निसर्गाला काही फरक पडत नाही!!!!!!!!!!!!!
जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती, कारण तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणीत राहून आपणही घाण होतो म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं आणि अक्कल भराभरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, शिशुवर्ग म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमवलेल्या अकलेचा एखाद-टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय.
इथे निसर्गाचा एकच कायदा आहे, 'आपण जगायचं, दुस-याला मारायचं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!! माणूस निसर्गाच्या वर चढू पाहतोय म्हणतात. शक्यच नाही. निसर्गाने माणसाला जसा तयार केलाय, जसा घडवलाय, अगदी तसाच तो वागतोय. तो कोणतेच नियम मोडत नाही. मानवाने इतर प्राण्यांची शिकार केली, म्हणून आज काही जाती नष्ट होतायत, झाल्यात. इतिहासात मानव यायच्या आधीही ब-याच प्रजाती नष्ट झाल्यात की. आणि शिकार काय फक्त माणूसच करतो? वाघ, सिंह, तरस, लांडगे, चित्ता, बिबट्या असे भरपूर पशू आहेत. मानव हा सुद्धा पशूच. मानवाला पशू म्हटल्याने ना पशूंचा अपमान होतो, ना मानवाचा. कारण खरच तो पशूच आहे, आणि पशूप्रमाणेच वागतो. त्यात काही चुकीचं नाही.
माणूस झाडं तोडतो, तोडत असेल, पण त्यांचा काहीतरी वापर करतो. हत्ती, माकडं यांना मस्ती चढली की विनाकारण कित्येक झाडं हकनाक मरतात. माणूस धरणं बांधून गावं बुडवतो. निसर्ग कित्येक गावं-शहरं तशीही अधुन-मधुन बुडवतच असतो की. शेतक-याला सुखावणारा पाऊस काही पक्ष्यांना, किड्यामुंग्यांना भारी पडू शकतो की. निसर्गातील कोणतीही घटना, त्या घटनेने निर्माण झालेली अवस्था, ही नेहमी काही प्रकारच्या सजीवांना मदत करते, तर काहींचा -हास करते.
आपण स्वतःला निसर्गापेक्षा वेगळे का म्हणतो हेच मला कळत नाही. सोयीचं जातं म्हणून? अरे पण सोयीच्या फंदात आपण आपलं मूळ विसरून जातो त्याचं काय!! आपण बांधलेली इमारत 'मानव-निर्मित' आणि मुंग्यांनी बांधलेली मोठीच्या मोठी वारुळं मात्र निसर्गाची किमया?? का?? आपल्या बिल्डिंग्ज, टॉवर्स, इतर सर्व वास्तू, ही निसर्गाचीच किमया आहे. आपण कशाचीही निर्मिती केली, की ती निसर्गाची कल्पकता आहे. आणि जर आपण विध्वंस केला, तर तो निसर्गाच्या रुद्रावताराचाच एक अंश आहे.
त्यामुळे आपण आज कितीही प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या जाती नष्ट केल्या, कितीही खनिजं उकरून पृथ्वीच्या पोटातलं सगळं वापरून संपवून टाकलं, तरी निसर्गाची काळजी करण्याचं काही कारण नाही. फार फार तर काय होईल? सगळे बर्फ वितळतील, सगळी शहरं बुडतील. बरेच जीव मरतील. त्यात माणसं सुद्धा. मरुदेत!!! निसर्गाला काही फरक पडणार नाहिये. या घटनेला आपण जरी 'महाप्रलय' असं नाव दिलं, तरी त्यात विशेष असं काहीच होणार नाहीये. एके काळी जगात जिकडे तिकडे डायनॉसॉर्स होते, आता ते कुठेच अस्तित्वात नाहियेत. त्याच प्रकारे आज जगात जिकडे तिकडे कच-यासारखी मानवजात पसरलीये. महाप्रलयानंतर ती कुठेही आढळणार नाही. नाही तर नाही. डायनॉसॉर गेले म्हणून निसर्गाचं काही बिघडलं? मग माणूस गेल्याने तरी काय मोठं होणार आहे? सगळेच जीव तर जाणार नाहीत. आणि निसर्गाची किमयाच म्हणता, तर महाप्रलयात असे जीव उत्क्रांत होतील, ज्यांना त्यावेळी त्या परिस्थितीत स्वतःची जीवनपद्धती प्रस्थापित करता येईल. जीवसृष्टी आहे तश्शीच राहील... फक्त थोडे फार फेर बदल होतील इतकंच... सजीवाचा आकार, रंग, गुणधर्म बदलला, बदलुदे!! काय वाईट झालं? काही नाही.
तेव्हा निसर्गाची काळजी करणा-यांनी ती अजिबात करु नये. काळजी करायला हवी ती माणसाने, स्वतःचीच. आपण जे काही उपद्व्याप चालवल्येत, ते आपल्याच अस्तित्वावर घाला घालतील, निसर्गाला घंटा फरक पडणार नाही, त्याचा उलट चांगलाच टाईमपास होईल.
जगाचं समीकरण हे असं साधं सिम्पल आणि सरळसोट आहे - शक्ती, बुद्धी, आणि क्रौर्य!! या ३ गोष्टींचा समेट ज्या जीवात नीट घडून येईल, तो जीव जगेल. बाकीचे गेले तेल लावत!! आता मला सांगा, अशा या जगात फक्त बुद्धी घेऊन आलेल्या माझ्यासारख्या अडीच वीत उंचीच्या जीवाला, रडायला नाही का येणार?? जग नेहमी समतोल राखून असतं. त्यामुळे जशी माझी शक्ती आणि माझं क्रौर्य वाढत गेलं, तशी माझी बुद्धी त्या प्रमाणात कमी कमी होत गेली. आज माझ्यात या तिन्ही गोष्टी नेमक्या किती प्रमाणात आहेत, माहित नाही. पण तिन्ही आहेत. नाहीतर मी जिवंत कसा राहिलो असतो? सर्व्हाइव्ह कसा झालो असतो? शेवटी मी कोण आहे? मी निसर्ग आहे. आणि हा सगळा पसारा मी मला स्वतःशीच खेळता यावं, म्हणून माझ्यासाठीच मांडून ठेवलाय!!!
(इतरत्र पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
त्या लेखावर हा उतारा आहे काय?
त्या लेखावर हा उतारा आहे काय?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तसं समजा हवं तर... ज्यांना
तसं समजा हवं तर...
ज्यांना पर्यावरणाची पर्वा नाही त्यांनी किमान स्वतःची पर्वा करून, स्वतःचा स्वार्थ बघून तरी आपल्या पर्यावरणाला हानीकारक अशा अनावश्यक गोष्टी करणं बंद करावं एवढीच अपेक्षा.
बाकी हा लेख तसा जुना आहे. म्हणजे सणांवरील लेखापेक्षा... पण त्यात (किंवा यात) मांडलेल्या विचारांमध्ये अजूनही फरक पडलेला नाहीये.
मेलेल्या प्रजातींचं नशीब वाईट
मेलेल्या प्रजातींचं नशीब वाईट होतं. मानवाचा वंश राहावा, कदाचित त्यांचं नशीब चांगलं असेल. किमान आत्मवंशनाश करू नये.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथे निसर्गाचा एकच कायदा आहे,
निसर्ग आणि मनुष्य हे द्वैत चुकीचं आहे हा लेखाचा मुद्दा मान्य आहे. मात्र अनेक लोकांत 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' या वाक्यासंबंधी गोंधळ असतो. या वाक्याचा अर्थ 'क्रौर्य, शक्ती, स्वार्थ' हे ज्याकडे अधिक आहे त्याचाच विजय, आणि हा निसर्गाचा नियम असल्यामुळे 'असं व्हावं ही निसर्गाचीच इच्छा आहे' असा काढला जातो.
खरं तर सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मध्ये खूपच अधिक अंतर्भूत आहे. ज्या ज्या गुणांचा आपली जनुकं पुढे न्यायला उपयोग होतो असे गुण निर्माण करणारी जनुकं पुढच्या पिढीत दिसून येतात. पण सर्व्हायव्हल साठी केवळ 'क्रौर्य, शक्ती, स्वार्थ' हेच उपयुक्त असतात असं नाही. आईने आपल्या मुलावर प्रेम करणं, त्याचं संरक्षण करणं, त्याचं संगोपन करणं यासाठी जे गुण आवश्यक असतात तेही टिकून राहण्यासाठी उपयुक्त असतात. ते गुणही 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' मधूनच टिकलेले आहेत. समाजातील इतरांसाठी आपला जीव देण्याची तयारी ठेवण्याचे गुणही असेच टिकलेले आहेत. प्रेम, त्याग, निस्वार्थीपणा, बंधुभाव हेही 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' मधूनच आलेले आहेत. सेल्फिश जीन या पुस्तकात निस्वार्थीपणा हा उत्क्रांतीत कसा निवडला जातो याचं उत्कृष्ट वर्णन आहे.