वलय (कादंबरी) - प्रकरण ५

प्रकरण ४ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6449
----

प्रकरण 5

थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.

स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...

... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.

रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...

तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!

दिल्लीतल्या मॉडर्न कॉलेजमधले त्या दोघांचे मॉडर्न प्रेम!

आणि तिला आठवला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तिच्या कॉलेजातला राहुल गुप्ता ज्याचा आता फोन आला होता.

रोहन आणि तिने एकत्र पाहिलेली स्वप्ने!

तिला कॉलेज जीवनापासूनच अॅक्टींगचे वेड होते...

दृष्ट लागेल असे जन्मजात सौंदर्य तिला लाभलेले होते आणि ते तिने तरुणपणी आवडीने जपले आणि टिकवले आणि वाढवले होते.

तिचे व्यक्तिमत्व सुद्धा सळसळते आणि उत्साही होते, म्हणून ते सौंदर्य आणखी खुलून दिसायचे.

तिचा चेहरा खूपच बोलका होता.

मनातील अगदी कोणतीही भावना तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसून यायची. तिचा चेहेरा लगेच लालसर व्हायचा.

त्यात भर म्हणून तिला अभिनय करण्याची आवड होती. कॉलेजात अनेक नाटकांतून तिने भाग घेऊन वाहवा मिळवली होती. कॉलेज संपले की तिला मुंबईला यायचे होते. थोडक्यात तिचे अभिनय क्षेत्रातले भविष्य उज्वल होते हे नक्की!

रोहनने तिला तिच्या करियर निवडीची मोकळीक दिली होती. त्याला लंडन मध्ये MBA करून नंतर मॅनेजमेंट मध्ये करियर करायचे होते.

तिचे वडिल दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्तुळात उठबस असणारे श्रीमंत बिझिनेसमॅन आणि रोहन एका प्रायव्हेट कॉलेज मधल्या प्रोफेसरचा मुलगा!

रागिणीच्या घरच्यांचा तिच्या रोहन सोबतच्या संबंधांना विरोध होता. पण, दोघेही हे ठरवून चुकले होते की रोहनने रागिणीच्या घरच्यांचे मन जिंकायचे आणि मग रागिणीने त्यांचे मन वळवायचे....

पण बरेचदा आपण ठरवतो एक आणि होते काही दुसरेच!

कारण फीलगुड सिनेमांच्या कथांमध्येच फक्त असे घडत असते की एखादा प्रियकर प्रेयसीच्या घरात काही कारणाने प्रवेश मिळवून हळूहळू आपल्या स्वभावाने सगळ्यांची मने जिंकतो.... पण रागिणीला विश्वास होता की रोहन असे नक्की करेल. खऱ्या जीवनात असे तो करून दाखवेन.. त्यांनी दोघांनी त्या दृष्टीकोनातून तयारी पण सुरु केली.

त्यासाठी त्यांनी “मेरा पिया गया परदेस!”, “बहू परदेसी!”, “मेरी दुल्हनिया गयी है सात समुंदर पार!” असे टिपिकल सुपरहीट पिक्चर पण पहिले आणि खऱ्या जीवनाशी तुलना करून ते दोघे हसत राहिले.. असे होईल तसे होईल अशी स्वपने रंगवत राहिले, पण कुणालातरी या त्या दोघांच्या या सर्व प्लानिंगची खबर मिळाली होती हे मात्र नक्की!

आणि मग ...

त्या रात्री छोट्या रस्त्यावरून हायवेवरील चौकात नेहमीच्या वेगात वळतांना अचानक प्रकट झाल्यासारखा तो ट्रक उजव्या बाजूने त्यांच्या कारसमोर आला...
रोहन कार चालवत होता. बरोबर कारच्या पुढे उजव्या बाजूला त्याच्या सीटला ट्रकची जोरदार धडक बसली. जोरकस धडकेने रोहन जागीच ठार झाला. त्या धडकेने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूचा दरवाजा उघडून रागिणी खाली पडली पण तिला थोडेसे खरचटले.

तोपर्यंत ट्रक वेगाने निघून गेला. पण जवळच पोलीस गस्त असल्याने ट्रक ड्रायव्हरला पकडण्यात यश आले.

ट्रक ड्रायव्हर रामसिंग यादवला पकडून नंतर सोडून देण्यात आले होते कारण त्याने मुद्दाम धडक दिल्याचा किंवा ट्राफीक नियम तोडल्याचा असा कुठलाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा सीसीटिव्ही मध्ये दिसत नव्हता. तो एक अपघात असल्याचेच सिद्ध झाले, घातपात नाही. रागिणीला पुसटसा घातपाताचा संशय आला होता पण तिच्याकडे कोणताही ठाम पुरावा नव्हता...

पण तो अॅक्सिडेंट मात्र तिच्या जीवनाला वेगळ्याच वळणावर घेऊन आला. नंतर ती भयंकर निराश होऊन डिप्रेशनमध्ये गेली... त्यातच तिच्याकडून एक चूक घडली आणि मग क्रमाने अनेक गोष्टी चुकत गेल्या जसे ...

तिला पुढचे आठवणार एवढ्यात सूरजच्या फोनने तिची विचारयात्रा भंग पावली. स्वतःला सावरून आवाजामधला रडवेला अंश गिळून ती नेहमीच्या सहजतेने सूरजला म्हणाली, “हां, सूरज बोल ना. कैसा है तू? कब आया?”

नंतर बराच वेळ ती सूरजशी बोलत होती. सूरज एक महिना ब्राझिलला जाऊन परतला होता. बिझिनेसच्या निमित्ताने त्याच्या अनेक परदेश वाऱ्या नेहमी व्हायच्या. त्यापैकीच ही एक वारी संपवून तो परतला होता.

त्याचेशी बोलताना तिला थोडे हायसे वाटले. या अफाट पसरलेल्या शहरात पैसा कमावण्यासाठी यांत्रिकपणे घड्याळाच्या काट्यांनुसार धावणाऱ्या आणि जगणाऱ्या असंख्य माणसांच्या महापूरात तिला त्याचा नेहमी आधार वाटत होता...

(क्रमशः)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet