ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - प्रास्ताविक
तुम्हाला तबला वाजवायला शिकायचं असेल, पेटी वाजवायला शिकायचं असेल, किंवा गाणं शिकायचं असेल तर शिकवणारे आसपास सहज सापडू शकतात. तो क्लास लावला, घरी नियमित प्रॅक्टिस केली तर वर्षा दोन वर्षांत आपल्यात फरक पडलेला जाणवतो. सगळ्यांनाच काही गानकोकिळा किंवा गंधर्व व्हायचं नसतं. आपल्या मनातलं गाणं मोकळेपणे बाहेर यावं, ऐकणाराला आवडावं, आणि आपल्यालाच म्हणताना आनंद व्हावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी तयारी करण्याची सोय असते. कोणीतरी जाणकार आपल्याला स्वरांची ओळख करून देऊ शकतो, कुठे बेसूर होतो आहोत हे सांगू शकतो, काही ताना हरकती घोटवून घेऊ शकतो. यातून गळ्याला एक शिस्त लागतेच, आणि मुख्य म्हणजे आपण गाऊ शकतो अशी खात्री निर्माण होते. आणि बहुतेक वेळा ही खात्री, हा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आपला स्वर नीट लागत नाही अशी भीती असेल तर गाणं जसं चोरट्या आवाजात होतं, किंवा म्हणायलाच भीती वाटते. पण एक विशिष्ट हुकुमत आली हे जाणवलं की आपल्यालाच आपल्या गाण्यातून आनंद येतो. एक मोकळेपणा, एक स्वातंत्र्य येतं.
लेखनाच्या बाबतीत मात्र असा शिक्षक दुर्लभ. चांगलं ललित लिखाण कसं करावं? मुळात चांगलं लिखाण कसं करावं? दुर्दैवाने हे शिकण्याची तितकीशी सोपी सोय कुठे नाही. त्यामुळे आपलं लेखन हे न शिकलेल्या, बऱ्या आवाजाच्या व्यक्तीच्या गाण्याइतकंच मर्यादित राहतं. आपण अनेक ठिकाणी ओघवतं लेखन पाहतो. आपल्यालाही असं लिहिता यावं अशी इच्छा होते. त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी असते. पण आपल्या लेखनापासून त्या जातकुळीच्या लेखनापर्यंत जाण्यासाठी, निदान जवळ तरी जाण्यासाठी काय करावं हे माहीत नसतं. त्यामुळे मनात आलेलं लेखन कागदावर उतरवण्याचंही धार्ष्ट्य अनेकवेळा होत नाही. गाणं चोरट्या आवाजात झालं की म्हणायची भीती वाटते तसंच.
त्यामुळे आत्तापर्यंतचा माझं निरीक्षण असं आहे की पहिल्यांदाच कथा लिहिणारे (काही मान्यवर अपवाद वगळता) अगदी मोजक्या शब्दांत गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे व्यक्तींची नावं, जुजबी नात्यांची ओळख, प्रसंग आणि आवश्यक तितकेच संवाद यात कथा आटपते. जालावरच्या अनेक अशा लेखनाला मी प्रतिसाद म्हणून 'कथेचा आराखडा म्हणून चांगली आहे, पण अधिक रंगवायला हवी' असं म्हणतो. मात्र रंगवणं म्हणजे काय, हे थोडक्यात सांगणं कठीण असतं. लेखकालाही ती गरज जाणवली तरी ती भागवण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं. काही पुढच्या पायरीवरच्या कथांमध्येही अनेक अंगं गाळलेली असतात. उदाहरणार्थ - तीन-चार व्यक्तिरेखा असलेल्या कथेत त्यांचे परस्परांशी होणारी संभाषणं, आणि हालचाली बारीकपणे टिपलेल्या होत्या. घटना आणि काही रूपकं चांगली वापरली होती. पण एकाही ठिकाणी त्या परिसराचं वर्णन नव्हतं, किंवा त्या व्यक्ती कशा दिसतात याचंही वर्णन नव्हतं. अवकाश, रंग, पोत, व्यक्तिमत्व यांसारख्या अंगांचं वर्णन करून कथेचा पोत निश्चितच सुधारला असता. पण अशा प्रकारे सुधारणा करता येतील, किंवा अशा काही गोष्टींबद्दल विचार करण्याची गरज आहे हे शिकवलं जात नाही.
यावर उपाय म्हणून मी ऐसी अक्षरेवर लेखनाची वर्कशॉप्स घेणार आहे. मी वर्कशॉप घेणार म्हणजे मला काही फार चांगलं लिखाण येतं असं नाही. किंबहुना मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. त्या शिकायला मिळतील हा एक माझा स्वतःचा उद्देश आहेच. मग मी लेखनातला तज्ञ नाही, आणि वर्कशॉपमध्ये भाग घेणारेही कोणी नाहीत अशा परिस्थितीत आपण शिकणार कसे? गाण्याच्या उदाहरणानेच उत्तर द्यायचं झालं तर आपल्यापैकी उत्कृष्ट गायक कोणी नसला तरी कानसेन भरपूर आहेत. त्यामुळे जर आपण सगळ्यांनीच थोडी थोडी एकत्र प्रॅक्टिस केली तर एकमेकांच्या चुका दाखवणं, एकमेकांच्या चांगल्या लेखनाला दाद देणं यातून सगळ्यांनाच खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे. दुसरी जमेची बाजू म्हणजे ऐसी अक्षरे सारखं ऑनलाइन व्यासपीठ असल्यामुळे लिखाण करणं, इतरांचे प्रयत्न तपासून बघणं, एकमेकांना मदत करणं, चुका दाखवणं यासाठी एक चौकट तयार आहे. दहा लोकांनी आठवड्यातून एकदा जमून आपापलं लेखन वाचून दाखवण्याच्या कागदी-भौतिक मार्गापेक्षा ही चौकट कितीतरी लवचिक आणि परिणामकारक आहे. म्हणून हा कार्यशाळेचा प्रपंच.
तंत्र शिकणं म्हणजे लेखन शिकणं का? काही कट्टर प्रतिभावादी म्हणतात की लेखक हा जन्मावा लागतो, तो घडवता येत नाही. मला हे पूर्णपणे पटत नाही. बहुतेक वेळा त्यांना जगातले सर्वोत्तम लेखक डोळ्यासमोर असतात. आणि कितीही शिकवलं तरी बहुतेक लोक त्यांच्याइतकं उत्तम लिहू शकणार नाहीत हे खरंच आहे. पण तंत्रावर मेहनत घेणंच नाकारणं मला मान्य नाही. संगीतातलंच उदाहरण घ्यायचं तर अल्लारखॉंसारख्याच्या पोटी निपजला नाही तर झाकीर हुसेनसारखं होणंच शक्य नाही हे घटकाभर आपण मान्य केलं तरीही झाकीर हुसेनने जी रोज दहा दहा तास मेहनत घेतली ती घेतली नसती तर तो इथपर्यंत पोचला असता का? आणि सर्वांनाच झाकिर हुसेन व्हायचं नसतं. पण किमान आपल्या मनात जो ठेका आहे तो बाहेर येण्यासाठी तंत्र घोटवून घ्यावंच लागतं. अशी मेहनत इतर कलाप्रकारांत घेण्याची प्रथा आहे, व्यवस्था आहे. लेखनाच्या बाबतीत चित्र फार वेगळं आहे. अनेक होतकरू लेखकांना इच्छा असूनही ही तंत्रं आत्मसात करण्यासाठी काही मार्गदर्शन मिळत नाही. या कार्यशाळेतून आपण 'एकमेंका साह्य करू अवघे धरू सुपंथ' या पद्धतीने प्रगती करायची इच्छा आहे.
कल्पना अशी आहे, आपल्याला जे शिकायचं आहे त्याचे लहान लहान तुकडे तयार करायचे. आणि ते एकमेकांच्या सहाय्याने आणि सरावाने शिकून घ्यायचे. आपल्याला शब्द बऱ्यापैकी येतात. तबला शिकताना आपण नुसते बोल यावेत किंवा गाणं शिकताना स्वर यावेत तसे. पण त्यांचं योग्य पद्धतीने जोडणी करून ते विशिष्ट लयीत आणण्यासाठीचे ताल किंवा राग यासारख्या गोष्टी एकमेकांकडून शिकून घ्यायचे. लेखनासाठी - विशेषतः ललित लेखनासाठी काय काय आवश्यक आहे हे पाहून त्याचा एक तुकडा घ्यायचा. त्या अंगाचा सराव करता येईल असे सुमारे दोनशे शब्द प्रत्येकाने लिहायचे. (दोनशे हा आकडा काही दगडात कोरलेला नाही. सरावापुरता पुरेसा मोठा- वाचण्यासाठी पुरेसा लहान असण्यासाठी अंदाजे मी हा आकडा घेतलेला आहे.) इतरांनी काय लिहिलं आहे ते वाचायचं. त्यांना बरा-वाईट प्रतिसाद द्यायचा. आपल्याला मिळालेल्या प्रतिसादातून मनापासून शिकण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी कधीकधी आपल्याला आकर्षक न वाटणारे बदलही करून बघण्याची तयारी ठेवायची. जमल्यास आपल्या मजकुराची सुधारित आवृत्ती लिहायची. या विषयावर कोणा उत्तम लेखकाने काही लिहिल्याचं उदाहरण सादर करता आलं तर ते करावं. कोणी हे कसं करावं याबद्दल काही विचार मांडलेले असतील तर ते उद्धृत करावेत. पण मुख्य भर सदस्यांनी प्रत्यक्ष काहीतरी लिहून बघण्यावर, एक प्रयत्न करून बघण्यावर असायला हवा. या प्रयत्नांतून लेखन सुधारेलच, पण शिवाय वाचनही सुधारेल अशी आशा आहे. आपण गाणं शिकलं की गायकही नक्की काय चांगलं करतो आहे याबाबतची जाण अधिक निर्माण होते.
या प्रकल्पात ऐसीकरांनी सक्रीय सहभाग घ्यावा ही विनंती.
रोचक प्रकार. पुण्यामधे काहि
रोचक प्रकार.
पुण्यामधे काहि संस्था क्रिएटिव्ह लेखनाचे वर्ग घेतात, त्यामधे ते आधी नुसतेच शेकड्याने पात्र निर्मिती करायला सांगतात उदा. भाजीवाला, वॉचमन, आजोबा, बसचालक, कंडक्टर, बॅंक कर्मचारी, सरकारी कर्मचारी, सहकर्मचारी वगैरे अशी पात्रनिर्मिती(त्यांच्या विविक्षीत गुणांसह) घट्ट झाली कि मग विषयाचा विस्तार करण्यासाठी रोलप्ले किंवा ब्रेन-स्टॉर्मिंग सेशन्स घेतात, असे अनेक विषय झाले कि मग विषयविस्तार + पात्रनिर्मिती = कथा हे समिकरण शिकवतात.
तुम्ही जे म्हणताहात ते स्टॉक
तुम्ही जे म्हणताहात ते स्टॉक कॅरेक्टर्स या संकल्पनेजवळ जातं. स्टॉक कॅरेक्टर्स म्हणजे 'हिरो' 'व्हिलन' 'हीरो की मॉं' वगैरे हिंदी सिनेमात वापरल्या जाणाऱ्या ठाशीव व्यक्तिरेखा. 'गुंड म्हणजे तो कसा असायला हवा?' वगैरेबाबतच्या वाचक/प्रेक्षकाच्या अपेक्षांबद्दल आडाखे बांधून त्यानुसार तांबारलेले खुनशी डोळे, उंच धिप्पाड, अशुद्ध भाषा, आवाजात गुर्मी वगैरे वगैरे टाकली की ती व्यक्तिरेखा झाली. अशा अनेक स्टॉक कॅरेक्टर्सचा एकमेकांशी संघर्ष झाला की झाली सिनेमाची कथा तयार. मला या स्टॉक कॅरेक्टर्सबद्दल फार प्रेम नाही. दोन खऱ्या, हाडामांसाच्या व्यक्तिरेखा एकमेकांत अपरिहार्यपणे गुंफल्या गेल्या की जे तयार होईल ते जास्त दर्जेदार असेल.
पण कथा आणि कादंबऱ्यांपर्यंत पोचायला बराच वेळ आहे.
दुरुस्ती
'हीरो की मॉं' , "व्हिलन" म्हणजे तुम्ही लैच पातळी काढलित.
प्रतिसादाचा भावार्थ तसा नसावा.
उदा :_
तुम्ही कुंदन शाह किंवा अजिझ मिर्झा चे चित्रपट किंवा मालिका पाहिल्यात का ? त्याच्या आधारावर हे ठाशिव क्यारेक्टर म्हणजे काय ते नेमकं सांगता येइल.
उदा :-
कभी हां कभी ना मधली पात्रे (ते टिपिकल "फादर" , "गुंड" ,वगैरे मंडळी ), राजू बन गया जंटलमन मधले काही भाग किंवा अलिकडच्या काळतले रॉकेटसिंग (हा अल्पपरिचित, पण बर्यापैकी बरा चित्रपट) ह्यातले क्यारेक्टर्स पहा.
रॉकेटसिंग तर पात्ररचनेसाठी एक उदाहरण म्हणून घेता यावा.
आता हे झालं हिंदीजगतातलं.
तुम्हा मंडळींना जागतिक स्तरावरची माहिती असल्याचं दिसतं.
त्यातलं ह्याच धाटाणीचं पण ह्याहूनही चांगल्या दर्जाचं असं काही असेलच की.
ते तुम्ही उदाहरण म्हणून घेउ शकता.
गुर्जींना तसं म्हणायचं नसावं
गुर्जींना तसं म्हणायचं नसावं असा अंदाज. मुळात पात्र उभारणीत साचेबद्धता टाळायचा त्यांचा मानस असावा नी मी यांच्या प्रतिसादातल्या कार्यशाळेत नेमके उलट होताना दिसते.
असो. कथा/कादंबर्या/नाटके वगैरे सोडा, ते दूर राहिले; त्यापेक्षा नियमतीत प्रतिसाद, चर्चा, धागे, पत्रे, यात विचार स्पष्ट पणे व योग्य सुरात लिहिता आले तरी कार्यशाळा माझ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल!
फॅक्टरी
तुम्ही म्हणता ती एक शक्यता आहेच, फक्त मी सांगतोय त्या कार्यशाळेत तो लाऊडपणा मोस्टली नसतो, पात्रं रोजच्या आयुष्यातली/अनुभवातली असतात, कथेचा जीव(विषय) लघुकथेप्रमाणे असतो त्यामुळे एका फॅक्टरी पॅटर्नमधे १०-१५ जणं ब्रेन स्टॉर्मिंग करतात आणि कथानिर्मिती करतात. लेखनाच्या प्रतिभेची त्यांनी रेसिपीच किंवा समिकरण तयार केले आहे, ज्यांना गती आहे त्यांना दिशा सापडू शकेल असा प्रयत्न असतो.
पात्रं रोजच्या
पात्रं रोजच्या आयुष्यातली/अनुभवातली असतात,
मग ठीक आहे. प्रतिभेची रेसिपी हे पचायला जड वाटतं. मात्र एखादी संकल्पना फुलवून तिचं प्रभावी चित्रणात, लेखनात रूपांतर करण्यासाठी काही तंत्र मोठेमोठे लेखकही वापरताना दिसतात. अशा तंत्रांची जाणीव होणं महत्त्वाचं. म्हणजे क्रिकेट खेळता येण्यासाठी कव्हर ड्राइव्ह शिकून घेणं महत्त्वाचं या अर्थाने. कुठच्या बॉलला कव्हरड्राइव्ह वापरायचा त्याचा इन्स्टिंक्टिव्हली निर्णय घेऊन तो शानदारपणे अमलात आणता येणं ही पुढची पायरी झाली.
उत्तम कल्पना. नाव नोंदवतो
उत्तम कल्पना. नाव नोंदवतो आहे.
-
हपीसात एका प्रेझेंटेशनच्या कार्यशाळेला जात असे. पद्धत अशी - एकाने प्रेझेंटेशन द्यायचं आणि बाकीच्यांनी फक्त चुका काढायच्या. त्या मास्तराचं म्हणणं असं होतं, की आपली बलस्थानं आपल्याला माहीत असतातच, आणि आपण ती वेळोवेळी कुरवाळत असतोच. चुका दुसर्याने दाखवल्या तर झोंबतात आणि सुधारणा होते. (या प्रकाराला आम्ही "माझी मारा वर्कशॉप" असं नाव ठेवलं होतं.)
माझ्या मते आहे त्यात काय चूक
माझ्या मते आहे त्यात काय चूक आहे हे दाखवण्यापेक्षा अजून काय काय बरोबर गोष्टी करायच्या राहिल्या यावर लक्ष केंद्रित करणं अधिक फायदेशीर ठरेल. म्हणजे 'इथे पाउल टाकताना तू अडखळलास' असं दाखवून देण्यापेक्षा 'अरे, एवढं मोठं अंगण असूनही तू त्या तेवढ्याशा कोपऱ्यातच फिरलास' या स्वरूपाचा फीडबॅक जास्त फायदेशीर ठरेल, आणि गरजेचा आहे.
गंमत जंमत
याचा विचार करताना खालील मजेच्या संकल्पना सुचल्या :
१. बळवंतबुवा वर एक कथा लिहा.
२. फडताळात एकमेकांना लावलेल्या पुस्तकांचे लेखक (टॉय स्टोरी) सारखे जागे होतात. यावर बेतून काहीतरी लिहा.
३. सखाराम गटणे ची डायरी लिहा.
४. मेघना भुस्कुटे मेघना पेठे यांना भेटतात अशी कल्पना योजून एक प्रसंग चितारा.
५. अंताजी आणि गोडसे भटजी यांच्या भेटीवर आधारित एक प्रसंग लिहा.
६. जीए कुलकर्णी फेसबुक आणि ट्विटरवर आलेले आहेत अशी संकल्पना योजून एक कथा लिहा.
७. ग्रेस यांच्या शैलीत एक बालकविता लिहा.
८. नामदेव ढसाळ यांचं चित्पावन संघाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेलं भाषण लिहा.
९. चक्रधरांच्या साहित्याचं इंग्रजी भाषांतर करून एक नमुना सादर करा. ("भाषांतराचा दृष्टांतु")
१०. "आवा निघाली पंढरपुरा" या अभंगातील आवा या स्त्रीचे प्रवासवर्णन लिहा.
११. होमरची इलियड आणि ऑडेसी चारोळीत लिहा.
१२. युगुलगीत हे "द्वंद्वगीत" केव्हा नि कसे होते ते समजावून सांगा.
१३. अन्नू मलिकचे सौंदर्यशास्त्र यावर निबंध लिहा.
१४. राखी सावंत आणि पूनमपांडे यांची आकृतीबंधात्मक समीक्षेतून केलेली तुलना.
१५. एन डी तिवारी आणि आसाराम बापू यांच्या स्त्रीमुक्तीसंघटनेच्या व्यासपीठावरचा परिसंवाद रचून दाखवा.
आभासी विश्व
आभासी विश्वातला सगळ्यात मोठा धोका हा, की एकमेकांशी संपर्क इतक्या सुलभपणाने आणि इतक्या जलद होतो की तात्काळ मनात 'या रे या रे गाऊ या, आपण सारे नाचू या' हे गाणे वाजायला लागते. मग विचारांची देवाणघेवाण, व्यक्तिमत्त्व विकास, काहीतरी केलं पाहिजे यार, समाज बदलून टाकू भेंचूत असे टप्पे खात खात चेंडू सीमेपार होतो. बाळ शाम, शरीर स्वच्छ रहावं म्हणून साबण वापरतोस ना, मग मनाच्या स्वच्छतेचं काय? वगैरे साने गुरुजी कल्पना बाळसे धरु लागतात. हे सगळे एक की बोर्ड आणि एक ब्रॉडबँड केबल एवढे असले की शक्य होते.
तरीही 'एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ' ही आम आदमी पार्टी कल्पना आवडली. सकाळी उठल्याउठल्या घरात 'उद्या जरा मेदूवडे करा. भिजायला घाला डाळ तांदूळ आत्ताच..' असे म्हणावे तशी विषयांची ऑर्डर देऊन लेखकांकडून लेखन करुन घेणे, मग त्यावर चर्चा होणे, एकमेकांच्या लेखनातील सौंदर्यस्थळे यावर खल होणे हे सगळे कल्पून उत्सुकतेने मी झोपलो.
खास संजोपरावछद्मछटा असलेला
खास संजोपरावछद्मछटा असलेला प्रतिसाद वाचायला मजा आली. पण काही गोष्टी तुमच्या प्रतिसादात गृहित आहेत. लेखन कार्यशाळेच्या सरकपट्टीवरून दर आठवड्याला एक जीए, एखादा खानोलकर, एक मेघना पेठे, एखादा शाम मनोहर बाहेर पडताहेत. सगळीकडे दर्जेदार साहित्याचा परमानंद उसळला आहे. वाचकांहून लेखकच बहु झाले आहेत इत्यादी.
लेखन म्हणजे काही फक्त साहित्यच नव्हे. आपल्या डोक्यातले विचार पुरेशा स्वच्छपणे, वाचणार्याच्या क्षमतेचा अचूक अंदाज घेऊन, आपल्याला हव्या असलेल्या सुरात (जसं की तुमचं हे खास छद्म) लिहून काढणं हे एक कौशल्यच आहे. त्यासाठी सरावाचा, शहाण्या मार्गदर्शनाचा उपयोग होतो. आपल्यापाशी आशय असो-नसो, तो पोचवण्यासाठी तंत्र आणि त्या तंत्रावर पकड मिळवावी लागतेच. त्यासाठी सहज संपर्काचा, उपलब्ध समविचारी लोकांचा वापर करून घेतला, तर त्यात इतकं 'अब्रह्मण्यम' काय?
'आपली पुस्तकं दुर्मीळ असली म्हणजे आपण थोर लेखक' या भाबड्या, हृद्य पण वेडगळ समजुतीसारखा तुमचा प्रतिसाद वाटला.
अगदी!
त्या साखळीगोष्टीनंतरची१ या सहस्रकातली सर्वात नामी कल्पना आहे ही! कोपरापासून _/\_.
(अवांतर: गडकर्यांची 'कवींचा कारखाना' आठवत आहे काय कोणास?)
---------------------------------------------------------------------------------------------------
१ त्या साखळीगोष्ट प्रकरणाचे अधिकृत नाव विसरलो. असो. सुज्ञांच्या लक्षात येईलच म्हणा काय ते.
ही स्वयंस्फूर्त गोष्ट आहे!
अशी शिकवता येत नाही.
एक तर मुळात असावी लागते, नाहीतर निरीक्षणाने, अनुकरण करून आणता येते. पण शिकवणे?
हे म्हणजे, येशूने ख्रिस्ती धर्माची मूलतत्त्वे वगैरे शिकवावीत, अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. तो बिचारा आपल्याला वाटेल तसे वागत होता, प्राप्त परिस्थितीत जमेल तसे आपल्या मनाने जगून मोकळा होत होता. 'मूलतत्त्वां'चा वगैरे विचार त्याने केला असावा, याबद्दल साशंक आहे. (ते एसेन्शियली इतरांचे उद्योग. रादर, असले उद्योग इतरांनीच करावेत, नि शक्यतो इतरच करतात.)
(अवांतर: फॉर द रेकॉर्ड, तळटीपांचा जनक मी नाही; तळटीपांचा शोध मी लावलेला नाही. आमच्याआधी झाले बहु, नि आमच्यानंतरही होतिल बहु. मी फक्त त्या यथेच्छ, मनास येतील तशा वापरल्या आहेत, इतकेच. त्यात फाइन आर्ट बहुधा नसावी, नि सायन्स तर नाहीच नाही. असो.)
उत्तरे
ह्या प्रतिसादात "भडकाउ" काय आहे?
असले प्रोत्साहनात्मक प्रतिसाद गुर्जींना खरोखरच कार्यशाळा घ्यायला इन्स्टिगेट करतात, म्हणून प्रतिसाद भडकाऊ.
शिवाय, प्रतिसादाला 'भडकाऊ' अशी श्रेणी दिली, की प्रतिसाद देणारा भडकतो, म्हणून श्रेणी भडकाऊ.
हे रेटींग कोण देते त्याचे नाव कळायची पण सोय हवी.
हे रेटिंग देणार्याचे नाव 'न'वी बाजू असे आहे.
(दोन्हीं प्रश्नांच्या उत्तरांबद्दल या प्रतिसादास 'माहितीपूर्ण' श्रेणी ऑन डिमांड लागू आहे.)
लेख आवडला. कोणत्याही प्रकारचे
लेख आवडला. कोणत्याही प्रकारचे लेखन करण्यासाठी सराव करणे, दोष सुधारणे गरजेचे आहे. लेखातील गायनाशी सांगीतलेले साधर्म्य समर्पक आहे.
इथे किती जणांना ललित लेखनात रस आहे आणि पैकी किती जणांना या उपक्रमात भाग घ्यायचा आहे हे ठाउक नाही, पण जे घेतील त्यांना ते नक्कीच लाभदायक असेल.
व्यक्तिशः मला ललित लेखनात रस नसल्याने, गती नसल्याने मी या धाग्यावर वाचनमात्र राहीन.
गुर्जींच्या सूचनांप्रमाणे एका
गुर्जींच्या सूचनांप्रमाणे एका कथेचे पुनर्लेखन करून झालेले आहे. या उपक्रमातही सराव करायला ना नाही.
अधिक लोकांचा फीडबॅक मिळणे अधिक चांगले. अधिकस्य अधिकं फलं वगैरे.
त्यानिमित्ताने चांगलं लिहून मराठी आंतरजालावर वर्ल्ड फेमस व्हावे अशी आमची बिनमहत्त्वाकांक्षा आहेच.
एका कोर्समध्ये मी खरोखर बसून
एका कोर्समध्ये मी खरोखर बसून 'सर्जनशील लेखन' या विषयावरची व्याख्यानं ऐकली आहेत. थोडाफार सरावही केला आहे. सुरुवातीला मला तो प्रकार आचरट वाटला होता. पण त्यातून कथा/कविता/कादंबरी असं काही थोर प्रकरण बाहेर पडलं नाही, तरी सराव मात्र भरपूर होतो. सराव म्हणा, व्यायाम म्हणा. लोकांचं लिखाण वाचायला मिळतं. आपल्या लिखाणावरच्या टिप्पण्ण्या रोचक असतात. काही नाही, तरी बैठक मारून अमुक वेळ आणि अमुक प्रकार लिहिणं या प्रकाराचा सरावच करावा लागतो नि तो यात भरपूर होतो.
तिथे आम्ही केलेले आणि सुचवलेले काही अभ्यासः
- रूढ शैली वापरता दुसरा कुठलाही साहित्यप्रकार वापरून सिनेमा / नाटकाचं परीक्षण
- एका पावसाळी रात्री एका खोलीत अडकलेल्या दोन पात्रांची गोष्ट
- एक चित्र / फोटो पाहून त्यावरून गोष्ट
- उपरोधिक शैलीतला अग्रलेख
- एक बातमी घेऊन (उदा. अपघात) तिचं प्रभावी वृत्तांकन


कल्पना
ही कल्पना आवडली.
माझ्यामते एक व्यायाम/खेळ/गृहपाठ असा असू शकतो की, एखाद्या कथेची संकल्पना घ्यायची; त्यावर लोकांना लिहावयास आवाहन करायचे. ठराविक मुदतीत जे लिहून होईल त्याची मीमांसा करायची.
आता यात थोडं जज्जमेंटल होणं आहे. परंतु तसं तर आपलं इथे येणार्या प्रत्येक गोष्टीबद्दल मत असतंच. आपण ते मुद्दाम व्यक्त करत नाही इतकंच.
इतरही सुचवण्यांचं स्वागत आहेच.