करोना साथीचे मध्यम वर्गावरील परिणाम
चर्चेचा मुख्य मुद्दा मध्यम वर्गीयांची आयुष्यातली गृहीतके आणि त्यात करोना मुळे होत असलेले बदल.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगात मोठी उलथापालथ झालेली आहे. त्याचे विविध समाजगटांवर आणि व्यवसायांवर होणारे परिणाम यांचा अनेक लोक अभ्यास करत आहेत आणि करोनोत्तर जगात काय बदल होतील याचाही अंदाज करण्याचा प्रयत्न चालू आहेत. यातल्या एका विशिष्ट गटावर झालेले तात्कालिक परिणाम मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. मी ही त्याच गटातला असल्याने हा समाज आणि त्यातले बदल मला जवळून पहायला मिळत आहेत. हा वर्ग म्हणजे मराठी मध्यम वर्ग (ममव).
हा वर्ग गेली अनेक वर्षे करियरमध्ये यशस्वी असलेला आणि त्यामुळे बर्यापैकी आर्थिक स्थैर्य असलेला वर्ग आहे. यातले काहीजण परदेशात वास्तव्याला आहेत. तरी जे परदेशात नाहीत तेही बर्यापैकी आर्थिक स्थैर्याचा अनुभव घेत आहेत. आयुष्यात जी स्वप्ने पाहिली जातात ती सर्व पूर्ण होऊ शकतील याची बहुतांश खात्री या वर्गाला आहे.
कोणत्याही व्यक्तीला तीन प्रकारच्या सुरक्षितता हव्याहव्याशा वाटतात. त्या म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक. या तीनही सुरक्षितता गृहीत धरता येतील इतपत या वर्गाने स्वत:ला अप-लिफ्ट केले आहे.
यातली आर्थिक सुरक्षितता ही प्राईम आहे. ती आहे म्हणून इतर दोन आहेत असे म्हणाता येईल. तरी हा वर्ग मुळात प्रिव्हिलेज्ड असल्याने सामाजिक सुरक्षितता ही काही प्रमाणात तरी (आर्थिक सुरक्षेच्या विना) या वर्गाला उपलब्ध होतीच.
आर्थिक सुरक्षितता म्हणाजे काय? तर कुटुंबातल्या सदस्यांना चांगले उत्पन्न देणार्या नोकया व्यवसाय आहेत. आणि त्यात खंड पडण्याची फ़ारशी शक्यता नाही. (त्या टिकवून ठेवायला जे कष्ट करायला लागतील ते हा वर्ग करतोच). आणि या उत्पन्नामुळे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे, त्यांच्या इतर सर्व गरजा आणि चैनी पूर्ण करणे सहज शक्य होत आहे. "सहज शक्य" याचा अर्थ कष्टाविना नाही पण ही स्वप्ने पाहूच शकणार नाही अशी आर्थिक परिस्थिती येणार नाही याची जवळजवळ खात्री आहे.
दुसरी सुरक्षितता आरोग्यविषयक. या वर्गाचे राहणीमान आणि त्यांना परवडणार्या वस्तू-सेवांमुळे या वर्गाला आरोग्यविषयक चिंताही नाहीत. चांगल्या आहारामुळे कुपोषण नाही तसेच किमान आरोग्यदायी गोष्टी स्वच्छ पाणी, हवा, उत्तम अन्नधान्य, भाज्या, मिळण्याची खात्री आहे. यातलं जे उपलब्ध नाही ते घरात शुद्ध करून घेण्याची सोय या वर्गाला करता येते. या वर्गाच्या आरोग्यविषयक चिंता गेली काही वर्षे मुख्यत्वे "अति/जंक खाणे" आणि "बैठे काम" या लाइफ़स्टाईलमुळे होणार्या विकारांविषयी किंवा कॅन्सर-पार्किन्सन सारख्या वृद्धत्वामुळे होणार्या विकाराबद्दल असतात. आणि त्यावर मात करण्याच्या प्रयत्नात हा वर्ग आहे. रोगराईत आपल्या माणसांचा बळी जाईल ही शक्यता या वर्गासाठी पंचवीस तीस वर्षे तरी अस्तित्वात नाही.
करोना साथीने ही गृहीतके मोडली आहेत. पहिले म्हणजे साथीच्या रोगाने "आपणही" मरू शकतो ही भीती नव्याने निर्माण झाली आहे. दुसरे म्हणजे या साथीच्या नियंत्रणासाठी लागू झालेल्या निर्बंधांमुळे अनेक व्यवसाय धोक्यात आले आहेत. आधी लॉकडाऊन मुळे पुष्कळसे व्यवसाय, कार्यातये दीर्घकाळ बंद ठेवण्याची वेळ आली. त्या बंद असण्याने बाजारातील वस्तू सेवांची मागणी अचानक कोसळली. त्या वस्तू सेवा पुरवणार्याच्या साखळीवर विपरित परिणाम झाला. आणि एकूण अर्थव्यवहार हे अत्यंत परस्परावलंबी झाल्यामुळे नुसत्या त्या साखळीतल्याच नव्हे तर त्या साखळीला अलाइड सेवा पुरवणार्या इतरही व्यवसायातील लोकांना धोका निर्माण झाला आहे. आणि त्या व्यवसायांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. त्यांनी आपपल्या कर्मचारी संख्येत कपात करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला फ़क्त रोजंदारीवर काम करणार्यांना बसलेली झळ वरच्या वर्गातल्यांनाही बसू लागली आहे. आणि या वर्गात आपला ममव पण आला आहे. शिवाय करोनाची साथ संपण्याची काही चिन्हे दिसत नसल्यामुळे खबरदारी म्हणूनही कंपन्या आपल्या बिझनेस मॉडेल्सचा पुनर्विचार करत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यवसाय अडचणीत आल्यामुळे काही आर्थिक सेवा देणार्या व्यवसायांवरही परिणाम यापुढे होणार आहे. उदाहरणार्थ व्यावसायिक कर्जे देणार्या संस्था- बॅंका, बॅंकांव्यतिरिक्त पतपुरवठा करणार्या संस्था इत्यादींवरही पुढे परिणाम होणार आहेत. मम वर्गाचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत हे सेवा क्षेत्रात आहेत. त्या क्षेत्रावर मेजर परिणाम होणार आहेत.
तिसरी सुरक्षितता म्हणजे सामाजिक सुरक्षितता. सामाजिक सुरक्षितता म्हणजे प्रिव्हिलेज्ड क्लास मधील असल्यामुळे सर्वसाधारणपणे सामाजिक अडचणी नसणे. यात डिस्क्रिमिनेशन नसणे यापासून सुरुवात करून आपल्या वर्गामधील मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या नेटवर्कमुळे काही प्रश्न सहज सुटून जाणे किंवा अडचणीच्या वेळी नव्या संधी उपलब्ध होणे- संधीची माहिती उपलब्ध होणे. बाकी आर्थिक मदत मिळते की नाही याबद्दल साशंक आहे पण तातडीची आर्थिक मदत मिळू शकते. परंतु करोनोत्तर काळात नेटवर्कमधील सगळेच कमीअधिक झळ पोचलेले असल्याने पूर्वी ज्या संधी इतरांना सांगितल्या जात असतील त्या आता सरप्लस नसल्याने त्या उपलब्ध होणार नाहीत. आर्थिक मदतसुद्धा सगळेच जात्यात असतील तर अवघड होईल.
सामाजिक सुरक्षिततेमध्ये "जीवनशैलीच्या सातत्याची सुरक्षितता" याही पैलूचा विचार करता येईल. या वर्गाची एक जीवनशैली तयार झाली आहे. वीकेंडला सिनेमा/मॉल/अॅम्यूझमेंट पार्कला जाणे, वर्षातून दोनदा पर्यटन, समारंभ, पार्ट्या या स्टॅण्डर्ड जीवनशैलीला निदान दोन वर्षे मुकावे लागणार आहे. ही काही प्रत्यक्ष अडचण नाही पण याचा मानसिक परिणाम अनेकांवर होईल.
या सर्व गोष्टींमुळे या वर्गाची आजवरची गृहीतके हलली आहेत आणि हा वर्ग धास्तावला आहे. त्याचे परिणाम हळूहळू पुढे येत राहतील. पण याचा लगेचचा परिणाम म्हणजे त्याचे एकमेकांबरोबरचे वागणे बदलते आहे आणि ते अधिक आत्मकेंद्री होत आहे. यातून सोसायट्यांमध्ये सदस्यांसाठीचे आणि सोसायट्य़ांमध्ये येणार्या बाहेरील व्यक्तींसाठी बनवले जाणारे विचित्र नियम उदयास येत आहेत..
वरच्या बहुतांश विवेचनात सरासरी सरळ रेषेत चालणारे आयुष्य धरले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात थोडेफ़ार चढ उतार/अडचणी असतीलच. पण एक सरासरी म्हणून वरचे वर्णन योग्य आहे असे वाटते. होणार्या सर्व बदलांचा मागोवा आत्ताच घेणे शक्य नाही. ते जसजसे होतील तसतसे उलगडत जातील.
आढावा पटला. 2008च्या अमेरिकन
आढावा पटला. 2008च्या अमेरिकन समस्येची झळ भारतीयांना फार बसली नव्हती पण आत्ताचा प्रकार फारच हादरवणारा आहे. पण यातून एक जाणवते. ममव संस्कार म्हणून ज्या अनेक गोष्टींची हेटाळणी केली जाते. त्याच ममव सवयींमध्ये पैशांची बचत करणे, अंथरूण पाहून पाय पसरणे याही गोष्टी असतात. या संकटाने बचतीचे महत्त्व नक्की वाढेल असे वाटते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला हा एक अतिशय महत्वाचा लेख
मला हा एक अतिशय महत्वाचा लेख वाटत आहे.
त्यात लिहिलेल्या गोष्टी मला माझ्या आसपास खदखदताना दिसत आहेत.या बाहेर कशा पद्धतीने येतील हे बघायला पाहिजे.
लेखाच्या मथळ्यात मध्यम वर्ग
लेखाच्या मथळ्यात मध्यम वर्ग आणि करोनाचे त्यांच्यावर परिणाम म्हटले आहे तरी पहिल्याच परिच्छेदात 'मराठी मध्यम वर्ग' म्हटले आहे. जगात सगळीकडेच सर्वांवरच घाला घातला आहे आणि कोणत्याही कोपऱ्यातला मध्यम वर्ग तेवढाच भरडला गेला आहे. ममवांचे संस्कार किंवा त्यांचे बोलणे, विचारधारा कन्नडिगा, तमिळ वगैरेंशी वेगळे असले तरी आर्थिक,शैक्षणिक बाबतीत या साथीने तेवढेच खचले असतील ना?
सहमत आहे.
सहमत आहे.
माझा इतर भाषिक मध्यम वर्गाशी तितका जवळून संपर्क नाही. पण तेही भरडले गेले असतीलच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मध्यम वर्ग कसा निर्माण झाला
मध्यम वर्ग कसा निर्माण झाला.
1) अशिक्षित कामगार
हे खाडी देशात गेले आणि भारतीय चलनात त्यांचा पगार भारतातील चलनात तेच काम करणाऱ्या लोकांन पेक्षा खूप जास्त होता .
इथे तेच काम करून सायकल घेण्याची कुवत नसलेली व्यक्ती तेच काम खाडी देशात करून सोनी चा टीव्ही घेवू शकत होते.
2) नवीनच माहिती आणि तंत्र ज्ञान हे क्षेत्र निर्माण झाले आणि ते शिक्षण घेवून इथे 10000 रुपयाची कमविण्याची पण संधी नव्हती त्याच व्यक्ती ना युरोपियन देशात दोन चार लाख पगार मिळायला लागले तो लायकी पेशा खूप जास्त होता.
३) सेवा क्षेत्र.
बीअर बार, सर्व्हिस बार, पश्चिमात्य राहणी मानाची ओढ म्हणून तरांकित हॉटेल व्यवसाय .
ह्या क्षेत्रात काम करणारे मध्यम वर्गीय झाले.
4) सरकारी कर्मचारी काम आणि productivity ह्याचा काहीच संबंध नसणार वर्ग काम दोन रुपयाचे आणि पगार 100 रुपये .
ह्या सर्व लोकांना लायकी पेक्षा जास्त धन प्राप्ती होत गेली .त्यांची ती क्षमता नसताना.
त्या मुळे परिस्थिती बिघडली की ते हे कमवत होते त्याच्या 10 टक्के पण कमावू शकत नाहीत.
त्यांची क्षमता तीच आहे.
फक्त संघर्ष करून व्यवसाय मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणारे.
शेती मध्ये प्रयोग करून यशस्वी झालेले.
.सेवा पुरवणारे .
प्रामाणिक पना मुळे विश्वास निर्माण करून सेवा पुरवणारे.
हे माध्यम वर्गीय आहेत आणि फक्त हेच नंतर पण टिकून राहतील.
बाकी 1 ते 4 मधील मध्यम वर्गीय टिकून राहतील ह्याची शास्वती नाही.
या प्रतिसादातलं विशेष काही
या प्रतिसादातलं विशेष काही कळलं नाही.
१ ते ४ गटातील ४ क्रमांकाचे लोक का टिकून राहणार नाहीत हे कळत नाही. क्र १ मधील लोकांच्या अडचणी करोना पूर्व काळातच सुरू झाल्या कारणा मध्यपूर्वेतील तेलाची इकॉनॉमी डळमळीत झाली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उत्तम विषय
लेख आवडला; आभार.
अशा लेखनात लोकांना जोखण्याचा दवणीयपणा करणारं लेखन खूप दिसतं. ते अगदी सहज टाळलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नेमके निरिक्षण
नेमके निरिक्षण! फक्त आर्थिक दृष्ट्या मला तितकासा फरक पडला आहे असे वाटत नाही.
माझ्या ओळखितल्या कुणाचा जॉब गेल्याचे ऐकिवात नाही. पण या क्वार्टरच्या आकडेवारी नुसार टॉप आयटी कंपन्यांचा वर्कफोर्स कमी झाला आहे. त्यामुळे काहींच्या नोकर्या गेल्या आहेत पण ती आकडेवारी कमी आहे. गेल्या ५० वर्षात प्रथमच पर कॅपिटा इन्कम डिग्रोथ होत आहे. तरिही, मला आर्थिक दृष्ट्या ममव लोकांचे फारसे बिघडलेले दिसत नाही. मात्र निम्न आर्थिक स्तरातल्या लोकांना जास्त फटका पडताना दिसत आहे. (उदा. रिक्षावाल, धुणी-भांडी करणार्या स्त्रिया) आणि तो अजूनही पडतो आहे. यातल्या काहींनी ज्यांना मूळ गावी उत्पन्नाचे साधन होते त्यांनी कुटुंबासहीत स्थलांतर केले आहे. (मुलांचे शाळेतले नाव काढून). पण तिथेही इतक्या वर्षांनी शेती-बागायती करण्याचे कौशल्य राहिलेले नसल्याने उत्पन्नाची तशी बोंबच आहे. अशा ओळखीतल्या काही जणांचा गणपती/दिवाळी नंतर कुटुंब गावीच ठेवून रोजगारासाठी शहराकडे धाव घेण्याचा विचार चालू आहे. मुले चांगल्या शिक्षणाला (ऑनलाईन घेण्याची सोय नसल्याने) पारखी राहिल्याने आणि नोकरीच्या संधी आटल्याने ममव आणि या वर्गातले अंतर उलट वाढण्याची शक्यता अधिक वाटते.
मुंबईत ज्यांना बाधा झाली, त्यातले ७०% ते ८०% लोकं हे सौम्य लक्षणवाले आहेत. (मधल्या काळात करोना माझ्याही घरात पाऊल टाकून गेला, सुदैवाने सौम्य लक्षण आणि होम क्वारंटाईनवर निभावले). ममव वर्गावर काम पडत आहे (घरची + ऑफिसची + मूलांच्या ऑनलाइन शाळा - यात जर मूल लहान असेल तर एक-दिड तास पालकांनाच काढावा लागत आहे) त्यामूळे फार फार तर मेंटल प्रेशर नक्की असेल. त्यात १०%-२०% ज्या केसेस आहेत, त्यांच्या अनुभवामूळे -काळ्या बाजारतल्या औषधाच्या किमती, इ. मुळे थोडी भीती पण आहेच, नाही असे नाही. पण आताशी बरीच भीती चेपली आहे. बाजारात गर्दी आहे. पुठपाथवर जूने फेरिवाले पुन्हा एकदा आपली जागा "क्लेम" करत आहेत. त्यामुळे करोनाच्या काळात उत्पन्नाचे साधन गेल्याने नव्याने नारळ-भाजी विकणारी मंडळीं आपल्या "नव्या/परमनंट" जागेच्या शोधात आहेत.
तशीही इकॉनॉमि गेल्या वर्षीपासून गडगडतच होती. गेल्या वर्षीच्या शेवटच्या क्वार्टर मध्ये (जान-मार्च-२०) मध्ये तिने १०-११ वर्षाच तळ गाठला. यावर्षीचे जीडीपी प्रोजेक्शन -४% ते -५% आहे. शेती सोडली तर मॅन्युफॅक्चरींग आणि सर्व्हीस दोनही गडगडलेले आहे. पण आशा ही आहे की, पुढल्यावर्षी लो-बेस इफेक्टमुळे आणि वाढलेल्या इकॉनॉमिक अॅक्टीव्हिटीज मूळे चांगला ग्रोथ असेल. टोल कलेक्शनचे आकडे पूर्ववत होत आहेत. गेल्या महिन्याचे जीएसटी कलेक्शनचे आकडे अपेक्षेपेक्षा बर्यापैकी चांगले आहेत. काही इंडस्ट्रीज/सेक्टर्स/प्रोफेशन्स मात्र अजूनही गर्तेतच आहेत. टूर-ट्रॅव्हल, एंटरटेनमेंट - सिनेमगृहे, अम्युझमेंट पार्क, हॉटेल्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स इ. सेक्टर्सना, तसेच वकिली, इंटेरिअर डेकोरेटर्स, प्रॉपर्टी व्हॅल्यूअर्स ई. या प्रोफेशन्सना करोनाचा फटका जास्त पडला आहे.
आरबीआयने बरीच लिक्विडीटी उपलब्ध करून दिली. सरकारने पण लोन गॅरेंटीची स्किम दिली. पण एचडीएफसी बँक वगळता प्राव्हेट सेक्टर बँकानी कॅपिटल सेफ ठेवण्यावरच भर दिला आहे. त्यामुळे क्रेडीट ग्रोथ सरकारला अपेक्षित असा नाही आहे. आयसीआयसीआय बँक वगळता टॉप खाजगी बँकांचे मोरॅटोरिअम कमी होऊन ९-१०% वर आले आहे (जे एप्रिल मध्ये २०%हूनअधिक होते) . पण सगळ्यांचीच कलेक्शन एफिशिअन्सी पण वाढून ७०% च्या वर गेली आहे. मोरॅटोरिअम-२ चा पिरिअड संपल्यावर एनपीए चे बरेचसे चित्र स्पष्ट होईल.
एकंदर चित्र वाटले तितके वाईट नाही पण "लवकरच" पूर्वीसारखे "नॉर्मल" होईलच याचीही खात्री नाही.
मम वर्गावर आर्थिक ताण पडलेला
मम वर्गावर आर्थिक ताण पडलेला नाही असे कशाच्या आधारे म्हणत आहात? बऱ्याचश्या लग्झरी सेगमेंट मधील सेवांना पर्यटन-विमानप्रवास-हॉटेल-रिसोर्ट यांना ताबडतोब फटका बसला आहे त्यामुळे त्यातल्या बहुसंख्यांचे जॉब धोक्यात आहेत. अजून गेले नसले तरी पगार गोठवले आहेत कपात केली आहे.
शिवाय सेकंडरी परिणामांनी जॉब जाण्याची शक्यता वाढली आहे. सध्या कर्जवसुलीवर स्थगिती असल्याने अजून कर्जदारांपैकी किती कर्जदार लुढकले आहेत हे गुलदस्त्यात आहे. ते स्थगिती संपल्यावर लक्षात येईल. त्याचा कास्केडिंग इफेक्ट बँकिंग क्षेत्रावर दिसेल.तेव्हा ही बँका दिवाळखोरीत जातील. त्यातून सेकंड फेज जॉब लॉसेस होतील. बँका बुडल्याने त्यांना सेवा पुरवणारे आयटी सेक्टरही बाधित होईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मॅनेजमेंट गाईडन्स
टॉप आयटी आणि फायनान्स इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंट कमेंट्रीवरून तसे मला वाटते. (या महिन्यात आलेल्या पहिल्या क्वार्टरच्या रिझल्ट वरून). या वर्षी इन्फोसिसने ०-२% रेव्ह्यून्यू वर जाईल असे म्हटले आहे. इतर आयटी कंपन्यांनी गाईडन्स दिले नसले तरी डील विन मोमेंटम वरून या इंडस्ट्रीमधल्या लोकांचे जॉब जातील/धोक्यात येतील असे वाटत नाही. विप्रो वगळता अॅनालिस्ट डॉलर रेव्ह्यून्यू मध्ये ग्रोथ होईल असे गृहीत धरत आहेत. अर्थात आयटी/फायनान्स इंडस्ट्री म्हणजेच सगळी इकॉनॉमि नाही. पण बराचसा ममव वर्ग याच इंडस्ट्रीमध्ये आहे. (आयटी मधला गलेल्ल्ठ पगार, ऑनसाईट अपॉर्च्यूनिटी... त्यामुळे आलेली स्थिरता... जे माझे गॄहितक चूकीचे असेलही.). बँकांच्या बाबतीत तुम्ही बरोबर म्हणता, चित्र मोरॅटोरिअम पिरिअड संपल्यावर अधिक स्पष्ट होईल. पुढल्या क्वार्टर रिझल्ट नंतर ते चित्र अजून स्पष्ट दिसेल. (अर्थात इथे पण टॉप प्रायव्हेट सेक्टर बँका मी गृहीत धरल्या होत्या.)
सर्वत्र पसरलेल्या को
सर्वत्र पसरलेल्या को ऑपरेटिव्ह बँकांतील स्टाफ हा सर्व मी ममव मध्येच गणतो.
आमच्या माहितीत एक जोडपे नवरा-बायको दोघेही केसरी ट्रॅव्हल मध्ये आहेत. त्यांचा जॉब गेला नसला तरी एप्रिल पासून पगार नाही. सध्याचे चित्र पाहता दीड वर्ष तरी काही उर्जितावस्था अपेक्षित नाही.
टर्शरी इफेक्ट होतील ते या सर्वाचा परिणाम म्हणून बाजारात मागणी कमी होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आणखी उद्योग गोत्यात येणे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एकंदर चित्र वाटले तितके वाईट
नवीनच सरकारात आलेल्यांसाठी ,मग ते मध्यमवर्गीय म्हणत नसले तरी त्यांच्यासाठी धडकी भरवणारे आहे.
पण मवंना आणि मवं समजणाऱ्या
पण मवंना आणि मवं समजणाऱ्या पात्रांना घेऊन कादंब्ऱ्या, नाटकं करणाऱ्यांचं काय होणार?
प्रत्यक्ष अडचण नाही पण याचा
हा खुप महत्वाचा मुद्दा आहे. मानसिक परिणाम इतका आहे की त्यामुळेच पूर्वीसारखे "नॉर्मल" होईलच याची खात्री नाही.
- (मानसिक) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
+१०००
+१०००
वरील मानसिक परिणामांचे वाक्यच मला चटकन 'येस्स्स!!! बरोब्बर' असे वाटले. संपूर्ण लेखच आवडला.
एक नक्की होणार ते म्हणजे, काटकसर, बचत आदि सवयी पूर्वीपेक्षा घट्ट होणार.
Covid19 वर विजय कधी मिळेल
Covid19 वर विजय कधी मिळेल ह्याचे उत्तर आता कोणाकडेच नाही.
लस काम करेल की नाही ह्याची खात्री नाही.
तेव्हा आर्थिक संकट कोणावर येईल आणि कोणावर येणार नाही हे आता सांगता येत नाही..
हे संकट असेच राहिले तर .
इंटरनेट,टीव्ही,सिनेमा,पर्यटन,हॉटेलिंग, स्पा, आणि असे अनेक व्यवसाय बंद होतील.
कोणी त्या वर खर्च करणार नाही.
खर्च फक्त अन्न ,धान्य आणि कपडे.vij hya varach hoil.
Covid19 ajun गंभीर झाला तर ?
पुढच्या तीन महिन्यांत करोना ओसरु लागेल.
करोना विषयी माहिती आणि उपाय /उपचार या बद्दल माहिती इतकी प्रचंड आहे की त्याच्या परिणामांमुळे करोना ओसरु लागेल.
जरी तो राहिला किंवा तीव्र झाला तरी लोक किती दिवस नोकरी-धंद्या विना रहातील? नंतर लोक जसे रस्त्यावर उतरल्यावर अपघातामुळे माणुस मरु शकतो हे गृहीत धरुन चालतात तसेच करोना होऊ शकतो ही शक्यता धरुन आपापले काम धंदे करु लागतील.
करोनाची लस/औषध/ रामबाण उपाय जेंव्हा येइल तेंव्हा येइल सध्यातरी सोशल डिस्टण्सिंग हा एक सावधगिरीचा उपाय आहे. पण दुर्दैवाने कोणीही त्याचा प्रसार करीत नाहीये. सरकारी यंत्रणा सुद्धा लॉक्डाउन हाच एक उपाय आहे हे मानुन काम करते आहे. हे असंच चालु राहिलं तर करोना मुळे नाही मेले तरी भूक बळी किंवा कर्हबाजारी पणामुळे आत्महत्या करुन लोक मरतील.
शेवटी किती दिवस लोक लॉकडाउन ई. पाळणार आहेत ? सरकारी कर्मचारी /पोलिस लोक सुद्धा त्यामुळे बाधित झाले आहेत, आणि याचे आर्थिक /सामाजिक परिणाम त्यांनाही भोगावे लागणार आहेत. तेही हळु हळू लोकांना टोकणे/पकडणे ई. गोष्टी करणे सोडुन देतील. उगीच शास्त्रापुरते एखाद दोघांना पकडतील आणी समज देऊन सोडुन देतील.
एक वेळ अशी येईल की लोक बंड करुन उठतील आणि आपले व्यवहार पूर्ववत चालु करतील.
Covid19 विषयी पुर्ण ज्ञान अजुन तरी नाही
Covid19 चे मूळ च अजुन ठाम पने माहीत नाही.
उपचार ठाम पने माहीत नाहीत.
सामूहिक प्रतिकार क्षमता काम करेल हे ठाम पने माहीत नाही.
प्रसार कसा होतो
ठाम पने माहीत नाही..
काहीच ठाम पने माहीत नाही.
लस काम करेल हे पण माहीत नाही.
विषाणू नी जर उग्र स्वरूप दाखवले तर बंड करण्यासाठी निरोगी माणूस तरी हवा ज्याच्या अंगात उभ राहून रस्त्यावर यायची ताकत असेल.
ज्या वस्तुंच्या खरेदीचवर पैसे
ज्या वस्तुंच्या खरेदीचवर पैसे खर्च होत होते त्यात मोठ बदल झालेला दिसतो.
घरच्या घरी करता येतील असे छंद शोधले जातायत. आधी भटकंती, खरेदी, निरनिराळे कार्यक्रम, मेळावे या मधे रमणारे लोक बेकींग, कुकींग, क्राफ्ट इ. मधे मन रमवित आहेत . जीम च्या ऐवजी योगा वगैरे...
जीवनशैलीमधे बराच बदल झालेला आहे, आणि हे नियम बंधने इ. हटवल्यानंतर निदान काही काळापर्यंत टिकून राहील असे वाटते.
परंतु हे बदल किती काळ टिकतील या बद्दल साशंकता वाटते. कारण जरा परिस्थिती सुधारतेय म्हणल्यावर सारे काही पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही.
ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा आर्थिक नुकसान झालेय, त्यांना यातून सावरायला किमान एक, दोन वर्षे लागतील. परंतु त्या काळात न बुडता पाण्याच्यावर डोके ठेवणे जमायला पाहिजे आणि ते अत्यंत कठीण आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
सामाजिक लाज
ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा व्यवसाय बसले आहेत अशा पांढरपेशा मंडळींची कुचंबणा होईल किंवा व्ह्यायला लागली आहे. अशीच परिस्थिती असलेल्या पण निम्न आर्थिक स्तरातील मंडळींना 'अन्य कुठलेही काम' करण्यासाठी नसणारी लाज ही पांढरपेशांना असते,
आणि हीच मोठी समस्या आहे.
करोना साथीच्या सुरुवातीच्या
करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे एप्रिल मे मध्ये मध्यमवर्गाला जी माहिती मिळत होती त्यात हा रोग मुख्यत्वे दाट वस्तीच्या भागात म्हणजे धारावी, वरळी कोळीवाडा भागात किंवा पुण्यातल्या भवानी पेठ, नाना पेठ भागात पसरत आहे असे दिसत होते. आपल्या भागात म्हणजे प्रभादेवी, शिवाजी पार्क किंवा कोथरूड कर्वे नगर पौडरोड भागात हा रोग पसरणार नाही असे मध्यम वर्गाला वाटू लागले. त्यामुळे काहीशी बेफिकिरी जूनमधल्या अनलॉक मध्ये दाखवली गेली. रोज बाहेर पडणे भाजी आणायला लांब पर्यंत जाणे वगैरे गोष्टी व शिवाय मास्क न घालणे एका बाईक वर तीन जण इत्यादि अतिरेकही झाले. आणि जुलै महिन्यात पुन्हा लॉकडाउनची वेळ आली. इतकेच नव्हे तर करोना अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये बऱ्यापैकी लागण होत असलेली दिसू लागली.
यामुळे मी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्याला काही होणार नाही हा कॉन्फिडन्स आता डळमळला आहे आणि त्यामुळे मव सोसायट्या घाबरून विचित्र गोष्टी करू लागल्या आहेत. यात रोज सोसायटीचा परिसर डिसैन्फेक्टंटने धुणे ते मोलकरणींना सनिटायझरची आंघोळ घालणे ते मोलकरणींना सोसायटीत प्रवेश न देणे अशा गोष्टी करत आहेत. नुकत्याच कळलेल्या घटनेत कोविड ने मृत्यू न झालेल्या व्यक्तीचे शव सोसायटीत आणण्यास मनाई करण्यात आली..
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मध्यमवर्गाचे उत्पन्न आणि लॉकडाऊन
आजच हा लेख वाचला -
Middle class incomes were worst hit by India’s harsh coronavirus lockdown
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मोक्याच्या फायदा उचलणारी वृत्ती
उद्योगपती मोक्याचा फायदा उचलून कामगार कपात करणे,कामगारांची देणी न देणे,पगार न देणे असले उद्योग करतील आणि त्याचा फटका मध्यम वर्गाला,आणि कनिष्ठ मध्यम वर्गाला बसेल.
सरकारची आर्थिक स्थिती किती खराब आहे हे दाखवण्यासाठी covid19 नी जी स्थिती निर्माण झाली आहे त्या संधीच सुवर्णसंधी मध्ये रुपांतर करून.
सरकारी उद्योग विकणे,कर वाढवणे,अनुदान कपात करणे,हे उद्योग सरकार करेल आणि ह्याचा पण फटका मध्यम वर्गाला च बसेल.
लॉक डाऊन संपले तरी लोकांकडे पैसे च नसल्यामुळे तेजी येणार नाही उलट साठेबाजी केली जाईल आणि महागाई वाढेल.
मदत आणि नवीन व्यवसाय
एका मव ग्रुपवर मेसेज वाचला होता की ज्यांना किराणा, औषधं, गरजेच्या गोष्टी खरेदी करणं पैशाच्या आभावी शक्य नसेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. त्यांच्या घराबाहेर सामान ठेवण्याची व्यवस्था केली जाईल आणि नाव, पत्ता कुठेही उघड होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ती सुविधा किती लोकांनी वापरली,वापरत आहेत, कल्पना नाही.
अजून एक निरीक्षण असे की बऱ्याच ममव नी घरून खाद्यपदार्थ पार्सल करून देण्याचा व्यवसायही चालू केला आहे. या लोकांचा पूर्वी कधीही या व्यवसायाकडे कल असेल असं वाटलं नव्हतं.
पोळी!
उदारीकरणापासून, म्हणजे साधारण ९४-९५ सालापासून ठाण्यात चिकार 'पोळीभाजी केंद्रं' सुरू झाली. ह्या दुकानांच्या नावांमधला 'पोळी' हा शब्द बघून माझा समज होता की उच्चवर्णीय, विशेषतः ब्राह्मण ह्या व्यवसायात खूपच सुरुवातीला आले. दुसरं कारण असंही असणार की शहरी भागांत ममवंची क्रयशक्ती आधीपासूनच जास्त होती. त्यामुळे त्यांच्या रुचीचं अन्न तयार मिळायला सुरुवात आधी झाली. चपाती-भाजी न विकता, पोळी-भाजी विकणं हे त्याचं दृश्य लक्षण.
मला आठवतंय तेव्हापासून, म्हणजे १९८०च्या दशकाची शेवटच्या काही वर्षांपासून आई ठाण्यातल्या ठार ब्राह्मणी भागातल्या एका परचुरे आजींकडून भाजणी दळून आणायची. बाकी पिठं साध्या गिरणीत जात, भाजणी परचुरे आजींकडे. आजी पापड, सातूचं पीठ वगैरे विकत असत. मग पुढे सुनांनीसुद्धा व्यवसाय वाढवला.
ही सगळी सांगोवांगीच. मी ठाण्यातल्या पूर्वापार संघी मोहोळ असणाऱ्या ब्राह्मणी भागातच वाढले. ठाण्याच्याच नाखवा वस्तीच्या भागात काय चालायचं, महागिरी ह्या मुस्लिमबहुल भागात काय चालायचं, काय चालतं ह्याचा मला आजही अजिबात पत्ता नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वैविध्य
आपल्या रोजच्या जेवणात नसलेल्या पदार्थांची पार्सल सेवा सुरू करण्यातच बरेच नवे लोक उतरले आहेत, हे विशेष. यात थाई, मेडिटेरेनिअन, व्हिएतनामी, टर्किश वगैरे बरेच प्रकार दिसतात. शिवाय केक्स, कुकीज, पाइज इ. जिन्नसही. पोळी- भाजी, कोरडे पदार्थ, पिठं, पापड, लोणची वगैरे बरेच लोक आधीपासून करतात.
...
कधी या लोकांचा औटपुट चाखून पाहिला आहेत काय? ऑथेन्टिसिटीच्या स्केलवर नक्की कोठे बसतो, या दृष्टीतून? नाही, सहज कुतूहल म्हणून विचारतोय.
उगाच देवदत्तची ती तैवानीज क्विझीनवाली कथा आठवून गेली.
(तसेही, भारतात 'चायनीज' या नावाखाली जे काही मिळते, ते 'इंडियन चायनीज क्विझीन' हे एक स्वतंत्र क्विझीन म्हणून आजकाल गणले जाऊ लागले आहे.)
(खूपखूप पूर्वी, अर्ली २०००ज़मध्ये, विलेपार्ले (पूर्व) मध्ये, 'मेक्सिकन'च्या नावाखाली काहीतरी पनीर घातलेले खाल्ल्याचे आठवते. 'शिंचे मेक्सिकनच्या नावाखाली काय खपवून देतात ते तरी पाहू' म्हणून गेलो होतो. त्यांच्या शिंचेपणाचे सार्थक झाले. इथे कोणाला पत्ता लागणार आहे? आणि, पत्ता लागणारे, मेक्सिकन कशाशी खातात याची कल्पना असणारे आमच्यासारखे किती असतात? ते एकतर दोनतीन वर्षांतून एकदा क्वचित कधीतरी भारतात टपकणार; त्यात यांच्या सेवेचा लाभ ते घेण्याची शक्यता शून्यवत किंवा अत्यंत नगण्य. म्हणजे, धंदा त्यांच्या जिवावर तर चालत नाही. मग ते बोंबलले, तरी विक्रेत्याने त्यांची पर्वा का करावी? इथे इतका जो क्लूलेस जनसागर पसरलेला आहे, तीच खरी मायबाप गिऱ्हाइके, आश्रयदाते. द्या त्यांना खपवून काहीपण. निमूटपणे खातात, नि पुन्हा आणखी मागतात. चलता है, हिंदुस्तान है| तो फिर, चलते रहने दो|)
==========
किंवा मग, दुसरी शक्यता म्हणजे, यदाकदाचित चुकून हे ऑथेंटिक असलेच (विच आय सीरियसली डाउट), तर तो अन्य देशांत काही काळ राहून परत येऊ लागलेल्या भारतीयांच्या वाढत्या जनसंख्येचा परिणाम असावा काय? आणि, बहुतकरून असे आंत्रप्रनूर हे बहुतांशी भूतपूर्व एनाराय असावेत काय? परंतु, भूतपूर्व एनाराय आंत्रप्रनूर आणि भूतपूर्व एनाराय गिऱ्हाइके या काँबिनेशनचा, धंदा सस्टेन होऊ शकेल इतपत क्रिटिकल मास अद्याप निर्माण झाला आहे काय? (खास करून कोथरुडासारख्या ममव ठिकाणांत?) मला प्रचंड शंका आहे.
पैशाची चणचण भासू लागल्यावर
पैशाची चणचण भासू लागल्यावर खूप काही स्किल न लागणारा*/स्किल आधीच उपलब्ध असणाऱ्या, घरच्या घरी करता येणाऱ्या आणि ज्यात मंदी फारशी येत नाही अशा खाद्यपदार्थ बनवणे/विक्री करणे या व्यवसायात उतरण्याचा कल हा अगदीच सामान्यपणे दिसतो. गृहिणींसाठी तर मोस्ट इझी** "वाटणारा" पहिला ऑप्शन हाच असतो.
गिरणगावात देखील कामगारांच्या महिलांनी शेव, फरसाण, लोणची, पापड हे उद्योग सुरू केले होते. त्या भागात लक्षणीय प्रमाणात ही दुकाने दिसतात.
*या विधानामुळे अनेक सदस्य दुखावतील याची कल्पना आहे.
** वकील श्री सुधाकर यांनी श्री तळीराम यांच्या सहयोगाने संसाराची वाताहात केल्यावर सौ सिंधू यांनीही इतरांची दळणे दळून देण्याचा मार्ग स्वीकारला होता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
.
सोपा वाटण्यापेक्षा शक्यतेच्या कोटीतला, accessible असलेला उद्योग म्हणता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
!
निर्दिष्ट विधानामुळे भावना दुखावल्या नाहीत. मात्र:
दारू पिण्याची तुलना करोना साथीशी केल्याबद्दल तीव्र निषेध!!!
(तसेही, स्वत: मजबूत पिणाऱ्या गडकऱ्यांनी 'एकच प्याला' लिहून आत्यंतिक भंपकपणा केला आहे१, हेमावैम. आणि, सिंधूचे पात्र हे त्या काळाकरितासुद्धा आत्यंतिक बुळचट दाखविण्याबद्दल स्त्रीवाद्यांची मते ऐकावयास आवडतील. असो.)
==========
१ हा म्हणजे, एकीकडे 'सारे जहाँ से अच्छा' लिहिणाऱ्याने दुसरीकडे विभक्त मुस्लिम राज्याची (पर्यायाने, 'पाकिस्तान'ची) संकल्पना मांडण्याच्या तोडीचा भंपकपणा झाला, हेमा-आणखीएक-वैढुं. (आता, 'सारे जहाँ से अच्छा' लिहिणे आणि 'पाकिस्तान'ची संकल्पना मांडणे, यांपैकी मजबूत दारू पिणे कोणते नि 'एकच प्याला' लिहिणे कोणते, हे तुम्हीच ठरवा!)
आपल्या रोजच्या सवयीचे आणि
आपल्या रोजच्या सवयीचे आणि हातात बसलेले सोडून इतर पदार्थ बनवणे, ते प्रस्थापित हॉटेलांच्या स्पर्धेत विकणे, आणि त्यातून अर्थार्जन करणे ही 'मोस्ट इझी' गोष्ट नाही, असा माझा समज आहे. कोणी त्यावर informed comment केली तर वाचायला आवडेल.
सुरुवात तरी रोजच्या नसली तरी
सुरुवात तरी रोजच्या नसली तरी नेहमी बनवत असलेल्या पदार्थांनी होते असे निरीक्षण आहे. नॉनव्हेज न बनणाऱ्या घरातील गृहिणी एकदम पापलेट फ्राय किंवा मटन बिर्याणीचा व्यवसाय सुरू करत नाही. सुरुवात सहसा मोदक, चकल्या, पुरणपोळयांनी होते.
आमची एक मैत्रीण नव्यनेच खाद्यपदार्थांचा व्यवसाय करू लागली आहे. पण ती स्वत: पदार्थ बनवत नसून ॲग्रिगेटर म्हणून व्यवसाय करीत आहे. त्यामुळे तिच्या पोर्टफोलिओ मध्ये खूप विविध पदार्थ सुरुवातीपासून आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शंका
सध्या कोव्हिडच्या माहौलात रेष्टॉरंट उद्योगाची अवस्था काय आहे, कितपत रेष्टॉरंटे चालू आहेत, नि जी आहेत, तेथे तरी प्रत्यक्ष जाऊन बसून खाऊ इच्छिणारे ग्राहक कितीसे उरले आहेत, हा एक प्रश्न. म्हणजे, प्रस्थापित रेष्टॉरंटांमध्ये सशक्त स्पर्धक (किंवा 'खरी काँपिटीशन') म्हणून गणले जाण्याइतकी ताकद आता उरली आहे का, असे विचारायचे आहे.
माझ्या अंदाजाने, भारतात तूर्तास नक्की काय परिस्थिती आहे, याची मला कल्पना नाही, परंतु, इथे जॉर्जियात तरी मी जे काही पाहातो आहे, निदान त्यावरून तरी, आता तुरळक रेष्टॉरंटे जरी (एकाआड एक टेबलांवर फुल्या मारून) हळूहळू आत बसून खाण्यासाठी उघडू लागली असली, तरीही, बहुतांश रेष्टॉरंटे जी अद्याप तग धरून आहेत, ती बहुतकरून टेकआउट ऑर्डर्स तथा थर्ड पार्टी डेलिव्हरी सर्व्हिसच्या ऑर्डर्स यांच्या जिवावर (कशीबशी) टिकून आहेत. आता, खरे तर या रेष्टॉरंटांची खरी मजा ही तेथे जाऊन, त्या आंबियान्समध्ये बसून खाण्यात. मला जर पार्सलच आणायचे असेल, आणि ते मला जर कोणी माझ्या कॉलनीतच बनवून देणार असेल, तर मग मी कशाला झक मारायला दूरवरच्या त्या प्रस्थापित रेष्टॉरंटात जाईन? किंवा तेथून डेलिव्हरीकरिता अवाच्या सवा चार्जेस मोजेन?
हे झाले कोव्हिडमुळे. परंतु, कोव्हिड नसलेल्या, सुबत्तेच्या परिस्थितीतसुद्धा, ही प्रस्थापित रेष्टॉरंटे ही खरोखरच या घरगुती सेक्टरला काँपिटीशन (किंवा व्हाइसे व्हर्सा) आहेत का? यांचे क्लायंटेल नि त्यांचे क्लायंटेल हे निराळे नव्हे का? किंवा, यांच्याकडून विकत घेण्याची ग्राहकाची मूलभूत उद्दिष्टे नि त्यांच्याकडून विकत घेण्याची ग्राहकाची मूलभूत उद्दिष्टे ही निराळी नव्हेत काय? मुळात हे दोन सेक्टर एकमेकांच्या पायांवर पाय खरोखरच देतात काय?
(ही कमेंट इन्फॉर्म्ड आहे, असा माझा मुळीच दावा नाही. फक्त, माझ्या अधिकारातून१ माझा अंदाज वर्तवला, इतकेच.)
----------
१ व्यक्त होण्याचा अधिकार. फॉर व्हॉटेव्हर इट इज़ वर्थ.
नबा, मीही व्यक्त होण्याच्या
नबा, मीही व्यक्त होण्याच्या अधिकारातून सांगते. मला फार माहिती नाही. प्रस्थापित चायनीज/मेडिटेरेनिअन/ इतर हॉटेलं किंवा पिझ्झा जॉइन्ट्स स्वीगी, झोमॅटो अथवा तत्सम डिलिव्हरी पार्टनर करवी पार्सल पाठवतात. त्यांची माणसं खूपदा दिसतात बिल्डिंग अथवा रस्त्याने जा ये करताना. शिवाय हे लोक डिस्काउंट स्कीम्स देत राहातात. त्यामुळे लोक हॉटेलातून खाणं मागवतात. घरगुती व्यवसाय करणाऱ्या लोकांना डंझो सारख्या सेवा पार्सल पोहोचवण्यासाठी वापरता येतात. भारतात या सेवा वापरण्याचा खर्च फार नाही. परंतु बहुतेक घरगुती उद्योग चोवीस तास आधी मागणी नोंदवायला सांगतात, जे बऱ्याच लोकांना अडचणीचं वाटतं. बिर्याणी वगैरे सारखे प्रकार पूर्वी दिवस ठरवून ऑर्डर केले जायचे. आता जास्त लोकांना बोलावून खाण्यापिण्याचे कार्यक्रम कमी झाले आहेत. त्यामुळे छोट्या कुटुंबाचे प्लॅन्स ऐनवेळी ठरतात. त्यात मुलं आणि आईवडील यांना वेगवेगळं काही हवं असेल तर ते चोवीस तास आधी प्लॅन सहसा केलं जात नाही.
शिवाय आजकाल खाद्यान्न व्यवसायात FSSAI प्रमाणपत्र असण्याबद्दल लोक जागृत असतात. म्हणजे अन्नाच्या दर्जाची थोडीतरी खात्री. नाहीतर ओळखीच्या व्यक्तीकडून निव्वळ विश्वासाच्या आधारावर अन्न मागवलं जातं.
अचानक आलेल्या संकटात
गाडी खरेदी,घर खरेदी,गुंतवणूक अशा गोष्टीत लोकांनी विचार करून ,प्लॅन करून गुंतवणूक केली होती.
पद्धतशीर नियोजन केले होते.
पण ह्या covid 19 मुळे लोकांची आर्थिक गणित बिघडले आहे.
खूप लोकांची आर्थिक आवक कमी झाली आहे आणि ती लवकर सुधारेल ह्याची खात्री नाही.
हफ्ते भरणे,घर खर्च चालवणे अवघड झाले आहे.
आणि बिकट आर्थिक संकट उभ आहे.
निव्वळ
निव्वळ पूर्वसंचिताच्या व्याजावर जगणाऱ्या आणि व्यवसाय केल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड वा पेन्शन नसलेल्या, माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तींना कठीण दिवस आले आहेत.