Skip to main content

"अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही" - प्रा. प्रतिमा परदेशी

"अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही" - प्रा. प्रतिमा परदेशी

- ऐसीअक्षरे

आजची स्त्री चळवळ कुठे आहे? स्त्री चळवळीचा चेहरामोहरा रूढार्थाने ब्राह्मणी आहे का? आत्तापर्यंत स्त्री चळवळीने काय मिळवलं आणि काय मिळवायचं राहिलं, याबद्दल प्रा. प्रतिमा परदेशी यांचं भाष्य.

सत्यशोधक विचारधारेतल्या प्रा. परदेशी धुळे-नंदूरबार भागात भटक्या, विमुक्त, आदिवासींसाठी कार्य करतात. तीन वर्षांपूर्वी 'मिळून साऱ्याजणी'ने प्रसिद्ध केलेल्या प्रा. परदेशी यांच्या मुलाखतीत त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्याबद्दल इथे वाचता येईल.

एकूण स्त्रीचळवळीकडे पाहिलं तर भारतात १९७५ पासून स्त्रीवादाचं विश्लेषण होतं आहे. पण मुळात स्त्री चळवळीचा विचार करायचा झाला, तर थोडं मागे जाऊन, आधुनिक भारताच्या इतिहासापासून, म्हणजे एकोणिसाव्या शतकापासून करावा लागेल. एकोणिसाव्या शतकात स्त्रीप्रश्न पुढे आले. त्यांचं जातलक्ष्यी विश्लेषण करताना नेतृत्व करणाऱ्यांची जात काय हे जरी बघितलं नाही, तरी स्त्रियांच्या प्रश्नांची जात मात्र ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असते, हे लक्षात आलं. केशवपन, विधवा-पुनर्विवाह अशा स्वरूपाच्या कौटुंबिक सुधारणा मनावर घेणारे काही सुधारक होते. उदा. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर. दुसरी विचारधारा होती ती सत्यशोधकांची, महात्मा फुल्यांनी सुरू करून दिलेली. त्यांनी स्त्रीप्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहिलं, त्या प्रश्नांच्या मुळांचा विचार केला, असं मला वाटतं. सुधारकांनी, म्हणजे ब्राह्मणी विचारवंतांनी, केशवपनासारखे महत्त्वाचे स्त्री-प्रश्न मांडले. तरीही त्यांची जी मांडणी केली त्यात त्यांनी या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असं दिसत नाही. केशवपन नको, मुलींनीही शाळेत गेलं पाहिजे, अशा प्रकारचा स्त्रियांकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. तर दुसरीकडे महात्मा फुल्यांनी स्त्रियांकडे ’बिचाऱ्या’ असं म्हणून न पाहता स्त्री-पुरुषांचे अधिकार एकसमान असले पाहिजेत अशा पद्धतीचा विचार मांडला. त्यांनी आणि सावित्रीबाईंनी पहिल्यांदा स्त्रियांचं शोषण समजून घेण्यासाठी एका शोषक ब्राह्मणी पितृसत्ताक संस्थेचं आकलन मांडायला सुरुवात केली. शिवाय फुले दंपतीने त्या विरोधात कृतीशील आंदोलनंही केली; उदा विधवांचा प्रश्न, त्यांची बाळंतपणं हेसुद्धा त्यांनी केलं.

विसाव्या शतकाततलं १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होतं. या दशकात (१९७५-८५) भारतात पुन्हा स्त्री संघटना उभ्या राहिल्या. त्यांनी एकोणिसाव्या शतकातल्या दोन परंपरांपैकी सुधारकी, ब्राह्मणी स्त्रीमुक्तीची परंपरा उचलली. सत्यशोधक किंवा अब्राह्मणी स्त्रीवादाच्या विश्लेषणाकडे त्यांनी पाठ फिरवली. त्या संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया ब्राह्मण होत्या हे महत्त्वाचं नाही, तर प्रश्नांवर काम करण्यासाठी सुधारकी परंपरा स्वीकारली हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांची स्त्रीवादाची मांडणी एकांगी पद्धतीची झाली. त्यांनी मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न पुढे आणले; कौटुंबिक हिंसेला केंद्रस्थान दिलं - हे महत्त्वाचं होतंच. पण कौटुंबिक हिंसा आपोआप घडत नाही. ती एका विशिष्ट समाजव्यवस्थेत घडते. नक्की कोणत्या समाजातल्या स्त्रियांना कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावं लागतं; हिंसाचाराला कोणत्या जातीचा, धर्माचा वा पुरुषसत्तेचा आधार असतो, याचा विचार न करता कौटुंबिक हिंसेचा सुट्टा प्रश्न पुढे आणला. पितृसत्ताक संस्कृतीच्या चौकटीतच स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी केली गेली आणि स्त्रियांचं शोषण करणाऱ्या विसाव्या शतकातल्या इतर दोन संस्थांकडे - भांडवलशाही आणि जातिव्यवस्था - यांकडे त्यांचं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं. त्यामुळे आज या चळवळीवर दलित आणि बहुजनवादी स्त्रीवादी परंपरेकडून आक्षेप घेतले जातात. त्यांचा या परंपरेला विधायक नकार आहे. ही सुधारकी मांडणी पूर्णपणे टाकाऊ आहे असं नाही, पण त्यात उणिवा मात्र होत्या अशी भूमिका अब्राह्मणी स्त्रीवाद घेतो. ब्राह्मणी मांडणीच्या या सदोषपणामुळेच नंतरच्या काळात स्त्री चळवळ कोंडीत सापडली. आपल्याकडे जागतिकीकरण झाल्यानंतर स्वायत्त स्त्रीचळवळीचं मोठ्या प्रमाणावर ’एनजीओ’करण झालं. आंदोलनं कमी झाली आणि संघटनांनी प्रकल्पानुसार काम - ज्यासाठी पैसा मिळेल त्या प्रश्नासाठी काम - मनावर घेतलं. कारण त्यांनी परिपूर्ण सैद्धांतिक चळवळ स्वीकारली नव्हती.

पुन्हा पुन्हा सांगतेय, ब्राह्मणी/अब्राह्मणी स्त्रीवाद याचा शब्दशः अर्थ घेऊ नये. या संकल्पना म्हणून वापरल्या जातात. स्त्रीदास्य आणि पुरुषसत्ता यांचं समर्थन करणारा विचार ब्राह्मणी म्हणून ओळखला जातो. जाती, वर्ग, स्त्रीदास्य यांचा अंत करते ती विचारधारा अब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. मांडणी करणार्‍य़ाची जन्मदत्त जात कोणतीही असली, तरी पुरुषसत्ता, भांडवलशाही यांना विरोध करणाऱ्यांना अब्राह्मणी प्रवाहातलं समजलं जातं. आगरकर, न्या. रानडे हे उदारमतवादी असले तरी त्यांना ब्राह्मणवादाची मर्यादा होती. आगरकर आणि फुल्यांचे मतभेद झाले ते त्यातूनच. स्त्रीप्रश्नांची मांडणी करताना आगरकर म्हणतात की, स्त्रिया यासुद्धा मानवच आहेत, त्यांना उपमानव समजू नका. पण जातिव्यवस्था, ब्राह्मणी धर्म, ब्राह्मणी मूल्य यांतूनच स्त्रियांचं शोषण होतं या पद्धतीची मांडणी मात्र सुधारकांकडून झाली नाही.

हिंसा ही आभाळातून पडणारी गोष्ट नाही. ती एका विशिष्ट परिस्थितीत निर्माण होते. पुरुषसत्ता, धर्मव्यवस्था, जातिव्यवस्था या हिंसेच्या पायावरच सुरू राहतात. पुरुषसत्ता म्हणजे स्त्रियांना दुय्यम स्थान इतकाच याचा मर्यादित अर्थ नाही. स्त्रियांना दुय्यम स्थानी ठेवण्यासाठी जी व्यवस्था वापरली गेली, ज्या व्यवस्थे स्त्रीकडून सातत्याने पुनरुत्पादन करवून घेतलं गेलं, त्यात हिंसा ग्राह्य मानलेली आहे. उदाहरणार्थ, स्त्रियांना घरात बंदिवान ठेवा. यातून नियंत्रण येतं. तिच्या शरीरावर, मनावर, लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असं ही पुरुषसत्ता मानते. भारतात पुरुषसत्तेला जातिव्यवस्थेचा आधार आहे. स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं साधन म्हणून भारतीय परंपरांमध्ये हिंसाचाराचं समर्थन केलेलं दिसतं. ’बायको ऐकत नाही म्हणून तिला धाकात ठेवण्यासाठी तिला मारहाण करायची’, यात हिंसा येते.

यापेक्षा चांगलं उदाहरण पाहू या. स्त्रियांना जाळण्याचे प्रकार फक्त भारतातच होतात अशातला भाग नाही. जगात सगळीकडेच असे प्रकार होत असत, होतात. पण भारतात स्त्रियांना जाळण्याच्या क्रियेचं प्रथेत रूपांतर झालं. याला कारण जातिव्यवस्था आणि पुरुषसत्ता. पुरुषसत्ता एकसाची नाही, तिला बरेच आयाम आहेत. भारतात या आयामांमध्ये जात आणि धर्म या दोन गोष्टी येतात. म्हणून भारतातला हिंसाचार इतर देशांपेक्षा निराळा आहे. एकीकडे गर्भलिंग चाचण्या करून स्त्रीगर्भ मारला जातो. गेल्या वीस वर्षांत आपल्याकडे हे दिसतंय. दुसरीकडे एकतर्फी प्रेमातून होणारे खून. महाविद्यालयातल्या तरुणी त्यामुळे असुरक्षित आहेत. कधी, कोण चाकू-सुरा घेऊन आपल्याला "प्रेम करतेस का मारू?" असं विचारतील आणि अॅसिडचा हल्ला करतील, ते सांगता येत नाही. तिसरं, जातपंचायतींच्या निमित्ताने पुढे आलेला मुद्दा, ज्याला ते लोक 'ऑनर किलींग' म्हणतात. स्त्रियांना मारण्याला 'ऑनर' म्हणणं हेच मुळात आम्हांला मान्य नाही. चौथं असं की सार्वजनिक क्षेत्रातही हिंसेला थोडी मुभा आहे. रात्री चित्रपट बघायला गेलात तर सुरक्षित परत येणार का याची काळजी सगळ्यांनाच असते. सार्वजनिक ठिकाणी बलात्कार इत्यादी हिंसेचे प्रश्न आहेत. दिल्लीतल्या 'निर्भया'ची गोष्ट हे याचंच उदाहरण. किंवा खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबातल्या मायलेकींची जी विटंबना झाली तीही याचंच उदाहरण. या घटना असंच सांगत आहेत की सार्वजनिक क्षेत्रांत स्त्रिया सुरक्षित नाहीत. आईच्या गर्भापासून सार्वजनिक क्षेत्रापर्यंत स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर होतो आहे. या हिंसाचाराला जातिव्यवस्था आणि पितृसत्तेनंच आधार दिलेला आहे.

या हिंसेला तोंड द्यायचं असेल तर तिचं नीट विश्लेषण केलं पाहिजे. खाप पंचायती जे 'ऑनर किलींग' करत आहेत, ते सनातनी, मध्ययुगीन मानसिकतेतून येतं इतकंच विश्लेषण करून पुरणार नाही. या हिंसेचा ब्राह्मणी पितृसत्ता आणि जातिव्यवस्थेशी असणारा संबंध काय हे विश्लेषण योग्य रीतीने केलं, तरच तो प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आपण जाऊ शकतो.

हिंसाचार म्हणजे केवळ चाबकानं वा चाकूने मारणं असं नाही. स्त्रियांच्या भावना, त्यांचं मन आणि शरीर गृहीत धरलं जातं, हा सगळ्यात मोठ्या प्रकारचा हिंसाचार आहे. कारण त्यांना त्यात माणूसच मानलं जात नाही. उदाहरणार्थ, स्वच्छतागृहाची सोय नसण्याची झळ कोणाला बसणार? स्त्रियांना. ग्रामीण स्त्रियांना जास्तच.

उच्च जातीतल्या स्त्रियांना कुटुंबात पितृसत्ता सहन करावी लागते. पण निदान सार्वजनिक क्षेत्रामध्ये असे अनुभव येत नाहीत. बहुजन जातीच्या स्त्रियांना मात्र कुटुंबांतर्गत, घरातल्या पुरुषांकडून पितृसत्तेचा अनुभव येतो आणि सार्वजनिक क्षेत्रातही त्यांना पितृसत्तेचा सामना करावा लागतो. त्यांचं शोषण उच्चजातीय स्त्रियांपेक्षा अधिक गंभीर प्रकारचं होतं. कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचं शोषण अधिक आहे हे इतरांना पटवून देण्याच्या प्रयत्नातच चळवळीची बरीच शक्ती खर्च होत आहे. ’सगळ्या स्त्रिया शोषित असतात’ हे एक ललित वाक्य झालं. पण प्रत्यक्षात सगळ्या स्त्रियांचं शोषण समान नाही, शोषणाची तीव्रता कमी-जास्त आहे. जातिव्यवस्थेतल्या खालच्या स्तरांमध्ये शोषण अधिकाधिक तीव्र बनत जातं. त्यामुळे ’आमचं अधिक शोषण होतं आहे’ हे सांगण्यासाठी आधी सैद्धांतिक मांडणी करावी लागते. दुसरीकडे, फक्त पितृसत्ताक पद्धतीचाच नाही, तर आर्थिक शोषणाचाही सगळ्यात जास्त फटका कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांनाच बसतो. सगळ्या स्त्रियांची एकजूट झाली पाहिजे, कारण पितृसत्ता शोषण करते, हे बरोबर आहे. पण नक्की कोणत्या स्त्रियांची चळवळ संघटित करायची आहे, याचा प्राधान्यक्रम आधी ठरवावा लागतो.

आमच्यासारखे लोक अशी मांडणी करतात: जे सगळ्यांत जास्त दडपलेले आहेत - आदिवासी, भटक्या-विमुक्त, दलित, बहुजन जातींमधल्या स्त्रिया - त्यांच्या प्रश्नांना आपल्याला अग्रक्रम द्यावा लागेल.

१९७५ च्या दशकात तसं झालं नाही. १९९० नंतर ही मागणी पुढे यायला लागली.

एकीकडे स्त्रीमुक्ती आंदोलनांना सरकारकडून काही बौद्धिक स्वरूपाच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. उदा. जमीन हक्क, परित्यक्ता स्त्रियांसाठी मागण्या, इत्यादी. दुसरीकडे पर्यायी संस्कृतीच्या मागण्या पुढे आणायच्या आहेत. पर्यायी संस्कृतीसाठी आम्ही दलित, बहुजन स्त्रियांनी प्रयत्न केला होता. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं तो दिवस, २५ डिसेंबर, हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा व्हावा असा तो प्रयत्न होता. त्यामागची भूमिका अशी: मनुस्मृती ही स्त्रीदास्याची संहिता आहे. तिच्यामार्फतच पुरुषसत्ता आणि जातिव्यवस्था एकत्रितरीत्या स्त्रियांचं शोषण करतात. त्या शोषणाचा निषेध म्हणून मनुस्मृतीे दहनाचा दिवस हा भारतीय स्त्रीमुक्तीचा दिवस, असं मानलं होतं. अब्राह्मणी भगिनीभाव वृद्धिंगत करण्याचा हा प्रयत्न होता, जो आम्ही १९९६ पासून साजरा करतो.

ब्राह्मणी चळवळीकडून ज्या चुका झाल्या त्या टाळल्या पाहिजेत अशी आमची भूमिका होती. याचं एक उदाहरण सांगते. १९८५ च्या आसपास शेतकरी महिला आघाडी आली. मध्यम जातीतल्या स्त्रिया या आघाडीच्या निमित्ताने प्रथमच संघटित झाल्या. शेतीमधलं त्यांचं स्थान, कुटुंबातलं त्यांचं शोषण यांबद्दल त्या बोलत होत्या. ब्राह्मणी स्त्रीमुक्ती चळवळीने या स्त्रियांशी कोणत्याही प्रकारचा भगिनीभाव दाखवला नाही. ’हे श्रीमंत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत’ असं म्हणत या प्रश्नांकडे पाठ फिरवली. यातून भगिनीभाव वाढू शकतो याचा विचारच केला नाही. या प्रश्नांकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघण्याची गरज होती, ते झालं नाही. त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन 'आपलं' - स्त्रीवादाचं - आंदोलन पुढे नेण्याची शक्यता होती, ते झालं नाही. त्यांनी काही प्रयोग सुचवले होते, उदाहरणार्थ 'सीता शेती'. रामाची संस्कृती नाकारत, पुरुषसत्तेची बळी असणाऱ्या परित्यक्ता सीतेचं नाव घेऊन, त्या शेतीचे प्रयोग करू पाहत होत्या. त्यांनी 'लक्ष्मी मुक्ती'चा कार्यक्रम सांगितला होता - स्त्रीला संपत्तीत अर्धा हक्क पाहिजे. आपले मतभेद लक्षात ठेवूनही त्यांच्या या स्त्रीमुक्ती कार्यक्रमाला पाठिंबा दिला गेला पाहिजे होता. शेतकरी महिला आघाडीने आणखी एक महत्त्वाची भूमिका घेतली होती. रावेर नावाचं गाव आहे, तिथले शेतकरी गहू पिकवत नाहीत. कारण तिथली एक आख्यायिका अशी आहे की, सीता प्रसूत झाली तेव्हा लव-कुश या जुळ्यांचा सांभाळ करण्यासारखी तिची परिस्थिती नव्हती. ती तेव्हा रावेरमध्ये होती. या मुलांची उपासमार होऊ नये म्हणून ’दूध नाही, निदान मूठभर गव्हाची कणीक द्या, पाण्यात कालवून मी ते दुधाच्या जागी माझ्या मुलांना पाजेन’ अशी विनंती तिने लोकांना केली. पण कुणी तिला गहू दिले नाहीत. मग संतापून तिने शाप दिला की या गावात गहू पिकणार नाहीत. या आख्यायिकेचा परिणाम अजूनही असा आहे की, रावेरमधले शेतकरी गहू पिकवत नाहीत. त्यावर या शेतकरी महिला आघाडीने कार्यक्रम हाती घेतला, की आपण सीतामाईची मुक्ती करू या, तिच्या शापातून मुक्त होऊ या. पुढे ते आंदोलन इतर तंटे, भूसंपादन यांमध्ये हरवलं ही गोष्ट निराळी.

पण मला वाटतं, त्यांचा पराभ‌व झाला, कारण आमच्यासारखे स्त्रीवादी त्यांच्याबरोबर नव्हते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. स्त्रीवादी आंदोलनानं त्यांच्याशी, एकूणच शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नांशी जोडून घ्यायला हवं आहे. जागतिकीकरणानंतर इथे मोठमोठ्या खतकंपन्या वगैरे आल्या, कर्जबळी झाले. त्यातून स्त्रियांवर आत्महत्यांचा मानसिक आघात झालाच, वर शेती आणि कुटुंबाची जबाबदारी.

एकीकडे जातपंचायतींना नाकारणं, पुरुषसत्तेला विरोध करणं, नव्या कायद्यांची मागणी करणं हे आम्हांला एकीकडे लागेल. उदाहरणार्थ: आदिवासींना हिंदू कोड बिल लागू नाही. त्यांना जमात पंचायतीकडून न्याय मागावा लागतो. 'पाचांमुखी परमेश्वर' असला तरी पंचांमध्ये स्त्रिया नसतात. त्यामुळे या जातपंचायती पुरुषसत्ताक असतात. म्हणून आमची मागणी होती की आदिवासी स्त्रियांना हिंदू कोड बिल लागू करा, म्हणजे निदान कायद्याचं संरक्षण त्यांना मिळेल. ही एक कायदेशीर बाजू झाली. दुसरं म्हणजे हिंसाचाराची व्याख्या करून, तो रोखण्यासाठी न्यायालयं सक्रिय करावी, पितृसत्ताक गुन्ह्यांना कडक शिक्षा करावी अशा प्रकारच्या नव्या संदर्भातल्या मागण्या.

ज्यांना जात, पितृसत्ता आणि भांडवलशाही यांमधून होणाऱ्या शोषणाला सामोरं जावं लागलं आहे अशा सगळ्यांची - म्हणजे शोषित जातींतल्या सर्वहारांची, एकजूट करून पुढची आंदोलनं बांधावी लागतील. ज्यांचा आर्थिक वर्ग बदलला आहे त्यांचे प्रश्न निराळे आहेत.

भारतीय भांडवलशाही आणि भारतीय स्त्री

भांडवलशाहीमुळे भारतीय स्त्रियांचं होणारं शोषण उर्वरित जगापेक्षा कसं निराळं आहे हे आधी बघावं लागेल. युरोपच्या इतिहासात सरंजामशाही संपवण्यासाठी तिथला भांडवलदार वर्ग संघटित झाला. त्यांनी सरंजामदारांच्या जमिनी लोकांना वाटून, लोकांची क्रयशक्ती वाढवली. त्यांना त्यातून पुढे नफा मिळणार होता, कामगार वर्ग उपलब्ध होणार होता, म्हणून ही क्रांती झाली. भारतामध्ये मात्र काही अपवाद वगळता पूर्वाश्रमीच्या बनिया जातीचे लोक भांडवलावर ताबा ठेवून आहेत. आपल्याकडच्या भांडवलाची प्रवृत्ती अशी की भांडवल आपल्या जातीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. अशी चिक्कार उदाहरणं देता येतील, पण साधं उदाहरण पहा. एखाद्या वस्तीत राजस्थानकडचा मारवाडी येतो आणि किरकोळ किराणा मालाचं दुकान काढतो. तिथे कामगार म्हणून कोण असतं? तर त्यानेच त्याच्या गावाकडून आणलेला एखादा गरीब मजूर. पण त्याच्याच जातीतल्या स्थानिकाला ती नोकरी मिळत नाही. कारण विश्वास ठेवायचा, तो फक्त आपल्या जातीतल्या माणसावर. पैसे फिरू द्यायचे, ते आपल्याच नात्यागोत्यांत, किंवा परीघ किंचित वाढवून, आपल्याच जातीत. त्यापलीकडे भांडवल जाऊ नये, अशी भारतीय भांडवलशाहीची प्रवृत्ती. त्यामुळे युरोपमधल्यासारखी सरंजामशाही संपवणारी क्रांती भारतातला भांडवलदार करत नाही. त्यांनी अशी जमिनीची मालकी सगळ्यांकडे जाऊ देणारी क्रांती केली असती तर त्यांना मोठ्या प्रमाणावर कामगार, ग्राहक उपलब्ध झाला असता आणि इथल्या भांडवलशाहीचं स्वरूप कदाचित चांगलं झालं असतं. हे घडत नाही कारण इथली जातिव्यवस्था.

भारतात जात, पुरुषसत्ता आणि भांडवलशाही वेगवेगळ्या झाल्या नाहीत. त्यांनी एकत्र येऊन शोषण केलं. उदा. लोकांच्या विकासापेक्षा बिर्लाशेठला मंदिर बांधण्यात रस आहे. नवीन उद्योग काढून भांडवलाचं चलनवलन सुरू ठेवण्यापेक्षा 'डेड इनव्हेस्टमेंट' म्हणावीत अशी मंदिरं बांधली गेली. या मंदिराच्या संस्कृतीतून जुनी मूल्यं जपली गेली आणि समाजावर ताबा मिळवला गेला. हे एकाएकी घडत नाही. अंबानींनी भारतातल्या सुमारे तेरा टेलिव्हिजन वाहिन्या खरेदी केल्या आहेत. का? त्यांना हवी असणारी मूल्यं आणि राजकीय विचार त्यांना पसरवायचा आहे. टीव्हीवर चालणाऱ्या मालिका पाहा. त्यातून जुनी व्यवस्था कायम ठेवणारी, पुरुषसत्ताक, उपभोगवादी मूल्यसंस्कृती दाखवतात. छान, चकचकीत कपडे घालायचे, मोठे बंगले दाखवायचे आणि चंगळवादाचा प्रसार करायचा. भांडवलदार माध्यमांवर ताबा ठेवून पुन्हा एकदा पितृसत्ताक व्यवस्था कायम ठेवत आहेत. नफा कमावणं ही भांडवलशाहीची मूळ प्रेरणा असते, असं आम्ही अभ्यासक्रमात शिकलो. पण ते भारतात दिसतच नाही. "नफा मिळाला नाही तरी चालेल, पण स्त्रियांच्या, मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध केला पाहिजे" अशी त्यांची भूमिका असते. राहुल बजाज राज्यसभेत असताना आरक्षण नको म्हणून भांडले आहेत. समाजातलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ही अन्याय्य व्यवस्था टिकवून धरायची, एवढीच भारतीय भांडवलशाहीची प्रेरणा आहे.

अलीकडच्या काळात असं दिसायला लागलं आहे, की भारतीय भांडवलदार फक्त सबसिड्या मिळतात तिथेच गुंतवणूक करू पाहतो. पवनऊर्जा व्यवसायात सरकार सबसिडी देणार असेल, तरच कंपन्या त्यात उतरतात. विकास होईल आणि भांडवल वाढेल असं काम ते करतात असं मला वाटत नाही. कारणे भांडवलशाहीची वाढसुद्धा पितृसत्ताक पद्धतीने झालेली आहे. जागतिकीकरणानंतर लोक खूप श्रीमंत झाले नाहीत. फक्त ज्या वर्गाला काही थोडेफार फायदे झाले, त्या वर्गाचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम भारतीय राजकारणी, उद्योजक आणि बुद्धिजीवी वर्गाने केलं. विचारांमध्ये प्रगल्भता न आल्यामुळे फक्त पैसा येऊन भणंगीकरण (lumpenisation) तेवढं झालं. लोक खूप वस्तू खरेदी करतात, पण सुसंस्कृत बनत नाहीत. ते तसे बनू नयेत, म्हणून यंत्रणा, राज्यकर्ता, नोकरशाही आणि भांडवलशाही एकत्र येऊनच हे भणंगीकरण करतात. त्यामुळे पैशानं प्रश्न मिटण्याऐवजी उलट गुंतागुंतीचे होतात.

अगोदर हिंसा फक्त कुटुंबांतर्गत होती, आता खेळत्या पैशासह हिंसाचाराचा स्तर अधिकच अमानवी बनतो आहे. बीडचं एक उदाहण आहे. गर्भलिंगनिदान करून मुलींचा गर्भ पाडायचा हे तर 'नेहेमीचं' आहेच. पण एका डॉक्टरच्या स्टिंग ऑपरेशनमधून समजलं की मॅच्युअर झालेले गर्भ मारले जात होते आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी चार कुत्रे पाळलेले होते. हिंसा अधिकाधिक भीषण, अमानवी पद्धतीने होत असल्याचं हे उदाहरण आहे. साहित्य, संस्कृती, राजकारण, समाजकारण, या सगळ्याचंच मोठ्या प्रमाणावर भणंगीकरण होत आहे.

आपल्याकडे बनिया भांडवल आणि पारशी भांडवल असा फरक दिसतो. टाटांनी ’टीआयएफआर’ (Tata Institute of Fundamental Research), 'टिस'सारख्या (Tata Institute of Social Sciences) संस्थांना देणग्या दिल्या आहेत. बनिया भांडवलदार मात्र फक्त व्यवसाय करतो. अंबानींनी २६ मजली इमारत बांधल्यावर टाटांची प्रतिक्रिया बोलकी होती. ते म्हणाले होते, "वैभवाचं प्रदर्शन मांडू नये." टाटांच्या भांडवलाला संस्कृती आहे. फक्त भांडवल वाढवून चालत नाही, त्याला विचारांची जोड द्यावी लागते. त्यासाठी भांडवलशाहीअंतर्गत जेवढे प्रयत्न करता येऊ शकतात, ते त्यांनीच केले आहेत. त्यांच्या नफ्यातला काही भाग विचारांच्या प्रसारासाठी दिलेला आहे. लोक प्रगल्भ बनले तर त्याचा अंतिमतः फायदा भांडवलदारांनाच होणार असतो, पण तेवढ्यासाठीही बनिया भांडवल काहीही उपक्रम करत नाहीत. बिल गेट्सने प्रचंड निधी लोककल्याणाकरता दिला हे राहुल बजाजना सांगितलं, तेव्हा ते म्हणाले, "मी गेट्सएवढा श्रीमंत नाही." आपण लोककल्याणाकरता पैसे देण्याइतपत मिळवले नाहीत याची त्यांना लाजही नाही. पारशी भांडवलात ही चाड दिसते, ती बनिया भांडवलदारांकडे नाही. टाटांनी धरण बांधलं, त्यातून लोकांपर्यंत वीज पोहोचली, 'टिस'सारख्या संस्था उभ्या करून विचारांना चालना दिली. तसं बनिया उदाहरण औषधालाही नाही. उलट त्यांच्याकडे फसवणुकीची प्रेरणा आहे. सरकारने या कंपन्यांवर बंधन घातलं की पाच टक्के निधी विकासकामांसाठी वापरला पाहिजे, तर पाच टक्क्यांबद्दल न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवल्याचं उदाहरणं भारतात दिसतं; अपवाद एक पारशी भांडवलाचा, तो ही सुरुवातीपासून.

भारतीय माध्यमं आणि स्त्री
भारतात आता फेसबुकासारखी माध्यमं येत आहेत, जी भांडवलशाहीतच उदयाला आली. या घटनेकडे भारतात जातीच्या परिप्रेक्ष्यातून बघावं लागेल. सोशल मिडियाचा वापर करणार्‍यांत माहिती देणाऱ्यांचंच वर्चस्व आहे. दलित, बहुजन लोकांना स्वतःचा दृष्टिकोन या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी स्थिती भारतात अजून आलेली नाही. भारतात संगणक आल्यावर ज्ञानपिपासा निर्माण झाली आणि विकास झाला असं झालं नाही. उलट त्यावरून कुंडली कशी बनवायची यात लोकांना रस होता. संगणकाचं स्वागत नारळ फोडून करणारी परंपरा या देशात आहे. एक साधन येणं फक्त महत्त्वाचं नाही, त्यावर वर्चस्व कोणाचं आणि त्याचा वापर कसा होणार हे महत्त्वाचं आहे. सोशल मिडीयाच्या चांगल्या उपयोगाचं उदाहरण 'निर्भया'च्या वेळचं देता येईल. त्याचा निषेध करण्यासाठी लोकांनी मेणबत्त्या पेटवून आपली सहवेदना प्रकट केली. पण प्रश्न असा आहे की हीच गोष्ट खैरलांजीच्या बाबतीत, नितीन आगेच्या बाबतीत होत नाही. अलीकडेच नगर जिल्ह्यात जामगावच्या पुढे ज्या घटना झाल्या तिथेही होत नाही. दलित, बहुजन स्त्रियांसाठी मेणबत्त्या पेटवल्या जात नाहीत. आदिवासी स्त्रियांवर अन्याय झाला म्हणून सोशल मिडियाच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत, कारण हा मिडिया वापरणारे लोक विशिष्ट जातवर्गातले, विशिष्ट मनोवृत्तीचे आहेत. त्यामुळेच सोशल मिडियालाही जात आणि पितृसत्ता मिळाली आहे.

आंतरजाल हे फक्त शहरी लोकांच्या हातात आहे असं राहिलेलं नाही. भांडवलशाहीच्या कृपेने किंवा अवकृपेने त्याचा प्रसार ग्रामीण भागातही होत आहे. पण माध्यमं हातात आल्यावरचा अनुभव असा आहे - पुण्यात फेसबुकच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची बदनामी झाली. फेसबुकाचा वापर लोकांच्या भावना भडकवून जातीय दंगे करण्यासाठी झाला. शिवाजी महाराजांची बदनामी कोण्या मुसलमानाने केली अशी पोस्ट कोणीतरी टाकली आणि त्याचा परिणाम म्हणून एका सॉफ्टवेअर इंजिनीयरला, नसीमला, लोकांनी डोक्यात बॅट डोक्यात घालून मारलं. भारतात फेसबुकाचा वापर उच्चजातीयांचे हितसंबंध राखण्यासाठी होतो आहे.

आपल्या हातात साधनं येणं आणि त्या साधनांवर नियंत्रण असणं या वेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेत फर्ग्युसन शहरात एका कृष्णवर्णीयाला पोलिसाने गोळी घातली, त्याच्या निषेधात निदर्शनं झाली आणि तिथे सैन्याकडे असतात तशा बंदूका, चिलखतं, रणगाडे घेऊन पोलीस शहरात आले. या प्रकाराबद्दल तिथल्या माध्यमांनी संताप व्यक्त केला. तिथे कृष्णवर्णीयांच्या लढ्याला मोठा इतिहास आहे. त्यांनी आंदोलनं करून अमेरिकन स्थानिक सरकारांना जेरीस आणण्याची उदाहरणं आहेत. कृष्णवर्णीयांच्या संतापाचा त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो. भारतात हे होत नाही, कारण भारतात जात आहे. शोषित एकत्र येऊ नयेत यासाठीची यंत्रणा व्यवस्थेच्या माध्यमातून तयार होते आहे. या शोषितांचं हातावर पोट आहे, त्यांच्यापर्यंत माध्यमं पोहोचतच नाहीत. अमेरिकेत ही दरी खूपच कमी आहे. भेदभाव असला तरीही मूलभूत गरजांसाठीचा संघर्ष इथल्याइतका अवघड नाही. भारतात मात्र जातिधर्माच्या नावाखाली उत्पादनाच्या साधनांवरच नाही, तर जीवनावरही नियंत्रण ठेवलं जातं. माध्यमांचा वापर करून शोषणाविरोधात लढा देण्याची परिस्थिती भारतात येण्यासाठी खूप जास्त काळ जावा लागेल.

आंबेडकर म्हणजे राज्यघटना बनवणारे असं गृहीत धरलं जातं. फुले आणि आंबेडकर मुळातून न वाचता त्यांना गृहीत धरण्याची चूक इथल्या स्त्रीवाद्यांनी केली आहे. बाबासाहेब स्वातंत्र्यानंतर नऊ वर्षं हयात होते. त्यांनी १९४२ पासून स्त्रियांच्या प्रश्नासाठी काम सुरू केलं होतं. त्यांच्या पुस्तकांची शीर्षकं वाचली, तर ८०% साहित्यातून त्यांनी पितृसत्तेवर हल्ला केल्याचं लक्षात येतं. 'ब्राह्मणशाहीचा विजय', 'Riddle in Hinduism' यांत ते हिंदू धर्माची चि्कित्सा करून धर्म कसा पितृसत्ताक आहे, ब्राह्मणवर्चस्ववादी आहे याची चर्चा करतात. 'हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती' हा त्यांचा ३० पानांचा छोटा निबंध आहे, 'बहिष्कृत भारत', 'समता' यांतल्या लिखाणात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा केली आहे. मी १९९६ साली 'डॉ. आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती' अशी जी पुस्तिका लिहिली, त्यात आंबेडकरांच्या स्त्रीवादी विचारांची मांडणी आहे. अलीकडे शर्मिला रेगेंनी लिहिलेल्या 'Against the madness of Manu' नावाच्या पुस्तकात आंबेडकरांच्या पितृसत्ताक पद्धतीबद्दल लिहिलेल्या लेखनाचं संकलन आणि एक चांगली प्रस्तावना आहे.

'हिंदू कोड बिला'साठी आंबेडकरांनी केलेला संघर्ष पाहता असं दिसतं, की पं. नेहेरूंपासून, राजेंद्र प्रसाद, चारातले तीन शंकराचार्य इथपर्यंत सर्वांनी 'हिंदू कोड बिला'ला विरोध केला. कारण ब्राह्मणी पितृसत्तेनुसार हिंदू स्त्रियांना पुनर्विवाहाचा वा वारसचा अधिकार नाही. अब्राह्मणी स्त्रियांना पोषक असणारी मांडणी फुल्यांनंतर आंबेडकरांनी केली. त्यांनी एकीकडे सैद्धांतिक मांडणीतून ब्राह्मणी पितृसत्ता उलगडून दाखवली, या सत्तेला आव्हान देण्यासाठी कोणते नवे कायदे आजच्या समाजात असले पाहिजेत हे लिहिलं आणि शिवाय कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. या देशातल्या स्त्रियांना किमान स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी संघर्ष केला. नेहेरूंनी वचन देऊनही 'हिंदू कोड बिल' संसदेत मांडलं नाही, याचा निषेध म्हणून त्यांनी कायदामंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९७५ साली आपल्याकडे स्त्रीवादी चळवळ सुरू झाली तेव्हा त्यांनी 'हिंदू कोड बिला'च्या चर्चेचा वारसा डोळसपणे स्वीकारला असता, तर स्त्रीमुक्ती चळवळ आज वेगळ्या टप्प्यावर पोचली असती. पण तसं झालं नाही. त्यामुळे चळवळीची कोंडी झाली. हे टाळण्यासाठी आंबेडकरांनी केलेली स्त्रीवादी मांडणी पुढे आणली पाहिजे.

आजची स्त्री चळवळ कुठे आहे? स्त्री चळवळीने काय मिळवलं?

कोणतीही चळवळ सिद्धांतांवर आणि संकल्पनांवर उभी राहते. स्वातंत्र्यानंतर झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीमुळे शहरी स्त्रियांचं जीवनमान सुधारलं. त्यांनी सरकारी पातळीवर काही मागण्या केल्या, त्यामुळे सरकारी दृष्टिकोनातून स्त्रियांची दखल घ्यायला सुरुवात झाली. या त्यांच्या योगदानाबद्दल प्रश्नच नाही. पण त्यांच्या योगदानाहून त्यांच्या मर्यादा जास्त आहेत. वाचनाचा पर्याय उपलब्ध असूनही फुले-आंबेडकर न वाचता त्यांनी वरवरची मांडणी केली असा आक्षेप आहे. जातिव्यवस्थाविरोधी आंदोलन मधल्या काळात निर्माण झालं नाही. आम्ही सगळ्या स्त्रिया आहोत, आम्ही एक आहोत इतपतच भगिनीभाव मर्यादित नसतो. वेगवेगळ्या जातीतल्या स्त्रियांचं शोषण वेगवेगळ्या प्रकारे होतं. याला व्यक्ती म्हणून कोणी जबाबदार नाही, त्यामुळे शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात एकत्र आंदोलन केलं पाहिजे असं प्रबोधन व्हायला हवं. पण हे प्रबोधन झालं नाही. जातीचा मुद्दा घेतला गेला नाही, त्यामुळे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय स्त्रियांना स्वच्छतागृहासारखे प्रश्न आपले वाटलेच नाहीत. कोणी, कुठे, कसं राहायचं हे याचं जातिव्यवस्थेनं ठरवलं. गावकुसाबाहेर, घाणीत कोणी रहायचं हे जातिव्यवस्थेने सांगितलं. हे समजून घेतलं नाही आणि त्याबद्दल चीड आली नाही, तर स्वच्छतागृहासारखे मुद्दे आपले वाटणारच नाहीत. त्यासाठी आवश्यक असणारं प्रबोधन स्त्रीचळवळीने केलं नाही. त्यांचा प्रश्न - आमचा प्रश्न अशी विभागणी केली गेली. सहवेदना मानली नाही.

ओबीसी स्त्रियांनी आरक्षण मागितलं तर त्या फूट पाडतात असा आरोप उच्चवर्णीय मानसिकतेमधून होतो. भगिनीभावाला तडे जातात. त्या ही मागणी कोणत्या पार्श्वभूमीवर करत आहेत हे समजून घेतलं जात नाही. 'हिंदू कोड बिल' आम्हांला लागू करा अशी मागणी आदिवासी स्त्रियांनी केली. उच्चवर्णीय स्त्रिया म्हणाल्या, "तुम्ही चळवळीत फूट पाडता, आदिवासी स्त्रियांचे वेगळे प्रश्न घेता." आदिवासी स्त्रियांचे नेमके प्रश्न कोणते, त्यांची मागणी काय आहे हे समजून न घेता हे आरोप केले गेले. आपल्यात भिनलेली पुरुषसत्ता, ब्राह्मण्य सिद्ध करणारे हे आरोप असतात. ब्राह्मणी मूल्यसंकल्पना, उच्चजातीचे संस्कार हे स्त्रीवादी चळवळीत आल्यामुळे आपसूकच पुसले जात नाहीत. त्यासाठी डीकास्ट, डीक्लास होण्याची गरज असते. यासाठीच चर्चा, वाचन, प्रबोधनाची गरज आहे.

महाराष्ट्राला प्रबोधनाचा वारसा आहे असं समजलं जातं. प्रबोधन म्हणजे नव्या विचारांचं स्वागत. नवे विचार म्हणजे विषमता, शोषणाचा विरोध. ही परंपरा महाराष्ट्राला होती आणि आहे. प्रबोधनाकडे काही पक्ष, संघटना, चळवळींनी सपशेल दुर्लक्ष केलं. जे जातिव्यवस्थाविरोधी होते, ज्यांनी स्त्रियांचे प्रश्न या अंगाने पाहिले त्यांनी प्रबोधनाला महत्त्व दिलं. एकोणिसाव्या शतकात आगरकर, रानडें यांनी ब्राह्मणी संस्कृतीच्या चौकटीत का होईना, पण प्रबोधनाचा विचार केला. फुल्यांनी सगळ्याच चौकटी मोडून सर्वंकष समतेच्या दृष्टीने मुद्दे पुढे नेले. विसाव्या शतकात शाहूंच्या, ब्राह्मणेतर चळवळीच्या निमित्ताने प्रबोधन झालं, पण कल बदलला. आधी प्रबोधन समताधिष्ठित होतं, विसाव्या शतकात ते पुरोहितशाहीच्या विरोधात झालं. ब्राह्मणेतर चळवळींनी ब्राह्मणसत्तेच्या विरोधात प्रबोधन केलं. आंबेडकरांच्या शब्दांत, त्यांनी ब्राह्मणशाही, पितृसत्ता, भांडवलशाहीच्या विरोधातलं प्रबोधन गतिमान केलं. पण मार्क्सवादावर आधारलेले पक्ष, संघटनांनी प्रबोधनाकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या दृष्टीने आर्थिक धोरणं संघटित करणं म्हणजे चळवळ, पक्ष चालवणं. विचार पसरवण्यासाठी प्रबोधनाची गरज असते, ते त्यांनी केलं नाही. समाजवाद म्हणजे काय याचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचला नाही. मार्क्सवादाला जो समाजवाद अभिप्रेत होता, त्याचा अर्थ पगारवाढ, बोनससाठी संप करणे असा मर्यादित प्रकारे लावला गेला. पण त्यापलीकडे कम्युनिझम असतो हे प्रबोधनातून पोहोचवता आलं असतं. समाजवादी मन घडवायचं असेल तर समाजवादी प्रबोधन करावं लागतं, ते त्यांनी केलं नाही. विचार जोपर्यंत जनमानसाची पकड घेत नाही तोपर्यंत ते बौद्धिक हत्यार बनत नाही, असं मार्क्स म्हणतो. खुद्द मार्क्सवादी असा विचार करतात, असं दिसत नाही. जात, स्त्रीशोषण यांना विरोध करणारे मात्र प्रबोधन गतिमान करताना दिसतात.

आम्ही काय करतो?

धुळे आणि नंदूरबारमध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या नावाने आम्ही गेली ३०-३५ वर्षं कार्यरत आहोत. भूमीहीन आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न आहे. ते कसत असलेल्या जमिनींचा ताबा वनखात्याने मागितला आहे आणि आदिवासी अतिक्रमण करणारे ठरले आहेत. त्याविरोधात एक संघर्ष झाला. त्यातून २००६ मध्ये वन हक्क कायदा झाला आणि या जमिनी आदिवासींच्या नावे करा असा आदेश आला. त्याची लढाई अजून सुरू आहे. जमिनीच्या प्रश्नाची मांडणी आम्ही प्रबोधनाच्या पातळीवर कशी करतो? माकप किंवा अन्य पक्ष आंदोलनं हातात घेतात पण जमिनीचा इतिहास मांडत नाहीत. या जमिनीचं आणि आपलं नात काय आहे हे काही मांडत नाहीत. हे आम्ही जोडून घेतलं आहे. या भागात कंचारा माता, यहांमुदी, निऋती या मातृदेवता आहेत. देवमोगऱ्याला यहांमुदी मातेची पूजा करतात. ती धान्याच्या कणगीमध्ये उभी असते. तिची पूजा करताना आपल्या शेतात उगवलेलं धान्य तिच्या कणगीत टाकायचं आणि तिच्या कणगीतलं धान्य आपल्या टोपलीत आणून ते धान्य पहिल्या पावसाला पेरायचं, अशी पद्धत आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, शेती करायला या स्त्रियांनी शिकवलं म्हणून आम्ही त्यांना देवी मानलं आहे, त्यांना श्रेष्ठ स्थान दिलं आहे. जमीन कसायला शिकवणाऱ्या या देवता आहेत; ही अंधश्रद्धा नाही तर शेती करण्याची प्रेरणा आहे. आम्ही लढा उभारत असताना हा इतिहास लोकांना सांगतो. मग आपण अतिक्रमणदार आहोत असं या शेतकऱ्यांना वाटत नाही. लढण्याची, शेतीची उर्मी आपल्याकडे इतिहासकाळापासून आहे, हे प्रबोधन आम्ही केलंय, करतो आहोत.

आमच्या भागात बजरंग दलासारख्या हिंदुत्त्ववादी संघटना आहेत. त्यांनी गुजराथमधल्या नंदूरबारच्या शेजारी भागात शबरीकुंभमेळा करायला सुरुवात केली. हिंदू धर्मशास्त्रानुसार चारच कुंभमेळे असतात. यांनी मात्र सुबीर नावाचं गाव शबरीचं आहे, तिथे तिने रामाला उष्टी बोरं दिली असं खोटं सांगत तिथे आदिवासींना शबरीचे वारसदार म्हणण्याचा, त्यांचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आम्ही त्याला विरोध केला आहे. शबरी ही आश्रित, दास्य मानसिकतेचे प्रतीक आहे. त्यांनी बनवलेल्या देवळात राम वर बसलाय आणि शबरी पायाशी आहे. या सत्तासंबंधांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कुंभमेळे सुरू केले जात आहेत. आमचा याला विरोध आहे. त्याला विरोध म्हणून आम्ही मातृदेवता उत्सव भरवला. जसं २५ डिसेंबरला भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा केला, तसंच जमिनीच्या हक्काची लढाई लढताना भारतीय शेतीचा इतिहास सांगितला. संस्कृतीतल्या शोषणाच्या इतिहासाला विरोध करत आम्ही प्रबोधन करत आहोत.

प्रबोधनाचं महत्त्व कमी होणं म्हणजे चंगळवादी संस्कृतीकडे समाजाची वाटचाल होणं. सुसंस्कृत समाज हवा असेल तर प्रबोधन गतिमान राहिलं पाहिजे.

शब्दांकन - मेघना भुस्कुटे, ३_१४ विक्षिप्त अदिती

विशेषांक प्रकार

अनुप ढेरे Thu, 16/10/2014 - 09:29

मूलनिवासी नायकमधला लेख चुकुन इथे आलेला वाटला. बरीच जनरलायझेशन्स केलेली वाटली. बनीया लोक केवळ फसवणूक करतात वगैरे. पूर्ण लेख न वाचता प्रतिक्रिया वाचत असाल तर लेख वाचला नाहीत तरी चालेल. काहीही मिस करणार नाही तुम्ही.
अवांतरः स्त्रीयांचे प्रश्न वेगळया जातीत वेगळे होते असा वाद अरूण जोशींनी कधीतरी घातलेला आठवतो. त्यांना अनेक ऋण श्रेण्या मिळालेल्या तेही आठवतं.

रमताराम Thu, 16/10/2014 - 12:56

In reply to by अनुप ढेरे

बाप रे. प्रतिवादाला सुरुवात कुठून करावी अशा विचारानेच हतबुद्ध होऊन गेलोय. इतकी बेधडक विधाने आणि खिचडीसारखे सारेच विषय कोंबून बसवण्याच्या प्रयत्नात 'एक धड ना भाराभर चिंध्या' अशी स्थिती झालेली दिसते आहे.

पुन्हा पुन्हा सांगतोय 'ब्राह्मणी' अशा उल्लेखाचा नि मला लेख न आवडल्याचा अजिबात संबंध नाही. :p

बॅटमॅन Thu, 16/10/2014 - 13:06

In reply to by रमताराम

चला, आमच्यागत अजूनही लोक आहेत तर इथे. आनंद वाटला. नायतर कानफाटीकरणामुळे प्रतिसाद फाट्यावर मारल्या जाण्याची भीती होती ती आता राहिली नाही.

रुची Thu, 16/10/2014 - 20:57

In reply to by रमताराम

लेख झेपला नाही आणि प्रतिवाद करायचा तर कोठून सुरवात करायची तेच कळेना (कारण आम्ही ब्राम्हणी विचारसरणीचे असणार...आमचाच दोष!). दोन शंका,
१) लेखाचे संपादन केले गेले नाहीय काय?
२) भारतात जे काही सनातनी, चंगळवादी आहे ते सगळे ब्राम्हणी विचार आणि जे काही पुरोगामी, समाजवादी आहे ते अब्राम्हणी अशी व्याख्या आहे काय? (नसावी बहुतेक.. कारण पुरोगामी विचारही ब्राम्हणीच असू शकतात असे वरती म्हटल्यासारखे वाटतेय.) :~

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/10/2014 - 21:18

In reply to by रुची

पुरोगामी विचारही ब्राम्हणीच असू शकतात असे वरती म्हटल्यासारखे वाटतेय.

सुधारक आणि पुरोगामी या शब्दांमध्ये गोंधळ झालाय का?

मूठभर ब्राह्मण पुरुषांची सत्ता असावी हा विचार मान्य करणारे ते ब्राह्मणी विचारधारेतले; त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था ब्राह्मणी आणि आणि मूठभर पुरुषांनाच सगळं काय ते महत्त्व देण्याची गरज नाही असं मानणारे अब्राह्मणी विचारधारेतले असा अर्थ मी लावला.
(खरंतर ब्राह्मण, अब्राह्मण या शब्दांचे पारंपरिक अर्थ, आधुनिक अर्थ यात माझा बराच गोंधळ होतो. त्यापेक्षा क्ष आणि य अशी नावं देऊन विचार करणं मला सोयीचं जातं. पण त्यावरही बोटचेपेपणाचा आरोप होऊ शकतो, याची जाणीव आहे.)

'न'वी बाजू Fri, 17/10/2014 - 07:50

In reply to by रुची

(कारण आम्ही ब्राम्हणी विचारसरणीचे असणार...आमचाच दोष!).

किंवा, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, "कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?"

मिहिर Thu, 16/10/2014 - 21:25

In reply to by अनुप ढेरे

स्त्रीदास्य आणि पुरुषसत्ता यांचं समर्थन करणारा विचार ब्राह्मणी म्हणून ओळखला जातो.

असो. सुधारकांची अशी 'ओळख' करून दिल्याबद्दल आभार. ह्यासंदर्भातलाच शहराजाद ह्यांनी मागे दिलेला हा प्रतिसाद आठवला.
बाकी हा लेख म्हणजे मुलाखतीचे शब्दांकन आहे, की भाषणाचे शब्दांकन आहे की आणखी काय तेही कळले नाही.

अरविंद कोल्हटकर Thu, 16/10/2014 - 18:34

आमच्या भागात बजरंग दलासारख्या हिंदुत्त्ववादी संघटना आहेत. त्यांनी गुजराथमधल्या नंदूरबारच्या शेजारी भागात शबरीकुंभमेळा करायला सुरुवात केली. .....>

ह्या 'शबरीधाम' ऐसीमध्ये दोन-सवादोन वर्षांपूर्वी आधीच लिखाण झालेले आहे. अतिशय मनोरंजक असे हे लेखन वाचावयाचे असेल तर 'शबरीधाम' ह्या जुन्या धाग्यावर ह्या प्रतिसादापासून पुढे वाचन करावे.

(येथील minor mystery अशी की मूळ धागा आणि त्यातील चित्रे - मंदिर, पंपा सरोवर, ज्या दगडांच्यावर बसून शबरीने बोरे दिली आणि रामलक्ष्मणांनी ती खाल्ली ते दगड इत्यादि - आता गायब झाली आहेत. सर्व चर्चा मात्र टिकून आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/10/2014 - 19:50

In reply to by अरविंद कोल्हटकर

स्वामी असीमानंद यांच्या मुलाखतीमध्येही शबरीधामाचा उल्लेख येतो. ही ती मुलाखत.
प्रा. परदेशी यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने आणखी एक लेख आठवला. How to Colonize Your Own Country

मन Fri, 17/10/2014 - 09:49

In reply to by अरविंद कोल्हटकर

:)
तो लेख अगदिच हुच्च होता राव.
झालच तर अवकाशताण वगैरेही वेगळ्या दिशेचे ; पण त्याच थोरवीचे लेख आहेत.

वामा१००-वाचनमा… Thu, 16/10/2014 - 21:07

आधी प्रतिक्रिया वाचल्या मग तरीही अतिशय न्युट्रल (उदासीन) दृष्टीकोनातून लेख समजावून घ्यायचा प्रयत्न केला. पूर्ण मोकळ्या मनाने वाचत गेले अन

...... ट्रा ला ला ला.....

स्त्रीदास्य आणि पुरुषसत्ता यांचं समर्थन करणारा विचार ब्राह्मणी म्हणून ओळखला जातो. जाती, वर्ग, स्त्रीदास्य यांचा अंत करते ती विचारधारा अब्राह्मणी म्हणून ओळखली जाते.

या वाक्याने झटका लागला अन नंतरचं कळलच नाही. अन हा शॉक फक्त ब्राह्म्ण या नावाने लागला नसून, हे विधान कोणाच त्याला आधार काय, इतक्या धाडसी विधानामागे व्यवस्थित विवेचन नसल्याने लागला. बाकी ब्राहमण पुरोगामी की अब्राह्मण वगैरेने मला व्यक्तीशः काहीही फरक पडत नाही.
________
लेख कळलाही नाही अन इतका ठासून भरला आहे की झेपला नाही. पण जाम बोअर झालाय .... मला तरी. अन्य विद्वज्जनांचे विचार ऐकण्यास उत्सुक.

मी Thu, 16/10/2014 - 23:09

"भारतीय भांडवलशाही आणि भारतीय स्त्री"च्या पहिल्या परिच्छेदापर्यंत लेख आवडला, लय जमली होती, पण पुढे एकदम स्त्रियांवरचा फोकस जाऊन इतर विचार लेखात आल्यावर ती लय मोडली.

स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करायचे असल्यास स्त्रिया ह्या दुय्यम आहेत हे ब्राह्मणी विचार सोडून दिल्याशिवाय गत्यंतर नाही हे म्हणायचे असावे बहुदा, हा गोंधळ ह्या लेखापुरता झाला असावा असे वाटते.

अंतराआनंद Fri, 17/10/2014 - 00:37

लेख विस्कळीत वाटतोय. एक विचार समजून घ्यावा तोपर्यंत दुसर्^या परिच्छेदात दुसरा विचार पुढ्यात हजर. कदाचित हा स्वतंत्र लेख नसून शब्दांकन आहे म्हणून असावे.
लेखाचे शिर्षक आणि लेख यांचाही संबंध कळला नाही. अब्राम्हणी द्र्ष्टीकोन असलेलं प्रबोधन असं म्हणायचं असावं. लेखातले कितीतरी मुद्दे पटण्यासारखे आहेत. ते सोडून प्रतिक्रियांमध्ये उगाचच लेखाला झोडपलं आहे . त्यामुळे

सोशल मिडियाचा वापर करणार्‍यांत माहिती देणाऱ्यांचंच वर्चस्व आहे. दलित, बहुजन लोकांना स्वतःचा दृष्टिकोन या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी स्थिती भारतात अजून आलेली नाही.

हे परदेशीबाईंच म्हणणं नकळतपणे अधोरेखीत होतय याची मजा वाटली.

जागतिकीकरणानंतर लोक खूप श्रीमंत झाले नाहीत. फक्त ज्या वर्गाला काही थोडेफार फायदे झाले, त्या वर्गाचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम भारतीय राजकारणी, उद्योजक आणि बुद्धिजीवी वर्गाने केलं. विचारांमध्ये प्रगल्भता न आल्यामुळे फक्त पैसा येऊन भणंगीकरण (lumpenisation) तेवढं झालं. लोक खूप वस्तू खरेदी करतात, पण सुसंस्कृत बनत नाहीत. ते तसे बनू नयेत, म्हणून यंत्रणा, राज्यकर्ता, नोकरशाही आणि भांडवलशाही एकत्र येऊनच हे भणंगीकरण करतात. त्यामुळे पैशानं प्रश्न मिटण्याऐवजी उलट गुंतागुंतीचे होतात.

हे आवडलं, पटलं.

अंतराआनंद Fri, 17/10/2014 - 19:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वारी !! दोष म्हणतं नाहीये. शब्दांकनाच्या प्रोसेसमध्ये असं होतं एवढचं . तुम्ही स्वत:चा वेळ, पैसा, मेहेनत खर्च करून ही मेजवानी वेळेवर देत आहात . ’घाईगडबडीत करायचं नाही’ असं म्हणाला असतात तर दिवाळीचा अंक होळीपर्यंतही वाचायला मिळाला नसता.

ॲमी Fri, 17/10/2014 - 03:55

In reply to by अंतराआनंद

सहमत आहे.
खासकरून 'लेखातले कितीतरी मुद्दे पटण्यासारखे
आहेत. ते सोडून प्रतिक्रियांमध्ये उगाचच लेखाला झोडपलं आहे . त्यामुळे ... हे परदेशीबाईंच म्हणणं नकळतपणे अधोरेखीत होतय याची मजा वाटली.' याच्याशी :-)

राजेश घासकडवी Fri, 17/10/2014 - 05:42

लेखातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ ब्राह्मणी आणि अब्राह्मणी मांडणीतला फरक. मला खरंतर अशा चार्ज्ड शब्दांऐवजी व्यवस्थांतर्गत आणि व्यापक असे शब्द आवडले असते. उदाहरणार्थ, पिंजऱ्यात बांधलेल्या पक्ष्याला गळ्यातली साखळी जाचते म्हणून जरा मोठ्या गळ्याची, बिनखिळ्यांची, कदाचित मखमल लावलेली साखळी लावायची हा व्यवस्थांतर्गत बदल झाला. तर त्या पक्ष्याला पंख आहेत, उडण्याची इच्छा आहे आणि पिंजरा आहे म्हणून उडता येत नाही - तेव्हा पिंजरा तोडला पाहिजे ही मांडणी व्यवस्थाबदलाची आहे. हे अर्थातच पटण्यासारखं आहे.

मात्र 'स्त्रीला मानव म्हणून मानलं पाहिजे' आणि 'व्यवस्था स्त्रीला पुरुषांपेक्षा वेगळं, अधिक वाईट वागवते' या दोनमध्ये तफावत काय आहे हे कळलं नाही. 'व्यवस्थेने स्त्रीला मानवापेक्षा हीन वागणूक दिलेली आहे' ही दोन्हींचा समन्वय साधणारी मांडणी आहे.

लेखात अनेक विधानं तपासून बघण्यासारखी आहेत.

स्त्रियांना दुय्यम स्थानी ठेवण्यासाठी जी व्यवस्था वापरली गेली, ज्या व्यवस्थे स्त्रीकडून सातत्याने पुनरुत्पादन करवून घेतलं गेलं, त्यात हिंसा ग्राह्य मानलेली आहे. उदाहरणार्थ, स्त्रियांना घरात बंदिवान ठेवा. यातून नियंत्रण येतं. तिच्या शरीरावर, मनावर, लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असं ही पुरुषसत्ता मानते.

पण मग गेल्या सहा दशकांमध्ये फर्टिलिटी रेट साडेसहा वरून सव्वादोनवर आला आहे याचा अर्थ काय? जातीव्यवस्था आणि पुरुषप्रधान मानसिकता अचानक कोलमडली का? या काळात भांडवलशाहीचा तर प्रसारच झालेला दिसतो. त्यामुळे तिलाही स्त्रीच्या शोषणासाठी जबाबदार धरता येत नाही. स्त्रियांचं शिक्षण घेण्याचं प्रमाण गेल्या साठ-सत्तर वर्षांत प्रचंड प्रमाणावर वाढलं. स्वातंत्र्यापूर्वी स्त्रियांमध्ये सुमारे २ ते ५ टक्के साक्षरता होती. आजच्या विशीखालच्या मुली ९०% साक्षर आहेत. साक्षरतेचं सोडा, आज जन्मणाऱ्या मुलींपैकी सुमारे २५% ते ४०% मुली बॅचलर्सपर्यंत पोचतील आणि त्यांना शिक्षणाच्या जोरावर आपल्या पायावर उभं राहता येईल अशी परिस्थिती आहे. या सगळ्या क्रांतीतून आपण जातो आहोत पण लेखिकेने याची काही दखलच घेतलेली दिसत नाही. या सुधारणांमागचे मुख्य घटक काय, आणि ते घटक कसे वाढवता येतील याबाबत ब्राह्मणी आणि अब्राह्मणी मांडणीत नक्की काय फरक आहेत? ब्राह्मणी मांडणीत 'मुलींना शिकवा' म्हणतात का? हो. अब्राह्मणी मांडणीत म्हणतात का? हो.

अब्राह्मणी मांडणीतली 'पुरुषप्रधानता, जातिव्यवस्था, आणि भांडवलशाही' हे शत्रू आहेत म्हणण्यापेक्षा शिक्षणाचा अभाव आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या शक्तीचा अभाव ही अधिक मूलभूत कारणं आहेत. यांचं मोजमाप करण्याऐवजी लोकं नुसत्याच मांडण्या करतात तेव्हा या सगळ्यांत काय अर्थ आहे हे मला कळत नाही.

सविता Fri, 17/10/2014 - 23:18

लेख विस्कळित वाटला.

एकूणच "ब्राम्हण" ह्या लेबल खाली सगळ्या वाईट गोष्टी ठेवणे आणि मग आम्ही जात या अर्थाने म्हणत नाही अशी मखलाशी करत ब्राह्मण या शब्दाला, तो स्वत:शी जोडणार्या सर्वांना यथेच्छ झोडपायची खाज भागवायची हे जुनी युक्ती झालीये!

मला तर हल्ली स्त्री मुक्ती या विषयाचाच कंटाळा यायला लागलाय, लोक एकतर या टोकाचे बोलतात नाहीतर त्या!

वामा१००-वाचनमा… Fri, 17/10/2014 - 23:35

In reply to by सविता

:) "आनंदी गोपाळ" पहीली स्त्री डॉक्टर होती ना मग ब्राह्मण वर्णच स्त्री दास्याचा समर्थक कसा? बरं या लिखाणातील वाद फक्त महाराष्ट्रापुरता आहे की दक्षिण-उत्तर बाजूही लक्षात घेतली आहे?
_____
परत फुल्यांना शाळा चालवायला एका ब्राह्मण व्यक्तीनेच वाडा दिला होता असे ऐकले आहे. गुगल करता संदर्भ सापडला नाही. त्यामुळे लिहीले नव्हते. आपला काही अभ्यास नाही -अभ्यास नाही म्हणून गप्प बसते झालं.
____
लेखातील दुव्यावर जाऊन वाचलं असता एक कळलं ते हे की "कसबा पेठेत" लेखिकेच्या आईला ब्राह्मण लोक पाणी भरु देत नसत म्हणजे शेवटी भरायला लावत. अशा कटू आठवणींखेरीज काही ब्राह्मण समाजाच्याच चांगल्या आठवणी आहेत का, असल्यास त्याचा उल्लेख का नाही?
_____
जसं "भक्ती" ही काही लोकांची गरज असते, तशी एखादी "पंचिंग बॅग" शोधून ठोसे लगावत रहाण्याची काही मस्तवाल लोकांची गरज असते ही "पंचींग बॅग" ब्राह्मण वर्णाला केलं जातं,हा अनुभव आहे. - लेखिकेला उद्देश्यून हे विधान नाही. एक जनरल नीरीक्षण आहे.

बॅटमॅन Fri, 17/10/2014 - 23:46

In reply to by वामा१००-वाचनमा…

जसं "भक्ती" ही काही लोकांची गरज असते, तशी एखादी "पंचिंग बॅग" शोधून ठोसे लगावत रहाण्याची काही मस्तवाल लोकांची गरज असते ही "पंचींग बॅग" ब्राह्मण वर्णाला केलं जातं,हा अनुभव आहे. -

होय, आणि याविरुद्ध काही बोलणे हे महापापही समजलं जातं. त्यामुळे त्या सर्व सेल्फ रायचस लोकांना फाट्यावर कोलणे हा एकमेव उपाय शिल्लक राहतो.

वामा१००-वाचनमा… Sat, 18/10/2014 - 00:06

In reply to by बॅटमॅन

बॅट्मॅन बोललं जात नाही म्हणून फावतं. बोललच पाहीजे. चीड आहे मलाही या सगळ्याची. तुला बक्षीस मिळालं कारण आई ब्राह्मण हे ऐकलय मीही लहानपणी. कोकणस्थांचे नीळे डोळे न गोरा वर्ण ब्रिटीशर्सडून आले - असली मूर्खगमनी वाक्य ऐकलीयेत. अवांतराबद्दल सॉरी. आता तयार व्हावं म्हणते कोणाच्यातरी अभ्यासपूर्ण थिअरम सिद्धीकरता की खरच ते वाक्य कसं बरोब्बर आहे.
_____
अर्थात हे झाले अपवाद, सर्व जातीच्या मैत्रिणींच्या अनेक प्रेमळ आयांनी अनन्वित प्रेमही दिलय. म्हणूनच मी वरती विचारलय फक्त कटू आठवणी आहेत की चांगल्याही. हॅव्ह सम पर्स्पेक्टीव्ह!!!! प्लीज हॅव्ह पर्स्पेक्टीव्ह.
त्या आयांनी, दिलेलं ते प्रेम आठवलं, माणुसकी अन लाड आठवले की पुढील कविता आठवते (अवांतर आहे म्हणून पांढर्‍या फॉन्टमध्ये लिहीली आहे)
जाऊ देत, जात्पात आली की जाम रक्त उकळतं पण हा प्लॅट्फॉर्म थोडीच आहे ते व्यक्त करायला. माझे अनुभव माझ्यापाशी :)
-

किसने बचाया मेरी आत्मा को
किसने बचाया मेरी आत्मा को दो कौड़ी की मोमबत्तियों की रोशनी ने
दो-चार उबले हुए आलू ने बचाया
सूखे पत्तों की आगऔर मिट्टी के बर्तनों ने बचाया
पुआल के बिस्तर ने और
पुआल के रंग के चाँद नेनुक्कड़ नाटक के आवारा जैसे छोकरे
चिथड़े पहनेसच के गौरव जैसा कंठ-स्वरकड़ा मुक़ाबला करते
मोड़-मोड़ परदंगाइयों को खदेड़ते
वीर बाँकें हिन्दुस्तानियों से सीखा रंगमंचभीगे वस्त्र-सा विकल अभिनय
दादी के लिए रोटी पकाने का चिमटा लेकर
ईदगाह के मेले से लौट रहे नन्हे हामिद ने
और छह दिसम्बर के बादफ़रवरी
आते-आतेजंगली बेर नेइन सबने बचाया मेरी आत्मा को।

अनुप ढेरे Sat, 18/10/2014 - 03:59

In reply to by वामा१००-वाचनमा…

"पंचिंग बॅग" शोधून ठोसे लगावत रहाण्याची काही मस्तवाल लोकांची गरज असते

अगदी!! पूर्ण सहमत. ही पंचींग बॅग कधी पुणेकर असतात, कधी पुरुष असतात, कधी मुसलमान असतात, कधी तथाकथित उच्चजातीय असतात.

बॅटमॅन Tue, 21/10/2014 - 21:47

In reply to by मन

ऐसीकरांना कुठली पंचिंग ब्याग रिअलिस्टिक वाटते त्याचा अंदाज वरील प्रतिसादास मिळणार्‍या श्रेण्यांवरून येतोच आहे.

अन्य ब्यागा बहुधा मंगळावरच्या असाव्यात.असो.

प्रकाश घाटपांडे Wed, 22/10/2014 - 11:31

In reply to by वामा१००-वाचनमा…

जसं "भक्ती" ही काही लोकांची गरज असते, तशी एखादी "पंचिंग बॅग" शोधून ठोसे लगावत रहाण्याची काही मस्तवाल लोकांची गरज असते

होय. तो त्यांच्या जगण्याचा आधार असतो.उन्माद व्यकत करण्यासाठीही असे पंच लागतात. आणि मस्तवालच कशाला परिस्थिती ने गांजलेले असहाय्य लोक आपला राग असहाय्यता वैफल्य कशावर तरी काढतात. व्यवस्थेला शिव्या घालत स्वत:शीच बडबडतात.

सलील Sun, 26/10/2014 - 23:04

In reply to by प्रकाश घाटपांडे

मग हि पण एक अंधश्रद्धा नव्हे का? कारण जसे देव आहे हा एक विश्वास आहे तसाच सगळे सगळे विद्यानालाच माहिती आहे हा विश्वास आहे. फक्त तो मान्य करण्याची तयारी नाहीये

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 05:34

प्रतिक्रियांमध्ये ब्राह्मणी या शब्दावर बराच आणि इतरही काही आक्षेप घेतल्याचं दिसतं.

मिहिर यांनी वर शहराजाद यांच्या एका प्रतिसादाचा दाखला दिलेला आहे. एकेकाळी ब्राह्मण इतर जातीतल्या लोकांना कमी समजत, तो काळ सरता-सरता घाणेरड्या, मळलेल्या गोष्टींना, लोकांना विशेषण म्हणून महार जातीचं नाव जोडून देण्याची प्रथा ब्राह्मणांमध्ये होती आणि ती आता जरा कमी होत आहे असं वाटतं. ही कथा शिकलेल्या, पुढारलेल्या (किंवा स्वतःला तसं समजणाऱ्या) जातीची.

याच चष्म्यातून दुसऱ्या बाजूने पाहता, अन्यायकारक ते सगळं ब्राह्मणी, जन्माधिष्ठीत उतरंड लावणारं ते सगळं ब्राह्मणी अशी संगती ब्राह्मणेतरांनी लावली तर त्याबद्दल एवढी राळ उडावी, ती सुद्धा शिकलेल्या, समजूतदार समजल्या गेलेल्या लोकांकडून, याबद्दल आश्चर्य वाटतं. ज्यांच्यावर अन्याय झाला नव्हता त्यांनी आधुनिक/इंग्रजी शिक्षणाला सुरूवात केल्यानंतरही काही पिढ्या इतर जातीच्या लोकांना कमी लेखलं. मग ज्यांच्यावर पिढ्यान्-पिढ्या अन्याय झाला होता, अजूनही खैरलांजी, नितीन आगे अशी प्रकरणं होतातच, आणि अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत (उदा - एक लेख इथे वाचता येईल;) त्यांनी काहीबाही नावं ठेवली तर ते समजून घेण्याची पत शिक्षण, आर्थिक परिस्थिती, सुखी-समाधानी आयुष्य यांतून येऊ शकत नाही का?

"ब्राह्मणांवर राग नाही, ब्राह्मण्यावर आहे," असं मोघम न बोलता, ब्राह्मण्य म्हणजे काय आणि नक्की कशावर राग आहे हे सांगितल्यावरही तपशील न पाहता फक्त शब्द पाहून कीस काढणं आणखी दुःखद आहे. 'ब्राह्मणी' या शब्दावर आक्षेप घेणाऱ्या किती लोकांना स्त्रीदास्य आणि पुरुषसत्ता यांचं समर्थन, जातीभेद, मूठभर ब्राह्मण पुरुषांच्या हातात व्यवस्थेच्या सगळ्या किल्ल्या असणं मंजूर आहे?

यांचं मोजमाप करण्याऐवजी लोकं नुसत्याच मांडण्या करतात तेव्हा या सगळ्यांत काय अर्थ आहे

मोजमाप करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्याशी बोलण्यापासून 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकावर काम करणाऱ्यांना कोणीही थांबवलेलं नव्हतं.
कदाचित अशी मोजमापं करणारे कोणी सध्या नसतीलही. पण अशी मोजमापं म्हणजे नक्की काय मोजमापं करायची?
आणि कोणालातरी काहीतरी मोजमापं महत्त्वाची वाटतात म्हणून सिद्धांत मांडणाऱ्यांनी (= theoretical आणि प्रत्यक्ष field work प्रकारची कामं करणाऱ्यांनी) आपली आवड, कल, समोरची परिस्थिती बघून महत्त्वाचे वाटणाऱ्या गोष्टी (धुळे, नंदूरबार भागात काय काम चालतं याची माहिती इथेच आहे.) हे सगळं सोडून मोजमापं करायचं का? याचं उत्तर हो असेल तर, 'इथे येऊन प्रतिसाद आणि लेख कशाला टंकता, मोजमापं करा आधी', असं का म्हणू नये?

मला तर हल्ली स्त्री मुक्ती या विषयाचाच कंटाळा यायला लागलाय, लोक एकतर या टोकाचे बोलतात नाहीतर त्या!

प्रा. परदेशी ज्या भागांत काम करतात तिथल्या स्त्रिया, एकूणच तिथला समाज हा सुखासीन, इंटरनेटधारक, मध्यमवर्गीय, निर्यातप्रधान इंडस्ट्रीमध्ये काम करणारा आणि टोकाचं दारिद्र्य, अडचणी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरं न जाणारा आहे का? देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात स्त्रियांना सार्वजनिक स्वच्छतागृहं मिळावीत म्हणून तीन वर्षांच्यावर आंदोलन चालवावं लागतं, तिथे एखादी मुमताज 'टोकाची'च कृती करण्याचा निर्णय घेते आणि या निर्णयाला तिच्या सोबत आंदोलन करणाऱ्या स्त्रिया पाठिंबा देतात. लोकांनी या कृतीलाही टोकाचीच कृती म्हटलं होतं. पण या टोकाच्या कृतीच्या धमकीमुळे त्यांना आयुक्तांची भेट मिळाली; 'आरटीपी' आंदोलन पुढे सरकलं आहे.

आपल्या सुखाच्या आयुष्यात टोकाला जाण्याची गरज नाही, आपण मुक्त स्त्री आहोत म्हणून आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया मुक्त आहेत का, त्यांच्याकडे निदान काही प्रमाणात तरी आर्थिक सत्ता आहे का? प्रा. परदेशी यांच्या कार्य-विचारांमागची पार्श्वभूमी भूमीहीन आदिवासी लोकांची आहे; त्यांच्या गावांमध्ये धड रस्ते नसतात, आणि या लोकांनी टोकाला जायचं नाही! संवेदनाहीनतेचं, गिरीश कुबेर म्हणतात* त्या 'त्रिशंकूंच्या पैदाशी'चं उदाहरण वेगळं का शोधायला जावं?

(*या मुलाखतीचं शब्दांकन काही दिवसांत प्रकाशित होईल.)

नितिन थत्ते Sat, 18/10/2014 - 07:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्राह्मणांवर राग नाही, ब्राह्मण्यावर आहे," असं मोघम न बोलता, ब्राह्मण्य म्हणजे काय आणि नक्की कशावर राग आहे हे सांगितल्यावरही तपशील न पाहता फक्त शब्द पाहून कीस काढणं आणखी दुःखद आहे.

हे वाचून मग लेख पुन्हा वाचला. तरीही पुन्हा तसंच वाटलं.

१. तसं असेल तर राजेश घासकडवी म्हणतात तसे वेगळे शब्द न वापरता मुद्दाम "ब्राह्मणी" वगैरे शब्द का वापरायचे?

२. ओव्हरऑल लेखात 'ब्राह्मण' असलेल्या सुधारकांना सरसकट डिसक्रेडिट केलेले आहे. ब्राह्मणांविषयी आकस नसेल तर असे का? आगरकरांची एक्झॅक्ट मांडणी ठाऊक नाही पण ज्योती म्हापसेकर, मीना देवल, शारदा साठे यांची मांडणी परंपराग्रस्त होती असे म्हणणे धाडसाचे आहे. त्यांनी नक्कीच व्यवस्था बदलण्याची मांडणी केलेली होती. नव्वदीच्या दशकातच त्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या प्रश्नाच्या पुढे गेलेल्या आहेत. स्त्रीमुक्ती संघटनेचे कार्य आज (आणि गेली वीसेक वर्षे) मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांमधून चालू आहे. त्याला 'पैसे मिळवून देणार्‍या' एनजीओ म्हणून निकालात काढणे पटत नाही. स्त्रीमुक्ती संघटना आणि राष्ट्रसेविका समिती एकच आहेत अशा स्वरूपाची विधाने कशी स्वीकारणार?

ब्राह्मणी व्यवस्थेला झोडायला माझी ना नाही. त्या व्यवस्थेची भलामण करणार्‍यांना पाहिजे तेवढे ठोका. पण त्या व्यवस्थेच्या विरोधात कार्य करणार्‍या ब्राह्मण/उच्चवर्गीयांना निकालात काढणे पटत नाहीच. मी एरवी ब्राह्मण श्रेष्ठत्वाला पुरस्कारणार्‍या मतांच्या विरोधी असलो (किंवा ब्राह्मणांवर अन्याय होतोय या मांडणीच्या विरोधात असलो) तरी या लेखातल्या प्रतिपादनाला टू मच वास येतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 07:53

In reply to by नितिन थत्ते

१. तसं असेल तर राजेश घासकडवी म्हणतात तसे वेगळे शब्द न वापरता मुद्दाम "ब्राह्मणी" वगैरे शब्द का वापरायचे?

(माझ्या आकलनानुसार) मुळाशी जाणारं कारण - जातीसंस्था, पुरुषसत्ता यातून फक्त ठराविक ब्राह्मण पुरुषांचाच फायदा होत होता. बाकी सगळेच नाडले जात होते, ब्राह्मण स्त्रियासुद्धा. मग ज्यांचा फायदा होतो, जे लोक ती व्यवस्था टिकवण्याचा आग्रह (काही प्रमाणात आजही) धरताना दिसतात त्यांचं नाव विचारधारेला देणं (पी.सी. नसेल कदाचित) पण सरसकट चूक कसं म्हणायचं?

ब्राह्मणांच्या घरात नाही का "अगं महारणी आधी पाय धुवून ये" म्हणायची पद्धत होती; त्याचं अनुकरण करणं (पारंपरिक/ब्राह्मणी किंवा अपारंपरिक/अब्राह्मणी) विचारसरणीत फारतर "ब्राह्मणी" म्हणता येईल. नंदा खरे ज्या "पेशवाई"चा उल्लेख करतात, तसंच हे ब्राह्मणी.

एकदा जन्मजात नाकारली आणि जुन्या शब्दाला नवा अर्थ दिला की मग जन्मजात ब्राह्मणीपणाची मातब्बरी कसली?

२. ओव्हरऑल लेखात 'ब्राह्मण' असलेल्या सुधारकांना सरसकट डिसक्रेडिट केलेले आहे. ब्राह्मणांविषयी आकस नसेल तर असे का?

उदाहरणार्थ लेखातली काही विधानं -
१. केशवपन, विधवा-पुनर्विवाह अशा स्वरूपाच्या कौटुंबिक सुधारणा मनावर घेणारे काही सुधारक होते. उदा. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर.
२. १९७५ च्या दशकात उभ्या राहिलेल्या स्त्रीवादी संघटनांच्या नेतृत्वाने ... मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न पुढे आणले; कौटुंबिक हिंसेला केंद्रस्थान दिलं - हे महत्त्वाचं होतंच.
३. ही सुधारकी मांडणी पूर्णपणे टाकाऊ आहे असं नाही, पण त्यात उणिवा मात्र होत्या अशी भूमिका अब्राह्मणी स्त्रीवाद घेतो.
४. आगरकर, न्या. रानडे हे उदारमतवादी असले तरी त्यांना ब्राह्मणवादाची मर्यादा होती.

याचा मला लागलेला अर्थ - ब्राह्मणी विचारधारा स्वीकारलेले सुधारक आणि १९७५ च्या पुढचं स्त्रीवादी नेतृत्व, संघटनांनी स्त्रियांवर झालेल्या अन्यायाचा अभ्यास करताना ब्राह्मणी जातीसंस्था या मूळ कारणाचा विचार केला नाही. (कदाचित पाश्चात्य स्त्रीवाद जसाच्या तसा उचलला असण्याची शक्यता आहे - ही माझी भर.) त्यांनी केलं ते अपुरं होतं असं म्हणण्यात 'सरसकट डिसक्रेडिट' कसं काय केलं जातं हे मला समजलं नाही.

त्याला 'पैसे मिळवून देणार्‍या' एनजीओ म्हणून निकालात काढणे पटत नाही.

संजीव खांडेकरांचा पुनर्मुद्रित केला जाईल तो लेख दोन-चार दिवसांत प्रकाशित होईलच. त्यात त्यांनी या विधानासाठीच बरेच शब्द खर्ची घातले आहेत. (सॉरी, मला किंचित जास्त अॅक्सेस आहे याचा हा गैरफायदा वाटेल. पण तेवढे दिवस हे विधान बाजूला ठेवायला काही हरकत नसावी.)

स्त्रीमुक्ती संघटना आणि राष्ट्रसेविका समिती एकच आहेत अशा स्वरूपाची विधाने कशी स्वीकारणार?

अशा अर्थाचं एकही विधान मला दिसलं नाही. मदत?

. यासाठी समांतर पण कोणतंही लोडेड कनोटेशन (मराठी?) नसणारं उदाहरण सुचतं. माणसांमध्ये पुरुष उंच आणि पिळदार स्नायू असणारे असतात. याचा अर्थ सगळे पुरुष सगळ्या स्त्रियांपेक्षा उंच किंवा पिळदार स्नायू असणारे असतात असं नाही. पण सरासरीमध्ये हे विधान योग्य ठरतं.
. ज्ञान किंवा knowledge म्हटल्यावर आता संभोग आठवतो का?

नितिन थत्ते Sat, 18/10/2014 - 08:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>(माझ्या आकलनानुसार) मुळाशी जाणारं कारण - जातीसंस्था, पुरुषसत्ता यातून फक्त ठराविक ब्राह्मण पुरुषांचाच फायदा होत होता. बाकी सगळेच नाडले जात होते,

हाच एक गैरसमज असावा असे वाटते. जाती संस्था आणि पुरुषसत्ता यातून सर्व (त्या त्या वेळी) सत्ताधारी असलेल्या पुरुषांचा फायदा होत होता. एका विशिष्ठ काळात (जो रिसेंट भूतकाळात आहे) महाराष्ट्रात सत्ता ब्राह्मणाकडे होती म्हणून त्या काळात ब्राह्मण पुरुषांचा मुख्य फायदा झाला. त्या आधीच्या काळात दादोजी कोंडदेवाला व्यवस्थेतून शहाजी पेक्षा (आणि चाणक्याला चंद्रगुप्तापेक्षा, वशिष्ठाला दशरथापेक्षा) जास्त फायदा होत नव्हता. त्या काळीतरी ब्राह्मणांना होणारा फायदा आनुषंगिक होता. पेशवाईची इच्छा करणारे लोक हे केवळ अठराव्या-एकोणीसाव्याशतकाचा* विचार करतात. ते सोडून द्या.

>>१९७५ च्या पुढचं स्त्रीवादी नेतृत्व, संघटनांनी स्त्रियांवर झालेल्या अन्यायाचा अभ्यास करताना ब्राह्मणी जातीसंस्था या मूळ कारणाचा विचार केला नाही.

त्यांनी व्यवस्थेला "ब्राह्मणी" असं लेबल लावलं नाही पण व्यवस्था हीच अन्यायाला कारणीभूत आहे. तसेच कौटुंबिक सत्ता-स्पर्धा हीसुद्धा काही प्रकारच्या अन्यायाला कारणीभूत असते अशीही मांडणी केली. त्यांना ब्राह्मणी व्यवस्था टिकवायचा प्रयत्न करणारे असं लेबल लावणं पटतच नाही.

*परंपरावाद्यांना नजीकच्या भूतकाळातली परिस्थिती हजारो वर्षे आहे असे नेहमी वाटते. त्यांना पोळी, भाजी, भात, वरण, कोशिंबिर, लोणचे, चटणी वगैरे जेवण हजारो वर्षे दररोज घेतले जात आहे असे वाटते. त्या दृष्टीने मग प्रतिमा परदेशींसारख्यांना ब्राह्मण हजारो वर्षे सत्ता उपभोगत होते असं वाटतं ते सुद्धा परंपरावादीच.

असो. ज्ञान ऐकून संभोग आठवत नाही तसा यज्ञ ऐकून पण आठवत नाही. पण ते सगळे डिस्टंट पास्ट आहे. ब्राह्मण/ब्राह्मण्य समकालीन आहे.

अनुप ढेरे Sat, 18/10/2014 - 09:02

In reply to by नितिन थत्ते

एका विशिष्ठ काळात (जो रिसेंट भूतकाळात आहे) महाराष्ट्रात सत्ता ब्राह्मणाकडे होती म्हणून त्या काळात ब्राह्मण पुरुषांचा मुख्य फायदा झाला.

सहमत.
आणि प्रत्येक वाईट गोष्टीला एकाच जातीचं नाव दिल्यामुळे ब्रिगेडी प्रवृत्तींना आयतच खतपाणी मिळतं. म त्यातून एकाच जातीच्या इतिहास संशोधकांना टार्गेट करणे, त्यांना काळे फासणे वगैरे प्रकार सुरू होतात. हेच लॉजिक वापरून काही गोष्टींना एकाच धर्माच नाव देऊन 'तसल्या प्रवृत्ती' असं म्हणणं काही वेगळं नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 09:27

In reply to by अनुप ढेरे

इस्रोचे अध्यक्ष आणि भूमिहीन आदिवासींना एकाच तागडीत तोलून झालं. आता ब्राह्मण या लेबलाची (अपारंपरिक व्याख्या केल्यावरही) त्याचा विरोध करताना ब्रिगेडचं नाव काढण्याबद्दल आश्चर्य वाटू नये. पण खेद जरूर होतो.

"तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर तुम्ही ब्रिगेडी आहात."

अनुप ढेरे Thu, 23/10/2014 - 17:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अपारंपरिक व्याख्या केल्यावरही

ती 'व्याख्या' इथे किती लोकांना समजली ते दिसतं आहेच. बाहेरही सगळ्यांना समजेल असं वाटत नाही.

"तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर तुम्ही ब्रिगेडी आहात."

जॉर्ज बुश सायबांनी हे बाकी मस्तं केलं. प्रत्येक विरोधाला हे असलं लेबल लावलं की आपली बाजू ती सम्यक इतरांची ती आक्रस्ताळी अशी जाहिरात आपोआप होतेच.

असो दिवाळी अंकाची धुळवड होऊ नये म्हणून थांबतो.

बॅटमॅन Fri, 24/10/2014 - 14:16

In reply to by अनुप ढेरे

अहो एकदा लिंबूटिंबूचे नियम एका बाजूला लावायचं ठरलं की असले प्रश्न पडत नाहीत. उगा त्रास का करून घेता?

(कानफाटेश्वर) बॅटमॅन.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 09:19

In reply to by नितिन थत्ते

एका विशिष्ठ काळात (जो रिसेंट भूतकाळात आहे) महाराष्ट्रात सत्ता ब्राह्मणाकडे होती म्हणून त्या काळात ब्राह्मण पुरुषांचा मुख्य फायदा झाला. त्या आधीच्या काळात दादोजी कोंडदेवाला व्यवस्थेतून शहाजी पेक्षा (आणि चाणक्याला चंद्रगुप्तापेक्षा, वशिष्ठाला दशरथापेक्षा) जास्त फायदा होत नव्हता.

त्यात दलित, आदिवासी पुरुष आणि स्त्रिया कुठे होते?

त्यांनी व्यवस्थेला "ब्राह्मणी" असं लेबल लावलं नाही पण व्यवस्था हीच अन्यायाला कारणीभूत आहे. तसेच कौटुंबिक सत्ता-स्पर्धा हीसुद्धा काही प्रकारच्या अन्यायाला कारणीभूत असते अशीही मांडणी केली. त्यांना ब्राह्मणी व्यवस्था टिकवायचा प्रयत्न करणारे असं लेबल लावणं पटतच नाही.

असं त्यांनी म्हटलेलंही मला दिसलं नाही. "ब्राह्मणी" स्त्रीवाद्यांनी जातीव्यवस्था मोडण्यासाठी पुरेसे (किंवा काहीच) प्रयत्न केले नाहीत असा प्रा. परदेशी यांचा आरोप आहे. (ते खरं खोटं ठरवण्याएवढा माझा अभ्यास नाही.) दुसरं, त्यांनी शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यात स्त्रीवाद्यांनी शेतकरी स्त्रियांना पुरेशी मदत केली नाही, आदिवासी स्त्रियांना हिंदू कोड बिल लागू करण्याबद्दल विरोध केला, असे आक्षेप आहेतच.

ब्राह्मण/ब्राह्मण्य समकालीन आहे.

समकालीन असेल तरीही त्यागलेलं असेल तरीही भावना जाग्या होतात/दुखावतात का?

नितिन थत्ते Sat, 18/10/2014 - 09:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>"ब्राह्मणी" स्त्रीवाद्यांनी जातीव्यवस्था मोडण्यासाठी पुरेसे (किंवा काहीच) प्रयत्न केले नाहीत असा प्रा. परदेशी यांचा आरोप आहे.
ब्राह्मणी स्त्रीवादी म्हणजे परदेशी यांच्या मते नक्की कोण हे डोळ्यासमोर येत नाही. जातीव्यवस्था मोडण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत म्हणजे त्यांना जातीव्यवस्था टिकवायची होती असा निष्कर्ष काढणे अन्यायकारक आहे. शेतकरी स्त्रियांच्या लढ्याबाबतच्या स्त्रीवाद्यांच्या भूमिकेविषयी मला कल्पना नाही. त्याचे काही संदर्भ मिळाले तर ते वाचायला आवडतील.

>>(ते खरं खोटं ठरवण्याएवढा माझा अभ्यास नाही.)

दुसर्‍या कुणाचा असू शकतो.

>>त्यात दलित, आदिवासी पुरुष आणि स्त्रिया कुठे होते?

ते कुठल्याच व्यवस्थेत कुठेच नव्हते/ अन्यायग्रस्तच होते. पण जुन्या व्यवस्थेत फक्त काही ब्राह्मण पुरुषांचाच फायदा होत होता या विधानाचा प्रतिवाद म्हणून मी विधान केले होते. फायदा सत्तेवर असलेल्या पुरुषांचा होत होता. ब्राह्मण किंवा कोणीही. ब्राह्मण मुख्य सत्ताधारी असतानासुद्धा त्यावेळी प्रतिष्ठित असलेल्यांनाही फायदे होतेच. सत्तेवर असणारे दलित/आदिवासी यांना नाडत असत. ब्राह्मण सत्तेवर असताना ब्राह्मणांचा अ‍ॅडिशनल फायदा. पण हा काळ फक्त नजीकच्या भूतकाळातला. ती परिस्थिती सनातन शाश्वत नव्हती एवढेच माझे म्हणणे आहे. म्हणून फक्त ब्राह्मण पुरुषांचाच फायदा हे खरे नाही. यासाठी भूतकाळाचे भान आणून दिले.

>> ब्राह्मण/ब्राह्मण्य समकालीन आहे.
समकालीन असेल तरीही त्यागलेलं असेल तरीही भावना जाग्या होतात/दुखावतात का?

भावना जाग्या होत नाहीत. ब्राह्मण इन जण्रल ह**खोर किंवा फुल्याफुल्या असतात असं बिनधास्त म्हणावे. पण ज्यांनी काही पाथब्रेकिंग कार्य केलं आहे ते ब्राह्मणी व्यवस्थेचे पाईक होते (त्यांना ब्राह्मणी व्यवस्था/जातीव्यवस्था टिकवायची होती) असा आरोप होऊ नये. मी जे स्त्रीवादी कार्यकर्ते पाइले आहेत ते तर कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यही होते.

या सगळ्यामध्ये परदेशी यांच्या कार्याला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 10:31

In reply to by नितिन थत्ते

जातीव्यवस्था मोडण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत म्हणजे त्यांना जातीव्यवस्था टिकवायची होती असा निष्कर्ष काढणे अन्यायकारक आहे.

ते आमच्या बरोबर नाहीत म्हणजे ते आमच्या विरोधात आहेत (किंवा ब्रिगेडी आहेत) असा अर्थ का काढावा? त्यांचं आकलन कमी पडलं, किंवा त्यांना गरज नव्हती, किंवा (महर्षी कर्वेंचं उदाहरण आहे तसं) त्यांना त्यांच्या काळात शक्य नव्हतं म्हणून त्यांनी हे केलं नाही असाही अर्थ असू शकतो.

ज्यांनी काही पाथब्रेकिंग कार्य केलं आहे ते ब्राह्मणी व्यवस्थेचे पाईक होते

तु्म्ही जी ब्राह्मणी व्यवस्था म्हणत आहात त्याला प्रा. परदेशी ब्राह्मणी म्हणत नाहीत. ब्राह्मण जातीत जन्माला आलेले म्हणून ब्राह्मणी विचारधारेतले नाहीत ... यापुढे आणखी वेगळ्या पद्धतीने मला खरंच सांगता येत नाही.

'न'वी बाजू Sat, 18/10/2014 - 08:22

In reply to by नितिन थत्ते

बाकी काहीही असो, परंतु पदार्थविज्ञानातल्या आर्यन फिजिक्स-ज्यूइश फिजिक्स द्वैताप्रमाणेच स्त्रीवादातही ब्राह्मणी स्त्रीवाद - अब्राह्मणी स्त्रीवाद द्वैत आहे, हे नव्याने कळले. हा काही थोडका फायदा नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 09:39

In reply to by 'न'वी बाजू

पाश्चात्य स्त्रीवादात अगदी पुरुषांचं लिंग कापून काढावं इथपासून ते स्त्रियांकडे खास काही शक्ती असतात असं म्हणणारे बरेच मतप्रवाह आहेत. त्यामानाने भारतीय स्त्रीवाद विविधतेत (अगदीच बै!) कमीच पडतो.

धनुष Sat, 18/10/2014 - 10:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अरुण कोलटकरांच्या एका कवितेत हि लिंग कापून टाकण्याची प्रतिमा एका स्त्री निवेदेकाकडून येते. कविता: मुंबईनं भिकेस लावलं. संग्रह: अरुण कोलटकरांच्या कविता)

राजन बापट Sat, 18/10/2014 - 11:02

In reply to by धनुष

माझ्या आठवणीप्रमाणे ते "चरित्र" नावाच्या कवितेमधे येतं.

डॉक्टर म्हणाला
इलाज नाही मिस्टर नेने इलाज नाही.
बायको म्हणाली
कापून टाकू का कापून
आंगावर ट्रक घालून म्हणाला
दिखता नहीं मादरचोद दिखता नहीं

(शब्द नेमके नाहीत. पण कवितेचं नाव नक्की "चरित्र". "मुंबईने भिकेला लावलं" नाही. ती निराळी आहे कविता)

धनुष Sat, 18/10/2014 - 11:10

In reply to by राजन बापट

ओहो.बरोब्बर.आभार.

च्यायला, किती हमखास चुकीचे संदर्भ द्यायला लागलोय मी. छे! माझी लाडकी पुस्तकं जवळ नाहीत हल्ली.

मै भाभी को बोला
भाई साब की ड्यूटी पे आ जाऊ क्या?
भडक गई साली.

हे बहुतेक मुम्बैन भिकेस लावल मधे आहे.

कोलटकर, लई भारी.

राजन बापट Sat, 18/10/2014 - 11:16

In reply to by धनुष

मुंबईनं भिकेस लावलं
कल्याणला गूळ खाल्ला
ज्या गावाला नाव नव्हतं
पण एक धबधबा होता
तिथं एक ब्लँकेट विकलं
अन पोटभर पाणी प्यालो

पिंपळाची पानं चघळत
नाशकापर्यंत आलो
तिथं तुकाराम विकला
अन वर खिमापाव खाल्ला
जेव्हा आग्रारोड सोडला
तेव्हा एक चप्पल तुटलं

न मागता मिळालेली
कांदाभाकर खाऊन ऊठलो
ढुंगणाखालची हॅवरसॅक
उचलून पाठीवर घेतली
मग दोन मैल विचार केला
अन परतायचं ठरवलं

धनुष Sat, 18/10/2014 - 11:34

In reply to by राजन बापट

आयला इथही गंडलोच कि! पण ह्या कवितेसाठी मुक्त सुनीत ह्यांचे खूप आभार. ह्या माणसामुळे मी कविता लिहिणं सोडून दिलं. ह्याच्या एका तरी कवितेच्या पायाशी बसेल असं काही तरी लिहलं तो जाने.

बाय द वे, हि कविता भणंगकरणाच्या (लुम्पेनाइजेशन) चर्चेत प्रस्तुत आहे, नाही? ह्यावरून आणखी सुनील तांबे ह्यांचा एक जबरी आत्मकथात्मक लेख आठवला त्यातही भणंग झालेला नायक मुंबईहून बिहारला जातो, मधल्या मध्यप्रदेशात एका धाब्यावर मिळेल ते काम करतो. वैगेरे. एक्सलंट लेख होता. (पुस्तक: संकल्प, संपादक: संजीव खांडेकर, ग्रंथाली)

अंतराआनंद Sat, 18/10/2014 - 16:10

In reply to by नितिन थत्ते

त्यांनी सरसकट डिस्क्रेडीट केलयं असं मलातरी वाटलं नाही तर त्यांना त्यांच्या मर्यादा होत्या असं म्हटलय; आणि तशा त्या असणं स्वाभाविक आहेत. मग तसं कोणी म्हटलं तर का राग यावा ?

राजेश घासकडवी Sat, 18/10/2014 - 09:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती - प्रतिसाद आततायी वाटला.

१. शहराजाद यांचा प्रतिसाद दुष्प्रवृत्तींना 'ब्राह्मणी' किंवा 'महारी' अशी लेबलं लावण्यालाच होता. कारण त्या लेबलांखाली 'आम्ही ब्राह्मणांना/महारांना झोडपत नाही तर पूर्वीच्या ब्राह्मणांनी/महारांनी जी प्रवृत्ती दाखवली त्या प्रवृत्तींना झोडपतो' असं म्हणत त्या जातीला झोडपण्याची सोय होते. हा गैरवापर टाळण्यासाठी अशी लेबलं लावण्यापासून दूर राहिलं पाहिजे.

२. ब्राह्मणी/अब्राह्मणी या शब्दांना मी स्वतः दुर्दैवी गैरवापर म्हणत त्याखाली काय म्हटलं आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला लागलेला अर्थ सोप्या शब्दांत सांगितलेलाही आहे.

३. 'हे सगळं सोडून मोजमापं करायचं का? याचं उत्तर हो असेल तर, 'इथे येऊन प्रतिसाद आणि लेख कशाला टंकता, मोजमापं करा आधी', असं का म्हणू नये?' यावर सोपं उत्तर म्हणजे माझं वाक्य चुकलं. 'मोजमापं करा आधी' ऐवजी 'तुमच्या मांडणीचा प्रत्यक्ष मोजमापांशी पडताळा लावून बघा जरा' असं म्हणायचं होतं. 'जातीव्यवस्था स्त्रीला घरात बांधून ठेवून निव्वळ पुनरुत्पादन करायला लावते' हा एक वरील मांडणीतला थिअरम आहे. पण अत्यंत रेखीवपणे मोजलेलं सत्य असं आहे की गेल्या सहा दशकांत फर्टिलिटी रेट साडेसहावरून सव्वादोनवर आलेला आहे. मग यावरून जातीव्यवस्था साफ मोडकळीला आलेली आहे असं कबूल करायला लेखिका तयार आहे का? 'अमुक मांडणी तमुक मांडणीपेक्षा जास्त योग्य' असं म्हणायचं असेल तर निदान काही सत्यं तरी अमुक मांडणीने जास्त योग्य पद्धतीने सिद्ध करायला नकोत का? इथे तर ही मांडणी सत्याशी छेद घेताना दिसते आहे.

४. ७५ सालच्या ब्राह्मणी मांडणीत स्त्री शिक्षणावर भरपूर भर होता. तेव्हा गाजलेल्या 'मुलगी झाली हो' नाटकात "शिक्षणाची गाडी धाड धाड पुढे गेली" म्हणून खंत होती. आपल्या पायावर उभं राहता येत नाही म्हणून शोषण होतं याबद्दल तक्रार होती. अब्राह्मणी मांडणीत या तक्रारी नाहीत का? किंवा ब्राह्मणी मांडणीला सुरूवात झाल्यापासूनच्या चाळीस वर्षांत स्त्री साक्षरता चौपट झाली हे त्या मांडणी करणारांचं यश म्हणता येईल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 10:05

In reply to by राजेश घासकडवी

चालायचंच. मला इतर बहुतेक सगळ्या प्रतिसादांतला "ब्राह्मणी" त्रागा आततायी वाटतो.

१. चांभारचौकशा, धेडगुजरी (धेड = महार) अशी हीनत्वदर्शक विशेषणं चालतात. मग ब्राह्मणी हे विशेषण हीनत्वदर्शक म्हणून वापरलं तर त्याची पार्श्वभूमी वगैरे न समजून घेता, शब्दाचा "दुर्दैवी गैरवापर" ते "लेखात काही वाचण्यासारखं नाही", छाप प्रतिक्रिया? तरी बरं हे शब्द वापरणाऱ्या उच्चवर्णीयांवर, त्यांच्या पूर्वजांवर जात्याधारित अन्याय होण्याची परंपरा नाही.

२. त्याच लागलेल्या अर्थाबद्दल बोलणं सोडून फक्त शब्दावरून भावना दुखावून घेणं, मला खेदजनक वाटतं. (आणि नंदा खरे 'पेशवाई'बद्दल बोलतात त्याबद्दल मात्र काहीही प्रतिक्रिया येत नाही.)

३. शब्दबदलाबद्दल आभार. (त्यासाठीही "आततायी" प्रतिसाद द्यावा लागला.)

जातीव्यवस्था साफ मोडकळीला आलेली आहे असं कबूल करायला लेखिका तयार आहे का

पुन्हा एकदा लिंक देते, याच वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या गोष्टींची - झुंजूमुंजू ः सामाजिक न्याय विशेष दलित अत्याचार, लॉंग मार्च आणि खर्डा संसद
'जातीव्यवस्था स्त्रीला घरात बांधून ठेवून निव्वळ पुनरुत्पादन करायला लावते' यात फर्टिलिटी रेट इतपत आकलन फारच मर्यादित आहे. पोरांच्या निमित्ताने, पितृत्त्वाची शाश्वती, घरात अडकवून ठेवणं, तेच-तेच रटाळ काम पुन्हा करायला लावणं असे बरेच अर्थ त्यात आहेत. (सध्या दुवा सापडत नाही) पण अलिकडेच वाचलं होतं त्यानुसार भारतीय पुरुष घरात सरासरी ६ (का १०) मिनिटं काम करतात; इतर अनेक आफ्रिकन देशांमध्ये हेच मोजमाप एक तासाच्या वर इतकं केलं गेलं आहे.

४. ब्राह्मणी स्त्रीवादाने काहीही साधलं नाही अशा अर्थाचं एकही विधान मी लेखात वाचलं नाही (ना बोलणं सुरू असताना ऐकलं).
मी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, ब्राह्मणी स्त्रीवादाने काय मिळवलं, अशा अर्थाचा एकही प्रश्न नव्हता, ही माझी "चूक" आहे.

सविता Sat, 18/10/2014 - 10:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चांभारचौकशा, धेडगुजरी (धेड = महार) अशी हीनत्वदर्शक विशेषणं चालतात. मग ब्राह्मणी हे विशेषण हीनत्वदर्शक म्हणून वापरलं तर त्याची पार्श्वभूमी वगैरे न समजून घेता, शब्दाचा "दुर्दैवी

गैरवापर" ते "लेखात काही वाचण्यासारखं नाही", छाप प्रतिक्रिया? तरी बरं हे शब्द वापरणाऱ्या उच्चवर्णीयांवर, त्यांच्या पूर्वजांवर जात्याधारित अन्याय होण्याची परंपरा नाही.

- काल त्यांच्यावर अन्याय झाला, म्हणून आज तुमच्यावर,
- काल ते उपाशी होते म्हणून आज त्यांना आज जेवायला देऊन तुम्हाला उपाशी ठेवायचे
- काल त्यांची जात शिवी होती म्हणून आज तुमची

यात मला न्याय मिसिंग वाटतो, परिस्थिति खरेच जात/धर्म/लिंग यापासून मोकळी करायची असे म्हणून परत त्यातच गोलगोल फिरणे आहे हे!

एका दिशेचा लंबक मध्ये न स्थिरावता दुसर्या दिशेला न्यावा, मग त्या विशिष्ट गटावर पुरेसा अत्याचार झाला की ते पेटतील मग त्यांच्यावरचा अन्याय दूर करायला परत त्यांना चुचकारा!

अनादी अनंत काळ हेच करत राहायचे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 10:57

In reply to by सविता

छे, हा न्याय नाहीये. त्याला कोणीही न्याय म्हणतही नाहीये. ही सामाजिक प्रतिक्रिया आहे. आणि कोणी उपाशी ठेवू शकत नाही, अन्याय करू शकत नाही आता सुस्थित असणाऱ्यांना. उगाच कशाला आपण 'उपेक्षित' आहोत असा समज करून घ्यावा?

राजेश घासकडवी Sat, 18/10/2014 - 17:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझे आक्षेप असे आहेत
१. दोन मांडणींमधला पायाचा फरक सांगितला आहे, पण वर उभ्या राहणाऱ्या इमारती कशा वेगळ्या असतील हे स्पष्ट नाही. (ऍक्झिअम्स बदलल्यावर थियरम कसे बदलतील हे सांगितलेलं नाही.)
२. मूळ मांडणीतली अॅक्झिअम्स/थियरम्स सत्य परिस्थितीशी मिळतेजुळते नाहीत. सरासरी मोजमापांपेक्षा टोकांच्या घटनांविषयीची उदाहरणं मांडून मुद्दे पटवण्याचा प्रयत्न आहे.
३. इतका मोठा आवाका ठेवू पाहणाऱ्या लेखात शिक्षण या शब्दाचा उल्लेखही नाही. गेल्या चाळीस-पन्नास वर्षात घडत असलेल्या क्रांतीविषयी चकार शब्द नाही.

एखाद्या थियरीबद्दल हे रास्त आक्षेप आहेत. (एवढ्या त्रुटी असूनही शिवाय ब्राह्मणी/अब्राह्मणी वगैरे चार्ज्ड शब्द वापरून भावनिक युक्तिवादाकडे झुकणं हेही आहेच. पण मी त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करायला तयार आहे.)

'न'वी बाजू Sat, 18/10/2014 - 18:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मग ब्राह्मणी हे विशेषण हीनत्वदर्शक म्हणून वापरलं तर त्याची पार्श्वभूमी वगैरे न समजून घेता

ऑ, कमॉन!

(कोणत्याही पार्श्वभूमीनिशी) 'बायकी' हे विशेषण हीनत्वदर्शक म्हणून वापरले, तर तुम्हाला ते चालेल काय?

(मला नाही चालणार. व्हॉट द हेक!)

शहराजाद Wed, 22/10/2014 - 04:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धेडगुजरी-
यातील धेड हा जातिवाचक शब्द नसून अधेड- अर्धवट यावरून आला आहे. चूभूद्याघ्या.
(लेखावर सविस्तर प्रतिसाद लवकरच)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 04:34

एका शब्दावरून किस पाडणाऱ्या प्रतिक्रिया वगळता मला या मुलाखतीमधून काय मिळालं -

ठराविक प्रकारच्या (उच्चवर्णीयांवर केलेल्या) विनोदांपलिकडे मी जातपात मानत नाही असा माझा आत्तापर्यंत समज होता. प्रतिमाताई बोलत असतानाच या समजाच्या ठिकऱ्या झाल्या. क्षणभर मी सुद्धा 'ब्राह्मणी' या शब्दामुळे दचकले होते. पण अधिक विचार करता लेबल महत्त्वाचं नाही असा डीफेन्सिव्ह विचार आधी केला. आणखी थोडा विचार केल्यानंतर 'ब्राह्मणी' हे लेबल हीनत्त्वदर्शकही असू शकतं हे सुद्धा मी मान्य केलं.

मी स्वतः नास्तिक आहे, मला देवाधर्माची काहीही आवश्यकता नाही. पण बहुतांश लोक असे नसतात. विशेषतः आर्थिक हलाखी, अडचणी, पायाभूत सुविधांचा अभाव अशा परिस्थितीत लोकांना मानसिक आधार देण्याचं काम देव, धर्म अशा गोष्टी करतात. अचानक त्यांच्याकडून ब्राह्मणी धाटणीचा हिंदू धर्म हिसकावून घेतला तर त्याची पोकळी लोकांना जाणवत राहील, तिथे दहशतवादासारखं जीवघेणं तत्त्वज्ञानही घुसू शकतं. त्याजागी काहीतरी विचार करून, कालसुसंगत देवी-देवता, रूढी-परंपरा निर्माण करणं महत्त्वाचं आहे, आणि हे काम प्रा. परदेशी करतात. माझ्यासाठी हा 'युरेका' क्षण होता.

अनुप ढेरे Sat, 18/10/2014 - 05:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याजागी काहीतरी विचार करून, कालसुसंगत देवी-देवता, रूढी-परंपरा निर्माण करणं महत्त्वाचं आहे, आणि हे काम प्रा. परदेशी करतात.

नवीन रूढी आणि देवता निर्माण करणं ही कल्पना रोचक आहे. आवडली!! कुठल्या रूढी बनवता येतील याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 05:30

In reply to by अनुप ढेरे

मुळात लोकांच्या असलेल्या श्रद्धा मोडायच्या असतील तर ती पोकळी भरून काढावी लागेल, हेच मला प्रा. परदेशी यांच्यामुळे लक्षात आलं. बालवाडीतल्या, नास्तिक+लोकांपासून लांब राहणारीला संशोधनाच्या पातळीवरचे, आस्तिक, रूढी-परंपरासंबंधीचे प्रश्न विचारून काय उत्तर मिळणार!

अनुप ढेरे Sat, 18/10/2014 - 05:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राँग नंबर

नव्या रूढी परंपरांच्या गरजेबद्दल इतकं ठामपणे सांगितल्यावर आम्हाला वाटलं की तुम्ही याही बाबतीत मार्गसर्शन कराल.

पोकळी भरून काढावी लागेल,

बालाजीला नमस्कार करणार्‍या इस्रो अध्यक्षांवर टीका झालेली आठवली. पण तो इषय वेगळा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 06:18

In reply to by अनुप ढेरे

'इस्रो'चा अध्यक्ष आणि भूमिहीन आदिवासी हे समान स्तरावरच आहेत, अस्तित्वाचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून देवा-धर्माची गरज असणं आणि लाखो-कोटी रुपये, अनेक हुशार अभियंते, शास्त्रज्ञांची बुद्धी, मेहेनत खर्च करून बनवलेल्या मंगळयानाने नीट काम करावं म्हणून बालाजीकडे साकडं घालणं हे सगळं एकाच तागडीत तोलायचं असेल तर बोलणंच खुंटलं.

'न'वी बाजू Sat, 18/10/2014 - 07:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही म्हणजे, भूमिहीन आदिवासींना भेडसावणारे अस्तित्वाचे प्रश्न त्यांच्याकरिता परममहत्त्वाचे आहेत, आणि ते सुटत नसता मानसिक आधाराकरिता त्यांनी देवाधर्माकडे वळणे हे साहजिक आहे, याबद्दल दुमत नाही.

उलटपक्षी, मंगळयानाचे म्हणाल, तर ते त्यावर खर्च केलेले लाखो-करोडो रुपये नाहीतरी ट्याक्सपेयरचे आहेत, इस्रोच्या अध्यक्षांच्या खिशातून आलेले नाहीत; आणि अभियंत्यांचे नि शास्त्रज्ञांचे म्हणाल, तर या सरकारी अभियंत्यांना नि शास्त्रज्ञांना नाहीतरी उद्योग काय असतो? काहीतरी टाइमपास करायचा, त्याऐवजी पब्लिकच्या पैशाने मंगळयान-मंगळयान खेळत बसतात, झाले. त्यामुळे, मंगळयान नीट चालले काय, नि उडविल्याक्षणी तिथल्या तिथे धाडकन खाली पडले काय, इस्रोच्या अध्यक्षांच्या तीर्थरूपांचे नाहीतरी काय जाणार असते? ही ह्याज़ नथिंग पर्सनली अ‍ॅट ष्टेक, ह्याज़ ही? अ‍ॅट लीष्ट, नथिंग ऑफ इंपॉर्टन्स, नाही का? त्यामुळे, इस्रोच्या अध्यक्षांनी बालाजीकडे साकडे घालणे चुकीचेच आहे. अगदी!

तेव्हा, भूमिहीन आदिवासी आणि इस्रोचे अध्यक्ष यांना एकाच तागडीत तोलता येणार नाही. अगदी बरोबर!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/10/2014 - 08:03

In reply to by 'न'वी बाजू

दुर्दैवाने मंगळयान त्याच्या नियोजित कक्षेत पोहोचलं नसतं तर इस्रोच्या अध्यक्षांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली असती, अगदी सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली असती तरी निवृत्तीवेतनही मिळालं नसतं, पगार म्हणून मिळालेला पैसा परत द्यावा लागला असता असं म्हणताय का काय?

'न'वी बाजू Sat, 18/10/2014 - 08:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो, शेवटी बोलूनचालून सरकारीच शास्त्रज्ञ ते! त्यांना काढूनबिढून थोडीच टाकणार आहेत? असे होत असते काय कधी? एकदा चिकटले, की रिटायर होईपर्यंत चिकटले.

हं, आता काहीतरी बिघडले असतेच, तर त्यांना फक्त एकच करावे लागले असते. फारसे मनाला लावून न घेता निर्लज्जपणे बसून राहावे लागले असते, एवढेच.

सांगण्याचा मतलब, देअर इज़ नथिंग रियली इंपॉर्टंट अ‍ॅट ष्टेक; अ‍ॅट लीष्ट, नथिंग पर्सनल; सो, व्हाय इन्वॉल्व बालाजी इन इट?

ऋषिकेश Sat, 18/10/2014 - 08:48

In reply to by 'न'वी बाजू

विषयांना फाटे फुटून अनेकांच्या आवडत्या परंतू इथे पूर्ण अवांतर अशा या विषयांवर गाडी आली (जसे हे इस्रो प्रकरण) की ही संभाव्य - नेहमीचीच - पकडापकडी "मनात आलेले विचार" मध्ये हलवण्याबद्दल काय मत आहे?

ऐसीवर दिवाळी अंकाच्या निमित्ताने अनेक पाहुणे भेट देत आहेत. तेव्हा आपले घर दिवाळीपुरते आवरलेले असावे अशा बहुमान्य मानसिकतेतून हा प्रश्न विचारत आहे.

मेघना भुस्कुटे Sat, 18/10/2014 - 11:01

In reply to by ऋषिकेश

अगदी मान्य.

संज्ञांसाठी लोकांची तत्पर सजगता पाहून श्री. ना. पेंडसे यांच्या एका कादंबरीतलं एक वाक्य आठवलं. ते मात्र देते. ते इथून योग्य ठिकाणी हलवायला माझी अजिबात हरकत नाही.

...वास्तविक तो जात न मानणारा. पण घरी येताच तिला म्हणाला, 'आपण जात मानत नाही हे खोटं. आपली सगळ्यांची त्वचा खरवडली, तर पहिल्या जातींच्या पेशी बाहेर येतील. आजही ब्राह्मणप्रशंसा ऐकताना मी आत सुखावत होतो, एखादा अनवट राग ऐकावा तसं ऐकत होतो. नंतर लक्षात येताच शरमलो...'

'न'वी बाजू Sat, 18/10/2014 - 18:06

In reply to by ऋषिकेश

ऐसीवर दिवाळी अंकाच्या निमित्ताने अनेक पाहुणे भेट देत आहेत. तेव्हा आपले घर दिवाळीपुरते आवरलेले असावे अशा बहुमान्य मानसिकतेतून हा प्रश्न विचारत आहे.

खरे आहे. आणि याच दृष्टिकोनातून (किंवा तुम्हाला हवे तर मानसिकतेतून म्हणा) प्रस्तुत लेख दिवाळी अंकातून इतरत्र हलविण्यास माझा काहीही आक्षेप नाही.

प्रकाश घाटपांडे Sat, 18/10/2014 - 10:15

बघा बघा. हे प्रतिसाद...
ब्राह्मणी भावना म्हणतात त्या याच
ब्राह्मणी कावा म्हणतात तो हाच
.
.
लवकरच अब्राह्मणी परंपरेतील शास्त्रज्ञ मेंदुतील ब्राह्मणी भावनांच केंद्र शोधून काढणार आहेत.

धनुष Sat, 18/10/2014 - 10:52

हा लेख मला सुद्धा थोडा विस्कळीत वाटला आणि काही स्पष्ट हाताला लागलं नाही. नवीन तर काहीही सापडलं नाही पण इथल्या चर्चेच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षवेधी वाटले आणि त्यांच्या बद्दल थोडं स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली म्हणून प्रतिक्रिया:

प्रतिमा परदेशी ह्या मार्क्सवादी,फुले-आंबेडकर वादी आणि स्त्रीवादी प्रवाहातल्या महत्वाच्या कार्यकर्त्या/विचारवंत आहेत. त्यांनी ह्या विषयांवर सातत्यानं अतिशय उत्तम लिखाण केलंय. पण ह्या लेखावरच्या प्रतीक्रीयांमध्ये व्यक्त होणारा वैताग हा मुख्यतः संकल्पनांबद्दलच्या गोंधळामुळे होतोय. पूर्वी शरद पाटलांवर लिहलेल्या लेखातही मी ह्या कॅटेगरीज आणि त्यांचं जातविरोधी मांडणीतलं महत्व दाखवलं होतं. ब्राह्मणी आणि अब्राह्मणी ह्या विचारधारा मराठी जातविरोधी चर्चाविश्वात एकोणिसाव्या शतकापासून मांडल्या गेल्याहेत आणि त्यांच्या पुनर्मांडणीची आवश्यकता निश्चितच आहे पण त्यांचा नेटका परिचय सुद्धा आपल्याला नसावा हे थोडं खेदजनक आहे. (पुन्हा जुनाच मुद्दा: किती ब्राह्मण/सवर्ण लोक दलित/अब्राह्मणी/स्त्रीवादी लेखन नियमित वाचतात?)

ब्राह्मणी म्हणून हिणवलं गेलं किंवा वैयक्तिक पातळीवर अन्याय झाले हे जरासं बाजूला ठेवू (अश्या वैयक्तिक कहाण्या ब्राह्मणेतरांकडे चिक्कार आहेत त्यामुळे ह्या भांडणातून काही निष्पन्न होणार नाही.) आणखी एक म्हणजे ब्राह्मणी/अब्राह्मणी हे एका सुट्या सुट्या व्यक्तींमधलं विभाजन नाहीये. हा समाजशास्त्रीय मुद्दा आहे आणि तो सामाजिक रचनांबद्दल आहे हे लक्षात ठेवूया. शिवाय, जसं सनातन प्रभात सगळ्या ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करत नाही तसंच मूलनिवासी किंवा संभाजी ब्रिगेड म्हणजे सगळे अब्राह्मणी नाहीत हे ही लक्षात ठेवू.

ब्राह्मण/अब्राह्मण हि मांडणी मुळात एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीत जन्माला आली आणि माझ्या स्वतःच्या मते, ती आता कौंटर प्रॉडक्टीव झालीये. पण मूळ मांडणीला परिवर्तनाचा दृढ पाया होता. परिवर्तनाचा प्रश्न हा समता ह्या मूल्याभोवती फिरणारा प्रश्न आहे. आपल्याला जर समता हवी असेल तर, तर मग आपण जात, लिंगभाव (जेन्डर) आणि वर्ग (क्लास) ह्या सामाजिक विषमता कश्या दूर करू? हा तो प्रश्न. मग "ह्या निरनिराळ्या विषमता भारतात कश्या निर्माण झाल्या आणि त्यांच्या समर्थनाचं तत्वज्ञान कोणतं" हा प्रश्न आला. फुल्यांच्या चळवळीनं त्याचं उत्तर दिलं कि ब्राह्मणवाद हे तत्वज्ञान (ज्यात वर्णव्यवस्थेचं समर्थन, वेद प्रामाण्याचा आग्रह, मनुस्मृतीच्या आधारे स्त्री-शूद्रांना समाजव्यवस्थेत दुय्यम स्थान देणं इत्यादी गोष्टींचा समावेश होईल.) हे विषमतेचं समर्थन करणारं तत्वज्ञान आहे.

थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया: आधी १८३० मध्ये साताऱ्याच्या गादीवरचे प्रतापसिंह छत्रपति आणि पुढे १८९९ मध्ये कोल्हापूरचे शाहू छत्रपति ह्यांच्या क्षत्रिय असण्या बद्दल वाद झाला (जो वेदोक्त प्रकरण म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात विख्यात आहे.) वाद काय होता? शाहू महाराज कोल्हापुरात पंचगंगेवर काही विधी करायला गेले होते आणि त्यांचा पुरोहित जो पारोशानंच आला होता, तो पूजा सांगताना वैदिक मंत्र न म्हणता, पुराणोक्त मंत्र म्हणत होता. हि गोष्ट तिथे असलेल्या राजाराम शास्त्री भागवतांच्या लक्षात आली आणि त्यांनी ती शाहू महाराजांना सांगितली. त्यावर महाराजांनी त्या पुरोहिताला जाब विचारला, त्यावर तो म्हणाला कि, तुम्ही शुद्र असल्यानं तुम्हाला वेदांचा अधिकार नाही, त्यामुळे मी पुराणातले मंत्र म्हणतोय. ह्यावर शाहू महाराजांनी विचारलं कि मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे आणि ते क्षत्रिय होते आणि त्यांनी वैदिक राज्याभिषेक करून घेतला होता. असं असताना मी क्षत्रिय का नाही? (हा वाद पुढे बराच चिघळला आणि ह्याचं पर्यवसान महाराष्ट्राला वेढून टाकणाऱ्या एका वावटळीत झालं. ब्राह्मणेतर चळवळ ह्या वादामुळे अतिशय आक्रमक रुपात पुढे आली. ते असो.)

एकूण ब्राह्मणी म्हणवली जाणारी मांडणी (अर्थात सगळेच्या सगळे ब्राह्मण नाहीत पण बहुसंख्य ब्राह्मण) थोडक्यात अशी होती: परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात वर्णक्षय झाला आणि केवळ दोनचं वर्ण उरले: ब्राह्मण आणि शुद्र. म्हणजे अर्थात, जो ब्राह्मण नाही तो शुद्र ठरु लागला. (पहा चिपळूणकर. अहिताग्नी राजवाडे) फुल्यांनी ही ब्राह्मण/शुद्र मांडणी उलटी केली. म्हणजे त्यांच्या मते भारताचा इतिहास हा ब्राह्मण आणि शुद्र ह्यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. मग ब्राह्मण विश्वविजयाचं प्रतिक सगळं विश्व तीन पाउलात पादाक्रांत करणारा वामन असेल तर मग त्याला उदार मनानं तिसरा पाय स्वतः च्या डोक्यावर ठेव म्हणून सांगणारा बळी राजा हा शूद्रांच्या इतिहासाचं प्रतिक बनू लागला. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, तृतीय रत्न, शेतकऱ्याचा आसूड (फुले) जातीभेद विवेक सार (तुकाराम तात्या पडवळ), अशी ब्राह्मणेतर इतिहासाची मांडणी करणारी पुस्तकं पुढे आली. त्यांच्या मते, ह्या ब्राह्मण शाही विरुद्धचं बंड महानुभाव, वारकरी परंपरा आणि पूर्वी बुद्ध आणि चार्वाक ह्यांची तत्वज्ञाने ह्यांच्या मार्फत झालं आता तेच आपण नव्या स्वरुपात पुनरुज्जीवित करायला हवं. पुढे फुलेवादातून विकसित झालेलं शाहू-आंबेडकर यांचं तत्वज्ञान पुढे जाऊन भारतीय तत्वज्ञानांची विभागणी ब्राह्मणी विरुद्ध ब्राह्मणेतर अशी करून समता म्हणजे ब्राह्मण्याचा विच्छेद अशी मांडणी करू लागलं. शरद पाटलांनी ब्राह्मणेतर ह्या ऐवजी अब्राह्मणी असा नवा पर्याय दिला: ज्यात ब्राह्मणी परंपरा आणि तिचं चातुर्वर्ण्य समर्थनाचं तत्वज्ञान ह्यांचा विरोध करणारा कुणाही ब्राह्मण जातीय व्यक्तीचा समावेश शक्य आहे. (आणखी एक: फुले त्यांच्या संपूर्ण लिखाणात कुठंही हिंदू हा शब्द वापरत नाहीत. हिंदू धर्माला उद्देशून ते ब्राह्मण धर्म असाच शब्द वापरतात. हिरोयुकी कोटानी नावाच्या जपानी इतिहासकाराने महाराष्ट्राच्या अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातल्या इतिहासावर ३ पुस्तकं लिहिली आहेत. त्याचं म्हणणं असं: इंग्रजी राज्य आल्या पासून, जो कुणी मुसलमान किंवा क्रिश्चन नसेल त्याला हिंदू म्हणणे सुरु झालं. इंग्रज येण्या आधी हे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसत.)(अवांतर: सदानंद मोऱ्यांनी फुलेंची तुलना अलिगढ युनिवर्सिटीचे संस्थापक सय्यद अह्मदांशी केलीये. अतिशय रोचक. लोकमान्य ते महात्मा. पुस्तक जवळ नसल्यानं संदर्भ देत येत नाहीत.)

एकोणिसाव्या शताकातल्या सुधारकी परंपरेची चिकित्सा करताना ती परंपरेवर किती मूलगामीपणे प्रहार करत होती हा मुद्दा पहिला जातो: परदेशी म्हणतात कि ज्या सुधारणा केवळ वरवरचे उपचार होत्या, म्हणजे एखादी प्रथा बंद करणे (केशवपन) वैगेरे त्यांनी ह्या प्रथांना असलेलं धार्मिक समर्थन ज्या आधारांवर होत होतं (मनुस्मृती, इत्यादी.) त्यांना मुलभुत नकार दिला नाही. म्हणजे काय तर, केशवपन तर नको पण विधवेला कुरूप करण्याचं काम ज्या वैचारिक आधारावर (ब्राह्मणी धर्मग्रंथ) केलं जाई त्यांना संपूर्ण नकार द्यायला हवा होता जो फुले आंबेडकरांनी दिला. पर्यायानं, सुधारणा करण्याच्या दोन पद्धती परदेशी एकमेकांपासून वेगळ्या करतात: सुधारणा हवी पण ब्राह्मणी धर्माचं रक्षण करून असं म्हणणारा एक पक्ष आणि संपूर्ण समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी ब्राह्मणी धर्माला नकार देणारा दुसरा अब्राह्मणी पक्ष.

इथे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी हे विभाजन हे व्यक्ती व्यक्ती मध्ये नाहीये, हे आहे दोन तात्विक भूमिकांसंदर्भात. अर्थात ह्या विभाजनाच्या तात्विक आधाराची चिकित्सा करता येइलच आणि त्याच्या प्रत्यक्ष वापरात काय कुरूपता निर्माण होतात ह्याची टीकाही शक्य आहे (खरं तर गरजेची सुद्धा आहे. हे उठ सूठ उगाच एखाद्याला झोडपत बसण्याचे मूर्ख उद्योग चाललेत ते भीषणचं प्रकार आहेत. पण परदेशी आणि हे ब्रिगेडी लोक ह्यांच्यात फार फरक आहे हे विसरून चालणार नाही.)

कृतीशील असण्याचा परदेशी यांचा मुद्दा पण महत्वाचा आहे: संमती वयाच्या चर्चेचं उदाहरण घेऊ. मुलीचं विवाहयोग्य वय काय असावं ही ती चर्चा. एक तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तर्राधातही, मुलींची लग्नं ८/९ वर्षी होत असत. तर मुलीला स्वतःच्या लग्नाला संमती देण्याची समज असताना तिचं लग्न करावं असा विचार पुढे आला. मग हे वय काय धरावं ह्या विषयांवर हि चर्चा झाली. एक पक्ष (टिळकांचा) म्हणत होता कि हे जे काय प्रकरण आहे ते आमचं अंतर्गत प्रकरण आहे; जी काही सुधारणा हवी ते आम्ही स्वतः करू, त्यात सरकारने हस्तक्षेप करू नये. (बाय द वे, विसाव्या शतकात जेंव्हा हमीद दलवाई मुस्लिम स्त्रियांच्या तलाक विषयक हक्कांसाठी चळवळ करत होते, त्यांना कायद्याने हक्क द्यावेत असं म्हणत होते तेंव्हा मुसलमान नेत्यांचं भारतीय सरकारला उत्तर काय होत? - हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात सरकारने कायदे करून ढवळाढवळ करू नये.) न्यायमूर्ती रानडेंचा संमती वयाच्या विधेयकाला पूर्ण पाठींबा होता पण प्रत्यक्षात त्यांची पहिली पत्नी वारली तेंव्हा रमाबाईंशी, त्या ८ वर्षांच्या असताना त्यांचं दुसरं लग्न लागलं. ते त्यांनी वडिलांच्या आग्रहाखातर केलं असा बचाव केला जातो पण फुलेंच्या चळवळीला विरोध असल्यानं त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं, ते मान्य करून फुले बाहेर पडले पण चळवळ बंद केली नाही. फुलेचं एक अद्भुत वाटावं असं आणखी उदाहरण आहे: फुले दांपत्याला मूल नसल्यानं त्या काळाच्या रिवाजा प्रमाणे, फुल्यांचे सासरे त्यांना म्हणाले कि मुल होण्यासाठी तुम्ही दुसरं लग्न करा, त्यावर फुले म्हणाले कि कशावरून माझ्यात दोष नसेल? जर तसं असेल तर तुम्ही सावित्रीला दुसरं लग्न करू द्याल काय? ब्राह्मणावर कठोर टीका करूनही, फुल्यांनी केशवपनाविरूद्ध नाव्ह्यांचा संप अयोजीत करणे, ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेल्या अनौरस संततीला दत्तक घेणे असे त्या काळात अचाट वाटतील असे उद्योग केले.

बाकी घासकडवी म्हणतात तसं, "….या सगळ्या क्रांतीतून आपण जातो आहोत पण लेखिकेने याची काही दखलच घेतलेली दिसत नाही. या सुधारणांमागचे मुख्य घटक काय, आणि ते घटक कसे वाढवता येतील याबाबत ब्राह्मणी आणि अब्राह्मणी मांडणीत नक्की काय फरक आहेत? ब्राह्मणी मांडणीत 'मुलींना शिकवा' म्हणतात का? हो. अब्राह्मणी मांडणीत म्हणतात का? हो". ह्याच्याशी सहमत.

ब्राह्मणी/अब्राह्मणी ह्या द्वंद्वाची सर्वात मोठी मर्यादा आणि त्याचं सामर्थ्य इतिहासच आहे. हे द्वंद्व इतिहासाच्या आधारावर उभं आहे आणि समकालीन इतिहासात कालबाह्य होत आहे. स्त्री-शुद्र-दास्य-अंताची चळवळ केवळ अब्राह्मणीकरणाच्या वैचारिक पायावर आता उभी राहू शकणार नाही. तिला नवी सैद्धांतिक परिप्रेक्षं, नव्या राजकीय जाणीवा आकाराला आणाव्या लागतील. अब्राह्मणीकरण निव्वळ द्वेषात रुपांतरीत होत असेल तर त्याची सांस्कृतिक नवनिर्मितीची क्षमता तपासावी लागेलच. ब्राह्मणी परंपरेत अनेकानेक बदल घडले ते स्व-टीकेमुळे घडले. अब्राह्मणी प्रबोधनाने आपल्या परंपरेची मार्मिक सखोल चिकित्सा करण्याचा उद्योग हाती घेणं अतिशय आवश्यक आहे.

मेघना भुस्कुटे Sat, 18/10/2014 - 11:08

In reply to by धनुष

वरच्या अस्थानी वादानं धनुष यांना हा प्रतिसाद लिहायला उचकवलं असेल, तर वादाचंही चीज झालं असं म्हणावं लागेल. अशी प्रगल्भ, स्पष्टवक्ती आणि आत्मपरीक्षक भूमिका घेण्याचा आपण सगळे जण प्रयत्न तरी करू, तो सुदिन.

नितिन थत्ते Sat, 18/10/2014 - 11:37

In reply to by धनुष

मी सहसा ब्राह्मणांच्या बाजूने कधी वाद घालत नाही.

इथे मी काही प्रतिवाद केला कारण काळाचा परिप्रेक्ष्य लक्षात न घेता जुन्या सुधारकांची 'ब्राह्मणी' म्हणून बोळवण केली गेली आहे. जणू आदिवासी, दलित यांच्यासाठी काम केलं नाही तर काही कामच केलं नाही.

फुल्यांना जे जाणवले ते (जातीभेदाचे रंग) आगरकरांना जाणवलेच नसण्याचीही शक्यता आहे. जसे इंग्रजी राज्य हे भारताचे आर्थिक शोषण आहे हे दादाभाईंना (व्यापारी असल्यामुळे?) जाणवले जे तत्कालीन इतर नेत्यांना जाणवले नव्हते. गांधींनाही अन्याय जाणवला तो गाडीतून फेकल्यावर. पण आगरकर व्यवस्था टिकवण्यासाठी धडपडत होते हे म्हणणे खरे नाही.

तसेच विसाव्याशतकातील स्त्रीमुक्ती कार्यकर्त्यांचीसुद्धा ब्राह्मणी म्हणून बोळवण केलेली दिसली. त्यातले अनेक कार्यकर्ते तर ब्राह्मणसुद्धा नाहीत.

त्यांनी मूलभूत ढाचा तोडायचं काम केलं नसेल (तसं ते आंबेडकरांनीही केलं नाही) पण त्यांना ब्राह्मणी म्हणून झटकून टाकणं पटलं नाही म्हणून काही प्रतिसाद दिले.

चिंतातुर जंतू Sat, 18/10/2014 - 12:11

In reply to by नितिन थत्ते

>> इथे मी काही प्रतिवाद केला कारण काळाचा परिप्रेक्ष्य लक्षात न घेता जुन्या सुधारकांची 'ब्राह्मणी' म्हणून बोळवण केली गेली आहे.

मला वाटतं की काळाच्या परिप्रेक्ष्याचे गोंधळ अनेकांचे होत आहेत. उदा : -

>> ब्राह्मण सत्तेवर असताना ब्राह्मणांचा अ‍ॅडिशनल फायदा. पण हा काळ फक्त नजीकच्या भूतकाळातला. ती परिस्थिती सनातन शाश्वत नव्हती एवढेच माझे म्हणणे आहे. म्हणून फक्त ब्राह्मण पुरुषांचाच फायदा हे खरे नाही. यासाठी भूतकाळाचे भान आणून दिले.

'फक्त नजीकचा भूतकाळ' म्हणताना इथे सत्तेचा अर्थ केवळ राजकीय सत्ता असा तुम्ही घेत असाल, तर गोंधळ आहे. कारण 'संन्याशाची पोरं' म्हणून ज्ञानोबा आणि बंधुभगिनींना त्रास देणं, संस्कृतातली गीता मराठीत आणली म्हणून त्रास देणं, 'बडवे मज मारिती, ऐसा काही तरी अपराध' असं चोखा मेळ्याला म्हणावं लागणं ह्या गोष्टी काही ब्राह्मणी राजकीय सत्तेच्या काळातल्या नाहीत. धर्मसत्ता आणि त्यातून निर्माण झालेले गोंधळ पुरेसे पूर्वीपासूनचे आहेत. त्या मानानं तुम्ही म्हणता ते सुधारक नजीकच्या भूतकाळातले आहेत असंच म्हणावं लागेल.

'न'वी बाजू Sun, 19/10/2014 - 02:41

In reply to by चिंतातुर जंतू

धर्मसत्ता आणि त्यातून निर्माण झालेले गोंधळ पुरेसे पूर्वीपासूनचे आहेत.

'धर्मसत्ता' याचा अर्थ येथे मी 'ज्युडीशियल ऑथॉरिटी' असा घेतो.

भारतवर्षातल्या हिंदू समाजांतली धर्मसत्ता ही ब्राह्मणेतरांच्या हातात कधी होती? (किंबहुना, व्याख्येनेच धर्मसत्ता ही ब्राह्मण वर्गाची मुखत्यारी होती ना?)

सांगायचा मतलब, पॉवर करप्ट्स, अँड अ‍ॅब्सोल्यूट पॉवर करप्ट्स अ‍ॅब्सोल्यूटली. त्या ठिकाणी कोणीही असते, तरी गोंधळ झालाच असता, आणि तोच गोंधळ झाला असता. हा दोष वर्णाचा नसून त्या सत्तेचा आहे, व्यवस्थेचा आहे.

कारण 'संन्याशाची पोरं' म्हणून ज्ञानोबा आणि बंधुभगिनींना त्रास देणं

प्रस्थापित सामाजिक प्रथा/कायदे मोडल्याबद्दल वाळीत टाकणे/तदानुषंगिक छळ (थोडक्यात, खापपंचायतगिरी) ही सर्वच समाजांत चालत असावी. हा ब्राह्मणसमाजाचा यूएसपी नसावा.

(सवांतर शंका: संन्यास घेण्याची प्रथा महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरकालीन अब्राह्मणांत कितपत प्रचलित असावी? आणि, ज्या समाजांत मुळात संन्यासाची प्रथाच नाही, तेथे संन्याशास पोर झाले, याचे काय सोयरसुतक असावे? तेथे त्यात्या समाजांत ज्या प्रथा असतील, जे टॅबू असतील, त्यांच्या उल्लंघनाबद्दल त्या समाजांतील घटकांस शिक्षा होईल, होतच असेल. त्यामुळे, हा ब्राह्मणसमाजाचा अंतर्गत मामला म्हणावा काय?)

संस्कृतातली गीता मराठीत आणली म्हणून त्रास देणं

(प्रस्थापित कायद्यानुसार) एक्स्ट्रालीगल अ‍ॅक्टिविटी म्हणून धर्मसत्तेकडून (बोले तो, ज्युडीशियल ऑथॉरिटीकडून) बोंबाबोंब (अधिक पॉसिबल लीगल अ‍ॅक्शन?), अधिक (झाली असल्यास) प्रस्थापित सामाजिक प्रथा ('आमच्यात गीता संस्कृतातच असते, ती प्राकृतात आणायची पद्धत नाही.') उल्लंघिण्याबद्दल सामाजिक ऑस्ट्रसायझेशन?

'बडवे मज मारिती, ऐसा काही तरी अपराध'

बडवे हे लोकल अनऑफिशियल/एक्स्ट्राज्युडिशियल पॉवर्स-द्याट-बी होऊन माजले असावेत, आणि दूरस्थ धर्मसत्तेपर्यंत त्यांचे कारनामे पोहोचत नसावेत (किंवा दूरस्थ धर्मसत्तेस त्यात सुओ मोटू लक्ष घालण्यात स्वारस्य नसावे). एकंदरीत, लोकल करप्शन, किंवा फार फार तर ज्युडीशियल सिस्टिमचे सिस्टीमिक करप्शन.

आता यातल्या कोणत्याही बाबीत ब्राह्मण-स्पेसिफिक असे काय आहे? हे तर जगात कोठेही, कोठल्याही समाजात होऊ शकते.

बॅटमॅन Sun, 19/10/2014 - 16:05

In reply to by 'न'वी बाजू

बह्वंशी सहमत.

बाकी, गीता मराठीत आणल्याबद्दल त्रास म्हणजे उगा काहीतरीच आहे. ज्ञानेश्वरांना त्रास झाला तो संन्याशाची पोरे इ.इ. बद्दल. गीता मराठीत भाषांतरित वा पुनर्कथित केल्यामुळे नव्हे. पण इतका नुआन्स झेपतोय कुणाला? दिसेल त्याला सेल्फराइचसपणे वाटेल तसं झोडणं हा एकमेव मार्गच ज्यांना येतो त्यांबद्दल अजून काय बोलावे? असो.

'न'वी बाजू Sun, 19/10/2014 - 19:14

In reply to by बॅटमॅन

बाकी, गीता मराठीत आणल्याबद्दल त्रास म्हणजे उगा काहीतरीच आहे. ज्ञानेश्वरांना त्रास झाला तो संन्याशाची पोरे इ.इ. बद्दल. गीता मराठीत भाषांतरित वा पुनर्कथित केल्यामुळे नव्हे.

गुड क्याच!

(आमचा इतिहास अंमळ कच्चाच असल्याकारणाने, हे लक्षात आले नाही. त्यामुळे, असे आर्ग्युमेंट पुढे आल्यावर, कोण जाणे, केलाही असेल या कारणास्तव छळ, "कारण शेवटी ती भटेच. त्याला काय करणार?" (पु.ल., हे विसरू नका हं!) म्हणून तेही पर्स्पेक्टिवमध्ये आणण्याचा ("समर्थनाचा" नव्हे हं! प्लीज नोट.) प्रयत्न केला, इतकेच. त्याची गरज नव्हती, हे लक्षात आले नाही. अभ्यास कमी पडला. ("कारण शेवटी आम्ही आम्हीच, त्याला काय करणार?" - आम्ही.) पण लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.)

-------------------------------------------------------------------------------------------------------------

कर्णविदारणन्याय, अर्थात, एकदा नाव कानफाट्या पडल्यावर कोणीही उठावे नि काहीही आरोप करावेत. किंवा, अमेरिकनमध्ये, "थ्रो इट अगेन्ष्ट द वॉल अँड सी इफ इट ष्टिक्स". अर्थात, तीही गरज असू शकते म्हणा कोणाकोणाची, त्याला काय करणार?

बॅटमॅन Sun, 19/10/2014 - 20:11

In reply to by 'न'वी बाजू

धन्यवाद!

बाकी,

कर्णविदारणन्याय, अर्थात, एकदा नाव कानफाट्या पडल्यावर कोणीही उठावे नि काहीही आरोप करावेत. किंवा, अमेरिकनमध्ये, "थ्रो इट अगेन्ष्ट द वॉल अँड सी इफ इट ष्टिक्स". अर्थात, तीही गरज असू शकते म्हणा कोणाकोणाची, त्याला काय करणार?

सहमत आहे हेवेसांनल. पण या निमित्ताने एक अवांतर शंका आली. नाव कानफाट्या पडले की इ.इ. जो वाक्प्रचार आहे त्यात व्हॉट इज़ कानफाट्या? अ‍ॅण्ड व्हॉट इज़ द बिग डील अबौट हिम?

कानफाट्या हे पुरुषी नाव असल्याने, तसेच दुष्ट वैट्ट काहीतरी असल्याने त्याचे 'कानफाटी' असे रूपही प्रचलित होवो असा आग्रह बहुधा होणार नाही असे वाटते.

अरविंद कोल्हटकर Mon, 20/10/2014 - 01:17

In reply to by बॅटमॅन

कानफाटे हे गोरखपन्थीय संन्याशांचे एक - पुष्कळसे तुच्छतादर्शक - नाव आहे. ह्याबाबतची मराठी विश्वकोशातील नोंद अशी आहे:

कानफाटे : शैव मतानुयायी बैराग्यांचा एक पंथ. त्यांना गोरख पंथी, गोरखनाथी व दर्शनी अशीही नावे आहेत. या पंथाचा उगम केव्हा व कसा झाला; पंथ स्थापक कोण व पंथाचे तत्वज्ञान काय आहे, ह्याबाबत निश्चित माहिती मिळत नाही. गोरखनाथाचा आजेगुरू आदिनाथ याने हा पंथ स्थापिला असे कानफाटे सांगतात. कानफाटे कानाची पाळी चिरून त्यांत मोठ्या कड्या घालतात, म्हणून त्यांना `कानफाटे' म्हटले जाते. ह्या कड्या घालण्याच्या विधीला `मुद्राविधी' म्हणतात. लाकूड, धातू किंवा हरणाच्या शिंगापासून ह्या कड्या तयार करतात. गोपीचंदाची व भर्तृहरीची गाणी म्हणत व कुका नावाचे एकतारी वाद्य वाजवीत ते भिक्षा मागतात. जोगी किंवा नाथ ह्या नावांनीही ते ओळखले जातात. ते मेखला, कौपीन, व्याघ्रांबर, खडावा व विभूति वापतात. भिक्षा मागताना `आलख' व `आदेश' असा ते उद्‌घोष करतात.

कानफाटे सर्व भारतभर पसरलेले दिसतात. गुजरात मधील कच्छच्या रणात तसेच कर्नाटकात व महाराष्ट्रात त्यांची विशेष वस्ती आहे. ते जातपात मानीत नाहीत. मद्य-मांसादी ते सेवन करतात. काही मठातही राहतात. कर्नाटकातील व महाराष्ट्रातील कानफाटे भिक्षा मागताना हातात त्रिशूळ धारण करतात. काही कानफाटे डमरूही बाळगतात. म्हणून त्यांना डौरी (डमरू) गोसावी म्हणतात. कालभैरव, भैरवनाथ, बालासुंदरी ही त्यांची स्थानपरत्वे उपास्य दैवते आहेत.>

गावाबाहेर उजाड जागी राहणे, मद्य-मांस-गांजा इत्यादींचे सेवन करणे, 'मुले पळवून नेतात' अशा त्यांची सांगोवांगीची अपकीर्ति अशांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये ते अविश्वासाचा, चेष्टेचा आणि तिरस्काराचा विषय असतात आणि 'कानफाटया' हे pejorative विशेषण त्यातून तयार झाले आहे.

प्रकाश घाटपांडे Sat, 18/10/2014 - 12:21

कम्युनिस्टांना जस सगळ जग वर्गीय विभागणीत दिसत तस इथे लेखिकेला ते ब्राह्मणी अब्राहमणी चळवळीच्या परंपरेमधे विभागलेले दिसते.अजुन कुणाला अजुन कशात विभागलेले दिसते. स्त्रीलिंगभावामुळे निर्माण झालेले प्रश्न निराळे व स्त्रियांचे प्रश्न निराळे. जगभरातील स्त्रिया एक प्रकारच्या नाहीत त्यामुळे त्यांचे प्रश्नही एक प्रकारचे नाहीत. त्याला विविध आयाम आहेत. सुधारकांनी तत्कालीन परिस्थितीत आपापल्या कुवतीने व आपापल्या मर्यादांच्या आधीन राहून ते सोडवण्याचे प्रयत्न शक्य तितके केले.म्हणुन लगेच सर्वांगिण प्रयत्न केले नाही म्हणुन त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे विवेकी नाही. बहुतेक सुधारक हे ब्राह्मण होते तसेच बहुतेक सनातनीही ब्राह्मण होते. इथे ब्राह्मण हा शब्द जन्मानुसार अपरिहार्यपणे चिकटलेली जात अशा अर्थाचा अभिप्रेत आहे
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा.http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=542198394543544199…
.मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली. जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणॆ द्यायला सुरवात करतात. विवेक व विद्रोह एका ठिकाणी नांदत नाहीत पण विवेकाने विद्रोह समजून घेण्यास मदत होते असे मला वाटते.
जन्माने ब्राह्मण असल्यास अब्राह्मणी परंपरेत काम करताना अनेकांना आपल्या निष्ठा सातत्याने सिद्ध कराव्या लागतात.फट म्हणता अब्रह्महत्येचे पातक लागण्याची भीती बाळगावी लागते. पुरोगाम्यांमधल्या या गोची विषयी सदानंद मोरेंनी पुर्वी साधना साप्ताहिकात लिहिले होते. त्यामुळे मोरे आता भटाळले असा निष्कर्षही काही अब्राह्मणी परंपरेतील विद्वानांनी काढला होता. असो. माझ्याकडे तो लेख असेलही कुठेतरी ! शोधून पहातो.

धनुष Sat, 18/10/2014 - 12:38

कोण काय द्वेष पसरवतोय का विष कालवतोय, ह्याची इतकी चर्चा करूनही कुणीही हे म्हणत नाहीये कि आपण ह्या स्त्रियांचे जे जमिनीचे, शेतीचे, कौटुंबिक हिंसेचे, गर्भलिंगनिदानाचे, नव्या कायद्यांचे जे प्रश्न आहेत त्यात ह्यांच्या बरोबर आहोत. का नाहीयोत? मूळ प्रश्न काय आहे: शोषणापासून मुक्तीचा प्रश्न आहे ना? मग त्यात आपण ब्राह्मण किंवा अब्राह्मण कुणीही असलो तरी सामील आहोत का?

लोकमान्य टिळकांचा मुलगा श्रीधरपंत टिळक ह्यांनी त्यांच्या अतिशय करूण आणि दुर्दैवी अश्या आत्महत्येपूर्वी शेवटचं पत्र कुणाला लिहिलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांना. त्यात त्यांनी लिहिलंय, कि पुढच्या जन्मांमध्ये सुद्धा त्यांना समतेच्या लढ्यात सामील होता यावं हीच त्यांची शेवटची इच्छा आहे. आपण कुणीही असलो तरी, श्रीधरपंत टिळक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत कि नाही? कि परदेशी म्हणतात तसं हि नवी वर्चुअल शस्त्रं नव्या ब्राह्मणांनी बळकावली आहेत?

नितिन थत्ते Sat, 18/10/2014 - 12:46

In reply to by धनुष

>>मूळ प्रश्न काय आहे: शोषणापासून मुक्तीचा प्रश्न आहे ना? मग त्यात आपण ब्राह्मण किंवा अब्राह्मण कुणीही असलो तरी सामील आहोत का?

ते तर आम्ही आहोतच. पण असं म्हटलं/सुचवलं जातंय की जातीय विषमता (त्यांच्यातले नसणार्‍या) सुधारणावाद्यांना कळतच नाही आणि (त्यांच्यातले नसलेल्या) सुधारणावाद्यांनी जे केलं ते ब्राह्मणी व्यवस्था टिकवण्यासाठी केलं. तेवढ्याचाच फक्त वाद-प्रतिवाद आहे.

प्रकाश घाटपांडे Sat, 18/10/2014 - 14:46

आजचा सुधारक या विवेकवादाची परंपरा जोपासणार्‍या मासिकावर देखील ब्राह्मणी असल्याचे आरोप झाले. त्या विषयी पुर्वी दिलेल्या एका प्रतिक्रियेची लिंक
http://mr.upakram.org/node/1208#comment-20002
वरील लिंक मधील नानावटी- खिलारे या जोडीतील नानावटी म्हणजे आपले ऐसी अक्षरे वरील सदस्य प्रभाकर नानावटी.

धनुष Sat, 18/10/2014 - 15:44

माझा जो जुनाच मुद्दा होता: सामान्य वाचकाला हिरीरीने मत प्रदर्शित करण्याची स्पेस विज्ञान नसून समाज आहे, तो ह्या चर्चेच्या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाला असं मला वाटतं. परदेशींच्या ब्राह्मण/अब्राह्मण विभागणी मुळे अनेकांनी अनेक मुद्दे मांडले ज्यांचा जात, सामाजिक सत्ता-संबंध, इतिहास, सामाजिक तत्वज्ञान अश्या सोशल सायन्सेसच्या विषयांशी संबंध आहे. आणि त्या विषयांचा मराठीत/इंग्रजीत रीतसर अभ्यास मात्र नाही. प्रत्येकानं त्या विषयातली डिग्री घेणं शक्य हि नाही आणि गरजेचं ही नाही; पण काही प्लाटफॉर्मस आपण निर्माण करायला हवेत जे ह्या विषयांची सुलभ ओळख करून देतील असं सुचवावंसं वाटतं. किमान महाराष्ट्राच्या संदर्भात जे कळीचे प्रश्न आहेत, इतिहास असो, जात असो, ब्राह्मणब्राह्मणेतर वाद असो किंवा मराठी अस्मितेच्या पोकळ राजकारणाचा मुद्दा असो, ह्यांची नीट संदर्भासहित ओळख करून देणारे लेख आपण मागवायला हवेत. नव्या सामाजशास्त्रीय संशोधनाविषयी लिखाण मिळवायला हवं. उदाहरणार्थ इत्यादी.

मेघना भुस्कुटे Sat, 18/10/2014 - 18:12

In reply to by धनुष

'ऐसी अक्षरे'च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही या विषयांवर नेमानं लिहिलंत तर फार बरं होईल. आम्हांला वाचायला खूप आवडेल. लिहाल काय?