Skip to main content

जाने कहां गये वो लोग

इस्माईल दरबारला पाहीलंय का कुणी ?
टीव्हीवर जज म्हणून नाही विचारत. अलिकडच्या हिंदी सिनेमाच्या श्रेयनामावलीत संगीतकार म्हणून त्याचं नाव कुणी वाचलंय का ? गायबच झालाय नाही का तो ? उदीत नारायणचं नावही असंच गायब झालंय. कदाचित मा़झ्या नजरेतून सुटण्याची शक्यता अधिक आहे. पण गेल्या पाच वर्षात त्याच्या आवाजात एकही नवीन गाणं कानावर पडलेलं नाही.

काय झालं असावं ?
दर्जा नाही असं त्यांचा शत्रू देखील म्हणू शकणार नाही. आत्ता बॉलिवूडमधे सक्सेफुल असणा-या अनेक लोकांचे हे दोघंही बाप आहेत. जिथं हिमेश रेशमिया चालतो, साजिद वाजिद चालतात तिथं हम दिल दे चुके सनम आणि देवदास सारखं दरबारी थाटाचं संगीत देणारा संगीतकार का चालला नाही ? कि हल्लीच्या सिनेमांना त्याची जातकुळी मानवणारी नाही ? मध्यंतरी तेरा जादू चल गया नावाचा टुकार सिनेमा आला होता. त्याचं त्याने दिलेलं संगीतही टुकारच होतं. म्हणजे दुस-या कुणी ते दिलं असतं तर आम्ही चांगलंच म्हटलं असतं, पण ईस्माईल दरबार, संजय लीला भन्साळी ही नावं वाचली कि अपेक्षा काय च्या काय वाढतात. त्या अपेक्षांमुळे तेरा जादू चाललाच नाही. स्वतःच वाढवून ठेवलेल्या अपेक्षांचा बळी ठरला का दरबार ? कि बॉलिवूडमधे टिकण्यासाठी आवश्यक असलेली मीठी जुबान नसल्याने आणि फटकळपणामुळे त्याला गायब केलं असावं ? कि त्याच्याकडे होतं ते ब्येस्ट देऊन आता तो रिता झालाय ? काही समजत नाही पण आजूबाजूला इतके संगीतकार असताना आणि त्यात भर पडत असतानाही त्याची आठवण प्रकर्षाने येत राहणं हे त्याच्या संगीताला मिस करण्याचं लक्षण असावं.

उदीत नारायणचं तर काहीच कळत नाही. मोहम्मद रफी नंतर कुठल्याही प्रकारचं गाणं सहजतेनं आणि स्वतःच्या अस्सल आवाजात गाणारा एक गायक इंडस्ट्रीला मिळाला होता. मध्यंतरीच्या काळात शब्बीरकुमार, मुन्ना अजीज, कुमार सानू असे कसले कसले अत्याच्यार या कानांनी सोसले होते. त्या जायबंदी कानांना अचानक उदीत नारायणच्या आवाजातली कयामत से कयामतची गाणी ऐकू आली तो क्षण अक्षरशः आनंदाश्रूंनी भिजण्याचा होता. पण शब्बीर, मुन्नाच्या तुलनेत चांगला वाटला असं त्या आवाजाचं मोल नव्हतंच. याआधीही गोरी तेरा गाव बडा प्यारा असं गाऊन तमाम हिंदुस्थानाला वेड लावणारा येशुदास गायब झालाच होता. येशुदासकडे वैविध्य नव्हतं, गोडवा नव्हता, संगीताचं ज्ञान नव्हतं कि आणखी काय म्हणून तो गायबला ? उदीत नारायणची अवस्था इतकी वाईट नव्हती कधीच. इंडस्ट्रीचा प्रमुख गायक होता तो. बड्या हिरोंनाही त्याचा आवाज लागायचा. याच दरम्यान रिअ‍ॅलिटी शोजमधून अनेक नवे गायक पुढे येत होते. संगीतकार त्यांना सर्वांसमोर काम देऊन पाठ थोपटून घेत होते. इतपर्यंत ठीकच.

पण दबक्या आवाजात असं ऐ़कू आलं कि प्रमुख गायक असलेया उदीत नारायणच्या मानधनात जवळजवळ फुकट असे नवे गायक मिळाले तर त्यांना हवेच होते. यात ब्रेक देण्याचा हेतू वगैरे सगळा दिखाउपणा होता. नाहीतरी या इंडस्ट्रीत दिखाऊपणाच आहे सगळा. उदीत नारायण मागत असलेलं मानधन कमी कर असं सांगता येत नसल्याने त्याला अडगळीत टाकण्याची ही नवी युक्ती इतर गायकांनाही संदेश देणारी होती. सोनू निगम हा आता प्रमुख गायक आहे. पण त्यालाही हवं तसं मानधन वाढवून घेणं अवघडच आहे. पण आजही काही गाणी ही उदीत नारायण, कैलाश, के के, सोनू निगम या ताकदीची मंडळीच गाऊ शकतात. अर्थात तशा प्रकारच्या गाणी देणारा इस्माईल दरबार देखील सध्या गायबसिंग झालाय. अधून मधून ए आर रहमान हजेरी लावतो. पण त्याच्याकडे त्याने पारखून घेतलेल्या गायकांची फौज असते. शिवाय रेहमान हे वेगळंच संस्थान आहे. रेहमानचं संगीत हाच सिनेमाचा युएसपी बनत असल्याने त्याला न घेऊन सांगतो कुणाला अशी अवस्था आहे. शिवाय हिंदी सिनेमा मिळाला नाही म्हणून त्याचं दुकान काही बंद होत नाही. साऊथला त्यापेक्षा जास्त मानधन आणि चांगल्या दर्जाचं काम मिळतं. त्याला बॉलिवूडकडे काम मागण्याची गरज नाही.

अलका याद्निक, अभिजित हे देखील दुर्मिळ होत चाललेत. किती दिवस फ्युजनच्या नावाखाली प्रयोग ऐकायचे, किंवा लुंगी डान्स वर समाधान मानायचं हे समजत नाही. आपलंच काही चुकतंय, कि काळाबरोबर आपण बदलत नाही आहोत काही समजत नाही. या सगळ्या वैतागवाडीनंतर हे सगळं मला एकट्यालाच वाटतंय कि आणखीही कुणी समदु:खी आहेत हे जाणून घ्यावंसं वाटलं. म्हणून चर्चेचा हा प्रस्ताव ठेवला.

काय म्हणता ?

तिरशिंगराव Wed, 16/10/2013 - 18:01

१९७५ नंतर आमच्या, चित्रपट संगीत विषयक ज्ञानाची उंची इतकी कमी झाली आहे की त्यानंतर आम्हाला तिथले 'लोग' न दिसता नुसते 'लेग'च दिसायला लागले. तेंव्हापासून आम्ही फक्त जुन्यातच रमतो. सबब पास!

अनुप ढेरे Wed, 16/10/2013 - 15:59

देवदासचं संगीत 'ठीक' एवढयाच योग्यतेचं. त्याहून जास्तं चांगल नाही. आणि कुमार सानूला का उगाच शब्बीरकुमार, मुन्ना अजीज वगैरेंच्या पंगतीत बसवलय?? काहीही...
बाकी अभिजित चांगला गायचा. परवाच त्यानी गायलेलं 'राजाबाबू' चित्रपटातलं 'आ आ ई $$ उ उ ऊ , मेरा दिल $$ ना तोडो' हे गाणं ऐकत होतो.

अनिल सोनवणे Wed, 16/10/2013 - 21:54

In reply to by अनुप ढेरे

कुमार सानूला का उगाच शब्बीरकुमार, मुन्ना अजीज वगैरेंच्या पंगतीत बसवलय?? काहीही...>>>

काहीही का ? त्याच्या गाण्यात रेकणंच जास्त आहे असं माझं मत आहे. कदाचित, शब्बीर बरा असं काहीवेळा म्हणावं लागेल. कुमार सानू आरडी कडे जेव्हढा चांगला गायला तेव्हढा इतरांकडे कधीच ऐकणेबल वाटला नाही.

सविता Wed, 16/10/2013 - 17:22

उदित नारायण म्हातारा झाला आता, अभिजीत पण सुमारे दहा-बारा वर्षापुर्वीचा!

सोनू निगमच ऐकू येत नाही तिकडे त्याच्यापेक्षा जुन्या गायकांची काय कथा!

अलका याज्ञिक , कविता कॄष्णमूर्ती - त्यांचा काळ संपता संपता बेसुर्‍या झाल्या होत्या त्यामुळे त्या आता मागे पडणार असे वाटले होते आणि तसेच झाले.

आशा, लता ची गोष्ट वेगळी आहे. त्या जरी बेसुर आनि वयानुसार होत गेलेल्या भसाड्या आवाजात गाऊ लागल्या तरी या "लेजंडरी (मराठी?) गायिकां बरोबर एकदातरी काम करायचं" या हौसेपायी नवीन संगीतकार त्यांना गाणी देत राहतात म्हणून मग एके काळची सुरेल गानकोकिळा "अनदेखा..अंजाना सा..." असे भसाड्या, फाटलेल्या आवाजात म्हणते तरी ते ऐकण्याची शिक्षा आपल्याला मिळते. अलका, कविता इतक्या थोर नसल्यामुळे त्यांना बेसुरे गाताना ऐकावे लागले नाही हे नशीबच म्हणायचे.

अर्थात परवा रेडिओमिर्चीवर थोडे जुने गाणे अलका च्या आवाजातले गाणे लागले ..तर ऐकायला फार छान वाटले.

आणि फक्त इस्माइल दरबार च का? असे ढिगाने संगीतकार आहेत जे धुमकेतू सारखे काही सुंदर गाणी देऊन मग लुप्त झाले. जतिन- ललित (जो जिता वही सिकंदर), संदिप चौता (मस्त). मला वाटते त्यांना जे काय बेस्ट देता येत होते, ते दिल्या नंतर ते रिते झाले. जित्क्या प्रमाणात गाणी मिळाली तितक्या प्रमाणात त्या गुणवत्तेची गाणी देण्याइतकी प्रतिभा नसल्याने ते मागे पडले.

तिरशिंगराव Wed, 16/10/2013 - 18:06

In reply to by सविता

सविता यांच्याशी सहमत.
हल्ली, 'आपण यांना का ऐकलंत' असं वाटायला लावणारे गायक्/गायिका बरेच झाले आहेत. त्यांत आमच्या अत्यंत आदरणीय लताबाई पण सामील झाल्यामुळे हृदयाला अत्यंत वेदना होतात. पण जे सत्य आहे ते मान्य केलेच पाहिजे कारण आम्ही व्यक्तिपूजक नाही.

अनिल सोनवणे Wed, 16/10/2013 - 22:55

In reply to by सविता

आणि फक्त इस्माइल दरबार च का? >>

जतीन ललितची गाणी ही श्रवणीय आहेत. आनंद मिलिंदचीही होती. पण ईस्माईल दरबार ची गाणी श्रवणीय पेक्षा लोककला आणि शास्त्रीय संगीत यांचा मिलाफ असलेली वाटलेली. मला संगीतातलं फारसं कळत नाही. पण या गाण्यांचं आयुष्य तत्कालीन नाही हे नक्की. तडप तडप के मधली आर्तता लागलीच भिडल्याने ते ताबडतोब लोकप्रिय झालं, पण निंबुडा लोकप्रिय व्हायला वेळ लागला. पण आजही त्याचा कंटाळा येत नाही. असो. अंदाज अपना अपना..

ता.क : ईस्माईल दरबारचं उदाहरण दिलं आहे फक्त. आणखीही लोक असतीलच कि. शब्बीरला काम मिळत होतं तेव्हां त्याच्यापेक्षा कैक पटीने गुणी असलेल्या अन्वरला काम मिळालं नाही. चप्पा चप्पा चरखा चले वाल्या विशाल भारद्वाज ने मध्यंतरी मला काम मिळणे बंद झाल्यामुळं निर्माता व्हावं लागलं असं विधान केलं होतं. आता विशाल भारद्वाजकडे क्षमता नाही असं कोण म्हणेल ? जो जिता वही सिकंदरने प्रकाशात आलेल्या जतीन ललितने काही वर्षे गाजवलं. पण त्या जो जिताची काही गाणी उचललेली होती. अकेले हम अकेल तुमची काही गाणीही उचललेली होती असं एका रेडीओ स्टेशनवर ऐकलं. ए आर रहमान, दरबार, भारद्वाज यांना उचल्या म्हणणे शक्य नाही. मुद्दा असा होता कि ईस्माईल दरबारच्या जातकुळीचे सिनेमे बनत नाहीत कि तो रिता जालाय.. त्याला एकदमच बहिष्कृत करण्यामागचं कारण लक्षात येत नाही. मग एकच कारण दिसत ते म्हणजे त्याचा फटकळपणा..

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 16/10/2013 - 22:08

In reply to by सविता

फार आनंद झाला हा प्रतिसाद वाचून. विशेषत: हा भाग - "अनदेखा..अंजाना सा..." असे भसाड्या, फाटलेल्या आवाजात म्हणते तरी ते ऐकण्याची शिक्षा आपल्याला मिळते.

कविता कृष्णमूर्ती गायिका म्हणून कितीही चांगली असली तरीही 'तू ही रे' गाणं ऐकताना "आवरा हे गोग्गोड रडगाणं" झालं होतं.

लॉरी टांगटूंगकर Wed, 16/10/2013 - 22:08

आयला नेमका मुद्दा समजत नाहीये. प्रत्येकाची वेळ असते.. दहा पंधरा वर्ष लीड मध्ये काम केल्यावर कधी कधी वेळे बरोबर न बदलल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे (जतीन ललित वेगळे झाले, इंडियन ओशन सारख्या band मधून लीड गिटारवादक बाहेर पडला- होत रहातं) . नवीन लोकं पुढे येणारच. शान, सोनू निगमने सुरुवातीला मिळतील ती गाणी पण घेतली असणार. फार थोडे लोकं नकार द्यायचं धाडस दाखवतात सुरुवातीला. सोनू अजून बऱ्याच वेळा ऐकू येत असतो (हिंदी+मराठी+कन्नडमध्येपण). उदित नारायणची पण बरीच वर्ष लीडिंग एज मध्ये असायचा. फिल्मी संगीतात गायक वेगळा आणि दिग्दर्शक वेगळा. पद्धत बदलली की दिग्दर्शक त्याच्या स्टाईलच्या गायकांना पुढे घेणार. ए आर रेहमान बरोबरचे काही गायक त्याच्याच चेन्नईच्या म्युझिक स्कूल मधून शिकलेले आहेत. शंकर महादेवन, हरिहरन वगैरे तगडी मंडळी बर्याचदा उत्तम गाणी ऐकवत असतातच. जगजीत सिंग सारखे लोकं शेवटपर्यंत गात होते.

वयानुसार गायक लोकं बेसूर होतात हे काहीच्या काहीच. (किशोरी ताई , जसराज वगैरे लोकं सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे सहज असतील, कॉमेंट करायची माझी लायकी नाही तितकं स्वर ज्ञान पण नाही. या बाप लोक्स ना कुठे थांबायचं ते नक्की कळेल.) आवाजाच टेक्स्चर बरंच बदलतं. सोनू निगमचा दिवाना मै हू दिवाना तेरा वाला आवाज आणि तनहाईssssss वाला आवाज फरक आहेच (सोनूला म्हातारा म्हणायचं असलं तर म्हणा बापडे). रियाजानुसार आवाज बदलणारच. वयस्कर झाले तरी जसराज किंवा किशोरीताईसारखं गाणं फार कमी लोकं दाखवू शकतात.

सध्या लुंगी डांस खपतोय तर शिनेमा मध्ये तेच दिसणार ना, नाय तर दबंग, बॉडीगार्ड, चेन्नई एक्सप्रेससारखे शिनेमे बघताना (KSRTC मध्ये बंद करता येत नाय :( ) बर्याचा भयाण फिलिंग येते, शुटींगच्या वेळेला यांना आपण काय करतोय ते कळतच नसेल काय?? थोडक्यात काय, जे खपतंय ते बनवून विकलं जातंय.

अनिल सोनवणे Fri, 18/10/2013 - 07:55

In reply to by लॉरी टांगटूंगकर

नवीन लोक पुढे येणार यात काही वादच नाही. मग ए आर रहमान नाही लुप्त झाला तो ? त्याने जसं रोजा मधून लक्ष वेधून घेतलं तसं इस्माईल दरबारने हम दिल दे चुके सनम आणि देवदास मधून लक्ष वेधून घेतलं आणि नंतर त्याला कामच मिळालं नाही, हा महत्वाचा फरक ध्यानात घ्या ना राव ! चार सिनेमे मिळाले, त्यात त्याला चमक दाखवता आली नाही म्हणून तो बाजूला पडला असं झालं असतं तर गोष्ट वेगळी..

अनुप ढेरे Fri, 18/10/2013 - 09:39

In reply to by अनिल सोनवणे

अहो देवदास, हम दिल दे चुके सनम मधली गाणी 'ठीक' होती. आणि म्हणूनच तो इस्माईल दरबार फार दिसला नाही पुढे...

पूर्ण विजार Fri, 18/10/2013 - 09:43

In reply to by अनुप ढेरे

देवदासची गाणी ठीक म्हणत असाल तर साजीद वाजीदला अप्रतीम म्हणणार कि हिमेश रेशममियांना ? कैच्याकै हां

पूर्ण विजार Fri, 18/10/2013 - 09:46

In reply to by पूर्ण विजार

eस्माईलच्या ऐवजी सुहास दरबार असं नाव कल्पून बघा बरं. कदाचित ते संगीत अस्सल आणि ठीकच्या वरच्या श्रेणीत असल्यासारखं वाटू लागेल.. ;)

अनुप ढेरे Mon, 21/10/2013 - 11:07

In reply to by पूर्ण विजार

दोघांची अनेक गाणी (सगळी नाही) आवडतात मला. पण निंबुडा निंबुडा, ढोलि तारो, डोलारे डोला तत्सम गाणी अनेकदा ऐकुन देखील अज्याबात नाही आवडली. त्यापेक्षा हमराझ, तेरे नाम पासून दबंग (१ आणि २), रावडी राठोड मधली अनेक गाणी आवडतात मला. :-)

लॉरी टांगटूंगकर Fri, 18/10/2013 - 15:49

In reply to by अनिल सोनवणे

भा पो

http://en.wikipedia.org/wiki/Ismail_Darbar

दरबार साहेबांच्या नावाने थोडं गुगलंल तर त्यांचे देवदास नंतर दहा एक प्रोजेक्ट झालेले दिसतायत, आणि इतर काही गॉसिप म्हणा किंवा काय म्हणा टाइप बातम्या दिसत आहेत, ते सोडा. पण दहा पैकी एकपण फारसा प्रसिद्ध दिसत नाहीये. :(

नगरीनिरंजन Thu, 17/10/2013 - 07:48

धाग्याचे शीर्षक वाचून उत्सुकतेने धागा उघडला आणि भ्रमनिरास झाला. आम्हाला वाटले क्रांतीतल्या हेमामालिनीचा किंवा "आप जैसा कोई मेरे" मधल्या झीनतचा किंवा डॉनमधल्या हेलनचा किंवा जाँबाजमधल्या डिंपलचा उल्लेख असेल.
असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 17/10/2013 - 20:11

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटलं होतं कोंबडी, बकरा वगैरे उल्लेख येतील.