दिवाकरांची क्षमा मागून…
हे बघा गणपतराव, तुमचा गुलामगिरीला विरोध आहे हे मला माहित आहे. कुणालाही गुलाम म्हणून हालात जगावं लागू नये ही तुमची भूमिका मी समजतो. तुमच्या तत्त्वांबद्दल मला आदरच आहे. तुम्ही स्वत: गुलाम बाळगावा, किंवा त्याला कासरा बांधून मुलीच्या रुखवतात मांडावा असं मी कधीही म्हणायचा नाही. पण म्हणून मीही गुलाम बाळगू नये असं सांगणारे तुम्ही कोण? किंवा आपल्या गावकट्ट्यावर गुलामांचा बाजार भरता कामा नये असा तुमचा दुराग्रह का? जोपर्यंत बाकी कुणाला त्रास होत नाही - म्हणजे अर्थात गुलाम वगळून - तोपर्यंत मला माझं करू द्या आणि तुमचं तुम्ही करा! जगा आणि जगू द्या… काय? बरोबर की नाही?! … आता तुम्ही म्हणता की माणसाला स्वतंत्रपणे जगायचा हक्क आहे. खरं तर इतिहासात तसं काही नाही. पिरॅमिड हे सगळे गुलामांनीच बांधलेले होते. पण मी म्हणतो, ते काही असलं तरी गुलामांचे हक्क काय हा मुद्दा इथे दुय्यमच नाही तर तिय्यम आहे. मुख्य मुद्दा असा की तुम्हाला मोलकरीण ठेवायचा जसा हक्क आहे, तसा मला गुलाम ठेवायचा आहे. आता गुलामाला काम करावं लागतं तसं मोलकरणीलाही करावं लागतंच की! मग काय फरक आहे दोन्हींत? आँ!? तेंव्हा उगीच तुमची मतं माझ्यावर नका लादू. इतरांना उपदेश करायची ही कसली हौस म्हणतो मी?!
नेहा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू जे केलंस त्यात तुझं काही चुकलं नाही. तुझं म्हणणं असं की अशोकच्या अंगात दम नव्हता, गादीत तो कमजोर पडायचा. हे तू म्हणालीस त्याआधीच मी अोळखलेलं होतं. तेव्हा मुळ्याच्या आमटीतून धोत्र्याच्या बिया खायला घालून त्याला संपवलास हे अगदी फक्कड काम केलंस. शिवाय मुळ्याला वासही असा उग्र येतो की त्याला काहीसुद्धा शंका आली नसणार. आता तू म्हणशील हे मी वाईट केलं का? तर मी म्हणते, यात काहीसुद्धा वाईट नाही! अॉस्ट्रेलियात एक कोळी असतो, लॅट्रोडेक्टस हॅसेलटी नावाचा. त्याच्याबरोबर जुगल्यानंतर त्याची मादी त्याला मारून खाऊन टाकते. तेव्हा निसर्गात हे असंच चालतं. कोळीणबाई जशी तिच्या गुणसूत्रांनुसार वागते तशीच तूही वाग! तिच्या बिचारीच्या अंगात डझनभरच गुणसूत्रं असतात, आणि तुला तर तेवीस आहेत. तेव्हा तुला दुप्पट कारण नाही का मिळालं?! अगं, यात नैतिकतेचा काही प्रश्न नसतो, जगणं हीच एक नैतिकता असते. आणि आता मरताना अशोक कसा तडफडला, त्यानं बुबुळं कशी फिरवली, कसा केविलवाणा चेहरा केलान ही असली चित्तरकथा उगाळत बसू नको बाई! मनाला लावून घेण्यासारखं त्यात काही नसतं. तू जो गोंधळ करतेयस ना, त्याला जिनोमॉर्फिझम म्हणतात. म्हणजे कसं ते सांगते. आता स्त्रियांना वेदना होतात यात काही शंका आहे का? तर नाही. पण म्हणून आपल्यातल्या काहीजणी गफलतीनं असं समजतात की पुरुषांनाही त्या होतात! त्यामुळे विनाकारण भावनेच्या आहारी जाऊन नरदया नरदया असलं काहीतरी त्या खुळचटपणे बडबडत राहतात. आता स्वत:चं स्वत: भागवून घ्यायची बाईला सोय नसती, तर यांची नरदया केंव्हाच पावणेआठच्या भावात नसती का गेली?! पण ते सगळं राहू दे. थोडक्यात काय की पुरुषांना वेदना होत नाहीत हे सत्य लक्षात ठेवलंस म्हणजे पुरे झालं. उगीच अवांतर तत्त्वं यात आणण्यात काहीसुद्धा अर्थ नाही…
प्रतिक्रिया
थोड संकोचाने
थोड संकोचाने चाचरतच लिहीतोय माझ्या मर्यादीत आकलनावरुन या लेखातला किमान काही भाग मॅन इज द मेझर ऑफ ऑल थिंग्ज या विचारसरणीतील विसंगती वर मर्यादेवर केलेला भेदक उग्र उपहास असावा कदाचित. मी वाट बघत होतो कालपासुन जाणकार काय मत देतात तर समजुन घेता आला असता धागा.
दिवाकरांच्या एरवी निरुपद्रवी छटांचा इतका उग्र वापर असा केलेला पहील्यांदाच बघितला.
लेख पुर्ण कळला नाही मात्र अस्वस्थ करुन गेला.. ( बाय द वे मुग्धा कर्णिक यांच्या मांसाहारी धागा व प्रतिसादातील चर्चा या धाग्याची प्रेरणा असावी काय ?)
दुसरी नाट्यछटा सॉलीड आहे.
दुसरी नाट्यछटा सॉलीड आहे. लहानशा तुकड्यातच, पण खिळवुन ठेवण्याचे कसब २ र्या नाट्यछटेत अधिक जाणवले.
यातली पहिली नाट्यछटा मीच
यातली पहिली नाट्यछटा मीच कुठेतरी लिहिली आहे असा भास झाला.