तपश्चर्या ऑउटसौर्स – कथा सत्यव्रताची
आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. सौप्या भाषेत, आपली कामे दुसर्या कडून करवून घेणे म्हणजे ऑउटसौर्स. जगाला नवीन असली तरी आपल्या देश्यात ऑउटसौर्सची परंपरा फार जुनी आहे. पण ऑउटसौर्सचा कधी कधी काय परिणाम होतो....
एके काळी इक्वाषु वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते. राजा सत्यव्रताने सौपा मार्ग निवडला चक्क तपश्चर्या ऑउटसौर्स केली. ऋषी विश्वामित्र तपस्या करणार आणि सत्यव्रत स्वर्गात जाणार हे ठरले. या साठी राजा सत्यव्रताने किती सुवर्ण मुद्रा मोजल्या असतील, काही कल्पना नाही. एवढे मात्र खरे, ऋषी विश्वामित्र तपस्येला बसले आणि सत्यव्रताचे स्वर्गारोहण सुरु झाले.
आता परीक्षा देणारा एक आणि पास होणारा दुसरा, कुणालाही हे आवडणार नाही. आपल्या देशात परीक्षेत कॉपी करणाऱ्यां विरुद्ध कार्रवाई केली जाते. पोलीस कॉपी करणार्यांना अटक करतात. देवांच्या राजा इंद्राला सत्यव्रताचा ऑउट सौर्सिंग प्रकार मुळीच रुचला नाही. आता महान तपस्वी ब्रह्मचारी ऋषी विश्वामित्र आणि इक्ष्वाकु . वंशाच्या बलाढ्य राजाच्या विरुद्ध बलप्रयोग करणे देवराज इंद्राला जमणे शक्य नव्हते. पण इंद्राजवळ अप्सरा रुपी ब्रह्मास्त्र भरपूर होते. त्यांचा वापर कसा करायचा हे ही इंद्राला चांगले माहित होते. इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्रांची तपस्या भंग करण्याचा आदेश तिला.
मेनका विश्वामित्रांच्या पुढ्यात येऊन ठाकली. रती समान सुंदर स्त्री समोर पाहून विश्वामित्र यांची विकेट उडाली. मेनकेला पाहून त्यांची कामाग्नी भडकली. विश्वामित्र राजाला दिलेले वचन विसरून गेले. तपस्या अर्धवट सोडून, विश्वामित्रांनी मेनके सोबत संसार थाटला. सत्यव्रताच्या मागे तपश्चर्येचे बळ असल्यामुळे इंद्र त्यांना खाली पृथ्वीवर ढकलू शकत नव्हता आणि पुढच्या प्रवासासाठी तपोबळाचे इंधन नसल्यामुळे राजा सत्यव्रताला स्वर्गाच्या दिशेने पुढचा प्रवास करणे ही शक्य नव्हते. त्यांची गत तर ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. अद्याप ही ते न धड पृथ्वी वर, न धड स्वर्गात, अधांतरीच लटकलेले आहे. ऑउटसौर्स,मुळे त्यांची स्वर्गात जाण्याची मोहीम पूर्णपणे फसली.
आपल्याला प्रत्येक कार्य ऑउटसौर्स करता येत नाही. ज्या कामांचे चांगले आणि वाईट परिणाम स्वत:च भोगायचे असतात. ती कामे करण्यासाठी स्वत:च कष्ट करावे लागतात. या साठीच समर्थांनी म्हंटले आहे.
जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टात गेला
तोचि भला.
(दासबोध १९.९.१६)
[समर्थ म्हणतात - जो स्वत:च्या कार्यासाठी दुसर्यावर विसंबून राहतो त्याच्या कार्याचा नाश होतो, म्हणून जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोचि शहाणा समजावा].
दुसरा दृष्टिकोन.
पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड-
इंद्राने तपश्चर्या भंगाचं काम आउटसोर्स केलं मेनकेकडे. (अर्थात तो स्वत: येऊन नाचला असता तर विश्वामित्रांचे मिटलेले डोळे उघडण्याची शक्यता शून्यच होती म्हणा. एनी वे.)
पण मेनकेने आउटसोर्सिंग असलेलं कामही मनापासून केलं आणि यशस्वीरित्या पारही पाडलं. त्याबद्दल तिचं कौतुक इंद्राने केलंच असेल.
त्या उलट विश्वामित्रांनी आउटसोर्सिंगचं काम सिरीअसली घेतलं नाही, आणि ते दुसर्याच कामात मग्न झाले. त्यामुळे अर्थात त्यांचा क्लायंटही बोंबलला.
तेव्हा आऊटसोर्सिंगला विरोध नाही, पण कोणाला काय काम देतोय ते जरा बघून द्यावं.