चंदेरी:मियाजींच्या घरी जेवणाचा किस्सा
गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात. हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत भाग घेतात. चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो ते हि कळले.
(किल्याच्या भिंतीवरून दिसणारे चंदेरी शहर)

जेवत असताना, वडिलांनी सांगितलेला एक जुना किस्सा आठवला. १९६०-६२च्या दरम्यानची गोष्ट. वडील मुंबईच्या एका रंगरसायन कंपनीचे विक्रय प्रतिनिधी म्हणून दिल्लीत कार्यरत होते. चंदेरीच्या साड्या प्रसिद्ध आहेतच. पण तिथे सद्या रंगण्याचे कारखाने हि भरपूर आहेत. १९६०च्या दशकात जुने रंग सोडून नवीन रासायनिक रंगांचा वापर तेथे हि सुरु झाला होता. त्या बरोबर काही समस्या हि निर्माण झाल्या होत्या. कुठलीही नवीन तकनीक वापरताना सुरवातीला समस्या या येतातच. ऑफिसने मुंबई वरून एक तकनीकी व्यक्ती दिल्लीला पाठवला. त्याच्या सोबत वडील चंदेरीला पोहचले. तेथील डीलरच्या दुकानात तेथील रंगारी जमले, त्यांच्या सोबत चर्चा झाली. दुसर्या दिवशी पहाटे एका बुजुर्ग मियांजींच्या कारखान्यात प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले. मियांजींच्या राहत्या घराच्या एक बाजुला त्यांच्या कपडे रंगण्याचा छोटेखानी कारखाना होता. पाहुणे घरी आले, की त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, हि भारतीय परंपरा आहेच. मियांजी म्हणाले, कल आ ही रहे हो तो दुपहर का भोजन हमारे घर हो जाय. वडिलांनी उत्तर दिले, काही हरकत नाही, पण जेवायला शाकाहारी पदार्थ ठेवा, कारण आम्ही शाकाहारी आहोत. मियांजी उद्गारले, काळजी करू नका, मी स्वत: जातीने लक्ष देईन.
त्या दिवशी रात्री, मुंबईहून आलेल्या तकनीशियन ने विचारले, पटाईत साहेब आपण जेवणाचे निमंत्रण स्वीकारले आहे, पण हे लोक तर मांस इत्यादी खाणारे. वडील म्हणाले, फिरतीवर असताना आपण ढाब्यावर जेवतो. अन्न कस आणि कश्यारीतीने बनविले आहे, आपल्याला माहित नसते. केवळ विश्वासावर आपण ढाब्यात जेवतो. इथे तर घर आहे, काळजी कशाला, भांडे चक्क धुऊन-पुसून स्वैपाक करतील हे लोक. कुठला हि अरुचीकर वास येणार नाही याची काळजी घेतील.
दुसर्या दिवशी काम संपल्यावर दुपारी एक दीड वाजता. मियांजींच्या घरी पोहचले. त्या काळच्या हिशोबाने घर कौलारू आणि मातीचे होते. स्वैपाकघरात ताटे मांडली होती. स्वैपाकघर हि व्यवस्थित शेणाने सारवलेले दिसत होते. चंदेरी, शिंद्यांच्या अधिकारात असल्यामुळे मराठी जेवण संस्कृतीचा प्रभाव या भागावर अजूनही आहे. अशोक नगरहून चंदेरी कडे जाताना सकाळच्या वेळी रस्त्यात ठेल्यांवर बटाटा पोहे विकताना दुकानदार दिसले होते. मियांजींच्या घरी हि वडिलांना हा प्रभाव जाणविला. वरण-भात, पापड, लोणचे, बटाट्याची सूखी भाजी आणि सेंवैया खीर हा मेनू होता. चुल्हयावर कढई, ठेवलेली होती, गर्मागर्म पुर्या तळून म्हातारी अम्मी वाढणार होती.
ताटावर बसल्यावर वडिलांना एक जाणवले. पितळेचे ताट, वाटी, पेला, चुल्ह्यावर ठेवलेली पितळी कढई सर्व भांडे नवीन होते. वडिलांनी सहज विचारले, मियांजी, भांडे नवीन विकत घेतलली आहेत का. हां, आप लोक आने वाले थे, इसलिए अम्मीजीने कहा, नए बर्तन ले आओ. मियांजीचे उत्तर ऐकून, वडिलांना कसे-कसे वाटले, काहीवेळ त्याना काय बोलावे काही सुचले नाही. थोड्यावेळ विचार करून ते म्हणाले, अम्मीजी इसकी क्या जरुरत थी. म्हातारी अम्मीने लगेच उत्तर दिले, कैसे जरुरत नहीं थी. बामन आदमी को घर पर खाने को बुलाया है. बर्तन कितना भी मांजो कहीं न कहीं बास रही जाती है. ऐसे बर्तन में खाना खिलाकर आपका धर्मभ्रष्ट थोड़े ना करना है. फिर मुझे भी तो अल्लाताला को जवाब देना है. त्या भोळ्या अशिक्षित म्हातारी अम्मीचे उत्तर ऐकून, वडिलांनी डोळ्यातून ओघळणार्या अश्रुंना बामुश्कील थांबविले. दुसर्यांच्या धार्मिक विचारांबाबत किती काळजी होती तिला. त्या दिवशीच्या जेवणाची गोडी काही औरच होती.
२००७ मध्ये, वृद्धावस्था आणि आजारी असताना, वडिलांनी हा किस्सा सांगितला होता. जवळपास पन्नास वर्षानंतर हि त्यांच्या जिभेवर अम्मीच्या हातच्या जेवणाची चव होती. त्या दिवशी रात्री घरी सेंवैया खीर केली हे सांगणे नकोच.
वडील नेहमी म्हणायचे, तो काळ वेगळा होता. लोक ढोंगी नव्हते. त्या काळी लोक, अलग-अलग थाळीत जेवत होते, पिण्याचे पेले हि वेगळे होते. पण एका दुसर्याच्या प्रती प्रेम होत. दुसर्याच्या भावनांचा सम्मान कसा करायचा, हे अडाणी लोकांना हि कळायचे. सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.
ललित लेखनाचा प्रकार
...
जैनांस मांस वर्ज्य असते नि (फॉर व्हॉटेव्हर रीझन) मांसाचा तिटकारा असतो, हे माहीत असूनसुद्धा जैन व्यक्तीकडून कुकर उसना घेऊन त्या जैन व्यक्तीस कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यात मांस शिजवून परत आणून देणे नि त्यावर त्या जैन व्यक्तीची काहीही प्रतिक्रिया होणार नाही अशी अपेक्षा बाळगणे हा (Never attribute to malice that which can be adequately explained by stupidity या उक्तीस अनुसरून) शुद्ध मूर्खपणा आहे. (उपरोक्त उक्तीचा आधार नसता, तर यास शुद्ध आगाऊपणा म्हणावे की शुद्ध हलकटपणा, असा संभ्रम निर्माण होऊ शकला असता, परंतु सुदैवाने उपरोक्त उक्ती सुटकेस आली आहे.)
(जैनांस मांस वर्ज्य असते नि (फॉर व्हॉटेव्हर रीझन) मांसाचा तिटकारा असतो, हे माहीत नसल्यास (किमान भारतात राहिलेल्यावाढलेल्या भारतीय व्यक्तीच्या बाबतीत तरी) यास निव्वळ अडाणचोटपणा अनप्यारलल्ड असे संबोधता यावे. असो.)
(टीप: मी शाकाहारी नाही. गोगलगोमांसापासून ते गोमांसापर्यंत मला काहीही वर्ज्य नाही, नि तुरळक अपवाद वगळता बरेचसे आवडते.)
वडील नेहमी म्हणायचे, तो काळ
वडील नेहमी म्हणायचे, तो काळ वेगळा होता. लोक ढोंगी नव्हते. त्या काळी लोक, अलग-अलग थाळीत जेवत होते, पिण्याचे पेले हि वेगळे होते. पण एका दुसर्याच्या प्रती प्रेम होत. दुसर्याच्या भावनांचा सम्मान कसा करायचा, हे अडाणी लोकांना हि कळायचे. सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.
माफ करा , हे वाक्य अतिसुलभ, अतिभाबडे वाटले. असा विश्वास न ठेवण्याइतका सिनिक्पण आलाय आता.
.
पण लहानसाच किस्सा रंगवुन सांगण्याची हातोटी आवडली.
हा विषय इतका सब्जेक्टिव्ह आहे
हा विषय इतका सब्जेक्टिव्ह आहे की यामधे सत्य काय आहे नि नाही हे कळणं अशक्य आहे. प्रत्येकजण स्वतःच्या अनुभवानुसार जनरलाइझ करतो. त्या व्यक्तीसाठी ते सत्य असते, असं समजायचं. There is a hidden "I think --/ In my experience --" qualifier in all such statements. (Qualifier ला मराठीत काय म्हणतात?)
भल्याभल्यांकडून...
अलग थाळीत जेवत असले म्हणून काय झालं? प्रेम होतं. यात "प्रेम होतं असं आम्ही सांगतोय ना? मग त्या अलग थाळीवर ऑब्जेक्शन घेऊ नका!" असं सुचवणं* आहे. म्हणून ते भाबडं वाटत नाही.
*शिवाय पटाईत काकांचा दुसरा धागा वाचल्यावर तर नाहीच वाटत.
असे सुचविण्याचा प्रमाद भल्याभल्यांकडून घडलेला आहे.
नेमक्या कोणत्या पुस्तकात ते आता नक्की आठवत नाही, प्रसंगही नीटसा आठवत नाही नि संदर्भाकरिता पुस्तकही संग्रही नाही, परंतु जे काही अंधुकसे आठवते, त्याप्रमाणे सुनीताबाई आपल्या आईची आठवण कोठेशी मांडतात. की तिच्याकडे घरी येणाऱ्या कोळणीकरिता की अशाच कोणत्याशा बाईकरिता (आता नक्की तपशील आठवत नाही, पण) वेगळी भांडी असत, एकंदरीत शिवाशीव टाळण्याकडे कटाक्ष असे, परंतु तीच ती कोळीण की कोण ती आजारी असली, तिला गळवे झाली असली (तपशिलाच्या अचूकतेची चूभूद्याघ्या.), की ती गळवे स्वत:च्या हातांनी साफ करून त्यावर उपचारही त्याच (बोले तो सुनीताबाईंच्या आई) जातीने करत, नि तसे करताना मात्र त्या क्षणापुरती तरी त्यांना शिवाशीव आड येत नसे, वगैरे वगैरे. (उपचारानंतर स्नानशुचिर्भूत होण्याची आवश्यकता सुनीताबाईंच्या मातु:श्रींना वाटत असे किंवा कसे, याबद्दल काही ज़िक्र सुनीताबाईंनी केला आहे किंवा कसे, हे मला आता स्मरत नाही, आणि केला असल्यास त्याबद्दलचा तपशीलही आता याद नाही. आणि सुनीताबाईंच्या मातु:श्रींच्या या लोकोत्तर सद्गुणास सुनीताबाई प्रेम असे संबोधतात, की आपुलकी, की माणुसकी, की अन्य काही, हेही आता आठवत नाही. हे दोन्ही मुद्दे तितकेसे महत्त्वाचे नाहीत.)
टेक द होल थिंग विथ ऑर विदौट अ ग्रेन ऑफ सॉल्ट, ऑर लीव्ह इट ऑल्टुगेदर. (तसेही सुनीताबाई किंवा त्यांच्या मातु:श्री दोघींपैकी कोणाशीही मला काहीही व्यक्तिगत देणेघेणे नाही; तुम्हालाही बहुधा नसावे. (चूभूद्याघ्या.)) सांगण्याचा मतलब इतकाच, की 'आपली माणसे' म्हणून आपण ज्यांना मानतो,त्यांचे दोष प्रकटरीत्या व्हाइटवॉश करण्याचा मोह भल्याभल्यांना जेथे आवरत नाही, तेथे पटाईतकाका कोणत्या झाडाची मुळी आहेत? किंबहुना मी तर म्हणतो की हा मानवी स्वभावधर्म आहे.
तेव्हा, सोडून सोडा हो!
(अतिअवांतर कुतूहल: सुनीताबाई या पूर्वाश्रमीच्या ठाकूर, बोले तो भट की सारस्वत? नाही, नित्याने घरात कोळिणीच्या असलेल्या येजाच्या ज़िक्रामुळे कुतूहल जागृत झाले, इतकेच. असो.)
एक प्रश्न
>> विशिष्ट चष्मा डोळ्यांवर लावल्यामुळे साधा प्रसंग हि वेगळा वाटू लागतो. कधीतरी हृदयाने वाचायला पाहिजे, डोळ्यांवरचा विशिष्ट चष्मा काढून.
सहमत. मी हृदयाने वाचलं आणि मग हे वाचून मनात एक प्रश्न आला -
>> सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.
प्रश्न : तुमचे वडील कधी तरी अम्मीला असं म्हणाले का?
'आता माझ्या मनात तुमच्याविषयी इतकी सहृदयता निर्माण झाली आहे, की मला इथे घरच्यासारखंच वाटतं. त्यामुळे माझ्यासाठी अन्न वेगळ्या भांड्यांत नको, तर तुम्ही रोज जेवता त्याच भांड्यांत शिजवा आणि वाढा'
प्रश्न : तुमचे वडील कधी तरी
प्रश्न : तुमचे वडील कधी तरी अम्मीला असं म्हणाले का?
'आता माझ्या मनात तुमच्याविषयी इतकी सहृदयता निर्माण झाली आहे, की मला इथे घरच्यासारखंच वाटतं. त्यामुळे माझ्यासाठी अन्न वेगळ्या भांड्यांत नको, तर तुम्ही रोज जेवता त्याच भांड्यांत शिजवा आणि वाढा'
किंवा कमीत कमी नविन भांडी तरी घेउन जात होते का चंदेरीमियांना द्यायला.
त्यांना उगाचच दर वेळेला भांड्यांचा खर्च.
???
एकदा भटासाठी विकत घेऊन ठेवलेली भांडी पुन्हापुन्हा (फक्त त्याच नाही, पण येईल त्या) भटासाठी वापरता येत नाहीत?
पूर्वीच्या काळी भटांत१ काय घरात येणार्या प्रत्येक (तथाकथित) निम्नवर्णीयाकरिता इंडिव्हिज्युअल पर्सनलाइज़्ड फुटका कप राखीव असे?
(तुम्ही पण ना राव! उगाच न्यूटनसाहेबाच्या मांजरीची आठवण करून दिलीत.)
----------
१ भटेतर (तथाकथित) उच्चवर्णीयांत शिवाशिवीचे नेमके काय संकेत होते, याबद्दल वेल-डॉक्युमेंटेड माहिती वा संदर्भ (किमानपक्षी माझ्याजवळ) उपलब्ध नसल्याकारणाने केवळ भटांचा उल्लेख.
पूर्वीच्या काळी? भारीच्च बै
पूर्वीच्या काळी? भारीच्च बै तुम्ही ऑप्टिमिष्टिक. हे अजुनही चालतं मुंबईसारख्या मागास शहरात (कामवाल्यांसाठी. गै.स. नको. जातीसाठी नसुन त्या 'स्वच्छता पाळत नसल्याने' असते असे ऐकले आहे. श्रीमंत नीचजातीय तथा परजातीय आल्यास असे करत नाहीत. परंतु कामवाल्यांकडुन सारे घर भ्रष्ट झालेले चालते)
मांसाहारी लोकांच्या भावनांची
मांसाहारी लोकांच्या भावनांची कदर करून शाकाहारी त्यांच्याकडे जेवायला गेल्यावर त्यांना वाईट वाटू नये म्हणून मांसाहार का करत नाहीत? का भावना फक्त शाकाहार्यांनाच असतात?
याचं कारणं मांसाहारी म्हणतो असे लोक खर तर मिश्राहारी असतात. सो ते वेज खाणारे असतातच.
बाकी, एक अनेक धार्मिक दुसर्याच्या धार्मिक नियमांबाबत जागृत असतात असं पाहिलेलं आहे. (उदा: डब्यात बिर्याणी असेल तर अबे आज मत खा, आज मंगलवार है ना वगैरे आठवण करून देणारे मित्र पाहिले आहेत.)
इतरांनाच जजमेंट पास करायची खाज जास्तं असते.
नै पटलं. मांसाहारी लोकांनी
नै पटलं. मांसाहारी लोकांनी शाकाहार्यांना वासही येऊ नये म्हणून नवी भांडीही आणायची तरी त्यात काही गैर वाटत नाही! आणि उलट उदाहरण माझ्या ऐअकण्यात एकही नाही! उलट आज रविवार असूनही अबकला कसं घासफूस खावं लागलं याचच कौतिक चालू असतं. माझ्या मांसाहारी भावना कित्ती दुखावतात. पण एका शाकाहार्याला त्याचं काही असेल तर शपथ! ;)
असो. नेहमीचे यश्स्वी वाद नकोत! ;)
किंवा उलट प्रश्न आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला मांसाहार अतिप्रिय आहे म्हणून किती शाकाहारी "घरपे अबक बुलाया है तो उसके लिये ..." असे ड्वायलाग मारत पुढ्यात (किमान विकतच्या) तंगड्या ठेवतात? अशावेळी अतिथी देवो भव कुठे जातं?
ते सगळं ठीक आहे हो. पण
ते सगळं ठीक आहे हो. पण आपल्यासाठी नविन भांडी आणून जेवू घालणार्याला एखाद्यावेळी आपल्या घरी बोलावून आपल्याला चालत नसलं तरी त्याला मेजवानी म्हणून भांड्यासकट बिर्याणी विकत आणून का होईना, शाकाहारी लोक खाऊ घालतात का? कुठेतरी तुच्छतेची भावना असते तर मान्य तरी करा ना राव! बळंच शुद्ध मनाने वाचा वगैरे कशाला?
...
मुळात काकांनी तुम्हाला आमंत्रण दिले आहे काय?
---
ते असो. स्वतः मांसाहार करीत नाही, परंतु मी घरी पाहुणा आलो तर (मला आवडते म्हणून) मला काही मांसाहारी पदार्थ आपण होऊन (प्रसंगी शेजारणीस रेशिपी विचारून) करून खाऊ घातले, असे किमान दोन तरी अनुभव गाठीशी आहेत. त्यामुळे, ही अगदीच अशक्यकोटीतली गोष्ट आहे, अशातला भाग नाही.
उलटपक्षी, अनेकदा मांसाहार्यांकडे पार्टी आहे, आणि आमंत्रितांपैकी मोजकेच लोक शाकाहारी आहेत, तर बर्याचदा एखादा तरी शाकाहारी विकल्प (फॉलब्याक ऑप्शन) जेवणात ठेवावा, हा संकेतही (असलाच तर) विस्मरणात जातो (किंवा साफ दुर्लक्षिला जातो), असाही अनुभव आहे. (किंवा उपलब्ध असलाच, तर तो विशेष लक्ष न घालता केलेला असतो, अनेकदा रीसायकल्ड लेफ्टोव्हर्सपैकीसुद्धा असतो, असेही निरीक्षण आहे. सन्माननीय अपवाद असल्यास क्षमस्व.) किंबहुना, एकदा तर एका पार्टीत आमच्या मातु:श्री आणि आणखी एक सद्गृहिणी या दोनच शाकाहारी सदस्या उपस्थित असताना, जेवणात झाडून सारे मांसाहारी विकल्प, आणि वर "अय्या! तुम्ही खात नाही, नाही का? विसरलेच मी! आता काय करू? मी काहीच शाकाहारी केले नाही. अरे हो, सकाळचा भात थोडा आहे, त्याला फोडणी देऊ का?" असाही एक अनुभव गाठीशी आहे. (वस्तुतः, सीकेपी लोक बिरड्यांची उसळ उत्तम करतात, असे ऐकून आहे - खखोसीकेपीजा. त्यामुळे, 'आम्ही शाकाहारी बनवतच नाही' वगैरे ऐट निव्वळ अनाकलनीय आहे. पण असो.)
किंवा, मांसाहार्याकडे आमंत्रित दांपत्यापैकी एक सदस्य (बहुधा नवरा) मांसाहारी (परंतु अपारंपरिक) आणि दुसरी सदस्या शाकाहारी अशी परिस्थिती असली, तर आणखीच एक गंमत दिसते. बोले तो, एखादा शाकाहारी विकल्प असूही शकतो, तो मुद्दा नाही. परंतु जो मांसाहारी विकल्प असतो, तो दांपत्यापैकी मांसाहारी सदस्यास आवर्जून, अतिअगत्याने, अगदी पुढेपुढे करून वाढला जातो, इतके की ते अंगावर येऊ लागते, आणि शाकाहारी सदस्येकडे मात्र जवळपास पूर्ण दुर्लक्ष होते. बोले तो, जेवण वाढले जाते, पर्फंक्टरी विचारपूसही होते, नाही असे नाही, पण ऑल्सो रॅनप्रमाणे.
किंवा, मत्स्याहार्यांकडे आमंत्रित अपारंपरिक मत्स्यभक्ष्यास अगदी आवर्जून अगत्याने 'फीश' (याला पारंपरिकेतर मत्स्यभक्ष्यांशी किंवा बिगरमत्स्यभक्ष्यांशी बोलताना 'फीश' म्हणायचे असते, नि आपसात बोलताना 'बाजार'.) वाढले जाते, आणि मग तो ते खात असताना अतिकौतुकाने त्याच्या तोंडाच्या हालचालींचे निरीक्षण केले जाते. वर 'अय्या! हा ('भट असून' हे अध्याहृत) बाजार अगदी व्यवस्थित ('अगदी आपल्यासारखा' हे अध्याहृत) काटे साफ करून खातो, नॉऽऽऽऽऽऽय!' हे सानुनासिक, स-हेल 'कौतुक'. आता, हे तथाकथित 'कौतुक' पहिल्या वेळेस ऐकताना (अनभिज्ञ असताना) क्वचित बरेही वाटू शकते. परंतु साधारणतः सत्ताविसाव्या वेळेस ऐकल्यावर ऐकविणार्याचा (१) गळा घोटण्याची आणि/किंवा (२) ते साफ केलेले काटे त्याच्या/तिच्या नरड्यात कोंबण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते. (च्यामारी! भट झाला म्हणून त्याला काटे साफ करता का येऊ नयेत? खास करून थोडा हिंडलाफिरलेला, हॉस्टेलवर राहिलेला वगैरे असला तर? आणि, काटे साफ करून मासे खाऊ शकणारा भट ही चीज तुमच्या मर्यादित अनुभवविश्वात तुमच्या पाहण्यात येत नसेल, नि म्हणून तुम्हांस त्याचे अप्रूप असेल. मला त्याचा त्रास कशाला?)
किंवा, 'या( भटा)स आम्ही नॉनव्हेज/फीश खाऊ घालतो' याचेही स्वकौतुक असते की काय, नकळे. असेच एक गोतावळ्यातले सद्गृहस्थ. पारंपरिक मत्स्याहारी. मुंबईत यांचे घरी मी अनेकदा जात असे. आवर्जून मासे खाऊ घालत. (नंतर ते मी खात असताना मुखनिरीक्षणादि उपरोक्त कार्यक्रमही चालत. तर ते असो.) आता, पुण्यात माझ्या घरी (१) मी आणि माझे तीर्थरूप हे दोनच सदस्य प्रासंगिक मांसभक्षी असल्याकारणाने आणि (२) घरात कोणास मांसाहारी पाकसिद्धीचा अनुभव नसल्याकारणाने घरी मांसाहारी पदार्थ बनत नसत. परंतु (आमच्याकडे राहणारी आमची खत्रूड आजी वगळल्यास) कोणाचा मांसाहारास विरोध किंवा तिटकारा नव्हता. कधी आईवडिलांबरोबर बाहेर जेवावयास गेल्यास आईने शाकाहारी जेवणे आणि मी आणि वडिलांनी मांसाहारी जेवण एकत्र बसून करण्यास कोणासच अडचण नसे, अनेकदा करतही असू. मात्र, घरात मांसाहारी पाकसिद्धी (अंडी वगळल्यास) होत नसे.
तर असाच एकदा मी कॉलेजच्या दिवसांत सुट्टीचा पुण्यात घरी आलेलो असताना काही कामानिमित्त हे सद्गृहस्थ पुण्यास आले, आणि आले तसे भेटायला घरी आले. गप्पाटप्पा झाल्या, ठीकच आहे. पण (१) आमच्या घरात मांसाहारी पाकसिद्धी होत नाही, आणि (२अ) आमच्या आजीची मांसाहाराबद्दलची मते टोकाची आहेत, आणि (२ब) आमची आजी अतिशय खत्रूड आहे, या गोष्टी सर्वज्ञात असताना, मुद्दाम आमच्या घरी आल्यावर आणि त्यात आमची आजी समोर बसलेली असताना, "मऽऽऽऽग? तुमच्या क्षक्षक्षला मिळते की नाही खायला पुण्यात, फीऽऽऽऽश? मुंबईला आमच्याकडे येतो तेव्हा नेहमी खातो, फीऽऽऽऽश! फिदीफिदीफिदी!" असे आवर्जून पचकण्याची खरे तर या सद्गृहस्थांना काही गरज नव्हती. बरे, यांच्या घरी मी 'फीऽऽऽऽश' खातो, हीदेखील जाहीर आणि सर्वज्ञात बाब होती, त्यातही ते काही नव्याने सांगत होते, अशातला भाग नव्हता. सांगावेसे वाटत होते, की "काका, मुंबईला मी तुमच्या घरी येतो, तेव्हा तुम्ही मला आवर्जून 'फीऽऽऽऽश' खाऊ घालता, ते ठीकच आहे. आणि इथे पुण्यास आमच्या घरी 'फीऽऽऽऽश' बनत नसेलही. पण पुण्यात मला 'फीऽऽऽऽश' नाही मिळाले, तर मी काही तुमच्यासारखा पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडून मरणार नाहीये काही. माझा बाप घरी मला 'फीऽऽऽऽश' खाऊ घालत नसेलही, पण उपाशीही ठेवत नाही. आणि एवढेच मला 'फीऽऽऽऽश' खावेसे वाटले, तर माझ्या ढुंगणामागच्या खिशात पाकीट असते, त्यात बापानेच दिलेले पैसेही असतात, नि ढुंगणाखाली मला दोन पायही आहेत, ते वापरून मी एवढेच वाटले तर चालत जाऊन बाहेर खाऊनही येऊ शकतो. तेव्हा पुण्यात मला 'फीऽऽऽऽश' मिळते की नाही, याची काळजी तुम्हांस कशास?" पण जाऊदे म्हटले. बोललो नाही.
पण मी गप्प बसलो, तरी आमची आजी गप्प बसेल? इतका वेळ गप्प बसलेल्या आमच्या हलकट, दुष्ट, रेशिष्ट आजीने अगदी हसतहसत तोंड उघडलेच. "आम्ही ब्राह्मण आहोत. आम्ही 'तसले' खात नाही."
(वस्तुत:, ते सद्गृहस्थही स्वतःस 'ब्राह्मण' म्हणविणार्या मत्स्याहारी जातींपैकीच. आणि, ब्राह्मण आहोत वगैरे ठीक आहे, पण "आम्ही 'तसले' खात नाही" हेही तितकेसे खरे नाही. बोले तो, ती खात नसेल, माझी आई खात नसेल, पण 'आम्ही' खात नाही, हे तथ्यास धरून नाही. अगदी नित्याने नसलो तरी. पण ते एक असो.)
आता, एरवी माझी आजी जर असे कोणास माझ्यादेखत म्हणाली असती, तर मी (१) ती माझी आजी आहे, नि (२) वयोवृद्ध आहे, यांपैकी कशाचाही मुलाहिजा न राखता तिचा जागच्याजागी गळा घोटला असता. परंतु त्या क्षणी घोटावासा नाही वाटला. The gentleman - and I use the term euphemistically - had asked for it, and deserved every bit of what he got.
---
तर सांगण्याचा मतलब, स्वतः मांसाहारी असलो, तरी पारंपरिक मांसाहार्यांकडील अनुभव हा सुखदच असतो, असे नाही. अनेकदा ते जेवण अॅटिट्यूडसहित येते, आणि मग ते नकोसे होऊ लागते. त्यापेक्षा माझ्या एकारान्त भटमित्राघरी जाऊन आम्ही दोघे त्याच्या ग्रिलवर ष्टेक भाजून खाणे मी पसंत करतो. तेथे त्याने खाऊ घातलेले ष्टेक आणि/किंवा त्याच्या बायकोने खाऊ घातलेले शुद्ध कोकणस्थी पद्धतीचे शाकाहारी जेवण - त्याबरोबर अॅटिट्यूड येत नाही. आलाच तर मोकळेपणा आणि आपुलकी येते.
एकंदरीत आजकाल भारतीय वंशाच्या पारंपरिक मांसाहार्यांकडून (१) जेवणाचे बिल भरण्याची आणि (२) वर १५%पर्यंत टिप ठेवण्याची सोय असल्याखेरीज अन्नग्रहण (आणि विशेषतः मांसाहारी अन्नग्रहण) करू नये, अशा विचारांकडे कल होऊ लागला आहे.
असो.
फीssश!
डोक्यात जातो हा शब्द. तसाच दुसरा शब्द म्हणजे 'फ्रेश्श्श्'. कुणीही कुणालाही 'तुम्ही फ्रेश्श्श् होऊन येता का, म्हणजे आपल्याला बोलणं सुरू करता येईल; किंवा तोवर मी सरबत/चहा आणते/तो, असे कुणासमोरही बोलू शकतो. पाहुण्यांनी नक्की काय करावं असं अभिप्रेत असतं कुणास ठाऊक.
हॅ
अहो, अम्मीच काय, आपणसुद्धा शेकडो वर्षे असे वेगळेचार करत होतो की. वेगळी ताटली, वेगळी वाटी वगैरे. आता ती भांडी नवी असत की कसे हा विदा शोधायला पाहिजे. आणि भांडी नवी नसली म्हणून काय झाले, करवंटी तर दरवेळी नवी असे!
अणि मुसलमान लोक असे सररास आपल्याकडे जेवायला येत असत की कसे हेसुद्धा शोधायला पाहिजे.
जा.जा.- भारतातून कोणी लोक (हिंदू बहुधा) पाकिस्तानात गेले की तिथल्या लोकांकडून त्यांना कसे भरभरून प्रेम आणि आदरातिथ्य मिळते याच्या कहाण्या वाचल्या आहेत. पण तिथून मुसलमान लोक इथे आले की त्यांचे आम जनतेकडून कसे स्वागत होते याच्या कहाण्या मात्र (आम्हांला उर्दू येत नसल्याकारणाने) वाचायला मिळालेल्या नाहीत. (आम्हांला मराठी, हिंदी येते.)
युरेक्का!!
पण तिथून मुसलमान लोक इथे आले की त्यांचे आम जनतेकडून कसे स्वागत होते याच्या कहाण्या मात्र (आम्हांला उर्दू येत नसल्याकारणाने) वाचायला मिळालेल्या नाहीत. (आम्हांला मराठी, हिंदी येते.)
मध्यंतरी कोणीतरी खफवर दिलेल्या विदानुसार लोकांनी ऐसीवरून उडी मारलेल्या सायटींमध्ये पाकिस्तानातल्या 'द डॉन' वृत्तपत्राची साईट पहिल्या पाचांत येते. त्याचे कारण आत्ता कळाले. ;-)
भावनाओं को समझो जी
>> सो ते वेज खाणारे असतातच.
हे मांसाहारींना अंमळ गृहित धरणं झालं. बोंबलाच्या कालवणाऐवजी भातावर गोड्या मसाल्यातली आमटी घालायला आवडेल का, मटन/चिकन बिर्याणीपेक्षा व्हेज बिर्याणी खायला आवडेल का, चिकन टिक्का किंवा तळलेल्या कोळंबीऐवजी भेंडीची गुळमट भाजी खायला आवडेल का, असे प्रश्न विचारले तर किती मांसाहारी लोक व्हेज पर्याय निवडतील? असा माझ्या भावनांना हात घालू नका ढेरेजी!
समजेना!
त्याने तुम्हाला काही फरक पडतो?
(इन एनी केस, समजा अगदी त्याने दिली, तरी 'जैन कोलंबी' खायची तुम्हाला खरोखरच इच्छा आहे? हे म्हणजे, जुन्या काळच्या 'क्लासिक' गुडलकमध्ये - बोले तो, जेव्हा मेनूकार्डावर पर्फंक्टरी एकदोनच शाकाहारी आयटम असायचे, आणि तेही खाण्यालायक नसायचे, तेव्हाची गोष्ट. आताच्या दर्जेदार वाढीव शाकाहारी विकल्पांच्या दिवसांतली नव्हे. - जाऊन एक रोटी आणि दालफ्राय मागविण्यासारखे झाले. किंवा उडप्याकडे चहा.)
कृष्णा-कुंडल उपमा
>> तुम्हाला प्रतिपुल हा खिताब देण्यात येत आहे ढेरेशास्त्री.
खरं तर हे वाचून तुम्ही त्यांना काही तरी वपु, दवणे वगैरे अश्लील म्हणाल अशा आशेत मी होतो -
>> दुसर्याच्या इन्विटेशनला मान देऊन त्याच्याघरी जाण्यातला आनंद
ऐसीकाठी पहिल्या अनुताई आता उरल्या नाहीत! आता गब्बरच माझा त्राता.
शाकाहारी लोक असा कंसिडरेटपणा
शाकाहारी लोक असा कंसिडरेटपणा कधी दाखवणार?
ते कंसिडरेट मांसाहारी बघतील. त्यांना प्राब्लेम नसेल तर हे लादणारे तुम्ही/आम्ही कोण?
एकतर्फी कंसिडरेटपणा दाखवणारे
माझी चांगल्या माणसाची व्याख्या परतफेडीची अपेक्षा न करता चांगुलपणा दाखवणारा ही आहे. विचारवंत सगळ्या गोष्टी व्यवहाराच्या भाषेत बघत असतील तर त्यांना त्रास होत असेल. त्यांनी वाचू नयेत असे किस्से त्रास होत असेल तर.
अम्मीचा कंसिडरेटपणा अजिबात हेलावणीय वाटला नाही.
गुड फॉर यू!
अम्मीजींचा कंसिडरेटपणा
अम्मीजींचा कंसिडरेटपणा वाखाणण्याजोगा आहे हे मीच लिहिलं आहे. पटाईत काकांनी गोष्ट तो दाखवण्यासाठीच लिहिली आहे. अम्मीजींना कोणीही वाईट जज केलेलं नाही. उलट सगळे अम्मीजींचं कौतुकच करतायत. कोणीही मांसाहारी वाईट असतात असं म्हणालेलं नाही. इमॅजिनरी आक्षेप तुम्हीच काढलेत.
दुसर्याच्या भावना कोणी जपल्या तर काही तिर्हाइत लोकांना एवढा त्रास होतो हे प्रथमच दिसलं. मला जे म्हणायचं होतं ते म्हणून झालं आहे. मी थांबतो.
भावना जपल्या म्हणून त्रास होत
भावना जपल्या म्हणून त्रास होत नाहीय. समाजाचा एक भाग दुसर्याच्या भावना जपण्याचे कष्ट घेत नाही याकडे दुर्लक्ष केले जाते ह्याचा त्रास होतो. बळंच अम्मीला तुम्ही(च) चांगलं म्हणताय आणि मला त्याचा त्रास होतोय असं तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय एवढे म्हणून मीही थांबतो.
बाकी, एक अनेक धार्मिक
बाकी, एक अनेक धार्मिक दुसर्याच्या धार्मिक नियमांबाबत जागृत असतात असं पाहिलेलं आहे. (उदा: डब्यात बिर्याणी असेल तर अबे आज मत खा, आज मंगलवार है ना वगैरे आठवण करून देणारे मित्र पाहिले आहेत.)
ह्यात धार्मिक भावनेबिवनेऐवजी बिर्यानीची हाव हेही एक कारण असू शकेल ना?
इतरांनाच जजमेंट पास करायची खाज जास्तं असते.
शाकाहारी जेव्हा मांसाहर्यांवर जजमेंट पास करतात तेव्हा तो निव्वळ जळकेपणा असतो. त्यांना माहिती असतं की दे सक (ऑन ऑल फोर्स), त्यामुळे स्वतःला बरं वाटून घेण्याकरिता तो एकमेव मार्ग असतो. उदा. काही काकवा निव्वळ जळूपणापोटी तंग इ. कपडे घालणार्या पोरींवर जजमेंट पास करतात त्यातलाच हा प्रकार.
चांगले दिवस.
खरे तर मेज़्बानाने आग्रह करून मेहेरबानांना बोलावले असेल तर त्यांच्या पसंतीचे जेवण बनवावे, किमान ते त्यांना आवडेल असे असावे असा संकेत आहे. अनाहूत असाल तर मिळेल ते गिळायला हवे. पण दावत देऊन बोलावल्यावर काहीतरी विशेष करणे अपेक्षित असते. एखाद्या सज्जन गरीबाने आयत्या वेळी 'दादा आम्ही इतकेच करू शकलो, गोड मानून घ्या' असे सांगणे वेगळे. दुसर्या कोणी (तितक्याशा गरीब नसलेल्याने) 'आम्ही हे असे असे बनवले आहे, हवे तर घ्या नाही तर फुटा' असे सुचवणे वेगळे. मिश्राहार्याला घरी बोलवून त्याला आवडेल असा एखादा सामिष पदार्थ मुद्दाम त्याच्यासाठी केला तर ते निश्चितच चांगले आदरातिथ्य ठरेल.
येतील. हेही (चांगले) दिवस येतील.
पटाइतांच्या म्हणण्यात तथ्य वाटलं
पटाइतांच्या म्हण्ण्यात तथ्य वाटलं. समोरच्या व्यक्तीनं आपल्यापेक्षा वेगळय समाजसमूहातील व्यक्तीच्या धार्मिक भावनांची कदर केली; इतकच पटाइतांना म्हणायचं असवं असं मला वाटलं. इथे कुनीतरी सुचवल्याप्रमाणे (बहुतेक ननि) शाकाहार हा श्रेश्ठ, मांसाहार हा तुच्छ; असा सूर वआटला नाही. "धार्मिक शाकाहारी हिंदू" अशा व्यक्तीच्या काही धारणा, श्रद्धा असू शकतात. कित्येक धार्मिक ज्यू व मुस्लिम पोर्क-- डुक्कर असलेलं अन्न खात नाहित. हाच किस्सा थोडाफार बदल करुन त्यांच्या संदर्भात लिहिला तरी ते म्हण्णं मला वैध वआतेल. ज्यू -मुस्लिम पाहुणा समजा आधुनिक राहणीमान्,विचारांच्या ख्रिश्चन व्यक्तीच्या घरी गेला. किंवा अगदि एखाद्या पारशी व्यक्तीच्या घरी गेला. आणि पारशी व्यक्तीनं हा आपला खास दोस्त म्हणून म्हणा...किम्वा विशेष महत्वाची व्यक्ती म्हणून म्हणा समोरच्या व्यक्तीसाठी पोर्क-डुक्कर नसणारं काहीतरी शिजवले ; नवीन भांडे आणून बनवले; तर नक्की काय चुकले ?
किंवा समजा अजून एक केस. मुस्लिम सज्जन धार्मिक पाहुणा. त्याचा धार्मिक हिंदू मित्र होस्ट/यजमान. यजमानाने मुस्लिम पाहुण्याची कदर म्हणून नवा कोरा पेला घेउन त्यात त्या धार्मिक मुस्लिम पाहुण्याला सरबत दिले. तर ह्या घटनेत नक्की काय चुकलं ? त्याला द्यावंसं वाटलं; त्यानं आपणहून दिलं.
.
.
आता हिंदू पाहुणा मुस्लिम मित्राकडे गेल्यावर मुस्लिम मित्रानं त्याला(स्वतः न पिता) दारु ऑफर केल्यास कदाचित तो त्या मुस्लिम मित्राचा मोठेपणा असेल मह्णा, किम्वा त्यांची दोस्ती म्हणा. व्हॉटेव्हर. पण समजा मुस्लिम व्यक्तीनं दारु ऑफर केली नाही; तरी नक्की काय बिघडलं ? ती धार्मिक मुस्लिम व्यक्ती दारु पीत नाही; पिउ घालत नाही. मग कुणाला काही तक्रार असलीच तर कशाबद्दल आहे ?
तुमच्याकडे कुणी आलं तर तुम्ही मांस खाउ घालाल का ? ही विचारणा शाकाहारी व्यक्तीला करणं हे धार्मिक मुस्लिम व्यक्तीला सांगण्यासारखं आहे; की पारशी पाहुण्याला दारु पाज; डुक्कर खाउ घाल म्हणून. मुस्लिम व्यक्ती खाउ घालू इच्छित नसेल; तरी ते ठीकच असायला हवे; असे मला वआटते.
.
.
संतुलनाची कंटाळवाणी सवय लागली आहे. जाहिर करतो. मी स्वतः ऑल्मोस्ट शून्य टक्के धार्मिक आहे...ऑल्मोस्ट नास्तिक आहे. एखाद्याला अवघडलेल्या परिस्थितीत ढकलणं मला आवडणार नाही.
संभाव्य आअक्षेप --
कथेतील हिम्दू व्यक्तीने मुळात शाकाहाराचा आग्रह धरुन समोरच्याला अवघडलेल्या परिस्थितीत ढकललं आहे.
त्यास उत्तर -- तो त्यांचा नाइलाज आहे. त्यांची धार्मिकता आणि नतिक मूल्यं ही ऑल्मोस्ट एकरुप आहेत. तुम्ही तुमची नैतिकता सोडू लावणारी कामं कराल? पटाइत काका जुन्या पद्धतीचे विचार माम्डत असले तरी ह्याबाबतीत मला काहीही खटकले नाही. आणि सगळे एक बाजू घेउन ज्या सुरात बोलताहेत चेष्टेच्या.... तेही आवडलं नाही.
वडिलांनी उत्तर दिले, काही
वडिलांनी उत्तर दिले, काही हरकत नाही, पण जेवायला शाकाहारी पदार्थ ठेवा, कारण आम्ही शाकाहारी आहोत
हिंदू व्यक्तीने कुठे सांगीतलं होतं नवीन भांडी च लागतील म्हणून. कदाचित नंतर त्यांनी हे सांगीतलंही असेल की "अशी तसदी परत घेणार नसाल तरच परत जेवायला येइन."
जर तर ला काहीच अर्थ नाही कारण नक्की काय झालं हे कधीच कळणार नाही.
पण एक आहे नवीन भांडी आणून मुस्लिम कुटुंबाने अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. हिंदू व्यक्तीची तशी अपेक्षा मूळातच नाहीये.
शुची ताई, प्रतिसाद वाचले.
शुची ताई, प्रतिसाद वाचले. आमचे वडील फिरतीवर राहणारे. बाहेर जे काही वेज म्हणून धाब्यांवर मिळते, वेज समजून गटकणारे, पण अम्मी ईमान वाली. आता ईमान म्हणजे काय.
प्रतिसाद देणारे, बहुतेक लोक जुन्या दिल्ली सारख्या मिश्र वस्तीत राहिलेले नाही. एक लक्ष्यात ठेवा आम मुसलमान धर्मनिष्ठ असतो. रोज एकवेळा तरी तो नमाज पढतो. त्याच बरोबर तो दुसर्यांच्या विश्वासांचा हि सम्मान करतो. समजा मी ब्राह्मण आहे, नॉनव्हेज न खाणारा. ( जो नॉनव्हेज खात नाही तोच खरा पंडित). आपल्या मुसलमान मित्राला घरी बोलवून त्याच्या साठी नॉनव्हेज करेल. परिणाम, (या ब्राह्मणाने नॉनव्हेज घरात बनवून आपला ईमान सोडला, फक्त एका माणसाला खुश करण्यासाठी). माझ्यावरून त्याचा विश्वास उडून जाईल. त्या पेक्षा माझ्या घरी मी त्याला वेज पदार्थ खाऊ घालेल, तर मी आपल्या ईमानवर कायम राहणारा व्यक्ती आहे, त्याचा विश्वास माझ्यावर वाढेल). खरा मुसलमान अर्थात ईमान पालन करणारा, कधीच वेज खाणार्या हिंदूला नॉनव्हेज खाण्यासाठी म्हणणार नाही. जाउद्या तुम्हाला सामान्य माणसांच्या या गोष्टी समजणार नाही. त्या साठी अश्या भागांत राहणे गरजेचे व मुसलमान लोकांशी संबंध असणे हि गरजेचे. हे कळले तर समजेल त्या अम्मीनी नवीन भांडे का घेतले. कारण तिला स्वत:चा ईमान कायम राखून दुसर्याच्या ईमानची इज्जत करायची होती.
स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देता येत नाही.
आमच्या एका शाळूमित्राची आठवण
आमच्या एका शाळूमित्राची आठवण झाली. नेहमी म्हणायचा "यार मला फार चिकन खावंसं वाटतंय, तू बोलव ना मला तुमच्या घरी"; म्हणून मी एक दोनदा दिलं होतं आमंत्रण. एकदा त्याच्या घरी गेल्यावर त्याला हुक्की आली म्हणून अंडाऑम्लेट करुन द्यायची त्याने फर्माईश केली. ऑम्लेट करुन आम्ही दोघे खात असताना त्याच्या आईने तवा चिमट्यात धरुन अशा चेहर्याने बाजूला टाकला की जणू त्यावर विष्ठा पडली आहे. तेव्हापासून मग अशा फर्माईशी पुर्या करणं बंद केलं.
खूप छान लिहिलय. भांड्यांवरून
खूप छान लिहिलय.
भांड्यांवरून एक प्रसंग आठवला.
माझ्या इमारतीत राहणार्या एका सिंधी मैत्रिणीकडे पार्टी होती. त्यसाठी तिला भला मोठा कुकर हवा होता. आमच्याच दुसर्या जैन मैत्रिणीकडे तिल तो नेमका सापडला. पार्टी झाल्यावर परत करताना त्या सिंधी मैत्रिणीने सांगितले की त्यात मटण शिजवले होते. झाले! त्या जैन मैत्रिणीने आजतागायत तो परत वापरला नाही आहे. कितीही धुतला तरीही तिचे समाधानच होत नाही म्हणे. :)