Skip to main content

काही रोचक अनुभव - ३

2 minutes

साधारण ७५-७६ च्या सुमारास पुण्यात शिकायला होतो, तेंव्हाचीच गोष्ट. वेळ मिळेल तेंव्हा मुंबईला जाणे-येणे व्हायचेच. अशाच एका रविवारी संध्याकाळी, व्ही.टी. ला जाऊन, डेक्कन क्वीन मधे बसलो होतो. गाडी सुटायला साधारण पंधरा मिनिटे तरी अवकाश असेल. एक, माझ्यासारखाच मध्यमवर्गीय दिसणारा, गोरटेला तरुण माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

"तुम्ही पुण्याला कुठे रहाता ? सदाशिव पेठेच्या जवळ आहे का ?" मी होकारार्थी मान हलवली. (आयला, म्हणजे आपणही सदाशिवपेठी दिसायला लागलो की काय?)

" माझं एक काम कराल का प्लीज ? आज सकाळी मुंबईला येताना माझी बॅग हरवली, त्यांत माझे सगळे कागदपत्र, वॅलेट होतं. पुण्याला परत जायचीच पंचाईत झालीये. मला तशी काही मदत नको. फक्त ही चिठ्ठी माझ्या घरी पोचवाल? मी सदाशिव पेठेत रहातो. चिठ्ठीवर पत्ताही लिहिला आहे. घरचे करतील काहीतरी व्यवस्था."

" अहो, पण तो पर्यंत तुम्ही काय करणार ?"

"ठीक आहे हो. राहीन इथेच स्टेशनवर, त्याचं काही एवढं नाही. पण घरचे काळजी करत असतील. बर्‍याच जणांना विचारलं पण कोणी मदत नाही केली. का कुणास ठाऊक, तुमच्याकडे बघून वाटलं आपलं, तुम्ही नक्की मदत कराल म्हणून!"

मी काही बोलायच्या आंत, तो ट्रेनमधून उतरला आणि ओढत्या पायांनी मेन गेटकडे चालू लागला. माझ्यातला 'परोपकारी गोपाळ' जागा झाला.(लहानपणी चांदोबा वाचल्याचा परिणाम) मी पण, पटकन गाडीतून उतरलो आणि झपाझप चालत त्याला गाठलं. त्याच्या खांद्याला स्पर्श केला. त्याचे डोळे प्रश्नार्थक.

" अहो, तुम्ही उद्यापर्यंत इथेच स्टेशनवर उपाशीपोटी रहाणार, हे काही मला पटत नाही."

मी खिशांत हात घातला. तो नको नको म्हणू लागला. मी पाकीट काढले. नेमक्या दहा रुपयाच्या नोटा संपल्या होत्या. पण आता माघार घेणे कसे शक्य होते? त्याच्या हातात एक वीस रुपयांची नोट ठेवली. त्याचं आपलं, कशाला, कशाला, चाललंच होतं.

मी म्हटलं, "ते काही नाही. तिकीट काढा, मागच्या गाडीचं आणि घरी पोचा आजच्या आज!"

त्याच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचा भास झाला. " मी उद्याच तुमचे पैसे परत करीन. तुमच्यासारखी देवमाणसं आजकाल भेटणं कठीण! "

तो डोळे पुसत, झपाट्याने चालू लागला. मीही पटकन, गाडीत येऊन बसलो. वर बघून घेतलं, माझी बॅग सुरक्षित जाग्यावरच होती. त्याची चिठ्ठी बाहेर काढली. त्यावर, मी रहायचो त्याच्या जवळच्याच, एका वाड्याचा पत्ता होता. मी त्याच समाधानात एक डुलकी काढली. गाडी अगदी वेळेवर पुण्याला पोचली. बाहेर येऊन चार नंबरच्या बसने घरी गेलो.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी, तिथल्याच एका मित्राला बरोबर घेऊन, तो वाडा शोधून काढला. मधल्या चौकात एक गृहस्थ उभे होते. त्यांना चिठ्ठीवरील पत्ता दाखवला.

"पत्ता तर बरोबर आहे, पण या नांवाचं कोणीच रहात नाही इथं!"

" अहो, कोणाकडे तरी पेईंग गेस्ट म्हणून रहात असेल कदाचित ?"

" माझं आयुष्य गेलंय या वाड्यांत! असा कोणी इसम इथे रहात नाही. " का, काही काम होतं का ?"

आता माझीच फजिती या त्रयस्थाला कशाला सांगू ? मुकाटपणे वाड्याच्या बाहेर पडलो.

" तुलाही पुणेरी भामटा भेटला तर, आणि तोही सदाशिवपेठी!" माझा मित्र हंसत उदगारला!

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

गवि Wed, 08/03/2017 - 13:25

अगदी कॉमन झालंय आता हे.

सध्याची पद्धत अशी:

१. एक गरीब केविलवाणं कुटुंब पैशाच्या तीव्र गरजेत वणवण फिरत असतं.

२. कुटुंबात एकतरी लहान मूल असणं कंपल्सरी.

३. त्यांच्या हातात इतर गाठोडी बॅग वगैरे असते. पण नेमकी सर्व पैसे असलेली इतर एक बॅग चोरीला गेलेली असते.

४. हे सर्वजण पर्यटनाला किंवा मजा करायला प्रवास करत नसून हटकून देवाच्या यात्रेला किंवा तीर्थस्थानी चाललेले असतात.

५. गावी परत जाणं आणि सध्या खाणंपिणं हेही त्यांना शक्य नसतं. त्यासाठी दहावीस रुपये दिलेत तर ते दोनशे पाचशे मागतात.

६. ते तीर्थक्षेत्री किंवा कुठेतरी जाताना लुबाडले गेलेले असतात पण सध्या मात्र हिरानन्दानी गार्डन्स किंवा तत्सम उच्च्भ्रू वस्तीत उभे असतात. ते मुळात मुंबईतच कशाला आले ते कळत नाही. त्यांचं मुंबईत कोणी कोणी नसतं.

हे कुटुंब आपल्याला थांबवून "मराठी बोलता का साहेब?" "किंवा "एक मिनिट जरा ऐकून घ्या" अशी सुरुवात करतात.

आपण पुरेसे पैसे दिले तरी तेच कुटुंब चार चौक सोडून दोन दिवसांनी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेल्या अवस्थेत फिरताना दिसतं. हे पर्पेचुअली लॉस्ट लोक असतात.

गेल्या आठवड्यात इव्हिनिंग वॉकच्या वेळी तर दोन किलोमीटर वॉकमधे तीन वेगवेगळी कुटुंब या प्रकारे लुटली गेलेली आणि परतीच्या भाड्याअभावी अडकलेली दिसली. हा एक विक्रम आहे.

अतिशहाणा Wed, 08/03/2017 - 18:58

In reply to by गवि

इथे वालमार्ट किंवा तत्सम दुकानाच्या बाहेर गाडीतलं पेट्रोल संपलंय वगैरे सांगून उधार मागणारे कायम भेटतात. एकदा एक खूपच गरीब दिसणारी तरुण मुलगी अक्षरशः रडवेली होऊन क्याब करायला पैसे मागत होती. घरी जाऊन फोन करुन पैसे परत देण्याची शपथ वगैरे घेत होती. बायकोने आग्रह केल्याने तिला $२० दिले तर चेहऱ्यावरचे हावभाव अगदी साळसूद करुन चालू पडली. तिथे कोपऱ्यातच तिची मैत्रीण बेंचवर बसून दारु पित होती तिथे जाऊन हिने सिगरेट शिलगावली. आता फडतूसांना मदत करायची नाही हे कायम ठरवून टाकलंय.

गब्बर सिंग Thu, 09/03/2017 - 00:10

In reply to by अतिशहाणा

आता फडतूसांना मदत करायची नाही हे कायम ठरवून टाकलंय.

ही अशी माणसं मला मेसिज च्या समोर दोनदा भेटलीत. एकदा तर त्यांच्या गाडीत होते व त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपत आलं होतं. व पेट्रोल भरायला पैसे हवे होते.

Overly basic मुद्दा - तुमच्या भीष्म प्रतिज्ञेमुळे परिणाम हा होतो की खरोखर गरजू असेल तर त्यांना मदत मिळत नाही.

'न'वी बाजू Thu, 09/03/2017 - 08:05

In reply to by गब्बर सिंग

Overly basic मुद्दा - तुमच्या भीष्म प्रतिज्ञेमुळे परिणाम हा होतो की खरोखर गरजू असेल तर त्यांना मदत मिळत नाही.

हा प्रश्न आपल्याला कधीपासून भेडसावू लागला?

सामो Thu, 09/03/2017 - 00:15

In reply to by अतिशहाणा

मला गंडवलेले नाही पण मी एकदा दोनदा भिकार्‍यांना $२० दिले होते. म्हणजे अति अति अति दया आल्याने + माझे डोके ताळ्यावर नसल्याने. ती भिकारीण मी दिसले की मीठी वगैरे मारुन पैसे मागायला लागली होती. तेव्हापासून ... बंद म्हणजे एकदम बंद.

अजो१२३ Thu, 09/03/2017 - 00:26

In reply to by सामो

मी आयुष्यात मागे केलेल्या कोणत्याही चुकीचा मनस्ताप वा पश्चात्ताप इ इ करून घेत नाही. पुढे देखिल अजून चार चूका करायची माझी अगोदरपासूनच इच्छा असते.
================================
२० डॉलरचं अर्थकारण क्षुल्लक आहे. आपण फसलो ह्याचं दु:ख मोठे. काय फरक पडतो आपण फसलो तर, क्षुल्लक रकमेने?

बॅटमॅन Thu, 09/03/2017 - 00:31

In reply to by अजो१२३

पुढे देखिल अजून चार चूका करायची माझी अगोदरपासूनच इच्छा असते.

हाण्ण =)) =)) =)) इस्कू बोलते जबर्‍या.

बाकी असा गाढवपणा मीही केलेला आहे. अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळावर एक प्राणी पैसे मागत होता अगदी दीनवाणा चेहरा करून. त्याला दिले पंचवीसेक युरो. नंतर लक्षात आलं की आपण फसलो, पण तरी समहाऊ मी इतका खूश होतो की या एका घटनेचं मला काही विशेष वाटलं नाही. नायतर एरवी दहावीस रुपयांसाठीही गंडवलो गेलो तर आवडत नाही पण इथे मी अगोदरच इतका प्रसन्न होतो की काय वाटतच नव्हतं विशेष.

गब्बर सिंग Thu, 09/03/2017 - 00:37

In reply to by बॅटमॅन

पण तरी समहाऊ मी इतका खूश होतो की या एका घटनेचं मला काही विशेष वाटलं नाही. नायतर एरवी दहावीस रुपयांसाठीही गंडवलो गेलो तर आवडत नाही पण इथे मी अगोदरच इतका प्रसन्न होतो की काय वाटतच नव्हतं विशेष.

हे थोडेसे टिप सारखे आहे.

मला असं म्हणायचंय की अर्थशास्त्रीय विचार हा रॅशनॅलिटी (नेमकेपणे बोलायचं तर रॅशनल चॉइस) अनिवार्यपणे गृहित धरतो ही बोंबाबोंब अनाठायी आहे.

( आज मला न पिता चढलेली दिसत्ये. )

गब्बर सिंग Thu, 09/03/2017 - 00:39

In reply to by बॅटमॅन

अगदी. मुद्दा हाच आहे.

रॅशनल चॉईस नुसार = तू त्याला तरच पैसे दिले असतेस जर त्याने तुझ्या आनंदात भर घातली असती तर.

पण तसं झालं नाही.

अस्वल Thu, 09/03/2017 - 01:12

तिमा,
मस्त लिहिताय- सहज आणि शिंपल. अजून रोचक (किंवा कसेही!) अनुभव नक्की लिहा!

{हट साला, म्हणजे बंगळूरला एकदा एका "मराठी" माणसाला केलेली मदत बहुतेक रात्री चखण्यावर वाया गेली.
त्यापेक्षा मीच शेंगदाणे घेऊन खाल्ले असते बशीभर.}

अभ्या.. Thu, 09/03/2017 - 10:21

रेग्युलर घडणारा किस्सा.
त्यातला त्यात हपिस स्टँडच्या जवळ असलेने रोज एकतरी पंढरपूरला/तुळजापूरला/अक्कलकोटला/गाणगापूरला आलेलो टाईप भेटतेच. तिकिटाचे पैसे संपले, भूक लागली ही कारणे फिक्स.
दोन पर्याय देतो. भूक लागली तर खाऊ घालतो (भरपेट वगैरे नाही. वडापाव अन चा टाईप) पैसे मात्र हॉटेलवाल्याला देतो नायतर चला तिकिट काढून एस्टीत बसवून देतो. ही ऑफर ऐकली की ९० टक्के निघून जातात. दहा टक्के वडापावची ऑफर घेतात. एस्टीत बसवून दिलेले अद्याप घडलेले नाही.

तिरशिंगराव Fri, 10/03/2017 - 14:09

तुम्ही लावलेली दृष्ट फार काळ न टिको.

अजून काही ठेवणीतले प्रतिसाद बाकी असावेत.

अस्वल Sat, 11/03/2017 - 01:24

In reply to by तिरशिंगराव

लोळणारा स्मायली>
लोळणारा स्मायली>
लोळणारा स्मायली>
असं स्वत:च लिहिलं, नायतरी स्मायली टाकून काय फायदा?

राजेश घासकडवी Sun, 12/03/2017 - 19:42

मला असं सुशिक्षित, मध्यमवर्गीय जोडपं अमेरिकेत दिसलं होतं. त्यावेळी मी हॊटेलमध्ये राहात होतो. पार्किंग लॊटमध्ये त्यांनी मला गाठून अशीच करुणकहाणी सांगितली - पर्स हरवली, हॊटेलसाठी पैसे नाहीत, किमान खाण्याची तरी व्यवस्था वगैरे वगैरे. मी काही त्यांना भीक घातली नाही. मग थोड्या वेळाने, अगदी तासाभरातच मी पेट्रोल भरायला गेलो. तिथेही तेच जोडपं पेट्रोलसाठी पैसे मागायला लागलं. मी त्यांना, आपण आत्ताच भेटलो सांगितल्यावर त्यांची ट्यूब पेटली असावी. पण तरी ते काहीच न झाल्याप्रमाणे विघून गेले. माझ्यासारख्या भारतीयाचा चेहरा ते विसरले, म्हणजे त्या तासाभरात त्यांनी किती लोकांपुढे हात पसरले असतील!