क्वारंटाईन सेंटरमधून...
प्रियांका तुपे यांचा अनुभव :
सध्या मी पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. परवाच कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तेव्हापासून इथे आहे. काळजीचं कारण नाही, तब्येत व्यवस्थित आहे. मी लिहितेय ते वेगळ्याच मुद्द्यासाठी. इथे शासनातर्फे बऱ्यापैकी चांगलं दोन वेळचं जेवण, एकदा नाश्ता, दोनदा चहा-दूध असं सगळं दिलं जातं. पण त्यातनं होणाऱ्या अन्नाची नासाडी मला परवापासून सतावतेय. इथे पैक केलेले फूड ट्रेज येतात. त्यात तीन पोळ्या-भाजी, वरण-भात, लोणचं/सलाड किंवा कधी तरी गोड असं असतं. जेवण आलं की इथले कर्मचारी माईकवरून सूचना देतात. मग प्रत्येकाने तळ मजल्यावरच्या काऊंटरवरून आपापलं जेवण आणायचं. तीन दिवसात मी एक निरीक्षण केलं की, सगळ्यांनी (चार मजली इमारतीतल्या खोल्यांमध्ये राहणारे कमीतकमी दोन - अडीचशे लोकांनी) आपापली जेवनं घेऊनही त्या काउंटरवर कमीत कमी चाळीस - पन्नास ट्रे तसेच पडून राहतात. जेवण झाल्यावर उशिरा जरा चक्कर मारायला खाली गेलं की ते ट्रे तसेच पडून असलेले दिसतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता आणायला गेल्यावर दिसतात. अशीच दुपारच्या जेवणाची उरलेली ट्रेज रात्री जेवण आणायला जाते, तेव्हा बाजूला ठेवलेली दिसतात. अर्थातच कुणालाही तेच शिळं/खराब झालेलं किंवा दुपारचंच रात्री रिपीट दिलं जात नाही, सगळ्यांना फ्रेशच दिलं जातं. पण दररोज लंच आणि डिनरची अशी उरलेली किमान शंभर तरी ट्रे वाया जातात. शिवाय प्रत्येकजण त्यांच्या ताटातलं सगळं अन्न संपवत नाहीत. काहींना ताप, कडवटपणा यामुळे अन्न जात नाही, तर बऱ्याच जणांना दिलेलं अन्न भुकेपेक्षा जास्त असल्याने सगळं संपलं जात नाही आणि काही जणांना अन्नाचं मोल कळत नाही, हे मी माझ्या रूममेटच्या अनुभवावरून बोलतेय कारण ती भाजी आवडली नाही की सरळ ताट कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवून तिच्या मुलीकडून घरचं मागवून घेते. तरी इथलं जेवण खरोखरच बऱ्यापैकी चांगलं आहे. वरण उगाच पाण्यासारखं पातळ नसतं. भाज्याही चांगल्या आणि पोळ्याही व्यवस्थित भाजलेल्या आणि मऊ फ्रेश असतात. खरं तर अशा परिस्थितीत हे असं अन्न उपलब्ध करून देणाऱ्या सगळ्यांचे आभारच मानले पाहिजेत. तर लोक जे ट्रेज घेतात, त्यातलंही जवळपास साठ टक्के जेवण वायाच जाताना मी पाहतेय.
ही अन्नाची नासाडी टाळण्यासाठी काय करता येईल? काही फिझिबल सजेशन्स असली तर मी ती इथल्या प्रशासनाला सुचवून पाहीन. किमान पाकीटबंद असलेलं अन्न तरी वाचवता येईलच. शहरात किती तरी गरीब गरजू लोकांची वाईट परिस्थिती आहे, अनेकांना खायलाही नसेल. त्यांच्यासाठी याचा काही उपयोग कसा करता येईल? शिवाय सरकारी तिजोरीत आधीच खणखनाट असताना, सरकारचा या अन्नावर होणारा खर्च - जो की आपल्या सगळ्याच नागरिकांचा कररुपी पैसा आहे, तो एवढ्या मोठ्या प्रमानात - योग्य व्यवस्थापनाअभावी वाया जाताना पाहून खरंच फार वाईट वाटतंय.
पैसे घ्यावे
प्रत्येकाकडून जेवणाचे दहा रुपये तरी घ्यावे. नाम मात्र तरी. म्हणजे ताटातलं अन्न सोडुन देण्याचं प्रमाण कमी होईल.
हे उघड आहे की जितके लोक आहेत त्यापेक्षा जास्त थाळ्या दिल्या जातात. पण हे त्यांनाच समजायला हवे की जर शंभर लोक असतील तर एकशे दहा पेक्षा जास्त थाळ्या द्यायला नको. पण सरकारी कारभारावर आपण कसा अंकुश ठेवणार ?
Nausea
अन्नावरची वासनाच उडून जाणे हे मुख्य कारण असावं. नाहीतर फारशी ताटं शिल्लक राहिली नसती. ज्यांना शक्य आहे त्यांना नाश्ता बंद करायचा पर्याय द्यायला हवा. नाश्ता ऐच्छिक ठेवावा. जर भूक लागलीच तर दुपारी एखादा एक्सट्रा डबा खायला हरकत नाही. हे अर्थात तरुण लोकांसाठी.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
विलागिकारण विषयी नियम लवचिक हवेत
ज्यांचं घर लहान आहे वेगळी जागा बाधित व्यक्ती साठी उपलब्ध नाही त्यांना च सरकारी विलगिकरान कक्षात ठेवावे.
ज्यांचे घर मोठे आहे जागा उपलब्ध आहे त्यांच्या वर जबरदस्ती करू नये त्यांना घरीच राहू ध्या
अन्नं वाया जायला नाही पाहिजे.
अन्नं वाया जायला नाही पाहिजे.
उरलेले कुणा गरजुंना देता आले तर चांगलेच.
कदाचित रोज नविन पेशंटस भरती होत असतील, म्हणून ते जास्तीचे घेऊन ठेवित असतील. ऐनवेळी कुठे शोधाशोध करणार.?
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
प्राथमिक अंदाज
सगळं विचित्र चालू आहे.
माझी मुलगी नुकतीच डॉक्टर होऊन याच ठिकाणी काम करत आहे. प्राथमिक अंदाजा नुसार पेशंट घरून डबा मागवतात हे असावे. जितके रूग्ण तितके जेवण तयार ठेवत असणार. सरकारी लोकांना आपलं डोकं वापरायची मुभा नसते. बाकी शिकाऊ डॉक्टर म्हणून आमच्या नव्या डॉक्टरला भरपूर अनुभव मिळत आहे!तेवढं मास्क अन पीपीई किट चांगले (किंवा बरे) दिले तर उपकार होतील असं वाटतं.