Skip to main content

कॉन्स्पिरसी थिअरीज

आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.

गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेत्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................

म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्‍या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्‍या.

१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
नोकरी करणारी स्त्री कशी थकते आणि तिच्याकडून मोदक, पुरणपोळ्या, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करण्याची अपेक्षा करणे कसे चुकीचे आणि अन्यायकारक आहे हे मध्यमवर्गीयांच्या मनावर बिंबवले गेले.
उद्देश हाच फराळ, मोदक, पुरणपोळ्या (आणि इतर खाद्यपदार्थ) करून देणार्‍या व्यावसायिकांचा धंदा चालावा.

२. पूर्वी सर्व लेखन, परीक्षेच्या उत्तरपत्रिका, बँकेचे चेक वगैरे फाउंटन पेनाने करावे लागत असे.
नंतर बॉलपेनाने लिहायची परवानगी दिली गेली.
उद्देश हाच की काळे आणि म्हात्रे या मराठी व्यावसायिकांचा धंदा बसावा.

३. स्वातंत्र्याच्या काळात नेत्यांकडून स्वावलंबनाची शिकवण दिली गेली.
लोक घरच्या घरी स्वतःच दाढी करू लागले.
उद्देश हाच की न्हावी समाजाचा व्यवसाय गोत्यात यावा. (गुरू नानकांचासुद्धा हाच उद्देश होता की काय ते ठाऊक नाही. इतक्या मागचा इतिहास तितकासा ज्ञात नाही).

पाहूया सदस्यांना आणखी किती कॉन्स्पिरसी थिअर्‍या बनवता येतात....

अशोक पाटील Sun, 30/09/2012 - 14:19

१. पूर्वीही धो-धो पावसामुळे मुंबईतील लोकल्स प्रवासाचा बोर्‍या वाजत होताच. पण मिडियाने हल्ली तो एक 'इव्हेन्ट' बनविला आहे.
त्याला कारण मोबाईल फोनचे महत्व आईबापांच्या मनावर चांगलेच ठसावे. आयटी हमाल असलेला मुलगा मुलगी कुठेही असली तरी मोबाईलवरून मध्यरात्रीही क्षणाक्षणाला वार्तांकन देत असतो. मोबाईलचा प्रचंड खप कसा होईल हे चाणाक्षपणे सेल कंपन्यांनी ओळखून मिडियाशी हातमिळवणी केली.

२. पूर्वीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने व्हायचेच. पण ज्या स्पोर्टस चॅनेलकडे प्रसारणाचे हक्क आहेत त्यांच्याच 'बातमी' सेक्शन मिडियाने त्याला 'वॉर' चे रूप दिले. एक फालतू टी-२० चा सामना, पण तो चालू होण्यापूर्वीच या जगात त्याच्याशिवाय महत्वाचे काहीच नाही, हाच गेली दोन दिवस ठणाणा.
कारण ? या देशातील एक अब्ज जनतेला उल्लू बनवून एरव्हीच्या मॅचेसना ५० जाहिराती असतील तर आजच्या मॅचला ५०० जाहिराती येणार म्हणजे येणारच, शिवाय रेटही घसघशीत.

सध्या तरी याच दोन कॉन्स्पिरसी थिअरीज वरील धाग्यात अ‍ॅड करतो.

तिरशिंगराव Sun, 30/09/2012 - 17:40

भारतातील, पाण्याच्या अशुद्धतेबद्दल वृत्तपत्रांत वारंवार लेख येत असतात.
त्यामुळे घाबरुन जाऊन नवश्रीमंत वर्ग बाहेर कायम बॉटल्ड पाणी पितो. अर्थातच मिनरल वॉटर विकणार्‍या कंपन्यांचा प्रचंड फायदा. अशी सवय लागलेल्या व्यक्तीने चुकून कुठे साधे पाणी प्यायलेच तर इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्याला लगेच इन्फेक्शन होणार आणि पुन्हा एकदा - डॉक्टरांचा प्रचंड फायदा आणि ते जी औषधे लिहून देतात त्या औषध कंपन्यांचा अतिप्रचंड फायदा!!!

डायपर जाहिरातीतील गोग्गोड बाळे!!
डायपरच्या जाहिराती टीव्हीवर सतत पाहून, हल्लीच्या माता लहान बाळांना चोवीस तास डायपर लावून ठेवतात. त्यामुळे त्या कंपन्यांचा प्रचंड फायदा आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून, बाळाला त्या जागी पुरुळ, रॅश आणि युरिनरी इन्फेक्शन झाल्यामुळे, पुन्हा एकदा डॉक्टर आणि औषध कंपन्यांचा फायदा.

सध्ध्या एवढेच!

लॉरी टांगटूंगकर Tue, 02/10/2012 - 14:44

In reply to by तिरशिंगराव

बॉटल्ड पाण्याचे म्हणजे ते उघडले की पिले तितकेच प्यावे थोड्या वेळानी परत पिऊ नये, नवी बाटली उघडावी कारण त्यात हवे मार्गे किंवा इतर मार्गे जंतू जातात ...

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/10/2012 - 00:16

कोक आणि पेप्सीमधलं जंतूनाशकांचं प्रमाण अधिक असल्याची आवई नारळ आणि कोकमवाल्या केरळी/कोकणी लोकांनी उठवली होती.

पुढचं अंमळ अडल्ट आहे.
सविता भाभीच्या कार्टून्समधून स्त्रिया आणि समलैंगिकांनाही आनंद मिळतो हे न बघवून स्त्रीद्वेष्ट्या आणि होमोफोबिक लोकांनी संस्कृतीरक्षकांना हाताशी धरून त्या संस्थळावर बंदी आणवली.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/10/2012 - 22:59

In reply to by नितिन थत्ते

ते सोप्पंय. त्याच्या दोन थिअरीज आहेत.
एकतर मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा संघर्ष पेटवायचा आणि त्यातून (माझ्या मते बेचव) बंगाली पाणीपुरीसाठी अवकाश निर्माण करायचं हे एक.
आणि दुसरं, वडापावकडे अभिजनवर्ग बहुजनांचं अन्न म्हणून बघतो. अभिजनांची आवडती पण चोरून चैन करायची सवय, पाणीपुरी, तीच हद्दपार केली तर मराठी वडापाव अभिजनांचं खाद्य होऊ शकेल आणि मग मराठी भाषा अभिजात आहे हे जाहीर होण्यातल्या अडचणी कमी होतील. म्हणजे तसं म्हटलं तर मराठी भाषा अभिजात आहेच, सरकारकडून जाहीर झालं की मग गंगेत घोडं न्हालं ना. (हवंतर गंगेला हुगळी किंवा गोदावरी म्हणा, आपल्याला काय!)

पाणीपुरीच्या तांब्याचा व्हिडो हे मी चुकून बालाजी तांबे असं वाचलं ...

आळश्यांचा राजा Mon, 01/10/2012 - 08:02

(पुण्यातील) दुचाकी बनवणार्‍या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून (पुण्यातील) सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेकडे (जाणीवपूर्वक) दुर्लक्ष केले जाते.

नंदन Mon, 01/10/2012 - 08:59

१. ओबामा पुन्हा निवडून यावा म्हणून अल-कायदाने ओसामाचा बळी दिला.
२. रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन अडचणीत आणण्यासाठी वादळ टॅम्पा शहराच्या दिशेने वळवण्यात आले.
३. भावी अध्यक्षीय उमेदवार रॉमनीला बदनाम करण्यासाठीच डीसी कॉमिक्सने त्यांच्या व्हिलनचे नाव नव्वदच्या दशकात 'बेन' असे ठेवले.
.....

या आणि यासारख्या सुपीक कॉन्सिपरसी थिअरीजचा जनक अर्थातच रश लिम्बॉ :)

सविता Mon, 01/10/2012 - 11:04

अजित पवारने राजिनामा दिला, नक्कीच शरद पवारने काहीतरी त्याची गोची केली असणार

लेक वारसदार म्हणुन आल्यावर त्याला पुतण्या नकोसा झालाय!

---
का कोण जाणे पण मला या कॉन्सिपरसी थिअरी मध्ये तथ्य वाटते :)
पॉवर् आपलं हे पवार लोक तेवढ्या उलट्या काळजाचे आहेत!

रमाबाई कुरसुंदीकर Mon, 01/10/2012 - 12:44

भारतिय परराष्ट्रमंत्र्यांचे मूळ मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानने हीना रब्बानीची निवड केली.
सोनिया गांधीची काँग्रेस पक्षात अध्य़क्ष म्हणून निवड झाल्यानंतर गेल्या ८/९ वर्षात ईटालियन फेरारी गाड्यांच्या विक्रीत भारतात वाढ झाली आहे.

ऋता Mon, 01/10/2012 - 14:13

प्रगत देशातले शस्त्रास्त्र कारखाने चालावेत (विशेषतः आर्थिक मंदी आल्यापासून) म्हणून अप्रगत देशांमध्ये युद्ध पेटवली जातात...उ. सिरिया...आणि एकूणच "अरब स्प्रिंग" वगैरे.

रमाबाई कुरसुंदीकर Mon, 01/10/2012 - 18:20

फडके-अत्रे जाणून बुजून वाद घालतात जेणेकरून कोकणस्थ ब्राम्हणांचे नाव नेहमी चर्चेत राहील्. समाज सुधारणा करणार्‍या एका नेत्याने म्हंटलेले आठवते.
(कधी कधी जुन्या आठवणीत रमणारी)रमाबाई

विसुनाना Wed, 03/10/2012 - 15:50

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

रमाबाई, फडके-खांडेकर म्हणायचे असावे तुम्हाला. कारण प्रल्हाद केशव ऊर्फ आचार्य अत्रे हे कोकणस्थ ब्राह्मण नव्हते - (म्हणजे देशस्थ ब्राह्मण होते, पण कुठले का असेनात?- ब्राह्मणच होते हे मात्र खरे - आता 'खरे' हेसुद्धा को.ब्रा. आडनाव आहे तेव्हा कोब्रांचाच जय होतो ('सत्यमेव जयते')हे त्रिकालाबाधित सत्य आहे)- असे खूप पूर्वी 'कर्‍हेच्या पाण्यात' वाचल्याचे आठवते. आता माझेही (कदाचित तुमच्याइतकेच) वय झाल्याने स्मृती थोडा दगा देते आणि विनाकारण विषयांतरही होते.. ;)

श्रावण मोडक Mon, 01/10/2012 - 19:16

In reply to by मी

हे खरं असतं तर आवडलं असतं. चिंतूंनी हल्ली काय लिहिलं आहे?

प्रकाश घाटपांडे Tue, 02/10/2012 - 14:18

इंटरनेट चे व्यसन हा मानसिक आजार आहे असे काही लोकांनी म्हणण्यास सुरवात केली आहे. लोकांनी इंटरनेटवरचे साहित्य वाचून त्याचे मुल्यमापन केले तर काही जालसम्राटांच्या अनभिषिक्त साम्राज्यावर गदा येईल

'न'वी बाजू Tue, 02/10/2012 - 19:35

In reply to by प्रकाश घाटपांडे

लोकांनी इंटरनेटवरचे साहित्य वाचून त्याचे मुल्यमापन केले तर काही जालसम्राटांच्या अनभिषिक्त साम्राज्यावर गदा येईल

लोकांनी इंटरनेटवरचे साहित्य वाचून त्याचे मूल्यमापन केले, तर फार फार तर त्यांचा वेळ काहीतरी निरुपयोगी करण्यात फुकट जाईल. जालसम्राटांवर काडीमात्र फरक पडणार नाही.

किंवा झालीच, तर 'मूल्यमापक'/'टीकाकार' जाँरमधल्या जालसम्राटांची नवी साम्राज्ये निर्माण होतील. (पण तशी शक्यता कमी वाटते. पब्लिकचा टॉलरन्स मूल्यमा'पका(ऊं)'करिता फारसा असावासा वाटत नाही.)

ऋषिकेश Wed, 03/10/2012 - 15:58

शदचंद्ररावजी पवार साहेब यांनी ......

(रिकामी जावा यथाशक्ती यथामती भरावी.. त्यांनी काहिहि केलं तरी दुसर्‍या दिवशी पेप्रात त्याची कॉन्पिरसी थियरी (तयार) होते ;))

संकेत Thu, 11/10/2012 - 20:32

सी आय ए साऱ्या जगावर नजर ठेवून आहे हा समज जालावर लिहिणार्या लेखकांसाठी आणि कवींसाठी पसरवण्यात आला असावा कारण कोणी नाही तर गुगल किंवा सी आय ए आपले लेखन वाचते असे त्यांना वाटून प्रोत्साहन मिळावे.

बॅटमॅन Wed, 17/10/2012 - 11:39

In reply to by नंदन

ही थेरी थोड्याश्या वेगळ्या स्वरूपात ग्रँट डफने मांडली होती बहुतेक.

"मराठ्यांचा उत्कर्ष न व्हावा अशीच बहुतेक ईश्वरी योजना होती" असे कायसेसे वाक्य आहे त्याचे.

... Tue, 30/10/2012 - 22:50

अमेरिकाला चांगला धडा शिकवावा, आपल्यापेक्षा या जगात कोणीतरी अधिक सामर्थ्यवान आहे याची जाणीव अमेरिकेला यावी, अमेरिकेने जगाचा मक्ता घेतल्यासारख वागू नय्रे या व्यावहारिक विचाराने सॅडी हे चक्रीवादळाचा फेरा अमेरिकेवर आला

ऋता Sun, 04/11/2012 - 15:08

मलाला युसुफझाइ या तालिबान्यांना शिंगावर घेणार्या धाडसी मुलीचं मनापासून कौतुक वाटत असताना...ती अमेरिकेची एजंट असून, हा सर्व 'शो' जगापुढे करवण्यात आला अशी एक कॉन्सपिरसी थिअरी वाचनात आली.

'न'वी बाजू Sun, 04/11/2012 - 18:14

In reply to by ऋता

'तालिबान्यांना शिंगावर घेणारी' ही शब्दरचना त्यातील गर्भितार्थामुळे खटकली. असो.
===
*म्हणजे, प्रतिसादामागील भावनेशी सहमत आहे, अशा अर्थी. कॉन्स्पिरसी थियरी ठीक आहे, असे प्रतिपादन नाही.