Skip to main content

फॅंड्री - जाता नाही जात ती...

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)

भारतातल्या जातिव्यव्यस्थेबद्दल पुष्कळ बोललं, लिहिलं जातं. अनेकांशी बोलताना लक्षात येतं की एरवी उदारमतवादी वाटणारे लोकही जातीपातीविषयी बोलताना कधी कधी विखारी होतात. आधुनिक भारतात निम्नजातींना कशा अनेक संधी आहेत, त्यांची कशी प्रगती होते आहे वगैरे आकडेवारी एकीकडे दाखवली जाते; तर दुसरीकडे परंपरेनं सवर्ण मानलेल्या जातींमध्ये आरक्षणासारख्या धोरणांचे फायदे मिळावे म्हणून धडपड चालू दिसते. एकीकडे महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा आहे वगैरे म्हटलं जातं; तर दुसरीकडे खैरलांजी, जात पंचायतींसारख्या घटना अजूनही 'पुरोगामी' महाराष्ट्रात घडत असतात.

ह्या सगळ्या मतमतांतरांच्या आणि समांतर वास्तवांच्या गदारोळात दलित साहित्यानं महाराष्ट्रात पाय रोवला आणि जातीय वास्तवाचा दाहक प्रत्यय त्या साहित्यातून यायला लागला. मराठी साहित्यसृष्टी त्यानं हादरली. हे काही तरी वेगळंच आहे ह्याची जाणीव भारतीय साहित्यातही पसरली. पण साहित्य हे माध्यमच शिकल्या-सवरलेल्यांसाठीचं असल्यामुळे पूर्वीच्या मौखिक परंपरेतल्या लोकसाहित्यापेक्षा ह्या साहित्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचायला काही मर्यादा पडल्या. विसाव्या शतकातल्या भारतात लोकसंस्कृती ही लिखित साहित्यापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून पटकन पोहोचणाऱ्या सिनेमातून अधिक दिसू लागली. पण सिनेमा माध्यमाला वेगळ्या मर्यादा होत्या. सिनेमा बनवणं हेच एक खर्चिक आणि सांघिक काम होतं. दलित कवी एखाद्या झोपडपट्टीत राहून, शेतात किंवा मुंबईच्या गिरण्यांमध्ये राबूनही सशक्त कविता लिहीत होते, पण सिनेमातून आपल्यातला विद्रोह व्यक्त करणं तितकं सोपं नव्हतं. भल्याभल्यांचे हात सिनेमे काढून पोळले होते. शिवाय, जो सिनेमा पैसा आणि लोकप्रियता कमावत होता तो दाहक वास्तवाशी फटकून होता.

पण ही परिस्थिती २१व्या शतकात हळूहळू बदलली. फिल्म फेस्टिव्हल्स आणि सोशल नेटवर्किंगमधून 'शिप अॉफ थिसिअस'सारखा गंभीर आणि कमी खर्चात बनवलेला सिनेमा आता मर्यादित प्रमाणात लोकप्रियता मिळवू शकतो. स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षांनी का होईना, पण सर्वसामान्यांहूनही दीन परिस्थितीतून आलेल्या नागराज मंजुळेची 'फॅंड्री' १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. अनेक महोत्सवांतून पारितोषिकं आणि प्रेक्षकांच्या पसंतीची पाठीवर थाप 'फॆंड्री'ला अगोदरच मिळालेली आहे. रसिकमान्यता आणि लोकमान्यता एकाच वेळी साधण्याची ही किमया काय आहे?

'लहान मुलांचं भावविश्व दाखवणारा सिनेमा' असं म्हटलं की गोग्गोड 'माजिद माजिदी'छापाचं कृतक् काही तरी पाहावं लागणार अशी भीती आताशा भेडसावते. अबोध वयातली प्रेमकथा हा फॅंड्रीतला एक घटक आहे. ती तशी गोग्गोड व्हायचा धोका निश्चित होता, पण नागराजनं तो टाळला आहे. 'शाळा', बी.पी., टी.पी. प्रभृतींपेक्षा इथल्या जब्याचं गाव अधिक वास्तवाच्या जवळ जाणारं असावं. स्वप्नाळू जब्या आणि त्याला पदोपदी जमिनीवर खेचणारं ते वास्तव ह्यामुळे 'भावविश्व' हा गुळगुळीत शब्द त्याला वापरू नये अशी इच्छा होते. किशोर कदमसारखा एखादा अपवाद सोडता ह्यात कसलेले नट नाहीत. नट नसलेल्या, पण सिनेमातल्यासारखंच वास्तव जगत असलेल्या आणि म्हणून पडद्यावर परिणामकारक ठरणाऱ्या नटांना घेऊन केलेली फॅंड्री 'निओ-रिअलिझम'चं लेबल बाळगत व्हित्तोरिओ द सिकाच्या 'बायसिकल थिफ'शी त्यामुळे अधिक जवळचं नातं सांगते. कितीही पिच्छा पुरवला तरी हाती न गवसणारं पाखरू आणि डुक्कर ही परस्परविरोधी प्रतीकं वापरून ती वास्तववादापलीकडेही जाते आणि त्यातल्या जब्यासाठी काही अस्तित्ववादी प्रश्नही उपस्थित करते.

'सामाजिक आशय दाखवणारा सिनेमा' हे असंच घासून गुळगुळीत झालेलं आणखी एक लेबल. हे लेबल घ्यायचं, समाजवादी, उदारमतवादी वगैरे विचारांचे लेप चढवत चढवत चकचकीत आणि शहरी प्रेक्षकासाठी नेत्रसुखद सिनेमा करायचा आणि करिअर 'बनवायची' अशी रेडीमेड रेसिपीच पुरोगामी महाराष्ट्रात आहे. घाऊक बक्षिसघेऊ अशा ह्या सिनेमांच्या मदतीनं कुणाही सोम्यागोम्याला आपली करिअर उभी करता येते हे महाराष्ट्रात पूर्वीच सिद्ध झालेलं प्रमेय आहे. नागराजनं हा धोकासुध्दा टाळला आहे. तो प्रेक्षकाला कुरवाळत नाही, सिनेमाला घासूनपुसून गुळगुळीत करत नाही आणि (शेवटचे नाट्यमय प्रसंग वगळता) कथानकातला सामाजिक आशय मुद्दाम अधोरेखितही करत नाही. संवादांतून किंवा चर्चानाट्यातून पात्रं आपली वैचारिक, सामाजिक बैठक वगैरे उलगडत सुटतात असा चाकोरीबद्ध पलायनवादही तो पत्करत नाही. सिनेमातल्या पात्रांच्या आपापल्या गोष्टींमधून आणि एकमेकांबरोबरच्या वर्तनातून सामाजिक आशय सहज लक्षात येईल ह्याची काळजी मात्र तो घेतो. कथानकातल्या नाट्यमय चढउतारांद्वारे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचं कसबही तो चांगल्या प्रकारे, आणि तरीही बटबटीत मेलोड्रामा टाळून वापरतो. सुरुवातीला काव्यात्म वाटणारं अवघड वयातल्या मुलाचं जग हळूहळू विदारक कसं होत जातं तेही उल्लेखनीय आहे.

'आत्मचरित्रात्मक' हे आणखी एक लेबल. त्याचाही गुळगुळीत फॉर्म्युला होऊ शकतो. 'फॅंड्री' हे सिनेमाचं नाव किंवा जब्या, कचरू, पिराजी अशी पात्रं घेत आणि गावातल्या खऱ्याखुऱ्या वाटाव्यात अशा चेहऱ्यांच्या मदतीनं केलेल्या फॅंड्रीत आत्मकथा कुठे संपते आणि सिनेमा कुठे सुरू होतो ह्याचा फारसा विचार न करता नागराज एक जोरकस, सणसणीत गोष्ट सांगतो. (त्यातलं एक पात्र खुद्द नागराजनंच उभं केलंय, पण त्यात कसलाही, म्हणजे हिचकॉक किंवा गेलाबाजार सुभाष घईची वाट चोखाळत असल्यासारखा, आव नाही.) रखरखीत जातीय वास्तव मांडताना सिनेमातला निसर्ग गरजेहून जास्त नेत्रसुखद होणार नाही ह्याचीही काळजी घेतलेली आहे. गावातली गटारं, उच्छाद मांडणारी डुकरं आणि इतर बकालीसकटचं गाव ह्यात दिसतं.

एकंदरीत सांगायचं तर मोठ्या पडद्यावर आवर्जून पाहावा असा, 'पर्सनल इज पॉलिटिकल' म्हणणारा मराठी सिनेमा अनेक दिवसांनंतर आला आहे. तो जरूर पाहा.

समीक्षेचा विषय निवडा

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/02/2014 - 20:05

(याचीही DVD येणार नाही का? असं असेल तर येत्या आठवड्यात सिनेमा डाऊनलोड करून पहावा का? DVD येईल तेव्हा ती विकत घेता येईलच.)

कान्होजी पार्थसारथी Thu, 13/02/2014 - 21:37

टी.पी/दुनियादारी आदि बघुन सोकावलेल्या तथाकथित मराठी चित्रपटप्रेमींच्या डोळ्यात वंगण घालणारा अभिनिवेश नस्लेला सिनेमा. नागराजचं हे काम जबरदस्त आहे.
बटबटीत मेलोड्रामा नाही त्यामुळे जे मांडायचंय ते अधिक परिणामकारक वाटले.
अवश्य पाहाच.
('माजिद माजिदी'छाप थोडासा कृतक असला तरी त्याच्या सिनेमात आजुबाजुचं वातावरण येतं ते प्रामाणिक वाटतं. ते गरजेहुन जास्त भडकही नसतं आणि त्यांचा सामाजिक स्तर दाखवताना तो काळजी घेतो असं वाटतं. त्यातलं सगळंच गोग्गोड वाटत नाही.)

'न'वी बाजू Thu, 13/02/2014 - 21:44

In reply to by कान्होजी पार्थसारथी

टी.पी/दुनियादारी आदि बघुन सोकावलेल्या तथाकथित मराठी चित्रपटप्रेमींच्या डोळ्यात वंगण घालणारा अभिनिवेश नस्लेला सिनेमा.

डोळ्यांत वंगण???

म्हणजे, हल्ली ते डोळ्यांत घालण्याचे ल्यूब्रिकेटिंग ड्रॉप्स मिळतात (व्हायझीन वगैरे), तसल्यासारखा काही प्रकार आहे काय?

(सहसा डोळे कोरडे पडत असतील, तर घालतात. टी.पी. (हे जे काही असेल ते)/दुनियादारी वगैरे पाहून डोळे कोरडे पडतात काय?)

(पूर्वीच्या काळी 'प्रभात'चे पिच्चर पाहून लोकांचे डोळे ओले होत असत, अशी ख्याती होती. ज़माना बदल गया है, हं?)

(अतिअवांतर: 'डोळ्यांत अंजन घालणे' असा कायसासा एक जुना वाक्प्रचार कधीकाळी ऐकला होता, त्याची, का कोण जाणे, पण आठवण आली.)

Nile Fri, 14/02/2014 - 02:10

In reply to by 'न'वी बाजू

डोळ्यांत वंगण???

पुणेरी मराठी वाचून सोकावलेल्या तथाकथित उच्चभ्रु मराठी भाषाप्रेमींच्या डोक्यात अंजन घालणारा वाकप्रचार आहे तो!

बॅटमॅन Fri, 14/02/2014 - 02:35

In reply to by Nile

वंगणाविना डोळे काम नीट करेनासे झाले तर वाकवाकून बघावे लागेल सगळे. त्यामुळे 'वाकप्रचार' बद्दल खच्चून सहमत.

अन डोक्यात अंजन घातले तर डोके दुखायचे थांबेल, हेही ओघाने आलेच, नाही का?

'न'वी बाजू Fri, 14/02/2014 - 04:14

In reply to by बॅटमॅन

अन डोक्यात अंजन घातले तर डोके दुखायचे थांबेल, हेही ओघाने आलेच, नाही का?

डोक्या (थोडेसे) अंजन लावले, तर डोके दुखायचे थांबेल खरे.

मात्र, उदा., डोक्या अंजनाची (आख्खी) बाटली घातली, तर डोके अधिकच दुखेल.

सुनील Mon, 17/02/2014 - 12:32

In reply to by बॅटमॅन

अन डोक्यात अंजन घातले तर डोके दुखायचे थांबेल, हेही ओघाने आलेच, नाही का?

आमचे एक परिचित, डोके चालेनासे झाली की विचारशक्तीला चालना देण्यासाठी, स्वतःच्या गुढघ्याला अंजन लावतात!

बॅटमॅन Fri, 14/02/2014 - 01:13

ओळख तरी मस्तच करून दिलेली आहे. ए एस ए पी हा पिच्चर पाहीनच.

बाकी इतकं त्याबद्दल वाचलं पण फँड्री या शब्दाचा नक्की अर्थ काय ते कळालं नाही. त्या पोराचं नाव आहे, की अजून काही?

फेबुवरही अशाच पोष्टी. कोणीतरी सांगा रे काय भानगड आहे ही!!!!!!

कान्होजी पार्थसारथी Fri, 14/02/2014 - 03:52

In reply to by बॅटमॅन

थिंग टु एक्स्पीरिअन्स!

बॅटमॅन Fri, 14/02/2014 - 16:44

In reply to by चिंतातुर जंतू

&%$!@#$%%$#@!!!

वरील प्रतिसादही काही नाट्यमय प्रतिक्रियेस उद्देशून आहे याची कृपया नोंद घेणे ;)

(नाट्यप्रेमी) बॅटमॅन.

टिन Fri, 14/02/2014 - 01:37

थँक्यु! माजिद मजिदीबद्दलचं मत वाचुन वाटलं कोणत्यातरी जाणकार व्यक्तीलाही आपल्यासारखंच वाटतंय म्हणजे मी एकदमच ढ नसणार सिनेमाच्याबाबतीत. एक 'चिल्ड्रन ऑफ हेवन' पाहील्यावर पुढचा त्याचा सिनेमा बघायला सुरवात केली होती, पण फारच कंटाळा आला.

फूलनामशिरोमणी Thu, 04/02/2016 - 00:23

In reply to by टिन

माजिद माजिदीचा "चिल्ड्रन ऑफ हेवन" प्रचंड आवडला होता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो गोडगोड असेलही, तरी त्या काळी इतके वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी चित्रपट कमी होते. आजकाल वास्तवदर्शनाचं पण फॅड आलंय की. फॅन्ड्रीसुद्धा आवडलाच. दोन्ही सारखेच आवडले. तुलना करता येणार नाही.

घनु Fri, 14/02/2014 - 11:35

पुणे फिल्म फेस्टिवल मधे पाहिलेला सर्वात बेश्ट शिनेमा rather मी म्हणेन अत्तापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांमधला एक अप्रतिम सिनेम/कलाकृती. वास्तवाचं एवढं धगधगतं चित्रण चित्रपटांमधून खुप विरळ पहायला मिळतं. आणि मला दिग्दर्शकाचं खास कौतूक ह्यासाठी करावं वाटतं की त्याला जे वाटलं ते त्याने अगदी हुबेहुब उतरवलं आहे, अगदी कुठलाही नाटकी आणि कृत्रिम वापर न करता (आणि व्यावसायिक दृष्ट्या ही खुप मोठी 'रिस्क' आहे असं मला वाटतं). बरेचदा आपण साधं आपल्या वक्तव्यातून किंवा लिखाणातून देखील एवढा खरा आणि नैसर्गिक भाव आणू करू शकत नाही.

चित्रपटात संगीताचा वापर खुप मोजका पण योग्य केला आहे आणि म्हणूनच तो परिणामकारक आहे. जब्याच्या मनात चाललेल्या 'रोमॅन्टीक' विचारांच्यावेळी जे एक पार्श्वसंगीत आहे (बुलबुल किंवा गिटार वर वाजवलेल्ं , पाण्याच्या संथ लहरींसारखं) ते जितकं रोमॅन्टीक आहे तितकचं अंतर्मुख करतं आणि सतत वास्तवाची जाण देऊन टोचत राहतं...

काही दिवसांनी हा सिनेमा टिव्ही वर येईलच किंवा डिव्हीडी वर (वा आंतरजालावर), पण शक्य असल्यास असे सिनेमे सिनेमागृहात जाऊन पाहिल्याने नागराज मंजुळे सारख्या नविन दिग्दर्शकांना जरुर प्रोत्साहन मिळेल.

मन Fri, 14/02/2014 - 12:30

उद्या सकाळचा खेळ पहावा म्हटलं फॅण्ड्रीचा. मगरपट्त्यातील एक थिएटर सोडून कुठेही सकाळचा खेळ सापडला नाही.
डाय्रेक दुपारी बारा दोन नंतरच सगळं.
बहुतेक हा चित्रपट पुढील आठवड्यात पहावा लागणार.
तोवर तो थेट्रांमध्ये टिकावा इतकीच इच्छा आहे.

ऋता Fri, 14/02/2014 - 12:53

कोणतीही लेबल्स स्वतः न लावता पण इतरांनी लावली आहेत त्याचा आधार घेत चांगला परिचय करून दिला आहे.

रविवारची तिकिटे काढली.

ऋषिकेश Fri, 14/02/2014 - 13:57

In reply to by अनुप ढेरे

बहुदा असतील.
गेल्या काही महिन्यांत हा ट्रेंड बघितला आहे. डेढ इश्कीया, अ रेनी डे या दोन्ही नॉन-इंग्रजी चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स होती

मिहिर Fri, 14/02/2014 - 16:41

रखरखीत वास्तव मांडणारा सिनेमा. फार आवडला. परिचयाबद्दल आभार.

@अनुप ढेरे: मी विद्यापीठ रोडवरच्या ई-स्क्वेअरमध्ये पाहिला. तिथे सबटायटल्स होते. माझे दोन अमराठी मित्रही आले होते.

सन्जोप राव Sun, 16/02/2014 - 07:14

'फॅन्ड्री' या शब्दाच्या वापराबद्दल एवढे रहस्य का ते कळाले नाही. डुकराला आणि डुकरासारख्या समजल्या माणसांना हिणवून वापरण्यासाठीचा तो एक तुच्छतादर्शक शब्द आहे, इतकेच.
नागनाथ मंजुळेच्या प्रयत्नांबद्दल कौतुक बाळगूनही 'फँड्री' काही माझ्या मनाच्या तळाशी उतरुन तेथे रेंगाळत राहिला नाही. त्या मानाने '७२ मैल' ने मला अधिक अस्वस्थ केले होते.
गावाबाहेर डुकरे धरणार्‍यांची पाले पडत असत. कुणालाही न कळणार्‍या हेंगाड्या भाषेत ते लोक एकमेकांशी बोलत असत. हातात एक काठी आणि तिला गुंडाळलेला कासरा असला फासा करुन ते लोक गावातल्या डुकरांचा पाठलाग करत असत. डुकरे गावभर चीं चीं करत पळत असत. मग हाती सापडलेल्या डुकराचे पाय बांधून त्याला उलटे वाशावर टांगून हे लोक आपल्या वस्तीवर घेऊन येत असत.ते डुक्कर धडपड करत भयानक केकाटत असे. मग संध्याकाळच्या वेळी तीन दगडांच्या चुलीवर हे डुक्कर शिजायला पडत असे. डुकराची कातडी, केस, त्याची आतडी हे सगळे तिथेच कोपर्‍यात माळावर पडलेले असे. एकदा त्या लोकांमधील एक तीन-चार वर्षाची झिंज्या विस्कटलेली, फाटक्या झग्यातली मुलगी एखाद्या बाहुलीशी खेळावे तशी त्या डुकराच्या आतड्यांच्या वेटोळ्यांशी खेळत असताना मी पाहिली होती. हे सगळे आमच्या शाळेच्या वाटेवरच होते. 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो' ही आमच्या शाळेची प्रार्थना सुरु असताना हाकेच्या अंतरावर या लोकांच्या वस्तीतली ही काळीबेंद्री, शेंबडी पोरे उघड्या अंगाने आपल्या करदोट्यात हात घालून, बोटे चोखत आमच्या प्रार्थनेकडे बघत उभी असत.
गावातले उकिरडे उपसायला, मेलेली जनावरे गावाबाहेर नेऊन टाकायला, मैला साफ करायला, पायताणे बांधून द्यायला गावातले महारमांग येत असत. त्यांचे मळके,फाटके कपडे, किडके दात, काळी, वास येणारी शरीरे, त्यांच्या चेहर्‍यावरील लाचार, शरमेने काळे पडलेले भाव आणि त्यांच्यावर मग्रुरी गाजवणारे गावातले मराठा,ब्राह्मण, जैन, लिंगायत समाजातले लोक यालाच त्या काळात 'समाज' म्हणत असत. घराबाहेरच्या, हॉटेलबाहेरच्या पडक्या भिंतींवर बिनकानाचे फुटके कप असत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून,'मोती' साबणाने अभ्यंगस्नान करुन,'मैसूर सँडलवुड तेल लावून,नवे कपडेबिपडे घालून फराळ आणि दहीपोहे यांची वाट बघत असताना बाहेर म्हाराचे वाजाप येत असे. दिवाळीच्या दिवशीही त्याच्या अंगावर फाटकेच कपडे असत. त्याला 'पर्स' होणार नाही की काळजी घेऊन त्याला काहीबाही फराळाचे वाढले जाई. 'एकादा जुना शर्ट आसला तर बगा, दिवाणजी..' असे तो म्हणत असे. त्याच्या श्वासाला दुर्गंधी असे. दारुचीही.
हे सगळे माझ्या मनाच्या पहिल्या पानावर छापलेले आहे. त्यामुळे 'फँड्री' बघून पांढरपेशांना जो धक्का बसतो, तसा मला काही बसला नाही. 'फँड्री' बद्दल बोलताना फेसबुकवर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये अमृता सुभाषने इंग्रजी बोलत केले आहेत तसे विभ्रमही मला करावेसे वाटले नाहीत. 'मराठी सिनेमा विल नेव्हर बी दी सेम अगेन' असे (इंग्रजीत) म्हणावेसेही मला वाटले नाही. अर्थात ही मर्यादा माझी आहे, 'फँड्री' ची नाही, हे मला मान्य आहेच.
थिएटर भरलेले होते. मागच्याच रांगेत राष्ट्राचे भावी स्तंभ वगैरे असलेल्या तरुणांचे एक टोळके होते. शालू पडद्यावर येताक्षणी शिट्ट्यांची ललकारी घुमली. 'लाईन आली बग..' कुणीतरी ओरडले. मध्यंतरात 'ये दिल्या, लई बोअर व्हायलंय लगा..' हेही ऐकू आले. संपूर्ण चित्रपटभर हेच सुरु होते. चित्रपट संपताना कुणीतरी 'पयशे परत..' असेही ओरडले.यात किंचितही अतिशयोक्ती नाही.हे शब्दशः असेच घडले.
परत येताना डोक्यात घण पडत होते. त्यांत 'फँड्री' चा वाटा किती हे मला सांगता येणार नाही.

कान्होजी पार्थसारथी Sun, 16/02/2014 - 15:08

In reply to by सन्जोप राव

'फॅन्ड्री' या शब्दाचा अर्थ बर्‍याच परीक्षणांतून सांगितला गेला होता. नागराज मंजुळेंनाच बहुदा हे रुचले नाही.(एक परीक्षण लिहिणार्‍या मित्राचे सांगणे)
लहानपणी मला माझ्या गावी या समूहाला पाहता आले. बर्‍याच बाबी सारख्या असल्या तरी काही फरक आहेत. ग्रामपंचायत त्यांना डुकरे पकडायला अल्पसा मोबदला देई. त्यांना प्रत्यक्ष डुक्कर पकड्ताना पाहिले नाही तरी एका तिचाकीतून धरलेली डुकरे घेऊन जाताना पाहिले आहे.

प्रत्यक्ष स्पॄश्यास्पॄशतेचा कुठ्लाच अनुभव नाही. घरापुढेच रस्त्यापलीकडे मांगवस्ती आहे. कळकट वाटणार्‍या तक्लादु पूर्वीच्या झोपड्यांत आता बरीच पक्की घरे दिसतात. कधी मधी यल्लमाचा जोगवा मागायला येणार्‍या तिथल्या आजीला घरात विटाळ झाला नाही. तरीही अप्रत्यक्ष स्पॄश्यास्पॄशता आजही घरी असते. म्हातार्‍यांच्या तोंडी 'महारामांगाचा हाईस का' ही शिवी आहेच. अजुन एक म्हणजे या महारामांगांपैकी महार हे आंबेडकरी. मांगांना आंबेडकरांशी जवळीक नाही आणि मांगांच्या लेखी ते खालचे. या छोट्याश्या वस्तीला लागुन एक चांभाराचे घर आहे. नान्या चांभार मांगवस्तीच्या आणि त्याच्या घराच्या मधून एक पायवाट जाते हे ठासून सांगून तो त्या वस्तीत येत नाही हे सांगतो. जातीयता रुतलेली आहे, आणि ती अशी गुंतागुंतीची आहे.

बाकी गुलछ्बू उद्देशाने आलेल्या सर्व तरुणांनी हेच केले.सगळ्या रांगा यांनीच भरल्या होत्या. "आयला, अजय-अतुल भावाचं गाणं बघायला आल्तो खास, फ्यांड्री केला रांडंच्यांनी" ही एक "कोल्हापूरी" "चाबूक(!)" कॉमेंट.
परतताना, गाडीवर थोडावेळ तसाच बसलो होतो. समोरून एक चार-पाच जणांचा घोळ्का आला. त्यापैकी कुणीतरी चित्रपटात 'नागराज' कोण हे सांगत होता. ते जवळ आल्यावर त्यांना पिक्चर कसा वाटला हे विचारलं. त्यांच्या प्रतिक्रिया आश्वासक होत्या. त्यांची विचारचक्रे शाबुत आहेत हे बरं वाटलं. हा त्यातल्या त्यात ओअ‍ॅसिस.

चिंतातुर जंतू Sun, 16/02/2014 - 16:11

In reply to by कान्होजी पार्थसारथी

>> 'फॅन्ड्री' या शब्दाचा अर्थ बर्‍याच परीक्षणांतून सांगितला गेला होता. नागराज मंजुळेंनाच बहुदा हे रुचले नाही.(एक परीक्षण लिहिणार्‍या मित्राचे सांगणे)

आजच्या म.टा.त नागराज मंजुळे स्वतः त्याविषयी बोलले आहेत.

विसुनाना Mon, 17/02/2014 - 13:27

In reply to by सन्जोप राव

अगदी असेच सन्जोप रावांसारखे फक्त चित्रपट न पहाता म्हणतो. खरे तर चित्रपट न पहाताच तसा अधिकार नसेल पण तरीही अनागरी वातावरणात हे असे बरेच पाहिल्याने धक्का बसला नाही. एक काळ समाज तसा होता - तरीही माझे कुटुंब तसे त्याकाळी वागत नसे. 'पोर्गं म्हाराच्या हातच्या मिलोच्या भाकर्‍या खातंय' हे मीच स्वतः अनुभवलेलं आहे. वडर समाजातले माझे मित्र होते. त्यांच्या मनात आमच्याप्रती त्यावेळी विरोध (आता जाणवणारा विखार) भरलेला होता असे कधी जाणवले नाही. तो त्यांच्या मनात होता असे मानून चालले तरी आमच्या मनात त्याच्याबद्दल तो मुळीच नव्हता. माझी प्रत्यक्ष आजी जी पूर्वी सोवळे पाळत असे तिच्या स्वयंपाकघरात माझे हे मित्र जेवले तेव्हा जातपात मोडली गेली.

त्या गोष्टी होऊन आता वीस-पंचवीस वर्षे झाली आणि मग अचानक यत्रतत्रसर्वत्र जातीभेदावरून रान पेटले आहे. दलित साहित्यामुळे मराठी भाषेला एक नवे अनुभवविश्व खुले झाले असे म्हणायची पद्धत रूढ झाली. कदाचित ने अनुभव मोठ्या शहरात नवे असतील तर असोत बापडे पण कुंपणाच्या या बाजूने ते अनुभव निदान मला तरी होते आणि ते कुंपण बरेचसे तोडले गेले होते. तरीही ह्यॅ:, तुला काय ते जळजळीत वास्तव जगायला लागले? असे म्हणून कोणी माझ्या संवेदनशीलतेवर थुंकणार असेल तर थुंको बापडे...

चिंतातुर जंतू Mon, 17/02/2014 - 13:58

In reply to by विसुनाना

>> दलित साहित्यामुळे मराठी भाषेला एक नवे अनुभवविश्व खुले झाले असे म्हणायची पद्धत रूढ झाली. कदाचित ने अनुभव मोठ्या शहरात नवे असतील तर असोत बापडे पण कुंपणाच्या या बाजूने ते अनुभव निदान मला तरी होते आणि ते कुंपण बरेचसे तोडले गेले होते.

दोन वेगळ्या मुद्द्यांची सरमिसळ होते आहे का? दलित साहित्यात जे अनुभव लिहून आले ते लोकांनी पिढ्यानपिढ्या अनुभवलेले होतेच आणि तरीही त्या अनुभवांना मराठी साहित्यात स्थान नव्हतं. त्यामुळे तोवरच्या मराठी साहित्यात जीवनानुभवाचं जे प्रतिबिंब पडत असे ते तोकडं किंवा अपुरं होतं. ती जागा दलित साहित्यानं भरून काढली. स्त्री साहित्यानं तशीच, पण वेगळी जागा भरून काढली. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा 'हे अनुभव नवे नसल्यामुळे धक्का बसला नाही' असा दिसतो. पण धक्काच बसला पाहिजे अशी गरज नाही. ते साहित्य (किंवा सिनेमा किंवा इतर काही) तुम्हाला भिडतंय का असा प्रश्न मुख्य आहे. आणि भिडण्यासाठी ते विश्व तुम्हाला अपरिचितच असावं अशी अटही नाही, किंवा तुम्ही तशा अन्यायग्रस्त समाजातलेच असायला हवेत अशीही अट नाही.

विसुनाना Mon, 17/02/2014 - 15:18

In reply to by चिंतातुर जंतू

त्या अनुभवांना मराठी साहित्यात स्थानच नव्हते असे म्हणण्यापेक्षा त्याप्रकारचे लेखनच त्याकाळात पहिल्यांदा झाले (नामदेव ढसाळ, दया पवार किंवा फोर्ड फाऊंडेशन विजेता लक्ष्मण माने इ.) या नव्या लेखकांना डोक्यावर घेताना (पुढारलेल्या जातीच्या) वाचकांनी त्यांची जात पाहिली नाही. अनुभवांची सच्चाई पाहिली. त्यामुळे वेगळे स्थान निर्माण झाल्यासारखे दिसले.

पण म्हणून "हे तुम्हाला मुळातून माहितच नव्हतं , ते आम्ही दाखवलं" असे म्हणणे हा अंधपणाचा आरोप मान्य माही. उदा. धाकल्या माडगुळकरांनी धनगरांबद्दल लिहिले तर ते गुडीगुडी आहे, वास्तव नाही असे का म्हणायचे? बनगरवाडीमधली अनुभवांची सच्चाई का नाकारायची?

>> त्यामुळे वेगळे स्थान निर्माण झाल्यासारखे दिसले.

विधानाचा नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे ते कळलं नाही. 'वेगळं स्थान खरं तर नव्हतं, पण ते निर्माण झाल्याचा आभास उत्पन्न झाला, आणि तो केवळ उच्चवर्णीय वाचकांनी ते लिखाण डोक्यावर घेतल्यामुळे झाला' असा काही तरी अर्थ पोचतोय, पण तसं तुम्हाला म्हणायचं असावं असं वाटत नाही.

>> उदा. धाकल्या माडगुळकरांनी धनगरांबद्दल लिहिले तर ते गुडीगुडी आहे, वास्तव नाही असे का म्हणायचे? बनगरवाडीमधली अनुभवांची सच्चाई का नाकारायची?

असं कोण म्हणतंय? त्याला का महत्त्व द्यावं? आणि 'फँड्री'विषयीच्या चर्चेत त्याचं काय स्थान? हे कळलं नाही. त्यामुळे पास.

विसुनाना Mon, 17/02/2014 - 16:27

In reply to by चिंतातुर जंतू

असे प्रत्यक्ष माझे अनुभव म्हणतात. ज्या लेखकरावांनी असे एक पुस्तक लिहिले आहे त्यांच्या पुस्तकाची (चांगली - म्हणजे जागतिक दर्जाच्या इतर साहित्याबरोबर तुलना करणारी) समीक्षा करणार्‍या विद्वान (पण उच्च जातीच्या) व्यक्तीस त्या (अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या) लेखकरावांनी "तुम्हाला काय कळतं त्यातलं? ज्याचं जळतं त्यालच कळतं" वगैरे सुनावल्याचे प्रत्यक्ष अनुभवले आहे. म्हणून त्याला महत्त्व द्यायचे.
म्हणून हा प्रतिसाद.:(

आबा Mon, 17/02/2014 - 13:59

In reply to by विसुनाना

"बीन देअर, डन दॅट" हा अ‍ॅटीट्यूड सुद्धा वेगळ्या पातळीवरचं रोम्यांटिसिजमच आहे, ज्याच्या तुम्ही विरोधात आहात (असं वाटतंय)

बॅटमॅन Mon, 17/02/2014 - 14:42

In reply to by विसुनाना

कदाचित ने अनुभव मोठ्या शहरात नवे असतील तर असोत बापडे पण कुंपणाच्या या बाजूने ते अनुभव निदान मला तरी होते आणि ते कुंपण बरेचसे तोडले गेले होते. तरीही ह्यॅ:, तुला काय ते जळजळीत वास्तव जगायला लागले? असे म्हणून कोणी माझ्या संवेदनशीलतेवर थुंकणार असेल तर थुंको बापडे...

बाकी प्रतिसादही भारीच, पण या भागासाठी विशेष टाळ्या. अतिशय मार्मिक.

दोन संस्कृतींमधील विरोधाभास जितका जास्त, तितकं ते वास्तव अधिक अंगावर येतं. अतिनागरी अन अतिग्रामीण यांतील मोठा विरोध जर अतिनागरी लोकांनी उचलून धरला, तर तो अतिनागरी समाजासच जास्त भारीबिरी वाटेल. तुलनेने अल्पनागरी ब्याकग्रौंड असलेल्यांना त्याचं इतकं विशेष वाटणार नाही. त्यामुळे जर कोणी जजमेंट पास करू पाहत असेल, तर करूदे. तथाकथित उच्च नैतिक भूमिका घेऊन दुरून असे बोलणे लै सोप्पे असते.

एका मित्रानं सांगितलेलं अँड्रे बीटेलचं एक वाक्य अशावेळेस हमखास आठवतं. "अलीकडे सबाल्टर्न/खेडवळ लोकांचा कळवळा लै येत असला तरी त्यांच्याबरोबर राहण्यात कोणालाही स्वारस्य नाही."

असो.

ऋषिकेश Mon, 24/02/2014 - 14:52

In reply to by विसुनाना

तरीही ह्यॅ:, तुला काय ते जळजळीत वास्तव जगायला लागले? असे म्हणून कोणी माझ्या संवेदनशीलतेवर थुंकणार असेल तर थुंको बापडे...

विनुनाना काय म्हणताय ते समजतेय, पण तरी चित्रपट पहाच!
कारण इथे नेमके या चित्रपटात तुम्हाला अश्या प्रकारच्या साहित्यांत/लेखनात अपेक्षित असणारा/कित्येकदा बटबटीतपणे मांडलेला अभिनिवेशच नाहीये. त्यामुळे चित्रपट वेगळा ठरतो. असो. पण बघाच!

ऋषिकेश Mon, 24/02/2014 - 14:49

In reply to by सन्जोप राव

त्यामुळे 'फँड्री' बघून पांढरपेशांना जो धक्का बसतो,

यातपशीलांमुळे पांढरपेशांना धक्का बसतोय म्हणून चित्रपट चालतोय असे वाटत असेल तर असहमती नोंदवतो. हा चित्रपट धक्कादायक फार कोणाला वाटला नसावा मात्र परिणामकारक खचितच आहे! इथे ही बाब नवी/कमी प्रकाशात असणारी आहे आणि त्या सत्यकथनामुळे बसलेला धक्का नाहीये, तर ही गोष्ट ज्या पद्धतीने समोर आलीये - ज्या दृष्टिकोनातून - कोणत्याही अभिनिवेशरहित शैलीत- मांडली आहे, त्यामुळे कथा अधिक नेमकी व परिणामकारक झालीये - धक्कादायक नव्हे!
माझ्यासारख्या शहरांतील लोकांसाठी या कथेत वातावरणात काहिसे नाविन्य तरी आहे. तुमच्या सारख्या गावातून आलेल्यांना/गावांत शिकलेल्यांना धक्का बसला नाही तर त्यात आश्चर्य काय? तसा बसला असता तर तो उलट दिग्दर्शकाचा पराभव ठरला असता असे वाटते.

बहुदा तुम्हाला "धक्का" बसायची अपेक्षा होती ती पूर्ण न झाल्याने हा प्रतिसाद असेल तर मग योग्यच आहे म्हणा.

चिंतातुर जंतू Sun, 16/02/2014 - 12:24

>> थिएटर भरलेले होते. मागच्याच रांगेत राष्ट्राचे भावी स्तंभ वगैरे असलेल्या तरुणांचे एक टोळके होते. शालू पडद्यावर येताक्षणी शिट्ट्यांची ललकारी घुमली. 'लाईन आली बग..' कुणीतरी ओरडले. मध्यंतरात 'ये दिल्या, लई बोअर व्हायलंय लगा..' हेही ऐकू आले. संपूर्ण चित्रपटभर हेच सुरु होते. चित्रपट संपताना कुणीतरी 'पयशे परत..' असेही ओरडले.यात किंचितही अतिशयोक्ती नाही.हे शब्दशः असेच घडले.

प्रेक्षकांची प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटलं नाही. सिनेमाचा विषय कितीही गंभीर, सामाजिक असला तरीही सिनेमा लोकप्रिय व्हावा ह्यासाठी त्यात आसू आणि हसू खेचणारे टाळीबाज संवाद घालायचे, पटकथेत आणि अभिनयशैलीत भावनांना हात घालणाऱ्या बटबटीत मेलोड्रामाचा आधार घ्यायचा असा मराठीत पायंडा आहे. 'फँड्री'त हे टाळलं आहे आणि तरीही (किंवा त्यामुळे) त्याचा अनुभव गहिरा आणि टोकदार होतो. प्रेक्षकशरणता टाळल्यामुळे सिनेमाच्या लोकप्रियतेला मर्यादा पडण्याची शक्यता आहे म्हणूनच ऐसीच्या वाचकांचं 'फँड्री'कडे लक्ष वेधलं होतं.

सुनील Mon, 17/02/2014 - 12:23

In reply to by चिंतातुर जंतू

प्रेक्षकशरणता टाळल्यामुळे सिनेमाच्या लोकप्रियतेला मर्यादा पडण्याची शक्यता आहे म्हणूनच ऐसीच्या वाचकांचं 'फँड्री'कडे लक्ष वेधलं होतं.

भा.पो.

खरे तर, प्रत्यक्ष स्टोरी न सांगता लिहिलेले परीक्षण वाचूनच हा चित्रपट जमेल तितक्या लवकरात लवकर थेट्रातच पहायचे ठरवले आहे.

मी Mon, 17/02/2014 - 15:06

पांढरपेशा समाजाने अमुक-जातीय साहित्याची दखल घेतली नाही तर तो जातीयवाद ठरतो आणि दखल घेतली तर तर तो उच्चभ्रुपणा ठरतो. लेबल लावण्याचं स्वातंत्र्य मान्य आहेच, पण लेबल लावातायेण्याजोगा समाज कायमच असणार हे स्विकारल्यास 'कलाकृतीचा' आस्वाद अधिक घेता येऊ शकेल आणि कलाकृती अधिकाधिक लोकांपर्यत पोहचल्याचे फायदे उत्तोरोत्तर दिसु लागतील असे वाटते.

ऋता Mon, 17/02/2014 - 15:21

उत्तम चित्रपट. जरूर सर्वांनी पहावा. पात्रनिवड (कास्ट) आवडावी/चपखल वाटावी असे मराठी चित्रपट फार कमी आहेत...त्यातील हा एक नक्कीच.
रहस्यभेद वगैरे कोणत्याच पातळीवर न केलेले बरे....पण या चित्रपटाबाबत रहस्यभेदाचा फार बाऊ करण्यासारखं काहीही नाहिये असं मला वाटलं. चित्रपट कितीही काहीही माहिती असताना पाहिला तरी एक चांगला नाविन्याचा अनुभव देऊन जाईल...तेव्हा नक्कीच पहा.

रहस्यभेद चालू:
चित्रपटात सायकल चेपते तो प्रसंग अगदी प्रेडिक्टेबल झाला असे वाटले.

अक्षय पूर्णपात्रे Mon, 17/02/2014 - 22:34

चित्रपट पहायला हवा असे वाटत आहे. लहानपणापासून डोंगर, नद्या, निसर्ग, लोकांनी काढलेली निसर्गाची चित्रे पहातच आलो म्हणून नवनवी निसर्गचित्रे पाहूच नये की काय असे काहीसे वरील उपचर्चा वाचतांना वाटले.

राजेश घासकडवी Wed, 19/02/2014 - 17:56

आत्ताच फॅंड्री पाहून परत आलो. परीक्षण पुन्हा वाचल्यावर चिंतातुर जंतूंनी मांडलेले मुद्दे मनोमन पटले.
- तो प्रेक्षकाला कुरवाळत नाही, सिनेमाला घासूनपुसून गुळगुळीत करत नाही आणि (शेवटचे नाट्यमय प्रसंग वगळता) कथानकातला सामाजिक आशय मुद्दाम अधोरेखितही करत नाही.
- संवादांतून किंवा चर्चानाट्यातून पात्रं आपली वैचारिक, सामाजिक बैठक वगैरे उलगडत सुटतात असा चाकोरीबद्ध पलायनवादही तो पत्करत नाही.
- 'फॅंड्री' हे सिनेमाचं नाव किंवा जब्या, कचरू, पिराजी अशी पात्रं घेत आणि गावातल्या खऱ्याखुऱ्या वाटाव्यात अशा चेहऱ्यांच्या मदतीनं
- एक सणसणीत गोष्ट
- रखरखीत जातीय वास्तव मांडताना सिनेमातला निसर्ग गरजेहून जास्त नेत्रसुखद होणार नाही ह्याचीही काळजी घेतलेली आहे.

शेवटच्या नाट्यमय प्रसंगातली प्रतीकात्मता एकही शब्द न वापरता चित्रांतून आणि प्रसंगातून दाखवली आहे, पण तरीही ती जाणवल्यावाचून राहत नाही.

मोठ्या पडद्यावर निश्चित पहावा. मात्र सन्जोप रावांना आला तसलाच गलिच्छ अनुभव मलाही आला. अत्यंत करुण, अंगावर येतील अशा प्रसंगांना लोक हसत होते. तेव्हा या रसभंगाची तयारी ठेवून जा.

गवि Mon, 24/02/2014 - 15:29

In reply to by राजेश घासकडवी

अत्यंत करुण, अंगावर येतील अशा प्रसंगांना लोक हसत होते. तेव्हा या रसभंगाची तयारी ठेवून जा.

मला अशा प्रकारच्या लोकांमुळेही त्रास झाला नाही किंवा वाईट वाटलं नाही. शेवटी तो जो पेप्सीकोला चोखत मजा बघणारा अन मजा करणारा अख्खा गाव असतो ना, त्यात हे थेटरातले लोकही बेमालूम मिसळून गेले. सिनेमातली पात्रं वाढली इतकंच.

ऋषिकेश Mon, 24/02/2014 - 14:19

संवादांतून किंवा चर्चानाट्यातून पात्रं आपली वैचारिक, सामाजिक बैठक वगैरे उलगडत सुटतात असा चाकोरीबद्ध पलायनवादही तो पत्करत नाही. सिनेमातल्या पात्रांच्या आपापल्या गोष्टींमधून आणि एकमेकांबरोबरच्या वर्तनातून सामाजिक आशय सहज लक्षात येईल ह्याची काळजी मात्र तो घेतो. कथानकातल्या नाट्यमय चढउतारांद्वारे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचं कसबही तो चांगल्या प्रकारे, आणि तरीही बटबटीत मेलोड्रामा टाळून वापरतो. सुरुवातीला काव्यात्म वाटणारं अवघड वयातल्या मुलाचं जग हळूहळू विदारक कसं होत जातं तेही उल्लेखनीय आहे.

चित्रपट बघताना ही वाक्यं त्यातही पहिलं वाक्य इतकं आठवत होतं.. नेमकी ओळख करून दिली आहे.

चित्रपटाविषयी तर काही बोलायला शब्द नाहीयेत फारसे. लहान लहान तरीही अत्यंत महत्त्वाच्या तपशीलांवर, पटकथेवर, संवादांच्या आवश्यक अवकाशावर, पात्रयोजनेवर अश्या अनेक अंगांनी, इतकं नेमकं काम झालेलं, मराठी चित्रपटाचं उदाहरण आठवु म्हणता आठवत नाहीये.
आणि तो साला जब्या डोक्यातून जायचं नाव घेत नाहीये :(

नागराज आणि अख्ख्या टीमलाच सलाम!

गवि Mon, 24/02/2014 - 15:07

बघितला.

कोणताही बटबटीतपणा न आणता, कोणतेही गिमिक किंवा कृत्रिम सिनेमॅटिक हाय देण्याचा प्रयत्न न करता, जे आहे, जसे आहे, जिथे आहे ते अत्यंत परिणामकारक कथेतून आणि त्याहून परिणामकारक चित्रीकरणातून दाखवण्याचा हा प्रयत्न इतका लाजवाब जमला आहे की मराठीत तरी असले दर्जेदार काही बघितल्याचं आठवत नाही.

जे प्रसंग रेंगाळणारे किंवा कंटाळवाणे वाटू शकतील, तेही मला त्यातल्या तपशिलांमुळे अत्यंत रम्य वाटले. पॉज करुन न्याहाळत रहाव्या अशा फ्रेम्स.. अगदी जब्याच्या घरासकट.

राष्ट्रगीताचा प्रसंग, काळ्या पाखराला मारण्याची सततची पाठलाग केल्यासारखी इच्छा..आणि केवळ स्पॉईलर नको म्हणून इथे उल्लेखणे टाळावे लागेल असे असंख्य क्षण..एस्क्प्रेशन्स..

नागराज मंजुळे ही व्यक्ती मराठी चित्रपटसृष्टीत आहे हे नुसते लक्षात आल्याने आता पुढे बराच काळ असे काहीतरी अप्रतिम बघायला मिळणार याचा आनंद झाला आहे.

या पद्धतीची कथा "क्लोज" करायला अत्यंत अवघड असते. इथे जी काही सप्पकन क्लोज केलीय म्हणता.. अहाहा.. मंजुळे आणि टीम.... जियो.

चिंतातुर जंतू Mon, 24/02/2014 - 16:01

थिएटरमध्ये पाहताना रसभंग झाला अशी अनेकांकडून प्रतिक्रिया आल्यामुळे साशंक होतो, पण मी पाहिलेल्या खेळात असा रसभंग झाला नाही. वीकेंड दुपारचा खेळ असल्यामुले (दुसरा आठवडा असूनही) थिएटर भरलेलं होतं, पण (फोनवर अधूनमधून मेसेज चेक करणं वगैरे वगळता) प्रेक्षक शेवटपर्यंत शांतपणे पाहात होते.

अस्वल Mon, 12/05/2014 - 08:22

जब्राट सिनेमा!
सगळ्यात जमेची बाजू म्हणजे "जात" ह्या हलकल्लोऴ विषयावर फार कमी वेळा अनुभवता येणारी subtlety मस्त टिपलीये.
पाहिला नसेल तर पुढलं वाचू नका...
वाचून्का फाटक सुरु
काही काही प्रसंग तर तोडफोड चित्रित केले आहेत!
राष्ट्रगीताचा प्रसंग, संपूर्ण पाठलाग सिक्वेन्स, जब्याच्या मनातील शालूसाठी वाजणारया तरंगांचे संगीत, जब्या आणि त्याच्या विंगम्यानचे संवाद,
डुक्कर पकडल्यावर त्याला नेताना पाठी भिन्तिवर समाजसुधारकांची चित्रं, हे सगळं सुरेख जमलंय! खुद्द नागनाथची भूमिकाही अस्सल.
बरेचदा प्रसंग अपूर्ण ठेवून किंवा जेमतेम पूर्ण करून नागनाथने प्रेक्षकांना सूचक अनुभव दिलाय.

वाचून्का फाटक बंद

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/05/2014 - 22:27

In reply to by अस्वल

(चित्रपट बघितला नसेल तर फार समजणार नाही, किंवा चित्रपट आस्वादात नंतर फार फरक पडणार नाही, असं वाटल्यामुळे 'फाटक' टाकलेलं नाही.)

मला व्यक्तिशः सगळ्यात जास्त आवडलं ते मोडकी सायकल परत आणतानाचं दृष्य/चित्रीकरण. उतारावरून, एका वळणदार रस्त्यावरून मोडकी सायकल परत आणत असताना, पार्श्वभूमीवर राक्षसी आकाराची, पवनचक्कीची पाती फिरताना दिसतात. प्रगती आली पण तिची फळं चाखणारे मोजकेच लोक आहेत याचं प्रभावी चित्रण आहे.

दुसरं म्हणजे नागनाथचं पात्र. जब्या अगदी स्वतःसारखाच आहे, असं नागनाथला वाटतं. पण पुढे नागनाथचं काय होतं, लोकांचं त्याच्याबद्दल काय मत असतं हे चित्रणही विदारक आहे.

दाह Fri, 15/01/2016 - 22:28

जब्या ज्या मुलीच्या मागे असतो तीच मुलगी शेवटच्या डुक्कर पकडण्याच्या प्रसंगी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची चाललेली खटपट अगदी मजेने पाहत असते. हसत टाळ्या देत असते. इतकंच नव्हे तर तिची मैत्रीण जाऊया म्हणत असताना ‘’अगं थांब की जरा “ म्हणून ती तिथेच थांबते. तिच्या चेहऱ्यावरील भाव घेताना पण नागनाथने कमालीचा सेन्स दाखवलाय. नकळत समाजव्यवस्थेच्या मानसिकतेचा भाग होऊन गेलेल्या शालुचे भाव हे निरागस आहेत. म्हणजे ती मुद्दाम जब्याला खिजवायला हसत खिदळत नसते. पण जब्या आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत जे काही चाललंय त्यात काहीच चूक असं नाहीये आणि जणू काय ही करमणूक आपला हक्कच आहे असेच तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतं. समाजाचंदेखील असंच आहे.
आणि जब्याची अवस्था तर पाहवतपण नाही. अगोदरच बापाने अक्ख्या गावासमोर मारला असताना आणि सगळे फिदीफिदी हसत असताना जेव्हा तो शालुकडे पाहतो आणि ती पण त्याला हसत असलेली दिसते तेव्हा काय वाटलं असेल त्याला ? किती आक्रोश झाला असेल त्याच्या मनात ? किती अपमान वाटला असेल ?
ज्या वयात आपल्या लायनीसमोर साधी छोटीशी फजिती झालेलीपण खपत नाही तिथे अशा प्रकारे सगळ्या गावासमोर उघडउघड आपली आणि आपल्या आईबाप बहिणीची अशी भयंकर कुचेष्टा, झालेली पाहताना,अनुभवताना त्याचं मन कितीदा मेलं असेल ? का अजूनच मुर्दाड बनलं असेल ? शालूचा त्याला राग आला असेल की नाही ?
या जागी मी असतो तर?
आयला विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.

adam Mon, 25/01/2016 - 08:47

In reply to by दाह

हेच आणि असेच. नेमके. विशेषत: पहिला परिच्छेद अगदि माझ्याही मनात आला होता.

नगरीनिरंजन Sun, 17/01/2016 - 22:39

जो चित्रपट पाहून हमसून रडू आलं तो हा एकमेव चित्रपट (आपल्याला "खालचे" समजणारे लोक ज्यांना भेटलेत त्यांना कळेल). नगरमध्ये अशी परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. कुत्रे घेऊन डुकरांच्या मागं माणसं पळत आली की आम्ही गोट्या-भोवरे आवरुन चकित नजरेने बघत असू. तेव्हा अर्थातच काहीच वाटायचं नाही. त्या सगळ्या वस्त्या, ती माणसं कुठे तरी आठवणींच्या तळाशी गेल्यासारखंच होतं. या चित्रपटाने ते एकदम ढवळून वर आलं.
पण जब्याच्या संतापाइतकीच किंबहुना जास्तच जब्याच्या बापाची लाचारी त्रास देऊन गेली.