देव्यपराधक्षमापन स्तोत्र
आदि शंकराचार्यांचे देव्यपराधक्षमापन स्तोत्र वाचल्यानंतर बराच वेळ मनात हे विचार येत राहिले.
.
न मंत्र नो यंत्रं तदपि न जाने स्तुतिमहो,
न चाव्हानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथाः।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं,
परं जाने मात्स्तवदनुसरणं क्लेशहरणं॥१॥
.
(हे माते, मला ना मंत्रांचे ना तंत्रांचे ज्ञान आहे. तुझी स्तुती, आवाहन किंवा ध्यान कसे करावे याविषयी मी अनभिज्ञ आहे. ना मला योगमुद्रा येतात ना विलाप करून, टाहो फोडून, आरतीने तुला बोलविता येते. पण मला एक नक्की समजते की तुला अनुसरले, तुझ्या मागे मागे , तुझ्या पावलावर पाऊल टाकून फिरले की माझे क्लेश दूर होतात. )
.
एखादं बाळ आईवेडं असतं, सारखा आईचा पदर धरून असतं, आईचे लक्ष वेधून घेत असतं. आई जरा नजरेआड झालेली त्याला खपत नाही लग्गेच चेहरा रडवेला होतो. अगदी ओठ काढून , दीनवाणं होउन जातं बाळ. आणि मग आई कुठूनतरी ते पहाते किंवा ऐकते आणि हातातलं काम टाकून,लगबगीने येउन त्याला हृदयाशी कवळते, चुचकारते, गोड बोलून बाळाला आधी शांत करते. बाळ गोड हसून आईला समाधानाची पावती देउन टाकतं आणि आईचे हृदय परत एकदा बाळ मुठीत सामावून जातं.
.
न मोक्षस्याकांक्षा भव्विभववांछापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयावे जननि जननं यातु मम वै,
मृडानि रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः॥८॥
.
(हे विधुवदना माते, मला ना मोक्षाचॆ आकांक्षा आहे, ना एखादी कला जाणून घेण्याची, विज्ञान ज्ञान एवढेच काय कोणत्याच सुखाचीही मला अपेक्षा नाही. फक्त मृडानी, रुद्राणी शिव शिव भवानी असे तुझे नाव घेत माझा जन्म सरावा. )
.
त्या बाळाला ना खेळणी आवडतात ना ते फ़ुलपाखरांमागे, पक्ष्यांमागे दुडूदुडू धावतं ना अन्य मुलांच्यात रमतं. त्याला बस आईच लागते. म्म -मं-आ-आ अशा बोबड्या बोलांनी आईला बोलण्यातच त्याला आनंद वाटतो.
.
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला,
परं तेषाम् मध्ये विरल तरलोऽहम् तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे,
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति॥३॥
.
(पृथ्वीवरती सरळमार्गी असे तुझे अनेक पुत्र आहेत त्यासर्वांमध्ये मी वेगळाच आहे. खोडकर, चंचल, स्वतंत्र वृतीचा आहे.पण तू मला त्यागाणार नाहीस याची मला खात्री आहे कारण एकवेळ कुपुत्र जन्मास येउ शकतो पण माता ही कुमाता कधीही नसते.)
.
याउलट एखादं बाळ सुटं असतं. त्याला आई फक्त नजरेच्या टप्प्यात असणे महत्त्वाचे वाटते. तेवढं मात्र असलं तर ते बाकी त्याच्या त्याच्या खेळात रमून जातं. कधी मूळाक्षरांचे ठोकळे रचून त्यांची इमारतच बनव तर कधी चेंडूशीच नाहीतर बाहुली-बाहुल्याशीच खेळ कधी गोलाकार आकाराचा ठोकळा गोलाकार साच्यात बसव तर कधी तेली खडूने, कागदावर गिरगिट्या आख.
.
विघरेज्ञानेन द्रविणविरहेण्लसतया,
विधेयाशक्यत्त्वात्तव चरणयोर्या च्युतिर्भूत।
तदेतत क्षन्तव्यं जननि सकलोद्धरिणि शिवे,
कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति॥२॥
.
(तुझी पूजा करण्याचे ज्ञान तर सोडाच पूजेकरता लागणारे पुरेसे द्रव्यादेखील मजकडे नाही. आळस तर माझ्यात काठोकाठ भरला आहे. या सर्वामुळे मी तुझ्या चरणांना अंतरलो आहे पण सर्वांचे कल्याण करणाऱ्या हे माते तू मला क्षमा करशील याची मला खात्री आहे कारण एकवेळ कुपुत्र जन्मास येउ शकतो पण माता ही कुमाता कधीही नसते.)
.
हां मात्र कधीकधी ते गोल ठोकळा, चौकोनी साच्यात बसवायला जातं अन मग जमलं नाही की वैतागून रडू लागतं. आई दुरून कौतुकाने जर या बाललीला पहात असेल तर तिला ताबडतोब कळतं की आता हस्तक्षेप करण्याची वेळ झाली आहे आणि ती येउन बाळाला दाखवते "असं नाही रे छकुल्या , गोल ठोकळा, हा गोल साच्यातच जाणार". हे ज्ञान बाळाला नवीन तर असताच पण अपूर्वाईचही असतं. आणि मग ते आत्मसात करून बाळ विशिष्ठ आकाराचा ठोकळा, बरोबर योग्य त्या साच्यात घालायला शिकतं. त्याला काय अभिमान वाटतो की जणू त्याच्याच बुद्धीने हे कौशल्य हस्तगत झाले आहे. आई मात्र दुरून प्रेमभऱ्या नजरेने त्याची दृष्ट काढण्यात मग्न असते.
.
स्तोत्र वाचून झाल्यानंतर बराच वेळ आई कामात असतानाही मागेमागे लागून आईचा पदर धरून धरून खेळणारं बाळ (आदि शंकराचार्य) आणि त्याच्यावर न रागावणारी सर्व विश्वाची जननी, भवानी डोळ्यांसमोर तरळत राहीले .
ललित लेखनाचा प्रकार
हे कुपुत्र कदाचित या श्लोकात
हे कुपुत्र कदाचित या श्लोकात आहे माहिती नव्हते.
ह्म्म. हा श्लोक आईच्या बोलण्यात बरेचदा येई. पण या स्तोत्रात आहे हे पुढे कधीतरी कळले. जिथे "सौंदर्यलहरी" मध्ये शंकराचार्यांनी त्रिपुरसुंदरी (पार्वती) देवीच्या सौंदर्याची अतिशय रसिकतेने स्तुती केलेली आहे तिथेच पुढे या स्तोत्रात दक्ष, प्रेमळ आईचेही रुप देऊ केले आहे.
आदि शंकराचार्य?
हे आणि अन्य अशीच स्तोत्रे आणि बरेचसे इतरहि साहित्य 'आदि शंकराचार्यां'चे असते असा सार्वत्रिक समज आहे पण त्याला आधार असा काहीच नाही. ह्या बहुतेक स्तोत्रांच्या निर्मितीचा असा काही इतिहास उपलब्ध नसतो. केवळ पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने त्यांना 'आदि शंकराचार्य विरचित' असे मानले जाते.
८व्या शतकापासून आजपर्यंत 'शंकराचार्य' ही उपाधि धारण करणारे प्रमुख मठांचे अधिपति असे शेकडो स्वामी होऊन गेले. त्यांचीहि फारशी माहिती उपलब्ध नाही. त्या शेकडोंपैकी कोणी केलेल्या स्तोत्राची निर्मिति आदि शंकराचार्यांंना चिकटणे सहज शक्य आहे.
एरवीहि आपले स्तोत्र कोणा प्रसिद्ध निर्मात्याच्या नावाखाली प्रसारित करणे ही जुनी पद्धत आहेच.
छानच लिहंलं आहेत की हो.
छानच लिहंलं आहेत की हो. आईबद्दलचा भाव तर तंतोतंत उतरलाय की. भाव तर सर्वात महत्वाचा. तो सोडला तर बाकीच्या पांडित्याचा काहीही उपयोग नाही. ते पांडित्य कित्येकवेळेस “मी कोणितरी शहाणा” असाच भ्रम निर्माण करून ठेवते. असो.
एकदा योग्य भाव निर्माण झाला की, निम्मी नव्हे तर निम्यापेक्षा जास्त वाटचाल झाली असं म्हणायला हरकत नाही. माऊलींनी हरिपाठात सांगूनच ठेवलंय.
भावबळें आकळे। एरवी नाकळे ।।
करतळीं आंवळे । तैसा हरि॥१२.२॥
नवा आयडी !
शुची यांचा पुन्हा नवा आयडी की काय !