एका पुरोगाम्याचं आत्मपरीक्षण
उत्पल यांच्या फेसबुकवरची ही नोंद, त्यांच्या परवानगीने इथे प्रकाशित करत आहे.
डॉ. कलबुर्गी यांची हत्या, त्यावरील बजरंग दलाच्या सह-समन्वयकाचे ट्वीट या पार्श्वभूमीवर मी काही लिहिलं होतं. त्याचा समारोप करताना मी 'अजिबात भावनिक न होता पूर्णपणे स्ट्रॅटेजिक विचारच करावा लागेल' असं म्हटलं होतं. त्या पोस्टवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापैकी हेमंत कर्णिक आणि आशुतोष जावडेकर यांच्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने आणि माझ्याही मनातील संघर्षाच्या अंगाने तटस्थपणे काही मांडायचा प्रयत्न करतो. या दोघांच्याही प्रतिक्रिया इथे देत आहे -
हेमंत कर्णिक - तुझी कन्सर्न कळते. व्यक्तीपातळीवर आपण काम करत असतोच. पण मोदीराज आल्यापासून काही लोक भयंकर चेकाळले आहेत. आपल्या आसपास वावरणार्यांच्यात खूनबाजी आणि दडपशाही यांचं उघड वा आडून समर्थन करणारे निघतील असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यांच्या बुद्धिभेदाला जनतेच्या मैदानात कसं तोंड द्यायचं, हा खरा प्रश्न आहे. नेमकी त्यांचीच हत्या होते आहे, ज्यांना हे करता येत होतं.
आशुतोष जावडेकर - अजिबात भावनिक न होता पूर्णपणे स्ट्रॅटेजिक विचारच करावा लागेल -- ' हे योग्य आहेच आणि तू कविता/गद्य जे लिहील आहेस तेही उत्तम आहे .पण अजून एक : सेलेक्टीव्ह निषेध करायची एक राजकीय पद्धत मला उजवे आणि डावे या दोन्ही बाजूंकडे आढळते. निषेध हा वृत्तीचा असावा, व्यक्तीसापेक्ष नव्हे . एक लक्षात घेऊया , अति-उजवे आणि अती-डावे या दोन्हीला या देशात कधीच जनाधार मिळालेला नाही आणि त्याच एक कारण हेही आहे की सामान्य जनतेला हा सेलेक्टीव्ह निषेध आतून कळतो!
हेमंत कर्णिक म्हणतात तसं भाजप सरकार आल्यापासून वातावरण बदललं आहे हे खरं आहे. गेल्या वर्षीची निवडणूक, भाजपचा विजय, मग मोदी सरकारची एक वर्षाची कारकीर्द यावर पुष्कळच चर्चा झाली आहे, सतत होत आहे. मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन तट पडून त्यांच्यातले प्रेमळ संवाद चराचर व्यापून उरले आहेत. मला असं जाणवतं की बहुधा इतक्या मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होण्याची ही वेळ बऱ्याच काळाने आली असावी. अर्थात यात सोशल मीडियाची भूमिका फारच महत्त्वाची आहे. कारण याआधी अशा चर्चा, वाद-विवाद होतच असणार. फक्त सोशल मीडियाने जे व्यासपीठ दिलं आहे ते अद्वितीय आहे. कारण यात विरोधक समोर नसला, दिसत नसला तरी त्याच्याशी वाद-विवाद करता येतो.
मला प्रामुख्याने आशुतोषच्या सिलेक्टिव्ह निषेधाच्या अंगाने बोलायचं आहे. पण त्याआधी थोडी प्रस्तावना आवश्यक आहे.
मला स्वतःला धर्मविरहीत जगण्याची कल्पना आकर्षित करते. मी स्वतः खरं तर तसं जगतो आहे. आणि ते केल्याने मला काहीही अडचण आलेली नाही. पण अर्थातच हे सगळं इतकं सोपं नाही याची मला कल्पना आहे. म्हणजे प्रत्येकाला धर्मविरहित जगता येईल असं नाही. वेगवेगळ्या प्रसंगी मी वैयक्तिक दुःख इतरांसारखंच अनुभवलं आहे, पण मी एका टोकाचं दुःख, अस्तित्व पणाला लागतं असं दुःख अनुभवलेलं नाही. उदा. माझं घर भूकंपात पडलेलं नाही किंवा आगीत जळालेलं नाही, माझ्या घरातील कुणी कधी दंगलीत, अपघातात मारलं गेलेलं नाही. मला अतिशय हलाखीत दिवस काढायला लागलेले नाहीत. मी स्त्री नसल्यामुळे मला आपल्या समाजातील स्त्रीच्या मानसिकतेतील असुरक्षिततेचा अनुभव नाही. (पुरूष असल्यामुळे लैंगिक गरजेच्या गोचीचा अनुभव आहे!)
एकूणात माझा जो काही थोडाफार संघर्ष असेल तो एक मध्यमवर्गीय संघर्ष आहे. माझं माझ्या दुःखांशी वैर नाही, पण मला दुःख झालं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मी माझ्या सामाजिक स्थानासकटच म्हणत असतो याचं भान मला ठेवावं लागतं. उदा. सकाळचीच भाजी काय संध्याकाळी असं वाटून जेव्हा मी वैतागतो तेव्हा असं वाटण्यात फार मोठा गुन्हा आहे असं नाही, पण सकाळची भाजी संध्याकाळी मिळणं हेदेखील काही लोकासांठी सुख असू शकतं ही जाण मला ठेवावीच लागते.
माझ्यासारखा माणूस जेव्हा 'माझा' म्हणून विचार करतो तेव्हा मला 'माझा' विचार करण्याइतपत लिबर्टी आहे हे मला लक्षात ठेवावंच लागत. कारण मी जो काही विचार करतो, करू शकतो त्यात माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील घडणीचा सहभाग असतो. माझ्या सामाजिक स्थानाचा सहभाग असतो. मी जर एखाद्या वेश्येच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी कसा विचार केला असता? मी जर दंगलीत मारल्या गेलेल्या आई-वडिलांचा मुलगा असतो तर मी कसा वाढलो असतो? मी जर हातावर पोट असणाऱ्या एखाद्या मजुराचा मुलगा असतो तर मी कसा विचार केला असता?
आपल्याला दुःख असणं हे मला मान्यच आहे. पण आपल्या दुःखाची प्रत, त्याची जातकुळी ओळखण्याइतपत आपला मानसिक विकास व्हायला हवा यात मला शंका वाटत नाही. मी जर समाजाचा भाग असेन तर समाजविचार सोडून विचार करणं मला योग्य वाटत नाही.
म्हणूनच मी धार्मिक नसलो तरी धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे मला काळजीपूर्वक बघावं लागतं हे मला विसरून चालत नाही. धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे विविध संदर्भात बघावं लागतं. श्रद्धेला संपूर्ण न नाकारता, सत्प्रवृत्त माणसांच्या श्रद्धेचा अनादर न करता माझ्यासारख्या अश्रद्ध माणसांना त्यांचं म्हणणं मांडता यायला हवं. मी उद्वेगाने अनेक वेळा धर्माबद्दल तिरकसपणे लिहिलं आहे, पण तो हल्ला अर्थातच धर्माचे नकारात्मक परिणाम, धर्माच्या अतिरेकामुळे येणारं अवलंबित्व, विचारशक्तीचा ऱ्हास यावर आहे. मला असं वाटतं की स्वतंत्र विचाराची शक्ती असेल तर वेश्येच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो की मजुराच्या पोटी जन्मलेला मुलगा असो की एखाद्या विचारवंताच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो - सगळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. ही शक्ती धर्म देतो असं मला वाटत नाही. मार्क्सचं 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे वाक्य वारंवार उद्धृत केलं जातं, पण त्या वाक्याआधी जी संपूर्ण मांडणी आहे ती बरेचदा वाचली जात नाही. ती मुद्दाम इथे देतो -
Man makes religion, religion does not make man. Religion is, indeed, the self-consciousness and self-esteem of man who has either not yet won through to himself, or has already lost himself again. But man is no abstract being squatting outside the world. Man is the world of man – state, society. This state and this society produce religion, which is an inverted consciousness of the world, because they are an inverted world. Religion is the general theory of this world, its encyclopedic compendium, its logic in popular form, its spiritual point d’honneur, its enthusiasm, its moral sanction, its solemn complement, and its universal basis of consolation and justification. It is the fantastic realization of the human essence since the human essence has not acquired any true reality. The struggle against religion is, therefore, indirectly the struggle against that world whose spiritual aroma is religion.
Religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people.
शेवटच्या परिच्छेदात मार्क्स म्हणतो की धर्म हा हृदयशून्य जगाचे हृदय आहे, आत्मा हरवलेल्या परिस्थितीचा आत्मा आहे. धर्म ही अफूची गोळी आहे.
मी धार्मिक मनुष्य नाही. अज्ञेयवादी आहे. घरात देवघर नाही. पण मी क्वचित कधी सत्यनारायणाचं बोलावणं आलं तर जातो. नमस्कारही करतो. ते औपचारिकच असतं, पण निमंत्रणाला नकार देणं काहीसं जड जातं. मी धार्मिक नसलो तरी भिडस्त आहे. पटकन नाही म्हणता येंत नाही. वैचारिक समता की माणसाशी जोडलेपण असा प्रसंग आला तर मी जोडलेपणाची निवड करेन. अर्थात त्यासाठी माणूस सत्प्रवृत्त, हिंसा न करणारा, हिंसेवर विश्वास नसलेला असायला हवा. धार्मिक माणूस सत्प्रवृत्त असूच शकतो. धर्मांध माणूस नाही. मुळात धर्म हे माझ्या दृष्टीने एक कोडं आहे. (धर्म हा शब्द मी सगळीकडे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन इ. संघटित धर्म या रूढ अर्थानेच वापरतो आहे.)
हे सगळं सांगणं आवश्यक वाटलं कारण मला पुढे जे म्हणायचं आहे ते म्हणायच्या आधी माझी व्यक्तिगत भूमिका काय हे सांगणं गरजेचं वाटलं.
मागे एकदा याकूब मेमनच्या फाशीबाबत लोकसत्तात जो अग्रलेख आला होता त्यावरील एका प्रतिक्रियेला मी प्रतिक्रिया दिली. ती वाचून अर्थातच पुन्हा प्रतिक्रिया आल्या. स्वामीजी निश्चलानंद यांनी तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांना मी दहशतवादाचं समर्थन करतो आहे असं वाटलं. त्यावर मी दहशतवादाचं समर्थन करत नाही असं म्हणून त्यांची माफी मागितली. मनापासून मागितली.
मला असं वाटतं की मी ही माफी मागितली पाहिजे, कारण मी जेव्हा तिरकसपणे काही लिहितो तेव्हा कदाचित काही सत्प्रवृत्त माणसांनाही मी दुखावलं असेल. आणि अशा वेळी माफी मागण्यात कमीपणा वाटायचं कारण नाही. कारण माणूस दुखावला गेला आहे हे सत्य मला नाकारता येत नाही.
डावे-उजवे-मधले हे सगळे विचाराने कुठल्याही बाजूचे असले तरी ती माणसं आहेत आणि म्हणून परिवर्तनीय आहेत असं मला वाटतं. मला सोशल मीडियाची भीती वाटते ती या माध्यमामुळे आपण अधिकाधिक एकारलेले, अपरिवर्तनीय होत आहोत असं वाटतं म्हणून. आपण फार तीव्रतेने भांडतोय. सतत भांडतोय. 'आपलं चुकू शकतं' हे आपण विसरतोय का? आपण सगळे मुळात एकाच व्यवस्थेत राहतोय. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा उजवे असा, ऑफिसातला बॉस किंवा व्यावसायिक असू तर आपले क्लायंट्स हेच आपले नियंत्रक आहेत हे सत्य आहे. आपल्याला आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाचे 'की रिझल्ट एरियाज' माहीत आहेत का? अशा वेळी आपण पंतप्रधान, आरबीआयचे गव्हर्नर यांच्या कामाविषयी बातम्या, लेख याच्या आधारे जोरात भांडू शकतो याची मला मौज वाटते.
सोशल मीडियाच्या या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर सिलेक्टिव्ह निषेधाचा मुद्दा पुढे येतो.
मुस्लिम दहशतवाद, मुस्लिमांकडून झालेले/होणारे अत्याचार याबाबत पुरोगामी इ. लोक काही बोलत नाहीत असा एक आक्षेप अनेकजण नेहमी घेतात. याबाबत पुढे काही लिहिण्याअगोदर मी हे कबूल करतो की या आक्षेपात तथ्य आहे. यामागची कारणं सांगता येतील. पण ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. याचाच थोडा परामर्श घ्यावा असं वाटतं.
मुस्लिम हे अल्पसंख्य आहेत आणि त्यांना या देशात सुरक्षित वाटणं गरजेचं आहे, मुस्लिम दहशतवादाचं रूप उग्र असलं तरी प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे असा एक विचार आहे आणि मीदेखील हा विचार मानणाऱ्यांपैकी आहे. मुस्लिम शासकांनी इथे, विशेषतः उत्तर भारतात अनेक शतकं राज्य केलं. बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला तो १५२६ मध्ये. तिथून मुघल साम्राज्याची सुरूवात होते. इब्राहिम लोधीच्या आधी त्याचा बाप सिकंदर लोधी, त्याआधी सिकंदर लोधीचा बाप बहलोल खान, त्याआधी सईद साम्राज्य असा सगळा इतिहास पुष्कळच मागे जातो. आणि त्यात केवढी गुंतागुंत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
आर्य बाहेरूनच आले आणि त्यांनी इथल्या लोकांना दास केलं अशी जी मांडणी आहे त्याला आंबेडकरांनी आक्षेप घेतला आहे. 'शूद्र पूर्वी कोण होते?' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात हे सगळं त्यांनी विस्तृतपणे मांडलं आहे. वैदिक परंपरेला आव्हान देणारी श्रमण परंपरा, इतर अनेक पंथ असं बरंच काही इथे घडलेलं आहे. त्यावर पुष्कळ संशोधन झालं आहे. अनेक मत-मतांतरे आहेत. त्यात शिरणं हा माझा उद्देश नाही. माझी तेवढी कुवतही नाही. हे सगळं सांगावसं वाटलं कारण या देशाच्या इतिहासाबाबत काहीही विधान करणं अशक्य आहे असं मला वाटतं. माझं इतिहासाबाबत एवढं एकच मत ठाम आहे. एकाने काही मांडलं की त्यावर दुसरा आक्षेप घेतो, दुसऱ्याने काही मांडलं की त्यावर तिसरा आक्षेप घेतो. भारताचा इतिहास हा बाकी काही नाही तरी आक्षेपांचा इतिहास आहे हे नक्की!
आता या अत्यंत म्हणजे अत्यंत गुंतागुंतीच्या संस्कृतीत, समाजात काहीजण फक्त एकच झेंडा घेऊन उभे आहेत. काहीजण हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उभे आहेत - मुस्लिम इथले नाहीत, आक्रमक आहेत, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही त्यांची भूमिका आहे. माझ्यासारखे काही आधुनिक विचारांचा झेंडा घेऊन उभे आहेत - धर्म वगैरे विसरा आता आणि खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या ही माझी भूमिका आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी इस्लामचा झेंडा घेऊन उभे आहेत - त्यांना हिंदू बहुसंख्यांचा धोका वाटतो.
आता आपण माझ्याबद्दल बोलू. मी हिंदू धर्मातील वाईट गोष्टींबाबतच का लिहितो? मला मुस्लिम समाजातील दोष दिसत नाहीत का?
याची ठळक कारणं -
मी लिबरल हिंदू घरात जन्माला आलो. लहानपणी मुस्लिम लोकांमध्ये पुष्कळ वावरलो. अगदी घरातल्यासारखा. ('असलेपण-नसलेपण' या माझ्या ब्लॉगवरील लेखात मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे.) दंगल पाहिली तेव्हा मुस्लिम काय किंवा हिंदू काय, आक्रमक म्हणून कुणीच लक्षात राहिले नाहीत. दंगलीची प्रत्यक्ष झळ पोचली नाही. हिंदू घरात वाढत होतो त्यामुळे हिंदू परंपरा जवळून पाहिल्या. हिंदू समाजात सतीसारख्या काही भयंकर परंपरा होत्या हे कळलं. देवाची मूर्ती काहीही म्हणजे काहीही करू शकत नाही हे कळलं. पुढे मग सगळंच फोल वाटू लागलं. सामाजिक वाचन झालं त्यात हिंदू समाज, हिंदू धर्मसुधारणा याचाही समावेश होता. धार्मिक वाचन झालं नाही. आईने एकदा लहानपणी शनिमाहात्म्य वाचून दाखवलं होतं. तेव्हा मला साडेसाती सुरू होती म्हणून. पण ती शनीची गोष्ट मी गोष्ट म्हणूनच ऐकली होती. मोठेपणी गीतारहस्य उत्साहाने वाचायला घेतलं होतं, पण ते काही झेपेना. भक्तीयोगात मला शरण जा, माझी भक्ती करा असं काही यायला लागलं तेव्हा कंटाळा अधिकच वाढला. देव समजा ठीक आहे, पण देवळाच्या बाहेर भिकारी का असतात? आत देव - सगळ्या जगाचा त्राता आणि त्याच्या दाराबाहेर भिकारी कसे? पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर वेश्यावस्ती आहे. मंदिरात जाणं योग्य, पण या बायकांशी बोलणं चांगलं नाही असं का? असे प्रश्न पडू लागले. मला असं लक्षात येऊ लागलं की आपण भौतिक जगाकडे आस्थेने बघणाऱ्यांपैकी आहोत. आपल्याला अध्यात्माची गोडीच नाही. आपल्याला जमिनीवरचे, जगण्याचे प्रश्न जास्त खुणावतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला गणपतीकडे बघून काही वेगळं, शांत, प्रसन्न असं वाटत नाही. आपल्याला त्या वेश्येमध्ये रस आहे. आपल्याला तिच्याशी बोलावसं वाटतं. या जगात दुःखाचं एक मूलभूत कारण पैसे नसणं हे आहे. असं असताना धर्म त्याबद्दल काय सांगतो? तर काही नाही. धर्म म्हणतो की पैसे कसे कमवायचे ते तुमचं तुम्ही बघा. पण तुम्ही पैशासाठी वेश्याव्यवसाय करणं वाईट. आणि ते करणारेही वाईट. पण मग जिला फसवून या व्यवसायात आणलं ती वाईट कशी?
धर्माने मला, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या माणसाला काय दिलं? किंवा धर्मपालन करणाऱ्या आसपासच्या लोकांनी मला वैचारिकदृष्ट्या काय दिल? तर काही नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकत नव्हते. त्यांच्या श्रद्धेला माझा विरोध नव्हताच, पण ते बदल घडवून आणू शकत नाहीत हे लक्षात येत होतं. धर्म माणसांना एकत्र ठेवतो असं सांगण्यात येतं. पण जर सगळ्यांना व्यवस्थित पैसे मिळाले आणि सगळ्यांनी नागरिकशास्त्राचे नियम पाळले तरी सगळे एकत्र राहतीलच की. उलट ते अधिक चांगल्या पद्धतीने एकत्र राहतील. मग सगळ्यांकडे पैसे असतील, सगळेजण नागरिकशास्त्र समजून घेतील यासाठी काय करायचं?
ऐहिक जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यात्म किंवा धर्म कसे उपयोगी पडतील, मुळात उपयोगी पडू शकतील का असा विचार मी केला नाही हेही खरं आहे. कारण त्यातला रसच संपला होता. माझी वैचारिक भूक भागत नव्हती त्यामुळे धर्माबद्दलची माझी आस्था संपली होती. आपल्या प्रश्नांची उत्तरं धर्मात, परंपरांमध्ये नाहीत हे लक्षात आलं.
माझ्या आसपासचे लोक हिंदू होते. आहेत. ज्या सार्वजनिक उत्सवांमुळे त्रास झाला (आवाज, गर्दी, लोकांची गैरसोय) ते प्रामुख्याने हिंदू उत्सव होते. माझ्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या गांधींना मारणारे हिंदू होते. दुसरा प्रभाव म्हणजे आंबेडकर. त्यांनी ज्या समाजातील जाती-आधारित शोषण मला दाखवलं तो हिंदू समाज होता. दाभोळकरांची हत्या झाल्यावर त्यांच्या चित्रापुढे फुली मारणारी सनातन प्रभात ही हिंदू संघटना आहे. स्टेन्स आणि त्यांची दोन लहान मुलं यांना जिवंत जाळणारा दारासिंग हा कट्टर हिंदुत्ववादी होता. कुलबर्गी यांच्या हत्येनंतर ट्वीट करणारा हिंदुत्ववादी होता.
दंगलीचा संदर्भ मी देत नाहीये. कारण त्यात दोन्हीकडील माथेफिरू असतात. आणि गरीब हिंदू व गरीब मुस्लिम श्रीमंत हिंदू आणि श्रीमंत मुस्लिमांनी भडकावल्यामुळे मूर्खपणे एकमेकांचे गळे कापतात. दंगल हा एक वेगळाच विषय आहे. मी काही सुटे प्रसंग देतोय ज्यात दंगल वगैरे नसताना अचानकपणे हत्याकांड घडलेलं आहे.
वर उल्लेख केलेल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच कट्टर मुस्लिमांनी इथे अलिकडे अशा प्रकारची हत्याकांडे केली आहेत का? माझ्या माहितीत तरी नाही. आणि जर असं काही घडलं असेल तर ते निषेधार्हच आहे.
मी हिंदू धर्माची माझ्या कुवतीनुसार थोडीफार चिकित्सा करतो, करू शकतो कारण माझ्याकडे तेवढी सामग्री आहे. माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची इतकी सामग्री नाही.
थोडक्यात, 'मला धर्म नाही आणि मला धर्मविरहित जगू द्या' हे मी आज सांगत असलो तरी मी ज्या धर्माला पाहिलं, अनुभवलं आणि ज्या धर्मामुळे मला वैचारिक त्रास झाला तो हिंदू धर्म होता. मी मुस्लिम असतो आणि लिबरल असतो तर मी मुस्लिम धर्माची चिकित्सा केली असती. कारण त्यावेळी माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची सामग्री असती.
आता ही चिकित्सा करताना मी उपरोधिक झालो आहे हे खरं आहे. आणि त्यामुळे कुणा सत्प्रवृत्त धार्मिक माणसाला मी दुखावलं असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला 'खुमखुमी' येते हे खरं आहे, कारण धर्मांधता माझ्यातल्या क्रिएटिव्ह माणसाला जागं करते.
मला मुस्लिमांचा त्रास कुठे दिसतो? अर्थातच दहशतवादी कृत्यात. मग मी त्या हल्ल्यांनी व्यथित होऊन लेख लिहिला का? निषेधाची कविता केली का? नाही केली. याचं कारण? माहीत नाही. मला काही सुचलं नाही इतकंच. ’मला का सुचलं नाही’ याचं विश्लेषण होऊ शकतं. आणि मी त्याबाबतीतील प्रश्नोत्तरांना तयार आहे.
मी स्वतः 'पुरोगामी' गटातला आहे. म्हणजे मला या गटातील लोकांचं सगळं पटतं का? नाही. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण द्यावं का? खुशाल द्यावं. महाराष्ट्र भूषण हा एक फार मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं का? अजिबात नाही. नोबेल पुरस्कार मिळालेल्या माणसाहून नोबेल न मिळालेला भारी माणूस जगात असू शकतो का? हो. असू शकतो. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी सापडले तर त्यांना फाशी द्यावी का? देऊ नये. माझ्यावर दाभोळकर, पानसरे यांचा प्रभाव आहे का? अर्थातच आहे. औरंगजेब रोडचं नाव बदलायला माझी काही हरकत? अजिबात नाही. महात्मा गांधी रोडचं नावदेखील बदलावं. त्यांचे पुतळे वगैरेसुद्धा काढावेत. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक बंद करावं का? करू नये. माझ्या आसपास गांधींना मनसोक्त नावं ठेवणारे लोक आहेत. मी त्यांच्याशी प्रतिवाद करतो का? नाही करत. कारण गांधी न आवडणारे लोक असू शकतात हे मला स्वीकारता आलंच पाहिजे असं मला वाटतं. गांधींवर जे जे आक्षेप आहेत ते ते मला तपासावेसे वाटतात. कारण गांधींचा माझ्यावर प्रभाव आहे. मी त्यांचा भक्त नाही. ज्या दिवशी मी 'भक्त' होईन त्या दिवशी मी संपेन असं मला वाटतं.
माझ्यासमोर आव्हान हे आहे की मी गांधी विचार रस्त्यांची नावं, पुतळे याशिवाय लोकापर्यंत कसे पोचवू शकतो हे बघण्याचं. मला 'गांधी' लोकांपर्यंत पोचवायचे नाहीत. गांधी विचार पोचवायचा आहे.
गांधींचा खून झाल्यावर ब्राह्मणांची घरं जाळली गेली तेव्हा ती वाचवण्यासाठी गांधीवादी मंडळीसुद्धा गेली होती. आता समजा गोळवलकर गुरुजींची हत्या झाली असती तर आपल्याकडे काय घडलं असतं? हिंदुत्ववादी मंडळींनी 'हो, मी गोळवलकरांना मारलं' अशा नावाचं नाटक चालू दिलं असतं का? हत्या समजा मुस्लिम माणसाने केली असती तर मुसलमानांची घरं वाचवायला हिंदुत्ववादी गेले असते का?
गांधीप्रणित सहिष्णुता आणि धर्मप्रणित असहिष्णुता यात हा जो फरक आहे तो आपण, विशेषतः हिंदुत्ववादी मित्रांनी लक्षात घेतला पाहिजे.
आता शेवटचं.
'पुरोगामी' या शब्दाबद्दल आणि त्या विचारांच्या लोकांबद्दल आज जी नाराजी दिसते तिकडे दुर्लक्ष नाही करता येणार. आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आपण खरोखरच सिलेक्टिव्ह निषेध करतो का? आपण खरोखरच काहीही झालं तरी मुस्लिमांची बाजू घेतो का हे तपासलं पाहिजे. देशांतर्गत ज्या काही घटना होत आहेत त्यात मुस्लिम दोषी असतील तर ते दोषी आहेत हे ठामपणे म्हटलं पाहिजे. मुळात हा हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नाही. आपण गुन्हेगारांचा निषेध करणार असू तर सर्वच गुन्हेगारांचा निषेध करायला हवा. मला कल्पना आहे की कदाचित असा निषेध होऊनदेखील उजव्या विचारांच्या लोकांपर्यंत तो पोचला नसेल. पण तरी त्यांच्यात जी नाराजी दिसते ती अशी दुर्लक्षून चालणार नाही असं मला वाटतं. आपण आपला विचार फक्त निषेधाच्या माध्यमातून कसा पोचवू शकणार? परिवर्तनाच्या चळवळीत अनेक मोठे कार्यकर्ते होऊन गेले. अनेक कार्यकर्ते आजही काम करत आहेत. पण संघाच्या शाखा झपाट्याने वाढतात आणि परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यक्रमाला परिवर्तन झालेले लोकच जास्त प्रमाणात असतात हे का? धर्म आणि श्रद्धा या देशातल्या लोकांच्या डीएनएमध्ये आहे. कदाचित परिवर्तन माझ्या डीएनएमध्ये आहे तसंच. म्हणून आपल्याला वादापेक्षाही कल्पकता दाखवावी लागेल. संध्याकाळी खेळायला म्हणून मुलांना एकत्र करून संघाची शाखा भरवली जाते. ही कल्पना चांगली आहे. आपण परिवर्तनाचा विचार अशा माध्यमातून रुजवू शकतो का? खेळण्यासाठी मुलांना एकत्र करून त्यांच्यात वैज्ञानिक विचार रुजवता येतील का? आपण परिवर्तनवादी आहोत याचा आपल्याला अहंकार आहे का? आपण सामान्य माणसाशी जोडून घेऊ शकत नाही आहोत का? धर्माची चिकित्सा तर व्हावीच, पण आपण फक्त तेवढंच करतो आहोत का? आपण पर्याय देतो आहोत का? आपल्याला परिवर्तन हवं आहेच, पण असे अनेक प्रश्नही आपण आपल्याला विचारले पाहिजेत. कारण आपण प्रश्न विचारणारेच लोक आहोत. त्यातून आपली स्वतःचीदेखील सुटका नाही.
भारतातील खरा झगडा हा हिंदू-मुस्लिम नसून कम्युनल हिंदू आणि लिबरल हिंदू हा आहे असं राम मनोहर लोहियांनी म्हटल्याचं स्मरतं. मला असं वाटतं हे दोघे एकत्र आले, किमान त्यांच्यातले ताण कमी झाले तर कदाचित आपल्याकडचे बरेच प्रश्न सुटतील. विभागला गेलेला फोर्स एकत्र येईल. हा भाबडेपणा आहे हे मला मान्य आहे. पण तरी मी हे म्हणतो आहे. कदाचित भाबडेपणा हाच माझा स्ट्रॅटेजिक विचार असेल.
- उत्पल
श्रीगुरुजींचे प्रतिसाद खरंतर तर्ककर्कश्श
आदिती,
निदान शिव्या तरी योग्य त्या घाला.
श्रीगुरुजींचे प्रतिसाद तर्कहीन आहेत असे कशावरून म्हणत आहात?
खरंतर त्यांना तर्ककर्कश्श म्हणायला हवे.
होय श्रीगुर्जींची चौफेर
होय श्रीगुर्जींची चौफेर बॅटींग अतिशय आवडली. मला या विषयात फारसं गम्य नाही पण दोन्ही बाजू तोडीस तोड लढल्याने हा धागा अत्यंत रोचक झालेला आहे.
धन्यवाद शुचि!
धन्यवाद शुचि!
माझ्या प्रतिसादांना तर्कहीन
माझ्या प्रतिसादांना तर्कहीन किंवा तर्ककर्कश्श म्हणणार्या दोन्ही विचारांच्या प्रतिसादकांचे आभार!
षंढ नव्हे बलात्कारी!
नाही हो, श्रीगुरुजी!
मी तुमच्या प्रतिसादांना तर्क कर्कश्श म्हणत नाहीय. ते तर्कपुर्ण आणि वस्तुस्थितीला धरूनच आहेत यात शंका नाही. पण, तुम्हाला जर कुणी शिव्या देत असेल तर तिच्या शिव्या तरी नेमक्या वस्तुस्थितीला धरून असाव्यात असे मला म्हणायचे होते.
अवान्तरः अनेक स्त्रियांशी प्रेमप्रकरणे करणाऱ्या माणसाला षंढ अशी शिवी घालता येणार नाही त्याला फारतर नराधम/ बलात्कारी (ते वस्तीस्थिती ला धरून नसले तरी, पण केवळ मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नाही म्हणून क्षोभ व्यक्त करण्यासाठी) म्हणावे लागेल.
अवांतर
का बुवा? प्रेमप्रकरण करण्याचा नि षंढतेचा काय संबंध? काय कळले नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कार्नल रिलेषनबद्दल म्हणायचे
कार्नल रिलेषनबद्दल म्हणायचे असावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अभ्यास वाढवा.
अभ्यास वाढवा. आणखी काय लिहिणे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शास्त्रादपि बलीयसी
शास्त्रात ७ प्रकारचे षंढ सांगितलेले आहेत. त्यांपैकी काही शरीरसंबंध ठेवू शकतात. शिवाय, पुरुषाचे लिंग उद्दीपित होत नसेल तरीही स्त्रीला शरीरसुख देता येणे शक्य असते. अन्यथा समलिंगी स्त्रियांना शरीरसुख मिळालेच नसते. पण ते असो. इथे फार अवांतर नको.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद!
धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुठली
कुठली वस्ती अन कोणती स्थिती म्हणताय?
-Nile
मी तुमच्या प्रतिसादांना तर्क
धन्यवाद!
या धाग्यावरील चर्चा नुकतीच
या धाग्यावरील चर्चा नुकतीच वाचली. दोन्ही बाजूंनी मांडलेल्या मतांमधून मला काही नवीन माहिती मिळाली त्याबद्दल सर्वजणांचे आभार. मी स्वतः ऑनलाइन चर्चेसाठी नालायक आहे, त्यामुळे राजेश, अदिती, चिंजं आणि इतरही काहींनी जे मुद्दे मांडले त्यातून मला बळ मिळालं. या सर्वांचे विशेष आभार. श्रीगुरुजी, बॅटमॅन, अनामिक व इतरांनी केलेल्या प्रतिवादातही मला काही महत्त्वाचे मुद्दे दिसले. त्यांचेही आभार.
माझा लेख, त्यावरील इथली आणि फेसबुकवर झालेली चर्चा, काही प्रत्यक्ष चर्चा याच्या पार्श्वभूमीवर मला पुन्हा काही लिहावंसं वाटतं आहे. परंतु मला आत्ता इथे दोन मुख्य मुद्दे मांडायचे आहेत.
पहिला मुद्दा म्हणजे आत्मपरीक्षणाबाबत. मला असं जाणवलं की मी जसं आत्मपरीक्षण करू इच्छित आहे तसं आत्मपरीक्षण करण्याबाबत पुरोगामी लोकांना विरोध करणारे किंवा पूर्णतः उजव्या विचारसरणीचे मित्र उत्सुक नाहीत. किमान या धाग्यावर तरी मला असं दिसलं. अन्यत्र कुठे त्यांनी ते केलं असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. हिंदू धर्मावर सतत टीका करताना पुरोगामी मंडळी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मीयांविरुद्ध काहीच बोलत नाहीत हा त्यांच्या मनातला प्रमुख राग आहे आणि तो समजण्यासारखा आहे. अर्थात या मुद्द्यावर विचार करताना 'अखेरीस रागावणारेही सिलेक्टिव्ह होतात आणि मुस्लिमांवर सतत टीका करताना हिंदूंचे दोष नजरेआड करतात' असं मला वाटू लागलं आहे. पण याबाबत स्वतंत्रपणेच लिहिणं योग्य होईल. भारतीय संदर्भात कट्टर हिंदुत्ववाद हा स्वयंभू आहे की इस्लामिक कट्टरतेला प्रतिक्रिया म्हणून तो प्रबळ झाला आहे याचाही अभ्यास करायला हवा असं मला वाटतं आहे.
दुसरा मुद्दा हिंदू अतिरेकी या शब्दप्रयोगाबाबत. श्रीगुरुजी यांना मी हा शब्द वापरणं मान्य झालं नाही. त्याबद्दल मी त्यांची माफीही मागितली. पुढील चर्चेत असं दिसलं की 'आरोप सिद्ध झालेला हिंदू अतिरेकी' नसल्याने हा शब्द वापरण्याबाबत त्यांना आक्षेप आहे. पण नथुराम गोडसे हा हिंदू दहशतवादी होता असं मी म्हटलं तर त्यात काही चुकीचं होणार नाही कारण त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेला होता. नथुराम गोडसे वगळता इतर ठिकाणी, इतर जणांबाबत अतिरेकी, दहशतवादी या शब्दप्रयोगाबाबत व्याख्येवरून बराच वाद होऊ शकेल. आणि तो या धाग्यावर झालेलाही आहे. त्यामुळे त्यात मी जात नाही. एक गोष्ट मात्र खरी की मुस्लिम दहशतवादाचं जगातील स्वरूप, त्याची तीव्रता आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या कारवाया अशी तुलना होऊन त्यात अधिक-उणे होऊ शकेल.
मला सांगायचं आहे ते हे की हिंदू दहशतवाद किंवा हिंदू अतिरेकी या शब्दप्रयोगांबाबत माझ्या मनात जो गोंधळ श्रीगुरुजी यांच्या प्रतिवादामुळे निर्माण झाला होता तो आता मिटला आहे. उत्तर प्रदेशातील ताजी घटना (मोहम्मद अखलाक याची हत्या), सनातन संस्था आणि त्यांचे 'साधक', बजरंग दल, श्रीराम सेनेसारख्या कट्टर संघटना या पार्श्वभूमीवर मला आता हिंदू अतिरेकी, हिंदू दहशतवादी असे शब्द वापरायला काहीही अपराधी वाटत नाही. (एक सूचना - याबाबत Godse's Children - Hindutva Terror in India हे सुभाष गाताडे लिखित पुस्तकही उपयोगी पडू शकेल). शिवाय या चर्चेत पुढे आलंय तसं मारून टाकणाराच फक्त दहशतवादी असतो असं नाही, तर लोकांच्या मनात भय उत्पन्न करणे हाही दहशतवाद आहे. मी स्वतः 'पुरोगामी दहशतवाद' या शब्दाला तात्विक विरोध करत नाही. (पुरोगाम्यांना एवढे शत्रू आहेत यातूनच काय ते दिसतं…:)…). प्रत्यक्षात पुरोगामी लोकांनी आजवर संकल्पनात्मक सुधारणेचं फार मोठं काम केलं आहे. पण तरीही अतिरेक झाला असेल, एकारलेपण आलं असेल तर ते मान्य करून त्यांच्याकडून 'वैचारिक दहशतवाद' झाला हे मान्य करायला माझी काहीच हरकत नाही. सांगायचा मुद्दा हां की मुस्लिम दहशतवाद भीषण आहे हे मी पूर्णपणे मान्य करतो आणि तिकडे पुरोगामी लोकांनी लक्ष दिलेलं नाही हे पुन्हा एकदा सांगतो. पण असं असलं तरी हिंदू दहशतवाददेखील अस्तित्वात आहे आणि त्याची परिणती मुस्लिम दहशतवादाइतक्या गंभीर प्रश्नात होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत हेदेखील मी इथे ठामपणे सांगू इच्छितो.
शेवटचं म्हणजे मी 'पुरोगामी' विचाराचा आहे याचा मला आनंद होतो आहे. कारण या बाजूला अडचणी आहेत, त्रुटी आहेत. पण वैचारिक दिशा योग्य आहे. मला इतरांचं माहीत नाही, पण 'माझं चुकलं' हे म्हणताना मला त्रास होत नाही. मी चुकू शकतो, नव्या माहितीच्या, नव्या ज्ञानाच्या प्रकाशात मी माझं मत बदलायला तयार असायला हवं ही माझी प्रमुख धारणा आहे. प्रश्न असा आहे की 'हो, माझं चुकलं, मी स्वतःला तपासेन' असं कबूल करायला हिंदुत्ववादी तयार आहेत का?
प्रश्न असा आहे की 'हो, माझं
काही काळापूर्वी कुरूंदकरांनी 'मी मुस्लिम नसल्याने माझ्यावर अल्ला मानण्याची सक्ती नाही हे मान्य करायला तुम्ही तयार आहात का?' असा प्रश्न मुसलमानांना विचारला होता.
आज त्याच प्रकारचा प्रश्न कोणीतरी हिंदुत्त्ववाद्यांना विचारल्याने आता दोघेही समान पातळीवर आले आहेत असे म्हणून समान नागरी कायदा लागू करावा अशी मागणी होणार बहुधा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आज त्याच प्रकारचा प्रश्न
अहो ऋ, तुम्ही, मी आणि इथले जवळजवळ सर्वच जन्मानी हिंदू आहेत. त्यातल्या तुम्ही, मी आणी बर्याच लोकांनी देव सोडला आहे. म्हणजे हा प्रश्न, कमीत कमी ह्या आणि ह्या सारख्या हिंदुंना तरी विचारता येतोच ना, फक्त हिंदुत्ववाद्यांना च का?
बाकी काय चाललंय?
बाकी हिंदूंना अडचण नसावी हे त्यामागे गृहीत असेल कदाचित?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाकी हिंदूंना अडचण नसावी हे
तोच तर पाँईट आहे चि.ज. बहुसंख्य हिंदुंना अश्या प्रश्नात अडचण नसते. ह्याचे महत्व तुम्ही समजुन घेत नाही का? उगाचच बॅशिंग करताना.
अहो मावशी हिंदु वायले
अहो मावशी हिंदु वायले हिंदुत्त्ववादी वायले!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कुरुंदकरांनी प्रश्न
कुरुंदकरांनी प्रश्न मुसलमानांना विचारला होता ना, मग इथे प्रश्न हिंदूंना विचारला पाहिजे, हिंदुत्ववाद्यांना का?
------------------------
तसेही कोणी बिचारा मुलगा ८०% मार्क मिळवून पास होत असेल तर त्याला तुझे २०% मार्क का गेले म्हणुन सतत झोडपू नये असे आपले माझे मत. त्यापेक्षा शेजारच्या मुलाला तर शाळेतुन काढुनच टाकले आहे त्यापेक्षा आपला मुलगा खूप बरा म्हणुन खुष व्हावे.
कुरुंदकरांनी प्रश्न
ज्यांनी हिंदुत्त्ववाद्यांना प्रश्न विचारलाय त्यांना कुरुंदकर आठवले नव्हते.
तेच तर - इथे त्याला बघा कसे शाळेतही घेत नाहीयेत, इथे तुम्ही उरलेल्या २०%साठी मारे झिजताय.. बंद करा! असा अजब ओरडा चालु असतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
RIP स्वतंत्र विचार. RIP
RIP स्वतंत्र विचार. RIP secularism (कुरुंदकरांचीच व्याख्या).
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
प्रतिसाद आवडलेला आहे.
"आपल्या मतात चिकित्सा->मतात बदल ->सुधारणा" निव्वळ इतकं जरी आपण स्वतःला पुरोगामी/प्रतिगामी वगैरे लेबलं न लावता केलं तरी पुरावं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
धन्यवाद..
अगदी..लेबल नाही लावलं तरी चालेल....
उत्पल ही प्रतिक्रिया मिळून
उत्पल
ही प्रतिक्रिया मिळून सार्या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे. मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती.
माझ्याकडे सुजाता देशमुख यांचा मूळ लेख नाही. त्यामुळे कदाचित थोडे सुसंगत वाटणार नाही. पण तरी स्वतंत्र्य रित्या पाहिले तरी चालेल. उपक्रमचे संकेतस्थळ रिड ओन्ली स्वरुपात देखील गंडते म्ह्णुन पेस्टवत आहे.
पुरोगामी जमातवाद
पुरोगामी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे 'डाव्या` असा शिक्का लोकांनी मारलेल्या सामाजिक, राजकीय, संघटना तसेच 'आम्ही डावं उजवं मानीत नाही. जात, धर्म पंथ वंश मानीत नाही. अशा विचारांचे लोक` असं चित्र डोळयासमोर येईल.
तुमचा कुत्रा कुठल्या जातीचा आहे असा प्रश्न विचारल्यावर पामेरियन, अल्सेशियन असं काही उत्तर मिळाल्यावर त्याची अंगकाठी, रंगरूप बांधा वगैरे गोष्टी डोळयासमोर येतात. तसं माणूस कुठल्या जातीचा आहे असं विचारल्यावर तो हलकट, काळा, गोरा, उंच, विद्वान असं अभिप्रेत नसंत. त्याची जन्मानुसार असलेली मराठा, महार, मांग, चांभार, ब्राम्हण वगैरे अभिप्रेत असतं. निसर्गात अभिप्रेत असलेली जात ही गुणधर्मानुसार असते. एकटया गुलाबाच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. सरकारी नोकरीत बायोडाटा देताना मला जात विचारली तर 'मी मनुष्य जातीचा प्राणी आहे' व 'मानवता हा माझा धर्म' असे सांगितल्यावर सगळे हॅ हॅ करुन हसले. तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते मी सांगणार नाही असे म्हटल्यावर त्याने नाही सांगितले तरी आम्हाला कळतं असे म्हणून स्वत:च तो कॉलम भरुन टाकला.
एखादा वाद आला म्हणजे मध्यवर्ती मुद्दा आला तसं पुरोगामी जमातवादाला सुद्धा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. तो म्हणजे जन्माधिष्ठित नसलेले पुरोगामित्व. हे पुरोगामित्व सुद्धा कुठल्यातरी बिंदूमुळेच मिळालेली एका रेषेवरील दिशा आहे. त्याच अनुषंगाने प्रतिगामित्व ठरते. या बिंदूच्या सापेक्षते मुळेच पुरोगामित्वाचे शिक्के बसत असतात. त्या मुळे पुरोगामी कुणाला म्हणायचं या प्रश्नात प्रसंगी कुत्सितता वाटली तरी सापेक्षता पण आहे. लेखात नमूद केलेला पुरोगामी जमातवाद हा धर्म निरपेक्षतेशी निगडीत आहे. या धर्म निरपेक्षतेची सापेक्षता ही जन्माधिष्ठित असलेल्या धर्माशी सापेक्ष आहे. पुरोगामित्वाचं सोवळं हे लोकांनीच नेसवलेलं आहे. त्याला मी धर्मविरहित आहे असे सांगण्याची सोय नाही. त्याने स्वत:ला काहीही म्हणवले तरी जन्माधिष्ठित धर्म हा त्याला चिकटला जाणारच. सर्वधर्मसमभाव हे तर रिंगमास्टर एकमेकाचे हाडवैर असणारं प्राणी जस एका रिंगणात 'प्रेमानं` बसवितो तसा बसवलेला भाव आहे. हिंदुत्ववाद हा तरी कुठे एक आहे? त्यातही अनेक छटा आहेत. विविध जाती- जमातींची उतरंड असलेला हा समाज एक असणं हे मानण सुद्धा त्या रिंगमास्टरची कमाल आहे. धर्मनिरपेक्षतेची चिकित्सा करताना कुठलाही धार्मिक मूलतत्ववाद आणि धर्मांधता वगळता येत नाही. धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्ववाद याचे मूल्यमापन करताना धर्मचिकित्सा ही अपरिहार्य बनते कारण धर्म तत्वांची त्याला जोड असते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला एक प्रश्न नेहमी विचारला जातो काहो तुम्ही फक्त हिंदूच्याच अंधश्रद्धांवर झोड उठवता पण मुस्लिमांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे बोलत नाही? हा पळपुटेपणा नाही काय? यात हिंदूंच्या अंधश्रद्धाविषयी बोलण्याचा अधिकार प्रश्नकर्त्याने मान्य केलेला आहे. किंबहुना हे काम तुम्ही चांगलच करता आहात असाही कधी कधी सूर असतो. पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही. चळवळ ही प्रबोधनाशी निगडित असल्याने जवळीक हा महत्वाचा दुवा आहे. अंधश्रद्धा ही सापेक्ष आहे ही बाब जरी घटकाभर बाजूला ठेवली तरी अंधश्रद्धा ही हिंदू धर्मातील काय किंवा मुस्लिम धर्मातील काय तितकीच अंध आहे.चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा धर्मांधता व मूलतत्ववाद हा राष्ट्रहिताशी निगडीत असते त्यावेळी ही चिकित्सा सोयीनुसार करुन चालणार नाही ती कठोरपणेच झाली पाहिजे ही बाब नाकारुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी ठरलेली ९/११ ही न्यूयार्क मधील घटना ही त्याची साक्ष आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
'पुरोगामी जमातवाद'विषयी मी
'पुरोगामी जमातवाद'विषयी मी मि.सा. मध्ये असताना ऐकलं होतं. मूळ लेख वाचायचा राहिला मात्र…
तुमचं म्हणणं पटलं. अगदी असेच काही मुद्दे माझ्याही मनात आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे मला नव्याने लिहावंसं वाटतं आहे…व्यक्तिगत पातळीवर मी केवळ हिंदू धर्मातील अनिष्ट बाबींवर टीका केली तर ते ठीक आहे, मात्र संघटनेचा प्रतिनिधी म्हणून, व्यासपीठावरून बोलताना मला दृष्टीकोन व्यापक करावा लागतो….असो. सविस्तर लिहिणंच योग्य होईल.
प्रतिसादाबद्दल आभार….
समान कायदा
कायदा सगळ्यांना समान असल्याकारणाने माझ्या मते आता कारवाई मात्र सर्व धर्मातल्या 'जादूटोण्या'विरोधात होते आहे. खरं ना?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
.....हो, होत असणार. तसं
..:)...हो, होत असणार. तसं अपेक्षित आहे...
पहिला मुद्दा म्हणजे
आत्मपरीक्षण अनेकजण करीत असतात. आत्मपरीक्षण करण्याची तुमचीच पद्धत निर्दोष आणि सर्वोत्कृष्ट आहे असे तुमचा समज दिसतो, म्हणूनच "मी जसं आत्मपरीक्षण करू इच्छित आहे तसं आत्मपरीक्षण करण्याबाबत पुरोगामी लोकांना विरोध करणारे किंवा पूर्णतः उजव्या विचारसरणीचे मित्र उत्सुक नाहीत. " असं तुम्हाला वाटतंय. दुसरं म्हणजे आत्मपरीक्षण करणारे प्रत्येक वेळी आपले अनुभव सार्वजनिक करतील अशी तुमची अपेक्षा दिसते.
माफी मागण्याची अजिबात गरज नव्हती हे मी माझ्या एका प्रतिसादात लिहिले होते. नथुराम गोडसे हा 'हिंदू दहशतवादी' किंवा 'दहशतवादी' अजिबात नव्हता. याविषयावर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. ती वाचल्यास खुनाची परिस्थिती जास्त स्पष्ट होईल.
मुळात तुमच्या मनात हिंदू दहशतवाद किंवा हिंदू अतिरेकी या शब्दप्रयोगांबाबत गोंधळ नव्हताच. 'हिंदू दहशतवाद' आणि 'हिंदू अतिरेकी' हे अस्तित्वात आहेतच हे तुमचे सुरवातीपासूनच ठाम मत होते. त्यामुळे मनात जो गोंधळ नव्हतात तो मिटण्याचे कारणच नाही. आपण लिहिलेला लेख पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचल्यास हे लक्षात येईल. सनातन, बजरंग दल, श्रीराम सेना इ. संघटनेच्या एकाही कार्यकर्त्यावर आजतगायत दहशतवादी कृत्ये करून हिंसा केल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही ही वस्तुस्थिती असताना 'हिंदू दहशतवाद' आणि 'हिंदू अतिरेकी' हे अस्तित्वात आहेतच हे तुमचे सुरवातीपासूनचे मत होतेच. १-२ उदाहरणे देतो.
- दाभो़ळकरांच्या खुनानंतर सुरवातीचे २-३ आठवडे सनातनच्या ६०-७० कार्यकर्त्याची कसून तपासणी झाली. त्यात काहीही सापडले नाही.
- १६ सप्टेंबरला सनातनच्या समीर गायकवाडला पकडल्यानंतर अनेक बातम्या येऊ लागल्या. समीर गायकवाड सराईत गुन्हेगार आहे, त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे ही बातमी सातत्याने झळकायला सुरुवात झाली. प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नव्हती हे २-३ दिवसांनी लक्षात आले. समीरने पानसरेंना मारल्याची मैत्रीणीकडे कबुली दिली, त्याने पानसरेंच्या खुनापूर्वी त्यांच्या घराची रेकी केली होती असेही प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात हेही खोटे निघाले. आता तर २-३ दिवसांपूर्वी वृत्तपत्रात असे आले आहे की समीर या खुनात नव्हता आणि त्याला खुन्यांची माहिती नसावी या निष्कर्षाला पोलिस आले आहेत. हा खून कदाचित छोटा राजनच्या टोळीने केला असावा असाही एक नवीन अंदाज निघाला आहे.
परंतु तो पर्यंत हा खून समीरनेच केला असून सनातनवर तातडीने बंदी घालावी यासाठी वाहिन्यांवर अनेक तास चर्चासत्रे झाली. आता मात्र समीरचा नागोरी होणार का अशी चर्चासत्रे सुरू झाली आहेत. माध्यमांचं असं वैशिष्ट्य असतं की ते आधी बाण मारून बाण लागलेल्या बिंदूभोवती वर्तूळ काढून आपला बाण अचूक लक्ष्यावर लागला आहे असे ते दाखवितात. समीरला पकडून १५ दिवस झाले, परंतु अजूनही पोलिसांना भरीव पुरावा मिळाल्याचे दिसत नाही.
परंतु तुमच्यासारखे पुरोगामी सनातनला आधीच 'हिंदू दहशतवादी' ठरवून मोकळे झाले सुद्धा.
मोहंमद अखलाकचा काल जो दुर्दैवी खून झाला, त्यावरून निष्कर्ष काढण्याआधी अजून काही दिवस थांबायला हवे. खुनामागे नक्की बीफसेवन हेच कारण होते का अजून दुसरे काही होते हे काही दिवसात कळेलच. खुनाच्या आदल्या दिवशीच गावकर्यांनी त्याच्या कुटुंबाला भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या हे वाचले. आणि लगेच दुसर्या दिवशी तेच गावकरी त्याला बीफसेवन या कारणावरून मारतील याचे नवल वाटते. उत्तर प्रदेश मध्ये नजीकच्या भविष्यकाळात स्थानिक निवडणुका आहेत. कदाचित तो अॅंगलसुद्धा असू शकेल. या खुनाची संपूर्ण माहिती येईपर्यंत जरा थांबूया आणि नंतर निष्कर्ष काढू.
तुम्ही ज्या विचारांना 'पुरोगामी' विचार समजता त्या विचारांचा मी नाही याचा मला आनंद होतो आहे. माझी वैचारिक दिशा माझ्या मते योग्य आहे. मी चुकू शकतो, नव्या माहितीच्या, नव्या ज्ञानाच्या प्रकाशात मी माझं मत बदलायला तयार असायला हवं ही माझी देखील प्रमुख धारणा आहे.
'माझं चुकलं, मी स्वतःला तपासेन' असे किती पुरोगाम्यांनी आजवर कबूल केले आहे? हिंदुत्ववादी यासाठी तयार असतील किंवा नसतील. आणि जे यासाठी तयार असतील ते तुम्हाला थोडेच सांगायला येणार आहेत.
असो.
नथुराम गोडसे दहशतवादी नव्हता
नथुराम गोडसे दहशतवादी नव्हता असं सांगणारी कोणती पुस्तके आहेत? नावं सांगता येतील का? 'पंचावन्न कोटींचे बळी'माझ्याकडे आहे. त्यामुळे ते सोडून इतर कोणती पुस्त़के आहेत ते सांगू शकाल का? मला वाचायला आवडतील...
नथुराम गोडसे दहशतवादी नव्हता
इतरांच्या पुस्तकांवर तुमचा आक्षेप असेल. मनोहर माळगावकरांचं "The Men Who Killed Gandhi" हे पुस्तक वाचा.
बादवे, नथुराम हा दहशतवादी होता असं कोणत्या न्यायालयात सिद्ध झालंय ते सांगता का जरा? त्याला दहशतवादाच्या आरोपाखाली शिक्षा झाली का खुनाच्या आरोपाखाली झाली तेही सांगा.
बादवे, नथुरामला दहशतवादी म्हणताना स्वामी श्रद्धानंदांचा ज्याने घरी जाऊन पाहुणा असल्याचा बहाणा करून खून केला त्या अब्दुल रशीद बद्दल आपले काय मत आहे? आणि त्या खुनानंतरसुद्धा अब्दुल रशीदला 'बंधु' असे संबोधित करणार्यांबद्दल आणि त्याला या खुनाबद्दल दोषी न मानणार्यांबद्दल आपले काय मत आहे? त्याच्याबद्दलचे हे खालील मत वाचा आणि मग ठरवा.
धन्यवाद...
धन्यवाद...मनोहर माळगावकर यांचं पुस्तक मी नक्की वाचेन...ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे असं दिसलं. पण इतर अनेक जी पुस्तकं आहेत त्यांचीही नावं कृपया सांगा. सगळी वाचायला जमतीलच असं नाही, पण तरी पाहायला/चाळायला आवडतील.
अलीकडेच मी 'फाळणीची शोकांतिका' हे रा.स्व.संघाचे सरकार्यवाह हो.वे.शेषाद्री यांचं पुस्तक (अनुवाद : सुधीर जोगळेकर, माजी संपादक, तरूण भारत) आणलं आहे. हे पुस्तक, शेषराव मोरे यांचा राजहंसने प्रकाशित केलेला ग्रंथ, त्या ग्रंथाचा प्रतिवाद करणारं राजहंसचंच पुस्तक आणि महात्मा गांधींचे स्वीय सहकारी प्यारेलाल यांचं 'द लास्ट फेज' हे तीन खंडातील पुस्तक एवढी मोठी सामग्री सध्या हाताशी आहे...संपायला बहुधा वर्ष-दीड वर्ष लागेल..:)...
सुभाष गाताडे यांचं Godse's Children - Hindutva Terror in India हे पुस्तकही वाचायचं आहे. तुम्हीही वाचा. कदाचित तुम्हाला काही नवीन माहिती मिळू शकेल.
अब्दुल रशीद प्रकरणाची माहिती दिल्याबद्द्ल आभार. वरील उद्गार गांधीजींचे आहेत हे विकीपीडियावरून कळलं. या उद्गारांचा तुम्हाला राग येणं मी समजू शकतो. वरील उद्गारात टोकाची क्षमाशीलता आहे. गांधींच्या एकूण अतीअहिंसक, अतीमानवतावादी विचारांची साक्ष देणारे उद्गार आहेत. पण मला हे उद्गार पटले आहेत (फक्त मी त्याला भाऊ वगैरे मानणार नाही बहुधा). कारण मीदे़खील बर्यापैकी अव्यवहार्य आणि कधीकधी मलाच न कळणारा आदर्शवादी वगैरे असतो. माझ्याच एका लेखातील परिच्छेद देतो..
<याकूब मेमनची केस किंवा अजमल कसाबची केस वृत्तपत्रातून गाजली, टीव्हीवरून गाजली कारण त्याला दहशतवादाचं परिमाण आहे. त्यांनी केलेले गुन्हे थेट स्वरूपाचे, भीषण होते. कुणाचाही जवळचा माणूस जाणं हे भयंकर आहे आणि त्याची तीव्रताही खूप आहे. 'तुमच्या घरातला माणूस गेला असता तर तुम्हाला कळलं असतं' असा एक युक्तिवाद असतो आणि त्यात तथ्य आहेच. पण मला इथे असा प्रश्न पडतो की आपल्या जवळच्या माणूस गेला की ज्याने ते केलं त्याला मारावसं वाटणं ही प्रतिक्रिया, सूडभावना झाली. ती न्यायभावना असते का? आणि सूडाची भावना असली तर त्यात काही गैर आहे असंही नाही. (पुन्हा एकदा, व्यक्तिशः मला सूड घ्यावासा वाटत नाही. पण ते माझ्याबाबतीत झालं. कारण हा वैचारिक भूमिकेतला फरक आहे. माझ्या घरी काही वर्षांपूर्वी सुमारे लाखभर रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. चोर सापडला नाही आणि खरं तर मी त्याकरता प्रयत्नही केले नाहीत. मला भुरट्या चोरांचा राग येत नाही. उलट त्यांना भेटून त्यांच्याशी सखोल बोलावसं वाटतं. माणूस चुकीचा वागतो त्यामुळे त्याचा राग येण्याऐवजी तो असा का वागतो, त्यात आपल्याला काही बदल करता येईल का याचा शोध घेण्यात मला समाधान मिळतं.आता यावर असा प्रश्न येईल की चोरी ही साधी गोष्ट झाली. तुमच्या आईला, वडिलांना किंवा बायकोला कुणी मारून टाकलं तर तुला काय वाटेल? या प्रश्नाचं उत्तर 'मी तरीही सूड घेऊ इच्छिणार नाही. उद्या न्यायालयाने त्याला फाशी दिली तरी माझी इच्छा त्याला सुधारगृहात ठेवावं ही आहे' असं आहे. पण अर्थातच हे उत्तर ग्राह्य धरता येणार नाही कारण माझ्याबाबतीत तसं घडलेलं नाही.) तर सूड आणि न्याय यात आपल्याला काय फरक दिसतो, व्यक्तिगत ते सामाजिक अशा विविध पातळ्यांवर या दोन्ही संकल्पनांमध्ये काय फरक पडत जातो हे आपल्याला तपासता येईल. (हा खरोखर एक रोचक प्रश्न आहे. मीही आत्ता न्याय आणि सूड या संकल्पनांच्या गोंधळात पडलो आहे.)>
दादरी येथे मारल्या गेलेल्या मनुष्याच्य मुलाने बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे. हा व्हीडीओ मी नुकताच पाहिला. मला तो मुलगा माझ्या विचारांच्या जवळचा वाटला. नथुराम गोडसेलाही फाशी द्यायला नको होती असंच मला वाटतं. दाभोळकर, पानसरे. कलबुर्गी यांच्याही मारेकर्यांना फाशी देऊ नये हे मी माझ्या लेखात म्हटलं आहेच.
अर्थात माझ्या आणि तुमच्या मनोभूमिकेत फरक असल्याने माझा विचार तुम्हाला पटणार नाही हे मी समजू शकतो. फक्त मी माझा विचार शेअर केला इतकंच...(आपण इथे लिखित स्वरूपात बोलत असल्याने वैचारिक देवाण-घेवाणीला मर्यादा येतात. प्रत्यक्ष भेटीत कदाचित हे अधिक सोपं होतं.)
दहशतवाद शब्दाच्या व्याखेवर एकमत होत नसल्याने आपण तो मुद्दा सोडून देऊ. पण त्यावरून तुम्हाला एक विचारायचं होतं ते आठवलं... पुरोगामी दहशतवाद हा शब्दप्रयोग तुम्हाला मान्य आहे का? असल्यास/नसल्यास त्याचं कारण काय?
उत्पल, सविस्तर
उत्पल,
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! या निमित्ताने हे जास्तच प्रकर्षाने लक्षात आले की तुमचे आणि माझे विचार बरेचसे वेगळे आहेत.
हो…आपल्या विचारांमध्ये फरक
हो…आपल्या विचारांमध्ये फरक आहे. म्हणूनच आपण बोललं पाहिजे. सारखे विचार असणाऱ्यांकडून नवीन काही मिळत नाही…:)…
धर्म हे माझ्यासाठी कोडं आहे हे मी लेखात लिहिलंच आहे. मी स्वतः धर्मविरहित जगतो आहे हेही लिहिलं आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांच्या नवमानवतावादात धर्मविरहित जगण्याची मांडणी केली आहे.याबाबत माझ्या डोक्यात जे आहे ते मला सविस्तर लिहायचं आहे. परंतु हिंदू-मुस्लिम प्रश्न, निधर्मी-धार्मिक वाद हे समोर येतं तेव्हा वर्तमान परिस्थितीचं आणि इतिहासाचं आकलन वाढवायला पर्याय नसतो.
वर दिलेल्या पुस्तकांच्या यादीत स.ह. देशपांडे यांच्या 'सावरकर ते भाजप' या पुस्तकाचाही अंतर्भाव होतो. हिंदुत्वविचार आज 'हिंदुराष्ट्रवाद' या स्वरूपात मांडला जातो, पण त्याचा उगम आणि मूळ पाया 'हिंदुसंघटनवाद' हा आहे असं ते म्हणतात. 'भारतीय संदर्भात कट्टर हिंदुत्ववाद हा स्वयंभू आहे की इस्लामिक कट्टरतेला प्रतिक्रिया म्हणून तो प्रबळ झाला आहे याचाही अभ्यास करायला हवा असं मला वाटतं आहे' असं मी माझ्या एका प्रतिसादात म्हटलं होतं. स.ह.देशपांडे यांचं हे पुस्तक याबाबत आणि एकूणच हिंदुत्वाच्या आकलनाबाबत माझ्यासाठी महत्त्वाचं ठरेल असं वाटतंय. मात्र आत्ता जे आजूबाजूला दिसतं आहे ते हिंदुत्वाचं स्वरूप सहंनादेखील अभिप्रेत नसावं.
मुळात माझा मुद्दा असा आहे की मुस्लिम मूलतत्त्ववादाला हिंदू मूलतत्त्ववाद हेच एकमेव उत्तर आहे हे मला पटत नाही. धार्मिक उन्मादाला धार्मिक उन्माद हेच उत्तर का बरं? अर्थात माझ्या मतावर विविध अंगांनी चर्चा होऊ शकते. परंतु माझा कल धार्मिक उन्मादाला 'पर्यायी नवजीवनवादा'ने उत्तर देण्याकडे आहे. म्हणजे उदा. आपण एखाद्या मुलाला लहानपणापासूनच कुठल्याही धार्मिक संस्कारांशिवाय वाढवलं, त्याला स्वतःची ओळख केवळ एक माणूस म्हणूनच करून देता येईल याची काळजी घेतली आणि तशी नागरी व्यवस्था विकसित केली, सृष्टी आणि सृष्टीनिर्मितीविषयक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पद्धतीनेच घ्यायची सवय लावली, आपल्यात जन्मणारे विकार, आपलं दुःख या सगळ्याला धार्मिकतेचा आसरा अजिबात न घेता कसं सामोरं जायचं हे शिकवलं तर काय होईल? हे करणं शक्य आहे का? यात काय अडचणी येऊ शकतील? माझ्या दृष्टीने हे प्रश्न आणि ही नवव्यवस्था महत्त्वाची आहे. कारण धार्मिक उन्मादाला संपवण्याची बीजे असलीच तर याच पद्धतीत आहे असं मला वाटतं.
असो. या विषयावर पुष्कळच चर्चा होऊ शकेल. मला कायम एक जाणवतं ते म्हणजे 'आर्ग्युमेंट' याचा अर्थ विस्तृत आणि सांगोपांग मांडणी. छोट्या प्रतिक्रियांमधून ते साध्य होत नाही.
<आत्मपरीक्षण करण्याची तुमचीच पद्धत निर्दोष आणि सर्वोत्कृष्ट आहे असे तुमचा समज दिसतो, म्हणूनच "मी जसं आत्मपरीक्षण करू इच्छित आहे तसं आत्मपरीक्षण करण्याबाबत पुरोगामी लोकांना विरोध करणारे किंवा पूर्णतः उजव्या विचारसरणीचे मित्र उत्सुक नाहीत. " असं तुम्हाला वाटतंय.>
माझी पद्धत निर्दोष आणि सर्वोत्कृष्ट आहे असा माझा समज आहे असा तुमचा जो समज आहे तो गैरसमज आहे असं मी सांगू इच्छितो. वास्तविक मी असं कुठेही म्हटलेलं नाही. पण तरी तुम्हाला असं वाटलं असेल तर कदाचित मला माझं म्हणणं तुमच्यापर्यंत नीट पोचवता आलं नसेल.
तर मी कोणत्याही पद्धतीने केलेलं आत्मपरीक्षण वाचायला खरोखरच उत्सुक आहे. 'संघातले दिवस' हा स.ह. देशपांडे यांचा लेख मला सापडला. असं अजून कुणी काही लिहिल आहे का? माहीत असल्यास कृपया सांगा.
<दुसरं म्हणजे आत्मपरीक्षण करणारे प्रत्येक वेळी आपले अनुभव सार्वजनिक करतील अशी तुमची अपेक्षा दिसते.>
प्रत्येक वेळी करू नये. पण एकदा करायला काय हरकत आहे? अन्यथा समोरच्या माणसाला कळणार कसं? आणि आपण जसे आपले विचार, आपल्या बाजू नेहमी ठामपणे लोकांसमोर मांडतो, तावातावाने भांडतो, तसंच आपले पुनर्विचार, आपल्याला दिसलेल्या आपल्या चुका यादेखील ठामपणे लोकांसमोर मांडाव्यात की! मला तर हा वैचारिक मांडणीचा महत्त्वाचा गुण वाटतो. आपली बाजू फक्त मांडायची, पण आपल्या चुका लपवून ठेवायच्या ही वैचारिक चर्चेची पद्धत योग्य नव्हे. (राजकारणाची मात्र ही सर्वोत्तम पद्धत आहे…:)….!)
असो. चर्चा बरीच झाल्याने फार लांबवायला नको. पण प्रत्यक्ष भेटून बोलायला मला नेहमीच आवडतं. मी पुण्यात राहतो. तुम्ही कुठे राहता? शक्य झाल्यास भेटायला आवडेल.
शेवटी फक्त तुम्ही अनुत्तरित ठेवलेले दोन प्रश्न पुन्हा विचारतो. चर्चा संपवायच्या आधी तुम्ही या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मला बरं वाटेल.
पहिला म्हणजे नथुराम गोडसे दहशतवादी नव्हता असं सांगणारी साळगावकरांचं पुस्तक सोडून इतर कोणती पुस्तके आहेत? मला वाचायला/चाळायला आवडतील.
दुसरा म्हणजे पुरोगामी दहशतवाद हा शब्दप्रयोग तुम्हाला मान्य आहे का? असल्यास/नसल्यास त्याचं कारण काय?
पुन्हा एकदा सविस्तर आणि
पुन्हा एकदा सविस्तर आणि प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तुम्ही वर लिहिल्यानुसार हिंदू मूलतत्ववाद हा केवळ मुस्लिम मूलतत्ववादाला उत्तर देण्यासाठी निर्माण झाला आहे किंवा मुस्लिम मूलतत्ववादाला हिंदू मूलतत्ववाद हेच एकमेव उत्तर आहे किंवा हे उत्तर आहे हे मला पटत नाही. आज हिंदू मूलतत्ववादाचा जो आविष्कार दिसत आहे त्यामागे बहुतांशी राजकारण व राजकारणी आहेत. दोन्ही धर्मातील मूलतत्ववादी वाढले की आपल्या पक्षाला फायदा होईल या गृहितकावर मूलतत्ववादाला काही जण समर्थन देत आहेत. मुस्लिम मूलतत्ववाद इस्लामच्या जन्मापासून अस्तित्वात आहे आणि अजूनही तो अत्यंत तीव्र स्वरूपात जगात अनेक देशात आढळतो. ज्या ज्या देशात मुस्लिम मूलतत्ववाद आढळतो त्यातील बहुसंख्य देशात त्याला उत्तर केवळ कठोर कायदेशीर कारवाई करूनच दिले जात आहे. बहुसंख्य देशात त्याला उत्तर म्हणून दुसर्या धर्मातील मूलतत्ववाद वाढलेला नाही. अगदी ९/११ नंतर सुद्धा अमेरिकेत मुस्लिमांवर हल्ले होण्याच्या तुरळक घटना घडल्या, परंतु त्याला प्रत्त्युत्तर म्हणून ख्रिश्चन मूलतत्ववाद वाढलेला नाही. भारतात देखील मुस्लिम मूलतत्ववादाला उत्तर म्हणून हिंदू मूलतत्ववाद वाढलेला नाही.
गोपाळ गोडसेंचे "गांधीहत्या आणि मी" हे एक पुस्तक आहे. परंतु हे नथुरामच्या भावाने लिहिले असल्याने ते कदाचित तुम्हाला चालणार नाही. त्या व्यतिरिक्त Why Godse killed Gandhi? हे कांचन गुप्तांचं एक पुस्तक आहे. अजून १-२ पुस्तके आहेत. त्याची नावे आता आठवत नाहीत.
पुरोगामी दहशतवाद हा शब्द नुकताच शेषराव मोर्यांनी वापरला. तो शब्द प्रतिकात्मक आहे असे माझे मत आहे. पुरोगामी दहशतवाद म्हणजे पुरोगामी हातात बंदुका घेऊन किंवा बॉम्बस्फोट करून दहशत निर्माण करीत आहेत असा अर्थ नाही. माझ्या मते पुरोगामी दहशतवाद म्हणजे काही पुरोगामी आपल्या विरूद्ध असलेले विचार अजिबात सहन करीत नाहीत अशा अर्थाने असावा. एक उदाहरण देतो. बेरड समाजात काम करणारे भीमराव गस्ती नावाचे एक समाजसेवक आहेत. पुण्यातील "पुरोगामी" वर्तुळात त्यांची चांगलीच उठबस होती. त्यांनी स्वत:च एक आठवण सांगितली होती. ९० च्या दशकात अयोध्येत श्रीराम मंदीर बांधण्याचे त्यांनी एका मुलाखतीत समर्थन केले. त्यानंतर ते पुण्यात आले होते तेव्हा त्यांना पुण्यातील "पुरोगामींनी" वाळीत टाकले. त्यांच्याशी अनेक वर्षे परिचय असलेल्या काही "पुरोगामींनी" त्यांच्याशी जवळपास संबंधच तोडले. शेषराव मोर्यांनी वर्णिलेला "पुरोगामी दहशतवाद" तो हाच. अनंतमूर्तींनी देवाच्या मूर्तीवर लघवी केली, "देवाच्या मूर्तीवर लघवी करणे चुकीचे नाही" असे कलबुर्गींनी त्याचे समर्थन केले. असे करताना श्रद्धाळूंच्या श्रद्धेवर आपण आघात करीत आहोत याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. हा सुद्धा पुरोगामी दहशतवादच आहे. आपल्याला मूर्तीपूजा मान्य नाही व आपण समाजाचा मूर्तीपूजेवरून विश्वास उडवू शकत नाही व त्यामुळे मूर्तीचेच पावित्र्य भंग केले की आपोआप मूर्तीपूजक समाजाला धडा मिळेल या वैफल्यातूनच अशी कृत्ये होतात. विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी एखाद्याला वाळीत टाकणे किंवा देवाच्या मूर्तीवर लघवी करून पावित्र्यभंग करणे हाच पुरोगामी दहशतवाद.
एक उदाहरण देतो. बेरड समाजात
कैच्याकै लिहिलेले आहे.
१) गस्ती यांना पुरोगाम्यांनी वाळीत टाकले हा दहशतवाद ? तो कसा काय ? आपण एखाद्या व्यक्तीशी असलेले आपले संबंध तोडतो (कारण त्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झालेला असतो वगैरे) - पण ह्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल दहशत निर्माण होते ?? खरंच ? सगळ्या पुरोगाम्यांनी गस्ती यांना वाळीत टाकले तरी - कोणाच्या मनात दहशत निर्माण झाली ? गस्ती यांच्या मनात ?? एखाद्याशी संबंध तोडणे हे दहशत निर्माण करणारे कसेकाय असते ?? गस्ती यांनी स्वतःची वेगळी वैचारिक संघटना/चळवळ निर्माण का केली नाही ?? एका गटाने तुम्हाला वाळीत टाकले तर तुम्ही दुसरा गट निर्माण करा. माझ्या माहीतीनुसार पुरोगामी हा शब्द पेटंटेड नाही. गस्ती यांनी पुरोगामी (गस्तीवादी) अशी चळवळ सुरु करायची.
२) एखाद्या चळवळीची म्हणून स्वतःची काही तत्वं असावीत की नसावीत ? चळवळीतल्या सभासदांनी त्या तत्वांप्रति आग्रही असावे की नसावे ? तत्वे प्रत्येकास लावली जावीत की न जावीत ? एका विशिष्ठ अर्थाने न्यायाची व्याख्या ही - Justice is defined as judging everyone by the same rules. अशी प्रत्येकाच्या वेगळेपणाला सहिष्णुता दाखवून चळवळीच्या नियमांबद्दलच्या काटेकोरपणाला तिलांजली दिली गेली तर चळवळीचे रुपांतर खिचडीत होणार नाही का ??
३) असे करताना श्रद्धाळूंच्या श्रद्धेवर आपण आघात करीत आहोत याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. देवाच्या मूर्तीवर लघवी करून पावित्र्यभंग करणे हाच पुरोगामी दहशतवाद. - हे तर कैच्याकै आहे. पहिली गोष्ट अनंतमूर्ती व कलबुर्गी हे विचारवंत आहेत. त्यांच्या लक्षात एवढी सोपी गोष्ट येणार नाही हे पटत नाही. पण तरीही आपण त्यांना इग्नोरंट मानू. मूर्तीवर लघवी केल्याने लोकांच्या श्रद्धेवर आघात होतो हे ठीक. श्रद्धेवरील आघातामुळे दहशत निर्माण होते ?? खरंच ?? ही तुम्ही खूप मोठी उडी मारलेली आहे. असे असते तर जगात नास्तिकांबद्दल दहशत निर्माण झाली असती कारण त्यांनी तर देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. डॉकिन्स, हिचेन्स हे लोक दहशतवादी मानले गेले असते किंवा दशतवाद्यांचे मेंटॉर मानले गेले असते. व चार्वाक ही दहशतवादी चळवळ मानली गेली असती.
पुरोगामी दहशतवाद हा शब्द
असे गुरुजींनी आधीच नमूद केले आहे. मात्र त्यांना जर तसे वाटत नसेल तर गब्बर यांचे म्हणणे मान्य आहे. कोणाशी संबंध टाकल्याने "वाळीत टाकलेल्याच्या" मनात दु:ख वगैरे वाट्टेल ते निर्माण होवो पण दहशत वगैरे निर्माण होत नाही.
प्रतिकात्मक पद्धतीने दहशतवाद
प्रतिकात्मक पद्धतीने दहशतवाद हा शब्द वापरल्यामुळे शेषराव मोरे यांनी स्वतःच्या मुख्य उद्देशाप्रति प्रतारणाच केलेली आहे असे म्हणायला वाव आहे. दहशतवाद या शब्दाला विशिष्ठ अर्थ आहे. तो अर्थ ट्विस्ट करणे म्हंजे काय हे मी त्यांना सांगायची आवश्यकता नाही.
आश्चर्य ए पुरोगामी दहशतवाद ही
आश्चर्य ए पुरोगामी दहशतवाद ही संकल्पना मान्यय पण हिंदू दहशतवाद नाही!!!!???
असो असतात एकेकाचे गैरसमज.. किती निस्तरत बसायचे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कै च्या कै
हा हा हा. पुरोगाम्यांचे अध्वर्यू श्री. निखिल वागळे यांनी भीमराव गस्तींची घेतलेली मुलाखत (गेल्या चार-पाच वर्षांतली असावी) -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चला, त्या निमित्ताने तुमचे
चला, त्या निमित्ताने तुमचे अध्वर्यू कोण हे ही समजले.
टिप टिप टिपूया ज्ञानकण...
चला, निखिल वागळे कोण आहेत हे समजण्यासाठी तुम्हाला कुणाची तरी मदत लागते हे त्या निमित्ताने समजले.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुमचं बरोबर आहे. पुरोगामी
तुमचं बरोबर आहे. पुरोगामी लोकांबाबत 'अतीआग्रह', 'टोकाची भूमिका' याअर्थी दहशतवाद हा शब्द मोरेंनी योजला आहे. मला स्वतःला तो शब्द तत्त्वतः मान्य आहे. परंतु दहशतवाद हा शब्द न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यावरच वापरावा असा तुमचा आग्रह आधीच्या प्रतिसादांवरून दिसला. पुरोगामी लोकांवर कोणताही खटला दाखल झालेला नाही आणि ते दहशतवादी आहेत असं सिद्ध झालेलं नाही. तरीही तुम्हाला ते दहशतवादी आहेत हे मान्य आहे असं दिसतं.
आता दुसरीकडे हिंदुत्वाचा अतींआग्रह धरणारे लोकही आहेत. त्यांच्या कारवाया आपण पाहिलेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहीजणांवर खटलादेखील भरला गेला आहे. त्यामुळे त्यांना हिंदू दहशतवादी म्हणणं अगदीच योग्य आहे असं मला वाटतं. याबाबत गब्बर सिंग यांनी मांडलेली मतेही मला पटली आहेत.
तुम्हाला कदाचित हे मान्य होणार नाही, पण शांतपणे विचार केला तर हे सहज पटू शकेल.
"सांगायचा मुद्दा हां की
"सांगायचा मुद्दा हां की मुस्लिम दहशतवाद भीषण आहे हे मी पूर्णपणे मान्य करतो आणि तिकडे पुरोगामी लोकांनी लक्ष दिलेलं नाही हे पुन्हा एकदा सांगतो. पण असं असलं तरी हिंदू दहशतवाददेखील अस्तित्वात आहे आणि त्याची परिणती मुस्लिम दहशतवादाइतक्या गंभीर प्रश्नात होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत हेदेखील मी इथे ठामपणे सांगू इच्छितो."
या बद्दल फारसे काही बोलला नाहीत. हिंदू धर्माबद्दल खरा कळवळा हाच. रिऍक्शनरी विचारांमधून आपण आपल्याच धर्माचे, संस्कृतीचे किती नुकसान करत आहोत याचे भान उजव्यांना नाहीये असेच दिसते.
बिपिन कार्यकर्ते
पण असं असलं तरी हिंदू
मी माझ्या पहिल्या प्रतिसादापासून या मुद्द्यावरच लिहित आहे. पुन्हा पुन्हा तेच लिहायचा कंटाळा आला आहे.
मुस्लिम दहशतवाद हा जगात अनेक देशात अस्तित्वात आहे हे अनेकवेळा सिद्ध झालेलं आहे. परंतु "हिंदू दहशतवाद" असं काहीही अस्तित्वात नसताना, आजतगायत दहशतवादी कृत्ये करून नागरिकांची हत्या करण्याच्या आरोपावरून शिक्षा झालेली एकही हिंदू व्यक्ती नाही. अशा प्रकारे शिक्षा झालेले जे हिंदू आहेत त्यांची नावे सांगा असे मी २-३ प्रतिसादात विचारले होते. परंतु इथे तावातावाने "हिंदू दहशतवाद" हा "मुस्लिम दहशतवादा"इतकाच भयंकर आहे असे रेटून लिहिणार्यांना आणि त्यांना समर्थन देणार्यांना आजतगायत असे एकही नाव सांगता आलेले नाही. असा एकही हिंदू नसल्याने यांनी मग दहशतवादाची व्याख्याच बदलण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने लावलेले लाऊडस्पीकर, मिरवणुका हा एक "हिंदू दहशतवादच" आहे असे कोणीतरी एका प्रतिसादात लिहिले होते. आता अजून पुढे जाऊन घरी देवपूजा करणारे किंवा देवासमोर ध्यान लावून बसणारे हिंदू दहशतवादी आहेत अशीही एक नवीन थेअरी पुढे येईल.
हिंदूंवर विनाकारण आणि निराधार दहशतवादाचे आरोप करून त्यांना आणि मुस्लीम दहशतवाद्यांना एकाच पंगतीत बसविणार्यांना विरोध करून त्यांचे खोटे आरोप खोडून काढल्याने हिंदू धर्माचे, संस्कृतीचे नुकसान होत नसून हिंदूंवर खोटे आरोप करणारेच भारताचे जास्त नुकसान करीत आहेत.
आता अजून पुढे जाऊन घरी
अगदी सहमत.
मागे एकदा - देवळं ही भारतीयांची शोषणकेंद्रे आहेत अशा स्वरूपाचा युक्तीवाद करणारा अख्खा धागा मीमराठी वर आला होता. व्यक्ती कोणीही बलप्रयोग न करता आस्तिक असते, व्यक्ती कोणत्याही जबरदस्तीविना देवळात जाते, देवळात पैसे अर्पण करणे हे सुद्धा वैकल्पिक असते - मग शोषण कसे ?
--------
कै पटलं नाय.
अहो आक्रमणं झाली. स्वार्या झाल्या. लुटालूट झाली, अत्याचार झाले - त्यातून नुकसान झाले.
आरोपांनी एवढं नुकसान होत नसतं.
------
कट्-अँड-पेस्ट करा ना.
कट्-अँड-पेस्ट करा ना.
__/\__
आता अजून पुढे जाऊन घरी
श्रीगुरूजींचे प्रतिसाद वाचताना फीअर माँगरींग हा शब्द किती लोकांना आठवतो? (या प्रश्नाला श्रीगुरूजी सोडून इतरांकडून उत्तर अपेक्षित आहे.)
नको हो, दया करा. त्येच-त्ये किती वेळा वाचायचं? त्यांना भले गोबेल्सनीती वापरायची असेल पण ती संधी आपण कशाला द्यावी त्यांना?
(मला त्यांचं तेच-तेच दळण वाचायचा कंटाळा आलाय. इतर कोणाला कंटाळा आलाय का? हा प्रश्नसुद्धा इतर सगळ्यांसाठीच आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
श्रीगुरूजींचे प्रतिसाद
ज्यांना आठवत नाही त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे का ?
मला आठवत नाही.
भयप्रचारक/भयविक्रेता असे लेबल (गुरुजींना) लावायचा तुमचा यत्न नसावा असा माझा कयास आहे. पण अभयप्रचारक/अभयविक्रेता ही कॅटेगरी असते का ? फिअरमाँगरिंग च्या विरुद्ध काय असते व त्या क्याटेगरीत कोण मोडते याचा विचार करीत आहे.
होलोकॉस्ट सर्व्हायव्हर लोकांपैकी एकाला विचारले की तू ह्या सगळ्या एपिसोड मधून काय शिकलास ? त्याचे उत्तर हे की - If someone tells you that he is going to exterminate you then the first thing you should do is to believe him. इथे दहशतवाद आपल्याला बोंबलून सांगतोय की - If you say the wrong thing then I will exterminate you. दहशतवादी स्वतः एका विशिष्ठ धर्माचे आहेत. ते धमकी देताना धर्माचे नाव घेतायत. धर्माच्या बचावासाठी आम्ही हे करतो आहोत असे ही ओरडून सांगतायत. व त्याची धमकी पोकळ नाही हे सिद्ध करण्यासाठी इतरांचा बळी घेताना ते स्वतःच्या जिवाची सुद्धा पर्वा करीत नाहीयेत (क्रेडिबल कमिटमेंट). आणि ते इतके माथेफिरू आहेत की स्वःच्या धर्मातल्या लहान मुलांना सुद्धा निर्ममतेनं मारतायत. और हम है के -- इस्लामिक दहशतवाद अस्तित्वातच नैय्ये किंवा इस्लामिक दहशतवाद अस्तित्वात असण्याची शक्यताच नैय्ये असा युक्तीवाद करायचा अट्टाहास का करीत आहोत ??
पण अभयप्रचारक/अभयविक्रेता ही
वाळूत तोंड खुपसून बसलेले शहामृग/ झोपेचे ढोंग घेतलेला जागा अशा काही रिलेटेड कॅटॅगरीज आठवल्या.
श्रीगुरूजींचे प्रतिसाद
मी उत्तर का देऊ नये ते समजले नाही. परंतु माझा उल्लेख असल्याने उत्तर देत आहे.
माझ्या प्रतिसादातून फीअर माँगरींग का वाटले ते समजले नाही. फीअर माँगरींन म्हणजे काय हे मी सांगतो. फीअर माँगरींग हे सदैव सुरू असते. अनेकजण अनेकवेळा वेगवेगळ्या व्यासपीठावरून ते करीत असतात. "It will be disastrous for the country to have Narendra Modi as the Prime Minister." हे जानेवारी २०१४ मधील मनमोहन सिंगांचे वाक्य आठवत असेलच. हे फीअर माँगरिंगचेच उदाहरण आहे. गेले काही दिवस श्याम मानव सगळ्या वाहिन्यांवर दिसत आहेत. "सनातनवर बंदी नाही आली तर महाराष्ट्राचा पाकिस्तान होईल" हे त्यांचे २ आठवड्यांपूर्वीचे वाक्य आणि गेल्या आठवड्यात "सनातनवर बंदी नाही आली तर महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल" हे नवीन वाक्य. हे सुद्धा फीअर माँगरिंगचेच उदाहरण आहे. सनातन संस्था हिप्नॉटिझम वापरून मानवी बॉम्ब बनवित आहे हे त्यांचे वाक्य पण त्याचेच उदाहरण.
२००० साली वाजपेयींनी राज्यघटनेची समीक्षा करण्यासाठी अनेक नामवंत कायदेपंडीत व न्यायाधीशांचा समावेश असलेली समिती बनविली, तेव्हा सुद्धा "वाजपेयींना घटना बदलून फक्त आयकर भरणार्यांनाच मत देता येईल अशी तरतूद करायची आहे" अशी भीति कॉंग्रेससकट अनेक राजकीय पक्ष पसरवित होते. अगदी अलिकडच्या काळातील उदाहरण म्हणजे, "मोदींना भारतात पुन्हा एकदा आणिबाणी आणायची आहे" असे अनेक 'पुरोगामी विचारवंत' जाहीररित्या सांगत होते, हे सुद्धा फीअर माँगरींगच आहे.
मग नका वाचू. वाचायची सक्ती आहे का?
श्रीगुरुजी, तुमच्या या
श्रीगुरुजी, तुमच्या या प्रतिसादाच्या (पहिल्या भागाच्या) शब्दाशब्दाशी सहमत.
ओवेसी तर म्हणाले होते की - मोदी पंप्र झाले तर भारतातल्या प्लुरलिझम ला विसरा.
मोदी सेक्युलर नाहीत व कम्युनल आहेत हे इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी ठसवले गेले होते की मला वाटलं की सेक्युलर असणे (whatever that means) हे एकमेव नेसेसरी व सफिशियंट स्किल आहे खासदार व पंतप्रधान बनण्यासाठी.
बरोबरे
तुम्ही अॅमवे वगैरेची प्रोडक्ट्स वापरत असाल नाही? आणि ते गणपती, सरस्वती वगैरेंचे फोटो दहा तासाच्या आत दहाजणांनाही तुम्ही पाठवता ना? आणि फेसबूकावर "ह्या फोटोखाली १ कमेंट करा आणि जादू बघा" पण करत असाल नाही?
-Nile
गब्बर सिंग, प्रतिसादाबद्दल
गब्बर सिंग,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
जाता जाता ... तुमच्या स्वाक्षरीबद्दल ...
प्रत्येक नवीन पिढीनुसार तत्वज्ञान, मूल्ये, विचारसरणी आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असते. काळानुसार बदल हा अपरिहार्य आहे. दीनदयाळ उपाध्यायांच्या काळात आंतरजाल, भ्रमणध्वनी, सोशल मिडिया इ. प्रकार नव्हतेच. दूरदर्शन अत्यंत मर्यादीत स्वरूपात होते. त्यामुळे त्यांचे तत्वज्ञान त्या काळानुसार मांडलेले होते. आता २०१५ या वर्षात त्याच फक्त त्याच तत्वज्ञानावर भर देऊन मोदींनी (किंवा इतर कोणीही) वाटचाल केली तर ते अयोग्य ठरेल. त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा, सुविधांचा वापर करून घेतला नाही तर तो देश कधीच पुढे जाऊ शकणार नाही. माओच्या किंवा लेनिनच्या मूळ तत्वांपासून चीन, रशिया केव्हाच दूर गेले आहेत. तसे केले नसते तर आज ते खूपच मागे राहिले असते. त्यामुळे हेडगेवार, गोळवलकर गुरूजी किंवा दीनदयाळ उपाध्याय इ. तत्वज्ञानापासून दूर जावे लागणारच होते. दूर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता.
इथे
दीनदयाळ उपाध्याय यांचे "तत्वज्ञान" असा शब्द मी खवचटपणेच वापरला होता. दीनदयाळ उपाध्याय यांचे कोणतेही तत्वज्ञान नव्हते. दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार म्हंजे - सगळी ओल्ड वाईन इन न्यु बॉटल - समाजवाद होता. तुम्ही हा जो "कालमानपरत्वे विचारसरणी बदलायला हवी" हा मुद्दा जो उपस्थित केलेला आहे तो "फेस सेव्हिंग" आहे. दीनदयाळ उपाध्याय यांनी "machine should not be competitor of labor" असा बकवासात्मक विचार मांडलेला होता. अडवाणींनी सुद्धा "राजीव गांधींचा संगणक म्हंजे बेकारीला आमंत्रण" अशा अर्थाचे विधान केलेले होते. अडवाणींचे हे विधान दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वज्ञास साजेसेच होते. आरेसेस तर्फे आजही तो बकवास चालू आहे. पुरावा इथे. मोदींचा डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह व सोशल मिडियावरील भर हा दीनदयाळ उपाध्याय यांच्या व अडवाणींच्या प्रतिगामी "तत्वज्ञानाशी" विपरीत आहे पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हंजे भाजपा ला रिफॉर्म करणारा आहे. अर्थात भाजपावाल्यांना दीनदयाळ उपाध्याय हे काहीतरी देवदूताप्रमाणे भासत असल्यामुळे रिफॉर्म होणे कठिण आहे.
एखाद्या व्यक्तीला आदर्श मानले
एखाद्या व्यक्तीला आदर्श मानले म्हणजे त्यांच्या प्रत्येक विचारावर अंमल करायला हवा असे नाही.
गांधींची बहुतेक सारी तत्त्वे नेहरू-पटेल-आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर धोरणे ठरवताना, घटना बनवताना मोडीत काढली. खरे तर गांधींचे कोणते तत्त्व भारताने स्वातंत्र्योत्तर काळात खरोखर अंमलात आणले हा प्रश्नच आहे.
गांधी विकेंद्रित अर्थव्यवस्थेचे (ग्रामस्वराज्य) पुरस्कर्ते होते
गांधी प्रबळ केंद्रसत्तेच्या विरोधात होते.
गांधी यंत्रांच्या विरोधात होते.
गांधी स्वातंत्र्याबरोबरच इर्रिलेव्हंट झालेले होते.
गांधींची तत्त्वे सरकारपेक्षा जनतेनेच जास्त अंमलात आणली. शांतिपूर्ण विरोध/चळवळी करणे वगैरे. भारतात लोकशाही मार्गाने निवडणुका होणे, सत्तांतर होणे वगैरे बाबी जनतेच्या कृपेने घडत राहिल्या. त्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात गांधींना आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
>>>>>> हिंदूंवर खोटे आरोप
समझोता एक्स्प्रेसमध्ये २००६ मध्ये बॉम्बस्फोट होऊन जवळपास ६० प्रवासी ठार झाले. त्यात बरेचसे पाकिस्तानी होते. सुरवातीच्या तपासानंतर काही मुस्लिमांना अटक झाली. फॉरेन्सिक तपासणीनंतर असे जाहीर केले गेले की बॉम्बस्फोटात आरडीएक्स चा वापर नव्हता.
नंतर २ वर्षांनी अचानक एक दिवस स्वामी असीमानंद व इतर काही हिंदूंना या प्रकरणी अटक करून त्यांना आरोपी करण्यात आले. या प्रकरणाचा निकाल अजूनही लागलेला नाही.
२००९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी या प्रकरणात काही हिंदूंना अडकविण्यात आले, त्याचे वाईट परीणाम झाले.
त्यानंतर जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान दरम्यान दहशतवादाचा मुद्दा निघतो तेव्हातेव्हा हमखास पाकिस्तान समझोता प्रकरणाचा उल्लेख करून दहशतवादी तुमचेच होते असे सांगून भारताला गप्प करण्याचा प्रयत्न होतो. जेव्हा जेव्हा भारत दाऊद, टायगर मेमन, मसूद अझर इ. च्या हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तान वरील आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करतो. जेव्हा जेव्हा भारत २६/११ च्या आरोपींना (हफीझ सईद, जाकीर लखवी इ.) पाकिस्तानने शिक्षा करावी अशी मागणी करतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तान समझोता प्रकरणातील आरोपींना भारताने अजून शिक्षा दिलेली नाही असा कांगावा करतो.
समझोता प्रकरणात हिंदू आरोपींना अडकवून भारताने पाकिस्तानविरूद्धची आपली दहशतवादाची लढाई कमजोर करून टाकली आहे.
हिंदूंवर खोटे आरोप केल्यामुळे भारताचे असे नुकसान होत आहे.
मुस्लिम दहशतवाद हा जगात अनेक
ह्या संपूर्ण परिच्छेदासाठी गुरुजींना मी मार्मिक ही श्रेणी दिलेली आहे. सहर्ष.
प्लीज माझ्यावर छुपा हिंदुत्ववादी असल्याचा आरोप करा. प्लीज. आय डिमांड, प्लीड, रिक्वेस्ट, अपील.
या धाग्यावर ब्याट्याने जे लिहिलेय ते एकदम मार्मिक आहे. हिंदू दहशतवाद अस्तित्वात असतो, शीख दहशतवाद अस्तित्वात असतो/होता, बुद्ध दहशतवाद असतो (रेझा अस्लान म्हणतो तसे बौद्ध भिक्षु म्यानमार मधे ....), ख्रिश्चन क्रुसेडर्स होते ..... पण इस्लामिक दहशतवाद ही अस्तित्वात नसलेली संकल्पना आहे - असा आग्रह का ?? (ज्यांचा आहे त्यांचा).
हे कोण बोलले बोला... दहशतवादी माझा निजला
कोण बरं हे लोक? जरा हात वर करा बरं. गोळ्याच झाडून टाकतो. विषय संपला. न रहेगा बाँस...
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद गब्बर सिंग!
धन्यवाद गब्बर सिंग!
आता अजून पुढे जाऊन घरी
हे अगदी बरोबर. मशिदी अतिरेकी बनवण्याचा कारखाना आहेत ही 'थेअरी' अशीच तयार झाली.
- ओंकार.
काही आजच्या वृत्तपत्रातील
काही आजच्या वृत्तपत्रातील लिंका.
(१)
(२)
आणि
वरिल प्रतिसादात उल्लेख असलेली बातमी
माझ्या मते 'हिंदु दहशतवाद' हा
माझ्या मते 'हिंदु दहशतवाद' हा शब्द इस्लामी दहशतवादाला दिलेले कडवे प्रत्युत्तर अशा अर्थाने माध्यमांच्या सोयीसाठी वापरात आला.
>> दाभोळकर, पानसरे. कलबुर्गी यांच्याही मारेकर्यांना फाशी देऊ नये हे मी माझ्या लेखात म्हटलं आहेच.<
माझ्या मनात याबाबत द्विधा आहे. एका बाजूला हे पटते. पण मनातल्या मनात मी मारेकर्याला भर रस्त्यात चाबकाचे फटके दिले आहेत. ही क्रूर शिक्षा फक्त माज उतरवण्यासाठी केली. मनातल्या असहायता व संतापाला मोकळी करुन दिलेली ती वाट आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
हा तो दांडपट्टा धागा.
हा तो दांडपट्टा धागा. अत्युत्तम धागा आहे. एकाहून एक बलवान मुद्दे मांडून दोन पार्टी लढल्या आहेत. फार आवडतो हा धागा. अंतराच्या सुसंगत मांडणीचे तर विशेष कौतुक आहेच.
धागा जोरदार आहे
धागा जोरदार आहे.
ऐरवी सुस्त अजगरासारख ऐसी अक्षरे संस्थळ निपचीत पडुन असत.
अनेक छोटे मोठे गारुडी येतात, काहीबाही वाजवुन जातात
ते ढिम्म हालत नाही.
मग अचानक कोणीतरी एखादा चतुर गारुडी येतो अचुक जागेला स्पर्श करतो. किंवा कधी कोणी अजाण बालकही चुकुन पाय पाडुन अजगराला हलविण्यास कारणीभुत होतो.
मग एकदा का ऐसी चा वैचारीक अजगर सक्रिय झाला की जे ब्बात जे ब्बात मग बिळातुन लपलेले लंबी नींदसे जगे हुए डोळे चोळत अनेक नवनविन प्रकारचे नाग
येऊन अचानक प्रतिसादांचे फुत्कार टाकु लागतात एक जलजला शुरु होता है
एक सर्पसत्र सुरु होत.
अनेक मोठे मोठे संकल्पना प्राणी प्रतिसाद वाद गिळले पचवले हलवले जातात
मजा येते
ऐसी
भारी
आहे.
राव.
विक्षिप्त प्रक्षुब्ध भयंकर भीषण
सर्पसत्र आयमीन
चर्चासत्र
अनेक छोटे मोठे गारुडी येतात,
;;) ;;) :-B :-S
कित्येक गारुडी बिळातल्या
कित्येक गारुडी बिळातल्या ढिम्मपणाला कंटाळून पुंग्या मोडून खातात.
चतुराई हवीच, स्टॅमिनासुध्दा हवा
पाने