Skip to main content

शरद जोशींचे निधन

शरद जोशींचे ऐंशीव्या वर्षी निधन झाले. म्हणजे अकालीही नव्हे आणि अति उशीराही नव्हे. तशीही गेले काही महिने त्यांची तब्येत त्रास देत असल्याच्याच बातम्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाने धक्का बसला असे म्हणता येणार नाही.
धक्के जोशीबुवांनी जिवंतपणीच भरपूर दिले!
मध्यमवर्गीय शहरी ब्राह्मण माणूस युनायटेड नेशन्समधील नोकरी सोडतो हा पहिला धक्का. जिरायत शेती विकत घेऊन शेतकरी होण्यासाठी खेड्यात पोहोचतो हा दुसरा. एकदा शेतीच्या उद्योगाला लागल्यावर त्यांनी 'अशिक्षित' शेतकरी आणि सर्वसामान्य शहरी माणूस या दोघांना कळणाऱ्या भाषेत आपले प्रतिपादन सुरू केले. आणि 'शेतकऱ्यांचे कैवारी' आदी मुखवटे मिरवणाऱ्या राजकारण्यांना मुळापासून हादरा बसला. कारण शरद जोशींनी शेतमालाला भाव का मिळत नाही या मूळ मुद्द्यालाच हात घातला. तोवर शेतकरी दैववादी म्हणून जन्माला येत, दैववादी म्हणून जगत आणि दैववादी म्हणूनच सरणावर जात. आजही फार काही फरक पडला आहे असे नव्हे. पण त्यातल्या बऱ्याच मोठ्या वर्गाला किमान आपण हतबल आणि म्हणून दैववादी आहोत याची जाणीव तरी झाली आहे. याचे बरेचसे श्रेय शरद जोशींना जाते.
त्यांना स्वतःची अशी मते होती. आणि ती मते निर्मीडपणे मांडण्याचा विश्वास आणि धैर्यही होते. शिव्या नि ओव्या त्यांनी जवळपास निर्विकारपणे दुर्लक्षिल्या. त्यांनी निर्णय घेतले आणि ते माघारीही घेतले. पण शेवटी ताळेबंद मांडताना त्यांचा स्वच्छ निर्मळपणा उठून दिसतो. "माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला / मी तसे बोललोच नव्हतो" या सोयीच्या छत्रीखाली आसरा न घेतलेले ते बहुधा पहिलेच राजकारणी!
त्यांची 'इंडिया-भारत' ही मांडणी लोकांना अतिरेकी आणि भावनाप्रधान वाटली होती. आज ही मांडणी आपल्या राजकीय-सामाजिक शब्दकोषाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे.
"त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अवघड/अशक्य आहे" असे लिहिल्याखेरीज कुठल्याही शोकलेखाची अखेर करता येत नाही. गोची एवढीच आहे की या घासून चमकदार गुळगुळीत झालेल्या शब्दांना खरेच अर्थ असायला हवा होता ही तीव्र इच्छा कशी मांडणार?

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

नितिन थत्ते Fri, 18/12/2015 - 19:46

शरद जोशी स्वत:ला मार्केटवादी समजत होते. मार्केटात उत्पादनखर्चावर आधारित भाव कुठल्याही व्यवसायात मिळत नाही हे त्यांना ठाऊक नव्हते का?

गब्बर सिंग Fri, 18/12/2015 - 21:19

In reply to by नितिन थत्ते

मार्केटात उत्पादनखर्चावर आधारित भाव कुठल्याही व्यवसायात मिळत नाही हे त्यांना ठाऊक नव्हते का?

शॉल्लेट.

उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळत असता तर सर्वसाधारणपणे कोणताही व्यवसाय कधीही तोट्यात गेला नसता.

शेतीमालाला "योग्य" (म्हंजे उत्पादन खर्चावर आधारित) भाव मिळावा असा आग्रह धरणे व तो सरकारकरवी इन्फोर्स केला जावा अशी मागणी करणे हे कृषिमूल्य आयोगाचे अप्रत्यक्ष समर्थन आहेच पण हे शेतकर्‍याला कधीही तोटा होता कामा नये असे म्हणण्यापैकी आहे. म्हंजे शेतकर्‍याची तोटा होण्याची रिस्क ग्राहकाकडून बळजबरीने इन्श्युअरन्स करवून घेण्याच्या जवळपास जाणारे आहे.