' वेगळी' (!) जगण्यातली गुणवत्ता ?
फेसबुक उघडलं की बाळबोध ते दुर्बोध स्टेटसांचा प्रपात धबाबा मेंदूत कोसळतो. अवघा एकच वैचारिक चिखल होऊन मंदमति डुकरासारखी त्यात लोळते. या थोर स्टेटसवंताना मनातल्या मनात आक्रंदून काहीबाही विचारावसं वाटतं. तर अशीच एका अंतर्मनातली कुजबुज चुकून संगणकाच्या कीबोर्डवर अवतीर्ण झाली. (कीबोर्ड इतका वाह्यात आहे ना की तीळ भिजत नाही त्याच्या किल्लीत!)
एका थोर व लोकप्रिय स्टेटसवंतीचं मधाळ, वेगळं स्टेटस वाचून उडालेला कुशंकित त्सुनामी संभ्रम चिकित्सेकरिता सादर आहे.
जगाच्या दृष्टीने जी माणसं 'वेगळी' असतात, तीच माणसं जगण्यातली गुणवत्ता राखत असतात, वाढवत असतात! असं 'वेगळे' असण्याचा षौक जरूर करावा...पण लोकांना दाखवण्यासाठी नाही, खरोखर 'आतून' ते वेगळेपण' तुमच्यात असेल तरच...!!
इति लोकप्रिय (!) स्टेटसवंती
माननीय स्टेटसवंती बाईंच्या पायाला गू ................ ( म्हणजे पंजाबीत पैरी पौना , हिंदीत पाय लागू वगैरे ……पाय वेगळे "गू " णवान असले की झाले )
१. वेगळी म्हणजे काय हो बाई? जन्माला आलेला प्रत्येक माणूस वेगळाच असतो असे म्हणतात ना? सारखे कुणी न कुणी काही न काही म्हणूनच ठेवत असत त्यामुळे आमच्यासारख्या मंदबुद्धी असल्याने वेगळे असलेल्यांची फार कुचंबणा होते हो!
२. जगण्यातली गुणवत्ता कशी राखतात? म्हणजे त्यासाठी कुणी राखणदार वगैरे ठेवावा लागतो का? गुणवत्ता ठरवतो कोण?? त्याचे निकष आर्थिक आहेत कि सामाजिक? गुणवत्ता वाढीस लागावी म्हणून काही खतपाणी द्यावे लागते की समाजवाद्यांच्या दाढीसारखी ती आपोआप वाढते?? राखलेल्या गुणवत्तेवर दरोडा वगैरे पडायची भीती असते का हो?
३. बरं झालं बाई तुम्ही परवानगी दिलीत! आता आम्ही पण वेगळे असण्याचा आंबटषौक जरूर करू. लोकांना दाखवू नका म्हणता म्हणजे चोरून करावा लागेल नाही का?? असं काय करता बाई मग त्याचा काय उपयोग?? जंगल में मोर नाचा किसने देखा? राखलेली गुणवत्ता आम्हाला पण उधळू द्या ना गडे, प्लीज! घरातच ना गडे नाचून काय फायदा? पूनम पांडेकडे पहा बरं; ती भारताच्या विजयासाठी बर्थ डे सुटात दर्शन देणार होती पण तिचा आतून काही वेगळाच उद्देश असल्याची शंका तुमच्या सारख्या बासुंदी आटवत बसलेल्या मंडळींना पोखरू लागली यामुळे तिची वेगळेपण दाखवायची संधी तेंव्हा हुकली ना!
तुम्ही कित्ती कित्ती वेगळ्या आहात न बाई! तुम्ही गुणवत्ता असलेले स्टेटस टाकण्याचा षौक करता. मग तुमची सगळी फेसकोकरं टणाटणा उड्या मारत लग्गेच लाईक करू लागतात त्यांचा आतून उद्देश काही वेगळाच असला तरी.
अग्गबाई आज तर बासुंदी आटून आटून त्याची रबडी झालेली दिसते .जाउदे बाई जाते आता ...
तुमचा रोजचाच बासुंदी आटवायचा उद्योग आहे , मी जाते पॉपकॉर्न करायला ...
चिकणी चिमणी उप्स सॉरी
चकणी चिमणी
सहमत
श्रामोंशी सहमत.
जगाच्या दृष्टीने जी माणसं 'वेगळी' असतात, तीच माणसं जगण्यातली गुणवत्ता राखत असतात, वाढवत असतात! असं 'वेगळे' असण्याचा षौक जरूर करावा...पण लोकांना दाखवण्यासाठी नाही, खरोखर 'आतून' ते वेगळेपण' तुमच्यात असेल तरच...!!
एक शंका: हे वाक्य तृतीयपंथीयांना पण लागू होईल का ?
फेसबुकचा बिगबॅंग
सखूताई, हे वेगळं असण्याचं प्रकरण जरा वेगळंच आहे. तुमच्यासारख्या कळपातल्या मेंढ्यांना नाही जमायचं. या वेगळेपणावर इतकं मौलिक भाष्य करणारांची अशी चेष्टा उडवलेली पाहून माझं हृदय तीळतीळ तुटलं. थोडक्यात या वेगळेपणाची कॉस्मॉलॉजी सांगतो.
मी - वेगळा, बाकीचे बहुतेक सगळे - सारखे, उरलेले काहीजण - वेगळे. हे जे सगळे सारखे आहेत ते आपल्या विश्वात भरून राहिलेल्या स्पेसप्रमाणे आहेत.
मात्र
काहीजणांमधले बहुतेक सगळे - वेगळेपणाची टिमकी वाजवतात, जगाला दाखवण्यासाठी वेगळे असतात. ते वाईट. अदितीने लिहिल्याप्रमाणे डार्क एनर्जीसारखे असतात. जवळ येऊ पहाणाऱ्या मुक्त विश्वाला अडसर घालणारे.
अगदी मोजके लोक आतून वेगळे असणारे, पण बाहेर मुद्दामून न दाखवणारे. ते चांगले असावेत. पण दुर्दैवाने ते वेगळेपण दाखवत नाहीत म्हणून दिसत नाहीत. हे डार्क मॅटर.
त्या मोजक्यातले अगदी मोजके - हे वेगळेही असतात, आणि टिमकी न वाजवता आपल्याला दिसतातही. हे खरं विश्वातलं म्याटर. फक्त चार टक्के. तेच म्याटर करतात.
आता गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे म्याटर म्याटरला आकर्षित करतं. अशी जीवनमूल्यं सांगणं आणि एकमेकांना लाइक देणं हा गुरुत्वाकर्षणाच्या इंटरॅक्शनचा भाग आहे. एक मोठ्ठा ग्रह/तारा आपल्या ग्रॅव्हिटी वेव्हज सोडतो/ते आणि इतर लघुग्रह/लघुतारे त्यांच्याकडे आकर्षित होऊन आपल्या छोट्याशा गुरुत्वलहरी - लाइक्स - सोडतो. यावरून अर्थातच हे उघड आहे की फेसबुकचा शून्यातून उदय म्हणजे बिग बॅंग.
मेरे दिलके टुकडे हजार हुए कोई
मेरे दिलके टुकडे हजार हुए कोई यहा गिरा कोई वहा गिरा, या उक्तीप्रमाणे माझं हृदय असल्या अनेक गोष्टींमुळे तीळ तीळ तुटतंच आहे. किरणोत्सारी मूलद्रव्यं जशी कणाकणाने डीके होत जातात, तसं माझं हृदयही घटत चाललेलं आहे. या घटण्याचा हाफ लाइफ पिरियड सुमारे पाचेक वर्षांचा असल्यामुळे एव्हाना मूळ हृदयातलं फारसं शिल्लक नाही. हे विश्व प्रसरण पावत असलं तरी माझं हृदय मात्र आकुंचन पावत आहे.
या तुटत जाणाऱ्या तिळांचं काय करावं हा प्रश्न असतोच. तो सोडवण्यासाठी मी प्रत्येक तीळ सात जणींमध्ये वाटून देतो.
थांबा
पायाला गू... असे लिहिण्याची वेळ आली याचा अर्थ गडबड झाली. वाटल्यास थांबा, पण तुमच्या विनोदात या अशा गोष्टी टाळा.