टीका Vs सर्वसमावेशकता
अमेरिकेत यायच्या आधी ....
.
आता अशी सुरुवात केली की तुम्ही म्हणाल हं झालं हिचं सुरु अमेरिकेत येण्यापूर्वी आणि अमेरिकेत येण्यानंतर हेच 2 कप्पे आहेत जणू आयुष्याचे. तर खरं तर तसे नाही लग्नापूर्वी-लग्नानंतर, नोकरीपूर्वी-नोकरीनंतर , अमकं पूर्वी-अमकं नंतर असेही कप्पे आहेत. पण तुमच्या मनात चेष्टेचा, टीकेचा सूर येणे साहजिकच आहे कारण तुमची माझी तशी ओळख आहे पण मैत्री नाही. माझी सुखं दु:ख तुम्हाला माहीत नाहीत आणि म्हणूनच माझी विचार करण्याची पद्धत, तसं मला का वाटतं, माझया खरं तर vulnerabilities बद्दल सुद्धा अनभिज्ञ आहात. आणि म्हणूनच पट्टकन judgement पास करण्याचा तुम्हाला हक्क आहे. आणि हा धागा त्याबद्दलच आहे. की अनोळखी परिस्थितीवर, लोकांवर किती चट्टकन नकारात्मक लेबल्स, जजमेंट्स लादता येतात किंवा पास करता येतात.
.
हां तर अमेरिकेत येण्यापूर्वी मी ही अगदी हीच भाषा बोलता असे जी मी क्वचित आंजावरती ऐकलेली आहे - अमेरिका म्हणजे मठ्ठ लोकांचा देश, अति मांस जन्य पदार्थ खाऊन चरबीचे थर साठविणाऱ्या ओबीस लोकांचा देश. या लोकांना आपल्या जगाव्यतिरिक्त ना कोणाचं भान असतं ना तसे असल्याची खंत. आंजावरती काही जणांनी हेही म्हणताना ऐकलेले आहे की - अमेरिका - ऊठसूठ जंतूनाशक द्रव्य (hand sanitizes ) लावून हाताला क्रीम्स फासणाऱ्या लोकांचा देश. हे जे शेवटचं वाक्य बोललेले लोकं हे नक्की एकदा अमेरिकेची वारी करून परत गेलेले आणि मग आपल्या निरीक्षणातून वाईट तेवढे उचललेले. तर सांगायचा मुद्दा मी ही हीच भाषा बोले. बरोबर पूर्ण अथवा अर्धवट ज्ञानातून टिपलेल्या वाईट बारकाव्यांवरती बेतलेले नकारात्मक विचार.
.
पण या देशात आले आणि हळूहळू इथले लोक कळत गेले. आमच्या पहिल्याच गावामध्ये जोपर्यंत कार विकत घेतलेली नव्हती, तोपर्यंत कार-पुलिंग करून मदत करणारे लोक भेटले तसेच थँक्स Giving ला आवर्जून आम्हा तिघाना घरी बोलावून मेजवानी खाउ घालणाऱ्या शार-टीशा भेटल्या. या लोकांनी ज्यांनी कधीही हे जाणवू दिले नाही की आम्ही परके आहोत. आम्हाला त्यांच्याबरोबर, त्यांच्या गटात, देशात सामावून घेतले. कोणाकोणाचे नवरे चक्क एका रात्रीत बायको-2 मुले सोडून फरार झालेले होते आणि आईने सिंगल पेरेंटिंग करून मुलांना वाढविले होते. काही मैत्रिणींची अति बेढबपणामुळे , खरं तर ऊंचीही अति असल्याने लग्न होत नव्हते. पण त्यांच्या आईने माझी मैत्रीण असल्यामुळे माझ्यापुढे मुलीच्या लग्नाची काळजी बोलून दाखवलेली मला आठवते. ती वेळ जेव्हा मला वाटले अरे ही परदेशी बाईही भारतीय आईसारखीच बोलते आहे, मुलीच्या भवितव्याची काळजी करते आहे. काहीजण एकाकीच होते. बसस्टॉपवरती तर किती जण किती जण भेटले जे फक्त एका स्मितहास्यावरती त्यानी पूर्ण आयुष्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली.किंबहुना जास्तीत जास्त ब्लु कॉलर्ड, गरीब लोक हे बसमध्येच भेटत गेले. साहजिकच आहे.काहीजणी वयाच्या ७० व्या वर्षी नोकरी करताअना पाहील्या कारण काय तर अपार्टमेन्टचे भाडे नाहीतर कोण भरणार, डोक्यावरती छप्पर कसे रहाणार. लोकांच्या वेदना कळत गेल्या आणि हे कळत गेले की आपल्यासारखेच हाडामांसाचे लोक आहेत, सुख-दु:खे आहेत. कदाचित मनोबाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांची दु:खे "विकसित देशातील" दु:खे आहेत पण त्यांच्याकरता ती तितकीच संघर्षमय आहेत.
.
सांगायचा मुद्दा हा की या लोकांच्या vulnerabilities कळू लागल्या आणि त्यांच्याशी मैत्री होऊ लागली, मदतही अर्थात मिळू लागली होती, त्यांच्या मनाचा मोठेपणा कळू लागला होता. मग हे वैचारिक/शाब्दिक आसूड ओढणे, खाजगीत का होईना पट्टकन अविचारी ताशेरे देणे हे कमी होउ लागले. हळूहळू अशी वेळ आली की मुलीच्या ज्या मैत्रिणी ओबिस आहेत त्याच्या बद्दल चक्क काळजी खरंच, खरच काळजी वाटू लागली. स्वतः:ची भावनिक गुंतवणूक झाली. अरे किरा तर आपल्या रियासारखीच आहे, पण ..... ती जर याच गतीने जाडी होत राहिली, तर बिचारीला नाना व्याधी जोडणार, नोकरी कशी मिळणार, लग्न कसं होणार ....वगैरे. (डिस्क्लेमर - नोकरी व लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्ये नाहीत हे जाणून आहे.)
.
म्हणजे एका लक्षात आले की लेबल लावणे हे सोपे असते. याउलट त्या व्यक्तीला, त्या त्या वंशाला , लोकांना जाणून घेऊन, त्यावर विचार करून, जीभेवरती लगाम ठेवून बोलणे हे अवघड असते. कुठेतरी एक फार सुंदर वाक्य वाचलेले होते जे आता आठवत नाही - या अर्थाचे होते - दुसऱ्याला कमी लेखून जो एक वॉर्म ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो, एक जी समाधानाची भावना आपल्याला मिळते ती अतुलनिय असते नाही... तिची तुलनाच अन्य आनंदाशी होऊ शकत नाही. अर्थात हे वाक्य उपरोधिक होते.
.
मला असे नाही म्हणायचे की तुम्ही कोणावरही टीका करूच नका. टीकेचे , constructive criticism चे एक स्वतः:चे अजोड स्थान विश्वात आहे. टीकेमुळे दुसर्यात चांगला बदल घडण्याचे chances असतात निदान टीकेमुळ आपण काही गोष्टी नाकरतो आणि स्वत:लाच डिफाईन करत असतो. टिकापात्र व्यक्ती स्वतः: receptive असेल व ती अंतर्मुख होऊन विचार करू शकली तर टीकेचा लाभही होतो. अन्यथा टीका वायाही जाऊ शकते किंवा उलटूही शकते. पण टीका करण्यापलीकडे, एखादी सिच्युएशन जर माणुसकीच्या डोळ्यांनी पहाता येत असेल तर ते उत्तम. judgement पास करणे, सारासार विवेक,नीरक्षीर विवेक हे बुद्धीचे अंगभूत गुणधर्म आहेत, Faculties of intellect हे मान्यच आहे. पण तरीही आमच्यासारखे लोक कदाचित बुद्धी आणि मन यामध्ये पर्याय दिला तर मनाने, विचार करणे जास्त पसंत करत असावेत. म्हणजे बुद्धी अगदी गहाणच टाकावी असे नाही, पण ... या पणचे काय करायचे? मला ही सीमारेषा आखता येत नाही. कधी एखाद्या व्यक्तीला Discriminate करायचे आणि कधी समजुन घ्यायचा आटोकाट प्रयत्न करायचा.
शुचि मामी , एकदम मस्त पोस्ट.
शुचि मामी , एकदम मस्त पोस्ट. मला तर अम्रिकेतल्या अतिस्वल्प काळात एकदम मस्त माणसं भेटली.अम्रिकेतच काय तर महाराष्ट्र ग्रामीण , ते UP बिहार ग्रामीण via तामिळनाडू ते आफ्रिका सगळीकडं बरी माणसं असतातच . हां,आपल्यासारखे त्यांचेही prejudices असतात . पण अभिनिवेश विरहित वागल्यास ती लोकही prejudices टाकायला सहज तयार होतात. प्रश्न असतो आपल्या चष्म्याचा rather झापडांचा !! हा एक होतं , हि सगळी मंडळी सर्वसामान्य , फडतूस होती एवढे खरे
मला ही सीमारेषा आखता येत
मला ही सीमारेषा आखता येत नाही. कधी एखाद्या व्यक्तीला Discriminate करायचे आणि कधी समजुन घ्यायचा आटोकाट प्रयत्न करायचा.
सीमारेषेचा प्रश्न नाही. डिस्क्रिमिनेट करणे आणि समजून घ्यायचा प्रयत्न करणे या गोष्टी म्युचुअली एक्स्क्लूजिव्ह नाहीत.
आपलं-परकं करणं ही मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. "मी डिस्क्रिमिनेट करत नाही" म्हणणारी व्यक्ती चक्क खोटं बोलत असते. प्रश्न असा आहे की परका हा परका असल्यामुळे आपण त्याला समजून घ्यायचं दार बंद केलं आहे का?
__________
अवांतरः (गब्बर मोड ऑन) डिस्क्रिमिनेट करणे हे चिरंतन मूल्य आहे.
डिस्क्रिमिनेट करणे आणि समजून
डिस्क्रिमिनेट करणे आणि समजून घ्यायचा प्रयत्न करणे या गोष्टी म्युचुअली एक्स्क्लूजिव्ह नाहीत.
हम्म्म!
.
मी डिस्क्रिमिनेट करत नाही" म्हणणारी व्यक्ती चक्क खोटं बोलत असते.
हे खरे आहे खोटं तरी बोलत असते किंवा तिचं तिला चूकीचे का होइना पण पटलेले असते की ती खरच डिस्क्रिमिनेट करत नाहीये. कधी कधी तर "डिस्क्रिमिनेट करायचं नाही" या हेतूने लंबक अधिकच उलटा जातो. उदा - गे. गे लोकांना डिस्क्रिमिनेट करायचं नाही म्हणुन काही कंपन्या अगदी "गे-फ्रेन्डली असण्याचा आव असलेले" पॅम्प्लेट/डोक्युमेन्टेशन ठेवतात. हे सत्य आहे. म्हणजे लंबक पूर्वेला जाऊ नये या काळजीत लंबक पश्चिमेस जास्त हलवला.
लेख प्रचंड आवडण्यात आलेला आहे.
टीका खरोखर अत्यंत जहरीपणाने तुच्छतावाद दाखवुन छद्मी आव आणुनही करता येते याला नकारात्मक टीका म्हणू.
दुसरी वर अचरट व शुची म्हणाले तशी कन्स्ट्रक्टीव्ह क्रिटीसीझम ही करता येतो. ( मी दोन्ही प्रकार वापरतो )
पण माझीही एक आदर्श स्वरुपात आंतरजालावर चर्चा व्हावी अस स्वप्न आहे फॅन्टसी आहे ( जी मी स्वतःच प्रत्यक्षात करण्याच्या अजुन लायक नाही याची जाणीव आहे.)
मला सेल्फ हेल्प ची आदर्शवादी पुस्तके व त्यातल्या टेक्नीक्स आवडतात. माझी त्यात भाबडी आशा आहे मी ते वाचुन कधी उत्तेजीत होतो.. श्री स्टीव्हन कोव्ही एक सुंदर पद्धत एका व्याख्यानात सांगतात. नविन काहीच नाही आपणही अनेकांनी आपल्या हपिसाच्या कार्यक्रमात ऐकली वापरलीच असेल. पण मला अस वाटत इथे मराठी आंजा वर ती वापरुन प्रयोगापुरती अधुन मधुन वापरायला हवी. तर त्यांनी एक इंडियन टॉकींग स्टीक चा उल्लेख केलाय. म्हणजे थोडक्यात मी ती आपल्या आंजावरील चर्चेला टेलरमेड करुन पाहीली ती अशी. ती आपण अशी वापरु शकतो असे मला वाटते
१- सर्वप्रथम कुठल्याही अतीतप्त चर्चेच्या विषयात आपण अस करायच की आपल्या कडुन एखाद्या चर्चकाला " हा घे धारण कर हा पिवळा गुलाब " अस म्हणायच ( त्या मूळ उदाहरणात काठी आहे ती नको आपल्या इथे एखादा काठीच टाळक्यात हाणेल वर तुम्ही नाठाळ आम्ही तुकाराम वगैरे ,म्हणून मी पिवळ फुल सुचवतो हे मैत्रीच प्रतिक रोज डे ला मैत्री साठी पिवळ गुलाब देतात त्यावरुन घेतल.
२- आपण ज्याला पिवळा गुलाब दिला त्याचा अर्थ असा की आपण त्याचा मुद्दा जो काही आहे तो पुर्णपणे प्रामाणिकपणे समजुन घ्यायचा प्रयत्न करणार. म्हणजे आपला मुद्दाच नाही त्याचा. पिवळा गुलाब देणे हे मैत्रीपुर्ण मी तुला समजुन घेण्याचा प्रयत्न करतो याचे जाहीर प्रगटन आहे. मग त्याला त्याचा मुद्दा मांडायला सांगावा किंवा अगोदर मांडुन झाला असेल तर तो समजुन घेण्याचा प्रयत्न करावा.
३- नंतर आपण तुझे म्हणणे असे असे आहे की......१ २ ३ असे मांडुन दाखवायचे की बघ मी बरोबर समजलो का नाही ? त्याला त्याचाच मुद्दा जो काय आपल्याला कळला तो मांडुन दाखवावा. शक्यतो आकड्यात अशासाठी की ५ पैकी कदाचित तो ४ पास करु शकेल व म्हणेल की तुला बरोबर कळलय पण ३रा मुद्दा चुकला. मग आपल्याला तेवढच पुन्हा मांडणे बाकी राहील.
४- तर अगोदर त्याच्या कडुन ग्रीन सिग्नल घ्यावा तो म्हणाला ओके आता तुला एक्झॅक्टली कळले की मला काय म्हणायचे आहे. मग आपला गुलाब परत मागुन घ्यायचा. मग आपला मुद्दा मांडायचा मग तो प्रयत्न करेल आपल्या मुद्द्याला समजण्याचा व आपण त्याला ओके ग्रीन सिग्नल देउ असे करत राहावे. म्हणजे थोडक्यात वा मेरी आवाज सुनो कडुन आपला प्रवास मिले सुर मेरा तुम्हारा कडे होइल.
५- आता एक नियम ठेवायचा (हा मी आंजानुभवावरुन शोधला ) एखादा गुलाब धरुनच बसला व तुम्ही सारख दहा वेळा जरी मुद्दा मांडुन दाखवला तर इथे एक शक्यता आहे की तो म्हणेल तुला मला काय म्हणायच ते कळलच नाही गड्या तर प्रॅक्टीकल वांधा होइल. त्यामूळे २ वेळा प्रयत्न करण्याची मर्यादा ठेवायची. मी दोनदा प्रयत्न केला तुला समजुन घेण्याचा की थांबायच मग दुसर्याने आता दोनदा प्रयत्न करायचा मला समजुन घेण्याचा. असे. हे म्हणजे कोव्हीची आयडीया मराठी आंजा ला टेलरमेड करणे.
६- तर हा गावठीच जुनाच व वेलनोन उपाय, थोडक्यात अपोनंट चे स्टेटमेंट समजुन रीस्टेटमेंट करणे इतकाच थोडक्यात आहे. प्रश्न कृतीचा आहे आणि मित्रांनो हा खरोखर प्रभावी उपाय आहे. याला प्रत्येकाने इच अॅन्ड एव्हरी टाइम वापरावे असे नाहीच म्हणत पण मी जमेल तेव्हा जमेल तितक्या वेळा वापरुन पाहीन असे धोरण ठेवायला हरकत नाही. म्हणजे आज मुझे कत्लेआम करना है किंवा आज बोंबा ठोकायच्याच आहेत किंवा विकारशरण व्हायचेच आहे तर हो बाबा अधुन मधुन चालेल क्योकी परफेक्शन मे इम्र्पुव्हमेंट नही हो सकती म्हणुन अॅज मच अॅज पॉसिबल हा नियम चालेल.
७- संस्थळाने अशा व्यक्तींना एक श्रेणी द्यावी गुलाबी समजुतदार प्रतिसाद सर्वांनी असे गुलाबी श्रेणी देऊन जो समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय यशस्वीपणे त्याला प्रोत्साहन द्यावे. संपादक मंडळाने एक गुलाबराव अशी दर आठवड्या महीन्याला निकाल जाहीर करुन बोर्डावर लावावा. या महीन्यातल गुलाबी समजुत दार व्यक्तिमत्व ( ज्याने सर्वात जास्त पिंक पॉइंट्स मिळवले तो ) याने खवचटांना गुलाबराव व्हायची महत्वाकांक्षा निर्माण होइल कदाचित. ( हे अती स्वप्नील होत आहे हे मान्य आहेच तरीही....)
८-आता वरील प्रतिसाद टंकल्यावर सर्वात अगोदर बळी राजा अर्थातच मीच असेल ( एक काम करना लय वाजुन राहीला तुच तुझ्यापासुन सुरुवात कर की आम्ही बनवु हो तुला गुलाबराव ) तर हो मी करेल सुरुवात नक्कीच, माज्या डोळ्यात अजुनही स्वप्नील भाबडेपणाची झाक दिसते. मी सिरीयसली करेल फक्त प्रत्येक वेळेस माझा गळा पकडुन मला या प्रतिसादाची आठवण न करुन देता मलाही अधुन मधुन विकारवश झाल्यास होण्याची मुभा देत रहावी.
९- शिवाय हे प्रत्येक धाग्यासाठी नाही केवळ वादळी ज्वालाग्रही ज्वलंत स्फोटक आक्रमक भीषण विषय व वाद जेथे उपस्थित झालाय तिथे याचा वापर प्रामुख्याने करावा असे म्हणणे आहे. म्हणजे फारस ओझ ही राहणार नाही.
१०- हे केवळ कोणीतरी जेन्युइन विरोधी मुद्दा समजुन घेण्याचा केवळ प्रयत्ने मात्र चर्चेस स्फुर्ति येइल. चर्चकास समाधान होइल. एक वातावरण सौदार्हा चे निर्माण होइल. कोव्ही म्हणतो अगोदर एथोज इमोशन्स ने सुरुवात करावी मग पॅथोज मग शेवटी लोगोज लॉजिक तर्क हा सर्वात शेवटी वापरावा. तसे होइल. असे वाटते.
मग करायची का सुरुवात ? जेव्हा ज्वलंत चर्चा होइल तेव्हा मला सांगा मी वापरुन दाखवतो ( आता सुटका अशीही नाहीच शिकारी खुद यहॉ शिकार हो गया )
https://www.youtube.com/watch?v=HUxi-Zc45tA
https://www.gbnews.ch/the-7-habits-of-highly-effective-people-habit-5-s…
हाहाहा मस्त. पण एक कळलं नाही
हाहाहा मस्त. पण एक कळलं नाही - "समजूतदार" अशी श्रेणी निर्माण करायचीये का? आणि मग जर बापटजी समजा (एक उदाहरणादाखल) त्यांना आठवड्याला जास्त समजूतदार श्रेणी मिळाल्या तर .... हां तर पुढे का? त्यांनी लेख लिहायचा का?
____
की एखाद्या क्लिष्ट लेखाच्या लेखकाला आपण पिवळा गुलाब द्यायचा आणि त्याचा लेख आटोकाट समजुन घेण्याचा प्रयत्न करायचाय?
मला अस म्हणायच होत की
क्लिष्ट विषयापेक्षा मला म्हणायच आहे ज्या विषयावर टोकाचे मतभेद व भावना तीव्र असतात. तिथे परस्परांचे मत नेमके काय आहे हे समजुन घेण्याच प्रयत्नच होत नसतो. उदा. आरक्षणाचा विषय. म्हणजे मतच मुळात न समजुन घेतल्याने दोन्ही एकाच बाजुचे असुनही कधी कधी भांडतांना दिसतात.
मी जे म्हणतोय ते आपण स्वतःहुन दुसरा काय म्हणतोय त्याच मत त्याचा मुद्दा पुढे होउन समजुन घेण्याचा प्रयत्न करणे. यात पुढाकार आहे व समजले की नाही याची मान्यता समोरच्या कडुन घेणे आहे. यातला दुसरा भाग मत समजुन घेणे याचा अर्थ मतभेदाचे स्वातंत्र्य हरवणे असा नाही. वादाच्या शेवटी दोघांची मते पुर्णपणे परस्परविरोधी असु शकतात. मात्र ती गैरसमजातुन नसतात त्यात परस्परांचे म्हणणे पुर्णपणे समजुन मग हा निष्कर्ष आलेला आसतो. याने मोठा फरक पडतो. हा एका प्रगल्भ चर्चेचा शेवट असतो ज्यात दोन्ही एकमेकांच्या मुद्द्यांंना व्यवस्थित आकलन झालेले असतात.
स्वतःहुन अगोदर समजण्याचा प्रयत्न करणे फार सकारात्मक बाब आहे. यात विनम्रता आहे , वेगळ्या मताला समजुन घेण्याची संवेदनशीलता आहे. विद्यार्थी वृत्ती आहे., त्यात योग्य काही आढळल्यास घेण्याची तयारी आहे. शिवाय संवाद आवश्यक आहे.
आपण जर आपल्या मतालाच पुश्टी देणारे चॅनल, क्लब, संस्थळ, वर्तमानपत्र, पुस्तक, मित्र , कट्टा, संस्था शीच जोडुन घेत राहीलो तर आपण नक्कीच मर्यादीत होत जातो. आपल्याला दुसरी बाजु कळतच नाही. आपल्याकडे प्रत्येक वर्तुळे बनलेली आहेत. प्रत्येकजण आपापल्या पुर्व ग्रहाच्या ऑर्बिट मध्येच फिरत राहतो आयुष्यभर. इथे बदलाची शक्यता विकासाची शक्यता मावळते. सानेगुरुजी म्हणतात तसे वादात हरणारा जिंकतो त्याला नविन मत माहीत होते. तसे काहीसे अर्थात समजुन घ्या म्हणजे त्याच्या मताशी सहमती किंवा असहमती दोन्हीचे स्वातंत्र्य आहेच. फक्त अओदर प्रत्यत्न व्हाव्हा आपल्याकडुन व सर्टीफिकेट तो देणार ज्याचे मुळ मत आहे.
वरील श्रेणी कल्पना एक प्रोत्साहन म्हणुन फक्त राबवता येइल इतकेच सुचवले आहे तो खेळ खेळावा या अर्थी नाही. म्हणजे या महीन्यात बापट गुलाबराव असतील म्हणजे त्यांच्याकडुन इतरांची मते समजुन घेण्याचा पुढाकारी प्रयत्न सर्वात जास्त वेळा केला गेला.. व समोरच्याची ओके तु माझे म्हणजे अचुक समजलास हे ओके त्याला सर्वात जास्त वेळा रीसीव्ह झाले. इतकेच पुढच्या महीन्यातली गुलबकावली कदाचित तुम्ही असाल इतकेच. तो खेळ म्हणुन नाही .एक जस्ट प्रोस्त्सहन इतकेच. की हा माणुस सर्वात जास्त प्रयत्नशील आहे.
आपळे म्हणणे नुसते कोणी तरी ऐकुन घेतोय इतकीच केवळ इतकीच बाब फार शांत करणारी असते. त्यात कोणी तरी आपले म्हणणे नेमके काय आहे मत काय आहे हे समजुन घेण्याचा आटोकाट प्रयत्न आपले समाधान होइपर्यंत करतोय ही फारच सांत्वनपर अशी बाब असते.
यातुन दोन विरोधी व्यक्तींमध्ये निर्माण होणार जे वातावरण आहे त्याची प्रत फार वेगळी होउन जाते. एक संवाद निर्माण होतो. त्याचा शेवट जरी पुर्णपणे विरोधी मते एकमेकांची एका विषयावर असली तरी त्यात परस्परांच्या मताव्विषञी आदर असतो. आपण कुठे नेमका वेगळा विचार करतोय व समोरचा काय विचार करतोय नेमका याची जाण असतो. हे समोरच्याचे काहीच न ऐकता व समजुन न घेता आपलेच म्हणणे दामटण्याच्या आक्रमक वृत्तीपेक्षा फार च वेगळे असे असते.
बोलणार्याचं तोंड धरता येतं
बोलणार्याचं तोंड धरता येतं का
१९८७ च्या आसपास शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेकवेळा धमकी दिली होती की "बाळासाहेबांना पकडणार, बाळासाहेबांना पकडणार". वृतपत्रात ती बातमी अनेकदा छापून आली होती. शेवटी न राहवून... एकदा दादा कोंडके असं म्हणाले की ते स्वतः शंकररावांकडे गेले आणि त्यांनी विचारले - "अहो शंकररावजी चव्हाणजी, तुम्ही म्हणता बाळासाहेबांना पकडणार, बाळासाहेबांना पकडणार.... पण आम्हाला हे सांगा की बाळासाहेबांचं काय पकडणार ? ... म्हंजे डोकं पकडणार, हात पकडणार, पाय पकडणार .... काय पकडणार ??"
मतस्वातंत्र्याचा आदर
मतस्वातंत्र्याचा आदर करावा.
मग मुल्ला ओमर आणि आयसिस नी ( कोणाला पाहिजे तर इथे संघ, विहीप हे शब्द घाला ) काय घोडे मारले आहे? त्यांच्या मतस्वातंत्र्याचा का आदर होत नाही?
त्यांच्या मतस्वातंत्र्याचा आदरच आहे. पण समजा त्यांचे मतस्वातंत्र्य *&^%$ आहे असे कुणाचे मत असेल तर त्याच्या मतस्वातंत्र्याचाही आदरच आहे.
बेसिकली कुणाचेही मतस्वातंत्र्य अॅज़ लाँग अॅज़ इट डजंट बिकम प्रोब्लेम्याटिक लीगली- हे चालवून घेतले जावे. त्याच्या आडून जर कुणी मुद्दाम हिरोगिरी करत असेल तर मात्र त्याला/तिला फटकावलेच पाहिजे.
वाच्यार्थ वि. गर्भितार्थ
बेसिकली कुणाचेही मतस्वातंत्र्य अॅज़ लाँग अॅज़ इट डजंट बिकम प्रोब्लेम्याटिक लीगली- हे चालवून घेतले जावे.
वाच्यार्थाने ठीकच आहे. परंतु 'तुमच्या मताचा आदर आहे' या वाक्याचा गर्भितार्थ 'तुझ्या बैलाला घो१' असा आहे.
-----------------
१ या वाक्प्रचाराचा अर्थ कृपया कोणीतरी समजावून सांगावा.
बैलाला घो हा दोनतीन
बैलाला घो हा दोनतीन शिव्यांच्या ऑर्जीतून तयार झालेला, आईबाप नसलेला शब्दप्रयोग आहे. 'आईच्चा घो' म्हणजे आईचा नवरा. (सखू माहेरी आली हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा - फेम घो म्हणजे नवरा). आणि तुझ्या 'बैलाला हो' असं म्हणून होळीत ओरडण्याची प्रथा आहे. आता इथे हो म्हणजे बैलाला नक्की काय करायचं हे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिलेलं आहे. अमेरिकन भाषेतली (हीस इंग्रजी म्हणण्यास काही सदस्यांचा तीव्र आक्षेप आहे) 'हो' नसावी. मी बैलाला हो चा 'बैलाचा ढोल' असा तितकाच निरर्थक पंक्तीप्रपंच ऐकलेला आहे. पण 'पोएम डझ नॉट नीड टु मीन, जस्ट बी (अ पोएम)' हे कवितेप्रमाणे शिवीलाही लागू होत असावं.
"तुमच्या मताविषयी आदर आहे" हे
"तुमच्या मताविषयी आदर आहे" हे वाक्य अतिशय फसवे आहे. खरे वाक्य "तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे" असे पाहिजे. त्यातही खरेतर "इंटरनेटचा प्रसार झाला म्हणून काय वाट्टेल ते बरळतात साले/मेले" हेच काय ते निके सत्त्व.
बॅटू सारख्या सांख्यिकीशास्त्राच्या अभ्यासकासाठी - Aumann's agreement theorem (The Annals of Statistics मधून साभार)
तुला समजलं तर मलाही समजावून सांग रे.
त्यातही खरेतर "इंटरनेटचा
त्यातही खरेतर "इंटरनेटचा प्रसार झाला म्हणून काय वाट्टेल ते बरळतात साले/मेले" हेच काय ते निके सत्त्व.
याला उत्तर
"If you got an internet connection and a social media account, then does it mean that you would say whatever comes to your mind?"
"Yes"— Rofl Gandhi Dobara (@RoflGandhi_) September 4, 2016
छान !
छान लिहिलंय. हो भारताबाहेर स्थायिक होणाऱ्यांचे "मी इंडियात असताना" आणि "इथे आल्यावर" अशा दोन विशिष्ट अवस्था असतात हे नक्की. वेस्टर्न (अमेरिकन, युरोपीय) लोकं ही वेगळी असली तरी आपल्या सारखीच असतात याची कुठेतरी जाणीव होते. शेवटी सगळे मानवंच.
याउलट त्या व्यक्तीला, त्या त्या वंशाला , लोकांना जाणून घेऊन, त्यावर विचार करून, जीभेवरती लगाम ठेवून बोलणे हे अवघड असते.
जशी इथल्या लोकांच्या टीकेची जागा सर्वसमावेशकता घेते तसंच काही प्रमाणात आपले अमेरिकेत स्थायिक झालेले व्यक्तीही इंडियात राहणाऱ्या लोकांची मग टीका करायला लागतात. कुणाला व्यायाक्तीत म्हणत नाहीय, जस्ट एक जनरल ऑबझर्वेशन.
टीका दोन प्रकारच्या आहेत
टीका दोन प्रकारच्या आहेत .दुसय्राला बदलवून टाकण्यासाठी केलेली आणि मी किती शहाणा आहे हे दाखवण्यासाठी केलेली.