झाले नाही? तर, "त्या उमेदवाराची शिफारस करणार्या प्राध्यापकाला बरेच सोसावे लागते. पर्यायाने उमेदवारालाही सोसावे लागते. मटन मासे दारु घरपोच आणुन देण्यापासून मुलांची ढुंगणं धुवावी लागतात. संस्थाचालक गरीबांचे कधीच असत नाहीत. कर्मवीरांचा जमाना गेला. त्यामुळे या अधिकार्याँची आणि अतिवरिष्ठ प्राध्यापकांची मर्जी सांभाळावीच लागते. कारण या मर्जीच्या आड कुणाचं तरी आयुष्य उभं राहणार असतं." आयुष्य उभं राहतंय हे महत्त्वाचं आहे ना? मग, शिसारीचा दांभीकपणा कशासाठी? आयुष्य उभं करण्याची ती 'किंमत' आहे. पुन्हा एकदा हे स्पष्ट करतो की समितीला उघडं पाडण्याची जबाबदारी कोणा एकाची(च) आहे असे मी मानत नाहीये. इथं दोन प्राध्यापक, एक भावी प्राध्यापक आणि एक पत्रकार आहेत, त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे. आयुष्य 'उभं' राहणं हे साध्य असेल तर साधनाची चिंता कशासाठी? आणि साधन महत्त्वाचं असेल, त्यासंदर्भात भूमिका घ्यायची असेल तर साध्य तपासून घेतले पाहिजे.

वाघमारे यांनी लिहिलं की, "जाई लेखाच्या सुरुवातीलाच माझी बैठकी बाबतची जिज्ञासा मी व्यक्त केली आहे. तिथे मी नाईलाजाने गेलेलो नव्हतो. आणि आवर्जून खास असं ठरवूनही नव्हतो.शैक्षणिक शोषणाचा एक भाग म्हणुन तिकडे जाणे भाग पडले." म्हणजे, त्या स्त्रियांच्या शोषणाच्या व्यवस्थेत भाग घेण्यासाठी (यालाच हात धुवून घेणे असेही म्हणतात) त्याला जिज्ञासेची जोड द्यायची, आणि मग जिज्ञासेची ही पूर्तता शैक्षणिक शोषणातून झाली असे म्हणायचे, असा हा प्रकार आहे. नाईलाज नाहीही पण शोषण आहेही, हे कसे काय असू शकते? आपल्याच भूमिकेतील हा अंतर्विरोध वाघमारे यांच्या लक्षात येत नाही, असे म्हणायचे का?

सामाजिक कृपणतेविषयीच्या जिज्ञासेपोटी गोष्टी होतात तेव्हा त्यातून इतर काही साध्य केले जात नसते, इतके भान दोन प्राध्यापक आणि एक भावी प्राध्यापक यांना नसेल तर... माझं बोलणं खुंटलं आहे. आणि अशा लेखनाच्या आरत्या ओवाळणाऱ्यांनी समाजाच्या, देशाच्या वगैरे भवितव्याची वृथा चिंता करणे सोडून द्यावे. कारण हे सारे नक्राश्रू आहेत.
समिती सदस्यांबाबतच लेखनात टीकेचा सूर आहे, हा दांभीकपणा आहे, इतकेच.

वाघमारे यांची या लेखनातून अभिव्यक्त झालेली शिसारी म्हणजे हुकमी टीआरपीचा भाग ठरते आहे. शिसारी अगदी प्रामाणिकपणे आली असेल, हे मात्र मी गृहित धरले आहे. त्यामुळे शिसारी येण्याची कारणपरंपरा कमी महत्त्वाची ठरवण्याचाही प्रश्न नाही. पण शिसारी ज्या रीतीने व्यक्त झाली तो मात्र टीआरपीचा प्रकार ठरतो. वाघमारे यांची शिसारी हा टीआरपीचा खेळ आहे हे प्रस्तुत लेखनाविषयी ज्या रीतीने आरत्या ओवाळल्या जात आहेत, त्यातूनही दिसते. प्रसार माध्यमच अखेर हेही एक.

सतीश वाघमारे Sat, 23/03/2013 - 21:25

In reply to by श्रावण मोडक

मोडक साहेब दोन दिवस चिक्कार व्यस्त असल्यामुळे प्रतिक्रियेस प्रतिउत्तर द्यायला जरा उशीरच झाला. आणि मौनाचे अर्थ विचारण्याची वेळ आपल्यावर आली. आपण लावलेल्या माझ्या दोन दिवशीय मौनाच्या अर्थाने जर आनंदी झाला असाल तर मौनास धन्यवाद ! आणि जर दुःखी झाला असाल, मानसिक यातना झाल्या असतील तर मौनास तात्काळ मौनमय शिवी ! असो.
मोडक पार्श्वभूमीत तुमच्यासाठी नवे काहीच नाही हे छान ! तुम्हाला त्याही पलिकडच्या गोष्टी माहित आहेत. हे तर अत्यंत छान ! (इथे मी मोगँम्बो खुश हुवा च्या धर्तीवर हसून देखील घेतलंय) :-) तुम्ही तीन मुद्दे मांडलेत . पहिल्या मुद्यात तुम्ही असं असं मानू तर तसं तसं मानण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण काल्पनिक टचाचं लेखन मी करत नाही. दुसर्या मुद्याला काहीच उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही. कारण तुम्ही मुद्यात मांडलेल्या गोष्टीँ पलिकडच्याही गोष्टी माहित असणार्यातले आहात. असो.
तिसर्या भरपूर लंब्या चौड्या मुद्यांमधे तुम्ही घेतलेले आक्षेप
१) माझ्या तिथे जाण्यामागील भूमिकेतला अंतर्विरोध.
२) प्राध्यापक त्रयी आणि पत्रकार यांनी निवड समिती सदस्याला उघडे पाडायला पाहिजे होते.
३) समिती सदस्या बाबतच टिका हा दांभिकपणा.
४) शिसारीचं मुल्य आणि टी.आर. पी
मोडक समजा मी किँवा इतर कुणी लावण्या पाह्यला समिती सदस्यांना घेऊन बालगंधर्वला गेलो असतो जिथे नादच खुळा, चैत्रालीचा नाद करायचा नाय, नटरंगी नार या नावाचे कार्यक्रम होतात. छाया, माया खुटेगावकर, सुरेखा पुणेकर किँवा चैत्राली यांच्या जाती आपण जाणत असालच . (त्यांचा नाच पाह्यला छोटी, बडी, नैतिक, अनैतिक, ननैतिक बरीचशी मंडळी दोन दोन हजाराची तिकीटं काढून, बरीचशी दारु पिवून बसलेली असतात.) आणि तिथून पुढे शाँटच्या इच्छा पुर्ती करीता व्हाया बालगंधर्व ते बुधवारपेठ हा सदस्यासोबतचा प्रवास नाकारुन थेट घरी निघून आलो असतो तर काय प्रतिक्रिया असत्या ? याची गंमत वाटते. स्थळ परत्वे नैतिकतेची व्याख्या बदलते. माझ्यामते दांभिकपणा हा आहे
माझ्या भूमिकेतला अंतर्विरोध : तुम्ही मानसिक गोँधळलेपणा मान्य करताय का ? नसाल करत तर मग अवघड आहे. त्या ठिकाणी जाण्याकरीता आवश्यक पुरक पैसे मी सहज कमवत असल्याने , कुठल्यातरी बहाण्याने तिथे जाण्याची आणि शोषणात हात धुवून घेण्याची मला गरज नाही. बैठकी बाबतचं कुतूहल मी स्पष्टपणे व्यक्त केलेलंच आहे. त्या कुतूहलाची खाज ज्या पद्धतीने मिटली त्यात तुम्हाला शैक्षणिक शोषण आढळत नाही याचं भला आश्चर्य वाटतं. तो घटनेकडे बघण्यातल्या दृष्टीकोनाचा फरक आहे.
समिती सदस्यांवरच टिका : संपूर्ण बैठकीमधे आक्षेपार्ह वर्तन फक्त त्यांचच होतं. केवळ इतरांची उपस्थिती आणि तिथे घेऊन जाण्याची कृती हे समिती सदस्यांच्या तुलनेत किती मोठ्या प्रमाणातला गुन्हा आहे ? बालगंधर्वला इतर उपस्थितीत मेँबर गुन्हेगार ठरले असते काय ? स्थळ परत्वे बदलणार्या नैतिकतेच्या व्याख्येत ?
स्वतःला आयी मायी वरुन शिव्या देत मुतायच्या बहाण्याने बाहेर आलेला प्राध्यापक त्याला आलेली शिसारी ज्या नैतिकतेच्या कसोटीवर दांभिकतेची ठरवली जाते ती कसोटीच मला दांभिक वाटते. जिथे भिमरायाची रिंगटोन असती तर काय ? तसेच बालगंधर्व असते तर काय ? ही पांढरपेशी बुळाट नैतिकता मी स्पष्टपणे नाकारतो.
तुमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा !
दोन प्राध्यापक एक भावी प्राध्यापक आणि पत्रकार या चौकडीने ताकद एकवटून समिती सदस्याला उघडे पाडायला हवे होते. जे न केल्यामुळे सदर प्राध्यापकास , 'भडवेगिरी ' करुन प्राध्यापक झाला म्हटल्यास राग येऊ नये.वगैरे वगैरे
मोडकसाहेब तुमची मागणी अत्यंत रास्त आहे. तुमचा संताप देखील मी समजू शकतो. पण तुमचा गोँधळ रिंगणा बाहेरच्या माणसा सारखा झालाय. रिँगणाबाहेरुन रिंगणातल्याला असा लढं अन् तसा लढ या टाईपचा तुमचा सल्ला इथे ठरतो. चळवळीत काम करताना, व्यवस्थेत राहून व्यवस्थेविरुध्द लढताना , बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल हा पवित्रा कायमच पुरक पोषक ठरत नाही. आर्थिक कणा मोडून लढा यशस्वी होत नाही. लेट देम डू मिस्टेक्स ! या न्यायाचं प्रभावी शस्त्र निश्चित उपयोगी पडतेच पडते. तरीही, 'भडवेगिरी प्राध्यापक' ही शब्द योजना, तुमची तत्व, वैचारिकता, नैतिकता याला अत्यंत साजेशी आहे. म्हणुनच मला मान्य नसली तरी माझा आक्षेपही नाही. तर तेही एक असो.
याच न्यायाने मलाही एक प्रश्न पडतो आहे. तुम्ही सुरुवातीलाच प्रबळ आत्मविश्वासाने सांगितलेले आहेच की तुम्हाला त्याही पलिकडच्या गोष्टी माहित आहेत. आता मला सांगा तुम्हाला माहित असलेल्या या, 'त्याही पलिकडच्या' माहितीचं तुम्ही काय करता ? जर काहीच करत नसाल तर तुम्हालाही , 'गांडू माहितगार' किंवा षंढ माहितगार म्हटल्यास अजिबात राग येऊ नये. असो.
मोडक साहेब तुमचा शेवटचा मुद्दा
टी. आर. पी वगैरे फेसबुक काय किँवा हे संस्थळ काय इथल्या टी. आर. पी वर मी फार खुश होणार्यातला नक्कीच नाही. आणि दुःखी होणार्यातला तर अजिबातच नाही. आभासी जगाच्या बाहेर वास्तवात मला टी. आर. पी. मिळतो. फेसबुक वर माझी प्रोफाईल आहे पत्ता आहे. कधीही भेट द्या वास्तवातले काम आणि टी. आर. पी चे मुबलक पुरावे देइन.
तुमच्या मुद्यांच्या अनुषंगानेच इथल्या चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा
वारंवार विचारला जाणारा प्रश्न कृती काय, कृती काय ? निव्वळ लेखन वंध्या संभोग ठरत असेल तर निव्वळ वाचनाने वंश वेल वाढते काय ? लेखकाचे नुसतेच लेखन गांडू नैतिकतेत जमा असेल तर वाचकाचे नुस्तेच वाचन देखील गांडू नैतिकतेतच जमा होते. धन्यवाद !

श्रावण मोडक Sat, 23/03/2013 - 21:53

In reply to by सतीश वाघमारे

धन्यवाद. तुम्हाला समजून घेण्यासाठी हा आणि आधीचा प्रतिसाद अत्यंत उपयुक्त आहे. समजून घेणे ही प्रक्रिया याहीपुढे चालू राहील.

सतीश वाघमारे Sat, 23/03/2013 - 22:34

In reply to by श्रावण मोडक

आपल्या प्रक्रियेचं मनःपूर्वक स्वागतच असेल. पण प्रक्रियेतील माझा सहभाग हा आपल्या आग्रहावर नसून माझ्या उपलब्ध वेळेवर राहील याची मात्र नोँद घ्यावी.

... Thu, 21/03/2013 - 16:00

In reply to by सतीश वाघमारे

लेखाच्या सुरुवातीलाच माझी बैठकी बाबतची जिज्ञासा मी व्यक्त केली आहे. तिथे मी नाईलाजाने गेलेलो नव्हतो. आणि आवर्जून खास असं ठरवूनही नव्हतो.शैक्षणिक शोषणाचा एक भाग म्हणुन तिकडे जाणे भाग पडले. स्वतःला 'जस्टडायल सर्व्हिस' हे कौतुकाने नाही तर उपरोधाने म्हटलं आहे. हे लक्षात घेतलं तर माझी भूमिका तिथेच स्पष्ट होतेय. अर्थात तुमच्या सारख्या व्यक्तीने गावात न जाता गाव लिहिले पाहिजे ही अपेक्षा करणं मला अनपेक्षित वाटत नाही. नैतिकतेच्या/अनैतिकतेच्या कसोट्या या आपल्याकडे जात समाज आणि व्यक्तीनिहाय प्रचंड वेगळ्या आहेत

ओके

वेश्या समजून घेण्यासाठी वेश्येकडे जावेच लागते

अरे वा, माहितीबद्दल धनयवाद

जाई वाईट अजिबात वाटून घेऊ नका. तुमच्या वाचना विषयी मला जबरदस्त शंका यायला लागली आहे. तुम्ही दलित साहित्य वाचलंय का ? दिगंबरा दिगंबरा ही रिँगटोन कुणाचीही असू शकते हेच जर तुम्हाला मान्य नसेल तर धन्य आहे ! रिंगटोन संवेदनशिलता बोथट करु शकते हा नवाच शोध तुम्ही लावला आहे असं दिसतं. असो भिमरायाची रिंगटोन असती तर गंमत नाही , विलक्षण चीड आणि लाज वाटली असती जी दिगंबरा दिगंबरा ऎकूणही वाटलीच. मेसेज बाँक्स मधे गंमत वाटली ती तुमच्या प्रश्न विचारण्याची ! ती गंमत तुम्ही लेखातल्या अनुभवाला लागू करताय. वा ! असो.

गंमतीच काय हो, तुम्हाला काय गंमत वाटेल हे मी थोडीच ठरवू शकते, हेच घ्याना तो प्रोफेसर चिप्तपावान होता याचीही तुम्हाला गंमत वाटली होतीच.

नै नै, मला वाईट नाही वाटल. आणि माझ्या वाचनाची तुम्ही काळजी करु नये.तुमच्या सर्टीफिकेटची मला गरज नाही.तुम्ही किती पा़ण्यत आहात हे इथे दिअसत आहेच. तुम्हालाच काय ते समाज्सुधारणेतले कळते. तेव्हा

असो तुमच्याकडून वेगळ्या प्रतिसादची अपेक्षा नव्हतीच. आणि तुमची आयडेंटीटीही आता कळाली आहे. तेव्हा प्रश्नोत्तरांची गरज मला वाटत नाही. तुमचे चालू दे.

आणि यापुढे तुमचाशी संवाद साधावा असे मला वाटत नाही. धन्यवाद

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 16:14

In reply to by ...

मंडळ आभारी आहे. धन्यवाद !!! :-)

'न'वी बाजू Thu, 21/03/2013 - 16:53

In reply to by सतीश वाघमारे

वेश्या समजून घेण्यासाठी वेश्येकडे जावेच लागते.

१. कशासाठी? वेश्येकडे जाऊन येऊन तो अनुभव सगळ्यांना सांगणारे भेटतातच की. तेवढे पुरते आम्हांस. स्वतः अनुभव काय करायचाय?

तो येशू ख्रिस्त नाही का, सगळ्या जगाची पापे डोक्यावर घेण्यासाठी जन्माला आला? दुसरा कोणीतरी आपल्यासाठी भार डोक्यावर घेत असेल, तर तो भार आपण कशासाठी वाहायचा? तसेच काहीसे. (शिवाय, सगळ्यांच्या वतीने येशूस खिळे ठोकण्याची सोय आहेच. प्रत्येकाने खिळे कशासाठी ठोकून घ्यायचे?)

(येशूचे एक होते मात्र, तो पापे स्वतः (बहुधा) करत नसावा - कोणी पाहिलेय? - पण इतरांनी केलेली डोक्यावर मात्र घ्यायचा. इथे स्वतःच सगळ्यांच्या वतीने पापे करायला तयार झालेला येशू (बकरा) भेटला आहे, तर ते कष्ट स्वतः कोणी काय म्हणून घ्यावेत?)

किंवा, त्या वाल्या कोळ्याचे नाही का, त्याच्या पापातून मिळालेली फळे चाखायला आख्खे कुटुंब तयार. पण पाप तो स्वतः होऊन करायला तयार झालेला असताना त्याच्या पापाचा वाटा कोण कशासाठी घेईल?

२. ('वेश्या समजून घेण्यासाठी वेश्येकडे जावेच लागते.' हे विधान) कदाचित बरोबर असेलही. (मी वेश्येकडे गेलेलोही नाही, नि वेश्या समजून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही, त्यामुळे मला निश्चित कल्पना नाही. पण ते एक असो.) पण हे विधान पुरुषी दृष्टिकोनातून आहे.

समजा, एखाद्या स्त्रीस वेश्या (म्हणजे काय चीज असते, ते) समजून घेण्याची (फॉर व्हॉटेवर रीझन) इच्छा असेल, तर तिला नेमके काय करावे लागेल?

बॅटमॅन Thu, 21/03/2013 - 17:09

In reply to by 'न'वी बाजू

समजा, एखाद्या स्त्रीस वेश्या (म्हणजे काय चीज असते, ते) समजून घेण्याची (फॉर व्हॉटेवर रीझन) इच्छा असेल, तर तिला नेमके काय करावे लागेल?

वेश्येकडे जाऊन संभोग न करता संभाषण हे शक्य आहेच की. वेश्येकडे जाणे याचा अर्थ असाही घेतला जाऊ शकतो. अर्थात तो या संदर्भात अभिप्रेत होता किंवा कसे हा एक वेगळा मुद्दा झाला.

'न'वी बाजू Thu, 21/03/2013 - 17:15

In reply to by बॅटमॅन

तत्त्वतः शक्य असावे. पण मुद्दा तो नाही.

मूळ लेखकाचा मुद्दा बहुधा 'गमन' असा नसून 'स्वानुभव / अनुभवग्रहण' असा काहीसा वाटला, म्हणून हा प्रपंच.

ऋषिकेश Thu, 21/03/2013 - 17:16

In reply to by 'न'वी बाजू

अतिअवांतरः
पुरूषही वैश्या असतात की! आणि काही लेखिका त्यांना समजून घ्यायला त्यांना भेटतातही (आणि त्यावर लिहितातही). असो.
पुरुष वैश्या झाल्यावर त्यांना वैश्य थोडेच म्हणतात?

शिवाय स्त्रीने/पुरूषाने वैश्यागमन करताना विरूद्धलिंगी वैश्येकडेच जावे हा हट्ट का?

ऋषिकेश Thu, 21/03/2013 - 18:26

In reply to by 'न'वी बाजू

पण हे विधान पुरुषी दृष्टिकोनातून आहे.
समजा, एखाद्या स्त्रीस वेश्या (म्हणजे काय चीज असते, ते) समजून घेण्याची (फॉर व्हॉटेवर रीझन) इच्छा असेल, तर तिला नेमके काय करावे लागेल?

हे विधान/समज/गैरसमज अश्या वैचारिक हट्टातून आले आहे असे मला वाटते. :)

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 17:32

In reply to by 'न'वी बाजू

(वेश्येकडे जाऊन येऊन तो अनुभव सगळ्यांना सांगणारे भेटतातच की. तेवढे पुरते आम्हांस. स्वतः अनुभव काय करायचाय?) सगळे मुद्दे इथे संपले !!!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/03/2013 - 19:54

In reply to by 'न'वी बाजू

('वेश्या समजून घेण्यासाठी वेश्येकडे जावेच लागते.' हे विधान) कदाचित बरोबर असेलही. (मी वेश्येकडे गेलेलोही नाही, नि वेश्या समजून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही, त्यामुळे मला निश्चित कल्पना नाही. पण ते एक असो.) पण हे विधान पुरुषी दृष्टिकोनातून आहे.

समजा, एखाद्या स्त्रीस वेश्या (म्हणजे काय चीज असते, ते) समजून घेण्याची (फॉर व्हॉटेवर रीझन) इच्छा असेल, तर तिला नेमके काय करावे लागेल?

लाहोरमधल्या वेश्यावस्तीमधे नियमितपणे दिवसा आणि रात्री जाऊन, तिथल्या स्त्रियांशी, मुलांशी बोलून त्यांचं आयुष्य, त्यांची नैतिकता, त्यांचे प्रश्न, आयुष्य यांच्यावर 'टॅबू' नावाचं एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. पुस्तकाची लेखिका आहे फौजिया सईद नावाच्या एका कार्यकर्ती आणि स्कॉलर. या पुस्तकात आलेल्या बहुसंख्य स्त्रिया नाचगाणं करतात, आणि एखाद्या ऐपतदार मनुष्याची रखेली म्हणून आयुष्य जगतात, त्याच वेश्यावस्तीत. पुस्तकाबद्दल अधिक लिहीत नाही, ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. (मराठी अनुवाद उपलब्ध आहे.) मुख्य मुद्दा असा की अनेक ठिकाणी फौजिया असा उल्लेख करतात की या स्त्रियांकडे आधी अनेकदा जाऊन त्यांचा विश्वास संपादन करावा लागला त्याशिवाय त्यांच्या आयुष्याची माहिती मिळणं अशक्य होतं. फौजिया यांनी प्रत्यक्षात वेश्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले त्याचा उल्लेख पुस्तकात नाही. पण गूगल करून काही माहिती मिळू शकेल.

मन Thu, 21/03/2013 - 22:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फौजिया यांनी प्रत्यक्षात वेश्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले त्याचा उल्लेख पुस्तकात नाही. पण गूगल करून काही माहिती मिळू शकेल.
फौजिया ह्यांनी ते प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे का? का आहे? समाज, सरकार अशी एक पूर्ण व्यवस्था मान्य केल्यावर नक्की कोणत्या घटकाची ती जिम्मेदारी आहे? फौजिया नक्की कुणाकुणाला पुर्‍या पडणार आहेत?
मुळात "तिथून बाहेर यावं" असं तिथल्या सर्वच स्त्रियांना वाटतं का?
बाहेर आल्यावर त्यांच्याकडे काय पर्याय आहेत?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/03/2013 - 01:14

In reply to by मन

फौजिया यांनी असं पुस्तक लिहून प्रकाशित करण्याआधी तिथल्या स्त्रियांचं म्हणणं काय किंवा त्या ही आपल्यासारख्याच व्यक्ती आहेत हे कुठे आणि किती वेळा प्रसिद्ध झालेलं होतं माहित नाही. तरीही "अजून एकदा" असं काही लिहीण्यात काहीही अडचण दिसत नाही. कारण फौजिया यांचं लिखाण प्रकाशित होईपर्यंत परिस्थिती बदललेली नव्हतीच. मग असं लिखाण का आवश्यक आहे?

लाहोरची ही गाणं-बजावणं करणार्‍यांची वस्ती म्हणजे समाजाला लागलेली कीड असं एकीकडे लोक म्हणतात, किंवा म्हणायचे. दुसर्‍या बाजूने याच समाजातले काही पुरुष त्या वस्तीत जाऊन आनंद विकत घेतात. एकीकडे नैतिकतेच्या, मूल्यांच्या गप्पा हाणायच्या आणि दुसर्‍या बाजूने आपणही नायकिणीकडे जायचं, वेश्यागमन करायचं हा दुटप्पीपणा समोर येतो. (गाणं-बजावणं आणि देहविक्रय असे दोन वेगवेगळे व्यवसाय आहेत, नायकीणी वेश्या म्हणून काम करत असतीलच असं नाही असे उल्लेख टॅबूमधेही आहेत आणि अलिकडेच अन्यत्र एका चर्चेतही वाचनात आलं. पण आपण मध्यमवर्गीय सहसा या दोन्हींचा समावेश एकाच गटात करतो.) 'टॅबू'मधे अशा दुटप्पी वर्तनाची तक्रार अनेकींनी मांडलेली आहे.

वेश्यांकडे बघण्याचा मध्यमवर्गीय दृष्टीकोन काही प्रमाणात मवाळ होताना दिसतो. सुशिक्षित, मध्यमवर्गीय वेश्यांना वाईट न मानता, फक्त वेश्यागमन करणारे वाईट आणि वेश्या फक्त पीडीत, शोषित आहेत असं मानणारा गटही दिसतो. या नायकिणी आणि वेश्यांचीही काही मूल्यव्यवस्था आहे. आपल्या मध्यमवर्गीय, पांढरपेशा मूल्यांपेक्षा ही मूल्य निराळी आहेत. त्यांच्या व्यवस्थेनुसार त्या वस्तीतल्या अनेक स्त्रिया मुक्त आहेत किंवा मुक्त होण्याचा प्रयत्न करणार्‍या आहेत. मुक्ती कशापासून, कोणापासून हा एक मुख्य प्रश्न इथे समोर येतो. वेश्याव्यवसाय हा ही एक व्यवसाय आहे, कोणी बुद्धी विकतं, कोणी कौशल्य विकतं, कोणी शरीर. या स्त्रियांचा आपल्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन अशा प्रकारचा आहे. पण बुर्झ्वा मूल्यांनुसार या स्त्रिया प्रवाहपतित, शोषित, पीडीत आहेत. फौजिया आणि तिच्यासारखेच असणारे आपण पांढरपेशे लोक यांनी या स्त्रियांचं मूल्यमापन आपल्या स्वतःच्या मोजपट्टीनुसार करू नये. (या स्त्रियांनी नेहेमीच, इच्छेविरोधात तिथे नाच-गाणं अथवा शरीरविक्रय करावा असं अजिबात नाही. पण या व्यवसायात असणार्‍या व्यक्तींना आपण आपल्या फुटपट्टीनुसार जोखू नये.)

या स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांनी फौजिया यांना विचारलेले अडचणीत आणणारे प्रश्न, त्यातून त्यांना असणारी स्वतःच्या क्षुद्र अस्तित्त्वाची जाणीव, त्यामुळे त्यांची होणारी चिडचीड, या सगळ्या गोष्टी पुस्तकात समर्थपणे आलेल्या आहेत.

---

फौजियांनी या बाजारात रोज जाऊन, काही वर्ष याच पुस्तकासाठी खर्च केली. त्यांची कुवत लिखाणाची आहे, त्यांचा पिंड राजकारण्याचा नाही, उद्योजकाचाही नाही. त्यातून त्यांना जे जमलं ते त्यांनी केलं, लिखाण. फौजिया आज पाकीस्तानात National Commission on the Status of Women च्या पंधरापैकी एक सदस्या आहेत.

मोठ्या अधिकारावर असणारी बाईसुद्धा कोणालाच पुरी पडू शकत नाही. पण निदान धोरणं ठरवणार्‍या लोकांमधे कोणीतरी एक व्यक्ती अशी असेल की ज्यांच्याबाबत धोरणं ठरवली जातात, त्यांची मतं तिला माहित आहेत.

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 14:46

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघना जाई माझ्या फेसबुक वाँल वरील याच लेखा संदर्भात मेसेज मधुन प्रश्न विचारत होत्या. मी त्यांना जाहिरपणे विचारण्याची विनंती केली आणि मेसेज मधला संवाद टाळला.

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 17:56

In reply to by ...

माझा स्टँण्ड तुम्हाला कधीच कळणार नाही. फार वाईट वाटून घेऊ नका चलता है. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जमल्या पाहिजेत असा कुठे कायदा आहे काय ?:-)

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 18:00

In reply to by ...

माझा स्टँण्ड तुम्हाला कधीच कळणार नाही. फार वाईट वाटून घेऊ नका चलता है. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जमल्या पाहिजेत असा कुठे कायदा आहे काय ?:-)

अनामिक Wed, 20/03/2013 - 01:46

वर श्रामो म्हणतात त्याचप्रमाणे हे प्राध्यापकांच्या जागी कुणीही असलं तरी खुपलंच असतं. ह्या प्रकारातून बायकांच होणारं शोषण कधी थांबेल कुणास ठाऊक. पण हा प्रकार थांबण्याकरता वैय्यक्तिक पातळीवर वाघमारे (किंवा अजून कोणीही असो)एक करू शकले असते, ते म्हणजे ह्या जागी न जाणे. ते तिथे उपस्थीत राहिल्याने ह्या प्रकाराला त्यांनी मुक संमती दिली असे म्हणता येणार नाही का?

ॲमी Wed, 20/03/2013 - 07:30

In reply to by अनामिक

+१
सहमत आहे.
पण मग मी हाच क्रायटेरीआ स्वतःला अप्लाय करुन पाहीला. म्हणजे डान्सबार किँवा बैठकच्या बाबतीत नाही. पण इतर सो कॉल्ड लहानसहान बाबतीत.
उदा. पालक बालकांना गुरासारखे मारत असतील तर मी काय केलय? आणि मग वाघमारेंना बोलण्याचा मला काय हक्क?
एनीवे, समजणार्या भाषेत लिहील्यास, वाघमारेँचे लेख डिप्रेसिँग असतात. लिहीत रहा.

... Wed, 20/03/2013 - 07:39

In reply to by ॲमी

अस्मिता
एखादी गोष्ट चुकीची आहे हे तुला कळतय पटतय
तू ती गोष्ट रोखायला हतबल आहेस
पण त्याचवेळी त्या गोष्टीची तीव्रता आपल्यामुळे वाढू नये हे तुझ्या हातात असतच
अशावेळी तुझी विवेकबुध्दी काय निर्णय घेते हे महत्वाच
वाईट गोष्टीना समर्थन करुण वर त्याची कारण देण हा शुध्द दांभिकपणा आहे
आय होप यू आर गेटिँग मी
अनामिक यांनी विचारलेला प्रश्न चुकीचा आहे असे मला तरी वाटत नाही

ॲमी Wed, 20/03/2013 - 08:01

In reply to by ...

'अनामिक यांचा प्रश्न चुकीचा नाही' हे मान्यच आहे. म्हणुनच तर मी त्यांना +१ दिलय.
त्यापुढे मी फक्त माझं कंफ्युजन आणि हतबलता लिहीलीय.

'वाईट गोष्टीना समर्थन करुण वर त्याची कारण देण हा शुध्द दांभिकपणा आहे' असं वाघमारेँनी केलय असं मला तरी वाटलं नाही..

... Wed, 20/03/2013 - 08:10

In reply to by ॲमी

तुला तसे वाटत नसेल तर मग राहू दे
ज्याची त्याची विचारशक्ती
पण परत एकदा नीटच विचार कर ही रिक्वेस्ट

नगरीनिरंजन Wed, 20/03/2013 - 08:05

In reply to by अनामिक

अशा एक एक अन्यायात सामील व्हायला नकार देत गेलं तर खरोखरच एक दिवस सिव्हिलायझेशन नष्ट होईल.
(सुस्कारा) असो.

अनुभव वाचून मला धक्का बसला नाही आश्चर्यही वाटले नाही. याआधी सरकारी अधिकार्‍यांची डान्सबारपार्टी, प्राथमिक शिक्षकांच्या सभेतला गदारोळ वगैरे बातम्या वाचल्याने नक्की काय चालते त्याची चांगलीच कल्पना प्रत्येकाला असते असे वाटते. साध्या बसकंडक्टरच्या नोकरीसाठी लाख-दोन लाख मोजावे लागतात. प्राध्यापकाचा पगार तर कितीतरी जास्त असतो. प्राध्यापकच काय विद्यार्थीही अशा ठिकाणी जाऊन-येऊन असतात हे फार पूर्वीपासून माहित आहे.

निव्वळ काहीतरी (भेदक) अनुभव सांगतोय असा अविर्भाव सोडून एखादी परिणामकारक गोष्ट लिहीली असती तर बरे झाले असते असे मात्र वाटले. लेखकात तशी क्षमता असावी असे वाटते.

'न'वी बाजू Wed, 20/03/2013 - 08:17

In reply to by नगरीनिरंजन

...झग्यातून लाल आवरणास हात (शब्दरचना अंमळ चुकली असेल, हं! तसेही, म्हणजे काय कोण जाणे.) घालत आहात, असे आपणांस वाटत नाही काय?

'न'वी बाजू Wed, 20/03/2013 - 08:46

In reply to by सहज

आमच्या लहानपणीची (बोले तो, बाबा आदमच्या जमान्यातली, नि बाबासाहेब भोसल्यांच्या जमान्याच्या किंचितच अगोदरची) गोष्ट आहे. तेव्हा एक सद्गृहस्थ मुख्यमंत्री होते. एके रात्री हरून अल-रशीदच्या भूमिकेत लाल बत्ती विभागाची 'पाहणी' करायला गेले. अन् दुसर्‍या दिवशी गावभर गवगवा केला, की 'तेथे जे काही पाहिले, त्याने धक्का बसला', म्हणून... हो हो, पेपरात छापून आले होते तसे!

सहज Thu, 21/03/2013 - 18:44

In reply to by सतीश वाघमारे

प्रश्न सगळ्यांनी सगळ्यांनाच विचारावेत.

जस्ट डायल
१) एखादा मनुष्य नेहमी पुढे पुढे करतो मला अमके माहीत आहे, आपली अमकी ओळख आहे, आपला इकडे पण वट आहे. मग लोकांना वाटते की चला विचारुया यांना, याला माहीत असेल.
१.१) एखादा मनुष्य असतो जेव्हा एखादे महत्वाचे काम अडते तेव्हा ही व्यक्ती पुढे होउन ते काम पूर्ण करते. लोकांचे त्या व्यक्तीबद्दल मत चांगले होते. पुढे काही अशीच अवघड समस्या आली की त्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले जाते. ही व्यक्ती जितकी ज्ञानी व नम्र तितकी जस्ट डायल ऐवजी, ओन्ली इन क्रायसीस डायल असते.
जितके या माहीतगार व्यक्तीचे आचरण, वागणे बोलणे सभ्य तितके ह्या व्यक्तीचे चांगल्या कामामधे मार्गदर्शन घेतले जाते. वाईट गोष्टीत नाही. इथे थोडे नेमाडे + मनाचे श्लोक +आदर + सभ्यता+परंपरा आठवतात.

मदतः

जर एखाद्याचा हेतू कळला व तो हेतू चांगला नाही हे माहीत असेल. आपल्याला तश्या प्रकारच्या वर्तनाबद्दल आक्षेप असतील तर काहीही कारण देउन त्यातुन अंग काढून घेता येते. वेश्याव्यवसाय, महीलांना उपभोग वस्तू समजुन नाचायला लावणे इ इ गोष्टी न पटून त्यात कोणत्याही प्रकारे सहभागी न होणे भारतासारख्या पापभीरू समाजात फार कठीण नाही. विशेषता ज्या व्यक्तीसमोर आंबेडकर-फुले-शाहू महाराज यांचे आदर्श असतील. ज्याला अन्यायाविरुद्ध चीड आहे, ज्याला व्यवस्थेशी संघर्ष करता येतो. त्याला तर हे काहीच अवघड जाउ नये.

पण मग इतके सोपे असताना एखादा हे का करतो?
अ) परिस्थितीचा शिकार - मनाविरुद्ध
ब) कदाचित हे वाईट असेल हे मान्यच नाही - सर्वसामान्य कृती समजुन
क) आपले काम नावलौकीक मिळवणे - मनासाठी (इथे मनुष्य स्वता काय भले, काय वाईट ठरवतो. दुसर्‍याने सांगीतलेले पटतेच असे नाही. जोवर मी कोणाच्या मनाविरुद्ध काही केले नाही तोवर मला कोणी बोलायचे काम नाही. माझ्या अंतरात्माने पण नाही म्हणतो.)

आता 'मनाविरुद्ध' एखादे काम करायला लागत असेल तर समजुन घेता येते पण ...

सतीश वाघमारे Thu, 21/03/2013 - 19:43

In reply to by सहज

स्वतःलाही सोडू नये हे प्रचंड मान्य ! पण कधी ? कुठे ? या प्रश्नांच्या रोखाने पाहूनच.
आपल्याकडे बँकग्राऊंड पाहून बर्याच गोष्टी गृहित धरल्या जातात. आणि त्या तशाच बलवानांकडून लादल्याही जातात. झोपडटपट्टीधारक वेगळा, चाळवाला वेगळा आणि फ्लँटवाला वेगळा. प्रत्येक वेळी प्रत्येकच ठिकाणी जस्ट डायल कर्ता स्वयंस्फुर्तीनेच तयार झालेला असतो असं नाही. रिंगणा बाहेर राहून रिंगणात लढणार्याना लढ असा आणि लढ तसा हे सल्ले देणंही प्रचंड सोपंच आहे. व्यवस्थेमधे राहून व्यवस्था बदलायचा प्रयत्न करताना अपरिहार्य तडजोडी कराव्या लागतात. गरीबाच्या मुलाने गुणीच असावं या टाईपचा दंडक, शाहू फुले आंबेडकरी विचारवंतावर हेतू जाणून न घेता करण्यासारखा सदर प्रकार आहे. जाई यांच्या प्रतिसादावर आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या शोषणाबद्दल मी इथेच दोन प्रतिसाद दिलेले आहेत. त्यामुळे या प्रतिसादावर इथे अधिक लिहित नाही. माझं म्हणणं पुरेसं स्पष्ट मी केलेलं आहे.

ऋषिकेश Wed, 20/03/2013 - 08:52

बाकी लोकसभेत "अ‍ॅन्टी रेप" नावाखाली क्रिमिनल कायद्याद बदल व्हावेत त्याच दिवशी ही कविता प्रकाशित व्हावी हा योगायोगही रोचक आहे!

'न'वी बाजू Wed, 20/03/2013 - 09:02

In reply to by ऋषिकेश

प्रतिक्रियेचा रोख मार्मिक आहे. मात्र, प्रतिक्रिया तपशिलात किंचित गंडलेली आहे, असे सुचवावेसे वाटते.

प्रस्तुत लिखाणातील ओळी मनाला येतील तेथे तोडून ओळींच्या लांबीवर मर्यादा घातल्याने ही कविता असल्याचा आभास निर्माण होत असला, तरीही हे लिखाण गद्यच असावे, अशी अटकळ मांडण्याचे धारिष्ट्य येथे जरूर करावेसे वाटते.

ऋषिकेश Wed, 20/03/2013 - 09:18

In reply to by 'न'वी बाजू

तपशीलातील चूक मान्य! हल्ली नक्की कविता कुठली ते कळतंच नाही ;)

****अवांतर:
यावरून उगाच असामी आठवले:
"आता ते समोरून बाई चाल्लीये का बुवा ते कसं ओळखायचं?"
"त्याचं काय आहे ना, त्यांच्यापुढे जाऊन घाणेरडे जोक सांगायचे, जो लाजेल ना तो मुलगा" ;)
***

मेघना भुस्कुटे Wed, 20/03/2013 - 10:04

इथे लिहिण्यापेक्षा कृती करावी, समस्येच्या उच्चाटनाचा प्रयत्न करावा, निदान सहभागी होऊ नये, अशा आशयाची मतं वर दिसली.

एखाद्या गोष्टीबद्दल जाहीर व्यासपीठावर लिहिणं ही एक कृतीच असते, असं आपण मानत नाही का?

हारुन शेख Wed, 20/03/2013 - 11:37

In reply to by मेघना भुस्कुटे

+१

शिवाय अवांतर होईल पण तरीही टी एस इलिअट च्या एका पत्रातून " The analogy was that of the catalyst. When the two gases previously mentioned are mixed in the presence of a filament of platinum, they form sulphurous acid. This combination takes place only if the platinum is present; nevertheless the newly formed acid contains no trace of platinum, and the platinum itself is apparently unaffected; has remained inert, neutral, and unchanged.The mind of the poet is the shred of platinum. It may partly or exclusively operate upon the experience of the man himself; but, the more perfect the artist, the more completely separate in him will be the man who suffers and the mind which creates; the more perfectly will the mind digest and transmute the passions which are its material."