ढिंपांग टिपांग- बेरजेच्या राजकारणाची टांग!
तसे आम्ही मूळचे काँग्रेसवाले . पण काँग्रेसने आम्हाला काही हिंग लावूनही विचारले नाही. शिवसेनेनेही आमचा असाच भ्रमनिरास केला. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही भरवशाच्या म्हशीना टोणगे झाल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आमचा मोहरा आमच्या जुन्या लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला आहे. ('राष्ट्रवादीला टोणगे होण्याचे भय नाही. टोणग्यांनाच टोणगे कसे होणार? असे राजेश घासकडवी आमच्या कानात कुजबुजल्याचा आम्हाला भास झाला!) खरे तर यशवंतराव, वसंतरावांसारख्या आपल्या राजकीय गुरुंपासून सोनियाताई, मनमोहनदादांपर्यंत विविध लोकांप्रती राष्ट्रवादी काँगेसचे सवेसर्वा मा. शरदचंद्ररावजीपवारसो ( ते दोन कान्यांचे कुणीतरी लवकर बघा बुवा!) यांनी वेळोवेळी आपल्या अर्पिलेल्या आणि काढून घेतलेल्या निष्ठांमुळे आम्ही शरदभाऊंचे लयी जुने फ्यान आहोत. त्यांच्या बेरजेच्या राजकारणाने तर आम्ही कैकवेळा निव्वळ चकितच नाही, तर विस्मयचकितही झालो आहोत. एकीकडे आम्हाला शरदभाऊ अटलजींच्या आणि भीमाण्णांच्या खुर्चीला खुर्ची लावून सुधीर फडक्यांवर काव्यशास्त्रविनोदावर बोलताना दिसले, दुसरीकडे कुठल्याशा म्याचच्या पारितोषिक वितरणसमारंभात रिकी पाँटिंगला ट्रॉफी देताना दिसले. तिसरीकडे बायोटेक्नॉलॉजीच्या कुठल्याशा परिसंवादात मोन्सँटोच्या वरिष्ठ अधिकार्यांशी खलबत करताना दिसले. (जाताजाता हळूच ते त्या अधिकार्यांना फर्ड्या इंग्रजीत 'ते देण्याघेण्याचं विठ्ठलशेठशी बोला' असं काहीसं म्हणाले असे राजेश घासकडवी आमच्या कानात कुजबुजल्याचा आम्हाला भास झाला!) त्यांच्या खुल्या आणि दिलदार स्वभावाने त्यांनी सातारसम्राट शहाण्णवकुळी रॉयलब्लडेश्वर उदयनराजेंना छातीशी धरले ( 'ते लेवे प्रकरण मिटलं का हो?' असे रा.घा.आ.का.कु. आ.भा.झा.!) टी.बाळूंनी भुजबळांना 'लखोबा' म्हणून हिणवले ते मनावर घेतले नाही ('काय? त्या सतीश चिखलीकराचं पुढं काय? असे रा.घा.आ.का.कु. आ.भा.झा.! या घासकडवींचे आता काहीतरी केले पाहिजे...) आणि कारभारी दादांच्या तर किती बाललीला डोळ्यांआड केल्या याला गणनाच नाही. ( या खेपेला घासकडवी काहीतरी कुजबुजतील म्हणून आम्ही कान टवकारले तर घासकडवी काही बोललेच नाही. या घासकडवींचे म्हणजे अस्सेच आहे. भरवशाच्या म्हशीला टोणगा!) तात्पर्य काय, तर आता येथून पुढे फक्त बेरजा करायच्या असे आम्ही ठरवले. आता कुणाशी भांडायचे नाही, कुणाला वेडीवाकडे प्रतिसाद द्यायचे नाहीत. बस्स! आता फक्त बेरजा! तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे! आम्लेट! आता नुसते पूल बांधायचे आणि पवारसाहेबांसारखे यशस्वी व्हायचे. नुसत्या कल्पनेनेच आमच्या डोळ्यांसमोर आम्ही बेरजांचे पूल बांधायला लागलो की कायकाय होईल याची चित्रे नाचू लागली. 'व्वा, रावसाहेब, तुम्ही 'दुनियादारी' ला पाचपैकी साडेचार स्टार दिले आणि भरुन पावलो!' असे कुणी गदगदून म्हणते आहे. कुणी 'हे रे काय संजूदादा, माझी अशी खिल्ली उडविणे शोभतं काय तुला दादिटल्या? ज्जा.. आता गट्टी फू तुझ्याशी' असे फुरंगटून बसले आहे, 'रावबाबू, कोरियन प्रायोगिक सिनेमांचा फेस्टिवल लागला आहे. तिकिटांची जबाबदारी माझी, रसग्रहणं बाकी तुम्हीच लिहायची हां फर्मास! काय समजलेत?' असा कुणी प्रेमळ तगादा लावला आहे. निव्वळ कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहिले.
थोरांचा मान मोठा म्हणून आम्ही या बेरजा जालसर्किट मिलिंद भांदारकर यांच्यापासून सुरु करायच्या असे ठरवले. ('म्हणजे नाहीच जमले तर पहिला डाव भुताला असेही म्हणता येईल, नाही का? द्या टाळी! पुन्हा आमच्या कानात.. बरोब्बर! घासकडवीच! दुसरे कोण असणार?) भांडारकरांच्या जगप्रवासाची त्यांनी फेसबुकवर दिलेली जंत्री वाचून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आवाजात शक्य तितके मार्दव आणून 'तुझी कमाल आहे हां मिलिंदा, इतका प्रवास करायचा म्हणजे काही खायचें काम नाही. पु.लं नी भीमाण्णांना हवाई गंधर्व म्हटले, पण तू तर त्यांच्याही पुढं गेलास.' असे म्हणालो. भांडारकर त्यावर खवळून 'हाड, हुड... हाडुप' असे काहीसे म्हणाले. काहीसे हिरमुसले होऊनच आम्ही मागे फिरलो.
त्यानंतर डोळ्यांसमोर नाव आले ते प्रकाश घाटपांडेंचे. घाटपांडे म्हणजे अजातशत्रू माणूस हो. त्यांची आमची बेरीज आहेच, पण आता तिचा वर्ग(म्हणजे स्क्वेअर) करावा म्हणून आम्ही घाटपांडेंकडे गेलो. घाटपांडेंच्या 'फलज्योतिष - एक निरर्थक आणि बाष्कळ थोतांड' या विषयावर आमचे छत्तीस गुण जुळतात. निदान आज त्यांची तरी बेरीज जुळण्याचा योग आमच्या पत्रिकेत आहे का ते बघावे असाही विचार मनात येऊन गेला.घाटपांडे 'चिकित्सावादाची चिकित्सा' का असला कुठलासा ग्रंथ वाचत होते. 'प्रकाशराव,.." आम्ही पुन्हा तो मार्दवप्रयोग केला. आम्हाला पुढे बोलूही न देता घाटपांडेंनी जळजळीत नजरेने आमच्याकडे बघीतले.
"नष्ट करुन टाका असे कुणीसे म्हटले रावसाहेब, आणि तुम्ही त्याला चक्क समर्थन देऊन मोकळे झालात?" त्यांनी विखारीपणे विचारले.
"काय? कुठे? कसले? कोण?" आमच्या तोंडून शब्दच फुटेनात.
"अरे, मोठ्या माणसांना मारा की रे. निष्पाप प्राणी मारायचे म्हणजे पाप की रे!" घाटपांडे उद्गारले. आता ते या पुढे "ते हिरॉईनचं बाप भटजी असतंय नव्हे? म्हातारंच असणार की ते. मारा की त्याला! काय रडलं तर रडू दे लोक. ते पोर नका मारु.." असे म्हणणार असे आम्हाला वाटले.
"त..त..प...प.."
"कुत्री रावसाहेब. भटकी कुत्री मारुन टाका असं म्हणालात तुम्ही. म्हणे रस्त्यात घाण होते. तुम्हाला समाजातली घाण चालते. तुम्हाला कलमाडी चालतात, तुम्हाला मानकर चालतात, एवढंच काय, पण कलमाडींसारखा भ्रष्ट उमेदवार लोकसभेसाठी नको असं मानकरांनी म्हटलेलंही तुम्हाला चालतं. आणि नेमकी बिचारी पोरकी रस्त्यावरची कुत्री तुमच्या डोळ्यांवर आली होय?"
आता रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांवर आमचा राग आहे हे कबूल. पुण्यातली भटकी कुत्री मारुन टाका या 'मटा' मधल्या पत्राला आमचा छुपा पाठिंबा आहे हेही कबूल. ('रावसाहेब, म.टा. ची वार्षिक वर्गणी तुम्ही भरली आहे हे रमतारामला ठाऊक आहे काय?' रा.घा.आ.का.कु.आ.भा.झा!) पण आमच्या मनातले हे मांडे प्रकाशरावांपर्यंत कसे पोचले हे आम्हांस कळेना. 'गुरुमहाराज! काय चिमित्कार!' म्हणून प्रकाशरावांचे पाय धरावे म्हणून आम्ही पुढे सरसावलो तर प्रकाशराव तोंड फिरवून दुसर्याच दिशेला बघत बसले होते. एकूण काय प्रकाशरावांबरोबरची मैत्री पुढच्या पातळीवर नेण्याचा योग आमच्या कुंडलीत नाही, हेच खरे! ईश्वरेच्छा, दुसरे काय?
मग आता गड्या अपुला गाव बरा म्हणून आम्ही आमचे गाववाले महाराष्ट्रम्यांचेष्टरमहोमह, फेसबुकष्टेटसापडेटायनिपुण, हायद्राबादस्थित विसुनानांकडे गेलो. आमच्या दोघांच्याही रक्तांत पंचगंगेचे तेच प्रदूषित पाणी वाहाते आहे. आमच्या दोघांच्या हाडांमासांत त्याच मेसच्या जळक्या पोळ्यांचे आणि वांगीबटाट्याच्या भाजीच्या चिखलाचे सत्व उसळते आहे. आम्ही दोघांनीही काँग्रेसच्या एकाच भ्रष्ट उमेदवाराला मते दिली आहेत. रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असले तरी पाणी हे इंटरनेटपेक्षा घट्ट असते (असे रा.घा.आ.का.कु.आ.भा.झा!).
"काय, कैसा हाय तुम विसुनाना? हायद्राबादमें बैठके मजा मारतांय आयसा दिखताय! यंदा क्या बिरयानी आऊर हलीम खानेकु बुलाताय की नाय हमकु?" आम्ही सुरवात केली. हैद्राबादी उर्दू आणि आमच्या गावात फज्जरफज्जर नमजकु जाते वखत रस्तेपे याशिनभाई आणि झांगिरभाई बोलतात ती मुसलमानी ही भाषा एकच असा आमचा समज होता.
विसुनानांनी आपल्या काळ्याभोर टपोर्या डोळ्यांनी आमच्याकडे रोखून बघितले. त्यांचे काळेभोर चकचकीत केसही आमच्या नसलेल्या केसांकडे रोखून बघताहेत असा भास आम्हाला क्षणभर झाला. (छ्या! हे भास हल्ली फारच व्हायला लागलेत. रक्तदाब तपासून घेतला पाहिजे!)
'खुळ्यागत कायपण बोलू नका राव...' विसुनाना गरजले. 'हैदराबादेत येऊन र्हायचं म्हणजे काय ओपलला जाऊन मटणमसाला खायचं काम वाटलं काय तुमाला? आं? हितं आमचा बुकणा पडायलाय आणि तुमाला बिरयानी आणि हालिम सुचायलंय आण्णा...आणि हैदराबादी येत नसेल तर उगीच मुसलमानी बोलत जाऊ नका. उर्दू म्हणजे काय तुम्ही कणीक मळून ठेवावी तशी घरात मळून ठेवल्याय होय?' नुकतेच वाचलेले 'सत्यकथे'चे जुने अंक बोलत होते.
हा घाव जरा जास्तच खोलवर गेला. जगात कुणी कुणाचे नाही असा साक्षात्कार झाल्यासारखे हताश होऊन आम्ही जालावर भरकटत राहिलो. भान आले तेंव्हा समोर आपल्या ल्यापटॉपवर मनोगताचे पान उघडलेल्या अदितीदेवी बसलेल्या होत्या.
'काय बाळ? काय हालहवाल?' डिप्रेस झाला की माणूस काहीही बोलतो. अदितीदेवींनी प्रक्षुब्ध नजरेने आमच्याकडे पाहिले. '(एकूण पुरुषजातीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा असाच!' रा.घा.आ.का.कु.आ.भा.झा!) अटलांटिकपल्याड स्थित असलेल्या एका विवक्षित नरपुंगवाबद्दल आमच्या मनात अपार करुणा दाटून आली.
'काढून टाका, काढून टाका ते आधी!' अदितीदेवी खेकसल्या. 'असल्या विकृतींना ठेचल्याशिवाय समाजात स्त्रियांची प्रगती होणार नाही. काढता की नाही?'
'काय हो, काय ते?
' हे बघा...' मनोगताचे पान आमच्याकडे वळवत अदितीदेवी म्हणाल्या. 'माणूस नावाचा बेटा' आपल्याला का आवडली हे लिहिताना तुम्ही म्हणताय, 'तिचा गळा फार सुरेख आहे, गोल लिलीसारखा आहे, हाताचा स्पर्श होताच क्रूरपणे कुस्करावा असे वाटण्याइतपत आकर्षक आहे. त्याखाली तीळ आहे, थोडा जांभळसरच' हे तुम्हाला फार आवडले. का हो? बाईचा गोल गळा दिसताच तो क्रूरपणे कुस्करावा ही कसली विकृती? आम्ही लिहावे का असे? 'त्या पुरुषाची छाती भरदार आहे. चाकूने वार करुन खचकन ती छाती फोडावी आणि आतले गरम, धडधडणारे काळीज हातात घेऊन कचाकचा चावावे असे? आं?' अदितीदेवींच्या तोंडून फुटाणे फुटत होते असे लिहिणार होतो, पण फुटाणा हा पुरुषलिंगी शब्द असल्याने लाह्या फुटत होत्या असे लिहितो. लाही = स्त्रीलिंगी.
आम्ही शहारलो. 'अदितीदेवी, असे सगळे शब्दशः घ्यायचं नसतंय हो. पोएटिक लायसन्स म्हणतात याला. लिखाणात एवढं स्वातंत्र्य घेणारच लोक. उद्या कुणी एखाद्या स्त्रीचा गोरापान पुष्ट दंड आणि त्यावरच्या फिकट जांभळ्या शिरा पाहून त्या दंडाचा हलकासा चावा घ्यावा असे एखाद्या पुरुषाला वाटते असे लिहिले तर त्याला काय तुरुंगात टाकणार तुम्ही?"
"हीच. हीच ती तुमची जुलमी पुरुषी वृत्ती..."
"अहो, आता काय सांगायचं तुम्हाला? जे दिसतंय त्याच्या मागचा अर्थ समजून घ्यायचा असतो देवी. आता हे बघा, 'उठी श्रीरामा, प्रभात झाली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली' असं म्हटल्यावर त्याचा भावार्थ समजून घ्यायचा असतोय हो.. उगीचच.'काय रामभाऊ, इतक्या उशीरपर्यंत लोळत रहाणं शोभतं का तुम्हाला? आणि हां हां हां.. अहो पारोशा तोंडानं कसलं दूध पिताय? उद्या कळ घातली दाढेत म्हणजे आहेच आई सेवेला.. जर तोंड खंगाळून या' असं विचारणार का तुम्ही राघवांना?' आम्ही कळवळून म्हणालो.'आणि कसला डोंबलाचा पुरुषी जुलूम? पुरुषी आक्रोश आहे हा..
'नाव नका काढू त्या आक्रोशचं' अदितीदेवी गरजल्या. 'म्हणे प्रायोगिक चित्रपटांचा मेरुदंड! तुमचा तो आक्रोशचा हीरो' शेवटी बायकोवर काठीने हल्ला करण्यापर्यंत मजल गेली त्याची. हीच. हीच ती तुमची जुलमी पुरुषी वृत्ती..."
"जाऊ द्या. ओम पुरी नको तर नको. आपण दुसर्या कुणावर तरी बोलू. कोण चालेल तुम्हाला? नवीन निश्चल?" आम्ही विचारले.
'ह्या... ' अदितीदेवी कुत्सितपणे म्हणाल्या. 'बायकोला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा होता त्याच्यावर..."
पडेल चेहर्याने आम्ही बाहेर पडलो. एकूण हे बेरजेचे राजकारण काही आपल्याला जमणार नाही असे वाटायला लागले. इथे टोणगेच फार. शरदरावांना जमले म्हणजे आम्हाला जमेल असे नाही. होते. जेणु काम तेणु ठाय, बीजा करे सो गोता खाय. शरदराव तुस्सी ग्रेट हो!
=))
=)) अगायाया. ठार मेलो, आमचा अंदाज आता खात्रीमधे 'तबदील' झालेला आहे. नारद नक्कीच 'वाचस्पती' झालेला आहे. एकदम सगळं टेन्शन गेल्यावर दणादण फटकेबाजी सुरू झालेली दिसते.
या घासकडवींचे आता काहीतरी केले पाहिजे.>> करेक्टे. आम्ही केव्हापासून हेच म्हणतोय. पण आमचं कुणी ऐकतच नाही.
अदितीदेवींनी प्रक्षुब्ध नजरेने आमच्याकडे पाहिले. '(एकूण पुरुषजातीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा असाच!' रा.घा.आ.का.कु.आ.भा.झा!) >> यांचंही काहीतरी केले पाहिजे असं का नाही लिहिलंत. आम्ही लगेच +१ नसते दिले.
('रावसाहेब, म.टा. ची वार्षिक वर्गणी तुम्ही भरली आहे हे रमतारामला ठाऊक आहे काय?' रा.घा.आ.का.कु.आ.भा.झा!)>> लाहौलविलाकुव्वत. या सन्जोपरावांचही काहीतरी केले पाहिजे.
गटण्याहूनही = पुलंच्या
गटण्याहूनही = पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमधील एक जबरी पात्र मा.श्री. सखाराम गटणे वल्द अप्पाजी गटणे राहणार बुधवार पेठ पुणे (चार इमारतीवाले आणि पेंटिंगचे दुकान हा अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय असलेले) यांच्याहूनही.
-तेच ते डोळ्यांत ५६ सशांची व्याकुळता साठवणारे.
-सानेगुरुजी अन पुल हे आदर्श लेखक मानणारे.
-जीवनविषयक सूत्र ठरवून तदनुसार साहित्याशी एकनिष्ठ राहणारे.
-जीवनोन्नतीच्या सहा सोपानांचे ट्रेकिंग करून चहा न पिणारे.
-ख्यातनाम लेखक स.त. कुडचेडकर ('केतकी पिवळी पडली' फेम) यांचे एकनिष्ठ वाचक.
-प्राज्ञ मराठी बोलणारे.
वेडेवाकडे अवांतर
आमच्या ऑफिसातल्या एका कानवेंटाला मध्य प्रदेश सरकारची पायाभूत सुविधांची निती बनवायची होती. क्लायंटाचे लेटर घेऊन तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "'आदो संचारणा' मंजे काय?". मी त्याला सांगीतले कि हिंदी माझी मातृभाषा (मातरीबासा) नाही तेव्हा मी सांगू शकत नाही. त्याने मला आत्मविश्वास दिला कि अख्ख्या ऑफिसात माझ्याशिवाय कोणीच त्या शब्दाचा अर्थ सांगू शकत नाही. मी हुरळून जाऊन ते लेटर हातात घेतले आणि क्षणात सांगीतले - "अधःसंरचना म्हणजे infrastructure."
तेव्हापासून मला अधो आणि उर्ध्व वाले फार शब्द फटकन सुचतात, कळतात, स्फुरतात.
गिधाडे?
मागे एका (मराठीच्या) विद्वानांनी 'संस्कृत थडग्यात आहे' असे (सचित्र) प्रतिपादले होते. (अधिक माहिती: थडग्यावर क्रूस होता.) आपण संस्कृतला टॉवरमध्ये ढकलता. (तेही टॉप फ्लोअरवर.)
एकदाचे नक्की काय ते ठरवून टाका बुवा, की संस्कृत ख्रिस्त्यांची, की पारशांची ते.
==================================================================================
(अवांतर: यावरून एक विनोद आठवला. अगोदर वाचला/ऐकला असल्यास यापुढे वाचू नका. सक्ती नाही.)
दूरदर्शनवर रामायण चालू असते. लंकादहनाचा एपिसोड. प्रेक्षक: एक अमेरिकन, एक मुसलमान आणि एक सरदारजी.
तिघांनाही एपिसोड खूपच आवडतो. नि मग 'हनुमान आपलाच!' असा दावा करण्यासाठी तिघांचीही अहमहमिका सुरू होते.
अमेरिकन: 'जसा सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, तसा आमचा हॅनूमॅन.'
मुसलमान: 'अरे जा जा! जैसा उस्मान, सुलेमान, वैसा हमारा हनुमान.'
सरदारजी फक्त हसतो. बाकीचे दोघे चकित होऊन त्याला हसण्याचे कारण विचारतात.
सरदारजी: 'सीधी बात है. दूसरे की बीवी के लिए तीसरे की लंका जलाने वाला, और उस के लिए खुद की पूछ को आग लगवाने वाला, भला एक सरदार के सिवा और कोई हो सकता है?'
एकदाचे नक्की काय ते ठरवून
एकदाचे नक्की काय ते ठरवून टाका बुवा, की संस्कृत ख्रिस्त्यांची, की पारशांची ते.
पारशांची धर्मभाषा "अवेस्तन" ही तर वैदिक संस्कृतची सख्खी बहीण. तदुपरि, क्रिश्चॅनिटी=कृष्णनीती या समीकरणाप्रमाणे संस्कृत ही ख्रिस्त्यांचीही आहेच. व्हॅटिकनमध्ये वरकरणी देखावा कसलाही चालत असला तरी तिथे गुप्तपणे वेदपाठशाळाच चालते अजूनही. व्हॅटिकन=वेदवटी. अन्य पंथही तसेच. मुळात, येशू ख्रिस्त= ईशस् कृष्ट आणि मदर मेरी=माता मोरी.
करेक्टे
बॅटमॅन हा शब्दही खरं म्हणजे संस्कृत 'बटू-मन' - म्हणजे लहान मुलासारखे (पक्षी: निरागस, अविकृत, अजून 'कल्हई' न केलेले) - चे भ्रष्ट (मूळ शब्द नेहमीच संस्कृत असतो नि त्याचे कोणतेही रूप ते भ्रष्ट या नियमानुसार) रूप आहे असे म्हणतात. की बटूमन भ्रष्ट झालेल्याला बॅटमॅन म्हणतात? खरंखोटं काय अल्लाच जाणे.
आता इथे बटू हे पुरुष' निदर्शक रूप का, असे लिंगभेदाचे पुरस्कर्ते रूप वापरणे निषेधार्ह असे स्त्रीमुक्ती वाले म्हणतील. तर बटू म्हणजे फक्त विशिष्ट जातीतील लहान - ते ही पुन्हा विशिष्ट संस्कारप्राप्त - मूल तेव्हा यावर जातीयवादाचा आरोपही होऊ शकेल. म्हणून मूळ अर्थ या आंग्लाळलेल्या शब्दाआड लपवला गेला असावा असा एक तर्क आहे.
द्राविडी प्राणायाम.
नाही नाही. बॅटमॅन हा शब्द खरे तर "बट्ट-मण्ण" या द्राविडी शब्दावरून आलेला आहे. त्याच्या आणि गॉथम सिटी या शब्दाच्या उगमाची कथा सविस्तर इथे सापडेल. ती पेष्टवत आहे.
गॉथम तर बोलूनचालून आम्रविका खंडातले. ते भारतात येणार नाही तर अजून कुठले शहर येणार ? हे शहर गौतम बुद्धाच्या काळात वसल्याचे त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ऐंशी वर्षांनी गॉथमची स्थापना झाली. त्यामुळे "गौतम-अशीति(८०)" असे नाव पडले, त्याचा अपभ्रंश "गॉथम सिटी" असा झाला आहे. शिवाय वाल्गुदेय ऊर्फ बॅटमॅनचा उल्लेख मुक्तेश्वरांच्या कवितेच्या एका (पानशेतच्या पुरात वाहून गेलेल्या) प्रतीत आहे तोच माझी सही म्हणून घेतलेला आहे. मुळात बॅटमॅन हा शब्द तिथे चालणार्या बटाट्याच्या शेतीला अनुलक्षून बनलेल्या एका द्राविडी शब्दाचा अपभ्रंश आहे. तिथे मणभर बटाटे पिकत, त्यामुळे बट्ट-मण्ण असे म्हटल्या जाऊ लागले, त्याचाच अपभ्रंश बट्टमण्ण-बटमण-बटमन असा झाला. पुढे इंग्रजांनी तो शब्द ऐकला आणि क्रिकेटमधल्या बॅट्स्मनशी साधर्म्य आढळल्याने त्याचे बॅटमॅन असे रूपांतर केले. बटाटे पिकवणारा मॅन अशीही त्याची व्युत्पत्ती तत्कालीन नवपाणिनीने दिलेली आहे. तर पुढे हेच नाव गॉथम भागात राहणार्या प्रतिष्ठित नागरिकांत रूढ झाले.
अर्थात, द्राविडी असला तरी मूळचा भारतीयच हेवेसांनल.
काही स्पष्टीकरणे हवीत.
१. वल्द फक्त शोलेमधे म्हणतात. मराठीत उर्फ नको का म्हणायला?
२. पेंटीगच्या व्यवसायाचा विशेष उल्लेख करण्याचे कारण नसावे. काही विशेष कारण?
३. नेत्रीय व्याकुलता आणि ससा यांचा संबंध अगोदर ऐकला नव्हता.
४. ५६ ससे या संख्याविशिष्टाला काही महत्त्व आहे का?
५. साने आणि गुरुजी यांच्यात स्पेस नको का?
६. जीवनाच्या सूत्रांत साहित्याशी निष्ठा काहीतरी कामाची आहे का?
७. सहा सोपान बाजूबाजूला होते कि एकावर एक?
८. चहा न पिण्याचे आपल्याला (किंवा पुलंना) कौतुक अभिप्रेत आहे का?
९. केतकीचा मूळ रंग कोणता? गोर्या बायकांच्या मांड्यांना काकड्यांची किंवा केतकीची उपमा दिलेले ऐकले आहे. नक्की कशाची आठवत नाही.
१०. केतकी पिवळी पडली फेम असा शब्द आपण वापरला आहे. किती लोकांनी हे नाटक पाहिले आहे जेणेकरून आपण असे संदर्भ देता? ते आडनाव देखिल मी जन्मात प्रथम ऐकले.
११. साधी मराठी आणि प्राज्ञ मराठी यांचे एकएक वाक्य लिहून उदाहरण द्या म्हणजे आम्हाला ती प्राज्ञ मराठी कशी असते ते कळेल.
आता सुलभ भाषेत ही उत्तरे मिळतील तर आमचे अज्ञान थोडे दूर होईल.
मा.श्री. अरुणजोशीसो|, आपल्या
मा.श्री. अरुणजोशीसो|, आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर खालील लिंकेत सापडेल. सखाराम गटणे हे प्रकरण मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
उत्तेजक गेय
कामातला ताण आणि वैफल्य घालवण्यासाठी...
..............हे पुढील उत्तेजक गेय सकाळ-संध्याकाळ चमचा-चमचा गावे -
फ्रस्टियाओ नहीं मूरा
नर्भसाओ नहीं मूरा
एनी टाईम मूड़वा को
अप्सेटाओ नहीं मूरा
जो भी राँगवा हैं उसे
सेट राइटवा करो जी
नाही लुजियेजी होप
थोडा फाइटवा करो जी ... मूरा
..
..
- वरूण ग्रोवर (स्त्रोत)
रावसोा
रावसोा, अहो आमच्यासारखं कर्णपिशाच्च ठेवलंत तर कसं जमणार बेरजेचं राजकारण? (ठेवायचंच तर कर्णपिशाच्च का ठेवावं? पण ते एक असो.) अहो, आमचं नुसतं नाव घेतलं की सगळीकडे वजाबाक्या सुरू होतात. किंवा खरं तर अपोझिशन पार्टीत बेरजा सुरू होतात. आणि मग शिवसेना, मनसे, भाजपा, संघ आणि हिंदूजागृती समितीमधले आपापसात भांडणारे लोक झटकन एकत्र येतात.
कानात कुजबुजायच्या ऐवजी जाहीरच सांगतो रावसोा, अहो बेरजेचं राजकारण करण्यासाठी आपल्याकडे हातचे तयार पाहिजेत. निदान सुरूवातीला तरी. खूप बेरजा एकाच वेळी करायला लागलं की इकडचा हातचा तिकडे, तिकडचा आणखीन पलिकडे वगैरे वापरता येतात. आपण साधीसुधी मध्यमवर्गीय मराठी माणसं, मटारउसळ खाऊन चैन करणारी. आपल्याला कुठचे एवढे हातचे परवडणार आहेत. पण महागाचे नाहीत तरी स्वस्तातले सुद्धा तुम्ही वापरलेले दिसत नाही. आता भांडारकरांकडे गेलात. साधी पासष्ठ डॉलरची स्कॉचची बाटली नाही नेऊन दिलीत त्यांना? अदितीदेवींना भेटलात तर त्यांना साधा एखादा स्त्रीवादी भाष्य करणारा टी शर्ट नाही दिलात? अहो सगळ्यांना भेटायला गेलात ते रिकाम्या हातांनी! इतके हातचे राखून गेलात तर काय बेरजा होणार, कप्पाळ? आणि हो, आता जरा नव्या रक्तालाही द्या की वाव. जालीय राजकारणात बेरजा करायच्या झाल्या तर नवीन सदस्यांकडे जा जरा. आत्तापासून बेरजा सुरू केल्या की काही वर्षांनी ती गणितं पूर्ण होतील.
कंपू करणे
कंपू करणे म्हणजे सुद्धा, एका अर्थाने बेरजेचंच राजकारण ठरेल ना ? फक्त इतर जण सहमत होऊन बेरजेचं काही तरी करताहेत, असा संशय जरी आला तरी, या संस्थळावर कंपूशाही येऊ घातलीये असा इशारेवजा त्रागा करावा. आणि मग आपल्या तंबूची कनात उंच करुन इतरांना आपली ताकद दाखवून द्यावी.
मजाच मज्जा, मौजमज्जा.
"रा.घा.आ.का.कु. आ.भा.झा.!" हे
"रा.घा.आ.का.कु. आ.भा.झा.!" हे म्हणजे अगदी "कबीरा स्पिकींग" झालं की!
स्वगतः सन्जोप राव बेरजेचं राजकारण करत आहेत म्हणजे एखादं नवीन मराठी संस्थळ येणार का काय? माझा गॉसिप कोशंट कमी पडतोय का काय? जाऊ दे, आपण सध्या गप्प बसलेलं बरं. आपला गॉसिप कोशंट कमी पडल्याचं लोकांना नको समजायला!
मस्त!
:) +१