इतिहास

इंग्लंड आणि स्कॉटलंड

सध्या स्कॉटलंडने ग्रेट ब्रिटनपासून फारकत घ्यावी काय ह्या विषयाने वृत्तपत्रांचे रकाने भरून वाहत आहेत. त्या अनुषंगाने मुळात हे दोन एकेकाळचे प्रतिस्पर्धी देश एकत्र झालेच कसे ह्याविषयीची इंग्लंड आणि स्कॉटलंड ह्यांच्या राजघराण्यांतील गुंतागुंतीची नाती आणि संबधित व्यक्तींचा मनोरंजक इतिहास ह्याबाबतची डोक्यात असलेली बरीचशी अडगळ साफ करण्याचा हा प्रयत्न आहे.

आठव्या हेन्री टयूडरच्या (१४९१-१५४७) सहा बायका. पहिली कॅथेरिन ऑफ आरागॉन. हिला एक मुलगी - मेरी, जिला नंतर ब्लडी मेरी असे उपपद मिळाले. लग्नानंतर चौदा वर्षांमध्ये कॅथेरिन हेन्रीला राजपुत्र आणि राज्याचा वारस देऊ शकली नाही ह्या खर्‍या कारणासाठी तिला १५३३ मध्ये घटस्फोट देण्यात आला आणि हेन्रीचे मन जडलेली अ‍ॅन बुलीन लगेचच राणी झाली. तिची मुलगी म्हणजे एलिझाबेथ (१५३३-१६०३), जी एलिझाबेथ पहिली म्हणून नंतर राज्यावर आली. लग्नानंतर तीन वर्षांत व्यभिचाराच्या कारणासाठी अ‍ॅन बुलीनचा शिरच्छेद झाला. तिच्या लवाजम्यामधील जेन सीमोर हिच्यावर हेन्रीचे मन एव्हांना बसले होते आणि अ‍ॅन बुलीनच्या शिरच्छेदानंतर लवकरच हेन्रीने जेन सीमोरशी विवाह केला. हेन्रीला हवा असलेला राजपुत्र, जो हेन्रीनंतर सहावा एडवर्ड (१५३७-५३) म्ह्णून राज्यावर आला, तो सीमोरपासून हेन्रीला मिळाला पण लग्नानंतर सव्वा वर्षात त्या बाळंतपणामध्ये जेन परलोकी गेली. तीन वर्षानंतर गुंतागुंतीच्या राजकारणाचा परिणाम म्हणून हेन्रीने अ‍ॅन ऑफ क्लीव्ज ह्या युरोपातून आयात केलेल्या राजकन्येशी १५४० मध्ये विवाह केला पण पहिल्यापासून हेन्रीचे तिच्यावर कधीच मन बसले नाही. तिलाहि हेन्रीमध्ये काहीच स्वारस्य नव्हते म्हणून परस्परसहकार्याने हे लग्न घटस्फोटात मोडले. एव्हांना हेन्रीचे लक्ष अ‍ॅन ऑफ क्लीव्जच्या लवाजम्यातील कॅथेरिन हॉवर्डवर बसले होते आणि जुलै १५४० मध्ये हेन्री आणि कॅथेरिन हॉवर्ड विवाहबद्ध झाले. विवाहानंतर लवकरच कॅथेरिन हॉवर्डच्या विवाहबाह्य संबंधांवर कुजबूज ऐकू येऊ लागली होती, परिणामत: व्यभिचाराच्या आरोपाखाली १५४२ मध्ये तिचा शिरच्छेद करण्यात आला. १५४३ मध्ये हेन्रीने कॅथेरिन पार हिच्याशी विवाह केला पण तदनंतर हेन्री स्वत:च १५४७ मध्ये मृत्यु पावला.

त्याच्यानंतर १० वर्षे वयाचा राजपुत्र सहावा एडवर्ड राज्यावर आला पण १५५३ साली त्याचा वयाच्या १६व्या वर्षी मृत्यु झाला.

कॅथेरिन ऑफ आरागॉन हिला घटस्फोट देऊन अ‍ॅन बुलीनशी लग्न करण्याला पोपची संमति नव्हती ह्या कारणाने हेन्रीने इंग्लंडमध्ये पोपचा अंतिम अधिकार मानण्यास नकार देऊन प्रॉटेस्टंट विचाराला चालना दिली होती आणि सर्व युरोपभर प्रॉटेस्टंट विरुद्ध कॅथलिक अशी रस्सीखेच सुरू झाली होती. कॅथेरिन ऑफ आरागॉनची मुलगी मेरी ही सहाव्या एडवर्डनंतर वारसाहक्काने राज्यावर आली. ती कट्टर कॅथलिक होती आणि तिच्या पाच वर्षांच्या राजवटीत तिने प्रॉटेस्टंटांचा जो छळ केला आणि कित्येकास यमसदनास पाठविले त्यामुळे तिला ’ब्लडी मेरी’ असे नाव मिळाले. तिच्यानंतर १५५८ मध्ये पहिली एलिझाबेथ राज्यावर आली. तिच्या यशस्वी आयुष्यामध्ये बिटनवर येऊ घातलेले स्पेनचे परचक्र उलटविणे, स्पॅनिश आर्माडा (नौदल) नष्ट करणे अशा कार्यामधून ब्रिटनमध्ये राष्ट्रीय भावना रुजविणे ह्या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. शेक्स्पीअर, फ्रान्सिस बेकन, वॉल्टर रॉलि, फ़्रन्सिस ड्रेक हे हिचे समकालीन. १६०३ मध्ये तिचा मृत्यु झाला. अखेरपर्यंत ती अविवाहितच राहिली. (ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तिच्याच कालखंडामध्ये पडते.)

ब्रिटनकडून आपली नजर आता स्कॉटलंडकडे आणि स्कॉटलंडची tragic heroine मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिच्याकडे वळवू. इंग्लंड आणि स्कॉटलंड ह्या दोन शेजार्‍यांमधील परस्परद्वेषाला आणि चुरशीला २००० वर्षांचा इतिहास आहे. ’Braveheart’ ह्या अलीकडे बर्‍याच गाजलेल्या चित्रपटात त्याची चुणूक आपल्याला दिसते. १४व्या-१५व्या शतकांपर्यंत युरोपात फ्रेंच आणि स्पॅनिश राष्ट्रांचा वरचष्मा अधिक असे आणि इंग्लंड हे त्यांच्या समोर दुय्यम महत्त्वाचा देश होता. विशेषेकरून फ्रेंच लोक इंग्लंड आणि स्कॉटलंडमधल्या वादात स्कॉटलंडची बाजू उचलून धरून इंग्लंडची कोंडी करण्याचा प्रयत्न सतत करीत असत. फ्रेंच आणि स्कॉट्स ह्यांच्यामधील ह्या जुन्या मैत्रीच्या संबंधांना Auld Alliance (Auld - Old चे स्कॉटिश रूप) असे म्हणतात.

इंग्लंडचा आठवा हेन्री आणि फ्रान्सचा बारावा लुई ह्यांच्यामधील झगडयात फ्रान्सला मदत म्हणून उत्तरेकडून स्कॉटलंडचा राजा चौथा जेम्स ह्याने इंग्लंडवर आक्रमण केले. परिणामत: १५१३ साली फ्लॉडेन फील्डच्या लढाईत स्कॉटिश बाजूचा पराभव होऊन चौथा जेम्स स्वत: लढाईत मारला गेला.

आठव्या हेन्रीची थोरली बहीण मार्गारेट टयूडर हिचे लग्न स्कॉटलंडच्या चौथ्या जेम्सबरोबर झाले होते. त्यांचा मुलगा पाचवा जेम्स (जन्म १५१२) हा एक वर्षाचा असतांना बापानंतर राज्यावर आला. Auld Alliance खाली त्याचे पहिले लग्न फ्रेंच राजा फ़्रान्सिस पहिला ह्याची मुलगी मॅडेलीन हिच्याबरोबर १५३६ मध्ये झाले. लग्नानंतर सहा महिन्यात ती क्षयरोगामुळे वारली आणि जेम्सने मेरी ऑफ गीज (Mary of Guise) ह्या फ्रेंच उमराव घराण्यातील मुलीशी दुसरे लग्न केले. त्यांचे जगलेले एकुलते एक अपत्य म्हणजे मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स् (जन्म १८४२.) तिच्या जन्मानंतर आठवडयामध्येच तिचा बाप जेम्स पाचवा ह्याचा मृत्यु झाला आणि मेरी स्कॉटलंडची राणी बनली.

तिच्या अल्पवयामध्ये स्कॉटलंडचे राज्य तिच्या नावाने तिची आई अणि अन्य राज्यपालक चालवॊत होते आणि मेरीचे बहुतेक बालपण फ्रान्समध्येच गेले. वयाच्या पाचव्या वर्षी तिचा विवाह फ्रेंच राजा हेन्री दुसरा ह्याचा मुलगा राजपुत्र (Dauphin - दोफॅं) फ्रान्सिस ह्याच्याबरोबर ठरविण्यात आला. ह्यापूर्वी आठव्या हेन्रीने तिचा विवाह त्याचा मुलगा एडवर्ड ह्याच्या करण्याचा घाट घातला होता आणि मेरीच्या वयाच्या दहाव्या वर्षी हा विवाह होईल असा करारहि करण्यात आला होता पण एव्हांना प्रॉटेस्टंट विरुद्ध कॅथलिक हा झगडा स्कॉटलंडमध्येहि पोहोचला होता आणि स्कॉटलंडमध्ये कॅथलिक पक्षाची सरशी होऊन मेरीचे प्यादे फ्रेंच बाजूकडे गेले. वयाचे सहावे वर्ष चालू असतांना १५४८ सालात मेरीची रवानगी फ्रन्समध्ये झाली. पुढची १३ वर्षे ती फ्रान्समध्येच राहिली आणि एप्रिल १५५८ मध्ये राजपुत्र फ्रान्सिसबरोबर तिचा विवाह झाला.

त्यानंतर काही महिन्यांतच जुलै १५५९ मध्ये जाउस्टिंगच्या खेळात डोळ्यामध्ये भाला शिरून हेन्री दुसरा ह्याचा मृत्यु झाला आणि फ्रान्सिस हा फ्रान्सिस दुसरा म्हणून फ़्रान्सचा राजा होऊन मेरी राणी बनली.

दुसरा फ्रान्सिस अल्पायुषी ठरला. त्याच्या कानामध्ये त्याला काही विकार होऊन तो विकार मेंदूपर्यंत पसरला आणि डिसेंबर १५६० मध्ये त्याचे आयुष्य संपुष्टात येऊन Queen Mary ही Dowager Queen Mary झाली. तदनंतर नऊ महिन्यांनी ती स्कॉटलंडला परतली. जॉन नॉक्सच्या नेतृत्वाखाली प्रोटेस्टंट पंथाने तेथे चांगलाच जम बसविला होता आणि मेरी कॅथलिक असल्यामुळे तिला विरोध सुरू झाला. दरम्यान आपली आजी मेरी टयूडर हिच्या संबंधातून आपण पहिल्या एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या राज्याचे वारस आहोत असे जाहीर करून घेण्याचा अयशस्वी प्रयत्नहि तिने केला.

१५६५ मध्ये मेरी टयूडर संबंधातून तिच्या नात्यात असलेल्या हेन्री स्टयुअर्ट, लॉर्ड डार्न्ली ह्याच्याशी तिचा विवाह झाला. दोघेहि कॅथलिक असल्यामुळे ह्या लग्नाकडे स्कॉटिश जनता संशयानेच पाहात होती. प्रेमविवाह म्हणून सुरू झालेला हा संबंध लवकरच तणावाखाली आला कारण मेरीचे आपला इटालियन सेक्रेटरी रिझिओ ह्याच्याशी अनैतिक संबंध असावेत अशी शंका लॉर्ड डार्न्लीच्या मनामध्ये होती आणि त्यातून मेरीच्या समोरच रिझिओचा खून करणात आला. ह्यावेळी लॉर्ड डार्न्लीचे मूल - भावी जेम्स सहावा - मेरीच्या पोटात होते.

सहाव्या जेम्सचा जन्म जून १५६६ मध्ये झाला. मेरी आणि लॉर्ड डार्न्ली ह्यांच्यामधील ताणतणावाची वार्ता सार्वत्रिक झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून की काय लॉर्ड डार्न्लीचा निवास असलेल्या राजवाडयात मोठा स्फोट होऊन फेब्रुवारी १५६७ मध्ये त्याचे आयुष्य संपले.

एव्हांना मेरी कॅथलिक स्कॉटिश लॉर्ड बॉथवेल ह्याच्या प्रभावाखाली आली होती आणि लॉर्ड डार्न्लीच्या खुनामध्ये त्या दोघांचाहि हात आहे अशी शंका बर्‍याच जणांना येऊ लागली होती. मे १५६७ मध्ये आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन बॉथवेलने मेरीशी लग्न केले. त्याचा पहिल्या बायकोशी घटस्फोट मान्य नाही म्हणून कॅथलिक आणि ते कॅथलिक आहेत म्हणून प्रॉटेस्टंट अशा दोन्ही गटांचा त्यांना विरोध होता. पाठलाग करणार्‍यांपासून स्वत:चा बचाव करीत दोघे इतस्तत: पळत असतांना बॉथवेल डेन्मार्कला निघून गेला आणि मेरी बंदी झाली. स्कॉटलंडच्या राज्यावरील आपला हक्क सोडण्यास तिला भाग पाडण्यात आले आणि तिच्या जागी तिचा अज्ञान मुलगा जेम्स सहावा १ वर्ष आणि १ महिना इतक्या वयाचा असतांना राज्यावर आरूढ झाला. पुढची काही वर्षे त्याच्या राजपालकांनी त्याचे राज्य चालविले.

१५६८ मध्ये बंधनामधून पळून जाण्यात मेरी यशस्वी झाली आणि सीमेपलीकडे इंग्लंडत तिने आश्रय घेतला. ह्यानंतर २० वर्षांचे उरलेले आयुष्य मेरीने इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नजरकैदेतच काढली.

मेरीचे इंग्लंडात असणे हे बर्‍याच जणांना मान्य नव्हते. ती कॅथलिक असून पहिल्या एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या राज्यावर ती हक्क सांगत आहे म्हणजे इंग्लंडमध्ये पुन: कॅथलिक सत्ता बसविण्याचा हा प्रयत्न आहे अशी शंका ह्याच्या मुळाशी होती.

१५८६ साली ’बॅबिंग्टन कट’ उघडकीस आला. ह्यामध्ये सांकेतिक भाषेमधला मेरी आणि तिच्या कॅथलिक पाठीराख्यांची पत्रे सापडली. एलिझाबेथ राणीला नष्ट करून मेरीची सुटका करायची आणि त्ला इंग्लंडचे राज्य मिळवून द्यायचे असा तो कट होता. ह्या कटामागे स्पेनचाहि हात होता. ह्या तथाकथित कटाबद्दल बर्‍याच शंका आहेत पण त्याचा परिणाम असा झाला की ऑक्टोबर १५८६ मध्ये मेरीची ३६ उमरावांच्या कोर्टापुढे चौकशी होऊन तिला मृत्युदंड सुनावण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्याचा हुकूम देण्यास एलिझाबेथने काही काळ खळखळ केली पण १ फेब्रुवारी १५८७ ह्या दिवशी हुकूम निघाला आणि ७ फेब्रुवारीला संध्याकाळी मेरीचे शीर धडापासून वेगळे करून शिक्षेची अंमलबजावणी झाली. तिचा मुलगा स्कॉटलंडचा राजा जेम्स सहावा ह्याने आपल्या आईचे प्राण वाचविण्यासाठी करंगळीहि उचलली नाही.

अनेक वळणे घेतलेल्या ह्या गोष्टीची अखेर आता जवळ आली आहे. १६०३ मध्ये पहिली एलिझाबेथ जग सोडून गेली. तिच्यानंतर उर्वरित वारस म्हणून जेम्सने ’इंग्लंडचा पहिला जेम्स आणि स्कॉटलंडचा सहावा जेम्स’ अशा बिरुदाने १६२५ पर्यंत राज्य केले. ह्या काळात राजा जरी एक असला तरी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही अलग राज्येच होती. १७०७ मध्ये Act of Union दोन्ही पार्लमेंटांनी मंजूर करेपर्यंत ही स्थिति टिकून राहिली. १७०७ पासून चालत आलेली ही स्थिति अशीच राहते किंवा कसे हे लवकरच कळेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कोंडापूरची दैवते

आंध्र प्रदेश राज्यामधील मेडक जिल्ह्यामध्ये कोंडापूर या नावाचे एक गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला साधारण 1 किमी अंतरावर 35 ते 40 फूट (11 मीटर) उंचीचे एक टेकाड आहे. भारतीय पुरातत्त्व विभागात कार्य करणारे एक ब्रिटिश पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात येथे उत्खनन केले होते. या नंतर 1941-42 मध्ये हैद्राबाद संस्थानाचे निझाम यांच्या संस्थाना मध्ये हा भाग मोडत असल्याने या संस्थानाच्या पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, जी. याझदानी या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या एका पथकाने या जागेवर उत्खनन कार्य केले होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भोजनकुतूहल - ३

भाग १, भाग २.

अन्य शिजवलेली धान्ये, भाज्या, मांस इत्यादींना स्वाद आणण्यासाठी वापरण्याच्या वस्तूंना ’संभार’ असे नाव देण्यात आले आहे. ह्यांमध्ये मोहरी-सर्षप, ओवा-यवनी, जिरे-जीरक, हिंग-हिङ्गु, शेपू-शतपुष्पा-शताह्वा, सुंठ-शुण्ठी, मिरी-मरीच, पिंपळी-पिप्पली, वेलदोडा-एला, लवंग, त्वक्-त्वच-तज-दालचिनी (Laurus cassia मोल्सवर्थ, ह्या झाडाची साल), पत्रक-तमालपत्र (leaf of Laurus cassia मोनिअर-विल्यम्स), जातीपत्री-जायपत्री, जातीफल-जायफळ, कापूरचिनी-कङ्कोल (allspice), नागकेसर, अळता-अलक्तक, केशर-कुङ्कुम, कापूर-कर्पूर, जवादि - एक प्रकारचा सुवासिक पदार्थ, उदी मांजरापासून मिळणारा (मोल्सवर्थ), असे पदार्थ दर्शविले आहेत. ह्यामधील केशर-कुङ्कुम हे लक्षणीय आहे. ’कुङ्कुम’ ह्याचा मूळ अर्थ ’केशर’ असाच आहे. पूर्वकालीन भारतात राजा, राजसभेत बसण्याच्या योग्यतेचे पुरुष इत्यादि कपाळावर केशराचा टिळा लावत असत, स्त्रियाहि सौभाग्यलक्षण म्हणून टिळा लावत. मात्र असा केशराचा नित्य वापर सर्वसामान्यांच्या शक्तीपलीकडील असल्यामुळे हळदीच्या चूर्णावर लिंबाचा रस, तुरटी अशा आम्ल गोष्टींचा प्रयोग करून निर्माण होणार्‍या लाल रंगाच्या कुंकवाचा वापर करण्यास सुरू झाला. कालान्तराने ’कुङ्कुम’ ह्याचा मूळचा ’केसर’ हा अर्थ लुप्तप्राय होऊन हळदीकुंकवातले ’कुंकू’ हा अर्थ अधिक रूढ झाला.

’संभारां’मध्ये ’लवण’ म्हणजे ’मीठ’ ह्याचीहि गणना आहे. ग्रन्थकाराने त्याचे सैंधव, सामुद्र, गाढ-गढ(?) देशातील, द्रोणेय-डोणीचे, औखर-आटुक, रोमक-वाफे-सुकले असे प्रकार दर्शविले आहेत. अन्य ग्रन्थकार अन्य प्रकारची मिठे दाखवतात. Materia Medica of the Hindus ह्या उदय चंद्र दत्तलिखित पुस्तकात सुश्रुताने दिलेले मिठाचे पुढील प्रकार दर्शविले आहेत: सैन्धव-सिंधु नदीच्या परिसरातील खाणीतून निघालेले-शेंदेलोण, सामुद्र-समुद्राच्या पाण्यातून काढलेले, विट् लवण-बिडलोण-पादेलोण म्हणजे सैधवावर आवळ्याची प्रक्रिया करून केलेले काळ्या रंगाचे, सौवर्चल-सुवर्चल (?) देशातील खाणींचे-सोंचल-काला नमक (हिंदी), रोमक-शाकम्बरी-सांभर तलावाचे-रुमा नदीकाठचे, औद्भिद-खारवट (हिंदी-रेह) जमिनीवरचे, गुटिका(?) आणि पांशुज-खार्‍या पाण्याने संपृक्त अशा जमिनीपासून मिळवलेले.

मिठाकडून आता ऊस-साखरेकडे वळू. उसाचे काठया, काळा, तांबडा, पुण्ड्रक-पुंडया ऊस असे प्रकार ग्रन्थकाराने दर्शविले आहेत. उसाचा रस काहिलीमध्ये तापवून एक-चतुर्थांश उरला म्हणजे त्याला फाणित असे नाव आहे. अजून दाट होईपर्यंत उकळला म्हणजे गुड-गूळ, त्यापलीकडे मत्स्यण्डिका, मत्स्यण्डिका सुकविली की तिचे पांढरट स्फटिक बनतात ती खण्ड (हिंदी खांड, ह्यापासून इंग्रजी candy,) खण्ड पासून शर्करा आणि सितोपला म्हणजे खडीसाखर अशी प्रक्रिया दर्शविली आहे. उसापासून साखर बनविण्याची ही कृति प्राचीन भारतीयांनी विकसित केली होती आणि ७व्या शतकापर्यंत हे रह्स्य भारताबाहेर कोणास माहीत नव्हते. ७व्या शतकात अरबांनी हे ज्ञान बाहेर नेले आणि पर्शियनांनी तसेच अन्य संस्कृतींनी ते त्यांच्याकडून घेतले. ’शर्करा’वरून फारसीमध्ये ’शकर’ तयार झाला आणि तेथून लॅटिन succarum आणि इंग्रजी sugar. (अलीकडच्या काळात हे चक्र थोडे उलटे फिरले. इंग्रजी अखत्यारात चीनहून आणि मॉरिशसहून पांढरीशुभ्र साखर आयात होऊ लागली आणि ’चीनी’, तसेच ’मोरस’ ही दोन नवी नावे साखरेला मिळाली.) उसाशिवाय ’यावनाल’ म्हणजे ज्वारी आणि अन्य धान्यांच्या ताटांपासूनहि पूर्वकालीन भारतात साखर करत असत असे दिसते.

साखरेच्या पाठोपाठ साखरेच्या वापरातून करण्याची ’प्रपानके’ म्हणजे पन्ह्याचे प्रकार दर्शविले आहेत. थंड पाण्यात साखर विरघळवून तिला वेलदोडा, लवंग, मिरी आणि कापूर ह्यांनी सुवासित केले की होते ’शर्करोदक’ म्हणजे साखरपाणी. आंबट आंबा पाण्यात शिजवून त्याच्या गरापासून करावयाचे पन्हे हे भीमसेनाने निर्मिले असे सांगितले आहे. तसेच चिंचेचे, लिंबाचे इत्यादि सरबते दाखविली आहेत. ’तक्रपानक’ नावाच्या प्रकाराचे वर्णन पहा.

तुर्यांशेन जलेन संयुतमतिस्थूलं सदम्लं दधि
प्रायो माहिषमंशुकेन विमले मृद्भाजने चालयेत्।
भृष्टं हिङ्गु च जीरकं च लवणं राजीं च किचिन्मितां
पिष्ट्वा तत्र विमिश्रयेद्भवति तत्तक्रं न कस्य प्रियम्?
तक्रं रुचिकरं वह्निदीपनं पाचनं परम्।
उदरे ये गदास्तेषां नाशनं तृप्तिकारकम्॥

म्हशीच्या दुधापासून केलेले आंबट आणि घट्ट दही त्याचा १/४ भाग इतके पाणी मिसळून फडक्यामधून चाळून मातीच्या भांडयात धरावे. त्याला हिंग, जिरे-मोहरीची फोडणी देऊन त्यात थोडे मीठ टाकून ढवळावे. असे ताक कोणास प्रिय नाही? ते चविष्ट, क्षुधाग्नि प्रदीप्त करणारे, पचनाला मदत करणारे, उदरातील विकारांचा नाश करणारे आणि तृप्तिकारक असते.

दूध आणि त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे होणार्‍या गोष्टी ह्यावर काही लिखाण आहे. गाय इत्यादि व्यायल्यापासून ७ दिवसांपर्यंतचे दूध (चीक) विस्तवावर ठेवले की फाटते. त्याला पीयूष (खरोस-खरवस) म्हणतात. ८ दिवसांपासून १ महिन्यापर्यंतच्या दुधाला ’प्रमोरट’ म्हणतात. दही, ताक, लिंबाचा रस इत्यादि वापरून कच्चे दूध फाटविल्यास किंवा नासविल्यास - अशा दुधाला ’नष्टदुग्ध’ म्हणतात - त्यापासून निघणार्‍या पाण्यास ’मोरट’ आणि घट्ट भागास ’तक्रपिण्ड’ म्हणतात. तेच नष्टदुग्ध विस्तवावर उकळल्यास मिळालेल्या घट्ट भागास ’किलाट’ म्हणतात. दह्यामधील पाण्यास ’मस्तु’ असे नाव आहे.

दूध देणारे प्राणी - गाय, म्हैस. शेळी, मेंढी, गाढव, घोडा, उंट, हत्ती ह्यांच्या दुधाचे आयुर्वेदिक गुण वर्णिले आहेत. आयुर्वेदामध्ये मानवी दुधाकडेहि औषधि अशा नजरेने पाहिले आहे असे दिसते कारण स्त्रीदुग्धाचेहि गुण ग्रन्थामध्ये वर्णिले आहेत. ह्याच प्रकारे दुग्धजन्य पदार्थ, दही, लोणी, साय, तूप ह्यांचेहि आयुर्वेदिक गुण वर्णिले आहेत.

तक्रावर ग्रन्थकाराचे विशेष प्रेम आहे. त्याची महती अशी सांगितली आहे:

कैलासे यदि तक्रमस्ति गिरिश: किं नीलकण्ठो भवे-
द्वैकुण्ठे यदि कृष्णतामनुभवेदद्यापि किं केशव:।
इन्द्रो दुर्भगतां क्षयं द्विजपतिर्लम्बोदरत्वं गणा:
कुष्ठित्वं च कुबेरको दहनतामग्निश्च किं विन्दति॥

कैलास पर्वतावर ताक असते तर गिरीश ’नीलकण्ठ’ झाला असता काय? वैकुण्ठात ताक असते तर विष्णु अद्यापि काळा राहिला असता काय? इन्द्राला क्षते, चन्द्राला क्षय, गणपतीला ढेरपोट, कुबेराला कुष्ठरोग आणि अग्नीला दहनता सहन करायला लागली असती काय?

शिखरिणी ह्या दुग्धजन्य पदार्थाचे वर्णन पहा:

आदौ माहिषमम्लमम्बुरहितं दध्याढकं शर्करां
शुभ्रां प्रस्थयुगोन्मितां शुचिपटे किञ्चिच्च किञ्चित् क्षिपेत्।
दुग्धेनार्धघटेन मृण्मयनवस्थाल्यां दृढं स्रावये-
देलाबीजलवङ्गचन्द्रमरिचैर्योग्यैश्च तद्योजयेत्॥
ग्रीष्मे तथा शरदि ये रविशोषिताङ्गा
ये च प्रमत्तवनितासुरतातिखिन्ना:।
ये चापि मार्गपरिसर्पणशीर्णगात्रा-
स्तेषामियं वपुषि पोषणमाशु कुर्यात्॥

म्हशीच्या दुधापासून केलेल्या आणि पाणी काढून टाकलेल्या दह्याच्या - चक्का - एका आढकामध्ये दोन प्रस्थ (दह्याच्या निम्मी) शुभ्र साखर आणि अर्धे भांडे दूध घालून स्वच्छ फडक्यामधून मातीच्या नव्या भांडयामध्ये गाळावे. त्यामध्ये वेलदोडा, लवंग आणि मिरी घालावी.
ग्रीष्म अथवा शरद् ऋतूमध्ये कडक उन्हामधून तापून आलेले, प्रमत्त यौवनेसह रतिक्रीडा केल्यामुळे दमलेले, बराच काळ प्रवास केल्याने शीर्णगात्र झालेले अशा सर्वांच्या शरीराला ही शिखरिणी पोषदायक आहे.

अर्धाढकं सुचिरपर्युषितस्य दध्न:
खण्डस्य षोडशपलानि शशिप्रभस्य।
सर्पि: पलं मधु पलं मरिचं द्विकर्षं
शुण्ठया पलार्धमपि वार्धपलं चतुर्णाम्॥
श्लक्ष्णे पटे ललनया मृदुपाणिघृष्टे
कर्पूरचूर्णसुरभीकृतचारुसंस्था।
एषा वृकोदरकृता सरसा रसाला
ह्यास्वादिता भगवता मधुसूदनेन॥

बराच काळ पाणी काढून टाकलेल्या दह्याच्या अर्ध्या आढकामध्ये १६ पल (२ शराव अथवा १ प्रस्थ) इतकी शुभ्र साखर, त्यामध्ये १ पल तूप, १ पल मध, अर्धा पल मिरी आणि अर्धा पल सुंठ, अथवा हे चारी प्रत्येकी अर्धा पल असे घालून ते मऊ वस्त्रामधून सुंदर स्त्रीने नाजूक हाताने गाळावे आणि त्याला कापराचा सुवास द्यावा. भीमाने बनविलेल्या ह्या रसाल शिखरिणीचा स्वाद भगवान् श्रीकृष्णाने घेतला होता. (२ तोळे = १ कर्ष, ४ कर्ष = १ पल, ८ पल = १ शराव (शेर), २ शराव = १ प्रस्थ, ४ प्रस्थ = १ आढक, हे वैद्यकशास्त्रसंमत कोष्टक भाग २ मध्ये दाखविलेले होते.)

शिखरिणीच्या ह्या दोन्ही कृतींमध्ये दह्याच्या अर्धी साखर असे प्रमाण दाखविले आहे. सध्या घरी श्रीखंड केलेच तर ते बहुधा तयार चक्क्याचे करतात आणि त्यामध्ये चक्क्याइतकी साखर असे प्रमाण असते. दह्य़ापासून प्रारंभ केल्यास त्यातील पाणी काढल्यावर चक्का मूळ दह्याच्या निम्माच होईल तेव्हा जु्ने प्रमाण आजच्याहून वेगळे नाही असे दिसते. आजच्यापैकी केशर त्यात नाही आणि लवंग-मिरी आहेत हा भेद दिसतो.

’शिखरिणी’ ह्या शब्दावरून ’श्रीखंड’ शब्द निर्माण झाला असे वाटू शकेल कारण दोहोंच्या कृतींमधे साम्य आहे. पण तसे नसावे असे वाटते. जुन्या ’शिखरिणी’चा संबंध आजच्या ’शिखरण-शिकरण’ ह्याच्याशी लागतो. (पहा - मोल्सवर्थ.) ’श्रीखण्ड’ ह्याचा संस्कृतातील अर्थ ’चन्दन’ असा आहे. उगाळलेल्या चंदनाच्या लेपासारखे दिसणारे म्हणून ’श्रीखंड’ असा आजचा ’श्रीखंड’ शब्द निर्माण झाला असावा असा तर्क अधिक सुसंगत वाटतो.

पाकक्रियेमध्ये उपयुक्त असा दुसरा गोड प्रकार म्हणजे मधु किंवा मध. ह्याचे आठ प्रकार दर्शविले आहेत - माक्षिक (मधुमक्षिका अथवा मधमाश्या ह्यांनी गोळा केलेला), भ्रामर (भुंग्यांनी गोळा केलेला), क्षौद्र (’क्षुद्रा’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या पिंगट रंगाच्या छोटया माश्यांचा), पौतिक (’पुत्तिका’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या काळ्या रंगाच्या छोटया माश्यांचा), छात्रक (छत्रीसारखी गोल पोवळी रचणार्‍या माश्यांचा), आर्घ्य (पिवळ्या रंगाच्या छोटया माश्यांचा), औद्दालक (वाळवीच्या वारुळात मिळणारा कडवट-तुरट पदार्थ) आणि दाल (’दल’ म्हणजे फुलांच्या पाकळ्यांमधील मध).

मजसमोरील ’भोजनकुतूहला’च्या प्रतीमध्ये मद्याचा विषय सुरू होताच पुढची चार पाने गळली आहेत त्यामुळे ह्या विषयात ग्रन्थकाराने काय सांगितले आहे हे कळत नाही. उपलब्ध भागामध्ये मद्याकडे ग्रन्थकार थोडया उपेक्षेने पाहतो हे ध्यानी येते. तो म्हणतो:

मद्यं न पेयं पेयं वा स्वल्पं सुबहुवारि वा।
अन्यथा शोथशैथिल्यदाहमोहान् करोति च॥
द्राक्षेक्षव: सखर्जूरा: शालिपिष्टं यवस्य वा।
पञ्च मद्यकरा: श्रेष्ठा द्राक्षा तत्र विशेष्यते॥

मद्य एकतर पिऊ नये अथवा अगदी थोडे किंवा पुष्कळ पाण्यामधून प्यावे. द्राक्षे, ऊस, खजूर, तांदुळाचे पीठ आणि यवाचे - बार्ली - पीठ ह्या पाचांचे मद्य सर्वात चांगले, त्यामध्येहि विशेषत्वाने द्राक्षे.

अन्येऽपि मद्यभेदास्तत्प्रकाराश्च सर्वानुपयोगित्वात् ग्रन्थगौरवभयाच्चेह नोक्ता:। यत उक्तम्
मद्यप्रयोगं कुर्वीत शूद्रादिषु महार्तिषु।

मद्याचे अन्य प्रकार सर्वांच्या उपयोगाचे नसल्याने आणि ग्रन्थ उगीच वाढेल म्हणून येथे दाखवीत नाही. असे म्हटलेच आहे: ’शूद्र इत्यादि (कनिष्ठ) जातींनी, तसेच फार आजारी असल्यास, मद्य वापरावे.’ मद्य ह्या गोष्टीला शिष्टसमाजामध्ये वरचे स्थान नव्हते हे ह्यावरून दिसते.

Materia Medica of the Hindus आणि अन्य काही आयुर्वेदग्रंथांमधून मिळणारी काही माहिती संकलित करीत आहे.

मद्याचे प्रकार: माद्धिक - द्राक्षांपासून, खार्जूर - खजुरापासून, गौडी - साखरेच्या घट्ट पाकापासून (treacle), शीधु - उसाच्या रसापासून, सुरा - भातापासून, कोहल - यवापासून, मधुलिका - गव्हापासून, पैष्टी - वेगवेगळ्या धान्यांपासून, मधूकपुष्पोत्थ - मधूक पुष्पापासून (मोहाचे फूल), जाम्बव - जांभळापासून, कादम्बरी - कदंबाच्या फुलापासून, वल्कलि - बेहडयाच्या फुलापासून ( ह्यावरून ’बेवडा’ देशी दारू हा शब्द निर्माण झाला असेल काय?), वारुणी - ताडाच्या अथवा माडाच्या झाडाच्या स्रावापासून. ह्याशिवाय अन्य ग्रन्थांमध्ये मैरेयक, कापिशायन असेहि मद्यविशेष आढळतात.

पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत ’दिव्य’ म्हणजे आकाशातून पडणारे आणि ’भौम’ म्हणजे भूमीवर उपलब्ध असलेले असे प्रमुख प्रकार केले आहेत. त्यांमधून अनेक उपप्रकार निर्माण होतात. ’दिव्य’ पाणी हे ’धाराज’ - पावसाचे, ’करकाभव’ - गारांचे, ’तौषार’ - दवाचे आणि ’हैम’ - हिमवर्षाव वितळून झालेले असे चार प्रकारचे असते. ’धाराज’ पाणी दोन प्रकारचे - ’गाङ्ग’ आणि ’सामुद्र’. अश्विन महिन्यामध्ये पडणारे पाणी हे अष्टदिङ्नाग (आठ दिशा आपल्या पाठीवर तोलून असलेले आठ हत्ती) आकाशगंगेतून गोळा करून पृथ्वीवर पाडतात म्हणून ते ’गाङ्ग’ आणि त्यापूर्वीच्या महिन्यातील पावसाचे पाणी हे समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाचे निर्माण झालेले म्हणून ’सामुद्र’. ह्या दोहोंमध्ये गाङ्गजल अधिक श्रेष्ठ. ’भौम’ जलाचे ’जाङ्गल’, ’आनूप’ आणि ’साधारण’ असे तीन प्रकार आहेत. ’जङ्गल’ म्हणजे नद्या-तलाव-वृक्ष फार नसलेला प्रदेश आणि ते पुष्कळ असलेला प्रदेश हा ’अनूप’. ’साधारण’ प्रदेश ह्या दोहोंच्या मधला. ’भौम’ पाण्याचे त्याच्या स्रोतावरून उपप्रकार पडतात ते असे - नादेय - नदीचे, औद्भिद - खणलेल्या जमिनीतून झिरपून आलेले, नैर्झर - झर्‍याचे, सारस - सरोवराचे, ताटाक तडाग - तलावाचे, वाप्य - वापीचे, कौप्य - कूपाचे, चौडय म्हणजे खडकामधली भेग (chasm मोनिअर-विल्यम्स), त्यातील पाणी तेहि चौडय, पाल्वल - पल्वल-डबक्यातले, विकिर - नदीकाठच्या वाळूतील खडडयात साठणारे, कैदार - केदार-शेतामधले, ह्राद - ह्रदामधील (’ह्रद’ खोल पाण्याचा डोह). हे प्रत्येक प्रकारचे पाणी केव्हा आणि कसे प्यावे ह्याचे आयुर्वेदिक विश्लेषण ग्रन्थामध्ये आहे. ’नादेय’ जलाच्या बाबतीत भारतातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याचे गुणदोष वर्णन केले आहेत.

(’कूप’ आणि ’वापी’ ह्यांच्यामधील फरक असा:

भूमौ खातोऽल्पविस्तारो गम्भीरो मण्डलाकृति:।
बद्धोऽबद्ध: स कूप: स्यात्तदम्भ: कौपमुच्यते॥

जमिनीत खोदलेला, फार विस्तार नसलेला, खोल, वर्तुळाच्या आकाराचा, बांधलेला किंवा न बांधलेला, तो कूप आणि त्याचे पाणी कौप.

पाषाणैरिष्टिकाभिर्वा बद्धा कूपाद्बृहत्तरा।
ससोपाना भवेद्वापी तज्जलं वाप्यमुच्यते॥

कूपाहून मोठी, दगडी चिरे अथवा विटांनी बांधलेली आणि आतमध्ये जिना असलेली ती वापी आणि तिचे पाणी वाप्य. मराठीमधील ’आड’ आणि ’बारव’ असा हा भेद दिसतो.)

ग्रन्थकाराने ग्रन्थामध्ये ठिकठिकाणी उपदेशकारक वचने लिहून ठेवली आहेत. त्यांपैकी कांहींकडे नजर टाकून लेखनसीमा करतो.

किती आणि कसे जेवावे?

पूरयेद्भागयुगलं कुक्षेरन्नेन सुस्थित:।
जलेनैकं चतुर्थं च वायुसञ्चरणाय वै॥

चांगले स्वास्थ्य असलेल्याने दोनचतुर्थांश पोट अन्नाने आणि एकचतुर्थांश पाण्याने भरावे. उरलेला चौथा भाग वायूच्या हालचालीसाठी सोडावा.

य: क्षुधालौल्यभावेन कुर्यादाकण्ठभोजनम्।
सुप्तव्यालानिव व्याधीन् सोऽनर्थाय प्रबोधयेत्॥

भूक आणि जिह्वालौल्यामुळे जो आकण्ठ भोजन करतो तो निद्रिस्त पशूंप्रमाणे असलेल्या रोगांना जागे करतो.

आहारं तु रह: कुर्यात् निर्हारमपि सर्वदा।
उभाभ्यां लक्ष्म्युपेत: स्यात्प्रकाशे ह्रियते श्रिया॥

आहार आणि निर्हार (मलमूत्रविसर्जन) एकान्तात करणार्‍याची सोबत लक्ष्मी करते, उघडयावर ते करणार्‍याला ती सोडून जाते.

अश्नीयात्तन्मना भूत्वा पूर्वं तु मधुरं रसम्।
मध्येऽम्ललवणौ पश्चात् कटुतिक्तकषायकान्॥

लक्ष देऊन जेवावे, प्रथम मधुर आहार घ्यावा, मध्यावर आंबट आणि खारट आणि तदनंतर कडू, तिखट आणि तुरट पदार्थ खावेत.

अतिद्रुताशिताहारो गुणान् दोषान्न विन्दति।
भोज्यं शीतमहृद्यं च स्याद्विलम्बितमश्नत:॥

फार घाईने खाणार्‍यास त्यातील गुणदोष जाणवत नाहीत. फार हळू जेवणार्‍याचे अन्न थंड आणि अरुचिकर होते.

पाणी कधी आणि कसे प्यावे?

पिबेद्घटसहस्राणि यावन्नास्तमितो रवि:।
अस्तं गते दिवानाथे बिन्दुरेको घटायते॥

सूर्य मावळण्यापूर्वी हवे तितके पाणी प्यावे (शब्दश: घटसहस्राणि - हजारो घडे), सूर्य मावळल्यानंतर एक थेंबसुद्धा घडयासारखा आहे.

अजीर्णे चौषधं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि रात्रौ वारि विषोपमम्॥

अजीर्ण झाले असता पाणी हे औषधासारखे असते, दमल्याभागलेल्याला पाणी शक्ति देते, जेवतांना पाणी अमृतासमान आहे पण रात्री पाणी विषासमान मानावे.

वासितं नूतनै: पुष्पै: पाटलीचम्पकादिभि:।
पथ्यं सुगन्धि हृद्यं च शीतलाम्बु सदा पिबेत्॥

पाटल, चांफा अशा ताज्या फुलांनी सुवासित केलेले पथ्यकर आणि आनन्ददायक असे थंड पाणी प्यावे.

अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नमनम्बुपानाच्च स एव दोष:।
तस्मान्नरो वह्निविवर्धनाय पुन: पुनर्वारि पिबेदभूरि॥

अति पाणी प्यायल्याने अन्नपचन होत नाही, अजिबात न प्यायल्याने तोच दोष निर्माण होतो. म्हणून भूक वाढविण्यासाठी थोडे थोडे पाणी वारंवार प्यावे.

तांबूल, शतपावली आणि वामकुक्षी गुणवर्णन.

रते सुप्तोत्थिते स्नाते भुक्ते वाऽन्ते च सङ्गरे।
सभायां विदुषां राज्ञां कुर्यात्ताम्बूलचर्वणम्॥

सुरतक्रीडेमध्ये, झोपून उठल्यानंतर, स्नानानंतर, भोजनानंतर अथवा युद्धानंतर, विद्वत्सभेमध्ये अगर राजसभेमध्ये तांबूल खावा.

ताम्बूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम्।
वातघ्नं कृमिनाशनं कफहरं कामाग्निसंदीपनम्॥
स्त्रीणां भाषणभूषणं रतिकरं शोकस्य विच्छेदनम्।
ताम्बूले विदितास्त्रयोदश गुणा: स्वप्नेऽपि ते दुर्लभा:॥

तांबूल कटु, तिखट, उष्ण, मधुर, खारट आणि तुरट असून तो वात, जन्तु आणि कफ ह्यांचा नाश करतो. तो कामाग्नि वाढवितो आणि रतिकर असतो, तो स्त्रियांच्या बोलण्याला शोभा देतो आणि शोकनाशक असतो. तांबूलाचे हे तेरा गुण ज्ञात आहेत, जे स्वप्नामध्येहि दुर्लभ आहेत.

पूगकर्पूरकस्तूरीलवङ्गसुमन:फलै:।
फलै: कटुकषायैर्वा मुखवैशद्यकारिभि:॥
ताम्बूलपत्रसहितै: सुगन्धैर्वा विचक्षण:।

भुक्त्वा शतं पदां गच्छेच्छनै: स्वस्थोपजायते॥
मुखशुद्धि करणार्‍या सुपारी, कापूर, कस्तूरी, लवंग, वेलची, तिखट-तुरट फळे अथवा सुगन्धसहित तांबूलाचे सेवन करून शंभर पावले चालणार्‍या सुजाण पुरुषाचे स्वास्थ्य चांगले राहाते.

वामदिशायामनलो नाभेरूर्ध्वेऽस्ति जन्तूनाम्।
तस्मात्तु वामपार्श्वे शयीत भुक्तस्य पाकार्थम्॥

मनुष्यांच्या नाभीच्या वर डाव्या बाजूला वायूचे स्थान असते. अतएव जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी डाव्या कुशीवर झोपावे.

सद्योमांसं नवं चान्नं बाला स्त्री क्षीरभोजनम्।
घृतमुष्णोदकस्नानं सद्य: प्राणकराणि षट्॥

ताजे मांस, ताजे अन्न, बालयुवति, दुग्ध आणि घृतसेवन, तसेच उष्ण पाण्याने स्नान ह्या सहा गोष्टी प्राणवर्धक आहेत.

पूतिमांसं स्त्रियो वृद्धा: बालार्कस्तरुणं दधि।
प्रभाते मैथुनं निद्रा सद्य: प्राणहराणि षट्॥

शिळे मांस, गलितयौवना स्त्रिया, कन्याराशिस्थित सूर्य, पूर्ण न लागलेले दही, सकाळच्या वेळी मैथुन आणि निद्रा ही प्राणहारक आहेत.

असाच एक आठवणीतील शोक लिहून लेखमालिकेची समाप्ति करतो.

माहिषं दधि सशर्करं पय: कालिदासकविता नवं वय:।
एणिमांसमबला च कोमला स्वर्गशेषमुपभुञ्जते नर:॥

म्हशीच्या दुधाचे दही, साखरेसकट दूध, कालिदासाची कविता, तरुण वय, हरिणीचे मांस आणि कोमल तरुणी हे सर्व मिळणे म्हणजे माणसाने उर्वरित स्वर्गाचा उपभोग घेण्यासारखे आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सरवन भवनाची फिल्मी ष्टोरी

गेल्या 10 – 15 वर्षात चेन्नईला भेट दिलेल्यांना कधी ना कधी तरी सरवन भवनाबद्दल ऐकून माहिती असेल. कदाचित तेथील खाद्य पदार्थांची चवही घेतली असेल. चेन्नईसाठी सरवन भवन चेन हॉटेल्समधील शाकाहारी खाद्यपदार्थ म्हणजे जणू मेजवानीच. भारत भर 33 शाखा व परदेशात 47 शाखा चालवणार्‍या एवढ्या मोठ्या कारभारामागे 66 वर्षाच्या राजगोपाल या व्यक्तीची दूरदृष्टी, त्याचे श्रम व मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जिद्द आहेत. चेन्नईच्या हॉटेल व्यवसायात याचा भार मोठा दबदबा आहे. शाकाहारी हॉटेल व्यवसायाला त्यानी गौरव प्राप्त करून दिले असेच अनेकांचे मत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भोजनकुतूहल - २

भाग १

ह्या भागामध्ये भोजनात वापरल्या जाणार्‍या काही मोजक्या ठळकठळक कृतींकडे वळू. ग्रन्थामध्ये सुमारे ३५०-४०० कृतींचे वर्णन आहे. येथे त्यांपैकी काही प्रातिनिधिक कृति दाखवितो. ग्रन्थकार प्रत्येक कृतीबरोबर आयुर्वेदाच्या दृष्टीमधून त्या त्या कृतीचे शरीराला होणारे लाभ वर्णन करतो.

आयुर्वेदामधील अधिकारी लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:

भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम् ‌।
इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः ॥

षड्‌‍विध अन्न - १ मक्ष्य - चर्वण करून खाण्याचे - भाकरी, पोळी वगैरे, २ भोज्य - भात वगैरे, ३ पेय - प्यावयाचें, ४ लेह्य - चाटून खाण्याचें पंचामृत वगैरे, ५ चोष्य - चोखून खाण्याचें आणि ६ पिच्छिल - चटण्या - कोशिंबिरी.
षड्रस म्हणजे सहा चवी अशा:

मधुरो लवणस्तिक्त: कषायोऽम्ल: कटुस्तथा।
सन्तीति रसनीयत्वादन्नाद्ये षडमी रसा:॥ (शब्दकल्पद्रुम)

मधुर, खारट, तिखट, तुरट, आंबट आणि कडू हे अन्नामधील सहा रस.
भोजनकुतूहलकार ग्रन्थामध्ये एका जागी अन्नाचे सहा प्रकार असे दर्शवितो:

आहारं षड्विधं चोष्यं पेयं लेह्यं तथैव च।
भोज्यं भक्ष्यं तथा चर्व्यं गुरु विद्याद् यथोत्तरम्॥

तांदूळ, गहू अशा कोठल्याहि धान्यामध्ये चौपट, पाचपट, सहापट आणि चौदापट पाणी घालून धान्य शिजवले की अनुक्रमे विलेपी, भात, यवागु आणि पेया असे पदार्थ तयार होतात. पेयाहून थोडया अधिक घट्ट पदार्थाला यूप असे नाव आहे. येथील पेया म्हणजेच आपली परिचित पेज. येथील भात सध्याच्या कुकरमधील भाताहून अधिक शिजलेला आणि मऊ दिसतो. काञ्जिका म्हणजे भरडलेले धान्य पाण्यात घालून आंबवणे. भातामध्येच शिजतांना तांदुळाबरोबर कोणतीहि डाळ आणि आले-लसूण-हिंग घातले की कृसरा किंवा मिश्रोदन, अर्थात् खिचडी तयार होते. (हे वर्णन देणार्‍या श्लोकाच्या नंतर लेखकानेच कधीकधी ’भाषायाम्’ असा उल्लेख करून पदार्थाचे मराठी नाव दिलेले आहे. ’खिचडी’ हा शब्द असाच पुरविला आहे.) तांदुळात चांगले घुसळलेले दही चौपट, हरिद्रा (हळद), मरीच (मिरी) आणि अजाजि (जिरे) घालून शिजविले म्हणजे हरिद्रान्न तयार होते. शिजलेल्या भातात त्याच्या दुप्पट गोड दही, मिरीची पूड, आले आणि मीठ घातले की ’दध्योदन’ तयार होतो. ’घनश्याम सुंदरा’ मधील यशोदा मुकुंदाला ’मुकुंदा दध्योदन भक्षी’ असे सांगत आहे तोच हा दध्योदन दिसतो. असेच गुडोदन, परमान्न, कृसरोदन इत्यादि अन्य प्रकार सांगितले आहेत.

ह्यानंतर ’क्षीरी’ म्हणजे खीरप्रकरण. तुपावर टाकलेले तांदूळ गरम दुधामध्ये शिजवून त्यात साखर आणि तूप घातले की खीर तयार होते. ह्याच्यातच शिजतांना नारळाच्या खोबर्‍याचे लहान तुकडे टाकले की होते नारळाची खीर. ’समिता’ म्हणजे कणीक किंवा मैदा. कणकेचे लांब धागे काढून ते खिरीमध्ये शिजविले की सेविका म्हणजे शेवयांची खीर होते.

’सूप’ म्हणजे आमटीचे वर्णन अगदी थोडक्यात आहे. कोठलीहि डाळ मीठ, आले आणि हिंग घालून शिजविली की ’सूप’ म्हणजे आमटी तयार होते.

भाताचे प्रकार, क्षीरी आणि सूप ही ’भोज्य’ ह्या अन्नप्रकाराची उदाहरणे आहेत. ह्यानंतर सुरू होतो ’भक्ष्य’ गट. ह्या गटामध्ये भोजनकुतूहलकाराने नाना प्रकारच्या पोळ्या, रोटया, मांडे आणि नाना प्रकारांचे वडे, तसेच गोड प्रकार वर्णिले आहेत. त्यांपैकी काही ठळक असे.

गोधूमा धवला धूता: कुट्टिताश्शोधितास्तत:।
प्रोत्क्षिप्ता यन्त्रनिष्पिष्टाश्चालितास्समिता: स्मृता:॥
वारिणा कोमलां कृत्वा समितां साधु मर्दयेत्।
हस्तलालनया तस्या लोप्त्रीं सम्यक्प्रसारयेत्॥

शुभ्र गहू मळणी करून, साफ करून आणि पाखडून जात्यातून काढावेत आणि पीठ चाळून घ्यावे. ह्याला ’समिता’ म्हणजे कणीक (मैदा इति भाषायम्) म्हणतात. ही पाण्याने मऊ करून चांगली मळावी. हातावर पसरून तिची ’लोप्त्री’ म्हणजे उंडा बनवावा.

अधोमुखघटस्यैतां विस्तृतां प्रक्षिपेद्बहि:।
मृदुना वह्निना साध्यो सिद्धो मण्डक उच्यते॥

थोडया विस्तवावर खाली तोंड करून ठेवलेल्या घटावर तिला बाहेरून सगळीकडून पसरावे. अशा तर्‍हेने भाजलेला ’मंडक’ (मांडा) तयार होतो.

दुग्धेन साज्यखण्डेन मण्डकं भक्षयेन्नर:।
अथवा सिद्धमांसेन सतक्रवटकेन वा॥

तो दूध, तूपसाखर, शिजवलेले मांस किंवा दहीवडयासह खावा.
अशाच प्रकारे ’तप्तक’ म्हणजे तव्यावर भाजून ’पोलिका’ (पोळी) करावी आणि ती ’लप्सिके’बरोबर (लापशी) खावी.

समितां सर्पिषा भृष्टां शर्करां पयसि क्षिपेत्।
तस्मिन् घनीकृते न्यस्येल्लवङ्गमरिचादिकम्॥

लापशी करण्यासाठी कणीक तुपावर - सर्पिष् - भाजून साखरेसह दुधात शिजवावी. ती घट्ट झाल्यावर त्यात लवंग, मिरी इत्यादि घालावेत.

ह्याच मार्गाने पुढे जाऊन अंगारपोळी. रोटी, लिटी, अन्य धान्यांच्या रोटया, जसे जवाची, उडदाची इ. दर्शविल्या आहेत. पैकी ’लिटी’ हा शब्द आपल्या ओळखीचा नाही. तसेच तो मोल्सवर्थलाहि ठाऊक नाही पण बिहारमध्ये ’लिटी-चोखा’ नावाच्या प्रकाराचे बरेच कौतुक आहे असे जालावरून दिसते. ह्यानंतर पापड (पर्पटी) डांगर (झर्झरी) हेहि सांगितले आहेत.

अनेक प्रकारचे ’वटक’ म्हणजे वडे ग्रन्थामध्ये दाखविलेले आहेत. त्यासाठी उडीद, मूग इत्यादि भरडून आणि त्यात पाणी घालून ’पिष्टिका’ बनवायची आणि पिष्टिकेचे गोळे, त्यात मीठ, आले आणि हिंग घालून तेलामध्ये तळायचे अशी वटकांची प्रमुख कृति आहे.

माषाणां पिष्टिकां युक्तां लवणार्द्रकहिङ्गुभि:।
कृत्वा विदध्याद्वटकांस्तांस्तैले विपचेच्छनै:॥
असे वडे हिंग-जिरे घातलेल्या ताकामध्ये टाकावेत.
संचूर्य निक्षिपेत्तक्रे भृष्टहिङ्गु च जीरकम्।
लवणं तत्र वटकान्सकलानपि मज्जयेत्॥

’अलीकमत्स्य’ नावाचा एक वडा दाखविला आहे. ह्याला तळलेल्या माशाचा वास येतो म्हणून हे नाव. (अलीक = खोटे).

माषपिष्टिकया लिप्तं नागवल्लीदलं महत्।
तत्तु संस्वेदयेद्युक्त्या स्थाल्यामास्तारकोपरि॥
ततो निष्कास्य तं खण्डं ततस्तैलेन भर्जयेत्।
अलीकमत्स्य उक्तोऽयं प्रकार: पाकपण्डितै:॥
तं वृन्ताकभरित्रेण वास्तुकेनापि भक्षयेत्।
अलीकमत्स्याश्शुष्का वा किं वा क्वथिकया युता:॥

नागवेलीचे मोठे पान उडदाच्या पिष्टिकेने लेपून फडक्यावर ठेवून थाळीमध्ये भाजावे. तदनंतर त्याला तेलात तळावे. पाकविद्यानिपुण ह्याला ’अलीकमत्स्य’ असे जाणतात. तो वांग्याच्या - वृन्ताक - भरिताबरोबर, चाकवताबरोबर, कढीबरोबर किंवा नुसताच खावा.
क्वथिका (कढी अथवा कठिका) अशी करतात:

स्थाल्यां घृते वा तैले वा हरिद्राहिङ्गु भर्जयेत्
अवलेहनसंयुक्तं तक्रं तत्रैव निक्षिपेत्॥
एषा सिद्धा समरिचा कथिता क्वथिका बुधै:॥

हळद, हिंग आणि मिरी तेलावर वा तुपावर टाकून त्यामध्ये ताक अन्य मसाल्यांसह (अवलेहन?) घालावे. ह्याला विद्वान ’क्वथिका’ (कढी) म्हणतात.

आता काही मोजके गोड पदार्थ पाहू. प्रथम शंकरपाळे:

मण्डवत्समितां सिद्धां कृत्वा कुर्याच्च पोलिकाम्।
शृङ्गाटाकृतिकान् कुर्यात् खण्डशस्तान् पचेद् घृते॥
मज्जयेच्च सितापाके ततस्ते तु समुद्धृता:।
शङ्खपाला इति प्रोक्ता: पाकशास्त्रविशारदै:॥

मांडयासारखीच कणीक तयार करून त्याची पोळी लाटावी. तिचे त्रिकोणी तुकडे कापून ते तुपामध्ये तळावे. नंतर ते साखरेच्या पाकामधून काढावेत. ह्याला पाकशास्त्रविशारद शङ्खपाल - शंकरपाळे - म्हणतात.

समिताया घृताढयाया वर्तीर्दीर्घास्समाचरेत्।
तास्तु संनिहिता दीर्घा: पीठस्योपरि धारयेत्॥
वेलयेद् वेलनेनैतां यथैका पर्पटी भवेत्।
ततश्छुरिकया तां तु संलग्नामेव कर्तयेत्।
ततस्तु वेलयेद्भूय: शकटेन तु लेपयेत्।
ततस्संवृत्य तल्लोप्त्रीं विदधीत पृथक् पृथक्।
पुनस्तां वेल्लयेल्लोप्त्रीं यथा स्यान्मण्डलाकृति:॥
ततस्तां सुपचेदाज्ये भवेयुष्च पुटा: पुटा:।
सुगन्धया शर्करया तदुद्धूलनमाचरेत्॥
सिद्धैषा फेनिका नाम्नी मण्डकेन समा गुणा:॥

समितेमध्ये तूप घालून तिचे मोठे पोळे लाटावेत आणि ते पाटावर त्यांना एकमेकावर रचावेत. त्याला लाटण्याने लाटून पापडासारखे पातळ करावे. त्याची वळकटी करून सुरीने तिचे तुकडे पाडावेत. हे तुकडे साट्याने माखून त्याचे उंडे बनवावेत आणि हे उंडे लाटून गोलाकार करून तुपामध्ये तळावेत. ह्यामध्ये पापुद्रे निघतील. त्यांवर सुगन्धित साखर भुरभुरवावी. ह्याला ’फेणी’ म्हणतात आणि तिचे गुण मांडयासारखेच असतात. (शकट म्हणजे ’साटा’ - मोल्सवर्थ. शालिचूर्णं घृतं तोयमिश्रितं शकटं वदेत्। दोन थरांमध्ये घालण्याचे पीठ, लोणी, तूप अशा प्रकारचे भरण.)

वरील श्लोकांचा सुसूत्र अर्थ न समजल्याने जालावर ’फेणी’च्या कृति पाहिल्या पण सुतरफेणीपलीकडे काहीच हाती लागले नाही. अखेरीस विकिपीडियावरून असा अंदाज आला की ह्या कृतीला ’खाजा’ असेहि म्हणतात. खाजाच्या कृति बर्‍याचशा वरील वर्णनाशी जुळतात.

समितावेसने जीरहिङ्गुमारीचयोजिते।
घृताक्ते जलसंयुक्ते पीठस्योपरि वेल्लिते॥
घृतेन वाऽथ तैलेन भर्जिता पूरिका भवेत्॥

कणीक आणि बेसनामध्ये जिरे, हिंग आणि मिरी आणि तूप घालून पाण्यावर मळावे आणि त्याचे गोळे करून पाटावर लाटावे. ते तुपात अथवा तेलात तळले की पुरी तयार होते. (वेसन - दालयश्चणकानां तु निस्तुषा यन्त्रप्रेषिता:। तच्चूर्णं वेसनं प्रोक्तं पाकशास्त्रविशारदै:॥ चण्याची इत्यादि डाळ साफ करून जात्यावर - यन्त्र - त्याच्या केलेल्या पिठाला पाकनिपुण वेसन म्हणजे बेसन म्हणतात.)

मोतीचूर लाडू:

मुद्गानां धूमसीं सम्यग् घोलयेन्निर्मलाम्बुना।
कटाहस्य घृतस्योर्ध्वं झर्झरं स्थापयेत्तत:॥
धूमसीं तु द्रवीभूतां प्रक्षिपेज्झर्झरोपरि।
पतन्ति बिन्दवस्तस्मात् तान् सुपक्वान् समुद्धरेत्॥
सितापाकेन संयोज्य कुर्याद् हस्तेन मोदकान्॥
एवंप्रकारका: कार्या वेसनेनापि मोदकान्।

मुगाचे भरड पीठ (धूमसी) पाणी घालून पातळ करावे. उकळत्या तुपाच्या कढईवर झारा ठेवावा आणि पातळ पीठ त्यावर घालावे. तुपात पडलेले थेंब तुपावर चांगले शिजले म्हणजे त्यांना बाहेर काढून त्यामध्ये साखरेचा पाक घालावा आणि हाताने त्याचे लाडू बनवावेत. हे मोतीचुराचे लाडू. असेच बेसन इत्यादींचेहि लाडू करता येतात.

शेवेचे लाडू:

घृताक्तया समितया कृत्वा सूत्राणि तानि तु।
निपुणो भर्जयेदाज्ये खण्डपाकेन योजयेत्॥
युक्तेन मोदकान् कुर्यात् ते गुणैर्मण्डका यथा।

तूप मिसळलेल्या कणकेतून लांब शेवया काढाव्यात आणि त्या तुपामध्ये तळून त्यात साखरेचा पाक घालावा. त्याचे लाडू गुणांनी मांडयासारखे असतात.

ह्यानंतर जिलेबी किंवा कुण्डलिनी:

नूतनं घटमादाय तस्यान्त: कुशलो जन:।
प्रस्थार्धपरिमाणेन दध्नाम्लेन प्रलेपयेत्॥
द्विप्रस्थां समितां तत्र दध्यम्लं प्रस्थसंमितम्।
घृतमर्धशरावं च घोलयित्वा घटे क्षिपेत्॥
आतपे स्थापयेत्तावद्यावद्याति तदम्लताम्।
ततस्तु प्रक्षिपेत्पात्रे सच्छिद्रे भाजने च तत्॥
परिभ्राम्य परिभ्राम्य तत्संतप्ते घृते क्षिपेत्।
पुन: पुनस्तत्प्रवृत्य विदध्यान्मण्डलाकृतिम्॥
तां सुपक्वां घृतान्नीत्वा सितापाके तनुद्रवे।
कर्पूरादिसुगन्धे च श्रमयित्वोद्धरेत्तत:॥
एषा कुण्डलिनी नाम्ना पुष्टिकान्तिबलप्रदा।

नवा घडा घेऊन त्याच्या आतील भागावर अर्धा प्रस्थ (एक शेर) आंबट दही लेपावे. चार शेर कणीक, एक शेर दही आणि अर्धा शेर तूप चांगले मिसळून घडयामध्ये भरावे. मिश्रण आंबेपर्यंत घडा उन्हात ठेवावा. सच्छिद्र भांडयामध्ये काढून घेऊन मिश्रण उकळत्या तुपामध्ये पाडून आणि फिरवून फिरवून वर्तुळाकार आकृति करावी. ती चांगली तळली गेल्यावर तिला तुपातून काढून कापूर इत्यादींनी सुवासित केलेल्या घट्टसर साखरपाकामध्ये बुडवून काढावी. हिला कुण्डलिनी म्हणतात.

जिलेबी - झलाबिया हा प्रकार १६व्या-१७व्या शतकात मध्यपूर्वेकडून महाराष्ट्रात आला आणि तदनंतर देशभर पसरला हा रंजक इतिहास येथे आणि येथे वाचता येईल.

(भोजनकुतूहलकाराने ग्रन्थात कोठेच वजने अथवा मापांचा उल्लेख केलेला नाही. पुढील कोष्टक मला उदय चंद्र दत्तलिखित Materia Medica of the Hindus ह्या पुस्तकामध्ये मिळाले: ६ गुंजा = १ आणा, १२ गुंजा = १ माष, ८ माष = १६ आणे = १ तोळा, ८ तोळे = १ पल, ८ पल = ६४ तोळे = १ शराव शेर, २ शेर = १ प्रस्थ, ४ प्रस्थ = १ आढक, ४ आढक = १ द्रोण, १२.५ शेर = १ तुला. ११.६६ तोळे = १ ग्रॅम ह्या हिशेबाने १ प्रस्थ = १४९२ ग्रॅम अदमासे, म्हणजे साधारण दीड किलो इतका पडतो. वजनेमापे वेगवेगळ्या ग्रन्थांमध्ये वेगवेगळी दाखवलेली असतात पण २ शराव = १ प्रस्थ हे आयुर्वेदात वापरले जाणारे परिमाण आहे असे 'शब्दकल्पद्रुम' हा ज्ञानकोष सांगतो.)

आपल्या सर्वांच्या परिचित पुरणपोळीचे वर्णन एकाच ओळीत आहे:

पोळिका पूर्णगर्भा तु गुर्वी स्याद्गुडदालिता। (पूर्णपोली)

गूळ आणि डाळीचे मिश्रण भरलेली पोळी म्हणजे पूर्णपोली.

अपूप ह्या प्रकारात अनारसे असे दाखविले आहेत:

प्रक्षाल्य तण्डुलान्सम्यक् चूर्णयेत्तानुलूखले।
समया सितया योज्य मर्दयेत्तद्विचक्षण:॥
यथा पिण्डीभवेत् पिष्टं तथा लोप्त्रीं विधाय च।
बीजेषु वाहिफेनस्य निस्तुषेषु तिलेषु वा॥
प्रसारितां तां सुघृते पाचयेत्सुविचक्षण:।
भवन्ति ते ह्यनरसा रसिकानां मुदावहा:॥

तांदूळ धुवून त्यांना उखळामध्ये कांडून तेवढीच साखर त्यात घालून मिश्रण मळावे आणि लोप्त्री तयार करावी. खसखस किंवा तिळावर तिला लाटून तुपातून तळून काढावी. असे अनारसे रसिकांना आनंद देतात. (अहिफेनाचे बीज म्हणजे खसखस. अहिफेन म्हणजे अफू. अफयून - opium - ही चीज अरबांनी मध्ययुगामध्ये हिंदुस्थानात आणली असा उल्लेख उदय चंद्र दत्तलिखित Materia Medica of the Hindus येथे दिसतो.)

मांसाचे काही प्रकार आता पाहू. प्रथम अगदी साधे शुद्धमांस.

पाकपात्रे घृतं दद्यात्तैलं वा तदलाभत:।
तत्र हिङ्गुहरिद्रां च भर्जयेत्तदनन्तरम्॥
छागादेरस्थिरहितं मांसं तत्खण्डखण्डितम्।
धौतं निर्गलितं तस्मिन् घृते तद्भर्जयेच्छनै:॥
पाकयोग्यं जलं दत्त्वा लवणं च पचेत्तथा।
सिद्धे जलेन संसिच्य वेसवारं परिक्षिपेत्॥
द्रव्याणि वेसवारस्य नागवल्लीदलानि च।
तण्डुलाश्च लवङ्गानि मरीचानि समासत:॥
अनेन विधिना सिद्धं शुद्धमांसमिति स्मृतम्॥

भांडयामध्ये तूप, ते नसल्यास तेल टाकावे. हिंग आणि हळद त्यामध्ये तळून घ्यावी. त्यातच नंतर शेळीचे वगैरे अस्थिरहित केलेले मांस तुकडे करून, धुवून घेऊन आणि निथळून टाकावे आणि सावकाश तळून घ्यावे. आवश्यक तेवढे पाणी आणि मीठ टाकून ते शिजवावे. तयार झाल्यावर पाण्याने शिंपडून त्यामध्ये वाटण टाकावे. वाटणामध्ये विडयाची पाने, लवंगा, मिरी इत्यादि असतात. असे केलेल्या मांसास शुद्धमांस म्हणतात.

नंतर तक्रमांस:

पाकपात्रे घृतं दत्वा हरिद्राहिङ्गु भर्जयेत्।
छागादेस्सकलस्यापि खण्डान्यग्नौ तु भर्जयेत्॥
सिद्धियोग्यं जलं दत्त्वा पचेन्मृदुतरं यथा।
राजिकादियुते तक्रे मांसखंडानि धारयेत्॥

भांडयामध्ये तुपावर हळद आणि हिंग तळून घ्यावेत आणि शेळीच्या इत्यादि मांसाचे तुकडे विस्तवात भाजून घ्यावेत. नंतर योग्य तितके पाणी घालून मऊ शिजवावेत. मोहरी इत्यादि घातलेल्या ताकामध्ये मांसाचे तुकडे टाकावेत.

तलितमांस:

शुद्धमांसविधानेन मांसं सम्यक् प्रसाधितम्।
पुनस्तदाज्ये संभृष्टं तलितं प्रोच्यते बुधै:॥

शुद्धमांस तयार झाल्यावर ते तुपामध्ये तळून घेतल्यास त्यास विद्वान् ’तलितमांस’ असे संबोधतात.

शूल्यमांस (आपले परिचित शीखकबाब):

कालखंडादिमांसानि ग्रथितानि शलाकया।
घृतं सलवणं दत्त्वा निर्धूमे दहने पचेत्॥
तत्तु शूल्यमिति प्रोक्तं पाककर्मविशारदै:॥

यकृत् (कालखण्ड) इत्यादि मांस सळईवर अडकवून तूप आणि मीठ लावून धूर नसलेल्या विस्तवावर भाजून घ्यावेत. ह्याला पाकर्मविशारद शूल्यमांस असे म्हणतात.

अखेरीस मांसशृङ्गाटक म्हणजे समोसे:

शुद्धमांसं तनूकृत्य कर्तितं स्वेदितं जले।
लवङ्गहिङ्गुलवणमरीचार्द्रकसंयुतम्॥
एलाजीरकधान्याकनिम्बूरससमन्वितम्।
घृते सुगन्धे तद्भृष्टं पूरणं प्रोच्यते बुधै:॥
शृङ्गाटकं समितया कृतं पूरणपूरितम्।
पुन: सर्पिषि संभृष्टं मांसशृङ्गाटकं वदेत्॥

शुद्धमांसाचे बारीक तुकडे करून त्यांना आणखी कापावे. (हा खिमा.) त्यामध्ये लवंग, हिंग, मीठ, मिरी, आले, तसेच वेलदोडा, जिरे, धणे आणि लिंबाचा रस घालून त्यास तुपामध्ये तळावे. ह्याला विद्वान् ’पूरण’ असे ओळखतात. कणकेचे त्रिकोण करून त्यांमध्ये हे पूरण घालून पुन: तुपावर तळले म्हणजे त्यास मांसशृङ्गाटक (समोसे) म्हणतात.

ह्यानंतर नाना कंद, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींचे उल्लेख असून त्यांची नावे आणि आयुर्वेदिक गुण वर्णिले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय असे:

कंदामध्ये पलाण्डु (कांदा), आर्द्रक (आले) हरिद्रा (हळद), लशुन-रसोन (लसूण), सूरण (सुरण) अशी परिचित नावे आहेतच पण अन्य असे अनेक कंद आहेत की जे आज आपणास भाजीबाजारात कोठेच दिसत नाहीत आणि ज्यांना आपण ओळखूहि शकत नाही. पिण्डालु - मोहलकांदा, रक्तालु, कांसालु, फोडालु, पानीयालु असे अनेक ’आलु’ प्रकारात मोडणारे कंद उल्लेखिले आहेत. ह्यांपैकी ’पिण्डालु’ ह्याचा उल्लेख मला Materia Medica of the Hindus येथे मिळाला आणि तेथे त्याला Dioscorea globosa असे नाव भारतातील वनस्पतिशास्त्राचे जनक विल्यम रॉक्सबर्ग ह्यांनी दिलेले आहे असा उल्लेख मिळाला. ह्या नावाचा अधिक शोध घेता चित्रावरून असे दिसले की आज आपण ज्याला ’कोनफळ’ म्हणतो तो हा कंद आहे. (कोनफळ विशेष कोठे आढळत नाही पण कोनफळी रंग सर्वांस माहीत आहे.) अशा सर्व कंदांना ’आलु’ म्हटलेले आहे आणि त्यामध्येच ’रक्तालु’ म्हणजे सर्वपरिचित रताळेहि आहे. मौजेची बाब अशी की ’आलु’ ह्याचा मूळचा अर्थ आता लोपून जाऊन ’बटाटा’ ह्या कंदाचा तो समानार्थी शब्द बनला आहे, यद्यपि बटाटा भारतात पुष्कळ उशीराने आलेला आहे. दिवाळीच्या उटण्यात भेटतो तो कर्चूर-कचोरा, तसेच शृङ्गाटक-सिंघाटे (आजचा शिंगाडा) हेहि कंदगटामध्ये भेटतात.

फळभाज्यांमध्ये कूष्माण्ड-कोहळा, तुम्बी-भोपळा, कलिङ्ग-कलिंगड, खर्बूज-खरबूज, कोशातकी-दोडका, पटोल-परवल, निष्वाप-घेवडा, वाकुची-गोवारी, शिग्रु-शेवगा, तुण्डी-तोंडली, कारवेल्ल-कारले, कर्कटी-काकडी, वृन्ताक-वार्ताकी-वांगे, भेण्डा-भेंडी, चिंचा-अम्लिका-चिंच-इमली (हिंदी) अशा ओळखीच्या तर देवडांगर, वाळुक, चिर्भीट, सेंदणी, दिंडसे, कुहिरी अशा मराठी नावाने लेखकाने उल्लेखिलेल्या अपरिचित फळभाज्याहि दिसतात. केळी, बोरे, लिंबू, आवळा अशांच्या अनेक उपजाति वर्णिल्या आहेत. लिंबाच्या आयुर्वेदास माहीत असलेल्या जम्बीर, लिम्पाक, निम्बूक, वीजपूर, मधुकर्कटिका, मातुलुङ्ग, करुणा आणि नागरङ्ग अशा आठ जाती Materia Medica of the Hindus येथे दर्शविल्या आहेत. ह्यापैकी जम्बीर म्हणजे पिवळ्या सालीचे मोठे लिंबू, ज्याला lemon असे म्हणतात ते आणि लिम्पाक म्हणजे वरणभातावर वापरतात ते हिरवे लिंबू lime अशी माझी समजूत आहे. मातुलुङ्ग म्हणजे महाळुंग.

पत्रशाक म्हणजे पालेभाज्यांमध्ये वास्तुक-वास्तूक-चाकवत, चुक्र-चुका, शिग्रुपत्र-सेउगपत्र-शेवग्याची पाने, पालख-पालक, पुष्कल-पोकळा, राजशाकिनिक-राजगिरा, मारिष-माठ, शतपुष्पा-सेउप-शेपू, तण्डुलीय-तांदुळजा, अम्बष्टा-आंबाडा अशा ओळखीच्या तर पिंपलगा, कामोणी, सण, सराटे, वासेनी, भोपनी अशा पूर्ण अपरिचित भाज्या दिसतात.

ह्या पुढील तिसर्‍या भागामध्ये दूध-ताक-दही-तूप, शिखरिणी, ऊस-साखर-मीठ, मद्य अशा काही गोष्टींकडे जाऊ.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धेनुकाकटचे गौडबंगाल – भाग 5

(मागील भागांचे दुवे)
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धेनुकाकटचे गौडबंगाल भाग 4

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

धेनुकाकटचे गौडबंगाल- भाग 3

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

‘धेनुकाकट्’चे गौड्बंगाल- भाग 1

भारताच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित असलेल्या सह्याद्री पर्वतराजींमध्ये नाणेघाट या नावाने सुप्रसिद्ध असलेला एक प्राचीन घाट आहे. पायवाट म्हणणेच जास्त सयुक्तिक ठरेल असा हा घाट रस्ता घाटमाथ्यावरील एका नाळीपासून सुरू होतो व खाली उतरत उतरत रायगड जिल्ह्यामध्ये तळकोकणात उतरतो. या घाटमाथ्यावरील नाळीजवळ एक प्राचीन गुंफा आहे. काही वर्षांपूर्वी मी या गुंफेला भेट देऊन तेथे असलेले सातवाहन कालीन शिलालेख व पाषाणात कोरलेल्या मूर्तीच्या पावलांचे जे काय थोडेसे अवशेष उरलेले आहेत ते बघितले होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - इतिहास