अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर
पंचावन्न किंवा साठ वर्षांपूर्वीची एक स्पष्ट आठवण मला अजूनही आहे. मी त्या वेळेस एक शाळकरी मुलगा होतो. एका रविवारच्या दुपारी माझे एक मामा टापटिपीचे कपडे करून कोठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत मला दिसले होते. हे माझे मामा चाकरमानी असल्याने रविवार म्हणजे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस असे बहुसंख्य चाकरमान्यांप्रमाणे मानत आणि रविवारची दुपार सर्वसाधारणपणे लोळण्यात आणि वृत्तपत्र वाचनात घालवत असत. साहजिकच मला आश्चर्य वाटले व मी मामाकडे तो आज रविवार दुपारचा कसा काय आणि बाहेर कोठे चालला आहे? अशी पृच्छा केली. त्याने मला आपण एका मीटिंगला चाललो आहोत एवढेच सांगितले. मला फारसे काही कळले नाही व मी गप्प राहिलो. त्यावेळेस मीटिंग हा शब्द आजच्या इतका बोकाळलेला नव्हता. अलीकडे ऑफिसात दोन माणसे एकमेकाशी काय? कसे काय? एवढे जरी बोलली तरी ती मीटिंग करत असतात. त्या वेळेस राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा, कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाच्या किंवा एखाद्या संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीच्या फक्त मीटिंग होत असत व त्यात होणार्या खडाजंगी साठी प्रसिद्ध असत. असो!
रात्री बर्याच उशिराने मामासाहेब घरी परत आले. आल्यावर त्यांचा चेहरा एकदम खुष दिसत होता व ते गेले होते ती मीटिंग खूप एक्सायटिंग आणि थ्रीलिंग झाली होती हे मला त्यांच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होते. मग मी मामाला स्पष्टपणे तो कोठे गेला होता? म्हणून विचारून टाकले. त्याने मला मोठ्या उत्साहाने सांगितले की तो माझ्या घरापासून सुमारे 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या रेसकोर्सवर त्याची सायकल ताबडत, तेथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, यांचे भाषण ऐकण्यासाठी रेसकोर्सवर भरलेल्या एका विराट किंवा विशाल सभेला गेला होता. लहान वय असल्याने त्या वेळेस एक भाषण ऐकण्यासाठी मामासाहेब 10 किमी लांब असलेल्या रेसकोर्सपर्यंत सायकल दामटत का गेले होते? आणि त्या नंतर ते एवढ्या उत्साही मूडमध्ये का दिसत होते? हे काही मला कळू शकले नव्हते.
1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली होती. या आणीबाणीमुळे पंतप्रधानांना फर्मान सोडून राज्यकारभार चालू ठेवण्यास अनुमती दिली गेली होती. निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या होत्या आणि भारतीय घटनेने नागरिकांना दिलेली सर्व प्रकारची स्वातंत्र्ये निलंबित केली गेली होती. होती. आणीबाणीच्या बहुतांशी कालात श्रीमती गांधींचे सर्व राजकीय विरोधक कारावासात ठेवले गेले होते व वृत्तपत्रांवर कडक सेन्सॉरशिप निर्बंध लादले गेले होते. यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1977 मध्ये जेंव्हा घटनेमधील तरतुदीनुसार निवडणूका पुढे ढकलणे शक्य नव्हते तेंव्हा श्रीमती गांधींनी निवडणूका घेत असल्याची घोषणा केली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अत्यंत खळबळजनक संक्रमणाचा असा तो काल होता. निवडणूकीच्या आधी सरकारने विरोधकांना तुरुंगातून सोडून दिले होते व सर्व पक्षांना व विचारवंतांना लोकांशी संभाषण साधण्याची तसेच सभा, रॅली, भाषणे आयोजित करण्याची अनुमती दिली होती. पुण्यामधे स.प.कॉलेजच्या पटांगणावर आयोजित केलेल्या एका रॅलीला गेल्याचे मला स्मरते. या रॅलीला त्यावेळचे अनेक राजकीय नेते व विचारवंत यांनी संबोधिले होते. या वक्त्यांमध्ये एक साधेसुधे मराठी विनोदी लेखकही होते. हे विनोदी लेखक म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात “पुल” किंवा पु.ल.देशपांडे होते हे वाचकांनी जाणले असेलच. “पुल” राजकीय सभांमध्ये त्या कालापर्यंत कधीही आधी बोललेले नव्हते आणि राजकारणापासून ते चार हात नेहमी दूर रहात. त्या खळबळजनक कालात मात्र त्यांनी अनेक राजकीय सभांत भाग घेतला होता. ते त्या दिवशीच्या सभेत काय बोलले हे जरी आता मला स्मरत नसले तरी हे चांगलेच स्मरते की सुमारे 40 मिनिटाचे आपले भाषण संपवून जेंव्हा ते खाली बसले होते तेंव्हा माझे डोळे पाण्याने भरलेले होते. त्यावेळेपर्यंत हृदयाला स्पर्श करून जाईल असे भाषण मी बहुधा ऐकलेलेच नव्हते असे मला वाटते आहे. त्या दिवशी मला माझा मामा 8 ते 10 किमी सायकल ताबडत रेसकोर्सला नेहरूंचे भाषण ऐकण्यासाठी का गेला होता व परत आल्यावर तो एवढा खुष आणि उत्साहाच्या मूडमधे का होता याचा उलगडा झाला होता असे म्हणता येईल.
वक्तृत्व किंवा लोकांसमोर भाषण देण्याचे कौशल्य ही एक कला आहे असे मानले जाते. विकिपिडिया वक्तृत्वाची व्याख्या या शब्दात करतो.
” वक्तृत्वाची व्याख्या, प्रवचनाच्या कौशल्याची कला या शब्दात करता येईल. या कलेमुळे लेखक किंवा वक्ते यांना काही विशिष्ट परिस्थितींत आपल्या श्रोत्यांना नवीन माहिती पुरवण्याची, आपल्या दृष्टीकोनाकडे त्यांना वळवण्याची आणि काही कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आपली शक्ती वर्धित करणे शक्य होते.”
Wikipedia defines it as the art of discourse, an art that aims to improve the capability of writers or speakers to inform, persuade, or motivate particular audiences in specific situations.
भारत स्वतंत्र होण्याआधीच्या काळात भारतात अमोघ वक्तृत्वशैली असलेले अनेक पुढारी होऊन गेले. या वक्त्यांमध्ये असलेल्या वक्तृत्वकलेमुळे ते आपल्या पहिल्या दोन किंवा चार शब्दांत श्रोत्यांची मने जिंकून घेत व नंतर आपल्याला पाहिजे त्या प्रकारे श्रोत्यांना वळवून त्यांच्या मनावर राज्य करत. पंडित नेहरूंच्या व्यतिरिक्त महात्मा गांधी, आचार्य कृपलानी यांची नावे सहज रितीने डोळ्यासमोर येतात. नंतरच्या काळात होऊन गेलेले इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी बाजपयी यांसारखे नेते सुद्धा वक्तृत्व कौशल्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे कमी नव्हते.
अलीकडच्या कालात झालेला टीव्ही वाहिन्यांचा आणि प्रामुख्याने वृत्त वाहिन्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्यावर अष्टौप्रहर दिसणार्या ब्रेकिंग न्यूज यांच्या गदारोळात वक्तृत्वकौशल्य ही चीज आता नष्टच झाली आहे की काय? असा संशय येऊ लागल्यास त्यात काही नवल वाटावयास नको. दिवसाचे 24 तास या वाहिन्या आपल्यावर बातम्या, इंटरव्ह्यू आणि पॅनेल चर्चा यांचा एवढा भडिमार करत असतात असतात की मला तर या सर्व प्रकाराबाबत एक प्रकारची नावड निर्माण झाली आहे. आणि एकंदरीतच दुसर्याचे म्हणणे शांतपणे व कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता ऐकून घेण्याच्या कलेचा माझ्याकडे अभाव असल्याने, वृत्त वाहिन्यांवरील कार्यक्रम फार वेळ ऐकण्याच्या माझ्या सहनशक्तीवर मर्यादा येऊ लागल्या आहेत. परंतु साधारणपणे 3 महिन्यापूर्वी एकदा मी असाच टीव्ही वाहिन्यांचे ब्राऊझिंग करत असता अचानकपणे एक व्यक्ती एका महाविशाल जनसमुदायासमोर भाषण करत असल्याची चित्रफीत माझ्या नजरेसमोर आली. मी तेथे थबकलो आणि टीव्हीच्या पडद्यावर जे काय चालू होते त्याकडे लक्ष देऊन बघू व ऐकू लागलो. मला हे लक्षात ही आले नाही की मी हातातील टीव्ही रिमोट केंव्हाच बाजूला ठेवलेला आहे आणि माझे सर्व लक्ष त्या भाषणावरच केंद्रित झाले आहे. त्या दिवशीचे भाषण काही आता माझ्या लक्षात राहिलेले नाही. मात्र एवढे चांगलेच स्मरते आहे की त्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करून जात होता व माझ्या डोळ्यात अश्रू उभे करत होता. टीव्ही वर त्या दिवशी ज्या व्यक्तीच्या भाषणाची चित्रफीत दाखवली जात होती त्या व्यक्तीचे नाव होते नरेंद्रभाई मोदी. अवघ्या 3 महिन्याच्या कालात या आधी गुजराथ राज्याचा मुख्य मंत्री असलेल्या या व्यक्तीने, एप्रिल-मे 1914 मध्ये झालेल्या केंद्र शासनाच्या निवडणूकीत एखाद्या झंझावाताप्रमाणे शिरकाव करून दैदीप्यमान यश तर मिळवलेच आहे पण विरोधी पक्षांचे न भूतो न भविष्यति असे पानिपत केले आहे. या आपल्या यशाबरोबरच त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्याचा बहुमान सुद्धा प्राप्त करून घेतला आहे. त्या दिवसानंतर नरेंद्रभाईंची बहुतेक सर्व भाषणे निदान टीव्हीवरून तरी ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो होतो.
मागच्या वर्षीच्या (1913) फेब्रुवारी महिन्यात गुजराथ राज्यातील कच्छ आणि काठेवाड भागात प्रवास करण्याचा योग मला आला होता. नरेंद्रभाई याच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर गेली 13 वर्षे विराजमान होते. मी एक अगदी सर्व साधारण व्यक्ती असलो आणि आपण कोणत्याही प्रकारचे तज्ञ किंवा माहितगार नाही हे पक्के समजत असलो तरी सुद्धा जे काही मी तेथे बघितले होते त्याने मी कमालीचा प्रभावित झालो होतो याबाबत माझा मनात अजिबात शंका नाही. सुंदर रस्ते, 24 तास अखंडित विद्युत पुरवठा, समुद्रकिनार्यालगत उभारल्या गेलेल्या हजारो पवनचक्या, नवे औद्योगिक प्रकल्प आणि छोट्या रणासारख्या दलदलीच्या प्रदेशालगत असलेल्या भागात नर्मदा कालव्याच्या पाण्यावर फुलणारी जिरे, धने या सारख्या नगदी पिकांची शेते, हे सगळे माझ्या कल्पनेच्याही बाहेरचे होते हे मात्र खरे!
वक्तृत्वशैलीकडे परत वळूया. कोणताही मानदंड घेतला तरी हे मान्य करावेच लागते की नरेंद्रभाई मोदी हे एक अत्यंत कुशल असे वक्तृत्वपटू आहेत. ते बहुतेक वेळा ज्यामध्ये भाषण करतात त्या हिंदी भाषेवर त्यांचे कमालीच्या बाहेर प्रभुत्व आहे. त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांची त्यांनी केलेली निवड आणि फेक, अतिशय चपखल आणि श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारी असते. आवाजात चढ उतार कशी आणि कोणत्या जागांवर करायची? शब्दांमधील कोणत्या ठिकाणी जोर द्यायचा? कोणते शब्द आवाज वाढवून बोलायचे? या सर्वच बाबतीत त्यांच्या वक्तृत्वाला येणारा बहर वाखाणण्यासारखा असतो. ते लोकांना व्याख्यान किंवा आख्यान न देता त्यांच्याबरोबर संभाषण करत करत आपल्या मनातील विचार श्रोत्यांपर्यंत सहजपणे पोचवू शकतात.
परंतु नरेंद्रभाई आपल्या वक्तृत्वात वापरात आणत असलेल्या या सर्व गोष्टींमुळे फक्त त्यांची भाषणे असामान्य होतात असे मात्र म्हणता येणार नाही. त्यांच्या भाषणांमध्ये येणारे मुद्दे आणि विचार हे सर्वात जास्त महत्त्व देण्याजोगे असतात असे मला वाटते. मी त्यांचे असे एकही व्याख्यान अजून ऐकलेले नाही ज्यात श्रोत्यांना काही ना काही महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला नाही. त्यांच्या मनात नवीन काही तरी करून दाखवण्याची किंवा घडवून आणण्याची सतत असलेली उर्मी आणि नवनवीन कल्पना या त्यांच्या वक्तृत्वातून श्रोत्यांना जाणवत राहतात. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणशी शहरातून निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी जे भाषण केले होते त्या भाषणाचे उदाहरण मी वानगीदाखल येथे देतो. या भाषणात गंगा नदीबद्दल बोलताना ही नदी किती गलिच्छ आणि प्रदूषित झाली आहे अणि ती तातडीने स्वच्छ करणे गरजेचे आहे याचा त्यांनी उल्लेख केला होता. या उल्लेखात नवे असे काहीच नव्हते आणि राजीव गांधींपासून अनेक नेते याबाबत गेली कित्येक दशके सांगत आहेत. परंतु आपल्या या भाषणात मोदी खासियत म्हणता येईल अशी एक गोष्ट नरेंद्रभाईंनी सांगितली. लोकांनी हे कार्य करण्यासाठी पुढे यावे म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी आणि यात त्यांचाच कसा आर्थिक फायदा होणार आहे याचे गाजर त्यांना दाखवण्यासाठी ते म्हणाले की जगभरच्या अनेक प्रवाशांना वाराणशीला भेट देण्याची मनापासून इच्छा असते. परंतू वाराणशी इतके घाण आणि गलिच्छ आहे की हे प्रवाशी मनात असूनही ही भेट टाळतात. जर वाराणशीच्या लोकांनी मनावर घेतले आणि गंगा व आजूबाजूचा सर्व परिसर प्रदुषण मुक्त आणि स्वच्छ केला तर त्यातून वाराणशीकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, हजारो स्थानिकांना नवीन रोजगार मिळेल आणि या सर्वातून वाराणशी कडे येणारा पैशांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढून येथे मोठी आर्थिक सुबत्ता निर्माण होईल.
पण हे सगळे केंव्हा होईल तर जेंव्हा वाराणशी शहर आणि गंगा हे प्रदुषण मुक्त आणि स्वच्छ होतील.
नरेंद्रभाई सार्वजनिक वक्तृत्वकौशल्याच्या कलेला पूर्वीचाच बहर परत एकदा आणण्यात यशस्वी झाले आहेत ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे असे मला वाटते. नरेंद्रभाईंच्या आधी पंतप्रधान पद भूषवणार्या व्यक्तीने त्यांच्या कार्यकालात लोकांशी संभाषण साधण्याचा कधी प्रयत्नच न केल्याने, त्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वक्तृत्वकला जोपासण्याची आणि त्यात पारंगत होण्याची केवढी आवश्यकता प्रत्यक्षात किती आहे हे नरेंद्रभाईंना मिळालेल्या यशामुळे एका प्रकारे सिद्ध होते आहे असे म्हणता येते आहे. नरेंद्रभाईंच्या यशामध्ये त्यांच्या अमोघ वक्तृत्वशैलीचा मोठा हात आहे असे मला तरी वाटते.
26 मे 2014
प्रतिक्रिया
“पुल” राजकीय सभांमध्ये त्या
जनता सरकार आल्यावरच्या विजय सभेत मात्र त्यांनी उपस्थिती लावली नव्हती - सुनिताबाईंनी लाऊ दिली नव्हती - हे सुद्धा मला अतिशय भावते. आपले राजकीय भुमिका घ्यायचे कारण काय होते व ते हटल्यावर बाजुला होणे याचे भान दाखवणार्या मोजक्या लोकांपैकी ते एक ठरले होते.
बाकी नरेंद्र मोदी यांचे वक्तृत्त्व चांगले आहे याबद्दल सहमत आहे.
अर्थात, त्यांच्या विचारांनी मी तुमच्या इतका प्रभावित नाही. त्यांच्याहून कित्येक इतर नेत्यांचे वकृत्त्व आणि बरेचसे विचार मला आवडतात. (जसे श्री वाजपेयी, श्रीमती स्वराज यांचे दोन्ही, श्री नरसिंह राव यांचे निव्वळ विचार, श्री राज ठाकरे यांचे निव्वळ वक्तृत्त्व)
आणि मुद्द्यांबद्दल बोलायचे तर ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास कमी आहे असे म्हणावयास वाव आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
(अवांतर)
सुनीताबाईंनी बरे ऐकून घेतले?
अतिअवांतर
मग काय दिलं होतं, कद्दू?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(अतिअतिअवांतर)
'लाऊ' म्हणजे नेमके कोण?
भो पळा
I am afraid that's a pretty lau-key affair.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हम्म्म्म्म्...
'लौकी' ऐकला होता. (बोले तो दुधीच ना? (चूभूद्याघ्या.)) 'लौ'बद्दल प्रथमच ऐकतोय. असो.
येस्सार तेच आहे. 'की' गुप्त
येस्सार तेच आहे. 'की' गुप्त झाल्यामुळे प्राब्ळम जाहला इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्......
चुकून "सुनीताबाईंना लाऊ दिली नव्हती" असे वाचल्याने प्रतिसाद दिला.
मूळ मसुद्याबरहुकूम असल्यास आश्चर्य नाही.
पुलंच ते भाषण छापिल स्वरूपात
पुलंच ते भाषण छापिल स्वरूपात आहे. त्यात 'योध्याची वस्त्रे उतरवून पुन्हा विदूषकाची वस्त्रे धारण करत आहे' असं काहिसं म्हटलं आहे.
पुलं भारीच बोलायचे. 'बालगंधर्व'च्या उद्घाटनाला केलेलं भाषण पण भारी आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
...
Public declaration of a private intention?
वक्तृत्वशैली आणि विचार
श्री ऋषिकेश यांचा प्रतिसाद पाहता त्यांना श्री.नरेंद्रभाई मोदी यांचे विचार तितकेसे पसंत नाहीत असे दिसते. परंतु प्रस्तुत लेखाचा विषय नरेंद्रभाई यांचे विचार हा नसून त्यांची वक्तृत्वशैली हा आहे. त्यामुळे मला नरेंद्रभाईंचे सर्व विचार श्री. ऋषिकेश यांच्यापेक्षा जास्त पटत असले पाहिजेत हे त्यांचे म्हणणे मला योग्य वाटत नाही.
मान्य. त्यांच्या भाषणांमध्ये
मान्य.
हे वाक्य मी काहिशा पूर्वग्रहयुक्त नजरेने वाचल्याने माझा तसा समज झाला होता. तुम्ही हे मुद्दे, विचार नेहमीच योग्य असतात असे म्हटलेले नाही हे पुन्हा वाचल्यानंतर लक्षात आले. आभार.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोचक लेख. नमोंचे भाषण कधी
रोचक लेख. नमोंचे भाषण कधी ऐकले/पाहिले नाही. पण आपले ऐसीहृदयसम्राट अजो एका प्रतिसादात म्हणाले होते की मोदींची मुलाखत पाहिल्यावर ते क्लम्झी वाटले. बाळासाहेब आणि राज ठाकरेंचीपण वक्तृत्वशैली चांगली असावी पण त्यांचे अपिल फक्त महाराष्ट्रापुरतेच?