समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्या जबाबदार्या नि मर्यादा
मागील भागः समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - २ : आताच हे मूल्यमापन का?
आपल्या विचारसरणीला सुसंगत असेल असा राजकीय पर्याय निवडण्यात गैर काहीच नाही. परंतु हा निर्णय घेताना, नव्या क्षेत्रात पाऊल टाकताना त्या क्षेत्राचे, त्या खेळाचे नैतिक, अनैतिक, ननैतिक नियम, त्यांची व्याप्ती, त्या क्षेत्रात उतरताना आवश्यक असलेली किमान माहिती, आपल्या कुवतीचे रास्त मूल्यमापन, त्याच्याआधारे नव्या क्षेत्रात जास्तीतजास्त काय साध्य करता येईल याचे भान, आपल्या विरोधकांची बलस्थाने नि कमकुवत बाजूंचा अभ्यास नि त्याचा यथाशक्ती सामना करण्यास आवश्यक असलेली धोरणे नि स्ट्रॅटेजी किंवा आराखडा हे सारे सारे आवश्यक असते याचे भान असायला हवे. 'जनताच आमचा निवाडा करेल' ही घोषणा आकर्षक वगैरे असली तरी राजकीय पटलावर त्याचा काडीचा उपयोग नसतो याचेही भान असणे गरजेचे. अशा घोषणा करत आपण जनतेच्या पाठिंब्यावर वगैरे निवडून आलो असा दावा करणारे प्रत्यक्ष विजयासाठी वेगळीच हत्यारे, आयुधे, धोरणे वापरत असतात हे उघड गुपित आहे. तेव्हा हा नवा मार्ग निवडताना आपण तिथे आलो म्हणून तिथले सारे नियम, मानदंड ताबडतोब बदलून आपल्या सोयीचे होतील अशी भ्रामक अपेक्षा न बाळगता त्यातील खाचाखोचा, त्या खेळाचे नियम, नियमबाह्य शक्यता नि त्यांपासून संरक्षणाचे मार्ग या सार्याचा अभ्यास नाही तरी किमान माहिती करून घेणे आवश्यक नि अपेक्षित असतेच.
याशिवाय एकदा का आपली संघटना वा आपले वैयक्तिक सामाजिक स्थान आपला गट अशा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला की त्याच्या गुणावगुणाची, पापपुण्याची जबाबदारी आपल्यावर येते, ती टाळता येत नाही. त्यामुळे असा पर्याय निवडताना ज्याची निवड आपण करतो आहोत त्याची एक दखलपात्र राजकीय फोर्स म्हणून उभे राहण्याची कुवत वगैरे सारी अनुषंगे तपासून ही निवड होणे अपेक्षित होते. अन्यथा मग निर्णय चुकला तरी त्याचे समर्थन करण्याचे, त्याच्याबरोबर फरफटत जाण्याचे दुर्भाग्य भाळी येते.
राजकारणातील काही अपरिहार्यता, काही व्यावहारिक धोरणे कदाचित सैद्धांतिक पातळीवर अस्वीकारार्ह वाटली तरी काही वेळा तात्पुरती तडजोड म्हणून स्वीकारावी लागतात याचे भान असायला हवे. तत्त्वाला प्रसंगी मुरड घालून व्यवहार्य पर्याय स्वीकारणे अनेकदा अपरिहार्य ठरते. अर्थात हे आजच्या राजकारण्यांना सांगायची गरज उरलेली नाही. हे तत्त्व तर बहुतेक लोकांनी पुरेपूर आत्मसात केले आहेच. परंतु याचबरोबर हे जोखड केव्हा उतरून टाकायचे, त्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार व्हावी यासाठी काय पावले टाकावी लागतील याचा विचार, आराखडाही तेव्हाच तयार करायला हवा. हिंदुत्ववादी अजेंडा राबवणार्या भाजपने प्रसंगी जनता दल, समता पक्ष, जनता दल (संयुक्त), मायावतींचा बसपा, बिजू जनता दल वगैरे सैद्धांतिक दृष्ट्या दुसर्या टोकावर असणार्यांना जवळ केले, परंतु हे करत असताना आपल्या मूळ अजेंड्याला, मूळ गाभ्याला धक्का लागू न देण्याचे भान राखले, आपल्या पक्षाचा विस्तार अशा युत्यांमुळे खुंटणार नाही याची सतत काळजी घेतली. कदाचित हे सारे संघाचा अंकुश असल्यानेही घडले असेल. कारण काहीही असो, अशा सहकार्यातून भाजप वाढला नि अनेक सहकारी पक्ष क्षीण होत गेले ही वस्तुस्थिती आहे. समाजवादी नेमक्या उलट बाजूला असल्याने आणि एकदा व्यवहार्य भूमिकेच्या घसरगुंडीवर बसल्यानंतर लावायला ब्रेकच न उरल्याने केवळ सत्तालोलुप तडजोडी करत सत्तांध लोकांचे आश्रित होऊन राहिल्याचे पाहणे आपल्या नशीबी आले. गोव्यात 'मगोप' नामशेष झाला, मध्यभारतातून जनता दल अस्तंगत होऊन तिथे शत-प्रतिशत भाजप पाय रोवून उभा राहिला. बिजू जनता दलाने नि ममतादीदींच्या तृणमूलने वेळीच साथ सोडून 'एकला चालो रे' धोरण स्वीकारल्याने ते बचावले. जनता दल (सं.) मात्र याबाबत दुर्दैवी ठरला.
(क्रमशः)
---
हा भाग लहान असल्याचा फायदा घेऊन जरा अवांतर: लेखमाला चालू झाल्यापासून अनेक प्रश्न येत आहेत, ते त्या त्या भागाशी सुसंगत नसल्याने त्यावर चर्चा करणे टाळले आहे. त्यामुळे प्रश्नकर्त्यांच्या वा चर्चकांच्या फायद्यासाठी पुढील भागांची शीर्षके तेवढी देऊन ठेवतो, जेणेकरून पुढील वाटचालीत कोणते मुद्दे नि कुठल्या क्रमाने येतील याचा आधीच अंदाज यावा.
भाग ४. 'आप' च्या मर्यादा:
भाग ५. आप' हा समाजवाद्यांचा राजकीय चेहरा का असू शकत नाही:
भाग ६. समाजवाद्यांची बलस्थाने
भाग ७. समाजवाद्यांच्या राजकीय पीछेहाटीची संभाव्य कारणे आणि परिणाम
भाग ८. नवे संदर्भ, नवी आव्हाने
भाग ९. भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती
---
प्रतिक्रिया
मस्त
'जनताच आमचा निवाडा करेल' ही घोषणा आकर्षक वगैरे असली तरी राजकीय पटलावर त्याचा काडीचा उपयोग नसतो याचेही भान असणे गरजेचे. अशा घोषणा करत आपण जनतेच्या पाठिंब्यावर वगैरे निवडून आलो असा दावा करणारे प्रत्यक्ष विजयासाठी वेगळीच हत्यारे, आयुधे, धोरणे वापरत असतात हे उघड गुपित आहे.
अशा ओळींमुळे पूर्ण मालिकेतच विचार व्यावहारिक पातळीवर आहे;भाबडा आशावाद त्यात फार नाही; हे जाणवले.
लहान असला तरी अंक आवडला.
पुभाप्र.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ह्या अपरिहार्यतेच्या अनुषंगाने पुन्हा एक प्रश्न
ह्या अपरिहार्यतेच्या अनुषंगाने पुन्हा एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे कॉंग्रेस आणि बाकीचे इतके उल्लू बनविण्याचे राजकारण करतात, येता जाता गांधी, फुले अंद आंबेडकर ह्यांचे नाव घेवून जातीचे राजकारण खेळणार आणि हे कोणालाही खटकत कसे नाही. माझ्या अनुभानुसार नुसार संघ आणि भाजपा टोकाचा हिंदुत्वाद हा मुद्दा सोडला तर तसे समाजवादीच होते. आणि सुरवातीला ते तसेच बरेच स्वच्छ राजकारण करायचे पण लोकांना ते पसंत पडले नाही. मग भाजपने जातीचे समीकरण बनविले आणि आपली अस्पृश्यता संपवली. राष्ट्रवादी आणि मूळची कोंग्रेस तर सरळ सरळ जातीचे राजकारण करून जिंकत आलेत. बसप आणि सप पण तेच. तिकडे लालू यादव जातीचे राजकारण करत आलेत. दुर्दैवाने ह्यालाच व्यावहारिकता का म्हणवी? म्हणजे आपल्या जातीच्या बाहेर किंवा समाजाबाहेर किंवा घराच्या बाहेरच्या व्यक्तींवर विश्वास न ठेवणे किंवा माहिती असून संधी न देणे हा प्रकार आपल्या भारतात आहे. त्यामानाने समाजवादी म्हणजे एस एम, लिमये वगैरे प्रभूती तसे राजकारण करताना कधी दिसले नाहीत आणि म्हणून निवडणुका जिंकू शकले नाहीत. थोडक्यात अपरिहार्यतेच्या अनुषंगाने सगळे माफ असे काहीसे चित्र उभे राहिले आहे.
माझ्या अनुभानुसार नुसार संघ
माझ्या अनुभानुसार नुसार संघ आणि भाजपा टोकाचा हिंदुत्वाद हा मुद्दा सोडला तर तसे समाजवादीच होते.
सलीलदा, तुम्हास एक कडक सॅल्युट मारतो आहे.
भाजपा व संघ दोघेही प्रॉपर समाजवादीच आहेत. त्यांना फक्त तो शब्द मान्य नाहिये. आशय अगदी समाजवादीच आहे. उदा. एकात्मिक मानवतावाद या विषयावर भाजपाचे व संघाचे थॉट लिडर कै. दीनदयाळ उपाध्याय यांची ४ व्याख्याने मुंबईत झालेली होती. त्यांची लिखित प्रत भाजपा च्या संकेतस्थळावर आहे. इथे. एकात्मिक मानवतावाद (जो उपाध्याय यांना अभिप्रेत होता तो) हा समाजवादाची "ओल्ड वाईन इन न्यु बॉटल" आहे. किंबहुना थेट समाजवादच आहे. उपाध्याय हे नीतीवान व चरित्रवान व्यक्ती होते हे मी त्यांच्याबद्दल ऐकलेले आहे. पण एक विचारवंत म्हणून अगदीच यथातथा होते.
पण भाजपाने हिंदुत्त्वाद सोडणे
पण भाजपाने हिंदुत्त्वाद सोडणे म्हणजे 'जिराफाची उंची सोडली तर तो तसा हरीणच आहे' किंवा टू दि पॉईंट म्हणजे 'वाघाचं ते अक्राळ रूप सोडलं तर तो म्हणजे मांजरच आहे' असे म्हणण्यासारखे आहे.
तुमचा मुद्दा ठीक आहे. पण
तुमचा मुद्दा ठीक आहे.
पण आजतागायत भाजपाने दोन आयडिऑलॉजीज "आपल्या" म्हणून वापरलेल्या आहेत. १) हिंदुत्व, २) एकात्मिक मानवतावाद.
मी फक्त एकात्मिक मानवतावादाबद्दल बोलत आहे. की जो समाजवादापेक्षा वेगळा नैय्ये - असा माझा मुद्दा आहे.
अग्रिड
सहमत.
भाजपा आणि विचारवंत
भाजपा आणि विचारवंत एकत्र जातात असे वाटत नाही हो. म्हणजे बरेच शिकलेले भाजपा आणि संघात जातात पण ऐनवेळी ह्यांचे डोके कुठे माती खाते काही कळत नाही. संघाचे आणि भाजपाचे जुने लोक कट्टर समाजवादीच होते. बरेच चांगले स्वच्छ चारित्र्याचे होते पण त्याने निवडणूक जिंकता आली नाही. गम्मत म्हणजे मार्केट फोर्सेस इथेही लागू होतात. बऱ्याच कंपन्या कसेही करून प्रॉफीट कमावतात तद्वत सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वतःचे विचार वगैरे सोडून तडजोडी करून, वेळप्रसंगी जातीपातीचा भरपूर उपयोग करून निवडून येणे हेच एकमेव उद्दिष्ट सध्या केले आहे. आपल्या विचारवंतांना हे का मान्य आहे हे कळत नाही.
वेळप्रसंगी जातीपातीचा भरपूर
वेळप्रसंगी जातीपातीचा भरपूर उपयोग करून निवडून येणे हेच एकमेव उद्दिष्ट सध्या केले आहे. आपल्या विचारवंतांना हे का मान्य आहे हे कळत नाही.
जर मार्केट फोर्सेस इथे ही लागू पडत असतील तर हे जे घडते ते मार्केट नुसारच घडते नैका ?
बाकी - पब्लिक चॉइस थियरी वाचल्यास अनेक बाबींवर प्रकाश पडू शकेल. द कॅल्क्युलस ऑफ कन्सेंट - हे पुस्तकाचे नाव.
पब्लिक चॉइस थियरी ची व्याख्या च मुळी "Politics without romance" अशी आहे.
जर मार्केट फोर्सेस इथे ही
स्लिपरी स्लोप, गब्बर, स्लिपरी स्लोप. जे घडतं ते मार्केट फोर्सेसनेच हे राजकीय सामाजिक गोष्टींना लावायची तयारी झाली तर सरकार ही संस्थाच मार्केट फोर्सेसने तयार झाली आहे हे मान्य करावं लागेल...
जे घडतं ते मार्केट फोर्सेसनेच
जे घडतं ते मार्केट फोर्सेसनेच हे राजकीय सामाजिक गोष्टींना लावायची तयारी झाली तर सरकार ही संस्थाच मार्केट फोर्सेसने तयार झाली आहे हे मान्य करावं लागेल...
निवडणूक ही मार्केट फोर्सेस नेच होते. निवडणूकीत एन्ट्री बॅरियर्स नसतात. कोणावरही जबरदस्ती नसते - सहभागी होण्याची अथवा न होण्याची. व बहुपक्षीय लोकशाहीत तर अजिबातच एंट्री बॅरियर्स नसतात.
टॅक्स ही एक महत्वाची (एकमेव नव्हे) बाब अशी आहे की जिथे पार्टिसिपेशन हे मोठ्याप्रमाणावर जबरदस्तीने होते (regardless of the willingness of the participant.).
आणी
आणी मार्केट मध्ये जशी मोठी कंपनी छोट्या वा विरुद्ध कंपनीपेक्षा माझेच प्रोडक्ट चांगले तसेच दुसऱ्याच्या विचारसरणीपेक्षा माझीच चांगली आहे. एकदा वापरून तर पहा वगैरे वगैरे
आणि प्रॉफीट फक्त सीईओ आणि अप्पर मानजेमेंट आपल्याकडे ठेवते तसे राजकारणी घराणी सत्ता आपापसात वाटून घेतात
प्रॉफीट फक्त सीईओ आणि अप्पर
प्रॉफीट फक्त सीईओ आणि अप्पर मानजेमेंट आपल्याकडे ठेवते
अगदी.
व शेअरहोल्डर्स ना शेअर विकत घेण्याची वा न घेण्याची पूर्ण मोकळीक असते. त्यामुळे जनता / शेअरहोल्डर्स जर आरडाओरडा करीत असेल की आम्हाला डिव्हिडंड (लाभांश) मिळत नाही .... तर तो चक्रमपणाच असतो.
त्रोटक
चांगले आहे मात्र चांगलेच त्रोटक आहे. जरा विस्तारात लिहा ना
एक भुमिकेच्या घसरगुंडीवर बसल्यावर ब्रेक न मिळाल्याने हे इतके सामायिक कारण या सार्या पक्षांच्या अधोगतीचे/नष्ट होण्याच्या प्रवासातील एक कारण असेलही पण हे पुरेसे कारण नाही.
या व यासारख्या घडामोडींची बोळवण २-३ वाक्यात करण्यापेक्षा अधिक विश्लेषण (किमान प्रतिसादात) केलंत तर आनंद होईल.
यापैकी अशा अनेक घडामोडींची माहिती अगदी वरवरची आहे. या लेखमालेच्या निमित्ताने बरेच तपशील मिळतील अशी आशा होती/आहे. त्यामुळे तपशीलात लिहायला उचकवायचा प्रयत्न करतोय.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाचत आहे.
वाचत आहे.
मस्त
मस्त, विश्लेषण आवडले.