Skip to main content

शुभवर्तमान...? (भाग २)

गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्याचे शुभवर्तमान लिहिल्यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची काय परिस्थिती आहे हे बघण्याचा खटाटोप केला.

यामागची गृहीतके लिहितो :
१. एकदा माणूस कोरोनाबाधित झाल्यावर किमान काही काळ म्हणजे काही महिने तरी त्याच्या शरीरात काही प्रतिकारक्षमता निर्माण होते. (भले ती टिकेना का वर्षभर) आणि
२. किमान एक डोस लसीकरण झाल्यानंतर दोनतीन आठवडयांनी किमान काही काळ टिकणारी तरी (किमान ८४ दिवस तरी?) प्रतिकारशक्ती निर्माण होते.


या गृहीतकांच्यावर पुढचा सारा डोलारा.

या गृहीतकांच्या आधारावर आपण कोरोनाविरुद्ध अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली लोकसंख्या आणि शरीरात किमान प्रतिकारशक्ती निर्माण झालेली संख्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त किती टक्के असेल याचे अनुमान बांधणार आहोत.

  1. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या सुमारे : १२,९८,७७,५४१
  2. यात किमान एकदा कोरोना विषाणूने बाधित संख्या : ५९,९७,५८७
  3. आणि लसीकरण (किमान एक डोस) संख्या : २,९२,९२,६४२
  4. म्हणजे एकूण अशी संख्या : ३,५२,९०,२२९

टक्केवारीत बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने शरीरात किमान प्रतिकारशक्ती निर्माण झालेली संख्या २७. १७ टक्के आहे.

महाराष्ट्रात या टक्केवारीत सगळ्यात पुढे आहे पुणे जिल्हा : ४९.८१ टक्के

महाराष्ट्रातील कुठले जिल्हे यात पुढे आहेत आणि कुठले मागे पडत आहेत हे आपण या टेबलमध्ये बघूयात -

Exposed Chart June 23

अर्थात , जसजसे लसीकरण वाढत जाईल तसतसे हे चित्र अजून आश्वासक होत जाईल.

२१ तारखेला ८५ लाखाहून जास्त लोकांना लस टोचण्याचा एक जागतिक विक्रम झाला.

जास्तीत जास्त लसी टोचल्या हे उत्तमच झाले.

परंतु यात काही माध्यमांनी व काही आयटी सेल्सनी भाजपशासित राज्यांनी बघा कसे जास्त लसीकरण केले आणि उर्वरित लोकांनी कसे कमी केले असा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशने सोळा लाख डोस दिले (हे उत्तमच केले) परंतु त्याच्या आदल्या दिवशी फक्त अठराशे डोस दिले होते वगैरे बाबी चर्चेत आल्या. याही परिस्थितीत लोकांना जाहिरातीचे महत्त्व जास्त वाटते याचे वाईट वाटते.

एकंदरीत परिस्थिती बघता आत्तापर्यंत तरी लसीकरणाच्या महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.

सध्या लसीकरणात आघाडीवर असलेली पहिले पाच क्रमांक असलेली राज्ये म्हणजे :

१. महाराष्ट्र : २,९२,९२,६४२
२. उत्तर प्रदेश : २,८०,१७,४६७
३. गुजरात : २,३४,७८,०३४
४. राजस्थान : २,२४,७१,२०१
५. कर्नाटक : २,०४,७७,१८९

परवाच देशात एका दिवशी १६ लाखाचा उच्चांक करणारे मध्य प्रदेश मध्ये लसीचे १,७९,३१,२१७ इतके डोस दिले गेले आहेत .

महाराष्ट्रात (डॉ. विनिता बाळ यांनी सांगितलेला उत्तम मराठी प्रतिशब्द म्हणजे) सांघिक प्रतिकारक्षमता म्हणजे हर्ड इम्युनिटी आली किंवा येऊ घातली....... असले कुठलाही शास्त्रीय पुरावा नसलेले ठोस आणि धाडसी विधान आत्ता तरी नक्कीच नाही करणार.

परंतु किमान कोरोना विषाणूविरोधी अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली susceptible जनसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे हे नक्की.

जुलै महिन्यात लसींची उपलब्धता वाढण्याची चांगली चिन्हे आहेत.

सिरम आणि भारत बायोटेकची प्रस्तावित उत्पादनवाढ (दुप्पट?) जुलैमध्ये होणे अपेक्षित आहे. शिवाय जुलै महिन्यातच स्पुटनिक लसही बाजारात यायला सुरुवात होईल.

लॉकडाऊन संपल्यावर आता लोकांनी मास्क सोशल डिस्टंसिंग उगाच गर्दी ना करणे वगैरे त्रिसूत्री न पाळून मोकाटपणा करणे, आणि पुढच्या काही काळात अत्यंत वेगळी रचना असणाऱ्या आणि आत्ताच्या लसींना निरुपयोगी ठरवणाऱ्या एखाद्या variantने येऊन धुमाकूळ घालणे या दोन गोष्टी न घडल्यास

-

जुलै महिन्यानंतर एकंदरीत आश्वासक चित्र वाढत होत जाणार हे नक्की.

(पुढील भाग इथे)

Taxonomy upgrade extras

Rajesh188 Fri, 25/06/2021 - 13:34

तुम्ही शुभवर्तमान लिहायला घेता आणि विषाणू चे उत्परिवर्तन होते .तुमचं लिखाण खोटे पडावे म्हणून विषाणू पण भलताच सतर्क आहे.

राजेश घासकडवी Fri, 25/06/2021 - 14:04

लसीकरण + एकदा रोग होऊन गेलेले सध्या महाराष्ट्रात २७% आहेत. पण त्याहीपलीकडे या रोगाला जवळपास इम्यून असलेले, मृत्यूचा जवळपास शून्य धोका असलेले, २५ वर्षं वयाखालील एक मोठा गट आहे. सुमारे ३०% लोकसंख्या त्यात सहज असेल. हे एकूण ५५%+ लोक. शिवाय ज्यांना करोना होऊन गेलाय, पण नोंदला गेला नाही असेही ५-१०% असू शकतील. तेव्हा जर पुढच्या महिन्या दोन महिन्यात अजून १०% लोकांनी लस घेतली तर खरोखरच चांगली चिन्हं आहेत.

अनुप ढेरे Fri, 25/06/2021 - 15:24

पुण्यात केसेस डोके वर काढत आहेत गेले दोन दिवस. प्रति शंभर चाचण्या किती पोझिटिव हा आकडा पुन्हा 5च्या वर गेला आहे.

Rajesh188 Fri, 25/06/2021 - 16:57

मृत्यू आलेल्या लोकांच्या संख्येत ४२% लोक ही पन्नास वर्षापेक्षा कमी वयाची होती.तरुण लोक मृत्यू पावण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत जास्त होते.

पर्स्पेक्टिव्ह Fri, 25/06/2021 - 19:10

लॉकडाऊन संपल्यावर आता लोकांनी मास्क सोशल डिस्टंसिंग उगाच गर्दी ना करणे वगैरे त्रिसूत्री न पाळून मोकाटपणा करणे, आणि पुढच्या काही काळात अत्यंत वेगळी रचना असणाऱ्या आणि आत्ताच्या लसींना निरुपयोगी ठरवणाऱ्या एखाद्या variantने येऊन धुमाकूळ घालणे या दोन गोष्टी न घडल्यास

दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी सध्या घडताना दिसताहेत. तो डेल्टा प्लस व्हेरिएन्ट बहुधा सध्याच्या लशींना दाद देत नाहीये वाटते. आणि लोक काय, नुसते सुटलेयत.

राजा वळसंगकर Fri, 25/06/2021 - 19:21

पढत मूर्खलक्षण यादी नव्याने करता येईल का?

Avadhut - Nice analytical and logical presentation. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त केसेस का दिसल्या आणि दिसत आहेत हे बघणे उपयुक्त ठरेल. त्यावर् उपाय सुचवता येऊ शकेल. पढत मूर्खलक्षण यादी नव्याने करता येईल का?.

हे सुचवण्याचा (एक) कारण म्हणजे, मागच्या वेळेला लॉकडाउन उठवला तेव्हा (माझ्या) फेसबुक वर आपण कुठे कुठे हिंडतो आहोत हे सांगण्याची चढाओढ दिसत होती. आणि नंतरची करोना स्थिती सर्वश्रुत आहे. तेव्हापण आणि आजही वाचाळ टीका जास्त् दिसते. आम्ही विरुद्ध ते ... काय सांगू? Once is learning; twice is a mistake; three times is stupidity - टाळता आली तर छानच?

अबापट Fri, 25/06/2021 - 19:48

In reply to by राजा वळसंगकर

राजा,
डॉ प्रदीप आवटे यांचा लेख/मुलाखत वाचावी.
त्यातील काही भाग इथे पेस्ट करतोय.
महाराष्ट्रात , विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कुठलाही असा संसर्गजन्य आजार का सर्वात लवकर आणि जास्त पसरतो त्याची काही कारणे :

"आणखी एक कारण असं आहे की महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात विकसित राष्ट्र आहे. त्यामुळे परदेशातून विषाणू, रोग, महामारी आली ती अशा राज्यांत जिथे आंतरराष्ट्रीय दळणवळण चालतं, कनेक्शन आहे. महाराष्ट्रात नोकऱ्या असल्यामुळे संपूर्ण भारतातून लोक येतात; त्यामुळे विस्थापितांचे प्रश्नही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते.

महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त शहरीकरण झालेलं आहे. दर चौरस किलोमीटरमागे महाराष्ट्रात ३६४-३८६ लोक आहेत, ही झाली सरासरी. धारावीत हा आकडा दोन लाखापर्यंत वर जातो. ठाण्यात २१,०००! लोकसंख्येची घनता वाढल्यावर विषाणू चटकन पसरू शकतो."

बाकी लोकं निष्काळजी आत्ताही व्हायला लागली आहेत.

Rajesh188 Sat, 26/06/2021 - 00:19

In reply to by राजा वळसंगकर

जरा सूट दिली की हॉटेल मध्ये जावून एन्जॉय म्हणून जेवण करणे.
ग्रुप बनवून पावसाळी सहली ला जाणे आणि पर्यटन स्थळांवर गर्दी करणे.
जे थोडे आर्थिक बाबतीत बरे आहेत ती लोक देशभरातील पर्यटन स्थळांवर बायका ,मुल,मित्र सहित जाणे.
आर्थिक सक्षम लोक लगेच जागतिक सफर करायलाच निघतात.
आणि ही सर्व जमात देशभरातून,जगभरातून विविध प्रकारचे corona व्हायरस वाहक बनून सर्व समाजात पसरवतात.
वाचता, लिहता येणारे सुशिक्षित लोक..
नाहीतर चीन मध्ये उगमस्थान असणारा व्हायरस जिथे st पण जात नाही अशा खेड्यातून कसा पसरला.

अबापट Mon, 12/07/2021 - 21:07

हळू हळू (पण फारच हळू) योग्य दिशेने :

आपण २३ जूनचा उपलब्ध डेटा वर बघितला.
आता त्यानंतरचा आढावा, ९ जुलैच्या (डेटा) विदाधारित.

गृहीतके :
१. एकदा माणूस कोरोनाबाधित झाल्यावर किमान काही काळ, म्हणजे काही महिने तरी त्याच्या शरीरात काही प्रतिकारक्षमता निर्माण होते. (भले ती टिकेना का वर्षभर), आणि
२. किमान एक डोस लसीकरण झाल्यानंतर दोनतीन आठवडयांनी किमान काही काळ टिकणारी तरी (किमान ८४ दिवस तरी?) प्रतिकारशक्ती निर्माण होते.

दोन आठवड्यांच्या नंतर कोरोनाविरुद्ध शरीरात किमान प्रतिकारशक्ती निर्माण झालेली संख्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यात जास्तीतजास्त किती झालीय , हे या टेबलमध्ये बघूयात.

July 9 vaccination data Maharashtra

गेल्यावेळी दिसल्याप्रमाणेच याही वेळी पुणे जिल्ह्याने जोरात आघाडी घेतली आहे .

लसनिर्मितीत लक्षणीय वाढ होऊनही गेले तीनचार दिवस लसीकरणाची गती थोडी रेंगाळलेली दिसते (महाराष्ट्रात व सर्वात जास्त गुजरात मध्ये). याचे कारण काय असेल हे लक्षात येत नाहीये. (अर्थात उत्तर प्रदेशने गेल्या दोन दिवसात अनुक्रमे सात आणि आठ लाखाहून जास्त लसीकरण केले चांगले. चांगले झाले.)

लॉकडाऊन संपल्यावर आता लोकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग, उगाच गर्दी ना करणे वगैरे त्रिसूत्री न पाळून मोकाटपणा करणे, आणि पुढच्या काही काळात अत्यंत वेगळी रचना असणाऱ्या आणि आत्ताच्या लसींना निरुपयोगी ठरवणाऱ्या एखाद्या variantने येऊन धुमाकूळ घालणे या दोन गोष्टी घडायला नकोत आता.

किमान कोरोना विषाणूविरोधी अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली susceptible जनसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे हे नक्की, पण याचा वेग अपेक्षेपेक्षा कमी वाटतोय.

बघूयात उर्वरित जुलै महिन्यात काय होते ते.

तिरशिंगराव Tue, 13/07/2021 - 08:09

In reply to by अबापट

महाराष्ट्रात एकंदर आशादायी चित्र असताना, आता तरी सरकारने मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे सोडून बाकी निर्बंध उठवले पाहिजेत. नाहीतर अर्थचक्राची कायमची हानी होईल.

Rajesh188 Mon, 12/07/2021 - 22:36

आणि माझ्या शरीरात व्हायरस विरूद्ध किती प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे हे कोणत्याच सरकारी संस्थेने तपासले नाही.
काही ठराविक लोकांची प्रतिकार शक्ती किती हे तपासून गणिती सूत्र नी काढलेली माहिती .
बरोबर असेल असे नाही .
सर्रास चुकीची आकडेवारी असू शकते.

अबापट Tue, 13/07/2021 - 09:50

In reply to by Rajesh188

राजेशभाऊ,
कुठली आकडेवारी सर्रास चुकीची असू शकते हे सांगाल का ?
काही ठराविक लोकांची प्रतिकारशक्ती वगैरे तपासून इथे काही लिहिलं नाहीये.
गृहीतके थेट लिहिली आहेत आणि ती गृहीतके चुकली तर ही गणिते चूक ठरतील हेही लिहिले आहे.
प्रतिकारशक्ती पैकी फक्त अँटिबॉडी मोजण्याची सोय आहे.
T cell इम्युनिटी असली तरी मोजण्याची सोय नाही.
म्हणून गृहितकांचा आधार घ्यायला लागतोय.
बघुयात काय होतं ते