आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला
देवाचिये दादुलेपनाचा उबारा|
न साहावेचि साताहि सागरा||
भेणें वोसरूनि राजभरा |
दिधली द्वारावती ||
(अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय.
बहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे.
मी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा प्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे. "दिल्ली अब दूर नही" अशी स्थिती खरोखर आली आहे.
ह्यापूर्वी पुण्याच्या पब्लिकपैकी उत्तर भारताच्या राजधानीच्या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजीराव शाहाजीराव भोसले ह्यांचे व त्यानंतर दक्षिणेत कैक लढाया जिंकलेले सदाशिव(राव/भाउ) चिमाजी भट ह्यांचे जाणे झाले होते म्हणे.
पैकी पहिल्यास तिथले वातावरण अजिबात आवडले नाही, व त्या उर्मट लोकांना सुशासन काय असते हे दाखवण्यासाठी त्यांनी परत येउन इथे स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले.तर दुसरा असा काही गेला की परतलाच नाही.
ह्या सर्व प्रकारामुळे एकूणच मराठी मनांत स्वतःहून सतत दिल्लीला जाउन रहावे असे कधीच वाटले नाही.
ह्यापुढील सहाएक आठवडे माझे वास्तव्य दिल्लीला असेल्.त्यापुढील वीसेक आठवडे मी चंदीगडला असेन्.मला आता तुम्ही जालिय मित्र, हितचिंतक ह्यांची मदत लागणार आहे. फुकटात सल्ले हवे आहेत.
शंका :-
१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)
२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?
३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे?
४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)
५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)
६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय?
७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.
८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून?
९.अॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे?
खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का?
१०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का?
११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.
कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?)
१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.
१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय?
१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना?
--मनोबा
नवी आणि जुनी दिल्ली
मनराव ~~
मी नव्या दिल्लीपेक्षाही जुन्या दिल्लीत खूप रमलो होतो. दोन मुस्लिम मित्र आणि एक बोहरी समाजातील स्क्रॅप ट्रेडर्स माझे मित्र झाले होते. त्यांच्या समवेत विविध भागात भटकलेल्या दिवसांची तुमच्या या लेखाच्या निमित्ताने आठवण काढीत आहे. त्या काळात पायी हिंडत राहणे मजेशीर होते...विशेषतः चांदणी चौक, जामा मस्जिद भागात. मी अर्थातच १९८५ ते १९९५ या काळातील दिल्लीविषयी लिहित आहे. त्यानंतर तिकडे जाणे झाले नसल्याने देशात सर्वच ठिकाणी अंगावर येणार्या ट्रॅफिकचा दिल्लीतही कशाप्रकारे उपद्रव होत आहे याची मी फक्त कल्पना करू शकतो.
पण दिल्लीत [जुन्या] भटकावे ते रात्री. तो मुघल परिणाम असा काही जाणवत राहतो की पूछो मत. खाण्यापिण्याचा तर सुकाळ आणि शिवाय रेट परवडणेबल. व्हरायटी मोजायच्या म्हटल्या तरी रात्र सरेल. अर्थात तुम्ही त्यासाठी पट्टीचे खवय्ये असणे, आणि स्वच्छतेच्या भलत्यासलत्या कल्पना मनी न बाळगणारे असाल तरच दिल्ली तुम्हाला 'आपली' वाटेल.
शक्य असल्यास एक करा. रेल्वे स्टेशनपासून "पहाडगंज' एरिया जवळ आहे. टॅक्सीवाला घेऊन जातो. त्याला पहाडगंज पोलिस स्टेशन पत्ता सांगावा [दिल्लीत पोलिस स्टेशनचा पत्ता सांगणे फार किफायतशीर व्यवहार पडतो, फसवणूक, वादावादी, वैताग सारे टळते], तर या पोलिस चौकी परिसरातच 'महाराष्ट्र मंडळ निवासस्थान' आहे. इथे आम्ही मित्र उतरत असू. व्यवसाय आणि लोकसभा सेशनच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागातून येणारे प्रवासी या मंडळाच्या निवासस्थानाचा लाभ घेतात. दिल्ली परिसर पाहणारे प्रवासीही गटागटाने इथे येत असल्याने यांच्यासमवेत तुमची ओळख होऊ शकते, मग यांच्यातीलच एक गाईड तुम्ही म्हणाल त्यावेळी तुमच्यासोबत येतो. ते तुम्हाला सोईचे होईल. अन्यांशी ओळखही चटकन होऊन जाते. या परिसरात [म्हणजे अगदी तळमजल्यावरच] मराठी प्रवाशांसाठी हरिद्वार-ऋषिकेश-लक्ष्मणझुला यांच्या कंडक्टेड टूर्स असतात. एक दिवस डाव्या हाताला तर दुसर्या दिवशी उजव्या हाताला [ही त्यांचीच भाषा] म्हणजे आग्रा, मथुरा, वृन्दावन अशी एकेक दिवसाची सहल असते. त्यातच 'लोटस टेम्पल' ही घडते.
[पण शक्यतो एकट्याने फिरू नये....काहीच कळत नाही....शिवाय अगदी विख्यात असलेली ठिकाणे मागील बाजूस असतात, पण माहीत नसल्याने आपल्याकडून ती हुकतात. मोबाईल तर तुमचा साथीदार आहेच, पण तरीही एक छोट्या डायरीत त्यातील महत्वाचे नंबर्स टिपून ठेवा. आयत्यावेळी ही सवय फार उपयोगाची पडते....अनुभव आहे.]
~ या दिवसात तुम्ही चालला आहे, मनोबा. सूर्यदेव तुमचे त्याच्यापासूनच रक्षण करोत.
अशोक पाटील
आणि हेही सांगा
आम्हाला विमानाने दिल्लीला पाठवण्यात येतय.
डोमेस्टिक विमान प्रवासात विमान चढताना आणि उतरताना अक्षरशः छळ होतो.
भयानक कान दुखतात. नंतर कित्येक घंटे डोके दुखते, सुन्न झालेले असते.
frequesnt fliers मंडळींपैकी कुणी काही मदत करु शकेल काय?
@अशिक काका :- अवश्य. जुनी दिल्ली तर पहायचीच आहे.
रधिकाशी सहमत...
... पण इलाज नाही म्हटल्यावरः :-)
पाटील साहेब म्हणाले त्याप्रमाणे उष्णतेपासून सावधान. मे-जून महिने भयानक असतात, आणि गुड़गांव सारख्या धुळीच्या बुट्टीत तर जबरी. या महिन्यांत खूप कोरडी, गरम हवा असते. पण कंपनी फ्लॅट वगैरे असला तर ए-सी-बिसी असावा. गुड़गांव हे एरवी ही भयाण ठिकाण आहेच - खाप पंचायत आणि भल्या मोठ्या सुपरसेक्युरिटी सुपरकॉर्पोरेट गगनचुंबी सोसायट्या, मॉल आणि धूळ, पैसा आणि दारिद्र्य सगळेच शेजारी-शेजारी. पण आता मेट्रो आल्याने दिल्ली खरोखर तेथून दूर नाही. दिल्ली जुने शहर मस्तच आहे.
२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?
हा धागा वाचा - खासकरून पान ५ नंतर. यातील बर्याच ठिकाणी मी गेलीय. जुन्या दिल्लीतली खादाडी मस्त, पण उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात मजा जास्त असते हे मात्र खरे.
ईटिंग आउट इन डेल्ली स्थळ ही चांगले आहे; मी एकेकाळी त्यांतील सदस्यांना ओळखत असे, आणि ते खरोखर चांगल्या, हटके जागांची माहिती देत असत.
मराठी जेवण फारसे कुठे मिळत नाही. कुठेतरी लुटियन्स विभागात एक महाराष्ट्र सदन वगैरे आहे, तिथे थाळी मिळते.
३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे? तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)
इतिहासात आणि जुन्या इमारतींमधे रस असला तर या सारखे शहर नाही! आता गाईड पुस्तकं पुष्कळ आहेत, पण गंमत म्हणून विलियम डॅल्रिंपल चे "सिटी ऑफ जिन्न्स" अवश्य वाचा. तो दिल्ली शहराच्या कांद्या सारख्या ऐतिहासिक पाकळ्या मस्त उलगडत जातो, आणि शहराच्या ऐतिहासिक भूगोलाची मस्त कल्पना येते. निज़ामुद्दीन दर्ग्याला तर अवश्य जाच - तेथून जवळच हुमायुनचा मक़बरा आहे, कुतुब मिनार ला जाल तेव्हा बलबनच्या मक़बर्याबद्दल अवश्य विचारा. लाल किला वगैरे आहेच, पण जवळच गा़लिबचं घर आहे, तुघलकाबादला, हौज खास, सफदरजंगच्या मक़बर्याला जरूर जा. किती असंख्य ठिकाण आहेत...
नवीन अक्षरधाम वगैरे आहे, पण मला फारसे भावले नाही. लोटस मंदिर छान आहे. दिल्ली मेट्रोचे म्यूझियम चांगलं आहे (बहुदा सिंदिया हाउस स्टेशन - नीट आठवत नाही). चित्रकलेत रस असला तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ला गेलेच पाहिजे.
जवळपास जाण्यासारखे ठिकाणही खूप आहेत... आग्रा जयपुर वगैरे तर आहेच, पण ओर्छा वगैरे पण लांब नाही. चंडीगढ हून तर सिमला वगैरे हिमाचल ची ठिकाणं जवळ आहेत - कालका मेल ने ओवरनाइट. सगळं पंजाब नाहीतरी उन्हाळ्यात शिमल्यातच असतं असं कधी कधी वाटतं! चंडीगढ-शिमला रस्त्यावरच्या ढाब्यांवर पंजाबी जेवण घेतले की असली चीज क्या है हे कळते.
अरे दिल्ली इतनी भी बुरी नाही. मोबाइल चं काय करायचं माहित नाही, पण हिंदी - हरयाणवी च्या शिव्यांचा शब्दकोश कुठे सापडल्यास जवळ ठेवा... खासकरून बसप्रवासाचा योग आला तर.
इं
इंदिराबाई पंतप्रधान असताना एकदा जाणे झाले होते दिल्लीला. चांगले आहे शहर-मोठे रस्ते,खाण्यापिण्याची मुबलकता. वर्तमानपत्रांतून गुन्हेगारी खूप वाढली आहे असे वाचले आहे. तेव्हा पैशाचे पाकिट्,कपडे,ट्रंक,खाण्याचा डबा सगळे जपून ठेव. रात्री,बेरात्री हिंडू नकोस. व्यंकटेश स्त्रोत्र वा अथर्वशीर्ष म्हणत जा. नविन मुक्कामी तेवढाच वेळ जाईल.
दिल्ली
येते साताठ महिने कसेबसे काढावेत.मग नोव्हेंबर येईल. त्याबरोबर दिल्लीचा हिवाळा....
रात्री बेरात्री गारठ्यात जाकिटाच्या खिशात हात घालून जनपथवर भटकावे. कनाट प्लेसमध्ये संपूर्ण निरुद्देश फिरावे. पालिका बझारमध्ये काहीही विकत न घेण्याच्या उद्देशाने भटकावे. कॉफी हाऊसमध्ये एक कॉफी समोर घेऊन बसावे आणि आसपास चाललेल्या इंटलेक्चुअल चर्चा ऐकाव्या. 'अशोक यात्री निवास' मधील सरसोंका साग आणि मकईकी रोटी खावी. तिथल्याच कोकोनट ग्रूव्हमध्ये बिसिबेळे भात हाणावा. लाजपतनगर मार्केटमध्ये भेळेचे विविध प्रकार खावेत, एखाद्या तंदुर मुर्गीला मोक्ष द्यावा, एवढ्याने वजन वाढले तर राजपथवर जॉगिंग करावे...
छे... 'मन' फार मागे गेले बुवा..
पुन्हा एकदा इथे डकवतोय.
कोणताही किंतु मनात न बाळगता या. मी आहेच गुरुग्रामात म्हणजेच गुडगावात.
प्रथम तर वरील काही प्रतिसाद वाचुन मला गुडगावाची भिती वाटायला लागली आहे. असो. काही प्रतिसाद ऐकून मत बनवलेले किंवा ५/१० वर्षापुर्वी लागु पडतील असे आहेत.
तुम्ही तुमची चौकट दाखवलीत तर ते तुम्हाला ग्यालरी दाखवतील. म्हन्जे तुम्ही स्मित हास्य करा ते मन मोकळे हसुन तुमचे होतील.
आता तुमचे मुद्दे......
१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)
जर कंपनीने रहायची व्यवस्था केलीय तर अतिउत्तम आहे. एरिया सांगाल तर अधिक बरे होइल. संस्कृती म्हणाल तर सगळी सरमिसळ आहे. अंदाजाने ५००/६०० मराठी कुटुंबे आहेत गुडगावात. डोके लावायचे म्हणजे दोन्ही बाजुने एक पराठा शेकेल इतकी उष्णता निर्माण होवून( भें...., मा....., भे. के.. वैगरे ची आहुती पडुन) जो तो आपापल्या वाटेला, क्वचित मारामारी घडते.
२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ल ी+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?
"खाण्यासाठी जन्म आपुला" ह्या तत्त्वावर इथे लोक वावरतात.
दिल्ली : करीम्स ... जामा मस्जिद गेट नं. १ समोरच्या गल्लीत.... शा. मां. दोन्ही अति उत्तम वाजवी किंमत
राजेंद्रदा ढाबा ... हौज खास... तंदुरी साठी प्रसिध्ह, खास करुन पार्सल अशी तंदुरी दुसरीकडे कुठे मिळणार नाही.
मोती महल.... दिल्लीत खुप आहेत..... ह्यांच्याबद्दल काय बोलावे....उत्कृष्ट
चांदनी चौक....पराठेवाली गली....काही टिपीकल दुकानात ३५ प्रकारचे पराठे मिळतात, तिकडेच घंटेवाला हलवाइ आहे.
आणी हो तिथल्या शीशगंजवाल्या गुरुद्वारामधे जायला विसरु नका, खासकरुन कडाह प्रसाद साठी.
गुडगांव.
सुरुवात हल्दीरामपासून...... शाकाहारींसाठी उत्तम.
सेम बिकानेरवाला,
साउथ इंडियन हवे नैवेद्दम उत्तम, किंवा मग सागररत्न .... अजुन चव टिकवुन आहेत.
बाजुलाच पिंड बलुची......मधे घुसताच पंजाबातल्या गावात घुसलो की काय असा संशय लाजमी. अजुनही पितळी मोठ्या ग्लासात पाणी, लस्सि किंवा तत्सम पदार्थ देतात. थोडे महाग आहे आणी सध्या चवही ढासळलीय.
सेक.१५ ढाबा राज महल......मस्त मस्त मस्त........मित्रमंडळींच आवडतं ठिकाण
मदनपुरी गुडगाव हरीओम रसोइ.......शाकाहारींसाठी स्वर्ग.
इतके बास कि खाली सरकु.....राजस्थानकडे......
अरे हो चंदिगढ रस्त्यावर कुरुषेत्र जवळ "हवेली" मस्ट
३.दिललीत पाहणयासारखे काय आहे?
कुतुबमिनार, लोटस टेंपल, हुमायुंचा मकबरा, जामा मस्जिद, लाल किल्ला,संसद भवन, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट,अक्षरधाम मंदिर्,खूनी दरवाजा, पालिका बाजार, गफार खान मार्केट, सरोजिनी नगर मार्केट, नेहरु प्लेस इ. इ.
४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)
वरील उत्तर लागु.
५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)
अप्पुघर मधे बंद केले होते.कायम साठी....पण स्टे आला होता सध्याच माहीत नाही.हरी द्वार ऋषीकेश मधे बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग करायला मिळेल.
६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय?
मी हाय ना
७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.
वक्के. २ दिवस सुट्टी घ्या ... आगरा, मथुरा, जैपुर, हरीद्वार, ऋषीकेश, कुरुषेत्र, अमृतसर मधे सुवर्ण मंदिर किंवा जालीयांवाला बाग(एथे अमृतसरी नान खाणे आणी अमृतसरी पापड खरेदी विसरु नये) किंवा ३ दि वस सुट्टी असेल तर "जै माता दी" वैष्णोदेवी, तिथेच जम्मुला रघुनाथ टेंपल (३३ कोटी देव एकाच ठिकाणी भेटतील )
८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून?
दोन्ही कडुन सारखेच पडतील.
९.अॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे?
खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का?
पूर्ण हरयाणा-पंजाब शेतीवाला प्रदेश पण आताश्या कंपन्यांमुळे कमी होतोय. पण अजुनही गावाकडे शेतीवरच भर, हिसार, कुरुषेत्र, कैथल, जींद वगैरे कडे जावु शकतो. शेतात रहायचे माहीत नाही.
१०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का?
सध्या तिकडचा घेवुन या. नवा नं. घेइपर्यत. इकडे व्होडाफोन्चे नेटवर्क छान आहे.(माझा आयडिया आहे उगाच गैरसमज नको) १२५ रु. प्रिपेड मधे १०८ रु. चा टॉकटाइम .
११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.
कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?)
गोआयबिबो बघा,
१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.
मला भेटा.
१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय?
अनुभवी ऐसीकर सांगतीलच.
१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना?
हो अगदी अगदी, जर चानस मिळाला तर एखाद्या लग्नात घेवून जाइन म्हणतो......
सल्ला : गुडगावातुन दिल्लीला जायला शक्यतो मेट्रो वापरा डोक्याला कमी ताप आणी खिसा कमी हलका होइल.मेट्रो जवळ जवळ सगळ्या एतिहासिक जागा जोडते. फक्त मेट्रो स्टेशनला जायला जी ऑटो/सायकलरिक्शा कराल त्याच्याशी मजबूत घासाघीस करा. सायकलरिक्शावाल्यशी सुरुवातीला तुमचे कोमल मन धाजावणार नाही, एवढ्या उन्हात ओढतोय, बिच्चारा ,किती लांब घेवून आलो असे विचार येतील पण ते ५/६ दिवस टिकतील.नंतर त्यांचे उपद्व्याप पाहुन त्याच्यात बसता बसता विचार कराल कि ह्याचे कंबरडे कसे मोडु.
दिल्लि एयर्पोटवरुन सरळ तिथे असलेल्या दिल्ली पोलीस प्रिपेड बूथ्वर जावून ट्याक्सी बूक करा. बाकीचे लूट आहेत.
मनोबा विमान प्रवासाचा काहिही
मनोबा
विमान प्रवासाचा काहिही त्रास होत नाही
साधारण मुंबई टू दिल्ली दोन तासाचा प्रवास आहे
मी स्वत केलाय
फक्त सीट कुठली मिळते यावर डिपेँड आहे
इंदिरा गांधी एअरपोर्ट टू मेन देल्ही यांना जोडणारी मेट्रो चालू झाली असेल तर ऊत्तम
अन्यथा मेरु टँक्सी ऊत्तम
दिल्लित प्रवास करायचा असेल तर मेट्रो ऊत्तम मार्ग
नकाशा मिळतो मेट्रोमार्गचा
बसच्या भानगडित शक्यतो पडू नका
हातगाडी ओढणारे मजूर रिक्शाला पर्याय ठरतात
आता प्रचंड ऊन्हाळा असणार
तेव्हा कूलर वगैरे पर्याय तयार ठेवा
बाजारात भाड्याने मिळतात
आलूचाट टिक्की वगैरे पदार्थ प्रसिद्द आहेत
पनीर जवळ जवळ प्रत्येक पदार्थात मिळेल
फिरण्यासाठी चांदणी चौक सिविल लाईन्स इकडून जवळ पडेल
राष्ट्रपती भवन अमर ज्योती संसद तसच लोटस टेम्पल अक्षरधाम वगैरे ठिकाणे आहेत
मेट्रो नकाशासोबत रिकमडेँड यादी मिळते
दिल्लीवरुन मसूरी चंदीगड गुरगाव सारख्याच अंतरा वर आहेत
हाँटेल्स बहुतांशी करुन पहाडगंज एरियात मिळतीव
केल्याने देशाटन
वर सुचना दिल्या आहेतच, त्यात माझ्या पण आल्याच, उरलेल्या -
सायकल रिक्षा बद्दल इरसालांशी सहमत, मी वाईट वाटून प्रथम दुप्पट पैसे देत असे, नंतर स्थानिक लोकांनी मी कसा अलिबागवरून आलो आहे हे मला सांगितले, मग मी ऑटोरीक्षाने प्रवास चालू केला, त्यानंतर पुण्यातले रिक्षावाले खरच चांगले आहेत हे लक्षात आलं, त्याकाळी बसस्थानकावर बस अंगावर आली नाही तर त्यात चढता येत असे, आत्ता काय परिस्थिती आहे माहित नाही. मेट्रो भयानक व्यवस्थित प्रकल्प आहे, त्यातूनच प्रवास करा हे सुचवेन.
श्री. पाटील म्हणतात त्याप्रमाणे चांदनी चौक एरिया "थोडा"(हे सापेक्ष) बकाल आहे पण ऑथेंटीक दिल्ली खान-पान तिथेच होउ शकेल, आवर्जून जा.
कनाटप्लेस फर्गसन रोडप्रमाणे(थोडे जास्त हायफाय) आहे, लाजपत मार्केट तुळशीबाग+लक्ष्मीरोड आहे.
वांदा मध्यमवर्गीय अपेक्षांचा होतो, वैशालीसारखे छोटे बजेट रेस्तरां सापडेल तर शप्पथ, बाकी ढाबे अनेक आहेत, उच्चभ्रू हाटेले पण आहेत, सकाळी सकाळी ताजी जिल्बी बनवून खायला घालणारी मिठाई दुकाने आहेत, नाश्त्याला पोहे, उपमा न मिळता पराठे मिळतील, रोटी खायची तयारी करा, मनाने आणि पोटाने. हल्दीराम कडे राजकचोरी खा असे सांगतो.
अंतराचा हिशोब दिल्लीकरांचा वेगळा असतो, अमुक ठिकाण कुठे असं विचारल्यावर "ये बस इधरही है" म्हणजे ३-४ मैल असू शकेल.
दिल्लीकर थोडा भपकेबाज माणूस आहे, बोलताना फार गोड बोलतो, घरी या(च) म्हणले म्हणजे तोंड घेउन लगेच जाऊ नका, ती बोलायची पद्धत आहे, बाकी अनुभव तुम्ही घ्याच.
दिल्ली वगळता इतरत्र सेक्टरची भाषा चालते, पत्ता घेताना सेक्टर महत्वाचा हे लक्षात असू द्या. बस डेपोला बस-अड्डा असे म्हणतात.
महाराष्ट्रमंडळ ठीक आहे, त्याची मदत तुम्हाला इतरत्र भटकण्यासाठी होउ शकेल, नॉयडावरून हरिद्वार जवळ आहे, जरुर जा.
चंदीगड अतिशय छान वसवलेले शहर आहे, पण मराठी मध्यमवर्गीयसम प्रमाण कमी असल्याने आपल्या कडच्या माणसांची जरा पंचाईत होते, बाकी शहर छान, तिथुन सिमला-मनाली पुण्याच्या तुलनेत जवळ, काल्काएक्सप्रेसचा प्रवास छान असल्याचे ऐकले आहे.
चहा मिळालाच तर तो पुलंच्या भाषेत उंटिणीच्या दुधाचा असावा इतका घाण असतो (अपवाद वगळता), त्यामूळे चहाबाज असाल तर हे लक्षात ठेवा.
तुम्ही उबदार दिवसात जात आहात मजा करा.
गुडगावात रोडमराठा माणूस सापडल्यास पानिपताबद्दल चौकशी करा, पानिपताची जागा बघून या, कुरुक्षेत्र बघून या. हरयाणातील गरम डोक्याच्या लोकांपासून सावधान, माणसाला ताऊ म्हणतात व बाईला ताई म्हणतात, हे लोक फार भावनिक असतात.
ऱोचना ह्यांनी सांगितले तेवढे भटकलात तरी खूप आहे.
पण जा नक्की, कुठलीही मेट्रोसीटी नक्की पहावी, तिथे जे शिकायला मिळते ते इतरत्र शिकायला जन्म जातो.

माझा सल्ला
दिल्लीला जाऊच नका. :ड
दिल्ली भयाण आहे.