अजनी, एपी आणि ती उडी
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दाराजवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली...!
आयुष्यांतील काही क्षण अविस्मरणीय असतांत. एखादी घटना घडत असतांना त्याचं अप्रूप वाटत नाही, नंतर कधीतरी ती घटना आठवतांना जाणवतं की आपण काय दिव्य केलं होतं...! जरा काही बरं-वाइट झालं असतं तर...! आईचं माहेर असल्यामुळे लहानपणी वर्षातून एक चक्कर नागपूरचा व्हायचाच. लहानपणी साइकलीवर फिरलेलं असल्यामुळे नागपूरचा भूगोल मला ठावूक आहे. ही माहितीच त्या दिवशी माझ्या कामी आली.
1996 साली एक महिना हैदराबादला राहून मी परत येत होतो. एपी एक्सप्रेसचं तिकिट घेतल्यानंतर खिशांत तीसच रुपए उरले. आता बिलासपुरपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता. मधे नागपूरला उतरुन मामे भावाकडून मदत घेणे. इथे साहजिकच प्रश्न येतो की खिशांत पैसे नसतांना एक्सप्रेस कां निवडली...? एखाद्या पैसेंजर ट्रेननी जायचं. एक्सप्रेस निवडण्याचं कारण सांगताना आज हसूं येतंय, पण तेव्हां मनांत ‘एयर ब्रेक’ असलेल्या पैसेंजर ट्रेन मधे बसायची इच्छा होती. आणि या एपीला एयर ब्रेक होते.
त्यांचं काय आहे की मी स्टीम इंजिन मधे 5 वर्ष फायरमैन होतो, म्हणून मला वैक्यूम ब्रेकची माहिती होती. जबलपूर किंवा नागपूरला जाता-येता पैसेंजर/ एक्सप्रेस मधे वैक्यूम ब्रेकची कंट्रोलिंग मी बघून चुकलाे होतो. आमच्या फैक्ट्रीत एयर ब्रेक असलेल्या बीसीएन वैगन सोबतच एन बॉक्स मधे कोळसा, आयरन ओर, जिप्सम येत असे. तेव्हां तिथे छोटे डीजल इंजिन (फैक्ट्रीत 350 एचपी आणि 650 एचपी चे डीजल इंजिन होते) शंटिंग करायचे. त्या इंजिनमधे बसून एयर ब्रेकची कंट्रोलिंग पावर बघितली होती. मालगाडी मधे कंट्रोलिंग पॉवर बघितल्या नंतर मला पैसेंजर ट्रेनमधे एयर ब्रेकची कंट्रोलिंग बघायची होती. तो पर्यंत आमच्या दक्षिण-पूर्व (आता दक्षिण-पूर्व-मध्य रेलवे) रेलवेच्या पैसेंजर ट्रेन मधे एयर ब्रेकची सुविधा नव्हती आणि ‘एपी’ ला एयर ब्रेक होते. म्हणून ‘एपी’ ची निवड केली.
मी हैदराबादहून गाडीत चढलो. तिकिट घेऊन फलाटावर आलो. नागपूर पर्यंत दिवसाचा प्रवास, म्हणून मी शेवटची जनरल बोगी निवडली. गार्डचा डबा आमच्या पुढे होता. इंजिनकडे तोंड करुन सिंगल सीट वर बसलो, माझ्या मागे चार सीटनंतर डब्याचं दार होतं. ट्रेन सिकंदराबादहून सकाळी सहा वाजता सुटली आणि मी प्रकृतिचं निरीक्षण करुं लागलो.
‘एपी’ ला 26 डबे हाेते, मी शेवटच्या डब्यांत होतो. आता माझं सगळं लक्ष ड्राइवरच्या ड्राइविंग वर होतं. तो भरधाव जात असलेल्या गाडीचा वेग कमी करायचा, तेव्हां गाडीच्या बदललेल्या आवाजावरुन मी समजून जात असे की ड्राइवरनी ब्रेक लावलाय. तिसरं स्टेशन भुवनगिर येई पर्यंत मी ‘एयर ब्रेक’ ची कंट्रोलिंग समजून चुकलो होतो.
भुवनगिर स्टेशनानंतर डब्याच्या दाराजवळ उभा असलेला एक मुलगा माझ्या समाेर लांब सीटवर बसलेल्या लोकांच्या पाया खाली जागा बनवत सीट खाली झोपून गेला. बसलेल्या लोकांच्या पायामागे झाकला गेल्यामुळे तो दिसत नव्हतां. 9 वाजता गाडी काजीपेटला थांबली, तेव्हां टीटीई आला आणि सगळ्यांचे तिकिट चेक करुन निघून गेला, त्या मुलावर त्याची नजर गेलीच नाही. म्हणजेच तो मुलगा डब्ल्यूटी होता आणि टीटीईला चुकवण्यासाठी सीट खाली लपून बसला होता. दहा वाजताच्या जवळपास बल्लारशाॅला ट्रेन थांबली. सडकून भूक लागली होती म्हणून इडली विकत घेऊन खाल्ली, फक्त दहा रुपए...(भूख के सामने किसका बस चलता है?).
इथून गाडी सुटल्यावर मी हाच विचार करत होतो की नागपूर मेन स्टेशनला उतरल्या नंतर स्वावलंबी नगर पर्यंत कसं जायचं...? रिक्शातून उतरताच मावशीकडे पैसे मागण्याचा धीर होत नव्हतां.
‘एपी’ वर्ध्यावरुन येते खरी, पण ती वर्ध्याला न जातां सेवाग्राम हून निघून जाते. त्या दिवशी सेवाग्रामला गाडी फलाटावरुन निघाली. (सहसा असं होत नाही, एक्सप्रेस ट्रेनचा स्टाॅप नसला, ती थ्रू असली म्हणजे तिला फलाटावर न घेतां मधल्या लाइनीवरुन जाऊ देतांत.) म्हणून सेवाग्राम स्टेशनावर गाडीची स्पीड बघून कुणांस ठाऊक एक विचार मनांत चमकून गेला की जरी ‘एपी’ अजनीला थांबत नसली तरी मी तिथे गाडीतून उतरु शकेन. तिथून स्वावलंबी नगर नक्कीच जवळ होतं. समोर लांब पल्याच्या सीट खाली लपलेला तो मुलगा आतां बाहेर येऊन माझ्याच शेजारी बसला होता.
तो पुटपुटत होता-‘नागपूर में तो साले पकड़ ही लेंगे...जेब में एक पैसा भी नहीं...।’
हे ऐकतांच मी त्याला म्हटलं-
‘अजनी में ड्राइवर ट्रेन की स्पीड कंट्रोल करेगा, वहां उतर जाना...!’
हे ऐकून तो तर चमकलांच, शेजारी बसलेले लोक देखील दचकून माझ्याकडे बघूं लागले.
मी पुढे म्हटलं-
‘नागपूर में उतरकर रिस्क लेने से अच्छा है अजनी में रिस्क लेना. और फिर कोशिश करने में क्या हर्ज है...?’
त्याने अविश्वासानं माझ्याकडे बघितलं आणि गप्प राहिला. मला ती हिंदी म्हण आठवली-चोर का दिल कमजोर होता है...
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडली आणि सामान घेऊन दारावर आलो. तो तिथेच उभा हाेता. मी त्याला म्हटलं-
‘अजनी में गाडी धीमी होती है तो उतर जाना. मैं भी उतरुंगा.’ त्याचा विश्वासच बसत नव्हतां. तो माझ्याकडे बघतच राहिला. इतक्यांत गाडीचा वेग कमी झाला होता, म्हणजेच इंजिन अजनी स्टेशनाच्या फलाटापर्यंत पोचलं होतं. अजनी फलाटावरचा पहिला साइन बोर्ड मागे पडताच मी पिशवी खांद्यावर घेतली, सूटकेस डाव्या हातात घेऊन त्याला विचारलंं-
‘उतरतो कां...!’
तो चुप होता. तेव्हां मी त्याला म्हटलं-
‘मग दार सोड...’
उजव्या हाताने दाराचं हैंडल धरुन डाव्या हातांत सूटकेस सावरत मी शेवटच्या पायदानावर आलो...आता गाडीचा वेग वाढू लागला होता...आणि सूटकेस सांभाळत मी उडी घेतली. पाय जमीनीला लागतांच गाडीच्या दिशेने गाडी सोबत पाच-सहा पाउल धावलो आणि थांबता-थांबता गाडी कडे बघून जोराने ओरडलो-
‘ऐसे उतरते हैं चलती गाडी से...!’
मला माहीत होतं की मी जिथे बसलो होतो तिथे बसलेले लोक माझ्याकडेच बघत होते.
आता मी चहुकडे बघितलं. दुपारचे पावणे चार वाजले होते. चहुंकडे सगळं व्यवस्थित होतं. मी प्लेटफॉर्मच्या पुढे असलेल्या सिग्नल जवळ उतरलो होतो. सूटकेस घेऊन मी फलाटावर आलो आणि गेटजवळ पोचलो. तिथे स्टेशन मास्तर उभा होता. त्याने इतक्यांतच ‘एपी’ एक्सप्रेस ला लाइन क्लीयर दिला होता, ‘एपी’ तिथे न थांबता पुढे निघून गेली. मग हा वाटसरु कुठून टपकलां असेच काहीसे भाव त्याच्या चेहेरयावर होते. तिकडे दुर्लक्ष करीत मी स्टेशना बाहेर आलो, रिक्षा केला-8 रुपए. रिक्षा मधे मी रिलैक्स होईस्तोवर अजनी चौक आला. रिक्षा तो चौक पार करत असतांना मला जणूं जाग आली...! आणि माझ्या एकदम लक्षांत आलं की मी काय दिव्य केलंय ते. रिक्क्षेवाल्या साठी मावशीला पैसे मागावे लागतील म्हणून मी चक्क चालत्या सुपरफास्ट ‘एपी’ मधून उडी घेतली होती.
स्वावलंबी नगर ला मावशीच्या घरी पोचल्यावर मी कुणालाच काही सांगितलं नाही. रात्री मामे भाऊ भेटला तेव्हां त्याला सांगितलं. ते ऐकतांच तो सुन्नपणे मला बघतच राहिलां...मग खूप रागावलां. (माझ्याहून मोठा आहे) पण बिलासपुर पर्यंतचे तिकिटचे पैसे त्यानेच दिले.
ड्यूटीवर असतांना यार्डमधे शंटिंग करणारया इंजिन मधून दहादा उतरणं, चढ़णं रुटीनचं काम असूं शकतं. पण ‘एपी’ मधून घेतलेली ती उडी...!
त्यानंतर मी असं धाडस कधीच केलं नाही...!
ललित लेखनाचा प्रकार
अजनी, एपी...
धन्यवाद।
वडील रेलवेत असल्यामुळे लहानपण बिलासपुरच्या रेलवे कालोनीत गेलं. इथली रेलवे कालोनी देशाची दूसरी मोठी रेलवे कालोनी आहे. त्या मुळे स्टीम इंजिन जवळून बघायला मिळाले. नंतर ५ वर्षे फायर मेन होतो. ८ तासांत ९-१० टन कोळसा फायरबाक्स मधे सहज झोकत होतो. आज दोन बादल्या पाणी उचलायचं म्हटलं तर त्रास होतो. कारण कंप्य्रूटर वर सिटिंग जास्त होतं.
बघूंया...
अजनी, एपी...
धन्यवाद।
वडील रेलवेत असल्यामुळे लहानपण बिलासपुरच्या रेलवे कालोनीत गेलं. इथली रेलवे कालोनी देशाची दूसरी मोठी रेलवे कालोनी आहे. त्या मुळे स्टीम इंजिन जवळून बघायला मिळाले. नंतर ५ वर्षे फायर मेन होतो. ८ तासांत ९-१० टन कोळसा फायरबाक्स मधे सहज झोकत होतो. आज दोन बादल्या पाणी उचलायचं म्हटलं तर त्रास होतो. कारण कंप्य्रूटर वर सिटिंग जास्त होतं.
बघूंया...
हो आणि
एकदा माझी क्काही क्काही चूक नसताना प्लॅट्फॉर्मवर साष्टांग नमस्कार घडला होता. त्याचे असे झाले, आमच्या डब्याच्या एक डबा आधीच्या डब्यातून गाडी थांबण्यापूर्वी उतरलेले गृहस्थ जोरात गाडीच्या दिशेने धावत सुटले. हे असे धावायचे असते हे कुणीतरी त्यांच्या मनावर चांsगले ठसवून दिले होते असणार. आणि अर्थात ते गाडी थांबल्यानंतर उतरलेल्या माझ्यावर नेमके येऊन आदळले. अनपेक्षित हल्ल्यामुळे 'रविसुत महीसंगे फार दु:खित झाला' हेवेसांन. आणि ही विषम टक्कर होती त्यामुळे त्यांना काहीच झाले नाही हे आणखी वर.
छे छे, प्लान नाहीच...
प्लान नाहीच. आधीच लिहिलंय की घरी पोचताक्षणी मावशी जवळ रिक्शे साठी पैसे मागण्याचा धीर होत नव्हता.
दुसरं म्हणजे कान्फीडेंस....
अहो अजनी स्टेशनाहून दीनदयाल नगर जवळ आहे की....आणि उडी मारु शकेन हा आत्मविश्वास होता....कारण फायरमेन असतांना आम्ही १३ किमीच्या सेक्शन मधे ट्रेन चालवायचो. या दरम्यान बरेचदा इंजिन मधून चढ-उतर करावी लागे. बॉयलर मधे पाणी भरण्यासाठी इंजेक्टर चा उपयोग होई. त्यातून झिरपणारे पाणी एलुमिनियमच्या बरणीत भरायचं. ते पाणी उकळलेलं असायचं. त्याचा चहा करायचा (काळा). तर या बरणीत पाणी भरणं बरेचदा इंजिन चालू असतांना करावं लागे....
म्हणूनच तो आत्मविश्वास आला...
भोपाळ च्या अगोदर हबीबगंज स्टेशनाच्या पहिले देखील एक अंडरब्रिज आहे...
गाेंडवाना एक्सप्रेस हबीबगंज ला थांबत नाही...भोपाळला जाऊन आल्यावर दोन तास फुकट जातात....
दोनदा या गाडीने गेलो...पण उतरता आलं नाहीं दोन तास फुकट गेले...,
असो....
ये कुछ काम का लिख रहे हो।
ये कुछ काम का लिख रहे हो। एंजिन स्पॅाटींगच्या नावाखाली दुसरीकडे जे काही रटाळ पुराण लिहितात त्यापेक्षा हे थरारक आहे.पुर्वी वाफेचे एंजीनं,नॅरो गेज ,मिटर गेज ,इलेक्ट्रिक,डिझझल एंजिनं मला वाटतं अकोला ,पुर्णा ,खांडवा इथे एकाच ठिकाणी बघायला मिळत असावीत.आता सर्व एंजिनं बाहेरून जवळपास सारखीच दिसतात.तुमचा कोळशाच्या एंजिनाचे अनुभव नक्की लिहा.मी शोले हा सिनेमा केवळ त्या गाडीसाठी आणि स्टिरिओ साउंडसाठी पाहिला होता.मला त्या हिंदी सिनेमातली गाणी आणि कौटुंबिक नाट्य अजिबात समजत नाही.
छान लिहिलय! नागपूर स्टेशनला
छान लिहिलय!
नागपूर स्टेशनला डब्ल्यूटी लोकांची सोय म्हणून लोहापूल बांधलेला आहे. लोहापुलावर उतरलं की डायरेक्ट बर्डी.नो झंझट. लोकोपायलट लोक सहृदयतेने मुद्दाम तिथे गाडी स्लो करतात.
रेल्वे हा माझ्या फार आवडीचा विषय. वर कोणीतरी नॅरोगेज, मीटरगेज इ.इ.चा उल्लेख केला आहे.या ब्रॉडगेजवाल्यांनी रेल्वेची व्हरायटीच संपवण्याचं ठरवलंय.जिकडेतिकडे ब्रॉड्गेज.
नागपूर-छिंदवाडा-जबलपूर ही नॅरोगेज लाईन नुकतीच कायमची बंद झाली.आमच्या गावात तिला रीतसर बॅण्डबाजे वाजवून बिदाई देण्यात आली.(मीही तिच्यासमोर एक फोटो काढून घेतला आहे)आता तीही ब्रॉडगेज होणार(हाय!).अचलपूरची शकुंतलेला शेवटची घरघर लागली आहे(की बंद झाली?)
काही दिवसांपूर्वीच अकोला-ओंकारेश्वर पुन्हा अकोला व्हाया खंडवा असा मीटरगेजने केलेला अविस्मणीय प्रवास घडला. दार्जिंलिगंच्या बतासिया लूपसारखा लूप(साध्या भाषेत ४चा आकडा) सातपुडयातही आहे. सातपुडयाच्या गर्द रानातून जाणारा हा प्रवास एकदा तरी जरूर करण्यासारखा आहे. हाही लवकरच ब्रॉडगेज होणार आहे.
नागपुरात एक नॅरोगेज म्युझिअमही आहे (जे आम्ही ***शी असून अजून पाहिलेलं नाही).असो.
काही दिवसांपूर्वीच
काही दिवसांपूर्वीच अकोला-ओंकारेश्वर पुन्हा अकोला व्हाया खंडवा असा मीटरगेजने केलेला अविस्मणीय प्रवास घडला. दार्जिंलिगंच्या बतासिया लूपसारखा लूप(साध्या भाषेत ४चा आकडा) सातपुडयातही आहे. सातपुडयाच्या गर्द रानातून जाणारा हा प्रवास एकदा तरी जरूर करण्यासारखा आहे. हाही लवकरच ब्रॉडगेज होणार आहे.
तोच ना तो, ज्यात एका पुलावरून जाणारी गाडी वळसा घेउन पुन्हा त्याच पुलाखालून जाते तो?
नागपूर-छिंदवाडा-जबलपूर ही
नागपूर-छिंदवाडा-जबलपूर ही नॅरोगेज लाईन नुकतीच कायमची बंद झाली.आमच्या गावात तिला रीतसर बॅण्डबाजे वाजवून बिदाई देण्यात आली.(मीही तिच्यासमोर एक फोटो काढून घेतला आहे)आता तीही ब्रॉडगेज होणार(हाय!).अचलपूरची शकुंतलेला शेवटची घरघर लागली आहे(की बंद झाली?)
दुदैवाने औद्योगिकीकरण आणि चाकोरीबद्दता यांच अद्वैत आहे :(
कोणत्याही मॉलमध्ये गेलं की ही चाकोरीबद्धता आपल्या रोजच्या जगण्याशी किती जोडली गेलीये हे पुन्हा जाणवून हताश व्हायला होतं. पण त्याला इलाजही नाही.
===
अवांतरः याच कारणाने काही गोष्टी स्वतः बनवायला शिकत असतो. मग ते केक्स असोत, बिस्किटे असोत, विणकाम/शिवणकाम असो वा सुतारकाम असो.
किमान आपल्याला हव्या तशा लहानसहान गोष्टी तरी बनवून घेता आल्या पाहिजेत. बाजारावर किती अवलंबून रहायचं
अवांतर आवडले
युनिगेज प्रकल्पाचा रेल्वेला फायदा आहे हे खरे. पण मीटर गेज वाल्या गाड्या टुमदार दिसत. लोकल तर सुबक ठेंगणी म्हणता येइल अशी :). मद्रास एग्मोअर वाल्या लाईन वर एक दोनदा गेलो होतो. एकदा तर साउथ ट्रिप मधे बंगलोरहून पुढे बराच प्रवास मीटर गेज ने केलेला आहे. पूर्वी मिरज ला ही पाहिली होती.
औद्योगीकरण व चाकोरीबद्धता बद्दलही सहमत. इथल्या ग्रोसरी स्टोअर मधली प्रमाणबद्ध पण चवहीन सफरचंदे खायचा कंटाळा आल्यावर फार्मर्स मार्केट जेव्हा सापडले व तेथील ओबडधोबड पण चवदार फळे खाल्ल्यावर एकदम वेगळे वाटले होते.
तरी भारतात अजून अमेरिकेइतका जेनेरिकनेस आलेला नाही. रस्त्याने वा रेल्वेने प्रवास करताना ४-५ तासांनंतर मिळणारे पदार्थ थोडेफार तरी वेगळे असतात. तसेच फ्लेक्स ची डिझाइन्स सुद्धा :)
थत्ते चाचा, काय फेकता? कारनॉट
थत्ते चाचा, काय फेकता?
कारनॉट नी काय १७% च्यावर एफिशियन्सी मिळणार नाही असे सांगीतले? थांबा आता सीओइपी ची तक्रारच करते नीट शिकवत नाहीत म्हणुन.
माझ्या माहीतीत कारनॉट नी सांगीतले की कुठल्याही हीट इंजिन ची एफिशियन्सी १००% असु शकत नाही. आणि कुठल्याही प्रॅकटीकल हीट इंजिन ची एफिशियन्सी ही कारनॉट सायकल पेक्षा जास्त असु शकत नाही.
ते १७% की काय ते आता आठवत
ते १७% की काय ते आता आठवत नाही.
पण म्याक्सिमम एफिशिअन्सी विशिष्ट लिमिटपेक्षा जास्त मिळू शकत नाही असं कारनॉटने सांगितलं. विशिष्ट तापमानाच्या रेंजमध्ये चालणार्या इंजिनची एफिशिअन्सी एका विशिष्ट लिमिट एवढीच असणार.
स्टीम इंजिन हे अंतर्गत-ज्वलन-इंजिन नाही त्यामुळे कारनॉटचा नियम लागू होतो का? आठवत नाही.
नवीन, ताजे
काहीतरी नवीन, ताजे वाचण्याचे समाधान मिळाले. काही वर्षांपूर्वी, गगनविहारी नांवाच्या लेखकाने वैमानिकाचे अनुभव लिहिले होते, ते खूपच आवडले होते. कालांतराने त्या गगनविहारींचा गवि हा जालावरील प्रथितयश लेखक झाला. तुमच्या बाबतीतही याच अपेक्षा आहेत. आम्हाला तुमच्या अनुभवांच्या इंजिनातून सैर करायची आहे आणि तीही नागपुरी भाषेत.
धडधडलं. मी चालत्या गाड्या
धडधडलं. मी चालत्या गाड्या धावून पकडण्यात एक्स्पर्ट होते. पण दोनदा जबरी पडले. दुसऱ्यांना गुडघा दुखावला त्यानंतर आत्मविश्वासच गेला धावती गाडी पकडण्याचा. घाईने पोहोचायचं असे तेव्हा धावत्या गाडीतून उतरण्याचेही प्रयोग केलेत. पण तेव्हा ती गाडी मंदावण्याच्या मार्गातच असे. पण त्या अनुभवांमुळे तुमचा थरार कळला.
उफ्फ्!!!
वेगळ्याच विषयावरचा लेख आवडला.
वेगळ्याच विषयावरचा लेख आवडला. नुसत्या थरारापेक्षा आपल्या अनुभवाच्या क्षेत्रातलं वैशिष्ट्यपूर्ण चित्रण असल्यामुळे जास्त स्पर्शून जातो लेख. ब्रेक कसा चालतो हे पाहाण्यासाठी जास्त पैसे खर्चून त्या ट्रेनने जायची ऊर्मी, आणि मग त्याच ब्रेकच्या आणि आधी मिळवलेल्या आपल्या कौशल्याच्या आधारावर गाडीतून उडी मारण्याची तयारी... या दोन्ही गोष्टींनी एक वेगळंच अनुभवविश्व आणि व्यक्तिमत्व उभं राहातं.
तुमच्या अनुभवांवर खरोखरच अजून लिहा. मोठ्ठं काही नाही लिहिलंत तरी चालेल. अशा तुकड्यातुकड्यांतूनही खूप चांगलं चित्र उभं राहू शकेल.
शकुंतला
शकुंतला रेल वेवर लिहा एकदा. किलिक निक्सन कंपनीच्या मालकीचा खाजगी मार्ग होता तो. बाकी सगळ्या रेल वेज़् चे राष्ट्रीयीकरण झाले तरी हा यवतमाळ-मूर्तिजापूर मार्ग तोट्यात चालत असे म्हणून एकविसावे शतक उजाडेपर्यंत राष्ट्रीयीकृत झाला नव्हता. लोक तिकीटही काढीत नसत. डब्यातून जनावरे नेत. विदर्भातला पुलगाव-आरवी हा मार्गसुद्धा खाजगी मालकीचा होता.
भारी लिहिलंय! वेलकम. आणि
भारी लिहिलंय!
वेलकम. आणि लिहीत रहा. तुमचे रेल्वेतले अनुभव वाचायला आवडतील.
----
माझाही असाच काहीसा अनुभव आहे. मी एक वर्षभर मुंबईला नोकरीला होतो. शुक्रवार रात्रीची दादर-चेन्नै किंवा शनिवार दुपारची चेन्नै एक्सप्रेस पकडून पुण्याला येत असे. पुणे स्टेशनच्या "आऊटर"ला गाड्या बर्याचदा थांबतात, किंवा हळू तरी होतात. तिथे उतरलं की झाडी-झाडोर्यातून एक वाट थेट आरटीओपाशी निघते. तिथे उतरायचं कारण असं की स्टेशनवरच्या रिक्षावाल्यांच्या तुलनेत आरटीओच्या "ओपन मार्केट" मधले रिक्षावाले बरे असत. मीटरप्रमाणे नेत.
प्रथमप्रथम गाडी थांबलेली असेल तरच उतरत असे. मग हळू गाडीतूनही उतरायला लागलो. मग चालत्या गाडीतून उतरायचं टेक्निक जमल्यावर बर्यापैकी वेगात असलेल्या गाडीतूनही.
एक दिवस पिताश्रींना काय हुक्की आली माहीत नाही, पण ते चक्क न्यायला स्टेशनवर आले. मी आरटीओपाशी उतरून कधीच मार्गस्थ झालो होतो. ते वाट बघत बसले, आणि मोबाईलवर फोन केल्यावर भांडं फुटलं. चालत्या गाडीतून उतरतो म्हटल्यावर अशक्य कुटाणा झाला, आणि हा प्रकार बंद करावा लागला.