आईची जात
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या अपत्यांना सरसकट पित्याची जात लावण्याच्या आणि एक प्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीचे जतन करण्याच्या पारंपरिक निर्णयाला छेद देणारा एक महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे.
संदर्भ लोकसत्तामधील ही बातमी
या बातमीत म्हटले आहे की
गुजरातमधील आंतरजातीय विवाह केलेल्या अनुसूचित जमातीमधील आई आणि मागासवर्गीय नसलेल्या वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या रमेशभाई डायाभाई नायका या तरुणाचे हे प्रकरण आहे. आईच्या जातीनुसार रमेशभाई याने आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणातून स्वस्त धान्य दुकान घेतले, परंतु गुजरात न्यायालयाने व जात पडताळणी करणाऱ्या समितीने त्याला आईची जात घेता येणार नाही, असे सांगून त्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले. त्यामुळे सरकारी कोटय़ातून मिळालेल्या दुकानाला त्याला मुकावे लागले. रमेशभाई नायक याने न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्याला आदिवासी प्रमाणपत्र नाकारताना उच्च न्यायालयाने व छाननी समितीने केरळमधील १९९६ च्या वलसम्मा पॉल विरुद्ध कोचिन विद्यापीठ या खटल्याच्या निकालाचा आधार घेतला होता.
मात्र, नायकाचे आदिवासी असल्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविणारा गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून हे प्रकरण छाननी समितीकडे फेरविचारार्थ पाठविताना, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलामुलींनी आईच्या जातीच्या प्रमाणपत्राची मागणी केल्यास योग्य पुरावे सादर करून ते मिळविण्याची संधी त्यांना दिली पाहिजे, असे म्हटले आहे.
यासंबंधीचे बातमीत उल्लेख असलेला याआधीचा उच्च न्यायालयांचे निकाल वलसम्मा पॉल वि. कोचिन विद्यापीठ इथे वाचता येईल.
मागास समाजातील आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना योग्य पुरावे सादर करून आईच्या जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची संधी दिली पाहिजे, या न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. तुम्हाला काय वाटते?
-- हा कायदा झाल्यास महाराष्ट्राचा हा निर्णय पुरोगामी ठरेल का?
-- या निर्णयाचे समाजावर परिणाम कसे होतील असे तुम्हाला वाटते? काहि परिणाम होईल का? या निर्णयाचे परिणाम लगेच दिसू लागतील का याचे दूरगामी परिणाम असतील असे तुम्हाला वाटते?
-- या मुळे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळेल असे तुम्हाला वाटते का?
-- यामुळे स्त्रीयांकडे किंवा मागासवर्गीय स्त्रीयांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात काहि बदल होईल असे तुम्हाला वाटते का?
अर्थात चर्चा याच मुद्द्यांवर सिमीत करण्याचा हेतू नाही. प्रश्न केवळ दिशादर्शनासाठी आहेत. मात्र समांतर मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे
प्रतिक्रिया
या दुव्यावर नाननीया यांच्या
या दुव्यावर नाननीया यांच्या केसचा निकाल आहे, ज्याचा आधार घेऊन सरकार हा कायदा आणण्याचा विचार करत आहे
अवांतरः
या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने दिलेली जुनी जजमेंट्स कशी शोधायची हे देतो.
१. सुप्रीम कोर्टाने यासाठी जजमेंट्स इन्फॉर्मेशन सिस्टिम तयार केली आहे.
२. या दुव्यावरून निकालाची तारीख, जजचे नाव, वगैरे ८-१० क्रायटेरीया वापरून निकाल शोधता येतो.
३. याच साईटच्या होम या पानावरून उच्च न्यायालयाच्याही निकालांसाठीच्या संस्थळांचे दुवे मिळतात (डावीकडे)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असे वाटत नाही
'पुरोगामी' आहे किंवा कसे, याने नेमका काय फरक पडतो? अफेक्टेड पार्टीज़ना हितकारक आहे किंवा नाही, हे महत्त्वाचे.
मुळात आंतरजातीय विवाहांस प्रोअॅक्टिव/अफर्मेटिव प्रोत्साहन का असावे, ते कळले नाही. (बंदी असू नये, हे समजण्यासारखे आहे, पण तशीही भारतात कायद्याने अशी बंदी बहुधा नसावी. बाकी हा ज्याच्यात्याच्या / जिच्यातिच्या निवडीचा प्रश्न अत एव ऐच्छिक मामला आहे.) पण तो वेगळा मुद्दा आहे.
बाकी, असा काही कायदा केल्यामुळे आंतरजातीय विवाह (विशेषतः, जेथे दांपत्यापैकी एक आणि एकच जण मागासवर्गीय आहे, असे आंतरजातीय विवाह - अदर इंटरकम्यूनल कपल्स नीड नॉट अप्लाय.) करू पाहणार्या काही दांपत्यांचे भविष्यकालीन (विवाहोत्तर, आणि विशेष करुन संततिप्राप्त्योत्तर) आयुष्य काही प्रमाणात सुकर होण्यास कदाचित मदत होऊ शकेल (आणि ते ठीकच आहे), परंतु त्यामुळे आंतरजातीय विवाहांस प्रोत्साहन वगैरे मिळेल ('का मिळावे?' हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू.), असे काही वाटत नाही.
विवाहाचा मूळ अथवा प्राथमिक उद्देश हा 'कोण जाणे, कदाचित पुढेमागे आपल्याला कधीतरी संततीसुद्धा होईल, आणि त्या परिस्थितीत त्या संततीस काही सरकारी फायदे मिळावेत' असा बहुधा नसावा (चूभूद्याघ्या), आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बहुधा कोणी बोहल्यावर चढत नसावे. (निदान, असा अंदाज आहे. अपवादांनी - असल्यास - क्षमा करावी.) त्यामुळे, असा काही कायदा केल्यास, आधी म्हटल्याप्रमाणे, अफेक्टेड पार्टीज़चे आयुष्य सुकर होण्यासाठी कदाचित मदत होऊ शकेलही, आणि ते वांच्छनीयच आहे; परंतु अशा कायद्याच्या तथाकथित प्रोत्साहनाने लोक अधिकाधिक प्रमाणात आंतरजातीय विवाह (पुन्हा, एक आणि एकच जोडीदार जेथे मागासवर्गीय आहे, केवळ असेच आंतरजातीय विवाह - अदर इंटरकम्यूनल कपल्स नीड नॉट अप्लाय.) करू लागतील, जे अशा कायद्याअभावी त्यांनी केले नसते, असे वाटत नाही.
बाकी, अशा कायद्याने कोणाला कसा फरक पडू शकेल, त्याचा विचार करणे काही निष्कर्षाप्रत येण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरावे.
केस अ: आंतरजातीय दांपत्य, दोन्ही जोडीदार बिगरमागासवर्गीय.
या स्थितीत, दांपत्यापैकी कोणताही जोडीदार सरकारी सवलतींस पात्र नसल्याने, अशा कायद्यामुळे अशा दांपत्यावर काहीही फरक पडणार नाही.
केस ब: आंतरजातीय दांपत्य, दोन्ही जोडीदार मागासवर्गीय.
या स्थितीत, दांपत्यापैकी दोन्ही जोडीदार सरकारी सवलतींस पात्र असल्याने, अशा कायद्याच्या अनुपस्थितीतसुद्धा सदर सवलती मिळतीलच. त्यामुळे, काहीही फरक पडणार नाही.
केस क: आंतरजातीय दांपत्य, पती मागासवर्गीय, पत्नी बिगरमागासवर्गीय.
या स्थितीत, अशा कायद्याच्या अनुपस्थितीतसुद्धा प्रचलित कायद्यानुसार सदर सवलती मिळतीलच. त्यामुळे, काहीही फरक पडणार नाही.
केस ड: आंतरजातीय दांपत्य, पत्नी मागासवर्गीय, पती बिगरमागासवर्गीय.
या स्थितीत, नवीन कायद्यामुळे फरक पडू शकेल. पण तरीही, पुढेमागे कधीतरी होऊ शकणार्या अपत्यांना मिळू शकणार्या सरकारी सवलती हे बहुतांशांचे विवाहाचे आदिम उद्दिष्ट नसल्याकारणाने फारसा फरक पडेलसे वाटत नाही.
परंतु तसाच जर विचार करायचा म्हटला, अर्थात, या स्थितीत जर काही फरक पडू शकेल, असे मानायचेच म्हटले (जे मला मान्य नाही; पण तरीही), तर फार फार तर बिगरमागासवर्गीय पुरुषास मागासवर्गीय स्त्रीशी विवाह करण्यास यातून प्रोत्साहन मिळू शकेल, असे म्हणता येईल. आता उलट बाजूने विचार करून बघू. या अरेंजमेंटमुळे त्या मागासवर्गीय स्त्रीचा नेमका काय फायदा? तिने बिगरमागासवर्गीय पुरुषाशी लग्न केले काय, किंवा विजातीय मागासवर्गीय पुरुषाशी लग्न केले काय, किंवा स्वजातीय मागासवर्गीय पुरुषाशी लग्न केले काय, तिच्या संततीला या नवीन कायद्यान्वये सरकारी फायदे हे मिळणारच आहेत. मग तिला मुद्दाम होऊन आंतरजातीय विवाह करण्यात काय हशील? तिला यातून प्रोत्साहन नेमके कसे?
म्हणजे, 'आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन' असेच जर या कायद्यामागील उद्दिष्ट असेल (जे तसे आहे हे मला पटलेले नाही, आणि या प्रस्तावित कायद्यात काही गैर आहे, असेही वाटत नाही), तर ते 'प्रोत्साहन' अतिशय पुरुष-सेंट्रिक व्ह्यूमधून आहे, असे म्हणावे काय?
<उपरोध>हो तर! यातून स्त्रियांकडे, विशेषकरून मागासवर्गीय स्त्रियांकडे, 'पुढेमागे आपल्याला कधीतरी होऊ घातलेल्या संततीस सरकारी सवलती मिळवून देण्याचे हमखास वाहन' म्हणून बघण्याचा अत्यंत निकोप दृष्टिकोन निश्चितच वाढीस लागेल.</उपरोध>
उपरोध बाजूस ठेवता, स्त्रियांकडे अथवा मागासवर्गीय स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात यातून काहीही - सकारात्मक अथवा नकारात्मक - फरक पडेल, असे मला वाटत नाही.
(तसेही, हा कायद्यामागे फक्त 'अफेक्टेड पार्टीज़ना रिलीफ' अथवा 'मागासवर्गीयांस कायद्याने उपलब्ध असलेल्या सवलतींच्या वितरणाकरिताच्या पात्रतेच्या निकषांत समानता आणणे' एवढाच मर्यादित उद्देश असावा. त्यास 'आंतरजातीय विवाहांस प्रोत्साहन', 'परजातीकडे पाहण्याच्या समाजातील दृष्टिकोनात बदल घडवून आणणे' वगैरे वरकरणी उदात्त वाटणारी परंतु पूर्णपणे असंबद्ध अशी उद्दिष्टे - तशी ती मुळात नसताना - चिकटवणे हे फिज़ूल वाटते. अन्यथा, दिल्ली हायकोर्टाने समलिंगी संबंधाविरोधीच्या ज्या पुरातन ब्रिटिशकालीन कायद्याच्या अंमलबजावणीवर काही काळापूर्वी स्थगिती आणली, त्या मूळ कायद्यामुळे हिंदुस्थानात आंतरलैंगिक विवाहांस प्रोत्साहन मिळाले, आणि त्यातून आपल्याहून वेगळे लिंग असणार्या व्यक्तीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही अंशी तरी फरक पडला, असाही काहीबाही दावा करता येईलच. असो.)
प्रतिसाद आवडला! बहुतांश सहमत
प्रतिसाद आवडला!
बहुतांश सहमत आहे
अवांतरः
आंतरजातीय विवाहातून होणाती अपत्ये सजातीय विवाहातून होणार्या अपत्यांपेक्षा हुशार (पक्षी: केवळ पुस्तकी असे नव्हे तर त्यांच्या क्षेत्रात सरस)होतात असे म्हटले जाते. यात काहि अंशी तथ्य किती आहे माहित नाही. मात्र असे तथ्य असेल तर मग अश्यावेळी आंतरजातीय विवाहांस प्रोत्साहन देणे योग्य ठरावे का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वैयक्तिक निवडीचा प्रश्न
प्रतिपादनात तथ्य किती आहे याबद्दल खात्रीलायक माहिती नसल्याकारणाने पुढील चर्चा फिज़ूल आहे. परंतु तरीही...
समजा, या प्रतिपादनात तथ्य आहे, असे मानून चालू. पण तरीही, प्रोत्साहन कोणी आणि काय म्हणून द्यायचे, हा प्रश्न आहे. शेवटी, आपले अपत्य किती हुशार असावे, ही त्या पालकांची वैयक्तिक निवड असावी, नाही का?
समजा, आम्हांस आमची मुले होतील तशी ठीक आहेत, आंतरजातीय विवाह करणारांची मुले जर अधिक हुशार निपजत असतील, तर त्यांना ती लखलाभ होवोत, तशीही ही अनप्रूवन रेमेडी आहे, टाऊट (tout) करणार्यांनी ती जरूर टाऊट करावी, ते घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना जरूर आहे, परंतु आम्ही आपले caveat emptor हेच धोरण ठेवणे पसंत करू, अशी जर एखाद्या (सजातीय) दांपत्याची भूमिका असेल तर? त्यांना ती कोणी आणि कोणत्या अधिकाराने नाकारावी?
- (प्रो-चॉइस) 'न'वी बाजू.
हा कायदा हुशार मुलांच्या
हा कायदा हुशार मुलांच्या पैदाईशीला प्रोत्साहन द्यावे म्हणून नाही पण तो (असेलच तर)साईड इफेक्ट आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पूल विकणे आहे (छोटी जाहिरात)
आमचे येथे तूर्तास काही पूल विक्रीकरिता उपलब्ध आहेत. नयनाकर्षक, लक्षवेधक. चारचौघांत चर्चाविषय होण्याची हमी. आपली ख्याती पंचक्रोशीत पोहोचेल, अन्यथा आपले पैसे परत. मोठमोठे सत्ताधीश, झालेच तर चित्रपटअभिनेते आमचे पूल विकत घेण्यासाठी मरतात. त्या ख्यातनामांच्या मांदियाळीत आपणही सामील व्हा ना! अत्यंत माफक दर. त्वरा करा, त्वरा करा! अशी सुवर्णसंधी पुन्हा येणे नाही. लवकर ऑर्डरी नोंदवा. पहिल्या पाच ऑर्डरी नोंदवणार्या भाग्यवंतांस पुलासोबत शनवारवाडा मोफत भेट. त्यापुढील पंचवीस ऑर्डरींसोबत आयफेल टॉवर. इतरही चित्ताकर्षक बक्षिसे. ऑर्डरीपासून एका महिन्याच्या आत मोफत घरपोच डिलीवरी. त्याहूनही त्वरित (दोन आठवड्यांत) डिलीवरीकरिता अतिरिक्त आकार. आजच या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, आणि आपली ऑर्डर नोंदवा. आम्ही सर्व प्रकारची क्रेडिट कार्डे, तसेच रोख रक्कम स्वीकारतो.
'ऐसीअक्षरे' व्यवस्थापनास विनंती: अशा प्रकारच्या छोट्या जाहिराती येथे प्रकाशित करणे हे या संस्थळाच्या धोरणाविरुद्ध असल्यास कृपया तसे जरूर कळवावे, म्हणजे पुढील वेळी आपला इष्ट संदेश ईप्सित गंतव्यस्थानी पोहोचवण्याकरिता अन्य मार्गांचा अवलंब करण्याचा विचार करता येईल.
(अधिक माहितीकरिता)
काही रोचक दुवे:
"पूल विकणे" - एका किफायतशीर उद्योगसंकल्पनेचा उगम
यशस्वी पूलविक्रीउद्योजक
आणखी एक पूलविक्रेता
"आमच्या जगभर शाखा आहेत"
पूलविक्री संकल्पनेचा अर्थ आणि त्यामागील मनोभूमिका/मनोव्यापार
विकल्प/पाठभेद:
"If you believe that, I have a bridge to sell you."
"If you believe that, I have a few bridges to sell you."
"If you believe that, I have a bridge for you."
"I have a bridge for you."
प्रकाटाआ
प्रतिसाद वर योग्य ठिकाणी हलवला आहे.
'न'वी बाजू यांचा प्रतिसाद
'न'वी बाजू यांचा प्रतिसाद आवडला, पटला.
एकीकडे जात, भाषा, धर्म इत्यादी भेद मिटावेत असे प्रयत्न सुरू असतानाच स्त्रियांना पुरूषांएवढेच हक्क असावेत असेही विचार आहेत, पण 'समाज ही गुंतागुंतीची चीज आहे' याचंही भान असल्यामुळे अशा प्रश्नांसाठी माझ्या दृष्टीने सर्वसमावेशक, आदर्श पण व्यावहारिक उत्तर काय असेल हे अजून ठरवता आलेलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उगाच होऊ घातलेला कायदा
'न'वी बाजू यांच्याशी एकुणात सहमत आहे.
सदर कायद्याने फार काही साध्य होण्यासारखे नाही. त्या सो कॉल्ड सवलतीसाठी उच्चवर्गीय पुरुष मागास स्त्रीशी विवाह करतील हे संभवत नाही. आईची जात मिळण्याने पुरुषप्रधानता नष्ट / कमी होईल असेही वाटत नाही.
@ऋषिकेश
>>आंतरजातीय विवाहातून होणाती अपत्ये सजातीय विवाहातून होणार्या अपत्यांपेक्षा हुशार (पक्षी: केवळ पुस्तकी असे नव्हे तर त्यांच्या क्षेत्रात सरस)होतात असे म्हटले जाते. यात काहि अंशी तथ्य किती आहे माहित नाही. मात्र असे तथ्य असेल तर मग अश्यावेळी विवाहांस प्रोत्साहन देणे योग्य ठरावे का?
अशी थिअरी बहुधा नाही. उलट शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशी कायतरी थिअरी आहे. ['इनब्रीडिंग वाईट' ही थिअरी फक्त कुटुंबांतर्गत संबंधाविषयी आहे. जातिअंतर्गत संबंधाविषयी नाही]
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
यावर मी वाचलेला तर्क
यावर मी वाचलेला तर्क असा:
शुद्ध बीज वगैरे समज आहेत. बहुदा जितकी जेनेटिक डायव्हरसिटी अधिक उत्तम ब्रीडींग ची शक्यता वाढते. अनेक वर्षे एकाच जातीत लग्ने होऊन गुणसुत्रांमधील वैविध्य कमी होते. एकाच कुटुंबात जसे होते तेच वर्षानूवर्षे एकाच जातीत लग्न झाल्याने होत असावे (जात हे एक मोठ्ठे कुटुंब वगैरे वगैरे) असा काहिसा तर्क असावा.
नंतर जालावर शोधून बघतो काहि मिळते का
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सवलती/वैवाहिक निवड
सवलती दिल्यास विवाहात आंतरजातीय निवड अधिक होईल काय?
"नाही" या मताकडे मी झुकतो आहे, पण याचे उत्तर मला तरी निश्चित वाटत नाही. निरीक्षणांचे आत्त बघावे लागेल.
गृहीते :
(१) आजमितीला थोडेतरी आंतरजातीय विवाह होतात. (निरीक्षणसिद्ध)
(२) आजमितीला कित्येक विवाहात एका तरी पक्षाला एकाहून-अधिक-पर्याय असतात. (निरीक्षणसिद्ध)
(३) विवाह-निवडीच्या पर्यायांत आर्थिक गणिते होतात. (निरीक्षणसिद्ध)
(४) (१ आणि २ वरून "इंटरसेक्शन सेट असू शकेल" असा संदिग्ध कयास - निरीक्षण केलेले नाही) अशी काही विवाहेच्छुक असावेत, की त्यांना आंतरजातीय आणि स्वजातीय असे दोन्ही प्रकारचे पर्याय असतील.
(५) (३ आणि ४ वरून "इंटरसेक्शन सेट असू शकेल" असा संदिग्ध कयास - निरीक्षण केलेले नाही) असे काही विवाहेच्छुक असावेत, ज्यांना विजातीय/स्वजातीय असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील, आणि नव्या आर्थिक गणितामुळे ते विजातीय जोडीदार निवडतील.
(४) आणि (५) मधील इन्टरसेक्शन सेट नगण्य असतील, तर आंतरजातीय विवाहांच्या संख्येत/टक्केवारीत फरक पडणार नाहीत. पण ते इन्टरसेक्शन सेट नगण्य आहेतच असे काही मी निरीक्षणाशिवाय ठामपणे म्हणू शकत नाही.
- - -
व्यक्तीच्या निवडीत ढवळाढवळ न करतासुद्धा आंतरजातीय विवाहांची टक्केवारी कमी-अधिक करण्याबाबत "समाजाला" देणेघेणे असू शकते. (त्याच प्रकारे व्यक्तीच्या व्यवसाय-निवडीत थेट ढवळाढवळ न-करता, "एकूण त्या व्यावसायिकांची संख्या किती असावी" वगैरे गोष्टी समाजाच्या अख्त्यारीत आहेत.)
उगाच आपली एक शंका.
मी चर्चा काही वाचलेली नाहिये.
पण उगाच आपली एक शंका.
या निर्णयाची 'भगवी' बाजू म्हणजे 'लव्ह जिहादला' आळा बसणे असे होईल काय?
म्हणजे कुणा अल्पसंख्यांकाने समजा कुणा उच्च जातीतील कन्येस 'गटवले' तर सहाजिकच मुलांना उच्च जातच घ्यावी लागणार?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
जात
मूळात धर्म, जात यावर आधारीत वर्गीकरण अथवा भेदभाव हेच पटत नाही पण ते जिथे हा भेद अटळ आहे अश्या ठिकाणी किमान स्त्रिच्या ओळखीलाही महत्त्व आले हे त्यातल्या त्यात बरे वाटले.
आजकाल काही मोजक्या ठिकाणी वडिलांसोबत आईचेही नाव लिहायला लागते त्यावेळी आयांना समाधान वाटल्याचे पाहिले आहे. त्यामुळे या निर्णयाचा समाजावर जातिनिहाय काय परिणाम होईल याची कल्पना नाही पण स्त्रियांची ओळख जपायला मदत होईल असे वाटते.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
+१
>>यामुळे या निर्णयाचा समाजावर जातिनिहाय काय परिणाम होईल याची कल्पना नाही
सहमत आहे.
आमच्या ओळखीच्या पाच सहा स्त्रियांनी पहिल्याच ओळखीत आपण माहेरच्या ब्राह्मण असल्याचे आम्हाला आवर्जून सांगितले होते. तेव्हा आंतरजातीय (उच्चजातीय पुरुष आणि कनिष्ठजातीय स्त्री) विवाहातील संतती (कागदोपत्री कुठलीही जात लावत असेल) तरी समाजात आपण उच्च जातीचे असल्याचेच सांगेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुमच्या आडनावावरून तुमची आणि
तुमच्या आडनावावरून तुमची आणि त्यांची जात एकच असल्याचं त्यांना वाटल्यामुळे सांगितलं असण्याचीही शक्यता आहे. आपली जात वरची असण्यापेक्षा, आपण एकाच जातीचे, असा विचार असू शकतो. एकच आडनाव (वेगळी जात, भाषा), मूळगाव, शिक्षणसंस्था किंवा इतर काही समान धागा असल्यासही अशा प्रकारच्या गप्पा होतात.
अर्थात जातीभेद संपवण्यात याचा फार फायदा नाहीच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आदिती १००% बरोबर अदमासा आहे तुझा
अगदी १००% योग्य बोललीस. माझीही आई ब्राह्मण आहे आणि वडील सीकेपी. मी जिथे जे समान धागी (जातीचे) लोक दिसतील तिथे त्या जातीची म्हणून सांगते
म्हणजे ब्राह्मणांना आईची जात सांगते तर सीकेपींना बाबांची सांगते....... अर्थात जर विषय निघाला तर. अन्य कोणाला सांगवयास जात नाही. पण अन्य कोणी विचारली तर बाबांची सांगते, कारण तीच मी लावते.
वदतो व्याघातः?
वदतो व्याघातः?
माझे धोरण
माझे धोरण किंचित वेगळे आहे.
माझे वडील पुरुष होते, आणि आई स्त्री. मात्र, मी वडिलांचे लिंग लावत असल्याकारणाने, सगळ्यांना तेच सांगतो. म्हणजे, पुरुषांनाही 'मी पुरुष आहे' असेच सांगतो, आणि स्त्रियांनाही 'मी पुरुष आहे' असेच सांगतो. अन्य कोणाला सांगण्याचा आजवर प्रश्न आलेला नाही.
विषय निघण्याची वाट पाहण्याच्या मी भरीला पडतोच, असेही नाही. सांगावेसे वाटले, तर जरूर, विनासंकोच सांगतो. नाही सांगावेसे वाटले, नाही सांगत. अपन की मर्ज़ी के मालिक.
खूप छान प्रतिसाद. आपले
खूप छान प्रतिसाद. आपले प्रतिसाद नेहमीच रोचक वाटतात

वरील प्रतिसादात "वदतो व्याघात" का कायसं संस्कृत वचन आपण वापरले आहे. मला अर्थ माहीत नाही. पण रोख हा असावा की मी जात इथे का सांगते आहे? जर या "जातीच्या" धाग्यावर ते आपल्या लक्षात येत नसेल तर मी कितीही कंठशोष केला तरी कळणार नाही तेव्हा सांगायच्या भानगडीत पडत नाही. कसे
क्षमस्व!!!
वरील माझा स्नॅपी प्रतिसाद लिहील्यानंतर टोचणी लागून राहीली की उगीच "डिफेन्सिव्ह आणि स्नॅपी" झाले...... अक्षरक्षः कारण नसताना. नवीबाजू यांनी "वदतो व्याघ्यात?" (तर्कसुसंगत नसणे) असा केवळ प्रश्न विचारला आहे.
एक तर नवीन संस्कृत वचन कळाले दुसरे जातीचा उल्लेख खरच तितकासा आवश्यक नव्हता :(. त्याऐवजी "अ", "ब" घातले असते तर बरे झाले असते. आता पोटप्रसादामुळे संपादन करता येत नाही.
वेल!!!! गुड्नाईट्.....झोपेची खरच गरज आहे. टुमॉरो इज अनदर डे!!!
असो.
माझ्या आई वडलांची पोटजात वेगळी होती. आईकडच्या नातेवाईकांसमोर असे विषय निघाल्याचं आठवत नाही. पण वडलांकडच्या काही नातेवाईकांमधे आपली पोटजात श्रेष्ठ अशी भावना होती. त्यांच्यासमोर न चुकता त्या पोटजातीचे (सरसकटीकरण केलेले) अवगुण मोजून दाखवत असे. एक-दोनदा असे प्रकार केल्यावर "आमच्या खानदानात सुंदर दिसण्याची आणि हुशार असण्याची खानदानी परंपरा नाही, पण मी आणि माझा भाऊ त्याला अपवाद आहोत" हे ब्रह्मास्त्र काम करून गेलं.
अलिकडच्या काळात आईच्या पोटजातीचे लोकं या पोटजातीवरून फार डोकं उठवायचे. मग त्यांनाही हे ब्रह्मास्त्री वाक्य थोडा फेरफार करून ऐकवलं; नंतर त्यांनी फारसं पीडलं नाही. असो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.