संदीप खरे यांची कविता समजून घेण्याचा नम्र प्रयत्न
गेल्या पंधरा-वीस वर्षांचा विचार करताना असं दिसलं की संदीप खरे यांच्या कवितेला मराठी कवितेच्या प्रांतात जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी अन्य कुठल्याच कवीच्या कामाला मिळालेली दिसत नाही. नव्या कादंबर्या आल्या. काही लेखक-लेखिका २००० सालानंतर प्रकाशात आले. काही नवी प्रकाशनं, नियतकालिकं उदयाला आली. पण लोकप्रिय कवितेच्या बाबत खरे यांच्या जवळपास जाणारं काही घडलं आहे, असं जाणवत नाही.
इथे ‘लोकप्रिय’ या विशेषणाचं महत्त्व आहे, हे वेगळं सांगायला नकोच. या विशेषणाला विशिष्ट संदर्भांमध्ये बरे आणि वाईट अर्थ आहेत हेही उघड आहे. साहित्याचा वेध घेणार्या कुठल्याही ठिकाणी खर्यांच्या कवितेचा अभ्यास सोडा, उल्लेखही येत नाही; आणि गावोगाव (आणि परदेशी) राहत असलेल्या सामान्य रसिकांना या साहित्यिक महात्मतेच्या अभावाची कसलीही क्षिती नाही. खरे यांचे (कुलकर्णी यांजबरोबरचे) मंचीय सादरीकरणाचे कार्यक्रम जोरात चालले आणि चालू आहेत.
खुद्द खरे यांच्या कवितांची खानेसुमारी किंवा समीक्षा ही कितपत महत्त्वाची आहे याहीपेक्षा, वाङ्मयीन महत्ता आणि लोकप्रियता ही जी dichotomy (द्वैत) आहे, ती थोडी अधिक जवळून समजून घेणं मला रोचक वाटतं. आता, ही dichotomy कुठे नाही? वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ती चिरकालापासून चालत आलेली आहे.
ढोबळ मानाने पाहायला गेलं, तर असं म्हणता येईल; की मर्ढेकरांनंतर जे अनेक प्रवाह निर्माण झाले, त्यांत दिलीप चित्रे, वसंत डहाके - आणि कदाचित अरुण कोलटकर (पण कोलटकर फारच स्वयंभू वाटतात. असो. तर तेही) - अशा लोकांचा 'साठोत्तरी' म्हणून गणला गेलेला एक पंथ होता. आरती प्रभू / ग्रेस / ना. धों. महानोर यांच्यासारखे मौज-पॉप्युलर प्रकाशनांनी प्रकाशात आणलेले लोक होते. आणि मग जणू भूकंप व्हावा, तसं दलित साहित्य आणि पर्यायाने विद्रोही कविता आली. ढसाळांसारख्यांनी मराठी विश्वाला गदागदा हलवलं. ग्रामीण कवितेने आपलं अस्तित्व अधोरेखित केलं. हे सर्व ढोबळमानाने सांगण्याचं कारण, की नव्वदच्या दशकात तयार झालेला जो एक पंथ होता - त्यात हेमंत दिवटे, वर्जेश सोलंकी, मन्या जोशी, अरुण काळे, सचिन केतकर आदी लोकांचा समावेश होतो - या गटातल्या लोकांमध्ये आणि संदीप खरे यांच्यामध्ये जो मोठा फरक आहे, त्या फरकाचा संबंध मी वर ज्या वाङ्मयीन महत्ता आणि लोकप्रियता यातल्या dichotomyचा उल्लेख केला तिच्याशी येऊन पोचतो. 'अभिधानंतर' या नव्वदोत्तरी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अनियतकालिकाच्या अनेक लेखांतून संदीप खरे यांच्यावर प्रच्छन्न आणि उघड अशी टीका झाली. संदीप खरे यांना उद्देशून बाजारूपणासारखे शेलके शब्द वापरले गेले. गंमत अशी, की खर्यांनी याचा तेव्हा किंवा आता कुठे प्रतिवाद केल्याचं आठवत नाही.
यातल्या नळावरच्या भांडणांबद्दलच्या गॉसिपपेक्षा महत्त्वाचा आहे, तो नव्वदोत्तरी कवींच्या आणि खर्यांच्यामधला फरक; त्यांच्या भूमिकांमधला फरक, आणि ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या गोष्टींमधला विरोधाभास. नव्वदनंतर भारतीय अर्थव्यवस्था बदलली आणि भारताच्या समाजावर त्याचे दूरगामी परिणाम झाले; नव्या मध्यमवर्गाचा उदय झाला; शहरीकरण आणि जागतिकीकरण या गोष्टींना प्रचंड वेग आला आणि बदलाच्या या लोंढ्यात राहणीमानाची वीण (social fabric) पार बदलली, हे सर्वज्ञात आहे. या सर्वाचा परिणाम साहित्यावर होणे हेही अपरिहार्य होते. नव्वदोत्तरी कवितांवर त्याचा प्रभाव जाणवतो. या कवितेतला निवेदक हा 'थांबताच येत नाही' असं म्हणतो (हेमंत दिवटे) किंवा 'जफर आणि माझ्यामध्ये लोक विष कालवतात' अशा प्रकारचे विचार बोलून दाखवतो (वर्जेश सोलंकी) किंवा 'लोकलच्या गर्दीत एकमेकांना स्पर्श करण्याची प्रवृत्ती अनिवार होते' अशा आशयावर बोट ठेवतो (मन्या जोशी).
याउलट याच सुमारास (किंवा थोडं पुढे) प्रकाशात आलेले खरे, हे आरती प्रभू / मंगेश पाडगांवकर/ काही किंचित सुरेश भट यांच्याकडून प्रेरणा घेतलेले दिसतात. खर्यांच्या कवितेतला निवेदक प्रियेच्या आठवणीने व्याकूळ होतो; किंवा आपण एकटे/कलंदर आहोत, याची खर्यांच्या कवितेतल्या निवेदकाला जाणीव होते (मात्र त्याच्या एकटेपणाचा तो तुटलेपणाशी (alienation) किंवा सांप्रतकालीन जगण्याच्या गोचीशी (existential conundrum) संबंध जोडताना दिसत नाही.)
सर्वात गमतीचं साम्य किंवा फरक - किंवा दोन्ही - अशा प्रकारच्या कवितांमध्ये येतो, जिथे कवी अती काम करणार्या महानगरी निवेदकाच्या दृष्टीने बोलू जातो. नव्वदोत्तरी निवेदक कंटाळलेला / कटकट करणारा / व्याकुळता (anxiety) व्यक्त करणारा आहे. या सार्यामध्ये आपली निर्मितिशीलता घुसमटते आहे, अशा स्वरूपाचे बोल त्या कवितांमधून ऐकू येतात. मात्र खर्यांची कविता म्हणते, 'दूर देशी गेला बाबा, माझ्याशी खेळायला येत नाही!' थोडक्यात शहरीकरण, जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण यांच्या नंतरच्या जगतात राहणारे नव्वदोत्तरी नायक समाजाच्या संदर्भातलं, कुटुंबसंस्थांसारख्या गोष्टींच्या बाबतीतलं आपलं स्थान तपासतात; सामाजिक व्यवस्था आणि संकेतांबद्दल तिरकस - क्वचित जळजळीत म्हणावं इतपत धारदार - भाष्य करतात; या व्यवस्था आणि संकेत यांची आडवीतिडवी नासधूस झाल्यानंतरची असंगतता त्यांच्या कवितेतून येते. तर खर्यांच्या कवितेतली दु:खं ही स्वप्नरंजनात्मक आहेत, ती या मोडलेल्या ढाच्याबद्दल कुठेही बोलत नाहीत. तिथे अजूनही प्रिया भेटत नाही आणि मुलाला बाप भेटत नाही, वगैरे गुलाबी दु:खं येतात. या कृतक-रोमँटिसिझमच्या पलीकडे जात जेव्हा खरे काहीतरी मांडू जातात, तेव्हा ते अर्थातच अधिक गुणवत्तेचं आहे. परंतु त्यातही कलंदरी, कवीचं गूढरंजनात्मक अस्तित्व वगैरे काहीसे परिचित असलेले वळसे दिसतात. थोडक्यात सांगायचं तर जीवनाचं कुरूप म्हणा, विकृत म्हणा, विकट म्हणा, नाहीतर विक्राळ म्हणा, असं जे रूप आहे; त्याच्याशी कसलंही देणंघेणं नसलेलं खरे यांच्या कवितांचं जग आहे.
खर्यांचा विचार करताना मागील पिढीतल्या पाडगांवकर आणि विंदा आणि सुर्वे यांचा विचार येणं अपरिहार्य आहे. खर्यांवर टीका करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं, की काव्यवाचन हा प्रकार त्यांनी आणलेला नाही. त्यांनी ती परंपरा पुढे नेलेली आहे. पाडगांवकरांवरसुद्धा लिज्जत पापडाच्या जाहिराती केल्या म्हणून टीका झाली. खर्यांवरच्या टीकेपेक्षा ती पुष्कळ कमी होती, पण थट्टा ही झालीच.
खर्यांचा विचार करता-करता आपण अपरिहार्यपणे 'मेनस्ट्रीम', 'पॉप', 'लोकप्रिय' या गोष्टींकडे येतो. हा पिढी बदलल्याचा परिणाम असावा. माझ्या मते पाडगांवकरांच्या या १ टक्का कामावर जितकी टीका नि थट्टा तेव्हा झाली, त्या टीकेचा मागमूससुद्धा आता दिसत नाही. एका अर्थाने, नव्वदनंतरच्या पंचवीसेक वर्षांत कलेच्या क्षेत्रातलं बाजारपेठेचं महत्त्व पटायला, सर्वच क्षेत्रांतल्या 'मार्केटेबल' प्रकारांकडे आपल्याला बोट दाखवता येईल. कलेच्या या मार्केट इकनॉमीमध्ये मग नोस्टाल्जिया - स्मरणरंजनालासुद्धा चांगलाच भाव आहे. राहुल देशपांडे यांच्यासारखे तरुण कलाकार, त्यांच्या कारकीर्दीला दहा-बारा वर्षे झाली तरी त्यांच्या आजोबांची गाणी, नाटकं अधिकाधिक मोठ्या प्रमाणात सादर करतात आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. काहीसा हाच मामला संदीप खरे यांच्या कवितेबद्दल होताना दिसतो. खरे कविता करताना जी उपमानं योजतात, जे मूड चितारतात; त्यांनी Déjà vu असं वाटणं अपरिहार्य आहे. त्यांच्या संग्रहामधल्या काही कविता रँडम पद्धतीने उघडून वाचताना खालील 'साम्यस्थळं' जाणवली.
यातलं काव्य संदीप खरेंचं आहे. कंसातली नावं आहेत ती माझ्यामते ज्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली त्या पूर्वसुरींची आहेत.
संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली (सुरेश भट)
आता दिवाणखान्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे (कोन्यात झोपली सतार सरला रंग - गदिमा)
नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?
(आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको - वा रा कांत)
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही ओठांवर एकमेकांची भाषा आहे
दोघांच्याही मनभर एकमेकांच्या शुभेच्छा आहेत
दोघांच्याही डोक्यांवर एकमेकांचे आशीर्वाद आहेत...
झोपेच्या कागदावर जाग्रणाच्या अक्षरांनी मी कविता लिहीत असेन !
तिकडे उगाच असह्य होऊन असोशी ती पाणी पीत असेल...
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी तीही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल... (आरती प्रभू)
एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ? (आरती प्रभू)
मी काय तुला मागावे, अन काय तू मला द्यावे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली (सुरेश भट)
ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते (पाडगांवकर)
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.
वर जे विवेचन आलेलं आहे ते काहीसं स्वयंस्पष्ट आहे. माझ्या मते अधिक रोचक प्रश्न असा आहे की, इतर कवी आणि कवितांच्या रोडावलेल्या खपाच्या किंवा लोकप्रियतेच्या तुलनेत खर्यांची राक्षसी म्हणता येईल अशी लोकप्रियता कशी काय? ही लोकप्रियता म्हणजे वर्षानुवर्षं त्याच त्या मालिका पाहणार्या वर्गामधली लोकप्रियता म्हणायची की त्यापेक्षा हे वेगळं आहे? असल्यास कसं? खर्यांच्या बाबत जो एक मुद्दा वारंवार मांडला जातो - की त्यांनी मराठी तरुण वर्गाला कवितेकडे वळवलं - he made the Marathi poetry a cool thing among the young crowd - हे कितपत ग्राह्य मानता येईल? त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमांची केवळ संख्या, त्यांच्या कवितांना वाहिलेले ब्लॉग्स, दूरचित्रवाणीवर त्यांच्या कवितांचे आणि गाण्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होणं, कॅसेट्सचा तडाखेबंद खप होणं इत्यादी पाहता, लोकप्रियतेबद्दल शंका राहू नये. आणि त्यातसुद्धा, खरे यांच्यासारख्यांचा उदय आणि त्यांची दीर्घकाल टिकलेली लोकप्रियता, म्हणजे नव्वदच्या दशकापासून विस्तारत गेलेल्या आणि आता या प्रसरणाच्या प्रक्रियेने गती पकडलेल्या आपल्या समग्र मध्यमवर्गीयांच्या आशाआकांक्षांचं पडलेलं प्रतिबिंब आहे, अशा प्रकारचं विधान आपण करू शकतो का?
मला आणखी एक मुद्दा जाणवतो. अन्य संदर्भातल्या 'विकाऊ' गोष्टींचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, कारण ती ती क्षेत्रं जरा मोठी असतात. उदा. हिंदी सिनेमा. यात सलमान खानचे सिनेमे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचले आहेत, याचा विशेष त्रास होत नाही; कारण त्याच वेळी इरफान खान, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज यांसारखे लोकही लक्षवेधी काम करत आहेत. याउलट मराठी कवितेच्या सुकत गेलेल्या नदीचा हाच एकमेव प्रवाह शाबूत राहिल्यावर त्याचं अस्तित्व नको तितकं जाणवतं.
कुणीतरी कवींना Failed Prophets असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रेषित होण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे. खर्यांमध्ये आपल्याला 'माझे दोन्ही बाहू आकाशात फेकून मी सांगतो आहे, पण कुणीही ऐकायला तयार नाही' असं प्रेषितपण दिसतं का? तर माझ्यापुरतं याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. खर्यांमधला विद्रोह 'मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही' इथवर येऊन संपतो. धर्मातल्या तत्त्वांना विरोध, किंवा त्याबद्दलचे प्रश्न किंवा त्याबद्दलची मीमांसा वगैरे गोष्टींचा स्पर्श जाणवत नाही. खरं सांगायचं, तर साहित्यशास्त्रातले सिद्धांत, ठोकताळे हे जसेच्या तसे कुठल्याच कृतीला कधीच लागू होत नाहीत. अमुक एक गोष्ट अमुक काळामध्ये अस्तित्वात होती, अशी विधानंच काय ती ढोबळमानानं करता येतात.
आधुनिकतावाद - मॉडर्निझम - ही विसाव्या शतकात आलेली आणि जवळजवळ शतकभर उत्क्रांत होत गेलेली जागतिक साहित्यातली घटना आहे. ढोबळमानाने असं म्हणता येईल, की आधुनिकतेमध्ये 'तार्किक सुसंगती'ला जवळजवळ सोडचिठ्ठी दिलेली आहे. कविता ही कशाचंतरी तात्पर्य असू नये. आर्चबाल्ड मॅक्लाईश (Archibald MacLeish) म्हणून गेला, 'A poem should not mean but be'. त्याच्या या गंमतीशीर म्हणण्याचा अर्थ हा असा आहे. आणि दुसरं म्हणजे साहित्याने सांगू नये, दाखवावं. म्हणजे असं की 'मला दु:ख झालं किंवा मला भीती वाटते' यापेक्षा 'माझे हात थरथर कापू लागले' असं. विल्यम कार्लोस विल्यम्स (William Carlos Williams) या अमेरिकन कवीचं 'No Ideas But in Things.' हे वचन हे मॉडर्निझमच्या एकंदर खजिन्याची एक किल्ली गणली जातं. त्याचा अर्थ ढोबळमानाने हा असा आहे : जीवनाच्या व्यामिश्र अनुभवाचा संपूर्ण अर्थ लेखकालाही कळला असेलच हे कशावरून? तेव्हा कवीने किंवा लेखकाने जीवनानुभव सादर करावा व त्यावर भाष्य करण्याचं टाळावं हे खरं.
तर मग संदीप खर्यांच्या कामाला हे सिद्धांत लागू होतात का? पुन्हा एकदा, हे नमूद करतो की वरील आधुनिकतावादी तत्त्वांचा (निकष?) काटेकोरपणे कुणालाही लावावा, असं माझं म्हणणं नाही. तेव्हा, खर्यांना एकट्यांनाच दोष न देता असं म्हणता येईल की लोकप्रिय कवितेचा सर्व प्रवास हा यापैकी कुठल्याही गोष्टीशी?,कसलाही संबंध न ठेवता चालू आहे.
कोलटकरांसारख्या कवीला 'बिनाटेलिफोनचा कवी' असं गमतीने म्हटलं जायचं. कारण म्हणे त्यांच्या जवळजवळ पूर्ण आयुष्यात त्यांच्याकडे टेलिफोन नावाचा प्रकार नव्हता. जनसंपर्काचा विषय निघाल्यावर जी. ए. कुलकर्णींची आठवण येणं अपरिहार्य आहे. संदीप खरे आणि त्यांच्यासारख्या परफॉर्मन्सवरच उपजीविका करणार्यांच्या या संदर्भातल्या प्रकाराकडे, याही एका दृष्टीकोनातून पाहता येईल.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
भारीच. लेख आवडलाय.
संदीप खरेच्या कविता कधीकाळी तोंडपाठ केल्या होत्या कॉलेजमध्ये असताना. काही कविता फारच भारी होत्या. तर काही काहीच्या काहीहीही होत्या. असो.
पण लेख मस्त लिहिलाय.
काही कविता रसिकप्रिय असतात तर काही लोकप्रिय. उरलेल्या टिंगल टवाळीसाठी विडंबन करायला आयतं कोलितच देतात.
नव्वोदत्तरी बदलेल्या समाजाचे आणि कवितेचा गर्भित अर्थ व्यवस्थित मांडलाय.
बाकी तरूणांमध्ये क्रेझ असलेले कवी म्हणून कधीकाळी चारोळीकार गोखले होते. 'मी माझा', 'पुन्हा मी माझा' मुळे. सौमित्र यांचाही 'गारवा' मुळे एक चाहता वर्ग तयार झाला होता. आयुष्यावर बोलू काही मुळे संदीप खरे खेडोपाडी पोचले.
तसही नवकवी हा नेहमीच चेष्टेचा विषय असतो. सुरूवातीला खरेंच्या कवितांचा यथेच्छ समाचार घेतला गेला होता काही लोकांकडून. मात्र संदीप खरेंचे सकाळ वर्तमानपत्रातील एका पुरवणीत चांगले लेख येत होते कवितेबद्दल. लेखमाला वाचल्याचे आठवतंय. असो.
बाकी विश्लेषण आवडले.
लेख आवडला
आणखी असेच लेख येऊ द्या.
बर्याचश्या मुद्द्यांशी सहमत.
खरेंच्या लोकप्रिय कविता मला बोअर वाटतात हे आधी नमूद करतो.
खर्यांवर होणार्या टीकेमागे लोकप्रियता (म्हणजेच पोटात दुखणे) हेच मोठं कारण आहे. त्यांचं म्हणणं लोकांना आवडलं नसतं तर ते कधीच बाजूला फेकले गेले असते. सुरूवातीला म्हणजे २००४ च्या आसपास मी पुण्यात असताना आमच्यासारख्या कॉलेज्च्या मुलांमध्ये खरेंची क्रेझ होती. पण नंतर त्यांच्या कवितेतला तोच तोच पणा जाणवत गेल्यावर ते बोअर होत गेले. पण त्यामुळे ते काही दुर्लक्षणीय होत नाहीत. त्यांनी मराठी तरुण वर्गाला कवितेकडे वळवलं हे बर्याच अंशी खरं आहे. कारण मी माझ्या लिमिटेड परिघात ते अनुभवलं आहे. तरूणांना, कॅजुअल वाचक असलेल्यांना, नॉस्टॅल्जिक म्हातार्यांना पुन्हा कवितेकडे वळवायला त्यांनी उद्युक्त केलं. थोडक्यात ते कवितेतले "ययाती" किंवा "मृत्युंजय" झाले आहेत.
खरा सवाल हा खरे लोकप्रिय का आहेत या पेक्षा तुम्ही म्हणता तसे नव्वदोत्तरी, विद्रोही , पुरोगामी वगैरे कवी लोकप्रिय का नाहीत हा आहे.
दोन घटका विरंगुळा देतो म्हणून हिंदी पलायनवादी सिनेमा लोकप्रिय आहे हा युक्तिवाद काही अंशी असला तरी इथे जसाच्या तसा लागू होत नाही. प्रश्न असा आहे की कविता कशाला म्हणावं हे काही लोकांनी आपसातच ठरवून घेतलं आहे. अमुक म्हणजे विद्रोही, तमुक स्त्रीवादी. अमुक आडनावाचा असेल तर त्याने असंच लिहायला हवं अशी कप्पाबंद व्यवस्था मराठीत आहे. मला सुद्धा अनेकांनी तुम्ही दलित साहित्य का लिहित नाही (हे अर्थात माझ्या आडनावाकडे पाहून) विचारलं आहे. प्रत्येक कवी ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिचं सृजन स्वतंत्र आणि इंडिविज्युआलिटी सांभाळणारं असलं पाहिजे हे इतर वेळी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे विसरतात हे पाहून मौज वाटते.
खर्यांमधला विद्रोह 'मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही' इथवर येऊन संपतो. धर्मातल्या तत्त्वांना विरोध, किंवा त्याबद्दलचे प्रश्न किंवा त्याबद्दलची मीमांसा वगैरे गोष्टींचा स्पर्श जाणवत नाही.
तुमचीसुद्धा इथे तशीच काहीतरी अपेक्षा दिसते. धर्मातल्या तत्त्वांना विरोध, किंवा त्याबद्दलचे प्रश्न किंवा त्याबद्दलची मीमांसा त्यांनी का करावी? त्यांना नसेल करायची, त्यांनी नाही केली. ती करणारे इतरही कवी आहेत. यांनीही तेच केलं तर मग फरक काय राहिला? मीमांसा वगैरे करत राहिले तर त्यांचे श्रोते पळून जातील.
त्यामुळे जिला नव्वदोत्तरी कविता म्हणतात ती बव्हंशी प्रतिक्रियात्मक झाली आहे. ती तार्किक आहे. प्रातिनिधिक आहे. बर्याचदा तीत कवीचा स्वानुभव नाही. सामान्य वाचकाला आवडणारी गेयता, नादमयता, शब्दांचा कलाकुसरी वापर तीत नाही त्यामुळे ती अलोकप्रिय असल्यास काही नवल नाही. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने कला हे आनंद मिळवण्याचं साधन आहे, ज्यात काहीच चूक नाही.
वानगीदाखल एक प्रसंग सांगतो, मागे अकोल्याच्या एका ज्येष्ठ कवींशी त्यांच्या घरी गप्पा मारत होतो. संदीप खरेंचा विषय निघाला. ते म्हणाले मी का साहित्य संमेलनातल्या कविसंमेलनाचा अध्यक्ष होतो, तर हा संदीप खरे पण आमंत्रित होता. त्याच्या एका कवितेला वन्स मोअर आल्यावर मी काही त्याला पुन्हा कविता म्हणू दिली नाही, तो काय कवी आहे का, मी सिनिअर आहे वगैरे.. यांच्या कवितासंग्रहाची एक आवृत्ती संपायला वीस वीस वर्ष जातात ही गोष्ट वेगळी. ज्या माणसाला तुम्ही कवीच मानत नाही त्याच्या कवितेची चिकित्सा तरी हे लोक का करतात देव जाणे?
रुमाल
यामुळे जिला नव्वदोत्तरी कविता म्हणतात ती बव्हंशी प्रतिक्रियात्मक झाली आहे. ती तार्किक आहे. प्रातिनिधिक आहे. बर्याचदा तीत कवीचा स्वानुभव नाही. सामान्य वाचकाला आवडणारी गेयता, नादमयता, शब्दांचा कलाकुसरी वापर तीत नाही त्यामुळे ती अलोकप्रिय असल्यास काही नवल नाही. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने कला हे आनंद मिळवण्याचं साधन आहे, ज्यात काहीच चूक नाही.
अगदी अगदी!
भांडवलशाहीचे आणि जागतिकीकरणाचे सगळे सगळे फायदे लाटून भरपूर पैसे बिसे छापून "समाजवादी भान" असलेली (शक्यतो दीर्घ पल्लेदार मुक्तछंदी गेलाबाजार जगण्याचे प्रगल्भ भान वगैरे व्यक्त करणारी) कविता पाडणारे आणि इंस्टॉलेशन करणारे काही "नवता"वाले कवी चटकन डोळ्यासमोरून गेले. आणि किंवा "मी पैशांसाठी काम करत नाही" असं म्हणणारे, मस्त एसीत बसून विद्रोही नाटकं लिहिणारे श्रीमंत कम्युनिस्ट नाटककार देखील आठवले.
संदीप स्वतः गंभीर होऊन असले भामटे स्टॅन्ड घेत बसत नाही. टाळीखाऊ असले तर टाळीखाऊ आहे असं मान्य करून आपल्या वाटेने जाईल.
संदीपनं केवळ पावसाळी उसासे टाकणाऱ्या मोसमी कवींनाच प्रेरणा दिली आहे असं नाही, सुजित फाटक सारख्या चांगलं लिहू शकणाऱ्या बहुस्रुत पोरांना देखील प्रेरणा दिली आहे. हे वानगीदाखल सांगतो. माझ्या अनेक मित्रांनी संदीपची पारायणं केली आहेत एकेकाळी.
कोल्हापुरात असताना संदीप-सलीलचे कार्यक्रम मी चुकवले नाहीत. पहिल्यांदा आबोकाचा शो केभोला मी पाहिला तो रात्री साडे नऊचा होता. अगदी हाऊसफुल्ल. आम्ही वरती बाल्कनीत. तो जवळ जवळ तासभर उशिराच सुरु झाला. स्टेजवर तीन टाळकी, एक डिजिटल फ्लेक्स, एक तबला, एक बासरी आणि एक हार्मोनियम. समारोप म्हणून बारा-सव्वाबारा वाजता संदीप-सलीलनी त्यांचे अगदी ताजे म्हणून "देते कोण" हे बालगाणं सादर केलं. आख्खी बाल्कनी त्या छोट्याश्या गाण्यावर शिट्ट्या टाळ्यांनी दुमदुमत होती. आणि ७०% टक्के पब्लिक विशी-पंचविशीच्याच्या आसपासचं. लोक मध्यरात्रीसुद्धा उत्साहानं पेटले होते आणि त्यांनी आरडाओरडा करून तीन वन्स मोअर पाडले. मराठी कवितेसाठी हे असं?काहीतरी लिहू पाहणाऱ्या पोरांना केवढा आत्मविश्वास दिला असेल महाराष्ट्राच्या शहराशहरात या कार्यक्रमांनी. आणि हे गाणं बालकविता म्हणून टाकाऊ टुकार आहे का? नाही! सध्या तिशी-पस्तिशीत असणारी अनेक कार्टी एकहाती मराठी आणि कवितेकडे खेचून आणली संदीपने. त्यांचे प्रकार किती - सेमी इंग्रजीमुळे भजे न झालेली, बॉलीवूडच्या गाण्यांचा दबाव झुगारून देऊ पाहणारी आणि तरीही हिंदी धृपदे असलेली भिकार मराठी गाणी ऐकून विटलेली, नुकतंच कवितेचं भान आलेली, स्वभाषेच्या अभिमानातून मराठी गाणी ऐकू इच्छिणारी, संवेदनशील मनाची, आपल्या शहरात नाटका-एकांकिकांमध्ये रमू इच्छिणारी परंतु पोस्ट-उदारीकरणाच्या प्रभावांमुळे भाषिक अभिव्यक्तीत बावचळलेली, चार पुस्तकं वाचणारी आणि चेतन-भगत-छाप इंग्रजी-pseudoवाचनाची चटक न लागलेली, कॅसेट-प्लेअर->सीडी-प्लेअर->mp३-प्लेअर या अवस्थांतरात अडकलेली इत्यादी इत्यादी.
चांगला लेख.
चांगला लेख.
जनरली अपवाद वगळता जो समृद्धीत सुखवस्तू असतो तोच कविता आणि साहित्यात संघर्ष, जीवनाची कुरुप बाजू, विद्रोह, जळजळीत असे काही आढळल्यास आकर्षित होतो, मनोरंजित होतो किंवा क्वचित तसा रस शोधूही पाहतो. तेच त्याला अस्सल आणि दर्जेदार वाटते. बाकीचे ते नुसते "लोकप्रिय" असे ठरते.
जो या "नव्वदोत्तरी" बदलांच्या रगाड्यात पिसत असतो असा मध्यमवर्ग, म्हणजे गर्दी, बेरोजगारी किंवा सतत धावणे.. त्याला अर्थातच कविता साहित्यातही पुन्हा संघर्ष, कुरुपता नको असते. तो कलंदर, हळवे प्रेम, गाडी सुटल्यावर फलाटावर हलणारे रुमाल, ओंजळीत दिलेल्या दोन कळ्या यात विरंगुळा शोधतो. यश राज किंवा तत्सम चित्रपट आणि खरे गोखले हे त्याला ते पुरवतात.
जो खरा तळात पिचलेला असतो त्याला या सर्वाशी देणेघेणे असण्याइतकी ब्यान्डविड्थ नसते. त्यातून जरा डोके वर निघाले तरच निर्मिती आणि आस्वाद शक्य होऊ शकते.
खरे
खरे सांगायचे म्हणजे, जीवनातल्या दाहक, कुरुप वास्तवाकडे संपूर्ण पाठ फिरवून, इतरांच्या (बहुतांशी ममव) हृदयावर मखमली मोरपीस फिरवत रहायचे असाच काहींचा साहित्य प्रसवण्याचा उद्देश असतो. तसे लेखकही पूर्वी खूप होऊन गेले. खऱ्यांना कवितेतले वपु म्हणावेसे वाटते.
लेखन वाचन हा आस्वादाचा प्रकार
लेखन वाचन हा आस्वादाचा प्रकार आहे असं म्हणता येईल का? मग त्याची पाककलेशी तात्पुरती तुलना करु. जर लेखन ही समाज बदलण्याची चळवळ आहे असं असेल तर हे अप्रस्तुत मानावं.
जळजळीत तितराचे, घोरपडीचे अथवा तत्सम मटण किंवा कोन्डयाची भाकरी किंवा रोडगा किंवा हातभट्टी बनवत नसल्याने अत्यंत उत्तम पुरणपोळी शिरा अथवा मोदक बनवणार्या सुखवस्तू आजीबाईंना त्यापायी निकृष्ट किंवा किंचीतही निम्न मानावे का?
.
जळजळीत तितराचे, घोरपडीचे अथवा तत्सम मटण किंवा कोन्डयाची भाकरी किंवा रोडगा किंवा हातभट्टी बनवत नसल्याने अत्यंत उत्तम पुरणपोळी शिरा अथवा मोदक बनवणार्या सुखवस्तू आजीबाईंना त्यापायी निकृष्ट किंवा किंचीतही निम्न मानावे का?
आजीबाईंनी उत्तम पुरणपोळी, शिरा अथवा मोदक बनविले, तरी आमचे काहीच म्हणणे नाही. आम्ही ते आवडीने खाऊ. ('कारण शेवटी आम्ही...', वगैरे वगैरे. म्हणा लेको! जिथे पु.ल.सुद्धा म्हणून गेलेत, तिथे तुमचे तोंड कोण अडविणार?)
मात्र, रोज रोज केवळ शिकरण, नि जिच्यात डाळ सूक्ष्मदर्शित्राने शोधावी लागते, असली सपक पाणीदार (पाणचट?) आमटी जर खिलवून राहिल्या, तर आजीबाईंना काय सुगरण म्हणायचे? (एखादे वेळेस मटार उसळ, झालेच तर थालीपीठ, कांदेपोहे वगैरे जरी खिलवून राहिल्या, तरीसुद्धा बॉर्डरलाइन सुगरण म्हणण्याचा विचार करता येईल. पण कुठले काय?)
(रोज रोज पोळी शिकरण खिलविणारी मामी ही केवळ गदिमांच्या काव्यातच सुगरण ठरू शकते. परंतु तेसुद्धा गदिमांनी बहुधा सारक्याष्टिकली लिहिले असावे, गदिमांची टेष्ट इतकीसुद्धा गयीबीती नसावी, असे मानण्यास जागा आहे. आणि, त्यापुढच्याच पंक्तीतले 'गुलाबजामन खाऊया' हे एक तर 'बोलाचीच कढी, नि बोलाचाच भात' अशा अर्थाने तरी लिहिले असावे, नाहीतर 'बहुधां चितळ्यांकडूंन आणलें असावेंत' अशा (सानुनासिक हेलयुक्त) अर्थाने तरी, याबद्दल आम्हांस खात्री आहे. (चितळ्यांकडून - बहुधा बेअर मिनिमम क्वांटिटीमध्ये - विकत आणलेले गुलाबजाम खिलविणारी मामी ही 'सुगरण' कशी?१, २) गदिमा तसे बेरकी असावेत. त्यांच्या स्मृतीला माझा प्रणाम.)
परंतु असो. अभिव्यक्तिस्वातंत्र्याप्रमाणेच अभिरुचिस्वातंत्र्यावरसुद्धा आमचा पूर्ण विश्वास असल्याकारणाने, संदीप खरे आवडून घ्या, वर्जेश सोळंकी आवडून घ्या, मन्या जोशी आ. घ्या, व.पु. काळे (गरिबांचे पु.ल.) आ. घ्या, शिकरण आ. घ्या, फार कशाला, जयदीप चिपलकट्टीसुद्धा आ. घ्या.३ हॅव द एंटायर वर्क्स अँड हॅव फन. (जोवर ते मलासुद्धा आवडावेत, अशी माझ्यावर सक्ती नाही, तोवर) माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काय जाते? (आफ्टर ऑल, इट डज़ टेक ऑल सॉर्ट्स टू मेक अ वर्ल्ड.)
----------
१ हजार वार रेशीम विकत घेणाऱ्या मामाचासुद्धा बहुधा शिंप्याचा धंदा असावा. (अर्थात, त्यात काही गैर आहे, असे म्हणण्याचा उद्देश नाही.)
२ यावरून आठवले. आमचा एक (तेव्हा अविवाहित) उत्तरप्रदेशी मित्र. दुसऱ्या एका (विवाहित) मित्राच्या घरी जेवायला आमंत्रण आले. तर (त्या मित्राच्या बायकोला इंप्रेस करायचे, म्हणून) याने काय करावे? तर, (स्थानिक इंडियन ग्रोसरी ष्टोरातून विकत आणलेला) 'पंजाबी घसीटाराम हलवाई कराचीवाला' ब्रँडचा (पाकातल्या) गुलाबजामुनचा कॅन उघडला, एका काचेच्या भांड्यात रिकामा केला, मित्राच्या घरी ते काचेच्या भांड्यातले गुलाबजाम घेऊन गेला, नि 'मैं ने बनाए हैं' म्हणून दिलेन ठोकून! (नशीब 'गिट्स से' अशी पुस्ती नाही जोडलीनीत.) आता, तो गुलाबजामुनचा कॅन त्या इंडियन ग्रोसरी ष्टोराच्या शेल्फावर किती वर्षे पडून होता, कोणास ठाऊक, परंतु, ॲज़ लक वुड हॅव इट, ती बॅच नेमकी खराब निघाली. आणि मग, ते गुलाबजाम विकतचे होते, नि दुर्दैवाने खराब निघाले, हे कबूल करावे लागले, नि अशा रीतीने भांडे उघडे पडले. (काचेचे नव्हे. ते अगोदरच उघडे पडले होते. म्हणूनच तर हे भांडे उघडे पडले. चालायचेच.)
३ फक्त, 'न'वी बाजू तेवढे आ. घेण्यास आमचा तीव्र आक्षेप आहे. दॅट वुड बी इन एक्स्ट्रीमली बॅड टेस्ट. (वर्स दॅन व्होटिंग रिपब्लिकन. द ज्यूरी इज़ स्टिल आउट.) असो.
'अभिधानंतर' या नव्वदोत्तरी
'अभिधानंतर' या नव्वदोत्तरी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अनियतकालिकाच्या अनेक लेखांतून संदीप खरे यांच्यावर प्रच्छन्न आणि उघड अशी टीका झाली. संदीप खरे यांना उद्देशून बाजारूपणासारखे शेलके शब्द वापरले गेले.
पुनश्च, 'पब्लिक'पैकी कितीजण ही असली अनियतकालिकं वाचून खऱ्यांच्या कार्यक्रमाला जायचं की नाही किंवा त्यांच्या कविता वाचायच्या की नाहीत हे ठरवतं?
थोडक्यात शहरीकरण, जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण यांच्या नंतरच्या जगतात राहणारे नव्वदोत्तरी नायक समाजाच्या संदर्भातलं, कुटुंबसंस्थांसारख्या गोष्टींच्या बाबतीतलं आपलं स्थान तपासतात; सामाजिक व्यवस्था आणि संकेतांबद्दल तिरकस - क्वचित जळजळीत म्हणावं इतपत धारदार - भाष्य करतात; या व्यवस्था आणि संकेत यांची आडवीतिडवी नासधूस झाल्यानंतरची असंगतता त्यांच्या कवितेतून येते.
मुळात हे सगळं असणारी कविताच चांगली आणि इतर कविता वाईट हे कोणी आणि कधी ठरवलं? एकत्र येऊन 'तू मेरी खुजा मैं तेरी खुजाता हूं' करणाऱ्या चार-पाच टाळक्यांनीच ना?
नव्वदोत्तरी निवेदक कंटाळलेला / कटकट करणारा / व्याकुळता (anxiety) व्यक्त करणारा आहे. या सार्यामध्ये आपली निर्मितिशीलता घुसमटते आहे, अशा स्वरूपाचे बोल त्या कवितांमधून ऐकू येतात.
नेमका याचाच 'पब्लिक'ला कंटाळा येतो. आणि मग अशा कविता लिहिणाऱ्यांना आपले कवितासंग्रह विकले का जात नाहीत असा प्रश्न पडतो. मग आणखी जळजळीत कविता, आणखी कमी विक्री वगैरे....चक्र चालू राहाते. दरम्यान खरे पैसे आणि लोकप्रियता दोन्ही मिळवत राहतात.
बाय द वे लेख गेल्याच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात यायचा होता, चुकून आता प्रकाशित झाला का? 'नव्वदोत्तरी' वगैरे शब्द वाचून तसं वाटलं खरं....
..
एकत्र येऊन 'तू मेरी खुजा मैं तेरी खुजाता हूं' करणाऱ्या चार-पाच टाळक्यांनीच ना?
'तू मेरी खुजा मैं तेरी खुजाता हूँ' हे वाक्यसुद्धा आधुनिकोत्तर काव्यपंक्ती म्हणून वाईट नाही.
दरम्यान खरे पैसे आणि लोकप्रियता दोन्ही मिळवत राहतात.
मग बाकीचे काय खोटे पैसे मिळवितात?
बाय द वे लेख गेल्याच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात यायचा होता, चुकून आता प्रकाशित झाला का? 'नव्वदोत्तरी' वगैरे शब्द वाचून तसं वाटलं खरं....
नाही, तो अंक अनेक दिवाळ्यांपूर्वी येऊन गेला. असो.
पोटदुखी.
ही लेखक, कवींमध्ये असतेच. एकमेकांबद्दल. वाचकांना काहीच त्रास नसतो. आवडलं साहित्य तर विकत घेऊन वाचतात, नाही तर नाही. किंवा परवडले नाही तर वाचनालयातून संग्रह आणून वाचतात.
अमुक प्रकारचा कवी आहे किंवा अमुक आर्थिक किंवा वयोगटांत आवडणारा हे नंतर चिकटतं.
तरी मला लेखक राजन बापट आणि इतर सर्वांचेच प्रतिसाद आवडले. कविता फारशी पोहोचत नसली तरी मी वाचून समजण्याचा प्रयत्न करतोच.
ही लोकप्रियता म्हणजे
ही लोकप्रियता म्हणजे वर्षानुवर्षं त्याच त्या मालिका पाहणार्या वर्गामधली लोकप्रियता म्हणायची की त्यापेक्षा हे वेगळं आहे?
मराठीत, अन्य मालिका निघत नसल्याने, प्रेक्षक वर्ग आहे ते गोड मानून घेउन साजरं करतो. तसं कुठे आहे खऱ्यांच्या बाबतीत. अन्य कंटेंपररी कवि आहेतच ना? तुम्हीच नावे लिहीलेली आहेत. मग अन्य पर्याय असूनही खऱ्यांकडे रसिकवर्ग ओढला जातोय हे दिसतय.
संदिप खरेचे ध्येयच मस्त कविता
संदिप खरेचे ध्येयच मस्त कविता लिहून/गाऊन, माफक श्रीमंत होऊन, मटार उसळ खाऊन वगैरे टुमटूमीत राहायचे असेल तर त्याला कुणाची हरकत का असावी कळत नाही. पॉप्युलर आहे म्हणून नाके मुरडायचे हे किती बोअर आहे यार!
आणि 'दूर देशी गेला बाबा, माझ्याशी खेळायला येत नाही' असलं काही त्या कवितेत नाही. त्याच्या कवितेची चिकित्सा करताना ती वाचली पण असती तर बरे झाले असते.
संदिप खरेची 'मी आणि माझा आवाज' ही तुलनेने नवी कविता आवडली.
- नीचभ्रू पुंबा
तेच की.
आपल्याला हवी तशी साहित्य कलाकृती हल्ली कोणी तयार करत नाही, अशी तक्रार ऐकून कोण घेणार१ ? खरे बुवा तर नाहीच नाही. मग प्वाइंट काय२ ?
एकदा "शिप ऑफ थिसिअस" वर इंटेलेक्चुअल स्टीम्युलेशन फॉर स्नॉब्स अँड अपटाईट्स अशी टीका वाचलेली, तेव्हाबी असंच वाटलेलं.
"तुमचे युट्यूबच्या ट्रेंडिंग विभागाबद्दल मत काय ?" असा जळजळीत आणि तर्कनिष्ठुर प्रश्न बोटांवर आला होता, पण वेळीच
मला आणखी एक मुद्दा जाणवतो. अन्य संदर्भातल्या 'विकाऊ' गोष्टींचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, कारण ती ती क्षेत्रं जरा मोठी असतात. उदा. हिंदी सिनेमा. यात सलमान खानचे सिनेमे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचले आहेत, याचा विशेष त्रास होत नाही; कारण त्याच वेळी इरफान खान, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज यांसारखे लोकही लक्षवेधी काम करत आहेत. याउलट मराठी कवितेच्या सुकत गेलेल्या नदीचा हाच एकमेव प्रवाह शाबूत राहिल्यावर त्याचं अस्तित्व नको तितकं जाणवतं.
हे डिस्क्लेमर वाचले. पटले.
विकाऊ गोष्टींवरच्या आक्षेपामुळे बिढार मधला चांगदेव-नारायण संवाद आठवला.
---------------------------------------------------
१- हे नक्की कशामुळे होते खरं ? लेखकासारखी आणखी बरीच लोकं असती तर त्यांच्यापैकी कुणी इतरांसाठी किंवा त्यांच्या मागणीस पूर्ण करण्यासाठी इतर कुणी तशी कलाकृती तयार केली नसती का ? मग लेखकासारख्या आवडीची लोकंच कमी झाली आहेत, आणि इतक्या तुटपुंज्या संख्येसाठी फुल्ल टाईम लिखाण करणे व्हायेबल नाही, असं असू शकत का ?
२-हा, काही प्वाइंट असायलाच पाहिजे असा काय आमचा आग्रह/सक्ती नाही.
"दूर देशी गेला बाबा" -- मला
"दूर देशी गेला बाबा" -- मला माहिती नाही की कविता म्हणून ही किती उच्च दर्जाची कलाकृती आहे.
पण मला ती अंशत: पटते, कारण हा माझा प्रॉब्लेम आहे- आणि माझ्या सारख्या बऱ्याच लोकांचा.
निदान ही रिलेव्हन्सी ज्या कवितेत आहे ती मला वाचायला/ऐकायला आवडते.
------
अर्थात उद्या ह्यापुढे जाऊन संदीपने जर का "म्हणून बायकांनी घरी रहावं, एकत्र कुटूंब," वगैरे गूळ काढला तर मला ती कविता झेपणार नाही.
पण आणखी कुणाला तरी आवडून जाईल - आणि लोकप्रिय होईल.
----------
९०%ना आवडणाऱ्या कविता ह्या कशा असायला हव्यात? कशाबद्दल असायला हव्यात? त्यात जीवनाचं विदारक दर्शन घडवणाऱी व्याकूळता असावी की काहीतरी उदात्त, मंगल, सुंदर जग दाखवणाऱ्या ओळी असाव्यात?
ह्याचं उत्तर मला माहिती नाही,पण माझ्यामते अप्राप्य असं काहीतरी अफाट सौंदर्य जर कवितेत असेल तर ती कुणालाही भावावी-
उ.दा -
"देखणे जे चेहेऱे जे प्रांजळाचे आरसे
सावळे की गोमटे त्यां मोल नाही फारसे"
ह्या ओळींत सर्वांना (१%, ९०%, ३२% वगैरे) आवडणारं काहीतरी आहे, जे मला एकदम आतवर जाणवतं. अशा कविता मग सर्वांना का नाही आवडणार?
असो. काहीतरी भरकटलो.
:)
सविस्तर लेख वाचतोच, पण ह्यावर काही लिहिल्याबद्दल धन्यवाद!
मला संदीपच्या कविता आवडतात. म्हणजे त्याच्या कविता आधी ऐकल्या, मग वाचल्या आणि मग इतर काही कवींच्या कविता वाचल्या (मर्ढेकर/बोरकर/कोलटकर/ग्रेस).
संदीपच्या कविता सहज + थोड्या आजच्या वाटल्या.
खास आवडलेल्या म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेल्या.
बुंबुंबा/सुपरमॅन ह्या ऑल टाईम फेवरिट आहेत.
"अंगी ताकद जरी अफाट, काय नेमके सलते आत"?
अशी सुपरमॅनच्या दु:खाची "का रे बाबा, बरा आहेस ना?" अशी विचारपूस आणखी कोणा मराठी कवीने केल्याचं ऐकिवात नाही.
तसंच
"राम राम हे म्हणत रहा, आणि जगाला भिडत रहा.
त्या रामाचे करूनि ध्यान, चिरंजीव भव सुपरमॅन"
असा मैत्रीपूर्ण सल्ला देणारा हनुमानही इथेच दिसतो.
"करण्याआधी वाईट काही रे थांबा-
दिसेल अथवा आरशातुनि - बुंबुंबा!"
हे सलिलच्या किंचाळणाऱ्या आवाजात ऐकवलं नाही तरी "खयाल होना चाहिये" - तत्वात ही कविता मस्त बसते.
तर खर्यांच्या कवितेतली दु:खं ही स्वप्नरंजनात्मक आहेत, ती या मोडलेल्या ढाच्याबद्दल कुठेही बोलत नाहीत. तिथे अजूनही प्रिया भेटत नाही आणि मुलाला बाप भेटत नाही, वगैरे गुलाबी दु:खं येतात. या कृतक-रोमँटिसिझमच्या पलीकडे जात जेव्हा खरे काहीतरी मांडू जातात, तेव्हा ते अर्थातच अधिक गुणवत्तेचं आहे. परंतु त्यातही कलंदरी, कवीचं गूढरंजनात्मक अस्तित्व वगैरे काहीसे परिचित असलेले वळसे दिसतात. थोडक्यात सांगायचं तर जीवनाचं कुरूप म्हणा, विकृत म्हणा, विकट म्हणा, नाहीतर विक्राळ म्हणा, असं जे रूप आहे; त्याच्याशी कसलंही देणंघेणं नसलेलं खरे यांच्या कवितांचं जग आहे.
हे एक कारण असेल खरेंच्या लोकप्रियतेचं - की विषयाची निवड आणि हलकीफुलकी शैली.
पण गेयता हीसुद्धा महत्त्वाची असेल ना? आता ग्रेसची गाणी हृदयनाथ मंगेशकरांनी वगैरे चाल देउन जास्त फेमस केली - पण मुळात कवितेला गेयता असेल, ती गुणगुणता येत असेल तर तशा कविता लोकांना भावतात.
"पाउस कधीचा पडतो,
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने"
ही ग्रेसची कविता काही फार दुर्बोध वगैरे नाही, उलट थोडी अँटी ग्रेसच वाटते :) पण जबरदसत चित्र उभं करते. ह्यातलं दु:ख सोप्पं आहे असं थोडीच म्हणणार आपण?
तशा संदीपच्या कविता "सोप्प्या" आहेत म्हणून खास नाहीत(च) => हे गृहितक पटत नाही.
-----------------------
(तशा शाहीर संभाजी भगतांच्या कविता कशा एकदम पेटवणाऱ्या असतात - पण ते "अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा - मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालून काळा झब्बा!" टाईप नाही लिहू शकणार.)
खरेंच्या आणि तुम्ही म्हणता
खरेंच्या आणि तुम्ही म्हणता त्या इतर लेखकांच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांची कलाकृती ही त्यांच्या अनुभवविश्वाचे प्रतिबिंब आहे. मला खरे अजिबात आवडत नाहीत. पण खरेंसारखेच मला कुंडलकर वाटतात.
1975 च्या नंतर जन्माला आलेले बरेच शहरी लेखक (इथे ब्राम्हण असे वर्गीकरणही लागू आहे) एका विशिष्ट वातावरणात मोठे झाले. ते वातावरण क्रांती, कुरूप जीवन, अतीव दुःख वगैरे गोष्टींना पूरक नव्हते. आणि त्यांच्या प्रसिद्धीचे कारणही तेच आहे. त्यांची मोरपिशी दुःख त्यांच्यासारख्याच मोरपिशी लोकांना आवडतात. यामध्ये 1995 नंतरचा आयटी बूम, त्यातून अचानक उंचावलेले राहणीमान आणि सहज मिळणारा पैसा याचाही प्रभाव आहे.
त्यामुळे या चौकटीच्या बाहेर अनुभव विश्व असलेल्या लोकांना हे लेखक रुचत नाहीत.
मला ह्याचं दुसरं टोक म्हणजे
मला ह्याचं दुसरं टोक म्हणजे काय ते समजून घ्यायला आवडेल.
ह्या (कुंडलकर/खरे) शहरी लोकांचं अनुभवविश्व १% धरून चालू.
मग उरलेल्या नॉन-शहरी ९९% लोकांना आवडणारं लिखाण सध्या कोण करतं?
कदाचित हा मोठा डिस्कनेक्ट असेलही की आपापल्या परीघांत लोकप्रिय असणारे कवी/लेखक दुसऱ्या परीघांपर्यंत पोचतच नाहीत.
...
1975 च्या नंतर जन्माला आलेले बरेच शहरी लेखक (इथे ब्राम्हण असे वर्गीकरणही लागू आहे) एका विशिष्ट वातावरणात मोठे झाले. ते वातावरण क्रांती, कुरूप जीवन, अतीव दुःख वगैरे गोष्टींना पूरक नव्हते. आणि त्यांच्या प्रसिद्धीचे कारणही तेच आहे. त्यांची मोरपिशी दुःख त्यांच्यासारख्याच मोरपिशी लोकांना आवडतात. यामध्ये 1995 नंतरचा आयटी बूम, त्यातून अचानक उंचावलेले राहणीमान आणि सहज मिळणारा पैसा याचाही प्रभाव आहे.
त्यामुळे या चौकटीच्या बाहेर अनुभव विश्व असलेल्या लोकांना हे लेखक रुचत नाहीत.मग उरलेल्या नॉन-शहरी ९९% लोकांना आवडणारं लिखाण सध्या कोण करतं?
कदाचित हा मोठा डिस्कनेक्ट असेलही की आपापल्या परीघांत लोकप्रिय असणारे कवी/लेखक दुसऱ्या परीघांपर्यंत पोचतच नाहीत.
नॉन-शहरी लोकांचे जाऊ द्या. तूर्तास शहरी लोकांपुरतेच बोलू.
१. शहरीच, परंतु आयटीशी काडीमात्र संबंध नसलेल्या (आणि त्यामुळे त्या कुठल्याशा त्या आयटी बूमशी काडीमात्र संबंध नसलेल्या, अथवा त्यातून एक नवा पैसासुद्धा अधिकचा न मिळालेल्या वा त्या बूमपायी राहणीमान यत्किंचितही न उंचावलेल्या) लोकांचे काय?
२. १९७५पूर्वी जन्माला आलेल्या शहरी लोकांचे काय?
३. किंवा, आमच्यासारख्या (अ) शहरीच, परंतु १९७५पूर्वी जन्माला आलेल्या, (ब) आयटीतल्याच, परंतु १९९५च्या त्या बूमच्या पुष्कळच आधीपासून या क्षेत्रात असलेल्या (आणि त्या बूममुळे काहीही फरक न पडलेल्या), आणि, मुख्य म्हणजे, (क) ही सर्व कविमंडळी ('तथाकथित' हे विशेषण वापरण्याचा मोह महत्प्रयासाने टाळलेला आहे. कृपया लक्षात घ्या. थँक्यू!) उदयास येत असतानाच्या काळाच्या खूप आधीपासून महाराष्ट्राबाहेर/मराठी परिघाबाहेरच नव्हे, तर भारताबाहेर राहात असलेल्या (आणि त्यामुळे या कवींना फारसे एक्स्पोज़ न झालेल्या आणि/किंवा जवळपासची सर्वच मंडळी या कवींना आवडून घेत असल्यामुळे त्यांना आवडून घेण्याचे पियर प्रेशर नसलेल्या) लोकांचे काय?
थोडक्यात, नॉन-शहरी लोक सोडा, परंतु (तुमच्याच आकड्याप्रमाणे) १% शहरी लोकांच्या परिघात तरी हे लोक पूर्णपणे पोहोचू शकले आहेत काय?
(ऑल्दो, टू बी ॲब्सोल्यूटली फेअर, वरील क्र. १.च्या कॅटेगरीतील (बोले तो, शहरी, परंतु आयटी कॅटेगरीत न मोडणाऱ्या) एका विशिष्ट उपगटात (बोले तो, शहरी, बिगरआयटी, परंतु या कवींच्या उदयकाळात रिलेटिवली तरुण असलेल्या, लिहितावाचता येणाऱ्या/कॉलेजशिक्षित, आणि, अगदी श्रीमंत अथवा सुखवस्तू नाही, तरी घरची ठीकठाक असलेल्या, दोन वेळच्या अन्नाची ददात नसलेल्या मंडळींत) हे कवी अपील होत असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.१ मात्र, शहरी परंतु आयटीशी संबंध नसलेल्या (तत्कालीन) प्रौढांना ते आवडणे कठीण.२ क्र. २ आणि (विशेषेकरून) आमच्यासारख्या क्र. ३मधील लोकांत तर हे असंभव.३)
मग उरलेल्या नॉन-शहरी ९९% लोकांना आवडणारं लिखाण सध्या कोण करतं?
कोणी का करेनात? (अथवा न करेनात?) हे लोक करीत नाहीत, हे महत्त्वाचे आहे.
कदाचित हा मोठा डिस्कनेक्ट असेलही की आपापल्या परीघांत लोकप्रिय असणारे कवी/लेखक दुसऱ्या परीघांपर्यंत पोचतच नाहीत.
गरज काय? ते नॉन-शहरी लोक कधी सांगत आलेत, की कसेही करून बाबा तुमचे ते कुंडलकर-खरे नि आणखी कोण कोण ते आमच्यापर्यंत पोहोचवाच, म्हणून?
उरलेले नॉन-शहरी ९९% लोक आपापले पाहून घ्यायला समर्थ आहेत. त्यांना या लोकांची (१) गरज नाही, आणि (२) पडलेली नाही, हे उघड आहे. त्यांना त्यांच्या परिघात सुखाने राहू द्यात की!४ आणि या लोकांना आपल्या.५ Why inflict these people upon them?
(यांनी) उरलेल्या ९९% लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज नक्की कोणाला आहे? ९९ टक्क्यांना, की यांना? ९९ टक्क्यांना तर निश्चित नाही. आणि यांना आपल्या परिघाबाहेर पडण्यात स्वारस्य असावे, असे वाटत नाही. (तसेही बाहेर पडून ते बहुधा टिकणार नाहीत, ही बाब अलाहिदा.)
आणि, तेच ठीक आहे. मॅक्डॉनल्ड्सने बीफ बर्गर बनवावेत. (तेही ते धड बनवीत नाहीत, ही गोष्ट वेगळी.) उगाच हिंदुस्थानात विकायचे, म्हणून ते पनीर टिक्क्याचे ते धड-हिंदुस्थानी-नाही-नि-धड-अमेरिकन-नाही असले कायसेसे ते बनवून विकण्याच्या फंदात पडू नये. (बास्टर्डायज़ेशन, बास्टर्डायज़ेशन म्हणतात, ते हेच!)
----------
१ माझ्या बायकोने लग्नानंतरच्या दिवसांत - किंवा फॉर्दॅटमॅटर अगदी परवापरवापर्यंत/काही वर्षांपूर्वीपर्यंत या असल्या गाण्यांच्या कॅसेटा मला गाडी चालविताना पुष्कळदा ऐकविलेल्या आहेत. मी मात्र माझ्या आवडत्या तलत मेहमूदची वगैरे गाणी लावली, की त्यांची खिल्ली उडविते! ('दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है'ला कोणी जर 'लव्हेरिया हुआ' असे उत्तर दिले, तर अशा मनुष्याचे काय करणार? विशेषेकरून अशा मनुष्याशी लग्न झालेले असेल, तर? परंतु ते असो.) तर सांगण्याचा मतलब, माझ्या बायकोचा जन्म तत्त्वत: जरी १९७५पूर्वीचा असला, तरी १९७५च्या तितक्याही पूर्वीचा नाही. (बॉर्डरलाइन केस.) १९९५च्या आसपासच्या (तथाकथित आयटी बूमच्या, आणि ही कविमंडळी उदयास येत असतानाच्या) काळात तिचे वास्तव्य महाराष्ट्राच्या शहरी विभागातच असावे. तेव्हा ती तरुण तर होतीच होती. (बहुधा कॉलेजातून नुकतीच बाहेर पडली असावी, किंवा फार फार तर नुकतीच कमावू लागली असावी.) लिहितावाचता येत असावे. (कॉलेजातून नुकतीच बाहेर पडलेली म्हटल्यावर तेवढे गृहीत धरण्यास हरकत नसावी. (चूभूद्याघ्या.)) आणि, आयटीशी तिचा यत्किंचितही संबंध नसला (आणि, त्यामुळे, त्या तथाकथित बूममुळे तिला फरक पडला नसला), तरी, आर्थिकदृष्ट्या ठीकठाक असावी. फिट्स द डेमोग्राफिक, करेक्ट?
२ माझ्या सासूला हे असले काही आवडणे असंभव, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. (तशी रोखठोक आणि डाउन-टू-अर्थ बाई आहे.)२अ
२अ श्वशुरांचे सोडा. ते कशालाही 'वा! वा! वा! वा! छान! छान! उत्तम!' म्हणतील, तसेच यालाही म्हणतील. खरोखर आवडले, म्हणून नव्हे, तर काही लोकांना तशी सवय असते, त्यातलाच प्रकार म्हणून.
३ मला हे असले काहीतरी ऐकल्यावर अंगावरून झुरळ गेल्यासारखे होते. (हे एक, आणि तो दुसरा कोण तो, त्याला-पाऊस-आवडतो-तिला-पाऊस-आवडत-नाही-बघ-तुला-माझी-आठवण-येते-की-नाही-छाप गार्बेज पाडणारा तो कोठला कवी आहे तो. तेही ऐकलेले आहे कधीतरी, बायकोच्या कृपेने!) पण सांगतो कोणाला? (रादर, सांगून माझे ऐकतो कोण?) असो चालायचेच.
४ They would probably never know what they are missing. But, on the other hand, if they did come to know, they would not want it, anyways. (I certainly wouldn't.) So, why bother?
५ यावरून एक बुद्धकथा आठवते, ती (बहुधा अगोदर सांगितली असेल, परंतु) येथे (पुन्हा) देण्याचा मोह आवरत नाही. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसमवेत गावोगाव हिंडत असताना एके रात्री एका गावात मुक्काम करतात. गावातले लोक अतिशय सज्जन असतात, यांचे आदरातिथ्य करतात, यांना कोठेही काहीही कमी पडू देत नाहीत, वगैरे वगैरे. दुसरे दिवशी गाव सोडताना बुद्ध म्हणतात, "या गावात दुष्काळ पडो, हे गाव उद्ध्वस्त होवो, नि त्यातील लोक देशोधडीला लागोत." शिष्यांना आश्चर्य वाटते, परंतु बुद्धांना त्याबद्दल विचारण्याचे धाडस त्यांना होत नाही. काही दिवसांनंतर पुन्हा एका रात्री दुसऱ्या एका गावी मुक्काम करण्याच्या बेतात ही मंडळी असताना, त्या दुसऱ्या गावातील लोक या मंडळींशी उद्धटपणे वागतात, त्यांना शिव्या देतात, मारहाण करतात, दगड फेकतात, नि धक्के मारून गावाबाहेर हाकलून देतात. गावाबाहेर पडताना बुद्ध म्हणतात, "हे गाव सुरक्षित राहो." या वेळेस मात्र एक शिष्य हिंमत करून विचारतोच. बुद्ध शांतपणे सांगतात, "त्या पहिल्या गावचे लोक सज्जन होते. ते देशोधडीस लागून जगभर विखुरले, तर आपला चांगुलपणा जगभर घेऊन जातील, नि त्यातून जगाचे भलेच होईल. उलटपक्षी, या दुसऱ्या गावच्या लोकांचा दुष्टपणा त्यांच्या गावापुरताच सीमित राहिलेला बरा!" (सांगण्याचा मतलब, (१) सरदारजींचे लॉजिक उफराटे, असे लोक उगाचच समजतात. बुद्धही काही कमी नव्हते. आणि, (२) या १% कवींना मी पहिल्या कॅटेगरीत तर घालू शकत (वा इच्छीत) नाही; मग, त्या परिस्थितीत त्यांनी आपल्या १% परिघातच सुरक्षित राहिलेले काय वाईट?)
हा हाहा!!!
'दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है'ला कोणी जर 'लव्हेरिया हुआ' असे उत्तर दिले ...
'न'बा, तुम्हाला असंच पाहिजे! :प
मला आबिदा परवीनचं 'दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है' आवडतं, ऐकून पाहा. मी स्पॉटिफायवर लावते बरेचदा.
तळटीप क्रमांक ५मधला तर्क आवडला. खरे-सौमित्र लोकांना लावलेला तर जरा जास्तच.
न.बा, तुमचे प्रतिसाद वाचून
न.बा, तुमचे प्रतिसाद वाचून वकिली कागदपत्रं वाचण्याचं शिक्षण मिळतं.
तर मला अज्याबात संदीप/कुंडलकर/सलील कुलकर्णी (हे अर्क आहेत.) वगैरेंना ९०% किंवा ९९% पर्यंत पोचवायचं नाहीये.
पण निदान हे लोक ज्यांना आवडत नाहीत, त्यांना नक्की आणखी दुसरे कोण लोकप्रिय कवी/लेखक आवडतात- वो मुझे जानना है.
असो. मी बुद्धाची गोष्ट वाचली.
ज्जे बात!
परीघ म्हणा, सायलो म्हणा किंवा घेटो!
मला खऱ्यांचा कंटाळा अशासाठी येतो की ते माझ्या घेटोतलेच आहेत. पण ते पंचविशीच्या पुढे पोहोचलेले वाटत नाहीत. माझी चाळीशी आली, माझ्यावर प्रेम करणारा पुरुष आता माझ्या आठवणीनं गळा काढणारा वगैरे असेल तर मी त्याला, "बाळा, खुप्खुप मोठा हो," असा (हलकट) आशीर्वाद देऊन आपल्या कामाला निघून जाईन. वयानुसार पुरेसा खवचटपणा, चतुराई वगैरे आलेले नसतील तर ती माणसं कंटाळवाणी होत जातात. तसं काही संदीप खरेकडे आल्यासारखं वाटत नाही. मग माझ्या वयाच्या, माझ्या घेटोतल्या लोकांना खरे एवढा का आवडतो, ह्याचा तपास घ्यावासा वाटतो.
ह्याला सणसणीत अपवाद लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्याचा. त्यात मोठं होणं अपेक्षितच नाही; तिथे निरागसपणाच हवा. त्या कविता, गाणी ऐकून ओळखीतली मुलं डोलताना, बागडताना दिसतात. छान वाटतं. ते त्या मुलांच्या वयाला शोभतं.
या परिघाच्या बाहेरचे लिखाण
या परिघाच्या बाहेरचे लिखाण सध्या कोण करतं हे बघायला मी देखील उत्सुक आहे. मला आत्तापर्यंत कुठलाच नवोदित शहरी लेखक आवडला नाही. निळ्या दाताची दंतकथा वगैरे पुस्तकं सुद्धा अतिशय hyped वाटली. त्यामुळे non-fiction कडे परतायला होतं. किंवा इंग्रजी fiction.
दिवाळी अंकात काही काही चांगलं वाचायला मिळतं. यावर्षीचा शब्द शिवार नावाचा दिवाळी अंक मला आवडला. त्यात ग्रामीण भागातील अनेक कथा होत्या आणि त्यातल्या काही अतिशय आवडल्या. पण अशी पुस्तकं, जी शहरी पण मध्यमवर्गीय नाहीत किंवा ग्रामीण आयुष्याच्या कथा सांगतात अशी हल्ली कोण लिहितं माहिती नाही. माझ्या जन्माच्या आधीच्या कादंबऱ्या आणि कविताही अशा आयुष्याची साक्ष द्यायच्या. आणि लेखनात ठाम राजकीय भूमिकाही दिसून यायची. त्याचे तर आता ३-१३ वाजले आहेत. लेखक फार दूरची गोष्ट आहे. उच्चशिक्षित सामान्य जनता देखील सरकारच्या भीतीने स्वतः चां सोशल मीडिया स्वतः च सेन्सर करताना दिसते.
आणि वर कुणीतरी म्हंटले आहे तसे सायलो आता सहजतेने पडताना दिसतात. सोशल मीडियावर आपल्या जगातील वावरात असे ठळक सायलो तयार झाले आहेत. शाळांच्या एडमिशन पासून ते नोकरीत सगळीकडे लोक त्यांना हवे तसे लोक भरती करून घेतात.
त्यामुळे अनुभव विश्व सिमीत होते ही एक बाब. पण आपल्यासारखे नाहीत त्यांच्याबद्दल मनात भीती आणि द्वेष वाढतो ही त्याहूनही मोठी बाब आहे. माझ्या सोशल मीडिया टाईम लाईनवर radical islam वगैरे धागे घेऊन Islamophobic पोस्ट टाकणाऱ्या किती लोकांचा दैनंदिन आयुष्यात मुस्लिम लोकांशी नीट समजून घेण्या इतका संपर्क येतो हे एक मोठा प्रश्न आहे. तसेच आपल्या मुलांना गरिबी म्हणजे काय हे कळेल का? त्याबद्दल ते संवेदनशील होऊ शकतील का? हे प्रश्नही सारखे पडतात.
अजून एक गोष्ट म्हणजे कथा, कादंबरी लिहायला जे रिसर्च करावं लागतं. म्हणजे गाव, शहर, रस्ते इत्यादी इत्यादी तेसुद्धा हल्ली नेट वापरून केलं जातं असा मला दाट संशय आहे. कारण अलीकडे वाचलेल्या एकाही लेखनात खिळवून टाकणारं आजूबाजूच्या परिसराचं वर्णन नाही. याबाबतीत फक्त गुप्ते अपवाद वतातात. I forgot his first name.
अजून एक गोष्ट म्हणजे कथा,
अजून एक गोष्ट म्हणजे कथा, कादंबरी लिहायला जे रिसर्च करावं लागतं. म्हणजे गाव, शहर, रस्ते इत्यादी इत्यादी तेसुद्धा हल्ली नेट वापरून केलं जातं असा मला दाट संशय आहे. कारण अलीकडे वाचलेल्या एकाही लेखनात खिळवून टाकणारं आजूबाजूच्या परिसराचं वर्णन नाही.
हे निरीक्षण आवडलं!
अस्सल अनुभव घेउन त्याबद्दल लिहिणारे लोक मराठीत कमीच असावेत.
काय सांगता!
म्हणजे? त्या लिहितात, ते नॉन-फिक्शन असते, असे का तुमचे म्हणणे आहे?
आम्ही तर ऐकले होते, की बुवा जगातील सर्वोत्तम तीन फिक्शने म्हणजे (१) भारतीय रेल्वेचे वेळापत्रक, (२) अमेरिकन राज्यघटना (तेवढी ती द्वितीय घटनादुरुस्ती वगळून), आणि (३) ३_१४चे लिखाण, म्हणून.
(/s)
अदिती फिक्शन जास्त छान लिहीते
अदिती फिक्शन जास्त छान लिहीते.
https://aisiakshare.com/user/1766/authored
आवडला
लेख (नेहमीप्रमाणेच) आवडला.
यांची गाणी ऐकताना नेहमी बटाट्याच्या चाळीतल्या (ओव्या लिहिणाऱ्या) कवयित्री काव्यकलाबाईंची आठवण व्हायची (सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब इ. इ.)
शिवाय, "दूर देशी गेला बाबा" हे गाणे तितकेसे प्रातिनिधिक नसावे असे वाटते - ही म्हणजे बी-१ वर टेंपररी (एकट्याच) दूर देशी गेलेल्या बाबाची गोष्ट आहे - आणि तसाही तो "मॅक्स"१ ३ महिन्यात परत येतोच की. "स्टे एक्स्टेंड"२ झाला तर बाळ आणि त्याची आईही बाबाकडे दूरदेशी जातात - मग गाण्याला फार अर्थ रहात नाही असे मला वाटते.
बाकी लेखातल्या सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहे!
----
१,२ यात देवनागरीत लिहिलेले इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्दांच्या अद्न्यानातून आले नसून, ज्या "आयटी"१,३ क्षेत्राचे प्रतिबिंब पाडणारे हे काव्य आहे त्याची खास "लिंगो"२,३ वापरण्याचा एक प्रयास आहे
३ तळटीपा रिकर्सिव्ह करण्याचा प्रयत्न (तितकासा जमलेला नाही. सूचना/ सुधारणांचे स्वागत आहे)
- अमित
खर्यांचा जाहीर कार्यक्रम
खर्यांचा जाहीर कार्यक्रम शेवटपर्यंत आणि पुन्हा पुन्हा ऐकणाऱ्या माणसांबद्दल मला कुतुहल मिश्रित राग येतो. 'नसतेस घरी तू जेव्हा ' सारख्या कविता एकामागोमाग ऐकणं हा अशक्य पीळ आहे. आपल्या सखीला उद्देशून "ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो, तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो" असे म्हणणाऱ्या माणसाचा कंटाळा येईल, नाहीतर काय ! लहान मुलांसाठीच्या काही कविता मात्र छान आहेत.
(थोडा) प्रतिवाद
ही जरा "थेरडेशाही" समीक्षा होते आहे असा मला संशय येतोय (अस्मादिक नि:संशय त्याच वयोगटात मोडत असू). त्यात पुन्हा कला ही जीवनासाठी (च) असली पाहिजे अशी भूमिका समीक्षकाने घेतलेली दिसते. मूळ लेखक आणि बहुतेक प्रतिसादांचे लेखक (हे नाम gender agnostic समजावे) यातील कोणी गद्धेपंचविशीतील असण्याचा संभव किती आहे कोण जाणे. आजची तरुणाई (माझा नावडता शब्द, पण प्रचारात असल्यामुळे नाइलाजाने वापरत आहे) चांगल्या कवितेचे निकष काय मानते हे मला माहीत नाही, पण त्यांच्या चष्म्यातून खरे यांची कविता कशी दिसेल हे समजून घेण्यात मजा येईल.
आता खरे यांच्या कवितेसंबंधी माझी (अपरिहार्यपणे थेरडी!) मते:
१. खरे हे सम-प्रमाणात 'डोकेबाज' आणि 'डोक्यात जाणारे', आणि म्हणून सरसकट मूल्यमापन करण्यास अवघड कवी आहेत. "आयुष्यावर बोलू काही" हा कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात पहात असताना मी वैतागून अर्ध्यात उठून गेलो होतो. त्या कार्यक्रमातल्या बहुतांश कविता मला सवंग वाटल्या होत्या. नंतर बरीच वर्षे मी त्यांना option ला टाकले होते.
२. नंतर अनेक वर्षांनी कुणाच्यातरी आग्रहामुळे त्यांची "नामंजूर" ही कविता https://www.youtube.com/watch?v=lL7pZjPnQKw&ab_channel=SaleelKulkarni-T… ऐकली. मला खूप आवडली. मग पुन्हापुन्हा ऐकली. नंतर केंव्हातरी "बुंबुंबा" ऐकली आणि हसून लोळलो. ह्या दोनच कविता त्यांनी लिहिल्या असत्या तरी ते एक चांगले (श्रेष्ठ नव्हे!) कवी ठरले असते असे वाटले. "नामंजूर" मधला कलंदरपणा आणि मूल्यदृष्टी (जडवाद, नास्तिकता, आसक्तपणा, identity politics वरचा हल्लाबोल इ) भावली. आणि 'बुंबुंबा' ला थरारक विनोद. त्या कवितांची समीक्षा करण्याची ही जागा नव्हे (आपण एकूण कवीबद्दल बोलतो आहोत).
३. खरेतर खरे हे रूढार्थाने "कवी" नसून "गीतकार" आहेत असे मला वाटते. कारण त्यांची बहुतेक काव्ये ही गायक+वाद्यवृंद आणि सलिल कुलकर्णींच्या चाली अश्या मखरात बसवली तरच दखलपात्र वाटतात.
४. [थोडे विषयांतर - पण खरे यांचे गायन मात्र "शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख" category तील आहे.]
५. बहुप्रसवता हा त्यांच्या लेखणीचा खरा दोष आहे असे मला वाटते. खरे यांनी खरे म्हणजे ते लिहितात त्याच्या एक दशांशच कविता लिहिल्या पाहिजे होत्या. पण ते 'मागणीनुसार पुरवठा' करत गेले आणि दर्जा हरवून बसले.
६. त्यांच्या काव्यसंभाराचे कडकपणे संपादन करून त्यापैकी सर्वात दर्जेदार अशा दहाएकच कविता निवडून त्यांवर कुणी रसग्रहणात्मक लिहिले तर मजा येईल. जरा आणखी थेरडा झाल्यावर हा प्रकल्प करून पहावा म्हणतो!
पाच दहा वर्षांपूर्वी खरे आणि
पाच दहा वर्षांपूर्वी खरे आणि कुलकर्णींच्या गाण्यांची ओळख झाली. आम्ही म्हणजे मुळात गद्य प्रकरण असल्याने कवितांच्या भानगडीत पडत नाही.
एखादी कविता चाल लावून ऐकवली तर ती बरीच सुसह्य असते हे माझे प्रामाणिक मत आहे. तिज्याय्ला आपल्याच कटकटी संपत नाहीत इथे आणि लोकांच्या रडकथा का ऐका? (रड कविता / गाणी म्हणा हवं तर)
आबोका हा शुद्ध पुणेरीपणा आहे (पुण्यातले लोकं कशालाही डोक्यावर घेऊ शकतात हे वैशालीत जाउन तुपातला ओनियन उत्तप्पा आणि फोडणीचं वरण (पक्षी : सांबार) खाल्ल्यावर पक्कं झालं आहे.) एकदा ऐकून सोडायला ठिक आहेत, अगदीच टाकाऊ नाहीत. त्यांच्या कवितेच्या कार्यक्रमांना जाऊन बघा आम्ही अजून कसे आपल्या मायबोलीशी / संस्क्रुतीशी / माती नाती / साहित्य / वगैरे वगैरेशी जोडून आहोत या पलीकडे त्याला काही अर्थ नाही (अर्थात ज्याचं त्याचं वाटणं).
त्याच्या कविता ठीक कॅटेगरीत येतात. म्हणजे अगदी गालीब, गदीमा, आरती प्रभू वगैरेशी तुलना करणं पटलं नाही. पण अगदी भिडण्यासारखं काही नाही, समदुःखी / समसुखी वगैरे वाटतात त्या. छोटसं उदाहरण द्यायचं झालं तर इंदिरा संतांच मृद्गंध माझं आवडतं आहे,सहज सोपी भाषा, आसपासच्याच गोष्टी आहेत. याही काळात माझ्याही अवतीभोवती होत असलेल्या. पण त्यातलं वेगेळेपण त्या पटकन पकडतात की असं वाटतं अरेच्च्या आपल्याला हे ल्क्षातच कसं नाही आलं. ही जी हलकी बोचरी टोच म्हणा किंवा भिडणं म्हणा ते नाही होत.
संदीप खरे कवी साला , मनामध्ये डाचतो आहे!
"संदीप खरे कवी साला , मनामध्ये डाचतो आहे!"
"नेणिवेची अक्षरे " हा
संग्रह त्याचा वाचतो आहे,
संदीप खरे कवी साला
मनामध्ये डाचतो आहे!
आंतर्जालावरती आला
कवितांचा महापूर
शुद्धलेखन नसे शुद्ध
काव्यात्मता राहिली दूर !
नवाच कवी (माझ्यासाठी)
मिळवून आता वाचतो आहे
अर्थ त्याच्या कवितांचा
मनामध्ये साचतो आहे!
अर्थगर्भ कवितेमध्ये
लालित्याचा लोळ महा
शलाका ही गगनामध्ये
चमकते ती कशी पहा
"कसा चंद्र ! कसं वय !
कशी तुझी चांदण सय !
कसा निघेल इथून पाय!
वेड लागेल नाहीतर काय!"
त्याच्या काही पानांवर तर
नाचतात बा सी मर्ढेकर :
"गरीब , बुटका , कद्रू,
कर्कश, कटकटवाणा
अवघड, हट्टी , हेकट
आणि माणूसघाणा "
स्वतःच्या या वर्णनाची
नसे राहिली फॅशन आज
प्रत्येक कवीमध्ये असे
महानतेचा मोठा माज!
तरुण कवी कसा काय
रान सारे करी फस्त
इतर कवींसाठी राही
थोडीच जागा, नाही स्वस्त!
"नाही लिहू शकलो असे"
विषाद याचा वाटतो आहे
पुस्तक याचे डोक्यावर
तरी घेऊन नाचतो आहे !
अदितीशी सहमत. पूर्वी असं
अदितीशी सहमत. पूर्वी असं छानछान लिहायचात. अजूनही वेळ गेलेली नाही. लिहीत जा.
खरेंच्या कवितेला लोकप्रियता आहे ती इतरांना का नाही असा एक प्रश्न उपस्थित झाला. माझ्या मते त्याचं उत्तर सोपं आहे - परफॉर्मन्स. आपले कुठचेही प्रसिद्ध कवी घ्या, ते प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या कवितांची गाणी झालेली आहेत. खुद्द ज्ञानेश्वरांच्या कविता कुठल्या असं सामान्यांना विचारलं तर लताची गाणीच आठवतात. गदिमा, तांबे, पाडगावकर हेही गाण्यांशिवाय इतके प्रसिद्ध झाले नसते.
संदीप खरेंने स्वतः प्रयत्न करून आपल्या कवितांचे शो केले. मराठी माणसाला शांतपणे पुस्तक हातात घेऊन शब्दशब्दाची रुची घेण्यापेक्षा असा शो बघायला आवडतो.
त्यांच्या बालकविता मला आवडतात. म्हणजे प्रत्येक कवितेतला पहिला दोन तृतियांश भाग. कारण पहिली गंमत संपवून ते ताबडतोब दुःखाची झालर, उदात्ततेची पताका किंवा तत्त्वचिंतनाचा पितांबर यापैकी एक तुकडा उद्मेखून जोडतात.
बाकी त्यांच्या कविता आवडत नाहीत. 'कोणीतरी' त्यांच्या कवितांना 'पुरुषांची मंगळागौर' म्हटलेलं होतं ते पटतं.
लेख आवडला.
बापट, बापट, एके काळी तुम्ही असे लेख लिहायचात. मग आम्हांला भेटलात आणि ... असो, स्वतःबद्दल किती बोलायचं!
तर लेख आवडला. कवितेबद्दल असूनही, तुमचं नाव बघून मी लेख उघडला; आणि आवडल्यामुळे पूर्ण वाचला.