Skip to main content

शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं. लौकिकार्थाने प्रचंड यशस्वी कारकिर्दीच्या ‘आखरी पडाव’ वर, पिक्चर पडला तरी हारण्यासारखं काहीच नाही अशा एका स्थितीला पोचल्यावर आता अमिताभने स्वत:ची ‘मन की बात’ ऐकत वेगवेगळे प्रयोग करायला सुरूवात करूनही आता बराच काळ लोटला आहे. स्वत: केवळ स्वत:साठीच पिक्चर काढण्याच्या किशोर कुमार, देव आनंद यांच्या लहरी वाटेवर अमिताभही आता चालायला लागला आहे, हे ‘शमिताभ’ पाहिल्यावर मला प्रकर्षाने जाणवलं.

एका वाक्यात चित्रपटाची कथा सांगायची म्हणजे सिनेमात हिरो बनण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असलेला मुका नायक [धनुष] एका अपयशी म्हातार्‍या नटाचा [अमिताभ] आवाज उसना घेतो आणि पडद्यावर साकारते एक अनोखे द्वंद्व जे कधी अनपेक्षित तर बर्‍याचदा अपेक्षित वळणे घेत शेवटी ०२ तास ३५ मिनिटांनी एका शोकांतिकेत संपते. मध्येमध्ये गोष्ट पुढे सरकवण्यासाठी टेकू म्हणून अक्षरा हसन नावाचा [बहुधा वशिल्याचा] ठोकळा येतो आणि आपल्या सहनशीलतेची परीक्षा घेतो. अमिताभ ज्या विद्यापीठाचा Professor Emeritus आहे त्या विद्यापीठाच्या अंगणवाडीतही अक्षरा हसनला अद्याप अ‍ॅडमिशन मिळायची आहे.

ऑफ-बीट सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यात संतुलन साधताना चित्रपट थोडा पसरट झाला आहे. पण त्यामुळे माझ्यासारख्या प्रेक्षकाला मधेमधे थोडी डुलकी घेऊन अक्षरा हसनच्या गंभीर अभिनयाने [?] येणारा शीण घालवण्यास मदत होते. सुरुवातीलाच नायकाचं सगळं आयुष्य एका गाण्यात लपेटून टाकल्यावर चित्रपट वेगवान असेल ही आपली समजूत लवकरच खोटी ठरते. आता मध्यंतर घ्यायची वेळ झाली आहे हे आपल्याला जाणवूनही दिग्दर्शकाला तसे वाटेपर्यंत खुर्चीत बसून राहणे भाग पडते.

अमिताभ- अमिताभ करता करता संकलनात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. थोडी अजून कात्री चालवून चित्रपट थोडा आटोपशीर करण्यास बराच वाव होता. अनेक ठिकाणी प्रसंग पॅच अप केल्यासारखे वाटतात,जसं काही अमिताभ-धनुषची मुख्य कथा आधी लिहून, चित्रित करून मग बाकीचे प्रसंग घुसडले आहेत. सांप्रतकालीन मसाला सिनेमाला चिमटे काढण्याच्या नादात बाल्कीने भरपूर दाक्षिणात्य आचरटपणा केला आहे. कदाचित मुंबैय्या सिनेमावाल्यांच्या पार्श्वभूमीवरचा चित्रपट असल्याने AIB छाप भाषाही यथेच्छ वापरली आहे. अमिताभनेही आतापर्यंत पडद्यावर दिल्या नसतील एवढ्या शिव्या या एकाच चित्रपटात दिल्या आहेत.

आता धनुषसारख्या माणसाला अमिताभचा प्लेबॅक देणं, त्यावर तो यशस्वी झालेला दाखवणं हा अनेकांच्या मते मायनस पॉइंट असू शकतो. पण एक अतिसामान्य चेहर्‍याचा नायक म्हणून धनुष ‘फिट’ आहे. बाकी राहिला ते अमिताभचा त्याला असलेला प्लेबॅक. संपूर्ण चित्रपटभर एका ब्लॅक कॉमेडीचा अंडरकरंट आहे, तो म्हणजे आजच्या तंत्रशरण झालेल्या आणि संवादफेक, शुद्ध उच्चार , उत्तम लेखन अशा नाट्य-सिनेमाच्या मूलभूत तत्वांपासून दूर झालेल्या व्यावसायिक सिनेमावर केलेली ही टीका आहे. आणि ही टीका करणारा आवाज अमिताभचा आहे. ‘लाईफबॉय’ची जाहिरातही त्यातलाच एक प्रकार असावा [ती खरोखर in-script जाहिरात नसली तर. पण असावी कारण अमिताभ या चित्रपटासाठी टीव्हीवर Benadrylचीसुद्धा जाहिरात करतो आहे. असो.] हे सगळं करण्याच्या नादात नट आणि आवाज यांतील संघर्ष या [आधी कधीतरी] मुख्य असलेल्या विषयाकडे दिग्दर्शकाचं दुर्लक्ष होतं आणि चित्रपट मध्येच पकड सोडतो. पण मध्यंतरानंतर शेवटाकडे जाताना पुन्हा वेग घेतो. सिनेमात अमिताभ धनुषचा पर्सनल स्टाफ [वॅलेट] म्हणून वावरत असतो. या पर्सनल स्टाफच्या कष्टाचं रेक्गनिशन म्हणूनच की काय साधारणत: शेवटच्या टायटल्सच्या शेवटी शेवटी येणारं मुख्य कलाकारांच्या वॅलेच नाव चित्रपट संपल्यावर लगेच दिग्दर्शकाच्या नावाआधी येतं. स्वानंद किरकिरे हा खरोखरच ‘मेहनती’ गीतकार आहे हे या चित्रपटात पुन्हा सिद्ध होतं.

चित्रपट अमिताभसाठीच लिहिलेला आहे हे तर स्पष्टच आहे. पण तो अमिताभनेच लिहून घेतला आहे की काय अशी मला दाट शंका आहे. संपूर्ण सिनेमाचे नसले तरी स्वत:च्या सीन्सचे दिग्दर्शनही त्यानेच केले असावे. कारण त्या त्या सीन्सचे टेकिंग थोडं जुन्या वळणाचं आहे. अर्थातच हा माझा एक अंदाज आहे. कदाचित तांत्रिकतेपेक्षा अंगभूत कलेला महत्त्व देणार्‍या जुन्या नटाच्या व्यक्तिरेखेला साजेसं म्हणून दिग्दर्शकाने तसं केलं असावं. पण खर्‍या अमिताभच्या वैयक्तिक आयुष्यातले संदर्भही कधी चोरटेपणाने तर कधी जोरकसपणे येऊन जातात. उदा. रेडिओवर अमिताभचा आवाज कसा ‘रिजेक्ट’ झाला होता व त्यानंतरची कथा सर्वांनाच माहिती आहे. ‘शमिताभ’चा विषयच मुळी नट आणि आवाज असल्याने हा संदर्भ जोरकसपणे आला आहे. तसेच रेखाच्या काही सेकंदाच्या गेस्ट अपीअरन्स मधून प्रेक्षक काय समजायचे ते समजतो. इथे लेखक-दिग्दर्शक बाल्की प्रेक्षकाला चित्रपटशी कनेक्ट करण्यात यशस्वी होतो. फिल्म इंडस्ट्रीने स्वत:ला ‘बॉलीवूड’ म्हणवून घेणं हे खर्‍या अमिताभप्रमाणे पडद्यावरच्या अमिताभलाही आवडत नाही. या व अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटात अमिताभ बच्चन हा अमिताभ सिन्हा म्हणून वावरत असला तरी तो खरा अमिताभ बच्चनच आहे हे शेवटपर्यंत जाणवत राहते. कदाचित याला काही समीक्षक उणे मार्क्स देतील. पण मला तर हे जाणीवपूर्वक केलं आहे असं वाटतं. किंबहुना म्हणूनच सिनेमाची कल्पना ही स्वत: अमिताभचीच फॅण्टसी असावी असं मला वाटतं. त्यामुळेच कितीही शमिताभ, शमिताभ म्हटलं तरी शेवटी अमिताभच उरतो, पडदाभर. मग तुम्ही आमच्यासारखे त्याचे चाहते असा किंवा नसा.

ता.क.: आता ‘शमिताभ’मध्ये दारुड्याची भूमिका करून मद्यप्राशनाला उत्तेजन दिलं म्हणून कुणा संस्कृतीरक्षकाने बिचार्‍या अमिताभवर FIR दाखल करू नये म्हणजे मिळवलं !

http://aawaghmare.blogspot.in/

समीक्षेचा विषय निवडा

पिवळा डांबिस Wed, 11/02/2015 - 10:22

पिक्चर अजून पाहिलेलं नाही, पण त्यामागची संकल्पना तरी इंटरेस्टिंग वाटतेय.
विशेषतः हल्ली जे काही अनेक फडतूस पिक्चर येतात त्यामानाने.
पूर्वी हॉलीवूडमध्ये एका सुंदर पण निर्बुद्ध स्त्रीला तिची रूपाने अतिसामान्य पण बुद्धिमान मैत्रिण आपली बुद्धिमत्ता (फोनवर) उसनी देते असा पिक्चर आला होता. आता पिक्चरचं नांव आठवत नाही पण उमा थर्मन होती त्यात! आता बॉलीवूडमध्ये बुद्धिमत्तेचा काही विशेष संबंध नसल्याने रूप आणि आवाज ही जोडी दाखवणं हे सहाजिकच!
असो, हा पिक्चर नक्कीच पहाणार!

चिंतातुर जंतू Wed, 11/02/2015 - 11:59

>> तो म्हणजे आजच्या तंत्रशरण झालेल्या आणि संवादफेक, शुद्ध उच्चार , उत्तम लेखन अशा नाट्य-सिनेमाच्या मूलभूत तत्वांपासून दूर झालेल्या व्यावसायिक सिनेमावर केलेली ही टीका आहे.

हाच उपदेश दिग्दर्शकालाही करता यावा. चित्रपटाचं लिखाण अतिशय ढिसाळ आहे. त्यामुळे प्रसंगामागून प्रसंग निव्वळ कंटाळवाणे होतात. अमिताभ बच्चन एकच एक आगाऊपणाचं बेअरिंग घेऊन सबंध चित्रपटात वावरला आहे. त्याचाही अखेर कंटाळाच आला. स्टारडमच्या पोकळपणाविषयी काही भाष्य करण्याची दिग्दर्शकाची इच्छा असावी असा अंदाज आहे, पण कोणत्याही कारणासाठी चित्रपट पाहावा अशी शिफारस करणार नाही.

लॉरी टांगटूंगकर Wed, 11/02/2015 - 15:24

In reply to by चिंतातुर जंतू

पण कोणत्याही कारणासाठी चित्रपट पाहावा अशी शिफारस करणार नाही. +१

अगदी, लै म्हणजे लैच कंटाळवाणा होता. या आधी लव्ह स्टोरी २०५० नामक शिनेमामध्ये इतका प्रचंड बोर झालेलो. जर का कोणाशी खुन्नस काढायची असेल तर त्याची मोबाईलची ब्याटरी डाऊन करून या शिनेमाला पाठवायचा.

अर्धावेळ युनिलिव्हरच्या जाहीराती, लैफ बॉय , नॉर सुप वगैरे. उरलेला अर्धावेळ अ‍ॅमेझॉनच्या जाहीराती, कमोडवालं गाणं.
का उगाच अत्याचार?

ए ए वाघमारे Wed, 11/02/2015 - 16:33

In reply to by लॉरी टांगटूंगकर

शिफारस करण्याचा प्रश्नच नाही.
पदरमोड करून सिनेमा पाहायचा आणि मग बोटमोड करून परीक्षण लिहून लोकांना फुकट शिफारसी करण्याचा धर्मादाय धंदा मी कधीच बंद केला आहे. माझा एक शिफारशी रिव्ह्यू इथे वाचता येईल.

तर हे परीक्षण सिनेमा पाहून [सुरक्षित] आलेल्यासाठी आहे. :)

आमच्या मते जे पुस्तक वाचताना चांगली झोप येते ते चांगले पुस्तक आणि जो सिनेमा पाहताना चांगली झोप येते तो चांगला सिनेमा ! उदाहरणार्थ, मराठी 'क्लासमेट्स' पाहतापाहता मी सुरूवातीलाच झोपलो, इंटरव्हलला उठलो आणि बाहेर पडून घरी येऊन पुन्हा झोपलो. इतकी मजा तर 'ब्लॅक' किंवा 'अक्स' पाहतानाही आली नाही. असो.

राजेश घासकडवी Wed, 11/02/2015 - 17:31

ओळख आवडली. सिरॅनो दि बर्गरॅक या गाजलेल्या सिनेमातदेखील एका सुंदर चेहऱ्याच्या तरुणाला आपलं शोर्य, काव्य देऊन एका तरुणीचं प्रियाराधन करायला पाठवणारा कुरुप सिरॅनो किंवा मिरासदारांच्या कथेतला राजाला आपली बुद्धिमत्ता देणारा विदूषक हे या सिनेमातल्या अमिताभच्या पात्रासारखे वाटतात.

धर्मराजमुटके Wed, 11/02/2015 - 20:04

सतीश वाघमारे दुसरा आयडी घेऊन परत आले की काय असे समजून उत्सुकतेने धाग्यावर आलो पण मग हे वाघमारे वेगळे असे लक्षात आले. मात्र निराशा झाली नाही.
छान परिक्षण. लिहित रहा.

अजो१२३ Fri, 13/02/2015 - 10:59

In reply to by धर्मराजमुटके

ऐसीवर दोन वाघमारे आल्यामुळे वाघप्रेमी लोकांनी इथल्या वाघांच्या संरक्षणासाठी एक एन जी ओ उघडली पाहिजे.

घाटावरचे भट Fri, 13/02/2015 - 11:11

अक्षरा हसन गोडुली आहे. आपल्याला आवडली ज्याम. अभिनय वगैरेचं आजकाल एवढं कोण पाहातं?

फूलनामशिरोमणी Tue, 14/04/2015 - 04:12

छानच आहे तुमचं परीक्षण- अगदी बारीकसारीक बाबींना लक्षात घेऊन लिहिलेलं. मला तरी सिनेमा बर्‍यापैकी आवडला, म्हणजे, एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.
धनुषची निवड पण अमिताभनेच केलेली असावी, कारण, तो आवाज, त्या व्यक्तीला पेलता येणार नाही, ह्यातच विरोधाभास जास्त दिसून येईल, हे सरळ आहे. उदा. नसीर/अक्षयकुमार घेतले असते तर तो आवाज व्यक्तिमत्वाहून इतका भिन्न वाटला असता का? हा प्रश्न पडतो.

अक्षरा चांगली आहे की! अभिनय येणार्‍या कोणत्याही नटीला इतके ऑथेंटिक दिसता आले असते का?