Skip to main content

कांदा संस्थानात स्वप्नदोषावर बंदी

कांदा संस्थान, (प्रतिनिधी). दि. ११. - कांदा संस्थानात आज बहुसंख्येने स्वप्नदोषांना फौजदारी गुन्हा ठरवले गेले. या ग्रामसभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. ऐसी अक्षरेची प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होती, तिच्याकडून मिळालेला हा वृत्तांत.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आज, फिरून एकदा समलैंगिकतेला फौजदारी गुन्हा ठरवल्यामुळे कांदा ग्रामपंचायतीची आणखी एक ग्रामसभा झाली. यात समलैंगिकतेच्या सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, वैद्यकीय, आर्थिक आणि व्यावसायिक पैलूंचा विचार झाला. ग्रामसभेत संस्थानाचे सामान्य नागरिक आणि संस्थानातील संशोधन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. ग्रामसभेत विविध लोकांनी समलैंगिकतेमुळे येणाऱ्या अडचणींना वाचा फोडली आणि नंतर या विषयावर मतदानही झाले.

चर्चेत महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो म्हणजे बालसंगोपनाचा. कांदा संस्थानचे माजी पाटील म्हणाले की त्यांचा नातू आता पाच वर्षांचा आहे. टीव्हीवर समलैंगिकतेबद्दल चर्चा ऐकून त्यानेही "समलैंगिकता म्हणजे काय रे बाऊ?" असा प्रश्न आपल्या मोठ्या भावाला विचारला. एवढ्या लहान मुलांना समलैंगिकता म्हणजे काय समजावून सांगता येत नसल्याची दिवाणी तक्रार रीतसर नोंदवून घेण्यात आली.

संस्थानाचे माजी राजोपाध्ये श्री. मा. उपाध्याय यांनी यापुढे महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्न सगळ्यांसमोर मांडला. "या समलैंगिकतेमुळे धर्म बुडतो आहे आणि आपल्या थोर संस्कृतीवर लांच्छन येते आहे. आपल्याला देवाने लैंगिक प्रेरणा दिल्यां त्यां फक्त प्रजोत्पत्तीसाठीं. यांचा आनंदासाठी वापर करणें आम्हीं एकवेळ समजून घेतलें असतें, पण लोकांनी त्यात फार स्वैराचार मांडला आहे. या लोकांना संस्कार नकोंत, पण सोहोळा हवा. निसर्गाच्या विरोधात जाण्याची किंमत काय आहे हे यां लोकांना समजत नाही. यां अंमळ विकृत लोकांमुळे आपला सहिष्णू समाज, आपली पवित्र संस्कृती आणि आपला महान धर्म यांना लाज येते आहे याची या लोकांना काहीही चाड नाही. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली ... संस्कृती कसली, अरे ही तर असंस्कृतीच! तिच्या प्रभावाखाली आणि नावीन्याच्या हौसेपोटी हें लोक स्वैराचार माजवत आहेंत. यांच्यामुळे मुलांचं बालपण आणि निरागसता संपत चालली आहे. लहान मुलांवर होणारे अत्याचार थांबवू शकत नाहीत म्हणून लैंगिक शिक्षणाची जी दळभद्री योजना काढली होती, त्याच कपटाचा हा आणखी एक भाग आहे. आपण याचा विरोध केलाच पाहिजें."

श्री. मा. उपाध्याय यांच्या भाषणाचा लोकांनी टाळ्या वाजवून स्वीकार केला. त्यापुढे सर्वात महत्त्वाचे भाषण झाले ते संस्थानाच्या संशोधनसंस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. कपटचिल्ली यांचे. प्रा. डॉ. कपटचिल्ली यांनी लैंगिकतेच्या आत्मिक बाजूवर गेली एकोणचाळीस वर्षे संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्री-पुरुष आणि बालकांवर शारीरिक, मानसिक आणि यौगिक प्रयोगही केले आहेत. ते म्हणाले, "माझ्या आधीच्या वक्त्यांनी समलैंगिकतेची धार्मिक बाजू चांगली मांडलेली असली तरीही त्यातली एक मुख्य वैज्ञानिक गोष्ट कोणाच्याही लक्षात आलेली नाही."

"गेली एकोणचाळीस वर्षं मी या विषयावर संशोधन करतो आहे. यातून माझ्या असं लक्षात आलं आहे की जे संबंध आणि ज्या लैंगिक कृती विषमलिंगी आणि पुनरूत्पादनासाठी नाहीत, अशा सगळ्या कृती, असे सगळे संबंध समलिंगी असतात. तुम्ही असंही म्हणाल की हे फक्त आपल्या संस्कृतीवर असणाऱ्या पाश्चात्य प्रभावामुळे झालेलं आहे. पण हे माझं संशोधन विश्वव्यापी आहे. आम्ही हे प्रयोग फक्त कांदा संस्थानच नाही तर शेजारच्या वांगीवाडीतही केले. आपल्याला माहित नसेल पण वांगीवाडीतले लोक या पाश्चात्य प्रभावापासून त्यांची संस्कृती जपून आहेत. त्यांच्या गावात गेली सतरा वर्षं हस्तमैथुनावरही बंदी आहे. या विषयातले काही परदेशी संशोधक, उदा. शेख सुलेमान अली, मु. गाबे बाब्वे, रे. पो. फ्रान असिस यांनी हे प्रयोग त्यांच्या देशातही केले. यात आम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट दिसून आली. ती अशी की हे संबंध विषमलिंगी नाहीत ते समलिंगी असतात."

"शिवाय या लोकांमधे अतिशय झपाट्याने उत्क्रांती होत आहे. पाश्चात्य लोक प्रयोग, आनंद आणि मानवतेच्या नावाखाली मानवाच्या नैसर्गिक उत्क्रांतीच्या मार्गात अडथळे आणत आहोत. इंग्लिश भाषेत असं म्हणतात की जे झाड वाढत नाही ते मरत आहे. हेच माणसालाही लागू आहे. माणसाची जर उत्क्रांती होत नसेल तर ही जमात सर्वनाशाकडे जात आहे. आपण आपल्या हातानेच आपला सर्वनाश ओढवून घेत आहोत."

"आपला सर्वनाश टाळायचा असेल तर समलैंगिकतेचे पैलू समजावून घेतले पाहिजेत. कोणत्याही प्रकारे माणसाने स्वतःसाठी लैंगिक आनंद मिळवला, स्वतःला आवडतं म्हणून सुंदर दिसलं, नवीन कपडे घातले, किंवा स्वतःच्या लैंगिक सुखासाठी काही कष्ट घेतले तर ही माणसाची समलैंगिक बाजूच आहे. हा शास्त्रीय संशोधनाचा निष्कर्ष, विदेसकट दाखवला तर तुम्हाला समजणार नाही म्हणून फक्त एक तर्कच मांडतो. आपण स्वतःला लैंगिक सुख मिळवून देणं म्हणजे समान लिंगी व्यक्तीला आनंद देणं. आणि आपल्याच लिंगाच्या व्यक्तीकडून आनंद मिळवणं. त्यामुळे आपण स्वतःला लैंगिक आनंद देणं ही समलैंगिकताच आहे. या समलैंगिकतेचा कहर म्हणजे स्वप्नदोष आणि हस्तमैथुन. आपल्यात पूर्वापार चालत आलेल्या म्हणी "वीर्यनाश म्हणजे सर्वनाश" हे आपल्या पूर्वजांना असणाऱ्या ज्ञानाचं द्योतक आहे. त्यांना भले आम्ही केले तसे किचकट प्रयोग करता आले नसतील, पण त्यांना मुळात काय महत्त्वाचं हे समजलं होतं हे निश्चित. अशाच अर्थाच्या म्हणी अन्य देशांमधेही आहेत यातून याची वैश्विकता स्पष्ट होते."

"स्वप्नदोष आणि हस्तमैथुन यातून आपण अनुत्पादक गोष्टी करतो आहोतच. पण मु्ख्य म्हणजे आपण उत्क्रांतीच्या उदात्त मार्गावरून दूर जातो आहोत. शरीरात बनणारी सारी द्रावणं फेकून देण्याच्या लायकीची नसतात. अगदी मानवी मलमूत्राचा उपयोगही सोनखत म्हणून होतो, पण आपण वीर्याचा सुकाळ असल्यागत हे फुकट घालवतो आहोत."

"आपला व्यक्तिगत आनंद बाजूला ठेवून आपण मानवजातीचा व्यापक विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. माझी आपणां सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बहुमताने, अणूबॉँबपेक्षा अधिक विध्वंसक आणि विनाशकारी असणाऱ्या कृतींवर बंदी घालावी. कांदा संस्थानातून हस्तमैथुन आणि स्वप्नदोष दोन्हींवर बंदी घालावी. शेजारच्या वांगीवाडीत हस्तमैथुनाला बंदी आहे. आपण त्यांच्या पुढे एक प्रागतिक पाऊल टाकावं आणि मानवी भवितव्य उज्ज्वल करावं."

ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडात प्रा. डॉ. कपटचिल्ली यांचे अभिनंदन केले. यापुढे हस्तमैथुन आणि स्वप्नदोषावर बंदी घालण्याचा ठराव ठेवण्यात आला. यावर मतदानाच्या आधी या ठरावावर मतप्रदर्शन करण्याची संधी ग्रामस्थांना दिली गेली. कोणी एक फाटका, शंकातुर इसम पुढे आला. त्याच्या मते "स्वप्नदोष हा दोष नसतो. हे नैसर्गिकतःच होतं. हस्तमैथुनाने कोणालाही अपाय होत नाही. यातून लोकांना निव्वळ आनंद मिळतो. तुम्ही लोकांना नैसर्गिक वागायला आणि आनंद घ्यायलाही मनाई करत आहात. हे योग्य नाही कारण ... " असं बोलायला सुरूवात केली. बहुसंख्य समुदायाने त्याच्यावर टोमॅटो, अंडी फेकून मारली. पण प्रा. डॉ. कपटचिल्ली यांच्या हस्तक्षेपामुळे ही हिंसा थांबली. प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी, 'विचारजंत' अशी पाटी त्याच्या गळ्यात अडकवून त्याची रवानगी सभागृहाबाहेर केली गेली. त्यानंतर मतदानात हस्तमैथुन आणि स्वप्नदोषावर बंदी घालण्याचा ठराव १००% मतांनी पारीत झाला.

आमच्या सूत्रांनुसार, सदर विचारजंत आता कोणत्यातरी युरोपीय देशात राजकीय आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रकाश घाटपांडे Thu, 12/12/2013 - 10:03

स्वप्नदोष व हस्तमैथुनाला प्रवॄत्त करणार्‍या नीलचित्रफीतींवर मात्र कांदा संस्थानात बंदी नाही हे जरा अनाकलनीय वाटते. म्हणजे गुन्हा करणार्‍याला शिक्षा पण त्यासाठी प्रवॄत्त करणारा मात्र मोकाट. हे न्यायाला धरुन नाही. शिवाय हस्तमैथुन व स्वप्नदोष हे प्रसंग खाजगी जागेत बंद दरवाजाच्या आत घडले तरी तो गुन्हा का याचे स्पष्टीकरण नाही.
मी म्हणतो कांदा संस्थानाने वांगीवाडीचाच आदर्श का घ्यावा. पुर्वेकडच्या केळेवाडीत लोक केळी खाण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी सर्रास वापरतात त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. असो खर्‍याची दुनिया नाही.

नगरीनिरंजन Thu, 12/12/2013 - 20:21

In reply to by प्रकाश घाटपांडे

नीलचित्रफिती व पीतसाहित्यविक्रीने कांदासंस्थानाचा जीडीपी वाढतो त्यामुळे त्या गोष्टी अतिपवित्र मानाव्यात असा आदेश सरपंच व संस्थानाचे माजी आर्थिक सल्लागार श्री. मौक्तिक नरहरी पाळे देण्याच्या बेतात आहेत.

बॅटमॅन Thu, 12/12/2013 - 22:39

In reply to by अनुप ढेरे

गुंडा नामक सिनेमहाकाव्यामधील इबू हटेला नामक पात्र आठवून अंमळ हळवा झालो.

अजो१२३ Thu, 12/12/2013 - 17:24

प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी, 'विचारजंत' अशी पाटी त्याच्या गळ्यात अडकवून त्याची रवानगी सभागृहाबाहेर केली गेली.

ऐसीवर उलटे होताना दिसत आहे.

सिफ़र Thu, 12/12/2013 - 18:14

फौजदारी वैगेरे म्हणजे जरा अतीच झाल राव …
उंबरठा च चांद मातला मातला गाणं पण म्हणताना भीती वाटतेय :)

आपल्याला देवाने लैंगिक प्रेरणा दिल्यां त्यां फक्त प्रजोत्पत्तीसाठीं.…. वाह ….
आज पासून कंडोम वर पण बंदी …… होऊ द्या भारत निर्माण ….

बॅटमॅन Thu, 12/12/2013 - 20:22

कांदासंस्थान काही गोष्टी विसरतंय. तो दोष स्वप्नात न होता जागेपणी झाला तर काय करायचे त्याचा पिल्यान नसल्याने "कांदा आदमी पार्टी" चा फियास्को होऊ नये म्हञ्जे मिळवली.

गब्बर सिंग Fri, 13/12/2013 - 06:39

मॅडम, दोन प्रश्न -

१) बहुपतित्व व बहुपत्नित्वाबद्दल कांदा संस्थानात चर्चा (विवाद) होते का ? का यांवर पण बंदी आहे ?

२) कांदासंस्थानात शेपुटघाले पक्ष (भाजपासारखे) आहेत का ?

मन Fri, 13/12/2013 - 09:19

In reply to by गब्बर सिंग

सध्याच्या काही प्रमुख पक्षांपैकी तुमच्या मते कोणते पक्ष शेपुटघाले नाहित?
काँग्रेस, सपा, बसपा, कम्युनिस्ट पार्ट्यांपैके एखादी पार्टी, जनता दलातील एखादा तुकडा, उर्वरित प्रादेशिक पार्ट्यातील एखादी पार्टी.

गब्बर सिंग Fri, 13/12/2013 - 22:35

In reply to by मन

सध्याच्या काही प्रमुख पक्षांपैकी तुमच्या मते कोणते पक्ष शेपुटघाले नाहित?

सवाल एकदम रास्त आहे.

पण भाजपा सगळ्यात जास्त शेपुटघाल्या आहे. नॅशनल पार्टी (विथ वाईडस्प्रेड बेस) असूनही समलैंगिकतेच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका अतिसंदिग्ध आहे.

आणि दुसरे म्हंजे, समलैंगिक कम्युनिटी मायक्रो-मायनॉरिटी (गृहितक) असूनही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/12/2013 - 20:46

In reply to by गब्बर सिंग

उत्तर देण्याचा एक प्रयत्न.

१. कांदासंस्थानात आपण होऊन काहीही होत नाही. भारतात काही झालं तर लगेच प्रतिक्रिया उमटतात.

२. कांदासंस्थानात संस्कृतिरक्षक लोक फार ताकदवान आहेत. त्यामुळे त्यांच्या शेपट्यांचे झेंडे झालेले असतात. भडक भगवे.

मन Fri, 13/12/2013 - 09:22

In reply to by ॲमी

Criticising national policies, doesn't make me anti-national अशी परिस्थिती तिथे आहे की धोरणे चूक म्हटली तर तुम्हे देशद्रोही मानले जाता?

ऋषिकेश Fri, 13/12/2013 - 12:17

In reply to by ॲमी

"काय मुर्खपणा आहे" हे स्वप्नात नक्की काय झाल्यावझ्र म्हणताय आणि त्यामुळेच स्वप्नदोष निर्माण होतोय असे सिद्ध झाल्यास त्यावरही बंदीचा विचार केला जाऊ शकतो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/12/2013 - 20:44

In reply to by ॲमी

तू कांदासंस्थानात रहात नसशील तर बिनधास्त म्हण. आपण आफ्रिकेबाहेर राहून नाही मुगाबेला नावं ठेवत!

अरविंद कोल्हटकर Fri, 13/12/2013 - 23:04

कांदा संस्थानचे आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद नावाचे एक सत्पुरुष होते. 'रक्तस्य दशपञ्चेभ्यो वीर्यबिन्दुर्विनिर्मित:। तस्मात्तं रक्षयेद्यत्नैराचाराद्ब्रह्मचारिण:॥' असा मोलाचा संदेश त्यांनी कांदासंस्थानवासीयांना दिला आहे.

त्यांच्या पीठाचे सध्याचे अधिकारी श्री५ आयुर्वेदाचार्य ताम्रपर्णीनिवासी बाळाचार्य नावाचे आहेत. वरील मार्गाने रेतस्तम्भन करून सुमुहूर्तावर वेद आणि मन्त्रघोषाने पवित्र झालेल्या अशा स्थानी ते योग्य पात्रामध्ये कसे स्थापन करावे, जेणेकरून तेजःपुंज पुत्ररत्नाची निश्चित प्राप्ति होते असे कांदा संस्थानवासीयांना मार्गदर्शन करणे हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले आहे.