"द डिसायपल" : नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती
चैतन्य ताम्हाणे यांच्या "द डिसायपल" या मराठी सिनेमाला व्हेनिस चित्रपटमहोत्सवात महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तो सिनेमा पाहाण्याची उत्सुकता वाढली होती. त्या आधी हा सिनेमा हिंदुस्तानी गायकी, गुरुशिष्य परंपरा यांच्याशी संबंधित आहे हे कळलेलं असल्याने या जिव्हाळ्याच्या विषयांवर असणारा हा सिनेमा पहायचा हे ठरलेलं होतंच.
काल एका ऑनलाईन पोर्टलवर, अधिकृतरीत्या प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहायला मिळाला. तो विशेष आवडला.
स्पॉईलर अलर्ट> या पुढील परिच्छेदांमधे कथानक, व्यक्तीरेखा, आणि अन्य पैलूंबद्दल बोलताना त्यातला काही भाग कळतनकळत उल्लेखला जाणार आहे. सिनेमा पहायची इच्छा असलेल्यांनी हा भाग नाही वाचला तरी चालेल.
शास्त्रीय संगीताची लहानपणापासून आवड जोपासलेल्या, पुढे आपल्या उमेदीची सगळी वर्षं शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या शरद नेरूळकरचा प्रवास इथे चितारलेला आहे. त्याच्या गुरुजींशी, आई वडलांशी, आजीशी , त्याच्या समकालीनांशी आणि मग पुढे त्याच्याकडून संगीत शिकणार्यांशी असलेले त्याचे संबंध त्यात येतात.
सिनेमा मेनस्ट्रीममधला नाही. कथानायक आपल्या नेत्रदीपक कर्तृत्वाने सरकारदरबार जिंकतो, जग जिंकतो, प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोचतो आणि या प्रवासात परीकथेप्रमाणे घटना घडतात ते इथे नाही. त्याच्या गुरुजींवर आणि गुरुंच्या गुरुंवर त्याची श्रद्धा आहे पण इथे श्रद्धेचे उमाळे नाहीत. हयात असलेल्या आणि दिवंगत व्यक्तींचं दैवतीकरण नाही. आपला हिरो हळुहळू तारुण्यातून प्रौढत्वाकडे जातो. कोवळेपणाचे थर गळतात. तो शरीराने काहीसा निबर बनतो. थोडा मनाने सुद्धा.
पैसा, प्रसिद्धी, कलात्मक यश याच्यात आपला हिरो कुठे शिखरावर पोचत नाही. निम्न आर्थिक स्थितीतून आलेला असतानाही, शास्त्रीय संगीताचा शिक्षक हा व्यवसाय म्हणून निवडतो आणि ते बनायच्या आधीची वर्षंसुद्धा शास्त्रीय संगीताच्या सीडीज विक, मैफलींमधे गा, आयोजक लोकांशी संबंध निर्माण करून काही काम मिळवता येतं का ते पहा असेच प्रयत्न करतो. त्याची मिळकत मोजकी आहे आणि ती तशीच राहाते. थोडं उशीरा का होईना, पण लग्न, संसार सुरू होतात पण तो असतो नि राहातो संगीताचा शिक्षक.
ज्यांच्यावर मूकपणे प्रेम केलं, ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली ते गुरुजी आणि कधी न भेटलेल्या गुरुजींच्या गुरु "माई" - ज्यांची फक्त भाषणं त्याने ऐकली आहेत - तेही वयोपरत्वे दुरावतात, त्यांच्याबद्दलची मिथकं कुठेतरी असत्य आहेत की काय असा भास होतो.
आणि या सर्वाची निवड करून झाल्यावर , हे सर्व पाहत, अनुभवत असताना त्याचा जीवनप्रवास चालू राहातो.
स्पॉईलर अलर्ट समाप्त>
सिनेमा पाहाण्यापूर्वी शास्त्रीय संगीताचा पाया असलेले, "कट्यार काळजात घुसली", "बालगंधर्व"यांसारखे गेल्या काही वर्षांमधे येऊन गेलेले सिनेमे आठवले. "डिसायपल" सुरू झाला आणि जाणवलं की हा सिनेमा त्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. (याचा अर्थ "कट्यार काळजात घुसली", "बालगंधर्व" हे वाईट आणि "डिसायपल" थोर असं मला म्हणायचं नाही. इतकं बटबटीत विधान करायचं नाहीये. )
सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पडलेले प्रश्न, आपल्याला पडलेली कोडी सोडवायचा हा प्रयत्न आहे असं मला वाटलं. हा सिनेमा पैसे कमावणार नाहीये आणि तशी त्याची प्रतिज्ञा नाहीये. मात्र कथानायक जितक्या प्रामाणिकपणे हिंदुस्तानी संगीताकडे आणि पर्यायाने आपल्या आयुष्याकडे पाहातो तितक्याच खरेपणाने सिनेमादेखील बनवला आहे असं मला कुठेतरी वाटलं.
कलेशी असलेलं आपलं नातं नेमकं काय असतं? कलेमधे मिळालेलं यश अपयश म्हणजे काय? लौकिक यशापयशाला जरी बाजूला ठेवलं तरी कलेतून काहीएक अर्थ लावण्याचा हेतू या गोष्टीच्या संकल्प आणि सिद्धीला काही अर्थ आहे कां? कलेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करत ठेवणं ही गोष्ट In and Of itself श्रेयसात्मक आहे का? मग ते करत असताना - किंवा ते केल्यामुळे - एक अत्यंत सामान्य , काहीसं उपेक्षित, अनामिक आयुष्य बनत गेलं तर ते श्रेयात्मक की निरर्थक? आणि असं जगत असताना आपल्या आजूबाजूच्या झपाट्याने बदलत असणार्या जगाशी आपला सांधा कसा राखून ठेवायचा? शरीरा-मनाच्या भुकांचं आणि मुख्य म्हणजे अतृप्तीचं आणि क्वचित कधीकधी खिंडीत गाठणार्या हपापलेपणाचं काय करायचं?
"द डिसायपल" ने हे प्रश्न मनात जागे केले. ते करत असताना जे समोर उलगडत गेलं त्यामधे कमालीचा संयम मला जाणवला. चैतन्य ताम्हाणे नावाच्या जेमतेम तीशीत असलेल्या माणसाकडे इतका संयम कसा आला असेल?
थोडं हिंदुस्तानी संगीत आयुष्यात ऐकलं आहे. थोडं शिकून पाहिलं आहे. त्यात "ठहराव" या गोष्टीला अपरिमित महत्त्व आहे. स्वरांच्या लगावामधे एक घनगंभीरता हवी असं मानलं जातं. शुद्धतेइतकंच या घनतेला खूप महत्त्व आहे. "द डिसायपल"ची निर्मिती, लिखाण , दिग्दर्शन करणार्यांना हा ठहराव गवसला आहे. अरुण द्रवीड या बुजुर्गाची गायकी आणि त्यांचा अभिनय मला आवडला. आणि मुख्य रोल केलेल्या आदित्य मोडकला आलिंगन द्यावं असं मला चित्रपटाच्या शेवटी वाटलं.
शरद नेरूळकरच्या या प्रवासामधे दिवंगत माईंनी दिलेल्या भाषणांची त्याला सोबत आहे. माईंची ही भाषणं मला अर्थसंपृक्त वाटली. त्याचा एक हिप्नॉटिक इफेक्ट - किमान मला - जाणवला. सार्या चित्रपटाचा जणू बोधस्वर म्हणजे ही उधृतं आहेत. सुमित्रा भावेंनी त्याकरता आपला आवाज दिलेला आहे. मला हा भाग परतपरत पाहावा वाटला.
सिनेमाबद्दल जे वाटतं ते याहून अधिक आहे पण सांगता येत नाही. माझे शब्द संपले. शरद नेरूळकर या कथानायक कसा विचार करत असेल ते सांगणारी शंकर रामाणींची एक मला अतिशय आवडणारी कविता देतो आणि समारोप करतो.
एकल्याने गावें
एकट्याचे गाणें;
परक्याचे नाणें
खरें-खोटें.
खरी आहे फक्त
नागवली काया
हंबरते माया
एकट्याची.
एकट्याच्या तेथे
उधळल्या वाटा
चढणीच्या घाटा
अंत नाही.
ललित लेखनाचा प्रकार
थोडा अपेक्षाभंग
हा सिनेमा मला माझ्या IPTV connection वर मिळाला आणि प्रस्तुत लेख येथे येण्याच्या दोनच दिवस आधी मी तो पाहिला होता. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंचा 'कोर्ट' मी ह्यापूर्वी पाहिला होता आणि हा दिग्दर्शक काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो हे तेव्हाच ध्यानात आले होते.
ह्या चित्रपटातहि वेगळेपण आहे. शास्त्रीय संगीताला वाहून घेण्याच्या इच्छेने प्रेरित अशा तरुणाचा हा प्रवास आहे. संगीताचा वारसा त्याला आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे आणि वडिलांचे गुरु हेच त्याचेहि गुरु आहेत. (ही भूमिका किशोरी आमोणकारांचे शिष्य आणि अमेरिकेतील उच्चपदस्थ - सध्या निवृत्त - अरुण द्रविड ह्यांनी केली आहे.)
चित्रपट पाहिल्यानंतर मात्र 'इतका वेळ घालवून हातात काय मिळाले' अशी खंत मागे राहिली. ह्याचे कारण म्हणजे कोठल्याच भूमिकेस खोली अशी नाही. शरद नेरुळकर शास्त्रीय संगीताला आपली करियर करण्याचा प्रयत्न करतांना दिसतो पण त्यासाठी लागणारी कुवत त्याच्यापाशी नाही. त्यामुळे उमेदवार गायकांच्या स्पर्धेत त्याला तिसरा क्रमांक मिळतो. गाण्याच्या बैठकीत गायला बसतो पण त्याला गायला सुरुवातच करता येत नाही त्यामुळे बैठक सोडून तो चक्क निघून जातो. त्याच्या गुरुजींनाहि गायनक्षेत्रामध्ये काही विशेष प्राप्त झाले आहे असे जाणवत नाही कारण ते आपल्या समोर असतात तेव्हा चाळीमधल्या एक खोलीवजा आपल्या घरामध्ये बसून ते गाण्याचा क्लास चालवितांना दिसतात.
शास्त्रीय संगीताला निष्ठा वाहिलेल्या ह्या दोघांची ही स्थिति का होते ह्याचे उत्तर चित्रपटातच सूचित केलेले सापडते. सर्व नव्या गायकांना Sa Re Ga Ma Pa L'il Champs किंवा America's Got Talent असल्या TV Shows आपण चमकावे असे वाटत असते. ह्यातून मिळणारे प्रसिद्धीचे वलय आणि पैसा शास्त्रीय संगीत देऊ शकत नाही ही वस्तुस्थिति आहे. वर उल्लेखिलेल्या उमेदवार गायकांच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारी मुलगी लगेचच टीवीवरील L'il Champs प्रकारच्या कार्यक्रमाकडे आकर्षिली जाते. शास्त्रीय संगीताचा निष्ठावंत शरद नेरुळकर ह्या स्पर्धेत मागे राहतो पण तो मागे राहतो ह्याचे कारण हे आहे की त्याच्यामध्ये कसलीच कुवत मुळातच नाही.
आपल्या संगीतसाधनेचे वैयर्थ्य केव्हातरी शरद नेरुळकरच्या लक्षामध्ये आलेले असावे कारण चित्रपटाच्या शेवटाशेवटाकडे त्याने संगीताच्या सीडीज करून विकायचा व्यवसाय सुरू केलेला दिसतो आणि त्यामध्ये त्याला माफक यशहि आलेले दिसते. पण हा सांधाबदल का आणि कधी घडला ह्याचे कसलेच स्पष्टीकरण - प्रत्यक्ष वा सूचित - चित्रपटामध्ये नाही.
अशा प्रकारे चित्रपटाला पुरेशी खोली न मिळाल्यामुळे चित्रपट निराशाजनक वाटतो.
कला आणि करिअर पोटापाण्याचा व्यवसाय
सर्वांनाच यश येते असे नाही हे दाखवायचे असेल.
स्पर्धा कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर 'केतकी माटेगावकर'ने केलेला सांंधाबदल यशस्वी झाला. तसे करवण्यात तिचे वय आणि पालकांचे संस्कार1 कारणीभूत झिले असतील.
#1 -वेगळ्या अर्थाने "ती एक गंमत असते, करिअरचा शेवट नसतो" हे सांगून तयार मानसिक तयारी करवली असेल. तिच्या बरोबरच्या इतर कलाकारांनी केतकीचा कित्ता उशिरा गिरवला.
New York Film Festival
ह्या चित्रपटाविषयीची चैतन्य ताम्हाणे ह्यांची New York Film Festival मधील मुलाखत येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=EaQhPPw8tuQ
काल बीएफआयच्या कृपेने बघायला
काल बीएफआयच्या कृपेने बघायला मिळाला. चित्रपट हे मला 'कळणारं' माध्यम नाही. (मुख्यत्वे माझ्या आळसामुळे.) त्यामुळे खालील मतं मिठाची चांगली धार सोडून घ्यावीत. शिवाय - स्पॉयलर अलर्ट वगैरे.
***
शास्त्रीय संगीत वगैरे बाजूला केलं तर या सिनेमाची थीम अत्यंत परिचित आहे.
एखाद्या क्षेत्रात 'सरासरीपेक्षा सरस' असलेल्या, पण 'सर्वोत्कृष्ट नसलेल्या' व्यक्तीची शरद नेरूळकरसारखी फरपट होणं अनेकदा पाहायला मिळतं. आपल्या क्षेत्राचं शिखर 'दिसतं' पण तिथे पोचता येत नाही. सुरुवातीला आत्मवंचना (denial) होते. शिखर कष्टसाध्य आहे या भावनेने आयुष्यातल्या अन्य गोष्टींवर पाणी सोडून 'शिखरा'च्या पाठीमागे धावणं होतं. आणि हळूहळू जाणीव कानाखाली जाळ करून जाते, की बाबा, you were always a 'maybe'. 'तिथे' पोचण्याएवढं पाणी तुझ्या आडात नाही.
एका लिमिटपलिकडे स्वत:ला फसवणं शक्य नसतं. कष्टांसाठी ज्या इतर गोष्टींवर पाणी सोडलं त्याच गोष्टी आजूबाजूच्या व्यक्तींच्या लौकिक यशामध्ये मोजल्या जातात, आणि त्या नसतात म्हणून आपल्याला यशस्वी गणलं जात नाही.
म्हणजे एकीकडे स्वत:च्या लेखीही यशस्वी नाही, आणि समाजाच्या लेखीही नाही. कडवटपणा आणि नैराश्य दारावर धडका देत असतं, अशा क्षणी. त्या मानाने शरद नेरूळकराने हे स्थित्यंतर चांगलं हाताळलं आहे.
कोल्हटकरकाकांना पडलेला "पण हा सांधाबदल का आणि कधी घडला ह्याचे कसलेच स्पष्टीकरण - प्रत्यक्ष वा सूचित - चित्रपटामध्ये नाही." हा प्रश्न मला पडला नाही, कारण हे वरचं सगळं. सांधाबदल हा एक साक्षात्काराचा क्षण क्वचितच असतो. साठून येतं, आणि एका क्षणी असह्य होतं.
***
(पट)कथा जास्त बांधीव असती तर मला आवडलं असतं. सिनेमात शरद नेरूळकर हाच फोकल पॉईंट आहे. (शरदचा स्क्रीन प्रेझेन्स भागिले सिनेमाची लांबी हे गुणोत्तर किमान ८०% तरी असावं.) त्याच्या आजूबाजूची पात्रं शरदच्या रेफरन्सने येतात आणि जातात. शरद वगळता कोणालाच 'कॅरेक्टर आर्क' अशी नाही.
पण कित्येकदा पार्श्वभूमीचे बारकावे मुख्य पात्राला खोली देऊन त्रिमित करतात. उदा० शेवटाकडे एकाच प्रसंगापुरतं येणारं 'जोशी' हे पात्र चेखॉव-बंदूक-तंत्राने आधीच सूचित करून ठेवलं असतं तर आवडलं असतं. शरद आणि त्याच्या सहाध्यायांचे व्यक्तिगत संबंध हाही भाग रंगवलेला आवडला असता.
अर्थात, 'हर गार्डाची न्यारी शिट्टी...'
***
एकंदर बघता, 'कोर्ट'इतकाच आवडला.
+१
पण हा सांधाबदल का आणि कधी घडला ह्याचे कसलेच स्पष्टीकरण - प्रत्यक्ष वा सूचित - चित्रपटामध्ये नाही
मला वाटतं बरेच छोटेछोटे क्षण एकत्र बेरीज होऊन हे घडलेलं आहे - त्याचं बैठकीतून उठून जाणं ही शेवटची काडी.
----------
एका लिमिटपलिकडे स्वत:ला फसवणं शक्य नसतं. कष्टांसाठी ज्या इतर गोष्टींवर पाणी सोडलं त्याच गोष्टी आजूबाजूच्या व्यक्तींच्या लौकिक यशामध्ये मोजल्या जातात, आणि त्या नसतात म्हणून आपल्याला यशस्वी गणलं जात नाही.
आबांशी सहमत -
मला प्रश्न आहे थोडा वेगळा. बाकी चित्रपटात मला शरदचा संभ्रम जाणवला - नक्की काय करायला हवं म्हणजे मला हवं ते मिळेल?
इतर क्षेत्रांतही हे प्रश्न पडतच असतील (चित्रपट, नाटक, लेखन इ.). पण त्यात आणि शास्त्रीय संगीतात एक महत्त्वाचा फरक म्हणजे गुरूशिष्य परंपरा हा आहे.
त्यामुळे मला चित्रपटातला काही भाग नीटसा उमगला नाही असं वाटतंय.
उदा.
जोशी हे शास्त्रीय संगीताचे समीक्षक/रेकॉर्ड कलेक्टर असलेलं पात्र "शास्त्रीय संगीतात हे शोषण होतंय ते थांबवायला हवं. उगाच काही तरी मिथ्स बनवून ठेवलीत, माई खरं तर अप्रतिम गायच्या पण वेड्या होत्या- प्रेक्षकांसाठी गायचं नाही असं कुणी कलाकार करील का?" हे सगळं बोलतं तेव्हा ते खरंच आहे का?
माईंचं संगीताबद्दलच्या खडतर वाटचालीचं वर्णन, निष्ठा आणि निर्मोही मनाने कलेची आराधना करणं हे सगळं २०-२१व्या शतकात बसतं का? मग ते तसंच ऐकून शरदने भलतंच खूळ मनात घेतलंय का?
माई फ्रॉड आहेत हे जोशींचं मत शरदसाठी जास्त दु:खदायक आहे की माई फ्रॉड नसून त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाण्याची आपली कुवत नाही ही जाणीव जास्त दु:खद आहे हाही एक पॉईंट.
=======
पुन्हा एकदा पाहीन. मोटरसायकलवरची दृष्य भारी- आणि शेवटलं गाणंही.
कोर्ट नक्कीच जास्त आवडलाय.
हिंट
जोशी हे शास्त्रीय संगीताचे समीक्षक/रेकॉर्ड कलेक्टर असलेलं पात्र "शास्त्रीय संगीतात हे शोषण होतंय ते थांबवायला हवं. उगाच काही तरी मिथ्स बनवून ठेवलीत, माई खरं तर अप्रतिम गायच्या पण वेड्या होत्या- प्रेक्षकांसाठी गायचं नाही असं कुणी कलाकार करील का?" हे सगळं बोलतं तेव्हा ते खरंच आहे का?
माईंचं संगीताबद्दलच्या खडतर वाटचालीचं वर्णन, निष्ठा आणि निर्मोही मनाने कलेची आराधना करणं हे सगळं २०-२१व्या शतकात बसतं का? मग ते तसंच ऐकून शरदने भलतंच खूळ मनात घेतलंय का?
काही हिंट देतो : चित्रपटात गुरूची भूमिका करणारे अरुण द्रविड स्वतः प्रत्यक्ष आयुष्यात किशोरी आमोणकरांचे शिष्य होते. त्या आणि त्यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर दोघी गायिका म्हणून जितक्या प्रतिभावान तितक्याच गुरू म्हणून अतिशय कडक म्हणून (कु)प्रसिध्द होत्या. किशोरीताई जेव्हा 'गीत गाया पत्थरोंने'मधलं गाणं गाऊन आल्या तेव्हा त्यांना मोगुबाई अद्वातद्वा बोलल्या हा किस्सा प्रसिद्ध आहे. त्यानंतर कधीही किशोरीताई सिनेमासाठी गायल्या नाहीत. मोगुबाईंना माई म्हणत. आता आज जर असा विचार केला, की किशोरीताईंच्या मोठ्या शिष्यगणांपैकी कुणाला तशी उंची गाठता आली, तर कुणी समोर येतं का? तुम्ही यापूर्वी कधी अरुण द्रविड यांचं नाव तरी ऐकलं होतंत का? द्रविड आयआयटी आणि नंतर एमआयटीत शिकून अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचं पोट संगीतावर नाही, तर इंजिनियरिंगवर चालतं.
धन्यवाद चिं.ज.
मला शास्त्रीय संगीतातलं काहीच समजत नाही. त्यामुळे गायक आणि त्यांची गायकी ह्याबद्दल इल्ले.
चित्रपटातल्या माईंचा काळ १९५० आसपास, शरदच्या वडलांचा काळ १९८० आणि शरदचा काळ २०१०
कदाचित माईंनी म्हटल्याप्रमाणे संगीताची आराधना निव्वळ स्वत:साठी करून जगणं १९९० पूर्वी शक्य असेल - आसपासचे लोकही साधारण हिंदू रेट ऑफ ग्रोथनेच सुबत्ता मिळवत होते.
पण शरदला हे अमलात आणणं अशक्य होईल अशी परिस्थिती आहे - निव्वळ स्वत:करिता गायन - आयुष्यभर संगीताची आराधना करणं क्वचितच एखाद्या प्रतिभावंताला शक्य होईलही (ति.मांच्या प्रतिसादातली तिसरी कॅटेगरी) पण शरदचा वकूब साधारण असल्याने त्याला हे कधीच जमणार नाही.
ती तफावत वाढतच जाईल.
---------------
अरुण द्रविड ह्यांच्या कॅरेक्टरची थोडी उलगड झाली असती तर आणखी आवडलं असतं. गुरुजी चित्रपटात शरदच्याच दृष्टीकोनातून दिसतात, त्यांची स्वत:ची संगीताबद्दलची मतं कधीच कळत नाहीत (ते माईंचेच शिष्य असल्याने माईंच्याच मार्गावर चालत आहेत, असं वाटतं). पैशाचा मोह न करता जमेल तसा प्रामाणिक प्रयत्न करत रहाणं - हे गुरुजींना जमून गेलं, पण शरदला तेही जमणार नाही.
बारकावे
अरुण द्रविड ह्यांच्या कॅरेक्टरची थोडी उलगड झाली असती तर आणखी आवडलं असतं. गुरुजी चित्रपटात शरदच्याच दृष्टीकोनातून दिसतात, त्यांची स्वत:ची संगीताबद्दलची मतं कधीच कळत नाहीत (ते माईंचेच शिष्य असल्याने माईंच्याच मार्गावर चालत आहेत, असं वाटतं).
ते सुचवणारे अनेक बारकावे चित्रपटात आहेत. उदा. परदेशातून आलेल्या समीक्षकाला माई (माई म्हणून नाही, पण नावाने) चांगल्याच माहीत असतात, आणि त्यांची गायकी उत्तम होती हेदेखील त्याला मान्य असतं. पण हे प्रधान कोण ते त्याला माहीत नसतं; इतकंच नाही, तर त्यानं ते आवर्जून माहीत करून घ्यावं असं काहीही कारणही नसतं. त्यांना काही फारशी मैफलींची आवताणं वगैरे येत नसतात. केवळ संगीताच्या शिकवण्या घेत ते बऱ्यापैकी हलाखीत राहत असतात. थोडक्यात, माईंना लाभलेल्या लौकिकाचा अंशही त्यांना मिळालेला नाही. (तसा तो नायकाच्या वडिलांनाही मिळालेला नाही, पण त्यांनी ते क्षेत्रच सोडून दिलेलं आहे. प्रधानांचं तसं नाही.) प्रधानांचं गाणं ऐकलं तर ते ठीकठाक आहे, पण ब्रिलियंट अजिबातच नाही. त्यामुळे खूप टॅलंट असूनही त्यांच्यावर अन्याय झाला आहे, अशातलाही भाग नाही. म्हणजे, आपल्याला सिनेमात ही रुढार्थाने 'लूजर' असलेल्या लोकांची मांदियाळी दिसते; आणि त्यात आपला नायक हा अगदीच स्ट्रगलर पातळीवर राहिलेला, पार मध्यमवयीन होईपर्यंत.
माई खरं तर अप्रतिम गायच्या पण
माई खरं तर अप्रतिम गायच्या पण वेड्या होत्या- प्रेक्षकांसाठी गायचं नाही असं कुणी कलाकार करील का?" हे सगळं बोलतं तेव्हा ते खरंच आहे का?.. हे सगळं २०-२१व्या शतकात बसतं का
अन्नपूर्णादेवी म्हणून सतार वादक(शिक्षिका) होत्या. अत्यन्त फट्कळ आणि माणूसघाण्या होत्या म्हणतात. पंडित रवीशंकरांच्या पत्नी ( आणि त्यांच्या गुरूंची मुलगी/शिष्या ). त्यांनी केवळ एक का दोन पब्लिक परफॉर्मन्स केले. नंतर लोकांसमोर वाजवणे बंद केले. ( अभिमान हा अमिताभ-जया भादुरीचा सिनेमा रवीशंकर-अन्नपूर्णादेवी या जोडीवर लूजली आधारित आहे. ) त्यांच्याबद्दल देखील अनेक गूढकथा आहेत. सिनेमातले पात्र म्हणते की "माइंनी स्वत:च्या मुलालाही लोकांसमोर येऊ दिले नाही म्हणतात". रवीशंकर आणि अन्नपूर्णादेवी यांचा मुलगा होता त्यालाही म्हणे अनेक वर्षे शिकूनही पब्लिक परफॉर्म करू दिले नव्हते त्यांनी. (त्या मुलाचे नाव शुभो असे होते. याच नावाने सिनेमात एक किस्सा सांगितला आहे. रेल्वे प्रवासाचा फ्लॅशबॅक ) त्याखेरीच माईंचा एक विख्यात कलाकार शिष्य आधीपासूनच भारी होता वगैरे उल्लेख आहे. अन्नपूर्णादेवी या हरिप्रसाद चौरसियांच्या गुरू होत्या आणि ते अन्नपूर्णादेवींकडे शिकायला जायच्या आधीच तसे मोठे कलाकार होते. सो माई हे पात्र अटलिस्ट थोड्या प्रमाणात अन्नपूर्णादेवींवर आधारीत वाटते. अन्नपूर्णादेवी एक दोन वर्षांपूर्वीच वारल्या. सो त्या 20/21 व्या शतकातल्याच होत्या.
प्रत्ययकारी
चित्रपट बघितल्याशिवाय प्रतिक्रिया द्यायची नाही हे ठरवलं होतं. त्यानुसार आज चित्रपट पहाता आला. पाहिल्यावर राबांचं परीक्षण पुन्हा वाचलं. अतिशय सुंदर आणि प्रत्ययकारी वाटलं. हा चित्रपट धंदा करु शकणार नाही. पण संगीताच्या बाबतीतल्या अनेक बाबींवर मार्मिक भाष्य करणारा आहे. ज्यांना शास्त्रीय संगीताची ओळख आहे त्यांना यातले बारकावे जास्त चांगले समजतील.
मी लहानपणापासून आमच्या घरी चालणाऱ्या अनेक 'रविवार सकाळींच्या अनौपचारिक मैफिलींचा साक्षीदार आहे. हवशे-गवशे नवशे आणि थोर कलाकारांच्या अनेक मैफिली ऐकल्या आहेत. त्यांत अनेक मिडिऑकर कलाकारांच्या आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला पुनर्प्रत्यय देऊन गेला. संगीताचा गळा आणि त्यांतली बुद्धिमत्ता, ह्या दोन्हीची देणगी फारच थोड्यांना मिळते, बाकीचे अनेक ऑलसो रॅन, या कॅटेगरीत आयुष्य काढतात. सुदैवाने त्यातील बऱ्याच जणांना स्वत:च्या लिमिटसची जाणीव असते. काही महाभागांना तीही नसते. अशांचे अर्थातच, त्यांच्यापाठी हसं होतं.
कलाकारांचे मुख्यत: तीन प्रकार बघितले आहेत. काही कलाकार तसे पारंपारिक चांगलं गाणारे असतात, सुरांतही गातात पण नवनिर्मितीची क्षमता नसते. तरीही कमर्शियली यशस्वी होतात. काही प्रतिभावंत असतात पण पीआरओगिरी न जमल्यामुळे हल्लीच्या जगांत मागे पडतात. तर काही इतके अदभुत प्रतिभावंत असतात की त्यांची अद्वितीय कलाच त्यांना तारुन नेते. त्यांचे सर्व विक्षिप्त प्रकार, संगीतप्रेमी जनता, त्यांच्या कलेवरच्या प्रेमामुळे गोड मानून घेते. तर अशा या सांगितिक जगाचा एक वेगळाच लेखाजोगा मांडणाऱ्या ताम्हाणेंना सलाम!
व्हसेक पॉस्पीसिल
सिनेमाची कथा वाचून ‘व्हसेक पॉस्पीसिल’ची आठवण झाली. हा तीसेक वर्षें वयाचा कॅनडातला एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. जवळपास प्रत्येक ग्रॅँड-स्लॅममध्ये असतो, याचा अर्थ तिथपर्यंत पोहोचण्याइतकं नैपुण्य त्याने सातत्याने टिकवून धरलेलं आहे. पण एकदा तिथे गेला की फारतर दुसऱ्यातिसऱ्या राउंडपर्यंत पोहोचून हरतो. हे आता नित्याचं झालं आहे.
वयाच्या सातव्या वर्षापासून तो लहानसहान टूर्नामेंट्स जिंकत आला आहे, म्हणजे एकंदरीने पाहता लहानपणापासून त्याच्या स्वत:च्या आणि आप्तेष्टांच्याही आशाआकांक्षा खूप असणार. पण तितकं नाही जमलं आणि आता या वयात जमेलसं वाटतही नाही.
वास्तविक त्याचे आईवडिल कम्यूनिस्ट युरोपातून कातडी बचावून कसेबसे कॅनडात येऊन पोहोचले, आणि पैशाची बाजू भक्कम नसतानाही त्यांनी मुलाला टेनिस खेळायला शिकवलं अशी काहीतरी कथा आहे. तेव्हा जगन्नियत्याला काही लाज असेल तर व्हसेक पॉस्पीसिल विंबल्डन फायनलला पोहोचतो, आणि फेडररला पाचव्या सेटपर्यंत झुंजवून एक मॅचपॉइंट वाचवून शेवटी गवत चारतो, असा त्याच्या कारकीर्दीचा सिनेमॅटिक शेवट होईल. पण प्रत्यक्षात तसं काही होण्याची शक्यता फार कमी दिसते. There is something decidedly tragic about such a story, precisely because the hero is not so grand.
डोक्यात घर करून राहावा असा सिनेमा
मी आज आणि काल मिळून दोनदा पाहिला. बराच काळ डोक्यात घर करून राहावा असा सिनेमा आहे. संयम हा राबांना जाणवलेला गुणविशेष मलाही प्रकर्षाने जाणवला.
‘आदुबाळ’ यांचा प्रतिसाद विशेष आवडला, पण (पट)कथेमुळे त्यांना झालेला त्रास मला झाला नाही. दोन प्रकारच्या कथावस्तू मला आवडतात: एकतर बांधेसूद किंवा हेतुपुरस्सर बांधेसूद नसलेल्या.
परदेशी प्रेक्षकांना यातल्या काही जागा कळणार नाहीत असं वाटतं, पण इथेतिथे तसं होणं साहजिकच आहे. उदाहरणार्थ, शरद नेरूळकरच्या एका गाण्याच्या कार्यक्रमात मागे लावलेला कापडी फलक मी टेप थांबवून लक्षपूर्वक वाचला तेव्हा त्यावर ‘प्रवेश विनामूल्य’ असं लिहिलेलं दिसलं.
बारकावे फार कौशल्याने दाखवलेले आहेत. सिनेमा काढायचा म्हणजे (करायचा ठरवला तर) किती प्रचंड खटाटोप असतो हे पुन्हा एकदा जाणवलं.
Good idea, average execution
पाहिला. बरा वाटला. अभिनय उत्कृष्ट आहे – विषेशत: अरूण द्रविड यांचा. तंत्र सफाईदार आहे, आणि दिग्दर्शन उत्तम. पण माझ्या मते कथावस्तू कच्च्या पायावर बांधली आहे. नायकाची motivations आणि प्राधान्यक्रम प्रमाणाबाहेर गोंधळलेली दिसतात. “तेल गेलं, तूपही गेलं”; किंवा थोडं ज्यास्त कठोरपणे, “गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं” अशी अवस्था. कथानकाचा तोच उद्देश आहे, पण सिनेमात एक गायक म्हणून नायकाची mediocrity अति-उघड दिसते. तोच कलाकार अभिनेता आणि गायक म्हणून वापरण्याचा अट्टाहास केल्यामुळे असेल. तो अभिनयात उजवा आहे, पण गाण्यात अगदीच कुचकामी. एखादा बरा पार्श्वगायक वापरला असता तर नायक ज्यास्त credible वाटला असता. शास्त्रीय संगीताच्या जाणकाराला कथेतले कच्चे दुवे ज्यास्त स्पष्ट दिसतील कदाचित. शेवट मात्र मला कळलाच नाही. तो परिणामकारक आहे असे ऐकतो. कुणी समजावून सांगेल का?
शेवट.
मलाही पूर्ण समजला नाहीये.
पण आधी रात्री-अपरात्री बाईकवरून जाणारा शरद आपल्या मनात येईल ते करणारा, शास्त्रीय संगीताची मनापासून आराधना करणारा तरूण दाखवला आहे.
आता तो सिस्टिमला शरण गेलाय, किंवा त्याने हार मानली आहे - १०० जणांत तो ओळखताही येत नाही - अशा लोकल ट्रेनचा प्रवासी.
(तो लोकल ट्रेनमधला पोरगा काय गाणं गातो त्याचे बोल समजले नाहीत. पण पोटासाठी ट्रेनमधे गाणारा तो पोरगा आणि पोटासाठीच गाणं शिकवून मास्तरकी करणारा शरद - ह्या दोहोंत काय फरक राहिला? असं काहीसं सुचवायचं आहे का?)
हिंट
लोकल ट्रेनमधला पोरगा काय गाणं गातो त्याचे बोल समजले नाहीत.
(गाणं तत्त्वचिंतनात्मक आहे. एंड टायटल्स पाहिली तर त्याचे बोल सहज सापडावेत नेटवर.) अनेकदा जे भल्याभल्या शास्त्रीय गायकांना जमत नाही ते लोकगायकांना सहज जमून जातं. तिथे तो लोकलमधला मुलगा ज्या उत्कटतेनं गातो तशी उत्कटता नायकाला आपल्या गाण्यात कधीही आणता आलेली नाही. रुढ अर्थानं नायकाकडे आज अधिक पैसा आहे, लौकिक यश आहे, जे त्या मुलाला कधीच मिळणार नाही; पण जे त्या मुलाकडे लीलया आहे त्यासाठी नायकानं जन्मभर धडपड केली आहे (जी आपण सिनेमात इतका वेळ पाहिलेली आहे) आणि ते त्यालाही कधीही मिळणार नाही हे आता त्याला कळून चुकलेलं आहे.
पुनश्च धन्यवाद.
नेटवर शोधलं, थोडं सापडतंय .
तुम्ही म्हणता ते बरोबर वाटतं आहे.
पण जे त्या मुलाकडे लीलया आहे त्यासाठी नायकानं जन्मभर धडपड केली आहे (जी आपण सिनेमात इतका वेळ पाहिलेली आहे) आणि ते त्यालाही कधीही मिळणार नाही हे आता त्याला कळून चुकलेलं आहे.
शंका - चैतन्यचा कॅमेरा फार कमी वेळा क्लोज अप असतो बहुतांश वेळा एक प्रेक्षक म्हणून वावरतो - त्यामुळे शरदच्या चेहेऱ्यावरून किंवा देहबोलीवरून हे उलगडत नाही,
चेहेरा आणि देहबोली
चैतन्यचा कॅमेरा फार कमी वेळा क्लोज अप असतो बहुतांश वेळा एक प्रेक्षक म्हणून वावरतो - त्यामुळे शरदच्या चेहेऱ्यावरून किंवा देहबोलीवरून हे उलगडत नाही
कदाचित छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर पाहणं यात फरक पडत असावा. कारण चित्रपटात सुरुवातीला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्साहानं गुरुबांधवांबरोबर जाऊन कपडे खरेदी करणारा मुलगा ते हळूहळू (अगदी टीव्हीवरच्या स्पर्धा वगैरे पाहतानासुद्धा) हताश होत गेलेला मध्यमवयीन पुरुष असा त्याचा प्रवास मला स्पष्टच दिसत गेला.
वेळेवर धागा दिसल्यामुळे आज
वेळेवर धागा दिसल्यामुळे आज ठरवून बघितला.
अप्रतिम आहे. अंतर्मुख करणारा आहेच. आपण नक्की काय शोधतो आहे हेच समजत नसेल तर कशी घुसमट होते हे सिनेमा बघताना सतत जाणवत राहतं.
मला cinematography फार आवडली. विशेषतः त्याची मोटारसायकलवरची दृश्य आहेत त्यात नक्की काय केले आहे हे technically मला कळत नाही पण त्याचा जो एकूण दृष्यावर प्रभाव आहे तो अफाट आहे.
नाव अलवार...
चित्रपटाच्या हाताळणीत एक मोठं बंधन घालून घेतलेलं दिसतं ते म्हणजे कोणत्याच ज्ञात घराण्याचा किंवा त्यातल्या नामवंतांचा उल्लेख न करणं. मग अलवार नावाचं काल्पनिक घराणं उभं करणं आलं. त्यात शास्त्रीय संगीताचा खयाल गायकी एवढाच गाभा तर घ्यायचा, पण कोणतीच छाप उमटू द्यायची नाही, यातच गुरुही आणि शिष्यही निष्प्रभ होतात. गायकी खुलवण्यासाठीचं चिंतन, विचार, आपापल्या घराण्याचे आडाखे यांची उकल गुरु करतात. पण ते ना त्याचे गुरु करतात, ना माई या परात्पर गुरु. नुसतं प्रवास खडतर आहे, मार्ग तुलाच शोधायचा आहे अशा पद्धतीची भाषणबाजी.
दुसरा भाग मांडणीचा. ज्या गुरुमाता माई यांच्या व्याख्यान्याचे तुकडे चित्रपटाच्या साधारण पाऊण भागात भरले आहेत ते सांगणं संपताना नायकाच्या मुंबईतल्या आयुष्याची दहा-बारा वर्षं गेलेली दाखवली आहेत. त्यात शेवट “तुझे गुरु तुला तुझ्या मर्यादा स्पष्ट सांगणार नाहीत, कारण ते तुझ्यावर अवलंबून आहेत” हे इतक्या उशीरा प्रेक्षकांना ऐकवलं म्हणून ते नायकालाही तेव्हाच कळलं हे कसं ? तेव्हा वळलं असं म्हटलं तर सीडी तयार करण्यात तो आधीपासून मदत करायचा, स्टॉलवरचे लोकांचे प्रतिसाद त्याला माहिती होते, माईंची व्याख्यानं कोणत्यातरी संग्रहालयाला देऊन टाकताना तिथला सरकारी खाक्या आणि तरीही ते डिजिटली उपलब्ध होण्याची व्यवस्था असणे याची माहिती त्याला होती मग सीडी / पेन ड्राइव्ह निर्मितीत तो उतरला हे नव्याने सांगून शेवट करण्यात काय हशील ? जरा जास्त सुटलेलं पोट दाखवलं आणि झुळझुळीत शर्ट घातला की तो प्रस्थापित होतो का ? आणि ते केव्हा येतं, तो मैफलीत गाणं म्हणताना न सुचून उठूनच जातो या दृश्यानंतर. पत्रकारांशी बोलताना चार वर्षांच्या मेहनतीने त्याने अलवार घराण्याचा दोनशे वर्षांच्या इतिहासाचं दस्ताऐवजीकरण नवीन कंपनीच्या माध्यमातून केलं असा उल्लेख येतो. तीन अलवार गायकांची नावं (चित्रपटात प्रथमच) त्या बोलण्यात कळतात, एकदा आपल्या आईशी बोलताना तो अजून चार वर्षांनी मी चाळीसचा होईन मग मला कोणीही डिव्होर्सी, विधवा चालेल असं म्हटलेलं असतं, मग त्या अलवार प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जाताना लोकलच्या प्रवासात शेजारी एक बाई व तिची लहान मुलगी त्याच्यापाशी खिडकीशी बसून बाहेर पाहतेय आणि पत्रकार परिषद झाल्यावर परतताना त्याच्यासमोर तीच आई आणि मुलगी पाठमोरी आहे म्हणजे त्या त्याच्या आयुष्यात असाव्यात असा कयास बांधायचा. एकूण सगळं ढिसाळ निबंधासारखं वाटलं.
पाहील्यानंतर परत परत वळून
पाहील्यानंतर परत परत वळून विचार करायला लावतो. एडिटिंग अत्युत्तम. आडात नाही तर पोहऱ्यात कुटून येणार? पण आडात 'काही' नाही ही जाणीव अंगभूत करुन जगावेच लागते. पाणी नसलेला आड आपलाच बाब्या असतो. तरिही पीळ जात नाही. उथळ आडातच घराण्याची परंपरा, वडलांची किस्सेबाजी, कलेविषयी निष्ठेचा बागुल्बुवा हे सगळे तसेच राहते. आधी माईंचे मोनोलॉगमध्ये काही हिडन धडा असावा म्हणुन त्या कॅसेटी असल्याचीही वाच्यताही न करणार मग त्या डोनेट करतो. शेवटापर्यंत नायक हा खऱ्या अर्थाने वडलांच्या पावलावर पाऊल टाकून घराणे-गुरु-परंपरा सारख्या बुळ्या गोष्टींचा डिंक काढू लागतो. कथानक साधेच पण सादरीकरण अतिशय सघन.
हा सिनेमा बघताना माईंची कधी
हा सिनेमा बघताना माईंची कधी कधी कमाल चीड आली.
आपण ज्याला लोकानुनय म्हणतो ते एक टोक. Playing it to the gallery. Giving people what they want. पण आपण आपली कला फक्त गुरू आणि परमेश्वरासाठी जोपासतो हे दुसरे टोक आहे. जगासमोर आलेले आणि लोकांचं प्रेम मिळालेले कलाकार सतत मनात या अशा विचाराशी एकनिष्ठ राहू शकत असतील का?
आणि अशा संस्कारातून आलेल्या यशस्वी शिष्यांना समोरून येणाऱ्या applause बद्दल अपराधी वाटत असेल का? अर्थात आपल्या शिष्याच्या डोक्यात हवा जाऊ नये ही गुरूची चिंता रास्त आहे. पण गुरू - शिष्याचे नाते नेहमीच इतके प्रामाणिक असते का?
कदाचित हल्लीच्या काळात applause खूप स्वस्त झाला आहे म्हणून हे असं सगळं उत्कट, दैवी, शुद्ध खूप pretentious वाटतं. आपल्यातली कला आपल्या आयुष्यातील तथाकथित तामसिक अनुभवातून अजिबातच प्रगल्भ होत नाही का? The constant coaching to deny yourself the pleasure of applause is absurd. आणि भारतीय परंपरेत सगळीकडेच या denial ला इतकं महत्त्व दिलं आहे की स्वतःशी प्रामाणिक राहायचं की आपल्यावर झालेल्या संस्कारांशी या कात्रीत अडकायला होतं.
वेगळी विचारसरणी
'जे विकतं तेच चांगलं - असं दुसरं टोक आता सगळीकडे दिसतंच आहे, तर मला उलट हा सिनेमा त्या विचारसरणीला छेद देणारा वाटला. वेगळा विचार करणारी यशस्वी/मान्यवर लोक होती, हे एक उदाहरणच नाही का?
कला लोकाभिमुख असतेच, जसे ट्रेनमधे गाणारा मुलगा. त्याचं गाणं आपल्याला भिडतं. तो उपाशी आहे, कलेवर त्याचं पोट आहे, पण तरी तो मुलगाही कुठे इकडेतिकडे बघत टाळ्यांची वाट बघतांना दाखवलाय? 'सादरीकरणात' आनंद घेता आला तर लोकांना ते आवडतं, मुद्दाम विकायला गेलं तर दर्जा खालावतो..... हा समतोल साधणं दिग्दर्शकाला जमलंय असं मला वाटतं. चित्रपट ही कला सादर करतांना, केवळ बॉक्स ऑफिसचं गणीत न बघता, ताम्हणेंनी आपला प्रेक्षकवर्ग ओळखला आहे, आणि चित्रपट निश्चितच त्यांना आनंद देणारा आहे, असं वाटलं
औत्काट्य, दिव्यत्त्व आणि शुद्धता आणि माईंचा स्वीट स्पॉट
माई या बाबतीत थोड्याश्या लकी आहेत.
माईचे कॅरेक्टर म्हणजे लौकिकातल्या ताई धरु. आणि मोगुबाई कुर्डीकर माईंच्या आई. माईंच्या आईच्या बाबतीत "आपल्यातली कला आपल्या आयुष्यातील तथाकथित तामसिक अनुभवातून अजिबातच प्रगल्भ होत नाही का?" हा प्रश्न महत्त्वाचा आहे. गाणाऱ्या बायकांना फारशी प्रतिष्ठा नसताना मोगुबाईंनी कला जोपासली आणि त्या आयुष्यातल्या तामसिक अनुभवातून जाऊन प्रगल्भ झालेल्या आहेत.
गाणाऱ्यांच्या प्रतवाऱ्या असताना कुर्डीकरांना वरच्या स्तरात जाताना अशक्य झगडावं लागलं असणार. आयुष्यातल्या अस्थैर्यात आपल्या अंगी कला सोडून दुसरे कोणतेही कसब नसल्यामुळे कलेतले औत्काट्य, दिव्यत्त्व आणि शुद्धता हेच ती जोपासत राहण्याची प्रेरणा असावेत.
माई मात्र तुलनेने आईने घालून दिलेल्या रस्त्यावर आणि मूल्यांवर चाललेल्या आहेत. माईंना लोकानुनय न करण्याइतपत वलय लाभलेलं असू शकतं. माई जिनियस असल्यातरी माईंनी हे वलय मुद्दामहूनही जोपासलेलं असू शकतं. लोकांचं प्रेम मिळायला थेट लोकांना रिझवायलाच हवं, लोकानुनय करायलाच हवं असं नाही. लोकांना रिझवणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर किंवा प्रतिष्ठित प्रस्थापित अभिजनांवर इन्फ्लुएन्स टाकला की झालं. उदा. पु.लं, पालेकर, इत्यादी.. म्हणजे लोकांचे प्रेमही मिळते आणि औत्काट्य, दिव्यत्त्व आणि शुद्धता यांच्याशी एकनिष्ठही राहता येते.
चित्रपट झेपला नाही. सादरीकरण
चित्रपट झेपला नाही. सादरीकरण अत्यंत रटाळ वाटले, कॅमेराचा ठेहराव अनावश्यक लांबवलेला वाटला.
संगीताची उपासना करणाऱ्या माईंचा वारसा आपला मानणाऱ्या नायकाच्या नशिबीची घालमेल कमी न होता वाढतच जाते आणि शेवटी अपरिहार्यपणे तो तडजोड करतो हे ठीक आहे पण त्याचा गाण्याचा वकूब पाहता ते समजण्यासारखेच आहे. समाजात आजुबाजूला एवढी स्थित्यंतरे होत असताना, युट्युब वगैरे चालू असताना, आपण संगीत शिकवण्या घेत आत्यंतिक आग्रहाच्या भूमीका घेणे प्रत्यक्षात कितपत होत असेल याविषयी शंकाच आहे. स्पॉन्सर मिळविणे, ठरलेल्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे कला सादर करणे, आपल्या हेतूविषयी जमेल तितके प्रामाणिक रहाणे आणि ऐहिक बाबींकडे ठार दुर्लक्ष न करणे एवढी पथ्ये बाळगून संगीताची सेवा शरदलाही करता आलीच असती पण त्यासाठी डोक्यातली 'कलेसाठी कला' विचाराची जळमटे काढून टाकायला जमले पाहिजे.
किशोरी आमोणकर जेंव्हा म्हणतात की 'प्रत्यक्ष यमन उभा राहिला पाहिजे' तेव्हा त्या त्यांच्या उंचीवरून जग कसं दिसतं ते सांगत असतात. तोच आग्रह अतिसामान्य गवयाने धरला तर त्याची अवस्था त्रिशंकुसारखी झाली तर त्यात काय आश्चर्य? पण ते समजेल तर खरं. प्रधान गुरुजींनी त्यांच्यापुरतं ते सत्य जाणलंय पण मग शिष्याची झेप ओळखून त्याला ते मार्गदर्शन का नाही करत? ट्युशन तर त्यांना दुसरीही मिळेल आणि शरदचा स्वभाव पाहता तो सेवा करायला तसाही येत राहीलही. मग गुरुजींचं अडतंय कुठे?
जोश्यांचा एपिसोड चक्क ठिगळासारखा वाटला, बळेच जोडलेला. त्यातही माईंबद्दल बोलताना उगाच सेक्युलर शेरेबाजी करत 'या मुसलमान गुरुंनी आपली विद्या विटाळली' यासारखी शेलकी वाक्ये पेरली आहेत असं वाटून गेलं.
ओव्हरऑल, हा सिनेमा भारतीय संगीताविषयी काही भाष्य करत नाही. तो विषयच नाही त्याचा म्हणावं असंही नाही. पण मुख्य आक्षेप हा की पात्रे विरविरीत वाटतात, व्यक्ती म्हणून भिडत नाहीत, सहज संवाद साधत नाहीत. किंबहुना स्टार्क सादरीकरणाच्या आग्रहापोटी त्यांच्यापैकी कोणाच्याही व्यक्तिमत्वात मुळी ओलावाच नाही. सगळे द्विमितीतले जीव आहेत इतकेच वाटले, एकाविषयीही आपुलकी वाटली नाही, बाजू पटते आहे असेही वाटले नाही, थोडक्यात सिनेमा आला आणि गेला. सुमित्रा भाव्यांच्या आवाजातले माईंचे हृद्गत आवडले. 'इदं च नास्ति परं न लभ्यते' अशी नायकाची घुसमट दिसली, तीही एवढी वेळकाढूपणे दाखवायची गरज होती का असे वाटले. बाकी हे पाहून कदाचित शास्त्रीय संगीत एवढं 'हव्वा' असतं का बुवा असं वाटत राहील लोकांना आणि अण्णा, बुवा, ताई, माईंभोवतालचे तेजोवलय गडद गडद होत जाईल.
द हिंदू - परिक्षण
https://www.thehindu.com/entertainment/movies/the-disciple-remains-on-t…
हे परीक्षण मला आवडलं.
गाण्यातलं काहीच न समजणाऱ्या माझ्यासारख्याला हे उपयोगी गाईड आहे. :)
ख्याल, घराणं आणि त्याचं पावित्र्य - घराण्याचा सन्मान आणि त्या(च) पद्धतीने जाणारं गाणं. शरद अलवार घराण्याचा शिष्य आहे त्यामुळे त्याने "बाहेरचं" काही गाऊ नये ही अपेक्षा, आणि घराण्याची गायकीच सर्वश्रेष्ठ ही धारणा. शरद काहीतरी प्रयोग करतो आहे पण घराण्याच्या गायकीचं ओझं खांद्यावर बाळगल्याने त्याला त्यापलीकडे जाता येत नाही. त्याची कुवत मुळातच कमी आहे - की ह्या घराण्याच्या अवडंबराने त्याची सर्जनशीलता खुडली गेलीये?
Where Tamhane really stages a coup though is the sequence towards the end of the film where a distracted Sharad begins raag Miya Malhar but finds it impossible to weave it into a cohesive whole. He has got rid of his Maai tapes and his guru is dead. His tethers to his tradition have been broken and he wanders aimlessly through the by-lanes of the raag. For me, it is in these disconnected, disorderly strands of Malhar that Sharad toys with that one gets, for the first and only time in the film, a glimpse of Sharad’s own voice, the possibility of him finding his own aesthetic and making the tradition his own. But Sharad is overwhelmed, perhaps by this very seemingly sacrilegious possibility, and walks off stage. This music belongs to venerable sages! How could it possibly be his own? This is probably the most dramatic scene in the film, otherwise spectacular for its lack of drama. The dissonance of the tanpura, the choice of raag, the magnificent pauses that punctuate Sharad’s struggle with it — Tamhane, Pradhan and Modak have created something special here.
हा पैलू मला कळला नसता, तो उलगडल्याने परीक्षण आवडलं.
विसंगती
one gets, for the first and only time in the film, a glimpse of Sharad’s own voice, the possibility of him finding his own aesthetic and making the tradition his own.
मला हे अर्थनिर्णयन पटलेलं नाही. मुळात मैफलीत गात असताना अचानक, इतकी वर्षं ज्याला काहीही सापडलेलं नाही, अशा गवयाला काही तरी गवसणं ही अतिशयच रोमँटिक कल्पना आहे. ती ह्या फिल्मच्या गाभ्याशीच विसंगत आहे. खूप काही वेळा थोडं थोडं काही तरी ज्याला (रियाजात / मैफलीत) गवसत गेलेलं आहे अशा माणसाला मैफलीत हे गवसण्याची शक्यता असते, पण शरदसारख्याला हे गवसणं प्रचंडच रोमँटिक आहे. आधी उभारलेला सगळा डोलारा त्याच्याशी विसंगत होतो.
गाणं न समजता
घराणं आणि त्यामुळे गाण्यावर आलेले निर्बंध - हे चित्रपटात दिसतात का तेही मला कळलं नाही
माझ्या मते घराण्यापेक्षाही माईंचे शिष्य म्हणून या तिघांचं (वडील, गुरू आणि शरद) झाकोळलं जाणं अधिक स्पष्टपणे आणि तीव्रपणे येतं.
गाणं न समजता चित्रपट कळू शकतो - जर चित्रपटाची भाषा उकलून बघितला तर - असं (गाणं न समजणाऱ्या काही औरंगजेबांचं) एक मत.
आज बघितला.
शरद त्याच्या क्लासमधल्या मुलाला बँड मध्ये सहभागी होण्याची परवानगी देताना स्वतःची निष्ठा त्या मुलावर लादायाचा प्रयत्न करतो तिथे चीड आली. तो जिथे कुठे शाळेत किंवा कॉलेजात शिकवत असतो तिथे त्याच्या वेळचं गुरु-शिष्य नातं नाही हे समजायला मारवाडी आईशी फेस ऑफ व्हायला लागतो यावरून असं वाटलं की शरदने त्या क्लासभोवतीपण उदात्ततेचे जाळे विणले असते. आजूबाजूच्या परिस्थितीशी ते सुसंगत नसते.
माईंची भाषणे मलापण हिप्नोटायझिंग वाटली.
शेवट आनंदी/दुःखी आहे, आणि सिनेमाच्या टोनला साजेसा वाटला.
सिनेमा फारच आवडला. माई ही
सिनेमा फारच आवडला. माई हे पात्र थोडेसे अन्नपूर्णादेवींवरून बेतले आहे असे वाटते. एका बाजूला पराकोटीचा आदर्शवाद, निष्काम संगीत साधना, गायकांबद्दलच्या आख्यायिका वगैरे ऐकत मोठा झालेला नायक. त्याला असल्या आदर्शवादाचा फोलपणा वयाप्रमाणे लक्षात येत असतो. इंडियन आयडलवगैरेमधलया लोकांबद्दल असूया वाटत असते हा भाग छान दाखवला आहे. पण नंतर तिथला ओंगळपणाही एका प्रसंगात दाखवला आहे. आदर्शवाद उपयोगी नसतो पण त्याचे विरुद्ध टोकही विद्रूप आहे. एक शास्त्रीय संगीत शिकणारी मुलगी त्या बाजारू ओंगळपणात अडकते आणि नायक विरुद्ध टोकात अडकतो/नंतर बाहेर पडतो.
फारच सुंदर सिनेमा.
उदात्ततेचं जाळं
तो जिथे कुठे शाळेत किंवा कॉलेजात शिकवत असतो तिथे त्याच्या वेळचं गुरु-शिष्य नातं नाही हे समजायला मारवाडी आईशी फेस ऑफ व्हायला लागतो यावरून असं वाटलं की शरदने त्या क्लासभोवतीपण उदात्ततेचे जाळे विणले असते. आजूबाजूच्या परिस्थितीशी ते सुसंगत नसते.
माझ्या मते हे (उदात्ततेचं) जाळं क्लासभोवती किंवा गुरू-शिष्य नात्याभोवती नसून शास्त्रीय संगीताभोवती आहे. जर हे संगीत शिकायचं असेल तर ते संगीत त्याच वेळी गाऊ / वाजवू नये कारण त्याचा वाईट परिणाम शिक्षणावर होईल, असा तो विचार आहे. तो विचार कितपत परिस्थितीशी सुसंगत आहे हे तात्पुरतं सोडून देऊ, पण त्याचा वाईट परिणाम होताना 'रिअलिटी शो'मधल्या मुलीच्या कथेमार्फत दिसतो. शास्त्रीय संगीत गाणारी साधीशी मुलगी सिनेमा संपतो तेव्हा शास्त्रीय संगीतापासून खूपच दूर गेलेली दिसते. त्यामुळे मुद्द्यात तथ्य आहे असंच दिग्दर्शकालाही म्हणायचं असावं.
Open ended
अतिशय आवडलेल्या चित्रपटाची सखोल चर्चा वाचून भरूनच आलं. "कलेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करत ठेवणं ही गोष्ट In and Of itself श्रेयसात्मक आहे का? मग ते करत असताना - किंवा ते केल्यामुळे - एक अत्यंत सामान्य , काहीसं उपेक्षित, अनामिक आयुष्य बनत गेलं तर ते श्रेयात्मक की निरर्थक?" हा कथेमागील मुख्य धागा आहे, हे अगदी पटलं. बरेचसे प्रतिसाद वाचून मग म्हटलं आपल्यालाही काय कळलं वाटतंय ते इथे मांडावं.
१. चित्रपटातले बरेच (जवळजवळ सगळेच म्हणायला हरकत नाही) मुख्य प्रश्न अनुत्तरित आहेत, हे मला त्याचं मोठंच यश वाटलं. शास्त्रीय संगीताचा पाया अध्यात्मिक आहे,त्यामुळे प्रत्येकाचा साधनेचा, सत्यशोधाचा प्रवास वैयक्तिक असतो, शेवटी 'कशावर' आणि 'कोणावर' विश्वास ठेवायचा, हे आपलं आपणच ठरवायचं असतं- असं त्यातून सुचवलं आहे, असं वाटलं. म्हणूनच माईंबद्दलच्या वदंता, त्यांचा विक्षिप्तपणा, प्रसिद्धिपराङ्मुखता कळूनसुद्धा, तेव्हा तरुण असलेला शरद लगेच संगीतसाधना सोडून देत नाही. मात्र, तो प्रसंग शरद प्रौढ झाल्यावर मधेच आल्यासारखा वाटतो, ह्यात त्याची मानसिकता महत्वाची आहे. वैफल्य आलेल्या मनस्थितीत त्याचा गुरु आणि त्यांच्या तत्वज्ञानावरचा विश्वास ढळत असताना हा प्रसंग येतो.
पटकथेतील हा महत्वाचा बिंदू आहे. त्यात कुठलंतरी 'सत्य' आपल्या हाती लागेल असं वाटतं, पण ते लागत नाही, कारण शरदला वदंतांच्या पलीकडे जाऊन एकदा शेवटचा निकराचा प्रयत्न करून पाहणे बाकी आहे. माई सांगतात त्याप्रमाणे, तो मैफलीत राग सुरु करतो, पण कुठलेच स्वर झपाटून टाकत नाहीयेत ह्या क्षणी त्याला 'आत्मशोध' झाला, असं वाटतं. माईंनी सांगितलेला मार्ग आपल्यासाठी नाही, हे त्याला कळून चुकतं. तो स्टेजवरून उठून निघून जातो.
२. शास्त्रीय संगीताची/कलेची शुद्धता, त्यातील टोकाचा आदर्शवाद खरा आहे, कि खोटा? ह्या द्विधा मनस्थितीतून संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना घेऊन जातो. आणि विवेकानंदानी श्रीरामकृष्ण परमहंसांना विचारले, "तुम्ही देव पाहिला आहे का?" तोच प्रश्न शरद माईंना विचारू शकता तर विचारला असता, आणि त्यांनीही, "ज्याची श्रद्धा अढळ आहे, त्यांनाच देव दिसतो." असं कडक उत्तर दिलं असतं. इथे 'कलोपासना' हा देव, आणि ज्या कलाकारांना कलोपासनेतला 'फ्लो' सापडतो, त्यांना खरोखर यश/मन सन्मानाशी काही घेणं उरत नाही. स्वतःच्या कलेशी इतकं एकरूप होणं शरदला शेवटपर्यंत जमत नाही, असं मला वाटतं. इथे व्हॅन गोव्ह आठवला. तसेच, शेवटी गाडीच्या डब्यात गाणारा मुलगा आठवला- ज्याने मनातली तळमळ 'विकायला' काढली आहे. खरोखर उपाशी असल्यामुळे 'मी पणा' सोडून तो गातो आहे, कारण तेवढंच करणं त्याला शक्य आहे. इथे पर्याय नाहीत आणि वृथा 'बौद्धिकता' नाही, कसला आव नाही, फक्त भाव आहे...
३. मी लहानपणी (१९९०-२०००) इतक्या मैफिली ऐकल्या- थोर भाग्य होतं. संगीतातले मेरुमणी असलेले बरेच दिग्गज तोवर उतारवयात होते. तरीपण त्यांनाच ऐकण्यात लोकांना रस असायचा. ह्या दिग्गजांच्याच अतिशय तयार असणाऱ्या शिष्यांना मात्र फार, गुरूंच्या मानाने अतिशय कमी संधी, नाव पैसा मिळाला. त्या काळी उदयोन्मुख असणारे पं. संजीव अभ्यंकर, वीणा सहस्त्रबुद्धे, अश्विनी भिडे देशपांडे - अशी नावं डोळ्यापुढे आली. हीच मंडळी आता येत असती तर प्रचंड लोकप्रिय झाली असती. (तेव्हाही झाली, पण त्यांच्या गुरूंच्या मानाने नाही- माझं मत).
४. व्याख्याने ऐकुन किंवा गरीब राहून ग्रेट होता येत नाही. हे म्हणजे, मी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला तर मी पण टिळक (?) होईन, असा भ्रम बाळगणे झाले, हाच भ्रम शेवटी तुटून नायक सर्वसामान्यांच्या मार्गाला लागतो. मोटरसायकल हा एकलकोंडा/अहंकारी प्रवास सोडून ट्रेनमधून गर्दीचा भाग होऊन जातांना मीपणा गळून पडलेला आहे, आणि ट्रेनमधेही लहान मुलगा निकोप गाणे गाऊ शकतो आहे, हे ही कळलं आहे.
निरीक्षणातून असंही दिसलं, की शरदच्या डोक्यात सतत फक्त तानपुरा वाजतो आहे, म्हणजे तो भारला गेला आहे, पण स्वत:चे स्वर मात्र कधीच त्याच्या डोक्यात आपणहोऊन उमटत नाहीत. वास्तविक, गायकाच्या डोक्यात सदैव स्वराविष्कार हवा, तसा तो नाही. 'ग्रेट' होण्याच्या नादात शरद गाण्यातून आनंद घेणे विसरला आहे, असं वाटतं. म्हणजे तो केवळ कुठल्याशा तत्वद्न्यानाने 'ब्रेनवॉश' झालाय का? शेवटी हा तानपुरा बंद होऊन तिथे शांतता होते. अगदी प्रथमच शरदच्या तोंडावर हसू दिसतं - तो आपल्या मुलीशी खेळतो आहे, त्यातला आनंद त्याला गवसला आहे.
४.जेव्हा माई म्हणाल्या, "तुझ्या बापात कुवत नव्हती, पण ते त्याला कळलं नाही, पण तू वेगळा आहेस ना रे?" --> माईंचे बाकी सर्व संवाद शरद मोटारसायकलवर जाताना ऐकत असतो, फक्त हाच एक संवादाचं चित्रण त्याच्या 'स्मृती' प्रमाणे वाटतं, शिवाय, तो माईंना प्रत्यक्ष कधीच भेटलेला नसतो, त्यावरून, मला हा संवाद त्याच्याच अंतर्मनाचा आवाज वाटतो. स्वयंपाक करताना मला माझ्या आईचा आवाज कानात ऐकू येतो, तसलं काहीतरी. "फ्रीजमधून एका हाताने भांडं काढू नको, ते हमखास पडतं :) :) :)
४. कसलिशी उपलब्धी झालेली माणसं त्यांचं तत्वज्ञान सांगतात, पण ते मुळात खरं/खोटं नसून, आपण ते आमलात आणतांना आपल्या कुवतीनुसार ते आपल्याला लागू पडतं. ताम्हणेंनी शास्त्रीय संगीतावर/गुरुशिष्य परंपरेवर सरधोपट टीका न करता, तटस्थपणे एका शिष्याचा प्रवास दाखवला आहे. त्यामुळे, माई खरोखर ग्रेट होत्या की नाही, आपले आदर्श खरोखर 'आदर्श' होते की नाही, हे प्रश्नच इथे गौण आहेत. हा 'ओपन एण्डेडनेस' मला सर्वात भावला. त्यालाच कदाचित समीक्षेत 'ठहराव' म्हटले आहे.
कुवेरे किनारे अबदु
शेवटच्या गाण्याने डोक्यात घर केलं होतं - त्यावर इथे सर्वात चांगली चर्चा सापडली. मतितार्थ- शिष्याचा शोध, गोरखनाथांना मच्छिन्द्रनाथ या गुरूंनी दिलेली दीक्षा- देवाने तुला काय बनवले - चिंचेचे झाड, नि तू काय बनायला गेलास - मासा! देवाने तुला ससा केले, तर तू शिकाऱ्याचा आव आणून फिरतोस!
https://youtu.be/D0_Lau8l21Y
मला शरदने गायलेले शेवटचे गाणे
मला शरदने गायलेले शेवटचे गाणे भावपूर्ण वाटले. त्याची आधीची सर्व गाणी तांत्रिकदृष्ट्या चोख, पण स्फूर्तिशून्य असल्याची दाखवली आहेत, त्यापेक्षा शेवटचे गाणे वेगळे वाटले. माझ्या मते संगीताच्या भाषेतले कथानक तिथे टिपेला पोचले.
लोकलमधल्या गायक भिकाऱ्याचे गाणे म्हणजे मला खडतर-सहज-सुंदर-जंगली-क्रूर गुरु-शिष्य संबंधाबाबत शाब्दिक सारांश वाटला. ते संपादकीय इतिवाक्य होते, क्लायमॅक्स नव्हता. ... शरदला कष्टसाध्य असलेला सांगीतिक प्रामाणिकपणा भिकाऱ्याला सहजसाध्य होता, असा शरदचा व्याज संपादकीय अपमान होता, असे जे चिंतातुर जंतूंना जाणवले, तसे मला जाणवले नाही.
शेवटाचे भिकाऱ्याचे गाणे
(जालशोधाच्या मदतीने, सिनेमा बघताना अर्धवट ऐकून मला वेगळेच काही शब्द असल्यासारखे वाटत होते.)
अवधू
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
ओ जारो पेड़ मछलियाँ छायो
जारो पेड़ मछलियाँ छायो , हे लो
कुंए रे किनारे अवधू , हिरणी-सी ब्यायी रे
हो जी पाँच मिरगला लाई, हे लो
ससईयो शिकारी अवधू बन खंड चाल्यो
ममता मृगली ने मारी , हे लो
----
जालशोधात पूर्ण कवन :
http://meenaldhawan.blogspot.com/2014/12/pyra-uthala-taal-kabira-kaa-in…
{गोरखनाथ के शब्दों में }
कुंए रे किनारे अवधू
At the edge of a well, oh seeker
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
At the edge of a well, oh seeker, I sowed a tamarind seed.
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
जारो पेड़ मछलियाँ छायो , हे लो The tree sprouts fish, casts a fine shade- Oh my mind !
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
जारो पेड़ मछलियाँ छायो , हे लो
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे Take my message to that wandering yogi !
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे
TABLA LINE----------
कुंए रे किनारे अवधू , हिरनी-सी ब्यायी रे
At the edge of a well, oh seeker, a deer was wed.
कुंए रे किनारे अवधू , हिरनी-सी ब्यायी रे
हो जी पाँच मिरगला लाई, हे लो She gave birth to five fawns- Oh my mind !
कुंए रे किनारे अवधू , हिरनी-सी ब्यायी रे
TABLA LINE----------
ससईयो शिकारी अवधू बन खंड चाल्यो रे Ther rabbit turns hunter, takes off to the forest.
ससईयो शिकारी अवधू बन खंड चाल्यो रे
ममता मृगली ने मारी , हे लो He kills the fawns of attachment- Oh my mind !
ससईयो शिकारी अवधू बन खंड चाल्यो रे
ममता मृगली ने मारी , हे लो
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
TABLA LINE----------
खूंटो तो दूजे अवधू , भैंस बिलोवे रे The peg milks, the buffalo churns.
खूंटो तो दूजे अवधू , भैंस बिलोवे रे
जारो माखण बिरला खायो , हे लो Only the rare one eats this butter- Oh my mind !
खूंटो तो दूजे अवधू , भैंस बिलोवे रे
जारो माखण बिरला खायो , हे लो
TABLA LINE----------
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
कुंए रे किनारे अवधू , इमली-सी बोई रे
जां खोज्यां वां पाया , हे लो The one who seeks, will find- Oh my mind !
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे Take my message to that wandering yogi ! }
जां खोज्यां वां पाया , हे लो
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे
रमते जोगी ने म्हारा आदेश केवणा रे
लिखाण वाचून
लिखाण वाचलं. चित्रपट बघायच्या यादीत टाकलाय. शेवटच्या ओळी खासच.
अवांतर --
ह्या धाग्याला रेटिंग देता येत नाहीये. कुणीतरी माझ्यावतीनं पाच तारका द्या. तितकाच अधिक लोकांच्या रडारवर येईल.