समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ६: समाजवाद्यांची बलस्थाने
मुळात आज आपल्या पराभवाचे खापर यांच्यावर फोडले जात आहे ती पैसा वा माध्यमे ही समाजवाद्यांची शक्ती होती कधी? असे असेल तर प्रतिस्पर्ध्याने ती वापरली असता आपण हतबुद्ध होऊन जात असू तर मग आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरही त्या शक्तीला पर्यायी शक्ती आपण उभी करू शकलो नाही हे मान्य करण्यासारखे आहे. मग समाजवाद्यांची शक्ती होती कोणती जिच्या आधारे त्यांचे राजकीय अस्तित्व टिकून होते. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांची बलस्थाने होती ती दोन... कदाचित तीन.
पहिले म्हणजे निश्चित तत्त्वांच्या अथवा दृष्टिकोनाच्या आधारे होणारे राजकारण. ही तत्त्वे काटेकोरपणे ग्रथित केलेली असल्याने दृष्टिकोनात बरीच पारदर्शकता होती. इतकेच नव्हे तर या तत्त्वांची चिकित्सा करणारे, त्याबाबत खंडनमंडन करत त्यांना तपासणार्या अभ्यासकांचे गट सातत्याने त्यावर काम करत होते.
दुसरे म्हणजे संघटन किंवा निरलसपणे कार्य करणार्या कार्यकर्त्यांची फौज. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी फौज सातत्याने उभी ठेवून भाजपला ती रसद पुरवू शकत असेल तर त्यांच्याही पूर्वी असे संघटन उभे करणार्यांना आपले हे बलस्थान कमकुवत होत होत नाहीसे का झाले याचा धांडोळा घ्यावासा का वाटत नाही? पैसा नि माध्यमे या दोन शक्तींना टक्कर देण्यासाठी उत्कृष्ट संघटन ही नवी ताकद उभी करता येऊ शकते का याचा विचार करता येणार नाही का? की इथेही हल्ली असे निरपेक्ष कार्यकर्ते मिळतात कितीसे असं म्हणत पुन्हा दोष जनतेच्या माथी मारत आपण मोकळे होणार आहोत? 'आपले दोष' कधी तपासणार आहोत? आपल्या पराभवाची कारणे सतत इतरांच्या अवगुणात शोधणे कधी थांबवणार आपण? आज माध्यमांचा वेगाने प्रसार होत असताना असे आत्मवंचना करणारे समर्थन समोरच्यांना खरंच पटतं आहे का याचा वेध घ्यावासा वाटतो का?
तिसरे एक बलस्थान मी मानतो ते म्हणजे विचारांचा खुलेपणा, आणि मूल्यमापनाची शक्यता असणे. हा एक दुर्मिळ गुण (आणि कदाचित तोच दुर्गुणही, कारण यातूनच वैचारिक मतभेद नि अखेर फाटाफूट हा परिणामही संभवतो) केवळ समाजवादी विचारधारांत दिसतो. धार्मिकतेच्या आधारे संघटना उभी करणार्या उजव्यांना परंपरा, जुने ग्रंथ यांचे प्रामाण्य हवे असते तर सर्वात अर्वाचीन तत्त्वज्ञान असलेल्या साम्यवादी संघटनेत पोथी वेगळी असते इतकेच. शेवटी दोन्ही प्रकारात 'वरून आलेला आदेश' शिरोधार्य मानायचा असतो. आपल्या तत्त्वाची चिकित्सा करण्याचा वा त्याचा अर्थ लावण्याचा हक्क त्या त्या संघटनेतील मूठभरांच्या हाती राहतो. याउलट समाजवादाचे अनेक रंग आपण पाहिले आहेत. कम्युनिस्ट, लोहियावादी, रॉयिस्ट वगैरे मूलतः समाजवादी असलेल्या परंतु तरीही वेगळ्या असलेल्या परंपरा दिसून येतात. केवळ पक्षाचे राजकीय नेतेच नव्हे तर राजकारणाबाहेर असलेले तत्त्वज्ञही विविध प्रकारे आपल्या मतांना तपासून खंडनमंडनाच्या मार्गे वेगवेगळे मुद्दे मांडत राहिले आहेत. त्याला त्यांच्या राजकीय पक्षांचा धोरणात्मक विरोध असलेला दिसून येत नाही. वैयक्तिक पातळीवर वा अस्वीकृतीच्या पातळीवरचा वेगळा, पण ते म्हणणे मांडण्याचा हक्कच हिरावून घेण्याच्या पातळीवर तो नसतो/नव्हता हे नमूद करून ठेवायला हवे. अशा विचार-विश्लेषणाची परंपरा सांगणार्यांची अवस्था आज फक्त प्रतिस्पर्ध्याबाबत बोटे मोडण्यापर्यंत आलेली पाहून मन विषण्ण झाले. विचारांच्या परंपरेचा शेवट अशा आततायी राजकारणी विचारांपाशी व्हावा हे दुर्दैव म्हणावे लागेल.
या पलीकडे जाऊन समाजवादी पक्षांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भूगोलाच्या सीमा बंदिस्त करत नाहीत अशी अंगीकृत विचारसरणी असणारा भारतीय राजकारणातला एक प्रमुख राजकीय गट. ती व्यापकता अन्य कोणत्याही पक्षाची वा विचारसरणीची दिसून येत नाही. साम्यवाद्यांनी शेतकरी नि मजूर वर्गाची लोकशाही म्हणत प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे इतर समाजघटकांना दुय्यम लेखले आणि भूगोलाच्या नाही तरी सामाजिक गटांच्या संदर्भात आपले तत्त्वज्ञान एका कुंपणाआड बंदिस्त करून ठेवले. या व्यापक विचारसरणीमुळे जगात अन्यत्र झालेल्या/होणार्या अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींपासून बोध घेणे, तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होते. कम्युनिस्टांनी बर्याच अंशी हा फायदा उचलला होता. लोहियांसारख्या नेत्याने लोकशाही समाजवादी गटांसाठीही याचा काही प्रमाणात उपयोग करून घेतलेला दिसतो.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
हा भाग आवडला. विशेषतः दुसरं
हा भाग आवडला. विशेषतः दुसरं बलस्थान इंट्रेष्टिंग वाटलं. सुचवल्या जाणार्या उपायांमध्ये त्याबद्दल अजून सविस्तर येईल का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
होय.
फोकस राजकारणावर असल्याने वर उल्लेखलेल्या मुद्द्यांपैकी ज्यांच्या संदर्भात Action items संभवतात त्याला अनुसरून विवेचन शेवटच्या भागात येईल.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
आतापर्यंतच्या मालिकेतील हा
आतापर्यंतच्या मालिकेतील हा लेखांक सर्वाधिक आवडला
---------
समांतरः
फक्त लेखनाने "आपले" दोष वगैरे पेक्षा समाजवाद्याचे दोष किंवा स्वतःचे दोष अशी शब्दयोजना अधिक आवडली असती.
लेखकाने "आपले" म्हटले की लेखक समाजवाद्यांच्यातील एक आहे असा भास होतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण लेखक समाजवाद्यांतील आहे हे
पण लेखक समाजवाद्यांतील आहे हे त्यानं नाकारलं कुठे आहे? बळंच आणलेल्या कृतक तटस्थपणापेक्षा प्रांजळ पक्षधारणा केव्हाही उत्तम.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पण ते नक्की सांगितलं तरी
पण ते नक्की सांगितलं तरी कुठंय ते पहायला आवडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ते
ते सांगणं बंधनकारक आहे? आणि तसा मी आहे की नाही यावरून लेखनाचे आकलन बदलते का?
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
ओ हॅलो साहेब. थंड घ्या.
ओ हॅलो साहेब. थंड घ्या. तुम्ही या लेखमालेत जितके लेख लिहिलेत तिथे असे लिहिलेले सापडत नाही इतकंच माझं म्हणणं आहे.
तदुपरि- तुम्ही ते सांगणं बंधनकारक आहे की नाही इ.इ. बद्दल आय कुडंट केअर लेस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इथे खालील वाक्य सापडतं:एक
इथे खालील वाक्य सापडतं:
समाजवादी विचारसरणीचा पराभव खुपणार्या (माझे आकलनः समाजवादी विचारसरणी जवळची मानणार्या) माणसाने केलेले हे विश्लेषण आहे.
पुरवणी: अर्थातच त्यामुळे लेखाचे आकलन अजिबातच बदलत नाही. मात्र माझ्या मते तटस्थपणा जपता जपता कितीतरी कठोर गोष्टी सांगायच्या राहून जाऊ शकतात. त्या कवाडीच्या आत उभं राहून सांगितल्या, तर त्या कमी टोचतात, जे सांगणार्याच्या उद्देशाच्या दृष्टीनं फायद्याचेच ठरते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
धन्यवाद
नेमक्या संदर्भाबाबत धन्यवाद. मी सारा लेख इतक्या वेळा रिवाईज केलाय नि मुद्द्यांची फेरजुळणी केली आहे की नेमके कुठे काय आहे मला स्वतःलाच सापडणे अवघड झाले आहे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
नेमक्या
संदर्भासाठी धन्यवाद मेघना.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
<< फक्त लेखनाने "आपले" दोष
<< फक्त लेखनाने "आपले" दोष वगैरे पेक्षा समाजवाद्याचे दोष किंवा स्वतःचे दोष अशी शब्दयोजना अधिक आवडली असती.
लेखकाने "आपले" म्हटले की लेखक समाजवाद्यांच्यातील एक आहे असा भास होतो >>
विचार करणारे/तपासून पाहणारे म्हणून जे अपेक्षित आहेत ते स्वतः समाजवादी आहे त्यांनी 'आपले दोष ओळखावे' अशी वाक्यरचना आहे नि ती सयुक्तिक आहे असे वाटते.
शिवाय लेखकाला आधीच लोक समाजवादी समजतातच (वादविवादाच्या क्षणी उत्तराची जबाबदारी टाळण्यास कामी येते.) आणि लेखकाला त्यात काही गैर वाटत नाहीच. सुज्ञ म्हणवणार्या पण पोकळ हिंदूच्या उत्सवाच्या बाबतीतील शेपूट घालण्याबद्दल लिहिले की मी समाजवादी म्हणून आरोपित होतो. जसे हिंदू समाजातील पुरोगामी प्रसंगी मुस्लिमधार्जिणेपणाचे, धर्मद्वेष्टेपणाचे आरोप स्वीकारूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागून स्वधर्मविरोधी मते व्यक्त करतात त्याच्या दशांशानेही मुस्लिम समाजातून घडत नाही - धर्मविरोधी सोडा, मुस्लिम दहशतवाद्यांबाबतही नाही - असे म्हणेन तेव्हा कुणी मला संघवाला म्हणेल. तेव्हाही मी ती शिवी हारासारखी गळ्यात मिरवेन. दोष माझा नव्हे तर शिक्क्याशिवाय ज्यांना पत्राचा मजकूर समजत नाही अशांच्या समजुतीचा आहे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
भुमिका समजली. आभार. तुम्हाला
भुमिका समजली. आभार.
तुम्हाला शिक्के कोणी मारतं का? का मारतं? कोणते मारतं? हे इथे गैरलागु/अवांतर असलं तरी रंजक आहे .
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अजून डीटेलमध्ये वाचायला आवडलं
अजून डीटेलमध्ये वाचायला आवडलं असतं याबद्दल. असो, लिहिले तेही रोचक आहे.
बाकी, फाटाफूट होण्यासाठी वैचारिक खुलेपणा हे एकच कारण असेल असे नाही. ईगोलाही त्याचे रूप दिल्या जाऊ शकते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
साम्यवादी शेतकरी?
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग तरी साम्यवाद्यांशी कितपत जोडला गेला आहे हे पहाणेही रोचक ठरावे.
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग तरी साम्यवाद्यांशी कितपत जोडला गेला आहे हे पहाणेही रोचक ठरावे.
हान तेजायला ... एकदम टिपिंग प्वाईंट.
माझ्या माहीतीनुसार भारतात शेती ही प्रायव्हेटाईझ्ड आहे बव्हंशी भागात. साम्यवादी रशियात "sovkhozes तसेच kolkhozes" ही सामूहिक शेतीची मॉडेल्स होती. एक होती सरकारी शेती व दुसरी सामुहिक मालकीची (ज्यात सरकारचा सहभाग कमी होता). साम्यवादी रशियातील सामूहिक शेती ही अनुत्पादिकतेशी "चोली दामन" का रिश्ता ठेवून होती व आजही भारतातली प्रायव्हेटाईझ्ड शेती सुद्धा अनुत्पादकतेने भरून पावलेली आहे. आता प्रायव्हेटायझेशन म्हंजे उच्च उत्पादकता - असा जो काही क्यापिटलिस्टांचा दावा असतो तो कितपत खरा आहे ते तपासून पहा बरं.
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे तर हेतूबद्दल आहे हे ध्यानात घ्यावे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे तर हेतूबद्दल आहे हे ध्यानात घ्यावे.
मुद्दा एकदम मान्य. सहर्ष मान्य.
समाजवादाचा थिसिस हा परिणामांबाबत कधीच नव्हता. हेतूंबाबत च होता. अर्थात याचा अर्थ असा नाही की भांडवलवादाचा थिसिस हा परिणामांच्या साध्य होण्याच्या ग्यारंटीचा होता. भांडवलवादाचा थिसिस हा हेतूंच्या विशुद्धतेबद्दलचा सुद्धा नव्हता.
-
याबद्दल खालील उद्बोधक व्हिडिओ पाहणे. जेमतेम साडेचार मिनिटांचा आहे.
.
गल्लत
'समाजवाद्यांची बलस्थाने' आणि 'समाजवादी तत्त्वाची बलस्थाने' ह्यात माझी गल्लत झाली काय?