वीरचक्र

हवालदार शिवाजी विठ्ठल जाधव याला मरणोत्तर वीरचक्र मिळाले नाही याबद्दल त्याच्या नातेवाईकात प्रचंड नाराजी होती. कारण हा उमदा तरुण काश्मीर कारवाईच्या धुमश्चक्रीत मारला गेला होता. त्याच्या शरीराचे तुकडे छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले होते. जमिनीत पुरलेले भूसुरुंग निकामी करत असताना त्याचा जीव गेला होता. परंतु त्याच्यामुळे 20-25 भारतीय सैनिकांचे जीव वाचले होते. इतक्या सैनिकांचे जीव वाचवताना जीव गमावलेल्या जाधवला वीरचक्र देत नसल्यास कुणाला ते पदक दिले जाते हा प्रश्न त्याच्या कुटुंबियानी उपस्थित केला होता. खरे तर गावातील ग्रामस्थांचा हा इभ्रतीचा प्रश्न झाला होता.

ग्रामस्थानी पुढाकार घेऊन जाधवच्या रेजिमेंटच्या कमांडंटशी संपर्क साधला. रीतसर पत्र लिहून आपली व्यथा प्रगट केली. व जाधवला वीरचक्र का दिले नाही यामागील कारणे विशद करण्याची विनंती केली. बरेच दिवसानंतर रेजिमेंटकडून उत्तर आले. त्यात सैनिक म्हणून असामान्य कर्तृत्व दाखविणाऱ्यांना वीरचक्रसारखी शौर्यपदकं देण्याची प्रथा भारतीय सैन्यात फार पूर्वीपासून आहे. दरवर्षी या पदकासाठी नावांची शिफारस करणारी समिती याबद्दल निर्णय घेते. या समितीने जाधव यांना पदक न देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण समितीच्या मते नेमून दिलेले कर्तव्य करत असताना मृत्यु आल्यास त्याला असामान्य कर्तृत्व असे म्हणता येणार नाही. त्यामुळे पदक न देण्याची शिफारस करत आहे. जाधव यांच्या अकाली मृत्युबद्दल रेजिमेंटच्या सर्व सैनिकांनी हळहळ व्यक्त केली, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. व पदक न मिळाल्याबद्दल विषाद वाटते असे लिहिलेले होते.

या पत्रातील तर्कसुसंगती गावातील मोजक्या सुज्ञांच्या लक्षात आले तरी बहुतेक ग्रामस्थ व जाधवचे कुटुंबीय यांना पत्राची भाषा व त्यातील मतितार्थ कळला नाही. काही असले तरी कुटुंबियांची नाराजी कशी दूर करायची हा ग्रामस्थासमोरचा प्रश्न होता. पुन्हा एकदा रेजिमेंटच्या विरोधात ब्रिगेड लेव्हलपर्यंत जाऊन विनंती करायची की आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करत चुपचाप बसायचे?
** ** **
हवालदार जाधवच्या कुटुंबियांना आपला मुलगा मोठा शूर होता असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु शिफारस समितीच्या सदस्यांनी याबद्दल विचार/चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले होते. त्यांच्या मते ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून इतर अनेकांचे जीव वाचविले त्यांना वीरचक्रसारखे पदक द्यायला हवे. येथे तर हवालदार जाधवचा जीव ड्युटी करत असताना गेला होता. भूसुरुंग निकामी करणे हे त्या रेजिमेंटला दिलेले काम होते. आणि जाधवकडून ही ड्युटी अपेक्षित होती. कामात हयगय झाल्यास त्याला कोर्ट ऑफ इन्क्वायरीसमोर उभे केले असते. त्यामुळे जे निर्दिष्ट काम दिले आहे ते करत असताना जीव गेल्यास त्याला अपघात समजून त्यासाठी मिलिटरीच्या नियमानुसार जी काही भरपाई मिळणार आहेत ते त्याला द्यायला हवेत. त्यासाठी वीरचक्र देऊन त्याच्या मृत्युचे उदात्तीकरण करण्याची गरज नाही. याचेच स्पष्टीकरण म्हणून खालील उदाहरण समितीने नमूद केले होते.

तळ्याच्या काठी तुम्ही उभे असताना एखादा पोहायला न येणारा मुलगा बुडत असल्यास त्याला वाचवणे हे तुमचे नैतिक कर्तव्य ठरते. त्यामुळे फार तोशीस न घेता त्या बुडत्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचविल्याबद्दल त्या मुलाचे कुटुंबीय तुम्हाला धन्यवाद देतील. आणि तुम्हालाही एखाद्याचा जीव वाचविल्याबद्दल समाधान मिळेल. परंतु या उलट मुलगा तळ्याच्या मध्यभागी गटांगळ्या खात आहे, जीवाचा आकांत करत वाचवण्यासाठी ओरडत आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून उडी मारून पोहत पोहत त्याच्यापर्यंत पोचून त्याला खोल पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवता. त्यावेळी मात्र तुमची ही कृती असामान्य व अनुकरणीय अशी समजली जाईल. स्वतःच्या जीवाची परवा न करता बुडत्याचा जीव वाचविल्याबद्दल तुम्हाला शौर्यपदकसमान काही देणे उचितही ठरू शकेल. व नैतिकदृष्ट्याही ते योग्य ठरेल. काही वेळा अशा प्रकारचे धाडस केल्याबद्दल तुमचे वारेमाप स्तुती, कौतुक केले जाईल. परंतु तुम्ही तेथे असूनसुद्धा काहीही न केल्यास तुम्हाला कुणी दोषही देणार नाहीत.

तुमचे कर्तव्य आणि out of the way जाऊन केलेले धाडसी कृत्य यात फरक करायला हवे. जर हा फरक केला जात नसल्यास नैतिकतेला बाधा पोचू शकते. याचीच पुढची पायरी म्हणजे उपयुक्ततावाद. या वादामध्ये जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल अशी कृती केल्यास ते नैतिकदृष्ट्या योग्य ठरेल.

हेच जर खरे असल्यास बहुतेक वेळा बहुतेक जण थोडेसे वैयक्तिक त्याग करून जास्तीत जास्त लोकांचा फायदा करून देणारी कृती करण्यास टाळाटाळ करत असतात. पाण्याची कपात असताना माझी कार चकचकीत पाहिजे या दुराग्रहापायी आणि माझ्याकडे पाणी उपलब्ध आहे या अट्टाहासापायी पाण्याचा अपव्यय करणे अनैतिक ठरेल. स्वच्छता-अस्वच्छता यासंबंधीच्या आपल्या स्वभावाला थोडेसे मुरड घातल्यास आकाश कोसळून पडणार नाही की जमीन दुभंगून जाणार नाही. हजारो – लाखो लोक झोपडपट्टीत राहतात. हे माहित असूनसुद्धा कुटुंबातील दोघा – तिघासांठी 4-5 मजली बंगल्यातील वास्तव्य कितपत योग्य? याचा अर्थ आपण झोपडपट्टीत जाऊन रहायला हवे असे नसून भोवतालच्या परिस्थितीचे भान ठेऊन आपल्या जीवनशैलीला आकार देणे नैतिकतेला धरून असेल. शक्य होईल तेथे, शक्य होईल तितके गरीबांना मदत करणे हेही आपले कर्तव्य ठरू शकेल. आणि यासाठी फार मोठ्या त्यागाची गरजही नाही. आपल्या काही सुखसोई आपणहून सोडून द्यावे एवढीच माफक अपेक्षा यात आहे.

याच न्यायाने हवालदार जाधव यांच्या कर्तव्यकठोरतेचा विचार करावा लागेल. त्यानी जर मनात आणले असते तर कामचुकारपणा करून स्वतःचा जीव नक्कीच वाचवू शकला असता. फार फार तर कामचुकार म्हणून शिक्का त्याच्यावर बसला असता. कदाचित त्याला कोणीही दोषी ठरवले नसते. त्या रेजिमेंटमध्ये असे सैनिक असतीलही. परंतु जाधव यांनी त्या परिस्थितीत एखाद्या कर्तव्यदक्ष माणसाप्रमाणे आपल्या कर्तव्यात कसूर न करता भूसुरुंग निकामी करून इतरांचा जीव वाचविला. परंतु अपघाताने त्याचा जीव गेला.

आजकाल तुम्हाला नेमून दिलेले काम करत असले तरी सत्काराची अपेक्षा केली जाते. सरकारी पब्लिक प्रॉसीक्यूटरला खटल्यातील आरोपींना शिक्षा मिळाली की त्याचा उधो उधो करायला पाहिजे असे वाटते. व तसे सत्कार घडवूऩ आणण्याची कुशलताही त्याच्याकडे असते. खरे बोलणे चोरी न करणे, दुसऱ्यांना न फसविणे, संवेदनशील असणे, या गोष्टी माणसाच्या स्वभावातच असले पाहिजेत. परंतु कुणीही (चुकून) खरे बोलले तरी त्यांचा सत्कार होत असतो. थोडे फार दुष्काळ निधीसाठी पैसे दिले तरी पेपरमध्ये ठळक अक्षरात मथळे छापून आणण्याची सोय केलेली असते.

नैतिकतेला धरून केलेले कर्तव्य की धाडसी कृत्य ही चर्चा कदाचित बौद्धिक कसरत ठरू शकेल. काही कृत्यासाठी धाडसाची गरज असते. व हे धाडस काही जणात उपजतच असते, असे म्हणता येईल. यात कुठलेही नैतिकतेचा आव नसून तो त्यांच्या स्वभावाचाच भाग असतो. त्यामुळे नैतिकतेच्या पलिकडे जाऊन धाडस करणारे, वा काहीही न करता स्वस्थ बसणारे यांच्यामुळे समाजजीवनात फार फरक पडत नाही हेही तितकेच खरे!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पाण्याची कपात असताना माझी कार चकचकीत पाहिजे या दुराग्रहापायी आणि माझ्याकडे पाणी उपलब्ध आहे या अट्टाहासापायी पाण्याचा अपव्यय करणे अनैतिक ठरेल.

वगैरे इथे तुम्ही लिहीताय ह्यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. "मला परवडतं म्हणून मी अन्न भरपूर वाया घालवून अन्नाने सचैल स्नान का करू नये" असं काहीतरी इथे वाचल्याचं आठवतंय.
--
बाकी लेखाशी संपूर्ण सहमत. आपण भारतीय नसत्या गोष्टी भावनांशी जोडत असल्याने आपलं बरंच काही गंडलेलं आहे.

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

नेमून दिलेले काम कर्तव्यनिष्ठेने करणे हे दुर्मिळ होत असल्याने असे काम कुणी करत असेल तर गदगदून येते

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

समाजहिताच्या व्यापक चित्राकडे न बघता फालतू तर्कसुसंगतीच्या मागे लागलं की असला निष्कर्ष निघतो.

समजा दिलं वीरचक्र, तर काय होईल? वीरचक्रविजेत्या शिवाजी जाधवांचं मोठं स्मारक गावात उभारलं जाईल. जाधव परिवाराचा समाजातला मान वाढेल. त्या निमित्ताने सैन्यात नोकरी करण्याला जी प्रतिष्ठा आहे ती समाजात दृगोच्चर होईल.

भारतात कधीही (स्वातंत्र्याआधी आणि नंतरही) सक्तीची सैन्यभरती (conscription) करावी लागलेली नाही. म्हणजेच, सैन्याला आजवर कधीही मनुष्यबळाची कमतरता भासलेली नाही. नॉन कमिशन्ड पातळीवर तर नाहीच, पण कमिशन्ड ऑफिसर पातळीवरही नाही.**

याचं कारण म्हणजे सैन्यातली नोकरी हे 'एक पोटापाण्याचा व्यवसाय' याव्यतिरिक्तही आणखी काही आहे ही जनमानसातली भावना. ही भावना टिकवायची किंमत वीरचक्र असेल तर ताबडतोब देऊन टाकावं.

**भारताला अमुक एवढ्या ऑफिसर्सची 'गरज' आहे वगैरे प्रचार सोडा. आजवर एनडीए/आयएमए/ओटीएमधल्या जागा रिक्त राहिल्यात असं झालेलं नाही. माझ्याच मित्रमंडळात साधारणपणे दहा-बारा लोकांना सैन्यात जायचं होतं. प्रत्यक्षात चार लोक सिलेक्ट झाले.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा, असहमत .
समाज हिताच्या व्यापक चित्रा करिता पदमविभूषण , भारत रत्न वगैरे आहे, ते द्यावं हवं तर .
जिथे निकष असतील व पाळले जात असतील तिथे ते डायल्यूट करण्याचा आग्रह विचित्र वाटतोय .

तेही चालेल. पण त्यांनी 'आणखी काही' दिलं आहे आणि त्याची समाजाला जाण आहे हा संदेश जाणं महत्त्वाचं आहे.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

भारतात कधीही (स्वातंत्र्याआधी आणि नंतरही) सक्तीची सैन्यभरती (conscription) करावी लागलेली नाही. म्हणजेच, सैन्याला आजवर कधीही मनुष्यबळाची कमतरता भासलेली नाही. नॉन कमिशन्ड पातळीवर तर नाहीच, पण कमिशन्ड ऑफिसर पातळीवरही नाही.** याचं कारण म्हणजे सैन्यातली नोकरी हे 'एक पोटापाण्याचा व्यवसाय' याव्यतिरिक्तही आणखी काही आहे ही जनमानसातली भावना. ही भावना टिकवायची किंमत वीरचक्र असेल तर ताबडतोब देऊन टाकावं.

सैन्यदलांचे नियम काटेकोरपणे पाळले जातात हे त्यांच्या प्रतिष्ठेमागचे व जनमानसातील त्यांच्याबद्दलच्या आदरामागचे एक कारण आहे.

केली मागणी, वाढवला दबाव व मिळवला पुरस्कार हे असलं तिथे नाही.

हे 'एक पोटापाण्याचा व्यवसाय' याव्यतिरिक्तही आणखी काही आहे ही जनमानसातली भावना जी आहे ती ही की सेनादलांमधे काटेकोरपणे पाळली जाणारी मूल्ये. These values inspire youngsters to join the armed forces.

समाजहिताच्या व्यापक चित्राकडे न बघता फालतू तर्कसुसंगतीच्या मागे लागलं की असला निष्कर्ष निघतो.

फालतू शब्दाऐवजी कठोर शब्द घातल्यास मान्य

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

संरक्षणदलात बिरुदांची खैरात होत नसते. निकष कडक असतात.

हेच जर खरे असल्यास बहुतेक वेळा बहुतेक जण थोडेसे वैयक्तिक त्याग करून जास्तीत जास्त लोकांचा फायदा करून देणारी कृती करण्यास टाळाटाळ करत असतात. पाण्याची कपात असताना माझी कार चकचकीत पाहिजे या दुराग्रहापायी आणि माझ्याकडे पाणी उपलब्ध आहे या अट्टाहासापायी पाण्याचा अपव्यय करणे अनैतिक ठरेल. स्वच्छता-अस्वच्छता यासंबंधीच्या आपल्या स्वभावाला थोडेसे मुरड घातल्यास आकाश कोसळून पडणार नाही की जमीन दुभंगून जाणार नाही. हजारो – लाखो लोक झोपडपट्टीत राहतात. हे माहित असूनसुद्धा कुटुंबातील दोघा – तिघासांठी 4-5 मजली बंगल्यातील वास्तव्य कितपत योग्य? याचा अर्थ आपण झोपडपट्टीत जाऊन रहायला हवे असे नसून भोवतालच्या परिस्थितीचे भान ठेऊन आपल्या जीवनशैलीला आकार देणे नैतिकतेला धरून असेल. शक्य होईल तेथे, शक्य होईल तितके गरीबांना मदत करणे हेही आपले कर्तव्य ठरू शकेल. आणि यासाठी फार मोठ्या त्यागाची गरजही नाही. आपल्या काही सुखसोई आपणहून सोडून द्यावे एवढीच माफक अपेक्षा यात आहे.

देशात सरकारच्या अनेक बिल्डिंगा आहेत. कार्यालये, कोर्टकचेऱ्या वगैरे. संध्याकाळी ६ नंतर सगळे कर्मचारी घरी जातात. तिथे बिल्डिंगांमधे सिक्युरिटी व्यक्तिरिक्त कोणीच जात नाही. मग या सगळ्या जागांमधे बेघरांसाठी रात्री झोपण्याची तरी किमान सोय होऊ शकते. म्हंजे सात वाजता बेघरांनी त्या बिल्डिंगांमधे जाऊन झोपायचे. सकाळी सात वाजता बाहेर पडायचे. एवीतेवी त्या जनतेच्याच मालकी च्या आहेत ना. मग जनतेलाच त्यांच्यामधे प्रवेश का दिला जाऊ नये ? विशेषत: जर ती जनता बेघर असेल तर ??

अपव्यय टाळण्यासाठी हा उपाय कसा वाटतो ?

आता कोणी म्हणेल की त्या कार्यालयांमधे कागदपत्रं, दस्तऐवज असतात व ते गहाळ झाले तर कोण जबाबदार ? मग संध्याकाळी सहा वाजता कर्मचाऱ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी ती कागदपत्रे कपाटात बंद करून ठेवावीत असा अध्यादेश काढला जाऊ शकतोच की. किंबहुना त्यातल्याच काही बेघरांना हे काम दिले जाऊ शकते की सहा वाजता यायचे व सगळी कागदपत्रे, दस्त ऐवज कपाटात बंद करून ठेवायचा व मगच झोपायचे. म्हंजे त्यांना तासाभराचा पगार पण दिला जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तीच कागदपत्रे कपाटातून बाहेर काढण्याचा पण एक तासाचा पगार दिला जाऊ शकेल. तेवढीच बेकार + बेघर लोकांची कमाई व सोय होईल.

आता सर्व सरकारांमधे जर संगणकीकरणाचा घाट घातला असेल तर मात्र समस्या आहे. कारण जास्त संगणकीकरण म्हंजे कागदपत्रे कमी. मग कपाटात उचलून ठेवणार काय ? उत्तर सोपे आहे - संगणकच उचलून कपाटात ठेवायचा. म्हंजे जास्त पगार पण दिला जाऊ शकेल कारण संगणक जड असतो (कागदपत्रांच्या तुलनेत). सकाळी सात वाजता पुन्हा संगणक जाग्यावर (म्हंजे टेबलावर) आणून ठेवायचा व सॉकेट मधे जोडायचा ह्याचा पण रोजगार होऊ शकतो.

आता संगणक चोरीला गेला तर काय करायचे ? - अशी शंका उपस्थित करू नका. कारण बेघर लोक हे चरित्रवान असतात, नीतीवान असतात याच गृहितकावर प्रजातंत्र चालते. म्हंजे ते बेघर लोक स्वत: चोरणार तर नाहीतच पण आलेल्या एखाद्या चोराला पण रोखून धरतील.